Showing posts with label Jesus Christ. Show all posts
Showing posts with label Jesus Christ. Show all posts

Thursday, March 26, 2026


पेशवाई अखेरच्या टप्प्यात असताना आणि अव्वल इंग्रजी अमदानीच्या अगदी सुरुवातीच्या काळात भारतात इंग्रजी आणि मराठी शाळा स्थापन करून, मराठीतील पहिले पाठ्यपुस्तक लिहिण्याचा, आधुनिक शिक्षणपद्धतीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान या अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांच्याकडे जातो.

केवळ ४१ वर्षे आयुष्य लाभलेल्या गॉर्डन हॉल यांचा महाराष्ट्रातील मिशनकार्याचा कालावधी अवघा बारा वर्षांचा होता.
मात्र या काळात ख्रिस्ती धर्माची पताका फडकावत त्यांनी येथील समाजाच्या सर्व घटकांना म्हणजे बहुजन, अस्पृश्य तसेच स्त्रियांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. अशा प्रकारे सार्वत्रिक शिक्षणाने भारतात समाजक्रांतीचे एक नवे पर्व सुरु केले.
गॉर्डन हॉल यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्ष अलीकडेच २० मार्च २०२६ पासून सुरु झाले आहे.
अमेरिकेतून निघालेल्या गलबतातून मुंबई बंदरात दिनांक १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाऊल ठेवलेल्या गॉर्डन हॉल आणि अमेरिकन मराठी मिशनच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच मराठी भाषा शिकणे सुरु केले आणि मग मुंबईत शाळाही सुरु केल्या.
हे मिशनरी भारतात आले तेव्हा येथील लिखाणा-वाचनाबाबत आणि एकूण मराठी साहित्याची स्थिती काय परिस्थिती होती याचे रेव्हरंड हेन्री जे ब्रूस यांनी पुढील शब्दांत वर्णन केले आहे:
``आमचे पहिले मिशनरी मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांना दिसले कि स्थानिक लोकांनी तोपर्यंत पाश्चात्त्य संस्कृतीचा कसलाही प्रभाव अनुभवलेलाच नव्हता. मुंबईत एकही स्थानिक छापखाना नव्हता, तसेच कोणतेही स्थानिक नियतकालिकही अस्तित्वात नव्हते.
मराठी भाषेत जे थोडेफार साहित्य उपलब्ध होते, ते मुख्यतः पुराणे, महाभारत आणि इतर पवित्र ग्रंथांमधील कथांचे भाषांतर होते. त्यामध्ये राम, कृष्ण आणि इतर देवतांच्या कथा होत्या.
काही स्थानिक राजांच्या ऐतिहासिक आठवणी (चरित्रात्मक लेखन) देखील होत्या. हे तसेच पवित्र ग्रंथांवरील भाषांतरे बहुतांश काव्यरूपात लिहिलेले होते.
याशिवाय काही मूळ कविता होत्या. या सर्वांनी मिळून त्या काळातील साहित्याचा मोठा भाग बनवला होता. जशी पुस्तके कमी होती, तसेच वाचकही कमी होते.’’
आधुनिक काळातील या आद्य मिशनरींना मराठी भाषा शिकण्यात अनेक अडचणी आल्या. याचे कारण म्हणजे तोपर्यंत मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करण्यात आले नव्हते.
याविषयी रेव्हरंड ब्रूस यांनी लिहिले आहे :
``या मिशननरींना स्थानिक मराठी भाषा शिकण्यासाठी व्याकरणे आणि शब्दसंग्रह यांच्या स्वरूपात फारशी, किंबहुना काहीही मदत उपलब्ध नव्हती. एखादया फारसे अनुभव आणि कौशल्य नसलेल्या पंडितासोबत बसून त्यांना शब्दांचे अर्थ आणि वाक्यरचनेचे प्रकार याविषयी तोंडी मार्गदर्शन घ्यावे लागत असे. भाषेचे खरे नियम त्यांना केवळ दीर्घकालीन आणि संयमी तुलना व सामान्यीकरण यांच्या माध्यमातूनच समजू शकत असतात.’’
मिशनच्या सुरुवातीच्या नोंदींमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या शाळांविषयी वेगवेगळ्या कागदपत्रांत, अहवालांत माहिती आढळते. मुंबईत मिशनकार्य करण्याची परवानगी मिळाल्यानंतर गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांनी लगेचच इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्रकारच्या शाळा सुरू केल्या.
रेव्ह. सॅम्युएल बी. फेअरबँक यांनी गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांच्याबद्दल पुढील शब्दांत लिहिले आहे :
``गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांना मुंबईत राहू दिले जाईल याबद्दल शाश्वती नसली त्यांनी मराठी शिकण्यास तातडीने सुरुवात केली. सन १८१४ च्या अखेरीपूर्वी त्यांनी एक शाळा सुरू केली. ‘’
मे १८१५ मध्ये या मिशनरींनी स्थानिक मुलांसाठी असलेल्या एका शाळेचा उल्लेख केला आहे. तीच पहिली आणि एकमेव शाळा होती.
त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या दिनदर्शिकेत असे नमूद आहे :-
“आमची शाळा हळूहळू वाढत आहे. सध्या त्यात सुमारे २५ मुले आहेत. ‘सुमारे’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची उपस्थिती इतकी अनियमित आहे की ते कधीच एकाच वेळी सर्व उपस्थित नसतात.
आम्हाला या शिक्षणकार्यात मदत करु शकेल आणि शिकवण्याच्या मुख्य कामातून आम्हाला थोडाफार दिलासा देईल असा योग्य सहाय्यक लवकर मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
सध्या तरी आम्ही दररोज सुमारे पाच तास शाळेत घालवतो आणि हा वेळ आपापसांत वाटून घेतो.”
सन १८१५च्या वर्षाच्या अखेरीस हॉल आणि नॉट यांनी शाळेत दोन ब्राह्मण शिक्षकांची नेमणूक केली होती. एका दिनदर्शिकेत पुढीलप्रमाणे लिहिले आहे:
“पंचवीस मुलांची एक इंग्रजी शाळा आहे आणि ब्राह्मणांनी चालवलेल्या दोन स्थानिक शाळांत सुमारे ४० विद्यार्थी आहेत.”
पुढील वर्षात आणखी काही शाळा सुरू करण्यात आल्या. एका अहवालात नोंद आढळते कि मिशनरींच्या देखरेखीखालील शाळांमध्ये जवळपास ३०० मुलांना शिक्षण दिले जात होते. सन १८१८मध्ये ११ शाळांची माहिती देण्यात आली असून या शाळांत ६०० मुलांची नियमित उपस्थिती होती.
तीन वर्षांनी एकूण २५ शाळा सुरू होत्या; परंतु निधीअभावी त्यांना काही काळासाठी त्यांपैकी १० शाळा बंद कराव्या लागल्या. मात्र १८२३ मध्ये त्यांच्या एकूण २६ शाळा होत्या आणि त्यामध्ये १,४५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत होते.
या शाळांबद्दल पुढील एक नोंद आहे: :-
“आमच्या या शाळा आम्हाला अपेक्षित अशा नसल्या तरी त्या आम्हाला प्रोत्साहन आणि आशा देत आहेत. स्थानिक लोकसंख्येवर य शाळांचा प्रभाव जरी शांत आणि सहज वर्णन करता येणार नाही असा असला, तरी तो सतत, व्यापक आणि आमच्या मिशनच्या उद्दिष्टांसाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे.
आम्हाला स्थानिक लोकांकडून पुढीलप्रकारचे उद्गार ऐकायला मिळतात : ‘प्रौढ लोकांना दुसरा धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करता येत नाही; परंतु धार्मिक शाळांमध्ये शिकणारी मुले ख्रिस्ती होतील, आणि अशा प्रकारे शेवटी सर्व लोक ख्रिस्ती होतील.’
आम्ही या मताशी सहमत नसूनही, या शाळांना एक महत्त्वाचे साधन मानतो आणि आमच्या आजूबाजूला आणखी बऱ्याच शाळा सुरू करता याव्यात अशी आमची तीव्र इच्छा आहे.
आमच्या शेवटच्या बैठकीत आम्ही आणखी शाळांसाठी आलेल्या तेरा अर्जांचा विचार केला; पण साधनसामग्रीच्या अभावामुळे आम्हाला ते नाकारावे लागले.”
या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ११६ ज्यू मुलांचाही समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व शाळा मुंबईतच नव्हत्या; त्यांपैकी अनेक शाळा कोकणातील खेड्यांमध्ये होत्या.
कोकणात गॉर्डन हॉल नियमितपणे वारंवार दौरे करत आणि या शाळांना भेट देत असत.
आपण सुरु केलेल्या या शाळांत शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके हवीत म्हणून त्यांनी धार्मिक पुस्तकांबरोबरच पाठ्यपुस्तकेही लिहिली. छापखाने सुरु करुन या पुस्तकांची छपाई केली.
आपल्या धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून गॉर्डन हॉल यांनी मराठीत अनेक पुस्तके लिहिली आणि छापली आहेत. ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांशिवाय अमेरिकन मिशनच्या शाळांसाठी हॉल यांनी तीन मराठी पाठ्यपुस्तके लिहिली आहेत.
आधुनिक शिक्षणपद्धतीतील मराठी भाषेतील ही पहिलीच पाठ्यपुस्तके.
गॉर्डन हॉत ` लेकरांची पहिली पोथी (First Book of Children) हे सोळा पानांचे पुस्तक १८१८ साली छापण्यात आले. अमेरिकन मिशन मालेमधील हे पहिल्या क्रमांकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक एका बाजूला बालबोधमध्ये व दुसऱ्या बाजूला मोडी लिपीत छापले होते.
या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी निघाल्या व या सर्व आवृत्या मिळून दहा लाख तरी प्रती सपल्या असतील, असा रे. ब्रूस यांचा अंदाज आहे. या पुस्तकाच्या १८२८ व १८२९ साली स्कॉटिश मिशनरींच्या कोकणातील बाणकोट मिशनने दोन आवृत्त्या काढल्या.
ट्रॅक्ट सोसायटीनेसुद्धां १८३०, १८३१, १८३२, १८३३, १८२४ १८३५ साली सहा आवृत्त्या काढल्या. पुढे १८३७, १८४१ व १८४४ मध्ये बालबोध व मोडी लिपीत हे पुस्तक प्रकाशित करण्यांत आले असे श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या ग्रंथात नमूद केले आहे.
त्या दोघांनी १८१६ मध्ये बायबलच्या नव्या करारातील अनेक पुस्तके अनुवादित केली, मराठी भाषेत काही लघुपत्रके (ट्रॅक्ट्स) तयार केली.सन १८१७ मध्ये त्यांनी आठ पानांचे एक धर्मग्रंथावर आधारित पत्रक आणि संत मॅथ्यूच्या शुभवर्तमानावर लेखन छापले.
हॉल आणि न्यूवेल सॅम्युएल यांनी १८१८ च्या उत्तरार्धात कोकणात अनेक ठिकाणी प्रवास केले. त्यांनी समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे शंभर मैलांपर्यंत असलेल्या शहरांना आणि गावांना भेटी दिल्या, तेथली माहिती गोळा केली, पुस्तके वाटली आणि संधी मिळेल तिथे सुवार्ता धर्मप्रचार केला.
फेअरबँक लिहितात कि हीच ती प्रारंभीची नोंद आहे जी मला त्यांच्या मिशनकार्याच्या तीन मुख्य विभागांबद्दल आढळते.
``प्रथम आले शिक्षण. दुसरे आले प्रचारकार्य आणि तिसरे म्हणजे मराठी भाषेत पवित्र शास्त्रांचे आणि ख्रिस्ती साहित्याचे लेखन, मुद्रण आणि प्रसार.''
चौथा महत्त्वाचा विभाग म्हणजे वैद्यकीय उपचार आणि औषधोपचार. अगदी सुरुवातीपासूनच आमच्या मिशनरींनी आपल्या गुरूचे म्हणजे येशू ख्रिस्ताचे अनुकरण करत आजारी लोकांचे उपचार केले.
याचे उदाहरण गॉर्डन हॉल यांच्या पुढील प्रसंगातून दिसते.''
गॉर्डन हॉल दिनांक १५ मार्च १८२६ रोजी नाशिक येथे पोहोचले. त्यांनी लगेचच धर्मप्रवचन सुरू केले आणि पुस्तके वाटण्याचे काम हाती घेतले.
त्या वेळी तेथे कॉलऱ्याची साथ होती. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या हॉल यांनी त्यांनी आजारी लोकांना औषधोपचार केला. काही काळाने त्यांच्याकडील पुस्तके आणि औषधे संपली.
दिनांक १८ मार्चला त्यांनी मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला.
सिन्नरजवळ दोडी दापूर येथे त्यांनाही कॉलऱ्याची लागा झाली होती. तिथेच त्यांचे निधन झाले.
गॉर्डन हॉल यांचे निधन हे अमेरिकन मिशनला मोठा धक्का होता. मात्र त्यामुळे अमेरीकन मिशन बोर्डाचे येथील काम थांबले नाही. त्यानंतर अमेरीकेतून अनेक मिशनरी भारतात येत राहिले, धर्मप्रसाराबरोबरच येथे शिक्षणकार्य आणि सामाजिक कार्य करत राहिले.
हॉल यांच्या निधनानंतर पुढल्याच वर्षी म्हणजे १८२७ साली पहिल्या अमेरिकन अविवाहित महिला मिशनरीचे मुंबईत आगमन झाले.
या मिस सिंथिया फरार यांच्या अहिल्यानगर येथील तब्बल तीन दशकांच्या शिक्षणकार्याची आतापर्यंत आपल्याला ओळख झालेली आहेच.

Camil Parkhe March 25, 2026


Friday, December 6, 2024

 कुठल्याही प्रार्थनास्थळाच्या आवारात संबंधित देवदैवतांच्या तसबिरी आणि धर्मग्रंथांतील वचने असतात. काल या देवळाच्या प्रशस्त आवारात शिरलो अन डाव्या बाजूला या कोनशिलावजा फलकाकडे लक्ष गेले आणि मी चमकलो.

तो फलक पाहून मी चमकलो, याचेही मला नंतर आश्चर्य वाटले.
याचे कारण म्हणजे या मंदिराच्या स्थापनेपासुन म्हणजे गेली तीस वर्षे मी तिथे वेळोवेळी जात आलेलो आहे. दादाबाई असताना घरच्यांना भेटण्यासाठी येथे माझे कायम येणेजाणे असायचे.
रविवारच्या मिस्सेसाठी या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी शहरातील हे दुसरे चर्च बांधण्यात आले आहे.
अलिकडच्या काळात जेथेजेथे मी गेलो तिथेतिथे हा फलक पाहून त्याभोवती फोटो काढण्याचा मला मोह झाला आहे. उदाहरणार्थ, पुण्यातील नव्या पेठेतील एस एम. जोशी स्मारकातील भारतातील राज्यघटनेच्या प्रास्तविकेचा हा फलक.
दर पंधरा ऑगस्टला चर्चमध्ये गायला जाणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतील ती प्रसिद्ध ओळसुद्धा या फलकावर कोरली आहे,
प्रागतिक विचारसरणीच्या संस्थांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्तविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करावा, लोकांमध्ये याबाबत जाणिव निर्माण करावी यात काही विशेष नाही.
त्यांच्या मूलभूत उद्दिष्ट्यांचा तो एक भाग असतो.
असेच कार्य करण्यासाठी लोयोला दिव्यवाणी चर्चच्या आवारात अगदी प्रवेशद्वारातच येशू ख्रिस्ताची प्रतिमा किंवा बायबलच्या वचनांऐवजी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत मांडलेल्या लोकशाही देशाच्या आदर्श तत्त्वांचा पुरस्कार करावा याचे मला सद्याच्या वातावरणात विशेष कौतुक वाटले.
गेल्या तीस वर्षांच्या काळात या अतिपरिचित फलकाच्या अस्तित्वाची मला कधी जाणिवही का झाली नाही याचेही मला लगेच उत्तरही मिळाले.
Where the mind is without fear
and the head held high;
Into that heaven of freedom,
my Father, let my country awake.
^^
Camil Parkhe, November 11, 2024

Tuesday, September 3, 2024

 

या चित्राचा संदर्भ काय आहे, हे कितीजण चटकन सांगू शकतील?

इतर कुठल्याही धर्मग्रंथांप्रमाणे बायबलमध्ये सुद्धा स्त्रियांना गौण किंवा नगण्य स्थान आहे. संपूर्ण बायबलमध्ये म्हणजे जुन्या आणि नव्या करारांत स्त्रियांची पात्रे क्वचितच आढळतात.
अनेकदा या पात्रांना स्वतःचा चेहेरा, नावगाव म्हणजे ओळखसुद्धा नसते. अमुक याची आई, तमुकची पत्नी, एलीया या संदेष्ट्याला ऐन दुष्काळात तेल आणि पीठ पुरवणाऱ्या स्त्रीची ओळखसुद्धा शेवटपर्यंत `एक गरीब विधवा' अशीच राहते.
पहिला मानव. असलेल्या आदामची सहचारिणी इव्ह, लहानग्या मोझेसचा जीव क्लुप्तीने वाचवणारी त्याची आई आणि बहिण, रुथ, राणी इस्थेर अशा काही मोजक्या स्त्रियांना थोडेफार स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
नव्या करारात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आगमनानंतरच्या भागातसुद्धा काही मोजक्याच स्त्रियांची पात्रे येतात.
येशूची आई मारीया, सेंट जॉन द बॅप्टिस्टची आई एलिझाबेथ. मेरी माग्दालेन आणि कुकर्म करत असताना पकडलेली आणि त्यामुळे मॉब लिंचिंगची बळी होऊ शकणारी एक स्त्री येशूमुळे वाचते.
त्याचे कारण म्हणजे `तुमच्यापैकी जो कुणी निष्पाप असेल त्याने हिच्यावर पहिला धोंडा उचलावा' असा येशूचा त्या झुंडशाहीला सल्ला असतो.
येशूच्या बारा शिष्यांमध्ये एकही स्त्री नाही. त्याचप्रमाणे नव्या ख्रिस्ती मंडळींना पत्रे लिहून ख्रिस्ती धर्मतत्त्वांची मांडणी करणाऱ्या सेंट पॉल, सेंट पिटर वगैरे व्यक्तींमध्येही एकाही महिलेला जागा नाही.
`बायबलमधील स्त्रिया' या एकाच शिर्षकाची मराठीत अलीकडेच दोन नवी पुस्तके आली आहेत.
एक आहे सरोजिनी नीलकंठ साळवी यांनी लिहिलेले. (चेतक बुक्स, पुणे ) आणि दुसरे आहे डॉ. अनुपमा निरंजन उजगरे, वर्णमुद्रा प्रकाशनने प्रकाशित केलेले.
तर `या चित्रातील दोन महिला कोण आहेत ' या प्रश्नांचे उत्तर बायबल अगदी थोडेफार माहित असलेल्या व्यक्तीला अगदी सहज देता येईल. .
या दोघी बहिणी आहेत मारिया आणि मार्था. दोन प्रसंगांत या दोन बहिणींचा येशूच्या चरित्रात म्हणजे गॉस्पेलमध्ये होतो.
वरील चितारलेल्या प्रसंगाचे फादर फ्रान्सिस दिब्रिटोकृत `सुबोध बायबल'मध्ये खालील शब्दांत वर्णन आहे :
``प्रवास करीत असता येशू बेथानीला आला, तिथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले, तिला मारीया नावाची बहीण होती. ती प्रभूच्या चरणी बसून त्याची अमृतवाणी ऐकत होती.
स्वयंपाकघरात मार्थाला पाहुणचाराचे पुष्कळ काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली. ती येशूकडे येऊन त्याला म्हणाली "प्रभुजी, माझ्या बहिणीने कामाचा सगळा भार माझ्या एकटीवर टाकला आहे. ह्याचे आपल्याला काहीच वाटत नाही काय? मला मदत करायला तिला सांगा ना:"
प्रभुने तिला उत्तर दिले, ' मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. मारीयेने जे चांगले आहे, त्याची निवड केली आहे. ते तिच्यापासून हिरावून घेतले जाणार नाही.''
हे झाले या पोस्टमध्ये दिलेल्या या चित्राविषयी.
आता या चित्राच्या चित्रकर्तीविषयी.
भारतात आणि जगातही फार कमी संख्येने महिलांनी चित्रकलेत नाव कमावले आहे.
भारतातल्या पहिल्या काही चित्रकर्तींमध्ये मूळ गोव्याच्या असलेल्या अँजेला त्रिंदाद (१९०९-१९८०) यांचा समावेश होतो.
ब्रिटिशकाळात बंगाल स्कुल ऑफ आर्ट आणि मुंबई स्कुल ऑफ आर्ट या दोन कलाशाखा उगमास आल्या, त्यापैकी अँजेला त्रिंदाद या मुंबई स्कुल परंपरेतील.
मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्टची स्थापना १८५७ ची.
मुंबईत जन्मलेल्या अँजेला यांनी भारतीय परंपरेतील म्हणजे भारतीय प्रतिमांचा वापर करुन ख्रिस्ती धर्मसंकल्पनांतील अनेक चित्रे रेखाटली.
हे चित्र यापैकी एक.
साधना बहुलकर यांनी लिहिलेल्या `बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार (१८५७-१९५०)' या पुस्तकाचे (राजहंस प्रकाशन, २०२१) मुखपृष्ठ आहे.
या पुस्तकात साधना बहुळकर यांनी अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, दुर्गा भागवत यांच्या बहीण विमल भागवत गोडबोले, मारी हेंडरसन - टेंपल, मरदा नाखमन -आचार्य, अमृता शेरगील वगैरे महिला चित्रकारांच्या जीवन आणि चित्रकलाविषयी लिहिले आहे.
ख्रिस्ती धर्मपरंपरा आपल्या चित्रांत भारतीय प्रतिमांसह म्हणजे पूर्णतः भारतीय शैलीत आणणाऱ्या चित्रकार अँजेला त्रिंदाद यांचे फार मोठे योगदान आहे.
Camil Parkhe

Monday, April 1, 2024

मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट''

`द लास्ट सपर' किंवा `येशूचे शेवटचे भोजन या विषयाने जगभरातील चित्रकारांना आकर्षित केले आहे.
लिओनार्दो दा व्हिन्सी याने रेखाटलेले ते प्रसिद्ध चित्र किंवा त्या चित्राची प्रतिकृती ख्रिश्चनांच्या घरात विशेषतः डायनिंग टेबलाच्यावर भिंतीवर असतेच.
माझ्याही घरात आहेच.
गुड फ्रायडेला क्रुसावर दुःखसहन करून देहत्याग करणाऱ्या ख्रिस्ताने आपल्या बारा शिष्यांसह आज पवित्र गुरुवारी ( Maundy Thursday) संद्याकाळी आपले `शेवटचे भोजन' केले. `The Last Supper '
त्यावेळी ज्युडास इस्किर्योत हा त्याचे चुंबन घेऊन विश्वासघात करणारा शिष्यसुद्धा होता.
त्यावेळचे येशू आणि त्याच्या शिष्यांचे चित्रण करण्याचे आव्हान चित्रकारांसमोर असते.
जेवणासाठी बसण्याची आसनव्यवस्था, बाराही शिष्यांचे ओळख पटण्यासारखे चित्रण आणि 'तुमच्यापैकी एक जण आता माझा विश्वासघात करणार आहे' हे येशूने सांगितल्यावर या शिष्यांमध्ये उमटणारी अस्वस्थता लिओनार्दो द व्हिन्सीने The Last Supper ' या चित्रात उत्तमरीत्या सादर केली आहे.
भारतातील अनेक चित्रकारांनी `द लास्ट सपर' रेखाटण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे.
मकबूल फिदा (एम. एफ.) हुसेन, जेमिनी रॉय, फ्रान्सिस न्युटन सोझा, अँजेलो दा फोन्सेका वगैरेंनी.
ही सर्व चित्रे अर्थातच भारतीय शैलीत म्हणजे भारतीय प्रतिमांसह आहेत.
एम. एफ. हुसेन यांनी ख्रिस्ती धर्माच्या संकल्पनेवर खूप चित्र रेखाटलेली आहेत आणि त्यांचा अर्थातच `भारतीय ख्रिस्ती कला' मध्ये समावेश केला जातो.
एम. एफ. हुसेन यांनी आपल्या खास शैलीत रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट' चे (२००८) हे एक चित्र.
हे चित्र हुसेन यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील आहे. हुसेन यांच्या या चित्रात ख्रिश्चन आणि इस्लामिक संस्कृतीचा मिलाप दिसतो.
चित्रात उंट, देवदूत आणि इतर अनेक प्रतिमा आहेत, त्याबद्दल केवळ कला समीक्षकच लिहू शकतील.
Camil Parkhe

Friday, January 26, 2024

Karl Marx : ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा ओळख
Karl Marx Birth Anniversary
Karl Marx Birth Anniversaryesakal

Karl Marx Birth Anniversary : `जगातल्या कामगारांनो एक व्हा...तुमच्या पायातल्या शृंखलाशिवाय तुम्हाला गमवण्यासारखे इतर काहीच नाही..'

Workers of the world Unite.. You have nothing to lose but your shackles...

असे आता जगप्रसिद्ध बनलेले आवाहन साद देणारा कार्ल मार्क्स .

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा मला ओळख झाली ती श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना. आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. 

त्यावेळी या जिल्ह्यात बारातेरा साखर कारखाने त्यापैकी तीन खासगी, हरेगावचा बेलापूर शुगर फँक्टरी भारतातला ब्रिटिशकाळात सुरु झालेला पहिला साखर कारखाना. या परीसरात असे औद्योगिकीकरण झाल्याने, कामगार वर्ग निर्माण झाल्याने त्यामुळे कार्ल मार्क्स म्हटल्याप्रमाणे क्रांतीसाठी अगदी पोषक वातावरण.

त्यामुळे माझ्या घराच्या आसपास, रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कचेरीपाशी लाल बावटा अंगाखांद्यावर मिरवत शोषित कामगार मिरवणुकीने जाताना दिसत. `लाल बावटा झिंदाबाद' अशा काहीतरी घोषणा असायच्या, बहुधा गाडे नावाचे एक कामगार नेता या कामगारांचे नेतृत्व करायचे चा. एक दिवस तो लाल बावटा माझ्याही अंगाखांद्यावर आणि त्या घोषणा माझ्याही ओठांवर असतील असे त्यावेळी वाटले नव्हते.

गोव्यात मी कॉलेजात असताना सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकांत कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाने नव्या तरुण पिढीला कमालीची भुरळ घातली होती. मिरामार इथल्या आमच्या धेंपे कॉलेजातले, मडगाव म्हापसा बॉस्को द गामा इथल्या कॉलेजांमधले माझे कित्येक मित्रमैत्रिणी कट्टर मार्क्सवादी बनले होते..

त्याआधी जेसुईट प्रिनॉव्हिस म्हणून मी बीए ला तत्त्वज्ञान विषय घेतला होता. तिथे कार्ल मार्क्स, मानवेन्द्र नाथ रॉय, नक्षलबारी चळवळ, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरेंची जवळून ओळख झाली. माझ्या पिढीतले त्यावेळी बहुतेकजण त्यावेळी मार्क्सवादाच्या मांडवाखाली किंवा त्या प्रभावाखाली होते.

रशियाकडून सप्रेम भेट आलेली अनेक गुळगुळीत पानांची, हार्ड बाउंड, अगदी स्वस्तातली मराठी पुस्तके त्याकाळात घरोघरी असायची. मॅक्सिम गॉर्की याचे आई (The Mother ) अशी कितीतरी पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझ्याकडेसुद्धा होती.

भारतातील कितीतरी नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कम्युनिस्ट नेते होते, कितीतरी नावे आहेत. भगत सिंग तर कम्युनिस्ट आयकॉन , चे गव्हेरा यांच्या प्रमाणे. महाराष्ट्रातील कितीतरी राजकीय नेते, साहित्यिक आणि कवी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हेसुद्धा सांगायालाच हवे.

गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी चिटणीस झालो. गोव्यातली आणि संपूर्ण भारतातली त्याकाळची पत्रकारांची आणि वृत्तपत्र कामगारांची चळवळ डावे आणि समाजवादी नेते चालवत होते. सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस वाय कोल्हटकर आणि साथी के. विक्रम राव (जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी आणि बडोदा डायनामाईट केसमधले एक आरोपी) आमचे नेते. 

देशभर आणि गोव्यात आम्ही पत्रकार आणि वृतपत्र कामगार चळवळीतले सगळे जण एकमेकांना कॉम्रेड म्हणून संबोधित असू, ( पुण्यात आल्यावर ही सवय सुटली ! ) लाल झेंडा आणि क्रांतीच्या त्या घोषणा, `हम होगे कामयाब' (We Shall overcome..) हे गाणे असायचेत. 

मार्क्सवादाच्या याच प्रभावाखाली माझी सोव्हिएत रशिया आणि बल्गेरियाची वारी घडली, बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. कम्युनिस्ट देशाच्या या पंढरीची वारी करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील कितीतरी नेत्यांची, साहित्यिकांची नावे देता येईल.

मी त्यापैकी अखेरचा. याचे कारण मी मॉस्कोत होतो तेव्हा मिखाईल गोब्राचेव्ह नुकतेच सत्तेवर आले होते, नंतर ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइकाचे सुरु झाले नि सोव्हिएत रशियाची अन कम्युनिस्ट जगताची पडझड झाली, ती आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली. 

मॉस्कोत क्रेमलीनला असताना तिथे खूप मोठी चर्चेस पाहिली, मार्क्स आणि लेनिन यांची पुतळेही पाहिलेय. चर्चमध्ये सामसूम असायची, पण साठ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीत सुदैवाने या वास्तू शाबूत राहिल्या, या देवळांना केवळ `संग्रहालय' असा दर्जा होता. नंतर कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे क्रेन लावून काढण्यात आली.

तीन दशकांपूर्वी संपूर्ण जग कार्ल मार्क्सला मानणाऱ्या आणि भांडवलशाही देशांमध्ये विभागले होते. येशू ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स असे म्हटले जायचे. कार्ल मार्क्स संपणारा आहे का ? त्याच्या विचारांचा नवा अन्वयार्थ शोधण्याचे काम चालूच राहिल.

जन्मदिनानिमित्त कार्ल मार्क्सला अभिवादन...

Esakal 

https://www.esakal.com/blog/karl-marx-birth-anniversary-after-christ-name-that-has-reached-all-over-world-aak11

Camil Parkhe 



Friday, July 14, 2023

May be an image of 5 people

शिष्टाचारात आसनव्यवस्थेला खूप महत्व असते. जागतिक नेत्यांची बैठक असते तेव्हा समूह फोटोसाठी ते एकत्र उभे राहतात तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेहेमीच केंद्रस्थानी असतात.

रांगेत सर्वात शेवटी किंवा कोपऱ्यात उभे केलेल्या व्यक्तीचे स्थान त्या व्यक्तीच्या देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्व अधोरेखित करते.

लिओनार्डो दा विन्सीने चित्रित केलेल्या त्या अजरामर प्रसिद्ध चित्रातली `द लास्ट सपर' (The Last Supper) मधील जेवण्याच्या टेबलावरची बसण्याची व्यवस्था त्यानंतर इतर कुणीही चित्रकाराने गेली काही शतके बदलली नाही यातच सर्व आले.
येशू ख्रिस्ताची जागा अग्रस्थानी, त्याच्या उजव्या बाजूला सेंट जॉन, डाव्या बाजूला शेवटून दुसरा हातात पैशाची थैली असणारा ज्युदास वगैरे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सहकारी मंत्र्यांबरोबर असतात तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूला गृहमंत्री अमित शाह, दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री निर्मला सितारामन, सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह असतात.
परवा राज्यातील चालू विधानसभेच्या कार्यखंडातला तिसरा सत्ताबदल झाला तेव्हा राज्यकर्त्यांमध्ये केंद्रस्थानी कोण असेल याबद्दल कुतूहल होते.
आज दैनिकांतली कॅबिनेट मिटिंगची छायाचित्रे पाहिली आणि उलघडा झाला.
May be an image of 5 people

Camil Parkhe July 5, 2023ea

Saturday, May 13, 2023

जगातल्या कामगारांनो एक व्हा...तुमच्या पायातल्या शृंखलाशिवाय तुम्हाला गमवण्यासारखे इतर काहीच नाही..'

Workers of the world Unite.. You have nothing to lose but your shackles...

असे आता जगप्रसिद्ध बनलेले आवाहन साद देणारा कार्ल मार्क्स .

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा मला ओळख झाली ती श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना. आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला होता.

त्यावेळी या जिल्ह्यात बारातेरा साखर कारखाने त्यापैकी तीन खासगी, हरेगावचा बेलापूर शुगर फँक्टरी भारतातला ब्रिटिशकाळात सुरु झालेला पहिला साखर कारखाना. या परीसरात असे औद्योगिकीकरण झाल्याने, कामगार वर्ग निर्माण झाल्याने त्यामुळे कार्ल मार्क्स म्हटल्याप्रमाणे क्रांतीसाठी अगदी पोषक वातावरण.

त्यामुळे माझ्या घराच्या आसपास, रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कचेरीपाशी लाल बावटा अंगाखांद्यावर मिरवत शोषित कामगार मिरवणुकीने जाताना दिसत. `लाल बावटा झिंदाबाद' अशा काहीतरी घोषणा असायच्या, बहुधा गाडे नावाचे एक कामगार नेता या कामगारांचे नेतृत्व करायचे चा. एक दिवस तो लाल बावटा माझ्याही अंगाखांद्यावर आणि त्या घोषणा माझ्याही ओठांवर असतील असे त्यावेळी वाटले नव्हते.

गोव्यात मी कॉलेजात असताना सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकांत कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाने नव्या तरुण पिढीला कमालीची भुरळ घातली होती. मिरामार इथल्या आमच्या धेंपे कॉलेजातले, मडगाव म्हापसा बॉस्को द गामा इथल्या कॉलेजांमधले माझे कित्येक मित्रमैत्रिणी कट्टर मार्क्सवादी बनले होते..

त्याआधी जेसुईट प्रिनॉव्हिस म्हणून मी बीए ला तत्त्वज्ञान विषय घेतला होता. तिथे कार्ल मार्क्स, मानवेन्द्र नाथ रॉय, नक्षलबारी चळवळ, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरेंची जवळून ओळख झाली. माझ्या पिढीतले त्यावेळी बहुतेकजण त्यावेळी मार्क्सवादाच्या मांडवाखाली किंवा त्या प्रभावाखाली होते.

शियाकडून सप्रेम भेट आलेली अनेक गुळगुळीत पानांची, हार्ड बाउंड, अगदी स्वस्तातली मराठी पुस्तके त्याकाळात घरोघरी असायची. मॅक्सिम गॉर्की याचे आई (The Mother ) अशी कितीतरी पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझ्याकडेसुद्धा होती.

भारतातील कितीतरी नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कम्युनिस्ट नेते होते, कितीतरी नावे आहेत. भगत सिंग तर कम्युनिस्ट आयकॉन , चे गव्हेरा यांच्या प्रमाणे. महाराष्ट्रातील कितीतरी राजकीय नेते, साहित्यिक आणि कवी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हेसुद्धा सांगायालाच हवे.

गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी चिटणीस झालो. गोव्यातली आणि संपूर्ण भारतातली त्याकाळची पत्रकारांची आणि वृत्तपत्र कामगारांची चळवळ डावे आणि समाजवादी नेते चालवत होते. सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस वाय कोल्हटकर आणि साथी के. विक्रम राव (जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी आणि बडोदा डायनामाईट केसमधले एक आरोपी) आमचे नेते.

देशभर आणि गोव्यात आम्ही पत्रकार आणि वृतपत्र कामगार चळवळीतले सगळे जण एकमेकांना कॉम्रेड म्हणून संबोधित असू, ( पुण्यात आल्यावर ही सवय सुटली ! ) लाल झेंडा आणि क्रांतीच्या त्या घोषणा, `हम होगे कामयाब' (We Shall overcome..) हे गाणे असायचेत.

मार्क्सवादाच्या याच प्रभावाखाली माझी सोव्हिएत रशिया आणि बल्गेरियाची वारी घडली, बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. कम्युनिस्ट देशाच्या या पंढरीची वारी करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील कितीतरी नेत्यांची, साहित्यिकांची नावे देता येईल.

मी त्यापैकी अखेरचा. याचे कारण मी मॉस्कोत होतो तेव्हा मिखाईल गोब्राचेव्ह नुकतेच सत्तेवर आले होते, नंतर ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइकाचे सुरु झाले नि सोव्हिएत रशियाची अन कम्युनिस्ट जगताची पडझड झाली, ती आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली.

मॉस्कोत क्रेमलीनला असताना तिथे खूप मोठी चर्चेस पाहिली, मार्क्स आणि लेनिन यांची पुतळेही पाहिलेय. चर्चमध्ये सामसूम असायची, पण साठ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीत सुदैवाने या वास्तू शाबूत राहिल्या, या देवळांना केवळ `संग्रहालय' असा दर्जा होता. नंतर कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे क्रेन लावून काढण्यात आली.

तीन दशकांपूर्वी संपूर्ण जग कार्ल मार्क्सला मानणाऱ्या आणि भांडवलशाही देशांमध्ये विभागले होते. येशू ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स असे म्हटले जायचे. कार्ल मार्क्स संपणारा आहे का ? त्याच्या विचारांचा नवा अन्वयार्थ शोधण्याचे काम चालूच राहिल.

जन्मदिनानिमित्त कार्ल मार्क्सला अभिवादन...


माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता
जानकी अक्का म्हणाली. ``वळीखलंस ह्याला -
ह्यो आमचा मार्क्सबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला
संन्याशाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती ''
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
पुढे, एका सभेत मी बोलत होतो,
तर, या मंदीचे कारण काय ?
दारिद्र्याचे गोत्र काय ?
पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,
आणि घडाघडा बोलतच गेला
परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता,
मी म्हणालो -
`आता इतिहासाचे आपणच नायक आहोत
या पुढच्या सर्व चरित्रांचेही '
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला
`अरे, कविता-बिविता लिहितोस कि काय
छान, छान
मलासुद्धा गटे आवडायचा. '
---
नारायण सुर्वे
*जाहिरनामा" (पॉप्युलर प्रकाशन)