Showing posts with label Gilbert Londhe. Show all posts
Showing posts with label Gilbert Londhe. Show all posts

Tuesday, April 28, 2026

 

एक ख्रिस्ती धर्मगुरू असूनही वेगळी वाट चाललेले सुभाष चांदोरीकर हे एक अनोखे व्यक्तिमत्व होते. चांदोरीकर हे पुण्यातील युनायटेड थिऑलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र  (यू.टी.एस.एम.) येथे अनेक वर्षे ईशज्ञानाचे प्राध्यापक होते. मात्र त्यांनी आपले कार्य केवळ आपल्या विद्यार्थ्यांशी आणि वर्गाच्या चार भिंतींशी कधीच मर्यादित ठेवले नव्हते. यामुळेच पुण्यात शुक्रवारी वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालेले चांदोरीकर यांनी आपल्यामागे ठेवलेले कार्य आणि वारसा महत्त्वाचा ठरतो. 

चांदोरीकर हे मूळचे मराठवाड्यातील उदगीर परिसरातले.  धार्मिक किंवा पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन समाजातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांसाठी ते अखेरपर्यंत झगडत राहिले. आपल्या धार्मिक कार्याचाच एक भाग म्हणून समाजाच्या विविध दुर्लक्षित घटकांसाठी विशेषतः पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यांसाठी,  एड्सग्रस्तांसाठी आणि तृतीयपंथीयांसाठी समाजकार्य केले.  

तृतीयपंथियांसाठी त्यांनी आयोजित केलेल्या दोन कार्यक्रमांना अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ श्रीराम लागू यांनी हजेरी लावलेली होती.

चांदोरीकरांच्या अशा चाकोरीबाहेरच्या वर्तनामुळे ख्रिस्ती समाजातील अनेक लोंकांचा त्यांना रोष पत्करावा लागला, मात्र चांदोरीकर यांनी माघार कधी  घेतली नाही.

रेव्हरंड डॉ. अरविंद निर्मळ हे भारतातील दलित ख्रिस्ती चळवळीचे एक मुख्य प्रणेते. अहिल्यानगर येथे १९९१ मध्ये पहिले दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून निर्मळ यांनी ख्रिस्ती समाजाची महाराष्ट्रातील दलित चळवळीशी नाळ जोडली. त्यानंतर अशी चार  साहित्य संमेलने त्यांनी आयोजित केली.  

निर्मळ यांचे १९९५ साली निधन झाल्यानंतर सुभाष चांदोरीकर यांनी दलित ख्रिस्ती साहित्य चळवळीची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली आणि विविध शहरांत या संमेलनांचे एकाहाती आयोजन केले.  उत्कृष्ठ वक्तृत्वशैली लाभलेले चांदोरीकर हे कुशल संघटकसुद्धा होते.  विविध संस्था आणि कार्यकर्त्यांना हाताशी धरुन त्यांनी राज्यात अनेक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने भरविली. 

त्यांच्या पुढाकाराने पाचवे दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन (अध्यक्ष बिशप प्रदीप कांबळे - पुणे २००१), सहावे संमेलन (अध्यक्ष सुभाष चांदोरीकर, संगमनेर २००४), सातवे संमेलन (अध्यक्ष डॉ. गिलबर्ट लोंढे, नागपूर २००६), आठवे संमेलन (अध्यक्ष वसंत म्हस्के, उदगीर २००८), नववे संमेलन (अध्यक्ष अनुपमा डोंगरे जोशी, श्रीरामपूर २०१२) आणि दहावे संमेलन (अध्यक्ष फादर ज्यो गायकवाड, श्रीरामपूर २०१२) येथे भरवण्यात आली होती.

सुभाष चांदोरीकर यांच्याच प्रेरणेने या सर्व अध्यक्षीय भाषणांचे संकलन 'शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या माझ्या  पुस्तकात करण्यात आले आहे. 

अखेरच्या आजारपणातसुद्धा चांदोरीकर अकराव्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाची जुळवाजुळव करत होते.  दलित ख्रिस्ती समाजाला आपले न्याय्य हक्क, सवलती मिळाव्यात यासाठी ते तळमळत होते, त्यासाठी आपली लेखणी वापरत होते.  

उषाताई आणि विलास वाघ यांच्या `सुगावा प्रकाशना'ने चांदोरकरांची काही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. `गवंड्यांचे पोर' हे आत्मचरित्र  हे चांदोरीकरांचे अखेरचे प्रकाशित पुस्तक.

चांदोरीकर यांचा बंडखोर वारसा आणि त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला क्रूस त्यांच्यामागे कोण स्विकारणार या प्रश्नाचे उत्तर आताच देणे अवघड आहे. `दलित ख्रिस्ती' या शब्दाबद्दल ख्रिस्ती समाजात घृणा आहे.  सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा या शब्दाबद्दल आक्षेप घेतला आहेच. त्यामुळे `ख्रिस्ती अस्मिता' या नावाने काही वर्षांपूर्वी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अधिकृत नोंदणीकरण करण्यात आले आहे आणि साहित्य संमेलनांची निर्मळ आणि चांदोरीकर यांनी चालवलेली दीर्घ परंपरा चालू ठेवण्याचा निर्धार या समाजातील काही युवा  कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

हा निर्णय निश्चितच  स्वागतार्ह आणि सर्वमान्य होण्यासारखा आहे. 

Camil Parkhe