Showing posts with label Prince Harry. Show all posts
Showing posts with label Prince Harry. Show all posts

Tuesday, November 8, 2022

इंग्लंडचे वलयांकित राजघराणे

जगातल्या तीन पदांवरील व्यक्तींविषयी गेली काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम औत्सुक्य राहिलं आहे. ही तीन पदे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रोमस्थित पोप आणि इंग्लंडच्या राणी साहिबा एलिझाबेथ द्वितीय आणि आता त्यांच्यानंतर गादीवर आलेले किंग चार्ल्स तिसरे..

आता एलिझाबेथ राणी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. प्रिन्स चार्ल्स राजे झाल्यानंतर या पदाविषयी भविष्यकाळात असं औत्सुक्य राहील अशीच  चिन्हे आहेत.

पोप जॉन पॉल दुसरे यांच्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीच्या काळानंतर आणि पोप बेनेडिक्ट आल्यानंतर या पदाचे वलय कमी झाले होते. पोप जॉन पॉल यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपली मोठी छाप उमटवली होती. जगभर अनेक राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटी देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. भारताच्या दोन दौऱ्यांत पोप जॉन पॉल त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भेटले होते. त्यांचा मायदेश पोलंड आणि इतर देशांतील कम्युनिस्ट राजवट संपवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या धक्कादायक निवृत्तीनंतर त्यांची जागा घेणाऱ्या पोप फ्रान्सिस यांनी या पदाला पुन्हा गत वलय मिळवून दिलं आहे.

जगभर आपल्या पदाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवण्याचं कर्तुत्व फार मोजक्या व्यक्तींचं असतं. एके काळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर हे याबाबतीत प्रसिद्ध होते. यामुळेच पद सोडल्यानंतर सुद्धा जगभर त्यांची व्याख्यानं होत असत. त्यांच्या पुस्तकांना मागणी असते. नव्वदी पार केलेल्या किसिंजर यांनी अलीकडेच एक नवं पुस्तक लिहिलं आहे. नुकतेच दिवंगत झालेले आता अस्तंगत झालेल्या  सोव्हिएत रशियाचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह असेच एक व्यक्तिमत्व होते.

पंतप्रधान पंडित नेहरु आणि त्यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पण जगभर नाव कमावलं होतं आणि बांगलादेश निर्मितीनंतर इंदिराबाईंनी जगभर आपला वचकसुद्धा निर्माण केला होता.

इंग्लंडचा राजा अथवा राणी इंग्लंडबरोबरच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर काही स्वतंत्र, सार्वभौम देशांचा राजा/ राणी किंवा राष्ट्रप्रमुख असतो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेत अमेरिका आणि इंग्लंडच्या राज्यघटनांच्या काही चांगल्या तरतुदींचा समावेश केला आहे. मात्र इंग्लंडच्या राणीला वा राजाला  इंग्लंडच्या इतर पूर्वीच्या वसाहती राष्ट्रांप्रमाणे भारताच्या राष्ट्रप्रमुख म्हणून कायम ठेवले नाही. कॉमनवेल्थ परिषदेचा एक सदस्य म्हणून राणीला या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणून स्वीकारले, बस इतकेच.

इंग्लंडविषयी भारतीय जनतेत एक सुप्त आकर्षण आहे. बहुधा जगभर अनेक देशांतील लोकांत,  विशेषतः ब्रिटिश वसाहती असलेल्या राष्ट्रांत-  अशी भावना असणं शक्य आहे.  अमेरिकेविषयीसुद्धा असच आकर्षण आहे.

भारतातील अनेक लोकांना इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याची, तिथलं नागरीकत्व घेण्याची इच्छा आहे. पोर्तुगालची साडेचारशे वर्षे वसाहत असलेल्या  गोवा, दमण आणि दीव इथल्या लोकांना आणि १९६१ आधी म्हणजे गोवा मुक्तीआधी  जन्मलेल्या लोकांना पोर्तुगालचं नागरिकत्व घेणं आजही शक्य आहे. अनेक जण याबाबत प्रयत्न करून लिस्बनची वाट धरत आहेत.

आपल्या आधीच्या वसाहतीतील लोकांना नागरिकत्व देण्याची   अशीच सवलत इंग्लंडने दिली तर काय होईल याची नुसती कल्पनाच करुन बघा.

दहा वर्षांपूर्वी कुटुंबियांसह युरोप सहल आखताना  इंग्लंडच्या वारीला आम्ही प्राधान्य आणि सर्वाधिक दिवस दिले होते. दुदैवानं  आमच्या सहलीची तारीख आठवड्यावर आली आणि तरीही मुंबईतली ब्रिटिश वकिलात व्हिसाबाबत निर्णय घेईना तेव्हा इंग्लंड वगळून आम्हाला युरोप दौरा करावा लागला होता याची खंत आजही आहे.

गोव्याहून मी बल्गेरिया आणि रशियाला गेलो तेव्हा विमानमार्ग बदलून मॉस्को ऐवजी रोमला थांबण्याची माझी संधी थोडक्यात हुकली होती. मात्र काही वर्षांपूर्वी रोममध्ये आणि इटलीत भरपूर दिवस मुक्काम गेला.

इंग्लंडबाबतही असं काही घडावं अशी गोड आशा आहे.

इंग्लंडच्या राणी साहिबा आपल्या हयातीतच अगदी पदग्रहण केल्यापासून एक दंतकथा बनल्या होत्या. तसं पाहिलं तर हे इंग्लंडची राणी किंवा राजा हे पद अगदी विचित्र आहे. घटनात्मक आहेच शिवाय वंश परंपरेनुसार. शिवाय राजा आणि राणी हे इंग्लंडच्या चर्चचे प्रमुख म्हणजे पोपच. आहे की नाही गंमत ?

धर्मप्रमुख म्हणून इंग्लंडच्या आर्च बिशप ची नेमणूक राणी किंवा राजा करतो, जसं पोप बिशप आणि कार्डिनल यांची नेमणूक करतात तसे. इंग्लंड हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे. चर्च ऑफ इंग्लंड हा इंग्लंडचा राजधर्म आहे, त्या अर्थाने इंग्लंड हे सेक्युलर राष्ट्र नाही हे अनेकांना माहितीही नसते.

ख्रिस्ती धर्मात चर्च ऑफ इंग्लंड किंवा अँग्लिकन चर्च हा नवा पंथ निर्माण झाला तो इंग्लंडच्या राजामुळेच. राजा आठव्या हेनरीच्या घटस्फोटाला पोप क्लेमेंट सातवा मान्यता देईना, म्हणून या राजाने सोळाव्या शतकात हा पंथ स्थापन केला.

या राजघराण्यातील सर्व विवाह, बाप्तिस्मा, अंत्यविधी अत्यंत काटेकोरपणे विशिष्ट चर्चमध्ये होत असतात. इंग्लंडचा भावी राजा किंवा राणी धार्मिक नसेल किंवा नास्तिक असेल किंवा दुसऱ्या धर्माचा, पंथाचा असला तर अँग्लिकन चर्चचा धर्मप्रमुख कसा बनेल असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

एलिझाबेथ राणी साहिबा फार बोलत नसायच्या, मात्र त्यांचं सूचक मौनसुद्धा बातमी बनायची. त्यांचा पेहराव, कॅप, गळ्यातला हार याविषयी लिहिलं जायचं. त्यांच्या शेजारी कोण आणि कसे म्हणजे कुठल्या क्रमाने उभे राहिले यावर सुद्धा. त्यांच्या नंतर गादीवर कुणाचा कितव्या क्रमांकावर हक्क यावर लिहिलं जायचं.

राणीला भेटायला कसं जायचं, तिथं कसं वागायचं याविषयी खूप शिष्टाचार असायचे, राणीच्या हातात नेहेमी हातमोजे असायचे. राणीसाहिबावर असं खूप लिहिलं गेलं आहे. तरी त्यांच्या बाबतचे औत्सुक्य कमी होत नाही.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे १९८० साली सत्तेवर पुनरागमन झाल्यानंतर भारतात १९८३ साली कॉमनवेल्थ राष्ट्र प्रमुखांची परिषद झाली. इंग्लंडची राणी या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष. त्यावेळी प्रिन्स फिलिप यांच्यासह त्या नवी दिल्लीत आल्या होत्या. या कॉमनवेल्थ परिषदेचे सदस्य असलेल्या अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख नंतर गोव्यात चार दिवसांसाठी आले. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर अर्थात होत्याच. या ऐतिहासिक परिषदेचे वार्तांकन मी ` नवहिंद टाइम्स'साठी केलं. राणीसाहेब आणि प्रिन्स फिलिप मात्र दिल्लीहून लंडनला परतले होते. या दोघांविषयी वार्तांकन करण्याची माझी संधी हुकली

चाळीस वर्षांपूर्वी आताचे राजे चार्ल्स तृतीय आणि लेडी डायना स्पेन्सर यांचा विवाह जगानं अत्यंत  कुतूहलपूर्वक पाहिला  होता. त्यावेळी जगभर वृत्तपत्रांत याबद्दल रकानेच्या रकाने लिहिली गेली. बातमीदार म्हणून मीही याबाबत अपवाद नव्हतो.

प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांच्या जगभर गाजलेल्या शाही विवाहाचे वृत्तांकन आमच्या पणजी इथल्या ` नवहिंद टाइम्स' इंग्रजी दैनिकाने केले,  गोव्यातील वृत्तपत्रात लंडनच्या शाही लग्नाचे फोटो मिळविण्यासाठी त्याच दिवशी म्हणजे २९ जुलै १९८१ला  आम्ही खूप  आटापिटा केला होता.  त्याकाळात दुसऱ्या शहरांतल्या, देशांतल्या घटनांचे फोटो चारपाच दिवसांनंतर मिळायचे.

प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. ब्रिटिश राजघराणे , ब्रिटिश पर्यटन खाते  आणि संपूर्ण जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला.  त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते.

यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ला राणी एलिझाबेथ व्दितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे  जगातले  एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र आताइतके जनसामान्यांपर्यंत पोहोचले नव्हते.

मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा  साखरपुडा झाला तेव्हा रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे  भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते.

एके काळी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळत नसे. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याविषयी जगात अनेक देशांत  कुतूहल होते.  एके काळी ब्रिटिशांनी जेथे राज्य केले होते त्या देशांत आणि इतरही ठिकाणी हा विवाह ठरला, तेव्हापासूनच पुढील काही महिने  हे लग्न म्हणजे एखाद्या परिकथेतील गोड सोहोळा. 'फेरीटेल वेडिंग'  आहे असेच वृत्तपत्रांतून आणि इतर प्रसारमाध्यमातून रंगविले जात होते.

याचे एका कारण म्हणजे खुद्द डायना यांचे व्यक्तिमत्व होते. प्रिन्स चार्ल्सने तिशी पार केली असली तरी डायना स्पेन्सर लग्नाच्यावेळी विशीच्या आत होती.  ती आता राजघराण्याचा भाग होणार होती. प्रसारमाध्यमातून  ब्रिटिश राजघराण्याच्या परंपरा, या शाही विवाहाची पूर्वतयारी, डायना यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वगैरे संदर्भात भ्ररपूर काही लिहिले जात होते. या शाही लग्नानिमित्त स्मरणिका ठरतील अशा अनेक वस्तू बाजारात आल्या होत्या.

दिनांक २९ जुलै १९८१ला पार पडलेला हा शाही विवाह त्या काळात सर्वाधिक लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिलेली घटना होती.

जगभर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेली या घटनेचा वृत्तांत देण्याबाबत पणजी येथे  'नवहिंद टाइम्स'मधील आमच्या संपादकांनी मोठी व्यूहरचना केली होती. लग्नाची बातमी पीटीआय वगैरे वृत्तसंस्थांकडून ताबडतोब मिळणे शक्य होते. मात्र छायाचित्रांच्या बाबतीत तसे नव्हते.

१९८०च्या दशकाच्या सुरुवातीस राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रे फोटोंसाठी फार मोठया प्रमाणात प्रेस इन्फॉर्मशन ब्युरो (पीआयबी) वर अवलंबून  असत. दिल्ल्लीतून पीआयबीने पाठविलेली तीन-चार दिवसांपूर्वीच्या घटनांची  छायाचित्रे  सर्वच वृत्तपत्रे वापरत.असत. लंडन येथील  या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे त्याच दिवशी मिळणे अशक्यच होते.

त्याकाळात महाराष्ट्रात टेलिव्हिजन फक्त मुंबई आणि नजिकच्या परिसरात दिसत असे. जवळपास कुठे टेलिव्हिजन टॉवर्स नसल्याने गोव्यातही टेलिव्हिजनचे कार्यक्रम पाहता येत नसे. असे असले तरी   ' नवहिंद टाइम्स'चे संपादक बिक्रम व्होरा हे गोव्यात टेलिव्हिजन सुविधा असणाऱ्या अगदी बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींमध्ये होते

त्यासाठी त्यांनी मिरामार समुद्रकिनारी असलेल्या आपल्या बंगल्यात मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम पाहता यावे यासाठी  आपल्या टेलिव्हिजनसाठी एक उंच अँटेना लावली होती.

त्याशिवाय त्या अँटेनाला एका बुस्टरही लावला होता. त्यामुळे मुंबई दूरदर्शन केंद्राने प्रसारीत केलेले सर्व कार्यक्रम त्यांना अगदी स्पष्टपणे पाहता येत असत.

गोव्यात असलेल्या या दुर्मिळ सुविधेचा वापर करून या लग्नाचे छायाचित्र वापरण्याचे  संपादक व्होरांनी ठरविले होते. त्यानुसार लग्नाच्या तारखेच्या आदही काही दिवस फोटोग्राफर संदिप  नाईक  याने संपादकांच्या घरी जाऊन रंगीत तालीम घेतली.

टेलिव्हिजनसमोर कॅमेरा स्टॅन्ड लावून त्याने टेलिव्हिजनवर चाललेल्या कार्यक्रमाचे चांगल्यात चांगले फोटो काढण्याचा सराव केला.

त्यानंतर लग्नाच्या दिवशी संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्यांच्या वेळी संदिप सह संपादक आणि आम्ही काही बातमीदार  टेलिव्हिजनसमोर श्वास रोखून उभे होतो.

त्या  शाही लग्नाच्या बातम्या आणि चित्रे दाखविली जाऊ लागली तसे संदिप  कॅमेराची बटणे खटाखट दाबू लागला. लग्नाचे व्हिजुल्स चालू असेपर्यंत  कॅमेराचे शटर वेगाने फिरत गेले. व्हिजुल्स संपेपर्यंत संदिप  तणावाने घामाघूम झाला होता.

त्यानंतर तो वेगाने फोटोच्या प्रिन्टस काढण्यासाठी निघून गेला आणि आम्ही इतर जण दैनिकाच्या ऑफिसात गेलो. एक तासानंतर संदिप  फोटोंच्या प्रिन्टस घेऊन आला तेव्हा एकदम खुशीत होता.

काही फोटो अगदी मस्त आले होते.

संपादकांनी त्यापैकी एका फोटोची  छापण्यासाठी निवड केली.

फोटो अर्थातच पान एकवरच  जाणार होता. दु सऱ्या दिवशीच्या नवहिंद  टाइम्सच्या पान  एकवर लग्नाच्या बातमीसह तो फोटो प्रसिद्ध झाला.

फोटो कॅप्शनवर  'दूरदर्शन फोटो बाय संदिप नाईक '  अशी बायलाइनही होती !

त्याकाळात नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक होते.  दुसऱ्या दिवशी गोव्यातील सर्वच मराठी वृत्तपत्रांनीं चार्ल्स-डायनाच्या लग्नाची बातमी छापली पण त्या लग्नाचा फोटो केवळ नवहिंद टाइम्सकडेच होता !

संपादक बिक्रम व्होरांनी केलेले नियोजन कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यानंतर पुढे अनेक दिवस म्हणजे गोव्यात टेलिव्हिजन टॉवर येईपर्यंत काही विशेष बातम्यांसाठी या दैनिकात टेलिव्हिजन फोटोची बायलाईन्स असे.

संपादक बिक्रम व्होरा नंतर अनेक वर्षे आखाती देशांतील गल्फ न्यूज आणि खलीज टाइम्स या आघाडीच्या दैनिकांचे संपाद्क होते.  

प्रिंस ऑफ वेल्स चार्ल्स  आणि डायना यांच्या दोन्ही मुलांची लग्ने झाली तेव्हाही याविषयी आणि अनेक वादग्रस्त घटनांविषयी  भरपूर लिहिलं गेलं.

आपल्या लग्नाआधी तेव्हाचे  प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स हे  मुंबईला आले होते तेव्हा अभिनेत्री  पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या गालावर चुम्बन घेऊन मोठी खळबळ उडून दिली होती.  या १९८० साली झालेल्या घटनेची जगभर चर्चा झाली होती.

नंतर पद्मिनी कोल्हापुरे स्वतः  लंडनला  गेल्या तेव्हा ``प्रिन्स चार्ल्सचे चुंबन घेणाऱ्या तुम्हीच काय ? '' असा प्रश्न त्यांना विमानतळावरच्या एका अधिकाऱ्यानं विचारला होता असं  या अभिनेत्रीनं सांगितलं आहे.

पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सिनेमांना विसरलेले अनेक सिनेमाप्रेमी लोक हे चुंबन प्रकरण मात्र विसरलेले नाहीत.  

जगभर लंडनच्या या शाही कुटुंबाविषयी लिहिलं गेलं ते इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या स्थानामुळं आणि राणी साहिबा एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्वामुळं. राजे चार्ल्स तृतीय हे इंग्लंडच्या राजघराण्यातल्या शतकांपासून चालत आलेल्या परंपरा आणि संकेत पाळतील कि नाही याबद्दल रास्त  शंका आहेत.

इंग्लंडच्या राज्यघटनेची अधिकृत मान्यता असलेले हे राजघराणे चालू ठेवायचे कि नाही याविषयीसुद्धा या देशाचे नागरिक फेरविचार करु शकतात.

इंग्लंडच्या राजघराण्याविषयी असलेले जागतिक वलय  मात्र पुढच्या काही वर्षांत कमी होईल  अशी चिन्हं नाहीत.

सद्याच्या इंग्लंडच्या राजाचा एक मुलगा प्रिन्स हॅरी राजघराण्याचा हक्कांचा आणि विशेषाधिकारांचा त्याग करून सामान्यजनांचं जीवन जगण्यासाठी आपली पत्नी आणि मुलं  यांना घेऊन अमेरिकेला राहायला गेला आहे, तिथंही हे राजघराणं त्याचा कायम पिच्छा करेल.  

Camil Parkhe