Sunday, July 12, 2026

 


आम्हा पत्रकारांची आणि इतर वाचकांची दैनिके आणि नियतकालिके वाचण्याची तऱ्हा एका बाबतीत तरी वेगळी असते.
कुठलाही वाचक एखाद्या बातमीचा, लेखाचा मथळा वाचून ती बातमी वाचण्याबाबत ठरवत असतो. वाचून झाल्यानंतर दुसऱ्या बातमी किंवा लेखांकडे हे वाचक वळत असतात.
आम्ही पत्रकार मंडळीसुद्धा बातमीचा मथळा आणि उपशिर्षक वाचल्यानंतरच अधिक खोलात जायचे कि नाही हे ठरवत असतो.
मात्र बातमी आवडली, म्हणजे बातमी लिखाणाची पद्धत आवडली, न आवडली, एकांगी आणि अपूर्ण वाटली तर ती बातमी, लेख कुणा बातमीदारानी, लेखकाने दिली हे हमखास चिकित्सेने पाहत असतो,
अनेक वर्षे विविध वृत्तपत्रांत काम केल्याने आणि काही ठराविक दैनिकांचे अनेक वर्षे वाचत करत असल्याने एखाद्या बिट्समधील बातमीचे शीर्षक किंवा बातमीचा कल पाहताच ती बातमी कुणा बातमीदाराने लिहिली असावी याचा लगेच अंदाज येतो.
त्या बातमीला बायलाईन असल्यास हा कयास अनेकदा खरा ठरतो.
बहुतेक इतर वाचकांना मात्र बायलाईन या प्रकाराशी काही सोयरसुतक नसते.
या रविवारी `महाराष्ट्र टाईम्स'ची `संवाद' पुरवणी हातात पडली तेव्हा लेखांची शिर्षके पाहतपाहत शेवटच्या पानावर आलो तेव्हा लेखाचा मथळा पाहिला, लेखाच्या मध्यभागी असलेला तो ग्रुप फोटो पाहिला.
तो फोटो आणि मथळ्यामुळे नजर आपसूप बायलाईनवर स्थिरावली.
मग उत्सुकतेने लेख भराभरा वाचून काढला.
लेखातील काही संदर्भ लगेच कळाले नाही म्हणून लेख पुन्हा एकदा वाचून काढला.
लेखाबरोबर असलेल्या फोटोतील बहुतांश व्यक्ती परिचयाच्या होत्या, म्हणजे त्यांच्यापैकी काहींशी माझा एकेकाळी चांगला वैयक्तिक संबंध होता.
काहींना एकदोनदा भेटलो होतो आणि दोनेक व्यक्ती खूप प्रसिद्ध व्यक्ती असल्याने फोटोओळ नसली तरी त्यांची ओळख पटत होती.
लेखाचे शिर्षक आहे `१ झपुर्झा, साहित्य सहवास'.
मुंबईतले हे प्रसिद्ध `साहित्य सहवास' मी कधी पाहिले नसले तरी तो लेख लगेच वाचून काढला अन नंतर `महाराष्ट्र टाइम्स'च्या ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांना मॅसेज टाकून हा लेख लिहिणाऱ्या अनुराधा आठवले यांचा नंबर मागवला.
या लेखात अनुराधा आठवले यांनी आपल्या ५७ वर्षे निवासस्थान असलेल्या या घराविषयीच्या अनेक आठवणी लिहिल्या आहेत.
लेख वाचून गेल्या चाळीस वर्षांतील अनेक घटनांचा पट नजरेसमोर तरळून गेला होता म्हणून हा उद्योग.
ऐंशीच्या दशकाच्या अगदी सुरुवातीला गोव्यात पणजीमध्ये `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात मी शिकाऊ बातमीदार म्हणून लागलो होतो.
मुंबई विद्यापीठाची तत्त्वज्ञानाची पदवी परीक्षा देऊन निकाल लागण्याआधीच नोकरी धरली होती. त्या दैनिकात माझे काम तसे खरेच काही नव्हते.
आमच्या ऑफिसात मी अक्षरशः लिंबूटिंबू म्हणून वावरायचो, मी दिली तर बातमी वापरली जायची, ``कामिल, आज काहीच बातमी कशी नाही?'' असा जाब कुणी विचारत नसायचे.
पहिल्याच नोकरीत आणि तेही ऐन उमेदवारीच्या काळात असले सुख इतर कुणीही पत्रकारितेच्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रांत अनुभवले असेल असे मला वाटत नाही.
वृत्तपत्र कामगारांना असलेला न्यायमूर्ती देविदास पालेकर वेतन आयोग मला लागू नव्हता तरी साडेतीनशे रुपये मासिक पगार बऱ्यापैकी होता. दर महिन्याअखेरीस खिशात काही रक्कम शिल्लक असायची.
त्या काळात महाराष्ट्र सरकारच्या गोव्यात पणजी येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालिका अनुराधा आठवले होत्या.
महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्राबाहेर ‘महाराष्ट्र परिचय केंद्रे’ चालवली जातात.
दिल्लीत आणि इतरत्र. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इतर राज्यांतील लोकांना परिचय व्हावा, या हेतूने या केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात. महाराष्ट्रातील साहित्यिकांची, इतर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणे हा त्यापैकीच एक उपक्रम.
या काळात नारायण आठवले (अनिरुद्ध पुनर्वसु ) पणजीतील दैनिक ‘गोमंतक’चे संपादक होते. अनुराधा आठवले या त्यांच्या पत्नी.
ते बहुधा १९८२-८३ साल असावे. महाराष्ट्र परिचय केंद्राने पु. ल. देशपांडे यांची पणजीत तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती.
पणजीतील महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी असलेल्या सभागृहात पुलंची ही व्याख्यानमाला होती. `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून त्या व्याख्यानाची बातमी देण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते.
त्यासाठी पहिल्या दिवशी मी तेथे वेळेत गेलो. मात्र बातमीदाराचे ओळखपत्र असूनही मला बसण्यासाठी जागा मिळाली नाही इतकी चिक्कार गर्दी तेथे होती.
पुलंचे भाषण सुरू झाले आणि त्यापाठोपाठ सभागृहात हास्यकल्लोळ.
दुसऱ्या दिवशी `गोमंतक', `नवप्रभा' आणि मडगावातून प्रकाशित होणाऱ्या `राष्ट्रमत' या मराठी दैनिकांत पान एकवर अँकरला पुलंच्या भाषणाचे फोटो आणि क्षणचित्रांसह विस्तृत बातम्या छापून आल्या होत्या.
आमच्या इंग्रजी द नवहिंद टाइम्समध्ये मात्र आतल्या पानासाठी एक छोटीशी बातमी आणि फोटोओळ यावर मी वेळ निभावून नेली होती.
पुलंच्या मराठी भाषेतील विनोदांचे इंग्रजीत भाषांतर कसे करणार ?
व्याख्यानाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मला हॉलमध्ये प्रवेश मिळालाच नव्हता. लाऊडस्पीकरमुळे सभागृहाबाहेर व्याख्यान फक्त ऐकता आले.
पुलंचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व, ओघवते वक्तृत्व आणि प्रचंड लोकप्रियता याचा प्रत्यक्ष अनुभव या तीन दिवसांत मी घेतला.
साहित्यरसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी किंवा त्या निमित्ताने माझी अनुराधा आठवले यांच्याशी बहुधा पहिल्यांदा गाठभेट झाली होती.
आता नक्की आठवत नाही
त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने पणजीत राम शेवाळकर यांची रामायणावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. य. दि. फडके यांची गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यावर तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती.
या दोन्ही व्याख्यानमालांना बातमीदार म्हणून मी हजर होतो, त्या दोन्ही व्याख्यानमुलांवर आधारित मी आमच्या इंग्रजी दैनिकात ‘नवहिंद टाइम्स’मध्ये बातम्या आणि विस्तृत लेखही लिहिले होते.
जुन्या महाकाय आणि अवजड लायनो टाईप सेटिंग मशीनवर कंपोझ केलेल्या त्या लेखांची कात्रणे आजही माझ्याकडे आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राने कवी नारायण सुर्वे यांनासुद्धा असेच गोव्यात निमंत्रित केले होते.
त्याकाळात विविध वृत्तपत्रांतल्या बातमीदारांमधे कडवी व्यावसायिक स्पर्धा असायची. आजकाल विविध प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे वरचे नेते एकमेकांशी सोयरीक करतात, बड्डे अटेंड करतात आणि खालच्या पातळीवरील कार्यकर्ते मात्र एकमेकांना मारझोड, शाईफेक करतात तसलाच हा प्रकार होता.
आमच्या डेम्पो उद्योगसमूहाच्या `द नवहिंद टाइम्स' इंग्रजी दैनिकाचे `नवप्रभा' हे मराठी भावंड, चौगुले उद्योगसमूहाच्या `गोमंतकचे ते स्पर्धक. `द नवहिंद टाइम्स' आणि `नवप्रभा'ची त्याकाळची जुनी एकमजली कौलारी इमारत पणजी मार्केटला अगदी लागून होती,
नवी इमारत आता त्याच जागी आहे.
सकाळच्या बातम्या गोदरेज टाइपरायटरवर बडवून झाल्यानंतर आमच्या दैनिकाचे मुख्य वार्ताहर दुपारी एकच्या सुमारास जेवणासाठी घरी जाण्याआधी फिश मार्केटमध्ये जायचे ते प्रतिस्पर्धी इंग्रजी दैनिक `हेराल्ड' एखादी प्रत घेऊनच .
विकत घातलेले ताजे मासे `हेराल्ड'च्या प्रतीत गुंडाळून ते चेतक स्कुटरच्या डिकीत ठेवून ते पर्वरीच्या पत्रकार नगरला जायचे.
पत्रकारांची अशी व्यावसायिक स्पर्धा असतानासुद्धा गोमंतक संपाद्क नारायण आठवले यांच्या पत्नी अनुराधा आठवले यांच्याशी माझी जवळीक निर्माण कशी झाली याचे मला आजही आश्चर्य आठवते.
दैनिक `गोमंतक' मध्ये वामन प्रभू, सुरेश काणकोणकर, मोहन वैद्य असे अनेक बातमीदार आणि उपसंपादक असताना त्यांनी अनेकदा मला बोलावून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामात माझी मदत घेतली होती.
अर्थात या कामात मीसुद्धा आनंदाने सहभागी झालो होतो तो भाग अलाहिदा.
आता त्यापैकी ही पुढील एक कामगिरी होती.
“नारायण सुर्वे सपत्नीक पणजीला आले आहेत, अल्तिनोला गेस्ट हाऊसवर उतरले आहेत. त्यांना ‘गोवादर्शन’ घडवून आणशील का?”
एक दिवस गोव्यातल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी अनुराधा आठवले यांचा निरोप आला. लँडलाईन फोन दुर्मीळ आणि मोबाईलची संकल्पनाही अस्तित्वात नसलेल्या त्या काळात हा निरोप माझ्यापर्यंत कसा आला आता आठवत नाही.
इंग्रजी दैनिकात काम करणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या बातमीदाराकडे या कामगिरीसाठी अनुराधाबाईंनी विचारणा करावी, याचे मला आश्चर्य वाटले. आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार या कामगिरीसाठी परवानगी देतील, याची खात्री असल्याने मीही लगेच होकार कळवला.
सकाळीच अल्तिनोला गेस्ट हाऊसला जाऊन नारायण सुर्वे याना भेटलो. त्यांच्याबरोबर त्यांच्या `सावली' कृष्णाबाई होत्या.
नारायण सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’ आणि ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हे दोन्ही काव्यसंग्रह त्यावेळी माझ्याकडे होते. त्या दोन दिवसांत मी सुर्वे दाम्पत्याला गोव्याच्या काही प्रसिद्ध ठिकाणी घेऊन गेलो.
आठवले यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन. डी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सरोजमाई यांना कारमधून गोव्यात फिरवून आणण्याची अशीच एक संधी मिळाली.
आता नारायण सुर्वे किंवा एन. डी. पाटील यांच्याशी काय गप्पा झाल्या, ते काही आठवत नाही, पण त्या भेटींची स्मरणचित्रे अजूनही ताजी आहेत.
ही एक अगदी अलीकडची घटना.
दोन महिन्यापूर्वी गोव्यात होतो तेव्हा अपरिचित नंबरवरून फोन आला. दुसऱ्या दिवशी त्या मिस्ड कॉलवर फोन केला.
सांगलीचे राहुल थोरात संपाद्क असलेल्या `अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राच्या महात्मा फुले द्विशताब्दी विशेषांकात मी एक लेख लिहिला आहे.
त्यामध्ये सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या जेम्स मिचेल आणि मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांच्याबद्दल तसेच फुले दाम्पत्याच्या पुणे कॅम्पातील आजही चालू असलेल्या स्कॉटिश मिशन शाळांवर मी विस्तृत लिहिले आहे.
त्या लेखाबद्दल आणि फुले दाम्पत्याच्या शाळा शोधून काढण्याच्या माझ्या यशस्वी प्रयत्नाबद्दल माझे कौतुक करण्यासाठी मला हा फोन करण्यात आला होता.
फोन करणाऱ्या व्यक्ती होत्या `अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एक विश्वस्त सरोजमाई पाटील.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या थोरल्या बहिण.
`या कामगिरीबद्दल तुमचा खरे तर सत्कार करायला हवा. लेख वाचल्यानंतर लगेच मी फोनवर याबाबत हमीद (दाभोलकर) शी बोलले आहे. '' सरोजमाई बोलत होत्या.
आणि मी गप्प राहून ऐकत होतो.
सरोजमाईंशी बोलताना माझ्या डोळ्यांसमोर चाळीस वर्षांपूर्वीची आमची गोव्यातील ती भेट समोर आली होती.
मागच्या वर्षीच सरोजमाईंच्या धाकटी भावाने, शरद पवार यांनी माझ्या `सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक दाम्पत्य मिचेल आणि स्त्रीशिक्षणाचे पूर्वसुरी' या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.
आणि या कार्यक्रम पुण्यातील दीपक गिरमे यांच्या नेतृत्वाखालील अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेच आयोजित केला होता.
अर्थात हे दोन्ही विषय मी आमच्या त्या फोनवरच्या संभाषणात काढले नाही.
ऐंशीच्या दशकात गोव्यात मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा सरचिटणीस तसेच नवहिंद टाइम्स आणि नवप्रभा दैनिकांतील कामगार संघटनेचा सरचिटणिस होतो.
`गोमंतक'चे संपादक नारायण आठवले तर एक खंदे चळवळ्ये नेते. कामगार दिनानिमित्त एक मे रोजी पणजीत वृत्तपत्र कामगारांचे मोर्चे आणि काही वेळा संप यामुळे त्यावेळी कामगार चळवळीत मी खूप सक्रिय होतो आणि त्यामुळे नारायण आठवले मला चांगले ओळखत होते.
`गोमंतक'चे आधीचे संपादक माधव गडकरी हे एक पट्टीचे वक्ते. लेखणीबरोबरच गोव्यात ते सभाही गाजवत असत.
नारायण आठवलेसुद्धा याच परंपरेतील. लोकसत्तेचे माजी संपादक विद्याधर गोखले यांच्याप्रमाणेच आठवलेसुद्धा नंतर शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते.
असे असले तरी मी त्यांना गोमंतक भवनच्या त्यांच्या केबिनमध्ये एकदाही भेटलो नाही किंवा एकमेकांशी कधी संभाषणसुद्धा झाले नाही याचे मला आजही आश्चर्य वाटते.
नारायण आठवले यांच्यासंदर्भात आणखी एक घटना आठवते.
पुण्यात मुठा नदीच्या किनारी शनिवार पेठेत `स्नेहसदन' हा आश्रम १९६७ साली सुरु करणाऱ्या जर्मन जेसुईट फादर मॅथ्यू लेदर्ले यांची १९८५ साली येशूसंघांच्या (सोसायटी ऑफ जिझस) गोवा-पुणे-बेळगाव प्रॉव्हिन्सचे प्रांताधिकारी म्हणून नेमणूक झाली.
फादर लेदर्ले पणजीतल्या आझाद मैदानापाशी आणि कॅफे टॅटोच्या अगदी समोर असलेल्या जेसुईट हाऊसमध्ये राहायला आले.
त्यांची मी घेतलेली मुलाखत `द नवहिंद टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाली.
फादर मॅथ्यू लेदर्ले हे मराठी भाषा पंडित, पुणे विद्यापीठातील त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय होता `महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधन'.
पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात स्नेहसदनचे स्थान हा तर एक स्वतंत्र विषय आहे.
तर फादर लेदर्ले यांची मी घेतलेली आमच्या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी आमच्या ऑफिसात आलो तत्क्षणी आमचे ज्येष्ठ वार्ताहर असलेल्या र. वि. प्रभुगावकर यांनी मला सांगितले कि माझ्या मुलाखतीवर आधारीत `गोमंतक'मध्ये आज अग्रलेख छापून आला आहे.
नारायण आठवले यांनी लिहिलेल्या त्या अग्रलेखाचे शीर्षक होते :
` या पुणेकराचे गोमंतकात स्वागत असो ! '
अग्रलेख प्रसिद्ध झाला त्याच दिवशी मी फादर लेदर्ले यांना माझ्या दुचाकीवरुन गोमंतक भवनला घेऊन गेलो, तेथे आठवले आणि फादर लेदर्ले यांच्या गप्पागोष्टी झाल्या होत्या.
गोव्यात शिक्षण आणि नंतर पत्रकारिता करून गोवा सोडून पुण्यात मी इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो. कालांतराने नारायण आठवले हे `गोमंतक' संपादकपदातून मुक्त होऊन मुंबईला परतले.
निरंजन हरिश्चंद्र उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली १९९४ साली सोळावे ख्रिस्ती साहित्य संमेलन झाले मालवणला झाले तेव्हा मी तेथे तिन्ही दिवस हजर होते.
या संमेलनाच्या उदघाटनाला मुलुखमैदानी तोफ म्हणून नाव कमावलेले दोन `नारायण' उपस्थित होते.
पत्रकार, संपादक आणि विविध सामाजिक चळवळींचे म्होरके असणारे नारायण आठवले आणि त्यावेळचे शिवसेनेचे लढाऊ नेते म्हणून नाव कमावलेले स्थानिक आमदार नारायण राणे.
फादर नेल्सन मच्याडो यांनी अगदी अखेरच्या क्षणी नारायण राणेंना या कार्यक्रमाला येण्यासाठी राजी केले होते.
या संमेलनाला अनुराधा आठवलेसुद्धा असणार यात शंकाच नाही.
अनुराधा आठवले यांच्या या लेखात प्रसिद्ध झालेल्या फोटोत नारायण आठवले, अनुराधा आठवले, विंदा करंदीकर, सुमा करंदीकर यांच्यासह त्या वर्षातले दोन साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत.
नारायण सुर्वे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती आणि निरंजन हरिश्चंद्र उजगरे यांची मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
या दोन्ही साहित्य संमेलनाध्यक्षांचा आठवले दाम्पत्याने आपल्या घरी म्हणजे १, झपुर्झा येथे सत्कार केला होता.
त्यानंतर एकदा पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटसमोर नारायण आठवले यांची आणि माझी ओझरती भेट झाली. त्यावेळी मी बहुधा फर्ग्युसन कॉलेज रोडवरील `टाइम्स ऑफ इंडिया'त किंवा `सकाळ टाइम्स'मध्ये होतो.
`गोमंतक'चे संपादक म्हणून तरुण साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांची नेमणूक झाल्याचे त्यांनी तेव्हा सांगितले तेव्हा मी चकित झालो होतो.
विष्णू सूर्या वाघ आणि मी मिरामारच्या धेम्पे कॉलेजात जवळचे मित्र होतो, ते मला एक वर्षाने ज्युनियर होते.
धेम्पे कॉलेजात हस्तलिखित `आर्ट सर्कल'चा मी संपादक असताना विष्णू सूर्या वाघ यांच्या वळणदार अक्षरात लिहिलेल्या कविता मी नियमाने प्रकाशित करायचो.
`तरुण रक्ताला वाव द्यायला हवा' असे त्यावेळी मला नारायण आठवले म्हणाले होते.
नारायण आठवले यांची ती अखेरची भेट.
मात्र नारायण आठवले यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि स्वभावाच्या विविध पैलूंचा मला परिचय अगदी अलीकडेच झाला तो नामदेव ढसाळ आणि दलित पॅन्थरच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त वाचन करताना.
ते वाचताना नामदेव ढसाळ या मराठी साहित्यातील एक सर्वोत्तम हिरा असलेल्या ढसाळ यांना प्रकाशझोतात आणण्याचे श्रेय नारायण आठवले यांना जाते हे वाचून सुखद धक्का बसला होता.
नारायण आठवले यांनी ढसाळ यांच्याकडून त्यांच्या कवितांचे बांड मागवून घेतले, त्या कवितांचा संग्रह छापण्याची परवानगी ढसाळ यांना मागितली, न मागता रॉयल्टीसुद्धा देऊ केली.
ढसाळांनी चारपाचशे रुपये मागितले तेव्हा आठवले यांनी हजारभर रुपये आगाऊ रॉयल्टी दिली, असे खुद्द ढसाळ यांनीच लिहून ठेवले आहे.
`गोलपिठा' काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताना त्यातील शब्दांचा आणि भाषांचा अर्थ आणि संदर्भ समजून घेण्यासाठी विजय तेंडुलकरांनी कामाठीपुरात भरपूर वणवण केली होती.
आपल्या प्रस्तावनेत विजय तेंडुलकरांनी नामदेव ढसाळ यांच्या भाषेची तुलना थेट संत तुकारामांच्या भाषेशी केली आहे !
नारायण आठवले यांच्या `अनुराधा प्रकाशना'ने १९७१ साली `गोलपिठा' प्रकाशित केला आणि मराठी साहित्य विश्वात इतिहास घडला गेला.
`१ झपुर्झा, साहित्य सहवास' लेखाने हा सगळा फ्लॅशबॅक घडवून आणला.

Camil Parkhe

No comments:

Post a Comment