Monday, July 6, 2026


सकाळी सातचा सुमार. नळाला पाणी नव्हते आणि त्याचवेळी इमारतीखाली लोकांची धांदल जाणवली. वरुनच खाली डोकावले तर पालिकेच्या पाण्याच्या नळापाशी काही पुरुष मंडळी पाण्यासाठी थांबलेले दिसले. याचा अर्थ खालच्या टाकीतून वरच्या टाकीत पाणी खेचणारी मोटार बिघडली होती.

परत किचनमध्ये येत आपल्याच कामात गुंतलेल्या बायकोला मी म्हटलं, ` बरं झालं, आज पालिकेचे पाणी येण्याचा वार आहे. निदान खालच्या नळाला तरी पाणी येते आहे त्यामुळे लिफ्टने सर्वांना आपापल्या घरी पाणी आणता येईल. फारशी गैरसोय होणार नाही.आपल्याकडे एक बरे आहे. म्हणजे विहिरीचे आणि बोअर वेलचे पाणी असे इतरही दोन पर्याय आहेत, जे लोक केवळ पालिकेच्या पाण्यावर अवलंबून असतात त्यांचे किती हाल होत असतील नाही?''
``आणि दुसरं म्हणजे आपण शेजारच्या इमारतींखालच्या नळांचेसुद्धा पाणी भरु शकतो, अशा अडचणीच्या वेळी कोण नाही म्हणणार? आणि एक बरं म्हणजे आपल्याकडे निदान दर दिवसाड तरी पाणी येते, आठवड्यातून एकदा-दोनदा पाणी मिळणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील नाही?’’
शाळेला जाण्याच्या घाईत असल्याने बायकोच्या निर्विकार चेहऱ्याकडे मी पाहिले आणि मी पण एकदम गप्पगार झालो.
क्षणभर स्तब्ध झालो आणि एकदम चमकलोच.
आतापर्यंत ``मी हे बरं झालं, ते बरं झालं हे’’ हे माझ्यामधलं कोण म्हणत होतो ते माझ्या लक्षात आलं होतं.
``हे बरं झालं, ते बरं झालं’’ ची मालिका अशी खूप लांबवर चालली असती हे माझ्या लक्षात आलं होतं.
हे असं `बरं झालं, ते तर खूपच बरं झालं’’ असं म्हणत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असताना मला अनेकदा कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या मोझेसची आठवण येते.
मी त्याला भेटलो तेव्हाच मोझेस पंधरासोळा वर्षाचा असावा. शरीराने वाढला तरी मोझेसचा बुद्ध्यांक वयाच्या मानानं थोडा कमीच होता. लहानथोर माणसं त्याची थट्टा करत असायची ती त्याच्या एका आगळ्यावेगळ्या दृष्टिकोनामुळे. काहीही विपरीत घडलं तरी त्याकडे सकारात्मक नजरेनं पहायचं अशी त्याची नेहेमीच विचारधारा असायची.
एकदा शाळा सुटल्यानंतर पोरांची थोडी दंगामस्ती झाली आणि त्यात मोझेसला बारीकसा दगड नेमका डोक्यावर लागला, खोच पडली आणि त्यातून रक्ताची धार वाहायला लागली. जमलेल्या लोकांनी वेळीच कापडानं जखम दाबली आणि रक्त वाहण्याचं थांबलं.
त्यानंतर मोझेसचा तिथल्या पोरांशी आणि लोकांशी झालेली संवाद मला आजही आठवतो. थोडक्यात त्याची उत्तरे अशी होती.
``बरं झालं, दगड बारीकसा होता. बरं झालं, रक्त वाहायचं लगेच थांबलं.. बरं झालं, फक्त टकुऱ्याला लागलं, मेंदूला मार नाही बसला... मी नशिबवान, अगदी थोडक्यात वाचलो.. बरं झालं अन बरं झालं’’ असं तो बोलत राहिला आणि मग तिथं जमलेली सगळी मंडळी त्याला हसायला लागली.
मोझेसच्या बुद्धीची वाढ मंद झाली होती तरी त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भल्याभल्या विचारवंतानासुद्धा चकित करणारा होता.
तशी ही खूप वर्षांपूर्वीची घटना, मोझेस आता कुठे आहे, काय करतो हे मला माहितीसुद्धा नाही, मात्र त्याची बाळबोध विचारसरणी मला आजही खूप प्रभावित करत असते.
आजरा इथल्या या मोझेसच्या या सकारात्मक वृत्तीवर मी एक छोटासा इंग्रजीत लेख लिहिला होता. `Incorrigible Optimist'' या शिर्षकासह `टाइम्स ऑफ इंडिया'ने आपल्या राष्ट्रीय आवृत्तीच्या संपादकीय पानावर `मिडल' म्हणून हा लेख १९९१च्या आसपास छापला होता. त्याकाळात मी फ्रि-लान्स जर्नालिस्ट होतो.
कधीतरी हा लेखसुद्धा इथे मी टाकेल.
आणि हा दुसरा तसा गंमतीदार प्रसंग आहे.
शाळा सुटल्यावर आदितीला घरी आणण्यासाठी मी जायचो तेव्हा गेटपाशी अनेकदा ही घटना घडायची. दुसरी-तिसरीत असलेली एक मुलगी आपलं खांद्यावरचं दफ्तर सावरत पळत यायची आणि शेजारी असलेल्या रिक्षावाल्या काकांच्या गुडघ्यांना बिलगत आनंदाने म्हणायची, '' काका, आज फ्रायडे !''
एकदा ती मुलगी अशीच ''काका, आज थर्सडे !'' असं म्हणताना पाहिलं अन न राहवून मी त्या रिक्षावाल्या काकांना हा काय प्रकार आहे ते विचारले.
हसून ते म्हणाले, '' शनिवार-रविवारची सुट्टी जवळ येते म्हणून पिंटी दरदिवशी खूष असते.''
``तर मग सोमवारी ती काय म्हणून खूष असते?'' मी विचारले.
``सोमवारी पण ती खूषच असते, `आज मंडे'' म्हणून !'' गोड हसणाऱ्या पिंटीकडे पाहत मी थक्क झालो.
सदानकदा प्रत्येक गोष्टींतून - मग तो शुक्रवार असो वा सोमवार - जीवनाचा आनंद लुटण्याचा त्या चिमुरडीचा स्वभाव नक्कीच कौतुकास्पद होता.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात `फाईव्ह डे विक' असणाऱ्या तरुण मुलं-मुली शुक्रवारच्या विक-एन्डची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात, त्यांच्याशी बोलताना, त्या दोन दिवसांच्या सुट्टीबाबत त्यांचे मनोरथ ऐकताना मला नेहेमीच त्या शाळेच्या गणवेशात नेहेमीच खुश असणाऱ्या पोरीची आठवण येते. वाटते कि आज मोठी झालेली ती पिंटी या धकाधकीच्या जीवनात शुक्रवारइतकाच सोमवारसुद्धा त्याच आनंदी वृत्तीत घालवत असेल.
सकाळी जाग आल्याआल्या बिछान्यातून टुणकन उडी मारुन दिनक्रम सुरु करण्याची मला लहानपणापासून सवय आहे. `आज सुट्टी आहे' म्हणून बिछान्यातच लोळू शकणाऱ्या लोकांविषयी मला हेवा वाटत नाही, मात्र आश्चर्य नक्कीच वाटते.
गोव्यात पणजीला बॅचलरचे जीवन जगताना माझे काही मित्र सकाळी नऊपर्यंत गाढ झोपलेले असायचे, त्यावेळी मी मात्र अस्वस्थ असायचो. माझ्या या स्वभावामुळे एकदा त्यापैकी एक मित्र असाच चिडून बिछान्यावर उठून बसला आणि मला म्हणाला,'' कामिल, इतक्या लवकर उठून करायचे तरी काय ?''
तो प्रश्न ऐकून मी थक्क झालो. ''करायचे तरी काय?'
`दिवसभर `काय करु आणि काय नको करु' असा प्रश्न मला पडत असताना 'करायचे तरी काय?'' असा त्याला प्रश्न पडत होता !
मागे समाजमाध्यमांवर वाचलेले आठवते. काही व्यक्ती सकाळी उठल्याउठल्या 'अरे वा, आणखी एक नवा दिवस !'' असे म्हणत नव्या दिवसाला सामोरे जातात तर काही व्यक्ती ''बापरे, उगवला आणखी एक दिवस !'' असे म्हणत कपाळाला हात लावत असतात. यापैकी कुणाचे अनुकरण करायचे हे आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवायचे असते.
आणि ही एक दुसरी मनात घर करून बसलेली घटना. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये घडलेली. आमच्या कुटुंबाला जवळचे असलेले डॉकटर एक जीवघेण्या अपघातात अगदी थोडक्यात वाचले. नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले होते आणि मुंबई-पुणे महामार्गावर फुटपाथवर ते चालत असताना वेगात असलेला एक ट्रक फुटपाथवर चढला आणि या डॉकटरांच्या एका पायावरुन ट्रकचे चाक गेले.
जवळजवळ सहासात महिने डॉक्टर जायबंदी होते, लिगामेंट इंज्युरीमुळे काही काळ पूर्णतः परावलंबी होते. जॅकलीन आणि मी अनेकदा त्यांना भेटायला जायचो, त्यावेळी ते भयंकर अस्वस्थ असायचे. खूप धार्मिक असलेले आणि वेळोवेळी पुजापाठ करणारे डॉक्टर ``माझ्याच बाबतीत असे का घडावे ?'' असे म्हणायचे.
मी डॉकटरांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझी प्रतिक्रिया मात्र वेगळीच होती.
''डॉक्टर, नशिबवान आहात तुम्ही कि ट्रकचे चाक फक्त टाचेवरून गेले. अगदी थोडक्यात वाचला ना तुम्ही ! ट्रकचे चाक काही इंचाने पुढेमागे गेले असते तर काय भयानक झाले असते, तुम्ही एका बाजूला पडला म्हणून चाक फक्त टाचेवरुन गेले, डोक्यावरून किंवा पोटावरुन नाही गेले! Doctor, Really you should bless your stars !''
“I cried because I had no shoes until I met a man who had no feet, ” हे एक प्रसिद्ध वाक्य नेहेमीच लक्षात ठेवायला हवे
त्यादिवशी सकाळी आवरुन मी घराबाहेर पडत होतो तेव्हा शेजारच्या एका समवयस्क व्यक्तीने मला म्हटले, ''किती छान नाही असे दररोज कामाला बाहेर पडायचे. पाहा ना, मला इथे दिवसभर सगळे घर खायला उठते !''
याउलट दररोज कामाला जावे लागणारे लोक घरी बसून आराम करायचा विचार करत असतात. वय झाल्यावर निवृत्त होऊन घरी बसून करायचे तरी काय असे प्रश्न अनेकांना आणि त्यांच्या घरच्यांनाही पडत असतात.
काहींना असे प्रश्न मुळीच पडत नसतात, करण्यासाठी कितीतरी कामांची आणि योजनांची त्यांच्याकडे भलीमोठी यादीच असते.
सत्तरीकडे वाट करणारी एक नामवंत लेखिका मला काही महिन्यांपूर्वी मला म्हणाली, ''दर दिवसांची सुरुवात मी भल्या पहाटे करते, दिवसभर करण्यासाठी खूपखूप कामे असतात ना!'' मी त्यांना मनापासून सलाम केला.
पावसाळी वातावरण, मस्तपैकी गुलाबी किंवा थंडी बोचरी थंडी, स्वच्छ निरभ्र आभाळ, आकाशातला चंद्र, उगवता किंवा मावळता सूर्य, यापैकी काहीही सुखद किंवा निराशाजनक नसते, त्या वातावरणाकडे आपण कसे पहातो याकडे सर्वकाही अवलंबून असते.
चंद्रकोर, अष्टमीचा चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र काही क्षण थांबून निरखून पाहायला मला आवडते, तसेच अमावस्येच्या रात्री तारांनी पार उजळून टाकलेले आभाळसुद्धा.
सकारात्मक दृष्टिकोन एकदा अंगिकारला कि मग त्याच चष्म्यातून जगाकडे आणि आजूबाजूच्या पाहता येते. त्यासाठी तसा दृष्टिकोन मात्र ठेवायला हवा. आपल्या आजूबाजूचे जग कसे आहे हे आपण ठरवण्यावर असते. सभोवतालचे जग काही आपण बदलू शकत नाही, मात्र या जगाकडे पाहण्याची आपली वृत्ती मात्र आपण बदलू शकतो.

`दिव्यमराठी' रविवार पुरवणी \

Camil Parkhe July 7, 2022


Sunday, June 28, 2026

 


ज्या व्यक्तीने भारतात मुंबईत आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया घातला, महाराष्ट्रात मराठी भाषेत पहिल्यांदाच पुस्तके छापली, मराठीतली आणि इंग्रजीतलीसुद्धा पहिली शालेय पाठ्यपुस्तके तयार केली त्या व्यक्तीची महाराष्ट्राला ओळखही असू नये, मागील दोनशे वर्षात या व्यक्तीचे - गॉर्डन हॉल यांचे - मराठीत एकही चरित्र लिहिले गेले नाही हे निश्चितच खेदजनक आहे.

गॉर्डन हॉल यांच्याआधीसुद्धा मराठी पुस्तकांची छपाई झाली होती, मात्र ती छपाई महाराष्ट्राबाहेर झाली होती.
मराठीतील पहिले मुद्रित पुस्तक फादर थॉमस स्टिफन्स यांचे `ख्रिस्तपुराण' रोमी लिपीत पोर्तुगीज गोव्यात १६१६ साली प्रकाशित झाले होते.
त्यानंतर विल्यम कॅरी यांनी डॅनिश वसाहतीत बंगालमधील सेरामपूर येथे संत मॅथ्यूकृत शुभवर्तमान १८०५ साली छापले होते.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात गॉर्डन हॉल यांनी पहिले मराठी पुस्तक लाकडी छापखान्यात छापले.
अमेरिकेतून येऊन १२ फेब्रुवारी १८१३ रोजी गॉर्डन हॉल यांनी मुंबई बंदरात पाऊल ठेवले.
त्यानंतर वर्षभरात त्यांनी आणि त्यांच्या सहकारी अमेरिकन मिशनरींनी मुंबईत मराठी आणि इंग्रजी शाळा सुरु केल्या आणि त्याद्वारे संपूर्ण देशात आधुनिक शिक्षणाचे एक नवे पर्व सुरु केले.
हे शिक्षण सर्व जातीधर्माच्या लोकांना, पुरुषांना आणि स्त्रियांना, सवर्णांना आणि अस्पृश्यांना खुले होते.
याच अमेरिकन मिशनरींनी देशातली पहिली मुलींची शाळा मुंबईत १८२४ साली सुरु केली
नाशिक परिसरात कॉलऱ्याच्या रुग्णांना गॉर्डन हॉल औषधोपचार करताना त्यांनाच कॉलऱ्याची लागण होऊन २० मार्च १८२६ रोजी सिन्नरजवळ दोडी दापूर येथे त्यांचे निधन झाले.
या महान व्यक्तीचे मराठीतले पहिलेवहिले चरित्र असलेल्या '`गॉर्डन हॉल - गाथा मिशनरी शौर्याची' पुस्तकाचे पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात बुधवारी २५ मार्च रोजी प्रकाशित झाले.
``I cannot Turn Back The Adventures of Gordon Hall'' या जॉन क्रोझियर यांनी लिहिलेल्या या इंग्रजी पुस्तकाचा हरियाणामधील गुरुग्राम येथील कालेब इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉ विश्वास वळवी यांनी अनुवाद आणि पुनर्लेखन केले आहे.
गॉर्डन हॉल यांच्या मराठी भूमीवरील सेवेचे आणि बलिदानाचे या द्विशताब्दी वर्षानिमित्त (1826- 2026) व्हाईटलाईट पब्लिकेशन्स, पुणे, आणि नॅशनल सेंटर फॉर अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, बेंगळुरू) यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
यावेळी बेंगळुरूच्या नॅशनल सेंटर फॉर अर्बन ट्रान्सफॉर्मेशनचे डॉ. अतुल यशवंतराव अघमकार, `शब्दसेवा' मासिकाचे संपादक अशोक आंग्रे, चरित्रलेखक डॉ विश्वास वळवी, पत्रकार कामिल पारखे आणि व्हाईटलाईट पब्लिकेशन्सचे जॉर्ज काळे यांची याप्रसंगी भाषणे झाली.
Camil Parkhe

Tuesday, April 28, 2026

 

एक ख्रिस्ती धर्मगुरू असूनही वेगळी वाट चाललेले सुभाष चांदोरीकर हे एक अनोखे व्यक्तिमत्व होते. चांदोरीकर हे पुण्यातील युनायटेड थिऑलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र  (यू.टी.एस.एम.) येथे अनेक वर्षे ईशज्ञानाचे प्राध्यापक होते. मात्र त्यांनी आपले कार्य केवळ आपल्या विद्यार्थ्यांशी आणि वर्गाच्या चार भिंतींशी कधीच मर्यादित ठेवले नव्हते. यामुळेच पुण्यात शुक्रवारी वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालेले चांदोरीकर यांनी आपल्यामागे ठेवलेले कार्य आणि वारसा महत्त्वाचा ठरतो. 

चांदोरीकर हे मूळचे मराठवाड्यातील उदगीर परिसरातले.  धार्मिक किंवा पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन समाजातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांसाठी ते अखेरपर्यंत झगडत राहिले. आपल्या धार्मिक कार्याचाच एक भाग म्हणून समाजाच्या विविध दुर्लक्षित घटकांसाठी विशेषतः पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यांसाठी,  एड्सग्रस्तांसाठी आणि तृतीयपंथीयांसाठी समाजकार्य केले.  

तृतीयपंथियांसाठी त्यांनी आयोजित केलेल्या दोन कार्यक्रमांना अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ श्रीराम लागू यांनी हजेरी लावलेली होती.

चांदोरीकरांच्या अशा चाकोरीबाहेरच्या वर्तनामुळे ख्रिस्ती समाजातील अनेक लोंकांचा त्यांना रोष पत्करावा लागला, मात्र चांदोरीकर यांनी माघार कधी  घेतली नाही.

रेव्हरंड डॉ. अरविंद निर्मळ हे भारतातील दलित ख्रिस्ती चळवळीचे एक मुख्य प्रणेते. अहिल्यानगर येथे १९९१ मध्ये पहिले दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून निर्मळ यांनी ख्रिस्ती समाजाची महाराष्ट्रातील दलित चळवळीशी नाळ जोडली. त्यानंतर अशी चार  साहित्य संमेलने त्यांनी आयोजित केली.  

निर्मळ यांचे १९९५ साली निधन झाल्यानंतर सुभाष चांदोरीकर यांनी दलित ख्रिस्ती साहित्य चळवळीची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली आणि विविध शहरांत या संमेलनांचे एकाहाती आयोजन केले.  उत्कृष्ठ वक्तृत्वशैली लाभलेले चांदोरीकर हे कुशल संघटकसुद्धा होते.  विविध संस्था आणि कार्यकर्त्यांना हाताशी धरुन त्यांनी राज्यात अनेक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने भरविली. 

त्यांच्या पुढाकाराने पाचवे दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन (अध्यक्ष बिशप प्रदीप कांबळे - पुणे २००१), सहावे संमेलन (अध्यक्ष सुभाष चांदोरीकर, संगमनेर २००४), सातवे संमेलन (अध्यक्ष डॉ. गिलबर्ट लोंढे, नागपूर २००६), आठवे संमेलन (अध्यक्ष वसंत म्हस्के, उदगीर २००८), नववे संमेलन (अध्यक्ष अनुपमा डोंगरे जोशी, श्रीरामपूर २०१२) आणि दहावे संमेलन (अध्यक्ष फादर ज्यो गायकवाड, श्रीरामपूर २०१२) येथे भरवण्यात आली होती.

सुभाष चांदोरीकर यांच्याच प्रेरणेने या सर्व अध्यक्षीय भाषणांचे संकलन 'शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या माझ्या  पुस्तकात करण्यात आले आहे. 

अखेरच्या आजारपणातसुद्धा चांदोरीकर अकराव्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाची जुळवाजुळव करत होते.  दलित ख्रिस्ती समाजाला आपले न्याय्य हक्क, सवलती मिळाव्यात यासाठी ते तळमळत होते, त्यासाठी आपली लेखणी वापरत होते.  

उषाताई आणि विलास वाघ यांच्या `सुगावा प्रकाशना'ने चांदोरकरांची काही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. `गवंड्यांचे पोर' हे आत्मचरित्र  हे चांदोरीकरांचे अखेरचे प्रकाशित पुस्तक.

चांदोरीकर यांचा बंडखोर वारसा आणि त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला क्रूस त्यांच्यामागे कोण स्विकारणार या प्रश्नाचे उत्तर आताच देणे अवघड आहे. `दलित ख्रिस्ती' या शब्दाबद्दल ख्रिस्ती समाजात घृणा आहे.  सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा या शब्दाबद्दल आक्षेप घेतला आहेच. त्यामुळे `ख्रिस्ती अस्मिता' या नावाने काही वर्षांपूर्वी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अधिकृत नोंदणीकरण करण्यात आले आहे आणि साहित्य संमेलनांची निर्मळ आणि चांदोरीकर यांनी चालवलेली दीर्घ परंपरा चालू ठेवण्याचा निर्धार या समाजातील काही युवा  कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

हा निर्णय निश्चितच  स्वागतार्ह आणि सर्वमान्य होण्यासारखा आहे. 

Camil Parkhe 



 

Thursday, March 26, 2026


पेशवाई अखेरच्या टप्प्यात असताना आणि अव्वल इंग्रजी अमदानीच्या अगदी सुरुवातीच्या काळात भारतात इंग्रजी आणि मराठी शाळा स्थापन करून, मराठीतील पहिले पाठ्यपुस्तक लिहिण्याचा, आधुनिक शिक्षणपद्धतीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान या अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांच्याकडे जातो.

केवळ ४१ वर्षे आयुष्य लाभलेल्या गॉर्डन हॉल यांचा महाराष्ट्रातील मिशनकार्याचा कालावधी अवघा बारा वर्षांचा होता.
मात्र या काळात ख्रिस्ती धर्माची पताका फडकावत त्यांनी येथील समाजाच्या सर्व घटकांना म्हणजे बहुजन, अस्पृश्य तसेच स्त्रियांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. अशा प्रकारे सार्वत्रिक शिक्षणाने भारतात समाजक्रांतीचे एक नवे पर्व सुरु केले.
गॉर्डन हॉल यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्ष अलीकडेच २० मार्च २०२६ पासून सुरु झाले आहे.
अमेरिकेतून निघालेल्या गलबतातून मुंबई बंदरात दिनांक १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाऊल ठेवलेल्या गॉर्डन हॉल आणि अमेरिकन मराठी मिशनच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच मराठी भाषा शिकणे सुरु केले आणि मग मुंबईत शाळाही सुरु केल्या.
हे मिशनरी भारतात आले तेव्हा येथील लिखाणा-वाचनाबाबत आणि एकूण मराठी साहित्याची स्थिती काय परिस्थिती होती याचे रेव्हरंड हेन्री जे ब्रूस यांनी पुढील शब्दांत वर्णन केले आहे:
``आमचे पहिले मिशनरी मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांना दिसले कि स्थानिक लोकांनी तोपर्यंत पाश्चात्त्य संस्कृतीचा कसलाही प्रभाव अनुभवलेलाच नव्हता. मुंबईत एकही स्थानिक छापखाना नव्हता, तसेच कोणतेही स्थानिक नियतकालिकही अस्तित्वात नव्हते.
मराठी भाषेत जे थोडेफार साहित्य उपलब्ध होते, ते मुख्यतः पुराणे, महाभारत आणि इतर पवित्र ग्रंथांमधील कथांचे भाषांतर होते. त्यामध्ये राम, कृष्ण आणि इतर देवतांच्या कथा होत्या.
काही स्थानिक राजांच्या ऐतिहासिक आठवणी (चरित्रात्मक लेखन) देखील होत्या. हे तसेच पवित्र ग्रंथांवरील भाषांतरे बहुतांश काव्यरूपात लिहिलेले होते.
याशिवाय काही मूळ कविता होत्या. या सर्वांनी मिळून त्या काळातील साहित्याचा मोठा भाग बनवला होता. जशी पुस्तके कमी होती, तसेच वाचकही कमी होते.’’
आधुनिक काळातील या आद्य मिशनरींना मराठी भाषा शिकण्यात अनेक अडचणी आल्या. याचे कारण म्हणजे तोपर्यंत मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करण्यात आले नव्हते.
याविषयी रेव्हरंड ब्रूस यांनी लिहिले आहे :
``या मिशननरींना स्थानिक मराठी भाषा शिकण्यासाठी व्याकरणे आणि शब्दसंग्रह यांच्या स्वरूपात फारशी, किंबहुना काहीही मदत उपलब्ध नव्हती. एखादया फारसे अनुभव आणि कौशल्य नसलेल्या पंडितासोबत बसून त्यांना शब्दांचे अर्थ आणि वाक्यरचनेचे प्रकार याविषयी तोंडी मार्गदर्शन घ्यावे लागत असे. भाषेचे खरे नियम त्यांना केवळ दीर्घकालीन आणि संयमी तुलना व सामान्यीकरण यांच्या माध्यमातूनच समजू शकत असतात.’’
मिशनच्या सुरुवातीच्या नोंदींमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या शाळांविषयी वेगवेगळ्या कागदपत्रांत, अहवालांत माहिती आढळते. मुंबईत मिशनकार्य करण्याची परवानगी मिळाल्यानंतर गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांनी लगेचच इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्रकारच्या शाळा सुरू केल्या.
रेव्ह. सॅम्युएल बी. फेअरबँक यांनी गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांच्याबद्दल पुढील शब्दांत लिहिले आहे :
``गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांना मुंबईत राहू दिले जाईल याबद्दल शाश्वती नसली त्यांनी मराठी शिकण्यास तातडीने सुरुवात केली. सन १८१४ च्या अखेरीपूर्वी त्यांनी एक शाळा सुरू केली. ‘’
मे १८१५ मध्ये या मिशनरींनी स्थानिक मुलांसाठी असलेल्या एका शाळेचा उल्लेख केला आहे. तीच पहिली आणि एकमेव शाळा होती.
त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या दिनदर्शिकेत असे नमूद आहे :-
“आमची शाळा हळूहळू वाढत आहे. सध्या त्यात सुमारे २५ मुले आहेत. ‘सुमारे’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची उपस्थिती इतकी अनियमित आहे की ते कधीच एकाच वेळी सर्व उपस्थित नसतात.
आम्हाला या शिक्षणकार्यात मदत करु शकेल आणि शिकवण्याच्या मुख्य कामातून आम्हाला थोडाफार दिलासा देईल असा योग्य सहाय्यक लवकर मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
सध्या तरी आम्ही दररोज सुमारे पाच तास शाळेत घालवतो आणि हा वेळ आपापसांत वाटून घेतो.”
सन १८१५च्या वर्षाच्या अखेरीस हॉल आणि नॉट यांनी शाळेत दोन ब्राह्मण शिक्षकांची नेमणूक केली होती. एका दिनदर्शिकेत पुढीलप्रमाणे लिहिले आहे:
“पंचवीस मुलांची एक इंग्रजी शाळा आहे आणि ब्राह्मणांनी चालवलेल्या दोन स्थानिक शाळांत सुमारे ४० विद्यार्थी आहेत.”
पुढील वर्षात आणखी काही शाळा सुरू करण्यात आल्या. एका अहवालात नोंद आढळते कि मिशनरींच्या देखरेखीखालील शाळांमध्ये जवळपास ३०० मुलांना शिक्षण दिले जात होते. सन १८१८मध्ये ११ शाळांची माहिती देण्यात आली असून या शाळांत ६०० मुलांची नियमित उपस्थिती होती.
तीन वर्षांनी एकूण २५ शाळा सुरू होत्या; परंतु निधीअभावी त्यांना काही काळासाठी त्यांपैकी १० शाळा बंद कराव्या लागल्या. मात्र १८२३ मध्ये त्यांच्या एकूण २६ शाळा होत्या आणि त्यामध्ये १,४५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत होते.
या शाळांबद्दल पुढील एक नोंद आहे: :-
“आमच्या या शाळा आम्हाला अपेक्षित अशा नसल्या तरी त्या आम्हाला प्रोत्साहन आणि आशा देत आहेत. स्थानिक लोकसंख्येवर य शाळांचा प्रभाव जरी शांत आणि सहज वर्णन करता येणार नाही असा असला, तरी तो सतत, व्यापक आणि आमच्या मिशनच्या उद्दिष्टांसाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे.
आम्हाला स्थानिक लोकांकडून पुढीलप्रकारचे उद्गार ऐकायला मिळतात : ‘प्रौढ लोकांना दुसरा धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करता येत नाही; परंतु धार्मिक शाळांमध्ये शिकणारी मुले ख्रिस्ती होतील, आणि अशा प्रकारे शेवटी सर्व लोक ख्रिस्ती होतील.’
आम्ही या मताशी सहमत नसूनही, या शाळांना एक महत्त्वाचे साधन मानतो आणि आमच्या आजूबाजूला आणखी बऱ्याच शाळा सुरू करता याव्यात अशी आमची तीव्र इच्छा आहे.
आमच्या शेवटच्या बैठकीत आम्ही आणखी शाळांसाठी आलेल्या तेरा अर्जांचा विचार केला; पण साधनसामग्रीच्या अभावामुळे आम्हाला ते नाकारावे लागले.”
या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ११६ ज्यू मुलांचाही समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व शाळा मुंबईतच नव्हत्या; त्यांपैकी अनेक शाळा कोकणातील खेड्यांमध्ये होत्या.
कोकणात गॉर्डन हॉल नियमितपणे वारंवार दौरे करत आणि या शाळांना भेट देत असत.
आपण सुरु केलेल्या या शाळांत शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके हवीत म्हणून त्यांनी धार्मिक पुस्तकांबरोबरच पाठ्यपुस्तकेही लिहिली. छापखाने सुरु करुन या पुस्तकांची छपाई केली.
आपल्या धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून गॉर्डन हॉल यांनी मराठीत अनेक पुस्तके लिहिली आणि छापली आहेत. ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांशिवाय अमेरिकन मिशनच्या शाळांसाठी हॉल यांनी तीन मराठी पाठ्यपुस्तके लिहिली आहेत.
आधुनिक शिक्षणपद्धतीतील मराठी भाषेतील ही पहिलीच पाठ्यपुस्तके.
गॉर्डन हॉत ` लेकरांची पहिली पोथी (First Book of Children) हे सोळा पानांचे पुस्तक १८१८ साली छापण्यात आले. अमेरिकन मिशन मालेमधील हे पहिल्या क्रमांकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक एका बाजूला बालबोधमध्ये व दुसऱ्या बाजूला मोडी लिपीत छापले होते.
या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी निघाल्या व या सर्व आवृत्या मिळून दहा लाख तरी प्रती सपल्या असतील, असा रे. ब्रूस यांचा अंदाज आहे. या पुस्तकाच्या १८२८ व १८२९ साली स्कॉटिश मिशनरींच्या कोकणातील बाणकोट मिशनने दोन आवृत्त्या काढल्या.
ट्रॅक्ट सोसायटीनेसुद्धां १८३०, १८३१, १८३२, १८३३, १८२४ १८३५ साली सहा आवृत्त्या काढल्या. पुढे १८३७, १८४१ व १८४४ मध्ये बालबोध व मोडी लिपीत हे पुस्तक प्रकाशित करण्यांत आले असे श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या ग्रंथात नमूद केले आहे.
त्या दोघांनी १८१६ मध्ये बायबलच्या नव्या करारातील अनेक पुस्तके अनुवादित केली, मराठी भाषेत काही लघुपत्रके (ट्रॅक्ट्स) तयार केली.सन १८१७ मध्ये त्यांनी आठ पानांचे एक धर्मग्रंथावर आधारित पत्रक आणि संत मॅथ्यूच्या शुभवर्तमानावर लेखन छापले.
हॉल आणि न्यूवेल सॅम्युएल यांनी १८१८ च्या उत्तरार्धात कोकणात अनेक ठिकाणी प्रवास केले. त्यांनी समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे शंभर मैलांपर्यंत असलेल्या शहरांना आणि गावांना भेटी दिल्या, तेथली माहिती गोळा केली, पुस्तके वाटली आणि संधी मिळेल तिथे सुवार्ता धर्मप्रचार केला.
फेअरबँक लिहितात कि हीच ती प्रारंभीची नोंद आहे जी मला त्यांच्या मिशनकार्याच्या तीन मुख्य विभागांबद्दल आढळते.
``प्रथम आले शिक्षण. दुसरे आले प्रचारकार्य आणि तिसरे म्हणजे मराठी भाषेत पवित्र शास्त्रांचे आणि ख्रिस्ती साहित्याचे लेखन, मुद्रण आणि प्रसार.''
चौथा महत्त्वाचा विभाग म्हणजे वैद्यकीय उपचार आणि औषधोपचार. अगदी सुरुवातीपासूनच आमच्या मिशनरींनी आपल्या गुरूचे म्हणजे येशू ख्रिस्ताचे अनुकरण करत आजारी लोकांचे उपचार केले.
याचे उदाहरण गॉर्डन हॉल यांच्या पुढील प्रसंगातून दिसते.''
गॉर्डन हॉल दिनांक १५ मार्च १८२६ रोजी नाशिक येथे पोहोचले. त्यांनी लगेचच धर्मप्रवचन सुरू केले आणि पुस्तके वाटण्याचे काम हाती घेतले.
त्या वेळी तेथे कॉलऱ्याची साथ होती. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या हॉल यांनी त्यांनी आजारी लोकांना औषधोपचार केला. काही काळाने त्यांच्याकडील पुस्तके आणि औषधे संपली.
दिनांक १८ मार्चला त्यांनी मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला.
सिन्नरजवळ दोडी दापूर येथे त्यांनाही कॉलऱ्याची लागा झाली होती. तिथेच त्यांचे निधन झाले.
गॉर्डन हॉल यांचे निधन हे अमेरिकन मिशनला मोठा धक्का होता. मात्र त्यामुळे अमेरीकन मिशन बोर्डाचे येथील काम थांबले नाही. त्यानंतर अमेरीकेतून अनेक मिशनरी भारतात येत राहिले, धर्मप्रसाराबरोबरच येथे शिक्षणकार्य आणि सामाजिक कार्य करत राहिले.
हॉल यांच्या निधनानंतर पुढल्याच वर्षी म्हणजे १८२७ साली पहिल्या अमेरिकन अविवाहित महिला मिशनरीचे मुंबईत आगमन झाले.
या मिस सिंथिया फरार यांच्या अहिल्यानगर येथील तब्बल तीन दशकांच्या शिक्षणकार्याची आतापर्यंत आपल्याला ओळख झालेली आहेच.

Camil Parkhe March 25, 2026


 



गॉर्डन हॉल हे नाव तसे फारसे परिचीत नाही. ते नाव परिचित असण्याची शक्यता कमीच आहे, याचे कारण या अमेरिकन व्यक्तीला भारतात कार्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी मिळाला.
मात्र या अल्प कालावधीत गॉर्डन हॉल आणि त्यांच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी सहकाऱ्यांनी मुंबईत आणि भारतात एका नव्या पर्वाची मुहूर्तवेढ रोवली.
आधुनिक भारताचा इतिहास गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नामोल्लेखावाचून पूर्ण होऊ शकत नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे व्याकरण, शब्दकोश तसेच गद्य शुद्धलेखन त्याशिवाय या भाषेतील पुस्तकांची छपाई याबाबतीत परदेशी लोकांनी फार मोलाचे योगदान केलेले आहे.
विल्यम कॅरी, जेम्स थॉमस मोल्स्वर्थ, मेजर थॉमस कँडी यांची नावे यासंदर्भांत घेतली जातात. याच काळात भारतात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत पायाभूत स्वरुपाचे कार्य करणारी व्यक्ती म्हणून गॉर्डन हॉल यांचा उल्लेख करता येईल.
आधुनिक काळातील ते एक आद्य अमेरिकन मिशनरी होते.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या गॉर्डन हॉल यांनी कॉलऱ्याच्या भीषण साथीत नाशिकच्या परिसरात आजारी लोकांना औषधोपचार केले आणि त्यावेळी त्यांनाच या रोगाची लग्न होऊन नाशिकजवळ दोडी दापूर येथे वयाच्या अवघ्या ४१ वर्षी २० मार्च १८२६ रोजी त्यांचे निधन झाले.
मुंबईत पहिल्यावहिल्या आधुनिक पद्धतीच्या शाळा स्थापन करणाऱ्या तसेच १८२४ साली मुलींची पहिली शाळा सुरु करणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरीचे या शुक्रवारी, दिनांक २० मार्चपासून द्विशताब्दी स्मृतीवर्षे सुरु होत आहे.
मुंबई बंदरात १२ फेब्रुवारी १८१३ रोजी हार्मनी या बोटीतून तीन अमेरिकन प्रवासी उतरले. हे प्रवासी होते अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट.
भारतात आलेले हे पहिले अमेरिकन मिशनरी होते. काही काळानंतर अमेरिकेतून कॅरॅव्हान या जहाजाने रोजी अँडोनिराम जडसन आणि सॅम्युएल न्यूवेल हे भारतात आले.
या मिशनरींच्या आगमनाने भारतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
पश्चिम भारतात अमेरिकन मराठी मिशन स्थापन करुन पुढे त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि इतर क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले.
ब्रिटिश संसद दर दहा वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण करत असे.
त्यानुसार त्याकाळात मुंबईत आणि भारतात ख्रिस्ती मिशनरींना कार्य करण्याची मुभा नव्हती.
असे असले तरी मुंबईत काम करण्याच्या या मिशनरींचा दृढ निर्णय होता.
मुंबईत आल्याक्षणी त्यांनी इथली मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरु केला.
सॅम्युएल नॉट यांनी ५ मार्च १८१३ रोजी आपल्या आईवडलांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते :
``आमची परिस्थिती अनिश्चित असली तरी आम्ही मराठी भाषेचा अभ्यास सुरू करीत आहोत. आम्ही दृश्यावर विसंबून नव्हे तर विश्वासावर चालत आहोत. एक फार बोलघेवडा काळा माणूस आमच्यासोबत बसून दररोज तीन-चार तास आम्हाला ही भाषा शिकवत आहे.”
गार्डन हॉल आणि नॉट या दोघांनी अमेरिकन मिशन बोर्डाच्या सेक्रेटरीला १७ मार्च १८१३ रोजी एक पत्र लिहून त्यात म्हटले होते:
`` “येथे राहण्याची आमची आशा इतकी दृढ आहे की आम्ही लगेचच मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.”
मुंबईत राहिल्यानंतर व मराठी भाषा शिकल्यानंतर हॉल व नॉट यांनी १८१५ मध्ये एक इंग्रजी शाळा काढली. त्यात २५ मुले शिकत होती. याशिवाय दोन मराठी शाळांत ४० मुले होती.
सुरुवातीला त्यांना शिक्षक मिळण्यास अडचण पडली, पण पुढे दोन ब्राह्मण शिक्षक त्या मराठी शाळांत शिकवू लागले. पुढल्या वर्षी या शाळांची संख्या वाढली व एकूण ३०० विद्यार्थी झाले.
सन १८१८ मध्ये अमेरिकन मिशनच्या अकरा शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.
या अमेरिकन मिशनरींनी मुंबईतच १८२४ साली मुलीची पहिली शाळा सुरु केली.
आधुनिक काळात मुंबईत आलेल्या या आद्य मिशनरींना मराठी भाषा शिकण्यात असंख्य अडचणी आल्या.
याचे कारण म्हणजे तोपर्यंत मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करण्यात आले नव्हते.
पुढील काळात जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी मराठीचे व्याकरण आणि शब्दकोश रचले, त्यामुळे नंतरच्या काळातल्या मिशनरींना आणि ईस्ट इंडिया कंपनी अधिकाऱ्यांना मराठी भाषा शिकणे अधिक सोपे झाले.
अमेरिकन मिशनचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे धर्मप्रसारासाठी त्यांनी लहानसहान पुस्तिका लिहिण्यास सुरुवात केली, बायबलच्या मराठी भाषांतराचे काम तातडीने सुरु केले.
ही पुस्तके छापण्यासाठी मुंबईत लाकडी छापखानासुद्धा सुरु केला.
त्यासाठी मराठी भाषेतील टाईप किंवा फॉन्ट्स तयार केले. हे खूपच मेहनतीचे आणि पायाभूत स्वरूपाचे काम होते याबद्दल शंकाच नाही.
त्यासाठी आद्य मिशनरींना श्रेय द्यायलाच हवे.
`ए स्क्रिप्चर ट्रॅक्ट' ( A Scripture Tract ) ही अमेरिकन मिशनने धर्मासंबंधी १८१७ साली छापलेली पहिलीच पुस्तिका किंवा ट्रॅक्ट होय. ती पुस्तिका बहुधा गॉर्डन हॉल यांनी तयार केलेल्या पुस्तिकांपैकी एक होती.
ही पुस्तिका आठ पानांची होती आणि १० मार्च १८१७ रोजी ती छापखान्यात छापण्यात आली. त्या आवृत्तीच्या १५०० प्रती छापण्यात आल्या होत्या.
याच घटनेतून मराठी ख्रिस्ती साहित्याची सुरुवात झाली अशी माहिती रेव्हरंड ब्रूस यांनी दिली आहे असे श्री. म. पिंगे यांनी लिहिले आहे.
मुंबईत छापखान्याची उभारणी झाल्यानंतर बायबलच्या नव्या कराराचे भाषांतर १८२६ मध्ये प्रसिद्ध झालें.
अमेरिकन मिशनचे हे मराठी बायबल गॉर्डन हॉल, सॅम्युएल न्यूवेल, होरेंशिओ बार्डवेल, जॉन निकोलस व अँलन ग्रेव्हज् या मिशनरींनी केले. यापैकी बार्डवेल १८१६ मध्ये व ग्रेव्हज् हे १८१८ मध्ये भारतात आले होते.
या पाच मिशनरींपैकी सॅम्युएल न्यूवेल १८२१ मध्ये, जॉन निकोलस १८२४ मध्ये मरण पावले. होरेंशिओ बार्डवेल १८२१ मध्ये अमेरिकेस परत गेले, अँलन ग्रेव्ह्ज १८४३ पर्यंत कार्य करून महाबळेश्वर येथे मरण पावले.
``या पाचही मिशनरींनी मृत्यूचा धोका पत्करूनसुद्धां बायबलच्या भाषांतराचे कार्य पुरे केले,'' असे त्यांच्याविषयी वर्णन श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या ग्रंथात केले आहे.
ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांशिवाय गॉर्डन हॉत यांनी तीन शिक्षणविषयक पुस्तके लिहिली होती. लेकरांची पहिली पोथी (First Book of Children) हे सोळा पानांचे पुस्तक १८१८ साली छापण्यात आले.
अमेरिकन मिशन मालेमधील हे पहिल्या क्रमांकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक एका बाजूला बालबोधमध्ये व दुसऱ्या बाजूला मोडी लिपीत छापले होते.
या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी निघाल्या व या सर्व आवृत्या मिळून दहा लाख तरी प्रती सपल्या असतील, असा रे. ब्रूस यांचा अंदाज आहे. या पुस्तकाच्या १८२८ व १८२९ साली स्कॉटिश मिशनरींच्या बाणकोट मिशनने दोन आवृत्त्या काढल्या.
ट्रॅक्ट सोसायटीनेसुद्धां १८३०, १८३१, १८३२, १८३३, १८२४ १८३५ साली सहा आवृत्त्या काढल्या. पुढे १८३७, १८४१ व १८४४ मध्ये बालबोध व मोडी लिपीत हे पुस्तक प्रकाशित करण्यांत आले असे श्री. म. पिंगे यांनी नमूद केले आहे.
गॉर्डन हॉल यांनी पुण्यातसुद्धा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला होता याचा उल्लेख पिंगे यांनी या ग्रंथात केला आहे.
मिशन छापखान्यात छापलेली मराठी पुस्तके आणि हिंदुस्थानी भाषांतील पुस्तके पुण्यात वाटण्यासाठी १८२३ साली गॉर्डन हॉल यांनी दोन नोकरांना पुण्यात पाठवले होते.
त्यांच्याबरोबर हॉल यांनी शिफारसपत्रे सुद्धा दिली होती त्यात म्हटले होते:
"This is to certify that the bearers hereof viz. Samuel and Benjamin Jews have been in our employ as school masters for several years. They are now furnished by us with a small quantity of Mahratta and few Hindoostanee books, which they are authorised to distribute gratuitously to such persons as may desirous of receiving them.
पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन् यांनी मुंबईतील कंपनी सरकारला पत्राद्वारे कळविले की ही धार्मिक पुस्तके वाटण्यास सरकारची मदत आहे अशी लोकांची समजूत झाली आहे व ती सरकारला हानिकारक होईल.
कलेक्टर रॉबर्टसन् यांनी त्या दोघांना पकडले व त्यांना त्यांच्या पुस्तकांसह घाटाखाली हद्दपार केले.
पुण्याचे कमिशनर चॅप्लिन यांनी मुंबई सरकारचे मुख्य सेक्रेटरी न्यूनहॅम यांना यासंबंधी कळविलें की धार्मिक पुस्तकांच्या वितरणाने कंपनी सरकारबद्दल लोकांमध्ये भिती निर्माण होईल.
मिशनरींच्या या कामाला पायबंद घालणें आवश्यक आहे, असेही त्यांनी सुचविले होते.
याबाबत कंपनी सरकारने गॉर्डन हॉल यांना कळवले तेव्हा गॉर्डन हॉल, निकोलस व अँलन ग्रेव्हज या तीन मिशनरींनी आपली बाजू मांडून सांगितले कि असे करणे काही आक्षेपार्ह नाही व पेशव्यांच्या काळापासून आपण धार्मिक पुस्तके वाटत आहोत आणि भारतातही ती वाटली जातात.
मार्च १८२६ मध्ये नाशिक परिसरात कॉलऱ्याची तीव्र साथ असताना तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी गॉर्डन हॉल थांबले होते.
वैद्यकीय प्रशिक्षण असल्याने आजारी लोकांना त्यांनी औषधे दिली. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
तिथेच त्यांची एक दगडी समाधी बांधण्यात आली होती.
March 20, 2026 दोनशेव्या स्मृतिदिनानिमित्त गॉर्डन हॉल यांना आदरांजली.

Camil Parkhe March 19, 2026