Showing posts with label Nashik. Show all posts
Showing posts with label Nashik. Show all posts

Thursday, March 26, 2026


पेशवाई अखेरच्या टप्प्यात असताना आणि अव्वल इंग्रजी अमदानीच्या अगदी सुरुवातीच्या काळात भारतात इंग्रजी आणि मराठी शाळा स्थापन करून, मराठीतील पहिले पाठ्यपुस्तक लिहिण्याचा, आधुनिक शिक्षणपद्धतीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान या अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांच्याकडे जातो.

केवळ ४१ वर्षे आयुष्य लाभलेल्या गॉर्डन हॉल यांचा महाराष्ट्रातील मिशनकार्याचा कालावधी अवघा बारा वर्षांचा होता.
मात्र या काळात ख्रिस्ती धर्माची पताका फडकावत त्यांनी येथील समाजाच्या सर्व घटकांना म्हणजे बहुजन, अस्पृश्य तसेच स्त्रियांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. अशा प्रकारे सार्वत्रिक शिक्षणाने भारतात समाजक्रांतीचे एक नवे पर्व सुरु केले.
गॉर्डन हॉल यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्ष अलीकडेच २० मार्च २०२६ पासून सुरु झाले आहे.
अमेरिकेतून निघालेल्या गलबतातून मुंबई बंदरात दिनांक १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाऊल ठेवलेल्या गॉर्डन हॉल आणि अमेरिकन मराठी मिशनच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच मराठी भाषा शिकणे सुरु केले आणि मग मुंबईत शाळाही सुरु केल्या.
हे मिशनरी भारतात आले तेव्हा येथील लिखाणा-वाचनाबाबत आणि एकूण मराठी साहित्याची स्थिती काय परिस्थिती होती याचे रेव्हरंड हेन्री जे ब्रूस यांनी पुढील शब्दांत वर्णन केले आहे:
``आमचे पहिले मिशनरी मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांना दिसले कि स्थानिक लोकांनी तोपर्यंत पाश्चात्त्य संस्कृतीचा कसलाही प्रभाव अनुभवलेलाच नव्हता. मुंबईत एकही स्थानिक छापखाना नव्हता, तसेच कोणतेही स्थानिक नियतकालिकही अस्तित्वात नव्हते.
मराठी भाषेत जे थोडेफार साहित्य उपलब्ध होते, ते मुख्यतः पुराणे, महाभारत आणि इतर पवित्र ग्रंथांमधील कथांचे भाषांतर होते. त्यामध्ये राम, कृष्ण आणि इतर देवतांच्या कथा होत्या.
काही स्थानिक राजांच्या ऐतिहासिक आठवणी (चरित्रात्मक लेखन) देखील होत्या. हे तसेच पवित्र ग्रंथांवरील भाषांतरे बहुतांश काव्यरूपात लिहिलेले होते.
याशिवाय काही मूळ कविता होत्या. या सर्वांनी मिळून त्या काळातील साहित्याचा मोठा भाग बनवला होता. जशी पुस्तके कमी होती, तसेच वाचकही कमी होते.’’
आधुनिक काळातील या आद्य मिशनरींना मराठी भाषा शिकण्यात अनेक अडचणी आल्या. याचे कारण म्हणजे तोपर्यंत मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करण्यात आले नव्हते.
याविषयी रेव्हरंड ब्रूस यांनी लिहिले आहे :
``या मिशननरींना स्थानिक मराठी भाषा शिकण्यासाठी व्याकरणे आणि शब्दसंग्रह यांच्या स्वरूपात फारशी, किंबहुना काहीही मदत उपलब्ध नव्हती. एखादया फारसे अनुभव आणि कौशल्य नसलेल्या पंडितासोबत बसून त्यांना शब्दांचे अर्थ आणि वाक्यरचनेचे प्रकार याविषयी तोंडी मार्गदर्शन घ्यावे लागत असे. भाषेचे खरे नियम त्यांना केवळ दीर्घकालीन आणि संयमी तुलना व सामान्यीकरण यांच्या माध्यमातूनच समजू शकत असतात.’’
मिशनच्या सुरुवातीच्या नोंदींमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या शाळांविषयी वेगवेगळ्या कागदपत्रांत, अहवालांत माहिती आढळते. मुंबईत मिशनकार्य करण्याची परवानगी मिळाल्यानंतर गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांनी लगेचच इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्रकारच्या शाळा सुरू केल्या.
रेव्ह. सॅम्युएल बी. फेअरबँक यांनी गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांच्याबद्दल पुढील शब्दांत लिहिले आहे :
``गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांना मुंबईत राहू दिले जाईल याबद्दल शाश्वती नसली त्यांनी मराठी शिकण्यास तातडीने सुरुवात केली. सन १८१४ च्या अखेरीपूर्वी त्यांनी एक शाळा सुरू केली. ‘’
मे १८१५ मध्ये या मिशनरींनी स्थानिक मुलांसाठी असलेल्या एका शाळेचा उल्लेख केला आहे. तीच पहिली आणि एकमेव शाळा होती.
त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या दिनदर्शिकेत असे नमूद आहे :-
“आमची शाळा हळूहळू वाढत आहे. सध्या त्यात सुमारे २५ मुले आहेत. ‘सुमारे’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची उपस्थिती इतकी अनियमित आहे की ते कधीच एकाच वेळी सर्व उपस्थित नसतात.
आम्हाला या शिक्षणकार्यात मदत करु शकेल आणि शिकवण्याच्या मुख्य कामातून आम्हाला थोडाफार दिलासा देईल असा योग्य सहाय्यक लवकर मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
सध्या तरी आम्ही दररोज सुमारे पाच तास शाळेत घालवतो आणि हा वेळ आपापसांत वाटून घेतो.”
सन १८१५च्या वर्षाच्या अखेरीस हॉल आणि नॉट यांनी शाळेत दोन ब्राह्मण शिक्षकांची नेमणूक केली होती. एका दिनदर्शिकेत पुढीलप्रमाणे लिहिले आहे:
“पंचवीस मुलांची एक इंग्रजी शाळा आहे आणि ब्राह्मणांनी चालवलेल्या दोन स्थानिक शाळांत सुमारे ४० विद्यार्थी आहेत.”
पुढील वर्षात आणखी काही शाळा सुरू करण्यात आल्या. एका अहवालात नोंद आढळते कि मिशनरींच्या देखरेखीखालील शाळांमध्ये जवळपास ३०० मुलांना शिक्षण दिले जात होते. सन १८१८मध्ये ११ शाळांची माहिती देण्यात आली असून या शाळांत ६०० मुलांची नियमित उपस्थिती होती.
तीन वर्षांनी एकूण २५ शाळा सुरू होत्या; परंतु निधीअभावी त्यांना काही काळासाठी त्यांपैकी १० शाळा बंद कराव्या लागल्या. मात्र १८२३ मध्ये त्यांच्या एकूण २६ शाळा होत्या आणि त्यामध्ये १,४५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत होते.
या शाळांबद्दल पुढील एक नोंद आहे: :-
“आमच्या या शाळा आम्हाला अपेक्षित अशा नसल्या तरी त्या आम्हाला प्रोत्साहन आणि आशा देत आहेत. स्थानिक लोकसंख्येवर य शाळांचा प्रभाव जरी शांत आणि सहज वर्णन करता येणार नाही असा असला, तरी तो सतत, व्यापक आणि आमच्या मिशनच्या उद्दिष्टांसाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे.
आम्हाला स्थानिक लोकांकडून पुढीलप्रकारचे उद्गार ऐकायला मिळतात : ‘प्रौढ लोकांना दुसरा धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करता येत नाही; परंतु धार्मिक शाळांमध्ये शिकणारी मुले ख्रिस्ती होतील, आणि अशा प्रकारे शेवटी सर्व लोक ख्रिस्ती होतील.’
आम्ही या मताशी सहमत नसूनही, या शाळांना एक महत्त्वाचे साधन मानतो आणि आमच्या आजूबाजूला आणखी बऱ्याच शाळा सुरू करता याव्यात अशी आमची तीव्र इच्छा आहे.
आमच्या शेवटच्या बैठकीत आम्ही आणखी शाळांसाठी आलेल्या तेरा अर्जांचा विचार केला; पण साधनसामग्रीच्या अभावामुळे आम्हाला ते नाकारावे लागले.”
या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ११६ ज्यू मुलांचाही समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व शाळा मुंबईतच नव्हत्या; त्यांपैकी अनेक शाळा कोकणातील खेड्यांमध्ये होत्या.
कोकणात गॉर्डन हॉल नियमितपणे वारंवार दौरे करत आणि या शाळांना भेट देत असत.
आपण सुरु केलेल्या या शाळांत शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके हवीत म्हणून त्यांनी धार्मिक पुस्तकांबरोबरच पाठ्यपुस्तकेही लिहिली. छापखाने सुरु करुन या पुस्तकांची छपाई केली.
आपल्या धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून गॉर्डन हॉल यांनी मराठीत अनेक पुस्तके लिहिली आणि छापली आहेत. ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांशिवाय अमेरिकन मिशनच्या शाळांसाठी हॉल यांनी तीन मराठी पाठ्यपुस्तके लिहिली आहेत.
आधुनिक शिक्षणपद्धतीतील मराठी भाषेतील ही पहिलीच पाठ्यपुस्तके.
गॉर्डन हॉत ` लेकरांची पहिली पोथी (First Book of Children) हे सोळा पानांचे पुस्तक १८१८ साली छापण्यात आले. अमेरिकन मिशन मालेमधील हे पहिल्या क्रमांकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक एका बाजूला बालबोधमध्ये व दुसऱ्या बाजूला मोडी लिपीत छापले होते.
या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी निघाल्या व या सर्व आवृत्या मिळून दहा लाख तरी प्रती सपल्या असतील, असा रे. ब्रूस यांचा अंदाज आहे. या पुस्तकाच्या १८२८ व १८२९ साली स्कॉटिश मिशनरींच्या कोकणातील बाणकोट मिशनने दोन आवृत्त्या काढल्या.
ट्रॅक्ट सोसायटीनेसुद्धां १८३०, १८३१, १८३२, १८३३, १८२४ १८३५ साली सहा आवृत्त्या काढल्या. पुढे १८३७, १८४१ व १८४४ मध्ये बालबोध व मोडी लिपीत हे पुस्तक प्रकाशित करण्यांत आले असे श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या ग्रंथात नमूद केले आहे.
त्या दोघांनी १८१६ मध्ये बायबलच्या नव्या करारातील अनेक पुस्तके अनुवादित केली, मराठी भाषेत काही लघुपत्रके (ट्रॅक्ट्स) तयार केली.सन १८१७ मध्ये त्यांनी आठ पानांचे एक धर्मग्रंथावर आधारित पत्रक आणि संत मॅथ्यूच्या शुभवर्तमानावर लेखन छापले.
हॉल आणि न्यूवेल सॅम्युएल यांनी १८१८ च्या उत्तरार्धात कोकणात अनेक ठिकाणी प्रवास केले. त्यांनी समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे शंभर मैलांपर्यंत असलेल्या शहरांना आणि गावांना भेटी दिल्या, तेथली माहिती गोळा केली, पुस्तके वाटली आणि संधी मिळेल तिथे सुवार्ता धर्मप्रचार केला.
फेअरबँक लिहितात कि हीच ती प्रारंभीची नोंद आहे जी मला त्यांच्या मिशनकार्याच्या तीन मुख्य विभागांबद्दल आढळते.
``प्रथम आले शिक्षण. दुसरे आले प्रचारकार्य आणि तिसरे म्हणजे मराठी भाषेत पवित्र शास्त्रांचे आणि ख्रिस्ती साहित्याचे लेखन, मुद्रण आणि प्रसार.''
चौथा महत्त्वाचा विभाग म्हणजे वैद्यकीय उपचार आणि औषधोपचार. अगदी सुरुवातीपासूनच आमच्या मिशनरींनी आपल्या गुरूचे म्हणजे येशू ख्रिस्ताचे अनुकरण करत आजारी लोकांचे उपचार केले.
याचे उदाहरण गॉर्डन हॉल यांच्या पुढील प्रसंगातून दिसते.''
गॉर्डन हॉल दिनांक १५ मार्च १८२६ रोजी नाशिक येथे पोहोचले. त्यांनी लगेचच धर्मप्रवचन सुरू केले आणि पुस्तके वाटण्याचे काम हाती घेतले.
त्या वेळी तेथे कॉलऱ्याची साथ होती. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या हॉल यांनी त्यांनी आजारी लोकांना औषधोपचार केला. काही काळाने त्यांच्याकडील पुस्तके आणि औषधे संपली.
दिनांक १८ मार्चला त्यांनी मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला.
सिन्नरजवळ दोडी दापूर येथे त्यांनाही कॉलऱ्याची लागा झाली होती. तिथेच त्यांचे निधन झाले.
गॉर्डन हॉल यांचे निधन हे अमेरिकन मिशनला मोठा धक्का होता. मात्र त्यामुळे अमेरीकन मिशन बोर्डाचे येथील काम थांबले नाही. त्यानंतर अमेरीकेतून अनेक मिशनरी भारतात येत राहिले, धर्मप्रसाराबरोबरच येथे शिक्षणकार्य आणि सामाजिक कार्य करत राहिले.
हॉल यांच्या निधनानंतर पुढल्याच वर्षी म्हणजे १८२७ साली पहिल्या अमेरिकन अविवाहित महिला मिशनरीचे मुंबईत आगमन झाले.
या मिस सिंथिया फरार यांच्या अहिल्यानगर येथील तब्बल तीन दशकांच्या शिक्षणकार्याची आतापर्यंत आपल्याला ओळख झालेली आहेच.

Camil Parkhe March 25, 2026


 



गॉर्डन हॉल हे नाव तसे फारसे परिचीत नाही. ते नाव परिचित असण्याची शक्यता कमीच आहे, याचे कारण या अमेरिकन व्यक्तीला भारतात कार्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी मिळाला.
मात्र या अल्प कालावधीत गॉर्डन हॉल आणि त्यांच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी सहकाऱ्यांनी मुंबईत आणि भारतात एका नव्या पर्वाची मुहूर्तवेढ रोवली.
आधुनिक भारताचा इतिहास गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नामोल्लेखावाचून पूर्ण होऊ शकत नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे व्याकरण, शब्दकोश तसेच गद्य शुद्धलेखन त्याशिवाय या भाषेतील पुस्तकांची छपाई याबाबतीत परदेशी लोकांनी फार मोलाचे योगदान केलेले आहे.
विल्यम कॅरी, जेम्स थॉमस मोल्स्वर्थ, मेजर थॉमस कँडी यांची नावे यासंदर्भांत घेतली जातात. याच काळात भारतात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत पायाभूत स्वरुपाचे कार्य करणारी व्यक्ती म्हणून गॉर्डन हॉल यांचा उल्लेख करता येईल.
आधुनिक काळातील ते एक आद्य अमेरिकन मिशनरी होते.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या गॉर्डन हॉल यांनी कॉलऱ्याच्या भीषण साथीत नाशिकच्या परिसरात आजारी लोकांना औषधोपचार केले आणि त्यावेळी त्यांनाच या रोगाची लग्न होऊन नाशिकजवळ दोडी दापूर येथे वयाच्या अवघ्या ४१ वर्षी २० मार्च १८२६ रोजी त्यांचे निधन झाले.
मुंबईत पहिल्यावहिल्या आधुनिक पद्धतीच्या शाळा स्थापन करणाऱ्या तसेच १८२४ साली मुलींची पहिली शाळा सुरु करणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरीचे या शुक्रवारी, दिनांक २० मार्चपासून द्विशताब्दी स्मृतीवर्षे सुरु होत आहे.
मुंबई बंदरात १२ फेब्रुवारी १८१३ रोजी हार्मनी या बोटीतून तीन अमेरिकन प्रवासी उतरले. हे प्रवासी होते अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट.
भारतात आलेले हे पहिले अमेरिकन मिशनरी होते. काही काळानंतर अमेरिकेतून कॅरॅव्हान या जहाजाने रोजी अँडोनिराम जडसन आणि सॅम्युएल न्यूवेल हे भारतात आले.
या मिशनरींच्या आगमनाने भारतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
पश्चिम भारतात अमेरिकन मराठी मिशन स्थापन करुन पुढे त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि इतर क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले.
ब्रिटिश संसद दर दहा वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण करत असे.
त्यानुसार त्याकाळात मुंबईत आणि भारतात ख्रिस्ती मिशनरींना कार्य करण्याची मुभा नव्हती.
असे असले तरी मुंबईत काम करण्याच्या या मिशनरींचा दृढ निर्णय होता.
मुंबईत आल्याक्षणी त्यांनी इथली मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरु केला.
सॅम्युएल नॉट यांनी ५ मार्च १८१३ रोजी आपल्या आईवडलांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते :
``आमची परिस्थिती अनिश्चित असली तरी आम्ही मराठी भाषेचा अभ्यास सुरू करीत आहोत. आम्ही दृश्यावर विसंबून नव्हे तर विश्वासावर चालत आहोत. एक फार बोलघेवडा काळा माणूस आमच्यासोबत बसून दररोज तीन-चार तास आम्हाला ही भाषा शिकवत आहे.”
गार्डन हॉल आणि नॉट या दोघांनी अमेरिकन मिशन बोर्डाच्या सेक्रेटरीला १७ मार्च १८१३ रोजी एक पत्र लिहून त्यात म्हटले होते:
`` “येथे राहण्याची आमची आशा इतकी दृढ आहे की आम्ही लगेचच मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.”
मुंबईत राहिल्यानंतर व मराठी भाषा शिकल्यानंतर हॉल व नॉट यांनी १८१५ मध्ये एक इंग्रजी शाळा काढली. त्यात २५ मुले शिकत होती. याशिवाय दोन मराठी शाळांत ४० मुले होती.
सुरुवातीला त्यांना शिक्षक मिळण्यास अडचण पडली, पण पुढे दोन ब्राह्मण शिक्षक त्या मराठी शाळांत शिकवू लागले. पुढल्या वर्षी या शाळांची संख्या वाढली व एकूण ३०० विद्यार्थी झाले.
सन १८१८ मध्ये अमेरिकन मिशनच्या अकरा शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.
या अमेरिकन मिशनरींनी मुंबईतच १८२४ साली मुलीची पहिली शाळा सुरु केली.
आधुनिक काळात मुंबईत आलेल्या या आद्य मिशनरींना मराठी भाषा शिकण्यात असंख्य अडचणी आल्या.
याचे कारण म्हणजे तोपर्यंत मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करण्यात आले नव्हते.
पुढील काळात जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी मराठीचे व्याकरण आणि शब्दकोश रचले, त्यामुळे नंतरच्या काळातल्या मिशनरींना आणि ईस्ट इंडिया कंपनी अधिकाऱ्यांना मराठी भाषा शिकणे अधिक सोपे झाले.
अमेरिकन मिशनचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे धर्मप्रसारासाठी त्यांनी लहानसहान पुस्तिका लिहिण्यास सुरुवात केली, बायबलच्या मराठी भाषांतराचे काम तातडीने सुरु केले.
ही पुस्तके छापण्यासाठी मुंबईत लाकडी छापखानासुद्धा सुरु केला.
त्यासाठी मराठी भाषेतील टाईप किंवा फॉन्ट्स तयार केले. हे खूपच मेहनतीचे आणि पायाभूत स्वरूपाचे काम होते याबद्दल शंकाच नाही.
त्यासाठी आद्य मिशनरींना श्रेय द्यायलाच हवे.
`ए स्क्रिप्चर ट्रॅक्ट' ( A Scripture Tract ) ही अमेरिकन मिशनने धर्मासंबंधी १८१७ साली छापलेली पहिलीच पुस्तिका किंवा ट्रॅक्ट होय. ती पुस्तिका बहुधा गॉर्डन हॉल यांनी तयार केलेल्या पुस्तिकांपैकी एक होती.
ही पुस्तिका आठ पानांची होती आणि १० मार्च १८१७ रोजी ती छापखान्यात छापण्यात आली. त्या आवृत्तीच्या १५०० प्रती छापण्यात आल्या होत्या.
याच घटनेतून मराठी ख्रिस्ती साहित्याची सुरुवात झाली अशी माहिती रेव्हरंड ब्रूस यांनी दिली आहे असे श्री. म. पिंगे यांनी लिहिले आहे.
मुंबईत छापखान्याची उभारणी झाल्यानंतर बायबलच्या नव्या कराराचे भाषांतर १८२६ मध्ये प्रसिद्ध झालें.
अमेरिकन मिशनचे हे मराठी बायबल गॉर्डन हॉल, सॅम्युएल न्यूवेल, होरेंशिओ बार्डवेल, जॉन निकोलस व अँलन ग्रेव्हज् या मिशनरींनी केले. यापैकी बार्डवेल १८१६ मध्ये व ग्रेव्हज् हे १८१८ मध्ये भारतात आले होते.
या पाच मिशनरींपैकी सॅम्युएल न्यूवेल १८२१ मध्ये, जॉन निकोलस १८२४ मध्ये मरण पावले. होरेंशिओ बार्डवेल १८२१ मध्ये अमेरिकेस परत गेले, अँलन ग्रेव्ह्ज १८४३ पर्यंत कार्य करून महाबळेश्वर येथे मरण पावले.
``या पाचही मिशनरींनी मृत्यूचा धोका पत्करूनसुद्धां बायबलच्या भाषांतराचे कार्य पुरे केले,'' असे त्यांच्याविषयी वर्णन श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या ग्रंथात केले आहे.
ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांशिवाय गॉर्डन हॉत यांनी तीन शिक्षणविषयक पुस्तके लिहिली होती. लेकरांची पहिली पोथी (First Book of Children) हे सोळा पानांचे पुस्तक १८१८ साली छापण्यात आले.
अमेरिकन मिशन मालेमधील हे पहिल्या क्रमांकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक एका बाजूला बालबोधमध्ये व दुसऱ्या बाजूला मोडी लिपीत छापले होते.
या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी निघाल्या व या सर्व आवृत्या मिळून दहा लाख तरी प्रती सपल्या असतील, असा रे. ब्रूस यांचा अंदाज आहे. या पुस्तकाच्या १८२८ व १८२९ साली स्कॉटिश मिशनरींच्या बाणकोट मिशनने दोन आवृत्त्या काढल्या.
ट्रॅक्ट सोसायटीनेसुद्धां १८३०, १८३१, १८३२, १८३३, १८२४ १८३५ साली सहा आवृत्त्या काढल्या. पुढे १८३७, १८४१ व १८४४ मध्ये बालबोध व मोडी लिपीत हे पुस्तक प्रकाशित करण्यांत आले असे श्री. म. पिंगे यांनी नमूद केले आहे.
गॉर्डन हॉल यांनी पुण्यातसुद्धा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला होता याचा उल्लेख पिंगे यांनी या ग्रंथात केला आहे.
मिशन छापखान्यात छापलेली मराठी पुस्तके आणि हिंदुस्थानी भाषांतील पुस्तके पुण्यात वाटण्यासाठी १८२३ साली गॉर्डन हॉल यांनी दोन नोकरांना पुण्यात पाठवले होते.
त्यांच्याबरोबर हॉल यांनी शिफारसपत्रे सुद्धा दिली होती त्यात म्हटले होते:
"This is to certify that the bearers hereof viz. Samuel and Benjamin Jews have been in our employ as school masters for several years. They are now furnished by us with a small quantity of Mahratta and few Hindoostanee books, which they are authorised to distribute gratuitously to such persons as may desirous of receiving them.
पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन् यांनी मुंबईतील कंपनी सरकारला पत्राद्वारे कळविले की ही धार्मिक पुस्तके वाटण्यास सरकारची मदत आहे अशी लोकांची समजूत झाली आहे व ती सरकारला हानिकारक होईल.
कलेक्टर रॉबर्टसन् यांनी त्या दोघांना पकडले व त्यांना त्यांच्या पुस्तकांसह घाटाखाली हद्दपार केले.
पुण्याचे कमिशनर चॅप्लिन यांनी मुंबई सरकारचे मुख्य सेक्रेटरी न्यूनहॅम यांना यासंबंधी कळविलें की धार्मिक पुस्तकांच्या वितरणाने कंपनी सरकारबद्दल लोकांमध्ये भिती निर्माण होईल.
मिशनरींच्या या कामाला पायबंद घालणें आवश्यक आहे, असेही त्यांनी सुचविले होते.
याबाबत कंपनी सरकारने गॉर्डन हॉल यांना कळवले तेव्हा गॉर्डन हॉल, निकोलस व अँलन ग्रेव्हज या तीन मिशनरींनी आपली बाजू मांडून सांगितले कि असे करणे काही आक्षेपार्ह नाही व पेशव्यांच्या काळापासून आपण धार्मिक पुस्तके वाटत आहोत आणि भारतातही ती वाटली जातात.
मार्च १८२६ मध्ये नाशिक परिसरात कॉलऱ्याची तीव्र साथ असताना तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी गॉर्डन हॉल थांबले होते.
वैद्यकीय प्रशिक्षण असल्याने आजारी लोकांना त्यांनी औषधे दिली. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
तिथेच त्यांची एक दगडी समाधी बांधण्यात आली होती.
March 20, 2026 दोनशेव्या स्मृतिदिनानिमित्त गॉर्डन हॉल यांना आदरांजली.

Camil Parkhe March 19, 2026


Sunday, January 25, 2026


सिन्नर-नाशिक मार्गावर दोडी दापूर हे गाव आहे. चारेक वर्षांपूर्वी या गावाचे नाव पहिल्यांदा एका ऐतिहासिक इंग्रजी दस्तऐवजात वाचले आणि एकदा या गावाला भेट ध्यायलाच हवी असे ठरवले.

दोडी दापूर या गावाला भेट देऊन तिथे एक स्मृतीफलक पाहायचा होता.
जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी तो स्मृतिफलक पाहण्याचा योग अगदी योगायोगाने आला.
गॉर्डन हॉल हे अमेरिकन मिशनरी ब्रिटिश भारतात येणारे एक पहिलेच मिशनरी.
१२ फेब्रुवारी १८१३ रोजी एक गलबत मुंबई बंदराला लागले आणि त्यातून चार अमेरिकन मिशनरी उतरले. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट, त्यांच्या पत्नी मिसेस नॉट आणि ल्युथर राईस हे ते चार मिशनरी.
त्यांच्या आगमनाने या देशात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते. आणि या उद्दिष्ट्याला तत्कालीन राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनीचा - सक्त विरोध होता.
या मिशनरींच्या सुदैवाने त्याच वर्षी १८१३च्या जुलैत ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण केले आणि त्यानुसार मिशनरींना भारतात येण्याची आणि काम करण्याची मुभा देण्यात आली.
या अमेरिकन मिशनने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडली. गंगाबाई या नावाची एक स्थानिक तरुणी या शाळेत शिकवत असे. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली.
या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली.
गॉर्डन हॉल यांचा विवाह मुंबईतच १९ डिसेंबर १८१६ रोजी मार्गारेट लुईस यांच्याशी झाला. अमेरीकन मिशनच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत गेली.
१८१८ पर्यंत त्यांच्या अकरा शाळा होत्या, या शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.
या परदेशी मिशनरी कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूंचे दुःख सहन करावे लागले. प्रत्येक घरात एकतरी अपत्याचे निधन झाले होते. १८३२ पर्यंत जन्मलेल्या ३० अपत्यांपैकी १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती.
इथल्या आरोग्याच्या समस्येमुळे गॉर्डन हॉल यांच्या पत्नीने आपल्या मुलांसह अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीलासुद्धा त्यांनी तसा आग्रह केला, मात्र मायदेशी जाण्यास हॉल यांनी नकार दिला.
गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज ए. हॉल अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त १९१३ साली मुंबईत मिशनरी म्हणून आले तेव्हा त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे वर्णन केले आहे.
ईस्ट इंडिया कंपनी सरकारने मिशनरींना मुंबईबाहेर घाटापलीकडे जाऊन मिशनकार्य करण्यास परवानगी दिली नव्हती. पुण्यातील पेशवाई नुकतीच संपली होती आणि दख्खनसारख्या संवेदनशील परिसरात कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्यास कंपनी सरकार तयार नव्हते.
गॉर्डन हॉल यांनी नोव्हेंबर १८२४ मध्ये त्यांनी एक शोधयात्रा हाती घेतली.
आजारपणाच्या काळात मिशनरी कुटुंबांना स्थलांतर करता येईल, असे एखादे योग्य ठिकाण पर्वतरांगांमध्ये आहे का हे पाहण्यासाठी ते बोटीने कोकणात बाणकोट येथे गेले.
तिथे आधीच स्थायिक झालेल्या स्कॉटिश मिशनरींनी त्यांचे स्वागत केले. तेथून नदीमार्गे महाडला जाऊन त्यांनी एक घोडा मिळविला आणि त्या घोड्यावरून पोलादपूर गाठले, नंतर घाट चढून महाबळेश्वर येथे पोहोचले.
गॉर्डन हॉल हे नियमितपणे रोजनिशी लिहीत असत. हॉल यांनी आपल्या या रोजनिशीत महाबळेश्वर येथील मंदिरे आणि पाच नद्यांचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या झऱ्याविषयी नोंदी केल्या आहेत.
तेथील हवामान उत्कृष्ट असल्याचे त्यांना आढळले; मात्र अन्नसामग्री व इमारती महाग होत्या, तसेच तेथे पोहोचण्याचे अंतर व अडचणी पाहता, एखाद्या मिशनरी कुटुंबाचे तेथे स्थलांतर करणे खर्चिक ठरेल, असे त्यांना वाटले.
यानंतर काही वर्षे उलटल्यावरच आरोग्य सुधारण्यासाठी मिशनरी महाबळेश्वरला जाऊ लागले.
लवकरच मिशनरींच्या प्रवासांवरील सरकारी निर्बंध शिथिल झाले.
मार्च १८२६ मध्ये हॉल आपल्या दोन तरुण सहकाऱ्यांसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे जाण्यास निघाले. तेथे कॉलऱ्याची तीव्र साथ असल्याने ते काही दिवस तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी थांबले; त्यांनी आजारी लोकांना औषधे दिली, पुस्तके वाटली आणि उपदेशसुद्धा केला.
मुंबईच्या परतीच्या प्रवासात, दोडी दापूर या गावात रात्री विश्रांती घेत असताना त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी त्यांचे निधन झाले.
ब्रिटिश अमदानीत सर्वप्रथम मुलांमुलींसाठी शाळा सुरु करणारे आद्य मिशनरी गॉर्डन हॉल यांचे निधन हा अमेरिकन मराठी मिशनला मोठा धक्का होता.
``तो आवडता शिष्य, उत्कृष्ट मिशनरी आणि एक आद्य कार्यकर्ता होता', अशा शब्दांत गॉर्डन हॉल यांचे वर्णन करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी त्यांचे दफन करण्यात आले, तेथे काही वर्षांनी तेथे एक दगडी समाधी बांधण्यात आली. मिशनरी ऍलन ग्रेव्ह्ज यांनी या समाधीला भेट दिल्यानंतर तेथे एक संगमरवरी स्मृतीफलक उभारण्यात आला. त्यावर पुढील इंग्रजी आणि मराठी मजकूर कोरलेला होता :
``Rev. Gordon Hall, Miss'y
Died March 20, 1826, Aged 41
ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित गॉर्डन हॉल येथे पुरला आहे. हा एकट्याच देवाची भक्ती व त्याच्या एकल्या अवताराकडून तारण ही सांगायास येथे फिरत होता. या तारणाविषयी तुम्ही शोध करा. तुम्हासही पाहिजे. ''
सिन्नर तालुक्यातील दोडी दापूर इथला हाच स्मृतीफलक मला पाहायचा होता.

नाशिकमधील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन संपल्यानंतर पुण्याला कारने परतताना त्यासाठी वाटेत दोडी दापूर येथे थांबण्याचा माझा इरादा होता.
त्यावेळी मंडपात असलेल्या नाशिकचे रेव्हरंड गिरीश भालतिडक यांच्याकडे मी सहज त्या स्मृतीफलकाचा विषय काढला.
त्यावर त्यांचे उत्तर ऐकून मी उडालोच.
``दाखवतो तुम्हाला मी तो स्मृतीफलक. माझ्या घरीच आहे तो.''
त्यानंतर भालतिडक यांनी त्या आद्य मिशनरींच्या स्मृतीफलकाची कथा सांगितली.
दहा वर्षांपूर्वी दोडी दापूर येथील कबरस्थानातील तो संगमरवरी स्मृतीफलक उखडून टाकला आहे असे त्यांच्या कानावर आले होते. त्यानंतर या गावी जाऊन तो स्मृतीफलक शोधण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले.
अखेरीस एका माणसाने त्या स्मृतीफलकाचे तुकडे जपून ठेवल्याचे त्यांना कळाले. त्या माणसाचा शोध घेऊन भालतिडक यांनी स्मृतीफलकाचे ते तीनचार तुकडे मिळवले होते. आणि ते जोडून आपल्या घरी ठेवले होते.
हे ऐकून तातडीने मी भालतिडक यांच्यासह त्यांच्या शरणपुरातील घरी पोहोचलो आणि तो स्मृतीफलक पाहिला.
त्यावरील वाक्ये पाहिली.
अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दीग्रंथात त्या स्मृतीफलकाविषयी लिहिलेले मी वाचले असल्याने आणि तसेच गॉर्डन हॉल यांच्या तिथल्या अखेरच्या क्षणाचे चित्र या ग्रंथात असल्याने मला मात्र त्या फलकावरील शब्दांची संगत लागली होती.
पुण्यात घरी आल्यावर लगेचच मी अमेरिकन मिशनचा तो शताब्दीग्रंथ पुन्हा चाळला आणि त्या स्मृतीफलकाविषयी लिहिलेले पुन्हा एकदा वाचून काढले.
गॉर्डन हॉल यांच्या त्या स्मृतीफलकाला योग्य ती जागा लाभो हिच इच्छा.

Camil Parkhe




Thursday, November 27, 2025

रेस कोर्सनजिक असलेल्या सेंट पॅट्रिक्ट्स कॅथेड्रल्समध्ये जाऊन पुण्याचे नवनिर्वाचित बिशप फादर सायमन अल्मेडा यांची आज सकाळी सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या असलेल्या आणि दिडशे वर्षांचा इतिहास असलेल्या पुणे कॅथोलिक धर्मप्रांताचे किंवा डायोसिसचे ते आठवे बिशप असतील.
पुणे डायोसिसची स्थापना १८८६ साली झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत धर्मप्रांताचे पहिले दोन बिशप जर्मन होते.
कॅथोलिक धर्मप्रांताचे बिशप या पदाचे महत्त्व आणि अधिकार चर्चबाहेरच्या इतरांना सहसा माहित नसतात.
बिशप हे त्यांच्या डायोसिसमधील असलेल्या सर्व धर्मप्रांतीय शैक्षणिक संस्था - शाळा-कॉलेजेस, दवाखाने, सामाजिक आणि धर्मादाय संस्था यांचे व्यवस्थापकीय प्रमुख असतात.
आताच्या पुणे डायोसिसमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली महसूल जिल्हे आणि कोल्हापूर शहर यांचा समावेश होतो.
एके काळी म्हणजे बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांच्या कारकिर्दीच्या काळात १९८७ पर्यंत पुणे धर्मप्रांतात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारपासून कोकणातील रत्नागिरीपर्यंतचा भाग समाविष्ट होता.
गेल्या काही दशकांत नाशिक आणि नंतर सिंधुदुर्ग नवे धर्मप्रांत निर्माण झाल्याने पुणे धर्मप्रांताचे क्षेत्र कमी झाले आहे.
बिशप जॉन रॉड्रिग्स यांची मुंबई सर्वधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून निवड झाल्याने हे पद गेले एक वर्षभर रिक्त होते.
त्याआधी थॉमस डाबरे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण होईपर्यंत पुण्याचे बिशप होते.
प्रत्येक कॅथोलिक व्यक्तीचा त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी बिशपांशी संपर्क आलेला असतोच.
याचे कारण कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार (सांक्रामेंत ) देण्याचा अधिकार केवळ बिशपांना असतो.
काही वर्षांपूर्वी फादर सायमन अल्मेडा आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चचे पाच वर्षे धर्मगुरु होते.
कॅथोलिक चर्चच्या अखत्यारीतल्या चर्चमधील धर्मगुरूंची आणि शाळांच्या प्राचार्यांची ठरविक काळानंतर बदली होत असते.
कॅथोलिक चर्चचे जगभर पसरलेले जाळे, या चर्चच्या विविध संस्थांचे विविध समाजघटकांत चालू असलेले कार्य आणि या चर्चचे व्यवस्थापन हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि अतिशय कुतूहलाचा विषय आहे.
चर्चसारखे नेटवर्क असलेली जगात इतर कुठलीही संस्था वा संघटना नसावी.
फादर सायमन अल्मेडा यांच्या बिशपपदाची घोषणा पोप लिओ चौदावे यांच्याकडून व्हॅटिकन सिटीमधून, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाकडून दिल्लीतून आणि पुण्यातील सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमधून एकाच दिवशी आणि एकाच क्षणी व्हावी, त्या घोषणेवेळी चर्चबेलचा घंटानादही व्हावा, या घटनेतून चर्चच्या जागतिक नेटवर्कची थोडीबहुत कल्पना यावी.
मी स्वतः गोव्यात जेसुईट फादर होण्यासाठी काही वर्षे उमेदवारी केली असल्याने कॅथोलिक चर्चच्या कामकाजाची आणि नियमांची मला थोडीफार माहिती आहे.
नूतन वर्षांरंभात फादर सायन अल्मेडा यांचा बिशप म्हणून दीक्षाविधी होईल.
नवनिर्वाचित बिशपांना शुभेच्छा !

Camil Parkhe


Tuesday, September 3, 2024

 

आज त्याच पुस्तक प्रदर्शनाला तिसऱ्यांदा भेट दिली. पहिल्या दोन भेटी घाईघाईत होत्या. आज अगदी आरामात अनेक कक्षांतील पुस्तके दोनदातिनदा नजरेखाली घातली, बऱ्याच पुस्तकांतला मजकूर चाळला.
पुस्तक प्रदर्शनात नेहेमीचेच यशस्वी प्रकाशक कलाकार होते आणि नेहेमीचेच लेखक आणि त्यांची ती पुस्तके होती.
अशाप्रकारच्या लोकप्रिय पुस्तक प्रदर्शनांत वेगवेगळी चव असणाऱ्या बहुतांश वाचकांना आवडतील अशीच पुस्तके असतात. हे प्रदर्शन त्यास अपवाद नव्हते.
मी वेगवेगळ्या प्रकारची अनेक मराठी पुस्तके - चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य, विनोदी साहित्य , ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या - खूप आवडीने वाचल्या ते श्रीरामपुरात दहावीपर्यंत शिकत असताना.
तिथल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात हे सगळे वाचन झाले. त्यानंतर मी गोव्याला गेलो, तेथे मी इंग्रजी शिकलो आणि इंग्रजी साहित्याकडे आणि पत्रकारितेकडे वळलो ते आजतागायत.
आज या पुस्तक प्रदर्शनात दिडेक तास वावरताना मला ती माझ्या ओळखीचे अनेक साहित्यिक आणि पुस्तके भेटली.
वि. स. खांडेकर, साने गुरुजी, ग. दि. आणि व्यंकटेश माडगूळकर, शिवाजी सावंत, इरावती कर्वे, पुल देशपांडे, दुर्गा भागवत, व.पु. काळे, गो. नि दांडेकर, आचार्य अत्रे आणि धनंजय कीर .
ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकांत अनेक मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या कलाकृती मी वाचलेल्या नाहीत. पण त्या पुस्तकांची आणि साहित्यिकांची मला तोंडओळख आहे.
आजच्या प्रदर्शनात ही पुस्तके नजरेसमोर आली आणि त्यांत मी डोकावून पाहिलेसुद्धा. मात्र आज ही पुस्तके माझ्याकडून वाचली जातील कि नाही अशी शंका येऊन ती पुस्तके पुन्हा रॅकवर ठेवली.
काही नवी पुस्तके नजरेत भरली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे 'देवळांचा धर्म' हेच पुस्तक गेली अनेक वर्षे ठिकठिकाणी दिसायचे, आता त्यांचे ''माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र , 'दगलबाज शिवाजी' असे चकित करणारे शीर्षक असलेले पुस्तक आणि इतरही पुस्तके नव्याने बाजारात आली आहेत.
मला हवे असलेले प्रबोधनकारांनी लिहिलेले पंडिता रमाबाई यांचे चरित्र मात्र मला मिळाले नाही.
अशी अनेक चांगल्या दर्जाची असलेली मराठी पुस्तके विविध कारणांमुळे दुर्मिळ होत चालली आहेत. मागच्याच आठवड्यातील एक गोष्ट सांगतो.
नाशिक येथे १८३०च्या आणि १८४०च्या दशकांत मुलींच्या शाळा चालवणाऱ्या मिसेस कॅरोलिन फरार यांचे 'चमत्कारिक गोष्टी' हे अनुवादित पुस्तक फार लोकप्रिय झाले,
`The Ayah and Lady. An Indian Story' या Mary Martha Sherwood यांच्या पुस्तकाचा अनुवाद.
या मराठी पुस्तकाच्या अनेक आवृत्त्याही छापल्या गेल्या होत्या. मिशनरी शाळांत हे पाठ्यपुस्तक म्हणून शिकवले जायचे.
'चमत्कारिक गोष्टी' या पुस्तकाबाबत मी अनेक जाणकार व्यक्तींकडे चौकशी केली, तर या पुस्तकाचे नावदेखील त्यांनी ऐकले नव्हते !.
नरहर कुरुंदकर यांची अनेक पुस्तकेसुद्धा आता नव्याने प्रकाशित झाली आहेत. साने गुरुजी यांनी अनुवादित केलेली विल ड्युरांत यांचे 'पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास' हा ग्रंथसुद्धा एक नवी भर आहे.
लोकप्रिय स्वरूपाच्या पुस्तक प्रदर्शनांत ठराविक प्रकाशन संस्थाचाच सहभाग असतो. त्यामागे आर्थिक गणित असतेच.
विविध प्रकारच्या मराठी साहित्य संमेलनांत भरणाऱ्या आणि पुस्तक प्रदर्शनांत पुस्तकप्रेमी लोकांना मोठे घबाड मिळत असते.
यावेळी अ भा. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्लीत होणार आहे. तिथे याबाबाबत काय परिस्थिती असेल हे आताच सांगता येणार नाही.
Camil Parkhe, August