Monday, August 24, 2026


मानवी इतिहासातील धर्मांतरे .. स्वातंत्र्याची ऐंशी वर्षे साजरा करणाऱ्या देशाने अलीकडेच स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि लागोपाठ राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्रात धर्मांतर स्वातंत्र्य कायदा मंजूर केला.

पुण्यातील गुरुवार पेठेतील पंचहौद चर्च शहराचा एक मौलिक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय वारसा आहे.
या पवित्र नाम देवालयाच्या एकशेतीस फूट उंचीच्या टोलेगंज मनोऱ्यात असलेल्या भल्यामोठ्या जाडजूड घंटांच्या नादांतून नियमितपणे संगीत निर्माण केलं जाते.
दरवर्षी ख्रिस्तजयंतीला या घंटानादातून ख्रिस्तजन्माची मराठी मधुर गीते किंवा ख्रिस्तमस कॅरोल्स गायली जातात. तसेच देशाच्या स्वातंत्र्यादिनी `जन गण मन अधिनायक जय हे' हे राष्ट्रगीत गायले जाते.
ख्रिस्ती देवळाच्या घंटानादातून स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीताचे स्वर गायले जाण्याची देशातील ही बहुधा एकमेव प्रथा असावी.
तर एकशेचाळीस वर्षे जुने असलेल्या या देवालयाच्या वर्धापनदिनानिमित्त येथे सप्ताहभर उपासना चालू होत्या.
त्यानिमित्त येथे मराठी गायने, भजने आणि कीर्तने टाळ, तबला वगैरे पारंपरिक भारतीय वाद्यसंगीताच्या सुरात होत असल्याने `हा तर चक्क धर्मातराचा प्रयत्न' असा आरोप झाला आहे.
संपूर्ण जगात केवळ आशिया खंडात प्राचीन काळापासून विविध धर्मांची आणि साहजिकच त्याचबरोबरच धर्मपरिवर्तनाची परंपरा आहे.
भारतात प्राचीन काळापासून आस्तिक आणि नास्तिक विचारधारा किंवा दर्शने परंपरा आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात नास्तिक आणि आस्तिक या शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आस्तिकता आणि नास्तिकतेसाठी भारतीय दर्शनशास्त्रात ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा वेदप्रामाण्य हाच निकष आहे.
वेदप्रामाण्य मानणाऱ्या तसेच वेद अपौरुषेय आहेत, मानवनिर्मित नाहीत असे मानणाऱ्या विचारधारांना किंवा दर्शनांना आस्तिक दर्शने संबोधली जातात.
चार्वाक, बौद्ध आणि जैन दर्शने वेदप्रामाण्य मानत नाहीत, म्हणून ही दर्शने नास्तिक समजली जातात.
सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे भारतीय इतिहासातील एक मोठे, दूरगामी परीणाम करणारे धर्मांतर मानले जाते.
अशोकाने आपला बौद्ध धर्माचा केवळ भारतवर्षांत नव्हे तर इतरही देशांत प्रचार केला, त्यामुळे आशियातील अनेक देशांतील लोक बौद्धधर्मीय बनले.
भारतातील वेरुळ, कैलास वगैरे प्राचीन गुंफा आणि लेणी यावरून देशात एके काळी बौद्ध धर्माचे लोण किती खोल आणि दूरपर्यंत पोहोचले होते याची साक्ष देतात.
भारतीय उपखंडात सम्राट अशोक यांचे बौद्ध धर्मप्रसाराच्या जे स्थान आहे तेच स्थान पाश्चात्य राष्ट्रांत रोमचा सम्राट कॉन्स्टंटाईन द ग्रेट याचे ख्रिस्ती धर्मप्रसाराबाबत आहे.
तिसऱ्या दशकात या रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्विकारुन त्या धर्माला राजाश्रय पुरवला. ख्रिस्ती धर्माला आपल्या साम्राज्याचा अधिकृत धर्म बनवला. याचाच परिणाम म्हणून नंतर ख्रिस्ती धर्म युरोपात आणि इतरत्र पसरला.
आद्य शंकराचार्य यांनी वैदिक धर्माचा संपूर्ण देशभर पुन्हा प्रचार केला आणि त्यानंतर बौद्ध धर्म भारतातून जवळजवळ नामशेष झाला.
तेराव्या शतकात उत्तर भारतात सुलतानी राजवट सुरु झाली, तेव्हा इस्लाम धर्माची देशात बीजे रोवली गेली. सुलतानी राजवटीनंतर बाबरपासून तो थेट बहादूर शाह जफरपर्यंत तब्बल सहाशे वर्षे अख्ख्या भारतात म्हणजे दख्खनपर्यंत मुघल राजवट म्हणजे मुस्लिमांची सत्ता होती.
जवळजवळ आठ शतकांच्या या दीर्घ कालावधीत येथील बहुसंख्य जनता हिंदूच राहिली हे विशेष.
वसईत अल्पकाळात आणि दक्षिण गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत जसे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतर झाले तसे मुस्लीम राजवटींत इस्लाममध्ये घाऊक धर्मांतर झाले नाही हा मोठा फरक आहे.
सम्राट अकबर यांच्या काळात तर धर्मपरिवर्तनाचा एक आगळावेगळा प्रयोग झाला.
हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिस्ती वगैरे अनेक धर्माच्या पंडितांशी वेळोवेळी चर्चा करुन अकबराने स्वतःचाच `दिने इलाही’ हा धर्म स्थापन केला. हा धर्म अकबरानंतर लयास गेला.
मुसलमान झालेल्या नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मांत आणले गेले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातले एक गाजलेले धर्मांतर प्रकरण.
येशू ख्रिस्त हा स्वतः आशियाई राष्ट्रातल्या इस्राईलमधील गॅलिली प्रांताचा. येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी संत थॉमस भारतात इसवी सन ५२ला आला आणि त्यांनी दक्षिणेत केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची बीजे रोवली.
भारतात ख्रिस्ती धर्माची अशी दोन हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्यामुळे केरळमधील ख्रिश्चन समुदाय स्वतःला सेंट थॉमस ख्रिश्चन्स किंवा ख्रिश्चन्स असे संबोधतो.
तामिळनाडू तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले डॉ. पी. सी. अलेक्झांडर आणि बुकर प्राईझ विजेत्या अरुंधती रॉय या सिरियन ख्रिश्चन समाजाचे काही नावाजलेले प्रतिनिधी.
गोव्यात आणि दक्षिणेत तामिळनाडू परिसरात मध्ययुगात पाचशे वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला.
देशातील वरच्या आणि खालच्या जातींजमातींतील लोक अशाप्रकारे ख्रिस्ती झाले, त्यामुळेच भारतातील ख्रिस्ती समाजात या देशातील बहुसंख्य समाजात असलेल्या सर्वच जाती आणि जमाती आढळतात, जातीभेदसुद्धा असतात.
मध्ययुगात वसई आणि `ओल्ड काँक्वेस्ट’ म्हणून गणल्या गेलेल्या दक्षिण गोव्यात पोर्तुगीज राजसत्तेच्या मदतीने ख्रिस्ती धर्माचा जोरदार प्रचार झाला.
त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या साधनांचा सर्रास वापर करण्यात आला आणि तेथील बहुसंख्य लोक ख्रिस्ती झाले.
नंतरच्या काळात मात्र ख्रिस्ती धर्मांतराची लाट पूर्णतः थंडावली आणि न्यु काँक्वेस्ट म्हणजे उत्तर गोव्यातली, तसेच दमण, दीव आणि सिल्व्हासा येथील बहुसंख्य जनता हिंदुच राहिली.
या पोर्तुगीजांकडूनच ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट हे लग्नात आंदण, हुंडा म्हणून मिळाले आणि या व्यापारी कंपनीने मग संपूर्ण भारत देशच आपल्या ताब्यात घेतला.
मात्र पोर्तुगीजांप्रमाणे ब्रिटिश सत्तेने ख्रिस्ती धर्मांतरास कधीही, कुठल्याही प्रकारे पाठबळ दिले नाही.
भारतात दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतसुद्धा ख्रिस्ती धर्मांतरांचे प्रमाण अगदी अल्प आणि नॉर्थ ईस्टसारख्या काही ठराविक प्रदेशांपुरते मर्यादित राहिले.
ख्रिस्तीधर्मिय ब्रिटिश राजवटीतसुद्धा येथील ख्रिस्ती लोकांची संख्या दोन टक्क्यांहून अधिक पुढे जाऊ शकली नाही.
ब्रिटिश अमदानीत एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्मांतरांच्या अनेक घटनांनी खळबळ माजवली.
कारण सुरुवातीच्या काळातली ही सर्व धर्मपरिवर्तने त्यावेळी उच्चभ्रू आणि सधन पारशी आणि ब्राह्मण वर्गांतून झाली होती.
चित्पावन ब्राह्मण पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, `स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, `यमुनापर्यटन' कादंबरी लेखक मराठीतले पहिले कादंबरीकार बाबा पदमनजी वगैरेंच्या धर्मांतरांनंतर महाराष्ट्रात मोठी वादळे निर्माण झाली होती.
त्यावेळी देशात पहिल्यांदाच कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले होते, त्यामुळे धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या पारशी तरुणांच्या धर्मांतरांबाबत मुंबईत स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन यांच्याविरुद्ध अनेक कोर्ट कचेऱ्या, हेबियस कॉर्पस याचिका दाखल झाल्या.
या पारशी तरुणांच्या ख्रिस्ती धर्मपरिवर्तनांमुळे मुंबईत सुरु झालेल्या स्कॉटिश मिशनच्या पहिल्यावहिल्या आधुनिक शाळा काही काळ विद्यार्थ्यांअभावी ओस पडल्या होत्या.
भारतातील पहिल्या महिला वकील कोर्नेलिया सोराबजी यांचे वडील सोराबजी खारसेटजी लांगराना यांना ख्रिस्ती झाल्यामुळें मोठया संकटांना सामोरे जावे लागले होते.
पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत जोतिबा फुले शिकत असताना त्यांच्या काही सहअध्यायी तरुणांनीसुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.
``इ. स. १८४६ मध्ये रेव्हरंड जेम्स मिचेल यांनी पुण्यातील दोघा तरुण ब्राह्मणांस बाप्तिस्मा दिला. तेव्हा जोतीराव आणि त्यांचे मित्र यांच्या मनाची थोडी चलबिचल झाली. परंतु सामाजिक सुधारणेचे कार्य तडीस न्यायचे असेल, तर प्रत्यक्ष धर्मांतर न करण्यात शहाणपण आहे हा विचारच शेवटी प्रबळ ठरला,’’ असे ग. बा. सरदार यांनी लिहिले आहे.
ख्रिस्ती न होता महात्मा जोतिबा फुले यांनी प्रागतिक विचाराच्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि लग्न वगैरे कार्यांत पुरोहित वर्गाची दलाली पूर्णतः नाकारली.
हिंदू धर्मांतून ही ख्रिस्ती धर्मांतरे झाली त्याचप्रमाणे विसाव्या शतकात ख्रिस्ती धर्मांतून हिंदू धर्मांत झालेली धर्मांतरेसुद्धा विविध कारणांनी गाजली.
या उलट्या प्रवाहातील काही धर्मांतरांचे मोठया उत्साहात स्वागत झाले तर काही व्यक्तींना त्यामुळे समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागले.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावामुळे ब्रिटिश तरुणी एलिझाबेथ मार्गारेट नोबल यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्या भगिनी निवेदिता बनल्या.
`सकाळ' दैनिकाचे संस्थापक संपादक नारायण भिकाजी नानासाहेब परुळेकर यांचा विवाह फ्रेंच महिला जेनेव्हिव्ह यांच्याशी झाला आणि विवाहानंतर त्यांनी शांताबाई हे नाव स्वीकारले.
`ज्ञानकोश'कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जर्मन ज्यू असलेल्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि शीलवती हे नाव धारण केले. त्यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिलेले आहे.
डॉ. केतकरांच्या पश्चात शीलवती केतकर यांनी केतकरांचे ज्ञानकोशांची विक्री करण्यासाठी किती खस्ता खाल्या याविषयी दुर्गा भागवत यांनी लिहिले आहे.
महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेले एक धर्मांतर म्हणजे `केसरी' दैनिकाचे संपाद्क आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू (मुलीचा मुलगा) असलेले ग. वि. (गजानन विनायक) केतकर यांनी एका परदेशी महिलेशी केलेला विवाह.
केतकर यांनी एका परदेशी ख्रिस्ती महिलेशी प्रेमविवाह केला होता. या आंतरधर्मीय विवाहानंतर पुणतात मोठे वादळ निर्माण झाले होते आणि केतकरांना 'केसरी' चे संपादकपद सोडावे लागले होते.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी बौद्ध धर्मात आपल्या असंख्य अनुयायांसमवेत केलेल्या धर्मांतराची मानवी इतिहासात एक खूप आगळेवेगळे धर्मांतर म्हणून केली जाईल. '
नाशिक जिल्ह्यात येवला येथे १९३५ साली `` मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' अशी प्रतिज्ञा केली.
धर्मांतर रोखण्यासाठी आज कायकाय केले जाते. मात्र नवलाची बाब म्हणजे बाबासाहेबांचे धर्मांतर रोखण्यासाठी तेव्हाच्या सामाजिक आणि धार्मिक पुढाऱ्यांनी कसलीही पावले उचलली नव्हती.
ही घोषणा तब्बल तीन दशकांनी प्रत्यक्षात उतरवली गेली तेव्हा या महामानवाबरोबर नव्या धर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपुरात हजारो लोक जमले होते.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील वंचित समाजात ख्रिस्ती धर्मपरिवर्तन सुरु झाले तेव्हासुद्धा बहुसंख्य समाजाने त्याकडे सरळसरळ कानाडोळा केला होता.
याचाच परिणाम म्हणून एकोणिसाव्या शतकात पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा,, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यातील अनेक गावाच्या गावे पुर्णतः ख्रिस्ती बनली होती.
अर्थातच हे सर्व लोक वंचित जातींजमातींतील होते.
स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतरानंतर यापैकी अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी नंतर स्वतःहून घरवापसी केली अन हिंदू किंवा बुद्ध धर्मांत राहणे पत्करले.
कुठलाही गाजावाजा न करता झालेले हे पुनर्धर्मांतर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना वगैरे जिल्ह्यांत आणि विदर्भात अमरावती, नागपूर वगैरे परिसरात घडले.
त्या कुटुंबांच्या दृष्टीने एका अर्थी हे बरेच घडले.
कारण त्यामुळे अनुसूचित जातींसाठी असलेल्या सर्व आरक्षणादी सुविधा त्यांना मिळत राहिल्या, त्यांचेच भाऊबंद असलेली ख्रिस्ती कुटुंबे मात्र त्यापासून वंचित राहिले.

Camil Parkhe

नाशिकच्या बाळ येशू तीर्थक्षेत्रातील हा फोटो

No comments:

Post a Comment