Showing posts with label Niropya. Show all posts
Showing posts with label Niropya. Show all posts

Wednesday, January 14, 2026

नाशिक येथे भरलेल्या तीन दिवसीय सत्ताविसाव्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे रविवारी अकरा जानेवारी रोजी सूप वाजले.

कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली बाळ येशू देवालय प्रांगणात अगदी उत्साहात पार पडलेल्या या संमेलनाचा हा थोडक्यात वृत्तांत.
या संमेलनात अनेक लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी भाग घेतला. साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ संपादक-लेखक उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष फादर एरॉल फर्नांडिस, वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसूझा यांची भाषणे झाली.
संमेलनाच्या मंचाला `फादर फ्रान्सिस दिब्रिटो विचारपीठ' असे नाव देण्यात आले होते. फादर दिब्रिटो यांचे २०२० साली निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच हे मराठी साहित्य संमेलन भरत होते.
फलकावर एका बाजूला फादरांचे आणि दुसऱ्या बाजूला कविवर्य कुसुमाग्रज यांची छायाचित्रे होती. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला रेव्ह. नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांची नावे देण्यात आली होती.
मंचावर एका अग्रस्थानी संविधानाची उद्देशिका ठेवण्यात आली. संमेलनाच्या सुरुवातीलाच या उद्देशिकेचे जमलेल्या सर्वांनी सामुदायिक वाचन केले.
साहित्य संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांच्या लिखित भाषणाच्या प्रती श्रोत्यांमध्ये वाटल्या होत्या, मात्र त्याशिवाय मार्टिन यांनी यावेळी उत्स्फूर्त मनोगत म्हणून उपस्थितांची मने जिकली.
संमेलनाच्या समारोपाच्या आपल्या भाषणात उत्तम कांबळे यांनी मार्टिन यांचे मनोगत `सर्वोत्तम' असे वर्णन केले.
साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले. कार्यक्रमस्थळी नुरील भोसले आणि सुनिल डिमेलो यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
संमेलनात झालेल्या विविध परिसंवादांत नितीन सरदार, डॉ सुरेश पठारे, दिलीप नाईक, नीलीमा बंडेलू, फादर आयवो कोयलो, `सुवार्ता' मासिकाचे संपादक फादर जोएल डिकुन्हा. आशिष शिंदे, सुहासिनी जाधव, वॉल्टर कांबळे, राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा कांदळकर, माजी सनदी अधिकारी बी जी वाघ वगैरेंनी भाग घेतला.
आजकाल कुठलीही `इव्हेन्ट’ असली कि तिथे सेलिब्रिटी लोकांबरोबर सेल्फी आणि फोटो घेतले जातात. इथे सेलेब्रिटी नसले तरी काही नामांकित व्यक्ती होत्या. या संमेलनात एका व्यक्तींबरोबर फोटो घेण्यासाठी काही जणांनी रांग लावली होती.
ही व्यक्ती म्हणजे `सुताराचा पोर' ही कादंबरी लिहिणारे सनी पाटोळे.
येशू ख्रिस्तावर आधारीत `सुताराचा पोर', `मुक्तिदाता मोशे', आणि राष्ट्रपिता अब्राहाम, योहान (जॉन) असे जाडजूड चरित्रग्रंथ त्यांच्या नावावर आहेत आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनसारख्या नामवंत संस्थेने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.
या सर्व कादंबऱ्यांतील सर्व पात्रे आणि कथानक अर्थात बायबलमधील आहेत.
सध्या त्यांनी नवी कादंबरी लिहायला घेतली आहे.
डोक्यावर पूर्ण सफेद केशसंभार आणि तशीच चंदेरी दाढी आणि वयोमानानुसार चालण्यावर आलेले बंधन असे व्यक्तिमत्व असलेल्या सनी पाटोळे यांनी आपल्या मनोगतातून श्रोत्यांची मने जिंकली.
आपल्या भाषणात सनी पाटोळे (वय ८६) यांनी कॉन्टिनेटल प्रकाशनाने त्यांची `सुताराचा पोर' ही कादंबरी प्रकाशनासाठी कशी स्वीकारली याची रंजक माहिती दिली.
आपल्या भाषणात सनी पाटोळे यांनी कॉन्टिनेटल प्रकाशनाने त्यांची `सुताराचा पोर' ही कादंबरी प्रकाशनासाठी कशी स्वीकारली याची रंजक माहिती दिली.
या साहित्य संमेलनात जमलेल्या श्रोत्यांची सर्वाधिक दाद मिळवणारा एक कार्यक्रम म्हणजे 'निमंत्रितांशी ऐसपैस गप्पा'.
ऑस्ट्रेलियात राहून वसईशी आणि मराठी भाषेशी आपली नाळ कायम राखणारे उद्योजक रिचर्ड नुनीस आणि कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी यशस्वी सामना देणारे मधुमेहतज्ज्ञ आणि हृदयविकारावर उपचार करणारे एम.डी. डॉक्टर विनीत वानखेडे यांच्याशी या सत्रात खुद्द संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांनी संवाद साधला.
जेसुईट फादर आणि `निरोप्या' मासिकाचे माजी संपादक ज्यो गायकवाड सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.
या संमेलनात पूर्वी कधीही न भेटलेल्या अनेक लोकांच्या गाठीभेटी झाल्या. विशेष नवलाची बाब म्हणजे यापैकी काही लोक मला `निरोप्या' मासिकात नियमितपणे लिहिणारा लेखक म्हणून ओळखत होते.
या संमेलनात फादर फ्रान्सिस कोरिया, सनी पाटोळे आणि मुक्ता अशोक टिळक यांचा सन्मान करण्यात आला. `गझल'कार रमण रणदिवे उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या चिरंजीवाने हा सन्मान स्वीकारला.
संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस वाघमारे यांचा 'आदर्श कार्यकर्ता' म्हणून सन्मान करण्यात आला.
संमेलन यशस्वी होण्यासाठी वॉल्टर कांबळे, गिरीश भालतिडक, अंतोन भोसले, अरुण त्रिभुवन, माया त्रिभुवन, रोहिणी पंडित, सुहासिनी जाधव दिवाने, अर्जुन दारोळे फिलोमिना बागुल, वगैरे स्थानिक कार्यकर्त्यांनी हातभार लावला होता
कुठलेही साहित्य संमेलन म्हटले कि पुस्तकांचे स्टॉल्स असायला हवेच. जॉर्ज काळे यांच्या व्हाईट लाईट पब्लिकेशन्सचा या साहित्य नगरीत एकमेव बुक स्टॉल होता.
नाशिकच्या या सत्ताविसाव्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला माझे `शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' हे पुस्तक छापून माझ्या हाती पडले होते.
या संमेलनात विक्रीसाठी बरोबर नेलेल्या पुस्तकांपैकी केवळ एक प्रत शिल्लक राहिली.
देवदत्त नारायण टिळक यांनी लिहिलेले 'महाराष्ट्राची तेजस्विता पंडिता रमाबाई' हे चरित्र `ऑल टाइम बेस्ट सेलर' आहे हे या बुक स्टॉलवरील विक्रीवरून दिसून आले.
नाशिक येथे भरलेले हे तिसरे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन.
पहिले `महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलन' या गोदावरीच्या काठावर असलेल्या शहरातच शंभर वर्षांपूर्वी १९२७ साली रेव्हरंड निकोल मॅक्नीकल यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
त्यानंतर पाऊण शतकाने २००० साली डॉ सिसिलिया कार्व्हालो यांच्या अध्यक्षतेखाली अठरावे साहित्य संमेलन येथील किलबिल विद्यालयात पार पडले होते. नंतर `निरोप्या' मासिकाचे संपादक झालेल्या फादर ज्यो. मा. पिटेकर त्यावेळी स्वागताध्यक्ष होते.
पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलन या नावाने भरले होते.
गेल्या शंभर वर्षांत या साहित्य संमेलनाची अनेक नामकरणे झाली आहेत. त्यानिमित्त वादविवादसुद्धा झाले आहेत.
यावेळीसुद्धा नामकरण झाले.
`अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन ' असे अधिक व्यापक, भारदस्त असे हे नामकरण आहे.

Camil Parkhe January 14, 2026


Tuesday, June 10, 2025

 


पुण्यातील शनिवार पेठेतील `स्नेहसदन' या जेसुईट फादरांच्या संस्थेच्या वतीने दिवंगत पोप फ्रान्सिस यांना अलीकडेच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शतक ओलांडलेल्या `निरोप्या' या मराठी मासिकाचे संपादक फादर भाऊसाहेब संसारे आणि माधवराव खरात यांनी आयोजित केलेल्या या श्रद्धांजली सभेला
पुणे, पिंपरी चिंचवड तसेच शेजारच्या नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक लोक आणि प्रगत पदवीधर संघटनेचे (पीपीएस) पदाधिकारी हजर होते.
यामध्ये पीपीएसचे सुधाकर सपकाळ, अंतोन कदम, जे डी आढाव, अर्चना आणि सुनील बोर्डे, रत्नाकर दोंडे आणि ऍडव्होकेट पी. एम संसारे , प्रेषित सोशल फौंडेशनचे सचिन औचारे, नाशिकचे वॉल्टर कांबळे. जयप्रकाश पारखे, `ज्ञानोदया'चे कार्यकारी संपादक कांतिश तेलोरे, सुनिता पारखे वगैरे होते.
पुणे येशूसंघीय (जेसुईट) प्रांताचे प्रांताधिकारी फादर आग्नेलो मस्करन्हेस, पुणे धर्मप्रांतीय व्यवस्थापक फादर रॉक अल्फान्सो, मेडिकल मिशन सिस्टर्स, बिबवेवाडी प्रमुख सिस्टर उषा गायकवाड (पोप फ्रान्सिस आणि स्त्रियांचा ख्रिस्तसभेमधील सन्मान व सहभाग) आणि मी स्वतः (कामिल पारखे ) यांचा वक्त्यांमध्ये समावेश होता.
या कार्यक्रमात सहभागी होण्यात मला खरोखर आनंद झाला.
जेसुईट फादर होण्यासाठी मी श्रीरामपूर सोडले १९७६ साली तेव्हा माझे गॉडफादर फादर प्रभुधर यांच्यासह येथे मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हापासून मी या संस्थेशी आजतागायत जोडले गेलेलो आहे.
हजारो ग्रंथ असलेल्या इथल्या ग्रंथालयात बसून मी महाराष्ट्र चरित्रकोशसह सातआठ पुस्तके लिहिली.
स्नेहसदन या संस्थेशी पुणेकरांचे फार जुने नाते आहे.
अनेक हौशी, प्रायोगिक मराठी नाटकांच्या तालमी येथे झालेल्या आहेत आणि पहिला अंक ( प्रवेश मूल्य ऐच्छिक ! ) येथेच झालेला आहे.
`स्नेहसदन'चे संस्थापक मॅथ्यू लेदर्ले यांच्या काळापासून नानासाहेब गोरे , पु. ल. देशपांडे, मोहन धारिया, मेधा पाटकर यांच्यासह अनेकांचा येथे नेहेमीच वावर होता.
फादर भाऊसाहेब संसारे यांनी सांगितले कि या वास्तूत पुन्हा एकदा कार्यक्रम आयोजित केले जातील.
या कार्यक्रमात हजर असलेल्या लोंकांचे हे छायाचित्र.
उजवीकडे कोपऱ्यात संस्थापक मॅथ्यू लेदर्ले यांचा फोटो आहे.

Camil Parkhe May 17, 2025



Wednesday, December 13, 2023


पुण्यात स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत महात्मा जोतिबा फुले शिकले, सावित्रीबाई यांनी स्कॉटिश मिशनरी मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अद्यापनाचे शिक्षण घेतले असा उल्लेख फुले दाम्पत्याचे अनेक चरित्रकार करतात.

हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या लेखी निवेदनात जोतिबा फुले म्हणतात की त्यांनी आपल्या शाळा मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या अन् या शाळा आजही (१८८२ साली ) चालू आहेत.
याच निवेदनात जोतिबा म्हणतात की ``ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे''.
या स्कॉटिश मिशन शाळेतील जोतिबा फुले यांचे शिक्षक कोण होते, फुले यांनी स्कॉटिश मिशन शाळेत काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली ती शाळा चालवणारे मिशनरी कोण याचा उल्लेख कुठल्याही फुले चरित्रांत चरित्रकार करत नाही.
जोतिबांनी सुरु केलेल्या शाळा पुढे चालवण्याची जबाबदारी घेणाऱ्या या मिसेस मिचेल कोण?
मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरु करणाऱ्या जोतिबांचा पुण्यात १८५०च्या दशकाच्या. सुरुवातीला जंगी सत्कार करण्यात आला, शालजोडीही भेट म्हणून देण्यात आली.
या कौतुक समारंभाला हजर असलेल्या शहरातील देशी विदेशी प्रतिष्ठित व्यक्तींची नावे त्याकाळच्या वृत्तपत्रांत झळकतात. फुले चरित्रांत ही नावे येतात, त्यामध्ये रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल ही नावे आहेत.
जोतिबांबरोबर या कामात त्यांना साथ देणाऱ्या सावित्रीबाई यांचाही या कार्यक्रमात सत्कार व्हायला हवा होता, तो झाला की.नाही हे आता कळणार नाही. हंटर आयोगातल्या निवेदनात हे शिक्षणकार्य आपल्या पत्नीच्या मदतीने केले असा सावित्रीबाईंना त्यांचे श्रेय देताना, त्यांचे ऋण मान्य करताना जोतिबा स्पष्ट उल्लेख करतात. जोतिबा या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात लिहितात:
``सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ ( १८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले. ’’
कोण आहेत हे जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल? काय म्हणून हे मिशनरी दांपत्य जोतिबांच्या सत्काराला उपस्थित होते?
हेच ते रेव्हरंड जेम्स मिचेल जोतिबांचे शिक्षक, ज्यांच्या स्कॉटिश शाळेत जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात इंग्रजी शिकले. ( जोतिबांचे हंटर कमिशनला दिलेले इंग्रजी निवेदन मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यांचे या भाषेवरील प्रभुत्व त्यातून दिसते.)
आणि जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मिचेल म्हणजे सावित्रीबाईंच्या शिक्षिका मिसेस (मार्गारेट शॉ ) मिचेल.
यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षकिणिचा (अद्यापनाचा ) अभ्यासक्रम पूर्ण केला ! याच मिसेस मिचेल यांनी जोतिबा दांपत्याने सुरू केलेल्या शाळा पुढे चालवल्या.
आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा असा भर मांडवात सत्कार होताना या मिशनरी मिचेल दाम्पत्याच्या भावना काय असतील याची आपण केवळ कल्पना करू शकतो.
स्कॉटलंडहून रेव्हरंड जेम्स मिचेल भारतात १८२९ साली आले. रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन आणि जेम्स मिचेल या दोघांनी पुण्यात स्कॉटिश मिशनचे कार्य पुण्यात १८३० साली सुरु केले, येथे शाळा सुरू केल्या.
याच शाळांत जोतिबा फुले, त्यांचे मित्र (आणि नंतर त्यांच्या समाजकार्यातले सहकारी) सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे यांचे शिक्षण झाले असे धनंजय कीर आणि इतर फुले चरित्रकार लिहितात.
जेम्स मिचेल यांच्या जोडीला पुण्यात नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल आले. तिथल्या संस्कृत कॉलेज (नंतर पूना कॉलेज आणि आताचे डेक्कन कॉलेजचे) प्रिन्सिपल किंवा व्हिझिटर बनले आणि जोतिबा फुले यांचे घनिष्ट स्नेही बनले.
जॉन मरे मिचेल यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्याकाळच्या सामाजिक स्थितीचा तो एक उत्तम दस्तऐवज आहे, मात्र फुले दाम्पत्याच्या बहुतेक चरीत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
जोतिबांच्या चरित्रातील उल्लेख होणाऱ्या `चटईचा विटाळ' आणि `वर्गातल्या अस्पृश्य विद्यार्थ्याना ढेकळाने मारणारे पंतोजी' वगैरे घटना या जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलेल्या आहेत.
अलीकडेच मी जोतिबा फुले यांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि सावित्रीबाई यांच्या अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर येथील शिक्षिका मिस सिंथिया फरारबाई यांचे चरित्र लिहिले.
आता जोतिबांचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल यांचेही चरित्र लिहिले आहे. हे चरित्र जेसुईट धर्मगुरूंच्या संस्थेतर्फे `स्नेहसदन', पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या `निरोप्या' मासिकाच्या या महिन्याच्या (डिसेंबर २०२३) नाताळ विशेषांकात प्रसिद्ध झाले आहे.
विशेष म्हणजे `निरोप्या' हे मराठी पत्रकारितेतील एक सर्वांत दीर्घायुषी (स्थापना १९०३) नियतकालिक आहे.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रावर आधारित त्यांचे सविस्तर चरित्र मी लिहिले आहे, तेसुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल.

Camil Parkhe

Tuesday, June 21, 2022

 `ज्ञानोदय'  मराठी भाषेतले सर्वाधिक दीर्घायुषी नियतकालिक May be an image of text

 
२० जून १८४२ रोजी - १८० वर्षांपूर्वी -  अहमदनगर येथे अमेरिकन धर्मगुरु रेव्ह. हेन्री बॅलेन्टाईन यांनी `ज्ञानोदय' हे मराठी नियतकालिक सुरु केले. 
 
त्याआधी दहा वर्षे आधी - १८३२ साली - बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतले पहिले वृत्तपत्र `दर्पण' सुरु केले होते. पण `दर्पण' अल्पायुषी ठरले. 
 
महात्मा जोतिबा फुले `ज्ञानोदय' नियतकालिकाचे एक वर्गणीदार होते. 
 
सावित्रीबाई फुलेंची विद्यार्थिनी मुक्ता साळवेचा " मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध', १८८५च्या ज्ञानोदय मासिकाच्या दोन अंकांमध्ये प्रसिद्ध झाला होता. 
 
`ज्ञानोदय' आजही पुण्यातून प्रसिद्ध होतो, त्यामुळे मराठी भाषेतले सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेले हे नियतकालिक आहे. अशोक आंग्रे हे विद्यमान संपादक आहेत. 
 
पुण्यातूनच प्रसिद्ध होणारे दैनिक `केसरी' आणि जेसुईट फादरांच्या (सोसायटी ऑफ जिझस किंवा येशूसंघ ) संस्थेतर्फे प्रकाशित होणारे 'निरोप्या' हे मासिक ही मराठीतील सर्वाधिक दीर्घायुषी नियतकालिके.
`ज्ञानोदय'चे संस्थापक संपादक अमेरिकन तर 'निरोप्या'चे संस्थापक-संपादक जर्मन, (पुणे डायोसिसचे) आर्चबिशप हेन्री डोरिंग !
 
ज्येष्ठ साहित्यिक डॉ अनुपमा उजगरे यांनी ज्ञानोदय च्या पहिल्या अंकातील संपादकीय आज येथे पोस्ट केले ते मी शेअर करत आहे. 
 
----
'ज्ञानोदय' पहिला अंक(अहमदनगर)
२० जून १८४२
संपा.रेव्ह.हेन्री बॅलेन्टाईन
जरीमरी
यंदा ठिकठिकाणीं जरीमरीचा वाखा फार झाला आहे... नगरामध्यें जरीमरीचा उपद्रव फार झाला नाहीं.बाजारगप्पाप्रमाणें मोजलें असतां एका महिन्यांत चारपांचशें माणसें मरावीं, परंतु अशा गप्पांवर कांहीं विश्वास ठेवावयाचा नाहीं. जर पांच माणसें मेलीं तर पंधरा ह्मणावें अशी चाल आहे...या वाक्यामुळें लोक घाबरलें आणि देवाचा क्षोभ आह्मांवर झाला असें बोलतात. फार करून सर्व लोक समजतात कीं, पटकीं पापामुळें आहे, कोणी ह्मणतात कीं इंग्लिश लोक या देशांत आल्यामुळें हा उपद्रव झाला आणि दोष सरकारवर घालितात.
परंतु फार करून लोक आपल्या पदरीं पाप घेऊन देवाला किंवा देवीला प्रसन्न करायाला उपाय करितात. हिंदु धर्मांतले जे लोक ते असें समजतात कीं, हें मरी देवीचे खेळ आहेत ह्मणून लोक गांवाबाहेर एखादें बागेंमध्यें जेवण करून इची पूजा करितात. घोडनदीस फौजदाराने सर्व लोकांस आज्ञा दिली कीं, गांवाबाहेर जाऊन देवीची पूजा करावी.
नगरामध्यें कांहीं दिवसामागें ब्राह्मण आणि विशेषेंकरून कारकून मंडळी यांनी बहुत पैका खर्च करून होम केले आणि एक तरुण मांगीण आणून तिला चांगले लुगडें व चोळीं नेसवून गळ्यांत माळा घालून आणि नैवेद्य देऊन तिचें चांगलें पूजन केलें आणि तिला गाड्यावर बसवून वाजंत्री आणि समागमें बहुत लोक गांवाबाहेर मिरवीत गेलें. परंतु या सर्व उपायांनीं कांहीं होत नाहीं तरी लोक असें करीत जातात.
हा रोग कसा उत्पन्न होतो? ज्यांनीं याचा शोध केला ते असें समजतात कीं, लोक अगोदर आपली प्रकृती बिघडवून मग हा रोग लागतो आणि आपली प्रकृती कशी बिघडवितात तर खादाडपणानें बहुत फळें आंबे वगैरे खाण्यानें व लग्नाकरितां सारी रात्र जागे राहण्याने आणि रांडबाजी करण्यानें आणि भयानें इत्यादिक. सारांश, जेणेंकरून मन अस्वच्छ होतें तेणेंकरून हा रोग लागण्यास शरीर तयार होतें...
खादाडपणा हें पाप आहे. जरी जेवण फुकट मिळतें तरी माणसें पशुधर्माप्रमाणें चालली असतां देव शिक्षा देईल... सर्व लोकांनीं ईश्वराचें भजन करून सर्व पाप सोडावें... ब्राह्मण लोकांनीं मांगणीचें पूजन करूं नये, परंतु आपल्या पापाविषयीं पश्चात्तापी होऊन ईश्वराजवळ प्रार्थना करावी.
संदर्भ :'ज्ञानोदय'ची पहिली १००वर्षे, १८४२-१९४१.
संपा. : भा.पां.हिवाळे.
--अनुपमा निरंजन उजगरे
संपादक 'ज्ञानोदय',२००३-२००४





Wednesday, April 27, 2022

`निरोप्या'कार आर्चबिशप हेन्री डोरिंग

बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली ‘दर्पण’ मासिक सुरू करून मराठी वृत्तपत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर मराठी भाषेत अनेक नियतकालिके सुरू करण्यात आली. यापैकी बहुतेक नियतकालिके आज काळाच्या ओघात गडप झाली आहेत. ‘ज्ञानोदय’ हे 1842 साली सुरू झालेले नियतकालिक आजही पुण्यातून प्रसिद्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळण या आजही अत्यंत आडवळणाच्या ठिकाणी असलेल्या खेडेगावी फादर हेन्री डोरिंग या येशूसंघीय जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मासिक 1903 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू केले. हे मासिक अजूनही पुण्यातून प्रकाशित होत आहे.

4 जानेवारी 1881 पासून गोपाळ गणेश आगरकर यांच्या संपादकत्वाखाली ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू झाले. त्यामुळे सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेल्या मराठी नियतकालिकांमध्ये ‘निरोप्या’ या मासिकाने या एप्रिल २०२२ महिन्यात एकशेविसाव्या वर्षांत पदार्पण केले आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
मराठी भाषिक कॅथोलिक समाजाची आध्यात्मिक गरज भागविणाऱ्या, या समाजातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वृत्त पुरविणाऱ्या या मासिकाची महाराष्ट्रातील विविध भागातील त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यातील मराठी भाषक ख्रिस्ती वाचक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. यावरून या मासिकाची लोकप्रियता लक्षात येते.
हिंदू मागासवर्गीय जातींतून नव्यानेच ख्रिस्ती धर्मात आलेल्या अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या समाजासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नियतकालिक सुरू करणारे फादर हेन्री डोरिंग हे धर्मगुरू निश्चितच द्रष्ट्ये मिशनरी होते हे यावरून दिसून येते. ‘निरोप्या’च्या या संस्थापकाचे त्यामुळे मराठी भाषिक ख्रिस्ती समाजावर आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेवर मोठे ॠण आहेत.
विशेष म्हणजे ‘ज्ञानोदय’ आणि ‘निरोप्या’ ही मराठीतील दोन्ही दीर्घायुषी मासिके मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाची मुखपत्रे आहेत. ‘ज्ञानोदय’ हे रेव्ह. हेन्री बॅलन्टाईन या अमेरिकन धर्मगुरूने सुरू केलेले नियतकालिक प्रॉटेस्टंट समाजात, तर ‘निरोप्या’ हे कॅथोलिक समाजात प्रामुख्याने वितरित केले जाते. या मासिकांचा खप केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित असला तरी महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचे या नियतकालिकांत प्रतिबिंब उमटत असल्याने संपूर्ण मराठी समाजाची ही मासिके एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.
हेन्री डोरिंग यांचा जन्म जर्मनीत बोकोल्ट येथे 13 सप्टेंबर 1859 रोजी झाला. 1882 मध्ये त्यांना गुरुदीक्षा मिळाली. 1895 मध्ये फादर डोरिंग यांचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीपाशी असलेल्या वळण येथे आगमन झाले. वळण शेजारी असलेले केंदळ हे गाव अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या खेडेगावातूनच कॅथोलिक मिशनरींनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वप्रथम धर्मप्रसार सुरू केला. आज अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे या जिल्ह्यात मराठी भाषिक कॅथोलिक ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे. यापैकी बहुसंख्य लोकांनी पूर्वाश्रमीच्या हिंदू महार या अस्पृश्य जातीतून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला.
फादर डोरिंग वळण येथे आले तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्य नुकतेच सुरू झाले होते. अस्पृश्य जातीतून अनेकजण ख्रिस्ती धर्मात येत होते तरी केवळ धर्मांतरामुळे त्यांच्या सामाजिक वा शैक्षणिक परिस्थितीत एकदम मोठा बदल होत नव्हता. या नवख्रिस्ती समाजाला शिक्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या नवसाक्षरांसाठी ख्रिस्ती धर्माचे ज्ञान देण्यासाठी मग या मिशनऱ्यांनी स्वतः मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि नंतर या भाषेत धर्मशिक्षणाची पुस्तकेही तयार केली.
फादर डोरिंग वळणला येण्याआधीच काही मिशनऱ्यांनी मराठी भाषेत धर्मशिक्षणाची काही पुस्तके लिहिली होती असे दिसते. अहमदनगर आणि नजिकच्या जिल्ह्यातील कॅथोलिक समाजातील पहिल्या पुस्तकाचा मान ‘लहान कॅथेखिसम’ या धर्मशिक्षणविषयक पुस्तकाला मिळतो. या पुस्तकाच्या लेखकाच्या नावाची नोंद मिळत नसली तरी या पुस्तकाचे लेखक केंदळ वळणमध्येच काम करणारे फादर दालिंग असावेत असे फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांनी म्हटले आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असणारे आणि रोम येथील विद्यापीठात तौलनिक धर्मशास्त्राचे प्राध्यापक असणारे फादर शेळके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यावर संशोधन केलेले आहे.
फादर शेळके पुढे म्हणतात की, फादर डोरिंग केंदळ वळण येथे स्थायिक झाले तेव्हा त्यांना स्थानिक लोकांमध्ये ‘सुभक्तीसार’ या शीर्षकाचे धर्मशिक्षणाचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे असे आढळले.
फादर डोरिंग यांच्या आधी म्हणजे 1892 च्या मध्यास केंदळ येथे आलेल्या फादर फ्रान्सिस ट्रेनकाम्प यांनी ‘सुभक्तीसार’ हे पुस्तक 1895 पूर्वी लिहून प्रसिद्ध केले. फादर ट्रेनकाम्प यांनी मराठी भाषेचा चांगला अभ्यास केला. या पुस्तकासाठी त्यांनी पुण्या-मुंबईच्या पुस्तकात आढळणाऱ्या भाषेऐवजी अहमदनगर जिल्ह्यात प्रचलित असलेल्या बोलीभाषेचा वापर केला. थोडेफार शिक्षण झालेले नवख्रिस्ती लोक या पुस्तकाचा वापर करत. देवळात मिस्साच्या वेळी प्रार्थना करण्यासाठीही धर्मगुरू या पुस्तकाचा वापर करत असत.
धर्मकार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या फादर डोरिंग यांना केवळ ‘लहान कॅथेखिसम’, ‘मोठे कॅथेखिसम’ या भाषांतरित आणि ‘सुभक्तीसार’ या पुस्तकांचाच उपयोग करावा लागत असे. त्याकाळी मिशनऱ्यांना आपल्या घरापासून लांबवर असलेल्या खेडेगावात उपदेशासाठी, मिस्सासाठी जावे लागत असे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना ख्रिस्ती धर्माचे मराठीतून धर्मज्ञान देण्यासाठी त्याकाळी मराठी भाषेत पुस्तकेच नसल्याने या भाषेत धर्मविषयक साहित्याची निर्मिती करण्याची गरज फादर डोरिंग यांना भासू लागली. अशा प्रकारचे साहित्य नसल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देणाऱ्या धर्मशिक्षकांना किंवा पालकांना त्यांचे कार्य करणे कठीण जात होते.
या समस्येवर उपाय म्हणून फादर डोरिंग यांनी मराठी भाषेतून धर्मविषयक माहिती देणारे मासिक सुरू करण्याचे ठरविले. येशूसंघाच्या अधिकाऱ्यांनी या मासिकासाठी आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. अशाप्रकारे 1903 च्या एप्रिल महिन्यात फादरनी ‘येशूच्या अतिपवित्र हृदयाचा निरोप्या’ या आपल्या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.
तेव्हापासून पहिल्या महायुद्धाच्या काळातील काही वर्षांचा अपवाद वगळता ‘निरोप्या’ आजपर्यंत नियमितपणे प्रकाशित होत आहे. येसूसंघ या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या मालकीचे हे नियतकालिक असल्याने केवळ एक अपवाद वगळता गेली १२० वर्षे येशूसंघीय धर्मगुरूच या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
फादर डोरिंग यांनी ‘निरोप्या’सुरू केल्यानंतर या मासिकात लिहिण्यासाठी स्वतःच्या मराठी भाषेच्या ज्ञानात अधिक भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषेतील शब्द, हिंदू धर्मसाहित्यात वापरले जाणारे शब्द तसेच संकल्पना ते शिकले. या ज्ञानाचा वापर करून आपले मासिक नवसाक्षर नवख्रिस्ती लोकांसाठी अधिकाधिक उपयुक्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले.
फादर डोरिंग हे या मासिकाचे संपादक आणि लेखकही होते. सुरुवातीच्या काळात ‘निरोप्या’ मुंबईतील ‘एक्झामिनर’ प्रेसमध्ये छापले जात असे. ‘निरोप्या’च्या पहिल्या अंकाची एकूण दहा पाने होती आणि त्यात पाच विषयांवर लेख होते. एप्रिल महिन्यासाठी प्रार्थनेचा विषय, पवित्र मिस्साचा चाकर होणे, लिओ तेरावे परमगुरुस्वामींचा (पोप) सण, तुझे राज्य येवो आणि एक रक्तसाक्षी (हुतात्मा) हे ते पाच विषय होत.
राहुरी तालुक्यातील एका आडवळणाच्या ठिकाणी ‘निरोप्या’च्या संपादकांचे वास्तव्य होते आणि त्यांचे मासिक तर मुंबईतून प्रसिद्ध होत होते. त्यामुळे अंक वेळेवर छापला जाईल यासाठी संपादकांना खास प्रयत्न करावे लागत असत. आपल्या या मासिकाचा चौथा अंक तर खुद्द संपादक महाशयांनीच सरळ स्वतःच्या हाताने लिहून काढला होता असे दिसते. हा अंक त्यावेळी का छापला गेला नाही हे आजही स्पष्ट होत नसले तरी या मासिकाच्या हस्तलिखित प्रतींवरून आपले नियतकालिक वेळेवर प्रकाशित झाले पाहिजे याबद्दल फादर डोरिंग विशेष आग्रही होते हे दिसून येते.
‘निरोप्या’तून ख्रिस्ती संतांची चरित्रे आणि ख्रिस्ती जगातील विविध घडामोडींविषयी लेख असत. शंभरी गाठलेल्या या मासिकात आजही ही सदरे प्रसिद्ध होत आहेत. त्याशिवाय ख्रिस्ती अध्यात्मात अभिजात वाङ्मय समजल्या जाणाऱ्या खाळेीींंळे लहीळीींळ या लॅटिन पुस्तकाचा अनुवादही त्यांनी या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केला. ‘ख्रिस्तानुवर्तन’ या नावाने या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत हे पुस्तक ‘निरोप्या’तून प्रकाशित केले गेले.
दर महिन्याला नियमितपणे प्रभूचा संदेश घेऊन ‘निरोप्या’ हे चिमुकले मासिक अहमदनगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील खेड्याखेड्यांतून प्रवासाला निघत असे. त्याकाळी पुस्तकांची किंवा मासिकांची वानवाच असल्याने या छोट्याशा नियतकालिकाने शंभर वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील ख्रिस्ती धर्मीय वाचकांची वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली असणार.
1907 मध्ये फादर डोरिंग यांची पुणे धर्मप्रांताचे महागुरुस्वामी किंवा बिशप म्हणून नेमणूक झाली. केंदळ वळण येथे असताना त्यांना केवळ आपल्या धर्मग्रामाची जबाबदारी सांभाळावी लागे. बिशप झाल्यानंतर त्यांना आता संपूर्ण पुणे धर्मप्रांतात येणाऱ्या विविध जिल्ह्यांच्या धर्मग्रामांचे धर्माधिकारी म्हणून काम पाहावे लागत असे. त्याकाळच्या पुणे धर्मप्रांतात पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली वगैरे जिल्ह्यांचा परिसर येत असे. बिशप म्हणून डोरिंग यांची जबाबदारी अनेक पटींनी वाढली तरीसुद्धा या साहेबांनी ‘निरोप्या’ चे संपादन आणि लेखन सोडले नाही. ‘निरोप्या’च्या संपादकांची धर्मगुरुपदावरून महाधर्मगुरुपदावर बढती होऊन पुण्याला बदली झाली तसे या मासिकाचे प्रकाशनस्थळही पुण्याला हलविण्यात आले.
पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले तेव्हा बिशप डोरिंग पोपमहाशयांना भेटण्यासाठी रोम येथे गेले होते मूळचे जर्मन असलेल्या बिशपांना ब्रिटिशांची वसाहत असलेल्या आपल्या कर्मभूमीत परतणे अशक्य झाले. पोपनी जपानमधील हिरोशिमा धर्मप्रांताचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांची 1921 साली नेमणूक केली. या काळातच आर्चबिशप हे ख्रिस्ती महामंडळातील आणखी एक उच्च पद त्यांना देण्यात आले.
जपानमध्ये नेमणूक झाल्यानंतरही आपल्या कर्मभूमीत परतण्याची डोरिंग यांची तीव्र इच्छा असावी असे दिसते, कारण ब्रिटिश सरकारची परवानगी मिळताच त्यांनी पुन्हा 1927 साली पुणे धर्मप्रांतातील मराठी ख्रिस्ती समाजाचे मेंढपाळ म्हणून पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली.
पुण्यात परतल्यानंतर केवळ सहाच महिन्यात म्हणजे जून 1928 मध्ये त्यांनी बंद पडलेल्या ‘निरोप्या’चे पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने प्रकाशन सुरू केले. ‘निरोप्या’ त्याच्या गुरूप्रमाणेच (येशू ख्रिस्ताप्रमाणे) पुनरुत्थित झाला’’ असे या घटनेचे फादर ख्रिस्तोफर शेळके यांनी वर्णन केले आहे.
‘निरोप्या’ हे मराठी भाषिक कॅथोलिक समाजाचे सर्वात पहिले मुखपत्र. गेले एक शतक हे मासिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कॅथोलिक कुटुंबांमध्ये नियमितपणे जात आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या या समाजातील अनेक कुटुंबांना दररोज वर्तमानपत्र घेण्याचीही ऐपत नाही. मात्र अगदी वाजवी वर्गणी असलेले हे मासिक या कुटुंबातील लहानथोरांची वाचनाची भूक भागवत आहे. त्यादृष्टीने आर्चबिशप डोरिंग यांनी या समाजास मोठे उपकृत करून ठेवले आहे यात शंकाच नाही.
1981 साली या मासिकाची वार्षिक वर्गणी केवळ तीन रुपये हेाती आणि किरकोळ अंकाची किंमत तीस पैसे होती. आज 2022 साली रंगीत मुखपृष्ठ असलेल्या आणि एकूण 32 पाने असलेल्या या मासिकाची वार्षिक वर्गणी दोनशे रुपये आहे.
आर्चबिशप डोरिंग यांच्या ‘निरोप्या’ने मराठी भाषिक कॅथोलिक समाजात वाचनाची आवड निर्माण करण्याबरेाबरच या समाजात लेखकांच्या आणि कवींच्या पिढ्या निर्माण करण्याचेही मोठे योगदान दिले आहे. मराठी सारस्वतात पुढे मोठे नाव कमाविणाऱ्या अनेक कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लेखकांना त्यांच्या उमेदवारीच्या काळात ‘निरोप्या’ ने त्यांना हक्काचे एक व्यासपीठ मिळवून दिले. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, कवी विश्वासकुमार आदी नामवंत साहित्यिकांचा ‘निरोप्या’च्या लेखकांमध्ये समावेश होतो.
आपले साहित्य आणि नाव पहिल्यांदाच छापून आल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव मलासुद्धा ‘निरोप्या’मुळेच लाभला. माझा पहिला लेख होता वि.स, खांडेकर यांना त्यांच्या `ययाती' कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला याबद्दल. साल होते १९७४ आणि माझे वय १५ वर्षे.
एखाद्या नियतकालिकाच्या प्रकाशन स्थळात अगदी क्वचितच बदल होतात. ‘निरोप्या’च्या शंभर वर्षांच्या आयुष्यात मात्र असे प्रसंग अनेकदा घडून आलेले दिसतात. याचे कारण म्हणजे ‘निरोप्या’चे मालकीहक्क असणाऱ्या येशूसंघाचे धर्मप्रांताधिकारी यांच्यामार्फत ‘निरोप्या’च्या संपादकांची नेमणूक केली जाते. नव्या संपादकांच्या नियुक्तीनंतर हे मासिकही ते संपादक ज्या धर्मग्रामात कार्यरत असतात तेथून प्रसिद्ध होत राहिले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील केंदळ वळण, श्रीरामपूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, सातारा जिल्ह्यातील कराड, त्याचप्रमाणे नाशिक वगैरे ठिकाणी ‘निरोप्या’चे कार्यालय सातत्याने स्थलांतरित होत राहिले.
या विविध जिल्ह्यांतील ख्रिस्ती धर्मियांनी अर्थातच त्यामुळे ‘निरोप्या’ची साथ सोडली नाही. त्यांच्या अनेक पिढ्यांनी या चिमुकल्या नियतकालिकावर आपली वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली आहे.
‘निरोप्या’कार आर्चबिशप डोरिंग यांनी मराठी साहित्याला आणखी एक मोठे योगदान दिले आहे. सतराव्या शतकात गोमंतकात मराठी भाषेत लिहिले गेलेले ‘क्रिस्तपुराण’ हे अस्सल देशी महाकाव्य त्यांनी महाराष्ट्रात उजेडात आणले. ‘क्रिस्तपुराणा’ची रचना फादर थॉमस स्टीफन्स या मूळच्या इंग्रज येशूसंघीय धर्मगुरूंनी 1616 साली केली. मात्र त्याकाळात गोव्यात देवनागरी मुद्रणकला विकसित झाली नसल्याने त्यांना ते छापावे लागले.. रोमन लिपीत असल्याने मराठी सारस्वताचे या अभिजात वाङ्मयाकडे तीन शतके लक्षच गेले नाही.
आर्चबिशप डोरिंग यांनी या महाकाव्याचा अभ्यास केला व या साहित्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या पुराणातील येशू ख्रिस्ताच्या चरित्रावर आधारित काही भागांचे देवनागरीत लिप्यांतर करून त्यांच्या तीन पुस्तिका प्रकाशित केल्या. अशाप्रकारे मराठी भाषेत असूनही रोमन लिपीमुळे मराठी भाषिकांपासून दुरावलेल्या या महाकाव्याचा निदान काही भाग तरी आर्चबिशप डोरिंग यांच्यामुळे प्रथमतःच मराठी भाषिकांना प्राप्त झाला. हे संपूर्ण महाकाव्य 1956 साली शांताराम बंडेलू यांनी देवनागरीत आणून य. गो. जोशी यांच्या प्रसाद प्रकाशनाने प्रकाशित केले.
मराठीत साहित्यसंपदा असणारे आजचे पुण्याचे बिशप थॉमस डाबरे हे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांचे उत्तराधिकारी आहेत. फादर भाऊसाहेब संसारे हे `निरोप्या'चे विद्यमान संपादक आहेत


1949 मध्ये वृद्धत्वामुळे आर्चबिशप डोरिंग यांनी निवृत्ती स्वीकारली आणि त्यांच्या जागी अँड्र्यू डिसोझा या धर्मगुरूंनी पुण्याचे पहिले भारतीय बिशप म्हणून सूत्रे हाती घेतली. ‘निरोप्या’तून शेवटचे बोधपत्र लिहून या मेंढपाळाने आपल्या कळपाचा निरोप घेतला. ‘निरोप्या’च्या अंकात प्रसिद्ध झालेले हे बोधपत्र पुढीलप्रमाणे आहे.
‘येशू ख्रिस्तामध्ये अतिप्रिय लेकरांनो, ईश्वराने तुम्हांस पुष्कळ वर्षे माझ्या हवाली केले, तरी आता तुम्हांस माझा शेवटचा सलाम सांगण्याची वेळ आली. 42 वर्षांपूर्वी 10वे प्रिय परमगुरुस्वामी यांनी मला पुण्याचे महागुरू म्हणून नेमिले आणि बायदरलीदन बिशपच्या जागी मला पुणे धर्मप्रांताचा अधिकार दिला.
सात वर्षे माझ्या कळपामध्ये शांतीने काम करता आले. मग पहिले महायुद्ध सुरू झाले, त्यावेळी मी परमगुरुस्वामींची भेेट घ्यायला रोम शहरी गेलो होतो. पुण्याला परत जाण्याचे माझे सर्व प्रयत्न व्यर्थ निघाले. मला माझ्या प्रिय लेकरांपासून लांब राहणे भाग पडले.
युद्ध संपल्यावर परमगुरुस्वामींनी मला जपान देशाला पाठविले. हिरोशिमा शहराचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांनी मला नेमिले. शेवटी 1927 साली ब्रिटिश सरकारने मला पुण्याला परत जाण्याची परवानगी दिली. तेव्हापासून मी पुन्हा तुम्हांमध्ये राहात होतो.
दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नवीन अडचण व त्रास उत्पन्न झाला. काही तरुण फादर, जर्मन नागरिक असल्याकारणाने, त्यांस सरकारने कैद्यांच्या छावणीत ठेवले आणि बिशपचा व्यवहारदेखील जरा कठीण झाला. या अवघड दिवसात विश्वासी आणि फादर लोकांचा विश्वासूपणा, प्रेम ही मला मोठ्या समाधानाची व शक्तीची कारणे होती. त्यांची आस्था आणि साहाय्य शेवटपर्यंत उपकारी मनाने मी विसरणार नाही.
युद्ध संपल्यावर माझ्या वृद्धपणाचा परिणाम अधिकाधिक मजवर झाला. प्रवास करणे मला कठीण झाल्यामुळे सर्व मिशनस्थानांची भेट वेळोवेळी घेता आली नाही. म्हणून माझ्यापासून हे भारी ओझे काढण्यास आणि उत्साही खांद्यावर ठेवण्यास परमगुरुस्वामींची विनंती करण्यास मला योग्य वाटले. त्यांनी माझी विनंती मान्य करून अंद्रू डिसोजा फादर यांस माझ्या जागी महागुरू म्हणून नेमले. त्यांची दीक्षा 24 ऑगस्टला झाली आणि या दिवसापासून ते महागुरूचा अधिकार चालवू लागले. ते तुमची चांगली काळजी घेतील.
म्हणून माझ्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हास माझा शेवटचा बोध करितो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून आपल्या विश्वासाप्रमाणे वर्तन करा. तुमच्यापुढे नवीन संकटे आहेत. येशूच्या हृदयाची आणि प.मारियेच्या निष्कलंक हृदयाची भक्ती बाळगत जा. ती तुमची रक्षण करतील. तुमच्या नवीन महागुरुस्वामींसाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हांसाठी रोजरोज प्रार्थना करीत जाईन, अशी खातरी मी तुम्हाला देतो. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.”
                                                                                                                    - हेन्री आर्चबिशप

निवृत्तीनंतर 17 डिसेंबर 1951 रोजी आर्चबिशप डोरिंग यांचे निधन झाले. पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमध्ये त्यांची समाधी आहे. जर्मनीतून महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकून, स्थानिक निरक्षर आणि अर्धशिक्षित ख्रिस्ती समाजाला ज्ञानार्जन करणारे आर्चबिशप डोरिंग हे आज विस्मृतीत गेले असले तरी ‘निरोप्या’च्या रूपाने त्यांचे स्मारक त्यांच्या कळपाच्या भेटीस आजही दर महिन्याला नियमाने येत आहे.


( ख्रिस्ती मिशनरींचे योगदान- कामिल पारखे (वितरण सुगावा प्रकाशक) मधील एक प्रकरण )

Wednesday, January 20, 2021

`टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. पत्रकारितेतील माझा मित्र अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.
टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा. अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत जवळजवळ मी एक तप घालवलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ? आणि त्या बातमीचा इंट्रो ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002, 10.37 PM IST
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या केंदळ -वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे. मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
वजनाने नेहेमीपेक्षा अधिक जाडजुड असलेला डिसेंबरच्या नाताळ विशेषांकानंतर आता प्रसिद्ध झालेला निरोप्या' जानेवारी २०२१ चा अंक पाहायला हवा. रंगीत जाहिरातीची तब्बल बारा पाने असलेला एकुण ४४ पानांचा अंक पाहिला तर या मासिकाला वाचकांपासून मिळणाऱ्या प्रतिसादासंबंधी ठोकताळे बांधणे शक्य आहे.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापकशांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनाने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे निधन १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
त्यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी बोलतो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
( निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. त्यावेळी पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा व्यवसाय असेल याची कल्पनाही केली नव्हती. )