Showing posts with label Narayan Vaman Tilak. Show all posts
Showing posts with label Narayan Vaman Tilak. Show all posts

Friday, December 6, 2024

नारायण वामन टिळक

काल `साधना' च्या बुक स्टॉलमध्ये एक तास घालवला. एक पुस्तक घ्यायचे मनात होते, पण निर्णय होत नव्हता.

नवनवी पुस्तके घेऊन घरात पडून राहतात, हातातल्या कामांमुळे वाचून होत नाहीत. हा नेहेमीचा अनुभव. शेवटी ते पुस्तक विकत घेऊन बॅगेत टाकले आणि प्रस्तावनेचा बराचसा भाग मेट्रोच्या परतीच्या प्रवासात वाचून काढला.

हे पुस्तक आहे सुधीर रसाळ लिखित` वाड्मयीन संस्कृती'.

पुस्तकाच्या शीर्षकाशी तसे मला काही देणेघेणे नाही, पुस्तक मी निवडले ते त्यातील नव्वद पानांच्या एका दीर्घ लेखामुळे.

ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचा तर परिचय देण्याची गरज नाही. या पुस्तकातील ज्या दीर्घ लेखाने मला आकर्षित केले तो लेख नारायण वामन टिळक यांच्यावर आहे.

नारायन वामन टिळक हे मराठीतील पंचकवीमधले एक. लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतिचित्रां'तून आपण सर्वांना ते परिचित असतात,

पाठ्यपुस्तकांत असलेल्या `दया आणि शांती' `तू तर माझ्याही पुढे गेलीस!' अशा धड्यांतून आणि `केवढे हे क्रौर्य', `वनवासी फुल' अशा कवितांमुळे त्यांचे नाव खास लक्षात राहते.

`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत टिळकांचे अल्पचरित्र आहे.

पण याहून अधिक नारायण वामन टिळकांचे खूप काही भरीव योगदान आहे.

ख्रिस्ती धर्म. मराठी भाषा, भारतीय परंपरा आणि संस्कृती, इथल्या मातीतल्या संतांचे लिखाण या संदर्भात ना. वा. टिळकांनी भारतीय आणि विशेषतः मराठी ख्रिश्चनांना खूप काही दिले आहे.

टिळकांचे निधन झाले मुंबईत, ते ख्रिस्ती होते तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचे दफन न होता मुंबईतच दहन झाले,

त्यांच्या अवशेषांना नंतर अहमदनगर इथल्या कबरस्थानात ठेवून तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.

`तुकानिर्मित सेतूवरुनी /
मीही आलो ख्रिस्ताचरणी //

अशी टिळकांची एक ओळ प्रसिद्ध आहे,

यावरून त्यांची वाटचाल आणि मराठी ख्रिस्ती समाजात रुढ केलेल्या अनेक परंपरांची कल्पना येऊ शकेल.

टिळकांची अनेक गायने आजही महाराष्ट्रातील चर्चेसमध्ये किबोर्ड, पेटी आणि तबल्याच्या सुरांत गायली जातात.

येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म पाश्चात्य नाही, पौर्वात्य आहे, हे टिळकांनी ठासून मांडले.

आम्ही ख्रिस्ती झालो म्हणजे या मातीत आणि देशात उपरे होत नाही हा त्यांचा सिद्धांत आजही मांडला जातो.

सुधीर रसाळ यांनी नारायण वामन टिळकांचा हा राष्ट्रवाद अन या मातीशी नाळ सांगणारा ख्रिस्ती धर्म आणि परंपरा याबाबत या दीर्घ लेखात विस्तृतपणे लिहिले आहे, ते हा लेख चाळताना लक्षात आले.

हा लेख मी अजून वाचलाही नाही.

मात्र आज सकाळीच लक्षात आले ६ डिसेंबर नारायण वामन टिळकांची जयंती. त्यामुळे या महान व्यक्तीविषयी काही शब्द लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.

नारायन वामन टिळकांना अभिवादन !

Sunday, December 18, 2022

निळकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे

नारायण वामन टिळक ख्रिस्ती झाल्यानंतर लक्ष्मीबाई आपल्या पतिबरोबर नांदायला तयार नव्हत्या. त्यांना आपल्या बरोबर आणण्यासाठी टिळकांना खूप प्रयत्न आणि कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या, त्यांच्या घरच्यांशी धाकटपटशा करावा लागला आणि खूप प्रयत्नानंतर लक्ष्मीबाई आपल्या पतीबरोबर राहू लागल्या, मात्र काही काळ त्या स्वतः चा वेगळा स्वयंपाक करत असत.

असाच प्रकार ख्रिस्ती झालेल्या अनेकांच्या बाबतीत झाला आहे. बाबा पद्मनजी वगैरेबाबत .
यावर तोडगा म्हणून त्याआधी खूप वर्षांपूर्वी घेतलेलं एक पाऊल वाचून मात्र मला हसूच आलं.
वर्ध्याला होऊ घातलेल्या आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या 'सावलीचा शोध’ (मौज प्रकाशन गृह -२०१२) या पुस्तकात ही घटना एका प्रकरणाच्या सुरुवातीलाच दिली आहे.
साल १८५३ आणि स्थळ वाराणशी. इथल्या तुरुंगात प्रत्येक कैद्याला स्वतः स्वयंपाक करण्याची परवानगी रद्द करून सामायिक अन्न शिजवण्याचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं घेतला होता. मात्र त्यामुळे जातीचे रोटी निर्बंध मोडतात म्हणून कैद्यांनी दंगा केला होता. म्हणून वाराणशी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत वाजंत्रीसह चक्क एक मिरवणूक निघाली होती.
''चार भोयांच्या खांद्यावर एक मेणा होता. त्यात एक तरुण बसला होता. मेण्यासोबत पंधरावीस लोक हातात काठ्या घेऊन चालले होते,. शिवाय दोनतीन गोरी माणसेही मिरवणुकीबरोबर चालत होती. ही मिरवणूक वाराणशीतील एका मराठी ब्राह्मणाच्या घराजवळ थांबली. घरासमोर थांबलेली ती मिरवणूक पाहून वाड्यातील जोगळेकर मंडळी फार घाबरून गेली. त्यांचा जावई ख्रिस्ती झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी वयात आलेल्या आपल्या लेकीला धर्मांतरित नवऱ्याकडे पाठवायला त्यांनी नकार दिला होता. आता मेण्यात बसून २०-२५ माणसे आणि दोनतीन युरोपियांना घेऊन तो आला होता. त्याचा हेतू दांडगाईचा दिसत होता. जोगळेकरांनी घराचे दर्शनी दार लावून घेतले आणि आतून कडी-आगळ घातली.
मेण्यातून उतरलेल्या निळकंठनें दारावर थाप मारुन लक्ष्मीला - आपल्या बायकोला - आवाज द्यायला सुरुवात केली. जोरजोरात आवाज दिले तरी कोणी दार उघडेना. शेवटी दोनचार आडदांड मंडळींनीं सरळ दार वर उचलून कोंड्यातून उचकटून ते काढले आणि ही मंडळी आत घुसली. चारदोन खोल्यांच्या घरात कोणत्या खोलीत लक्ष्मी आहे हे शोधणे अवघड नव्हते. समोर नवऱ्याला पाहतात लक्ष्मी थरथर कापत स्तब्ध उभी राहिली. नवऱ्याने हात धरून तिला बाहेर काढले. घरातील इतरांचा विरोध मोडून काढण्यात आला, लक्ष्मी आपल्या नवऱ्यासह मेण्यात बसली आणि मेणा परत निघाला. ''

लक्ष्मीच्या वयाच्या सातव्या वर्षी झालेल्या लग्नानंतर त्या दोघांची निघालेली ही दुसरी अशी वरात. फरक इतकाच कि या दुसऱ्या वरातीत त्या दोघांच्याही घरांतली कुणीही नव्हते. मिरवणूक वाराणशीच्या चर्च मिशनरी सोसायटीच्या आवारात गेली आणि तिथे एका छोट्या घरात निळकंठ अन लक्ष्मीचा संसार सुरु झाला.
पतीचे धर्मांतर हा हिंदू कायद्याप्रमाणे पत्नीशी आपोआप होणार विवाहविच्छेद समजला जाई आणि त्यामुळे आपल्या अद्याप हिंदू असलेल्या बायकोला आपल्याजवळ नांदण्यास परत आणणें हा धर्मांतरित नवऱ्यासाठी मोठाच जटिल प्रश्न होऊन जाई असं चपळगावकरांनीं नीलकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे यांच्यावरील या प्रकरणात यासंदर्भात म्हटलं आहे.
आज सकाळीच निळकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे (किंवा गोऱ्हे) यांच्यावरचे या पुस्तकातलं हे प्रकरण मी वाचत होतो .आणि राज्यात आंतर-जातीय आणि आंतर-धर्मीय विवाहावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वयक समिती नेमण्यात येते आहे असं वृत्तपत्रांत लगेच वाचलं.
प्रखर टिकेमुळं आता आंतर-जातीय विवाह या समितीच्या कचाट्यातून वाचला असंही कळालं.


लक्ष्मीबाई आणि नारायण वामन टिळक, विदुषी पंडिता रमाबाई, बाबा पद्मनजी प्रभुती खूप नशीबवान कि शंभर-दोनशे वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात जन्माला आले,
नाहीतर आजच्या आधुनिक, प्रगत काळात त्यांची काही खैर नव्हती असंच आता म्ह्नणायला हवं.