Showing posts with label Bible. Show all posts
Showing posts with label Bible. Show all posts

Friday, December 6, 2024

 कुठल्याही प्रार्थनास्थळाच्या आवारात संबंधित देवदैवतांच्या तसबिरी आणि धर्मग्रंथांतील वचने असतात. काल या देवळाच्या प्रशस्त आवारात शिरलो अन डाव्या बाजूला या कोनशिलावजा फलकाकडे लक्ष गेले आणि मी चमकलो.

तो फलक पाहून मी चमकलो, याचेही मला नंतर आश्चर्य वाटले.
याचे कारण म्हणजे या मंदिराच्या स्थापनेपासुन म्हणजे गेली तीस वर्षे मी तिथे वेळोवेळी जात आलेलो आहे. दादाबाई असताना घरच्यांना भेटण्यासाठी येथे माझे कायम येणेजाणे असायचे.
रविवारच्या मिस्सेसाठी या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी शहरातील हे दुसरे चर्च बांधण्यात आले आहे.
अलिकडच्या काळात जेथेजेथे मी गेलो तिथेतिथे हा फलक पाहून त्याभोवती फोटो काढण्याचा मला मोह झाला आहे. उदाहरणार्थ, पुण्यातील नव्या पेठेतील एस एम. जोशी स्मारकातील भारतातील राज्यघटनेच्या प्रास्तविकेचा हा फलक.
दर पंधरा ऑगस्टला चर्चमध्ये गायला जाणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतील ती प्रसिद्ध ओळसुद्धा या फलकावर कोरली आहे,
प्रागतिक विचारसरणीच्या संस्थांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्तविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करावा, लोकांमध्ये याबाबत जाणिव निर्माण करावी यात काही विशेष नाही.
त्यांच्या मूलभूत उद्दिष्ट्यांचा तो एक भाग असतो.
असेच कार्य करण्यासाठी लोयोला दिव्यवाणी चर्चच्या आवारात अगदी प्रवेशद्वारातच येशू ख्रिस्ताची प्रतिमा किंवा बायबलच्या वचनांऐवजी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत मांडलेल्या लोकशाही देशाच्या आदर्श तत्त्वांचा पुरस्कार करावा याचे मला सद्याच्या वातावरणात विशेष कौतुक वाटले.
गेल्या तीस वर्षांच्या काळात या अतिपरिचित फलकाच्या अस्तित्वाची मला कधी जाणिवही का झाली नाही याचेही मला लगेच उत्तरही मिळाले.
Where the mind is without fear
and the head held high;
Into that heaven of freedom,
my Father, let my country awake.
^^
Camil Parkhe, November 11, 2024

Tuesday, September 3, 2024

 

या चित्राचा संदर्भ काय आहे, हे कितीजण चटकन सांगू शकतील?

इतर कुठल्याही धर्मग्रंथांप्रमाणे बायबलमध्ये सुद्धा स्त्रियांना गौण किंवा नगण्य स्थान आहे. संपूर्ण बायबलमध्ये म्हणजे जुन्या आणि नव्या करारांत स्त्रियांची पात्रे क्वचितच आढळतात.
अनेकदा या पात्रांना स्वतःचा चेहेरा, नावगाव म्हणजे ओळखसुद्धा नसते. अमुक याची आई, तमुकची पत्नी, एलीया या संदेष्ट्याला ऐन दुष्काळात तेल आणि पीठ पुरवणाऱ्या स्त्रीची ओळखसुद्धा शेवटपर्यंत `एक गरीब विधवा' अशीच राहते.
पहिला मानव. असलेल्या आदामची सहचारिणी इव्ह, लहानग्या मोझेसचा जीव क्लुप्तीने वाचवणारी त्याची आई आणि बहिण, रुथ, राणी इस्थेर अशा काही मोजक्या स्त्रियांना थोडेफार स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
नव्या करारात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आगमनानंतरच्या भागातसुद्धा काही मोजक्याच स्त्रियांची पात्रे येतात.
येशूची आई मारीया, सेंट जॉन द बॅप्टिस्टची आई एलिझाबेथ. मेरी माग्दालेन आणि कुकर्म करत असताना पकडलेली आणि त्यामुळे मॉब लिंचिंगची बळी होऊ शकणारी एक स्त्री येशूमुळे वाचते.
त्याचे कारण म्हणजे `तुमच्यापैकी जो कुणी निष्पाप असेल त्याने हिच्यावर पहिला धोंडा उचलावा' असा येशूचा त्या झुंडशाहीला सल्ला असतो.
येशूच्या बारा शिष्यांमध्ये एकही स्त्री नाही. त्याचप्रमाणे नव्या ख्रिस्ती मंडळींना पत्रे लिहून ख्रिस्ती धर्मतत्त्वांची मांडणी करणाऱ्या सेंट पॉल, सेंट पिटर वगैरे व्यक्तींमध्येही एकाही महिलेला जागा नाही.
`बायबलमधील स्त्रिया' या एकाच शिर्षकाची मराठीत अलीकडेच दोन नवी पुस्तके आली आहेत.
एक आहे सरोजिनी नीलकंठ साळवी यांनी लिहिलेले. (चेतक बुक्स, पुणे ) आणि दुसरे आहे डॉ. अनुपमा निरंजन उजगरे, वर्णमुद्रा प्रकाशनने प्रकाशित केलेले.
तर `या चित्रातील दोन महिला कोण आहेत ' या प्रश्नांचे उत्तर बायबल अगदी थोडेफार माहित असलेल्या व्यक्तीला अगदी सहज देता येईल. .
या दोघी बहिणी आहेत मारिया आणि मार्था. दोन प्रसंगांत या दोन बहिणींचा येशूच्या चरित्रात म्हणजे गॉस्पेलमध्ये होतो.
वरील चितारलेल्या प्रसंगाचे फादर फ्रान्सिस दिब्रिटोकृत `सुबोध बायबल'मध्ये खालील शब्दांत वर्णन आहे :
``प्रवास करीत असता येशू बेथानीला आला, तिथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले, तिला मारीया नावाची बहीण होती. ती प्रभूच्या चरणी बसून त्याची अमृतवाणी ऐकत होती.
स्वयंपाकघरात मार्थाला पाहुणचाराचे पुष्कळ काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली. ती येशूकडे येऊन त्याला म्हणाली "प्रभुजी, माझ्या बहिणीने कामाचा सगळा भार माझ्या एकटीवर टाकला आहे. ह्याचे आपल्याला काहीच वाटत नाही काय? मला मदत करायला तिला सांगा ना:"
प्रभुने तिला उत्तर दिले, ' मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. मारीयेने जे चांगले आहे, त्याची निवड केली आहे. ते तिच्यापासून हिरावून घेतले जाणार नाही.''
हे झाले या पोस्टमध्ये दिलेल्या या चित्राविषयी.
आता या चित्राच्या चित्रकर्तीविषयी.
भारतात आणि जगातही फार कमी संख्येने महिलांनी चित्रकलेत नाव कमावले आहे.
भारतातल्या पहिल्या काही चित्रकर्तींमध्ये मूळ गोव्याच्या असलेल्या अँजेला त्रिंदाद (१९०९-१९८०) यांचा समावेश होतो.
ब्रिटिशकाळात बंगाल स्कुल ऑफ आर्ट आणि मुंबई स्कुल ऑफ आर्ट या दोन कलाशाखा उगमास आल्या, त्यापैकी अँजेला त्रिंदाद या मुंबई स्कुल परंपरेतील.
मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्टची स्थापना १८५७ ची.
मुंबईत जन्मलेल्या अँजेला यांनी भारतीय परंपरेतील म्हणजे भारतीय प्रतिमांचा वापर करुन ख्रिस्ती धर्मसंकल्पनांतील अनेक चित्रे रेखाटली.
हे चित्र यापैकी एक.
साधना बहुलकर यांनी लिहिलेल्या `बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार (१८५७-१९५०)' या पुस्तकाचे (राजहंस प्रकाशन, २०२१) मुखपृष्ठ आहे.
या पुस्तकात साधना बहुळकर यांनी अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, दुर्गा भागवत यांच्या बहीण विमल भागवत गोडबोले, मारी हेंडरसन - टेंपल, मरदा नाखमन -आचार्य, अमृता शेरगील वगैरे महिला चित्रकारांच्या जीवन आणि चित्रकलाविषयी लिहिले आहे.
ख्रिस्ती धर्मपरंपरा आपल्या चित्रांत भारतीय प्रतिमांसह म्हणजे पूर्णतः भारतीय शैलीत आणणाऱ्या चित्रकार अँजेला त्रिंदाद यांचे फार मोठे योगदान आहे.
Camil Parkhe

Wednesday, November 2, 2022

देहविक्री हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय

 श्रीरामपूरला आमच्या घरापासून चारशे-पाचशे मीटर अंतरावर आणि आमच्या सोमैय्या शाळेच्या मागे दहावीस घरांची वस्ती होती. आमच्या चाळीतल्या घरांसारखीच ही घरे सुध्दा कुडांची आणि पांढऱ्या मातीने बांधलेली होती. मात्र तरी या वस्तीला ` सफेद गल्ली’ किंवा ` पांढरी वस्ती’ या नावाने ओळखले जायचे.

या सफेद गल्लीला मी अनेकदा लांबून पाहिले, तिथून अगदी जवळून जाण्याची अनेकदा वेळ आली. या गल्लीत बहुधा एकदोन खोल्या असणाऱ्या घरांची समोरासमोर असलेली दारे होती, तिथल्या बाया अनेकदा दारापाशी बसून मशेरीनं दात घासत आपापसांत गप्पा मारत बसलेल्या दिसायच्या, किराणा दुकानावर त्या यायच्या, तेव्हा त्यांच्यापैकी काहींचे, विशेषतः प्रौढ बायांचे चेहरे काहीसे वेगळे, फुगलेले वाटायचे.
त्या `सफेद गल्ली’पाशी असलेल्या बाजारतळासमोरच्या मैदानावर आठवडी बाजाराच्या दिवशी शुक्रवारी तमाशाचे खेळ व्हायचे. या तमाशाबाबत वडीलधारी लोकांमध्ये खुलेपणाने कधी चर्चा झाल्याचे मी कधीही ऐकले नाही तसेच या पांढऱ्या घरांबाबत आणि त्या घरांत राहणाऱ्या बायांबाबत कधी वाईट किंवा चांगले बोललेले मी कधी ऐकले नाही. त्याकाळी शाळेच्या मागे त्या परिसरातील लोकांसाठी श्रीरामपूर नगरपालिकेने पुरुषांसाठी बारा आणि बायांसाठी बारा संडास बांधले होते. ते `बारा संडास’ असा अगदी सहजगत्या उल्लेख व्हायचा तसेच त्यामागची ती `पांढरी गल्ली’ असा तितक्याच सहजतेने उल्लेख व्हायचा.
शरीरधर्मासाठी दोन्हीही आवश्यकच..
सत्तरच्या दशकात गोव्यात मी शिकत असताना आणि नंतरच्या काळात पणजीला बातमीदारी करत असताना वॉस्को शहराजवळचा बायना बिच हा `रेड लाईट एरिया’ म्हणून प्रसिद्ध होता. समुद्रकिनारी असलेले बंदर अनेकदा कायम नौकानयनावर असलेल्या लोकांची आणि सैनिकांची शरीरसंबंधांची भूक भागवत असत.
ऐंशीच्या दशकात गोव्यात ताळगावला आमच्या `द नवहिंद टाइम्स’ आणि `नवप्रभा’ या जुळया इंग्रजी-मराठी दैनिकांतील आम्ही तीन सहकारी नारळांच्या झाडांनीं वेढलेलं एक बैठे टुमदार कौलारु घर भाड्याने घेऊन एकत्र राहत होतो. दरमहिना पाचशे रुपये भाडे होते या पाच खोल्यांच्या घराचे. आमच्यातल्या एक ज्येष्ठ सहकारी आपल्या पार्टनरबरोबर या घरात राहत असायचा, वेश्यागमनासाठी बायना बिचवर कि इतर कुठंकुठं हा माझा सहकारी जायचा तेव्हा तिथल्या या तरुणीला तो आपल्याबरोबर राहण्यासाठी म्हणून कायमचा घेऊन आला होता. मूळची कर्नाटकची असलेली ती आम्हा सगळ्यांबरोबर हिंदीत बोलायची. एका खोलीत मी आणि माझ्याच वयाचा, विशीच्या आसपास असलेला तो दुसरा तरुण सहकारी राहायचा.
या बंगलीवजा घराच्या आतल्या कुठल्याही रुमला दारं नव्हती आणि खिडक्यांनाही गज नव्हते. रात्री खूप उशिरा मी आलो कि स्वयंपाकघराच्या एका खिडकीची वरची कडी विशिष्ट पद्धतीनं खोलून मग ती खिडकी उघडून इकडंतिकडं न बघता मी सरळ माझ्या खोलीकडं जायचो.
एक दिवस मी रात्री घरी आलो तर या मुलानं मला सांगितलं कि सावंतवाडीहून त्याची मामेबहिण आज मुक्कामाला आली आहे, त्यामुळं त्या रात्री मी त्या रुमबाहेर झोपावं. काही हरकत न घेता मी त्याच्या सांगण्याप्रमाणं केलं. काही दिवसांनी तो मुलगा त्याच्या दोन चुलत कि मामे बहिणींना घेऊन आला होता आणि मग परत मला त्या खोलीबाहेर झोपावं लागलं.
दोनतीन दिवसांनी त्या मुलाच्या नातेवाईक बहिणींचा विषय सहज आमच्या तिसऱ्या सहकाऱ्याच्या पार्टनरशी बोलताना निघाला तेंव्हा ती एकदम खोखो हसत सुटली. मी मख्खपणे तिच्याकडं पाहत राहिलो तेव्हा ती हिंदीत मला म्हणाली, '' कामिल, तुम्ही किती बावळट आहात ! त्यानं तुम्हाला त्या मुली त्याच्या चुलत आणि मामे बहिणी आहेत असं सांगितलं आणि तुम्ही त्यावर सरळसरळ विश्वास ठेवला ? कमाल आहे बाई तुमच्या भोळसटपणाची आणि मुर्खपणाची! '' आणि ती पुन्हा तोंडाला पदर लावून पुन्हा हसत सुटली तेव्हा कुठं माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला!
गोव्यात मी पत्रकारितेची सुरुवात केली ती मुळी एज्युकेशन कॅम्पस आणि क्राईम रिपोर्टर म्हणूनच. दोन्हींचे जग अगदी वेगवेगळे. क्राईम रिपोर्टर म्हणून पोलीस, गुन्हेगारी विश्व आणि कधी ना कधी कायदा उल्लंघन करणारे लोक आणि त्यामुळे पोलिसांशी संबंध येणारे लोक यांच्याशी जवळून अनुभव आला. पोलिसांकडून या ना त्या कारणामुळे पकडले जाणारे लोक चोर वा गुन्हेगार असतातच असे नाही, याचा अनेकदा अनुभव आला.
पणजी पोलिस स्टेशनवर मुख्य असलेला फौजदार अलेक्स फर्नांडिस हा माझा जवळचा मित्र आणि क्राईम बिट सांभाळत असलेल्या माझ्यासाठी एक महत्त्वाचा स्त्रोत. पणजीतल्या आझाद मैदानावरच्या पोलिस मुख्यालयातली माझी भेट अलेक्सला `हाय’ केल्याशिवाय, त्याचाशी दोन शब्द बोलल्याशिवाय पुरी होत नसायची. कधीकधी फौजदार अलेक्स मला त्याच्या पोलिस जीपमधून पणजीतल्या `राऊंड’वर किंवा अगदी गुन्ह्याच्या घटनास्थळी घेऊन जायचा.
त्यादिवशी मात्र अलेक्स मला एका वेगळ्याच कामगिरीवर घेऊन गेला. त्यावेळी अंमलात असलेल्या `सिटा’ म्हणजे सप्रेशन ऑफ इममॉरल ट्रॅफिक ॲक्टीव्हीटीज अँक्टनुसार छापा घालण्यास आपण जात आहोत असे ऐकल्यावर मी सावध झालो होतो. आता या अँक्टमधील `सप्रेशन’ शब्दाची जागा `प्रिव्हेंशन’ ने घेतल्याने `सिटा’ ऐंवजी `पिटा’ असे नामानिधान झाले आहे.
पोलिस जीप पणजीहून चारशे वर्षांचा पोर्तुगीजकालीन पाटो पुल आणि पणजी बसस्टॅण्ड ओलांडून ओल्ड गोव्याच्या दिशेने धावू लागली आणि रायबंदर येथे रस्त्याशेजारी एकमजली इमारत असलेल्या एका लॉजपाशी थांबली. जीपमधल्या काही पोलिसांनी धावत जाऊन लागलीच मोक्याच्या जागा घेतल्या आणि इतर पोलिस तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावरच्या बंद खोल्यांना जोरजोराने ओरडत धडका देऊ लागले. सगळीकडे एकच गोंधळ माजला. दुपारचे चारपाच वाजले असावे.
त्यानंतर काय घडले ते सर्व काही येथे सांगता येणार नाही. मात्र सगळ्याच रूम्सचे दरवाजे काही क्षणात उघडले गेले आणि जेमतेम अब्रू राखण्यासाठी आवश्यक असणारे कपडे असलेले स्त्रीपुरुष पॅसेजमध्ये उभे राहिले.
आपण दोघे कोण आहोत, म्हणजे नवराबायको की दुसरे कोण आहोत, इथे कशासाठी आलो आहोत वगैरे सांगण्यात मग काही वेळ गेला. त्याकाळात आधार कार्ड वगैरे ओळखपत्रे नसायची, वैवाहिक संबंध दर्शवण्यासाठी मंगळसूत्रे दाखवले जायचे.
`कारवारचा शिक्षक’ म्हणून आपली ओळख सांगणाऱ्या एका मध्यमवयीन इसमाने अखेरीस आपल्याबरोबर असलेली महिला `आपली बायको नाही’ याची कबुली पाच मिनिटांत दिली. असेच इतरांच्या बाबतीत घडले, त्यांची चौकशी करुन पकडलेल्या महिलांना महिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि लॉजच्या काही नोकरांना पोलिस स्टेशनवर आणले गेले.
देहविक्रीशी संबधित असलेल्या हॉटेलमधील लोकांबाबत आणि इतरांबाबत कशाप्रकारे कारवाई केली जाते याचा मी अनुभवलेला हा प्रसंग. पुढच्या काळात क्राईम रिपोर्टिंग करताना हा अनुभव खऱ्या अर्थाने पथदर्शक ठरला.
भारतातल्या प्रचलित कायद्यानुसार देहविक्रीच्या गुन्ह्यांत महिलेला दोषी किंवा गुन्हेगार ठरवले जात नाही, उलट `पिडित’ म्हणून त्यांची सुधारणागृहात रवानगी होते आणि संबंधित लॉजचे मॅनेजर, कामगारवर्ग वगैरेंना वेश्याव्यवसाय चालवण्यावरून अटक होते, लॉजचे मालक मात्र नेहेमीच या कारवाईपासून दूरच असतात.
एकदा रात्री पणजी पोलिस स्टेशनवर नव्यानेच रुजू झालेल्या आणि नाईट ड्युटीवर असलेल्या एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाबरोबर जीपने राऊंडला मी गेलो होतो. रात्री साडेदहाच्या आसपास पोलिस स्टेशनवर परतलो तेव्हा दर्शनी खोलीत कोपऱ्यात विशीच्या आसपास असलेली एक महिला दोन्ही पाय दुमडून, अवघडून बसलेली दिसली. मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या कंपाल ग्राउंडजवळ रस्त्यावर उभी राहून ती गिऱ्हाईक शोधत उभी होती म्हणून तिला पोलिस चौकीत आणले होते. बहुधा तिच्याच सुरक्षितेच्या कारणास्तव.
वेश्याव्यवसायाचा विषय निघाला कि मला आजही ती कोपऱ्यात अवघडून बसलेली ती तरुणी हमखास आठवते.
काही वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलीसह युरोपच्या सहलीवर होतो तेव्हाची गोष्ट. पॅरीस शहर जगातली रोमान्स नगरी आणि फॅशनचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. पॅरीसच्या आठवड्याभरच्या त्या वास्तव्यात आम्ही मॉन्तमार्ट या भागात राहत होतो. पॅरीसमधलं सर्वात मोठे आणि उंच टेकडीवर असलेले चर्च म्हणजे बॅसिलिका ऑफ सेक्रेड हार्ट (पवित्र हृदयाची बॅसिलिका) इथं आहे आणि या चर्चच्या खालचा परीसर चित्रकला, फोटोग्राफी वगैरे कलांसाठी जगप्रसिद्ध आहे. गेल्या काही शतकांत मॉन्तमार्ट इथं नामवंत चित्रकारांनी हजेरी लावली आहे.
मॉन्तमार्ट इथल्या भूमिगत आणि जमिनीवर असलेल्या मेट्रोमार्गाभोवती फिरताना मला एका गोष्टीचं सतत आश्चर्य वाटायचं ते म्हणजे इथं असलेली सेक्स टॉईज विकणारी अनेक दुकानं.
त्यानंतर मला कळालं कि हा परिसर आणखी एका गोष्टीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे ती म्हणजे देहविक्री. आम्ही दररोज ज्या हॉटेलात जेवणासाठी जायचो तिथल्या मूळचा ट्युनिशियन असलेल्या मॅनेजरनं मला सांगितलं कि रात्री दहानंतर शक्यतो रस्त्यावर फिरू नका, कारण त्यावेळी देहविक्रीसाठी आमंत्रण देणाऱ्या महिला जागोजागी उभ्या असतात, आपल्या गिऱ्हाईकाच्या शोधात फिरत असतात.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ला `सकाळ टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा आणि भारताचा पत्रकार प्रतिनिधी म्हणून थायलंड येथे भरलेल्या उद्योगविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला मी हजर होतो. भारतातल्या सहा पत्रकारांमध्ये आणि जगातल्या ७४ पत्रकारांमध्ये माझा समावेश होता. थायलंडमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे आणि या व्यवसायात महिलांबरोबर पुरुषसुद्धा आहेत. आशिया खंडातली सेक्स कॅपिटल’ असाच थायलंडचा बोलबाला आहे.
बँकॉक इथल्या आमच्या हॉटेलसमोर असलेल्या मसाज पार्लरच्या किंवा `स्पा'च्या मुली आणि महिला दिवसभर आणि रात्रभर रस्त्यावर चालणाऱ्या पुरुषांना आपल्याकडं हाक मारून बोलवत असायच्या.
गोव्यात पर्यटक म्हणून गेल्यावर तिथं दारु प्यायलाच हवी किंवा पुण्यात मित्रांबरोबर मजा मारण्यासाठी आल्यावर तिथल्या बुधवार पेठेत जायलाच हवं असं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांतून येणाऱ्या काही तरुणांना वाटत असतं. तसंच थायलंडला आल्यावर तिथल्या मसाज पार्लरला भेट द्यायलाच हवी, त्याशिवाय या देशाची सहल पुर्ण होऊ शकत नाही, असाच अनेकांचा समज असतो.
आमच्या एका कॉमन मित्राच्या बोलण्यावरुन थायलंडची कीर्ती कानावर पडलेल्या माझ्या पत्नीनंसुद्धा हा `स्पा'चा काय प्रकार आहे त्याचा अनुभव घे असं मला सांगितलं म्हणजे चक्क बजावलंच होतं !
बॅंकॉंकला रस्त्यांवरच्या इमारतींत जागोजागी ` हेल्थ स्पा', `थाई मसाज’ असं लिहिलेलं आढळतं. तिथं ग्राहकांच्या हातापायाला किंवा पूर्ण अंगाला मसाज करणाऱ्या मुली, महिला रस्त्यांवरुन जाणाऱ्या लोकांना पारदर्शक काचांमुळे स्पष्ट दिसतात. ग्राहक कोचवर पडून त्याच्या शरीराला तेल लावून मुली आणि महिला मसाज करत असतात आणि असे चारपाच ग्राहक आपापल्या कोचावर ओळीने बसलेले, पालथे पडलेले बाहेरुन स्पष्ट दिसत असते. अशी मालिश करवून घेताना आडूनलपून राहण्याची मुळी गरजच नसते.
हा, मात्र काही `हेल्थ स्पा'मध्ये आंबटशौकीन ग्राहकांना `इतर' सेवा पुरवण्यासाठी आतल्या भागांत, पहिल्या मजल्यांवर वेगळे कक्ष असतात. आणि विशेष म्हणजे ही सर्व सेवा कायदेशीर असते, पोलिसांची किंवा इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाची तिथे धाड पडण्याची भीती मुळीच नसते.
थायलंडच्या कीर्तीला जागून त्यानुसार माझ्याबरोबर असलेला एक भारतीय पत्रकार दररोज रात्री नवनव्या मसाज पार्लरला भेट देत होता.
पहिल्या दिवशी घाबरत घाबरत मीही माझ्या पत्रकार मित्रासह आमच्या हॉटेलसमोरच असलेल्या `स्पा'मध्ये गेलो आणि तो मित्र `आतल्या’ भागात गेल्यावर मी स्वतःच्या अंगाखांद्याला मसाज करवून घेतला. नाहीतर भारतात परतल्यानंतर मित्रांनी आणि इतरांनी वेड्यात काढले असतं अशी भीती होती. त्या तरुण मुलींकडून असा मसाज करवून घेताना मी स्वतःच प्रचंड अवघडलो होतो आणि वेळेच्या आधीच '' बस्स, इतकं पुरं झालं !'' म्हणून स्वतःची सुटका करुन घेतली आणि हुश्श्य केलं.
खूप वर्षांपूर्वी पंचविशीच्या उंबरठ्यावर मी असताना बल्गेरिया येथे अनुभवलेला असाच एक प्रसंग त्यावेळी आठवला होता. बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना काही आठवड्यांनंतर केस खूप वाढले म्हणून मी एका सलून मध्ये शिरलो. तेव्हा अनपेक्षितपणे तिथं काम करणाऱ्या एका तरुणीनं केस कापण्यासाठी माझ्या डोक्याचा ताबा घेतला होता. नंतर डोक्याला मालिश पण केली होती. तेव्हा तो अर्धा पाऊण तास मी असाच बावचळून आणि अवघडून गेलो होतो हे आठवलं.
अशा प्रसंगाला मला तोंड द्यावं लागणार अशी मला कल्पना असती तर कदाचित माझा प्रतिसाद आणि वागणं जरा दुसऱ्या प्रकारचं असलं असतं ! सोफिया शहराच्या बांकिया उपनगरात माझ्या रुमवर परतल्यावर हा प्रकार मी इतर भारतीय पत्रकारांना सांगितला होता. दुसऱ्या दिवशी मग यापैकी अनेकांनी केस कापण्यासाठी सोफियाची लोकल ट्रेन पकडली होती.
थायलंडच्या दौऱ्यात मित्र बनलेला हा पत्रकार सहकारी माझ्याहून दहा वर्षांनी लहान होता, त्या पत्रकार सहकाऱ्यासारखं आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचं, आतल्या कक्षात जाण्याचं मला धाडस झालं नाही. `स्पिरिट इज विलिंग बट द फ्लेश इज विक' हे प्रसिद्ध वाक्य आहे. इथं अगदी उलट स्थिती होती, फ्लेश इज विलिंग बट द स्पिरिट इज विक ! पुर्वसंचित नैतिक, धार्मिक व सामाजिक संस्कारांचं दडपण, ओझं असं सहजासहजी झुकारता येत नाही हेच खरं ! मग एखादे कृत्य कायदेशीर किंवा बेकायदेशीर असो वा नसो !
देहविक्री करणे हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे असं म्हटलं जातं. वेश्यांना किंवा व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांना (पुरुषांना नव्हे !) नेहेमीच तिरस्करणीय वागणूक मिळत आली आहे. व्यभिचार करणाऱ्या किंवा नैतिक गैरवर्तन करणाऱ्या दोन महिलांचा बायबलमध्ये नव्या करारात उल्लेख येतो.
ज्युंच्या प्राचीन कायद्यानुसार व्यभिचार करणाऱ्या महिलेला लोकांनी सार्वजनिकरित्या दगडाने ठेचून ठार करण्याची शिक्षा दिली जात असे. व्यभिचार करताना पकडल्या गेलेल्या एका महिलेचा ``आपण काय न्यायनिवाडा करताल?'' असं येशू ख्रिस्ताची परिक्षा करण्याच्या हेतूनं, त्याला अडचणीत टाकण्यासाठी विचारलं जातं. त्या स्त्रिला दगडानं ठेचण्याच्या शिक्षेचं येशूनं समर्थन न केल्यास तो धर्मशास्त्राविरुद्ध आहे असं सांगायला हे लोक टपलेलं असत.
मात्र, ``तुमच्यापैकी ज्या कुणी आतापर्यंत एकही पाप केलेलं नसेल त्या व्यक्तीनं त्या व्यभिचारी महिलेच्या अंगावर पहिला दगड टाकावा'' असं जमिनीवर मातीत बोटांनी लिहून येशू सांगतो आणि ते ऐकून तिथं जमलेले सगळे लोक हातातला दगड खाली टाकत एकापाठोपाठ तेथून पाय काढतात अशी ही एक मार्मिक कथा आहे.
वेश्याव्यवसाय सर्वाधिक प्राचीन असला तरी कायमच तिरस्करणीय राहिला आहे. इतकेच नव्हे तर स्त्रीपुरुषांचे असलेले शारीरिक संबंधसुद्धा नैसर्गिक, पवित्र मानले जात नाही. अगदी विवाहित पतिपत्नींचेसुद्धा. आपल्याकडं आणि खरं पाहिलं तर जगात सगळीकडे सर्व समाजांत आणि धर्मांत शरीरधर्म वाईट असंच समजलं जातं.
``ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यु'' असलं तत्त्वज्ञान एकेकाळी खूप लोकप्रिय आणि त्यामुळं पौंगडावस्थेत नुकत्याच येणाऱ्या तरुण मनाला घाबरुन सोडणारं होतं. त्यामुळे दैवी संबंधांमुळं किंवा अनैसर्गिक पद्धतीने झालेले जन्म श्रेष्ठ असं समजलं गेलं आणि अशाप्रकारे जगात विविध धर्मांतली दैवतासमान मानल्या गेलेल्या व्यक्ती दैवी किंवा अनैसर्गिक संबंधांतून जन्माला आली असं दाखवलं गेलं.
याचं सरळसरळ कारण म्हणजे स्त्रीपुरुषांचे शरीरसंबंध एकतर तिरस्करणीय किंवा हीन मानले गेले. पृथ्वीवर तपस्या करणाऱ्या ऋषीमुनींना त्यापासून प्रवूत्त करण्यासाठी आणि त्यांना वाममार्गाला ( !) लावण्यासाठी मग स्वर्गातून अप्सरा पाठवल्या जातात. स्त्री म्हणजे मोक्षमार्गातली एक धोंड असाच सगळीकडं मानलं गेलं आहे.
स्त्रीपुरुषांच्या नैसर्गिक असलेल्या शरीरसंबंधांविषयी असलेल्या घृणेमुळे पुढे ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक धर्मगुरुंवर अविवाहीत राहण्याचं बंधन आलं जे आजतागायत कायम आहे. प्रोटेस्टंट पंथांत मात्र विवाहित धर्मगुरु असतात. भारतीय प्राचीन संस्कृतीत साधूसंतांनी, गुरुवर्यांनी आणि देवमाणसांनी संसारी असणे, प्रापंचिक असणे तितके तिरस्करणीय समजले जात नसायचे, हे विविध ऋषीमुनींच्या उदाहरणांनी स्पष्ट होते. आजन्म अविवाहित राहण्याचं व्रत घेऊन मिशनरी वृत्तीनं सेवा करण्याचं व्रत घेणाऱ्या कॅथोलिक ख्रिस्ती धर्मगुरुंचं अनुकरण मात्र भारतात काही संघटनांनी केलं आहे.

स्त्री किंवा एकूणच कामजीवन हे मोक्षमार्गातली र्धोंड मानले गेले आहे त्यामुळेच `सावधान; असं कानावर पडताच किंवा पडण्याआधीच काही जण बोहल्यावरुन मागे फिरतात. मी स्वतःसुद्धा जेसुईट धर्मगुरु होऊन आजन्म अविवाहित राहण्याचं व्रत घेण्याचं ठरवलं होतं. नंतर हा निर्णय मी बदलला तो काही वेगळ्या कारणांनी, केवळ लग्न करण्यासाठी नाही.

औपचारिकरीत्या संन्यासी व्रतबद्ध होण्याआधीच मी `सावधान' होऊन माघारी फिरलो आणि त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी गृहस्थाश्रम स्विकारला.
वेश्या केवळ स्त्रियाच असतात किंवा वेश्या व्यवसाय केवळ स्त्री आणि पुरुष या दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच चालतो ही एक गैरसमजूत आहे. गेल्या काही वर्षांत या समजुतीला तडे गेल्याचे दिसत आहेत. अलीकडेच डॉ. माधवी खरात यांनी लिहिलेली आणि कुणाल हजेरी यांच्या चेतक बुक्सने प्रकाशित केलेली `जिगोलो’ या नावाची पुरुष वेश्याच्या जीवनावरची कादंबरी मी त्या विषयाच्या नाविन्यामुळं एका बैठकीत वाचून काढली.
काही वर्षांपूर्वी सुगावा प्रकाशनाचे विलास वाघ आणि उषा वाघ यांनी अमेरिकेतील वेश्याव्यवसाय या शीर्षकाचा मी अनुवाद केलेले एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यावेळी या व्यवसायातील शोषणाची माहिती झाली.
देहविक्री करणाऱ्या महिलांनीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, वेश्यांनासुद्धा चांगले जीवन जगात आले पाहिजे, असा त्यावेळी बंडखोर, क्रांतिकारक वाटणारा विचार सुरक्षित कामजीवन आणि भारतातील संततीनियमन चळवळीचे आद्य प्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच मांडला होता. र. धो. कर्व्यांच्या काळातील वेश्याव्यवसाय आणि वेश्यांची स्थिती आणि सद्यस्थिती यात निश्चितच मोठे अंतर आहे.
सत्तरच्या दशकात दुर्गा भागवत यांनी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांबाबत केलेले एक विधान खूप वादग्रस्त ठरले होते. या विधानाचा विपर्यस्त अर्थ काढून दुर्गा भागवत वेश्याव्यवसायाचे समर्थन करतात असा आरोप केला गेला होता.
नामदेव ढसाळ यांचा `गोलपिठा' हा काव्यसंग्रह वेश्यांची वस्ती असलेल्या मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातले जीवन आणि भाषा चित्रित करतो. या काव्यसंग्रहाला विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना लिहिण्याआधी तेँडुलकर यांनी कामाठीपुरा येथला बराचसा परीसर आपल्या पायाखाली घातला होता, कारण इथले जीवन आणि भाषा मध्यमवर्गीय समाजाला आणि लेखकांना पूर्णतः अपरिचित होता.
दुर्गाबाई भागवत यांना त्यांच्या `पैस’ या लेखसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त महिला मंडळाने आयोजित केलेला त्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना भागवत म्हणाल्या कि, ''वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळायला हवी.'' त्यांच्या या विधानाचा धागा पकडत नामदेव ढसाळ यांच्या `गोलपिठा' कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजा ढाले म्हणाले, ''ज्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यावे असे वाटते त्यांनींच हा धंदा करावा !''
ढाले यांच्या या विधानाने मोठे महाभारत घडले. त्यानंतर बराचसा काळ ओलांडला आहे.
देहविक्री करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा कायद्याचे सर्व अधिकार समानतेने मिळायला हवेत, वेश्यांनासुद्धा सन्मानपुर्वक, प्रतिष्ठेचे जीवन मिळायला हवे, या शब्दांत आता खुद्द सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे देहविक्रीबाबत वेगळाच, क्रांतिकारक दृष्टिकोन निर्माण केला आहे.
सोशल माध्यमांत निरोगी आणि आरोग्यदायक कामजीवनाबाबत आता खुलेपणानं लिहिलं आणि वाचलं जात आहे.
तरीदेखील याबाबत अजूनही फार मोठी मजल मारावी लागणार आहे हे निश्चित.

Tuesday, October 11, 2022


पापक्षालन - प्रायश्चित घेण्यासाठी कन्फेशनल बॉक्ससमोर आम्हा मुलांची रांग लागलेली असायची.

साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता. तर या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.

दर शनिवारी संध्याकाळीं किंवा रविवारच्या सकाळच्या मिस्साविधिपूर्वी आम्हा मुलांची संत तेरेजा देवळात रांग लागायची. उंचच उंच शिखर असलेल्या त्या भव्य देवळाच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा तीन फादर - फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर ज्यो पिंटो - प्रायश्चित ऐकण्यासाठी आपल्या खुर्चीवर बसलेले असायचे. त्यांच्या खुर्चीच्या एका बाजूला जाळीधारी लाकडी फळी असायची, त्या फळीच्या खाली असलेल्या लाकडी पट्टीवर गुडघे टेकून मुलं त्या आठवड्यात आपण केलेल्या लहानमोठ्या पापांची यादी फादरांना सांगत असत.
प्राथमिक शाळातील मुलांनीं केलेली ती पापं शांतपणे ऐकत ते फादर मुलांना पापक्षालन म्हणून एकदोन `आमच्या बापा' अन एक `नमो मारिया' या प्रार्थना म्हणायला सांगत, नंतर आपला उजवा हात उंचावून पवित्र क्रुसाची खूण करत ते मुलांच्या पापांची क्षमा करत.
त्यानंतर रांगेतला दुसरा मुलगा आपली पापं कबूल करायला, त्या पापांची क्षमा मागण्यासाठी त्या फळीवर गुडघे टेकायचा.
अशाप्रकारे पापक्षालन झाल्यावर पापमुक्त झालेली ही मुले नंतर होणाऱ्या मिस्साविधीत पवित्र कम्युनियन किंवा ख्रिस्तशरीर सेवन करण्यासाठी पात्र असायची.
आम्हा सर्व मुलांचे जन्मल्यानंतर काही महिन्यांतच बाप्तिस्मे झाले होते, त्यानंतरचे दोन महत्त्वाचे सांक्रामेन्त प्रथम कम्युनियन आणि प्रायश्चित या शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना झाले.
जन्मानंतर कुठलीही व्यक्ती देवाने मोशेला दिलेल्या दहा आज्ञांचे (टेन कमांडमेंट्स) उल्लंघन करतेच आणि पाप करते. या पापांचे क्षालन होण्यासाठी प्रायश्चित किंवा कन्फेशन हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत.
या `टेन कमांडमेंट्स'मध्ये मुर्तीपुजा करु नकोस, आईवडलांचा सन्मान कर, रविवार (शब्बाथ) पवित्र पाळ, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस, व्यभिचार करु नकोस, खून करु नकोस, वगैरेंचा समावेश होतो.
आता दहाबारा वर्षांची मुलंमुली असं कोणतं पाप करणार आहेत ? मात्र त्याकाळात प्रायश्चित घेण्यासाठी कन्फेशनल बॉक्ससमोर आम्हा मुलांची रांग लागलेली असायची.
हल्ली रविवारी किंवा सणावाराला चर्चला आवर्जून जाणाऱ्या भाविकांपैकी अनेकांना त्यांनी प्रायश्चित कधी घेतले होते हे आठवणारसुद्धा नाही. मीसुद्धा याला अपवाद नाही
कॅथोलिक धर्मात सप्त स्नानसंस्कार म्हणजे सात सांक्रामेंत असतात. जन्मानंतर काही दिवसांत होणारा बाप्तिस्मा (नामकरण विधी) , बालपणी कम्युनियन, प्रायश्चित किंवा कन्फेशन, पौंगडावस्थेत कन्फर्मेशन किंवा दृढीकरण, तरुणपणी लग्नविधी किंवा दिक्षाविधी, आणि पार्थिव देहावर अंतिम संस्कार हे ते सप्त स्नानसंस्कार.
यापैकी बाप्तिस्मा, लग्नविधी, दीक्षाविधी आणि अंतिम संस्कार हे सांक्रामेंत आयुष्यातून एकदाच होतात तर कम्युनियन आणि प्रायश्चित हे दोन सांक्रामेंत भाविक वारंवार घेऊ शकतात. लग्नाचा विधी अर्थात काहींच्या बाबतीत एकापेक्षा अनेकदा होऊ शकतो !
कॅथोलिक देवळात रविवारीही (आणि दररोजही) होणाऱ्या मिस्साविधीत भाविकांना ख्रिस्तशरीर किंवा कम्युनियन दिले जाते. प्रायश्चित या सांक्रामेंतचा लाभ भाविक त्यांना हवे तेव्हा घेऊ शकतात.
मात्र कन्फर्मेशन (दृढीकरण), लग्न, दीक्षाविधी यासारख्या महत्त्वाचे सांक्रामेंत स्विकारण्याआधी त्या व्यक्तींनी प्रायश्चित घेऊन म्हणजे एकप्रकारे अध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध, पवित्र होऊन पुढले पाऊल उचलावे अशी अपेक्षा असते.
ख्रिस्ती धर्मानुसार जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती मूळ पापाचा कलंक घेऊन येत असते. आदाम आणि ईव्ह या पृथ्वीतलावरील पहिल्या पुरुष आणि स्त्रीने देवाची आज्ञा मोडली. इदेन बागेतलं देवाने मना केलेलं एक फळ (सफरचंद? ) इव्हने सैतानाच्या सांगण्यानुसार खाल्ले, आदामालाही खाल्लेलं अर्धे फळ खाण्यास दिलं, हेच ते मूळ पाप किंवा ओरिजिनल सिन. येशू ख्रिस्ताने क्रुसावर मरण पत्करुन मानवजातीची मूळ पापापासून सुटका केली.
बाप्तिस्मा घेणारी प्रत्येक व्यक्ती जन्मतः येणाऱ्या या मूळ पापापासून मुक्त होते. येशूची आई मदर मेरी मात्र या मूळ पापाच्या कलंकाशिवाय जन्माला आली, असा कॅथोलिक धर्माचा एक धर्मसिद्धांत ( डॉक्टरीन) आहे.
``ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता, त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची पापे तुम्ही तशीच राहू द्याल, ती तशीच राहतील,'' असं येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना म्हटलं होतं, त्या आधारावर पापक्षालन या स्नानसंस्काराची स्थापना झाली आहे.
कुठल्याही कॅथोलिक चर्चच्या सणानिमित्त, यात्रेनिमित्त जमलेले अनेक भाविक पापक्षालन सांक्रामेंत घेत असतात.
धर्मगुरु, बिशप, आर्चबिशप आणि कार्डिनल्स, पोपसुद्धा मानवच असल्याने पापं करणारच, त्यामुळे तेसुद्धा वेळोवेळी प्रायश्चित घेत असतात.
पोप हे भुतलावरचे येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी, सेंट पिटरचे उत्तराधिकारी, त्यांना `होली फादर' असेच संबोधले जाते. तर सर्वोच्च धर्माचार्य असलेले सद्याचे पोप फ्रान्सिस हे सुद्धा आपल्या पापक्षालनासाठी एखाद्या धर्मगुरुकडे आपल्या पापांची कबुली देऊन पापक्षालन करत असतात, हे वाचून अनेकांना धक्का बसायची शक्यता आहे.
यावरुन एक आठवलं. पोपपदावर आल्यानंतर लगेचच पोप जॉन पॉल दुसरे यांच्यावर व्हॅटिकन सिटीत सेंट पिटर्स चौकात दर्शनासाठी भाविकांमध्ये वाहनातून फिरत असताना जीवघेणा गोळीबार झाला. पोटात तीनचार गोळया जाऊनसुद्धा आश्चर्यकारकरित्या ते बचावले आणि पुढे सत्तावीस वर्षे पोप राहण्याचा आणि जगाचा राजकीय आणि भौगोलिक इतिहास बदलण्याचा विक्रम त्यांचा नावावर जमा झाला.
पोप यांच्यावर हल्ला करणाऱ्या अली अगका नावाच्या तुर्किश तरुणाला पुढे जन्मठेपेची सजा झाली. पोप जॉन पॉल या स्वतःच्या मारेकऱ्याला तुरुंगात जाऊन भेटले आणि त्याला त्याच्या पापाची किंवा गुन्ह्याची आपण क्षमा केली आहे असे त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर सांगितले.
अर्थात अली अगकाच्या पापाचे क्षालन झाले तरी या लौकिक जगातल्या न्यायानुसार अली अगका याला तुरुंगवासाची शिक्षा मात्र माफ झाली नव्हती. (पोप जॉन पॉल यांच्याप्रमाणेच प्रियंका गांधीसुद्धा त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना तुरुंगात भेटल्या आणि त्यांच्याविषयी आपल्या मनात कटुता नाही असं नंतर त्यांनी सांगितलं.)
मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या मृत्यूच्या सजेआधी त्यांचं प्रायश्चित ऐकून घेतले जाते.
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचेही प्रायश्चित ऐकून घेतल्यानंतर, पापांची कबुली ऐकल्यावर ती कबुली धर्मगुरुंना इतर कुणालाही अगदी न्यायालयांतसुद्धा उघड करण्याची परवानगी नसते. मग ही पापाची कबुली एखाद्या चोरीबद्दल, खुनाबद्दल, बलात्कारासारख्या किंवा खुनासारख्या मोठ्या गुन्ह्यांबद्दल असो. ही पापकबुली धर्मगुरुंना स्वतःपाशीच ठेवावी लागते.
अशा प्रकारचे कन्फेशन करणे किंवा पापांची कबुली देणे याचे फायदे खूप असतात आणि त्यामुळे धार्मिक बाब एकवेळ बाजूला ठेवली तरी मानसशास्त्रात त्यास फार महत्त्वाचे मानले गेले आहे.
मूळ पाप हे जन्मतः येते, तर काही पापे अथवा गुन्हे सामूहिक असतात. उदाहरणार्थ, अडॉल्फ हिटलरच्या कारकिर्दीत जर्मनीत लाखो निरपराध ज्यु लोकांना मृत्युदंडाची सजा देण्यात आली, अगणित लोकांचा छावण्यांत छळ करण्यात आला आणि त्याकडे इतर समाजघटकांनी, देशांनी आणि कॅथोलिक चर्चसारख्या सामर्थ्यवान संस्थांनी सरळसरळ काणाडोळा केला.
जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्लंडच्या राजघराण्याने किंवा प्रतिनिधींनी भारताची माफी मागावी, पापक्षालन करावे अशीसुद्धा मागणी केली जाते.
तसेच युरोपात आणि अमेरिकेत ख्रिस्ती धर्मगुरुंनी लहान मुलांवर केलेल्या लैगिक अत्याचाराबाबत म्हणता येईल, त्याबद्दल संबंधीत लोकांची आणि कुटुंबियांची पोप बेनेडिक्त सोळावे आणि पोप फ्रान्सिस यांनी माफी मागून एकप्रकारे पापक्षालनाची विनंती केली आहे.
तर अशा या पापक्षालनाविषयी अजून बरंच काही लिहिता येईल.

^^^^
Camil Parkhe, October 10, 2022

Friday, June 11, 2021

पंडिता रमाबाई


ख्रिस्ती मिशनरींचे योगदान

 कामिल पारखे

 वितरक:  सुगावा प्रकाशन

          1881 मध्ये कलकत्ता शहरात एका वीस वर्षांच्या मराठी युवतीचे आगमन झाले आणि तिच्या विद्वत्तेच्या तेजाने, संस्कृतवरील प्रभुत्वाने तेथील सामाजिक पुढारी चकित झाले. कलकत्त्याच्या विद्वान मंडळींनी या युवतीचा सत्कार घडवून तिला सरस्वतीउपाधी बहाल केली. विशेष म्हणजे रमाबाई डोंगरेहे नाव धारण करणाऱ्या या युवतीचे नाव महाराष्ट्रात तोपर्यंत कुणीही ऐकले नव्हते. त्यानंतर प्रसिद्धीचे वलय होऊन रमाबाई महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे व पुण्याजवळील केडगाव ही त्यांची उर्वरित आयुष्यातील कर्मभूमी बनली. कलकत्त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती चिकटलेले प्रसिद्धीचे वलय त्यानंतर त्यांना संपूर्ण आयुष्यभर चिकटले.

          प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात वावरणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील प्रत्येक घटना समाजासमोर येत असतात. या घटनांबद्दल त्या व्यक्तीला कधी हार तर कधी प्रहार स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. पंडिता रमाबाई तर चाकोरीबद्ध वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. ज्या काळात महिलांना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसे त्या काळात कुटुंबातील वा नातलगांमधील कुणाही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना या एकाकी महिलेने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखविले. त्यांच्या स्वत:च्या धर्मांतरामुळे, बालविधवांच्या पुनर्वसन कार्यामुळे आणि नंतर ख्रिस्ती मिशनरी या नात्याने समाजातील सर्व अनाथ आणि असाहाय्य घटकांचा सांभाळ करण्याच्या वृत्तीमुळे समाजात निर्माण झालेल्या अनेक वादळांना या विदूषीने खंबीरपणे तोंड दिले. पंडिता रमाबार्इंचे जीवन म्हणजे सतत संघर्षाशी झुंजणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत लढून जीवनमूल्यांशी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीची गाथाच आहे.

          पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म कर्नाटकात मेंगलोरजवळील गंगामूळ यागावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री (अनंतपद्मनाभ) परमेश्‍वर डोंगरे हे संस्कृतपंडित होते. चित्पावन ब्राह्मण कुळातील अनंतशास्त्रींनी आपल्या पत्नीला, लक्ष्मीबाईला संस्कृत शिकविले. रमाबाई केवळ सहा महिन्यांच्या असताना अनंतशास्त्री आपल्या कुटुंबासह म्हणजे पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसह तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडले. पंधरा वर्षे तीर्थार्टन केल्यानंतर हे कुटुंब मद्रास इलाख्यात पोहोचले. त्यावेळी तेथे भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने अनंतशास्त्रींचा आणि त्यांच्या पत्नीचा बळी घेतला. रमाबाई, त्यांचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई पोरके बनले. तेथूनच रमाबार्इंच्या संघर्षमय आयुष्याला सुरुवात झाली.

          आई-वडिलांच्या निधनानंतर या तरुण भावंडांनी आपली तीर्थयात्रा चालूच ठेवली. त्यानंतर काही महिन्यातच रमाबार्इंच्या थोरल्या बहिणीचे कृष्णाबाईचे निधन झाले. पित्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंनी संस्कृतचे आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे ज्ञान संपादन केले होते. पुराण सांगत आणि संस्कृतमधून व्याख्याने देत हे बहीण-भाऊ पुढे फिरतच राहिले. त्यांना आसरा देणारे, मायेने त्यांची काळजी घेणारे या जगात आता कुणी उरले नव्हते. तीन-चार वर्षे हजारो मैलांचा पायी प्रवास करत श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाई 1878 साली कलकत्त्यात पोहोचले. या शहरात मात्र या भाऊ-बहिणीच्या ज्ञानाची कदर करणारे लोक त्यांना भेटले. आधुनिक विचारसरणीच्या ब्राह्मो समाजाच्या आणि कलकत्त्यातील विद्यापीठाच्या पंडितांनी या तेजस्वी तरुणांना आदराची वागणूक दिली.

          श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंच्या संस्कृतवरील प्रभुत्वाने कलकत्त्यातील विद्वान मंडळी चकित झाली. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या काळात या महिलेचे संस्कृतवरील प्रभुत्व ही निश्‍चितच कौतुकाची बाब होती. कलकत्ता विद्यापीठात झालेल्या विद्वानांच्या सभेत यावेळी रमाबार्इंना सरस्वतीउपाधी सन्मानाने देण्यात आली. तेव्हापासून रमाबाई डोंगरे ही युवती पंडिता रमाबाई सरस्वतीया नावाने संपूर्ण हिंदुस्थानभर ओळखली जाऊ लागली.

रमाबार्इंविषयी मुंबईच्या एका दैनिकात 1878 च्या जुलै महिन्यात पुढील बातमी प्रसिद्ध झाली:

          हल्ली कलकत्त्यास रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळीस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय बावीस वर्षांचे असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीयन असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे.

          या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्त्री असूनही ही संस्कृत भाषा कशी शिकली, बावीस वर्षे ओलांडून अजून ती अविवाहित कशी, मराठी असूनही महाराष्ट्रात तिच्याविषयी कुणालाच काही कशी माहिती नाही, असे विविध प्रश्‍न रमाबार्इंविषयी मुंबई-पुण्यात विचारले जाऊ लागले.

          महाराष्ट्राला रमाबार्इंची ओळख झाली ती अशाप्रकारे. पंडिता रमाबार्इंच्या जीवनातील अनेक घटनांनी पुढील काळात महाराष्ट्रातील सामाजिक जीवन अनेकदा ढवळून टाकले. रमाबार्इंचा कलकत्त्यातील विद्वानांनी केलेला सत्कार आणि या महिलेविषयी महाराष्ट्रात झालेली त्यावेळची चर्चा रमाबार्इंच्या महाराष्ट्रातील पुढील जीवनाची एकप्रकारे नांदीच ठरली.

          त्यानंतर रमाबाई आणि त्यांचे बंधू आसामात सिल्हट येथे आणि बंगालमधील ढाका येथे गेले. ढाक्यात असताना श्रीनिवासशास्त्री आजारी पडले. तेथे त्यांचे 8 मे 1880 रोजी निधन झाले. आई-वडिलांच्या तसेच थोरल्या बहिणीच्या निधनानंतर रमाबार्इंना निदान आपल्या थोरल्या भावाचा तरी आधार होता. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर तोही आधार संपला. कर्नाटक प्रांत सोडून आलेल्या या तरुण अविवाहित महिलेला आता कुणाचाही आधार नव्हता.

          श्रीनिवासशास्त्री हयात असताना त्यांची आणि रमाबार्इंची बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली व्यक्तीशी ओळख झाली. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर बिपीन बिहारींनी रमाबाईंना लग्नाची मागणी घातली आणि 13 जून 1880 रोजी बांकीपूर शहरात रजिस्ट्रारसमोर नोंदणी पद्धतीने या दोघांचा विवाह झाला. त्याकाळात रमाबार्इंनी नोंदणी पद्धतीने विवाह केला या घटनेने पुन्हा एकदा समाजात खळबळ उडाली. लग्नानंतर सिल्हट येथे बिपीन बिहारीदास वकिली करत असत. 16 एप्रिल 1881 रोजी रमाबार्इंच्या मनोरमा या मुलीचा जन्म झाला.

          रमाबार्इंना वैवाहिक सुख फार काळ लाभले नाही. लग्नानंतर केवळ 19 महिन्यांनंतर बिपीन बिहारींचा 4 फेब्रुवारी 1882 रोजी अल्पशा आजारानंतर मृत्यू झाला. थोड्या काळाच्या अवधीत वडील, आई, थोरली बहीण आणि थोरला भाऊ यांच्या निधनाचं दु:ख सहन करणाऱ्या रमाबार्इंवर आता पतीच्या निधाची आपत्ती कोसळली. त्यानंतर आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पंडिता रमाबार्इंनी महाराष्ट्राची वाट धरली.

          रमाबाई महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच या विदूषीची महाराष्ट्राला ओळख झाली होती. पुण्यात आल्यावर रमाबार्इंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याशी घनिष्ट संबंध जुळले. रमाबार्इंच्या पुण्यातील वास्तव्यात त्यांच्याविरुद्ध समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरही रमाबाई रानड्यांनी पंडिता रमाबार्इंना भावनिक आधार दिला. पुण्यात पंडिता रमाबार्इंचे आगमन झाल्यानंतर या तेजस्विनीच्या सभा आयोजित करण्यात प्रसिद्ध मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे आणि रमाबाई रानड्यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील आपल्या वास्तव्यात पंडिता रमाबार्इंनी लोकजागृतीचे विशेषतः महिलांच्या प्रबोधनाचे कार्य सुरू केले. त्यांच्या या कार्यास पुण्यातील समाजसुधारकांचा मोठा पाठिंबा लाभला. रमाबार्इंच्या पुढाकाराने पुण्यात, अहमदनगर, सोलापूर आणि मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली.

          एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातसमाजजागृतीचे कार्य करणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये पुरुषांचीच अधिक संख्या होती. ज्या थोड्याफार महिला या क्षेत्रात काम करत होत्या त्या सर्वांना त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषांचे पूर्ण पाठबळ लाभले होते व त्यामुळे आपल्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल टीकेस त्या तोंड देऊ शकल्या. पंडिता रमाबाई मात्र परप्रांतातून एकट्या आल्या होत्या. एक छोटी मुलगी वगळता त्यांना कुटुंबातील कुणाही व्यक्तीचा वा नातलगाचा आधार नव्हता. त्याकाळात स्त्रियांच्या उन्नतीचे काम हाती घेणे किती कठीण होते हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सहन कराव्या लागलेल्या टीकेमुळे आणि हालअपेष्टांमुळे सिद्ध झाले होते. स्वत:च्या वैयक्तिक जीवनातसुद्धा रमाबार्इंनी खूप दु:ख सोसले. तरीसुद्धा सामाजिक प्रबोधनाचा काटेरी मार्ग त्यांनी निवडला हे विशेष.

          याच काळात ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू. हंटर या शिक्षणतज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची नेमणूक केली. या हंटर कमिशनसमोर दिलेली पंडिता रमाबार्इंची हिंदुस्थानातील महिलांच्या शिक्षणाबद्दलची साक्ष त्यावेळी खूप गाजली. हिंदुस्थानातील प्रचलीत सामाजिक व्यवस्थेमुळे या देशात महिला डॉक्टरांची खूप गरज आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी असे त्यांनी या साक्षीत सुचविले. हंटर कमिशनच्या सदस्यांनी यावेळी रमाबार्इंची उलटतपासणीही घेतली. रमाबार्इंना त्यावेळी इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीतून साक्ष दिली. रमाबार्इंच्या साक्षीने खुद्द सर हंटर फारच प्रभावित झाले. त्यांनी रमाबार्इंच्या साक्षीचे इंग्रजी रूपांतर करून छापून घेतले, इतकेच नव्हे तर इंग्लंडला परतल्यानंतर तेथे रमाबार्इंच्या कार्यासंबंधी व्याख्यानही दिले. अशाप्रकारे रमाबार्इंनी परदेशगमन करण्यापूर्वीच त्यांची कीर्ती इंग्लंडमध्ये पोहोचली.

          त्यानंतर थोड्याच काळात पंडिता रमाबार्इंनी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले. त्यांची मुलगी मनोरमासुद्धा त्यांच्याबरोबर होती. इंग्लंडमध्ये असतानाच वॉण्टेज शहरात त्यांनी आपल्या मुलीसह 29 सप्टेंबर 1883 रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. या घटनेपासून या विदूषीच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. रमाबाई इंग्लंडला गेल्या तर तेथे त्या ख्रिस्ती होतील ही महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांची भीती खरी ठरली. अपेक्षेप्रमाणे या घटनेने त्याकाळात महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली.

          इंग्लंडमध्ये 1886 पर्यंत म्हणजे तीन वर्षे राहून रमाबार्इंनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान महाराष्ट्रातून आनंदीबाई गोपाळराव जोशी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला, तर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या पंडिता रमाबाई या दुसऱ्या महाराष्ट्रीयन महिला. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रार्थना समाजाचे नेते डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या कन्या अन्नपूर्णा किंवा ॲना तर्खडकर इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई सरस्वती यांची पूर्वी कधीही गाठभेट झाली नव्हती. मात्र आनंदीबार्इंच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी पंडिता रमाबाई कन्येसह इंग्लंडहून अमेरिकेत गेल्या.

          आनंदीबार्इंच्या पदवीदान समारंभानंतर रमाबार्इंचे अमेरिकेत अडीच वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या विविध भागांत व्याख्याने दिली. अमेरिकेतील महिलांच्या संस्था, तेथील शिक्षणपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अमेरिकन जनतेत भारतातील महिलांच्या, विशेषत: बालविधवांच्या परिस्थितीबाबत जागृती निर्माण केली. या जागृतीमुळे हिंदुस्थानात पंडिता रमाबार्इंच्या महिलांविषयक कार्यास मदत करणाऱ्या रमाबाई असोसिएशनया संस्थेचा जन्म झाला. हिंदुस्थानात हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची हमी या संस्थेने स्वीकारली.

          हिंदुस्थानात उच्चवर्णीय बालविधवांसाठी शाळा चालविणे हे रमाबाई असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट होते. या शाळेची शैक्षणिक पद्धती पूर्णत: पंथरहित असावी, असा या संस्थेच्या घटनेत महत्त्वाचा नियम होता. रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळात रावबहादूर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहादूर महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता.

          भारतात परतल्यानंतर पंडिता रमाबार्इंनी रमाबाई असोसिएशनच्या वतीने मुंबईत चौपाटीजवळ 11 मार्च 1889 रोजी शारदा सदनया संस्थेची स्थापना केली. या सदनाच्या पहिल्या बालविधवा विद्यार्थिनी गोदूबाई. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह होऊन पुढे त्या आनंदीबाई वा बाया कर्वे या नावाने सुपरिचित झाल्या. बाया कर्वे यांनी माझे पुराणया आपल्या आत्मचरित्रात शारदा सदनातील दिवसांचे वर्णन केले आहे. गोदूबार्इंप्रमाणेच अनेक बालविधवांना शारदा सदनात शिक्षण आणि निवारा मिळाला.

          दीड वर्षानंतर म्हणजे 1880 च्या नोव्हेंबरात रमाबार्इंनी शारदा सदनचे मुंबईतून पुण्यातील कॅम्पात स्थलांतर केले. शारदा सदन ज्या संस्थेतर्फे चालविले जात होते ती रमाबाई असोसिएशन ही मिशनरी संस्था नसल्याने शारदा सदनचे काम सेक्युलर पद्धतीने चालवावे असा स्पष्ट नियम होता. रमाबाई स्वत: ख्रिस्ती असल्या तरी सदनातील बालविधवांच्या धार्मिक बाबतीत त्यांनी ढवळाढवळ करू नये असा असोसिएशनच्या सल्लागार मंडळींचा आग्रह होता. मात्र शारदा सदनच्या चालिका स्वत: हे कार्य येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी चालवित असल्याने त्यांच्या जीवनपद्धतीचा, विचारसरणीचा प्रभाव सदनातील कोवळ्या वयाच्या मुलींवर पडणे साहजिकच होते. यातूनच रमाबाई शारदा सदनातील असाहाय्य मुलींवर धर्मांतराची सक्ती करतात, रमाबाई छुप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत, असे आरोप त्यांच्यावर केले जाऊ लागले.

          शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी गोदूबार्इंचा धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला तेव्हा पंडिता रमाबार्इंनी शारदा सदनात मोठी जेवणावळ घातली. या समारंभाबद्दल महर्षी कर्व्यांनी आपल्या आत्मवृत्तया आत्मचरित्रात लिहिले आहे, “आपल्या पहिल्याविद्यार्थिनीची योग्य व्यवस्था लागत आहे हे पाहून त्यांना (रमाबार्इंना) अतिशय आनंद झाला होता. सदनातील विद्यार्थिनींनाही आपल्या एका मैत्रिणीला संसारसुखाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्यामुळे आणि विधवांच्या भावी सुस्थितीचे द्वार मोकळे होत चालल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता.बाया कर्वे यांनी आपल्या माझे पुराणआत्मचरित्रात म्हटले आहे, ‘बार्इंनी मला दागिने व कपडे दिले. त्यांच्या जावयालाकर्व्यांना कपडे दिले.पंडिता रमाबार्इंच्या या जावयाने पुढे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान केले आणि वयाची शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पंडित नेहरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर आणि गोपाळ कृष्ण गोखले आदी मोजक्या व्यक्तींच्या ऋणांचा आदरपूर्वक उल्लेख केला.

          शारदा सदनचे काम चालू असतानाच पंडिता रमाबाई हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीतही सक्रियपणे भाग घेत. रमाबार्इंच्या प्रयत्नांमुळे काँग्रेस संघटनेत स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. मुंबईत भरलेल्या 1889 च्या काँग्रेस अधिवेशनात रमाबाई स्त्री-प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या केवळ दोन महिलांमध्ये रमाबार्इंचा समावेश होता. या परिषदेतील रमाबाईंच्या भाषणाचे विस्तृत वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने 30 डिसेंबर 1889 च्या अंकात दिले.

          1897 मध्ये महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने थैमान घातले. यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चालविलेल्या कडक तपासणीमुळे सामान्य लोकांच्या झालेल्या हालाविरुद्ध पंडिता रमाबार्इंनी आवाज उठविला. गार्डीयनया इंग्रजी साप्ताहिकात रमाबार्इंनी या संदर्भात एक पत्र लिहिले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उपस्थित झालेल्या या विषयाच्या संदर्भात उत्तर देताना लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांनी रमाबार्इंचे हे पत्रच वाचून दाखविले.

          1895 साली पुण्यात काँग्रेसचे प्रथम अधिवेशन भरले तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानातून या शहरात जमलेल्या काही पुढाऱ्यांनी शारदा सदनला भेट दिली. तोपर्यंत या सदनातील बारा मुली रमाबार्इंच्या कार्याने प्रभावित होऊन ख्रिस्ती झाल्या. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ निर्माण झाले. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेत विधवाविपनाचा निषेध करणारा व विधवांना स्वावलंबी करण्याबाबतचा ठराव इंडियन सोशल रिफॉर्मचे संपादक के. नटराजन यांनी मांडला. त्यावेळच्या भाषणात नटराजन म्हणाले, “विधवांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा जो पायंडा पंडिता रमाबार्इंनी घालून दिला आहे व या शहरात त्यांचे कार्य इतक्या यशस्वीपणे चालू आहे त्याची प्रशंसा केल्याखेरीज माझ्याने राहवत नाही. काही धर्मांतरे झाली त्यांच्याबद्दल रमाबार्इंवर जे टीका करत आहेत त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटत नाही. ठोकळेबाज धर्ममतांवर माझा विश्‍वास नाही. आपल्या बंधूंचे भले करणे हा मी सर्वोच्च धर्म समजतो. भुकेल्याला अन्न देणे हे अत्यंत उच्च दजाचे धार्मिक कृत्य व श्रेष्ठ प्रतीचे दान आहे. पंडिताबाई व तिचे अमेरिकेतील मित्र व सहायक यांचे आपल्यावर इतके ऋण आहेत की आपण ते कधीही फेडू शकणार नाही; मग धर्ममतांबद्दल कितीही मतभेद असो.

          रमाबार्इंना जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते. रमाबाई असोसिएशनच्या नियमानुसार शारदा सदनात उच्चवर्णीय मुलींसाठी सोवळ्याओवळ्याचे कडकडीत नियम पाळावे लागत असत. असे सोवळ्याओवळ्याचे नियम तेथे पाळले नसते तर अनेक उच्चवर्णीय लोकांनी आपल्या बालविधवा मुलींना वा बहिणींना शिक्षणासाठी येथे पाठविलेच नसते. या संदर्भात शारदा सदनातील आपल्या सुरुवातीच्या दिवसांचे बाया कर्व्यांनी पुढील शब्दात वर्णन केले आहे. सहा महिने ब्राह्मणाची बाई मिळाली नाही म्हणून माझे जेवणही मलाच करावे लागे. गोविंदराव व काशीबाई कानिटकर, हरी नारायण आपटे आदी मंडळी केव्हा तरी सदनात आली म्हणजे एखाद्या वेळी त्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा करावा लागे.

          आपल्या मुली बालविधवा असल्या, समाजात त्या कितीही उपेक्षित असल्या तरी शारदा सदनात त्यांनी सुखात राहावे, असे रमाबार्इंना वाटे. शारदा सदनातील घटनांकडे लक्ष असणारे लोक रमाबाई आपल्या मुलींना दुधातुपात नुसते लोळवितेअसे म्हणत. शारदा सदनातील बालविधवांच्या या खाण्यापिण्यावरून एकदा केसरी आणि सुधारक या वृत्तपत्रांत वादही झाला होता. बाया कर्व्यांनी या संदर्भात लिहिले आहे, रमाबाई असोसिएशनची सल्लागार मंडळी म्हणे आपल्या जातीतील विधवांनी चैनीने राहणे बरे नव्हे’, पण रमाबार्इंना ते आवडत नसे. पूर्वीचे दिवस त्यांच्या मनात येत. त्या म्हणत, ‘मी विद्यार्थिनींना हालातून वर काढण्यासाठी त्यांचे हाल कमी करण्यासाठी शाळा घातली. मी त्यांना सुखात ठेवायचे ठरविले, ते कमी होणे शक्य नाही.

          शारदा सदनातील दिवसांबद्दल कृष्णाबाई गद्रे यांनी लिहिले आहे, ‘काय त्या बंगल्याची शोभा व काय तो सुंदर फुलांनी शृंगारलेला बगीचा, जिकडे पाहिजे तिकडे मोकाट फिरण्याची आम्हाला मुभा, दिवाणखाना देखील आमची बैठकीची जागा. सुंदर कोचाखुर्च्यांवर बसून गप्पा माराव्यात, बागेत जाऊन जाई, जुई, मोगरा, चमेली, बकुळी व मधुमालतीच्या वेण्या गुंफून केसावर लावाव्यात. रमाबार्इंनी आम्हाला फुलांची, पक्ष्यांची व झाडांची माहिती देऊन दुर्बिणीतून (सूक्ष्मदर्शक यंत्रांतून) त्यांचे निरीक्षण करण्यास शिकवले. काय ते लाड? अशा सुंदर वातावरणात आपले दिवस घालवायला कोण बालविधवा येणार नाही? कधी कधी रमाबाई स्वत: पहाटेस उठून आम्हाला आगाशीवर नेऊन नक्षत्रे वगैरे मोठ्या आवडीने शिकवीत.

          रमाबाई या शारदा सदनातील मुलींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात, हा त्यांच्यावर नेहमी केला जाणारा आरोप. या आरोपामुळे घाबरून काही पालकांनी आपल्या मुली सदनातून काढून घेतल्या. मात्र त्यामुळे या सदनात आश्रयासाठी येणाऱ्या अनाथ, समाजाने टाकून दिलेल्या बालविधवांची संख्या रोडावली नाही. समाजात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या वादळास खंबीरपणे तोंड देऊन पंडिता रमाबार्इंनी विधवांच्या पुनर्वसनाचे आपले कार्य चालूच ठेवले.

          त्या काळात मुली पाच-सहा वर्षांच्या झाल्या की त्यांची लग्ने उरकून टाकली जात असत. अनेकदा या कोवळ्या मुलींची प्रौढ पुरुषांशी लग्ने लावली जात असत. यामुळे अनेक मुलींवर वैवाहिक सुख भोगण्याआधीच बालविधवा होण्याची आपत्ती कोसळे. या बालविधवांना त्यानंतर अत्यंत उपेक्षित जीवन जगावे लागे. त्यांच्या स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींकडून आणि समाजाकडून त्यांची उपेक्षा होत असे. बैरामजी मलबारी या पारशी समाजसुधारकाने बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठविला. या चळवळीचा परिणाम होऊन ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात संमतीवयाचे विधेयक आणले. या विधेयकानुसार बारा वर्षांपेक्षा लहान असलेल्या स्त्रीशी तिच्या नवऱ्याने शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरणार होता. या विधेयकामुळे स्त्रियांच्या हालअपेष्टा कमी होणार असल्याने या विधेयकास स्त्रियांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पंडिता रमाबार्इंनी पुढाकार घेतला.

          संमतीवयाच्या विधेयकामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात. विशेषत: पुण्यात मोठा वाद निर्माण झाला. ब्रिटिश सरकारतर्फे सामाजिक सुधारणा लागू करण्यास लोकमान्य टिळकांचा प्रथमपासून विरोध होता. त्यातच समाजातील सनातनी मंडळींचाही या विधेयकास विरोध अपेक्षितच होता. या विधेयकामुळे पुण्यात गोपाळ गणेश आगरकर, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक आणि या विधेयकास विरोध करणारी सनातनी मंडळी यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. महिलांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या पंडिता रमाबाई या विधेयकास पाठिंबा देण्यासाठी महिलांना संघटित करू लागल्या. संमतीवयाच्या विधेयकाच्या निमित्ताने पुण्यातील दोन गटांनी एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. या संघर्षात अल्पसंख्य असणाऱ्या आगरकर, पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर या समाजसुधारकांना अर्थातच मोठी किंमत चुकवावी लागली.

          संमतीवयाच्या विधेयकास पाठिंबा मिळविण्यासाठी मुंबईत झालेल्या एका सभेचे चालकत्व पंडिता रमाबार्इंकडे होते, तर अध्यक्षस्थानी कॉर्नेलिया सोराबजी या सामाजिक कार्यकर्त्यां होत्या. त्यानंतर पुण्यात आर्य महिला समाजाच्या वतीने पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकरांनी सभा आयोजित केली. या सभेत पाच-सहा महिलांचा अपवाद वगळता इतर महिलांनी या विधेयकास पाठिंबा व्यक्त करणाऱ्या ठरावावर सह्या केल्या, असे त्यावेळी आगरकरांच्या सुधारकपत्रात छापून आले.

          न. चिं. केळकरांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्रात या सभेबद्दल खालील माहिती दिली आहे. या लिखाणावरून पंडिता रमाबार्इंच्या स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश पडतो. केळकरांनी लिहिले आहे.

          सौ. काशीबाई कानिटकर यांनी बिलाचे समर्थन केले, पण दुसरी एक बाई उठून म्हणाली, या बिलान्वये तुमच्या जावयावर उद्या खटला झाला तर तो तुम्हांस आवडेल काय? काशीबाई पडल्या हाडाच्या हिंदू. त्यांच्याने उत्तर देववेना. रामाबाईही हाडाच्या हिंदूच, पण धर्मांतराने त्यांचे सर्वच विचार बदललेले होते. काशीबाई निरुत्तर झाल्यावर रमाबाई म्हणाल्या, ‘बेहेत्तर आहे. मुलीपेक्षा जावई अधिक नाही.हे उत्तर पंडिता रमाबाईंच्या सडेतोड स्वभावास धरूनच होते. हा स्वभाव धर्मांतराने नव्याने बनलेला नव्हता.

          संमतीवयाच्या विधेयकाविरुद्ध कितीही गदारोळ उठला तरी अखेरीस हे विधेयक मंजूर होऊन तसा कायदा अस्तित्वात आला. आज विशीच्या आत मुलींची सहसा लग्ने होत नाहीत. शंभर वर्षांपूवी मात्र बारा वर्षांखालील मुलींच्या विवाहास विरोध करण्यासाठी रमाबार्इंना चळवळ करावी लागली आणि प्रतिकूल टीकेस तोंडही द्यावे लागले.

          मध्य भारतात 1897 साली भीषण दुष्काळ पडला तेव्हा भुकेने हाडाचे सापळे झालेल्या शेकडो मुलींना पंडिता रमाबार्इंनी आश्रय दिला. या मुलींच्या मदतीला रमाबाई धावून गेल्या नसत्या तर या मुलींना मृत्यूलाच सामोरे जावे लागले असते.

          रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील रमाबाई असोसिएशनने दहा वर्षे आर्थिक पाठबळ देण्याचे कबूल केले होते. 1898 मध्ये ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा रमाबाई अमेरिकेत गेल्या व ही संस्था विसर्जित करण्यात आली. यानंतर नव्याने स्थापन झालेल्या अमेरिकन रमाबाई असोसिएशनया संस्थेच्या मदतीने रमाबार्इंनी पुण्याजवळील केडगाव येथे मुक्ती सदनचे काम सुरू केले. त्यानंतर रमाबार्इंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ केडगाव येथेच घालविला.

          केडगाववात पंडिता रमाबार्इंनी समाजाच्या विविध उपेक्षित घटकांसाठी वेगवेगळी सदने काढली. एखाद्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले वा त्यांच्यावर एखाद्या अनुचित घटनेची आपत्ती कोसळली की त्या स्त्रियांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला ती स्त्री नकोशी होई, अशा समाजबहिष्कृत स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी कृपासदनउघडले. या परित्यक्ता स्त्रियांचे त्यांनी पुनर्वसन केले. वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी रमाबार्इंनी प्रीती सदनसुरू केले.

          भारतातील पहिली अंधशाळा उघडण्याचे श्रेय रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबाई यांना दिले जाते. अंधत्वामुळे परावलंबी बनलेल्या मुलींना आणि महिलांना केडगावातील बर्तमय सदनातआश्रय देऊन रमाबार्इंनी त्यांचे पुनर्वसन केले. येशू ख्रिस्ताने बर्तमय नावाच्या अंधाला दृष्टी दिली असे बायबलमध्ये सांगितले आहे. बर्तमय सदनातील अंध महिलांना ब्रेलने एकप्रकारे दृष्टीच दिली. बर्तमय सदनात या अंधांना स्वेटर विणण्याची, वेताच्या खुर्च्या बनविण्याची, टोपल्या तयार करण्याची कला शिकविली जाई. त्यामुळे या अंध महिला आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकल्या.

          केडगावात स्थायिक झाल्यानंतर लवकरच म्हणजे 1905 साली पंडिता रमाबार्इंनी संपूर्ण बायबलचे मराठी भाषांतर करण्याचे कार्य हाती घेतले. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे हे कार्य चालू राहिले. संपूर्ण बायबलच्या भाषांतरास त्यांना अठरा वर्षे लागली. बायबलचा जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. संपूर्णबायबलच्या इंग्रजी भाषांतराच्या अनेक आवृत्त्या रमाबाईंच्या काळातसुद्धा उपलब्ध होत्या. तरीसुद्धा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून बायबलचे मराठीत भाषांतर करण्याचे या विदूषीने ठरविले आणि त्यासाठी या दोन्ही भाषांचा त्यांनी अभ्यास केला.

          कर्नाटकात जन्मलेल्या रमा डोंगरेला कानडी भाषा येत होती, वडिलांमुळे तिने संस्कृतवर प्रावीण्य मिळविले आणि रमा पुढे पंडिता रमाबाई सरस्वतीबनली. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठीवरही प्रभुत्व मिळविले. इंग्रजी शिकून पुढे त्या इंग्लंड आणि अमेरिकेतही व्याख्याने देत फिरल्या. चाळिशी उलटल्यानंतर त्या आता बायबलच्या भाषांतरासाठी हिब्रू आणि ग्रीक भाषेचा अभ्यास करू लागल्या. मुक्ती सदनातील दीड-दोन हजार अनाथ मुली आणि महिलांची जबाबदारी असताना पंडिता रमाबाई आपल्या विविध कार्याचा व्याप सांभाळत असत हे विशेष.

          बायबलच्या मूळ भाषेतून म्हणजे हिब्रू आणि ग्रीक मधून या धर्मग्रंथाचे भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या जगातील एकमेव महिला. पंडिता रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबार्इंचे वयाच्या चाळिसाव्या वर्षी निधन झाले. आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्यूचा आघात रमाबार्इंनी खंबीरपणे सोसला आणि बायबलच्या भाषांतराचे काम चालूच ठेवले. बायबलचे भाषांतर हे त्यांच्या अखेरच्या जीवनातील मिशन बनले होते. भाषांतर पूर्ण होण्याआधी आपला मृत्यू होऊ नये अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. रमाबार्इंचे बायबलचे भाषांतर त्यांच्या स्वत:च्या केडगावातील छापखान्यातच छापले जात होते. 4 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबार्इंनी भाषांतराचे शेवटचे प्रूफ वाचून हातावेगळे केले आणि छपाईसाठी छापखान्यात पाठविले. त्यानंतर त्याच रात्री या महान समाजसेविकेने या जगाचा निरोप घेतला.

संदर्भ

1. ‘महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई’- लेखक आणि प्रकाशक - देवदत्त नारायण टिळक, शांतिसदन, आग्रा रोड, नाशिक (1960).

2. ‘वधस्तंभाचे सेवक’ - लेखक-थिओडोर विल्यम्स - मराठी अनुवाद - डी. वाय. गायकवाड, प्रकाशक - औटरिच प्रकाशन, इंडियन इव्हँजेलिकल मिशन, 7 लँगफोर्ड रोड, बंगलोर 560025 (1991).

3. ‘भारत आणि ख्रिस्त’ - लेखक-फादर हान्स स्टाफनर (येशूसंघ) मराठी अनुवाद - डॉ. वा. पु. गिडे, प्रकाशक - मार्ग प्रकाशक, स्टीफन्स निवास, 2008, संत विन्सेंट मार्ग, पुणे 411001 (1988).

4. ‘ख्रिस्ती मराठी वाङ्मय (फादर स्टीफन्स ते इ.स. 1960 अखेर)’-लेखक -डॉ. गंगाधर नारायण मोरजे, प्रकाशक - डॉ. पी. एस. जेकब, प्राचार्य, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर आणि डॉ. मॅथ्यू लेदर्ले (येशूसंघ), स्नेहसदन, 250 शनिवार पेठ, पुणे 411030, (वितरक - अ.ज.प्रभू, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, 1334शुक्रवार पेठ, पुणे 411 002 (1984).