Showing posts with label Christianity. Show all posts
Showing posts with label Christianity. Show all posts

Saturday, December 7, 2024

 अतिशय धार्मिक म्हणता येईल अशा कुटुंबात मी वाढलो. माझ्या वडलांची दिनचर्या सुरु व्हायची ती सकाळी उठल्याउठल्या पलंगातल्या बिछान्यातच हातात रोझरी जपमाळ घेऊन कपाळावर, छातीवर आणि दोन्ही खांद्यांवर हाताने क्रुसाची खूण करत ' पवित्र क्रुसाच्या खुणेने...'' या प्रार्थनेपासून.

त्यानंतर `आमच्या बापा’, `नमो मारिया’ `प्रेषितांचा विश्वासांगिकार’ वगैरे प्रार्थना अर्धा तास चालायच्या. त्यांचे तोंड बाहेरच्या खोलीत असलेल्या आमच्या कुडाच्या भिंतीवर टांगलेल्या छोट्याशा आल्ताराकडे असायचे.
दरम्यानच्या काळात स्वयंपाकघरात केलेला कोरा चहा कपबशीत त्यांच्यासमोर ठेवलेला असायचा. दादांचे हे असे दररोजचे दर्शन मला खूप लहानपणापासून आठवते.. याचं कारण घरात इतरांपेक्षा खूप लवकर म्हणजे तांबडं फुटण्याआधीच बिछान्यातून बाहेर पडण्याची मला लागलेली सवय.
सकाळी साडेआठ दरम्यान दादांची आंघोळ, नाश्ता उरकायचा, तोपर्यंत घरात महिन्यावार लावलेला फुलांचा हार आलेला असायचा. कालचा जुना हार काढून दादा आल्तारासमोर उभे राहून दोनतीन प्रार्थना - आमच्या बापा, मारिया - मनातल्या मनात म्हणायचे आणि आमच्या `पारखे टेलर्स’ दुकानात जायला निघायचे.
माझी शाळा सकाळी अकराला असल्यानं अनेकदा मी त्यांच्याबरोबर जायचो. दुकानातल्या लाकडी फळ्यांचे दार उघडून केरसुणीनं ते दुकान झाडून घ्यायचे आणि मग दुकानाच्या भिंतीवर मध्यभागी असलेल्या आल्तारासमोर उभे राहून ते पुन्हा दोनतीन प्रार्थना म्हणायचे.
संद्याकाळी दुकानात पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवल्यावर आणि नंतरच्या काळात दिवे लावल्यावर लगेचच ते आल्ताराकडे पाहायचे आणि उजवा हात कपाळावर लावायचे.
श्रीरामपूर नगरपालिकेचा रात्रीचा साडेआठ वाजता भोंगा झाल्यानंतर दुकान बंद करण्याआधी पुन्हा एकदा आल्तारासमोर प्रार्थना व्हायची.
घरी आल्यावर नऊच्या आत आल्तारावर जाडजूड स्टीलच्या स्टॅण्डमध्ये दोन मेणबत्त्या लावल्या जायच्या आणि घरातील सगळे जण रात्रीच्या सामूहिक प्रार्थनेत सहभागी व्हायचे. जवळजवळ अर्धा तास चालणाऱ्या रात्रीच्या या प्रार्थनेत कुणीही गैरहजर राहू नये असा एक दंडक होता.
शनिवारी रात्री मारियेची प्रार्थना म्हणजे रोझरी व्हायची, आठवड्यातून दोनतीनदा मारियेची, सर्व संतांची आणि संत जोसेफची लितानी प्रार्थना व्हायची. अशाप्रकारे दादांचा नि आमच्या घरातला हा दिनक्रम कार्यक्रम कधीही चुकल्याचं मला आठवत नाही.
नाश्ता आणि कुठलेही जेवण घेण्याआधी हातानं क्रुसाची खूण केल्यानंतरच घास तोंडात टाकायचा ही त्यांची आणखी एक सवय. ही सवय आमच्या आईला - बाईला - सुद्धा होती. अहमदनगर जिल्ह्यात आईला 'बाई' असं संबोधन करण्याची रीत प्रचलित आहे.
घरातल्या या धार्मिक वातावरणाचा प्रभाव घरातल्या आम्हा मुलामुलींवर पडणे साहजिकच होते. घरातली सगळीच मुलं साधुसंत झाली नाही तरी बऱ्यापैकी धार्मिक आणि चांगल्यावाईट कल्पनांचा आदर आणि दुःस्वास करणारी निघाली.
घरातल्या कुणाही व्यक्तीकडून कसलाही अपशब्द, लिंगाधारित अपशब्द किंवा एखादी शिवी कधीही कानावर पडली नाही.
सत्तरच्या दशकापर्यंत जगभरातील कॅथोलिक देवळांत रविवारचा आणि दररोजचाही मिस्साविधी लॅटिन भाषेतून व्हायचा. आपल्याकडे अलीकडच्या काळापर्यंत अनेक धार्मिक विधी सामान्य लोकांना न कळणाऱ्या संस्कृत भाषेत व्हायचे अगदी तसेच. श्रीरामपूरला आणि हरेगावसारख्या खेड्यांपाड्यांत १९७२ पर्यंत कॅथोलिक देवळांत मिस्साविधी आणि प्रार्थना लॅटिन भाषेत व्हायच्या,
पुस्तकात समोरासमोरच्या पानांवर रोमन आणि देवनागरी लिपींत लिहिलेल्या या लॅटिन प्रार्थना आम्ही म्हणायचो. मराठी भाषा येणारे आम्ही लोक देवनागरी लिपीतल्या त्या लॅटिन प्रार्थना सहजपणे गात आणि म्हणत असू.
आमच्या लहानपणी आम्ही - आणि जगभरातले सर्वच भाविक लोक - लॅटिन भाषेत प्रार्थना करत असू. .
तासभर चालणाऱ्या या संगीतमय लॅटिन मिस्सा खरंच भव्यदिव्य स्वरुपाच्या असायच्या. पूर्ण उपासनाविधीत याजक आणि जमलेले भाविक जवळजवळ विशिष्ट लयबद्ध पद्धतीने गात असत. लॅटिन भाषेच्या संगीतमय उपासनाविधीला रुळलेल्या माझ्यासारख्या मुलांना आणि अनेक ज्येष्ठांना हा निर्णय लगेचच रुचला नव्हता हे कबूल करायलाच हवं.
आज जगभर सगळीकडे स्थानिक भाषांत मिस्साविधी आणि इतर सर्व प्रार्थना होतात.
ख्रिस्ती लोक बहुसंख्य बसलेल्या श्रीरामपूरच्या नामवंत जर्मन हॉस्पिटल म्हणजे सेंट लुक हॉस्पिटलच्या परिसरापासून दोन किलोमीटर लांब पण शहराच्या मुख्य वस्तीत आमचं घर होतं.
मेनरोडपाशी सोनार लेनमध्ये आमचं `पारखे टेलर्स’ हे शहरात नावाजलेलं दुकान होतं. तेथून जवळच असलेल्या सोमैय्या हायस्कुलपाशी आम्ही राहायचो.
आमच्या चाळीत बहुधर्मिय आणि विविध जातींची घरं होती. आमच्या घराच्या भिंतीला लागून मुसलमान शेजार होता, त्यांच्या अगदी समोरसुद्धा एक मुसलमान घर होतं, आमच्या घराच्या दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंब होतं, त्यांच्याशेजारी आणखी एक मुसलमान कुटुंब होतं. समोरची चारपाच घरं माळी जातीच्या आणि एकमेकांचे नातेवाईक असलेल्या कुटुंबांची होती.
या साऱ्या घरांतील लोक पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी सामाईक नळावर अवलंबून असत. त्यावेळी तिथं गोल कुंकू लावलेल्या, कुंकवाची आडवी चीर लावलेल्या आणि अजिबात कुंकू नि कुठलेही सौभाग्यलेणं नसलेल्या बायांची गर्दी होई.
मात्र वेगवेगळे कुंकू असण्याचा किंवा अजिबात कुंकू नसण्याचा त्यांच्या आपापसांतील संभाषणांत काहीही फरक नसायचा.
या आमच्या माळी-मराठी आणि मुसलमान शेजाऱ्यांच्या आपापसांत नेहेमी भाजी-कालवणांची - अडीअडचणीच्या काळात गव्हाच्या-ज्वारी-बाजरीच्या पिठाचीही आठव्याच्या किंवा एखाद्या पातेल्याच्या मापात मोजून घेऊन देवाणघेवाण व्हायची.
जराशा अंतरावर असलेल्या दगडी इमारतीत आणि बैठ्या दगडी घरांत एकदोन ब्राह्मण घरं होती. त्या ब्राह्मण घरातला नातू माझ्याच वर्गातला आणि माझा जवळचा मित्र, तो आमच्या घरात यायचा, मीही त्याच्या घरात थेट आतपर्यंत जायचो,
मात्र त्याची सत्तरीतली आजी कायम सोवळ्यात असायची, आणि कुणाला तिच्याजवळ येऊ किंवा शिवू देत नसायची. माझ्या आईची तिची जाम गट्टी होती.
'' या,या मार्थाबाई, बसा घडीभर'' असं म्हणत ती माझ्या आईला आपल्या घरात घ्यायची,
भरपूर वेळ खूप गप्पाटप्पा व्हायच्या, मात्र सुरक्षित अंतर ठेवूनच. आम्हाला मात्र त्याचं कधीही वाईट वाटलं नाही. इतर कुणाही व्यक्तीला - अगदी मराठा आणि माळी जातीच्या लोकांनाही - त्या गणपुले आजी शिवत नसायच्या.
सगळा शेजारपाजार एकमेकांच्या घरांतील सुखदुःखाला म्हणजे लग्नकार्यांना, मयतीला हजर असायचा, त्यामुळे एकमेकांच्या रितीरिवाजांची आणि संस्कृतीची साधारण ओळख असायची.
शेजारच्या मुसलमान घरांतील लहान मुलांच्या सुंता कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं मला आजही आठवतं. नंतर थोडं मोठं झाल्यावर कळालं कि सुंता परंपरा यहुदी धर्मात होती आणि यहुदी असलेल्या येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या बाराही शिष्यांची साहजिकच सुंता झाली होती.
नव्या ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांमध्ये मात्र सुंता प्रथा न आणण्याचा निर्णय या विषयावर चर्चा होऊन अगदी सुरुवातीच्या काळातच घेतला गेला होता.
कालांतरानं लक्षात आलं कि धर्म आणि भाषा, संस्कृती, पेहराव आणि अगदी खाद्यपध्द्ती यांचा एकमेकांशी काही एक संबंध नसतो.
साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.
या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.
साठ आणि सत्तरच्या दशकांच्या पिढीपर्यंत देशातील धार्मिक ख्रिस्ती कुटुंबांत घरातलं एक तरी मुल फादर किंवा सिस्टर व्हावं अशी आईवडलांची अपेक्षा असायाची.
युरोपातून आणि अमेरिकेतून अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आणि नन्स मिशनरी होऊन भारतात, आफ्रिका खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आले त्याचं हे प्रमुख कारण होतं. ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या केरळ, गोवा आणि वसईसारख्या भागांतूनसुद्धा अनेक धर्मगुरु आणि नन्स देशाच्या कानाकोपऱ्यांत काम करत आहेत ते याच कारणामुळं.
कोणे एके काळी अशाच धार्मिक कॅथोलिक कुटुंबात जन्मलेले जॉर्ज फर्नांडिस मंगलोर येथील सेमिनरीत फादर होण्यासाठी दाखल झाले होते, मात्र नंतर त्यांचा विचार बदलला आणि मग ते समाजवादी विचारसरणीचे कामगार नेते बनले.
आमचे धार्मिक ख्रिस्ती कुटुंबसुद्धा यास अपवाद नव्हते. याचा परिणाम म्हणून मी स्वतः आजन्म ख्रिस्ती संन्याशी होण्याचा निर्णय घेतला. दहावीनंतर मी जेसुईट फादर होण्यासाठी घरकुटुंब सोडले.
दहावीनंतर श्रीरामपुरातले घर मी सोडेपर्यंत दोन गोष्टी माझ्या शरीराभोवती कायम असायच्या. त्यापैकी एक म्हणजे गळयाभोवती काळ्या दोरीने बांधलेला क्रूस. ख्रिस्ती असल्याची ही खूण अनेकदा इतरांना दिसेल अशा पद्धतीने शर्टाच्या कॉलरपाशी असायची.
दुसरी एक गोष्ट मात्र इतरांना कधीही दिसत नसायची. चारपाच दिवसांच्या दिवाळसणाचा फक्त शेवटचा दिवस आमच्या घरी साजरा व्हायचा, तो म्हणजे भाऊबीज. ``इडा पिडा टळो'' असं काहीसं म्हणत बाई दादांना आणि आम्हा सर्व मुलांना ओवाळायची, नंतर बहिणी आम्हा भावांना ओवाळायच्या आणि मग ओवाळणीच्या ताटात आम्हा सर्व पुरुषांना करदोटे मिळायचे.
आधल्या वर्षाचे करदोटे काढून मग ते नवे करदोटे कमरेभोवती गुंडाळायचे. करदोटेविना पुरुष म्हणजे षंढ असा त्याकाळी समज असायचा.
गोव्यात आल्यानंतर गळ्याभोवतीचाचा हा क्रूस आणि अंतवस्त्रापाशी असलेला करदोटा नक्की कधी आणि कसे गळून पडले हेसुद्धा आता आठवत नाही.
गोव्यात अर्थातच कॅथोलिक समाजात करदोटे बाळगण्याची प्रथा नाही आणि गळ्याभॊवती कुणी क्रॉससुद्धा बाळगत नाही.
हा, गोव्यात कॅथॉलिक व्यक्ती असल्याची ओळख करून देणारी एक दुसरी गोष्ट होती, ती म्हणजे उजव्या अंगठ्याच्या टोकापाशी गोंदलेली छोटीशी क्रुसाची चिन्ह. हिंदू पुरुषाचे दोन्ही कान टोचलेले असतात, तसे गोव्यात कॅथोलिक स्त्री-पुरुषाचे अंगठे क्रूसाचे चिह्नाने गोंदलेले असतात .
मात्र गोव्यात पदवीधर होण्याआधीच धर्मगुरू होण्याचे, आजन्म अविवाहित राहून धर्मसेवा आणि समाजसेवा करण्याचं ध्येय मी सोडलं आणि पत्रकारितेच्या व्यवसायात आलो.
जेसुईट संन्याशी होण्याचं बाळगलेलं स्वप्न सोडणं तितकं सहज नव्हतं. याकाळात प्रचंड मानसिक तणावातून गेलो, मात्र वर्षभराच्या काळात सावरलो आणि एका नव्या व्रताचा - पत्रकारितेच्या आणि कामगार चळवळीच्या - स्वीकार केला.
आज मागे वळून पाहताना एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे झालेले हे स्थित्यंतर अगदी सहजगत्या पार पडले असं वाटते.
आजन्म अविवाहीत धर्मगुरु राहण्याचे उद्दिष्ट सोडून मी गृहस्थाश्रम स्वीकारायला होता तरी तसा एकदा घेतलेला वसा पूर्णतः टाकून दिलेला नव्हता. नव्या अवतारातसुद्धा मूळचा पिंड कायम राहिला होता असे आज मागे वळून पाहताना जाणवते.

Friday, December 6, 2024

नारायण वामन टिळक

काल `साधना' च्या बुक स्टॉलमध्ये एक तास घालवला. एक पुस्तक घ्यायचे मनात होते, पण निर्णय होत नव्हता.

नवनवी पुस्तके घेऊन घरात पडून राहतात, हातातल्या कामांमुळे वाचून होत नाहीत. हा नेहेमीचा अनुभव. शेवटी ते पुस्तक विकत घेऊन बॅगेत टाकले आणि प्रस्तावनेचा बराचसा भाग मेट्रोच्या परतीच्या प्रवासात वाचून काढला.

हे पुस्तक आहे सुधीर रसाळ लिखित` वाड्मयीन संस्कृती'.

पुस्तकाच्या शीर्षकाशी तसे मला काही देणेघेणे नाही, पुस्तक मी निवडले ते त्यातील नव्वद पानांच्या एका दीर्घ लेखामुळे.

ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचा तर परिचय देण्याची गरज नाही. या पुस्तकातील ज्या दीर्घ लेखाने मला आकर्षित केले तो लेख नारायण वामन टिळक यांच्यावर आहे.

नारायन वामन टिळक हे मराठीतील पंचकवीमधले एक. लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतिचित्रां'तून आपण सर्वांना ते परिचित असतात,

पाठ्यपुस्तकांत असलेल्या `दया आणि शांती' `तू तर माझ्याही पुढे गेलीस!' अशा धड्यांतून आणि `केवढे हे क्रौर्य', `वनवासी फुल' अशा कवितांमुळे त्यांचे नाव खास लक्षात राहते.

`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत टिळकांचे अल्पचरित्र आहे.

पण याहून अधिक नारायण वामन टिळकांचे खूप काही भरीव योगदान आहे.

ख्रिस्ती धर्म. मराठी भाषा, भारतीय परंपरा आणि संस्कृती, इथल्या मातीतल्या संतांचे लिखाण या संदर्भात ना. वा. टिळकांनी भारतीय आणि विशेषतः मराठी ख्रिश्चनांना खूप काही दिले आहे.

टिळकांचे निधन झाले मुंबईत, ते ख्रिस्ती होते तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचे दफन न होता मुंबईतच दहन झाले,

त्यांच्या अवशेषांना नंतर अहमदनगर इथल्या कबरस्थानात ठेवून तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.

`तुकानिर्मित सेतूवरुनी /
मीही आलो ख्रिस्ताचरणी //

अशी टिळकांची एक ओळ प्रसिद्ध आहे,

यावरून त्यांची वाटचाल आणि मराठी ख्रिस्ती समाजात रुढ केलेल्या अनेक परंपरांची कल्पना येऊ शकेल.

टिळकांची अनेक गायने आजही महाराष्ट्रातील चर्चेसमध्ये किबोर्ड, पेटी आणि तबल्याच्या सुरांत गायली जातात.

येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म पाश्चात्य नाही, पौर्वात्य आहे, हे टिळकांनी ठासून मांडले.

आम्ही ख्रिस्ती झालो म्हणजे या मातीत आणि देशात उपरे होत नाही हा त्यांचा सिद्धांत आजही मांडला जातो.

सुधीर रसाळ यांनी नारायण वामन टिळकांचा हा राष्ट्रवाद अन या मातीशी नाळ सांगणारा ख्रिस्ती धर्म आणि परंपरा याबाबत या दीर्घ लेखात विस्तृतपणे लिहिले आहे, ते हा लेख चाळताना लक्षात आले.

हा लेख मी अजून वाचलाही नाही.

मात्र आज सकाळीच लक्षात आले ६ डिसेंबर नारायण वामन टिळकांची जयंती. त्यामुळे या महान व्यक्तीविषयी काही शब्द लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.

नारायन वामन टिळकांना अभिवादन !

Sunday, June 30, 2024

पोप फ्रान्सिस भारतभेटीला

इटलीच्या दौऱ्यावर असताना शुक्रवारी G-7 बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे.

परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलॉनी यांच्यासमवेत मोदीजी आणि पोप फ्रान्सिस यांचे हे छायाचित्र आहे.
मोदीजी यांनी याबाबत समाज माध्यम Xवर खालील टिपण्णी केली आहे.
“Met Pope Francis on the sidelines of the @G7 Summit. I admire his commitment to serve people and make our planet better. Also invited him to visit India. @Pontifex,”
G7 या राष्ट्रांच्या गटात भारताचा समावेश होत नसला तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला या बैठकीचे आमंत्रण दिले जाते. इटलीत ही बैठक होत असल्याने व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख या नात्याने पोप फ्रान्सिस यांनाही या बैठकीचे आमंत्रण होते.
याआधी मोदीजी पोपमहोदयांना व्हॅटिकन सिटीमध्ये २०२१ साली भेटले होते. तेव्हाही पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेऊन त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण दिले होते.
दरम्यानच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील काही राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत.
इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे पोप फ्रान्सिस यांचा दौरा अचानक होत नाही, याचे कारण त्यांची भेट ही नेहमीच धार्मिक उद्दिष्ट्याची ( Pastoral ) असते, त्यासाठी स्थानिक चर्चतर्फे खूप आधीपासून नियोजन केले जाते.
याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारतात १९८६ साली दहा दिवसांचा दौरा केला होता, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली ते पुन्हा तीन दिवसांच्या भेटीसाठी भारतात आले होते.
पोप यांच्या भारतभेटीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहेमीच विरोध केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार अशा देशांना भेटी दिल्या होत्या. या देशांपेक्षा भारतात ख्रिश्चनांचे प्रमाण फार अधिक आहे.
मोदीजी यांचे भारतभेटीचे आमंत्रण केवळ औपचारीकता नसून अगदी मनापासून असेल तर भारतातील चर्चचे पदाधिकारी आनंदून या दौऱ्याच्या तयारीला लागतील.
भारतातील कॅथोलिक चर्च गेली अनेक वर्षे भारताने पोप यांच्या दौऱ्यास मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
पोप हे राष्ट्रप्रमुखसुद्धा असल्याने कुठल्याही दौऱ्यासाठी त्या देशाचे त्यांना औपचारिक आमंत्रण असणे आवश्यक असते.
भारत सरकारने पुन्हा औपचारिक आमंत्रण दिल्यास काही महिन्यांत पोप फ्रान्सिस यांचा भारतदौरा होऊ शकतो.
या वर्षाअखेरीस नोव्हेंबरात गोव्यात संत फ्रान्सिस झेव्हियरच्या पार्थिवाचे अवशेष दोन महिन्यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
दर दहा वर्षानंतर होणाऱ्या या प्रदर्शनातून गोव्याला चांगला महसूल मिळत असतो.
संत फ्रान्सिस झेव्हियर हे सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट) किंवा येशूसंघ या धर्मगुरूंच्या संस्थेचे एक संस्थापक.
विशेष म्हणजे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर निवड झालेले पहिलेच जेसुईट धर्मगुरु आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भारत दौऱ्यात गोव्याचाही समावेश असेल अशी आशा व्यक्त केली आहे.
Camil Parkhe

Monday, April 1, 2024

मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट''

`द लास्ट सपर' किंवा `येशूचे शेवटचे भोजन या विषयाने जगभरातील चित्रकारांना आकर्षित केले आहे.
लिओनार्दो दा व्हिन्सी याने रेखाटलेले ते प्रसिद्ध चित्र किंवा त्या चित्राची प्रतिकृती ख्रिश्चनांच्या घरात विशेषतः डायनिंग टेबलाच्यावर भिंतीवर असतेच.
माझ्याही घरात आहेच.
गुड फ्रायडेला क्रुसावर दुःखसहन करून देहत्याग करणाऱ्या ख्रिस्ताने आपल्या बारा शिष्यांसह आज पवित्र गुरुवारी ( Maundy Thursday) संद्याकाळी आपले `शेवटचे भोजन' केले. `The Last Supper '
त्यावेळी ज्युडास इस्किर्योत हा त्याचे चुंबन घेऊन विश्वासघात करणारा शिष्यसुद्धा होता.
त्यावेळचे येशू आणि त्याच्या शिष्यांचे चित्रण करण्याचे आव्हान चित्रकारांसमोर असते.
जेवणासाठी बसण्याची आसनव्यवस्था, बाराही शिष्यांचे ओळख पटण्यासारखे चित्रण आणि 'तुमच्यापैकी एक जण आता माझा विश्वासघात करणार आहे' हे येशूने सांगितल्यावर या शिष्यांमध्ये उमटणारी अस्वस्थता लिओनार्दो द व्हिन्सीने The Last Supper ' या चित्रात उत्तमरीत्या सादर केली आहे.
भारतातील अनेक चित्रकारांनी `द लास्ट सपर' रेखाटण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे.
मकबूल फिदा (एम. एफ.) हुसेन, जेमिनी रॉय, फ्रान्सिस न्युटन सोझा, अँजेलो दा फोन्सेका वगैरेंनी.
ही सर्व चित्रे अर्थातच भारतीय शैलीत म्हणजे भारतीय प्रतिमांसह आहेत.
एम. एफ. हुसेन यांनी ख्रिस्ती धर्माच्या संकल्पनेवर खूप चित्र रेखाटलेली आहेत आणि त्यांचा अर्थातच `भारतीय ख्रिस्ती कला' मध्ये समावेश केला जातो.
एम. एफ. हुसेन यांनी आपल्या खास शैलीत रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट' चे (२००८) हे एक चित्र.
हे चित्र हुसेन यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील आहे. हुसेन यांच्या या चित्रात ख्रिश्चन आणि इस्लामिक संस्कृतीचा मिलाप दिसतो.
चित्रात उंट, देवदूत आणि इतर अनेक प्रतिमा आहेत, त्याबद्दल केवळ कला समीक्षकच लिहू शकतील.
Camil Parkhe

Saturday, August 26, 2023

 


मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.
केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगिजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समुळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.
दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.
मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.
देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व - वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या - जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.
आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा - १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.
या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.
मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.
इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदु व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशु ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ''नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.
ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.
बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.
मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.
मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स' चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार.
रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.
सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.
जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.
पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.
पंजाबमध्ये आणि संपुर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.
अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.
हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील. ``सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .
त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले.
त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.
यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन' ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे कासार जातीचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.
अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.
ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.
ख्रिस्ती समाजात अशाप्रकारे विविध जाती जमाती अगदी खुल्या स्वरूपात अस्तित्वात असल्या तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात मात्र जातीभेद नाही असे ठोसपणे म्हणता येते.
हे नंतर अगदी सविस्तरपणे पुढल्या पोस्टमध्ये…

Sunday, December 18, 2022

निळकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे

नारायण वामन टिळक ख्रिस्ती झाल्यानंतर लक्ष्मीबाई आपल्या पतिबरोबर नांदायला तयार नव्हत्या. त्यांना आपल्या बरोबर आणण्यासाठी टिळकांना खूप प्रयत्न आणि कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या, त्यांच्या घरच्यांशी धाकटपटशा करावा लागला आणि खूप प्रयत्नानंतर लक्ष्मीबाई आपल्या पतीबरोबर राहू लागल्या, मात्र काही काळ त्या स्वतः चा वेगळा स्वयंपाक करत असत.

असाच प्रकार ख्रिस्ती झालेल्या अनेकांच्या बाबतीत झाला आहे. बाबा पद्मनजी वगैरेबाबत .
यावर तोडगा म्हणून त्याआधी खूप वर्षांपूर्वी घेतलेलं एक पाऊल वाचून मात्र मला हसूच आलं.
वर्ध्याला होऊ घातलेल्या आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या 'सावलीचा शोध’ (मौज प्रकाशन गृह -२०१२) या पुस्तकात ही घटना एका प्रकरणाच्या सुरुवातीलाच दिली आहे.
साल १८५३ आणि स्थळ वाराणशी. इथल्या तुरुंगात प्रत्येक कैद्याला स्वतः स्वयंपाक करण्याची परवानगी रद्द करून सामायिक अन्न शिजवण्याचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं घेतला होता. मात्र त्यामुळे जातीचे रोटी निर्बंध मोडतात म्हणून कैद्यांनी दंगा केला होता. म्हणून वाराणशी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत वाजंत्रीसह चक्क एक मिरवणूक निघाली होती.
''चार भोयांच्या खांद्यावर एक मेणा होता. त्यात एक तरुण बसला होता. मेण्यासोबत पंधरावीस लोक हातात काठ्या घेऊन चालले होते,. शिवाय दोनतीन गोरी माणसेही मिरवणुकीबरोबर चालत होती. ही मिरवणूक वाराणशीतील एका मराठी ब्राह्मणाच्या घराजवळ थांबली. घरासमोर थांबलेली ती मिरवणूक पाहून वाड्यातील जोगळेकर मंडळी फार घाबरून गेली. त्यांचा जावई ख्रिस्ती झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी वयात आलेल्या आपल्या लेकीला धर्मांतरित नवऱ्याकडे पाठवायला त्यांनी नकार दिला होता. आता मेण्यात बसून २०-२५ माणसे आणि दोनतीन युरोपियांना घेऊन तो आला होता. त्याचा हेतू दांडगाईचा दिसत होता. जोगळेकरांनी घराचे दर्शनी दार लावून घेतले आणि आतून कडी-आगळ घातली.
मेण्यातून उतरलेल्या निळकंठनें दारावर थाप मारुन लक्ष्मीला - आपल्या बायकोला - आवाज द्यायला सुरुवात केली. जोरजोरात आवाज दिले तरी कोणी दार उघडेना. शेवटी दोनचार आडदांड मंडळींनीं सरळ दार वर उचलून कोंड्यातून उचकटून ते काढले आणि ही मंडळी आत घुसली. चारदोन खोल्यांच्या घरात कोणत्या खोलीत लक्ष्मी आहे हे शोधणे अवघड नव्हते. समोर नवऱ्याला पाहतात लक्ष्मी थरथर कापत स्तब्ध उभी राहिली. नवऱ्याने हात धरून तिला बाहेर काढले. घरातील इतरांचा विरोध मोडून काढण्यात आला, लक्ष्मी आपल्या नवऱ्यासह मेण्यात बसली आणि मेणा परत निघाला. ''

लक्ष्मीच्या वयाच्या सातव्या वर्षी झालेल्या लग्नानंतर त्या दोघांची निघालेली ही दुसरी अशी वरात. फरक इतकाच कि या दुसऱ्या वरातीत त्या दोघांच्याही घरांतली कुणीही नव्हते. मिरवणूक वाराणशीच्या चर्च मिशनरी सोसायटीच्या आवारात गेली आणि तिथे एका छोट्या घरात निळकंठ अन लक्ष्मीचा संसार सुरु झाला.
पतीचे धर्मांतर हा हिंदू कायद्याप्रमाणे पत्नीशी आपोआप होणार विवाहविच्छेद समजला जाई आणि त्यामुळे आपल्या अद्याप हिंदू असलेल्या बायकोला आपल्याजवळ नांदण्यास परत आणणें हा धर्मांतरित नवऱ्यासाठी मोठाच जटिल प्रश्न होऊन जाई असं चपळगावकरांनीं नीलकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे यांच्यावरील या प्रकरणात यासंदर्भात म्हटलं आहे.
आज सकाळीच निळकंठशास्त्री नेहेम्याशास्त्री गोरे (किंवा गोऱ्हे) यांच्यावरचे या पुस्तकातलं हे प्रकरण मी वाचत होतो .आणि राज्यात आंतर-जातीय आणि आंतर-धर्मीय विवाहावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वयक समिती नेमण्यात येते आहे असं वृत्तपत्रांत लगेच वाचलं.
प्रखर टिकेमुळं आता आंतर-जातीय विवाह या समितीच्या कचाट्यातून वाचला असंही कळालं.


लक्ष्मीबाई आणि नारायण वामन टिळक, विदुषी पंडिता रमाबाई, बाबा पद्मनजी प्रभुती खूप नशीबवान कि शंभर-दोनशे वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात जन्माला आले,
नाहीतर आजच्या आधुनिक, प्रगत काळात त्यांची काही खैर नव्हती असंच आता म्ह्नणायला हवं.