Showing posts with label Kerala. Show all posts
Showing posts with label Kerala. Show all posts

Saturday, August 26, 2023

 


मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.
केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगिजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समुळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.
दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.
मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.
देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व - वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या - जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.
आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा - १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.
या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.
मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.
इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदु व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशु ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ''नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.
ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.
बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.
मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.
मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स' चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार.
रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.
सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.
जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.
पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.
पंजाबमध्ये आणि संपुर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.
अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.
हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील. ``सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .
त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले.
त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.
यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन' ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे कासार जातीचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.
अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.
ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.
ख्रिस्ती समाजात अशाप्रकारे विविध जाती जमाती अगदी खुल्या स्वरूपात अस्तित्वात असल्या तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात मात्र जातीभेद नाही असे ठोसपणे म्हणता येते.
हे नंतर अगदी सविस्तरपणे पुढल्या पोस्टमध्ये…

Thursday, October 28, 2021

 मराठी पत्रकारितेत मुसलमान

A celebration in Sakal Times

फार वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटांत वेगवेगळया रसांसाठी अनेक छोटेमोठे नटनटया लागायाच्या, विनोदासाठी मेहमूद, लठ्ठ टुणटुण, सुंदर, मुक्री, वगैरे नट असायचे करुण रसासाठी रडणाऱ्या कामिनी कौशल सारख्या आयाबहिणी असायच्या, वीररसासाठी नायकाची यथेच्छा पिटाई करणारा आणि नंतर मार खाणारा खलनायकाचा नोकर शेट्टी असायचा, कॅबरे डान्स करणारी हेलेनसारखी गोवन किंवा ईस्ट इंडियन ख्रिश्चन असायची. केश्तो मुखर्जी, शरद तलवळकर,ललिता पवार, बिंदू, अरुणा इराणी, रणजित, डेव्हीड, के एन सिंग, ओम प्रकाश, सुजित, जॉनी वॉकर वगैरेसाठी खास ठरलेल्या भूमिका विविध चित्रपटांत असायच्या. सर्व धर्माच्या, प्रांतांच्या, संस्कृतींना या चित्रपटांत थोड्याबहुत प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायचे. असा संच असला कि मगच चित्रपटाची भट्टी जमायची आणि प्रेक्षक व त्त्यांच्यासह निर्माते खूष व्हायचे.

मी गोव्यात 'नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून 1981ला रुजू झालो, मांडवीच्या काठावर पणजी मार्केटशेजारी एकमजली कौलारी गोमंतकीय शैलीच्या बाल्कनी असलेल्या आमच्या ऑफिसच्या इमारतीत नवप्रभा हे मराठी जुळे दैनिक होते. आमच्या इंग्रजी दैनिकाचे खास कल्चर होते आणि नवप्रभा मराठी दैनिकाची वेगळी संस्कृती होती.
इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र दैनिकांची ही संस्कृती अखिल भारतीय पातळीवर समान स्वरुपाची होती, राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी आणि व्हर्नांक्युलर किंवा प्रादेशिक असे हे विभाजन असायचे हे मी वृत्तपत्र कामगार चळवळीच्या निमित्ताने आणि माझ्या परदेश दौऱ्यांच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर पोहोचलो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले.
इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांतील दैनिकांतील आणि नियतकालिकांतील ही संस्कृती आणि विविध भूमिकांचा संच मला भारतीय किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध भुमिकांची आणि पात्रांची वेळोवेळी आठवण करुन द्यायचा.
उदाहरणार्थ, टाइम्स ऑफ इंडियाच्या (बेनेट कॉलेमान ) ग्रुपच्या मारिओ मिरांडाच्या व्यंगचित्रांत आणि हिंदी चित्रपटांत बॉसची पीए किंवा डिक्षेशन घेणारी टायपिस्ट नेहेमी फ्रॉकवाली गोवन तरुणी असायची, देशातल्या इंग्रजी दैनिकांत डिट्टो हिच स्थिती असायची. मराठी संपादकांच्या नशिबी हे नसायचे.
आमचे वृत्तपत्र गोव्यात असल्याने साहजिकच गोवन ख्रिस्ती आणि हिंदू कर्मचारी बहुसंख्येने होते. त्याशिवाय
इंग्रजी वृत्तपत्रांत त्याकाळात किमान एकदोन दाक्षिणात्य म्हणजे नायर, जोसेफ, मेनन, मॅत्थू या नावाचे संपादकीय आणि छपाई वगैरे विभागांत कर्मचारी असायचेच. मूळचा नागपूरचा असलेला प्रभाकर झाडये हा माझा सहकारी नेहेमी म्हणायचा... "कामिल, रिमेम्बर, नो इंग्लिश न्यूजपेपर कॅन बी कंप्लेंट अनलेस देर आर मेनन्स, नायर्स, रॉय ऑर जोसेफ्स....''
त्याच्या म्हणण्यात खूप तथ्य होते हे माझ्या लक्षात आले. नंतरच्या काळात इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांबरोबर बंगाली लोकांची हजेरी आवश्यक ठरली.
गोव्यात 1970 च्या दशकातील हे मी वर्णन करतो आहे. त्याकाळात गोमंतकात आजच्या इतका भायलोंचा म्हणजे बाहेरच्या लोकांचा भरणा झाला नव्हता, पर्यटक पाहुण्यांसारखे यायचे आणि तसेच लगेच परतायचे. स्थानिक लोक आपापसांत कोकणी, पोर्तुगीज, मराठी आणि इंग्रजी बोलायचे, बाहेरच्यांशी हिंदी आणि इंग्रजीचा वापर व्हायचा.
पणजीला 18th जून रोडवर पणजी चर्चच्या जवळ माझ्या एका शीख मित्राचे 'शेर-इ -पंजाब' हॉटेल होते आणि त्याच रस्त्यावर जुन्ता हाऊसशेजारी गुजरात हॉटेल होते ही दोन हॉटेल्स बाहेरच्यांच्या विशिष्ट चवीच्या जेवणाची काळजी घेत असत. आझाद मैदानापाशी 'कासा फर्नांडिस' या दुकानाशेजारी शानबाग हे पणजीतील तेव्हाचे एकमेव उडुपी हॉटेल होते.
आमचे नवहिंद टाइम्स हे गोवा मुक्तीनंतर सुरु झालेले आणि टिकलेले इंग्रजी दैनिक, गोमंतक हे असेच मराठी दैनिक. आमचे हे इंग्रजी दैनिक ख्रिस्ती आणि इंग्रजाळलेल्या वाचकांमध्ये लोकप्रिय आणि गोमंतक हे मराठी वाचणाऱ्या हिंदू वाचकांमध्ये लोकप्रिय.
आपापल्या वाचकांच्या कलानुसार आणि आवडीनुसार या मराठी आणि इंग्रजी दैनिकांच्या बातम्या आणि संपादकीय भूमिका असायचा. पोर्तुगीज भाधेतून प्रसिद्ध होणारे 'ओ हेराल्डो' या काळात इंग्रजीतून प्रसिद्ध होऊ लागले आणि आपल्या वाचकांना म्हणजे ख्रिश्चंनांना धार्जिन अशा बातम्या आणि धोरणे स्वीकारू लागले. उदाहरणार्थ, मराठी कोकणी वादात कोकणी भाषेला अनुकूल, तर गोमंतक दैनिक मराठीस अनुकूल अशी सरळसरळ विभागणी असायची.
अशीच गोष्ट फार पूर्वी म्हणजे गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मुद्द्यावर गोव्यात i(भारतातले आतापर्यतचे एकमेव सार्वमत ) झालेल्या 1967 सालच्या सार्वमतात झाली होती. त्यावेळी गोयेंकरांनी गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यास ठाम नकार दिला होता.
या दोन्ही इंग्रजी आणि मराठी दैनिकांमध्ये संस्कृतीचा एक समान धागा होता, तो म्हणजे या दोन्ही दैनिकांचे संपादक भायले म्हणजे बिगरगोमंतकीय असायचे. माधव गडकरी, नारायण आठवले हे गोमंतकचे नावाजलेले संपादक आणि त्र्यंबक पर्वते, मेनन, बिक्रम व्होरा, मुदालियार वगैरे 'नवहिंद टाइम्स'चे संपादक. तसेच राजन नारायण हे हेराल्डचे संपादक.
अगदी अलिकडे एकदोन महिन्यांपूर्वी गोमंतकीय पत्रकार राजू बी. नायक यांनी 'गोमंतक'चे संपादक म्हणून सूत्रे घेतली तेव्हा अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी ही जुनी अनिष्ट परंपरा खंडीत केल्याबद्दल त्यांचे
अभिनंदन
केले होते.
या मराठी वृत्तपत्रांत साहजिकच मराठी आणि कोकणी बोलणारे हिंदू पत्रकार आणि इतर कामगार असत आणि इंग्रजी वृत्तपत्रांत अर्थातच पोर्तुगिजचे जुजबी ज्ञान असलेले, कोकणी आणि इंग्रजी बोलणारे ख्रिश्चन असत. गोव्यात सरकारी पातळीवर मराठी आणि देवनागरी भाषा जाणणारे बातमीदार
केवळ हिंदू असायचे त्यामुळे आमच्या नवहिंद टाइम्समध्ये दोन्ही बातमीदार हिंदूच होते. (गोव्यात मराठी आणि कोकणी न समजता पत्रकारिता करणे अवघड आहे,)
गंमत म्हणजे इंग्रजी वृतपत्रे ख्रिस्ती वाचकांमध्ये वाचली जाणार आणि या ख्रिस्ती वाचकांच्या चालीरिती संस्कृतीचे चित्रण हिंदू बातमीदार किती प्रभावीपणे करणार? उदाहरणार्थ, ख्रिसमस, कार्निंव्हाल, लेंट म्हणजे उपवासकाळ, सान जाव फेस्त या पारंपरिक सणांची कॅथोलिक धर्मातील पार्श्वभूमी आणि महत्व आजही गोव्यात काम करणाऱ्या हिंदू बातमीदारांना माहित असेल असे मला वाटत नाही
मी नवहिंद टाइम्सला जॉईन झालो आणि पहिल्यांदा मी ही धार्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक आणि भाषिक कोंडी फोडली. मी मराठी भाषिक असलो तरी कॅथोलिक. मी मराठी, कोकणी आणि इंग्रजीत बोलायचो, हिंदुप्रमाणेच कोकणी देवनागरी लिपीत लिहायचो आणि वाचायचो आणि ख्रिस्ती लोकांप्रमाणे कोकणी रोमन लिपीत लिहायचो, वाचायचो.
या माझ्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचा गोव्यात बातमीदार म्हणून दोन्हीं समाजांतील विषयांच्या बातम्या देण्यास मदत झाली. माझ्यासारखे असे बहुधार्मिक, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक व्यक्तिमत्व गोव्यातील तेव्हाच्या पत्रकारांमध्ये फक्त जॉन आगियर यांचेच होते.
गोव्यातून औरंगाबादला लोकमत टाइम्सला जॉईन झालो तेव्हा तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाची नव्याने ओळख झाली. इथे हिंदु बहुसंख्य असले तरी आंबेडकरी जनतेचे महत्व आणि अस्तित्व सातत्याने जाणवायचे, तीच बाब मुसलमान समाजाची. आणि याचे प्रतिबिंब आमच्या पत्रकारितेत दिसायचे.
आमच्या 'लोकमत टाईम्स'मध्ये मुस्तफा आलम या माझ्या मित्रासह तीन मुसलमान बातमीदार होते, संपादकांचा पीए मुसलमान होता, मराठी दैनिकांत दलित, बहुसंख्य समाजाला प्रतिनिधित्व होते, त्याशिवाय उर्दू दैनिके अनेक होती, त्यातून अल्पसंख्य समाजाच्या बातम्या यायच्या, त्या समाजाची अनेक पोरं पत्रकारितेच्या व्यवसायात आलेली मी पाहिली. आज इंग्रजी पत्रकारितेत ही मंडळी मोठ्या हुद्यावर आहेत. औरंगाबादचे आताचे खासदार आणि पूर्वीचे आमदार इम्तियाज जलील हेसुद्धा काही वर्षांपूर्वी पुण्यात न्यूज चॅनलमध्ये पत्रकार होतेच. आमच्या इंग्रजी दैनिकात आधी म्हटल्याप्रमाणे दाक्षिणात्य आणि गोवन ख्रिश्चन अर्थातच होतेच.
एक वर्षातच औरंगाबाद सोडून पुण्याला इंडियन एक्स्प्रेसला जॉईन झालो. इथल्या इंग्रजी दैनिकांत म्हणजे पूना हेराल्ड (नंतरचे महाराष्ट्र हेराल्ड ) येथे 'अमर अकबर और अँथनी ' या नावाने ओळखले जाणारे व्ही. कृष्णमूर्ती, ताहेर शेख आणि हॅरी डेव्हीड हे स्थानिक पत्रकारितेतले अत्यंत प्रस्थापित त्रिकुट होते.
पुण्यातल्या इंग्रजी वृत्तपत्र सृष्टीत राष्ट्रीय पातळीप्रमाणेच सर्वसमावेशक धार्मिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक समतोल राखला जायचा. इथे नावावरून किंवा आडनावावरून जातीविषयक काहीही बोध होत नसायचा, त्यामुळे जात चोरण्याची कुणाला गरज भासत नसायची. मुस्लीम समाजातील लोक बातमीदारीत आणि न्यूज डेस्कवर लक्षणीय प्रमाणात असायची आणि आजही आहेत. त्
या सर्वसमावेशकतेंमुळे दिवाळी, दसरा, पवित्र रमजान महिना, नवरात्री उत्सव, ख्रिसमस, गुड फ्रायडे, पोंगल, बैशाखी, ओणम वगैरे सर्व सणांना बातम्यांत व्यवस्थित स्थान, प्रतिनिधित्व मिळायचे आणि या सणांबाबत कुठलाही सावळा गोंधळं नसायचा.
उदाहरणार्थ, गुड फ्रायडे ला वाचकांना इतर सणांसारख्या 'हॅपी गुड फ्रायडे' च्या शुभेच्छा द्यायच्या नसतात! मात्र हॅपी ईस्टर म्हणता येईल, हे तारतम्य इथे पाळले जायचे.
गोव्यात, औरंगाबादला आणि पुण्यात नवहिंद टाइम्स, लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि अलिकडे सकाळ ग्रुपच्या 'महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स' या सर्व इंग्रजी दैनिकांत कितीतरी मुस्लिम सहकाऱ्याबरोबर मी काम केले आहे, त्यापैकी काही बॉस तर इतर सहकारी वा ज्युनियर होते. त्याशिवाय दोन महिला बॉस पारशी होत्या.
या चार दशकांच्या कालावधीत मराठी पत्रकारितेत मुसलमान समाजातील तरुणांचे अस्तित्व मात्र मला फारसे जाणवले नाही हे आता प्रकर्षाने लक्षात येत आहे.
पुण्यातील इंग्रजी पत्रकारितेत स्थानिक म्हणजे मराठी मुस्लीम स दिसतात तसें मराठी वृत्तपत्र व्यवसायात मुस्लीम समाजातील पत्रकार दिसत नाहीत. मुंबईत वा राज्याच्या इतर शहरांत काय स्थिती आहे हे मला माहित नाही.
मुंबई आणि इतर शहरांत मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेत इथल्या म्हणजे मराठीभाषक वसई. पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे हे मात्र मला माहित आहे.
तर मग अल्पसंख्यांकामध्ये सर्वाधिक संख्येने असलेल्या या मुस्लीम समाजाच्या प्रश्नांचे, भावनांचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब मराठी वृत्तपत्र सृष्टीत उमटत असते कि नाही? मागे एकदा कुठल्या तरी लेखात "मुस्लिम मनाचा कानोसा '' अशा पद्धतीच्या शिर्षकाच्या सदरांचा कुणीतरी खरपूस समाचार घेतलेला आठवतो.
कानोसा??
धार्मिक पातळीवर कुठल्याही उद्योगक्षेत्राकडे वा व्यवसायाकडे पाहिले जाऊ नये हे योग्यच आहे. मात्र अशी काही स्थिती असेल तर त्याची कारणेही शोधली गेली पाहिजेत.
वृत्तपत्रे समाजाचा आरसे असतात, त्यात सर्वच समाजघटकांचे प्रतिबिंब पडायला हवे.


Friday, June 11, 2021

मिरामार बीचवर फुटबॉल -- फुटबाँलवेडा गोवा

(Siridao beach photo by Willy Goes)

समोरचे ते लांबवर पसरलेले पाणी पाहून मी अगदी थक्क झालो होतो. काही ठिकाणी तर दुसरा किनाराही नजरेस पडत नव्हता. इतके पाणी मी केवळ हिंदी चित्रपटांत एखादे गाणे चालू असताना गंगामैया किंवा यमुना नदीचा प्रवाह दाखवतात तेव्हाच पाहिले होते.

माझी उत्फुर्त प्रतिक्रिया होती ; अरे बापरे, किती मोठी नदी आहे ही !

नदी? ही नदी नाही, समुद्र आहे, अरबी समुद्र ! आमच्या दौऱ्याचे प्रमुख असलेले फादर किस्स पटकन म्हणाले.

त्या उत्तराने आता माझ्या तोंडाचा आ अधिकच वासला होता. आपण काय पाहत आहोत यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
ही घटना आहे १९७८ ची. गोवा पुणे बेळगाव येशूसंघीय प्रांताने दहावी आणि अकरावीची परीक्षा दिलेल्या पंधरासोळा मुलांची आपल्या प्रांतातील मिशनकेंद्रांची व्होकेशनल टूर किंवा दैवी पाचारण दौरा आयोजित केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून मी एकटा या दौऱ्यात सामील झालो होतो. दौऱ्याच्या शेवटी पणजीला आल्यावर मिरामार बीचवर हा प्रसंग घडला होता.
एका बाजूला म्हणजे आमच्यासमोरच पणजी आणि कंपालकडून येणारे मांडवी नदीचे विशाल पात्र त्या अथांग सागरात विलीन होत होते आणि दुसऱ्या टोकाला निळ्याभोर आकाशापर्यंत भिडणारे ते पाणी म्हणजेच अरबी समुद्र होता !
माझी तर मती एकदम गुंग झाली होती. शालेय पुस्तकांत समुद्राविषयी कितीही शिकलो होतो तरी समुद्र प्रत्यक्ष पाहण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता.
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर उभे राहण्याची, तेथून तो समुद्र पाहाण्याची ही माझी पहिलीच वेळ. या मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशीच आणि नंतर सान्त इनेजशेजारच्या ताळगावात मी माझ्या आयुष्याची यापुढील तब्बल चौदा वर्षे घालवणार आहे याची तेव्हा मला साधी कल्पनाही नव्हती !
त्यानंतर एक महिन्यानंतर येशूसंघीयांतर्फे नव्यानेच उघडलेल्या लोयोला प्री-नोव्हिशिएट किंवा पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. अशाप्रकारे बीए होईपर्यंत म्हणजे चार वर्षे माझे समुद्रकिनारी वास्तव्य होते.
जून महिन्यात मी मिरामार बीचपाशी राहायला आलो. त्या पहिल्या पावसाळ्यात समोरच्या समुद्राने धारण केलेल्या रुद्र रुपाने खूप भीती वाटायची. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची खूप असायची आणि भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी तर अगदी रस्त्यापाशी आलेले असायचे. रात्री खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा घोघो आवाज झोप उडवायचा.
नंतर काही दिवसातच या समुद्राची भिती गेली, समुद्राचे पाणी कोठे किती खोल, कुठे कमी खोल हे कळायला लागले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोण्याचीं सवय आणि आवड निर्माण झाली.
धेम्पे कॉलेजातच माझे हायर सेकंडरी, पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले. बॉंबे युनिव्हर्सिटीची गोव्यातील आमची शेवटची बॅच. त्यानंतर गोवा युनिव्हर्सिटी स्थापन झाली.
धेम्पे कॉलेजासमोरच आमचे हॉस्टेल होते. पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षभर दर दिवशी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही मुले मिरामार बीचवर फुटबॉल खेळायचो.
तेथील स्वच्छ आणि सफेद मऊ वाळूत हा खेळ खेळताना पायात बूट घालायची गरज भासली नाही. एका बाजूला माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांची समाधी आणि दुसऱ्या बाजूला पाईन वृक्षांचे दाट जंगल यामध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच होती.
त्या मऊ वाळूत पळणे, फुटबॉल खेळवणे किंवा डॉज करणे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मार्क करणे आणि गोलकिपरने चेंडू अडविणे वगैरे सर्वकाही त्या खेळातील नियमांप्रमाणे होई. खेळतांना खाली पडले तरी वाळूमुळे अंग खरचटण्याचे, रक्त येण्याचे प्रमाण वा मोठी जखमा होण्याचे प्रमाण खूप कमी असायचे.
१९७०च्या दशकांत गोव्यात पर्यटकांची संख्या आजच्या इतकी नव्हती. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर कुठल्याही अडथळ्याविना किंवा इतरांना त्रास ना होता दररोज एक तासाचा खेळ होई. फुटबॉल समुद्रात गेला तर तो आणणारा येताना पाण्यात एका डुबकीही घेऊन होई. फुटबॉलची मॅच चालू असताना पाऊस सुरू झाला तर खेळण्याची मजा काही औरच असायची.
युरो फ़ुटबाँल स्पर्धेमुळे पुढील काही दिवसांत फुटबॉल फीवर सर्वत्र चढत जाणार आहे अर्थात गोव्यासारख्या छोट्याशा राज्यातील फुटबॉलप्रेम यापुरते मर्यादित नाही. ते गोमंतकीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे.
गोव्यातील शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात कधीही फुटबॉल खेळली नाही अशी व्यक्ती सहसा सापडणार नाही. अनेक घरांत गिटार वाजविणारी तरुण मुले आणि मुली आणि ज्येष्ठ नागरिकही असतात, त्याचप्रमाणे या छोटयाशा राज्यात घराघरांत फुटबाँलही असतो. गोवा ही चारशे वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीजांची वसाहत होती, त्याचा हा एक परिणाम.
पावसाळा संपला आणि मोकळ्या मैदानांवरचे पाणी जमिनीत जिरले, भाताची शेते मोकळी झाली की मग तेथे सकाळी आणि संध्याकाळी शाळकरी मुले आपल्या कोचसह फुटबॉल खेळू लागतात.
फुटबॉलचा हा सराव कधी आंतरशालेय स्पर्धांसाठी असतो, कधी कुठल्या स्पोर्टस क्लबने आयोजित केलेल्या टुर्नामेंटसाठी असतो. मात्र हे दृश्य तुम्हाला पणजी, म्हापशासारख्या शहरात दिसेल तसेच अंजुना समुद्रकिनाऱ्यापाशी दिसेल किंवा सांता एस्तेव्ह सारख्या बेटावरही दिसते (आता या गावाला काही बाजूंनी पुलाने जोडले गेले असल्याने बेट असण्याचे नावीन्य राहिले नाही).
भाताची कापणी होऊन एखादे शेत मोकळे झाले कि मग मुले फुटबॉल खेळण्यासाठी त्याचा ताबा घेतात. शाळेच्या मैदानांवर तर त्यांचा वर्षभर हक्क असतोच.
कधीकधी ही मुले फुटबॉल शूज, लांब मोजे घालून आलेली असतात तर कधी बूटमोज्याविनाही सराव करताना आढळतात. फुटबॉल डॉज करण्यासाठी, वेडीवाकडी वळणे घेत फुटबॉलशी खेळता यावे यासाठी सरावाची साधने घेऊन आली असतात. त्यांना कोचिंग करणारा तरुण किंवा मध्यमवयीन व्यक्ती त्यांच्या शाळेतले क्रीडाशिक्षक असतात किंवा स्थानिक स्पोर्टस क्लबचे सदस्य असतात.
गोव्यात माझ्या बहिणीकडे गेलो की या शाळेच्या मैदानात किंवा एखादया मोकळ्या झालेल्या पॅडी फिल्डवर मुलांचा फुटबॉलचा सराव पाहणे, कधी एखादा अटीतटीचा सामना पाहणे यात चांगला वेळ जातो. एकूण फुटबॉल हा खेळ अनेक गोमंतकीयांची पॅशन आहे.
पणजी येथील कम्पाला ग्राउंडवर तुम्ही गेलात तर तेथे अनेक जण क्रिकेट आणि फुटबॉल खेळतांना तुम्हाला हमखास सापडतील. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी दूरदृष्टी राखून पणजीतील मांडवी नदीच्या तीरावरील मिरामारपर्यंतचा लांबवरचा पट्टा विविध कला, क्रीडा आणि संस्कृती क्षेत्रांसाठी राखून ठेवला.
त्यामुळे या क्षेत्रांत रस असणाऱ्या गोमंतकीय आणि इतरांचीही खूप सोय झाली. गोव्याची कला अकादमी येथेच आहे.
विशेष म्हणजे कला, क्रीडा आणि संस्कृती या विषयाला वाहिलेल्या अनेक संस्था आणि स्पोर्टस क्लब्स गोव्यात गावोगावी सापडतात. फुटबॉल हा या स्पोर्टस क्लबचा प्रमुख आणि सर्वाधिक लोकप्रिय खेळ असतो. यापैकी अनेक स्पोर्टस क्लब्सना खूप वर्षांचा वारसा आहे. त्यापैकी काही पोर्तुगीज जमान्यातील आहेत.
काही क्लब्सना स्वतःच्या मालकीचे स्पोर्टस ग्राउंड्स आहेत, इमारती आणि कार्यालये आहेत, ग्राउंडवर फुटबॉल, हॉकी किंवा क्रिकेट खेळले जाते आणि इमारतीत विविध इन-डोअर गेम्स खेळले जातात.
गोव्यात घरी सकाळी वृत्तपत्र आले की पहिल्यांदा अगदी शेवटचे म्हणजे क्रीडा पान वाचणारे माझे अनेक मित्र आहेत. गोमंतकीयांसारखे इतके क्रीडाप्रेम भारताच्या काही मोजक्याच राज्यांत आढळेल.
गोव्याच्या या लोकप्रिय खेळास प्रमुख स्थानिक उद्योग कंपन्यांनी, दानशूर व्यक्तींनी आणि धनवानांनी गेली अनेक वर्षे आर्थिक पाठबळ पुरविले आहे. डेम्पो स्पोर्टस क्लब, साळगावकर स्पोर्ट्स क्लब, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा चर्चिल ब्रदर्स वगैरे नामांकित स्पोर्टस क्लब्स गोव्यात आहेत.
या क्लब्ससाठी गोव्यातील फुटबॉलपटू खेळात असतात. त्यामुळे या फुटबॉलपटूंना बिदागी मिळतेच, त्याशिवाय या खेळास आर्थिक पाठबळ मिळून नवी पिढीही या खेळाकडे आकर्षित होते.
गोव्यातील वृत्तपत्रांत फुटबॉलची माहिती असणारा स्पोर्टस रिपोर्टर असणे आवश्यक असते, कारण क्रीडापानांवरील प्रमुख बातम्या या फुटबॉलच्या असतात.
तसे पाहू गेल्यास फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक देशात सर्वाधिक खेळला जाणारा आणि प्रत्यक्ष मैदानावर वा टीव्हीवर पाहिला जाणारा खेळ आहे. त्या तुलनेने क्रिकेट, हॉकी किंवा टेनिस हे खेळ काही ठराविक देशांतच लोकप्रिय आहे. या क्रीडाप्रकारांत प्रावीण्य मिळालेले पेले आणि डायगो मॅराडोना यासारखे अनेक खेळाडू त्यांच्या हयातीतच दंतकथा बनले आहेत.
मात्र भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारतात काही अगदी मोजक्याच राज्यांत फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे आणि त्या राज्यांमध्ये गोव्याचा समावेश होतो. इतर राज्यांमध्ये केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांचा समावेश होतो.
संतोष ट्रॉफी हा या खेळातील देशातील सर्वात मानाचा चषक. तो चषक केवळ या मोजक्या राज्यांत वर्षानुवर्षे फिरत राहिला आहे. त्यांत नव्या राज्यांची भर पडलेली दिसत नाही.
ब्रह्मानंद संकवाळकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या संघाने संतोष ट्रॉफी पहिल्यांदा १९८३ साली जिंकली. ट्रॉफी जिंकून गोव्यात आल्यानंतर ब्रह्मानंद आणि त्यांच्या संघातील खेळाडूंची पणजीत ट्रकमधून मिरवणूक काढली होती. मला आठवते लोक मोठया संख्येने या फुटबॉलपटूंचे स्वागत करण्यास आले होते. ब्रह्मानंद संकवाळकर यांना नंतर देशातील क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतात गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांत फुटबॉलची इतकी क्रेझ असूनही आपला देश आंतराष्ट्रीय स्तरावर या खेळात खूप मागे आहे. जगाच्या नकाशावर टिंबाएव्हढे अस्तित्व असणारे छोटेछोटे देश सध्या चालू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कप स्पर्धेत हिरीरीने भाग घेत आहेत.
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण करणारे काही देश तर या स्पर्धेच्या चषकाचे दावेदार असणाऱ्या देशांनाच आव्हान देताना दिसत आहेत.
यापैकी अनेक देशांची नावे प्रेक्षक पहिल्यांदाच ऐकत असतील. गेली अनेक वर्षे भारत मात्र या महत्त्वाच्या स्पर्धेत पात्रताफेरीतच बाद होतो,
युरो फुटबॉल कप आज रात्री 12.30 पासून सुरू
आता पुढील काही दिवस मी फ़ुटबाँल मॅचेस पाहणार आहे.

Wednesday, June 26, 2019

कामगार चळवळीतील डाव्यांची पोकळी कोण भरून काढणार?

कामगार चळवळीतील डाव्यांची पोकळी कोण भरून काढणार?
पडघम - राज्यकारण 
कामिल पारखे
  • कामगार चळवळीचं एक चित्र, मुंबईच्या हुतात्मा चौकातील स्मारक आणि सीपीएमचे ध्वज
  • Wed , 26 June 2019
  • पडघमराज्यकारणकामगार चळवळकम्युनिस्ट पक्षडावे पक्षवेतनहक्करजाश्रेणी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना त्यांच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात एकही जागा जिंकता आली नाही. केरळमध्ये डावी आघाडी सत्तारूढ असूनही तिथे काँग्रेसने लोकसभेच्या अधिक जागा जिंकण्यात बाजी मारली. त्रिपुरातही डावे पक्ष सत्तेतून पायउतार झाले आहेत. देशभर पुरोगामी चळवळीतल्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कन्हैय्या कुमारचा बिहारमध्ये भाकपच्या बालेकिल्ल्यात पराभव झाला! डावे पक्ष आणि डाव्या संघटना देशातून लवकरच नामशेष होतील अशी सध्या चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर डाव्या पक्षांनी देशभर आणि जगातही कामगार वर्गाच्या हितासाठी, कल्याणासाठी उभारलेल्या यशस्वी लढ्याच्या योगदानाची साहजिकच आठवण येते. भले राजकीय सत्तेसाठी लोक काँग्रेस वा इतर पक्षांची निवड करत असत, तरी कामगारांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी डावे आणि समाजवादी नेतेमंडळीच धावून येणार हे अगदी ठरलेले असायचे. डाव्या पक्षांचे आणि पर्यायाने त्यांनी चालवलेल्या विविध कामगार संघटनांचे अस्तित्व हळूहळू नाहीसे होत आहे, ही कामगारांच्या दृष्टीने निश्चितच काळजी करण्यासारखी बाब आहे.
जगभरच डाव्यांची, समाजवाद्यांची आणि इतर पुरोगामी संघटनांची सगळ्याच क्षेत्रांत पिछेहाट होत असताना विचारसरणीच्या अनेक संस्था-संघटनांना ‘अच्छे दिन’ आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि क्षेत्र पसरत चालले आहे. अशा परिस्थितीत डाव्यांना समर्थ पर्याय म्हणून कामगारांच्या हितासाठी लढणारी कुठलीही संघटना आज दिसत नाही. उजव्या विचारसरणीत कामगार हिताला बिलकूल महत्त्व नाही, केवळ मालकांचेच हित आणि नफेखोरीलाच प्राधान्य द्यायला हवे, असाच संदेश सध्याची परिस्थिती देते आहे. 
गेल्या शतकात अनेक दशके एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन जगभरातील कामगार मंडळी आणि कामगार संघटना अतिशय उत्साहाने साजरा करत असत. या आंतरराष्ट्रीय दिनाचा सोहळा सर्वांत अधिक थाटामाटाने साजरा होई तो जगातील पहिली साम्यवादी क्रांती झालेल्या रशियातील मॉस्को शहरातील लाल चौकात आणि चीनमधील बीजिंग शहरात ! राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांच्या आणि हजारो नागरिकांच्या हजेरीत पार पडणारा हा सोहळा अगदी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याइतका महत्त्वाचा गणला जायचा. जगातील अनेक देशांत कम्युनिस्ट राजवटीचा पोलादी पडदा शतकाअखेरीस गायब झाला. त्याआधीच म्हणजे १९८६ साली हा आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा सोहळा बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पाहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट्स या कामगार संघटनेचा सरचिटणीस या नात्याने रशिया दौऱ्याची आणि बल्गेरियात पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली होती. कामगार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारा तो मेळावा आणि तेथील सैन्याच्या कवायतीमुळे मी अगदी भारावून गेलो होतो.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाला साम्यवादी जगात म्हणजे रशिया, चीन आणि पूर्व युरोपातील देशांत, डाव्यांच्या आणि समाजवाद्यांच्या चळवळीतच अधिक महत्त्व दिले जायचे. “जगातील कामगारांनो, एक व्हा! तुम्हाला तुमच्या शृंखलांशिवाय म्हणजे गुलामगिरीशिवाय इतर काहीही गमवायचे नाही!!” असा स्पष्ट नाराच कार्ल मार्क्सने दिला होता. त्यामुळे भांडवलशाहीचे प्रस्थ असलेल्या पश्चिम युरोपात आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रांत आंतरराष्ट्रीय कामगार दिनाला राष्ट्रीय सणासारखे महत्त्व दिले जाणे शक्यच नव्हते. मात्र या देशांतही डाव्या संघटनांच्या आणि इतरानाही चालवलेल्या कामगार चळवळीत एक मे च्या कामगार दिनाला महत्त्वाचे स्थान होतेच.
भारतातही तशीच परिस्थिती होती. देशात आणि महाराष्ट्रात त्या काळी काँग्रेसची सत्ता असली तरी कामगार चळवळीवर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (भाकप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप), समाजवादी पक्षांची आणि काँग्रेसचीही मजबूत पकड होती. भाकपची आयटक, माकपची सिटू, काँग्रेसची इंटक,  पूर्वाश्रमीच्या जनसंघाची आणि आताच्या भाजपची भारतीय मजदूर संघ आणि समाजवाद्यांची हिंद मजदूर सभा अशा कामगार संघटना सक्रिय होत्या. महाराष्ट्रात आणि देशभरातही एकेकाळी कामगार संघटनांवर लाल बावट्याचे म्हणजे कम्युनिस्टांच्या लाल झेंड्याचेच अधिराज्य असायचे. जॉर्ज फर्नांडिस, एस. एम. जोशी वगैरे समाजवादी नेतेही कामगार संघटनांच्या लढ्यात आघाडीवर होते. संरक्षण खात्यातील नागरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे नेतृत्व एस. एम. जोशी आणि इतर समाजवादी नेत्यांकडे अनेक वर्षे होते. 
कम्युनिस्टांच्या या क्षेत्रातील आघाडीच्या भूमिकेमुळे कामगार संघटना म्हणजेच कम्युनिस्टांच्या क्रांतीचे निशाण असणारा लाल झेंडा असे एक समीकरण झाले होते. एके काळी मुंबईत कॉम्रेड डांगे यांची आयटक संघटना कामगार चळवळीत आघाडीवर होती. भारतीय मजदूर संघ ही दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेली संघ परिवारातील कामगार संघटना नंतर डाव्यांना एक पर्याय म्हणून उभी राहिली होती. 
शिवसेनेनेसुद्धा मुंबईतील कामगार चळवळीत शिरून या क्षेत्रातील डाव्यांची मक्तेदारी संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अलिकडच्या काळात शिवसेनेने मुंबईत आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतसुद्धा कामगार चळवळीतून अंग काढून घेतल्यासारखे दिसत आहे. कामगार चळवळीत डॉ दत्ता सामंत यांनीही एकेकाळी मुंबईत आणि महाराष्ट्राच्या काही भागांत कामगार चळवळीची एक मोठी ताकद निर्माण केली होती.
या सर्वच कामगार संघटना कामगारांच्या हितासाठी भांडत असत. वार्षिक पगारवाढ, वेतनवाढीचे करार, पगारी सुट्ट्या, कायम नोकरी, विविध भत्ते, कामगारांचे निलंबन किंवा बडतर्फी, कामाचे तास आणि कामाच्या जागी दिल्या जाणाऱ्या सुविधा यासाठी या कामगार संघटना विशेष जागरूक असत. अगदी १९९० दशकापर्यंत बहुतेक सर्वच मोठ्या सार्वजनिक आणि खासगी कंपन्यात कामगार संघटना अधिकृतरीत्या काम करत असत, व्यवस्थापनातर्फेही त्यांना अधिकृत मान्यता दिली जात असे, ठराविक काळानंतर वेतनवाढीचे करार या कामगार संघटनेशी केले जात असत. घसघशीत पगारवाढ असलेल्या या त्रैवार्षिक वेतनकराराच्या व्यवस्थापनाकडून वा कामगार संघटनांकडून आलेल्या बातम्या आम्ही पत्रकार आवर्जून छापायचो. काही गंभीर समस्या असली तर या कामगार संघटना संपाची नोटीस देत कंपन्या टाळेबंदीची नोटीस काढत असत. विशेष म्हणजे हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहून होत असे. कामगार आयुक्तांचे प्रतिनिधीही कामगारांच्या आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींशी औद्योगिक तंटे मिटविण्यासाठी बैठक घेत असत.
भारतातील विविध प्रमुख शहरांतील आम्हा पत्रकारांच्या आणि वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या संघटनांवरही डाव्या पक्षांच्या नियंत्रण असायचे. सिटू या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र कर्मचाऱ्यांनी झगडून पालेकर, बच्छावत वगैरे वेतन आयोगाची स्थापना करायला लावली आणि नंतर या आयोगांच्या शिफारशींच्या अमंलबजावणीसाठीही लढे दिले. अशाच प्रकारे इतर क्षेत्रातील कामगारांना डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांनी संघटीत केले आणि त्यांच्या हिताचे संरक्षण केले. काही दशकांपूर्वी कुठल्याही औद्योगिक पट्ट्यात काही कंपन्यांच्या प्रवेशदारापाशीं लाल बावटे घेऊन निदर्शने करत असलेले कामगार हमखास दिसायचे. या कामगार युनियन्सच्या अवास्तव मागण्यांमुळे, संपांमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असेही घडले.
देशातील विविध उद्योगकंपन्यांतील कामगारांना संघटीत करण्यात, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात आणि त्यासाठी संघर्ष करून हे हक्क मिळवून देण्यात इतरांपेक्षा डाव्यांनी फार मोठे योगदान केले आहे. मात्र हे करत असताना डावे पक्ष मुंबईत आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतही केरळ आणि पश्चिम बंगालप्रमाणे राजकीय सत्ता मात्र मिळवू शकले नाही.
काही वर्षांपूर्वी आपल्या देशात आणि जगाच्या इतर भागांतही उदार अर्थव्यवस्था अस्तित्वात आली, खासगी कंपन्यांवरील सरकारी नियंत्रणे कमी होत गेली आणि कामगार संघटनांचे अस्तित्व लोपू लागले. गेल्या काही वर्षांत अनेक खाजगी क्षेत्रात व्यवस्थापनांनी कामगार संघटनांचे अस्तित्वच नाकारले आहे. कामगारांचा संघटित होण्याचा कायदेशीर हक्कच आज कुणी मान्य करत नाही. त्यामुळे कामगार युनियन्स स्थापन होण्याची प्रक्रियाच बंद झाली आहे. वार्षिक पगारवाढ, दर तीन वर्षानंतर होणारे वेतन करार, बाळंतपणाची हक्काची पगारी सुट्टी वगैरे कायदेशीर बाबी आता दुर्मीळ होत चालल्या आहेत. दर दिवसाचे कामाचे फक्त आठ तास आणि अधिक तास काम केल्यास ओव्हर टाइम हे नियम आता कुठल्याच खासगी कंपनीत पाळले जात नाहीत. सकाळी कामावर वेळेवर जाणारा कर्मचारी आणि अधिकारी रात्री कधी घरी परतेल याची कुणालाच खात्री नसते. शिवाय कर्मचाऱ्याने घरूनही काम करावे, मोबाईलवर संपर्कांसाठी कायम उपलब्ध असावे अशी अपेक्षा असते. 
आमच्या पिंपरी-चिंचवड शहरात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नावाने महापालिकेने एक संकुल उभारले आहे, भारतातील या आद्य कामगार नेत्याने ब्रिटिश काळात कामगारांचे दरदिवसाचे कामाचे तास मर्यादित असावे आणि त्यांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी म्हणून यशस्वी लढा उभारला होता. आजच्या कामगारांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे सतत वाढत जाणारे कामाचे तास, त्यांचे कायदेशीर हक्क आणि सोयी-सुविधांत सतत होणारी कपात पाहता कामगारांच्या कल्याणसुविधा आणि हक्कांबाबत सुधारणा होण्याऐवजी पिछेहाट होते कि काय असाच संशय येतो. हल्ली महिलांना सहा महिन्यांची बाळंतपणाची रजा मिळते. त्यामुळे काही कंपन्यांत गर्भवती महिलांना ही हक्काची आणि पूर्णपगारी रजा देण्याऐवजी त्यांना राजीनामा देण्यास भाग पडले जाते. या कारणामुळे अविवाहित व नवविवाहित महिलांना नोकरी देणे किंवा नोकरीत नियमित करणे टाळले जाते, असेही दिसून येते.
आज सर्वच क्षेत्रांतील कर्मचाऱ्याना प्रॉव्हिंडट फंडाशी निगडीत असलेले निवृत्तीवेतन दिले जाते. २०-२५ वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांस निवृत्तीनंतर महिना दोन-तीन हजार रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते! मात्र एकदा खासदार म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीला आयुष्यभर लाखो रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते. याचे कारण सर्वपक्षीय खासदार, आमदार आणि इतर लोकनियुक्त प्रतिनिधी आपले स्वतःचे वेतन आणि भत्ते वाढवून घेण्यासाठी पक्षभेद विसरून संघटीत होतात. नजिकच्या काळात आपल्या हितासाठी कामगार संघटीत होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे वेतनवाढीसाठी, वेतनवाढ करारासाठी आणि निवृत्तीवेतनाच्या या त्रुटी आणि तफावतीविरुद्ध भांडणार कोण?