Showing posts with label Vengurla. Show all posts
Showing posts with label Vengurla. Show all posts

Saturday, May 4, 2024

ख्रिस्ती मतदार
 अठरापगड जाती आणि जमातींचे समावेश असलेल्या ख्रिस्ती मतदारांचा महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत कुणाला कौल असणार आहे?

ख्रिस्ती समाजाचे राज्यात अधिकृत आणि अनधिकृत अशाप्रकारे तीन टक्क्यांच्या आसपास प्रमाण आहे.
भारतात सगळीकडे अगदी मुंबईपुण्यातसुद्धा धर्म, जात आणि पोटजात पाहून राजकीय पक्ष आपला उमेदवार देतात.
कारण मतदारसुद्धा त्याच पद्धतीने मतदान करतात.
महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विशेषतः विधानसभेत ख्रिस्ती समाजाचे एकगठ्ठा मतदान निर्णायक ठरु शकते याची तळागळावर काम असणाऱ्या राजकीय नेत्यांना माहिती असते.
याचा कधी तरी फटका बसला तर मग याची जाणीव होते.
एखादा उमेदवार थोड्याफार मतांच्या फरकाने पराभूत होतो अशावेळी मग एकगठ्ठा असलेल्या अशा मतदानामुळे ही किमया घडली हे कळते. असे मुंबईत एका प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अलीकडच्या काळात झाले होते.
त्यामुळें गाफील राहणे, कुठल्याही समजघटकाला दुर्लक्षित करणे धोकादायक ठरते.
इतर धर्मिय समाजाप्रमाणे निदान महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज एकसंघ, एक संस्कृतीचा किंवा एक भाषिक नाही. हे विशेषतः मुंबईपुण्यात जाणवते.
महाराष्ट्रात सर्वाधिक ख्रिस्ती मतदान आहे ते राज्याच्या राजधानीत.
मुंबईतल्या दोन लोकसभा मतदारसंघांत कुठलाही राजकीय पक्ष या समाजाला गृहीत धरू शकत नाही अशी तिथे परिस्थिती आहे. काटे की टक्कर असेल तर मग विचारूच नका.
मुंबईतला ख्रिस्ती मतदार हा पूर्णतः कॉस्मोपोलीटन आहे. मूळचे गोंयकार असलेले अनेक कॅथोलीक्स बांद्रा, चेंबूर, गोरेगाव वगैरे परीसरात मोठ्या संख्येने आहेत.
त्याशिवाय मूळचा दाक्षिणात्य असलेला ख्रिस्ती मतदार आहे,
त्याशिवाय संपूर्ण राज्यातून मुंबईत स्थायिक झालेल्या मराठी भाषक ख्रिस्ती समाज सुद्धा लक्षणीय आहे. भाषा, संस्कृती वगैरे कारणांमुळे या मराठी ख्रिस्ती लोकांचे वेगळेपण पटकन लक्षात येत नसते.
मुंबईत पाय रोवलेल्या या लोकांची नाळ आपल्या गावांकडे कायम असतेच. गावाकडच्या मतदानावरसुद्धा त्यांचा प्रभाव असतोच.
एकेकाळी म्हणजे सत्तरच्या दशकात मुंबईतून समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो विधानसभेवर निवडून येत असत.
त्याआधी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या काँग्रेसच्या स. का. पाटील यांना नंतर ' बंदसम्राट ' असे नाव कमावलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी चक्क लोकसभा निवडणुकीत हरवले होते !
डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे केवळ महापौर नव्हते तर नंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री सुद्धा बनले.
शेजारच्या वसईतून एखादे गोन्सालवीस किंवा इतर कुणी आमदार म्हणून निवडून येत असत.
मुंबईच्या सेलीन डिसिल्वा या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८३-८४) आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८५) राज्यमंत्री होत्या.
या समाजाच्या प्रतिनिधीला त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही.
.
कोकणात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या परिसरात फर्नांडिस, डिसोझा, डान्टेस, अशी नावे असणारी मूळची गोंयकार असलेली मंडळी लक्षणीय संख्येने आहेत.
गेल्या दोनतीन शतकात पोर्तुगीजांच्या गोव्यातून इथे हे कॅथोलिक लोक स्थायिक झालेत. त्यांना दुर्लक्षित करून कुठल्याही पक्षाला, उमेदवाराला विजयी होता येत नसते.
इथे एखादा कॅथोलीक उमेदवार सोशल इंजियरींगच्या आधारावर विधानसभेवर निवडून येऊ शकतो.
मुंबई आणि वसईनंतर ख्रिस्ती मतदानाचा सर्वाधिक टक्का आहे तो पुण्यात.
पूर्वी बारामती मतदारसंघात असलेले पिंपरी चिंचवड शहर आता मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॉस्मोपोलिटन ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व लगेच जाणवते. तिथले कॉलेज आणि इतर शिक्षणसंस्था या ख्रिस्ती समाजाची ओळख आहे.
अहमदनगर, नाशिक जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा येथे ख्रिस्ती समाज आपली खास ओळख राखून आहे. हा समाज तिथल्या मातीतला आहे, त्यामुळे आपल्या पाठीशी कोण राजकारणी उभा राहतो हे हा समाज पुरता ओळखून आहे.
संकटाच्या वेळी आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्ते या समाजाच्या पाठीशी असतात हे अनेकदा दिसून आले आहे. याचे कारण हा समाज आंबेडकरवाद्यांना परका मुळीच नाही. रक्ताचे आणि नात्यातले संबंध आहेत त्यांचे.
हे लोक ख्रिस्ती असल्याने भाजप आणि पूर्ण परिवार त्यांच्याकडे नेहेमीच संशयाने पाहत असतो हे साहजिकच.
तर मग या ख्रिस्ती मतदारांचा नैसर्गिक ओढा कुठल्या राजकीय पक्षांकडे असतो?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष ख्रिस्ती समाजाला गृहीत धरून असतात..
"तुम्ही जाऊन, जाऊन जाणार कुठे ? "असा मग्रुरीचा भाव.
पण खरेच तसे आहे काय?
एक सांगतो.
विसेक वर्षांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेत मागच्या वेळी एक ख्रिस्ती नगरसेविका निवडून आली होती. अश्विनी डॅनिएल लांडगे हे त्यांचे नाव.
त्यांना हैदराबादच्या ओवेसी यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. `एमआयएम'च्या त्या एकमेव नगरसेविका होत्या.
अशाप्रकारे आज कुठला राजकीय पक्ष ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करू शकेल?
यावेळी या राजकीय फाटाफुटीच्या काळात ख्रिस्ती मतदार कुणाच्या तागडीत आपला कौल टाकणार आहेत?
काही अंदाज?
यापुढील काही पोस्ट्समध्ये याविषयी सविस्तर लिहिणार आहे....
****
फोटो ओळी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांची भेट घेऊन त्यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे. अंतोन कदम
यावेळी हजर होते.
Camil Parkhe

Tuesday, November 2, 2021

 मुंबई -गोवा मार्गावरच्या आगबोटीची, स्टिमरची सेवा




साधारणतः याच काळात म्हणजे पावसाळा संपल्यानंतर दसरा सण झाल्यावर अणि दिवाळीच्या आधी गोव्यात मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सकाळी नऊच्या दरम्यान त्या हंगामाचा आगबोटीचा पहिला भोंगा कानावर पडायचा. खुपदा दोन ऑकटोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त या मुंबई -गोवा मार्गावरच्या आगबोटीची म्हणजे स्टिमरची सेवा सुरुवात करण्यासाठी असायचा. मिरामारला धेम्पे कॉलेजला त्याकाळात म्हणजे 1970च्या दशकात आमचे हायर सेकंडरीचे क्लासेस सकाळीच असायचे, त्यामुळे आगबोटीचा हा भोंगा हमखास कानावर यायचा.
मुंबईतून बहुधा त्या प्रसिद्ध भाऊच्या धक्क्यातून आदल्या दिवशी सकाळी धूर सोडीत निघणारी ही आगबोट बरोबर चोवीस तासांनंतर मिरामारला आम्हा कॉलेज विद्यार्थ्यांच्या नजरेस पडायची. मिरामार बिचपासून पणजीतल्या ऐतिहासिक आदिलशाह पॅलेसापाशी म्हणजे तेव्हाच्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय आणि मंत्रालयापाशी असलेल्या पणजी जेटी किंवा धक्का केवळ एकदिड किलोमीटर अंतराचा. मात्र अरबी समुद्राची हद्द संपवून मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी मांडवीच्या मुखात प्रवेश करण्याआधी या आगबोटीचा भोंगा वाजायचा तो आपल्या आगमनाची केवळ सूचना देण्यासाठी.
याचे कारण म्हणजे मुंबई सोडल्यापासून भर समुद्रात वेगाने आगेकूच करणाऱ्या या स्टिमरची पुढची मार्गक्रमणा मिरामारपाशी एकदम टप्प व्हायची. मिरामार येथे मांडवी नदी अरबी समुद्रात विलीन होते, त्यामुळे या ठिकाणी अरबी समुद्रासारखे खोल पाणी नसते.
दर चोवीस तासांत समुद्राच्या दोन भरती अन दोन ओहोटी असतात, म्हणजे दर सहा तासांनंतर एकतर भरतीला किंवा ओहोटीला सुरुवात होत असते. समुद्रकाठी अनेक वर्षे काढलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला समुद्राच्या लाटांकडे पाहूनच किंवा समुद्राच्या पाण्यात शिरताक्षणी त्यावेळी भरती कि ओहोटीची सुरुवात आहे हे कळत असते.
अनेकदा ओहोटीच्या काळात मांडवी समुद्रात विलीन होते त्या जागी म्हणजे मिरामार आणि नदीच्या पलिकडच्या बाजूच्या ऐन मध्यभागी वाळूचे मोठे बेट तयार होऊन तेथे जमीन वर आल्याचा भास निर्माण व्हायचा. त्या वाळूच्या बेटावर जाण्याचा मूर्खपणा करायचा नसतो हे मी कधीच शिकलो होतो.
तर मुंबईहून ही आगबोट निघाल्यावर आपल्या त्या दिवसाच्या शेवटच्या धक्क्यावर पोहोचण्याआधी पणजीचा तो धक्का अगदी जवळ असूनही या बोटीला नांगर टाकणे भाग पडायचे. याचे कारण म्हणजे या काळात ओहोटीची सुरुवात झालेली असायची वा ओहोटी अजून संपलेली नसायची. कारण काहीही असले तरी खोल समुद्रातून मिरामार बिचवर आल्यावर वेळ न दवडता लगेच पणजी धक्क्याकडे ही बोट आली असा अनुभव मला कधीच आला नाही.
मुंबई ते गोवा व्हाया वेंगुर्ला वगैरे बंदरांवरून येणारी ही स्टीमर किंवा आगबोट सेवा 1970च्या दशकात आणि त्याआधी खूप लोकप्रिय होती. कोकणात तोपर्यंत रेल्वे पोहोचली नव्हती आणि मुंबई -गोवा रोडने प्रवास करण्यासाठी त्याकाळात फारशा एसटी आणि खासगी बसेस नसायच्या. त्या काळच्या रस्त्यांच्या स्थितीबद्दल तर न बोललेलेच बरे. आजच्यासारखी लोकांकडे स्वतःची कारसारखी वाहने नसायची. त्यामुळे मुंबईहून गोव्याला आणि गोव्याहून मुंबईला कुटुंबासह आणि पोते आणि जाडजूड लोखंडी पेट्यांसह प्रवास करणाऱ्यांसाठी ही आगबोट सेवा स्वस्त आणि सोयिस्कर असायची.
पावसाळा सुरु होण्याआधी काही दिवस म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात या बोटसेवेचा त्या हंगामातला शेवटचा भोंगा वाजायचा.
मी मूळचा मराठवाड्यातला, औरंगाबाद जिल्ह्यातला, बालपण अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथे घालवले असल्याने दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचे पात्र मी कधी पाहिले नव्हते. आता तर मिरामारला समुद्रकाठीच राहायला आलो होतो. दररॊज सकाळी समुद्राच्या खोल पाण्यात हेलकावे खात असूनमधून भोंगा वाजवणाऱ्या ओहोटी संपून पाण्यातून पुढे जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या त्या आगबोटीकडे मी नवलाने पाहत असायचो.
मात्र आगबोटीची ही प्रतिक्षा फार तर एकदोन तासांची असायची, सकाळी अकराच्या आसपास ही बोट पणजीला धक्क्याला लागायची आणि पाहुणे मुंबईकरांची आणि मुंबईहून परतणाऱ्या गोयेंकारांची सामनासह पाण्यातला प्रवास संपवून जमिनीवर पाय ठेवण्यासाठी अक्षरशः झुंबड उडायची. टायटॅनिक सिनेमा पाहिलेल्या लोकांसमोर मी वर्णन करतो तें चित्र आतापर्यंत उभे राहिले असेलच.
याकाळात उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या सीमेवर असलेल्या आगाशी आणि कोर्ताली येथे झुआरी नदीवर पूल नव्हता. त्यामुळे दोना पावला येथून मोर्मुगांव येथे लाँचने जाऊन तेथून वोस्को शहरात जाणे सोयिस्कर असायचे. या सततच्या प्रवासाने खोल समुद्रातून लाँचने म्हणजे बोटीने प्रवास करणे म्हणजे काय याची थोड्याफार प्रमाणात मला कल्पना होती. तरीसुद्धा एकदा तरी बोटीच्या डेकचा अनुभव घ्यावा, काही तास तरी खोल समुद्रात बोटीने जाऊन यावे असे वाटायचेच.
काही वर्षांनी नवहिंद टाइम्सचा डिफेन्स बिटचा बातमीदार या नात्याने भारतीय नौदलाने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत एका युद्धानौकेवर राहून कारवारपासून दूर असलेल्या खोल अरेबियन समुद्रात दहा दिवस राहण्याची संधी मिळाली. त्यावेळी बोटीने खोल समुद्रात फेरफटका मारण्याची हौस अगदी पुरेपूर मिटली!
मुंबई गोवा या समुद्रमार्गावर दोन बोटी असायच्या, एक मुंबईतून निघणार, त्याचदरम्यान दुसरी पणजीतून. कोकण सेवक असे एका आगबोटीचे नाव होते. दुसरी बोट होती कोकण शक्ती. ही मुंबई गोवा प्रवाशी बोट सेवा मोगल लाईन्स या खासगी कंपनीतर्फे चालवली जायची. आणि या कंपनीचे मालक होता धेम्पो उद्योगसमूह, म्हणजे मी नोकरीला असलेल्या नवहिंद टाइम्स आणि नवप्रभा या दैनिकांचे मालकच. त्यामुळे दर हंगामाला ही आगबोट पहिल्यांदा यायची आणि मे महिन्यात शेवटच्या फेरीत फटाक्यांच्या गजरात पणजी जेटी सोडायवी त्यावेळी या दैनिकांत फोटो हमखास असायचा.
मुंबईत चेंबूरला घर असलेल्या माझ्या एका कॉलेजातील मित्राचे ओव्हिड परेरा याचे कुटुंबिय गोव्याला गावच्या चर्चच्या फेस्ताला किंवा इतर कामांसाठी आल्यावर मुंबईला परतताना या बोटीने जात असत आणि त्यावेळी गोव्यातून बरोबर भरपूर नारळ आणि घरचा उकडलेला तांदूळ म्हणजे बॉईल्ड राईस नेत असत. या बोटीची एकूण प्रवाशीक्षमता होती इनमिन हजार लोक. तिकीट न मिळाल्याने बोटप्रवास चुकला असे कधी होत नसे. प्रवासाचे तिकीट त्याकाळात सुद्धा फार नसायचे.
1980च्या दशकाच्या अखेरीस या आगबोटीच्या सेवेला घरघर लागली आणि दरवर्षी ऑकटोबरात ही सेवा सुरु होईल कि नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचे. 1991 ला या मुंबई गोवा प्रवाशी बोटसेवेने अखेरीस कायमचा नांगर टाकला आणि नंतर सुरु झालेल्या कोकण रेल्वेने या अत्यंत धिम्या वेगाच्या प्रवाशी सेवेची गरजच नाहीशी केली.
अलिकडेच अभिनेता शाह रुख खान यांचा मुलगा आर्यन खान गोवा- मुंबई मार्गावरील अत्यंत अत्याधुनिक क्रूझवरील कारवाईत पकडला गेला. या बातम्या वाचताना आता लोकांच्या आठवणीतून गेलेल्या या खूप जुन्या मुंबई -गोवा स्टिमरची सेवा नजरेसमोर उभी राहिली.
गोव्यात पणजीला मांडवीच्या काठी फिरताना हल्ली रंगीबेरंगी प्रकाशात चमचमणाऱ्या अधिक ताकदीच्या आणि विविध सुविधा असलेल्या कॅसिनोच्या आलिशान बोटी दिसतात, तेव्हा मला त्या जुन्या काळातल्या स्टिमर आगबो्टींची हमखास आठवण येते.
या मांडवीच्या काठाने इतिहासाच्या कितीतरी पाऊलखुणा आपल्या उराशी जपलेल्या आहेत, काही आनंददायी आणि काही कटू आणि काही अगदी गौरवास्पद. पणजी जेटी परिसरात यातल्या इतिहासाच्या काही खुणा कुणालाही दिसतात,
उदाहरणार्थ, हे मध्ययुगीन एकमजली, कौलारीं आदिलशाह पॅलेस किंवा जुने सचिवालय, त्याच्या एका बाजूला गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद किंवा भाऊसाहेब बांदोडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक संमोहनशास्त्राचा जनक असलेल्या आणि युरोपात नाव कमावलेल्या गोव्याचा सुपुत्र असलेल्या ऍबे डी फरिया यांचा तो भव्य पुतळा.
मांडवीच्या तिरात नांगर टाकून अस्वस्थतेने ठराविक वेळाने सारखी भोंगा वाजवत राहणारी ती मुंबई-गोवा आगबोट मात्र माझ्यासारख्या काही मोजक्या लोकांनाच आजही दिसत असते.

********



  • Manee Gill
    Yes, even I have experienced travelling by steamer during 70s..we all cousins use to go to Vengurla with my grandmother and father, they would book for aaji a cabin and we all children use to travel with tickets of upper or lower deck. Many would get sea sick 😀..and best fun part was , steamer would arrive Vengurla early morning and would be achored in deep see and then there would be biggest task of transferring passengers via a rope ladder into a small boàt which would bring us to the jetty. Now just can't imagine how my grandma too use to climb down that huge ship and we too with our luggages 😀
    1
    • Love
    • Reply
    • Share
    • 20 h