Showing posts with label Khandekar. Show all posts
Showing posts with label Khandekar. Show all posts

Thursday, June 3, 2021

  दीनानाथ दलाल यांची चित्रे


पूर्वीच्या काळात म्हणजे सत्तरच्या दशकात घरोघरी विविध देवदेवतांची चित्रे असलेली कॅलेंडर्स भिंतींवर लटकलेली असत. राम, कृष्ण, शंकर वगैरे देवदेवतांवर अगदी मोहक शैलीत ही चित्रे असायची. पाचवी-सहावीत असताना तशी चित्रे काढण्याचा, रंगविण्याचा मी प्रयत्न केल्याचे आजही आठवते. नंतर खूप वर्षांनी पत्रकारितेत आल्यानंतर ही आकर्षक शैलीतील चित्रे दीनानाथ दलाल यांची होती असे कळाले.
तीस वर्षांपूर्वी १९९१ साली पुण्यातील सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी यांच्या युनिक फीचर्ससाठी दलाल यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त मी लेख लिहिला, तो सिंडिकेटेड लेख विविध दैनिकांनी छापला होता.
तो हा लेख-----


चित्रकार दीनानाथ दलाल यांची कलाकृती पाहिली नाही असा मध्यमवयीन किंवा ज्येष्ठ नागरिक मराठी वाचक शोधूनही मिळणार नाही. दलालांची चित्रकलेतील कारकीर्द 1940 ते 1970 या दरम्यानची. तीन दशकांच्या या कालखंडात त्यांच्या कुंचल्याने कलेच्या विविध प्रातांत अमाप संचार केला, त्यामुळे दोन दशकांपूर्वी मृत्यू पावलेल्या या प्रतिभावान कलाकाराचा गाढा प्रभाव नव्या पिढीतील चित्रकारांवर अजूनही कायम आढळतो.
दीनानाथ दामोदर दलाल हे मूळचे गोव्याचे. मडगावात 30 मे 1916 रोजी त्यांचा जन्म झाला. चित्रकलेतील त्यांचे कौशल्य त्यांच्या लहानपणीच इतरांच्या निदर्शनास आले.
असे सांगतात की, पोर्तुगीज राजवटीत शाळेत शिकत असताना छोट्या दीनानाथने हेडमास्तरांचे चित्र रेखाटले. ते हुबेहुब रेखाटन पाहून `हे चित्र तूच काढले काय ?' असा प्रश्न हेडमास्तरांनी दीनानाथास विचारला.
त्या मुलाचे चित्रकलेतील कौशल्य पाहून कलाशिक्षणासाठी त्यास मुंबईस पाठवावे असा आग्रह हेडमास्तरांनी दीनानाथांच्या वडिलांना केला आणि दलालांचे मुंबईत आगमन झाले.
एका प्रगल्भ चित्रकाराच्या गौरवशाली कारकीर्दीची ती सुरूवात होती.
आपल्या कादकीर्दीच्या सुरुवातीस काही काळ दलाल यांनी एका चित्रपट जाहिरातीच्या संस्थेत काम केले पण दीनानाथ दलाल एक चित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. ते `चित्रा' या साप्ताहिकाचे राजकीय व्यंगचित्रकार म्हणूनच.
अनंत काणेकर आणि म. गो. रांगणेकर या जोडगोळीने हे साप्ताहिक काढले होते.
पण दलालांचे नाव मराठी वाचकांच्या घरोघरी पोहोचविले ते ना. धों ताम्हणकरांच्या `गोट्या' या मालिकेने. या मालिकेसाठी दलालांनी सुरेख रेखाटन पुरविले होते.
त्यानंतर दलालांनी अनेक नामवंत मराठी लेखकांच्या पुस्तकांना चित्रे पुरविली. माणदेशी माणसं, `गावाकडच्या गोष्टी', `बनगरवाडी' ही त्यापैकी काही प्रसिद्ध पुस्तके.
आपल्या कारकीर्दीत म्हणजे 1940 ते 1971 पर्यंत या काळातील सर्वच नामवंत मराठी लेखकांच्या पुस्तकांना मुखपृष्ठे अथवा रेखाटने दलालांनी पुरविली.
साने गुरूजी, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक वि.स. खांडेकर आणि वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज,, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई अशी या नावांची यादी प्रचंडच आहे.
त्याशिवाय दलालांनी अनेक दिवाळी अंकांना मुखपृष्ठे पुरविली. हिंदीतील प्रसिद्ध व्यक्तींची व्यक्तीचित्रेही अत्यंत प्रसिद्ध आहेत. ’महात्मा गांधी, पंडित नेहरू, विनोबा भावे, ही त्यापैकी काही अत्यंत नावाजलेली व्यक्तिचित्रे.
दलालांच्या व्यक्तिरेखाटन शैलीने वाचकांना अत्यंत प्रभावित केले होते. लेखक शब्दरुपाने एखाद्या व्यक्तीचे वा प्रसंगाचे वर्णन करतो. त्या व्यक्तींना अथवा प्रसंगांना आपल्या कुंचल्याद्वारे आकार देऊन जिवंत करण्याची क्रिया दलाल करीत. त्यामुळेच या पुस्तकातील घटना आठवल्या म्हणजे आजही वाचकांच्या डोळ्यासमोर ताबडतोब दलालांची चित्रे उभी राहतात.
दलालांनी आपल्या चित्रासाठी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय असे अनेक विषय हाताळले. दिवाळी अंकासाठी तसेच पुस्तकांसाठी मुखपृष्ठे पुरविणसाठी त्यांच्याकडे सतत प्रकाशकांची अन् लेखकांची मागणी असे.
त्यांना भरपूर व्यावसायिक यश मि’ळाले, पण त्यामुळे कलेकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष केले नाही.

``चित्रकार दलाल यांनी व्यावसायिक कला आणि अभिजात कला यामधील दरी दूर केली हा त्यांचा सर्वात मोठेपणा'', असे नव्या पिढीतील चित्रकार आणि दलालांस गुरू म्हणणारे अनिल उपळेकर म्हणतात ते यामुळेच.
चित्रकलेत अमाप लोकप्रिय आणि व्यावसायिक यश मिळविल्यानंतर दलालांनी चित्रकलेत नाना प्रकारची तंत्रे हाताळून पाहिली. नवनवे प्रयोग केले. दलालांच्या चित्रकलेचा अभ्यास असणाऱ्यांना त्यांच्या कलेतील हा बदल, नवनवे प्रयोग विशेषतः 1960 सालानंतरच्या चित्रकलेत आढळून येतो.
दलालांनी सुरू केलेले `दीपावली' हे मासिकही त्या काळात, अत्यंत लोकप्रिय झाले होते.
वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी म्हणजे 1971 साली दलालांचा मृत्यु झाला. पण त्यांनी आपल्यामागे अमूल्य किमतीचा चित्रसंग्रह ठेवला. दलालांच्या चित्रकलेने प्रेरित झालेली चित्रकाराची एक पिढी आज निर्माण झाली आहे.
या महान चित्रकाराच्या पंचाहत्तराव्या जन्मदिनानिमित्त यावर्षी (1991) वेगवगळ्या शहरांत त्यांच्या निवडक चित्रांची प्रदर्शने आयोजित केली जात आहेत.
दलालांच्या चित्रकलेशी दोन पिढीतील ’मराठी वाचकांचा अत्यंत जवळून संबंध आलेला आहे. त्यांच्या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने या चित्रांशी निगडीत असलेल्या आठवणींना निश्चितच उजाळा मिळेल.

Friday, October 7, 2011

ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?

Esakal
http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm


"ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?
कामिल पारखे
Friday, October 07, 2011 AT 08:15 PM (IST)

नुकतेच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाले आणि मी उत्सुकतेने ती बातमी वाचली. हिंदी साहित्यिक अमर कांत आणि श्रीलाल शुक्‍ला यांची सन 2009 साठी तर 2010 साठी कन्नड साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंबार यांची या पुरस्कारांसाठी निवड झाली. ती बातमी मी शेवटपर्यंत वाचली आणि माझे मन विषण्णतेने भरून गेले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे डॉ. कंबार हे कन्नड भाषेतील आठवे साहित्यिक आहेत, असे त्या बातमीत म्हटले होते.

ज्ञानपीठाची 1960च्या दशकात स्थापना झाल्यापासून, गेल्या पाच दशकांत हा पुरस्कार भारतीय भाषांतील एक महत्त्वाचे मानदंड बनला आहे. ज्ञानपीठ हे भारतीय साहित्यजगतातील सर्वांत अधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार. साहित्य अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांहून अधिक महत्त्व ज्ञानपीठास आहे. काही लाख रुपयांचे बक्षीस आणि सरस्वतीदेवीची मूर्ती ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यास दिली जाते. ज्ञानपीठ सन्मान मिळवणाऱ्या जवळजवळ प्रत्येक साहित्यिकाने त्यापूर्वी साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळवलेले असतेच.

ही बातमी वाचून विषण्ण होण्याचे कारण म्हणजे, ज्ञानपीठाच्या पाच दशकांच्या इतिहासात आतापर्यंत मराठीला हा प्रतिष्ठेचा सन्मान केवळ तीन वेळाच लाभला आहे. मराठी साहित्यात अनेक उच्च दर्जाच्या कांदबऱ्या आणि कथासंग्रह लिहिणाऱ्या वि. स. खांडेकरांना हा पुरस्कार त्यांच्या आयुष्याच्या अगदी अखेरीस देण्यात आला. दृष्टी अधू झालेली आणि वयोमानानुसार अनेक व्याधींनी शरीर थकलेले असताना त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान काही वर्षे आधीच दिला गेला असता तर त्याचा आनंद उपभोगता आला असता, असे ते त्यावेळी म्हटल्याचे स्मरते. त्यानंतर तब्बल दीड दशकांनंतर कवी आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' यांना हा सन्मान लाभला. काही वर्षांपूर्वी कवी विंदा करंदीकरांनाही ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कन्नड आणि हिंदी भाषांतील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार सर्वाधिक म्हणजे आठ वेळा देण्यात आला आहे. भारतीय साहित्यजगतात मराठी साहित्यविश्‍व अत्यंत समृद्ध समजले जाते. गेली अनेक दशके दरवर्षी नियमाने प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, त्यानिमित्त होणारी काही कोटी रुपयांची उलाढाल, दरवर्षी होणारी आणि अनेक अर्थांनी गाजणारी भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि संपूर्ण वर्षभर कुठे ना कुठे होणारी वेगवेगळी प्रादेशिक, सांप्रदायिक, ज्ञातीय आणि इतर साहित्य संमेलने, यांमुळे मराठी साहित्य जगात प्रचंड घुसळण होत असते, साहित्यनिर्मिती होते आणि त्याचा आस्वादही घेतला जातो. भारताच्या इतर कुठल्याही भाषांत साहित्याविषयी इतके प्रेम वा कार्यक्रम होत असतील, असे वाटत नाही. असे असूनही आतापर्यत केवळ तीनच मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा, याबद्दल मला आश्‍चर्य वाटते.

डॉ. कंबार यांच्यापूर्वी डॉ. के. एस. कारंथ आणि डॉ. गिरिश कर्नाड वगैरे कन्नड लेखकांना ज्ञानपीठ सन्मान मिळालेला आहे. त्यापैकी डॉ. कर्नाड यांचे तुघलक आणि हयवदन आदी साहित्यिक कलाकृतींची मराठी भाषांतरे मी वाचलीही आहे. काही ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य, हे हिंदी किंवा कन्नड भाषांतील वा इतर कुठल्याही भाषांतील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्याच्या तुलनेत खुजे आहे, असे म्हणता येणार नाही. तरीही मराठी भाषेला आतापर्यंत केवळ तीनच ज्ञानपीठ पुरस्कार का मिळावीत? पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याने मराठी वाचकांच्या मनांवर अनेक वर्षे राज्य केले. मात्र पुलंचा ज्ञानपीठासाठी कधी विचार झाला नाही. जी. ए. कुलकर्णी, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, नारायण सुर्वे वगैरे मराठी लेखकांचे साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्याच्या लायकीचे नाही, असे कुणी म्हणेल काय? मराठी दलित साहित्याने केवळ साहित्य क्षेत्रातच नव्हे, तर महाराष्ट्रातील समाजजीवनात मोठी क्रांती केली. अशा दलित साहित्यिकांपैकी नामदेव ढसाळ, दया पवार आदींपैकी एकाचेही साहित्य ज्ञानपीठ देण्याच्या लायकीचे नव्हते काय? का असे पुरस्कार मिळवण्यासाठी पडद्यामागे ज्या काही हालचाली कराव्या लागतात, त्यात मराठी माणूस मागे पडतो?