Showing posts with label Dalit Christians. Show all posts
Showing posts with label Dalit Christians. Show all posts

Tuesday, April 28, 2026

 

एक ख्रिस्ती धर्मगुरू असूनही वेगळी वाट चाललेले सुभाष चांदोरीकर हे एक अनोखे व्यक्तिमत्व होते. चांदोरीकर हे पुण्यातील युनायटेड थिऑलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र  (यू.टी.एस.एम.) येथे अनेक वर्षे ईशज्ञानाचे प्राध्यापक होते. मात्र त्यांनी आपले कार्य केवळ आपल्या विद्यार्थ्यांशी आणि वर्गाच्या चार भिंतींशी कधीच मर्यादित ठेवले नव्हते. यामुळेच पुण्यात शुक्रवारी वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालेले चांदोरीकर यांनी आपल्यामागे ठेवलेले कार्य आणि वारसा महत्त्वाचा ठरतो. 

चांदोरीकर हे मूळचे मराठवाड्यातील उदगीर परिसरातले.  धार्मिक किंवा पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन समाजातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांसाठी ते अखेरपर्यंत झगडत राहिले. आपल्या धार्मिक कार्याचाच एक भाग म्हणून समाजाच्या विविध दुर्लक्षित घटकांसाठी विशेषतः पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यांसाठी,  एड्सग्रस्तांसाठी आणि तृतीयपंथीयांसाठी समाजकार्य केले.  

तृतीयपंथियांसाठी त्यांनी आयोजित केलेल्या दोन कार्यक्रमांना अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ श्रीराम लागू यांनी हजेरी लावलेली होती.

चांदोरीकरांच्या अशा चाकोरीबाहेरच्या वर्तनामुळे ख्रिस्ती समाजातील अनेक लोंकांचा त्यांना रोष पत्करावा लागला, मात्र चांदोरीकर यांनी माघार कधी  घेतली नाही.

रेव्हरंड डॉ. अरविंद निर्मळ हे भारतातील दलित ख्रिस्ती चळवळीचे एक मुख्य प्रणेते. अहिल्यानगर येथे १९९१ मध्ये पहिले दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून निर्मळ यांनी ख्रिस्ती समाजाची महाराष्ट्रातील दलित चळवळीशी नाळ जोडली. त्यानंतर अशी चार  साहित्य संमेलने त्यांनी आयोजित केली.  

निर्मळ यांचे १९९५ साली निधन झाल्यानंतर सुभाष चांदोरीकर यांनी दलित ख्रिस्ती साहित्य चळवळीची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली आणि विविध शहरांत या संमेलनांचे एकाहाती आयोजन केले.  उत्कृष्ठ वक्तृत्वशैली लाभलेले चांदोरीकर हे कुशल संघटकसुद्धा होते.  विविध संस्था आणि कार्यकर्त्यांना हाताशी धरुन त्यांनी राज्यात अनेक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने भरविली. 

त्यांच्या पुढाकाराने पाचवे दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन (अध्यक्ष बिशप प्रदीप कांबळे - पुणे २००१), सहावे संमेलन (अध्यक्ष सुभाष चांदोरीकर, संगमनेर २००४), सातवे संमेलन (अध्यक्ष डॉ. गिलबर्ट लोंढे, नागपूर २००६), आठवे संमेलन (अध्यक्ष वसंत म्हस्के, उदगीर २००८), नववे संमेलन (अध्यक्ष अनुपमा डोंगरे जोशी, श्रीरामपूर २०१२) आणि दहावे संमेलन (अध्यक्ष फादर ज्यो गायकवाड, श्रीरामपूर २०१२) येथे भरवण्यात आली होती.

सुभाष चांदोरीकर यांच्याच प्रेरणेने या सर्व अध्यक्षीय भाषणांचे संकलन 'शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या माझ्या  पुस्तकात करण्यात आले आहे. 

अखेरच्या आजारपणातसुद्धा चांदोरीकर अकराव्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाची जुळवाजुळव करत होते.  दलित ख्रिस्ती समाजाला आपले न्याय्य हक्क, सवलती मिळाव्यात यासाठी ते तळमळत होते, त्यासाठी आपली लेखणी वापरत होते.  

उषाताई आणि विलास वाघ यांच्या `सुगावा प्रकाशना'ने चांदोरकरांची काही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. `गवंड्यांचे पोर' हे आत्मचरित्र  हे चांदोरीकरांचे अखेरचे प्रकाशित पुस्तक.

चांदोरीकर यांचा बंडखोर वारसा आणि त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला क्रूस त्यांच्यामागे कोण स्विकारणार या प्रश्नाचे उत्तर आताच देणे अवघड आहे. `दलित ख्रिस्ती' या शब्दाबद्दल ख्रिस्ती समाजात घृणा आहे.  सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा या शब्दाबद्दल आक्षेप घेतला आहेच. त्यामुळे `ख्रिस्ती अस्मिता' या नावाने काही वर्षांपूर्वी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अधिकृत नोंदणीकरण करण्यात आले आहे आणि साहित्य संमेलनांची निर्मळ आणि चांदोरीकर यांनी चालवलेली दीर्घ परंपरा चालू ठेवण्याचा निर्धार या समाजातील काही युवा  कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

हा निर्णय निश्चितच  स्वागतार्ह आणि सर्वमान्य होण्यासारखा आहे. 

Camil Parkhe 



 

Tuesday, November 8, 2022

बीड येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन


६ नोव्हेंबर २०२२ पासून बीड येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनातून तिसेक वर्षांपूर्वी मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने वेगळी वाट धरुन वेगळी चूल मांडली. तेव्हापासून मुख्य (!) प्रवाहातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या बहुसंख्य अध्यक्षांनी या वेगळ्या प्रवाहावर टीका केली आहे, भरपूर तोंडसुख घेतले आहे.

पुर्वसंमेलनाध्यक्ष निरंजन उजगरे, आणि सुभाष पाटील या आपल्या पूर्वसुरींच्या पावलांवर पाऊल टाकत आताचे संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे यांनीही `ख्रिस्ती दलित' या संकल्पनेवर भरपूर आगपाखड केली आहे.
दलित समाजाची पार्श्वभूमी नसलेल्या पूर्वसंमेलनाध्यक्ष डॉमिनिक ऑब्रिओ आणि सेसिलिया कार्व्हालो यांनी मात्र या वेगळ्या प्रवाहाबद्दल सहानुभूतीची भूमिका घेतली होती. गंमत म्हणजे दलित ख्रिस्ती संमेलनांवर टीका करणाऱ्या आधीच्या संमेलनाध्यक्षांनी पूर्वाश्रमीचे दलितत्व निदान मान्य केले होते, वाघमारे यांनीं मात्र आपला समाज मुळी दलितच नाही, अशीच भूमिका घेतली आहे.
या दलित ख्रिस्ती चळवळीविषयी संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे आपल्या भाषणात म्हणतात : (हे भाषण `अक्षरनामा'ने काल प्रसिद्ध केले आहे. )
``अलीकडच्या काही दशकांत ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ अस्तित्वात आली. खेड्यातील अस्पृश्य, दलित गणले गेलेल्या लोकांना त्यांचा दर्जा परत मिळवून देण्याच्या उद्देशाने ही चळवळ मूळ धरु लागली. महाराष्ट्रात रेव्ह. डॉ. अरविंद निर्मळ यांनी या चळवळीचा पाया घातला. आपला विचार रुजावा, फोफवावा, दबलेले लोक जागृत व्हावेत म्हणून त्यांनी विविध प्रयत्न केले. चळवळीसाठी पैसा उभा केला. कार्यकर्त्यांची फळी उभी केली. सुरुवातीची काही वर्षे निर्मळांच्या नेतृत्वामुळे ही चळवळ जीव धरुन होती. पुढे डॉ. निर्मळ ख्रिस्तवासी झाले, चळवळ खंडीत झाली.
मुळात दलित नसलेले आमचे लोक आहेत, कानामागून आलेल्या सवर्णांनी दलितत्व, अस्पृश्यता आमच्यावर लादलेली आहे. आमच्या असहायतेचा फायदा उठवत आम्हाला त्यांनी दास्यात ठेवले आहे. आणि त्यांचीच री ओढत, स्वतःला पुन्हा पुन्हा दलित म्हणवून घेत ही चळवळ पुढे रेटायचा प्रयत्न चालू आहे. ख्रिस्ती मिशनरींच्या आधाराने शिक्षण, आत्मसन्मान लाभलेले आणि आत्मभान लाभलेल्या लोकांनी या चळवळीला मान्यता दिली नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत ही चळवळ खुजी, खुरटी राहिली. याविषयीचे आत्मपरीक्षण या चळवळीतील कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.
अस्पृश्य नसताना दुसरे म्हणतात, वागवतात म्हणून किती दिवस स्वतःला ‘दलित’ म्हणवून घेणार आहोत आपण? आम्हाला केव्हा आत्मभान येणार? मिशनरींनी केलेले संस्कार, आम्ही विसरुन गेलो की काय? मिशनरींच्या प्रेरणेने स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीचा आम्हाला विसर पडला की काय? राजांचा राजा, प्रभुंचा प्रभू असलेल्या ख्रिस्ताच्या प्रजेने स्वतःला अस्पृश्य, दलित म्हणून स्वत:ला हिनवून घ्यायचे, ही शरमेची बाब आहे.
या चळवळीतील कार्यकर्ते वारंवार वास्तवतेचा टाहो फोडतात, खेड्यातील वास्तवता दाहक आहे, अजूनही सवर्ण आम्हाला आमचा दर्जा देत नाहीत. या वास्तवतेला खरे पाहिल्यास आम्हीच जबाबदार आहोत. सवर्णांप्रमाणेच आम्हीच आम्हाला वारंवार दलित म्हणवून घेतल्याने ‘दलितत्व’ जाण्याऐवजी टिकून राहत आहे, ही खरी वास्तवता आहे.
कोणतीही गोष्ट वारंवार घोकल्याने ती सत्य वाटू लागते, या नियमानुसार आम्ही दलित नसतांना, अस्पृश्य नसतानादेखील दुसरे म्हणतात\ गणतात, म्हणून आम्ही स्वतःला दलित म्हणवून घ्यायचे, यात पुरुषार्थ नाही. ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ दलितत्व घालवण्यासाठी आहे की, टिकवण्यासाठी, असा विरोधाभास जाणवतो. हे या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांने आत्मपरीक्षण केल्यास निश्चितच पटेल.''
---
`ख्रिस्ती दलित' ही मुळी संकल्पनाच पौलस वाघमारे यांनी नाकारल्याने हा प्रपंच..
....
``अहमदनगर येथे २३ आणि २४ मे १९९२ रोजी पहिले ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलन पार पडले. सन २००४ पर्यंत अशी एकूण सहा ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. सन १९९२ मध्ये भरलेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष रेव्ह. अरविंद निर्मळ यांनी विशेष पुढाकार घेऊन चार संमेलने आयोजित केली होती. सन १९९० मध्ये महाराष्ट्रात सुरु झालेल्या ख्रिस्ती दलित मुक्ती चळवळ, पुण्यातील समता विचार मंच आणि आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील दलित मुक्ती विद्यापीठाच्या सहकार्याने चेन्नईमधील गुरुकुल महाविद्यालयाने ही संमेलने प्रायोजित केली होती.
सन १९९३ मध्ये जालना येथे `आपण'कार सत्यवान नामदेव सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन भरले. लोणावळ्यात तिसरे संमेलन भरण्याआधीच या संमेलनाचे अध्यक्ष कवी विश्वासकुमार उर्फ संपत विश्वास गायकवाड यांचे निधन झाले. त्यामुळे हे संमेलन अध्यक्षाविना पार पडले. चौथे ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे देवदत्त हुसळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनानंतर २३ सप्टेंबर १९९५ रोजी रेव्ह. निर्मळ यांचे निधन झाले.
पाचवे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन पुण्यात बिशप प्रदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली २००१ साली पार पडले. सहावे संमेलन नाशिक येथे ८ आणि ९ मे २००४ रोजी पार पडले. रेव्ह. सुभाष चांदोरीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. नागपुरला झालेल्या सातव्या संमेलनाचे गिल्बर्ट लोंढे अध्यक्ष होते तर लातुर जिल्हात उदगीरच्या आठव्या संमेलनाचे वसंत म्हस्के अध्यक्ष होते. श्रीरामपुरच्या २०१४ सालच्या नवव्या आणि २०१८च्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अनुक्रमे अनुपमा डोंगरे जोशी आणि फादर ज्यो गायकवाड यांनीं भुषवले.
चेन्नईमधील गुरुकुल ईश्वरविज्ञान महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या दलित ईश्वरविज्ञान विभागाचे अरविंद निर्मळ प्रमुख होते. सन १९८० मध्ये मंडळ आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर एक वर्षानंतर दक्षिण भारतात वेल्लोर येथे ख्रिश्चन दलित लिबरेशन मुव्हमेंट सुरु झाली. ख्रिस्ती दलितांची ही चळवळ महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय निर्मळ याना दिले जाते. निर्मळ यांच्या निधनानंतर ही चळवळ काही काळ क्षीण झाली होती. प्रा. देवदत्त हुसळे, सुभाष चांदोरीकर आणि डॉ. गिल्बर्ट लोंढे यांनी या चळवळीला पुन्हा संजीवनी प्राप्त करून दिली.
विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजात चालू असलेल्या आरक्षणासाठीच्या चळवळीची वा या विषयाची साधी दाखलसुद्धा या काळात झालेल्या बहुतांश मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांनी घेतलेली नाही. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांची परंपरा नाशिक येथे १९२७ साली झालेल्या संमेलनापासून सुरु होते. अर्थात सर्वच प्रकारच्या मराठी साहित्यातून वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतूनही बहुजन समाजाच्या प्रश्नांचे प्रतिबिंब पडतेच असे नाही. तसाच प्रकार येथेही घडला होता. सन १९२७ पासून २०२२ पर्यंत एकूण सहवीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने पार पडली आहेत.
या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
आरक्षणाच्या या महत्वाच्या मुद्द्यावर ख्रिस्ती समाजाच्या या प्रमुख व्यासपीठावर दलित ख्रिश्चनांच्या खास समस्यांवर चर्चा झाली नाही. याचे दुसरे कारण म्हणजे या समाजातील आर्थिकदृष्ट्या प्रगत झालेल्या समाजघटकाचा बराच काळ दलित ख्रिश्चनांना आरक्षण देण्यास ठाम विरोध होता. या परिस्थितीत आज फार मोठा बदल झाला आहे. असेही म्हणता येणार नाही. मुख्य म्हणजे या प्रगत घटकास आरक्षणाच्या कुबड्यांची आता गरज नाही. या लोकांची संख्या अगदी मूठभर असली तरी शिक्षित असल्याने ह्या प्रश्नाबाबत केवळ तेच पुढाकार घेऊ शकतात. त्यांचाच या सवलतीस तत्वतः विरोध असल्याने वा या बाबत ते निरुत्साही असल्याने बहुसंख्य ख्रिस्ती समाजाचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे शीतपेटीतच राहिला आहे.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आरक्षणाच्या हक्काचे पहिल्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद निर्मळ यांनी जोरदार समर्थन केले. बहुसंख्य मराठी ख्रिस्ती समाज दलित असून आरक्षण वगैरे सवलतींवर त्यांचा हक्क आहे असे त्यांनी म्हटले. ख्रिस्ती समाजावर झालेल्या अन्यायासंदर्भात ते म्हणतात :
खेड्यापाड्यातील लाखो ख्रिस्ती दलित असून साक्षरावस्थेत पोहोचलेले नाहीत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजून त्यांना भेटलेच नाहीत. पूर्वी सरकारी सवलती, आरक्षण केवळ हिंदू धर्मातील दलितांनाच मिळत असत. नंतर शीख धर्मात गेलेल्या दलितांना या सवलती खुल्या झाल्या. परवा त्या नवबौद्धांनाही देण्यात आल्या. परंतु धर्मांतरित मुस्लिम आणि ख्रिस्ती दलितांना या सवलती अजूनही मिळत नाही. आई जेवू घालीना अन बाप भीक मागू देईना,'' अशी ख्रिस्ती दलितांची अवस्था आहे असे निर्मळ यांनी आपल्या या भाषणात पुढे म्हटले आहे.
दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाची विद्रोही, आक्रमक भूमिका
पहिल्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद निर्मळ यांचे भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण तितकेच विद्रोही विचार अगदी ठामपणे मांडणारे आहेत. खरी सामाजिक बांधिलकी उराशी बाळगणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणावे, पहिल्या मराठी ख्रिस्ती दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करावे. पंधरा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात आम्ही वाट चुकलो आहोत, आता नवी वाट तुडवायला हवी. मराठी ख्रिस्ती साहित्याला नवी दिशा द्यायला हवी. आमच्या मूक-बधिर समाजाला लिहिते, वाचते, बोलते व ऐकते करायला हवे, असे त्यांनी म्हटले होते.
आपण कोणत्या अर्थाने वाट चुकलो हे सांगताना अरविंद निर्मळ पुण्यातील ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या उदघाटक शांता शेळके यांच्या भाषणाचा संदर्भ देतात.
पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे उदघाटन करताना मराठी ख्रिस्ती साहित्य परंपरेचे विश्लेषण करताना शांताबाई शेळके म्हणाल्या होत्या ``फादर स्टीफन्सची पुराण ही संकल्पनाच हिंदू होती. साहित्यातील ही समन्वयाची भूमिका बाबा पदमनजी, रेव्ह. ना. वा टिळक, लक्ष्मीबाई आणि दे. ना. टिळक यांनीही पुढे चालू ठेवली. त्यामुळे मराठी माणसांमध्ये आणि मराठी साहित्यामध्ये त्यांना प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळाले आहे.''
या संदर्भात निर्मळ म्हणतात कि वर उलखलेली सर्व मंडळी म्हणजे सवर्ण धर्मांतरित ख्रिस्ती. त्यांना ख्रिस्ती धर्मात वैदिक धर्माची पूर्ती झाल्याचेही वाटले असेल. म्हणून त्यांनी ही समनव्याची भूमिका चालू ठेवली. आम्ही दलितांनी मात्र ख्रिस्ती धर्म पत्करला तो चातुर्वर्णाधिष्ठित हिंदू धर्माला पर्याय म्हणून. त्याचेशी समन्वय साधायला म्हणून नव्हे समन्वयाकडून संघर्षाकडे अशी वाटचाल आम्ही करायला हवी. याचा अर्थ असा नाही कि आम्हाला समेट नको आहे. समन्वय तडजोडीवर आधारित असतो परंतु समेटाला न्याय अभिप्रेत असतो.
संघर्षातून न्याय मिळवून मग आम्ही समेटाकडे वळू. समन्वय साधणाऱ्या सवर्ण ख्रिस्ती साहित्यिकांना मराठी साहित्यामध्ये प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळालेले आहे. परंतु संघर्षाची वाट तुडविणारे सूर्यवंशी मात्र मराठी साहित्यात उपेक्षितच राहतात, हेदेखील येथे लक्षात घेतले पहिजे'' असे निर्मळ यांनी ठासून सांगितले आहे.
``ख्रिस्ती धर्माचा अंगीकार करून त्या धर्माच्या नावाने जगणाऱ्या माणसांच्या जीवनाचं दर्शन घडवणारं, ते जीवन प्रतिबिबित करणारं साहित्य ते ख्रिस्ती साहित्य'' अशी नवी व्याख्या निर्मळ यांनी केली आहे.
ही व्याख्या स्वीकारली तर महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्म जगणारी बहुसंख्य माणसं दलित अस्मितेची, दलित मानसिकतेची, दलित जाणिवा उराशी बाळगणारी अशी त्रस्त, ग्रस्त माणसं आहेत, हेही आमच्या लक्षात येईल. त्यांच्या व्यथावेदना, त्यांची सुखदुःख, त्यांची तडफड, त्यांचा विद्रोह आणि त्यांचा नकार मग आमच्या साहित्यातून साकार होईल आणि आमच्या साहित्याला जिवंतपणा येईल. आमचे साहित्य मग विद्रोहाची आग ओकू लागेल. ते विषमतेविरुद्ध बंद पुकारील. मग ही विषमता आणि अन्याय स्वसमाजातील असली तरीही आमची लेखणी गय करणार नाही'' असे निर्मळ म्हणतात.
या नव्या वाटेवरील आणखी एक पाऊल म्हणजे आमच्या इतर दलित बांधवांशी आणि दलित साहित्याशी संबंध जोडणे, असे निर्मळ म्हणतात. इतर दलितांशी नाते जुळवून आम्ही एक भारतव्यापी दलित साहित्यिक चळवळ निर्माण केली पाहिजे. निदान महाराष्ट्रापासून आम्ही ही सुरुवात करायला हवी. आमच्या धर्मप्रेरणा वेगवेगळ्या असतील, आहेत. त्या कुणी कुणावर लढायला नकोत. परंतु दलितत्व हे आमचं सामान नातं आहे आणि विषमता हा आमचा समान वैरी आहे.
``आमच्या जालन्यात ख्रिस्तजयंतीच्या वेळी मोठी धामधूम असते. ख्रिस्तजयंतीच्या पूर्वसंध्येला कॅरोल राउंड निघतात. ख्रिस्तजन्माची स्तुतिगीते गेली जातात.
अशीच एक ख्रिस्तजयंती मी माझ्या सासूबाईंच्या येथे होतो. बाहेर मुलांचं एक टोळकं मध्यरात्री आलं, ते गाऊ लागले.
``उघडा हो दार आता / कुठवरी झोप घेता /
अंगात एक बंडी / वाजते फार थंडी /
नंतर' गद्यात ``आंटी उघडा ना आता दार अन द्या आम्हाला थोडीशी चिल्लर'. ' या गीताचा विषय ख्रिस्तजन्म नाहीच मुळी. पण माझ्या समाजाचं वास्तव त्यात उघड पडलं आहे.
``अंगात एक बंडी वाजते फार थंडी'' हा आहे माझा समाज, उघडा नागडा, थंडीत कुडकुडणारा अंगात उष्णता नाही म्हणून चहा प्यायला रुपयांऐवजी चिल्लर मागणारा. अंगात थंडी घालून ख्रिस्तजयंतीला थंडीने कुडकुडणाऱ्या या समाजाच्या व्यथावेदना माझ्या साहित्यात उतरल्या पाहिजेत याला म्हणतात सामाजिक बांधिलकी .दलित लेखक कवी हे आमचे खरे स्वजन: ''असं निर्मळ म्हणतात
`आपण'कार सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांनी १९७२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ख्रिस्ती समाज इतर दलित, अल्पसंख्य समाजाहून वेगळा नाही,या इतर समाजघटकांबरोबर राहून त्यांच्यासह झगडून ख्रिस्ती लोकांनी आपल्या हितसंबंधांचे रक्षण केले पाहिजे असा विचार मांडला होता.
जालना येथे १४ मे १९९३ रोजी पार पडलेल्या दुसऱ्या ख्रिस्ती दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सूर्यवंशी यांनी दलित लेखक कवी हेच आमचे खरे स्वजन आहेत असे स्पष्ट केले.
आपल्या भाषणात सूर्यवंशी म्हणतात ``हे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन आहे पण हा सवतासुभा नाही. ख्रिस्ती लेखक म्हणून इतर दलित लेखकांवेगळे आम्ही स्वतःला मनात नाही. दलित हा धर्म नाही कि जात नाही . दलित ही चिरडल्या, भरडल्या गेलेल्या व जात असलेल्या जित्या जागत्या माणसाची अगतिक बनवून सोडणारी अवस्था आहे. ती गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीतून बाहेर पडा हा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि दलित मुक्ती लढा सुरु झाला. तो आमचा लढा आहे आणि त्या लढ्यात उतरलेला प्रत्येक लेखक, कवी, पत्रकार, वक्ता आमचा भाऊ आहे, असे सूर्यवंशींनी यावेळी जाहीर केले.
दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात ख्रिस्ती दलित लेखककवींच्या लिखाणाचा मागोवा घ्यायला हवा. इतर समाजी दलित लेखकांची आणि आपली चूल वेगळी नाही हे संमेलन हा विचार पुढे ठेवण्यास बोलावण्यास आले आहे. स्वतःभोवती भिंतीही उभारू नयेत आणि ब्राह्मणी शैलीचे साहित्य लिहीत बसण्याचा व्यर्थ आटापिटाही करू नये. `विशाल प्रवाह' ही खोटी हूल आहे. या देशात प्रस्थापित म्हटले जातात त्यापेक्षा दलितांची संख्या अधिक आहे. विशाल प्रवाह आमचा आहे, त्यांचा नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न यशस्वी करण्यास सर्व दलित लेखकांनी धर्मभेद या तथाकथित जातीभेद विसरून एकत्र आले पाहिजे असे आवाहन यावेळी सूर्यवंशींनी केले.''
दलित ख्रिस्ती समाजाने आपल्या सभा आणि शिबिरांत इतर समाजी दलित नेते आणि साहित्यिकांना बोलावून त्यांचे विचार जाणून घेतले आहेत. यामध्ये बाबुराव बागुल, वामन निंबाळकर, विलास वाघ, उषा वाघ, नागपूरच्या कुमुद पावडे, औरंगाबादचे शांताराम पंदेरे, गोपाळ गुरु, डॉ लता मुरुणकर यांचा समावेश होता असे सांगून सूर्यवंशी म्हणतात कि ख्रिस्ती लेखकांबरोबरच बौद्ध, हिंदू, मुसलमान, शीख वगैरे समाजातील लेखकांनांही आम्ही वेळोवेळी बोलावतो याचे कारण म्हणजे ते आणि आम्ही वेगळे नाही, ही भावना आहे.
सूर्यवंशी यांनी 'जय हिंद ! जय भीम ! जय ख्रिस्त !' असे अभिवादन करुन आपले भाषण संपविले . .
सन १९७५च्या मुंबई येथील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष फादर डॉमिनीक ऑब्रिओ (नंतरचे औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप ) यांनी या व्यासपीठावरून सर्वप्रथम ख्रिस्ती दलितांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला.
''महाराष्ट्राच्या खेडोपाडी विखुरलेले आमचे असंख्य ख्रिस्ती बांधव केवळ ख्रिस्ती असल्यामुळे हलाखीचे व अपमानित जीवन जगात आहेत. कारण धर्मांतरामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती मुळात बदललेली नाही, याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे व इतरांना मिळणाऱ्या अल्पस्वल्प सवलती त्यांना मिळवून देण्यासाठी ख्रिस्ती लेखकांनीं पुढे सरसावले पाहिजे. ''
नाशिक येथे २००० साली भरलेल्या अठराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष सेसिलीया कार्व्हालो यांनी `दलित ख्रिस्ती' या संकल्पनेविषयी सहाभूतीची भूमिका घेतली होती.
सेसिलीया कार्व्हालो म्हणतात : एक उपेक्षित घटक म्हणजे दलित ख्रिस्ती. समाज आणि साहित्य या दोन्हींनी या घटकाची फारशी दाखल घेतलेली नाही. वास्तविक ख्रिस्ती धर्म कोणताही जातिभेदभाव मानत नाही ही फारच चांगली गोष्ट आहे. मात्र भारतीय मातीत आणि रक्तात जातिव्यवस्था भिनलेली असल्याने आणि ख्रिस्ती समाज या मातीतला असल्याने व्यवहारात मात्र जातिभेद मानला जातो. तळागाळातील लोकांनी ज्या कळाझळा सोसलेल्या आहेत ते त्या ख्रिस्ती दलितांच्या 'गावा' आणि 'वंशा' गेल्याशिवाय कळणार नाही .''

( ' दलित ख्रिश्चनांचा आरक्षणासाठी लढा '' लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन २००६) मधील एक प्रकरण )

Camil Parkhe

Sunday, March 27, 2022

दुर्लक्षित दलित ख्रिस्ती समाज 

पुतण्याचे लग्न आटोपून मी आमच्या विस्तारीत कुटुंबियांसह म्हणजे माझा थोरला भाऊ, सगळ्या वहिनी, तिन्ही बहिणी,  त्यांच्या लेकीबाळी आणि काहींची नातवंडे  यांच्यासह बसने नवरदेवाच्या घरी औरंगाबादच्या दिशेने चाललो होतो.  खूप वर्षांनंतर आणि आनंदी घटनेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आता एकत्र आलो होतो आणिनात्यांतल्या त्या शोडषवर्षीय तरुण लोकांच्या सळसळत्या उत्साहाची आम्हालाही लागण होत होती. गाण्याच्याभेंड्या खेळून झाल्या होत्या, चुलतभाऊ, चुलतबहिणी, आत्या, आजी, चुलते, चुलतआजे, वगैरेबरोबर वेगवेगळ्या सेल्फी घेऊन झाल्या.

त्यादिवशी श्रीरामपूरचे पारखे टेलर यांच्या विस्तारीत कुटुंबातील प्रत्येक घटकातील किमान एक सभासद बसमधील या प्रवासात सहभागी होता. माझी सर्वात मोठी वहिनी आपल्या मुलांसह, मुलींसह आणि त्यांच्या पोरांबाळीसह तिथे होती. गोव्यातली नन असलेली माझी बहीण ``सिस्टर'ताई आणि बाकी दोघी विवाहित बहिणी आपल्या मुलांसह आल्या  होत्या.  लग्नानंतर पोरीबाळींचे आडनावे बदलल्याने त्या ग्रुपमधले काही जण आता तोरणे, लोखंडे, साळवे  वगैरे आडनावे लावत असली तरी त्यांचे मूळ हे श्रीरामपूरचे पारखे टेलर यांचे कुटुंब होते.  

मोठ्या लवाजम्यामध्ये माझ्या दोन्ही वहिनी आंणि एक बहीण वयाने माझ्यापेक्षा  मोठ्या असल्या तरी पुरुषांमध्ये वयाने सर्वांत ज्येष्ठ माझा भाऊ आणि त्यानंतर मी होतो.आम्हा भावंडांच्या वयात खूप मोठा फरक असल्याने या भावाबहिणींच्या मुलांमध्ये- नातवंडाच्या  आपापसांतीलनातेसंबंधांविषयी बऱ्याच गंमतीदार संभाषणे व्हायची. उदाहरणार्थ, एकाच वयाची असलेली दोन मुलांमध्ये मामा-भाच्याचे नाते आहे. श्रीरामपूर, मुंबई, पुणे, गोवा, औरंगाबाद, अहमदनगर, शेवगाव, पढेगाव अशा लांबच्याअंतरावरील ठिकाणी राहणे असल्याने भेटण्याची संधी तशी चारपाच वर्षांनी केवळ लग्नकार्यानिमित्ताने.      

या सर्व पोरांपोरींत सर्वांत अल्लड आणि बोलकी असलेली राणी मग बसच्या पुढील भागातली एक सिट पकडून अधिकच बोलती झाली. बारावी पास होऊन आता अहमदनगरमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेणारी ही राणी म्हणजे माझ्या थोरल्या भावाच्या मुलीची - पिंटीची- मुलगी.  माझ्या मुलीच्या वयाच्या ती आसपास असली तरी नात्यानेतशी ती माझी नातच.   

या राणीने तिची एक कल्पना किंवा प्रकल्प त्या धावत्या बसमध्ये सर्वांना ऐकवला.

तर राणीची कल्पना तशी भन्नाटच होती.

बसमध्ये बसलेल्या आम्हा सगळ्यांकडे स्वतः उभे राहून पाहत राणीने आपली कल्पना मांडली. तिचे म्हणणे थोडक्यात असे होते.

बारावी पास झाल्यावर स्वतः राणीने नर्सिंगचे ट्रेनिंग पूर्ण केले होते आणि आता ती मुंबईत कुठल्याशा दवाखान्यात काम करत होती. तिची धाकटी बहीण पूजा सुध्दा सध्या अहमदनगरमध्येच नर्सिंगचा अभ्यासक्रम करत होती.राणीचा मामा म्हणजे माझा पुतण्या एका मोठ्या दवाखान्यात ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांच्या मदतीला असतो. त्याची आई म्हणजे माझी थोरली वहिनी आणि राणीची आजी गेली कित्येक वर्षे एका मॅटर्निटी होममध्ये`आया; म्हणजे मावशी म्हणून काम करते आहे. माझी दोन नंबरची वहिनी आणि आजच्या लग्नातल्या नवरदेवाची आई सरकारी दवाखान्यात स्टाफ नर्स म्हणून नोकरी करुन नुकतीच निवृत्त झाली होती. त्या वहिनीचा धाकटा मुलगा  म्हणजे या नवरदेवाचा भाऊ औरंगाबाद येथे कुठल्याशा नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षित शिक्षक आहे. माझी धाकटी बहीण ख्रिस्ती मिशनसंस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते आहे. त्याशिवाय माझ्या दोन नंबरच्या थोरल्या भावाचा एक मुलगा एका वैद्यकीय लॅबमध्ये क्षेत्रातले कुठलेही प्रशिक्षणकेले नसल्याने त्याचे `असिस्टंट'  हे पद कसले असेल याबद्दल अटकळ करणे सहज शक्य आहे. मात्र त्याचीबायको प्रशिक्षित नर्स म्हणून  नोकरीला आहे. 

मी स्वतः जेसुईट फादर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी दहावी परीक्षेनंतर श्रीरामपूरचे  घर सोडले होते पण पदवीशिक्षणानंतर त्याकाळी एक आगळेवेगळे असलेले, माझ्या नजरेतील कुणीही काम केले नव्हते असे इंग्रजी पत्रकारितेचे क्षेत्र मी निवडले होते. माझ्याप्रमाणेच माझी बायको पदव्युत्तर असून शाळेत सुपरवायझर किंवा उपप्राचार्याच्या पदावर आहे. आमच्या मुलीने जर्मन विषयात शिक्षण घेतले आहे. माझ्या दुसऱ्या लहान बहीणीनेमाझ्यासारखेच धार्मिक जीवन निवडले होते आणि आता ती सिस्टर म्हणून गोव्यातील त्यांच्या संस्थेच्या शाळेत कोकणी शिकवते आहे. त्यामुळे आम्हा तिघांचे कुटुंब आणि गोव्यातली ही शिक्षिका असलेली `सिस्टरताई या बहुसंखिय  वैद्यकीय क्षेत्रातील कुटुंबियांत अल्पमतात होतो.

तर आपल्या पारखे कुटुंबातील मंडळी वैद्यकीय क्षेत्रात विविध पातळ्यांवर काम करत आहेत, तर मग आपणस्वतःचे हॉस्पिटल उघडण्यास काय हरकत आहे असा राणीचा सवाल होता. 

आमच्या पारखे क्लॅनविषयी तिने जे काही सांगितले ते खरेच होते.

``अरेच्चा, खरंच कि, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं आत्तापर्यंत! ''  मी म्हणालो.   

''वैद्यकीय क्षेत्रातले एव्हढे अनुभवी आणि प्रशिक्षित `कुशल’  लोक आपल्याच घरात आहे तर  मग आपण आपलाच दवाखाना उघडायला काहीच हरकत नाही.'';

`हां, ते  सगळं खरं हाय.  पन  मंग या दवाखान्यात तुमी  डाक्तर कुठून आननार? आतापर्यंत मागच्या सिटवर शांतपणे बसलेली आणि सत्तरीकडे वाटचाल करणारी माझी थोरली बहीण आक्का म्हणाली.

तोपर्यत या चर्चेत उत्साहाने बोलणारे सर्व जण या प्रश्नानंतर गप्पगार झाले.

या विषयाला तोंड फोंडणारी राणी तर या प्रश्नाने भांबावलीच होती. सतरा-अठरा वर्षांच्या त्या पोरीने दवाखान्यासाठी अत्यावश्यक असलेल्या डॉक्टर या पदाचा विचारच केला नव्हता !  

पण ती शांतता काही वेळच टिकली. आपल्या या प्रस्तावित दवाखान्यासाठी डॉकटर कुठून आणायचे या जटील प्रश्नावर काथ्याकूट करावी याची गरज तिथल्यापैकी कुणालाही भासली नाही. स्वस्थ व शांत बसणे ठाऊक नसलेल्या राणीने का तिच्या बहिणीने मग दुसऱ्या कुठल्या तरी विषयाकडे आपला मोहरा वळवला आणि पुन्हा त्याधावत्या बसमध्ये गडबडगोंधळ आणि हास्यकल्लोळ सुरु झाला.

बसमधला तो उत्साही गडबडगोंधळ आणि संभाषण मात्र माझ्या डोक्यावरुन जात राहिले. आमची बस गोदावरी-प्रवरा नदींच्या संगम असलेल्या कायगाव टोक येथे पोहोचली तेव्हा गंगेचे ते विशाल पात्र पाहण्यासाठी काही क्षण माझ्या विचारांची तंद्री मोडली होती. औरंगाबादला नवरदेवाच्या घरी पोहोचेपर्यंत मी गपगप्पच होतो.

पत्रकारितेच्या पेशात असतानाच मी गेली अनेक वर्षे मराठी आणि इंग्रजीत पुस्तके लिहित आलो आहे आणि महाराष्ट्रातील आणि गोव्यातील ख्रिस्ती समाज हा माझ्या लिखाणाचा एक खास विषय आहे. माझ्या भावाच्या नातीने - राणीने - तिच्या नकळत त्या संभाषणात सर्वांच्या लक्षात आणून दिले होते कि आम्हां नातलगांत कुणीही एमबीबीएस किंवा कुठलाही डॉक्टर नाही.

कळीचा मुद्दा असा आहे कि केवळ आमच्या जवळच्या नातेवाईकांतच नाही तर मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या मराठी ख्रिस्ती समाजात किंवा विशेषकरून कॅथोलिक ख्रिस्ती समाजात एमबीबीएस पदवीअसलेला एकही डॉकटर माझ्या पाहण्यात आणि ऐकिवात नाही.  

वकिलीची सनद असलेले लोक आमच्या या समाजात गेल्या काही वर्षांत पैशाला पायलीभर मिळतील इतके झालेत, तुलनेने खूप उशिराने का होईना, पण  पीएचडी पदवी मिळवणारे  काही जण हल्ली समाजक्षितिजावर उगवताना दिसू लागलेत.

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत मराठवाड्यात, विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींच्या प्रभावाने ख्रिस्ती झालेल्या समाजघटकाविषयी मी हे  लिहित  आहे. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींमधून प्रामुख्याने हे ख्रिस्ती धर्मांतर झाले.  औरंगाबाद जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर  जिल्ह्यांत  महार समाजातील तर मराठवाड्यातील उरलेल्या जिल्ह्यांत म्हणजे जालना, लातूर, बीड वगैरे जिल्ह्यांत आणि सातारा, सांगली कोल्हापूर जिल्हयांत  मातंग समाजातील लोक ख्रिस्ती धर्माकडे वळले.  या धर्मांतरित ख्रिस्ती लोकांना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जातीने म्हणजे महार ख्रिस्ती किंवा मांग वा मातंग  ख्रिस्ती असे संबोधण्याची प्रथा होती. ग्रामीण भागांत आजही ही प्रथा चालूच आहे.  

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ख्रिस्ती लोकसंख्या लक्षणीय असली तरी  डिसोझा, गोन्सालवीस, फर्नांडिस अशी पोर्तुगीज वळणाची आडनावे असलेला  हा समाज प्रामुख्याने गोवा आणि इतर भागांतून स्थलांतरीतझालेला आहे. येथे स्थानिक पातळीवर कुठल्याही काळात ख्रिस्ती धर्मांतर झालेले नाही. 

कुठलीही सरकारी कार्यालये, बँका, शिक्षणसंस्था आणि व्हाईट कॉलर जॉब्स म्हणता येतील अशा कुठल्याही पदांवरया मराठी ख्रिस्ती समाजातील माणसे दिसत नाहीत. असली तर चतुर्थश्रेणीतील पदांवर हे लोक असतात.  हा,ख्रिस्ती मिशनसंस्थांतर्फे चालू असलेल्या विविध शहरांत आणि गावांतल्या शाळांत शिक्षिका आणि दवाखान्यांत नर्स एवढ्या पदांपर्यंतच त्यांची झेप गेली आहे. जसे केरळी ख्रिस्ती महिला भारताच्या कानाकोपऱ्यांत आणि जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी प्रामुख्याने नर्सची नोकरी करताना दिसतात. 

बाकी एमपीएससी, आयएएस, आयपीएस वगैरे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन या प्रदेशातील कुणी मराठी ख्रिस्ती व्यक्ती कलेक्टर, पोलीस कमिशनर वा सुपरिटेंडंट या पदावर अजूनही आलेली नाही.  एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन तहसिलदार किंवा प्रांत पद सुद्धा त्यांच्या नजरेत येऊ शकत नाही तर कलेक्टर वा पोलीस कमिशनर या पदांबद्दल बोलायलाच नको.  वर लिहिलेल्या जिल्ह्यांतील या समाजातील मुलां-मुलींना आजही परीक्षेच्या वेळी वह्या-पुस्तके समोर ठेवून, कॉप्या वापरण्याची सवलत देऊनसुद्धा दहावी पास होताना घाम फुटतो, ती मुलेमुली पदव्या किंवा स्पर्धा परीक्षा कशा उत्तीर्ण होणार ?

याचे कारण काय असू शकेल?     

हे लोक पूर्वाश्रमीचे अस्पृश्य म्हणजे दलित असले तरी ख्रिस्ती असल्यामुळे त्यांना आरक्षण नसते. मात्र त्यांच्या गळ्यातले दलितत्वाचे लोंढणे धर्मांतरानंतरही कायम असल्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय वगैरे क्षेत्रांत प्रगती साधणे त्यांना अजूनही शक्य नाही.

पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर सोलापूर, कोल्हापूर  जिल्ह्यांत,  मराठवाड्याच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात सामुदायिक धर्मांतरे झाली. त्यामागे केवळ आध्यात्मिक प्रेरणा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पंडिता रमाबाई, रेव्ह्. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्ह. नीळकंठशास्त्री नेहेम्या गोऱ्हे , बाबा पदमनजी वगैरे सुशिक्षित व्यक्तींच्या धर्मांतरात अध्यात्मिक परिवर्तन घडले हे नि:संशय. 

अस्पृश्य जातीजमातींच्या सामुदायिक धर्मांतराबाबत मात्र असे म्हणता येणार नाही. ज्या लोकांच्या वैयक्तिक वा सामाजिक जीवनात देव-धर्म, देऊळ, धर्मग्रंथ या संकल्पनांना कधीही प्रवेश नव्हता, अशा समाजातून वाळीत टाकलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचे अध्यात्म आधी समजून घेऊन नंतर हा धर्म स्वीकारला असे म्हणणे वास्तव्यास धरून होणार नाही.

धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा यांचे अविनाश डोळस यांनी पुढील शब्दांत विश्लेषण केले आहे : “ब्रिटिश राजवटीत अनेकांनी जातीव्यवस्थेने दिलेले नीचपण झुगारून त्यातून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. अनेक आदिवासी लोकांनीही शिक्षणासाठी, आपुलकीच्या मिळणाऱ्या वागणुकीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मिशनरी लोकांनी उपेक्षित, गरीब लोकांसाठी डोंगरदऱ्यांत शाळांची स्थापना करुन त्यांच्यापर्यंत शिक्षण नेऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे. या कार्याचा परिणाम म्हणून भारतात अधिकाधिक दलित, आदिवासी मंडळी ख्रिस्ती झाली आहेत.”

महाराष्ट्रातील वा इतर कुठल्याही ठिकाणी सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे आध्यात्मिक परिवर्तनाने झाली असा दावा खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू किंवा चर्चही करत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील प्रेषितकार्याचा इतिहास लिहिणाऱ्या फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांचे विश्ले्षण पुढीलप्रमाणे आहे: ”कॅथोलिक श्रध्देचा निरनिराळ्या भागात कसा प्रारंभ झाला हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. क्वचित प्रसंगीच आध्यात्म्याने सुरूवात झालेली दिसते असे खुद्द पवित्र शुभसंदेशातही आपल्याला दुसरं दिसत नाही. लोक येशूच्या भोवती गर्दी करू लागले. कारण त्याने आजाऱ्यांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा उठविले, अशुध्दांना त्याने शुध्द केले आणि भाकरी वाढविल्या. लोकांचा जमाव त्याच्याकडे आल्यानंतरच त्याने त्यांचे लक्ष शाश्वत मुल्याकडे ओढून घेतले. ”तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता म्हणून तुम्ही माझ्याकडे आला असे नाही, तर मी तुम्हांला भाकर दिली म्हणून तुम्ही आलात.” त्यानंतरच मग येशू अध्यात्म्याकडे वळून ’नश्वर अन्नासाठी झटू नका. त्याऐवजी चिरकालीन अन्नासाठी प्रयत्न करा’ असे त्या लोकांना सांगतो.”

’कॅथोलिक मिशनरींकडे लोक प्रथम वळले ते धर्म भावना मनात ठेवून नव्हे’ असे पुण्यातील सेंट विन्सेंट स्कूलचे माजी प्राचार्य फादर केनेथ मिस्किटा आणि फादर थॉमस साळवे यांनीही ’जेसुईट 2005’ या वार्षिक अंकात स्पष्ट म्हटले आहे. मिशनरींकडे वळण्याचा त्यांचा हेतू पोटापाण्याचा व सामाजिक मानसन्मान हा होता असे या त्यांनी म्हटले आहे. 

धर्मांतरामागची कारणे काहीही असोत, ही सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातीलएक मोठी सामाजिक क्रांती होती. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्दचा तो एक मोठा विद्रोह होता. त्यावेळच्या अन्याय्य स्थितीतून सुटका करून घेण्याचा धर्मांतर एक मार्ग होता. विशेष म्हणजे या दलितांना मुक्तीचा हा मार्ग दाखविणारा त्यांच्यामध्ये कुणीही मोझेस नव्हता. एका गावात एक धर्मांतर झाले आणि त्या धर्मांतराचे ऐहिक, सामाजिक आणि आर्थिकही फायदे त्याच्या नातेवाईकांना, भाऊबंदांना लक्षात आले आणि त्यांनीही मग तोच मार्ग पत्करला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतराची ही लाट महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या जिल्ह्यांत चालू राहिली. खेड्यापाड्यांत, आडवळणाच्या छोट्याशा वस्तींवर अहिंसेच्या मार्गाने अगदी संथपणे झालेल्या या क्रांतीची त्यावेळच्या उच्चवर्णियांनी साधी दखलही घेतली नाही. या सामाजिक क्रांतीमागची बहुविविध कारणे, त्याचा समाजाच्या इतर घटकांवर झालेला परिणाम आणि वरच्या जातींच्या अरेरावीस आणि सर्वच क्षेत्रांतील मक्तेदारीस अनेक शतकांनंतर पहिल्यादाच मिळालेले आव्हान याचे समाजशास्त्रज्ञांनी व इतर संशोधकांनी आतापर्यंत विश्लेषण केलेले नाही.

हे धर्मांतर रोखण्यासाठी अस्पृश्य जातींना त्यांना हवा तो आत्मसन्मान द्यावा किंवा अन्याय समाजव्यवस्था बदलावी असेही त्यावेळच्या समाजधुरिणांना वाटले नाही. त्यानंतर येवला येथे 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची गर्जना केली तेव्हाही हे सामुदायिक धर्मांतर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीच. धर्मांतराच्या घोषणेनंतर तब्बल दोन दशकांनी बाबासाहेबांनी आपली धर्मांतराची प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणली 

देशाचे पारतंत्र्य संपून भारताने स्वत:ची राज्यघटना बनविली तेव्हाच या देशात ज्या समाजघटकांवर शतकोनुशतके सामाजिक, धार्मिक आणि अन्य प्रकारचा अन्याय झाला अशा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य किंवा मागासवर्गिय घटकांना आरक्षण देऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न झाला.  डॉ, बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार असलेली भारताची राज्यघटना अमलात आल्यापासून म्हणजे १९५० पासून हिंदू धर्मातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना अनुसूचित जातींना (शेड्यल्ड कास्ट्स) आरक्षणाची सुविधा आणि इतर सवलती देणे सुरु झाले. 

अस्पृश्यता किंवा जातिभेद केवळ हिंदू धर्मात आहेत असे म्हणता येणार नाही, भारतीय संस्कृतीचा तो भाग आहे. `जात नाही ती जात''  अशी म्हण आहे ती यामुळेच. अस्पृश्य किंवा कुठल्याही जातीतील व्यक्तीने शीख, ख्रिस्ती किंवा बुद्ध धर्म स्विकारला म्हणजे लगेचच त्या व्यक्तीची जात गाळून पडली असे होत नाही वा त्यांचा सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा बदलला असे होत नाही.  अस्पृश्य समाजावर झालेल्या अन्यायाचे पारिमार्जन वा नुकसानभरपाई म्हणून त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर क़ाळात त्यांना आरक्षण आणि विविध सवलती लागू करण्यात आल्या.

सुरुवातीला केवळ हिंदु समाजातील दलित घटक़ांना असलेले हे आरक्षण नंतर म्हणजे 1956 साली दलित शीखांना लागू करण्रात आले. शीख धर्मातही चर्मकार वगैरे अस्पृश्य जाती असल्याने घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपतींकरवीखास आदेश (प्रेसिडेन्शियल ऑर्डर ) काढून १९५६ पासून दलित शिखांना आरक्षण सुविधा सुरु झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री बुटा सिंग या दलित शीख समाजातील एक मोठे नेते. अलिकडॆच पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच दलित शीख असलेल्या  चरणजीतसिंग चानी यांची निवड झाली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक दलितांनी १९५६ साली नागपुरात बौद्ध धर्मात प्रवेश केला. हिंदु धर्माचा त्याग करून बौध्द धर्माचा स्वीकार केल्यानंतर या बौद्ध समाजास त्यांच्या धर्मांतराच्या नावाखाली आरक्षण आणि इतर सवलती नाकारण्यात आल्या.  या धर्मांतरीत बौद्धांचा आरक्षणावरचा हक्क गेला. दुदैवाने बाबासाहेब आंबेडकरांचे महानिर्वाण झाल्यामुळे हा विषय संसदेत घेण्यासाठी दुसरा नेता नव्हता.   

स्वतंत्र महाराष्ट्राची 1960 साली निर्मिती झाली तेव्हा मात्र राज्य सरकारने आपल्या खास अधिकाराचा वापर करून नवबौध्द समाजाला आरक्षणादी सवलती चालूच ठेवण्याचा एक अत्यंत पुरोगामी असा निर्णय घेतला. 

जनता दलाच्या राजवटीत पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या बौद्ध समाजावरील हा अन्याय दूर केला आणि १९९० पासून धर्मांतरानंतरही नवबौध्द समाजाला आरक्षणाच्या सुविधा पूर्ववत चालू झाल्या.  या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आला.  धर्मांतराने दलित समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीत कुठलाही बदल घडून येत नाही, त्यामुळे आरक्षणावरील त्यांचा नैसर्गिक आणि न्याय्य हक्क कायम राहतो, हे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अधोरेखीत झाले होते. 

दलित शिखांच्या बाबतीत आणि दलित बौध्दांच्या बाबतीत सरकारने ज्या तत्वाच्या आधारावर आरक्षण लागू केले ते तत्व मात्र दलित ख्रिस्ती समाजाच्या बाबतीत आजतागायत अक्षरश बासनात गुंडाळून बाजूला ठेवण्यात आले आहे. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य ख्रिस्ती लोकांबाबत याबाबत पक्षपात केला गेला आहे. देशात समतेची आणि कायद्याची व्यवस्था येऊनही दलित ख्रिस्ती समाज मात्र अजूनही आरक्षण आणि सवलतीच्या बाबतीत अस्पृश्यच ठरवण्यात आला. यांचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यावतीने या हक्कांसाठी झगडणारा कुणीही राजकीय नेता नव्हता. हा दलित ख्रिस्ती समाज आपली स्वतःची व्होट बँक असू शकतो आणि त्यादृष्टीने त्यांच्यासाठी काही करावे असा विचार कुठल्याही राजकीय पक्षाने केला नाही .  

दलित ख्रिस्ती समाजाच्या बाबतीत असा अन्याय स्वातंत्र्योत्तर काळात सात दशके होत असताना हा समाज मात्र मूग गिळून बसला आहे. याबाबत त्यांच्यात राजकीय जागृतीसुद्धा नाही. या दलित ख्रिस्ती समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांच्या पाठीमागे राहणारी वा त्यांच्या प्रश्नांसाठी भांडणारी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पातळीवरची कुठलीही सामाजिक संघटना, राजकीय शक्ती संघटना नाही. 

मूळचे आदिवासी असलेल्या ख्रिस्ती समाजाला मात्र अनुसूचित जमातीला (शेड्यल्ड  ट्राइब्स  किंवा एस. टी )  लागू असलेले सर्व आरक्षण आदी सुविधा  १९५० पासूनच लागू आहेत. याचे कारण कि ईशान्य प्रांतांतील ख्रिस्तीबहुल मिझोराम, नागालँड वगैरे सर्व राज्यांतील लोक विविध आदिवासी जमातीतील आहेत. धर्मांतरित, ख्रिस्ती असले तरी त्यांनी आरक्षण आदी सुविधांवरचा हक्क वाजवून घेतला आहे.  माजी लोकसभा सभापती पी. ए. संगमा,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा  ही भारतातील  आदिवासी ख्रिस्ती समाजातील  काही प्रमुख नावे.

दलित ख्रिस्ती समाजाला दलित शिखांप्रमाणेच त्याकाळात आरक्षण दिले गेले नाही.  याचे कारण म्हणजेत्याकाळात खुद्द ख्रिस्ती पुढाऱ्यांनी आणि धर्माधिकाऱ्यांनीही मांडलेले मत.  प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ जेसुईट फादर जेरोम डिसोझा हे घटना परिषदेचे सदस्य होते. दलित ख्रिस्ती लोकांना आरक्षण देण्याविरुद्ध त्यावेळी भुमिका घेतल्याबद्दल नंतर ख्रिस्ती पुढाऱ्यांना आणि कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना आता पस्तावा करण्याची वेळ आली आहे. 

बेजवाडा विल्सन हे भंगी (मेहतर) समाजातील दलित ख्रिस्ती. सफाई कर्मचारी आंदोलनाचे नेते असलेल्या आणि कर्नाटकात जन्मलेल्या विल्सन यांना काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या रमण मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विल्सन यांनी लहानपणी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे भंगीकाम केले होते. दलित गणलेल्या अशा अनेक जातींचे लोक ख्रिस्ती समाजात आहेत.

अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत हरेगाव, संगमनेर, घोगरगाव, बोरसर वगैरे भागांत मिशनरींनी स्वातंत्र्यपूर्व काळातच प्राथमिक शाळा उधडल्या होत्या. तरीसुध्दा या जिल्ह्यांतील अनेक गावांतील कॅथोलिक समाजातील पदवीधरांची पहिली पिढी उगवण्यासाठी विसाव्या शतकातील सातवे किवा आठवे दशक उजाडावे लागले. समाजात शैक्षणिक वारशाचा पूर्ण अभाव, त्यामुळे शिक्षणाबद्दलची पालकांची अनास्था, हलाखीची आर्थिक स्थिती यामुळे मिशनाच्या शाळेतील या मुलांची प्राथमिक शिक्षणाच्या पुढे मजलच जात नव्हती.

राहुरीजवळ वळण येथे 1936 साली स्थापन श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे स्थलांतर झालेल्रा संत तेरेजा बॉईज स्कूलमध्ये माध्यमिक विभाग सुरू होण्रासाठी 1980 साल उजाडावे लागले ही घटनाच बरेच काही सांगून जाते. 

आज देशभर विविध राज्यांत ओबीसी जातींना आरक्षण देण्याच्या मुद्दयावर आंदोलने  सुरू आहेत .देशात आरक्षणाच्या मुद्द्यावर असे रणकंदन पेटत असतांना दलित ख्रिस्ती समाजाची स्वत:ची अशी भूमिका मात्र समाजासमोर आणि राजकिय नेतृत्वासमोर प्रभावीपणे मांडली जात नाही. 

पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजाने स्वत:ला दलित म्हणवून घ्यावे कि नाही याबद्दल बराच काळ चर्चा झाली होती. दलित या शब्दामागे एक प्रकारचा स्टिग्मा आहे, दलितत्व कलंकित आहे, त्यामुळे धर्मांतरानंतर पुन्हा आपण त्या स्थितीत जायला नको असा विचार ख्रिस्ती समाजातील काही विचारवंतांनी मांडला आहे. 

1970 च्या दशकात फादर लिओ देसाई, फादर मॅथ्यू लेदर्ले आणि प्रगत पदवीधर संघटना या ख्रिस्ती युवकांच्यासंघटनेने दलित ख्रिश्चनांना आरक्षण मिळावे या मुद्यावर महाराष्ट्रात अगदी रान उठविले होते.. त्यांच्या प्रयत्नामुळेच मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळात  महाराष्ट्र सरकारने 1978 साली दलित ख्रिस्ती समाजाचा इतर मागासवर्गिय वर्गांत (ओबीसी) मध्ये समावेश केला.  मात्र अनुसूचित समाजास लागू असणारे आरक्षणादी सवलती मात्र या समाजास मिळाल्या नाहीत.

पुढे रेव्ह. अरविंद निर्मळ यांनी महाराष्ट्रात या बाबतीत दलित ख्रिस्ती समाजात जागृती करण्याचे फार मोठे योगदान केले आहे.

आरक्षणावरचा दलित ख्रिस्ती समाजाचा नैसर्गिक हक्क शाबीत करण्यात मात्र हा समाज अयशस्वी ठरला आहे. या समाजाची सध्याची लढ्याची एकाकी पध्दत अशीच चालू राहिली तर या प्रयत्नांना यश मिळेल कि नाही याबाबतही मला शंकाच वाटते. रेव्ह. अरविंद निर्मळ यांचे एक फार मोठे योगदान म्हणजे त्यांनी दलित ख्रिस्ती समाजास देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख दलित प्रवाहात, आंबेडकरवादी चळवळीत सामील होण्यास प्रवृत्त केले. दलित समाजाचे प्रश्‍न मांडणाऱ्या सुगावा प्रकाशनाचे प्रा.  विलास वाघ आणि, उषाताई वाघ, अविनाश डोळस वगैरेसारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी दलित ख्रिस्ती समाजाच्या प्रश्‍नांची जाण करून दिली, आणि त्याचबरोबर शोषित समाजघटकांच्या संघर्षात दलित ख्रिस्ती समाज त्यांच्याबरोबरीने आहे, हे त्यांनी ठामपणे वेगवेगवेगळ्या व्यासपीठांवर मांडले.

हिंदु, शीख आणि बौद्ध धर्मातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाप्रमाणेच दलित ख्रिस्ती समाजाचाही अनुसूचीत जातींमध्ये समावेश करावा आणि अनुसूचीत जातींसाठी दिले जाणारे आरक्षण आणि इतर सवलती दलित ख्रिस्ती समाजास लागू करण्यात यावे अशी एक फार जुनी मागणी आहे. अशी मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सध्या चालू आहे. आरक्षणादी सवलती हिंदू धर्मीय दलितांना दिल्या जातात, त्याचप्रमाणे दलित शीखांना आणि नवबौध्दांनाही दिल्या जातात, तर मग दलित ख्रिश्‍चनांना या सवलती का दिल्या जात नाही, याची विचारणा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारकडे केली, तेव्हा या प्रश्‍नाचे समर्पक उत्तरच सरकारकडे नव्हते.

अस्पृश्य म्हणून शतकानुशतके दलित समाजावर खूप अन्याय झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या अन्यायाची नुकसानभरपाई म्हणून पूर्वाश्रमीच्या दलित आणि आदिवासी समाजाला आरक्षणादी सुविधा लागू झाल्या.  इतर दलित समाजाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक आणि इतर सवलती दलित ख्रिस्ती समाजाला नाकारल्या आहेत आणि हा अन्याय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा दशके अजूनही चालूच राहिला आहे. त्यामुळेच दलित ख्रिस्ती समाजाची शैक्षणिक क्षेत्रातील अशा प्रकारचा अनुशेष निर्माण झाला आहे. दलित ख्रिस्ती समाजाला आरक्षणसुविधा लागू केली तरच या समाजाची प्रगती होऊ शकेल. अन्यथा या समाजावर पिढ्यानपिढ्या झालेला अन्याय प्रगतीच्या अनुशेषाच्या स्वरूपात यापुढेही चालूच राहील.

त्यामुळेच आपल्या नात्यातल्या डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या परिवारातील वैद्यकीय कुशल आणिप्रशिक्षित लोकांना घेऊन दवाखाना उघडण्यासाठी माझ्या भावाच्या नातीला  राणीला अजून खूष काही वर्षे वाटपाहावी लागणार आहे.  

Saturday, December 4, 2021

प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि न अनुभवलेल्या मराठी साहित्य संमेलनांच्या काही आठवणी…
‘अक्षरनामा’  पडघम - साहित्यिक

पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत

  • Wed , 01 December 2021

आतापर्यंत खरे तर मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीहून प्रसिध्द होणाऱ्या 'द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून आणि नंतर पुण्यात इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांचा बातमीदार या नात्याने मी काही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोप कार्यक्रमाची भाषणे कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो. मराठी साहित्य संमेलनातली ही उपस्थिती असायची ते केवळ उद्घाटक आणि इतर मुख्य पाहुणे मराठी साहित्याशिवाय इतर काही महत्त्वाचे मुद्दे मांडतील त्याची बातमी करण्यासाठी.

विशेष म्हणजे या उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा इंग्रजी दैनिकांच्या वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त बातमी मूल्य असलेल्या इतर विषयांवर त्यांनी बोलल्यामुळे इंग्रजी दैनिकांच्या अमराठी वाचकांसाठी सुद्धा त्यांचे मत महत्त्वाचें ठरायचे.
एका कोकणी साहित्य संमेलनावे उद्घाटन म्हणुन मराठी लेखक `स्वामी’कार रणजित देसाई यांचे भाषण माझ्यासाठी असेच विस्मरणीय ठरले. त्यावेळी पणजीहून आम्हा बातमीदारांना संमेलनस्थळी घेऊन जाणाऱ्या कारमध्ये एक नामांकित, आदरणीय साहित्यिक व्हीआयपी व्यक्ती होती. मी पुढें ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो आणि मागच्या सीटवर मडगावहून प्रसिध्द होणाऱ्या दैनिक `राष्ट्रमत’चे बालाजी गावणेकर, 'नवप्रभा'चे गुरुदास पेडणेकर यांच्याबरोबर बाकिबाब म्हणजे प्रसिद्ध कवी बा. भ. (बाळकृष्ण भगवंत ) बोरकर बसले होते.
मानेपर्यंत रुळणारे केस आणि खांद्यावर घेतलेली शाल असे या कविवर्यांचे रूप आजही माझ्या नजरेसमोर कायम आहे. मुखदुर्बळतेमुळे म्हणा किंवा भिडेखातिर मी बोरकर यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. मात्र त्यांच्याबरोबरच्या गाडीतील प्रवासाची ती स्मरणीय घटना माझ्या मनात खोलवर उमटली आहे हे निश्चित.
त्यानंतर दक्षिण गोव्यात भरलेल्या दुसऱ्या एका कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यावेळच्या केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी केले, तो प्रसंग आजही आठवतो. त्यावेळी कर्नाटकात मंगळूर येथे राहणाऱ्या अल्वा यांचे कानडी ढंगाचे, उच्चाराचे कोकणी समजून घेताना आम्हा बातमीदारांची कशी त्रेधातिरपीट झाली होती ते आजही स्पष्ट आठवते. (कोकणी भाषा ही देवनागरी लिपीबरोबरच रोमन आणि कन्नड लिपींतही लिहिली जाते. सरकारी पारितोषके मात्र फक्त देवनागरी लिपीतल्या साहित्याला दिली जातात.)
मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला बातमीदार म्हणून नाही तर एक ख्रिस्ती वाचक म्हणून मी हजर होतो. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि आमदार नारायण राणे ऐनवेळी प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या विद्याभवन हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो यांनी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या साहित्य दिंडी नंतर संध्याकाळी राणेंच्या घरी जाऊन त्यांना संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची गळ घातली होती आणि ते लगेच राजी झाले होते.
``राजकारण्यांना साहित्य संमेलनात कशाला असा सन्मान द्यायचा?'' असा माझा नापसंतीचा सूर होता पण राणेंच्या उपस्थितीमुळे, त्यांच्याबरोबर आलेल्या फौजफाट्यामुळे, संमेलनाचा पुर्ण माहोल जो बदलला तो पाहून मग मी गप्पगार झालो.
शिवसेनेचे लढाऊ नेते अशी प्रतिमा असलेले नारायण राणे ख्रिस्ती समाजाच्या या मेळाव्यात काय मत मांडतील याबद्दलसुद्धा मी साशंक होतो. राणे यांच्या कोकणातील मतदारसंघात कॅथोलिक समाजाची संख्या लक्षणीय आहे. राणे यांच्या तिथल्या भाषणाने मात्र माझी निराशा केली नाही हे कबूल केले पाहिजे.
यावेळी संमेलनाध्यक्ष कवि निरंजन उजगरे होते. मराठी साहित्य संमेलने वाद झाल्याशिवाय गाजत नाहीत आणि आठवणीत राहत नाहीत. आपल्या भाषणात साहित्य संमेलनाध्यक्ष उजगरे यांनी ''दलित ख्रिस्ती' या शब्दप्रयोगाविषयी नापसंती व्यक्त केली आणि मग अशा वादाची ठिणगी पडलीच.
उजगरे यांची विधाने अशी होती:
"मध्यंतरी दलित ख्रिस्ती' चळवळ आणि त्यापाठोपाठ ' दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन' भरवण्यात आली. हा एकंदर प्रकारच अत्यंत चिंताजनक आहे. सर्व जातिजमातींमधून धर्मांतरीत झालेला ख्रिस्ती समाज ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने बांधला गेला आहे अशी आमची श्रद्धा असेल तर `दलित ख्रिस्ती' ही संकल्पना मान्य करता येणार नाही. पुन्हा एकदा अवमानित जगण्याकडे जाण्याची आमची मानसिक तयारी आहे का? अनुसूचित जातींना मिळणाऱ्या सवलतीसाठी आम्ही ' दलित ख्रिस्ती' ही पाटी गळ्यात अडकवणार का?"
झाले, या विधानामुळे उजगरे यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला. अलिकडेच, म्हणजे २०१८ ला दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे ज्यांनी अध्यक्षपद भूषविले ते निरोप्या ' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड या संमेलनात होते, कार्यकर्ते पौलस वाघमारे आणि माजी संमेनाध्यक्षा विजया पुणेकरसुध्दा होत्या.
काही दिवसांनी उजगरे यांनी आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती.
तर या मालवणच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्थानिक मिलाग्रिस वर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरु फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा होते. त्या तीन दिवसांच्या संमेलनात जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने जमलेले रसिक आणि खवय्ये पाहुणेलोक या मालवणी पाहुणचाराबद्दल जाम खूष होते.
लातूर जिल्ह्यात उदगीर येथे भरलेल्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले ते त्यावेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे.
हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे असा आरोप करुन ते संमेलन उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती. त्यामुळे जमलेल्या आम्हा पाहुण्यांना धड भोजनाची सुध्दा व्यवस्था झाली नव्हती. शेवटच्या दिवशी तर आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या एका पाळकाने म्हणजे पास्टरने सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज जेवण भरपेट देऊन सुभाष चांदोरीकर आणि इतर आयोजकांची अब्रू वाचवली होती.
श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे - जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती.
ही सर्व साहित्य संमेलने लक्षात राहिली आहेत ती अशा वेगवेगळया साहित्यविरहीत संदर्भांनी. या सर्व संमेलनांना मी उपस्थित असल्याने या साहित्य जत्रा आठवणीत राहिल्या.
मात्र काही मराठी साहित्य संमेलनांना थेट हजर नसतानाही ही संमेलने झाल्यापासून साडेचार दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही आजही माझ्या मनात अगदी ताजी आहेत. ही संमेलने झाली त्यावेळीं म्हणजे सत्तरच्या दशकात मी शालेय विद्यार्थी होतो. तरीसुद्धा त्या संमेलनाआधी, संमेलनादरम्यान आणि संमेलन पश्चात झालेले कवित्व, वाद आणि घडामोडी मला आजही अगदी स्पष्ट आठवतात.
संमेलनात हजर नसतानासुद्धा माझ्या आठवणीत असलेली ही दोन मराठी साहित्य संमेलने म्हणजे इचलकरंजीत पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आणि त्यापाठोपाठ लगेच कराड येथे दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली ऐन आणीबाणीच्या काळात झालेले मराठी साहित्य संमेलन.
इचलकरंजीचे १९७४ सालचे संमेलन खास आठवते याचे कारण संमेलनाध्यक्ष पु.ल. देशपांडे. त्यात या संमेलनाची पन्नाशी पुर्ण झाली म्हणून साहित्य विश्वात खूप उत्साह होता. याकाळात मी शाळेत शिकत असलो तरी मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती आणि तो वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हणजे त्याकाळात नव्यानेच साक्षर झालेली पहिली किंवा दुसरी पिढी नियतकालिके आणि मासिके भरपूर, अगदी पुरवून पुरवून वाचत असे. या दैनिकांना आणि इतर नियकालिकांसाठी ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने म्हणजे मोठी पर्वणीच होती. मला वाटते पुलंच्या अध्यक्षतेखाली भरलेले हे साहित्य संमेलन हे मराठी ग्रंथकारांचे पहिलेच मोठे गाजलेले संमेलन, मोठी साहित्य यात्रा असावी.
इचलकरंजीचे हे संमेलन होण्यापूर्वी कितीतरी दिवस आधी नियकालिकांची पानेच्या पाने आणि रकाने साहित्य संमेलना विषयीच्या मजकुराने भरली होती. संमेलनाध्यक्षकांचे संपूर्ण भाषण पान एकवरुन आतल्या पानावर आणि उद्घाटकांच्या भाषणाचा वृत्तान्त हा पान एक्वरची पहिली बातमी म्हणजे लीड न्युज होती. त्याशिवाय दैनिकांची इतर सर्व पाने संमेलना विषयीच्या बातम्यांनी भरलेली होती.
कराड येथील साहित्य संमेलन भरण्याआधीच त्याभोवती वादाचे ढग जमायला सुरुवात झाली होती. संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत आणि यजमान किंवा स्वागताध्यक्ष होते कराडचे सुपुत्र आणि देशाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य संमेलन होणार होते त्यावेळचा काळ आणि परिस्थिती.
हा काळ होता पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशभर लादलेल्या आणीबाणीचा. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व नेते त्यावेळी तुरुंगात होते. प्रसारमाध्यमांत सेन्सॉरशिप लागू होती.
आणीबाणी होती तरी कराड इथल्या साहित्य संमेलनातल्या सर्व बातम्या दैनिकांच्या आम्हा वाचकांपर्यंत पोहोचत होत्या. मावळते संमलनाध्यक्ष पु. ल. देशपांडे यांनी नव्या संमेलनाद्यक्षा दुर्गा भागवत यांच्याकडे सूत्रे सोपवतना केलेले भाषण, क्षणचित्रे वगैरे सर्व वृत्तांत यांनी वृत्तपत्रांची रकाने भरली होती.
"खूप वापर होत गेला तर मेलेल्या कातडीपासून बनवलेले वहाणसुध्दा कुरकुरायला लागते.," अशा आशयाचे या संमेलनात पुलंनी म्हटलेले आणि दैनिकांत वाचलेले एक वाक्य अजूनही मी विसरलेलो नाही.
कराड इथले हे मराठी साहित्य संमेलन हे या ग्रंथकारांच्या मेळाव्याच्या इतिहासातील अनेक कारणांनी आणि अर्थांनी आतापर्यंत सर्वांत गाजलेले आणि ऐतिहासिक संमेलन म्हणता येईल.
हे संमेलन पार पडल्यानंतरसुद्धा तिथले कवित्व लगेच संपले नाही. संमेलनानंतर लवकरच संमेलनाध्यक्षा दुर्गाबाईना अटक झाली आणि आणीबाणी शिथिल झाल्यावरच त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
त्यानंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कराड येथील मावळते आणि नवीन असे दोन्ही संमेलनाध्यक्ष - पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत - सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या विरोधात हिरीरीने उतरले आणि काँग्रेसचे निवडणुकीत पानिपत झाल्यावर दोघेही पडद्याआड झाले.
कराडचे हे गाजलेले आणि आताही बहुचर्चित असलेले हे साहित्य संमेलन मी संमेलनस्थळी न जाताही अशाप्रकारे वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनुभवले.
योगायोगाने केवळ एक वर्षांतच जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी मी कराड येथेच आलो. तिथे टिळक हायस्कूलात अकरावीचे शिक्षण घेताना तिथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाची आठवण येणे साहजिकच होते. तेव्हा म्हणजे १९७६ ला आणीबाणी पर्व चालूच होते.
आजही पुण्याहून गोव्याला जाताना आणि तेथून परतताना कृष्णाकाठचे कराड लागतेच. त्या थांब्यावर असताना कराडमधला माझा तो एक वर्षाचा काळ आणि त्याआधीचे पुलंनी आणि दुर्गाबाईनी गाजवलेले ते ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन हमखास आठवते.
कराडचे ते साहित्य संमेलन मराठी सारस्वतांनीच नाही तर सर्व भारतीयांनी सदा स्मरणात ठेवावे असेच आहे.
आणीबाणीच्या काळात कराडचे साहित्य संमेलन होत होते त्यावेळी सुध्दा सर्वकाही अलबेल आहे असे मानणारे आणि सांगणारे लोक बहुसंख्य होते.
सद्याच्या विविध क्षेत्रांतील अनेक अर्थांनी भरकटलेल्या परिस्थितीत तर कराड येथील ते साहित्य संमेलन एखाद्या दिपगृहासारखे दिशा दाखवणारे झाले आहे. पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या कणखर, परिणामांची पर्वा न करता राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावणाऱ्या, स्पष्टवक्त्या साहित्यिकांची कमतरता तर खूपच जाणवते आहे.

Tuesday, May 4, 2021

सुगावा प्रकाशन'चे विलास वाघ सर

 

विलास वाघ सर 

गोवा सोडून पुण्यात स्थायिक झालो त्याला आज तीन दशके झालीत. याकाळात पिंपरी चिंचवडला राहत असलो तरी नोकरी मात्र इंडियन एक्सप्रेस (पुणे कॅम्प), टाइम्स ऑफ इंडिया (हॉटेल वैशालीपाशी डेक्कनला) आणि नंतर सकाळ माध्यमसमूहाच्या महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांच्या (बुधवार पेठ आणि नंतर न. ता. वाडी, शिवाजीनगर ) पुण्यातील ऑफिसांत केली.
चिंचवडने दररोज सिटी बसने पुण्याला जाऊन तिथल्या भोज्याला शिवून परत रात्री बसने घरी हा दररोजचा कार्यक्रम. त्यामुळे ना पुण्यात ना चिंचवडला तसे कुठले मूळ धरले नाही, अपवाद फक्त पेठेतल्या भाऊ महाराज बोळातल्या पत्रकार मित्र पराग रबडेच्या घराचा. कामावरुन सुट्टी घेतली आणि पुण्यात असलो तर माझी भेटीगाठीची आणि विसाव्याची एकमेव तीन ठिकाणे होती हे आता माझ्या लक्षात आले.
'वाट चुकलेला फकिर मशिदीत' या नियमाने यासुट्टीच्या काळात पुण्यात मी हमखास सापडणार ती तीन-चार ठिकाणे आहेत. ती म्हणजे शनिवार पेठेतले मॅजेस्टिक बुकच्या समोरचा येशूसंघीय (जेसुइट ) धर्मगुरूंचा स्नेहसदन आश्रम, त्याजवळचेच सदाशिव पेठेतले चित्रशाळा बिल्डिंगमधले सुगावा प्रकाशनचा बुक स्टॉल, शुक्रवार पेठेतला साधनाचा बुक स्टॉल आणि बुधवार पेठेतील सकाळ माध्यमसमूहाचे तळमजल्यावरील ग्रंथालय.
यातील जर्मन फादर आणि मराठी भाषापंडित डॉ. मॅथ्यू लेदर्ले यांनी स्थापन केलेला `स्नेहसदन आश्रम' हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग, यासंबंधी नंतर कधीतरी सांगेन. या ‘स्नेहसदन`मधूनच तेथील ग्रंथपाल आणि जवळचा मित्र जयंत गायकवाड याने मला सुगावा प्रकाशनाची वाट दाखविली, तेथे नेऊन सुगावाच्या प्रा. विलास वाघ आणि उषाताई वाघ यांची ओळख करुन दिली. त्यावेळी 'सकाळ'मधला पत्रकार म्हणून मला `अहोजाहो' करणारे वाघ सर मला कधी अरेतुरे म्हणायला लागले हे आम्हा दोघांनाही कळाले नाही.
आम्ही पत्रकार मंडळी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना चांगले जोखून असतो, जात्यात सिनिकल असल्याने त्यानुसार आमचे त्यांच्यांशी पूर्णतः प्रोफेशनल संबंध असतात. महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाशी वाघ सरांचे किती घनिष्ठ संबंध होते हे मला खूप उशिरा कळाले आणि मग माझा त्यांच्याविषयीचा दृष्टिकोनच बदलून गेला. वाघ सरांचे व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीने आदरणीय बनले.
ख्रिस्ती समाजातील दोन अत्यंत ऋषीतुल्य व्यक्ती असलेल्या सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि रेव्हरंड अरविंद निर्मळ यांच्याबरोबर तीन दशकांपूर्वी उषाताईंनी आणि वाघ सरांनी काम केले होते, ही बाब त्या दोघांविषयी मला खूप काही सांगून गेली
`अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतील आद्य दलित आत्मकथन १९७६ साली लिहिणारे स. ना. सूर्यवंशी हे नाशिकमधून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपण' साप्ताहिकाचे संपादक आणि एक गाजलेले किर्तनकार. रेव्ह. निर्मळ हे भारतातल्या दलित लिबरेशन थियॉलॉजीचे प्रणेते. 'संदेष्ट्याला आपल्या गावात सन्मान मिळत नसतो' या बायबलमधल्या वचनाप्रमाणे निर्मळ यांना महाराष्ट्रात वंदनीय स्थान मिळाले नसले तरी दक्षिण भारतात दलित ख्रिस्ती चळवळीत त्यांना खूप मानले जाते.
रेव्ह. निर्मळ यांनी १९९०च्या दशकात महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती दलित साहित्य संमेलने भरविण्यात सुरुवात केली तेव्हा या संमेलनांना उषाताई आणि वाघ सरांनी साथ दिली होती. मराठी ख्रिस्ती स्त्रियांची एक खास कार्यशाळा अहमदनगरच्या निलीमा बंडेलू यांच्या मदतीने भरवून त्यांचे प्रश्न मांडणारी एक पुस्तिकाही उषाताई आणि वाघ सरांनी छापली, त्याची एक दुर्मिळ प्रत मी जपून ठेवली आहे.
महाराष्ट्रातील दलित ख्रिस्ती समाजाविषयी दलित चळवळीतील नेत्यांची मते आणि पूर्वग्रह ठराविक, एका साच्याची असतात. ख्रिस्ती समाज कुठल्याही चळवळीत नसतो, इतरांपासून फटकून असतो, ही त्यांची एक समान तक्रार. वाघ सर या दलित ख्रिस्ती समाजात वावरले होते, या समाजाच्या लोकांना त्यांनी समजून घेतले, त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध केली. गॅब्रिएल जाधव आणि सुभाष चांदोरीकर ही त्यांपैकी काही नावे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत १९९२ ला अहमदनगर येथे भर सभेत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करणारे 'ख्रिस्ती महार' या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक बाळासाहेब गायकवाड यांचा भ्रमनिरास झाल्यावर वाघ सरांनी गायकवाड यांना खूप मदत केली, त्यांची ख्रिस्ती समाजाविषयीची पुस्तकेही प्रसिद्ध केली. अर्थात हा इतिहास मला नंतर, खूप उशिरा कळाला.
वाघ सरांच्या सुगावा प्रकाशनाने माझी पुस्तकेही प्रकाशित केली. गावकुसाबाहेरचाा ख्रिस्ती समाज, दलित ख्रिस्ती समाजाचा आरक्षणासाठी लढा, अमेरिकेतील वेश्याव्यवसाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर), अस्पृश्यता आणि वर्णभेदाविरुद्ध लढा, ही ती पुस्तके. त्याशिवाय माझ्या इतर पुस्तकांचेही सुगावा प्रकाशन वितरक आहेत.

आणि हे सर्वांत महत्त्वाचे. दरवर्षी सुगावाचे उषाताई आणि वाघ सर आपल्या सर्व लेखकांना त्यांच्या पुस्तकाच्या रायल्टीची रक्कम इमानेइतबाने चेकने पोस्टाने पाठवित असतात. यावर्षी मला आलेली ही रॉयल्टीची ही रक्कम. पुस्तकाची किंमत चाळीस आणि पस्तीस रुपये असल्यामुळे तशी ही रक्कम अगदीच मामुली आहे. मात्र मराठीतील किती दैनिके, नियतकालिके आणि पुस्तक प्रकाशने अशा प्रकारे आपल्या लेखकांना असे मानधन देत असतील ?
सुगावातर्फे दरवर्षी चळवळीतल्या लोकांना दिला देणारा जाणारा सन्मान काही वर्षांपूर्वी वसईच्या लेखिका आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा सेसिलीया कार्व्हालो यांना दिला गेला.
जातीनिर्मुलनाच्या चळवळीचा एक भाग म्हणून उषाताई आणि वाघ सर गेली अनेक वर्षे आंतरजातीय वधूवर संमेलन घेत असत आणि त्यासाठी स्नेहसदनने आपली जागा त्यांना वापरण्यासाठी दिली होती. कोरोनाची साथ सुरु होईपर्यंत ही संमेलने जेसुईट फादरांच्या संस्थेच्या 'स्नेहसदन'मध्ये पार पडली. आज कोरोनामुळे वाघ सरांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना सलाम आणि आदरांजली.