प्रसारमाध्यमांची व्यावसायिकता आणि माणुसकीशी बांधिलकी
परवा विद्यानंद बापट हे बेदम मारहाण आणि त्यांची लाथाबुक्क्यांनी तुडवणूक होण्यापासून थोडक्यात वाचले.
पुण्यात टिळक रोडपासून जवळच असलेल्या एका चौकात मुलाखत देताना हल्लेखोर त्यांच्या कानशिलात केवळ एक जोरदार थप्पड देऊ शकला.
तिथे असलेल्या दोन व्यक्तींनी लगेचच हल्लेखोराला पूर्ण ताकदीने प्रतिकार केल्याने बापट यांच्यावरील एक बाका प्रसंग टळला.
त्यादिवशी त्या घटनास्थळी बापट यांच्या भुमिकेशी सहमत असणार काही लोक होते, असहमत असणारेही होते.
त्याशिवाय त्या वर्दळीच्या ठिकाणी ये-जा करणारे अनेक लोक होते.
दोन व्यक्तींमध्ये झगडा, संघर्ष होत असेल तर तिथे असलेले लोक क्वचितच हस्तक्षेप करतात.
समोर हिंसा होत असताना त्रयस्थ व्यक्तींनी हस्तक्षेप केल्यास या त्रयस्थ व्यक्तीच अनेकदा हिंसेचे बळी ठरत असतात याचा अनुभव नेहेमी येत असतो. एक क्राईम रिपोर्टर म्हणून अशा घटनांचे मी अनेकदा वार्तांकन केले आहे.
तर त्या भर दिवशी भर चौकात एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना विद्यानंद बापट आपले मत मांडताना अचानक एका हल्लेखोराने बापट यांच्या कानशिलात लगावली तेव्हा तेथे असलेल्या फक्त दोन व्यक्तींनी या हल्लेखोरास पूर्ण ताकदीनिशी रोखले.
हल्लेखोरास रोखणाऱ्या याच दोन व्यक्तींनी असा प्रतिकार करावा हे खरे पाहता पूर्णतः अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते.
हल्लेखोऱ्याने बापट यांना थप्पड मारल्यानंतर तिथे असलेल्या एका मध्यमवयीन महिलेने तत्क्षणी हल्लेखोऱ्याचा उगारलेला हात अडवला आणि बापट यांना वाचवले.
आपल्या मुलाखतीत बापट नेहेमीच सांगत असतात कि ''लोकांनी मला स्वतःला फार महत्त्व देऊ नये, माझ्यावर टीका करू नका, त्याऐवजी मी मांडतो त्या मुद्द्यांना उत्तरे द्या, त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा.''
विशेष म्हणजे या हातघाईच्या लढाईच्या बिकट प्रसंगी ती धाडसी महिला त्या हल्लेखोऱ्याला नेमके हेच सुनावत होती. मला त्या महिलेचे फार कौतुक वाटले.
बापट यांना बेदम मारहाणीपासून रोखण्यास त्याशिवाय आणखी एका व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली.
खरे तर त्या व्यक्तीने असे करणे त्याच्या व्यवसायिक हिताच्या अगदी विरुद्ध होते.
बापट यांच्या मुलाखतीचे चित्रण करणाऱ्या व्हिडीओग्राफरने बापट यांच्यावर हल्ला होताच लगेचच आपले चित्रण थांबवले आणि हल्लेखोऱ्याला एका हाताने ढकलत बापट यांच्यापासून दूर नेले.
आपल्यापैकी अनेक जण छोट्या आकाराचे पण महागडे मोबाईल वापरत असतात. प्रसारमाध्यमांतील फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांचे कॅमेरे किती महागडे असतील याची कल्पनाच केलेली बरे.
तर बापट यांच्यावर हल्ला होताच या व्हिडिओग्राफरने एका हाताने आपला अवजड कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने हल्लेखोऱ्याला पूर्ण शक्तींनिशी मागे लोटत नेले.
या अवधीत तिथे जमलेल्या लोकांना विद्यानंद बापट यांना सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य झाले. तरीसुद्धा लांबूनच तो हल्लेखोर ' बापट याला मी सोडणार नाही, मी त्याला मारणार आहे,'' असे जोरजोरात ओरडून सांगत होता. यावेळी ती महिला त्याला असे करु नकोस म्हणून सांगत होती.
या मारहाणीच्या झालेल्या चित्रणात हे दृश्य तुम्ही पाहू शकता.
हल्लेखोऱ्याने बापट यांच्या कानशिलात लगावली याचे चित्रण केवळ `टिव्ही नाईन' या वाहिनीकडेच आहे. या चित्रणामुळे या वाहिनीचा टिआरपी नक्कीच भरपूर वाढला असेल.
जर या व्हिडीओग्राफरने बापट यांच्या हल्लेखोऱ्याला रोखण्याऐवजी त्याला हल्ला चालू ठेवण्यास पूर्णतः मोकळीक दिली असती आणि या हल्ल्याचे चित्रण चालू ठेवले असते तर या वाहिनीकडे या हल्ल्याच्या एक्सल्युझिव्ह चित्रणाचे अधिक फुटेज, काही सेकंदाऐवजी काही मिनिटांचे झाले असते.
व्हिडिओग्राफर म्हणून हा हल्ला चालू ठेवणे नक्कीच त्याच्या व्यावसायिक हिताचे आणि बांधिलकीचे होते.
मात्र व्यावसायिक बांधिलकी आणि हित याऐवजी या व्हिडीओग्राफरने माणुसकीला प्राधान्य दिले.
खरे पाहता ही घटना इतक्या वेगाने घडली कि `हे बरे कि ते बरे' याचा विचार करण्यास त्या व्हिडिओग्राफरला मुळी वेळच मिळाला नाही.
त्यामुळे बापट यांच्या मदतीस जाऊन हल्लेखोऱ्यास रोखण्याची कृती व्हिडिओग्राफरकडून उत्स्फूर्तपणे घडली.
व्यावसायिक हिताऐवजी माणुसकीस जपण्याची व्हिडीओग्राफरची ही कृती पूर्ण विचारांती नव्हती तर ती एक प्रतिक्षिप्त कृती होती.
व्यावसायिक हितापेक्षा माणुसकीशी बांधिलकीला प्राधान्य मिळाले.
हा प्रसंग पाहताना आफ्रिकेतील एका देशात दुष्काळात मरणासन्न अवस्थेतील हाडांचा सापळा बनलेल्या एका बाळाकडे एक गिधाड बुभूक्षित नजरेने पाहत आहे, असा क्षण टिपलेल्या एका फोटोला एक जगप्रसिद्ध पारितोषक मिळाले होते ते आठवले.
Camil Parkhe