Saturday, September 12, 2026

 

बापटांना आतापर्यंत भेदरलेले किंवा भांबावलेले फक्त एकदाच पाहिले आहे.
त्यांच्यावर तो अचानक हल्ला झाला तेव्हा.
त्यांची मुलाखत रेकॉर्ड करणाऱ्या व्हिडिओग्राफरने कमालीचे प्रसंगावधान राखून एका हाताने आपला अवजड कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने हल्लेखोराला मागे ढकलत नेले तेव्हा बापट बेदम मारहाण होण्यापासून बचावले होते.
कुणी तरी स्वतःची ढाल बनवून विद्यानंद बापट यांचे आणखी हल्ल्यापासून रक्षण केले तेव्हा बापट यांचा ओझरता चेहरा दिसला तेव्हा या अचानक झालेल्या मारहाणीमुळे ते गांगरलेले दिसले.
मानवी स्वभावाला धरुन ते स्वाभाविकच होते ते.
बापट मुद्द्द्यांना सामोरे जाऊ शकतात. गुद्द्यांना खचितच नाही.
विद्यानंद बापट यांच्या कानशिलात लगावल्यानंतर त्या घटनेची दृश्ये पाहताना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताना तक्षणी मला तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता त्याची आठवण झाली.
झालेल्या हल्ल्याने पवार साहेब निश्चितच गांगरले होते.
काहींना यासंदर्भात अण्णा हजारे यांची ती प्रतिक्रियासुध्दा आठवली असेल.
विद्यानंद बापट यांची चावडीवर झालेली ती बहुचर्चित सामुहिक मुलाखत काल रात्री मुद्दाम सर्च देऊन पाहिली अन् बापट यांचे खूप, खूप कौतुक वाटले.
त्यावेळी त्यांच्यावर चहूबाजूंनी हल्लाच केला गेला होता.
`कौन बनेगा करोडपती' किंवा इतर शो मध्ये रॅपिड फायर सारखे पाठोपाठ प्रश्न विचारले जातात.
बापट यांच्या मुलाखतीत असलेली बापटांना घोळात घेण्याची, त्यांची मजाक उडवण्याची लिखित स्क्रिप्ट फक्त मुलाखतकारांकडे होती.
सत्ताधारी पक्षाच्या किंवा राज्यकर्त्यांपैकी कुणाला त्यांनी असा जाब कधी मागितला असेल असे वाटत नाही.
बापट यांची मराठी भाषा, वैयक्तिक जीवन, भावनिक जीवन वगैरे विषयांवर प्रश्नांचा भडीमार करुन त्यांची खिल्ली उडवण्याचा मुलाखतीमागचा हेतू होता.
या मंडळीचा खरा हेतू त्यांच्या लक्षात न येण्याइतके बापट बावळट नक्कीच नाहीत.
मात्र बापट यांनी स्थितप्रज्ञ वृत्ती राखत या मुलाखतीत ध्वनीप्रदुषणाबाबतचा त्यांचा सखोल अभ्यास उत्तमरित्या पेश केला असे मला वाटते.
बापट त्या दिवशी पुणे महापालिकेच्या सभेत अचानक गेले आणि नंतर हे बापट पुराण सुरु झाले असे अनेकांना वाटते.
परिस्थिती तशी अजिबात नाहीये.
बापट यांनी त्यापूर्वी बराच काळ राज्यपातळीवर थेट मुख्यमंत्री कार्यालयापासून ते प्रदूषण नियंत्रण महामंडळ, विविध सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी याबाबत भरपूर पत्रव्यवहार केला होता.
याच मुलाखतीत बापट ध्वनी प्रदुषणाबाबत गेल्या काही दशकांतील देशांतील अनेक प्रकरणांचा उल्लेख करतात, हवाला देतात.
त्यांपैकी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, विविध महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, स्मॉल कॉजेस कोर्ट (लघु कारणांचे लवाद - बापट लगेच मराठी शब्द पर्यायसुद्धा पुरवतात), वगैरे वगैरे.
पुणे महापालिकेच्या सभागृहात त्यांना जर पूर्ण बोलण्याची संधी मिळाली असती तर त्यांचे हे सारासार मुद्दे ऐकून उपस्थितांची काय स्थिती झाली असती याची कल्पना करवत नाही.
बापट यांची मुलाखत घेण्यापूर्वी, त्यांना प्रश्न विचाण्याआधी किती प्रचंड तयारी करावी लागेल याची एक छोटीशी झलक चावडीतल्या या मुलाखतीतून मिळते.
नारायण पेठेतच राहणाऱ्या विद्यानंद बापट यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला व्यक्तिशः एक पत्रकार म्हणून मला खूप आवडेल.
पण ध्वनी प्रदूषण या विषयावर मुलाखत घेण्यासाठी तरी नक्कीच नाही.

Camil Parkhe



 विद्यानंद बापट भरकटलेत. बापटांनी आता मुलाखती देणे बंद करावेत.

पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांना विद्यानंद बापटांच्या रुपाने आता एक नवे खेळणे मिळाले आहे. त्यांचा वापर करुन हे लोक स्वतःचा टीआरपी वाढवतायेत.
गेल्या काही दिवसांत विद्यानंद बापट यांच्या मुलाखती सर्वच वृत्तवाहिन्या आणि यु- ट्यूबर्स घेतायत.
गेल्या दोन दिवसांत राज ठाकरे यांच्या भाषणाला असाच तुफान टीआरपी लाभला असे म्हणतात. मात्र तो एका अगदी वेगळ्या कारणाने.
राज्यातल्या दहीहंडी कार्यक्रमांना खूप टीआरपी लाभला तसा.
वृत्तवाहिन्यांनी आपले नवशिके बातमीदार बापट यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यासाठी सोडले आहेत आणि त्यांची प्रश्ने पाहता अनेकांची करमणूक होतेय.
बापट यांना घेरण्याचा प्रयत्नांत अनेक दिग्गज पत्रकारांचाही अभिमन्यू झालेला दिसतोय.
बापट कुणाच्याच हाताला लागत नाहीत.
पत्रकार बापट यांना देव, धर्म, नास्तिकता वगैरे बाबतींत मुद्दाम खोचूनखोचून प्रश्न विचारुन, डिचवून त्यांना बहकू पाहतात.
त्यामुळे बापटांनी केवळ डिजे आणि ध्वनी प्रदूषण या त्यांच्या पेटंट मुद्द्यावरच बोलावे, संस्कृत सुभाषिते, रामायण आणि महाभारतातील दाखले देणे बंद करावे, असा अनाहूत सार्वजनिक सल्ला अनेकांनी त्यांना दिला आहे.
त्यात त्यांचे कट्टर समर्थक आणि चाहते यांचाही समावेश आहे.
मात्र बापट आपला तोल ढाळत नाहीत. कायदयाच्या कचाटीत येतील, त्यांच्या विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल असे एकही आक्षेपार्ह विधान करत नाहीत.
राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत बापट यांची दखल घेतली आहे.
पुण्यातल्या नारायण पेठेत सप्ताहातून तिनचार दिवस माझा वावर असतो. अशावेळी विद्यानंद बापट कधीतरी रस्त्यावर दिसतील असे वाटायचे.
त्यांचा चेहेरामोहरा आणि देहबोली आतापर्यंत अनेकांच्या परिचयाची झाली आहे. बापट यांची मुलाखत आपणसुद्धा घ्यावी असा विचार अनेकदा मनात आला आहे.
मात्र सद्याचा हा गदारोळ खाली बसेपर्यंत हे टाळायचे असे ठरवले होते.
त्यानंतर त्यांच्यावर हल्ल्याची ती घटना घडली.
आता एवीतेवी सुरक्षेच्या कारणास्तव बापट यांनी एकटेदुकटे बाहेर पडायचे टाळावे असा पोलिसांनी आणि इतरांनीही त्यांना सल्ला दिलाच आहे.
त्यामुळे बापटाख्यान कमी होईल असे मला वाटले होते.
आपल्या हितचिंतकांचा सल्ला मनावर घेऊन बापट काही काळ ध्वनिप्रदूषण वगळता इतर संवेदनाशील मुद्द्यांवर बोलणे टाळतील असे गृहीत धरले होते.
मात्र तसे झालेले नाही.
परवा प्रवासात असताना बापट यांची नवी मुलाखत ऐकली आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
नेहेमीप्रमाणे मुलाखत घेणारा पत्रकार पोरसवदा होता.
चिफ पब्लिसिटी किंवा सवंग लोकप्रियता मिळवणे हा आपला उद्देश नाही असे बापट सतत मनात आले आहेत.
या पत्रकाराने दोन प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांनी बापट यांच्या विचारसरणी एकदम स्पष्ट झाली.
`चिफ पब्लिसिटी किंवा सवंग लोकप्रियतेसाठी मी मुलाखती देत नाही, मात्र माझ्या या सततच्या मुलाखतींनी जर सार्वजनिक कार्यक्रमांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, रस्त्यांची आणि वाहतुकीची कोंडी, लोकांची गैरसोयण, हाल, आणि इतरांच्या दैनंदिन जीवनात येणारे नियंत्रण याबाबत समाजात जागृती होऊन सकारात्मक बदल होत असतील तर मी मुलाखती देत राहील.''
सर्वच धर्मांच्या सार्वजनिक, रस्त्यांवर साजरे उत्सवांमुळे आणि महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्यांमुळे (हा त्यांचाच शब्द) होणाऱ्या उपद्रवाविरोधी त्यांनी भूमिका घेतली आहे.
हे उत्सव आणि कार्यक्रम बंद हॉलमध्ये आणि इतरांना त्रास न होता साजरे व्हावे असे बापट म्हणतात.
त्या पत्रकाराचा दुसरा प्रश्न असा होता
``तुम्ही कधी असा कधी विचार करता कि ज्या देवासाठी हे सर्व सण, उत्सव केले जाते त्या देवाला तरी हे पटणारे आहे का? ''
``देवाच्या मुळी अस्तित्वावरच माझा विश्वास नाही तर मग देवाला काय वाटेल याचा मी विचारच कसा करेल?'' असे बापट यांचे उत्तर होते.
भारतीय माणूस फार सश्रद्ध आहे. आपल्या समाजजीवनात आणि राजकारणात अनेक वर्षांपासून जात आणि धर्म या अत्यंत महत्वाच्या बाबी राहिलेल्या आहेत, याचे पडसाद वेळोवेळी अनेक ठिकाणी पडत असतात.
त्यामुळे आपल्या जाती आणि धर्म यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रदर्शन करणे लोकांना भाग पडते किंवा फायदेशीर ठरत असते.
भारतीय लोक परदेशी गेल्यानंतरसुद्धा असेच वागतात हे आपण नेहेमीच अनुभवत असतो.
निधर्मी राज्यघटना असलेल्या आपल्या देशात गेल्या काही दशकांत उघडउघड धर्माधिष्टीत राजकारण आणि समाजकारण प्रस्थापित झाले आहे.
यामुळेच समाजकारणात आणि राजकारणात असलेली अनेक नेते मंडळी नास्तिक असली तरी देवधर्मांबाबत असलेल्या मतांबाबत आपली ठाम भूमिका कधी मांडत नाहीत.
`काहीही असले तरी आपण सश्रद्ध आहोत, आम्ही त्यांच्यापैकी नाही' अशी सारवासारव लोकानुयास्तव अनेक जण करत असतात.
यामुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखालील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने देव आणि धर्म याबाबत रोखठोख भूमिका घेण्याचे सातत्याने टाळले होते.
देव आणि श्रद्दा याविरुद्ध थेट भूमिका घेतल्यास सश्रद्ध असलेला बहुसंख्य समाज आपल्या चळवळीविरुद्ध जाईल अशी भीती यामागे होती आणि आहे .
आपल्या विविध मुलाखतींत आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ बापट महाभारतातील काही प्रसंग, संस्कृतमधील श्र्लोक, मराठीतील सुभाषिते यांची पेरणी करत असतात , काही इंग्रजी पुस्तकांचा, पाश्चात्त्य विचारवंतांचा हवाला देत असतात, आपल्या नागरी अधिकारांच्या समर्थनार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरलिखित राज्यघटनेतील मूलभूत स्वातंत्र्य आणि अधिकारांचा उल्लेख करतात, त्याचप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारसरणीचीही पाठराखण करत असतात.
कुठलाही आडपडदा न ठेवता आणि परिणामांची पर्वा न ठेवता आपण नास्तिक आहोत हे बापट यांनी आपल्या पहिल्याच मुलाखतीत स्पष्ट केले तेव्हा अनेकांना धक्काच बसला होता.
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता ।। ही तुकोबांची शिकवण बापट लोकांना नेहेमी ऐकवत असतात.
फार वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम लागू यांनी `देवाला रिटायर करा' अशी भूमिका घेतली तेव्हा मोठा गदारोळ उडाला होता याचे कारण बहुसंख्य समाज सश्रद्ध आहे हेच होते.
डॉ. लागू यांच्या थेट धर्मविरोधी आणि देवाच्या अस्तित्वाविरोधी भूमिकेने त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची फार मोठी गोची केली होती.
त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे त्याकाळात गावोगावी डॉ. श्रीराम लागू आणि डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यामध्ये देव ही संकल्पना, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयांवर सार्वजनिकरित्या संवाद घडवून आणले जात असत.
या संवादांत आपल्या चळवळीचा रोख लोकांच्या श्रद्धा, देव ही संकल्पना आणि धार्मिक प्रथा-परंपरा याविरुद्ध नाही तर समाजघातक, विविध प्रकारचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा याविरुद्ध आहे अशी मांडणी डॉ. दाभोलकर करत असत.
हा सरळसरळ ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होता.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या संवादांची पुस्तिका मराठीत आणि इंग्रजीत प्रकाशित झाल्या आहेत. त्या संवादाकडे एक नजर फिरवली तर मी काय म्हणतो आहे हे समजू शकेल.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामध्ये फरक मानते, चळवळीचा विरोध कुठल्याही समाजघातक, शोषण करणाऱ्या अंधश्रद्धेला आहे, श्रद्धेला नाही, अशी काहीशी गोलमाल आणि बोटचेपी भूमिका या चळवळीने घेतली होती.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील नेमका फरक काय आहे याबाबत मात्र स्पष्टीकरण दिले जात नसायचे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याही एक पाऊल पुढे जाऊन आपले राज्यघटनादत्त व्यक्तिस्वातंत्र्य आणि अधिकार याबाबत आपला मुद्दा मांडताना देवाचे अस्तित्व निःसंदिग्धपणे नाकारुन विद्यानंद बापट यांनी आता सरळसरळ मुळावरच घाव घातला आहे.
या मुद्द्यांवर विद्यानंद बापट यांना सरळसरळ भिडणे आतापर्यंत कुणालाच शक्य झालेले नाही.
Camil Parkhe September 9, 2026

Saturday, September 5, 2026

red with Pub

lic
प्रसारमाध्यमांची व्यावसायिकता आणि माणुसकीशी बांधिलकी
परवा विद्यानंद बापट हे बेदम मारहाण आणि त्यांची लाथाबुक्क्यांनी तुडवणूक होण्यापासून थोडक्यात वाचले.
पुण्यात टिळक रोडपासून जवळच असलेल्या एका चौकात मुलाखत देताना हल्लेखोर त्यांच्या कानशिलात केवळ एक जोरदार थप्पड देऊ शकला.
तिथे असलेल्या दोन व्यक्तींनी लगेचच हल्लेखोराला पूर्ण ताकदीने प्रतिकार केल्याने बापट यांच्यावरील एक बाका प्रसंग टळला.
त्यादिवशी त्या घटनास्थळी बापट यांच्या भुमिकेशी सहमत असणार काही लोक होते, असहमत असणारेही होते.
त्याशिवाय त्या वर्दळीच्या ठिकाणी ये-जा करणारे अनेक लोक होते.
दोन व्यक्तींमध्ये झगडा, संघर्ष होत असेल तर तिथे असलेले लोक क्वचितच हस्तक्षेप करतात.
समोर हिंसा होत असताना त्रयस्थ व्यक्तींनी हस्तक्षेप केल्यास या त्रयस्थ व्यक्तीच अनेकदा हिंसेचे बळी ठरत असतात याचा अनुभव नेहेमी येत असतो. एक क्राईम रिपोर्टर म्हणून अशा घटनांचे मी अनेकदा वार्तांकन केले आहे.
तर त्या भर दिवशी भर चौकात एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना विद्यानंद बापट आपले मत मांडताना अचानक एका हल्लेखोराने बापट यांच्या कानशिलात लगावली तेव्हा तेथे असलेल्या फक्त दोन व्यक्तींनी या हल्लेखोरास पूर्ण ताकदीनिशी रोखले.
हल्लेखोरास रोखणाऱ्या याच दोन व्यक्तींनी असा प्रतिकार करावा हे खरे पाहता पूर्णतः अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते.
हल्लेखोऱ्याने बापट यांना थप्पड मारल्यानंतर तिथे असलेल्या एका मध्यमवयीन महिलेने तत्क्षणी हल्लेखोऱ्याचा उगारलेला हात अडवला आणि बापट यांना वाचवले.
आपल्या मुलाखतीत बापट नेहेमीच सांगत असतात कि ''लोकांनी मला स्वतःला फार महत्त्व देऊ नये, माझ्यावर टीका करू नका, त्याऐवजी मी मांडतो त्या मुद्द्यांना उत्तरे द्या, त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा.''
विशेष म्हणजे या हातघाईच्या लढाईच्या बिकट प्रसंगी ती धाडसी महिला त्या हल्लेखोऱ्याला नेमके हेच सुनावत होती. मला त्या महिलेचे फार कौतुक वाटले.
बापट यांना बेदम मारहाणीपासून रोखण्यास त्याशिवाय आणखी एका व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली.
खरे तर त्या व्यक्तीने असे करणे त्याच्या व्यवसायिक हिताच्या अगदी विरुद्ध होते.
बापट यांच्या मुलाखतीचे चित्रण करणाऱ्या व्हिडीओग्राफरने बापट यांच्यावर हल्ला होताच लगेचच आपले चित्रण थांबवले आणि हल्लेखोऱ्याला एका हाताने ढकलत बापट यांच्यापासून दूर नेले.
आपल्यापैकी अनेक जण छोट्या आकाराचे पण महागडे मोबाईल वापरत असतात. प्रसारमाध्यमांतील फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांचे कॅमेरे किती महागडे असतील याची कल्पनाच केलेली बरे.
तर बापट यांच्यावर हल्ला होताच या व्हिडिओग्राफरने एका हाताने आपला अवजड कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने हल्लेखोऱ्याला पूर्ण शक्तींनिशी मागे लोटत नेले.
या अवधीत तिथे जमलेल्या लोकांना विद्यानंद बापट यांना सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य झाले. तरीसुद्धा लांबूनच तो हल्लेखोर ' बापट याला मी सोडणार नाही, मी त्याला मारणार आहे,'' असे जोरजोरात ओरडून सांगत होता. यावेळी ती महिला त्याला असे करु नकोस म्हणून सांगत होती.
या मारहाणीच्या झालेल्या चित्रणात हे दृश्य तुम्ही पाहू शकता.
हल्लेखोऱ्याने बापट यांच्या कानशिलात लगावली याचे चित्रण केवळ `टिव्ही नाईन' या वाहिनीकडेच आहे. या चित्रणामुळे या वाहिनीचा टिआरपी नक्कीच भरपूर वाढला असेल.
जर या व्हिडीओग्राफरने बापट यांच्या हल्लेखोऱ्याला रोखण्याऐवजी त्याला हल्ला चालू ठेवण्यास पूर्णतः मोकळीक दिली असती आणि या हल्ल्याचे चित्रण चालू ठेवले असते तर या वाहिनीकडे या हल्ल्याच्या एक्सल्युझिव्ह चित्रणाचे अधिक फुटेज, काही सेकंदाऐवजी काही मिनिटांचे झाले असते.
व्हिडिओग्राफर म्हणून हा हल्ला चालू ठेवणे नक्कीच त्याच्या व्यावसायिक हिताचे आणि बांधिलकीचे होते.
मात्र व्यावसायिक बांधिलकी आणि हित याऐवजी या व्हिडीओग्राफरने माणुसकीला प्राधान्य दिले.
खरे पाहता ही घटना इतक्या वेगाने घडली कि `हे बरे कि ते बरे' याचा विचार करण्यास त्या व्हिडिओग्राफरला मुळी वेळच मिळाला नाही.
त्यामुळे बापट यांच्या मदतीस जाऊन हल्लेखोऱ्यास रोखण्याची कृती व्हिडिओग्राफरकडून उत्स्फूर्तपणे घडली.
व्यावसायिक हिताऐवजी माणुसकीस जपण्याची व्हिडीओग्राफरची ही कृती पूर्ण विचारांती नव्हती तर ती एक प्रतिक्षिप्त कृती होती.
व्यावसायिक हितापेक्षा माणुसकीशी बांधिलकीला प्राधान्य मिळाले.
हा प्रसंग पाहताना आफ्रिकेतील एका देशात दुष्काळात मरणासन्न अवस्थेतील हाडांचा सापळा बनलेल्या एका बाळाकडे एक गिधाड बुभूक्षित नजरेने पाहत आहे, असा क्षण टिपलेल्या एका फोटोला एक जगप्रसिद्ध पारितोषक मिळाले होते ते आठवले.

Camil Parkhe



Monday, August 24, 2026


मानवी इतिहासातील धर्मांतरे .. स्वातंत्र्याची ऐंशी वर्षे साजरा करणाऱ्या देशाने अलीकडेच स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि लागोपाठ राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्रात धर्मांतर स्वातंत्र्य कायदा मंजूर केला.

पुण्यातील गुरुवार पेठेतील पंचहौद चर्च शहराचा एक मौलिक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय वारसा आहे.
या पवित्र नाम देवालयाच्या एकशेतीस फूट उंचीच्या टोलेगंज मनोऱ्यात असलेल्या भल्यामोठ्या जाडजूड घंटांच्या नादांतून नियमितपणे संगीत निर्माण केलं जाते.
दरवर्षी ख्रिस्तजयंतीला या घंटानादातून ख्रिस्तजन्माची मराठी मधुर गीते किंवा ख्रिस्तमस कॅरोल्स गायली जातात. तसेच देशाच्या स्वातंत्र्यादिनी `जन गण मन अधिनायक जय हे' हे राष्ट्रगीत गायले जाते.
ख्रिस्ती देवळाच्या घंटानादातून स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीताचे स्वर गायले जाण्याची देशातील ही बहुधा एकमेव प्रथा असावी.
तर एकशेचाळीस वर्षे जुने असलेल्या या देवालयाच्या वर्धापनदिनानिमित्त येथे सप्ताहभर उपासना चालू होत्या.
त्यानिमित्त येथे मराठी गायने, भजने आणि कीर्तने टाळ, तबला वगैरे पारंपरिक भारतीय वाद्यसंगीताच्या सुरात होत असल्याने `हा तर चक्क धर्मातराचा प्रयत्न' असा आरोप झाला आहे.
संपूर्ण जगात केवळ आशिया खंडात प्राचीन काळापासून विविध धर्मांची आणि साहजिकच त्याचबरोबरच धर्मपरिवर्तनाची परंपरा आहे.
भारतात प्राचीन काळापासून आस्तिक आणि नास्तिक विचारधारा किंवा दर्शने परंपरा आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात नास्तिक आणि आस्तिक या शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आस्तिकता आणि नास्तिकतेसाठी भारतीय दर्शनशास्त्रात ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा वेदप्रामाण्य हाच निकष आहे.
वेदप्रामाण्य मानणाऱ्या तसेच वेद अपौरुषेय आहेत, मानवनिर्मित नाहीत असे मानणाऱ्या विचारधारांना किंवा दर्शनांना आस्तिक दर्शने संबोधली जातात.
चार्वाक, बौद्ध आणि जैन दर्शने वेदप्रामाण्य मानत नाहीत, म्हणून ही दर्शने नास्तिक समजली जातात.
सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे भारतीय इतिहासातील एक मोठे, दूरगामी परीणाम करणारे धर्मांतर मानले जाते.
अशोकाने आपला बौद्ध धर्माचा केवळ भारतवर्षांत नव्हे तर इतरही देशांत प्रचार केला, त्यामुळे आशियातील अनेक देशांतील लोक बौद्धधर्मीय बनले.
भारतातील वेरुळ, कैलास वगैरे प्राचीन गुंफा आणि लेणी यावरून देशात एके काळी बौद्ध धर्माचे लोण किती खोल आणि दूरपर्यंत पोहोचले होते याची साक्ष देतात.
भारतीय उपखंडात सम्राट अशोक यांचे बौद्ध धर्मप्रसाराच्या जे स्थान आहे तेच स्थान पाश्चात्य राष्ट्रांत रोमचा सम्राट कॉन्स्टंटाईन द ग्रेट याचे ख्रिस्ती धर्मप्रसाराबाबत आहे.
तिसऱ्या दशकात या रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्विकारुन त्या धर्माला राजाश्रय पुरवला. ख्रिस्ती धर्माला आपल्या साम्राज्याचा अधिकृत धर्म बनवला. याचाच परिणाम म्हणून नंतर ख्रिस्ती धर्म युरोपात आणि इतरत्र पसरला.
आद्य शंकराचार्य यांनी वैदिक धर्माचा संपूर्ण देशभर पुन्हा प्रचार केला आणि त्यानंतर बौद्ध धर्म भारतातून जवळजवळ नामशेष झाला.
तेराव्या शतकात उत्तर भारतात सुलतानी राजवट सुरु झाली, तेव्हा इस्लाम धर्माची देशात बीजे रोवली गेली. सुलतानी राजवटीनंतर बाबरपासून तो थेट बहादूर शाह जफरपर्यंत तब्बल सहाशे वर्षे अख्ख्या भारतात म्हणजे दख्खनपर्यंत मुघल राजवट म्हणजे मुस्लिमांची सत्ता होती.
जवळजवळ आठ शतकांच्या या दीर्घ कालावधीत येथील बहुसंख्य जनता हिंदूच राहिली हे विशेष.
वसईत अल्पकाळात आणि दक्षिण गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत जसे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतर झाले तसे मुस्लीम राजवटींत इस्लाममध्ये घाऊक धर्मांतर झाले नाही हा मोठा फरक आहे.
सम्राट अकबर यांच्या काळात तर धर्मपरिवर्तनाचा एक आगळावेगळा प्रयोग झाला.
हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिस्ती वगैरे अनेक धर्माच्या पंडितांशी वेळोवेळी चर्चा करुन अकबराने स्वतःचाच `दिने इलाही’ हा धर्म स्थापन केला. हा धर्म अकबरानंतर लयास गेला.
मुसलमान झालेल्या नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मांत आणले गेले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातले एक गाजलेले धर्मांतर प्रकरण.
येशू ख्रिस्त हा स्वतः आशियाई राष्ट्रातल्या इस्राईलमधील गॅलिली प्रांताचा. येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी संत थॉमस भारतात इसवी सन ५२ला आला आणि त्यांनी दक्षिणेत केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची बीजे रोवली.
भारतात ख्रिस्ती धर्माची अशी दोन हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्यामुळे केरळमधील ख्रिश्चन समुदाय स्वतःला सेंट थॉमस ख्रिश्चन्स किंवा ख्रिश्चन्स असे संबोधतो.
तामिळनाडू तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले डॉ. पी. सी. अलेक्झांडर आणि बुकर प्राईझ विजेत्या अरुंधती रॉय या सिरियन ख्रिश्चन समाजाचे काही नावाजलेले प्रतिनिधी.
गोव्यात आणि दक्षिणेत तामिळनाडू परिसरात मध्ययुगात पाचशे वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला.
देशातील वरच्या आणि खालच्या जातींजमातींतील लोक अशाप्रकारे ख्रिस्ती झाले, त्यामुळेच भारतातील ख्रिस्ती समाजात या देशातील बहुसंख्य समाजात असलेल्या सर्वच जाती आणि जमाती आढळतात, जातीभेदसुद्धा असतात.
मध्ययुगात वसई आणि `ओल्ड काँक्वेस्ट’ म्हणून गणल्या गेलेल्या दक्षिण गोव्यात पोर्तुगीज राजसत्तेच्या मदतीने ख्रिस्ती धर्माचा जोरदार प्रचार झाला.
त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या साधनांचा सर्रास वापर करण्यात आला आणि तेथील बहुसंख्य लोक ख्रिस्ती झाले.
नंतरच्या काळात मात्र ख्रिस्ती धर्मांतराची लाट पूर्णतः थंडावली आणि न्यु काँक्वेस्ट म्हणजे उत्तर गोव्यातली, तसेच दमण, दीव आणि सिल्व्हासा येथील बहुसंख्य जनता हिंदुच राहिली.
या पोर्तुगीजांकडूनच ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट हे लग्नात आंदण, हुंडा म्हणून मिळाले आणि या व्यापारी कंपनीने मग संपूर्ण भारत देशच आपल्या ताब्यात घेतला.
मात्र पोर्तुगीजांप्रमाणे ब्रिटिश सत्तेने ख्रिस्ती धर्मांतरास कधीही, कुठल्याही प्रकारे पाठबळ दिले नाही.
भारतात दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतसुद्धा ख्रिस्ती धर्मांतरांचे प्रमाण अगदी अल्प आणि नॉर्थ ईस्टसारख्या काही ठराविक प्रदेशांपुरते मर्यादित राहिले.
ख्रिस्तीधर्मिय ब्रिटिश राजवटीतसुद्धा येथील ख्रिस्ती लोकांची संख्या दोन टक्क्यांहून अधिक पुढे जाऊ शकली नाही.
ब्रिटिश अमदानीत एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्मांतरांच्या अनेक घटनांनी खळबळ माजवली.
कारण सुरुवातीच्या काळातली ही सर्व धर्मपरिवर्तने त्यावेळी उच्चभ्रू आणि सधन पारशी आणि ब्राह्मण वर्गांतून झाली होती.
चित्पावन ब्राह्मण पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, `स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, `यमुनापर्यटन' कादंबरी लेखक मराठीतले पहिले कादंबरीकार बाबा पदमनजी वगैरेंच्या धर्मांतरांनंतर महाराष्ट्रात मोठी वादळे निर्माण झाली होती.
त्यावेळी देशात पहिल्यांदाच कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले होते, त्यामुळे धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या पारशी तरुणांच्या धर्मांतरांबाबत मुंबईत स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन यांच्याविरुद्ध अनेक कोर्ट कचेऱ्या, हेबियस कॉर्पस याचिका दाखल झाल्या.
या पारशी तरुणांच्या ख्रिस्ती धर्मपरिवर्तनांमुळे मुंबईत सुरु झालेल्या स्कॉटिश मिशनच्या पहिल्यावहिल्या आधुनिक शाळा काही काळ विद्यार्थ्यांअभावी ओस पडल्या होत्या.
भारतातील पहिल्या महिला वकील कोर्नेलिया सोराबजी यांचे वडील सोराबजी खारसेटजी लांगराना यांना ख्रिस्ती झाल्यामुळें मोठया संकटांना सामोरे जावे लागले होते.
पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत जोतिबा फुले शिकत असताना त्यांच्या काही सहअध्यायी तरुणांनीसुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.
``इ. स. १८४६ मध्ये रेव्हरंड जेम्स मिचेल यांनी पुण्यातील दोघा तरुण ब्राह्मणांस बाप्तिस्मा दिला. तेव्हा जोतीराव आणि त्यांचे मित्र यांच्या मनाची थोडी चलबिचल झाली. परंतु सामाजिक सुधारणेचे कार्य तडीस न्यायचे असेल, तर प्रत्यक्ष धर्मांतर न करण्यात शहाणपण आहे हा विचारच शेवटी प्रबळ ठरला,’’ असे ग. बा. सरदार यांनी लिहिले आहे.
ख्रिस्ती न होता महात्मा जोतिबा फुले यांनी प्रागतिक विचाराच्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि लग्न वगैरे कार्यांत पुरोहित वर्गाची दलाली पूर्णतः नाकारली.
हिंदू धर्मांतून ही ख्रिस्ती धर्मांतरे झाली त्याचप्रमाणे विसाव्या शतकात ख्रिस्ती धर्मांतून हिंदू धर्मांत झालेली धर्मांतरेसुद्धा विविध कारणांनी गाजली.
या उलट्या प्रवाहातील काही धर्मांतरांचे मोठया उत्साहात स्वागत झाले तर काही व्यक्तींना त्यामुळे समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागले.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावामुळे ब्रिटिश तरुणी एलिझाबेथ मार्गारेट नोबल यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्या भगिनी निवेदिता बनल्या.
`सकाळ' दैनिकाचे संस्थापक संपादक नारायण भिकाजी नानासाहेब परुळेकर यांचा विवाह फ्रेंच महिला जेनेव्हिव्ह यांच्याशी झाला आणि विवाहानंतर त्यांनी शांताबाई हे नाव स्वीकारले.
`ज्ञानकोश'कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जर्मन ज्यू असलेल्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि शीलवती हे नाव धारण केले. त्यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिलेले आहे.
डॉ. केतकरांच्या पश्चात शीलवती केतकर यांनी केतकरांचे ज्ञानकोशांची विक्री करण्यासाठी किती खस्ता खाल्या याविषयी दुर्गा भागवत यांनी लिहिले आहे.
महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेले एक धर्मांतर म्हणजे `केसरी' दैनिकाचे संपाद्क आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू (मुलीचा मुलगा) असलेले ग. वि. (गजानन विनायक) केतकर यांनी एका परदेशी महिलेशी केलेला विवाह.
केतकर यांनी एका परदेशी ख्रिस्ती महिलेशी प्रेमविवाह केला होता. या आंतरधर्मीय विवाहानंतर पुणतात मोठे वादळ निर्माण झाले होते आणि केतकरांना 'केसरी' चे संपादकपद सोडावे लागले होते.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी बौद्ध धर्मात आपल्या असंख्य अनुयायांसमवेत केलेल्या धर्मांतराची मानवी इतिहासात एक खूप आगळेवेगळे धर्मांतर म्हणून केली जाईल. '
नाशिक जिल्ह्यात येवला येथे १९३५ साली `` मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' अशी प्रतिज्ञा केली.
धर्मांतर रोखण्यासाठी आज कायकाय केले जाते. मात्र नवलाची बाब म्हणजे बाबासाहेबांचे धर्मांतर रोखण्यासाठी तेव्हाच्या सामाजिक आणि धार्मिक पुढाऱ्यांनी कसलीही पावले उचलली नव्हती.
ही घोषणा तब्बल तीन दशकांनी प्रत्यक्षात उतरवली गेली तेव्हा या महामानवाबरोबर नव्या धर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपुरात हजारो लोक जमले होते.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील वंचित समाजात ख्रिस्ती धर्मपरिवर्तन सुरु झाले तेव्हासुद्धा बहुसंख्य समाजाने त्याकडे सरळसरळ कानाडोळा केला होता.
याचाच परिणाम म्हणून एकोणिसाव्या शतकात पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा,, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यातील अनेक गावाच्या गावे पुर्णतः ख्रिस्ती बनली होती.
अर्थातच हे सर्व लोक वंचित जातींजमातींतील होते.
स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतरानंतर यापैकी अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी नंतर स्वतःहून घरवापसी केली अन हिंदू किंवा बुद्ध धर्मांत राहणे पत्करले.
कुठलाही गाजावाजा न करता झालेले हे पुनर्धर्मांतर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना वगैरे जिल्ह्यांत आणि विदर्भात अमरावती, नागपूर वगैरे परिसरात घडले.
त्या कुटुंबांच्या दृष्टीने एका अर्थी हे बरेच घडले.
कारण त्यामुळे अनुसूचित जातींसाठी असलेल्या सर्व आरक्षणादी सुविधा त्यांना मिळत राहिल्या, त्यांचेच भाऊबंद असलेली ख्रिस्ती कुटुंबे मात्र त्यापासून वंचित राहिले.

Camil Parkhe

नाशिकच्या बाळ येशू तीर्थक्षेत्रातील हा फोटो

Tuesday, August 11, 2026



सन १९६७ ते २०२६ .. काँग्रेसच्या दिड तपाच्या देशातील सत्तेला १९६७ साली सर्वप्रथम सुरुंग लागला आणि भाजपच्या एक तपाच्या निरंकुश सत्तेच्या बुरुजाला २०२६ साली अगदी खिजगणकीतसुद्धा नसलेल्या गटाकडून -झेन झी - कडून मोठे भगदाड पाडले.

महाराष्ट्रात १९६७च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी काँग्रेसच्या स. का. पाटील यांचा पराभव केला होता.
याच वर्षी १९६७ साली महाराष्ट्रात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी युवक क्रांती दलाची स्थापना केली होती.
`युक्रांद' या नावाने ओळखल्या गेलेल्या या संघटनेने राज्यात आपल्या कामाने भरीव ठसा निर्माण केला. युक्रांद नाव घेतले कि लगेचच डॉ. कुमार सप्तर्षी यांचे नाव नजरेसमोर येते.
डॉ. कुमार सप्तर्षी यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्यानंतर रविवारी पुण्यात कोथरूडच्या गांधी भवनात डॉ. सप्तर्षी यांच्या आठवणी जागवण्यात आल्या.
वयाची ऐंशी पार केल्यानंतरसुद्धा विविध उपक्रमांद्वारे तरुणांशी कायम संवाद साधणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांच्याबद्दल विविध वयोगटांचे लोक यावेळी बोलले.
देशात झेन झीने दाखवलेली ताकद डॉ. सप्तर्षी यांनी पाहायला हवी होती असा काही वक्त्यांचा सूर होता.
बाळासाहेब भारदे यांच्यानंतर महाराष्ट्र गांधी स्मारक भवनाचे अध्यक्ष झाल्यानंतर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अनेक उपक्रम सुरु केले.
दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गांधी भवनात दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम हा त्यापैकी एक.
या नव्या पर्वात चक्क गांधीजींच्या विचारावर आधारित तीन दिवसीय शिबीर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अलीकडेच भरवले होते आणि त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला होता.
बापूंचे चित्र असलेल्या टी-शर्टची विक्रीही या काळात झाली.
`डॉ कुमार सप्तर्षी यांच्या आठवणी' असे शिर्षक असलेल्या कार्यक्रमास हजेरी लावण्याची खरे तर मला इच्छा नव्हती.
पण श्याम बेनेगल यांचा `अंकुर' चित्रपट पाहिल्यानंतर आणखी काही वेळ तिथे रेंगाळलो आणि वक्त्यांच्या तोंडून जे ऐकले त्याने १९६७ ते २०१६ या काळातल्या अनेक घडामोडींवर प्रकाश पडला.
डॉ. कुमार सप्तर्षी हे आमच्या नगर जिल्ह्यातल्या राशिन गावचे, त्यांनी जानवे सोडले, आंतरजातीय लग्न केले आणि जातिअंताची चळवळ राबवली.
विविध विद्यार्थी चळवळींमध्ये जुळणारे प्रेमविवाह हा त्याकाळात एक थट्टेचा विषय झाला होता हे आठवते.
युक्रांदच्या तालमीत तयार झालेल्या अनेक व्यक्तींनी नंतर विविध समाजक्षेत्रांत नाव कमावले.
डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि पर्यायाने त्यांचे दीर्घ मनोगत ऐकण्याचे प्रसंग गेल्या वर्षी दोनदा आले.
त्यांच्याशी खूप आधीपासून संबंध ठेवायला हवे होते असे तेव्हापासूनच वाटायला लागले.
आणीबाणीत तुरुंगवास भोगल्यानंतर जनता पार्टीच्या लाटेत डॉ. सप्तर्षी नगर शहरातून विधानसभेवर निवडून गेले होते.
विधानसभेत जनता पार्टीचे सर्वाधिक म्हणजे शंभराहून अधिक आमदार असल्याने एस. एम. जोशी यांनी मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह सप्तर्षी यांनी केला होता.
एसेम यांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ शरद पवारांच्या गळ्यात पडली.
युक्रांदची सुरुवातीचा काळ, त्यानंतरची मधली काही वर्षे आणि दोन दशकांपूर्वी युक्रांदच्या पुनरुज्जीकरणानंतरची वर्षे याबद्दल त्यात्या काळात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांच्या भाषणांतून डॉ. सप्तर्षी यांचे व्यक्तिमत्व, कार्यपध्द्त आणि एकूण व्यक्तिमत्वाविषयी बरीच माहिती मिळाली.
पुण्यात उद्यान प्रसाद सभागृहात साक्षात पुरीचे शंकराचार्य यांच्याशी दोन दिवसांचा भरगच्च गर्दीत झालेला जाहीर संवाद हा सप्तर्षी यांच्या सुरुवातीच्या काळातील एक मोठा गाजलेला प्रसंग.
या संवादाला त्यावेळी कॉलेज विद्यार्थीनी म्हणून उपस्थित असलेल्या अंजली कुलकर्णी यांच्या तोंडून रविवारच्या कार्यक्रमात ऐकणे म्हणजे अलभ्य लाभ योग होता.
सुशीला मोराळे आणि कॉम्रेड किशोर ढमाले म्हणाले कि डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यावर प्रस्थापित समाजवादी नेत्यांनी खरे तर अन्यायच केला.
सत्तरच्या दशकातील दलित पँथर ही प्रस्थापित रिपब्लिकन नेत्याविरुद्ध, मागोवा ही संघटना मार्क्सवादी नेत्यांविरुद्ध आणि युक्रांद ही संघटना समाजवादी नेत्यांविरुद्ध नकार होती असे ढमाले म्हणाले.
ढमाले म्हणाले कि समाजवाद्यांनी डॉ. सप्तर्षी यांना साथ दिली नाही आणि काँग्रेसवाले त्यांना आपल्या पक्षात घेण्यास तयार नव्हते. डॉ. सप्तर्षी यांच्याकडे `साधना' साप्ताहिकाची सूत्रे देण्यास नकारघंटा मिळाल्यानंतर डॉ. सप्तर्षी यांनी स्वतः `सत्याग्रही विचारधारा' हे मासिक सुरु केले.
समाजवाद्यांनी डॉ. सप्तर्षी यांना साथ दिली असती तर महाराष्ट्रात सद्याची स्थिती आली नसती असे कॉम्रेड ढमाले म्हणाले.

Camil Parkhe August 10, 202