Monday, July 6, 2026


सकाळी सातचा सुमार. नळाला पाणी नव्हते आणि त्याचवेळी इमारतीखाली लोकांची धांदल जाणवली. वरुनच खाली डोकावले तर पालिकेच्या पाण्याच्या नळापाशी काही पुरुष मंडळी पाण्यासाठी थांबलेले दिसले. याचा अर्थ खालच्या टाकीतून वरच्या टाकीत पाणी खेचणारी मोटार बिघडली होती.

परत किचनमध्ये येत आपल्याच कामात गुंतलेल्या बायकोला मी म्हटलं, ` बरं झालं, आज पालिकेचे पाणी येण्याचा वार आहे. निदान खालच्या नळाला तरी पाणी येते आहे त्यामुळे लिफ्टने सर्वांना आपापल्या घरी पाणी आणता येईल. फारशी गैरसोय होणार नाही.आपल्याकडे एक बरे आहे. म्हणजे विहिरीचे आणि बोअर वेलचे पाणी असे इतरही दोन पर्याय आहेत, जे लोक केवळ पालिकेच्या पाण्यावर अवलंबून असतात त्यांचे किती हाल होत असतील नाही?''
``आणि दुसरं म्हणजे आपण शेजारच्या इमारतींखालच्या नळांचेसुद्धा पाणी भरु शकतो, अशा अडचणीच्या वेळी कोण नाही म्हणणार? आणि एक बरं म्हणजे आपल्याकडे निदान दर दिवसाड तरी पाणी येते, आठवड्यातून एकदा-दोनदा पाणी मिळणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील नाही?’’
शाळेला जाण्याच्या घाईत असल्याने बायकोच्या निर्विकार चेहऱ्याकडे मी पाहिले आणि मी पण एकदम गप्पगार झालो.
क्षणभर स्तब्ध झालो आणि एकदम चमकलोच.
आतापर्यंत ``मी हे बरं झालं, ते बरं झालं हे’’ हे माझ्यामधलं कोण म्हणत होतो ते माझ्या लक्षात आलं होतं.
``हे बरं झालं, ते बरं झालं’’ ची मालिका अशी खूप लांबवर चालली असती हे माझ्या लक्षात आलं होतं.
हे असं `बरं झालं, ते तर खूपच बरं झालं’’ असं म्हणत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असताना मला अनेकदा कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या मोझेसची आठवण येते.
मी त्याला भेटलो तेव्हाच मोझेस पंधरासोळा वर्षाचा असावा. शरीराने वाढला तरी मोझेसचा बुद्ध्यांक वयाच्या मानानं थोडा कमीच होता. लहानथोर माणसं त्याची थट्टा करत असायची ती त्याच्या एका आगळ्यावेगळ्या दृष्टिकोनामुळे. काहीही विपरीत घडलं तरी त्याकडे सकारात्मक नजरेनं पहायचं अशी त्याची नेहेमीच विचारधारा असायची.
एकदा शाळा सुटल्यानंतर पोरांची थोडी दंगामस्ती झाली आणि त्यात मोझेसला बारीकसा दगड नेमका डोक्यावर लागला, खोच पडली आणि त्यातून रक्ताची धार वाहायला लागली. जमलेल्या लोकांनी वेळीच कापडानं जखम दाबली आणि रक्त वाहण्याचं थांबलं.
त्यानंतर मोझेसचा तिथल्या पोरांशी आणि लोकांशी झालेली संवाद मला आजही आठवतो. थोडक्यात त्याची उत्तरे अशी होती.
``बरं झालं, दगड बारीकसा होता. बरं झालं, रक्त वाहायचं लगेच थांबलं.. बरं झालं, फक्त टकुऱ्याला लागलं, मेंदूला मार नाही बसला... मी नशिबवान, अगदी थोडक्यात वाचलो.. बरं झालं अन बरं झालं’’ असं तो बोलत राहिला आणि मग तिथं जमलेली सगळी मंडळी त्याला हसायला लागली.
मोझेसच्या बुद्धीची वाढ मंद झाली होती तरी त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भल्याभल्या विचारवंतानासुद्धा चकित करणारा होता.
तशी ही खूप वर्षांपूर्वीची घटना, मोझेस आता कुठे आहे, काय करतो हे मला माहितीसुद्धा नाही, मात्र त्याची बाळबोध विचारसरणी मला आजही खूप प्रभावित करत असते.
आजरा इथल्या या मोझेसच्या या सकारात्मक वृत्तीवर मी एक छोटासा इंग्रजीत लेख लिहिला होता. `Incorrigible Optimist'' या शिर्षकासह `टाइम्स ऑफ इंडिया'ने आपल्या राष्ट्रीय आवृत्तीच्या संपादकीय पानावर `मिडल' म्हणून हा लेख १९९१च्या आसपास छापला होता. त्याकाळात मी फ्रि-लान्स जर्नालिस्ट होतो.
कधीतरी हा लेखसुद्धा इथे मी टाकेल.
आणि हा दुसरा तसा गंमतीदार प्रसंग आहे.
शाळा सुटल्यावर आदितीला घरी आणण्यासाठी मी जायचो तेव्हा गेटपाशी अनेकदा ही घटना घडायची. दुसरी-तिसरीत असलेली एक मुलगी आपलं खांद्यावरचं दफ्तर सावरत पळत यायची आणि शेजारी असलेल्या रिक्षावाल्या काकांच्या गुडघ्यांना बिलगत आनंदाने म्हणायची, '' काका, आज फ्रायडे !''
एकदा ती मुलगी अशीच ''काका, आज थर्सडे !'' असं म्हणताना पाहिलं अन न राहवून मी त्या रिक्षावाल्या काकांना हा काय प्रकार आहे ते विचारले.
हसून ते म्हणाले, '' शनिवार-रविवारची सुट्टी जवळ येते म्हणून पिंटी दरदिवशी खूष असते.''
``तर मग सोमवारी ती काय म्हणून खूष असते?'' मी विचारले.
``सोमवारी पण ती खूषच असते, `आज मंडे'' म्हणून !'' गोड हसणाऱ्या पिंटीकडे पाहत मी थक्क झालो.
सदानकदा प्रत्येक गोष्टींतून - मग तो शुक्रवार असो वा सोमवार - जीवनाचा आनंद लुटण्याचा त्या चिमुरडीचा स्वभाव नक्कीच कौतुकास्पद होता.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात `फाईव्ह डे विक' असणाऱ्या तरुण मुलं-मुली शुक्रवारच्या विक-एन्डची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात, त्यांच्याशी बोलताना, त्या दोन दिवसांच्या सुट्टीबाबत त्यांचे मनोरथ ऐकताना मला नेहेमीच त्या शाळेच्या गणवेशात नेहेमीच खुश असणाऱ्या पोरीची आठवण येते. वाटते कि आज मोठी झालेली ती पिंटी या धकाधकीच्या जीवनात शुक्रवारइतकाच सोमवारसुद्धा त्याच आनंदी वृत्तीत घालवत असेल.
सकाळी जाग आल्याआल्या बिछान्यातून टुणकन उडी मारुन दिनक्रम सुरु करण्याची मला लहानपणापासून सवय आहे. `आज सुट्टी आहे' म्हणून बिछान्यातच लोळू शकणाऱ्या लोकांविषयी मला हेवा वाटत नाही, मात्र आश्चर्य नक्कीच वाटते.
गोव्यात पणजीला बॅचलरचे जीवन जगताना माझे काही मित्र सकाळी नऊपर्यंत गाढ झोपलेले असायचे, त्यावेळी मी मात्र अस्वस्थ असायचो. माझ्या या स्वभावामुळे एकदा त्यापैकी एक मित्र असाच चिडून बिछान्यावर उठून बसला आणि मला म्हणाला,'' कामिल, इतक्या लवकर उठून करायचे तरी काय ?''
तो प्रश्न ऐकून मी थक्क झालो. ''करायचे तरी काय?'
`दिवसभर `काय करु आणि काय नको करु' असा प्रश्न मला पडत असताना 'करायचे तरी काय?'' असा त्याला प्रश्न पडत होता !
मागे समाजमाध्यमांवर वाचलेले आठवते. काही व्यक्ती सकाळी उठल्याउठल्या 'अरे वा, आणखी एक नवा दिवस !'' असे म्हणत नव्या दिवसाला सामोरे जातात तर काही व्यक्ती ''बापरे, उगवला आणखी एक दिवस !'' असे म्हणत कपाळाला हात लावत असतात. यापैकी कुणाचे अनुकरण करायचे हे आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवायचे असते.
आणि ही एक दुसरी मनात घर करून बसलेली घटना. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये घडलेली. आमच्या कुटुंबाला जवळचे असलेले डॉकटर एक जीवघेण्या अपघातात अगदी थोडक्यात वाचले. नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले होते आणि मुंबई-पुणे महामार्गावर फुटपाथवर ते चालत असताना वेगात असलेला एक ट्रक फुटपाथवर चढला आणि या डॉकटरांच्या एका पायावरुन ट्रकचे चाक गेले.
जवळजवळ सहासात महिने डॉक्टर जायबंदी होते, लिगामेंट इंज्युरीमुळे काही काळ पूर्णतः परावलंबी होते. जॅकलीन आणि मी अनेकदा त्यांना भेटायला जायचो, त्यावेळी ते भयंकर अस्वस्थ असायचे. खूप धार्मिक असलेले आणि वेळोवेळी पुजापाठ करणारे डॉक्टर ``माझ्याच बाबतीत असे का घडावे ?'' असे म्हणायचे.
मी डॉकटरांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझी प्रतिक्रिया मात्र वेगळीच होती.
''डॉक्टर, नशिबवान आहात तुम्ही कि ट्रकचे चाक फक्त टाचेवरून गेले. अगदी थोडक्यात वाचला ना तुम्ही ! ट्रकचे चाक काही इंचाने पुढेमागे गेले असते तर काय भयानक झाले असते, तुम्ही एका बाजूला पडला म्हणून चाक फक्त टाचेवरुन गेले, डोक्यावरून किंवा पोटावरुन नाही गेले! Doctor, Really you should bless your stars !''
“I cried because I had no shoes until I met a man who had no feet, ” हे एक प्रसिद्ध वाक्य नेहेमीच लक्षात ठेवायला हवे
त्यादिवशी सकाळी आवरुन मी घराबाहेर पडत होतो तेव्हा शेजारच्या एका समवयस्क व्यक्तीने मला म्हटले, ''किती छान नाही असे दररोज कामाला बाहेर पडायचे. पाहा ना, मला इथे दिवसभर सगळे घर खायला उठते !''
याउलट दररोज कामाला जावे लागणारे लोक घरी बसून आराम करायचा विचार करत असतात. वय झाल्यावर निवृत्त होऊन घरी बसून करायचे तरी काय असे प्रश्न अनेकांना आणि त्यांच्या घरच्यांनाही पडत असतात.
काहींना असे प्रश्न मुळीच पडत नसतात, करण्यासाठी कितीतरी कामांची आणि योजनांची त्यांच्याकडे भलीमोठी यादीच असते.
सत्तरीकडे वाट करणारी एक नामवंत लेखिका मला काही महिन्यांपूर्वी मला म्हणाली, ''दर दिवसांची सुरुवात मी भल्या पहाटे करते, दिवसभर करण्यासाठी खूपखूप कामे असतात ना!'' मी त्यांना मनापासून सलाम केला.
पावसाळी वातावरण, मस्तपैकी गुलाबी किंवा थंडी बोचरी थंडी, स्वच्छ निरभ्र आभाळ, आकाशातला चंद्र, उगवता किंवा मावळता सूर्य, यापैकी काहीही सुखद किंवा निराशाजनक नसते, त्या वातावरणाकडे आपण कसे पहातो याकडे सर्वकाही अवलंबून असते.
चंद्रकोर, अष्टमीचा चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र काही क्षण थांबून निरखून पाहायला मला आवडते, तसेच अमावस्येच्या रात्री तारांनी पार उजळून टाकलेले आभाळसुद्धा.
सकारात्मक दृष्टिकोन एकदा अंगिकारला कि मग त्याच चष्म्यातून जगाकडे आणि आजूबाजूच्या पाहता येते. त्यासाठी तसा दृष्टिकोन मात्र ठेवायला हवा. आपल्या आजूबाजूचे जग कसे आहे हे आपण ठरवण्यावर असते. सभोवतालचे जग काही आपण बदलू शकत नाही, मात्र या जगाकडे पाहण्याची आपली वृत्ती मात्र आपण बदलू शकतो.

`दिव्यमराठी' रविवार पुरवणी \

Camil Parkhe July 7, 2022


No comments:

Post a Comment