Saturday, September 5, 2026

red with Pub

lic
प्रसारमाध्यमांची व्यावसायिकता आणि माणुसकीशी बांधिलकी
परवा विद्यानंद बापट हे बेदम मारहाण आणि त्यांची लाथाबुक्क्यांनी तुडवणूक होण्यापासून थोडक्यात वाचले.
पुण्यात टिळक रोडपासून जवळच असलेल्या एका चौकात मुलाखत देताना हल्लेखोर त्यांच्या कानशिलात केवळ एक जोरदार थप्पड देऊ शकला.
तिथे असलेल्या दोन व्यक्तींनी लगेचच हल्लेखोराला पूर्ण ताकदीने प्रतिकार केल्याने बापट यांच्यावरील एक बाका प्रसंग टळला.
त्यादिवशी त्या घटनास्थळी बापट यांच्या भुमिकेशी सहमत असणार काही लोक होते, असहमत असणारेही होते.
त्याशिवाय त्या वर्दळीच्या ठिकाणी ये-जा करणारे अनेक लोक होते.
दोन व्यक्तींमध्ये झगडा, संघर्ष होत असेल तर तिथे असलेले लोक क्वचितच हस्तक्षेप करतात.
समोर हिंसा होत असताना त्रयस्थ व्यक्तींनी हस्तक्षेप केल्यास या त्रयस्थ व्यक्तीच अनेकदा हिंसेचे बळी ठरत असतात याचा अनुभव नेहेमी येत असतो. एक क्राईम रिपोर्टर म्हणून अशा घटनांचे मी अनेकदा वार्तांकन केले आहे.
तर त्या भर दिवशी भर चौकात एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना विद्यानंद बापट आपले मत मांडताना अचानक एका हल्लेखोराने बापट यांच्या कानशिलात लगावली तेव्हा तेथे असलेल्या फक्त दोन व्यक्तींनी या हल्लेखोरास पूर्ण ताकदीनिशी रोखले.
हल्लेखोरास रोखणाऱ्या याच दोन व्यक्तींनी असा प्रतिकार करावा हे खरे पाहता पूर्णतः अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते.
हल्लेखोऱ्याने बापट यांना थप्पड मारल्यानंतर तिथे असलेल्या एका मध्यमवयीन महिलेने तत्क्षणी हल्लेखोऱ्याचा उगारलेला हात अडवला आणि बापट यांना वाचवले.
आपल्या मुलाखतीत बापट नेहेमीच सांगत असतात कि ''लोकांनी मला स्वतःला फार महत्त्व देऊ नये, माझ्यावर टीका करू नका, त्याऐवजी मी मांडतो त्या मुद्द्यांना उत्तरे द्या, त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा.''
विशेष म्हणजे या हातघाईच्या लढाईच्या बिकट प्रसंगी ती धाडसी महिला त्या हल्लेखोऱ्याला नेमके हेच सुनावत होती. मला त्या महिलेचे फार कौतुक वाटले.
बापट यांना बेदम मारहाणीपासून रोखण्यास त्याशिवाय आणखी एका व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली.
खरे तर त्या व्यक्तीने असे करणे त्याच्या व्यवसायिक हिताच्या अगदी विरुद्ध होते.
बापट यांच्या मुलाखतीचे चित्रण करणाऱ्या व्हिडीओग्राफरने बापट यांच्यावर हल्ला होताच लगेचच आपले चित्रण थांबवले आणि हल्लेखोऱ्याला एका हाताने ढकलत बापट यांच्यापासून दूर नेले.
आपल्यापैकी अनेक जण छोट्या आकाराचे पण महागडे मोबाईल वापरत असतात. प्रसारमाध्यमांतील फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांचे कॅमेरे किती महागडे असतील याची कल्पनाच केलेली बरे.
तर बापट यांच्यावर हल्ला होताच या व्हिडिओग्राफरने एका हाताने आपला अवजड कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने हल्लेखोऱ्याला पूर्ण शक्तींनिशी मागे लोटत नेले.
या अवधीत तिथे जमलेल्या लोकांना विद्यानंद बापट यांना सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य झाले. तरीसुद्धा लांबूनच तो हल्लेखोर ' बापट याला मी सोडणार नाही, मी त्याला मारणार आहे,'' असे जोरजोरात ओरडून सांगत होता. यावेळी ती महिला त्याला असे करु नकोस म्हणून सांगत होती.
या मारहाणीच्या झालेल्या चित्रणात हे दृश्य तुम्ही पाहू शकता.
हल्लेखोऱ्याने बापट यांच्या कानशिलात लगावली याचे चित्रण केवळ `टिव्ही नाईन' या वाहिनीकडेच आहे. या चित्रणामुळे या वाहिनीचा टिआरपी नक्कीच भरपूर वाढला असेल.
जर या व्हिडीओग्राफरने बापट यांच्या हल्लेखोऱ्याला रोखण्याऐवजी त्याला हल्ला चालू ठेवण्यास पूर्णतः मोकळीक दिली असती आणि या हल्ल्याचे चित्रण चालू ठेवले असते तर या वाहिनीकडे या हल्ल्याच्या एक्सल्युझिव्ह चित्रणाचे अधिक फुटेज, काही सेकंदाऐवजी काही मिनिटांचे झाले असते.
व्हिडिओग्राफर म्हणून हा हल्ला चालू ठेवणे नक्कीच त्याच्या व्यावसायिक हिताचे आणि बांधिलकीचे होते.
मात्र व्यावसायिक बांधिलकी आणि हित याऐवजी या व्हिडीओग्राफरने माणुसकीला प्राधान्य दिले.
खरे पाहता ही घटना इतक्या वेगाने घडली कि `हे बरे कि ते बरे' याचा विचार करण्यास त्या व्हिडिओग्राफरला मुळी वेळच मिळाला नाही.
त्यामुळे बापट यांच्या मदतीस जाऊन हल्लेखोऱ्यास रोखण्याची कृती व्हिडिओग्राफरकडून उत्स्फूर्तपणे घडली.
व्यावसायिक हिताऐवजी माणुसकीस जपण्याची व्हिडीओग्राफरची ही कृती पूर्ण विचारांती नव्हती तर ती एक प्रतिक्षिप्त कृती होती.
व्यावसायिक हितापेक्षा माणुसकीशी बांधिलकीला प्राधान्य मिळाले.
हा प्रसंग पाहताना आफ्रिकेतील एका देशात दुष्काळात मरणासन्न अवस्थेतील हाडांचा सापळा बनलेल्या एका बाळाकडे एक गिधाड बुभूक्षित नजरेने पाहत आहे, असा क्षण टिपलेल्या एका फोटोला एक जगप्रसिद्ध पारितोषक मिळाले होते ते आठवले.

Camil Parkhe



Monday, August 24, 2026


मानवी इतिहासातील धर्मांतरे .. स्वातंत्र्याची ऐंशी वर्षे साजरा करणाऱ्या देशाने अलीकडेच स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि लागोपाठ राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्रात धर्मांतर स्वातंत्र्य कायदा मंजूर केला.

पुण्यातील गुरुवार पेठेतील पंचहौद चर्च शहराचा एक मौलिक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय वारसा आहे.
या पवित्र नाम देवालयाच्या एकशेतीस फूट उंचीच्या टोलेगंज मनोऱ्यात असलेल्या भल्यामोठ्या जाडजूड घंटांच्या नादांतून नियमितपणे संगीत निर्माण केलं जाते.
दरवर्षी ख्रिस्तजयंतीला या घंटानादातून ख्रिस्तजन्माची मराठी मधुर गीते किंवा ख्रिस्तमस कॅरोल्स गायली जातात. तसेच देशाच्या स्वातंत्र्यादिनी `जन गण मन अधिनायक जय हे' हे राष्ट्रगीत गायले जाते.
ख्रिस्ती देवळाच्या घंटानादातून स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीताचे स्वर गायले जाण्याची देशातील ही बहुधा एकमेव प्रथा असावी.
तर एकशेचाळीस वर्षे जुने असलेल्या या देवालयाच्या वर्धापनदिनानिमित्त येथे सप्ताहभर उपासना चालू होत्या.
त्यानिमित्त येथे मराठी गायने, भजने आणि कीर्तने टाळ, तबला वगैरे पारंपरिक भारतीय वाद्यसंगीताच्या सुरात होत असल्याने `हा तर चक्क धर्मातराचा प्रयत्न' असा आरोप झाला आहे.
संपूर्ण जगात केवळ आशिया खंडात प्राचीन काळापासून विविध धर्मांची आणि साहजिकच त्याचबरोबरच धर्मपरिवर्तनाची परंपरा आहे.
भारतात प्राचीन काळापासून आस्तिक आणि नास्तिक विचारधारा किंवा दर्शने परंपरा आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात नास्तिक आणि आस्तिक या शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आस्तिकता आणि नास्तिकतेसाठी भारतीय दर्शनशास्त्रात ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा वेदप्रामाण्य हाच निकष आहे.
वेदप्रामाण्य मानणाऱ्या तसेच वेद अपौरुषेय आहेत, मानवनिर्मित नाहीत असे मानणाऱ्या विचारधारांना किंवा दर्शनांना आस्तिक दर्शने संबोधली जातात.
चार्वाक, बौद्ध आणि जैन दर्शने वेदप्रामाण्य मानत नाहीत, म्हणून ही दर्शने नास्तिक समजली जातात.
सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे भारतीय इतिहासातील एक मोठे, दूरगामी परीणाम करणारे धर्मांतर मानले जाते.
अशोकाने आपला बौद्ध धर्माचा केवळ भारतवर्षांत नव्हे तर इतरही देशांत प्रचार केला, त्यामुळे आशियातील अनेक देशांतील लोक बौद्धधर्मीय बनले.
भारतातील वेरुळ, कैलास वगैरे प्राचीन गुंफा आणि लेणी यावरून देशात एके काळी बौद्ध धर्माचे लोण किती खोल आणि दूरपर्यंत पोहोचले होते याची साक्ष देतात.
भारतीय उपखंडात सम्राट अशोक यांचे बौद्ध धर्मप्रसाराच्या जे स्थान आहे तेच स्थान पाश्चात्य राष्ट्रांत रोमचा सम्राट कॉन्स्टंटाईन द ग्रेट याचे ख्रिस्ती धर्मप्रसाराबाबत आहे.
तिसऱ्या दशकात या रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्विकारुन त्या धर्माला राजाश्रय पुरवला. ख्रिस्ती धर्माला आपल्या साम्राज्याचा अधिकृत धर्म बनवला. याचाच परिणाम म्हणून नंतर ख्रिस्ती धर्म युरोपात आणि इतरत्र पसरला.
आद्य शंकराचार्य यांनी वैदिक धर्माचा संपूर्ण देशभर पुन्हा प्रचार केला आणि त्यानंतर बौद्ध धर्म भारतातून जवळजवळ नामशेष झाला.
तेराव्या शतकात उत्तर भारतात सुलतानी राजवट सुरु झाली, तेव्हा इस्लाम धर्माची देशात बीजे रोवली गेली. सुलतानी राजवटीनंतर बाबरपासून तो थेट बहादूर शाह जफरपर्यंत तब्बल सहाशे वर्षे अख्ख्या भारतात म्हणजे दख्खनपर्यंत मुघल राजवट म्हणजे मुस्लिमांची सत्ता होती.
जवळजवळ आठ शतकांच्या या दीर्घ कालावधीत येथील बहुसंख्य जनता हिंदूच राहिली हे विशेष.
वसईत अल्पकाळात आणि दक्षिण गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत जसे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतर झाले तसे मुस्लीम राजवटींत इस्लाममध्ये घाऊक धर्मांतर झाले नाही हा मोठा फरक आहे.
सम्राट अकबर यांच्या काळात तर धर्मपरिवर्तनाचा एक आगळावेगळा प्रयोग झाला.
हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिस्ती वगैरे अनेक धर्माच्या पंडितांशी वेळोवेळी चर्चा करुन अकबराने स्वतःचाच `दिने इलाही’ हा धर्म स्थापन केला. हा धर्म अकबरानंतर लयास गेला.
मुसलमान झालेल्या नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मांत आणले गेले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातले एक गाजलेले धर्मांतर प्रकरण.
येशू ख्रिस्त हा स्वतः आशियाई राष्ट्रातल्या इस्राईलमधील गॅलिली प्रांताचा. येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी संत थॉमस भारतात इसवी सन ५२ला आला आणि त्यांनी दक्षिणेत केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची बीजे रोवली.
भारतात ख्रिस्ती धर्माची अशी दोन हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्यामुळे केरळमधील ख्रिश्चन समुदाय स्वतःला सेंट थॉमस ख्रिश्चन्स किंवा ख्रिश्चन्स असे संबोधतो.
तामिळनाडू तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले डॉ. पी. सी. अलेक्झांडर आणि बुकर प्राईझ विजेत्या अरुंधती रॉय या सिरियन ख्रिश्चन समाजाचे काही नावाजलेले प्रतिनिधी.
गोव्यात आणि दक्षिणेत तामिळनाडू परिसरात मध्ययुगात पाचशे वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला.
देशातील वरच्या आणि खालच्या जातींजमातींतील लोक अशाप्रकारे ख्रिस्ती झाले, त्यामुळेच भारतातील ख्रिस्ती समाजात या देशातील बहुसंख्य समाजात असलेल्या सर्वच जाती आणि जमाती आढळतात, जातीभेदसुद्धा असतात.
मध्ययुगात वसई आणि `ओल्ड काँक्वेस्ट’ म्हणून गणल्या गेलेल्या दक्षिण गोव्यात पोर्तुगीज राजसत्तेच्या मदतीने ख्रिस्ती धर्माचा जोरदार प्रचार झाला.
त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या साधनांचा सर्रास वापर करण्यात आला आणि तेथील बहुसंख्य लोक ख्रिस्ती झाले.
नंतरच्या काळात मात्र ख्रिस्ती धर्मांतराची लाट पूर्णतः थंडावली आणि न्यु काँक्वेस्ट म्हणजे उत्तर गोव्यातली, तसेच दमण, दीव आणि सिल्व्हासा येथील बहुसंख्य जनता हिंदुच राहिली.
या पोर्तुगीजांकडूनच ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट हे लग्नात आंदण, हुंडा म्हणून मिळाले आणि या व्यापारी कंपनीने मग संपूर्ण भारत देशच आपल्या ताब्यात घेतला.
मात्र पोर्तुगीजांप्रमाणे ब्रिटिश सत्तेने ख्रिस्ती धर्मांतरास कधीही, कुठल्याही प्रकारे पाठबळ दिले नाही.
भारतात दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतसुद्धा ख्रिस्ती धर्मांतरांचे प्रमाण अगदी अल्प आणि नॉर्थ ईस्टसारख्या काही ठराविक प्रदेशांपुरते मर्यादित राहिले.
ख्रिस्तीधर्मिय ब्रिटिश राजवटीतसुद्धा येथील ख्रिस्ती लोकांची संख्या दोन टक्क्यांहून अधिक पुढे जाऊ शकली नाही.
ब्रिटिश अमदानीत एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्मांतरांच्या अनेक घटनांनी खळबळ माजवली.
कारण सुरुवातीच्या काळातली ही सर्व धर्मपरिवर्तने त्यावेळी उच्चभ्रू आणि सधन पारशी आणि ब्राह्मण वर्गांतून झाली होती.
चित्पावन ब्राह्मण पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, `स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, `यमुनापर्यटन' कादंबरी लेखक मराठीतले पहिले कादंबरीकार बाबा पदमनजी वगैरेंच्या धर्मांतरांनंतर महाराष्ट्रात मोठी वादळे निर्माण झाली होती.
त्यावेळी देशात पहिल्यांदाच कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले होते, त्यामुळे धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या पारशी तरुणांच्या धर्मांतरांबाबत मुंबईत स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन यांच्याविरुद्ध अनेक कोर्ट कचेऱ्या, हेबियस कॉर्पस याचिका दाखल झाल्या.
या पारशी तरुणांच्या ख्रिस्ती धर्मपरिवर्तनांमुळे मुंबईत सुरु झालेल्या स्कॉटिश मिशनच्या पहिल्यावहिल्या आधुनिक शाळा काही काळ विद्यार्थ्यांअभावी ओस पडल्या होत्या.
भारतातील पहिल्या महिला वकील कोर्नेलिया सोराबजी यांचे वडील सोराबजी खारसेटजी लांगराना यांना ख्रिस्ती झाल्यामुळें मोठया संकटांना सामोरे जावे लागले होते.
पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत जोतिबा फुले शिकत असताना त्यांच्या काही सहअध्यायी तरुणांनीसुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.
``इ. स. १८४६ मध्ये रेव्हरंड जेम्स मिचेल यांनी पुण्यातील दोघा तरुण ब्राह्मणांस बाप्तिस्मा दिला. तेव्हा जोतीराव आणि त्यांचे मित्र यांच्या मनाची थोडी चलबिचल झाली. परंतु सामाजिक सुधारणेचे कार्य तडीस न्यायचे असेल, तर प्रत्यक्ष धर्मांतर न करण्यात शहाणपण आहे हा विचारच शेवटी प्रबळ ठरला,’’ असे ग. बा. सरदार यांनी लिहिले आहे.
ख्रिस्ती न होता महात्मा जोतिबा फुले यांनी प्रागतिक विचाराच्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि लग्न वगैरे कार्यांत पुरोहित वर्गाची दलाली पूर्णतः नाकारली.
हिंदू धर्मांतून ही ख्रिस्ती धर्मांतरे झाली त्याचप्रमाणे विसाव्या शतकात ख्रिस्ती धर्मांतून हिंदू धर्मांत झालेली धर्मांतरेसुद्धा विविध कारणांनी गाजली.
या उलट्या प्रवाहातील काही धर्मांतरांचे मोठया उत्साहात स्वागत झाले तर काही व्यक्तींना त्यामुळे समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागले.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावामुळे ब्रिटिश तरुणी एलिझाबेथ मार्गारेट नोबल यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्या भगिनी निवेदिता बनल्या.
`सकाळ' दैनिकाचे संस्थापक संपादक नारायण भिकाजी नानासाहेब परुळेकर यांचा विवाह फ्रेंच महिला जेनेव्हिव्ह यांच्याशी झाला आणि विवाहानंतर त्यांनी शांताबाई हे नाव स्वीकारले.
`ज्ञानकोश'कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जर्मन ज्यू असलेल्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि शीलवती हे नाव धारण केले. त्यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिलेले आहे.
डॉ. केतकरांच्या पश्चात शीलवती केतकर यांनी केतकरांचे ज्ञानकोशांची विक्री करण्यासाठी किती खस्ता खाल्या याविषयी दुर्गा भागवत यांनी लिहिले आहे.
महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेले एक धर्मांतर म्हणजे `केसरी' दैनिकाचे संपाद्क आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू (मुलीचा मुलगा) असलेले ग. वि. (गजानन विनायक) केतकर यांनी एका परदेशी महिलेशी केलेला विवाह.
केतकर यांनी एका परदेशी ख्रिस्ती महिलेशी प्रेमविवाह केला होता. या आंतरधर्मीय विवाहानंतर पुणतात मोठे वादळ निर्माण झाले होते आणि केतकरांना 'केसरी' चे संपादकपद सोडावे लागले होते.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी बौद्ध धर्मात आपल्या असंख्य अनुयायांसमवेत केलेल्या धर्मांतराची मानवी इतिहासात एक खूप आगळेवेगळे धर्मांतर म्हणून केली जाईल. '
नाशिक जिल्ह्यात येवला येथे १९३५ साली `` मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' अशी प्रतिज्ञा केली.
धर्मांतर रोखण्यासाठी आज कायकाय केले जाते. मात्र नवलाची बाब म्हणजे बाबासाहेबांचे धर्मांतर रोखण्यासाठी तेव्हाच्या सामाजिक आणि धार्मिक पुढाऱ्यांनी कसलीही पावले उचलली नव्हती.
ही घोषणा तब्बल तीन दशकांनी प्रत्यक्षात उतरवली गेली तेव्हा या महामानवाबरोबर नव्या धर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपुरात हजारो लोक जमले होते.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील वंचित समाजात ख्रिस्ती धर्मपरिवर्तन सुरु झाले तेव्हासुद्धा बहुसंख्य समाजाने त्याकडे सरळसरळ कानाडोळा केला होता.
याचाच परिणाम म्हणून एकोणिसाव्या शतकात पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा,, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यातील अनेक गावाच्या गावे पुर्णतः ख्रिस्ती बनली होती.
अर्थातच हे सर्व लोक वंचित जातींजमातींतील होते.
स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतरानंतर यापैकी अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी नंतर स्वतःहून घरवापसी केली अन हिंदू किंवा बुद्ध धर्मांत राहणे पत्करले.
कुठलाही गाजावाजा न करता झालेले हे पुनर्धर्मांतर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना वगैरे जिल्ह्यांत आणि विदर्भात अमरावती, नागपूर वगैरे परिसरात घडले.
त्या कुटुंबांच्या दृष्टीने एका अर्थी हे बरेच घडले.
कारण त्यामुळे अनुसूचित जातींसाठी असलेल्या सर्व आरक्षणादी सुविधा त्यांना मिळत राहिल्या, त्यांचेच भाऊबंद असलेली ख्रिस्ती कुटुंबे मात्र त्यापासून वंचित राहिले.

Camil Parkhe

नाशिकच्या बाळ येशू तीर्थक्षेत्रातील हा फोटो

Tuesday, August 11, 2026



सन १९६७ ते २०२६ .. काँग्रेसच्या दिड तपाच्या देशातील सत्तेला १९६७ साली सर्वप्रथम सुरुंग लागला आणि भाजपच्या एक तपाच्या निरंकुश सत्तेच्या बुरुजाला २०२६ साली अगदी खिजगणकीतसुद्धा नसलेल्या गटाकडून -झेन झी - कडून मोठे भगदाड पाडले.

महाराष्ट्रात १९६७च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी काँग्रेसच्या स. का. पाटील यांचा पराभव केला होता.
याच वर्षी १९६७ साली महाराष्ट्रात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी युवक क्रांती दलाची स्थापना केली होती.
`युक्रांद' या नावाने ओळखल्या गेलेल्या या संघटनेने राज्यात आपल्या कामाने भरीव ठसा निर्माण केला. युक्रांद नाव घेतले कि लगेचच डॉ. कुमार सप्तर्षी यांचे नाव नजरेसमोर येते.
डॉ. कुमार सप्तर्षी यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्यानंतर रविवारी पुण्यात कोथरूडच्या गांधी भवनात डॉ. सप्तर्षी यांच्या आठवणी जागवण्यात आल्या.
वयाची ऐंशी पार केल्यानंतरसुद्धा विविध उपक्रमांद्वारे तरुणांशी कायम संवाद साधणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांच्याबद्दल विविध वयोगटांचे लोक यावेळी बोलले.
देशात झेन झीने दाखवलेली ताकद डॉ. सप्तर्षी यांनी पाहायला हवी होती असा काही वक्त्यांचा सूर होता.
बाळासाहेब भारदे यांच्यानंतर महाराष्ट्र गांधी स्मारक भवनाचे अध्यक्ष झाल्यानंतर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अनेक उपक्रम सुरु केले.
दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गांधी भवनात दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम हा त्यापैकी एक.
या नव्या पर्वात चक्क गांधीजींच्या विचारावर आधारित तीन दिवसीय शिबीर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अलीकडेच भरवले होते आणि त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला होता.
बापूंचे चित्र असलेल्या टी-शर्टची विक्रीही या काळात झाली.
`डॉ कुमार सप्तर्षी यांच्या आठवणी' असे शिर्षक असलेल्या कार्यक्रमास हजेरी लावण्याची खरे तर मला इच्छा नव्हती.
पण श्याम बेनेगल यांचा `अंकुर' चित्रपट पाहिल्यानंतर आणखी काही वेळ तिथे रेंगाळलो आणि वक्त्यांच्या तोंडून जे ऐकले त्याने १९६७ ते २०१६ या काळातल्या अनेक घडामोडींवर प्रकाश पडला.
डॉ. कुमार सप्तर्षी हे आमच्या नगर जिल्ह्यातल्या राशिन गावचे, त्यांनी जानवे सोडले, आंतरजातीय लग्न केले आणि जातिअंताची चळवळ राबवली.
विविध विद्यार्थी चळवळींमध्ये जुळणारे प्रेमविवाह हा त्याकाळात एक थट्टेचा विषय झाला होता हे आठवते.
युक्रांदच्या तालमीत तयार झालेल्या अनेक व्यक्तींनी नंतर विविध समाजक्षेत्रांत नाव कमावले.
डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि पर्यायाने त्यांचे दीर्घ मनोगत ऐकण्याचे प्रसंग गेल्या वर्षी दोनदा आले.
त्यांच्याशी खूप आधीपासून संबंध ठेवायला हवे होते असे तेव्हापासूनच वाटायला लागले.
आणीबाणीत तुरुंगवास भोगल्यानंतर जनता पार्टीच्या लाटेत डॉ. सप्तर्षी नगर शहरातून विधानसभेवर निवडून गेले होते.
विधानसभेत जनता पार्टीचे सर्वाधिक म्हणजे शंभराहून अधिक आमदार असल्याने एस. एम. जोशी यांनी मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह सप्तर्षी यांनी केला होता.
एसेम यांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ शरद पवारांच्या गळ्यात पडली.
युक्रांदची सुरुवातीचा काळ, त्यानंतरची मधली काही वर्षे आणि दोन दशकांपूर्वी युक्रांदच्या पुनरुज्जीकरणानंतरची वर्षे याबद्दल त्यात्या काळात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांच्या भाषणांतून डॉ. सप्तर्षी यांचे व्यक्तिमत्व, कार्यपध्द्त आणि एकूण व्यक्तिमत्वाविषयी बरीच माहिती मिळाली.
पुण्यात उद्यान प्रसाद सभागृहात साक्षात पुरीचे शंकराचार्य यांच्याशी दोन दिवसांचा भरगच्च गर्दीत झालेला जाहीर संवाद हा सप्तर्षी यांच्या सुरुवातीच्या काळातील एक मोठा गाजलेला प्रसंग.
या संवादाला त्यावेळी कॉलेज विद्यार्थीनी म्हणून उपस्थित असलेल्या अंजली कुलकर्णी यांच्या तोंडून रविवारच्या कार्यक्रमात ऐकणे म्हणजे अलभ्य लाभ योग होता.
सुशीला मोराळे आणि कॉम्रेड किशोर ढमाले म्हणाले कि डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यावर प्रस्थापित समाजवादी नेत्यांनी खरे तर अन्यायच केला.
सत्तरच्या दशकातील दलित पँथर ही प्रस्थापित रिपब्लिकन नेत्याविरुद्ध, मागोवा ही संघटना मार्क्सवादी नेत्यांविरुद्ध आणि युक्रांद ही संघटना समाजवादी नेत्यांविरुद्ध नकार होती असे ढमाले म्हणाले.
ढमाले म्हणाले कि समाजवाद्यांनी डॉ. सप्तर्षी यांना साथ दिली नाही आणि काँग्रेसवाले त्यांना आपल्या पक्षात घेण्यास तयार नव्हते. डॉ. सप्तर्षी यांच्याकडे `साधना' साप्ताहिकाची सूत्रे देण्यास नकारघंटा मिळाल्यानंतर डॉ. सप्तर्षी यांनी स्वतः `सत्याग्रही विचारधारा' हे मासिक सुरु केले.
समाजवाद्यांनी डॉ. सप्तर्षी यांना साथ दिली असती तर महाराष्ट्रात सद्याची स्थिती आली नसती असे कॉम्रेड ढमाले म्हणाले.

Camil Parkhe August 10, 202


Monday, July 27, 2026

 


या नव्या पिढीतील ही पोरंपोरी..

मी मिखाईल गोर्बाचेव्हच्या काळात सोव्हिएत रशियाच्या मॉस्कोत, क्रेमलीनमध्ये हिंडलो आहे.  सोव्हिएत ब्लॉकचाच एक भाग असलेल्या पूर्व युरोपातील बल्गेरियात माझे पत्रकारितेतील पहिलेवहिले आणि एकमेव प्रशिक्षण पूर्ण झाले.  बल्गेरियाची राजधानी सोफिया आणि इतर शहरांत संध्याकाळी डिनर झाल्यानंतर पब्समध्ये व्होडका घेऊन संगीताच्या तालावर मनसोक्त नाचलो आहे.

त्याआधी सत्तरच्या दशकात सातारा जिल्ह्यातल्या दगडी बांधकाम असलेल्या आणि गुरुवार वगैरे पेठा असलेल्या कराड शहरात मी शिकलो आहे. कराडमध्ये माझा बालपणीचा काळ संपून उमेदीचा, तरुणाईचा कालखंड सुरु झाला. तरुणाईचे माझे अनुभव आणि आठवणी तिथपासून सुरु होतात.

हल्ली मी पुण्यात जाताना सिटी बसने जातो आणि संध्याकाळी घरी परतताना मेट्रोने प्रवास करतो. मेट्रोच्या या वातावरणात आणि प्रवासातून आजकालच्या तरुणाईचे होणारे दर्शन मला अचंबित करून जाते. कालचाच प्रसंग घ्या ना.

मुठा नदीवर असलेल्या मेट्रोच्या पुलावरुन मेट्रोच्या स्थानकात शिरताना पावसाची रिपरिप कालही चालू होती. माझ्या पायाच्या नखाला जखम झाल्याने त्या जखमेत पाणी शिरू नये, जखम चिघळू नये म्हणून मी काळजी घेत होतो.  

त्याचवेळी नदीवरील मेट्रोच्या पुलाच्या अगदी मधोमध फ्रॉकमधील एक मुलगी पावसात नाचत होती आणि तिच्याबरोबर असलेला तो मुलगा मोबाईलवर तिचे नाचणे टिपत होता.  सिटी बसने प्रवास करताना तरुणाईची अशी हलकीफुलकी, सहजगत्या वावरणारी दृश्ये नजरेस पडत नाही.  मेट्रोचा माहोल काही वेगळाच असतो.

डिस्ट्रिक्ट कोर्ट जंक्शनमध्ये ती दोन तरुणतरुणी एकमेकांच्या हातात हात घेऊन बाहेर पडली. येथून बहुधा त्यांच्या मेट्रोच्या लाईन्स बदलणार होत्या, कारण एकमेकांना जवळ घेऊन, आलिंगन घेऊन त्यांनी निरोप घेतला.  पाठ बदलल्यानंतर चित्रपटांत दाखवतात तसे त्यांनी पुन्हापुन्हा मागे वळून पाहिलेसुद्धा नाही.

या तरुणाईचा पेहराव खास असतो हे सांगायलाच नको.  जो तो आणि जी ती आपल्या मोबाईलमध्ये गुंग असते. त्यामुळे कोचमध्ये कितीही गर्दी असली तरी गोंगाट असा नावालाही नसतो. माझ्या रोजच्या मेट्रो प्रवासात या तरुणाईचे मोहक, आकर्षक आणि उत्साहवर्धक दर्शन घडते.

माझ्या समवयस्कातील पिढीने आपल्या तरुणाईच्या काळात इतिहास घडवला होता.  घोषित आणिबाणीआधी गुजरातमध्ये मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी मोठा उठाव केला होता. या बंडाचे लोण नंतर बिहारमध्ये पोहोचले.

घोषित आणीबाणीविरुद्ध तेव्हाच्या तरुणाईने किती मोठा संघर्ष केला होता हे खरे तर आता सांगायलाच हवे.  कराडच्या टिळक हायस्कुलात अकरावीत शिकताना माझेही त्यात अल्पसे योगदान होतेच.  ` इंडियन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी लॉस्ट इलेक्शन इन हर रायबरेली सिट' हे बीबीसी रेडिओवरून मध्यरात्री ऐकल्यानंतर सातारा मतदार मोजणी केंद्रात आम्ही केलेला जल्लोष आजही मला आठवतो.

विशेष म्हणजे त्यावेळी मी मतदार होण्यासाठी पात्रसुद्धा नव्हतो.  त्याकाळात मतदार नोंदणीसाठी, सज्ञान होण्यासाठी वयाची एकविशी गाठावी लागे. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी मतदारपदाची पात्रता एकवीस वर्षावरुन अठरा वर्षांपर्यंत खाली आणली. यामुळेच काँग्रेस पक्ष नंतर केंद्रातील सत्तेपासून दुरावला गेला असे काहींचे म्हणणे आहे.

आणीबाणीपर्वातल्या राजकीय क्रांतीने अनेक नेत्यांना जन्म दिला. अलीकडेच निधन झालेले युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी हे त्यापैकी एक.

मी शिकत असताना सत्तरच्या दशकात गोव्यात विद्यार्थी चळवळ खूप प्रभावी होती. आसामच्या विद्यार्थी आंदोलनाने तर देशात इतिहास घडवला. परकी नागरिकांच्या मुद्द्यावर ऑल आसाम स्टुडन्ट्स युनियनने निवडणूक जिंकून विद्यार्थी नेते प्रफुल्ल महंत वयाच्या ३२व्या वर्षी मुख्यमंत्री बनले. देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेक वर्षे त्यांच्या नावावर होता.

काही वर्षांपूर्वी युरोपात फ्रान्समध्ये आणि इटलीमध्ये वावरताना तिथला अभ्यासलेला, वाचलेला इतिहास नजरेसमोर येत होता.  पॅरीस, रोम आणि व्हेनिसमध्ये फिरताना तिथल्या बोल्ड तरुणाईचे दर्शन घडले.  पॅरीसमध्ये एका मॉलमध्ये तिथल्या पोरसवदा कॅशियरशी संवाद साधताना त्याचे एक वाक्य आजही आठवते.

आम्ही भारतीय आहोत असे ऐकताच, ''इंडिया, ओह, शाह रुख खान्स इंडिया' असे तो उत्स्फूर्तपणे उद्गारला होता.  पॅरीस आणि इतर शहरांत फिरताना मला फ्रान्सची राज्यक्रांती आठवत होती तर त्या फ्रेंच मुलाला भारतीय अभिनेता शाह रुख खान आकर्षित करत होता.

आज रविवारी सकाळी ब्रून घेण्यासाठी बेकरीत गेलो होतो. तिथला पंचविशीतला भरगच्च केशसंभार असलेला पोरगा मला जंतर मंतरला काय, काय झाले ते मला ऐकवत होता.  तो मूळचा दिल्लीचा, त्याचा एक मित्र दिल्ली आंदोलनात होता, दुसरा एक अमेरीकेतून पाठबळ देत होता.  ''तुला हे सगळे काही कसे कळत होते?'' मी त्याला विचारले. ''मी कायम मोबाईलवर अपडेट्स घेत असतो,'' तो उत्तरला.

याच तरुणाईने देशात आता पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे.  आपले भवितव्य घडवण्यात या पिढीने पुढाकार घेतला आहे.

Camil Parkhe



Sunday, July 12, 2026

 


`नीट, सरळ बसा, असे पायावर पायाची घडी करुन इथे बसायचे नाही,''

मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाच्या दालनांत बातमीदार म्हणून मी बसायला लागलो तेव्हा तिथला बेलिफ मला हे सांगायचा.
अनावधाने पुन्हा पायाची अशी घडी केली की लगेच तो पट्टेवाला बेलीफ तत्परतेने माझ्याकडे यायचा आणि मला सरळ करायचा.
न्यायालयाचा सन्मान करायचा, आदब राखायचा, बेअदबी होईल असे काही करायचे नाही असे धडे मी त्यावेळी शिकलो.
ते साल होते १९८२ आणि त्यावेळी मी नुकतीच विशीत पदार्पण केले होते. बीएची परीक्षा झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर करण्याआधीच बातमीदार म्हणून मी इंग्रजी दैनिक `द नवहिंद टाइम्स'चा स्टाफ रिपोर्टर म्हणून रुजू झालो होतो.
दिवसभराच्या माझ्या कँम्पस बिट्समधल्या बातम्या गोळा करून दुपारी साडेचार पाचच्या दरम्यान मी उच्च न्यायालयात पोहोचायचो.
त्यावेळी पणजीतील हे खंडपीठ मध्ययुगीन आदिलशाह पॅलेस आणि तेव्हाचे गोवा, दमण आणि दिवच्या सचिवालयाच्या आणि अँबे फरियांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाजूला मात्र मांडवी नदीच्या पाठमोरी असलेल्या जुन्या दुमजली इमारतीत होते.
पांढरा आणि पिवळा रंग असलेली पोर्तुगीज छापाची ही इमारत आजही आहे आणि तिकडे गेले कि मला आजही माझे ते लिगल रिपोर्टींगचे दिवस नजरेसमोर येतात.
तर त्या इमारतीत तिथे काही प्रमुख वकिलांना आणि मग रजिस्ट्रारला भेटल्यानंतर मला त्या दिवसातल्या प्रमुख याचिका आणि निकालांची माहिती मिळायची.
निकालाचा ऑपरेटिव्ह पार्ट शेवटच्या पानावर असायचा, तो नोटबुकात जसाच्या तसा लिहून काढायचा, याचिकेतील मुख्य मुद्दे वाचायचे आणि मग बातमी त्यावरुन तयार व्हायची.
लिगल रिपोर्टिंगच्या सुरुवातीच्या काळात आणि नंतरही खूप शिकता आले.
एकदा आठवते एका बातमीदाराने प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांचा (Judicial Magistare First Class - JMFC) उल्लेख `न्यायमूर्ती' असा केला होता, त्यावेळी `न्यायमूर्ती' असा उल्लेख फक्त उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी करावयाचा असतो अशी शिकवण मिळाली.
तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावाआधी मिस्टर जस्टीस किंवा Ms जस्टीस असे लिहायचे असते अशी सक्त ताकीदसुद्धा मिळाली.
कुठल्याही कार्यक्रमांत वा इतर घटनांत मुख्य पाहुणे आल्यानंतर पत्रकारांच्या कक्षांतील पत्रकारांनी उभे राहण्याची मुळीच गरज नाही.
अपवाद फक्त संसदीय सभागृहातील सभापतींचा, राज्यपाल आणि राष्ट्रपती आणि न्यायालयातील न्यायमूर्तींचा, असा धडा मला अगदी सुरुवातीला मला आमचे वृत्तसंपादक असलेल्या एम एम मुदलियार यांनी दिला होता.
``त्याशिवाय कुणाही व्यक्तीला उगाचच '', सर ' म्हणायचे नाही, भले ती व्यक्ती मुख्यमंत्री असो वा केंद्रीय मंत्री.. तुम्ही पत्रकार आहात, समोरची व्यक्ती तुमची बॉस नाही, उलट तुम्हालाच त्या व्यक्तीला जाब, प्रश्न विचारायचे आहेत हे लक्षात ठेव..'' असे मला मुदलीयार सरांनी बजावले होते.
परवा नॉर्वेच्या त्या महिला पत्रकाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे का जात नाही' असे विचारताना `सर' हा शब्द न वापरता 'प्राईम मिनिस्टर मोदी' असा त्यांच्या पदाचा उल्लेख केला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.
न्यायालयात वकील असलेल्या कुणाही व्यक्तीची न्यायालयात आपला काळा कोट आणि ती पांढरी कॉलर शिवाय येण्याची बिशाद नसते.
एकदा मुंबई उच्च न्यायलयाच्या गोवा खंडपीठात एका तरुण वकिलाने असा आगाऊपणा केला आणि ते कोर्टाच्या नजरेस आले तेव्हा तो वकील कसा घाईघाईने मागच्या दाराने कोर्ट रुमच्या बाहेर पडला हे मी स्वतः पाहिले आहे
जस्टीस गुस्ताव्ह फिलिप कुटो त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे न्यायाधीश होते.
त्याशिवाय मुंबईतून किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद नागपूर खंडपीठातील एकदोन न्यायाधीश व्हिझिटिंग जजेस किंवा व्हेकेशन जज म्हणून एक किंवा दोनतीन महिन्यांसाठी यायचे.
यापैकी जस्टीस वारीयावा हे एक नाव आजही स्पष्ट आठवते ते त्यांनी दिलेल्या काही निकालांमुळे.
जस्टीस कुटो हे एक खूप आदरणीय आणि कडक स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून लक्षात राहिले. सात आठ वर्षे मी हायकोर्टात लिगल रिपोर्टिंग केले पण एकदाही कुटो यांच्या कक्षात जाण्याचे धाडस झाले नाही, तसा प्रसंग आला नाही.
लिगल रिपोर्टर म्हणून दहाएक वर्ष काम केले, अनेक न्यायाधीशांच्या निकालपत्रांच्या बातम्या दिल्या पण यापैकी कुणाही न्यायाधीशाला त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी किंवा वेळ आली नाही.
औरंगाबाद येथे लोकमत टाइम्समध्ये रुजू झाल्यानंतर साहजिकच तिथल्या खंडपिठात पूर्ण एक वर्षभर लिगल रिपोर्टिंग केले.
त्याकाळात सुजाता मनोहर या मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश व्हिझिटिंग जज म्हणून काही महिने तिथे आल्या होत्या, तेव्हा त्यांच्या दालनात मी त्यांना भेटलो होतो.
हा एकमेव अपवाद
न्यायालयीन परिभाषेतील अनेक संज्ञा परिचित झाल्या, जशा की अमिकस क्युरी (amicus curiae) किंवा फ्रेंड ऑफ द जस्टिस किंवा न्यायमित्र.
पुण्यात आल्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये रुजू झाल्यानंतर लिगल रिपोर्टिंग कायमचे सुटले, कारण पुण्यात उच्च न्यायालयाचे मुळी खंडपीठच नाही.
मात्र तरीही लिगल रिपोर्टिंगची आवड कायम राहिली, आजही मी न्यायालयाच्या इंग्रजी आणि मराठी आवर्जून वाचतो.
त्याकाळात नव्यानेच ग्राहक कायदा संमत झाला, पुण्यातील ग्राहक न्यायालयांचे एकेक निकाल मोठ्या बातम्या बनत असत.
जस्टीस पी. एन. भगवती यांनी भारतीय न्याय व्यवस्थेत मोठी क्रांती केली. पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन किंवा सामाजिक हित याचिका त्यानंतर मोठ्या प्रमाणात न्यायालयात दाखल होऊ लागल्या.
एखादे पोस्ट कार्ड आले तर न्यायाधीश ते पत्र Suo Motto ( आपणहून ) याचिका म्हणून दाखल करून घेऊ लागले,
वृत्तपत्रांतील एखादी बातमीसुद्धा किंवा वाचकांचे पत्र याचिका म्हणून दाखल केली जायची, त्यासाठी मग न्यायाधीश अमिक्युस क्युरी. म्हणून एखाद्या वकिलाची नेमणूक करत असत.
त्यासाठी बहुतेक मानधन नसते. मात्र न्यायाधीशांकडून एखाद्याची अमिक्युस क्युरी म्हणून नेमले जाणे ही त्या वकिलासाठी मोठी सन्मानाची बाबा असायची
नंतर या जनहित याचिका किंवा पीआयएल काही समाज कंटकांनी खंडणी गोळा करण्यासाठी हत्यार म्हणून वापरली, जसे की नंतर माहिती अधिकार सुविधांचे झाले.
गेली अनेक वर्षे कुठल्याही उच्च न्यायालयाने एखाद्या बातमीची किंवा घटनेची आपणहून सु मोटो दखल घेऊन सुनावणी सुरु केली असे वाचण्यात आले नाही.
उलट सगळयांसमोर, अगदी उघडउघड होणाऱ्या `एन्काउंटर', `बुलडोझर न्याय' अशा घटनांबाबत न्यायसंस्थांनी डोळ्यांवर झापडे ओढून घेण्याचे प्रकार नित्याचे झाले.
न्यायव्यवस्थेच्या पडझडीची ते एक सुरुवात होती
काही वर्षांपूर्वी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी रंजन गोगई यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेऊन आपली चिंता आणि खेद व्यक्त केला ही घटना तर अभुतपुर्व होती.
त्यानंतर रंजन गोगई स्वतः सरन्यायाधीश बनले आणि त्यांनी वेगळाच इतिहास घडवला. नंतर लगेच राज्यसभा सदस्यत्व स्विकारुन आणखी एक वेगळाच इतिहास घडविला.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि त्यानंतर भूषण गवई यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हाही त्यांच्याविषयी अनेकांच्या खूपखूप अपेक्षा होत्या.
काय झाले ते आपणासमोर आहेच.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराच्या आकारातील जळीत नोटांच्या प्रकरणाने तर आपल्या देशाच्या न्यायसंस्थेची आणि संपूर्ण व्यवस्थेचीच लक्तरे वेशीवर टांगली होती.
आता झुरळ प्रकरण गाजते आहे आणि देशाचे सरन्यायाधीश देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वेगळ्याच प्रकारे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Camil Parkhe