Showing posts with label Pune. Show all posts
Showing posts with label Pune. Show all posts

Thursday, March 26, 2026

 



गॉर्डन हॉल हे नाव तसे फारसे परिचीत नाही. ते नाव परिचित असण्याची शक्यता कमीच आहे, याचे कारण या अमेरिकन व्यक्तीला भारतात कार्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी मिळाला.
मात्र या अल्प कालावधीत गॉर्डन हॉल आणि त्यांच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी सहकाऱ्यांनी मुंबईत आणि भारतात एका नव्या पर्वाची मुहूर्तवेढ रोवली.
आधुनिक भारताचा इतिहास गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नामोल्लेखावाचून पूर्ण होऊ शकत नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे व्याकरण, शब्दकोश तसेच गद्य शुद्धलेखन त्याशिवाय या भाषेतील पुस्तकांची छपाई याबाबतीत परदेशी लोकांनी फार मोलाचे योगदान केलेले आहे.
विल्यम कॅरी, जेम्स थॉमस मोल्स्वर्थ, मेजर थॉमस कँडी यांची नावे यासंदर्भांत घेतली जातात. याच काळात भारतात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत पायाभूत स्वरुपाचे कार्य करणारी व्यक्ती म्हणून गॉर्डन हॉल यांचा उल्लेख करता येईल.
आधुनिक काळातील ते एक आद्य अमेरिकन मिशनरी होते.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या गॉर्डन हॉल यांनी कॉलऱ्याच्या भीषण साथीत नाशिकच्या परिसरात आजारी लोकांना औषधोपचार केले आणि त्यावेळी त्यांनाच या रोगाची लग्न होऊन नाशिकजवळ दोडी दापूर येथे वयाच्या अवघ्या ४१ वर्षी २० मार्च १८२६ रोजी त्यांचे निधन झाले.
मुंबईत पहिल्यावहिल्या आधुनिक पद्धतीच्या शाळा स्थापन करणाऱ्या तसेच १८२४ साली मुलींची पहिली शाळा सुरु करणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरीचे या शुक्रवारी, दिनांक २० मार्चपासून द्विशताब्दी स्मृतीवर्षे सुरु होत आहे.
मुंबई बंदरात १२ फेब्रुवारी १८१३ रोजी हार्मनी या बोटीतून तीन अमेरिकन प्रवासी उतरले. हे प्रवासी होते अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट.
भारतात आलेले हे पहिले अमेरिकन मिशनरी होते. काही काळानंतर अमेरिकेतून कॅरॅव्हान या जहाजाने रोजी अँडोनिराम जडसन आणि सॅम्युएल न्यूवेल हे भारतात आले.
या मिशनरींच्या आगमनाने भारतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
पश्चिम भारतात अमेरिकन मराठी मिशन स्थापन करुन पुढे त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि इतर क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले.
ब्रिटिश संसद दर दहा वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण करत असे.
त्यानुसार त्याकाळात मुंबईत आणि भारतात ख्रिस्ती मिशनरींना कार्य करण्याची मुभा नव्हती.
असे असले तरी मुंबईत काम करण्याच्या या मिशनरींचा दृढ निर्णय होता.
मुंबईत आल्याक्षणी त्यांनी इथली मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरु केला.
सॅम्युएल नॉट यांनी ५ मार्च १८१३ रोजी आपल्या आईवडलांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते :
``आमची परिस्थिती अनिश्चित असली तरी आम्ही मराठी भाषेचा अभ्यास सुरू करीत आहोत. आम्ही दृश्यावर विसंबून नव्हे तर विश्वासावर चालत आहोत. एक फार बोलघेवडा काळा माणूस आमच्यासोबत बसून दररोज तीन-चार तास आम्हाला ही भाषा शिकवत आहे.”
गार्डन हॉल आणि नॉट या दोघांनी अमेरिकन मिशन बोर्डाच्या सेक्रेटरीला १७ मार्च १८१३ रोजी एक पत्र लिहून त्यात म्हटले होते:
`` “येथे राहण्याची आमची आशा इतकी दृढ आहे की आम्ही लगेचच मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.”
मुंबईत राहिल्यानंतर व मराठी भाषा शिकल्यानंतर हॉल व नॉट यांनी १८१५ मध्ये एक इंग्रजी शाळा काढली. त्यात २५ मुले शिकत होती. याशिवाय दोन मराठी शाळांत ४० मुले होती.
सुरुवातीला त्यांना शिक्षक मिळण्यास अडचण पडली, पण पुढे दोन ब्राह्मण शिक्षक त्या मराठी शाळांत शिकवू लागले. पुढल्या वर्षी या शाळांची संख्या वाढली व एकूण ३०० विद्यार्थी झाले.
सन १८१८ मध्ये अमेरिकन मिशनच्या अकरा शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.
या अमेरिकन मिशनरींनी मुंबईतच १८२४ साली मुलीची पहिली शाळा सुरु केली.
आधुनिक काळात मुंबईत आलेल्या या आद्य मिशनरींना मराठी भाषा शिकण्यात असंख्य अडचणी आल्या.
याचे कारण म्हणजे तोपर्यंत मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करण्यात आले नव्हते.
पुढील काळात जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी मराठीचे व्याकरण आणि शब्दकोश रचले, त्यामुळे नंतरच्या काळातल्या मिशनरींना आणि ईस्ट इंडिया कंपनी अधिकाऱ्यांना मराठी भाषा शिकणे अधिक सोपे झाले.
अमेरिकन मिशनचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे धर्मप्रसारासाठी त्यांनी लहानसहान पुस्तिका लिहिण्यास सुरुवात केली, बायबलच्या मराठी भाषांतराचे काम तातडीने सुरु केले.
ही पुस्तके छापण्यासाठी मुंबईत लाकडी छापखानासुद्धा सुरु केला.
त्यासाठी मराठी भाषेतील टाईप किंवा फॉन्ट्स तयार केले. हे खूपच मेहनतीचे आणि पायाभूत स्वरूपाचे काम होते याबद्दल शंकाच नाही.
त्यासाठी आद्य मिशनरींना श्रेय द्यायलाच हवे.
`ए स्क्रिप्चर ट्रॅक्ट' ( A Scripture Tract ) ही अमेरिकन मिशनने धर्मासंबंधी १८१७ साली छापलेली पहिलीच पुस्तिका किंवा ट्रॅक्ट होय. ती पुस्तिका बहुधा गॉर्डन हॉल यांनी तयार केलेल्या पुस्तिकांपैकी एक होती.
ही पुस्तिका आठ पानांची होती आणि १० मार्च १८१७ रोजी ती छापखान्यात छापण्यात आली. त्या आवृत्तीच्या १५०० प्रती छापण्यात आल्या होत्या.
याच घटनेतून मराठी ख्रिस्ती साहित्याची सुरुवात झाली अशी माहिती रेव्हरंड ब्रूस यांनी दिली आहे असे श्री. म. पिंगे यांनी लिहिले आहे.
मुंबईत छापखान्याची उभारणी झाल्यानंतर बायबलच्या नव्या कराराचे भाषांतर १८२६ मध्ये प्रसिद्ध झालें.
अमेरिकन मिशनचे हे मराठी बायबल गॉर्डन हॉल, सॅम्युएल न्यूवेल, होरेंशिओ बार्डवेल, जॉन निकोलस व अँलन ग्रेव्हज् या मिशनरींनी केले. यापैकी बार्डवेल १८१६ मध्ये व ग्रेव्हज् हे १८१८ मध्ये भारतात आले होते.
या पाच मिशनरींपैकी सॅम्युएल न्यूवेल १८२१ मध्ये, जॉन निकोलस १८२४ मध्ये मरण पावले. होरेंशिओ बार्डवेल १८२१ मध्ये अमेरिकेस परत गेले, अँलन ग्रेव्ह्ज १८४३ पर्यंत कार्य करून महाबळेश्वर येथे मरण पावले.
``या पाचही मिशनरींनी मृत्यूचा धोका पत्करूनसुद्धां बायबलच्या भाषांतराचे कार्य पुरे केले,'' असे त्यांच्याविषयी वर्णन श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या ग्रंथात केले आहे.
ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांशिवाय गॉर्डन हॉत यांनी तीन शिक्षणविषयक पुस्तके लिहिली होती. लेकरांची पहिली पोथी (First Book of Children) हे सोळा पानांचे पुस्तक १८१८ साली छापण्यात आले.
अमेरिकन मिशन मालेमधील हे पहिल्या क्रमांकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक एका बाजूला बालबोधमध्ये व दुसऱ्या बाजूला मोडी लिपीत छापले होते.
या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी निघाल्या व या सर्व आवृत्या मिळून दहा लाख तरी प्रती सपल्या असतील, असा रे. ब्रूस यांचा अंदाज आहे. या पुस्तकाच्या १८२८ व १८२९ साली स्कॉटिश मिशनरींच्या बाणकोट मिशनने दोन आवृत्त्या काढल्या.
ट्रॅक्ट सोसायटीनेसुद्धां १८३०, १८३१, १८३२, १८३३, १८२४ १८३५ साली सहा आवृत्त्या काढल्या. पुढे १८३७, १८४१ व १८४४ मध्ये बालबोध व मोडी लिपीत हे पुस्तक प्रकाशित करण्यांत आले असे श्री. म. पिंगे यांनी नमूद केले आहे.
गॉर्डन हॉल यांनी पुण्यातसुद्धा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला होता याचा उल्लेख पिंगे यांनी या ग्रंथात केला आहे.
मिशन छापखान्यात छापलेली मराठी पुस्तके आणि हिंदुस्थानी भाषांतील पुस्तके पुण्यात वाटण्यासाठी १८२३ साली गॉर्डन हॉल यांनी दोन नोकरांना पुण्यात पाठवले होते.
त्यांच्याबरोबर हॉल यांनी शिफारसपत्रे सुद्धा दिली होती त्यात म्हटले होते:
"This is to certify that the bearers hereof viz. Samuel and Benjamin Jews have been in our employ as school masters for several years. They are now furnished by us with a small quantity of Mahratta and few Hindoostanee books, which they are authorised to distribute gratuitously to such persons as may desirous of receiving them.
पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन् यांनी मुंबईतील कंपनी सरकारला पत्राद्वारे कळविले की ही धार्मिक पुस्तके वाटण्यास सरकारची मदत आहे अशी लोकांची समजूत झाली आहे व ती सरकारला हानिकारक होईल.
कलेक्टर रॉबर्टसन् यांनी त्या दोघांना पकडले व त्यांना त्यांच्या पुस्तकांसह घाटाखाली हद्दपार केले.
पुण्याचे कमिशनर चॅप्लिन यांनी मुंबई सरकारचे मुख्य सेक्रेटरी न्यूनहॅम यांना यासंबंधी कळविलें की धार्मिक पुस्तकांच्या वितरणाने कंपनी सरकारबद्दल लोकांमध्ये भिती निर्माण होईल.
मिशनरींच्या या कामाला पायबंद घालणें आवश्यक आहे, असेही त्यांनी सुचविले होते.
याबाबत कंपनी सरकारने गॉर्डन हॉल यांना कळवले तेव्हा गॉर्डन हॉल, निकोलस व अँलन ग्रेव्हज या तीन मिशनरींनी आपली बाजू मांडून सांगितले कि असे करणे काही आक्षेपार्ह नाही व पेशव्यांच्या काळापासून आपण धार्मिक पुस्तके वाटत आहोत आणि भारतातही ती वाटली जातात.
मार्च १८२६ मध्ये नाशिक परिसरात कॉलऱ्याची तीव्र साथ असताना तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी गॉर्डन हॉल थांबले होते.
वैद्यकीय प्रशिक्षण असल्याने आजारी लोकांना त्यांनी औषधे दिली. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
तिथेच त्यांची एक दगडी समाधी बांधण्यात आली होती.
March 20, 2026 दोनशेव्या स्मृतिदिनानिमित्त गॉर्डन हॉल यांना आदरांजली.

Camil Parkhe March 19, 2026


Thursday, December 25, 2025

 


नाताळाच्या पूर्वसंध्येला खूप काही गोष्टी करायच्या असतात. माळावरचा ख्रिसमस स्टार आणि इतर डेकोरेशन उतरून खाली आणून सजावटीची सुरुवात करणे वगैरे.
यावेळी आणखी एक काम होते. केकसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या दापोडीतल्या बेकरीतून केक आणणे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सीमावर्ती भागात दापोडी इथे असलेल्या `अलंकार' बेकरीच्या केकला खूप मागणी असते, नाताळाआधीच खूप जणांच्या, संस्थांच्या आगाऊ घाऊक ऑर्डर्स या बेकरीला मिळतात.
सणानिमित्त अनेकांना नाताळ केक आणि फराळ द्यायचा असल्याने या बेकरीतून दहाबारा केक मी घेऊन आलो.
आमच्या परिसरात बहुतेक बेकरी मालक मुसलमान आहेत आणि दरवर्षी त्यांनी नाताळ आणि ईस्टर सणानिमित्त बनवलेल्या केकला प्रचंड मागणी असते.
केक घेतल्यानंतर बेकरी मालकाला मेरी ख्रिसमस म्हणून सणाच्या आगाऊ शुभेछा देण्यास मी विसरलो नाही..
संध्याकाळी दयानंद ठोंबरे यांनी `अलौकिक परिवार'चा ख्रिसमस अंक दिला. `अलौकिक परिवार'चा हा पंधरावा नाताळ विशेषांक.
आता इतर ख्रिसमस अंकांची प्रतीक्षा आहे.
Camil Parkhe


Monday, October 6, 2025

 

धर्मपीठाच्या प्रमुख पदावर - पोप, शंकराचार्य, मौलवी, रब्बी, दलाई लामा किंवा इतर कुठलेही सर्वोच्च धर्माचार्य म्हणून महिलेची नेमणूक झाली आहे अशी नुसती कल्पनाच करा.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात काल शुक्रवारी ३ ऑकटोबर , २०२५ रोजी एक महत्त्वाची घटना घडली.
या घटनेची किती वृत्तपत्रांनी नोंद घेतली आहे, किती लोकांपर्यंत या ऐतिहासिक, भवितव्याला एक वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनेची माहिती पोहोचली आहे हे मला माहित नाही.
ख्रिस्ती धर्मपिठाच्या इतिहासात नव्हे मानवी इतिहासात हा एक ऐतिहासिक क्षण घडला आहे..
भारतात आणि इतर अनेक देशांत अस्तित्व असलेल्या इंग्लंडच्या अँग्लिकन चर्चच्या ५०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कँटरबरीच्या आर्चबिशपची जबाबदारी एका महिलेला देण्यात आली आहे.
अनेक शतकांपासून इंग्लंडचे राजा/ राणी अँग्लिकन चर्चचे प्रमुख आहेत.
कँटरबरीचे आर्चबिशप जागतिक अँग्लिकन चर्चचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आहेत,
सारा मल्लली (वय ६३ वर्षे) यांना इंग्लंड येथील कँटरबरीच्या पहिल्या महिला आर्चबिशप म्हणून नेमण्यात आले आहे
बहुतांश प्रमाणात पुरुषसत्ताक सत्तेचा इतिहास असणाऱ्या मानवी संस्कृतीत ही घटना खूप महत्त्वाची आहे.
याचे हादरे पुढे सतत बसणार आहेत हे नक्की.
परंपरेनुसार अँग्लिकन चर्चचे प्रमुख असलेल्या ब्रिटिश राजे / राणी आहेत. अँग्लिकन चर्चच्या आर्चबिशप पदासाठी उमेदवारांची निवड इंग्लंडच्या चर्चच्या संस्थेने केली जाते आणि याबाबत पंतप्रधानांना सल्ला दिला जातो.
त्यानंतर अँग्लिकन चर्चचे प्रमुख असलेल्या ब्रिटिश राजे / राणी यांच्याकडून अधिकृतरीत्या नूतन आर्चबिशपच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले जाते,
अँग्लिकन चर्चच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरला, कारण ५०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कँटरबरीच्या आर्चबिशपची जबाबदारी एका महिलेला देण्यात आली आहे.
मानवी संस्कृतीच्या इतिहासात आजतागायत कुठल्याही धर्माचे सर्वोच्च पद किंवा प्रेषित पद महिलेला देण्यात आलेले नाही.
इतकेच नव्हे तर परमेश्वर किंवा देव पुरुष आहे असेच सगळीकडे गृहीत धरलेले आहे.
य पार्श्वभूमीवर एक महिलेची सर्वोच्च धर्माचार्य म्हणून नेमणूक होणे ही एक अत्यंत क्रांतीकारक घटना आहे असे मी समजतो.
ही नेमणूक महत्त्त्वाची आहे याचे कारण म्हणजे जगातील सर्वच धर्मांत आजही पुरुषसत्ताक वागणूक असते आणि स्त्रियांना अन्यायकारक, दुय्यम दर्जाची वागणूक देणे योग्य नाही असा संदेश या घटनेतून सगळीकडे जाणार आहे.
चर्च ऑफ इंग्लंड हे अनेक बाबतींत सुधारणा राबवण्यात अग्रेसर राहिले आहे.
इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या अँग्लिकन चर्चमध्ये महिलांना धर्मगुरूपद देण्याची परवानगी १९९० च्या दशकाच्या मध्यापासूनच देण्यात आली आहे.
याउलट जगात सर्वाधिक अनुयायी असलेल्या आमच्या कॅथोलिक चर्चमध्ये सुधारणा गोगलगायीच्या मंद गतीने होत असतात. कॅथोलिक आणि इतर अनेक पंथांच्या चर्चेसमध्ये महिलांना आजही धर्मगुरू होता येत नाही,
चर्च ऑफ इंग्लंडच्या संपूर्ण जगात १६५ देशांत ८५० लाख अनुयायी आहेत. भारतात, महाराष्ट्रात आणि पुण्यामुंबईत अँग्लिकन चर्चचे अस्तित्व आहे.
उदाहरणार्थ, पुण्यातील गुरुवार पेठेतील पंचहौद चर्च, किंवा पवित्र नाम देवालय आणि खडकी येथील सेट मेरीज चर्च, मुंबई-पुणे हमरस्त्यावर खडकी येथील ऑल सेंट्स चर्च, पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोस्ट ऑफिसाशेजारी असलेले सेंट पॉल चर्च वगैरे.
सन १९९८ ला दीक्षा मिळालेल्या चित्रलेखा आढाव ( विवाहानंतर चित्रलेखा जेम्स ) या चर्च ऑफ इंग्लंडच्या पुण्यातील पहिल्या महिला धर्मगुरू. पुण्यात सध्या पाच दीक्षित महिला धर्मगुरू आहेत.
रेव्हरंड सोफिया मकासरे यांची दोनेक वर्षांपूर्वी पुलगेटजवळील सेंट मेरीज चर्चच्या प्रमुख धर्मगुरू म्हणून निवड झाली होती.
धर्मगुरुपदाची दीक्षा मिळून एखादा चर्चची सूत्रे मिळणाऱ्या शहरातील त्या पहिल्याच महिला. मात्र अलिकडेच त्या इंग्लंडला धर्मगुरु म्हणून गेल्या आहेत.
या चर्च ऑफ इंग्लंडची महाराष्ट्रात अनेक खेड्यापाड्यांत चर्चेस आहेत हे ऐकून अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
नगर शहराजवळ असलेल्या करंज या गावातील अँग्लिकन चर्चने काल शनिवारी ४ ऑकटोबरला आपला १०२वा वर्धानपनदिन किंवा सण साजरा केला.
सारा मल्लली हे पद स्वीकारणाऱ्या १०६व्या धर्मगुरू आहेत. त्या आपले पद पुढील वर्षांच्या जानेवारीमध्ये स्वीकारतील.
कँटरबरीचे आर्चबिशप काय करतात?
सार्वजनिक जीवनातही एक महत्त्वाची भूमिका निभावतात — कारण त्यांना इंग्लंडच्या संसदेमधील ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’मध्ये खासदारकीचे एक पद राखीव असते.
याचा अर्थ असा की ते महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणू शकतात, धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य करतात.
दोन मुलांची आई असलेल्या मल्लली यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये ३५ वर्षांहून अधिक काळ सेवा केली.
समानलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्यास अखेर परवानगी देण्याच्या २०२३च्या निर्णयाचे त्यांनी “चर्चसाठी आशेचा क्षण” असे वर्णन केले होते .
कँटरबरी आर्चबिशप म्हणून नियुक्तीनंतर सारा मल्लली यांनी मँचेस्टरमधील यहुदी उपासना स्थळी झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी म्हटले चर्चची जबाबदारी आहे की “यहुदी समुदायासोबत उभे राहावे आणि यहुदीविरोधाला विरोध करावा.”
त्या स्वतः पहिल्या महिला आर्चबिशप आहेत यावर त्यांनी फारसा भर दिला नाही.

Camil Parkhe

Monday, August 18, 2025

 

Chandu Borde

परवा एका कार्यक्रमानिमित्त अचानक क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्याशी संवाद घडला.

'शब्दसेवा' या नव्या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनासाठी ते व्यासपीठावर असणार होते.
मासिकाचे प्रकाशक व्हाईट लाईट पब्लिकेशन्सचे जॉर्ज काळे यांनी मलाही तिथे बोलण्यास सांगितले होते.
क्वार्टर गेटपाशी असलेल्या वायएमसीए सभागृहात कार्यक्रम होता. पत्रकार आणि शतायुषी ज्ञानोदय मासिकाचे माजी संपादक अशोक आंग्रे या नव्या मासिकाचे संपादक आहेत. डॉ. अमित त्रिभुवन सूत्रसंचालक होते.
या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या बारामतीच्या आणि वैद्यकीय सेवेची दीर्घ परंपरा असलेल्या कोल्हटकर कुटुंबाचे बारामतीच्या पवार कुटुंबाशी तीन पिढ्यांचे खूप जवळचे नाते.
या संबंधामुळेच डॉ संजीव कोल्हटकर यांच्या आग्रहामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा ऑगस्ट या भरगच्च कार्यक्रमांच्या दिवशीसुद्धा या कार्यक्रमास येण्याचे तात्काळ मान्य केले होते.
डॉ. दादासाहेब कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना अचानक पुण्याऐवजी बीड येथे स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यास जावे लागल्याने ते या कार्यक्रमास येऊ शकणार नव्हते.
हा बदल अचानक झाला होता.
कार्यक्रमाआधी आम्ही चहापानासाठी एका टेबलापाशी जमलो असताना अचानक आयोजकांनी ही बातमी चंदू बोर्डे यांना कळवली
आणि आता `तुम्हीच मुख्य पाहुणे म्हणून बॅट हातात घ्यावी' अशी जरा भीतभीतच विनंती केली.
मी त्यांच्या समोरच बसलो होतो, त्यांच्या चेहेऱ्यावरची प्रतिक्रिया न्याहाळत होतो.
पाचसहा वाक्यांच्या प्रस्तावनेनंतर चंदू बोर्डे यांनी `हा राखीव खेळाडू आता मैदानावर जाईल' अशी संमती दिली आणि आयोजकांचा जीव भांड्यात पडला.
चंदू बोर्डे यांच्या अनेक कार्यक्रमाला बातमीदार म्हणून मी हजेरी लावली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्याशी संभाषण करण्याची माझी ही पहिलीच वेळ.
आमच्याबरोबर असलेले एक गृहस्थ चंदू बोर्डे यांच्याशी क्रिकेटबाबत बोलत होते.
सत्तरच्या दशकातील आघाडीच्या क्रिकेटपटूंची नावे आणि त्यांच्या खेळण्याच्या तऱ्हा आणि विशिष्ट लकबी याविषयी बोलणे चालू होते.
इतर खेळाडूंबरोबर एकनाथ सोलकर यांचाही विषय निघाला होता .
त्या सर्वच क्रिकेटपटूंची नावे मला माहित होती तरी विषय तिथेच समाप्त होत होता.
क्रिकेटक्षेत्रात एके काळी ` चंदया' आणि `पँथर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतःविषयीसुद्धा ते बोलले.
चंदू बोर्डे यांनी अलीकडेच जुलै २१ला वयाची नव्वदी पार केली आहे, हे लक्षात ठेवून मी हे सर्व ऐकत होते. इतर अनेक गोष्टी मनात टिपून घेत होतो.
चंदू बोर्डे हे पुण्यातल्या रास्ता पेठेतील ख्राईस्ट चर्चचे सभासद.
पद्मश्री आणि पद्मभूषण किताबाचे मानकरी. राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले पुण्याचे एक भूषण.
आपल्या भाषणात चंदू बोर्डे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
या कार्यक्रमानंतर लवकरच त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला हवा असे त्याच क्षणी ठरवले.

Camil Parkhe August 17, 2025


Tuesday, June 10, 2025

 


पुण्यातील शनिवार पेठेतील `स्नेहसदन' या जेसुईट फादरांच्या संस्थेच्या वतीने दिवंगत पोप फ्रान्सिस यांना अलीकडेच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शतक ओलांडलेल्या `निरोप्या' या मराठी मासिकाचे संपादक फादर भाऊसाहेब संसारे आणि माधवराव खरात यांनी आयोजित केलेल्या या श्रद्धांजली सभेला
पुणे, पिंपरी चिंचवड तसेच शेजारच्या नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक लोक आणि प्रगत पदवीधर संघटनेचे (पीपीएस) पदाधिकारी हजर होते.
यामध्ये पीपीएसचे सुधाकर सपकाळ, अंतोन कदम, जे डी आढाव, अर्चना आणि सुनील बोर्डे, रत्नाकर दोंडे आणि ऍडव्होकेट पी. एम संसारे , प्रेषित सोशल फौंडेशनचे सचिन औचारे, नाशिकचे वॉल्टर कांबळे. जयप्रकाश पारखे, `ज्ञानोदया'चे कार्यकारी संपादक कांतिश तेलोरे, सुनिता पारखे वगैरे होते.
पुणे येशूसंघीय (जेसुईट) प्रांताचे प्रांताधिकारी फादर आग्नेलो मस्करन्हेस, पुणे धर्मप्रांतीय व्यवस्थापक फादर रॉक अल्फान्सो, मेडिकल मिशन सिस्टर्स, बिबवेवाडी प्रमुख सिस्टर उषा गायकवाड (पोप फ्रान्सिस आणि स्त्रियांचा ख्रिस्तसभेमधील सन्मान व सहभाग) आणि मी स्वतः (कामिल पारखे ) यांचा वक्त्यांमध्ये समावेश होता.
या कार्यक्रमात सहभागी होण्यात मला खरोखर आनंद झाला.
जेसुईट फादर होण्यासाठी मी श्रीरामपूर सोडले १९७६ साली तेव्हा माझे गॉडफादर फादर प्रभुधर यांच्यासह येथे मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हापासून मी या संस्थेशी आजतागायत जोडले गेलेलो आहे.
हजारो ग्रंथ असलेल्या इथल्या ग्रंथालयात बसून मी महाराष्ट्र चरित्रकोशसह सातआठ पुस्तके लिहिली.
स्नेहसदन या संस्थेशी पुणेकरांचे फार जुने नाते आहे.
अनेक हौशी, प्रायोगिक मराठी नाटकांच्या तालमी येथे झालेल्या आहेत आणि पहिला अंक ( प्रवेश मूल्य ऐच्छिक ! ) येथेच झालेला आहे.
`स्नेहसदन'चे संस्थापक मॅथ्यू लेदर्ले यांच्या काळापासून नानासाहेब गोरे , पु. ल. देशपांडे, मोहन धारिया, मेधा पाटकर यांच्यासह अनेकांचा येथे नेहेमीच वावर होता.
फादर भाऊसाहेब संसारे यांनी सांगितले कि या वास्तूत पुन्हा एकदा कार्यक्रम आयोजित केले जातील.
या कार्यक्रमात हजर असलेल्या लोंकांचे हे छायाचित्र.
उजवीकडे कोपऱ्यात संस्थापक मॅथ्यू लेदर्ले यांचा फोटो आहे.

Camil Parkhe May 17, 2025



Sunday, December 8, 2024


मी बातमीदार बनलो तेव्हा म्हणजे १९८१ साली आम्हा पत्रकारांना आणि इतर बिगरपत्रकार वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वर्षातून दहा पगारी सुट्ट्या (हॉलीडेज) होत्या. रजा वेगळ्या.

तत्कालीन अस्तित्वात असलेल्या आणि बहुसंख्य प्रतितिष्ठ वृत्तपत्रांत अंमलबजावणी होत असलेल्या वृत्तपत्र कर्मचारी कायद्यानुसार या पगारी सुट्ट्या होत्या.
गोव्यात आमच्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी आणि `नवप्रभा' या जुळ्या मराठी दैनिकात वर्षातून काही दिवस - नूतन वर्ष एक जानेवारी, २६ जानेवारी, पंधरा ऑगस्ट, गणेश चतुर्थी, दिवाळी - छपाई बंद ठेवून सर्वांना सुट्टी मिळायची,
यात तीनचार वर्षांनी एक मेच्या कामगार दिनाची भर पडली.
याचे कारण त्याकाळात डाव्या विचारसरणीचा जोर होता आणि आम्ही गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस (गुज) चे पदाधिकारी असलेले श्रमिक पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचारी स्वतःला कामगार समजायचो. उरलेल्या पाच पगारी सुट्ट्या आम्ही वर्षातून कधीही घेऊ शकायचो.
त्याशिवाय पत्रकार कायद्यानुसार वर्षाला तीस हक्काची रजा, बारा आजारपणाची रजा आणि दहाबारा कॅज्युएल रजा असायच्या.
गोवा सोडून मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हापर्यंत अशीच स्थिती होती,
पुण्यात त्यावेळी म्हणजे १९८९ साली मात्र दैनिकांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या असायच्या.
त्यावेळची प्रत्येक स्थानिक दैनिक आपापल्या वर्धापनदिनानिमित्त छपाई बंद ठेवायचे. उदाहरणार्थ, `सकाळ' चा वर्धापनदिनाला एक जानेवारीला सुट्टी असायची, दोन जानेवारीला पेपर नसायचा.
ही परिस्थिती एकदोन वर्षात व्यवहारी दृष्टिकोनामुळे बदलली.
मुंबईतल्या `लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसने पुण्यात आवृत्त्या सुरु केल्या होत्या. या दोन्ही वृत्तपत्रांनी आपल्या प्रती `सकाळ' वर्गणीदारांच्या घरांत दोन जानेवारीला फुकटात देणे सुरु केले.
त्यावेळचा पुण्यात दोन क्रमांकाचा असणारा `प्रभात' दुप्पट किंवा त्याहून अधिक प्रती दोन जानेवारीला छापू लागू लागला.
पुण्यात `सकाळ', `प्रभात' आणि `केसरी' याशिवाय इतरही दैनिके आहेत, याचा वाचकांना यावेळी पहिल्यांदाच पत्ता लागला.
परिणामतः `सकाळ' व्यवस्थापनाने एक जानेवारीला वृत्तपत्राची छपाई बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला. प्रतापराव पवार यांनी नानासाहेब परुळेकरांचा `सकाळ' पाचसहा वर्षांपूर्वी खरेदी केला होता.
छपाई आणि काम सुरु राहिले तरी `सकाळ' कर्मचाऱ्यांना मात्र त्यादिवसाऐवजी इतर दिवशी सुट्टी घेता यायची, आजही ही सोय आहे.
मी `इंडियन एक्सप्रेस'ला असतानाच पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांनी होळीनिमित्त सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.
बहुतेक वृत्तपत्र व्यवस्थापकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. या वितरकांच्या मदतीशिवाय आपण आपल्या दैनिकाच्या प्रती लोकांना वाटू असाही इशारा त्यांनी दिला.
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपला सुट्टीचा निर्णय वृत्तपत्र व्यवस्थापनकांना कळवल्यानंतर तीनचार दिवस तणावाची आणि संघर्षाची परिस्थिती निंर्माण झाली होती, हे आजही आठवते
मात्र वितरकांनी आपली एकी कायम ठेवली आणि आम्हा वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना असलेल्या आणखी एका सुट्टीची भर पडली.
पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांना आपल्या ताकदीची जाणीव झाली,
याआधी वृत्तपत्र कर्मचारी संघटितरित्या वृत्तपत्राची सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकत असत. आता त्यांची जागा वृत्तपत्र वितरकांनी घेतली होती,
हळूहळू एक मे चा कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन, अशा सुट्ट्या वाढत गेल्या.
अलीकडेच दिवाळीनिमित्त पुण्यात दैनिकांची छपाई त्यामुळे दोन दिवस बंद असते.
पुण्यात काल आणि आज वृत्तपत्रे नाहीत.
मात्र किती वाचकांना या दोन दिवशी सकाळी चुकल्याचुकल्यासारखे किंवा दैनिकांची गैरहजेरी जाणवतअसेल ?
Camil Parkhe



Saturday, May 4, 2024

ख्रिस्ती मतदार
 अठरापगड जाती आणि जमातींचे समावेश असलेल्या ख्रिस्ती मतदारांचा महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत कुणाला कौल असणार आहे?

ख्रिस्ती समाजाचे राज्यात अधिकृत आणि अनधिकृत अशाप्रकारे तीन टक्क्यांच्या आसपास प्रमाण आहे.
भारतात सगळीकडे अगदी मुंबईपुण्यातसुद्धा धर्म, जात आणि पोटजात पाहून राजकीय पक्ष आपला उमेदवार देतात.
कारण मतदारसुद्धा त्याच पद्धतीने मतदान करतात.
महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विशेषतः विधानसभेत ख्रिस्ती समाजाचे एकगठ्ठा मतदान निर्णायक ठरु शकते याची तळागळावर काम असणाऱ्या राजकीय नेत्यांना माहिती असते.
याचा कधी तरी फटका बसला तर मग याची जाणीव होते.
एखादा उमेदवार थोड्याफार मतांच्या फरकाने पराभूत होतो अशावेळी मग एकगठ्ठा असलेल्या अशा मतदानामुळे ही किमया घडली हे कळते. असे मुंबईत एका प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अलीकडच्या काळात झाले होते.
त्यामुळें गाफील राहणे, कुठल्याही समजघटकाला दुर्लक्षित करणे धोकादायक ठरते.
इतर धर्मिय समाजाप्रमाणे निदान महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज एकसंघ, एक संस्कृतीचा किंवा एक भाषिक नाही. हे विशेषतः मुंबईपुण्यात जाणवते.
महाराष्ट्रात सर्वाधिक ख्रिस्ती मतदान आहे ते राज्याच्या राजधानीत.
मुंबईतल्या दोन लोकसभा मतदारसंघांत कुठलाही राजकीय पक्ष या समाजाला गृहीत धरू शकत नाही अशी तिथे परिस्थिती आहे. काटे की टक्कर असेल तर मग विचारूच नका.
मुंबईतला ख्रिस्ती मतदार हा पूर्णतः कॉस्मोपोलीटन आहे. मूळचे गोंयकार असलेले अनेक कॅथोलीक्स बांद्रा, चेंबूर, गोरेगाव वगैरे परीसरात मोठ्या संख्येने आहेत.
त्याशिवाय मूळचा दाक्षिणात्य असलेला ख्रिस्ती मतदार आहे,
त्याशिवाय संपूर्ण राज्यातून मुंबईत स्थायिक झालेल्या मराठी भाषक ख्रिस्ती समाज सुद्धा लक्षणीय आहे. भाषा, संस्कृती वगैरे कारणांमुळे या मराठी ख्रिस्ती लोकांचे वेगळेपण पटकन लक्षात येत नसते.
मुंबईत पाय रोवलेल्या या लोकांची नाळ आपल्या गावांकडे कायम असतेच. गावाकडच्या मतदानावरसुद्धा त्यांचा प्रभाव असतोच.
एकेकाळी म्हणजे सत्तरच्या दशकात मुंबईतून समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो विधानसभेवर निवडून येत असत.
त्याआधी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या काँग्रेसच्या स. का. पाटील यांना नंतर ' बंदसम्राट ' असे नाव कमावलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी चक्क लोकसभा निवडणुकीत हरवले होते !
डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे केवळ महापौर नव्हते तर नंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री सुद्धा बनले.
शेजारच्या वसईतून एखादे गोन्सालवीस किंवा इतर कुणी आमदार म्हणून निवडून येत असत.
मुंबईच्या सेलीन डिसिल्वा या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८३-८४) आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८५) राज्यमंत्री होत्या.
या समाजाच्या प्रतिनिधीला त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही.
.
कोकणात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या परिसरात फर्नांडिस, डिसोझा, डान्टेस, अशी नावे असणारी मूळची गोंयकार असलेली मंडळी लक्षणीय संख्येने आहेत.
गेल्या दोनतीन शतकात पोर्तुगीजांच्या गोव्यातून इथे हे कॅथोलिक लोक स्थायिक झालेत. त्यांना दुर्लक्षित करून कुठल्याही पक्षाला, उमेदवाराला विजयी होता येत नसते.
इथे एखादा कॅथोलीक उमेदवार सोशल इंजियरींगच्या आधारावर विधानसभेवर निवडून येऊ शकतो.
मुंबई आणि वसईनंतर ख्रिस्ती मतदानाचा सर्वाधिक टक्का आहे तो पुण्यात.
पूर्वी बारामती मतदारसंघात असलेले पिंपरी चिंचवड शहर आता मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॉस्मोपोलिटन ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व लगेच जाणवते. तिथले कॉलेज आणि इतर शिक्षणसंस्था या ख्रिस्ती समाजाची ओळख आहे.
अहमदनगर, नाशिक जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा येथे ख्रिस्ती समाज आपली खास ओळख राखून आहे. हा समाज तिथल्या मातीतला आहे, त्यामुळे आपल्या पाठीशी कोण राजकारणी उभा राहतो हे हा समाज पुरता ओळखून आहे.
संकटाच्या वेळी आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्ते या समाजाच्या पाठीशी असतात हे अनेकदा दिसून आले आहे. याचे कारण हा समाज आंबेडकरवाद्यांना परका मुळीच नाही. रक्ताचे आणि नात्यातले संबंध आहेत त्यांचे.
हे लोक ख्रिस्ती असल्याने भाजप आणि पूर्ण परिवार त्यांच्याकडे नेहेमीच संशयाने पाहत असतो हे साहजिकच.
तर मग या ख्रिस्ती मतदारांचा नैसर्गिक ओढा कुठल्या राजकीय पक्षांकडे असतो?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष ख्रिस्ती समाजाला गृहीत धरून असतात..
"तुम्ही जाऊन, जाऊन जाणार कुठे ? "असा मग्रुरीचा भाव.
पण खरेच तसे आहे काय?
एक सांगतो.
विसेक वर्षांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेत मागच्या वेळी एक ख्रिस्ती नगरसेविका निवडून आली होती. अश्विनी डॅनिएल लांडगे हे त्यांचे नाव.
त्यांना हैदराबादच्या ओवेसी यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. `एमआयएम'च्या त्या एकमेव नगरसेविका होत्या.
अशाप्रकारे आज कुठला राजकीय पक्ष ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करू शकेल?
यावेळी या राजकीय फाटाफुटीच्या काळात ख्रिस्ती मतदार कुणाच्या तागडीत आपला कौल टाकणार आहेत?
काही अंदाज?
यापुढील काही पोस्ट्समध्ये याविषयी सविस्तर लिहिणार आहे....
****
फोटो ओळी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांची भेट घेऊन त्यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे. अंतोन कदम
यावेळी हजर होते.
Camil Parkhe