Showing posts with label Shah Rukh Khan. Show all posts
Showing posts with label Shah Rukh Khan. Show all posts

Saturday, February 11, 2023

शाह रुख खान, राज कपूरभारताचे अनभिषिक्त सांस्कृतिक राजदूत -  

काही वर्षांपूर्वी कुटुंबियांसह युरोपच्या सहलीवर होतो तेव्हाची ही गोष्ट. निघण्याआधी ऐनवेळेस इंग्लंडचा व्हिसा मिळाला नव्हता, त्यामुळे फ्रान्स आणि इटलीतील मुक्काम वाढवला होता. फ्रान्समध्ये आठवडाभर आणि पॅरीस येथे तीनचार दिवस होतो. त्यामुळे तिथली मेट्रो सेवा आणि इतर गोष्टी थोड्याफार अंगवळणी पडल्या होत्या.

एक दिवस पॅरीसमधल्या मॉन्ट मार्त या आमच्या स्थानाच्या परिसरातील रस्त्यावर आम्ही तिघं जण फिरत होतो आणि एका सुपरमार्केटमध्ये शिरलो.
तिथल्या वस्तू न्याहाळत होतो. दुकानात तिथल्या एका तरुण कॅशियरशिवाय एक-दोघेच होते. त्या युवकाशी बोलताना आमच्या मुलीनं -अदितीनं - म्हटलं कि आम्ही भारतातून आलो आहोत. ते ऐकताक्षणी त्या मुलाचा चेहरा एकदम चमकला. '' ओ , इंडिया ..? शाह रुखस इंडिया..!''
त्याचं ते उत्साही उद्गार ऐकून आम्ही तिघंही चकित झालो. अन त्यानंतर साहजिकच त्या तरुणाशी थोडंफार बोलणंही झालं.
आम्हाला फ्रेंच मुळी येत नव्हतं आणि तो मोडकंतोडकं इंग्रजी बोलू शकत होता.
त्या संभाषणातून कळलं कि बॉलीवूड नट शाह रुख खान त्याचा आवडता अभिनेता होता आणि शाहरुखचे सिनेमे तो आवर्जून पाहत होता. सब-टायटल्सच्या माध्यमातून त्याला हिंदी सिनेमे पाहणं आणि समजून घेणं शक्य झालं होतं. हिंदी चित्रपटांच्या कथा, नाच-गाणी आणि संगीत त्याला आणि फ्रान्समधल्या त्याच्या तरुण पिढीला आवडत आहे असं तो सांगत होता.
शाह रूख खान शिवाय ह्रतिक रोशन, सलमान खान, आमिर खान, प्रियांका चोप्रा आणि ऐश्वर्या राय हे त्याचे आवडते अभिनेते-अभिनेत्री होते.
खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९८६ साली मी पूर्व युरोपात बल्गेरियात आणि सोव्हिएत रशियात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी गेलो होतो तेव्हा असाच थक्क करणारा अनुभव मी घेतला होता.
मॉस्को शहरात आणि बल्गेरियात आम्हा भारतीयांचं 'हिंदी चित्रपट अभिनेता राज कपूर याच्या देशातील लोक' असं म्हणूनच अगदी प्रेमानं स्वागत व्हायचं.
राज कपूरचे `श्री ४२०', 'आवारा' असे कितीतरी चित्रपट रशिया आणि पूर्व युरोपियन देशांत तुफान लोकप्रिय होते. ``मेरा जुता हे जपानी'' हे राज कपूरचे गाणं तिथल्या अनेक लोकांना तोंडपाठ होतं.
पॅरीसमधल्या त्या तरुण पोराचं बॉलीवूडच्या लोकांवरचं प्रेम अनुभवलं आणि राज कपूरप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतील हे अभिनेतेसुद्धा परदेशांत भारताचे अनभिषिक्त सांस्कृतिक राजदूत म्हणून काम करत आहेत याची जाणिव झाली
उगाच नाही `पठाण' ने जागतिक पातळीवर बॉक्स ऑफिसवरचे आधीचे सगळे विक्रम मोडून काढलेत !

Tuesday, November 2, 2021

 मुंबई -गोवा मार्गावरच्या आगबोटीची, स्टिमरची सेवा




साधारणतः याच काळात म्हणजे पावसाळा संपल्यानंतर दसरा सण झाल्यावर अणि दिवाळीच्या आधी गोव्यात मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सकाळी नऊच्या दरम्यान त्या हंगामाचा आगबोटीचा पहिला भोंगा कानावर पडायचा. खुपदा दोन ऑकटोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त या मुंबई -गोवा मार्गावरच्या आगबोटीची म्हणजे स्टिमरची सेवा सुरुवात करण्यासाठी असायचा. मिरामारला धेम्पे कॉलेजला त्याकाळात म्हणजे 1970च्या दशकात आमचे हायर सेकंडरीचे क्लासेस सकाळीच असायचे, त्यामुळे आगबोटीचा हा भोंगा हमखास कानावर यायचा.
मुंबईतून बहुधा त्या प्रसिद्ध भाऊच्या धक्क्यातून आदल्या दिवशी सकाळी धूर सोडीत निघणारी ही आगबोट बरोबर चोवीस तासांनंतर मिरामारला आम्हा कॉलेज विद्यार्थ्यांच्या नजरेस पडायची. मिरामार बिचपासून पणजीतल्या ऐतिहासिक आदिलशाह पॅलेसापाशी म्हणजे तेव्हाच्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय आणि मंत्रालयापाशी असलेल्या पणजी जेटी किंवा धक्का केवळ एकदिड किलोमीटर अंतराचा. मात्र अरबी समुद्राची हद्द संपवून मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी मांडवीच्या मुखात प्रवेश करण्याआधी या आगबोटीचा भोंगा वाजायचा तो आपल्या आगमनाची केवळ सूचना देण्यासाठी.
याचे कारण म्हणजे मुंबई सोडल्यापासून भर समुद्रात वेगाने आगेकूच करणाऱ्या या स्टिमरची पुढची मार्गक्रमणा मिरामारपाशी एकदम टप्प व्हायची. मिरामार येथे मांडवी नदी अरबी समुद्रात विलीन होते, त्यामुळे या ठिकाणी अरबी समुद्रासारखे खोल पाणी नसते.
दर चोवीस तासांत समुद्राच्या दोन भरती अन दोन ओहोटी असतात, म्हणजे दर सहा तासांनंतर एकतर भरतीला किंवा ओहोटीला सुरुवात होत असते. समुद्रकाठी अनेक वर्षे काढलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला समुद्राच्या लाटांकडे पाहूनच किंवा समुद्राच्या पाण्यात शिरताक्षणी त्यावेळी भरती कि ओहोटीची सुरुवात आहे हे कळत असते.
अनेकदा ओहोटीच्या काळात मांडवी समुद्रात विलीन होते त्या जागी म्हणजे मिरामार आणि नदीच्या पलिकडच्या बाजूच्या ऐन मध्यभागी वाळूचे मोठे बेट तयार होऊन तेथे जमीन वर आल्याचा भास निर्माण व्हायचा. त्या वाळूच्या बेटावर जाण्याचा मूर्खपणा करायचा नसतो हे मी कधीच शिकलो होतो.
तर मुंबईहून ही आगबोट निघाल्यावर आपल्या त्या दिवसाच्या शेवटच्या धक्क्यावर पोहोचण्याआधी पणजीचा तो धक्का अगदी जवळ असूनही या बोटीला नांगर टाकणे भाग पडायचे. याचे कारण म्हणजे या काळात ओहोटीची सुरुवात झालेली असायची वा ओहोटी अजून संपलेली नसायची. कारण काहीही असले तरी खोल समुद्रातून मिरामार बिचवर आल्यावर वेळ न दवडता लगेच पणजी धक्क्याकडे ही बोट आली असा अनुभव मला कधीच आला नाही.
मुंबई ते गोवा व्हाया वेंगुर्ला वगैरे बंदरांवरून येणारी ही स्टीमर किंवा आगबोट सेवा 1970च्या दशकात आणि त्याआधी खूप लोकप्रिय होती. कोकणात तोपर्यंत रेल्वे पोहोचली नव्हती आणि मुंबई -गोवा रोडने प्रवास करण्यासाठी त्याकाळात फारशा एसटी आणि खासगी बसेस नसायच्या. त्या काळच्या रस्त्यांच्या स्थितीबद्दल तर न बोललेलेच बरे. आजच्यासारखी लोकांकडे स्वतःची कारसारखी वाहने नसायची. त्यामुळे मुंबईहून गोव्याला आणि गोव्याहून मुंबईला कुटुंबासह आणि पोते आणि जाडजूड लोखंडी पेट्यांसह प्रवास करणाऱ्यांसाठी ही आगबोट सेवा स्वस्त आणि सोयिस्कर असायची.
पावसाळा सुरु होण्याआधी काही दिवस म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात या बोटसेवेचा त्या हंगामातला शेवटचा भोंगा वाजायचा.
मी मूळचा मराठवाड्यातला, औरंगाबाद जिल्ह्यातला, बालपण अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथे घालवले असल्याने दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचे पात्र मी कधी पाहिले नव्हते. आता तर मिरामारला समुद्रकाठीच राहायला आलो होतो. दररॊज सकाळी समुद्राच्या खोल पाण्यात हेलकावे खात असूनमधून भोंगा वाजवणाऱ्या ओहोटी संपून पाण्यातून पुढे जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या त्या आगबोटीकडे मी नवलाने पाहत असायचो.
मात्र आगबोटीची ही प्रतिक्षा फार तर एकदोन तासांची असायची, सकाळी अकराच्या आसपास ही बोट पणजीला धक्क्याला लागायची आणि पाहुणे मुंबईकरांची आणि मुंबईहून परतणाऱ्या गोयेंकारांची सामनासह पाण्यातला प्रवास संपवून जमिनीवर पाय ठेवण्यासाठी अक्षरशः झुंबड उडायची. टायटॅनिक सिनेमा पाहिलेल्या लोकांसमोर मी वर्णन करतो तें चित्र आतापर्यंत उभे राहिले असेलच.
याकाळात उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या सीमेवर असलेल्या आगाशी आणि कोर्ताली येथे झुआरी नदीवर पूल नव्हता. त्यामुळे दोना पावला येथून मोर्मुगांव येथे लाँचने जाऊन तेथून वोस्को शहरात जाणे सोयिस्कर असायचे. या सततच्या प्रवासाने खोल समुद्रातून लाँचने म्हणजे बोटीने प्रवास करणे म्हणजे काय याची थोड्याफार प्रमाणात मला कल्पना होती. तरीसुद्धा एकदा तरी बोटीच्या डेकचा अनुभव घ्यावा, काही तास तरी खोल समुद्रात बोटीने जाऊन यावे असे वाटायचेच.
काही वर्षांनी नवहिंद टाइम्सचा डिफेन्स बिटचा बातमीदार या नात्याने भारतीय नौदलाने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत एका युद्धानौकेवर राहून कारवारपासून दूर असलेल्या खोल अरेबियन समुद्रात दहा दिवस राहण्याची संधी मिळाली. त्यावेळी बोटीने खोल समुद्रात फेरफटका मारण्याची हौस अगदी पुरेपूर मिटली!
मुंबई गोवा या समुद्रमार्गावर दोन बोटी असायच्या, एक मुंबईतून निघणार, त्याचदरम्यान दुसरी पणजीतून. कोकण सेवक असे एका आगबोटीचे नाव होते. दुसरी बोट होती कोकण शक्ती. ही मुंबई गोवा प्रवाशी बोट सेवा मोगल लाईन्स या खासगी कंपनीतर्फे चालवली जायची. आणि या कंपनीचे मालक होता धेम्पो उद्योगसमूह, म्हणजे मी नोकरीला असलेल्या नवहिंद टाइम्स आणि नवप्रभा या दैनिकांचे मालकच. त्यामुळे दर हंगामाला ही आगबोट पहिल्यांदा यायची आणि मे महिन्यात शेवटच्या फेरीत फटाक्यांच्या गजरात पणजी जेटी सोडायवी त्यावेळी या दैनिकांत फोटो हमखास असायचा.
मुंबईत चेंबूरला घर असलेल्या माझ्या एका कॉलेजातील मित्राचे ओव्हिड परेरा याचे कुटुंबिय गोव्याला गावच्या चर्चच्या फेस्ताला किंवा इतर कामांसाठी आल्यावर मुंबईला परतताना या बोटीने जात असत आणि त्यावेळी गोव्यातून बरोबर भरपूर नारळ आणि घरचा उकडलेला तांदूळ म्हणजे बॉईल्ड राईस नेत असत. या बोटीची एकूण प्रवाशीक्षमता होती इनमिन हजार लोक. तिकीट न मिळाल्याने बोटप्रवास चुकला असे कधी होत नसे. प्रवासाचे तिकीट त्याकाळात सुद्धा फार नसायचे.
1980च्या दशकाच्या अखेरीस या आगबोटीच्या सेवेला घरघर लागली आणि दरवर्षी ऑकटोबरात ही सेवा सुरु होईल कि नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचे. 1991 ला या मुंबई गोवा प्रवाशी बोटसेवेने अखेरीस कायमचा नांगर टाकला आणि नंतर सुरु झालेल्या कोकण रेल्वेने या अत्यंत धिम्या वेगाच्या प्रवाशी सेवेची गरजच नाहीशी केली.
अलिकडेच अभिनेता शाह रुख खान यांचा मुलगा आर्यन खान गोवा- मुंबई मार्गावरील अत्यंत अत्याधुनिक क्रूझवरील कारवाईत पकडला गेला. या बातम्या वाचताना आता लोकांच्या आठवणीतून गेलेल्या या खूप जुन्या मुंबई -गोवा स्टिमरची सेवा नजरेसमोर उभी राहिली.
गोव्यात पणजीला मांडवीच्या काठी फिरताना हल्ली रंगीबेरंगी प्रकाशात चमचमणाऱ्या अधिक ताकदीच्या आणि विविध सुविधा असलेल्या कॅसिनोच्या आलिशान बोटी दिसतात, तेव्हा मला त्या जुन्या काळातल्या स्टिमर आगबो्टींची हमखास आठवण येते.
या मांडवीच्या काठाने इतिहासाच्या कितीतरी पाऊलखुणा आपल्या उराशी जपलेल्या आहेत, काही आनंददायी आणि काही कटू आणि काही अगदी गौरवास्पद. पणजी जेटी परिसरात यातल्या इतिहासाच्या काही खुणा कुणालाही दिसतात,
उदाहरणार्थ, हे मध्ययुगीन एकमजली, कौलारीं आदिलशाह पॅलेस किंवा जुने सचिवालय, त्याच्या एका बाजूला गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद किंवा भाऊसाहेब बांदोडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक संमोहनशास्त्राचा जनक असलेल्या आणि युरोपात नाव कमावलेल्या गोव्याचा सुपुत्र असलेल्या ऍबे डी फरिया यांचा तो भव्य पुतळा.
मांडवीच्या तिरात नांगर टाकून अस्वस्थतेने ठराविक वेळाने सारखी भोंगा वाजवत राहणारी ती मुंबई-गोवा आगबोट मात्र माझ्यासारख्या काही मोजक्या लोकांनाच आजही दिसत असते.

********



  • Manee Gill
    Yes, even I have experienced travelling by steamer during 70s..we all cousins use to go to Vengurla with my grandmother and father, they would book for aaji a cabin and we all children use to travel with tickets of upper or lower deck. Many would get sea sick 😀..and best fun part was , steamer would arrive Vengurla early morning and would be achored in deep see and then there would be biggest task of transferring passengers via a rope ladder into a small boàt which would bring us to the jetty. Now just can't imagine how my grandma too use to climb down that huge ship and we too with our luggages 😀
    1
    • Love
    • Reply
    • Share
    • 20 h

Monday, December 28, 2020

बल्गेरियात राज कपूर भेटले

 

  • ३५ वर्षांपूर्वी बल्गेरियात राज कपूर भेटले आणि त्यांचे ‘मेरा जूता है जपानी...’सुद्धा! 
    कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
    कामिल पारखे
    • राज कपूर यांच्या ‘मेरा जूता है जपानी...’ या गाण्यातील विविध भावमुद्रा
    • Mon , 14 December 2020
    • कला-संस्कृतीहिंदी सिनेमाराज कपूरRaj Kapoorमेरा जूता है जपानीMera Joota Hai Japaniआवारा हूँAwara Hoon

    हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीची ही एक जुनी आठवण...

    ..................................................................................................................................................................

    ही जवळपास ३५ वर्षांपूर्वीची घटना आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टने १९८६ साली आम्हां भारतीय पत्रकारांसाठी बल्गेरियात पत्रकारितेचा कोर्स आयोजित केला होता. १९८०च्या दशकात अमेरिका आणि रशियामध्ये चालू असलेल्या शीतयुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टतर्फे रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपियन ब्लॉकमध्ये म्हणजे पूर्व जर्मनी, पोलंड, इटली वगैरे व्हर्साय करारात सामिल असलेल्या देशांत भारतीय पत्रकारांसाठी असे अभ्यासक्रम दौरा आयोजित करत असे. त्या वर्षी बल्गेरियाने भारतीय प्रतिनिधींसाठी पत्रकारिता अभ्यासक्रम आयोजित केला होता आणि गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचा सरचिटणीस म्हणून मीही या अभ्यासक्रम दौऱ्यात सहभागी झालो होतो.

    दररोज संध्याकाळी सात वाजता रात्रीचे जेवण झाल्यानंतर जवळच्या रेस्त्रामध्ये वाईन किंवा व्होडका पित संगीताचा आणि नृत्याचा अनुभव आम्ही घेतू असू. त्या वेळी तेथे पारंपरिक बल्गेरियन पोशाखातील गायक-वादकांचा चमू अंधुक प्रकाशात आपली कला सादर करत असे. त्या गार्डन रेस्त्रामधील काही ग्राहक मध्येच आपले टेबल सोडून मध्यभागी असलेल्या डान्स फ्लोरवर नृत्यात सामील होण्यासाठी जात असत.

    बल्गेरियात महिनाभरापेक्षा जास्त काळ घालवल्यामुळे आता डान्स फ्लोरवर चाललेल्या नृत्यामध्ये सामील होण्याइतकी आम्हा भारतीयांचीदेखील भीड चेपली होती. डान्स फ्लोरवर अनोळखी लोकांसह नाचगाण्यात सहभागी होण्यास तिथल्या तरुण मुली आणि स्त्रियांची काहीच हरकत नसायची, हे आता अनुभवाने आम्हाला समजले होते! मात्र सभ्यतेने वागायचे, अशी किमान अपेक्षा असायची. 

  • तर त्या दिवशी व्होडका (बल्गेरियन उच्चार ‘बोदका’) पीत असताना तेथील भिंतीवरील एका छायाचित्रावर माझी नजर गेली आणि क्षणभर मी चमकलो. भिंतीवरचे ते कृष्णधवल छायाचित्र अगदी परिचित होते. पण त्या छायाचित्राबद्दल खात्री करण्यासाठी मला माझ्या भारतीय मित्रांचे लक्ष वेधून घ्यावे लागले. सुरुवातीला काहींनी अविश्वास व्यक्त केला, मात्र काही क्षणांतच त्या छायाचित्राबद्दल आम्हा कुणालाही शंका राहिली नाही. ते छायाचित्र हिंदी चित्रपट अभिनेता राज कपूर यांचे होते, यात कसलाच वाद नव्हता.

    बल्गेरियात राज कपूरचे छायाचित्र कसे काय, याचे आम्हाला आश्चर्य वाटत होते!

    आमच्यातील काही पत्रकार त्यांची उत्सुकता दाबू शकले नाहीत. त्यांनी रिसेप्शन काऊंटरकडे धाव घेतली. तेथील लोकांना इंग्रजी समजत नव्हते, परंतु हावभाव आणि काही शब्दांच्या मदतीने आम्हाला कळले की, राज कपूर बल्गेरियातही खूप लोकप्रिय आहेत!

    मात्र आमच्या आश्चर्याची मालिका अजून संपायची नव्हती. आम्हा भारतीय पत्रकारांच्या त्या छायाचित्राबाबतच्या सुरुवातीच्या कुजबुजीचे उच्च स्वरातील संवादात रूपांतर झाले होते. तोपर्यंत तिथल्या वाद्यचमूने आपले एक गाणे संपवून आमच्याकडे पाहत दुसरे गाणे सुरू केले. आपली छडी वरखाली करत कॉयर मास्टर आपल्या वाद्यचमूला मार्गदर्शन करत असला तरी त्याचे पूर्ण लक्ष आमच्याकडेच होते. कारण आता वाजवले जाणारे गीत होते – ‘मेरा जूता है जपानी...’ 

    वाद्यचमूतल्या एकाने राज कपूरच्या ‘त्या’ खास शैलीत पदन्यास करत नाचणे सुरू केले, तेव्हा तर त्या रेस्त्रामधील लोकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. मग आम्हाला समजले की, राज कपूरचे हिंदी चित्रपट आणि ‘आवारा हूं...’ सारखी त्यांची गाणी रशिया आणि पूर्व युरोपियन देशांमध्येही लोकप्रिय आहेत.

    रेस्त्रामध्ये आम्ही इतरांशी बोललो, तेव्हा आम्हाला कळले की, राज कपूर हे फक्त बल्गेरियातच नव्हे तर सोव्हिएत रशिया आणि रशियाचा प्रभाव असणाऱ्या पूर्व युरोपियन राष्ट्रांमध्येही एक घरगुती नाव आहे.

    या दौऱ्यादरम्यान मला कळाले की, सोव्हिएत रशियामध्ये दोन भारतीय सर्वांत लोकप्रिय होते. त्यापैकी पहिली म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसरी, अभिनेता राज कपूर. आमच्या मॉस्कोच्या दौऱ्यात एका महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चौकात इंदिरा गांधींचा पूर्ण-आकाराचा पुतळा मी बसमधून पाहिला होता.

    याशिवाय बल्गेरियात आणखी एक भारतीय नाव लोकप्रिय होते. ती तिसरी व्यक्ती म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते कवी रवीन्द्रनाथ टागोर. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवीन्द्रबाबू टागोर बल्गेरियात आले होते. त्यांच्या कवितांचे बल्गेरियन भाषेत अनुवाद झाले आहेत.

    एके दिवशी आम्ही बल्गेरियातील एका शहरातील कापड कारखान्यास भेट दिली. तिथून परतताना तिथला एक मध्यमवयीन कर्मचारी आमच्याकडे लिफ्टपाशी आला. डोक्यावरची आपली हॅट त्याने हातात घेतली आणि राज कपूर यांच्या खास शैलीत पदण्यास करत तो ‘आवारा हूं, आवारा हूं....’ या गाण्याची धून गाऊ लागला!

    आम्ही आवाक् झालो. राज कपूर यांच्या देशातले लोक म्हणून आमच्याशी हस्तांदोलन करून तो राज कपूरचा चाहता आपल्या कामाकडे वळला.

    (काही वर्षांपूर्वी युरोप दौऱ्यात पॅरिसमधील एका सुपरमार्केटमध्ये एका तरुण कॅशियरशी मी बोलत होतो. माझ्या मुलीने त्या संभाषणाच्या ओघात सांगितले की, आम्ही भारतीय पर्यटक आहोत. तेव्हा त्या पोरगेल्या कॅशियरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती – ‘शाहरुख खान्स इंडिया!’ त्याचे ते उद्गार आमच्यासाठी सुखद आश्चर्य होते. त्या तरुणाला फारसे इंग्रजी येत नव्हते, परंतु तरीही संभाषण करण्यात आम्ही यशस्वी झालो. तो म्हणाला की, ‘एसआरकेचा चाहता आहे, शाहरुखचे हिंदी चित्रपट, नाचगाणे आणि संगीत मला आवडते.’ फ्रेंच भाषेतील सब-टायटल्स वाचली नाही तरी त्याला शाहरुखच्या चित्रपटाची कथा समजत होती. हृतिक रोशन, आमिर खान आणि इतर भारतीय कलाकारांचे हिंदी चित्रपटही त्याला आवडतात असेही त्याने सांगितले.

    भारतीय चित्रपट अभिनेत्यांनी आपल्या राष्ट्रीय, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा पार केल्या आहेत. किंग खान आणि हिंदी चित्रपट कलावंतांच्या नव्या पिढीने राज कपूरचा ‘भारताचा सांस्कृतिक राजदूत’ होण्याचा वारसा खरोखरच चालू ठेवला आहे.)

    बल्गेरियातला पत्रकारिता अभ्यासक्रम कोर्स संपल्यानंतर सोफिया येथून मॉस्कोमार्गे आम्ही भारतात परतत होतो. हवाई प्रवासात ताश्कंदला काही काळ थांबलो. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ताश्कंद या शहरात अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या शहरात पाऊल ठेवताक्षणी कुणाही भारतीयाला शास्त्रींची आठवण येतेच. पहाटे आमचे विमान नवी दिल्लीत पोहोचले. नव्यानेच बांधण्यात आलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नुकतेच झाले होते. परंतु त्या काळात प्रवाशांना विमानापासून चेक-इन काउंटरपर्यंतचे लांब पल्ल्याचे अंतर पार करण्यासाठी हल्लीच्या सरकत्या पट्ट्यासारखे कोणतेही साधन नव्हते. आम्ही सहकारी त्या बंद कॉरिडॉरमधून चेक-इन काउंटरकडे चालत जात होतो, तेव्हा अचानक माझी नजर एका वयस्कर सह-प्रवाशावर पडली.

  • जास्त वजनाच्या सूटकेस विमानाच्या कार्गो विभागात पाठवता येत नसल्याने माझ्या अंगावर आणि हातात जड, उबदार कपडे व इतर सामान होते. त्या गोऱ्यापान, लालबुंद चेहऱ्याच्या स्थूल वृद्ध प्रवाशाकडे मात्र बिलकूल सामान नव्हते. थोड्या वेळाने जवळून जात त्या वृद्ध प्रवाशाला मागे टाकले, तेव्हा ते थोडे थकल्यासारखे दिसले. त्या कॉरिडारमध्ये रांगेत असलेल्या रंगीबेरंगी बकेट सीटस होत्या, त्यापैकी एका खुर्चीत ते मटकन बसले. थकल्यामुळे त्याचा अतिशय गोरा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता.

    मी अचानक थबकलो.

    ते राज कपूर होते. सोव्हिएत रशिया किंवा इतर पूर्व युरोपियन देशांचा दौरा करून ते मॉस्कोमार्गे विमानाने आमच्याबरोबरच प्रवास करत दिल्लीला परतत होते.

    या महान चित्रपट अभिनेत्यापासून काही फूट अंतरावरच मी उभा होतो. काय करायला हवे होते, तेही परदेशात या कलावंताची लोकप्रियता अनुभवल्यावर? मला आजही असे वाटते की, भारतीय चित्रपटसृष्टीच्या या महान कलावंताबरोबर मी किमान हस्तांदोलन करायला हवे होते. रशिया आणि बल्गेरियात त्यांच्यामुळे आम्हा भारतीयांना अभिमानाची वागणूक मिळाल्याबद्दल त्यांच्याविषयीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती. पण यापैकी मी काहीही करू शकलो नाही. त्याचे कारण म्हणजे स्वत:चा लाजाळूपणा आणि सेलिब्रिटी व्यक्तीच्या खासगीपणाचा भंग करून त्यांना त्रास न देण्याची इच्छा.