Monday, October 6, 2025

 

धर्मपीठाच्या प्रमुख पदावर - पोप, शंकराचार्य, मौलवी, रब्बी, दलाई लामा किंवा इतर कुठलेही सर्वोच्च धर्माचार्य म्हणून महिलेची नेमणूक झाली आहे अशी नुसती कल्पनाच करा.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात काल शुक्रवारी ३ ऑकटोबर , २०२५ रोजी एक महत्त्वाची घटना घडली.
या घटनेची किती वृत्तपत्रांनी नोंद घेतली आहे, किती लोकांपर्यंत या ऐतिहासिक, भवितव्याला एक वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनेची माहिती पोहोचली आहे हे मला माहित नाही.
ख्रिस्ती धर्मपिठाच्या इतिहासात नव्हे मानवी इतिहासात हा एक ऐतिहासिक क्षण घडला आहे..
भारतात आणि इतर अनेक देशांत अस्तित्व असलेल्या इंग्लंडच्या अँग्लिकन चर्चच्या ५०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कँटरबरीच्या आर्चबिशपची जबाबदारी एका महिलेला देण्यात आली आहे.
अनेक शतकांपासून इंग्लंडचे राजा/ राणी अँग्लिकन चर्चचे प्रमुख आहेत.
कँटरबरीचे आर्चबिशप जागतिक अँग्लिकन चर्चचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आहेत,
सारा मल्लली (वय ६३ वर्षे) यांना इंग्लंड येथील कँटरबरीच्या पहिल्या महिला आर्चबिशप म्हणून नेमण्यात आले आहे
बहुतांश प्रमाणात पुरुषसत्ताक सत्तेचा इतिहास असणाऱ्या मानवी संस्कृतीत ही घटना खूप महत्त्वाची आहे.
याचे हादरे पुढे सतत बसणार आहेत हे नक्की.
परंपरेनुसार अँग्लिकन चर्चचे प्रमुख असलेल्या ब्रिटिश राजे / राणी आहेत. अँग्लिकन चर्चच्या आर्चबिशप पदासाठी उमेदवारांची निवड इंग्लंडच्या चर्चच्या संस्थेने केली जाते आणि याबाबत पंतप्रधानांना सल्ला दिला जातो.
त्यानंतर अँग्लिकन चर्चचे प्रमुख असलेल्या ब्रिटिश राजे / राणी यांच्याकडून अधिकृतरीत्या नूतन आर्चबिशपच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले जाते,
अँग्लिकन चर्चच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरला, कारण ५०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कँटरबरीच्या आर्चबिशपची जबाबदारी एका महिलेला देण्यात आली आहे.
मानवी संस्कृतीच्या इतिहासात आजतागायत कुठल्याही धर्माचे सर्वोच्च पद किंवा प्रेषित पद महिलेला देण्यात आलेले नाही.
इतकेच नव्हे तर परमेश्वर किंवा देव पुरुष आहे असेच सगळीकडे गृहीत धरलेले आहे.
य पार्श्वभूमीवर एक महिलेची सर्वोच्च धर्माचार्य म्हणून नेमणूक होणे ही एक अत्यंत क्रांतीकारक घटना आहे असे मी समजतो.
ही नेमणूक महत्त्त्वाची आहे याचे कारण म्हणजे जगातील सर्वच धर्मांत आजही पुरुषसत्ताक वागणूक असते आणि स्त्रियांना अन्यायकारक, दुय्यम दर्जाची वागणूक देणे योग्य नाही असा संदेश या घटनेतून सगळीकडे जाणार आहे.
चर्च ऑफ इंग्लंड हे अनेक बाबतींत सुधारणा राबवण्यात अग्रेसर राहिले आहे.
इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या अँग्लिकन चर्चमध्ये महिलांना धर्मगुरूपद देण्याची परवानगी १९९० च्या दशकाच्या मध्यापासूनच देण्यात आली आहे.
याउलट जगात सर्वाधिक अनुयायी असलेल्या आमच्या कॅथोलिक चर्चमध्ये सुधारणा गोगलगायीच्या मंद गतीने होत असतात. कॅथोलिक आणि इतर अनेक पंथांच्या चर्चेसमध्ये महिलांना आजही धर्मगुरू होता येत नाही,
चर्च ऑफ इंग्लंडच्या संपूर्ण जगात १६५ देशांत ८५० लाख अनुयायी आहेत. भारतात, महाराष्ट्रात आणि पुण्यामुंबईत अँग्लिकन चर्चचे अस्तित्व आहे.
उदाहरणार्थ, पुण्यातील गुरुवार पेठेतील पंचहौद चर्च, किंवा पवित्र नाम देवालय आणि खडकी येथील सेट मेरीज चर्च, मुंबई-पुणे हमरस्त्यावर खडकी येथील ऑल सेंट्स चर्च, पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोस्ट ऑफिसाशेजारी असलेले सेंट पॉल चर्च वगैरे.
सन १९९८ ला दीक्षा मिळालेल्या चित्रलेखा आढाव ( विवाहानंतर चित्रलेखा जेम्स ) या चर्च ऑफ इंग्लंडच्या पुण्यातील पहिल्या महिला धर्मगुरू. पुण्यात सध्या पाच दीक्षित महिला धर्मगुरू आहेत.
रेव्हरंड सोफिया मकासरे यांची दोनेक वर्षांपूर्वी पुलगेटजवळील सेंट मेरीज चर्चच्या प्रमुख धर्मगुरू म्हणून निवड झाली होती.
धर्मगुरुपदाची दीक्षा मिळून एखादा चर्चची सूत्रे मिळणाऱ्या शहरातील त्या पहिल्याच महिला. मात्र अलिकडेच त्या इंग्लंडला धर्मगुरु म्हणून गेल्या आहेत.
या चर्च ऑफ इंग्लंडची महाराष्ट्रात अनेक खेड्यापाड्यांत चर्चेस आहेत हे ऐकून अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
नगर शहराजवळ असलेल्या करंज या गावातील अँग्लिकन चर्चने काल शनिवारी ४ ऑकटोबरला आपला १०२वा वर्धानपनदिन किंवा सण साजरा केला.
सारा मल्लली हे पद स्वीकारणाऱ्या १०६व्या धर्मगुरू आहेत. त्या आपले पद पुढील वर्षांच्या जानेवारीमध्ये स्वीकारतील.
कँटरबरीचे आर्चबिशप काय करतात?
सार्वजनिक जीवनातही एक महत्त्वाची भूमिका निभावतात — कारण त्यांना इंग्लंडच्या संसदेमधील ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’मध्ये खासदारकीचे एक पद राखीव असते.
याचा अर्थ असा की ते महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणू शकतात, धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य करतात.
दोन मुलांची आई असलेल्या मल्लली यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये ३५ वर्षांहून अधिक काळ सेवा केली.
समानलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्यास अखेर परवानगी देण्याच्या २०२३च्या निर्णयाचे त्यांनी “चर्चसाठी आशेचा क्षण” असे वर्णन केले होते .
कँटरबरी आर्चबिशप म्हणून नियुक्तीनंतर सारा मल्लली यांनी मँचेस्टरमधील यहुदी उपासना स्थळी झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी म्हटले चर्चची जबाबदारी आहे की “यहुदी समुदायासोबत उभे राहावे आणि यहुदीविरोधाला विरोध करावा.”
त्या स्वतः पहिल्या महिला आर्चबिशप आहेत यावर त्यांनी फारसा भर दिला नाही.

Camil Parkhe

Wednesday, October 1, 2025


देवाचे गोठणे. कोकणात राजापूरजवळ देवाचे गोठणे हे गाव आहे. मराठी साहित्यविश्वाची थोडीफार ओळख असलेल्या कुणाही व्यक्तीला हे नाव परिचित असेल.

सत्तरच्या दशकात मी पहिल्यांदा राजापूर येथे पोहोचलो तेव्हा बॅरिस्टर नाथ पै यांचा हा लोकसभा मतदारसंघ आणि इथली अवचितपणे अवतरणारी `राजापूरची गंगा’ म्हणून हे शहर ऐकून होतो.
नाथ पै यांचा या मतदारसंघात पुढे वारसा चालवणारे मधू दंडवते यांचे नाव तोपर्यंत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या नजरेत भरले नव्हते.
तर देवाचे गोठणे लक्षात राहते ते एका वेगळया प्रकारचे नाव असलेल्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या पुस्तकामुळे.
माधव कोंडविलकर यांनी लिहिलेले हे आत्मकथन सत्तरीच्या दशकातील दया पवारांचे `बलुतं', सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचे `अगा जे कल्पिले नाही' आणि, लक्ष्मण माने यांचे 'उपरा' अशा पहिल्या दलित लेखकांच्या आत्मकथनांत आपले स्थान राखून आहे.
अशा प्रकारे लक्षात राहिलेल्या या गावाचे नाव काही महिन्यांपूर्वी ऐतिहासिक संदर्भात वाचले तेव्हा हे नाव अधिक ठळकपणे मनात कोरले गेले.
नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या `सावलीचा शोध' या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात देवाचे गोठणे येथील बाबाजी रघुनाथ या ख्रिस्ती झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या कोकणस्थ ब्राह्मण माणसाविषयी केलेली संक्षिप्त नोंद वाचली अन ख्रिस्ती समाजात आढळणाऱ्या असंख्य जातीजमाती या विषयावरील लिखाणाबाबत माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात बीज पेरले गेले होते.
रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांनी १८८१ साली लिहिलेल्या `अमेरिकन मराठी मिशन यासंबंधी मंडळ्यांची संक्षिप्त बखर' या पुस्तकात बाबाजी रघुनाथ मराठे या आद्य एतद्देशीय ख्रिस्ती मिशनरीबाबत माहिती लिहिली आहे.
अहिल्यानगरमधून ख्रिस्ती झालेल्या पहिल्या काही ब्राह्मण व्यक्तींमध्ये रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांचा समावेश होता.
त्यांची आणखी एक ओळख म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत कृष्णाची भूमिका करण्याबाबत प्रसिद्ध असलेले अभिनेते शाहू मोडक यांचे ते पणजोबा.
या पुस्तकात मोडक यांनी लिहिले आहे,
'' या (अहमदनगर) मिशनातील पहिले एतद्देशीय ख्रिस्ती साह्यकारकही उच्च जातींतले मनुष्य होते. बाबाजी रघुनाथ मराठे नामक कोकणस्थ ब्राह्मण जो मुंबईस मिशनरी लोकांस भाषा शिकवणारा पंडित असता, ख्रिस्ती शास्त्र शिकून व सत्याची खात्री पावून ख्रिस्ती झालेला होता, तोच या मिशनातला पहिला एतद्देशीय ख्रिस्ती उपदेशक होता.’’
मात्र अवघे बेचाळीस वर्षे आर्युमान लाभलेल्या या कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती माणसाचे भारतीय सामाजिक इतिहासात आणखी एक आगळेवेगळे स्थान आहे.
त्याकाळात ब्राह्मण आणि इतर वरच्या वर्णातील पुरुषांनी एखाद्या विधवेशी रितसर लग्न करणे ही अशक्यप्राय घटना होती. बाप्तिस्मा स्विकारुन ख्रिस्ती झालेल्या बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाने नेमके हेच केले.
त्या जमान्यात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते.
या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही पहिलीच घटना. बाबाजी रघुनाथ मराठे यांनी अमेरिकन मिशनच्या मुंबईतल्या आवारात आवडाबाई नावाच्या एक ब्राह्मण विधवेशी विधिवत लग्न करून हा इतिहास घडवला.
रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत लिहिले आहे: `` १८३१ साली या (ख्रिस्ती) मंडळीत बाबाजी रघुनाथ हा एकच एतद्देशीय ख्रिस्ती होता.
१८३१ यावर्षी आवडाबाई ब्राह्मणीण, जी बाबाजी रघुनाथाची बायको ती, कोंडू महार, काशिबा महार आणि भिक्या महार ही चौघेजणे (ख्रिस्ती) मंडळीत मिळाली.''
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनी १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती. त्यावेळी ब्रिटिश संसदेने कायदा संमत करुन भारतात विधवाविवाह कायदेशीर ठरवला होता.
कॅथोलिक धर्मगुरु आणि नन्स यांनी आजन्म अविवाहित राहण्याचे व्रत स्विकारलेले असते. बाबाजी रघुनाथ मराठे हे ज्या प्रोटेस्टंट ख्रिस्ती मिशनरींबरोबर काम करत होते त्यांच्यामध्ये विवाह आणि पुनर्विवाह निषिद्ध नव्हता.
पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी धोंडो केशव कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या पुण्यातील शारदा सदनातील गोदूबाई (नंतर आनंदीबाई) या बालविधवेशी १८९३ला पुनर्विवाह केला होता.
बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
विशेष म्हणजे ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीच्या काळात असा जगावेगळा जीवनपट असलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांचे चरित्र त्यांच्या अकाली निधनानंतर लगेचच १८३५ साली लिहिले गेले होते.
अमेरिकन मिशनरी हॉलीस रीड यांनी लिहिलेले हे चरित्र अलीकडेच पुण्यातील एक संशोधक अशोक एस. हिवाळे यांच्या वाचनात आले आणि `बाबाजीची बखर' या शिर्षकाखाली ७६ पानांचे पुस्तक त्यांनी ते स्वतःच्या सुमित्र प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहे.
मात्र या चरित्रात मी वर उल्लेख केलेल्या बाबाजी रघुनाथ यांनी केलेल्या विधवाविवाहाचा उल्लेख नाही. हा उल्लेख आढळतो तो अमेरिकन मराठी मिशनच्या १८३१-१९१३ या अर्धशतकाच्या कार्याच्या इतिहासात.
विल्यम हेजन यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या `अ सेंच्युरी इन इंडिया - अ हिस्टॉरीकल स्केच ऑफ द मराठी मिशन ऑफ द अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्स (अमेरिकन मराठी मिशन) फ्रॉम १८१३ टू १९१३' या ग्रंथात हा उल्लेख मला आढळला तेव्हा मी अचंबित झालो होतो.
या पुस्तकात लिहिले आहे:
``बाबाजींचा २० नोव्हेंबर १८३१ रोजी बाप्तिस्मा झाला आणि लवकरच त्यांनी ज्या महिलेसोबत ते काही काळ राहात (म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये) होते. अशा एका ब्राह्मण विधवेशी विवाह केला. हिंदू असलेल्या व्यक्तींसाठी प्रथमच हा ख्रिस्ती विवाहसोहळा अशा रीतीने पार पडला आणि हा विलक्षण सोहळा पाहण्यासाठी चॅपेल (छोटे प्रार्थनामंदिर)मध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांसाठी तो एक नवा अनुभव होता.
त्याचवेळी, बाबाजींच्या बाप्तिस्म्याबरोबरच गोपीबाई नावाच्या एका महार स्त्रीलाही प्रभुभोजनात (होली कम्युनियन) सामिल करुन घेण्यात आले आणि अशा प्रकारे हिंदू समाजातील दोन विरुद्ध टोकांचे घटक पहिल्यांदाच या नव्या ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले.
मिशनरींनी एकत्रित आणलेल्या या ख्रिस्ती मंडळीचे स्वरूप विविध घटकांचे मिश्रण वाटावे असेच होते. प्रभुभोजनात सामिल झालेल्या त्या एकोणीस व्यक्तींविषयी त्यांनी म्हटले की, त्या “ जगाच्या चारही दिशांमधून आलेल्या शेम, हाम आणि जाफेथ यांचे ते वंशज आहेत.''
(नौकेच्या मदतीने जगबुडीतून वाचलेल्या नोहाची शेम, हाम आणि जाफेथ ही तीन मुले होती. त्यांच्यापासून पुढे पृथ्वीवर मानववंश विस्तार झाला, असे बायबलमध्ये उत्पत्तीच्या - जेनेसिस - पुस्तकात लिहिले आहे.)
रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत जातीभेदाच्या प्रथेला छेद देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे :
``नोव्हेंबरात बाबाजी रघुनाथ मराठे कोकणस्थ ब्राह्मणातला प्रथमच ख्रिस्ती होऊन या मंडळीला मिळाला. आणि त्याच वेळेला कोणी गोपी महारीणही ख्रिस्ती होऊन या मंडळीला मिळाली. तेव्हा ब्राह्मण व महारीण ही उभयता प्रथमच ख्रिस्ती होऊन भाऊ बहिण अशी होऊन एका पंगतीत बसली असा चमत्कार दृष्टीस पडला.’’
बाबाजींच्या या धर्मपरिवर्तनानंतर लगेचच म्हणजे एक महिन्यातच मुंबईतल्या अमेरिकन मिशनची एक तुकडी अहिल्यानगरला आली. त्या तुकडीमध्ये बाबाजी रघुनाथ मराठे यांचा समावेश होता. या घटनेचे ``अमेरिकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात पुढीलप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे:
``अहमदनगरातील व सभोवतालच्या प्रदेशांतील मिशनच्या इतिहासाला २० डिसेंबर १८३१ मध्ये प्रारंभ झाला. या सुमारास सहा व्यक्ती - यापैकी पाच मिशनरी व एक धर्मांतरित ब्राह्मण भक्त - अकरा दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर येथे येऊन पोहोचले. मुंबईपासून अहमदनगरचे अंतर अवघे २०० मैलांचे असूनही प्रवासाला इतका दीर्घकाल लागत होता. दुसऱ्याच दिवशी ते वचनबद्ध होऊन त्यांनी स्वतःचेच ख्रिस्ती चर्च निर्माण केले. अनेक प्रेरक घटनांपैकी अमेरिकन मिशन बोर्डाच्या बखरीत या पहिल्याच चर्च सभेचा वृत्तांत आढळतो तो असा:
डिसेंबर २१, १८३१
आम्ही, सहाजण ज्यांची नावे खाली दिली आहेत ते या ठिकाणी मुंबईच्या अमेरिकन मिशनची शाखा म्हणून आल्यावर आणि या व्यवहारावर दैवी कृपा व्हावी म्हणून विनम्र विनंती केल्यावर, आम्ही विधियुक्त एकत्रित येत आहोत आणि त्रैक्य, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा - याला ख्रिस्ती चर्च म्हणून समर्पण करीत आहोत.
आमचा स्वीकार व्हावा आणि परस्परांना (आम्ही) आशिर्वादित करुन या ठिकाणच्या लोकांना आशिर्वादित करावे.
अँलन ग्रेव्ह्ज, हॉलिस रॉड
मेरी ग्रेव्हज कॅरोलिन रॉड
विल्यम हार्वे बाबाजी रघुनाथ मराठे ‘’
रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत नगर येथील मिशन स्थापनेचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे:
``याच (१८३१) वर्षांच्या डिसेंबर महिन्यात रेव्ह. (अँलन) ग्रेव्हज साहेब, रेव्ह (हॉलीस) रीड साहेब, रेव्ह. (विल्यम) हार्वे साहेब, हे तिघे मिशनरी सहकुटुंब, बाबाजी रघुनाथ मराठे या एतद्देशीय ख्रिस्ती भावास संगती घेऊन येथे आले आणि या सातांनी १८३१ ता. २१ रोजी म्हणजे शालीवाहन शके १७५३ मार्गशीर्ष वंध्य ३ बुधवार या दिवशी महंमदनगर येथे यथाविधी ईश्वरी भक्ती करण्यासाठी व जे उमेदवार मंडळीस मिळण्यास तयार होतील त्यास मुंबई मंडळींची शाखा अशी एक मंडळी स्थापिली.
नंतर आठ एतद्देशीय मनुष्ये बाप्तिस्मा घेऊन त्यासी मिळाल्यावर त्यांची स. १८३३ मार्च ता. सहा रोजी अहमदनगर मिशनातली शुद्ध एतद्देशीय ख्रिस्ती मंडळी स्थापली गेली. तिजवर रेव्ह. रीड साहेब हे तूर्त पाळक म्हणून निवडले गेले आणि रा. बाबाजी रघुनाथ हे वडील असे आणि रा. दाजीबा निळकंठ (प्रभू) हे सेवक म्हणजे कारभारी असे नेमले गेले.’’
रामकृष्ण विनायक मोडक यांनी पुढे असेही लिहिले आहे:
``या (नगर) मिशनातील पहिले एतद्देशीय ख्रिस्त साह्यकारकही उच्च जातीतले सुशिक्षित मनुष्य होते, बाबाजी रघुनाथ मराठे नामक कोकणस्थ ब्राह्मण जो मुंबईस मिशनरी लोकांस भाषा शिकवणारा पंडित असता, ख्रिस्ती शास्त्र शिकून व त्याच्या सत्याची खात्री पावून ख्रिस्ती झालेला होता, तोच या मिशनातला पहिला एतद्देशीय उपदेशक होता. त्याचप्रमाणे दाजी निळकंठ प्रभूही मिशनशाळेचा पंतोजी मुंबईस असता ख्रिस्ती झाला तो या मिशनचा दुसरा प्रथमचा एत्तद्देशीय ख्रिस्ती उपदेशक होता.‘’
त्याकाळचे अहमदनगर आणि आजचे अहिल्यानगर महाराष्ट्रातील `मराठी ख्रिस्ती समाजाचे येरुशलेम’ असे समजले जाते. अहिल्यानगर शहरातील पहिल्या संस्थापक ख्रिस्ती मंडळींमध्ये पाच युरोपियन मिशनरींबरोबरच बाबाजी रघुनाथ मराठे या कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती व्यक्तीचाही समावेश होता हे विशेष.
बाबाजी रघुनाथ मराठे यांचे मराठी ख्रिस्ती समाजाला आणि पर्यायाने या मातीतल्या संस्कृतीला दिलेले आणखी एक मोठे योगदान आहे.
ते म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच ख्रिस्ती उपासनेच्या प्रसंगी उपयोगी पडेल अशा हेतूने मराठी गीते रचली.
मराठी भाषेच्या इतिहासात फादर थॉमस स्टीफन्स यांच्यानंतर मात्र इथल्याच मातीतील, एतद्देशीय ख्रिस्ती व्यक्तीने केलेली ही पहिलीच पद्यरचना, त्यामुळे या गायनांना आणि भजनकीर्तनाला खूप महत्त्व आहे.
नारायण वामन टिळक किंवा कृष्णाजी सांगळे यांच्याआधी अनेक दशकांपूर्वी बाबाजींनी ही भजने आणि कीर्तने लिहिली होती.
हॉलीस रीड यांनी बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या चरित्रात बाबाजींची अनेक भजने आणि कीर्तनेसुद्धा दिली आहेत. बाबाजींच्या अभंगाच्या अखेरच्या कडव्यात `बाबाजी म्हणे' किंवा `ख्रिस्तदास म्हणे’ अशी ओळ असते.
मात्र बाबाजींबद्दल आणि त्यांच्या काव्य, भजन आणि कीर्तन अशा साहित्यकृतींबाबत काहीच माहिती नसल्याने आणि त्यांच्या आद्य पद्यरचना कुठल्याच उपासना संगीत पुस्तकांत नसल्याने त्यांचे कर्तृत्व आणि महती यावर गेली दोन शतके पडदा पडला गेला होता.
नवलाची आणखी एक बाब म्हणजे बाबाजी रघुनाथ मराठे यांचे अमेरिकन मिशनरी हॉलीस रीड यांनी १८३५ साली लिहिलेले आणि नंतर काळाच्या ओघात गायब झालेले चरित्र अशोक हिवाळे यांना कसे मिळाले ही आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत हिवाळे यांनी याबाबत लिहिले आहे. ते म्हणतात:
``मला बाबाजींचे रेव्ह. हॉलीस रीड यांनी लिहिलेले मराठी चरित्र गुगलवर एका वेबसाईटवर मिळाले. त्याच्या जेपीईजे फाईल्स मी डाऊनलोड करून त्यातील टेक्स्ट युनिकोड टेक्स्टमध्ये रुपांतरीत करुन स्वतःलाच ईमेल केले. तेथून कॉम्प्युटरवर त्याचे श्रीलिपी टाइपात रूपांतर करून हे पुस्तक पेजमेकरमध्ये सेट केले आहे व मुद्रित करण्यासाठी त्याची पीडीएफ फाईल बनवली. ‘’
मला आजही घरच्या टिव्हीवर ओटीटीवर चित्रपट लावणे जमत नाही. लॅपटॉपवर दररोज मी अनेक तास काम करतो, मात्र हे फक्त जुने टाईपरायटर बडवण्यापुरते मर्यादित असते. लॅपटॉपला माऊस लावल्याशिवाय मला टाईप करताच येत नाही, टचपॅडचा वापरच नाही. मोबाईलच्या वापराबाबतसुद्धा डिट्टो.
तर अशा या टेक्नॉसॅव्ही अशोक हिवाळे यांच्या व्यक्तिमत्वाबाबत तुम्ही काय ठोकताळे बांधणे असतील ?
अवघे एकोणऎंशी वर्षे आयुर्मान असलेल्या हिवाळे यांची नजर आता अधू झाली असून त्यांना केवळ एका डोळ्यानेच थोडेफार स्पष्ट दिसते, आतापर्यंत पाच वेळेला हृदयाच्या धक्क्यांना ते सामोरे गेलेले आहेत. हालचाल केवळ त्यांच्या घरापुरतीच मर्यादित आहे. असे असले तरी मोबाईल डोळ्याजवळ घेऊन त्यांचे वाचन-लिखाण, पुस्तक प्रकाशन आणि संशोधन अव्याहत चालू आहे.
हिवाळे यांनी पुण्यात जीवनवचन प्रकाशन या प्रकाशन संस्थेत अनेक पदांवर काम करताना पाचशेहून अधिक पुस्तकांचे संपादन, मुद्रिशोधन केलेले आहे, अनेक पुस्तके लिहिली आहेत,अनुवादित केली आहेत.
मुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या गोव्यातल्या धेम्पे कॉलेजात बीएला माझा ऐच्छिक मराठी हा विषय होता. मराठी लिहिण्याशी माझा तो अखेरचा संबंध. त्यानंतरची माझी संपूर्ण बातमीदारी आणि पत्रकारिता इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीतली.
काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमातला माझा एक मराठी लेख अशोक हिवाळे यांच्या वाचण्यात आला. त्यांच्यातील संपादक आणि मुद्रितशोधक जागा होऊन सहज एक चाळा म्हणून त्यातील शुद्धलेखनातील थोड्याफार चुका कंसात लिहून तो लेख त्यांनी माझ्याकडे पाठवला होता !
काळाच्या उदरात लुप्त झालेल्या आणि आता अचानक अवतरलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या काव्याविषयी अशोक हिवाळे यांनी लिहिले आहे:
``बाबाजींचे हे चरित्र मला फारच आवडले. कारण (हॉलीस रीड या ) लेखकाने ते त्या काळातील मराठीत अगदी सोप्या भाषेत लिहिले आहे. बाबाजींनी ख्रिस्ती मंडळीला केलेला बोध आजही अनुकरणीय, तसेच त्यांनी मंडळीला लिहिलेली पत्रे बोधप्रद आहेत. देवाच्या वचनांनी पुरेपूर भरलेली आहेत. त्या काळात उपासना संगीत नव्हते. बाबाजी हे कवीही होते. त्यांच्याच कविता मंडळीमध्ये गाइल्या जात असत. . त्या काळात बाबाजीने जे निःस्वार्थी परिश्रम ख्रिस्ती मंडळीसाठी केले ते वाखाणण्यासारखे आहेत.
कॉलऱ्याच्या साथीत (1833) त्यांचा दुदैवी अंत झाला व ख्रिस्ती मंडळी एका खऱ्या ख्रिस्ती सेवकाला मुकली. त्यांना अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभले. मला वाटते ते आणखी जगले असते, तर खूप मोठ्या प्रमाणावर व सखोल आध्यात्मिक कार्य अहमदनगर जिल्ह्यात झाले असते. ''
Camil Parkhe


Saturday, September 6, 2025

 

                                                    इन्स्पेक्टर मधुकर झेंडे,  चार्ल्स सोबराज

गोव्यात म्हापशात त्या रात्री साध्या वेशात असलेले इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि मी कदाचित समोरासमोर आलोही असेल, मात्र त्यांच्याशी काही बोलणे शक्यच नव्हते.

आपल्या मुंबई पोलीस टिममधल्या चारपाच लोकांव्यतिरिक्त कुणाशीही एक शब्दसुद्धा बोलण्याच्या मनःस्थितीत ते त्यावेळी नव्हते.

त्या रविवार ६ एप्रिल १९८६च्या रात्री तिथे जमलेल्या आम्हा काही मोजक्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांना अजिबात स्वारस्य नव्हते.

पर्वरी येथील `हॉटेल ओ कोकेरो' येथे चार्ल्स सोबराजच्या शिताफीने मुसक्या बांधल्यानंतर म्हापसा हॉटेलातून चेक-आऊट करून सोबराजसह शक्य तितक्या लवकर गोवा सोडून मुंबई गाठण्याच्या घाईत ते होते.

काल शुक्रवार दुपारी घरच्या टिव्हीवर पिक्चर सुरु झाल्यानंतर `इन्स्पेक्टर झेंडे' असे चित्रपटाचे शिर्षक झळकले आणि डोक्यात तिडीक उठली.

''इन्स्पेक्टरसाठी हेच नाव निवडण्याची काही गरज होती काय?'' असे मी मोठ्याने बोललोसुद्धा.

दोनचार मिनिटे गेली आणि लक्षात आले, ``अरे हो, हा तर मधुकर झेंडे आणि चार्ल्स सोबराज यांच्यावर चित्रपट आहे !''

त्यानंतर मी टिव्हीवरुन नजर वळवली.

आज माझ्या टेबलावर पणजी येथील `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात सोमवार ७ एप्रिल १९८६ रोजी पान एकवर बॅनर म्हणून प्रकाशित झालेली बातमी आहे.

``Sobhraj arrested in Goa ?'' असा प्रश्नात्मक मथळा असलेली जुन्या महाकाय लायनो सेट मशीनवर कंपोझ केलेली ही बातमी आहे.

बातमीला जोड बायलाईन अशी आहे : By Jovito Lopes and Camil Parkhe

प्रश्नात्मक मथळा आहे याचा अर्थ आम्हा दोघा बातमीदारांनासुद्धा पकडलेली व्यक्ती चार्ल्स सोबराजच आहे याची खात्री नव्हती.

साध्या वेशातील इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि त्यांच्या टिममधील कुणीही तोंड उघडण्यास तयार नव्हते.

प्रायव्हेट टॅक्सीमधून लवकरात लवकर त्यांना मुंबई हेडक्वार्टरला जाऊन आपल्या जाळ्यात गवसलेल्या मोठ्या प्राईझ कॅचविषयीची बातमी त्यांना जगजाहीर करायची होती.

आमच्या बातमीत इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांचा उल्लेख `एम झेंडे' असा करण्यात आला होता.

आमच्याकडे खूपच तुटपुंजी आणि ऐकीव माहिती होती,

रात्रीचे नऊ वाजत आले होते आणि जोवितो लोपीस यांच्या स्कुटरवरुन म्हापशाहून पणजीला परतून डेडलाईन वाढवून ती बातमी आम्ही छापण्यात यश मिळवले होते.

दिल्लीतल्या हाय सेक्युरीटी तिहार जेलमधून १६ मार्च १९८६ ला परागंदा झालेल्या चार्ल्स सोबराजला पुन्हा पकडण्यात इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्या टिमला यश आले होते.

तसे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि चार्ल्स सोबराज खूप जुने संबंध होते.

इन्स्पेक्टर झेंडे यांनी याच चार्ल्स सोबराजला आधीही एकदा जेरबंद केले होते.

ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवशी सोमवारी संध्याकाळी दाबोळी विमानतळावरून मी दिल्लीला गेलो होतो, तेथून लगेच त्याकाळच्या सोव्हिएत रशिया आणि बल्गेरिया येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी गेलो होतो.

त्यानंतरच्या पुढील काही महिन्यांत चार्ल्स सोबराज प्रकरणात गोव्यात, मुंबईत आणि भारतात काय घडले हे मला काहीच माहित नाही.

`बदलती पत्रकारीता' या माझ्या पुस्तकात (सुगावा प्रकाशन, २०१९) 'गोव्यात चार्ल्स सोबराजला अटक झाली तेव्हा' हे पहिलेच प्रकरण आहे.

वयोवृद्ध चार्ल्स सोबराज मागच्या वर्षीच नेपाळ तुरुंगातून फ्रान्समध्ये परतला आहे.

मधुकर झेंडे यांचे हल्ली पुण्यात कात्रजला आणि मुलाकडे सिंगापूरमध्ये वास्तव्य असते. झेंडे हे समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचे जवळचे नातलग.

म्हापशात आलो कि आजही बस स्टॅण्डसमोरच्या जीटीडीसी मालकीच्या `म्हापसा रेसिडेन्सी'कडे माझी नजर जातेच.

तेथून पणजीला जाताना पर्वरीला आजही त्याच अवस्थेत असलेल्या `हॉटेल ओ कोकेरो'कडे नजर जाते. कितीतरी गोष्टी नजरेसमोर झळकतात.

साडेचार दशकांच्या माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दितील ही माझी सर्वांत मोठी आणि सर्वाधिक स्मरणीय आणि गाजलेली बातमी.

Camil Parkhe September 6, 2025 




Saturday, August 30, 2025

 

                                                                  Francisco Luis Gomes

गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर डोना पॉलच्या दिशेने जाणाऱ्या दयानंद बांदोडकर मार्गावर मांडवीच्या किनाऱ्यापाशी कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो.
पणजीत असे पुतळे फार कमी आहेत, पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा असलेल्या बहुतेक जुन्या पुतळ्यांची गोवामुक्तीनंतर उचलबांगडी करुन त्यांची रवानगी वस्तूसंग्रहालयांत करण्यात आली आहे.
पणजी येथील मध्ययुगीन आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा त्यातून वाचला, तसाच कला अकादमीशेजारच्या कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा. या दोन्ही पुतळ्यांबाबत यामागील कारण एकच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या दोन्ही व्यक्ती ` नीज गोंयकार' आहेत.
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील कमरेवर एक हात ठेवून असलेल्या या व्यक्तीच्या पुतळ्याकडे सहसा लक्ष जात नाही किंवा अगदी क्वचित लक्ष जाते.
सुरुवातीला शिक्षणानिमित्त आणि नंतर `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात बातमीदारी करताना अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ आणि नंतर शेजारच्या ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी नेहेमीच कुतूहल वाटायचे.
हा पुतळा आहे डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स (Francisco Luis Gomes) यांचा. पोर्तुगीज उच्चारांनुसार फ्रांसिश्कु लुईश गोमिश. गोव्यातील अनेक लोकांनासुद्धा या डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्यता कमीच आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून तीनदा निवडून गेले होते.
त्याशिवाय फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे एक अगदी महत्त्वाचे आगळेवेगळेपण आहे.
एकोणिसाव्या शतकात जेव्हा निम्म्याहून अधिक जग वसाहतवादाने वेढले होते तेव्हा पारतंत्र्यात असलेल्या भारताला पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे फ्रान्सिस्को लुईस गोम्स हे पहिलेच राष्ट्रवादी नेते होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचा हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९३१ साली साली पोर्तुगाल राजवटीतच डॉ. गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता.
गोम्स यांच्या जन्मशताब्दीच्या दिनी म्हणजे ३१ मे १९२९ रोजी या पुतळ्याची कोनशिला बसवण्यात आली होती. या पुतळ्याचे ब्राँझ कास्टिंग इटालीमधील फ्लॉरेन्स शहरात झाले होते.
गोव्यातील तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर जनरल जोआओ कार्लोस क्राव्हेइरो लोपेश आणि आणि ईस्ट इंडिजचे पॅट्रियार्क हे पद असलेले गोव्यातील चर्चप्रमुख डॉम तिओटोनिओ डी कॅस्ट्रो यांनी २३ डिसेंबर १९३१ रोजी या पूर्णाकृती पुतळ्याचे या कंपाल गार्डनमध्ये अनावरण केले.
डॉ. गोम्स यांनी २२ डिसेंबर १८६० रोजी लिस्बनमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवून संसदेच्या आपल्या खासदारकीची सुरुवात केली होती.
पोर्तुगीज राजवटीतच त्यांचा पूर्णाकृती पुतळा पणजी येथे उभारला गेला तेव्हा पोर्तुगाल आणि भारत या दोन्ही देशांसाठी आपली प्रतिभा आणि सर्व गुण समर्पित करणारा देशभक्त म्हणून तेथील शिलालेखात त्यांचा गौरव करण्यात आला होता.
या पुतळ्याच्या चौथऱ्यावर पोर्तुगीज भाषेत खालील शिलालेख आहे . त्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे:
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्या गौरवशाली स्मृतीस
स्वातंत्र्याचे निर्भयी पुरस्कर्ते
प्रखर वक्ते
थोर साहित्यिक
विद्वान अर्थशास्त्रज्ञ
देशभक्त
ज्यांनी आपल्या तेजस्वी बुद्धीच्या
सर्व शक्ती
भारत आणि पोर्तुगालच्या कल्याणासाठी अर्पण केल्या
जन्मशताब्दीप्रित्यर्थ
१८२९–१९२९
" हा पुतळा पोर्तुगीज भारताच्या ७ व्या प्रांतीय अधिवेशनाच्या अभ्यास समितीने सुचवला.
अध्यक्ष डॉ. अँटोनिओ मारिया दा कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली,
प्रख्यात खासदार आणि नामांकित लेखकाचा गौरव करण्यासाठी,
ज्यांनी द ब्राह्मिन्स, द मार्क्विस ऑफ पोम्बाल, राजकीय अर्थशास्त्र आणि भूमी स्वातंत्र्य यांसारखी साहित्यकृती निर्माण केली."
गोव्यात आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली या भारताच्या इतर प्रदेशांत पोर्तुगालची तब्बल साडेचारशे वर्षे सत्ता होती. यापैकी बहुतांश काळात १८२२ नंतर गोवा, दमण, दीव, दादरा नगर हवेली यांचा समावेश असलेल्या पोर्तुगीज इंडियातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
पोर्तुगीज नागरिकांप्रमाणे पोर्तुगालच्या सर्व वसाहतीमध्ये स्थलांतर करण्याचे अधिकार आणि हक्क गोवा, दमण आणि दीव दादरा, नगर हवेली यासारख्या इतर सर्व पोर्तुगीज वसाहतीतील लोकांनाही होते.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गोवामुक्तीआधी म्हणजे १९ डिसेंबर १९६१ आधी पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना पोर्तुगीज नागरिकत्वावरचा हक्क आजही शाबूत आहे.
इतकेच नव्हे तर त्यांच्या पुढच्या दोन पिढ्यांनासुद्धा हा हक्क आहे.
पोर्तुगालमध्ये 1822 सालच्या राज्यघटनेनुसार गोव्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी लिस्बनमध्ये सत्तेवर आलेल्या लिबरल पार्टीने सर्व नागरिकांना मतदानाचे अधिकार दिले होते. विशेष म्हणजे पोर्तुगाल साम्राज्याच्या जगभरातील सर्व वसाहतीतील - पोर्तुगीज इंडियासह- सर्व नागरिकांचा त्यात समावेश होता.
लोकशाही तत्त्वानुसार ही फार मोठी राजकीय घटना होती. अर्थात निवडणुकीत मतदानाचे हे अधिकार काही विशिष्ट लोकाना होते. पोर्तुगीज बऱ्यापैकी लिहू आणि वाचू शकणारे आणि काही किमान सरकारी कर भरणारे पोर्तुगाल साम्राज्यातील वसाहतींतील सर्व नागरिक या मतदानासाठी पात्र होते.
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून तीनदा निवडून गेले होते. .
मात्र फ्रान्सिस्को लुईस गोम्स हेसुद्धा गोव्यातून पोर्तुगाल संसदेवर निवडून जाणारे पोर्तुगीज इंडियातले - गोव्यातले - पहिले नागरिक नव्हते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याआधी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीच बर्नार्डो पेरेस दा सिल्व्हा यांची आणि कॉन्स्टॅनशिओ रॉक दा कोस्टा या दोन गोवन नागरिकांची सर्वप्रथम यांची पोर्तुगालच्या संसदेवर चार जानेवारी १८२२ रोजी निवड झाली होती.
यापैकी बर्नार्डो पेरेस दा सिल्व्हा (१७७५- १८४४) हे पोर्तुगाल संसदेवर गोव्यातून तब्बल तीनदा निवडून गेले होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी मात्र इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, साहित्य अशा विविध क्षेत्रांत भरीव योगदान केले आणि जागतिक कीर्तीला पात्र ठरले. गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरु ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे इंग्रजी भाषेत लिहिलेले विस्तृत चरित्र नॅशनल बुक ट्रस्टने २०१० साली प्रकाशित केले आहे.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचा जन्म दक्षिण गोव्यातील नावेली येथे ३१ मे १८२९ रोजी झाला. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी तरुण वयातच पोर्तुगीज भाषेबरोबरच फ्रेंच, लॅटिन, मराठी, कोकणी भाषांत प्राविण्य मिळवले.
पणजीतल्या गोवा मेडिकल कॉलेजात त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पणजी येथे १८०१ साली स्थापन झालेले हे स्कूल ऑफ मेडिसिन अँड सर्जरी हे केवळ भारताततली नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली आधुनिक वैद्यकीय शिक्षण संस्था होती.
या वैद्यकीय शिक्षणानंतर गोम्स यांनी सहा महिने ब्रिटिश भारतातील मुंबईत वास्तव्य केले.
मुंबईतल्या या अल्प काळात त्यांचा या शहरातल्या मूळच्या गोमंतकीय, अँग्लो इंडियन तसेच पारशी कुटुंबांशी संबंध आला. पोर्तुगीज इंडियाच्या म्हणजे गोव्याबाहेरील इतर भारतीय भागांत प्रचलीत असलेल्या समाजव्यवस्थेची त्यांना पहिल्यांदाच अशाप्रकारे ओळख झाली.
याच काळात त्यांनी मुंबई सोडून उत्तर भारतातील काही प्रदेशांना भेटी दिल्या असाव्यात. याचे कारण म्हणजे पोर्तुगालला गेल्यानंतर त्यांच्या लिखाणात उत्तर भारतातील समाज व्यवस्थेचे चित्रण आढळते. विशेषत त्यांनी पुढे लिहिलेल्या `द ब्राह्मण' या पोर्तुगीज कादंबरीत उत्तर भारतातील समव्यवस्थेचे चित्रण आहे.
ब्रिटिश भारतात असताना याच काळात गोम्स यांनी इंग्रजी, मराठी आणि इतर भारतीय भाषांत प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
गोव्यात परतल्यानंतर गोम्स यांनी गोवा सरकारच्या आरोग्य सेवा खात्यातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेतला. त्यानंतर त्यांची सहाय्यक सर्जन पदावर निवड झाली आणि पणजी येथील सैन्यदलात त्यांची नेमणूक झाली. नंतर त्यांची पोंडा येथे सहायक सर्जन या पदावर बढती मिळाली.
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची १८६०च्या ऑगस्ट महिन्यात दक्षिण गोव्यातून सालसेट- काणकोण मतदारसंघातून पोर्तुगाल संसदेवर निवड झाली. त्यावेळी त्यांचे वय अवघे बत्तीस वर्षे होते.
पोर्तुगीज संसदेत त्यांनी उदारमतवादी विरोधी पक्षात प्रवेश केला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लवकरच ते आपल्या पक्षाचे एक प्रमुख नेते बनले. पोर्तुगालच्या विविध नियतकालिकांत त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. पट्टीचे वक्ते म्हणूनसुद्धा ते गाजले. पोर्तुगीज पार्लमेंटमधील त्यांची भाषणे माहितीपूर्ण असत.
अफोन्सेका नावाच्या एका खासदाराने पोर्तुगीज संसदेतील वसाहतींचे प्रतिनिधित्व रद्द करावे असे एक विधेयक 1861 च्या जानेवारीत आणले होते. इंग्लंडने आपल्या संसदेतील कॅनडाचे प्रतिनिधित्व रद्द केले होते, त्या धर्तीवर हा ठराव दाखल करण्यात आला होता.
आपल्या भाषणातून गोम्स यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. पोर्तुगीज वसाहतीतील लोकांच्या राजकीय हक्कांचा धडाडीने समर्थन करत त्यांनी या विधेयकास विरोध केला.
वसाहतींमधील शेकडो लोकांना त्यांचा केवळ जन्म परदेशातील वसाहतींमध्ये झाला या एकाच कारणास्तव त्यांच्या राजकीय हक्कांपासून वंचित ठेवले जाऊ नये असे त्यांनी ठामपणे मांडले. `परदेशातील वसाहतींमधील लोक सुसंकृत नाहीत, त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क देण्यात येऊ नये' या अफोन्सेका यांच्या मुद्द्यात तथ्य नाही असेही गोम्स यांनी ठणकावून मांडले.
त्यांच्या या भूमिकेमुळे हे विधेयक बारगळले.
फ्रान्समधील साहित्यिक अल्फान्सो डी लामार्तिन (१७९० – १८६९) यांच्यापासून गोम्स यांनी प्रेरणा घेतली होती.
लामार्तिन यांना पाच जानेवारी १८६१ रोजी फ्रेंच भाषेत लिहिलेल्या एका पत्रात गोम्स यांनी म्हटले होते:
``भारत देशात माझा जन्म झाला. जो देश एके काळी काव्य, तत्त्वज्ञान, इतिहास यांचा पाळणा होता व जो आज दुदैवाने त्याचे थडगे होऊन राहिला आहे. ज्या देशाने महाभारत निर्माण केले व बुद्धिबळाचा शोध लावला, तो देश माझा आहे. या दोन महान कृतींत दिक्कालातीत असे काहीतरी आहे. पण हे राष्ट्र ज्याने आपल्या संहितांना कवितेत लिहिले, ज्याने आपल्या राजकारणाला खेळामधून प्रकट केले ते राष्ट्र आता मुळी अस्तित्वातच नाही! हा देश आपल्या मातृभूमीतच कैद झाला आहे, स्वतःच्या समृद्धीनेच पार थकलेला आहे आणि स्वतःच्या वैभवाच्या तेजोमयतेतच झाकोळून गेलेला आहे.
आपल्या पंखांच्या मदतीने हिमालयाच्या उंच शिखरांवर भरारी मारणाऱ्या या पक्ष्याने आता आपल्याच पिंजऱ्याच्या गजांशी झुंजत आपली पिसे गमावली आहेत. कोणे एकेकाळी या पक्ष्याच्या गीताचे स्वर संपूर्ण आकाश व्यापत असत, आता स्वातंत्र्य गमावल्यामुळे आक्रोश करणारी ही कोकिळा आपला मंजुळ स्वरच विसरुन गेली आहे. मी भारतासाठी स्वातंत्र्याची मागणी करत आहे.”
कल्पना करा कि फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी पारतंत्र्याच्या जोखंडात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी १८६१ साली केली.
गोम्स यांनी या पत्रात गुलामगिरीत जखडलेल्या आपल्या देशाची व्यथा मांडत व्यक्त केलेली ही भूमिका तेव्हा गुलामगिरीत असलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामाच म्हणता येईल.
त्या काळात भारत हा प्रदेश एक एकसंघ राष्ट्र आहे अशी संकल्पना या भूमीवर राहणाऱ्या लोकांमध्येसुद्धा सोडा, येथील राज्यकर्त्यांमध्येसुद्धा रुजली नव्हती. या उपखंडातील छोटेमोठे राज्यकर्ते शतकोनुशतके आपापसांत लढत होती.

गोम्स यांनी हे ऐतिहासिक विधान केले त्याच्या चार वर्षे आधीच भारतातील विविध संस्थानिक मांडलिक आणि राजेमहाराजे यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या विरोधात दिल्लीतील शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जाफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ साली उठाव केला होता. आपापल्या मुलखांत आपली सत्ता कायम राहावी यासाठी त्यांनी केलेली ही अखेरची धडपड होती.
त्यामुळेच फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी समुद्रापार युरोपात केलेली ही मागणी विलक्षण आणि ऐतिहासिक ठरते.
भारताला स्वातंत्र्य मिळावे, या देशाची गुलामी संपायला हवी अशी मागणी गोम्स त्याकाळात केली होती आणि तीसुद्धा युरोपात आणि पोर्तुगालच्या भुमीवर ही महत्त्वाची बाब आहे.
भारताला परकीय सत्तेतून मुक्ती मिळावी अशी मागणी तोपर्यंत देशात कुणीही केली नव्हती.
भारताच्या स्वातंत्र्याची अशी मागणी करणारे गोम्स हे पहिलेच भारतीय नेते.
त्यांच्यानंतर तब्बल तीन दशकांनंतर १८९२ साली ब्रिटिश भारतातून दादाभाई नौरोजी यांची इंग्लंडच्या संसदेवर निवड झाली. इंग्लंडच्या संसदेवर खासदार म्हणून निवड झालेले दादाभाई हे पहिलेच आणि एकमेव भारतीय.
भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी करण्याची मानसिकता भारतीय नेत्यांमध्ये निर्माण होण्यासाठी पुढे बराच काळ लागला. त्यामुळेच फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे भारतीय राष्ट्रवादी असणे अधिक ठळक होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी आपल्या याच पत्रात एक महत्त्वाची टिपण्णी केली होती. विशेष म्हणजे गोम्स यांचा हा उतारा देताना त्यातील पुढील वाक्य अनेकदा गाळले जाते, असे गोम्स यांचे चरित्रकार ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी म्हटले आहे.
मात्र या वाक्यातील मतितार्थ खूप महत्त्वाचा आहे. त्या पत्रातील हे वाक्य पुढीलप्रमाणे आहे :
“ही शीर्षके माझ्या देशावर प्रेम करणाऱ्या आणि मानवजातीवर प्रेम करणाऱ्या तुमच्यासाठी पुरेशी शिफारस ठरतील. माझ्याबद्दल सांगायचे झाले, तर मी माझ्या देशबांधवांपेक्षा अधिक आनंदी आहे. मी स्वतंत्र आहे. `Civis Sum'
या वाक्यानंतर त्यांनी `civis sum' (एक नागरिक आहे) हा अभिजात लॅटिन भाषेतला वाक्प्रचार वापरला होता.
` मी सर्वार्थाने सर्व नागरी हक्क आणि अधिकार असलेला एक नागरिक आहे.’ असे या वाक्प्रचारातून स्पष्ट होते.
`मी माझ्या देशबांधवांपेक्षा अधिक आनंदी आहे. मी स्वतंत्र आहे. मी `नागरिक’ आहे,’’ या वाक्यात गोम्स यांनी ब्रिटिश भारतात आणि पोर्तुगीज भारतात लोकांना दिल्या जाणाऱ्या राजकीय आणि नागरी हक्कांची तुलना केली आहे आणि आपल्या भारतीय देशबांधवांपेक्षा आपण अधिक आनंदी आहोत असे म्हटले आहे.
हे स्पष्ट करताना ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी पोर्तुगाल आणि इंग्लंडने जगभरातील आपल्या वसाहतींतील लोंकाना दिलेल्या राजकीय आणि नागरी हक्कांची तुलना केली आहे.
``कारण पोर्तुगालने गोव्यातील आणि आपल्या इतर वसाहतींतील लोकांना आपल्या राष्ट्राचे नागरिक मानले होते आणि त्या सर्वांना समान अधिकार दिले होते. परंतु फ्रान्सिको लुईस गोम्स यांचे जे भारतीय देशबांधव इंग्रजांच्या राजवटीखाली होते ते त्यांच्यासारखे पोर्तुगीजांच्या राजवटीतील ‘नागरिक’ नव्हते, तर त्यांना नेहेमीच केवळ दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती, ” असे ओलिव्हियानो गोम्स यांनी लिहिले आहे.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे हे पत्र त्याकाळात खूप गाजले होते. फ्रान्समध्ये हे पत्र वाचल्यानंतर लामार्तिन आनंदाने बेहोश झाला होता असे म्हणतात. खूप सुंदर, खूप सुंदर.पत्र. हे पत्र लिहिणारा नक्कीच खूप प्रतिभासंपन्न आहे. मला या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला आवडेल. ‘’
लामार्तिन यांची इच्छा लवकरच पूर्ण झाली.
युरोपमध्ये डॉ गोम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे जोरदार स्वागत झाले. पॅरिस येथील दौऱ्यात ते लामार्तिन यांना १८६६ साली भेटले तर याच वर्षी इंग्लंडमध्ये लंडन येथे जॉन स्टुअर्ट मिल यांनी त्यांचे स्वागत केले.
गोम्स यांनी १८६६ साली Os Brâmanes किंवा द ब्राह्मण ही कादंबरी पोर्तुगीज भाषेत लिहिली. भारतातील जातिव्यवस्थेवर या कादंबरीत लिहिण्यात आले आहे.
लक्ष्मणराव सरदेसाई यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीं अध्यक्ष असताना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा अनुवाद १९७३ साली पहिल्यांदा प्रकाशित केला होता.
विशेष म्हणजे आपल्या या कादंबरीसाठी गोम्स यांनी गोव्याऐवजी उत्तर भारतातील फैजाबाद जिल्ह्यातील एक खेडे निवडले आहे.
गोम्स यांच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पोर्तुगीज संस्कृतीत वाढलेला ता तरुण मनाने भारतीयच राहिला, आपल्या भारतीयत्वाचा विसर त्यांना कधीही पडला नाही असे लक्ष्मणराव सरदेसाई यांनी म्हटले आहे.
पोर्तुगीज संसदेतील गोव्याचे प्रतिनिधी या नात्याने फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी गोव्याच्या हिताची अनेक कामे करवून घेतली, गोव्यासाठी अनेक सवलती मिळवल्या, करांचे ओझे कमी केले, त्याशिवाय गोव्यातील सरकारी नोकरांचा दर्जा पोर्तुगालमधील सरकारी नोकरांच्या बरोबरीचा करून घेतला.
गोव्यातील ख्रिस्ती लोकांना अंत्यसंकारासाठी आणि कबरस्थानात मृतदेह पुरण्यासाठी सरकारला मोठ्या रकमेचा कर भरावा लागत असे, त्यामुळे गरीब लोकांना खूप त्रास होत असे. संसदेतील आपल्या भाषणांत गोम्स यांनी या जाचक करांवर सडकून टीका होती.
आपल्या भाषणात उपहासात्मक शैलीत गोम्स यांनी म्हटले होते:
``सरकारी कर गोळा करणाऱ्या लोकांचा हात इतका लांब की तो मृत माणसाच्या थडग्यापलीकडेही शिरतो आणि मृतांकडून त्याचा ‘मांसाचा हिस्सा’ खेचून घेतो. गोव्यात मेलेल्या लोकांनासुद्धा कर द्यावा लागतो ! अंत्यसंकारासाठी कर असलेली ही १५० रईसांची रक्कम त्या मृत व्यक्तींच्या शाश्वत निद्रेत आणि एकांतात व्यत्यय आणते. ‘’
पोर्तुगालच्या संसदेत बोलताना फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी मतदानाचा हक्क केवळ पोर्तुगीज वाचु आणि लिहू शकणाऱ्या आणि सरकारला कर देणाऱ्या लोकांपुरता ठेवणाऱ्या कायदेशीर तरतुदींवर टीका केली
``मी स्वतः जरी जवळजवळ एक लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करत असलो तरी त्यापैकी प्रत्यक्षात फक्त दोन हजार लोक मला मतदान करु शकले आहेत. याचे कारण कि या नागरिकांपैकी खूप कमी लोक पोर्तुगीज वाचू आणि लिहू शकतात किंवा सरकारला कर देत असतात. पोर्तुगीज भाषा येणे आणि सरकारला कर देणे या दोन गोष्टी मतदानासाठी अटी असल्याने हे नागरिक मतदानासाठी पात्र नसतात.''
पोर्तुगालच्या सर्व वसाहतींतील लोकांसाठी असलेला या अटी अर्थातच अन्यायकारक होत्या. उदाहरणार्थ, गोव्यात राहणाऱ्या लोकांना हिंदू लोकांपैकी अनेकांना कोकणी आणि मराठी भाषा लिहिता आणि वाचता येत असे, मात्र त्यांना पोर्तुगीज भाषेचे ज्ञान नसे. पोर्तुगीज भाषा प्रामुख्याने गोव्यातल्या ख्रिस्ती लोकांना येत असे, स्थानिक समाजातील उच्च वर्णातील म्हणजे शेणवी, सारस्वत वगैरे जातींची पार्श्वभूमी असलेल्या ख्रिस्ती लोकांनी पोर्तुगाल भाषेला स्वीकारले होते. त्यामुळेच पोर्तुगालची राजधानी लिस्बनकडे यापैकी अनेकांचा ओढा असे.
ऍबे फरीया यासारखी काही उदाहरणे यासंदर्भात देता येईल. त्यामुळेच या वसाहतीकाळात पोर्तुगीज इंडियातून पोर्तुगाल संसदेसाठी मतदान करणारे बहुसंख्य नागरिक कॅथोलिक असत आणि खासदार म्हणून निवडून येणारेसुद्धा कॅथोलिकच असत.
अर्थात पोर्तुगालच्या जुन्या आणि नव्या मुलखांत या देशाची सत्ता बळकट झाल्यानंतर ख्रिस्ती लोकांबरोबरच हिंदू लोकांनीही पोर्तुगीज भाषेला जवळ केले होते, शिक्षण, व्यवसाय वगैरे मूलभूत गोष्टींसाठी राज्यकर्त्यांची भाषा शिकणे गरजचे होते.
अर्थात तरीही पोर्तुगाल इंडिया १९६१ साली भारतीय संघराज्यात सामील होईपर्यंत एकाही हिंदू गोवन नागरिकांची पोर्तुगालच्या संसदेवर निवड झाली नव्हती.
पोर्तुगालच्या एकतंत्री राजवटीचा अनेक वर्षे पंतप्रधान असलेल्या मार्केज द पोम्बाल याचे चरित्र गोम्स यांनी लिहिले, मार्केज द पोम्बालच्या या ले मार्कीस द पोंबाल : एस्कीस द सा वि पब्लिक ( Le Marquis de Pombal : Esquisse de sa vie publique ) चरित्रात गोम्स यांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील समग्र राजकीय इतिहास उभा केला त्यामुळे युरोपात त्यांना इतिहासकार म्हणून मान्यता मिळाली.
पोम्बालने गोव्याच्या बाबतीत केलेली अनेक स्मरणीय कामे गोम्स यांनी “मार्कीस दे पोंबाल : त्याच्या सार्वजनिक जीवनाची रूपरेषा’’ या चरित्रात विस्ताराने सांगितली आहेत. पोर्तुगालच्या नागरीकांना मिळणारे हक्क आणि सवलती गोव्यातील लोकांनाही देण्याचा प्रयत्न पोम्बाल याने केला होता, त्याची कारकीर्द गोव्यासाठी हितकारक ठरली असे गोम्स यांनी या चरित्रात मांडले आहे.
गोम्स यांनी लिहिलेल्या एका अर्थशास्त्रातील ग्रंथाने त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळाली. एस्से सुर ला थेओरी द ल'एकोनोमी पॉलिटिक ( Essai sur la théorie de L 'Economie Politiquen) हा तो ग्रंथ. गोम्स यांनी हे दोन्ही ग्रंथ फ्रेंच भाषेत लिहिले होते.
डॉ. गोम्स यांच्या गौरवार्थ मुंबईतील रॉयल आशियाटीक सोसायटीने त्यांची सदस्य म्हणुन निवड केली होती.
युरोपातील रोमँटिसिझम काळात ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्यावेळी त्यांच्यावर व्हिक्टर ह्युगो आणि लामार्तिन यांचा प्रभाव होता. या कादंबरीच्या तात्त्विक बाजूचे श्रेय व्हिक्टर ह्युगो यांच्याकडे तर भावनात्मक बाजूचे श्रेय लामार्तिन यांच्याकडे जाते असे लक्ष्मणराव सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दुदैवाने गोव्याच्या या महान सुपुत्राला फार कमी आयुष्य लाभले.
त्याकाळात बरा न होणाऱ्या क्षयासारख्या रोगाची लागण झाल्यामुळे आपले उर्वरित आयुष्य गोव्यात घालवण्याच्या इराद्याने त्यांनी पोर्तुगाल सोडले, मात्र बोटीवर प्रवासात असतानाच त्यांचे ३० सप्टेंबर १८६९ रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे चाळीस वर्षे होते.
गोम्स यांच्या पार्थिव देहाला मग जलसमाधी देण्यात आली. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची आपल्या जन्मभूमीत परतण्याची इच्छा अपुरीच राहिली.
आपल्या मायदेशात शेवटचा श्वास घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या गोम्स यांना घेऊन येणारी ती बोट गुजरातमधील पोरबंदर या बंदरात 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोहोचली.
तेव्हा या बोटीतल्या प्रवाश्यांमध्ये फ्रान्सिस्को लुईस गोम्स नव्हते.
योगायोग म्हणजे गोम्स यांच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नासाठी यशस्वीरीत्या लढणाऱ्या एका नेत्याचा याच दिवशी पोरबंदर येथे जन्म झाला होता.
मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे नाव.
आपल्या भारत देशाची गुलामी संपून पूर्ण स्वातंत्र्य लाभावे अशी खुली मागणी पहिल्यांदाच करणाऱ्या फ्रान्सिस्को लुईस गोम्स या राष्ट्रवादी नेत्याची ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी महात्मा गांधी यांनी अपार कष्ट घेतले.
Camil Parkhe, August 23, 2025