Showing posts with label Sofia. Show all posts
Showing posts with label Sofia. Show all posts

Tuesday, July 30, 2024

 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी मीनाक्षी गुरव या निवडून आल्या आहेत.

अशा निवडीची मी गेली अनेक वर्षे वाट पाहत होतो, तो योग आज तब्बल तीन दशकांनी आला.
सन १९९१-९२ ला या पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी मी अर्ज भरला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
कारण माझ्यामुळे निवडणूक अटळ होती.
त्याकाळात पत्रकार संघातले काही दुढ्ढाचार्य पत्रकार संघाचे पदाधिकारीपद आणि सदस्यपद इतरांना बहाल करत असत.
गोवा सोडून औरंगाबादमार्गे मी पुण्याला आलो होतो. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा - गुजचा - मी सरचिटणीस होतो, पत्रकारांच्या अनेक केसेस मी लढवल्या होत्या, ठाण्यात बच्छावत वेतन आयोगासमोर मी पत्रकारांची बाजू मांडली होती.
हाती लाल बावटे घेऊन, घोषणा देत पणजीत, दिल्लीत, कटक आणि श्रीनगर येथील वृत्तपत्र कामगारांच्या मोर्च्यांत मी सहभागी झालो होतो आणि नेतृत्वही केले होते
गुज सरचिटणीस म्हणून Indian Federation of Working Journalists- IFWJ- ने मला प्रशिक्षणासाठी बल्गेरिया आणि रशियाला पाठवले होते.
लोकमत टाइम्सला असताना औरंगाबाद श्रमिक पत्रकार संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत मी सरचिटणीसपदी निवडून आलो होतो.
तर पुण्यातल्या आमच्या इंडियन एक्सप्रेस ऑफिसात असाच एक सहकारी ऑफिसात आला आणि आपल्या दैनिकातर्फे त्याची सदस्यपदावर निवड झाली हे त्याने सांगितले, तेव्हा मी त्याच्याकडे असे चमकून पाहिले होते.
मग दुसऱ्या वर्षी माझ्यामुळे निवडणूक अटळ ठरली.
तर त्यावर्षी समोरचा उमेदवार खूप मताधिक्याने निवडून आला, ५२ विरुद्ध १३.
सलग दुसऱ्या वर्षी माझ्यामुळे पुन्हा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पुन्हा निवडणुका झाल्या,
जवळजवळ सर्वच पदांसाठी.

विशेष म्हणजे मी आणि पराग रबडेने सर्व पदांसाठी निवडणुकीसाठी अख्खे पॅनेलच उभे केले होते.
महाराष्ट्र हेराल्डच्या गौरी आगट्ये- आठल्ये सरचिटणीसपदावर बिनविरोध निवडून आल्या.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या त्या पहिल्यावाहिल्या महिला सरचिटणीस.
त्याआधी महिलांनी केवळ चिटणीसपद भूषवले होते.
त्यावेळी केसरीचे मधुकर प्रभुदेसाई सकाळ पुरस्कृत महाराष्ट्र हेराल्डच्या मूर्तींचा पराभव करून निवडून आले.
त्यानंतर पत्रकार संघाच्या नियमित निवडणुका होऊ लागल्या त्या आजतागायत. हे माझे एक छोटेसे पण महत्त्वाचे योगदान.
मात्र गेले पस्तीस वर्षे एकाही महिलेची सरचिटणीसपदावर निवड झालेली नव्हती ही अभिमानाची गोष्ट नव्हती. .
नव्या सोळा सदस्यीय कार्यकारिणीत इतर केवळ एकच महिला आहे.
अध्यक्षपदानेसुद्धा महिला पत्रकारांना आतापर्यंत हुलकावणी दिली आहे.
नूतन अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
Camil Parkhe, July 29, 2024

Wednesday, November 2, 2022

देहविक्री हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय

 श्रीरामपूरला आमच्या घरापासून चारशे-पाचशे मीटर अंतरावर आणि आमच्या सोमैय्या शाळेच्या मागे दहावीस घरांची वस्ती होती. आमच्या चाळीतल्या घरांसारखीच ही घरे सुध्दा कुडांची आणि पांढऱ्या मातीने बांधलेली होती. मात्र तरी या वस्तीला ` सफेद गल्ली’ किंवा ` पांढरी वस्ती’ या नावाने ओळखले जायचे.

या सफेद गल्लीला मी अनेकदा लांबून पाहिले, तिथून अगदी जवळून जाण्याची अनेकदा वेळ आली. या गल्लीत बहुधा एकदोन खोल्या असणाऱ्या घरांची समोरासमोर असलेली दारे होती, तिथल्या बाया अनेकदा दारापाशी बसून मशेरीनं दात घासत आपापसांत गप्पा मारत बसलेल्या दिसायच्या, किराणा दुकानावर त्या यायच्या, तेव्हा त्यांच्यापैकी काहींचे, विशेषतः प्रौढ बायांचे चेहरे काहीसे वेगळे, फुगलेले वाटायचे.
त्या `सफेद गल्ली’पाशी असलेल्या बाजारतळासमोरच्या मैदानावर आठवडी बाजाराच्या दिवशी शुक्रवारी तमाशाचे खेळ व्हायचे. या तमाशाबाबत वडीलधारी लोकांमध्ये खुलेपणाने कधी चर्चा झाल्याचे मी कधीही ऐकले नाही तसेच या पांढऱ्या घरांबाबत आणि त्या घरांत राहणाऱ्या बायांबाबत कधी वाईट किंवा चांगले बोललेले मी कधी ऐकले नाही. त्याकाळी शाळेच्या मागे त्या परिसरातील लोकांसाठी श्रीरामपूर नगरपालिकेने पुरुषांसाठी बारा आणि बायांसाठी बारा संडास बांधले होते. ते `बारा संडास’ असा अगदी सहजगत्या उल्लेख व्हायचा तसेच त्यामागची ती `पांढरी गल्ली’ असा तितक्याच सहजतेने उल्लेख व्हायचा.
शरीरधर्मासाठी दोन्हीही आवश्यकच..
सत्तरच्या दशकात गोव्यात मी शिकत असताना आणि नंतरच्या काळात पणजीला बातमीदारी करत असताना वॉस्को शहराजवळचा बायना बिच हा `रेड लाईट एरिया’ म्हणून प्रसिद्ध होता. समुद्रकिनारी असलेले बंदर अनेकदा कायम नौकानयनावर असलेल्या लोकांची आणि सैनिकांची शरीरसंबंधांची भूक भागवत असत.
ऐंशीच्या दशकात गोव्यात ताळगावला आमच्या `द नवहिंद टाइम्स’ आणि `नवप्रभा’ या जुळया इंग्रजी-मराठी दैनिकांतील आम्ही तीन सहकारी नारळांच्या झाडांनीं वेढलेलं एक बैठे टुमदार कौलारु घर भाड्याने घेऊन एकत्र राहत होतो. दरमहिना पाचशे रुपये भाडे होते या पाच खोल्यांच्या घराचे. आमच्यातल्या एक ज्येष्ठ सहकारी आपल्या पार्टनरबरोबर या घरात राहत असायचा, वेश्यागमनासाठी बायना बिचवर कि इतर कुठंकुठं हा माझा सहकारी जायचा तेव्हा तिथल्या या तरुणीला तो आपल्याबरोबर राहण्यासाठी म्हणून कायमचा घेऊन आला होता. मूळची कर्नाटकची असलेली ती आम्हा सगळ्यांबरोबर हिंदीत बोलायची. एका खोलीत मी आणि माझ्याच वयाचा, विशीच्या आसपास असलेला तो दुसरा तरुण सहकारी राहायचा.
या बंगलीवजा घराच्या आतल्या कुठल्याही रुमला दारं नव्हती आणि खिडक्यांनाही गज नव्हते. रात्री खूप उशिरा मी आलो कि स्वयंपाकघराच्या एका खिडकीची वरची कडी विशिष्ट पद्धतीनं खोलून मग ती खिडकी उघडून इकडंतिकडं न बघता मी सरळ माझ्या खोलीकडं जायचो.
एक दिवस मी रात्री घरी आलो तर या मुलानं मला सांगितलं कि सावंतवाडीहून त्याची मामेबहिण आज मुक्कामाला आली आहे, त्यामुळं त्या रात्री मी त्या रुमबाहेर झोपावं. काही हरकत न घेता मी त्याच्या सांगण्याप्रमाणं केलं. काही दिवसांनी तो मुलगा त्याच्या दोन चुलत कि मामे बहिणींना घेऊन आला होता आणि मग परत मला त्या खोलीबाहेर झोपावं लागलं.
दोनतीन दिवसांनी त्या मुलाच्या नातेवाईक बहिणींचा विषय सहज आमच्या तिसऱ्या सहकाऱ्याच्या पार्टनरशी बोलताना निघाला तेंव्हा ती एकदम खोखो हसत सुटली. मी मख्खपणे तिच्याकडं पाहत राहिलो तेव्हा ती हिंदीत मला म्हणाली, '' कामिल, तुम्ही किती बावळट आहात ! त्यानं तुम्हाला त्या मुली त्याच्या चुलत आणि मामे बहिणी आहेत असं सांगितलं आणि तुम्ही त्यावर सरळसरळ विश्वास ठेवला ? कमाल आहे बाई तुमच्या भोळसटपणाची आणि मुर्खपणाची! '' आणि ती पुन्हा तोंडाला पदर लावून पुन्हा हसत सुटली तेव्हा कुठं माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला!
गोव्यात मी पत्रकारितेची सुरुवात केली ती मुळी एज्युकेशन कॅम्पस आणि क्राईम रिपोर्टर म्हणूनच. दोन्हींचे जग अगदी वेगवेगळे. क्राईम रिपोर्टर म्हणून पोलीस, गुन्हेगारी विश्व आणि कधी ना कधी कायदा उल्लंघन करणारे लोक आणि त्यामुळे पोलिसांशी संबंध येणारे लोक यांच्याशी जवळून अनुभव आला. पोलिसांकडून या ना त्या कारणामुळे पकडले जाणारे लोक चोर वा गुन्हेगार असतातच असे नाही, याचा अनेकदा अनुभव आला.
पणजी पोलिस स्टेशनवर मुख्य असलेला फौजदार अलेक्स फर्नांडिस हा माझा जवळचा मित्र आणि क्राईम बिट सांभाळत असलेल्या माझ्यासाठी एक महत्त्वाचा स्त्रोत. पणजीतल्या आझाद मैदानावरच्या पोलिस मुख्यालयातली माझी भेट अलेक्सला `हाय’ केल्याशिवाय, त्याचाशी दोन शब्द बोलल्याशिवाय पुरी होत नसायची. कधीकधी फौजदार अलेक्स मला त्याच्या पोलिस जीपमधून पणजीतल्या `राऊंड’वर किंवा अगदी गुन्ह्याच्या घटनास्थळी घेऊन जायचा.
त्यादिवशी मात्र अलेक्स मला एका वेगळ्याच कामगिरीवर घेऊन गेला. त्यावेळी अंमलात असलेल्या `सिटा’ म्हणजे सप्रेशन ऑफ इममॉरल ट्रॅफिक ॲक्टीव्हीटीज अँक्टनुसार छापा घालण्यास आपण जात आहोत असे ऐकल्यावर मी सावध झालो होतो. आता या अँक्टमधील `सप्रेशन’ शब्दाची जागा `प्रिव्हेंशन’ ने घेतल्याने `सिटा’ ऐंवजी `पिटा’ असे नामानिधान झाले आहे.
पोलिस जीप पणजीहून चारशे वर्षांचा पोर्तुगीजकालीन पाटो पुल आणि पणजी बसस्टॅण्ड ओलांडून ओल्ड गोव्याच्या दिशेने धावू लागली आणि रायबंदर येथे रस्त्याशेजारी एकमजली इमारत असलेल्या एका लॉजपाशी थांबली. जीपमधल्या काही पोलिसांनी धावत जाऊन लागलीच मोक्याच्या जागा घेतल्या आणि इतर पोलिस तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावरच्या बंद खोल्यांना जोरजोराने ओरडत धडका देऊ लागले. सगळीकडे एकच गोंधळ माजला. दुपारचे चारपाच वाजले असावे.
त्यानंतर काय घडले ते सर्व काही येथे सांगता येणार नाही. मात्र सगळ्याच रूम्सचे दरवाजे काही क्षणात उघडले गेले आणि जेमतेम अब्रू राखण्यासाठी आवश्यक असणारे कपडे असलेले स्त्रीपुरुष पॅसेजमध्ये उभे राहिले.
आपण दोघे कोण आहोत, म्हणजे नवराबायको की दुसरे कोण आहोत, इथे कशासाठी आलो आहोत वगैरे सांगण्यात मग काही वेळ गेला. त्याकाळात आधार कार्ड वगैरे ओळखपत्रे नसायची, वैवाहिक संबंध दर्शवण्यासाठी मंगळसूत्रे दाखवले जायचे.
`कारवारचा शिक्षक’ म्हणून आपली ओळख सांगणाऱ्या एका मध्यमवयीन इसमाने अखेरीस आपल्याबरोबर असलेली महिला `आपली बायको नाही’ याची कबुली पाच मिनिटांत दिली. असेच इतरांच्या बाबतीत घडले, त्यांची चौकशी करुन पकडलेल्या महिलांना महिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि लॉजच्या काही नोकरांना पोलिस स्टेशनवर आणले गेले.
देहविक्रीशी संबधित असलेल्या हॉटेलमधील लोकांबाबत आणि इतरांबाबत कशाप्रकारे कारवाई केली जाते याचा मी अनुभवलेला हा प्रसंग. पुढच्या काळात क्राईम रिपोर्टिंग करताना हा अनुभव खऱ्या अर्थाने पथदर्शक ठरला.
भारतातल्या प्रचलित कायद्यानुसार देहविक्रीच्या गुन्ह्यांत महिलेला दोषी किंवा गुन्हेगार ठरवले जात नाही, उलट `पिडित’ म्हणून त्यांची सुधारणागृहात रवानगी होते आणि संबंधित लॉजचे मॅनेजर, कामगारवर्ग वगैरेंना वेश्याव्यवसाय चालवण्यावरून अटक होते, लॉजचे मालक मात्र नेहेमीच या कारवाईपासून दूरच असतात.
एकदा रात्री पणजी पोलिस स्टेशनवर नव्यानेच रुजू झालेल्या आणि नाईट ड्युटीवर असलेल्या एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाबरोबर जीपने राऊंडला मी गेलो होतो. रात्री साडेदहाच्या आसपास पोलिस स्टेशनवर परतलो तेव्हा दर्शनी खोलीत कोपऱ्यात विशीच्या आसपास असलेली एक महिला दोन्ही पाय दुमडून, अवघडून बसलेली दिसली. मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या कंपाल ग्राउंडजवळ रस्त्यावर उभी राहून ती गिऱ्हाईक शोधत उभी होती म्हणून तिला पोलिस चौकीत आणले होते. बहुधा तिच्याच सुरक्षितेच्या कारणास्तव.
वेश्याव्यवसायाचा विषय निघाला कि मला आजही ती कोपऱ्यात अवघडून बसलेली ती तरुणी हमखास आठवते.
काही वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलीसह युरोपच्या सहलीवर होतो तेव्हाची गोष्ट. पॅरीस शहर जगातली रोमान्स नगरी आणि फॅशनचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. पॅरीसच्या आठवड्याभरच्या त्या वास्तव्यात आम्ही मॉन्तमार्ट या भागात राहत होतो. पॅरीसमधलं सर्वात मोठे आणि उंच टेकडीवर असलेले चर्च म्हणजे बॅसिलिका ऑफ सेक्रेड हार्ट (पवित्र हृदयाची बॅसिलिका) इथं आहे आणि या चर्चच्या खालचा परीसर चित्रकला, फोटोग्राफी वगैरे कलांसाठी जगप्रसिद्ध आहे. गेल्या काही शतकांत मॉन्तमार्ट इथं नामवंत चित्रकारांनी हजेरी लावली आहे.
मॉन्तमार्ट इथल्या भूमिगत आणि जमिनीवर असलेल्या मेट्रोमार्गाभोवती फिरताना मला एका गोष्टीचं सतत आश्चर्य वाटायचं ते म्हणजे इथं असलेली सेक्स टॉईज विकणारी अनेक दुकानं.
त्यानंतर मला कळालं कि हा परिसर आणखी एका गोष्टीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे ती म्हणजे देहविक्री. आम्ही दररोज ज्या हॉटेलात जेवणासाठी जायचो तिथल्या मूळचा ट्युनिशियन असलेल्या मॅनेजरनं मला सांगितलं कि रात्री दहानंतर शक्यतो रस्त्यावर फिरू नका, कारण त्यावेळी देहविक्रीसाठी आमंत्रण देणाऱ्या महिला जागोजागी उभ्या असतात, आपल्या गिऱ्हाईकाच्या शोधात फिरत असतात.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ला `सकाळ टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा आणि भारताचा पत्रकार प्रतिनिधी म्हणून थायलंड येथे भरलेल्या उद्योगविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला मी हजर होतो. भारतातल्या सहा पत्रकारांमध्ये आणि जगातल्या ७४ पत्रकारांमध्ये माझा समावेश होता. थायलंडमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे आणि या व्यवसायात महिलांबरोबर पुरुषसुद्धा आहेत. आशिया खंडातली सेक्स कॅपिटल’ असाच थायलंडचा बोलबाला आहे.
बँकॉक इथल्या आमच्या हॉटेलसमोर असलेल्या मसाज पार्लरच्या किंवा `स्पा'च्या मुली आणि महिला दिवसभर आणि रात्रभर रस्त्यावर चालणाऱ्या पुरुषांना आपल्याकडं हाक मारून बोलवत असायच्या.
गोव्यात पर्यटक म्हणून गेल्यावर तिथं दारु प्यायलाच हवी किंवा पुण्यात मित्रांबरोबर मजा मारण्यासाठी आल्यावर तिथल्या बुधवार पेठेत जायलाच हवं असं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांतून येणाऱ्या काही तरुणांना वाटत असतं. तसंच थायलंडला आल्यावर तिथल्या मसाज पार्लरला भेट द्यायलाच हवी, त्याशिवाय या देशाची सहल पुर्ण होऊ शकत नाही, असाच अनेकांचा समज असतो.
आमच्या एका कॉमन मित्राच्या बोलण्यावरुन थायलंडची कीर्ती कानावर पडलेल्या माझ्या पत्नीनंसुद्धा हा `स्पा'चा काय प्रकार आहे त्याचा अनुभव घे असं मला सांगितलं म्हणजे चक्क बजावलंच होतं !
बॅंकॉंकला रस्त्यांवरच्या इमारतींत जागोजागी ` हेल्थ स्पा', `थाई मसाज’ असं लिहिलेलं आढळतं. तिथं ग्राहकांच्या हातापायाला किंवा पूर्ण अंगाला मसाज करणाऱ्या मुली, महिला रस्त्यांवरुन जाणाऱ्या लोकांना पारदर्शक काचांमुळे स्पष्ट दिसतात. ग्राहक कोचवर पडून त्याच्या शरीराला तेल लावून मुली आणि महिला मसाज करत असतात आणि असे चारपाच ग्राहक आपापल्या कोचावर ओळीने बसलेले, पालथे पडलेले बाहेरुन स्पष्ट दिसत असते. अशी मालिश करवून घेताना आडूनलपून राहण्याची मुळी गरजच नसते.
हा, मात्र काही `हेल्थ स्पा'मध्ये आंबटशौकीन ग्राहकांना `इतर' सेवा पुरवण्यासाठी आतल्या भागांत, पहिल्या मजल्यांवर वेगळे कक्ष असतात. आणि विशेष म्हणजे ही सर्व सेवा कायदेशीर असते, पोलिसांची किंवा इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाची तिथे धाड पडण्याची भीती मुळीच नसते.
थायलंडच्या कीर्तीला जागून त्यानुसार माझ्याबरोबर असलेला एक भारतीय पत्रकार दररोज रात्री नवनव्या मसाज पार्लरला भेट देत होता.
पहिल्या दिवशी घाबरत घाबरत मीही माझ्या पत्रकार मित्रासह आमच्या हॉटेलसमोरच असलेल्या `स्पा'मध्ये गेलो आणि तो मित्र `आतल्या’ भागात गेल्यावर मी स्वतःच्या अंगाखांद्याला मसाज करवून घेतला. नाहीतर भारतात परतल्यानंतर मित्रांनी आणि इतरांनी वेड्यात काढले असतं अशी भीती होती. त्या तरुण मुलींकडून असा मसाज करवून घेताना मी स्वतःच प्रचंड अवघडलो होतो आणि वेळेच्या आधीच '' बस्स, इतकं पुरं झालं !'' म्हणून स्वतःची सुटका करुन घेतली आणि हुश्श्य केलं.
खूप वर्षांपूर्वी पंचविशीच्या उंबरठ्यावर मी असताना बल्गेरिया येथे अनुभवलेला असाच एक प्रसंग त्यावेळी आठवला होता. बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना काही आठवड्यांनंतर केस खूप वाढले म्हणून मी एका सलून मध्ये शिरलो. तेव्हा अनपेक्षितपणे तिथं काम करणाऱ्या एका तरुणीनं केस कापण्यासाठी माझ्या डोक्याचा ताबा घेतला होता. नंतर डोक्याला मालिश पण केली होती. तेव्हा तो अर्धा पाऊण तास मी असाच बावचळून आणि अवघडून गेलो होतो हे आठवलं.
अशा प्रसंगाला मला तोंड द्यावं लागणार अशी मला कल्पना असती तर कदाचित माझा प्रतिसाद आणि वागणं जरा दुसऱ्या प्रकारचं असलं असतं ! सोफिया शहराच्या बांकिया उपनगरात माझ्या रुमवर परतल्यावर हा प्रकार मी इतर भारतीय पत्रकारांना सांगितला होता. दुसऱ्या दिवशी मग यापैकी अनेकांनी केस कापण्यासाठी सोफियाची लोकल ट्रेन पकडली होती.
थायलंडच्या दौऱ्यात मित्र बनलेला हा पत्रकार सहकारी माझ्याहून दहा वर्षांनी लहान होता, त्या पत्रकार सहकाऱ्यासारखं आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचं, आतल्या कक्षात जाण्याचं मला धाडस झालं नाही. `स्पिरिट इज विलिंग बट द फ्लेश इज विक' हे प्रसिद्ध वाक्य आहे. इथं अगदी उलट स्थिती होती, फ्लेश इज विलिंग बट द स्पिरिट इज विक ! पुर्वसंचित नैतिक, धार्मिक व सामाजिक संस्कारांचं दडपण, ओझं असं सहजासहजी झुकारता येत नाही हेच खरं ! मग एखादे कृत्य कायदेशीर किंवा बेकायदेशीर असो वा नसो !
देहविक्री करणे हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे असं म्हटलं जातं. वेश्यांना किंवा व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांना (पुरुषांना नव्हे !) नेहेमीच तिरस्करणीय वागणूक मिळत आली आहे. व्यभिचार करणाऱ्या किंवा नैतिक गैरवर्तन करणाऱ्या दोन महिलांचा बायबलमध्ये नव्या करारात उल्लेख येतो.
ज्युंच्या प्राचीन कायद्यानुसार व्यभिचार करणाऱ्या महिलेला लोकांनी सार्वजनिकरित्या दगडाने ठेचून ठार करण्याची शिक्षा दिली जात असे. व्यभिचार करताना पकडल्या गेलेल्या एका महिलेचा ``आपण काय न्यायनिवाडा करताल?'' असं येशू ख्रिस्ताची परिक्षा करण्याच्या हेतूनं, त्याला अडचणीत टाकण्यासाठी विचारलं जातं. त्या स्त्रिला दगडानं ठेचण्याच्या शिक्षेचं येशूनं समर्थन न केल्यास तो धर्मशास्त्राविरुद्ध आहे असं सांगायला हे लोक टपलेलं असत.
मात्र, ``तुमच्यापैकी ज्या कुणी आतापर्यंत एकही पाप केलेलं नसेल त्या व्यक्तीनं त्या व्यभिचारी महिलेच्या अंगावर पहिला दगड टाकावा'' असं जमिनीवर मातीत बोटांनी लिहून येशू सांगतो आणि ते ऐकून तिथं जमलेले सगळे लोक हातातला दगड खाली टाकत एकापाठोपाठ तेथून पाय काढतात अशी ही एक मार्मिक कथा आहे.
वेश्याव्यवसाय सर्वाधिक प्राचीन असला तरी कायमच तिरस्करणीय राहिला आहे. इतकेच नव्हे तर स्त्रीपुरुषांचे असलेले शारीरिक संबंधसुद्धा नैसर्गिक, पवित्र मानले जात नाही. अगदी विवाहित पतिपत्नींचेसुद्धा. आपल्याकडं आणि खरं पाहिलं तर जगात सगळीकडे सर्व समाजांत आणि धर्मांत शरीरधर्म वाईट असंच समजलं जातं.
``ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यु'' असलं तत्त्वज्ञान एकेकाळी खूप लोकप्रिय आणि त्यामुळं पौंगडावस्थेत नुकत्याच येणाऱ्या तरुण मनाला घाबरुन सोडणारं होतं. त्यामुळे दैवी संबंधांमुळं किंवा अनैसर्गिक पद्धतीने झालेले जन्म श्रेष्ठ असं समजलं गेलं आणि अशाप्रकारे जगात विविध धर्मांतली दैवतासमान मानल्या गेलेल्या व्यक्ती दैवी किंवा अनैसर्गिक संबंधांतून जन्माला आली असं दाखवलं गेलं.
याचं सरळसरळ कारण म्हणजे स्त्रीपुरुषांचे शरीरसंबंध एकतर तिरस्करणीय किंवा हीन मानले गेले. पृथ्वीवर तपस्या करणाऱ्या ऋषीमुनींना त्यापासून प्रवूत्त करण्यासाठी आणि त्यांना वाममार्गाला ( !) लावण्यासाठी मग स्वर्गातून अप्सरा पाठवल्या जातात. स्त्री म्हणजे मोक्षमार्गातली एक धोंड असाच सगळीकडं मानलं गेलं आहे.
स्त्रीपुरुषांच्या नैसर्गिक असलेल्या शरीरसंबंधांविषयी असलेल्या घृणेमुळे पुढे ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक धर्मगुरुंवर अविवाहीत राहण्याचं बंधन आलं जे आजतागायत कायम आहे. प्रोटेस्टंट पंथांत मात्र विवाहित धर्मगुरु असतात. भारतीय प्राचीन संस्कृतीत साधूसंतांनी, गुरुवर्यांनी आणि देवमाणसांनी संसारी असणे, प्रापंचिक असणे तितके तिरस्करणीय समजले जात नसायचे, हे विविध ऋषीमुनींच्या उदाहरणांनी स्पष्ट होते. आजन्म अविवाहित राहण्याचं व्रत घेऊन मिशनरी वृत्तीनं सेवा करण्याचं व्रत घेणाऱ्या कॅथोलिक ख्रिस्ती धर्मगुरुंचं अनुकरण मात्र भारतात काही संघटनांनी केलं आहे.

स्त्री किंवा एकूणच कामजीवन हे मोक्षमार्गातली र्धोंड मानले गेले आहे त्यामुळेच `सावधान; असं कानावर पडताच किंवा पडण्याआधीच काही जण बोहल्यावरुन मागे फिरतात. मी स्वतःसुद्धा जेसुईट धर्मगुरु होऊन आजन्म अविवाहित राहण्याचं व्रत घेण्याचं ठरवलं होतं. नंतर हा निर्णय मी बदलला तो काही वेगळ्या कारणांनी, केवळ लग्न करण्यासाठी नाही.

औपचारिकरीत्या संन्यासी व्रतबद्ध होण्याआधीच मी `सावधान' होऊन माघारी फिरलो आणि त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी गृहस्थाश्रम स्विकारला.
वेश्या केवळ स्त्रियाच असतात किंवा वेश्या व्यवसाय केवळ स्त्री आणि पुरुष या दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच चालतो ही एक गैरसमजूत आहे. गेल्या काही वर्षांत या समजुतीला तडे गेल्याचे दिसत आहेत. अलीकडेच डॉ. माधवी खरात यांनी लिहिलेली आणि कुणाल हजेरी यांच्या चेतक बुक्सने प्रकाशित केलेली `जिगोलो’ या नावाची पुरुष वेश्याच्या जीवनावरची कादंबरी मी त्या विषयाच्या नाविन्यामुळं एका बैठकीत वाचून काढली.
काही वर्षांपूर्वी सुगावा प्रकाशनाचे विलास वाघ आणि उषा वाघ यांनी अमेरिकेतील वेश्याव्यवसाय या शीर्षकाचा मी अनुवाद केलेले एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यावेळी या व्यवसायातील शोषणाची माहिती झाली.
देहविक्री करणाऱ्या महिलांनीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, वेश्यांनासुद्धा चांगले जीवन जगात आले पाहिजे, असा त्यावेळी बंडखोर, क्रांतिकारक वाटणारा विचार सुरक्षित कामजीवन आणि भारतातील संततीनियमन चळवळीचे आद्य प्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच मांडला होता. र. धो. कर्व्यांच्या काळातील वेश्याव्यवसाय आणि वेश्यांची स्थिती आणि सद्यस्थिती यात निश्चितच मोठे अंतर आहे.
सत्तरच्या दशकात दुर्गा भागवत यांनी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांबाबत केलेले एक विधान खूप वादग्रस्त ठरले होते. या विधानाचा विपर्यस्त अर्थ काढून दुर्गा भागवत वेश्याव्यवसायाचे समर्थन करतात असा आरोप केला गेला होता.
नामदेव ढसाळ यांचा `गोलपिठा' हा काव्यसंग्रह वेश्यांची वस्ती असलेल्या मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातले जीवन आणि भाषा चित्रित करतो. या काव्यसंग्रहाला विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना लिहिण्याआधी तेँडुलकर यांनी कामाठीपुरा येथला बराचसा परीसर आपल्या पायाखाली घातला होता, कारण इथले जीवन आणि भाषा मध्यमवर्गीय समाजाला आणि लेखकांना पूर्णतः अपरिचित होता.
दुर्गाबाई भागवत यांना त्यांच्या `पैस’ या लेखसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त महिला मंडळाने आयोजित केलेला त्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना भागवत म्हणाल्या कि, ''वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळायला हवी.'' त्यांच्या या विधानाचा धागा पकडत नामदेव ढसाळ यांच्या `गोलपिठा' कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजा ढाले म्हणाले, ''ज्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यावे असे वाटते त्यांनींच हा धंदा करावा !''
ढाले यांच्या या विधानाने मोठे महाभारत घडले. त्यानंतर बराचसा काळ ओलांडला आहे.
देहविक्री करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा कायद्याचे सर्व अधिकार समानतेने मिळायला हवेत, वेश्यांनासुद्धा सन्मानपुर्वक, प्रतिष्ठेचे जीवन मिळायला हवे, या शब्दांत आता खुद्द सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे देहविक्रीबाबत वेगळाच, क्रांतिकारक दृष्टिकोन निर्माण केला आहे.
सोशल माध्यमांत निरोगी आणि आरोग्यदायक कामजीवनाबाबत आता खुलेपणानं लिहिलं आणि वाचलं जात आहे.
तरीदेखील याबाबत अजूनही फार मोठी मजल मारावी लागणार आहे हे निश्चित.

Monday, December 28, 2020

बल्गेरियात राज कपूर भेटले

 

  • ३५ वर्षांपूर्वी बल्गेरियात राज कपूर भेटले आणि त्यांचे ‘मेरा जूता है जपानी...’सुद्धा! 
    कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
    कामिल पारखे
    • राज कपूर यांच्या ‘मेरा जूता है जपानी...’ या गाण्यातील विविध भावमुद्रा
    • Mon , 14 December 2020
    • कला-संस्कृतीहिंदी सिनेमाराज कपूरRaj Kapoorमेरा जूता है जपानीMera Joota Hai Japaniआवारा हूँAwara Hoon

    हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीची ही एक जुनी आठवण...

    ..................................................................................................................................................................

    ही जवळपास ३५ वर्षांपूर्वीची घटना आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टने १९८६ साली आम्हां भारतीय पत्रकारांसाठी बल्गेरियात पत्रकारितेचा कोर्स आयोजित केला होता. १९८०च्या दशकात अमेरिका आणि रशियामध्ये चालू असलेल्या शीतयुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टतर्फे रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपियन ब्लॉकमध्ये म्हणजे पूर्व जर्मनी, पोलंड, इटली वगैरे व्हर्साय करारात सामिल असलेल्या देशांत भारतीय पत्रकारांसाठी असे अभ्यासक्रम दौरा आयोजित करत असे. त्या वर्षी बल्गेरियाने भारतीय प्रतिनिधींसाठी पत्रकारिता अभ्यासक्रम आयोजित केला होता आणि गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचा सरचिटणीस म्हणून मीही या अभ्यासक्रम दौऱ्यात सहभागी झालो होतो.

    दररोज संध्याकाळी सात वाजता रात्रीचे जेवण झाल्यानंतर जवळच्या रेस्त्रामध्ये वाईन किंवा व्होडका पित संगीताचा आणि नृत्याचा अनुभव आम्ही घेतू असू. त्या वेळी तेथे पारंपरिक बल्गेरियन पोशाखातील गायक-वादकांचा चमू अंधुक प्रकाशात आपली कला सादर करत असे. त्या गार्डन रेस्त्रामधील काही ग्राहक मध्येच आपले टेबल सोडून मध्यभागी असलेल्या डान्स फ्लोरवर नृत्यात सामील होण्यासाठी जात असत.

    बल्गेरियात महिनाभरापेक्षा जास्त काळ घालवल्यामुळे आता डान्स फ्लोरवर चाललेल्या नृत्यामध्ये सामील होण्याइतकी आम्हा भारतीयांचीदेखील भीड चेपली होती. डान्स फ्लोरवर अनोळखी लोकांसह नाचगाण्यात सहभागी होण्यास तिथल्या तरुण मुली आणि स्त्रियांची काहीच हरकत नसायची, हे आता अनुभवाने आम्हाला समजले होते! मात्र सभ्यतेने वागायचे, अशी किमान अपेक्षा असायची. 

  • तर त्या दिवशी व्होडका (बल्गेरियन उच्चार ‘बोदका’) पीत असताना तेथील भिंतीवरील एका छायाचित्रावर माझी नजर गेली आणि क्षणभर मी चमकलो. भिंतीवरचे ते कृष्णधवल छायाचित्र अगदी परिचित होते. पण त्या छायाचित्राबद्दल खात्री करण्यासाठी मला माझ्या भारतीय मित्रांचे लक्ष वेधून घ्यावे लागले. सुरुवातीला काहींनी अविश्वास व्यक्त केला, मात्र काही क्षणांतच त्या छायाचित्राबद्दल आम्हा कुणालाही शंका राहिली नाही. ते छायाचित्र हिंदी चित्रपट अभिनेता राज कपूर यांचे होते, यात कसलाच वाद नव्हता.

    बल्गेरियात राज कपूरचे छायाचित्र कसे काय, याचे आम्हाला आश्चर्य वाटत होते!

    आमच्यातील काही पत्रकार त्यांची उत्सुकता दाबू शकले नाहीत. त्यांनी रिसेप्शन काऊंटरकडे धाव घेतली. तेथील लोकांना इंग्रजी समजत नव्हते, परंतु हावभाव आणि काही शब्दांच्या मदतीने आम्हाला कळले की, राज कपूर बल्गेरियातही खूप लोकप्रिय आहेत!

    मात्र आमच्या आश्चर्याची मालिका अजून संपायची नव्हती. आम्हा भारतीय पत्रकारांच्या त्या छायाचित्राबाबतच्या सुरुवातीच्या कुजबुजीचे उच्च स्वरातील संवादात रूपांतर झाले होते. तोपर्यंत तिथल्या वाद्यचमूने आपले एक गाणे संपवून आमच्याकडे पाहत दुसरे गाणे सुरू केले. आपली छडी वरखाली करत कॉयर मास्टर आपल्या वाद्यचमूला मार्गदर्शन करत असला तरी त्याचे पूर्ण लक्ष आमच्याकडेच होते. कारण आता वाजवले जाणारे गीत होते – ‘मेरा जूता है जपानी...’ 

    वाद्यचमूतल्या एकाने राज कपूरच्या ‘त्या’ खास शैलीत पदन्यास करत नाचणे सुरू केले, तेव्हा तर त्या रेस्त्रामधील लोकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. मग आम्हाला समजले की, राज कपूरचे हिंदी चित्रपट आणि ‘आवारा हूं...’ सारखी त्यांची गाणी रशिया आणि पूर्व युरोपियन देशांमध्येही लोकप्रिय आहेत.

    रेस्त्रामध्ये आम्ही इतरांशी बोललो, तेव्हा आम्हाला कळले की, राज कपूर हे फक्त बल्गेरियातच नव्हे तर सोव्हिएत रशिया आणि रशियाचा प्रभाव असणाऱ्या पूर्व युरोपियन राष्ट्रांमध्येही एक घरगुती नाव आहे.

    या दौऱ्यादरम्यान मला कळाले की, सोव्हिएत रशियामध्ये दोन भारतीय सर्वांत लोकप्रिय होते. त्यापैकी पहिली म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसरी, अभिनेता राज कपूर. आमच्या मॉस्कोच्या दौऱ्यात एका महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चौकात इंदिरा गांधींचा पूर्ण-आकाराचा पुतळा मी बसमधून पाहिला होता.

    याशिवाय बल्गेरियात आणखी एक भारतीय नाव लोकप्रिय होते. ती तिसरी व्यक्ती म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते कवी रवीन्द्रनाथ टागोर. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवीन्द्रबाबू टागोर बल्गेरियात आले होते. त्यांच्या कवितांचे बल्गेरियन भाषेत अनुवाद झाले आहेत.

    एके दिवशी आम्ही बल्गेरियातील एका शहरातील कापड कारखान्यास भेट दिली. तिथून परतताना तिथला एक मध्यमवयीन कर्मचारी आमच्याकडे लिफ्टपाशी आला. डोक्यावरची आपली हॅट त्याने हातात घेतली आणि राज कपूर यांच्या खास शैलीत पदण्यास करत तो ‘आवारा हूं, आवारा हूं....’ या गाण्याची धून गाऊ लागला!

    आम्ही आवाक् झालो. राज कपूर यांच्या देशातले लोक म्हणून आमच्याशी हस्तांदोलन करून तो राज कपूरचा चाहता आपल्या कामाकडे वळला.

    (काही वर्षांपूर्वी युरोप दौऱ्यात पॅरिसमधील एका सुपरमार्केटमध्ये एका तरुण कॅशियरशी मी बोलत होतो. माझ्या मुलीने त्या संभाषणाच्या ओघात सांगितले की, आम्ही भारतीय पर्यटक आहोत. तेव्हा त्या पोरगेल्या कॅशियरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती – ‘शाहरुख खान्स इंडिया!’ त्याचे ते उद्गार आमच्यासाठी सुखद आश्चर्य होते. त्या तरुणाला फारसे इंग्रजी येत नव्हते, परंतु तरीही संभाषण करण्यात आम्ही यशस्वी झालो. तो म्हणाला की, ‘एसआरकेचा चाहता आहे, शाहरुखचे हिंदी चित्रपट, नाचगाणे आणि संगीत मला आवडते.’ फ्रेंच भाषेतील सब-टायटल्स वाचली नाही तरी त्याला शाहरुखच्या चित्रपटाची कथा समजत होती. हृतिक रोशन, आमिर खान आणि इतर भारतीय कलाकारांचे हिंदी चित्रपटही त्याला आवडतात असेही त्याने सांगितले.

    भारतीय चित्रपट अभिनेत्यांनी आपल्या राष्ट्रीय, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा पार केल्या आहेत. किंग खान आणि हिंदी चित्रपट कलावंतांच्या नव्या पिढीने राज कपूरचा ‘भारताचा सांस्कृतिक राजदूत’ होण्याचा वारसा खरोखरच चालू ठेवला आहे.)

    बल्गेरियातला पत्रकारिता अभ्यासक्रम कोर्स संपल्यानंतर सोफिया येथून मॉस्कोमार्गे आम्ही भारतात परतत होतो. हवाई प्रवासात ताश्कंदला काही काळ थांबलो. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ताश्कंद या शहरात अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या शहरात पाऊल ठेवताक्षणी कुणाही भारतीयाला शास्त्रींची आठवण येतेच. पहाटे आमचे विमान नवी दिल्लीत पोहोचले. नव्यानेच बांधण्यात आलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नुकतेच झाले होते. परंतु त्या काळात प्रवाशांना विमानापासून चेक-इन काउंटरपर्यंतचे लांब पल्ल्याचे अंतर पार करण्यासाठी हल्लीच्या सरकत्या पट्ट्यासारखे कोणतेही साधन नव्हते. आम्ही सहकारी त्या बंद कॉरिडॉरमधून चेक-इन काउंटरकडे चालत जात होतो, तेव्हा अचानक माझी नजर एका वयस्कर सह-प्रवाशावर पडली.

  • जास्त वजनाच्या सूटकेस विमानाच्या कार्गो विभागात पाठवता येत नसल्याने माझ्या अंगावर आणि हातात जड, उबदार कपडे व इतर सामान होते. त्या गोऱ्यापान, लालबुंद चेहऱ्याच्या स्थूल वृद्ध प्रवाशाकडे मात्र बिलकूल सामान नव्हते. थोड्या वेळाने जवळून जात त्या वृद्ध प्रवाशाला मागे टाकले, तेव्हा ते थोडे थकल्यासारखे दिसले. त्या कॉरिडारमध्ये रांगेत असलेल्या रंगीबेरंगी बकेट सीटस होत्या, त्यापैकी एका खुर्चीत ते मटकन बसले. थकल्यामुळे त्याचा अतिशय गोरा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता.

    मी अचानक थबकलो.

    ते राज कपूर होते. सोव्हिएत रशिया किंवा इतर पूर्व युरोपियन देशांचा दौरा करून ते मॉस्कोमार्गे विमानाने आमच्याबरोबरच प्रवास करत दिल्लीला परतत होते.

    या महान चित्रपट अभिनेत्यापासून काही फूट अंतरावरच मी उभा होतो. काय करायला हवे होते, तेही परदेशात या कलावंताची लोकप्रियता अनुभवल्यावर? मला आजही असे वाटते की, भारतीय चित्रपटसृष्टीच्या या महान कलावंताबरोबर मी किमान हस्तांदोलन करायला हवे होते. रशिया आणि बल्गेरियात त्यांच्यामुळे आम्हा भारतीयांना अभिमानाची वागणूक मिळाल्याबद्दल त्यांच्याविषयीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती. पण यापैकी मी काहीही करू शकलो नाही. त्याचे कारण म्हणजे स्वत:चा लाजाळूपणा आणि सेलिब्रिटी व्यक्तीच्या खासगीपणाचा भंग करून त्यांना त्रास न देण्याची इच्छा.


Sunday, July 29, 2018

Chages in newspaper technology पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रवास



रविवार, २९ जुलै, २०१८



पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रवास  goo.gl/yDdWFM 
मंगळवार, २४ जुलै, २०१८कामिल पारखे
कोणताही व्यवसाय अनेकविध बदलांतून प्रवास करतो. वृत्तपत्र व्यवसायाने खूप मोठे तांत्रिक बदल थोड्या काळात बघितले. या बदलांचा पट, ते अनुभवलेल्या एका बातमीदाराच्या नजरेतून.
आधुनिक छपाई तंत्रज्ञानाचा शोध लागला पंधराव्या शतकात. तेव्हापासून कागदावर शब्दे उमटू लागली.  मात्र जोहानस गटेनबर्गने  हा शोध लावल्यानंतर त्यानंतर विसाव्या शतकापर्यंत या तंत्रज्ञानात फारशी प्रगती झाली नव्हती. पुस्तके  आणि वृत्तपत्रे जुन्याच पद्धतीने म्हणजे खिळ्यांची अक्षरे जुळवून छापली जात. ही पुरातन पद्धत भारतात अगदी १९८०च्या दशकापर्यंत चालू होती. मी पत्रकारितेची सुरुवात केली ती १९८१ साली.  तेव्हा मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेतील  वृत्तपत्रांच्या छापखान्यांत  खिळ्यांची अक्षरे जुळवून छपाई होत असे. अशा छपाईच्या आणि बातमी संकलनाच्या अगदी जुन्या  पद्धतीपासून  तो थेट आताच्या अत्याधुनिक पद्धतीच्या पत्रकारितेमध्ये झालेल्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. लँडलाईन, टेलिव्हिजन आणि मोबाईल फोन नसलेल्या काळात,  रेडीओची मर्यादित स्वरूपाची वार्तासुविधा असताना पत्रकारीतेची सुरुवात  करुन आजच्या अत्याधुनिक प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अगदी मोजक्या पत्रकारांमध्ये  मीही  आहे. यादरम्यानच्या काळात वृत्तपत्रांच्या तंत्रज्ञान वापरात आणि  बातमी संकलनांत, कामकाज पद्धतीत आणि एकंदर पत्रकारीतेत किती स्थित्यंतरे घडून आली आहेत याची नव्या पिढीला कल्पनाही करता येणार नाही. 
पणजीतून प्रकाशित होणाऱ्या द नवहिंद  टाइम्स या इंग्रजी दैनिकात मी नोकरीस लागलो होतो.  डेम्पो उद्योगसमूहाच्या द नवहिंद  टाइम्सचे आणि नवप्रभा या मराठी दैनिकाचे काम एकाच इमारतीत चालत असे. नवप्रभा या मराठी वृत्तपत्राची छपाई या खिळ्यांची अक्षरे जुळवून व्हायची. जुळारी हा आपल्या समोर रचलेल्या विविध छोटयाछोट्या खोक्यांमधून अगदी वेगाने आपल्याला हवे ते शब्द, जोडशब्द, कानामात्र, वेलांटी, उकार  आणि ओलांट्यासह निवडत असे आणि काही शब्दांची एका ओळ रचून नंतर दुसरी ओळ सुरू करत असे.  बोल्ड, इटॅलिक्स आणि छोट्यामोठया, विविध आकाराच्या टाइपांच्या  अक्षरांसाठी वेगळी खोकी असत. 
त्यामानाने द नवहिंद  टाइम्स या इंग्रजी दैनिकाच्या छपाईतंत्रात मात्र फारच मोठी मजल मारण्यात आली होती.  इंग्रजी लिखाण कंपोझिगसाठी तेथे भल्या मोठया आकाराचे आणि अवजड सात-आठ लायनोटाईप सेटिंग मशीन होते.  त्या मशीनमध्ये झिंक  वितळून त्यापासून अक्षरे असणारी एका छोटीशी चकती तयार केली जात असे.  लायनोटाईप ऑपरेटरसमोर किबोर्ड असायचा त्यावर ठराविक संख्येंचे शब्द टाईप करुन कळ दाबली की  त्या भल्यामोठया मशीनचे विविध भाग हलत आणि काही सेकंदात उकळत्या बॉयलरमधून झिंकचा ठराविक निवडलेल्या शब्दांची एक ओळ संच तयार व्हायची. झिंकचा ती ओळ थंड झाल्यावर त्या अनॆक ओळी एकत्र रचून त्याची प्रुफे  प्रूफरिडिंगला पाठवली जात. देवनागरी लिखाणात एखादया शब्दाची स्पेलिंगची चुक झाल्यास फक्त तेवढा शब्द दुरुस्त केला जाई, मात्र लायनोटाईप  मशीनवर इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाल्यास त्या झिंक धातूची पूर्ण ओळ बदलावी लागे. लायनोटाईप  मशिन्स अवजड असल्याने ती तळमजल्यावर असत तर  मराठी अक्षरजुळणीचे काम लाकडी तुळयांचे फ्लोअरिंग असलेल्या पहिल्या मजल्यावर चालायचे. 
कृष्णधवल फोटो छापण्यासाठी त्याकाळात फोटोवरून ब्लॉक केले जात असत आणि जुळवलेल्या बातम्यांबरोबर चौकटीत तो ब्लॉक ठेवला जाई.  हा ब्लॉकमेकर लाल दिवा असलेल्या अंधाऱ्या खोलीत काम करता असे.  नेहेमी वापरल्या जाणाऱ्या फोटोसाठी हे ब्लॉक्स लाकडावर माऊंट केले जात आणि पुनर्वापरासाठी जपवून ठेवले जात. पीआयबीने दिल्लीहून पाठवलेले पंतप्रधानांचे, इतरांचे  फोटो घटनेनंतर चार-पाच दिवसांनंतर छापले जात. 
१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा सरचिटणीस असताना माझे वृत्तसंपादक मला म्हणत असत की आम्ही सर्व बातमीदार संपावर गेलो तरी  पीटीआय आणि युएनआयच्या  मदतीने ते बारा पानांचा पेपर सहज प्रसिद्ध करू शकतील ते यामुळेच. पीटीआयचे टेलिप्रिंटरचे मशीन लाकडी  बॉक्सचे तर युएनआयचे टेलिप्रिंटर स्टीलच्या बॉक्समध्ये असायचे. एखादी खूप मोठी महत्त्वाची  बातमी असेल ( त्यावेळी  ' ब्रेकिंग न्युज' हा शब्द फारसा रूढ झाला नव्हता) तर टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल. कामावर असलेला एखादा उपसंपादक मग काय बातमी आहे  हे पाहण्यासाठी टेलिप्रिंटरकडे येई आणि त्या बातमीची दाखल घेऊन सिनियरांना तशी कल्पना दिली जाई.   
एके दिवशी सकाळी  मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला धक्काच बसला.  केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती. तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते : प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी शॉट अॅट'. त्यानंतर ऑफिसातील सर्व माणसे त्या टेलिप्रिंटरपाशी ताबडतोब जमा झाली हे सांगायलाच नको. साडेबाराच्या  दरम्यान ते वाक्य बदलले आणि  'प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी शॉट अॅट, फीयर्ड डेड' या वाक्यानंतर टेलिप्रिंटरवर सतत घंटा वाजत राहिली. सकाळी झालेल्या गोळीबारात इंदिरा गांधींचें निधन झाले ही बातमी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या संध्याकाळी उशिरा जाहीर केली होती.   
म्हाफुसिल किंवा प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना कोल्हापुरच्या  'पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा  होतो. बातम्या पाठविण्यासाठी 'पुढारी'ने  मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.
महाराष्ट्र सरकारच्या एसटी गाड्या या म्हाफुसिल बातमीदारांचे महत्त्वाचे आश्रयस्थान असायचे. आपल्या बातम्या, वार्तापत्रे, जाहिरातीचा मजकूर आणि कृष्णधवल फोटो  एका पाकिटात घालून हे बातमीदार त्यांच्या संबंधित वृत्तपत्रांच्या शहरी जाणाऱ्या एसटी बसच्या ड्रायव्हरकडे सोपवत असत, तो ड्रायव्हर मग वृत्तपत्रांच्या गेटपाशी लांबूनच फेकता असे आणि वॉचमन ती पाकिटे उचलून संपादकीय टेबलांकडे पाठवत असे. औरंगाबादला जालना रोडच्या महामार्गावर असलेल्या लोकमतच्या कार्यालयासमोर हा प्रकार सारखा चालूच असे. वृत्तपत्र कार्यालय प्रवासाच्या वाटेवर नसल्यास त्या वृत्तपत्राच्या पोस्टबॉक्समध्ये ती पाकिटे टाकली जात. वृत्तपत्र कार्यालयातील शिपाई  दिवसातून दोनदा- तिनदा हे पोस्टबॉक्स उघडून त्यातील पाकिटे  नेत असे. 
याच काळात कंपोझिंगच्या कामासाठी वृत्तपत्रांत संगणक दाखल  झाले आणि अक्षरजुळारीचे पद आणि  लायनोटाईप मशिनची गरज गायब झाली. मात्र मराठी बातमीदार त्यानंतरही अनेक वर्षे आपल्या बातम्या हाताने लिहित असत तर  इंग्रजी वृत्तपत्रांमधील आम्ही बातमीदार टाइपरायटरवर टाईप करत असू. इंग्रजी वृत्तपत्रांतील संपादकिय विभागातील सर्वच जण म्हणजे अगदी बातमीदार- उपसंपादकापासून तो थेट मुख्य संपादकांपर्यंत सर्व जण आपापले लिखाण स्वतः टाईप करत असत. मराठी पत्रकारितेत मात्र बातमीदारांनी आणि मुख्य संपादकांनी  स्वतः संगणकावर लिखाण करण्यास खूप उशिरा सुरुवात केली.  त्याकाळात मराठी दैनिकांचे मुख्य संपादकही  स्वतः हाताने लिहायचे वा स्टेनोला डिक्टेट करायचे. 
बल्गेरियात १९८६ मध्ये  पत्रकारितेचा अभ्यासक्रम केल्यानंतर परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू म्हणजे अडीच किलो वजनाचा एक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा. रॅमिंग्टन कंपनीचा तो टाईपरायटर मी  बल्गेरियन चलनी नोटा १०० लेव्ह देऊन म्हणजे एक हजार रुपयांना मी विकत घेतला होता आणि तो कॅमेरा दहा लेव्हला म्हणजेच  शंभर रुपयांस विकत घेतला होता. त्याकाळात पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो! याच काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.   
गोवा सोडल्यानंतर श्रीरामपूरला काही महिने सार्वमत या मराठी दैनिकात उपसंपादक होतो. तेथे मुंबई  किंवा नागपूरला चाललेल्या विधिमंडळाच्या सत्रांच्या काळात बॅटरी असलेल्या रेडिओवरील विधिमंडळाचे समालोचन आम्ही उशिरा संध्याकाळी  ऐकायचो. त्यानुसार  दुसऱ्या दिवसाच्या प्रमुख बातम्या आम्ही तयार करायचो. 
१९८०च्या दशकात  वृत्तपत्र कार्यालयांत केवळ सीनियर लोकांसाठी स्वतःचे टेबल आणि टाईपरायटर असायचे. माझ्यासारखे ज्युनियर रिपोर्टर आणि इतरांसाठी एकच जुना झालेला टाईपरायटर आणि एक लांबरुंद टेबल असायचा. औरंगाबादला मी लोकमत टाइम्सला जॉईन झालो तेव्हा मला पहिल्यांदा स्वतःचा टेबल आणि टाईपरायटर मिळाला. एक वर्षानंतर म्हणजे १९८९ ला पुण्यात इंडियन एक्सप्रेसला जॉईन झालो तेव्हा पुन्हा एकदा एका लांब मोठया  टेबलावर बसून सामायिक टाईपरायटर वापरायची पाळी आली. नंतर तेथे संगणकावर काम सुरू झाले तरी सुरुवातीला हे संगणकसुद्धा एक कॉमन प्रॉपर्टी असायची. सन  १९९९ ला पुण्यातच फर्गसन कॉलेज रोडवरच्या 'टाइम्स ऑफ इंडिया'त कामाला लागलो, तेव्हा पुण्यातले ते पहिलेच वातानुकूलित वृत्तपत्र कार्यालय होते. तेथे मला पहिल्यांदाच स्वतंत्र क्युबिकल, पीसी आणि गोलगोल फिरणारी खुर्ची मिळाली!  
१९९०च्या सुमारास भारतात इंटरनेटचा वापर सुरू झाला. याकाळात 'आयुका'चे  संचालक डॉ. जयंत नारळीकर यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्याकडून 'इलेक्ट्रॉनिक मेल'मुळे  जगातील शास्त्रज्ञांशी संवाद साधणे सोपे झाले आहे असे ते म्हणाले. त्यावेळी  'इलेक्ट्रॉनिक मेल' ही संकल्पनाच मला कळाली नव्हती. ई-मेल नंतर व्यवहाराचा एका अविभाज्य भाग होईल अशी त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती. त्याकाळात इंटरनेट कसे फायदेशीर आहे आणि त्याचा वापर कसा करावा यासंदर्भात पुणे श्रमिक पत्रकार संघाने आपल्या सदस्यांसाठी कार्यशाळाही  आयोजित केली होती. 
आज आम्ही सर्व पत्रकारमंडळी  इंग्रजी किंवा मराठी भाषेत बातमी किंवा लेख लिहिल्यानंतर आणि स्वतःच काढलेले फोटो त्याबरोबर जोडून संपादकांना इमेल करतो, त्याची अनेकदा एका मिनिटांत पोचही येते. या बातम्या ऑनलाईन आवृत्तीवर ताबडतोब प्रसिद्धही होतात.  लँडलाईन फोनचीही सुविधा नसलेल्या काळात पत्रकारिता सुरू केलेल्या माझ्यासारख्या पत्रकारास हे आजही स्वप्नवत वाटते आणि यापुढे आणखी काय असेल याबद्दल औत्सुक्यही  आहे. 

Monday, July 2, 2018

कम्युनिस्ट राजवटींचा अस्तकाल आणि आजचा रशिया Fall of Communism





कम्युनिस्ट राजवटींचा अस्तकाल आणि आजचा रशिया
सोमवार , २ जुलै, २०१८         goo.gl/kuQdq8  कामिल पारखे
सध्या फूटबॉल वर्ल्डकपमुळे पुन्हा एकदा प्रकाशात आलेला रशिया एकेकाळी साम्यवादी राष्ट्रांचा पुढारी होती. आज कम्युनिझम नाहीसा झालेल्या या देशाच्या १९८०च्या दशकातील आठवणी.
मॉस्कोच्या रेड स्केअर चौकात उणे बारा तापमानाचा अनुभव घेत आम्ही उभे होतो आणि आमची अनुवादक आणि  गाईड आम्हाला त्या ऐतिहासिक स्थळाची माहिती देत  होती. राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निवासस्थान कोठे आहे, आमच्यापैकी एका  पत्रकाराने तिला मध्येच विचारले आणि आतापर्यंत उत्साहाने बोलणाऱ्या ती गाईड क्षणभर गप्पगारच झाली. बहुधा तिला परदेशी पर्यटकांकडून येणाऱ्या अशा प्रश्नांची सवय असावी. कारण ताबडतोब तिने मूळ प्रश्नाला बगल देत रेड स्केअरविषयी अधिक माहिती देण्यास सुरुवात केली. 
ही घटना होती एप्रिल १९८६ मधील. कॉम्रेड  मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी नुकतीच  युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लीक  किंवा यूएसएसआरच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणून सूत्रे घेतली होते. त्यांनी सुरू केलेल्या ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका या उदारमतवादी धोरणांची जगाला हळूहळू ओळख होत होती. त्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकाविरोधी गटाचे नेतृत्व रशियाकडे होते. व्हर्साव्ह करारावर सह्या करणारी इस्टर्न ब्लॉकमधील पूर्व जर्मनी, पोलंड, रोमानिया, झेकोस्लाव्हाकिया, हंगेरी,  बल्गेरिया  वगैरे राष्ट्रे रशियाच्या प्रभावाखाली होती. भारत अलिप्त राष्ट्रांचे नेतृत्व करत असला तरी रशियाच्या बाजूने झुकला होता. त्याकाळात भारतातील पत्रकारांसाठी या इस्टर्न ब्लॉक किंवा पूर्व युरोपातील राष्ट्रांत दरवर्षी पत्रकारितेचे पदविका अभ्यासक्रम आयोजित केले जात असत. इंडियन फेडरेशन ऑफ वर्किग जर्नलिस्ट्स तर्फे पत्रकारांची अभ्यासक्रमासाठी निवड केली जाई. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी सरचिटणीस होतो. त्यामुळे  त्यावर्षी बल्गेरियात होणाऱ्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या भारतातील ३० पत्रकारांच्या तुकडीत माझा समावेश होता. बल्गेरियाला जाण्यापूर्वी रशियाला आम्ही धावती भेट देत होतो. त्यानिमित्त तेथील राजकीय, सामाजिक जीवनाचे दर्शन घडले.
मॉस्कोच्या या भेटीत व्लादिमीर लेनिनचे शरीर जतन केलेल्या स्मारकास- लेनिन मौसोलियमला - आम्ही भेट दिली. थ्री-पीस सूट, अर्धवर्तुळाकार टकलावरील उरलेले चापूनचोपून बसवलेले केस असा तो लेनिन शांत झोपला आहे असेच वाटले. त्या कडाक्याच्या थंडीतही स्मारकास भेट देणाऱ्या लोकांची रांग खूप लांब होती.  स्मारकाच्या शेजारीच कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स, लेनिन, जोसेफ स्टॅलिन वगैरेंचे मोठे पुतळे होते. अत्यंत मोठया आकाराच्या त्या लाल चौकात वाहनांस मुळी परवानगीच नव्हती. अफूची गोळी  असलेल्या धर्मावर बंदीच असल्यामुळे तेथील मोठमोठ्या चर्चचे पर्यटन वास्तूंत रूपांतर झाले होते. या चर्चमध्ये साठी-सत्तरी उलटलेल्या पुरुष- महिला भाविक आणि काळ्या झग्यातल्या आणि दाढी राखलेल्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या धर्मगुरूंशिवाय कुणी दिसत नव्हते. रशियातील सामान्य माणसांकडे त्यावेळी भारताचे  नाव काढले की इंदिरा गांधी आणि अभिनेते राज कपूर या दोनच व्यक्तीं त्यांच्या नजरेसमोर उभ्या राहत असत. 
मॉस्कोनंतर बल्गेरियात गेलो तेथे त्या देशाची राजधानी सोफिया आणि इतर अनेक शहरांना भेटी दिल्या.  रशियाचे जवळजवळ मांडलिक देश असलेल्या पूर्व युरोपातील देशांतही लेनिनच्या धर्तीवर आपापल्या राष्ट्रपुरुषांचे देह जतन करण्याची टूम होती. मृतदेह जतन करण्याची प्रक्रिया अर्थातच रशियातच केली जाई. सोफिया येथेही बल्गेरियन कम्युनिस्ट क्रांतीचा प्रणेता जॉर्जी  दिमित्रोव्ह यांचे शरीर असेच ठेवले होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त एक मे रोजी सोफिया येथे झालेल्या परेडला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्यावेळी मी भारावूनच गेलो होतो.
१९८०च्या त्या  दशकात आणि त्याआधीच्या  कालखंडात भारतात  डाव्या चळवळीबाबत आणि  कामगार युनियनबाबत सामान्य लोकांची, विचारवंतांची सहानुभूती असे. जवळजवळ सर्वच सरकारी खात्यांत आणि खासगी उद्योगकंपन्यांत कामगार युनियन्स असतच. कामगार संघटना स्थापन करणे हा कामगारांचा हक्क आहे याविषयी त्यावेळी दुमत नसे. कामगार चळवळीसाठी एक मे  हा दिवस एका मोठा उत्सव असे. मला आठवते दरवर्षी एक मे रोजी कामगारदिनानिमित्त गोव्यात पणजीत, म्हापशात, मडगाव आणि वॉस्को येथे विविध डाव्या, उजव्या  आणि सेंट्रिस्ट विचारसरणींच्या कामगार संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम आणि मोर्चे-फेऱ्यांचे आयोजन केले जात असे आणि दुसऱ्या दिवशी त्या घटनांचे सविस्तर वृत्तांकन आम्ही वृत्तपत्रांत छापत असू.  
पुरोगामी किंवा डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना, ओपिनियन मेकर्सना  त्याकाळात रशिया आणि पूर्व युरोपातील देशांची वारी करण्याची संधी मिळत असे, तेथील कम्युनिस्ट जीवनप्रणालीचा, तेथील तथाकथित प्रगतीचा वारेमाप प्रचार केला जाई. त्याकाळात कम्युनिस्ट विचारसरणींचा प्रचार करणारी पुस्तके, ग्रंथ विविध भाषांत अगदी नाममात्र किंमतीत वा फुकटात मिळत असे. त्यामुळेच मॅक्झिम गॉर्की यांच्या  'द मदर' या कादंबरीचे मराठी भाषांतर असलेले  'आई'  हे हार्डबाऊंड छापलेले पुस्तक, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरे पुस्तके घरोघरी असायचीच. 'सोव्हिएत लँड' या शीर्षकाचे गुळगुळीत कागदांवर छापलेले एक  रंगीत नियतकालिक जागोजागी दिसायचे.    
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आघाडीवर असलेल्या कम्युनिस्ट देशांत प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबतीत  बोंबच होती. जाहिरातबाजीमध्ये किंवा प्रोपोगांडामध्ये मात्र ही सर्व राष्ट्रे आघाडीवर होती. बल्गेरियात आम्ही दौऱ्यावर असताना विविध शहरात गेल्यावर तेथील अधिकारी, महापौर अशा  आर्थिक,  सामाजिक प्रगतीची  पोपटपंची सुरू करत, त्यावेळी बल्गेरियाबाहेरच्या जगाचा अनुभव घेतलेला आमच्या एक अनुवादकाकडे माझे लक्ष असायचे. 'या जाहिरातबाजीत  काहीच तथ्य नाही'  असे तो आम्हाला नेहेमी खासगीत सांगत असे. मात्र रशियन आणि बल्गेरियन भाषा फारशी येत नसल्याने  स्थानिक  लोकांशी थेट संवाद साधून सत्य परिस्थिती जाणून घेणे शक्य नसायचे. मात्र एकदा बुर्गास शहरात असताना काही गोरीगोमटी आणि  चेहेऱ्यावर लालभडक टिपके असलेली  मुले-मुली आमच्या शर्टाला खेचून भीक मागू लागली तेव्हा आम्ही चकितच झालो होतो.  त्याबद्दल स्पष्टीकरण पुरवताना त्या अनुवादकाची भंबेरी उडाली होती. ती मुले जिप्सी कुटुंबांतील होती आणि त्यांचे  पुनर्वसन करणे कम्युनिस्ट बल्गेरियन सरकारला शक्य झाले नव्हते हे त्यावेळी आमच्या लक्षात आले. 
रशियात आणि बल्गेरियाचा आम्ही दौरा करत असताना याकाळात म्हणजे  १९८०च्या दशकाअखेरीस कम्युनिझमचा अस्तकाळ जवळ येतो आहे, या कम्युनिस्ट जगात मोठी सुनामी येणार आहे याची अंधुकशीही कल्पना कुणाला आली नव्हती. या दोनतीन वर्षांच्या काळात कम्युनिस्ट जगतात अनेक घटना वेगाने घडत गेल्या आणि कम्युनिस्ट राजवटींचा हा  डोलारा डॉमिनो इफेक्ट प्रमाणे वेगाने खाली कोसळला. 
जगभर पसरलेल्या कम्युनिझमच्या या पोलादी पडद्यास छिद्रे पडण्यास सुरुवात झाली ती पोलंड येथे कामगार नेते लेक वालेसा यांनी केलेल्या चळवळीमुळे. कम्युनिस्ट राजवट असलेल्या पोलंडमधील क्रॅकोव्हचे कार्डिनल  कॅरोल जोसेफ वोजत्याल यांची रोममध्ये पोप जॉन पॉल दुसरे म्हणून निवड झाली आणि पोलंडमधील लोकशाही चळवळीने अधिक जोर घेतला. लेक वालेसा नंतर पोलंडचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यानंतर बर्लिनच्या भिंतीचा पाडाव झाला आणि  इतरही  अनेक कम्युनिस्ट राष्ट्रांत उठाव होऊन तेथेही लोकशाहीप्रधान राजकीय व्यवस्था प्रस्थापित झाल्या. रशियात मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी उदारमतवादी धोरण राबवल्यानंतर त्यांना भले नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. मात्र त्यांच्या उदारीकरणाच्या धोरणाचा एका परिपाक म्हणून युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लीकचे विभाजन झाले. हुकूमशाहीच्या बळावर एकसंघ राहिलेल्या सोव्हिएत युनियनमधून पंधरा स्वतंत्र राष्ट्रे  उदयास आली.  कम्युनिझमचा पोलादी पडदा कोसळल्यानंतर या देशांतील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विषमतेच्या  वास्तव्याचे पहिल्यांदाच संपूर्ण जगाला दर्शन घडले. 
पूर्वाश्रमीच्या युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट  रिपब्लिकपैकी केवळ रशियाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली राजकीय ताकद प्रस्थापित केली आहे. कम्युनिस्ट राजवट लोप झाली असली तरी आता तेथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची एकाधिकारशाही आहे. रशियाच्या अध्यक्षपदी 'निवडून'  येण्याची पुतीन यांची ही चौथी वेळ आहे.     
वर्ल्ड फुटबॉल कप किंवा फिफाच्या निमित्ताने रशिया पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. एकेकाळी साम्यवादी देशांचा पुढारी असलेल्या रशियातच आज कम्युनिझम नाहीसा झाला आहे. सात  दशकांच्या कम्युनिस्ट राजवटीत रशियातून धर्माचे पूर्ण  उच्चाटन करणे शक्य झाले नाही. आज अनेक रशियन नागरिक चर्चमधील धार्मिक विधीस उपस्थित राहू लागले आहेत. सर्व जगभर नाताळ  २५ डिसेंबरला साजरा आहोत असला तरी  रशियात  ऑर्थोडॉक्स चर्च सात जानेवारीस हा सण  साजरा करते. पूर्वी केजीबी या गुप्तचर संघटनेचे अधिकारी असलेले  राष्ट्राध्यक्ष पुतीन या ख्रिसमसच्या विधीला चर्चमध्ये आवर्जून हजर असतात. कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे चौकाचौकांतून हटविण्यात आली असली तरी  जगातील पहिल्यावहिल्या कम्युनिस्ट क्रांतीचा नेता असलेल्या  लेनिनचे शरीर रेड स्केअरमध्ये आजही जतन करून ठेवण्यात आले आहे. एके काळी हे स्मारक जगभरातील साम्यवादी जगासाठी एक तीर्थक्षेत्र होते. आजकाल  लेनिनला वंदन करण्यासाठी तेथे पूर्वीसारखी लोकांची लांबलचक रांग नसते. या स्मारकापाशी रोडावलेली ही गर्दी  गेल्या शतकभराच्या कालावधीत रशियात आणि कम्युनिस्ट जगतात  झालेल्या स्थित्यंतराचे एक प्रतीकच  आहे.