बापटांना आतापर्यंत भेदरलेले किंवा भांबावलेले फक्त एकदाच पाहिले आहे.
त्यांच्यावर तो अचानक हल्ला झाला तेव्हा.
त्यांची मुलाखत रेकॉर्ड करणाऱ्या व्हिडिओग्राफरने कमालीचे प्रसंगावधान राखून एका हाताने आपला अवजड कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने हल्लेखोराला मागे ढकलत नेले तेव्हा बापट बेदम मारहाण होण्यापासून बचावले होते.
कुणी तरी स्वतःची ढाल बनवून विद्यानंद बापट यांचे आणखी हल्ल्यापासून रक्षण केले तेव्हा बापट यांचा ओझरता चेहरा दिसला तेव्हा या अचानक झालेल्या मारहाणीमुळे ते गांगरलेले दिसले.
मानवी स्वभावाला धरुन ते स्वाभाविकच होते ते.
बापट मुद्द्द्यांना सामोरे जाऊ शकतात. गुद्द्यांना खचितच नाही.
विद्यानंद बापट यांच्या कानशिलात लगावल्यानंतर त्या घटनेची दृश्ये पाहताना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताना तक्षणी मला तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता त्याची आठवण झाली.
झालेल्या हल्ल्याने पवार साहेब निश्चितच गांगरले होते.
काहींना यासंदर्भात अण्णा हजारे यांची ती प्रतिक्रियासुध्दा आठवली असेल.
विद्यानंद बापट यांची चावडीवर झालेली ती बहुचर्चित सामुहिक मुलाखत काल रात्री मुद्दाम सर्च देऊन पाहिली अन् बापट यांचे खूप, खूप कौतुक वाटले.
त्यावेळी त्यांच्यावर चहूबाजूंनी हल्लाच केला गेला होता.
`कौन बनेगा करोडपती' किंवा इतर शो मध्ये रॅपिड फायर सारखे पाठोपाठ प्रश्न विचारले जातात.
बापट यांच्या मुलाखतीत असलेली बापटांना घोळात घेण्याची, त्यांची मजाक उडवण्याची लिखित स्क्रिप्ट फक्त मुलाखतकारांकडे होती.
सत्ताधारी पक्षाच्या किंवा राज्यकर्त्यांपैकी कुणाला त्यांनी असा जाब कधी मागितला असेल असे वाटत नाही.
बापट यांची मराठी भाषा, वैयक्तिक जीवन, भावनिक जीवन वगैरे विषयांवर प्रश्नांचा भडीमार करुन त्यांची खिल्ली उडवण्याचा मुलाखतीमागचा हेतू होता.
या मंडळीचा खरा हेतू त्यांच्या लक्षात न येण्याइतके बापट बावळट नक्कीच नाहीत.
मात्र बापट यांनी स्थितप्रज्ञ वृत्ती राखत या मुलाखतीत ध्वनीप्रदुषणाबाबतचा त्यांचा सखोल अभ्यास उत्तमरित्या पेश केला असे मला वाटते.
बापट त्या दिवशी पुणे महापालिकेच्या सभेत अचानक गेले आणि नंतर हे बापट पुराण सुरु झाले असे अनेकांना वाटते.
परिस्थिती तशी अजिबात नाहीये.
बापट यांनी त्यापूर्वी बराच काळ राज्यपातळीवर थेट मुख्यमंत्री कार्यालयापासून ते प्रदूषण नियंत्रण महामंडळ, विविध सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी याबाबत भरपूर पत्रव्यवहार केला होता.
याच मुलाखतीत बापट ध्वनी प्रदुषणाबाबत गेल्या काही दशकांतील देशांतील अनेक प्रकरणांचा उल्लेख करतात, हवाला देतात.
त्यांपैकी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, विविध महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, स्मॉल कॉजेस कोर्ट (लघु कारणांचे लवाद - बापट लगेच मराठी शब्द पर्यायसुद्धा पुरवतात), वगैरे वगैरे.
पुणे महापालिकेच्या सभागृहात त्यांना जर पूर्ण बोलण्याची संधी मिळाली असती तर त्यांचे हे सारासार मुद्दे ऐकून उपस्थितांची काय स्थिती झाली असती याची कल्पना करवत नाही.
बापट यांची मुलाखत घेण्यापूर्वी, त्यांना प्रश्न विचाण्याआधी किती प्रचंड तयारी करावी लागेल याची एक छोटीशी झलक चावडीतल्या या मुलाखतीतून मिळते.
नारायण पेठेतच राहणाऱ्या विद्यानंद बापट यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला व्यक्तिशः एक पत्रकार म्हणून मला खूप आवडेल.
पण ध्वनी प्रदूषण या विषयावर मुलाखत घेण्यासाठी तरी नक्कीच नाही.
Camil Parkhe
No comments:
Post a Comment