Showing posts with label American Marathi Mission. Show all posts
Showing posts with label American Marathi Mission. Show all posts

Wednesday, October 1, 2025


देवाचे गोठणे. कोकणात राजापूरजवळ देवाचे गोठणे हे गाव आहे. मराठी साहित्यविश्वाची थोडीफार ओळख असलेल्या कुणाही व्यक्तीला हे नाव परिचित असेल.

सत्तरच्या दशकात मी पहिल्यांदा राजापूर येथे पोहोचलो तेव्हा बॅरिस्टर नाथ पै यांचा हा लोकसभा मतदारसंघ आणि इथली अवचितपणे अवतरणारी `राजापूरची गंगा’ म्हणून हे शहर ऐकून होतो.
नाथ पै यांचा या मतदारसंघात पुढे वारसा चालवणारे मधू दंडवते यांचे नाव तोपर्यंत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या नजरेत भरले नव्हते.
तर देवाचे गोठणे लक्षात राहते ते एका वेगळया प्रकारचे नाव असलेल्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या पुस्तकामुळे.
माधव कोंडविलकर यांनी लिहिलेले हे आत्मकथन सत्तरीच्या दशकातील दया पवारांचे `बलुतं', सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचे `अगा जे कल्पिले नाही' आणि, लक्ष्मण माने यांचे 'उपरा' अशा पहिल्या दलित लेखकांच्या आत्मकथनांत आपले स्थान राखून आहे.
अशा प्रकारे लक्षात राहिलेल्या या गावाचे नाव काही महिन्यांपूर्वी ऐतिहासिक संदर्भात वाचले तेव्हा हे नाव अधिक ठळकपणे मनात कोरले गेले.
नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या `सावलीचा शोध' या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात देवाचे गोठणे येथील बाबाजी रघुनाथ या ख्रिस्ती झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या कोकणस्थ ब्राह्मण माणसाविषयी केलेली संक्षिप्त नोंद वाचली अन ख्रिस्ती समाजात आढळणाऱ्या असंख्य जातीजमाती या विषयावरील लिखाणाबाबत माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात बीज पेरले गेले होते.
रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांनी १८८१ साली लिहिलेल्या `अमेरिकन मराठी मिशन यासंबंधी मंडळ्यांची संक्षिप्त बखर' या पुस्तकात बाबाजी रघुनाथ मराठे या आद्य एतद्देशीय ख्रिस्ती मिशनरीबाबत माहिती लिहिली आहे.
अहिल्यानगरमधून ख्रिस्ती झालेल्या पहिल्या काही ब्राह्मण व्यक्तींमध्ये रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांचा समावेश होता.
त्यांची आणखी एक ओळख म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत कृष्णाची भूमिका करण्याबाबत प्रसिद्ध असलेले अभिनेते शाहू मोडक यांचे ते पणजोबा.
या पुस्तकात मोडक यांनी लिहिले आहे,
'' या (अहमदनगर) मिशनातील पहिले एतद्देशीय ख्रिस्ती साह्यकारकही उच्च जातींतले मनुष्य होते. बाबाजी रघुनाथ मराठे नामक कोकणस्थ ब्राह्मण जो मुंबईस मिशनरी लोकांस भाषा शिकवणारा पंडित असता, ख्रिस्ती शास्त्र शिकून व सत्याची खात्री पावून ख्रिस्ती झालेला होता, तोच या मिशनातला पहिला एतद्देशीय ख्रिस्ती उपदेशक होता.’’
मात्र अवघे बेचाळीस वर्षे आर्युमान लाभलेल्या या कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती माणसाचे भारतीय सामाजिक इतिहासात आणखी एक आगळेवेगळे स्थान आहे.
त्याकाळात ब्राह्मण आणि इतर वरच्या वर्णातील पुरुषांनी एखाद्या विधवेशी रितसर लग्न करणे ही अशक्यप्राय घटना होती. बाप्तिस्मा स्विकारुन ख्रिस्ती झालेल्या बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाने नेमके हेच केले.
त्या जमान्यात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते.
या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही पहिलीच घटना. बाबाजी रघुनाथ मराठे यांनी अमेरिकन मिशनच्या मुंबईतल्या आवारात आवडाबाई नावाच्या एक ब्राह्मण विधवेशी विधिवत लग्न करून हा इतिहास घडवला.
रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत लिहिले आहे: `` १८३१ साली या (ख्रिस्ती) मंडळीत बाबाजी रघुनाथ हा एकच एतद्देशीय ख्रिस्ती होता.
१८३१ यावर्षी आवडाबाई ब्राह्मणीण, जी बाबाजी रघुनाथाची बायको ती, कोंडू महार, काशिबा महार आणि भिक्या महार ही चौघेजणे (ख्रिस्ती) मंडळीत मिळाली.''
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनी १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती. त्यावेळी ब्रिटिश संसदेने कायदा संमत करुन भारतात विधवाविवाह कायदेशीर ठरवला होता.
कॅथोलिक धर्मगुरु आणि नन्स यांनी आजन्म अविवाहित राहण्याचे व्रत स्विकारलेले असते. बाबाजी रघुनाथ मराठे हे ज्या प्रोटेस्टंट ख्रिस्ती मिशनरींबरोबर काम करत होते त्यांच्यामध्ये विवाह आणि पुनर्विवाह निषिद्ध नव्हता.
पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी धोंडो केशव कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या पुण्यातील शारदा सदनातील गोदूबाई (नंतर आनंदीबाई) या बालविधवेशी १८९३ला पुनर्विवाह केला होता.
बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
विशेष म्हणजे ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीच्या काळात असा जगावेगळा जीवनपट असलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांचे चरित्र त्यांच्या अकाली निधनानंतर लगेचच १८३५ साली लिहिले गेले होते.
अमेरिकन मिशनरी हॉलीस रीड यांनी लिहिलेले हे चरित्र अलीकडेच पुण्यातील एक संशोधक अशोक एस. हिवाळे यांच्या वाचनात आले आणि `बाबाजीची बखर' या शिर्षकाखाली ७६ पानांचे पुस्तक त्यांनी ते स्वतःच्या सुमित्र प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहे.
मात्र या चरित्रात मी वर उल्लेख केलेल्या बाबाजी रघुनाथ यांनी केलेल्या विधवाविवाहाचा उल्लेख नाही. हा उल्लेख आढळतो तो अमेरिकन मराठी मिशनच्या १८३१-१९१३ या अर्धशतकाच्या कार्याच्या इतिहासात.
विल्यम हेजन यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या `अ सेंच्युरी इन इंडिया - अ हिस्टॉरीकल स्केच ऑफ द मराठी मिशन ऑफ द अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्स (अमेरिकन मराठी मिशन) फ्रॉम १८१३ टू १९१३' या ग्रंथात हा उल्लेख मला आढळला तेव्हा मी अचंबित झालो होतो.
या पुस्तकात लिहिले आहे:
``बाबाजींचा २० नोव्हेंबर १८३१ रोजी बाप्तिस्मा झाला आणि लवकरच त्यांनी ज्या महिलेसोबत ते काही काळ राहात (म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये) होते. अशा एका ब्राह्मण विधवेशी विवाह केला. हिंदू असलेल्या व्यक्तींसाठी प्रथमच हा ख्रिस्ती विवाहसोहळा अशा रीतीने पार पडला आणि हा विलक्षण सोहळा पाहण्यासाठी चॅपेल (छोटे प्रार्थनामंदिर)मध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांसाठी तो एक नवा अनुभव होता.
त्याचवेळी, बाबाजींच्या बाप्तिस्म्याबरोबरच गोपीबाई नावाच्या एका महार स्त्रीलाही प्रभुभोजनात (होली कम्युनियन) सामिल करुन घेण्यात आले आणि अशा प्रकारे हिंदू समाजातील दोन विरुद्ध टोकांचे घटक पहिल्यांदाच या नव्या ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले.
मिशनरींनी एकत्रित आणलेल्या या ख्रिस्ती मंडळीचे स्वरूप विविध घटकांचे मिश्रण वाटावे असेच होते. प्रभुभोजनात सामिल झालेल्या त्या एकोणीस व्यक्तींविषयी त्यांनी म्हटले की, त्या “ जगाच्या चारही दिशांमधून आलेल्या शेम, हाम आणि जाफेथ यांचे ते वंशज आहेत.''
(नौकेच्या मदतीने जगबुडीतून वाचलेल्या नोहाची शेम, हाम आणि जाफेथ ही तीन मुले होती. त्यांच्यापासून पुढे पृथ्वीवर मानववंश विस्तार झाला, असे बायबलमध्ये उत्पत्तीच्या - जेनेसिस - पुस्तकात लिहिले आहे.)
रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत जातीभेदाच्या प्रथेला छेद देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे :
``नोव्हेंबरात बाबाजी रघुनाथ मराठे कोकणस्थ ब्राह्मणातला प्रथमच ख्रिस्ती होऊन या मंडळीला मिळाला. आणि त्याच वेळेला कोणी गोपी महारीणही ख्रिस्ती होऊन या मंडळीला मिळाली. तेव्हा ब्राह्मण व महारीण ही उभयता प्रथमच ख्रिस्ती होऊन भाऊ बहिण अशी होऊन एका पंगतीत बसली असा चमत्कार दृष्टीस पडला.’’
बाबाजींच्या या धर्मपरिवर्तनानंतर लगेचच म्हणजे एक महिन्यातच मुंबईतल्या अमेरिकन मिशनची एक तुकडी अहिल्यानगरला आली. त्या तुकडीमध्ये बाबाजी रघुनाथ मराठे यांचा समावेश होता. या घटनेचे ``अमेरिकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात पुढीलप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे:
``अहमदनगरातील व सभोवतालच्या प्रदेशांतील मिशनच्या इतिहासाला २० डिसेंबर १८३१ मध्ये प्रारंभ झाला. या सुमारास सहा व्यक्ती - यापैकी पाच मिशनरी व एक धर्मांतरित ब्राह्मण भक्त - अकरा दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर येथे येऊन पोहोचले. मुंबईपासून अहमदनगरचे अंतर अवघे २०० मैलांचे असूनही प्रवासाला इतका दीर्घकाल लागत होता. दुसऱ्याच दिवशी ते वचनबद्ध होऊन त्यांनी स्वतःचेच ख्रिस्ती चर्च निर्माण केले. अनेक प्रेरक घटनांपैकी अमेरिकन मिशन बोर्डाच्या बखरीत या पहिल्याच चर्च सभेचा वृत्तांत आढळतो तो असा:
डिसेंबर २१, १८३१
आम्ही, सहाजण ज्यांची नावे खाली दिली आहेत ते या ठिकाणी मुंबईच्या अमेरिकन मिशनची शाखा म्हणून आल्यावर आणि या व्यवहारावर दैवी कृपा व्हावी म्हणून विनम्र विनंती केल्यावर, आम्ही विधियुक्त एकत्रित येत आहोत आणि त्रैक्य, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा - याला ख्रिस्ती चर्च म्हणून समर्पण करीत आहोत.
आमचा स्वीकार व्हावा आणि परस्परांना (आम्ही) आशिर्वादित करुन या ठिकाणच्या लोकांना आशिर्वादित करावे.
अँलन ग्रेव्ह्ज, हॉलिस रॉड
मेरी ग्रेव्हज कॅरोलिन रॉड
विल्यम हार्वे बाबाजी रघुनाथ मराठे ‘’
रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत नगर येथील मिशन स्थापनेचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे:
``याच (१८३१) वर्षांच्या डिसेंबर महिन्यात रेव्ह. (अँलन) ग्रेव्हज साहेब, रेव्ह (हॉलीस) रीड साहेब, रेव्ह. (विल्यम) हार्वे साहेब, हे तिघे मिशनरी सहकुटुंब, बाबाजी रघुनाथ मराठे या एतद्देशीय ख्रिस्ती भावास संगती घेऊन येथे आले आणि या सातांनी १८३१ ता. २१ रोजी म्हणजे शालीवाहन शके १७५३ मार्गशीर्ष वंध्य ३ बुधवार या दिवशी महंमदनगर येथे यथाविधी ईश्वरी भक्ती करण्यासाठी व जे उमेदवार मंडळीस मिळण्यास तयार होतील त्यास मुंबई मंडळींची शाखा अशी एक मंडळी स्थापिली.
नंतर आठ एतद्देशीय मनुष्ये बाप्तिस्मा घेऊन त्यासी मिळाल्यावर त्यांची स. १८३३ मार्च ता. सहा रोजी अहमदनगर मिशनातली शुद्ध एतद्देशीय ख्रिस्ती मंडळी स्थापली गेली. तिजवर रेव्ह. रीड साहेब हे तूर्त पाळक म्हणून निवडले गेले आणि रा. बाबाजी रघुनाथ हे वडील असे आणि रा. दाजीबा निळकंठ (प्रभू) हे सेवक म्हणजे कारभारी असे नेमले गेले.’’
रामकृष्ण विनायक मोडक यांनी पुढे असेही लिहिले आहे:
``या (नगर) मिशनातील पहिले एतद्देशीय ख्रिस्त साह्यकारकही उच्च जातीतले सुशिक्षित मनुष्य होते, बाबाजी रघुनाथ मराठे नामक कोकणस्थ ब्राह्मण जो मुंबईस मिशनरी लोकांस भाषा शिकवणारा पंडित असता, ख्रिस्ती शास्त्र शिकून व त्याच्या सत्याची खात्री पावून ख्रिस्ती झालेला होता, तोच या मिशनातला पहिला एतद्देशीय उपदेशक होता. त्याचप्रमाणे दाजी निळकंठ प्रभूही मिशनशाळेचा पंतोजी मुंबईस असता ख्रिस्ती झाला तो या मिशनचा दुसरा प्रथमचा एत्तद्देशीय ख्रिस्ती उपदेशक होता.‘’
त्याकाळचे अहमदनगर आणि आजचे अहिल्यानगर महाराष्ट्रातील `मराठी ख्रिस्ती समाजाचे येरुशलेम’ असे समजले जाते. अहिल्यानगर शहरातील पहिल्या संस्थापक ख्रिस्ती मंडळींमध्ये पाच युरोपियन मिशनरींबरोबरच बाबाजी रघुनाथ मराठे या कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती व्यक्तीचाही समावेश होता हे विशेष.
बाबाजी रघुनाथ मराठे यांचे मराठी ख्रिस्ती समाजाला आणि पर्यायाने या मातीतल्या संस्कृतीला दिलेले आणखी एक मोठे योगदान आहे.
ते म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच ख्रिस्ती उपासनेच्या प्रसंगी उपयोगी पडेल अशा हेतूने मराठी गीते रचली.
मराठी भाषेच्या इतिहासात फादर थॉमस स्टीफन्स यांच्यानंतर मात्र इथल्याच मातीतील, एतद्देशीय ख्रिस्ती व्यक्तीने केलेली ही पहिलीच पद्यरचना, त्यामुळे या गायनांना आणि भजनकीर्तनाला खूप महत्त्व आहे.
नारायण वामन टिळक किंवा कृष्णाजी सांगळे यांच्याआधी अनेक दशकांपूर्वी बाबाजींनी ही भजने आणि कीर्तने लिहिली होती.
हॉलीस रीड यांनी बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या चरित्रात बाबाजींची अनेक भजने आणि कीर्तनेसुद्धा दिली आहेत. बाबाजींच्या अभंगाच्या अखेरच्या कडव्यात `बाबाजी म्हणे' किंवा `ख्रिस्तदास म्हणे’ अशी ओळ असते.
मात्र बाबाजींबद्दल आणि त्यांच्या काव्य, भजन आणि कीर्तन अशा साहित्यकृतींबाबत काहीच माहिती नसल्याने आणि त्यांच्या आद्य पद्यरचना कुठल्याच उपासना संगीत पुस्तकांत नसल्याने त्यांचे कर्तृत्व आणि महती यावर गेली दोन शतके पडदा पडला गेला होता.
नवलाची आणखी एक बाब म्हणजे बाबाजी रघुनाथ मराठे यांचे अमेरिकन मिशनरी हॉलीस रीड यांनी १८३५ साली लिहिलेले आणि नंतर काळाच्या ओघात गायब झालेले चरित्र अशोक हिवाळे यांना कसे मिळाले ही आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत हिवाळे यांनी याबाबत लिहिले आहे. ते म्हणतात:
``मला बाबाजींचे रेव्ह. हॉलीस रीड यांनी लिहिलेले मराठी चरित्र गुगलवर एका वेबसाईटवर मिळाले. त्याच्या जेपीईजे फाईल्स मी डाऊनलोड करून त्यातील टेक्स्ट युनिकोड टेक्स्टमध्ये रुपांतरीत करुन स्वतःलाच ईमेल केले. तेथून कॉम्प्युटरवर त्याचे श्रीलिपी टाइपात रूपांतर करून हे पुस्तक पेजमेकरमध्ये सेट केले आहे व मुद्रित करण्यासाठी त्याची पीडीएफ फाईल बनवली. ‘’
मला आजही घरच्या टिव्हीवर ओटीटीवर चित्रपट लावणे जमत नाही. लॅपटॉपवर दररोज मी अनेक तास काम करतो, मात्र हे फक्त जुने टाईपरायटर बडवण्यापुरते मर्यादित असते. लॅपटॉपला माऊस लावल्याशिवाय मला टाईप करताच येत नाही, टचपॅडचा वापरच नाही. मोबाईलच्या वापराबाबतसुद्धा डिट्टो.
तर अशा या टेक्नॉसॅव्ही अशोक हिवाळे यांच्या व्यक्तिमत्वाबाबत तुम्ही काय ठोकताळे बांधणे असतील ?
अवघे एकोणऎंशी वर्षे आयुर्मान असलेल्या हिवाळे यांची नजर आता अधू झाली असून त्यांना केवळ एका डोळ्यानेच थोडेफार स्पष्ट दिसते, आतापर्यंत पाच वेळेला हृदयाच्या धक्क्यांना ते सामोरे गेलेले आहेत. हालचाल केवळ त्यांच्या घरापुरतीच मर्यादित आहे. असे असले तरी मोबाईल डोळ्याजवळ घेऊन त्यांचे वाचन-लिखाण, पुस्तक प्रकाशन आणि संशोधन अव्याहत चालू आहे.
हिवाळे यांनी पुण्यात जीवनवचन प्रकाशन या प्रकाशन संस्थेत अनेक पदांवर काम करताना पाचशेहून अधिक पुस्तकांचे संपादन, मुद्रिशोधन केलेले आहे, अनेक पुस्तके लिहिली आहेत,अनुवादित केली आहेत.
मुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या गोव्यातल्या धेम्पे कॉलेजात बीएला माझा ऐच्छिक मराठी हा विषय होता. मराठी लिहिण्याशी माझा तो अखेरचा संबंध. त्यानंतरची माझी संपूर्ण बातमीदारी आणि पत्रकारिता इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीतली.
काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमातला माझा एक मराठी लेख अशोक हिवाळे यांच्या वाचण्यात आला. त्यांच्यातील संपादक आणि मुद्रितशोधक जागा होऊन सहज एक चाळा म्हणून त्यातील शुद्धलेखनातील थोड्याफार चुका कंसात लिहून तो लेख त्यांनी माझ्याकडे पाठवला होता !
काळाच्या उदरात लुप्त झालेल्या आणि आता अचानक अवतरलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या काव्याविषयी अशोक हिवाळे यांनी लिहिले आहे:
``बाबाजींचे हे चरित्र मला फारच आवडले. कारण (हॉलीस रीड या ) लेखकाने ते त्या काळातील मराठीत अगदी सोप्या भाषेत लिहिले आहे. बाबाजींनी ख्रिस्ती मंडळीला केलेला बोध आजही अनुकरणीय, तसेच त्यांनी मंडळीला लिहिलेली पत्रे बोधप्रद आहेत. देवाच्या वचनांनी पुरेपूर भरलेली आहेत. त्या काळात उपासना संगीत नव्हते. बाबाजी हे कवीही होते. त्यांच्याच कविता मंडळीमध्ये गाइल्या जात असत. . त्या काळात बाबाजीने जे निःस्वार्थी परिश्रम ख्रिस्ती मंडळीसाठी केले ते वाखाणण्यासारखे आहेत.
कॉलऱ्याच्या साथीत (1833) त्यांचा दुदैवी अंत झाला व ख्रिस्ती मंडळी एका खऱ्या ख्रिस्ती सेवकाला मुकली. त्यांना अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभले. मला वाटते ते आणखी जगले असते, तर खूप मोठ्या प्रमाणावर व सखोल आध्यात्मिक कार्य अहमदनगर जिल्ह्यात झाले असते. ''
Camil Parkhe


Friday, January 26, 2024

 


American Marathi Mission : या तिघांमुळे महाराष्ट्रात बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. 

मुंबई : दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १८१३ रोजी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या मिशनवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात पाय ठेवला आणि भारतात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली.

गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या. आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते.

महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.

ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.

याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.

याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.

एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते.

त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.

मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत.

त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट होते. आणि या उद्दिष्टाला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.

त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.

ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली.

अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या.

याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.

अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.

उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.

आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.

अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.

ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण.

भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.

`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.

प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते.

इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.

मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले.

महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.

``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :

''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनी जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते.

एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''

पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे.

यांपैकी अनेक देशांत कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत.

त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.

मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:

``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत.

प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली.

स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’

याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.

''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती.

इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली.

मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली.

या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली.

आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले.

सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’

मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.



American Marathi Mission : या तिघांमुळे महाराष्ट्रात बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. 

मुंबई : दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १८१३ रोजी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या मिशनवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात पाय ठेवला आणि भारतात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली.

गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या. आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते.

महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.

ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.

याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.

याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.

एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते.

त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.

मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत.

त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट होते. आणि या उद्दिष्टाला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.

त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.

ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली.

अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या.

याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.

अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.

उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.

आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.

अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.

ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण.

भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.

`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.

प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते.

इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.

मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले.

त्यानंतरच स्वतः फुले दाम्पत्याने पुण्यात शाळा उघडल्या. फरार मॅडम यांच्या शाळेत सावित्रीबाई यांच्याबरोबर फातिमा शेख यांनीही प्रशिक्षण घेतले.

महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.

``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :

''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनी जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते.

एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''

पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे.

यांपैकी अनेक देशांत कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत.

त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.

मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:

``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत.

प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली.

स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’

याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.

''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती.

इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली.

मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली.

या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली.

आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले.

सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’

मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.


   वझीर बेग  


भारतात मुस्लीम मुलींसाठी पहिली आधुनिक शाळा सुरु करणारे  वझीर बेग  

 अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात पाय रोवू लागली आणि त्यानंतर  देशात आधुनिक शिक्षणपद्धत रुढ झाली. अमेरिका आणि इंग्लंडमधून धर्मप्रसारासाठी  आलेल्या ख्रिस्ती मिशनरींनी  या देशात पहिल्यांदाच विविध धर्मांच्या आणि जातीजमातींच्या मुलांमुलींसाठी आधुनिक शिक्षणाची दरवाजे खुली केली.  या शिक्षणास सर्वांत प्रखर विरोध झाला तो इथल्याच लोकांकडून. या शाळांत शिकण्यासाठी मुलांमुलींना गोळा करणे हे अत्यंत अवघड काम होते. अनेकदा या मुलांमुलींनी शाळेत यावे यासाठी दरवेळेस त्यांना पैसे, कपडेलत्ते पुरवावे लागत असे. मुलांमुलींच्या पालकांच्या शिक्षणाबाबतच्या अनास्थेमुळे नव्याने सुरु झालेल्या  या शाळा अल्पावधीत बंद पडत असत. 

अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १८४०च्या दशकाच्या मध्यात पुण्यात केवळ मुस्लीम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु करण्यात आली होती आणि या शाळेतील शिक्षक होते वझीर बेग.   

 पुण्यातच एका मुस्लीम कुटुंबात जन्म झालेल्या आणि तरुणपणात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या वझीर बेग यांच्याकडे भारतात केवळ मुस्लीम मुलींसाठी आधुनिक शिक्षणपद्धतीची असलेली पहिलीवहिली शाळा सुरु करण्याचे श्रेय जाते.      

 

वझीर बेग यांचे संपूर्ण शिक्षण पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या जेम्स मिचेल यांच्या शाळांत झाले होते.    जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल या मिशनरी दाम्पत्याचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला.  बेग यांचा ख्रिस्ती धर्माकडे १८४२ पासून ओढा होता, मात्र उघडपणे त्यांनी आपली धर्मश्रद्धा व्यक्त केली नाही. आपल्या धर्मांतराचा आपल्या मुस्लीम कुटुंबावर काय विपरीत परिणाम होईल या शंकेने त्यांनी आपली धर्मश्रद्धा लगेचच प्रकट केली नाही.  मिशनरी शाळांत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वझीर बेग याच शाळांत ते शिक्षक बनले.

दरम्यान १८४५ च्या काळात पुणे स्कॉटिश मिशनच्या शाळांतले सर्वांत महत्त्वाचे स्थानिक शिक्षक असलेल्या वझीर बेग यांना धारवाड गव्हर्नमेंट स्कुलचे मुख्याध्यापक पद देऊ करण्यात आले होते. यासाठी त्यांना दरमहा शंभर रुपये पगार देण्यात येणार होता.  त्याकाळात इतका भरघोस पगार दिला जात असतानासुद्धा वझीर बेग यांनीं मात्र हे पद घेण्यास नकार दिला. (रॉबर्ट  हंटर पान २५९

 वझीर बेग यांचा जन्म १८२४ चा. जोतिबा फुले यांच्यापेक्षा वझीर बेग तीन वर्षांनी मोठे होतेजोतीराव फुले यांनी जेम्स मिचेल यांच्या शाळांत १८४१ ते १८४७ या काळात इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. याचा अर्थ काही काळ वझीर बेग आणि जोतिबा फुले रेव्हरंड मिचेल यांच्या शाळेत सहाद्यायी होते. वझीर बेग १८४५ ला या मिशनरी शाळेत शिक्षक होते आपल्याहून वयाने काही वर्षे लहान असलेल्या जोतिबांना बेग  यांनी नक्कीच शिकवले असणार.

 

दरमहा शंभर रुपये पगार असलेली सरकारी नोकरी नाकारुन वझीर बेग यांनीं  मोठा आर्थिक त्याग करण्यामागचे  कारण आणि मिशनच्या कार्याबाबत त्यांची आवड ओळखणे काही अवघड नव्हते. लवकरच वझीर बेग यांनीं आपला बाप्तिस्मा करण्यासाठी अर्ज केला.  त्याशिवाय शुक्रवारी १८ सप्टेंबर १८४६ रोजी त्यांनीं मुंबईत असलेल्या आपल्या वडिलांना एक पत्र लिहून याबाबत कल्पना दिली.

 

वझीर बेग यांचे वडील एच. एम.  २२ रेजिमेंटमध्ये मेसमन म्हणून नोकरीला होते. बाप्तिस्मा घेण्याचा आपला बेग यांनी इरादा व्यक्त  केल्यानंतर  त्यांच्याच सहमतीने या निर्णय स्कॉटिश मिशनच्या शाळांत जाहीर  करण्यात आला. साहजिकच पुणे शहरातसुद्धा ही बातमी वेगाने पसरली. वझीर बेग यांचे मित्र आणि नातेवाईक स्कॉटिश मिशनच्या कुंपणात येऊन वझीर बेग यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागले. 

शब्बाथच्या दिवशी वझीर बेग यांचा  बाप्तिस्मा होणार होता. त्यादिवशी अनेक लोक मिशन हाऊसमध्ये जमले, मुंबईतून तातडीने पुण्याला आलेले  वझीर बेग यांचे वडीलसुद्धा  तेथे हजर होते. वझीर बेग यांना  त्यांच्या घरी काही काळासाठी येण्यासाठी आग्रह करण्यात आला. वझीर बेग एकदा त्यांच्या घरी आले कि त्यांना तेथून परत स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये पाठवले जाईल याबाद्दल शंकाच होती. आणि ते खरेच ठरले. 

अखेरीस याबाबत मॅजिस्ट्रेटकडून खातरजमा करण्यात आली आणि वझीर बेग यांना त्यांच्या घरच्या लोकांच्या, नातेवाईकांच्या  आणि इतरांच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. वझीर बेग यांचा गुरुवारी २४ सप्टेंबर १८४६ रोजी बाप्तिस्मा झाला. यावेळी वझीर बेग यांचे वय २२ वर्षे होते.   

या प्रसंगी वझीर बेग यांच्या वडलांचे आपल्या मुलांबाबतचे वर्तन अत्यंत उल्लेखनीय असेच होते.  त्य्यांच्या चिरंजिवाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी त्याचे घरात असलेले सर्व कपडे त्याच्याबरोबर दिले. काही काळापूर्वी त्यानी वझीर यांना एक महागडे सोन्याचे घड्याळ दिले होते, ते घड्याळसुद्धा  आणि एक सोन्याची साखळी त्यांनी आपल्या मुलाला दिली. वझीर बेग यांच्याप्रमाणेच त्यांना इतर नातेवाईकांचे आणि मुस्लीम मित्रांची वागणूक होती. त्यानंतर  वझीर बेग दररोज स्कॉटिश शाळांत शिकवण्यासाठी घरातून बाहेर पडत तेव्हा त्यांच्या जाण्याच्या आणि परत येण्याच्या वेळी नंतर कुणीही त्यांना त्रास दिला नाही. 

स्कॉटिश मिशनच्या शाळेत बेग हे एक उत्तम शिक्षक मानले जात असत.  ख्रिस्ती झाल्यानंतर स्कॉटिश मिशनच्या आवारातच वझीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु केली होती.

 पुण्यामुंबईत स्कॉटिश मिशनच्या शाळांतले ब्राह्मण आणि पारशी  विद्यार्थी ख्रिस्ती झाल्यानंतर या दोन्ही शहरांत खळबळ माजली होती, मुंबईत पारशी समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याने तर बराच काळ तणाव निर्माण झाला होता.  अशाच प्रकारचे प्रसंग वझीर बेग यांच्या ख्रिस्ती होण्याने पुण्यात निर्माण होईल असे वाटले होते. मात्र तसे काही झाले नाही.  या घटनेच्या वेळी पुण्यातल्या स्कॉटिश शाळांत १३० विद्यार्थी होते. त्यानंतर ही संख्या १०७ पर्यंत कमी झाली होती, मात्र यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनीं या शाळांतील आपला अभ्यासक्रम संपवून पुढील शिक्षणासाठी ही शाळा सोडली होती.     

बाळा गोपाळ जोशी हा अनाथ असलेला  ब्राह्मण तरुण जेम्स मिचेल यांच्या मिशन शाळेत तीन वर्षे शिकत होता. जोतिबा फुले यांचा तोसुद्धा सहाद्यायी.  मुंबईहून जॉन मरे मिचेल पुण्यात आले तेव्हा १८४६च्या ऑकटोबरात तो त्यांच्यासह मुंबईला शिकण्यासाठी गेला.   मरे मिचेल यांच्या सहवासात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. मात्र बाप्तिस्मा घेण्यासाठी बाळा गोपाळ जोशी यांना पुण्यात जेम्स मिचेल यांच्याकडे परत पाठवण्यात आले. 

याचे कारण म्हणजे बाळा यांच्या ख्रिस्ती होण्याच्या उदाहरणाचा पुण्यातल्या त्यांच्या संबंधित विद्यार्थी आणि इतरांवर प्रभाव पडेल अशी मिशनरींना आशा वाटत होती. त्याशिवाय मुंबईत आणखी एक ब्राह्मण विद्यार्थी ख्रिस्ती झाला असता तर या बातमीने तेथे मोठी खळबळ माजणार होती आणि पुन्हा एकदा तिथल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला असता.  

मुंबईतल्या जॉन विल्सन आणि रॉबर्ट विल्सन प्रभुतींनी याबाबत आधीच एका प्रकरणात आपले तोंड भाजून घेतले होते. मुंबईत बाप्तिस्मा झाल्यास काही वर्षांपूर्वी म्हणजे १८३९ साली पारशी विद्यार्थ्यांच्या बाप्तिस्म्यानंतर प्रचंड क्षोम निर्माण होऊन तिथल्या शाळा अगदी ओस पडल्या होत्या त्याची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक होते. मुंबईतल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांत त्याकाळात पुन्हा विद्यार्थी यायला लागले होते आणि त्यांच्यामध्ये एका पारशी विद्यार्थ्यांचाही समावेश होता.    

पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेतील विद्यार्थी बाळा गोपाळ जोशी याने आणि त्या दिवसांत कोर्ट मार्शल होऊन  तुरुंगात असलेल्या रुस्तमजी नौरोजी  या पारशी तरुणाने  २७  डिसेंबर १८४६ रोजी बाप्तिस्मा घेतला तेव्हा पुण्यात मोठी खळबळ निर्माण झाली होती.   बाळा गोपाळ जोशी यांनी पुण्यातल्या मिशनरी शाळेतले शिक्षक  जेम्स मिचेल आणि वझीर बेग यांच्या वर्गांत शिक्षण घेतले होते.    

वझीर बेग यांच्या बाप्तिस्म्याच्यावेळी आणि काही काळानंतर बाळा गोपाळ जोशी यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी स्कॉटिश मिशन हाऊसपाशी उडालेला गोंधळ त्यावेळी जेम्स मिचेल यांच्या मिशनरी शाळेत विद्यार्थी असलेल्या जोतिबा फुले यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून अनुभवला असणार.     

 ``इ. स. १८४६ मध्ये रे. जेम्स मिचेल यांनी पुण्यातील दोघा तरुण ब्राह्मणांस बाप्तिस्मा दिला. तेव्हा जोतीराव आणि त्यांचे मित्र यांच्या मनाची थोडी चलबिचल झाली. परंतु सामाजिक सुधारणेचे कार्य तडीस न्यायचे असेल, तर प्रत्यक्ष धर्मांतर न करण्यात शहाणपण आहे हा विचारच शेवटी प्रबळ ठरला.’’  

पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या अधिपत्याखालील स्थानिक चर्चमध्ये नेतेपदासाठी निवडणूक झाली तेव्हा  कॅसिडी नावाच्या इंडो-ब्रिटन व्यक्तीची आणि वझीर बेग तसेच  विठोबा या स्थानिक ख्रिस्ती व्यक्तींची निवड करण्यात आली होती. या स्थानिक चर्चमध्ये तेव्हा  २८ जण फुल कम्युनियनमध्ये होते.  कॅसिडी हे पुण्यातल्या  बाजार स्कुलमध्ये शिक्षक होते तर वझीर बेग हे शहरातल्या शाळेत शिक्षक होते. यापैकी बाजार शाळॆत १८४९ च्या जुलैत ९० विद्यार्थी होते तर शहरातल्या बेग यांच्या शाळेत ५० विद्यार्थी होते.    (रॉबर्ट हंटर पण २६२)

भिल्ल जमातीच्या एका सोळा ते अठरा वय असणाऱ्या एका प्रमुखाला पुण्यात शिक्षणासाठी सरकारी कॉलेजात आणण्यात आले होते. आसपासच्या अनेक गावांतून मिळणारा महसूल त्याला एकदोन वर्षानंतर वारसाहक्काने  त्याच्या मालकीचा होणार होता. या भिल्ल जमातप्रमुखाबरोबर  त्याचा वंशपरंपरागत कारभारी किंवा त्याच्या मालमत्तेचा व्यवस्थापकसुद्धा होता.  पुण्यात या  दोन्ही व्यक्ती  वझीर बेग यांच्या निगरानीत ठेवल्या होत्या, त्यांना काय शिक्षण द्यायचे याबाबतचे स्वातंत्र्य बेग यांना देण्यात आले होते. बेग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्या दोघांवर इतका प्रभाव पडला होता कि ते दोघे बेग यांच्या दैनंदिन कौटुंबिक प्रार्थनेत सहभागी होत असत आणि  कधीकधी चर्चला त्यांच्यासह जात असत.  

या स्कॉटिश शाळांत वझीर बेग यांचे  शिक्षण झालं होते त्याच जेम्स मिचेल यांच्या शाळांत आता बेग शिक्षक  म्हणून कार्यरत होते.  नंतर अशाचप्रकारे जोतिबा फुलेसुद्धा जेम्स मिचेल  यांच्या शाळांत शिक्षक म्हणून काम करत होते.   हिंदुस्थानी आणि पर्शियन भाषांवर वझीर बेग यांचे प्रभुत्व होते. त्याशिवाय अरेबिक, तुर्की आणि इंग्रजी भाषा ते शिकले.  पुण्यात ते नंतर लॅटिन आणि ग्रीक भाषासुद्धा शिकले. ख्रिस्ती मिशनरी म्हणून कार्य करण्याचे आपल्याला पाचारण आहे अशी त्यांची भावना होती.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या   `सत्यशोधक' चित्रपटात जोतिबांचे शिक्षक म्हणून रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्यावर काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत.    

जॉन टेरेन्स यांनी   `स्टोरी ऑफ अवर मिशन्स : वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया’  या १९०२ साली प्रकाशित झालेल्या   पुस्तकात लिहिले आहे : 

``स्कॉटिश मिशनच्या अगदी सुरुवातीच्या काळात इस्लाम धर्मातून ख्रिस्ती झालेल्या वझीर बेग यांनी काही काळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालू केली होती. त्याशिवाय डॉ.  मरे मिचेल यांनी आपल्या शाळेत सत्तर मुलींना आणण्यास यश मिळवले होते. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे  या शिक्षणासाठी एक छोटीशी रक्कम फी म्हणून सुद्धा आकारली जात असे.    

त्यानंतर काहीं काळाने अशीच एक शाळा प्रखर विरोधाला तोंड देत एकदोन वर्षे चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या कार्यात सातत्य नव्हते, मिस स्मॉल यांची नेमणूक करण्यात आली तेव्हा समाजाच्या या घटकासाठी काहीच करण्यात येत नव्हते. ‘’. 

वझीर बेग यांनी १८५३ साली ईशज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. वझीर बेग यांना प्रवचनकार म्हणून १८५३च्या डिसेंबरात प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर २७ जानेवारी १८५४ रोजी त्यांनी पुण्यात मुस्लीम लोकांसाठी एक हिंदुस्थानी शाळा उघडली. या शाळेत सुमारे चाळीस मुलांनी प्रवेश घेतला. त्याकाळात मुस्लीम लोकांना शिक्षणाकडे आकर्षित करणे आणि त्याशिवाय हे शिक्षण ख्रिस्ती धर्माशी संबधित असले तर किती अवघड होते हे लक्षात घेता विद्यार्थ्यांची चाळीस ही संख्या खुपच होती. 

वझीर बेग १८५४ साली  स्कॉटलंडला गेले, तेथे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे त्यानीं ठरवले होते. या विद्यापीठाच्या कागदपत्रांत मात्र त्यांचे नाव दिसत नाही. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे सदस्यत्व त्यांना १८६१ साली मिळाले. मेलबर्न येथे आल्यानंतर स्थानिक  प्रेस्बीटेरियन चर्चच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले.  पोर्ट अल्बर्ट येथे  १८६४ साली धर्मगुरु म्हणून त्यांचा दीक्षाविधी झाला. सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथे पौर्वात्य भाषा आणि साहित्य या विषयांवर अरेबिक ही मुख्य भाषा ठेवून व्याख्यातेपद निर्माण केले होते, त्या पदावर १८६६च्या डिसेंबर महिन्यात बेग यांची नियुक्ती झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच पौवार्त्य संशोधनासाठी एक विभाग स्थापन झाला होता. 

त्याशिवाय पौर्वात्य भाषांसाठी अनुवादक म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने बेग यांची नेमणूक केली, मात्र विद्यार्थ्यांच्या पुरेशा संख्येअभावी हे व्याख्यातेपद काही काळच टिकले.  नॉर्थ कॅरोलिनातील ग्रीनव्हिल येथील बॅप्टिस्ट कॉलेजने त्यांना १८६४साली मानद डॉक्टर ऑफ लॉ  (एलएलडी) पदवी प्रदान करुन त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला.     

वझीर बेग ऑस्ट्रेलियात  प्रेस्बीटेरियन चर्चचे धर्मगुरू बनले.  बेग यांच्या या आध्यात्मिक जीवनक्रमातील या घटनेचे  जॉन टॉरेन्स  या लेखकाने आपल्या पुस्तकात भारतातील त्याकाळच्या एका महत्त्वाच्या राजकीय घटनेशी तुलना केली आहे. एका  भारतीय नेत्याची लंडनमधल्या हाऊस  ऑफ कॉमन्समध्ये कायदा करण्यासाठी निवड झाली आहे असे या लेखकाने  म्हटले   आहे.  ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय  नागरीक  (१८९२-९५)  म्हणून निवड होणाऱ्या दादाभाई नौरोजी यांचा हा संदर्भ आहे हे उघड आहे.  

क्विन्सलँड येथील प्रेस्बीटेरियन चर्चमध्ये १८६७ साली काही काळ धर्मगुरु म्हणून काम केल्यानंतर बेग चालमर्स चर्चचे प्रमुख होते. या पदाचा त्यांनीं १८८२ साली राजीनामा दिला.  प्रेस्बीटेरियन चर्चच्या युतीचे ते खांदे समर्थक होते आणि चर्चच्या अनेक समित्यांवर त्यानीं काम केले. बेग यांनी लिहिलेल्या `मॅन्युअल ऑफ  प्रेस्बीटेरियन प्रिन्सिपल’ चे सिडनी येथे १८७० साली प्रकाशन झाले.  रोमन कॅथोलिक पंथाचे बेग कट्टर विरोधक होते. बेग यांचा विवाह मार्गारेट रॉबर्टसन स्मिथ यांच्याशी  १२ मार्च १८७२ रोजी झाला होता आणि  त्यांना दोन मुले होती.

ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाल्यानंतरसुद्धा रेव्हरंड वझीर बेग आपल्याला शिक्षण देणाऱ्या  पुणे स्कॉटिश मिशनकेंद्राला विसरले नव्हते. तेथून त्यांनी  पाच पौंडाची रक्कम आपल्या पुणे स्कॉटिश मिशनला देणगी म्हणून पाठवली होती यावरुन त्यांचा या मिशनकेंद्राप्रती कृतज्ञताभाव दिसून होतो.  

रेव्हरंड वझीर बेग  यांचे  वयाच्या ५८ व्या वर्षी  त्यांचे ४ जानेवारी  १८८५ रोजी निधन झाले आणि वेव्हर्ले कबरस्थानांत त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.  

मुस्लीम समाजातील मुलींना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्याच्या कार्यांत स्कॉटिश मिशनच्या वझीर बेग यांना यश आले नाही, तरी काही वर्षांनी स्कॉटिश मिशनच्याच मिशनरींना या कार्यांत अगदी भरीव यश मिळाले. 

जोतिबा फुले यांचे एक प्रेरणास्थान असलेल्या,पुण्यातल्या संस्कृत कॉलेजचे म्हणजे आताच्या डेक्कन कॉलेजचे काही काळ प्राचार्य (व्हिझिटर) असलेल्या रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी पुण्यात  केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती. या शाळेस मुस्लीम मुलींचा नुसता चांगलाच प्रतिसाद लाभला नाही तर या शाळेची असलेली फी भरण्याससुद्धा मुलींचे पालक तयार होते.

भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणा बत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लिम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत विस्तृत माहिती जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे.   ती अशी :

 ``ब्राह्मण आणि इतर जातींचे लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूप उत्साही होते तरी आपल्या मुलींच्या शिक्षणाबाबत ते बेफिकीर होते. मिशनरींच्या  आणि  स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या  शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे   होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.

 सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची  एक मुस्लिम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता.  या शाळेत  विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती. त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती.

 त्याकाळात  शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फी घेणे  ही एक विशेष बाब म्हणावी लागेल. याचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कोलकाता, नंतर मुंबईत, अहमदनगर  आणि पुण्यात ख्रिस्ती मिशनरींनी  शाळा सुरु केल्या तेव्हा शाळेतल्या मुलांमुलींसाठी अन्न, कपडेलत्ता किंवा काही रक्कम यासारखे आमिष देणे आवश्यक असायचे.  नंतरच्या काळातसुद्धा म्हणजे अगदी जोतिबा आणि सावित्रीबाई  फुले यांनासुद्धा आपल्या शाळांत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी असे करावे लागत असे.   

 स्कॉटिश मिशनच्या शिक्षणकार्याबाबतची माहिती दूरवर पसरत होती आणि आपल्याही शहरांत,  गावांत अशा शाळा सुरु व्हाव्यात असे तेथील लोकांना वाटायला लागले होते. पुण्याजवळ इंदापूर येथे सुरु झालेली एक शाळा नंतर बंद पडली तेव्हा तेथील गावकऱ्यांनी स्कॉटिश मिशनने तेथे शाळा चालवावी असा आग्रह केला.  शाळा सुरु करण्याबाबत हे ग्रामस्थ इतके आग्रही होते कि पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या मुस्लिम मुलींसाठी असलेल्या शाळांची फी मुलींचे पालक  देतात त्याप्रमाणे .इंदापूरच्या शाळेची फी भरण्याससुद्धा  स्थानिक विद्यार्थ्यांचे पालक तयार आहेत असे त्यांनी कळवले होते.  

भारतातील मुस्लीम समाजातील काही समाजसुधारकांनीसुद्धा केवळ मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या, मात्र त्यासाठी खूप काळ जावा लागला होता. त्यादृष्टीने अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात वझीर बेग आणि जॉन मरे मिचेल यांची ही कामगिरी फार मोलाची असे म्हणावे लागेल.  

भारतातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात रेव्हरंड वझीर बेग आणि रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी केलेले हे महत्त्वाचे योगदान कदाचित विस्मृतीत गेले असते.  मात्र स्कॉटिश मिशनसंबंधीच्या दस्तऐवजांत आणि विविध पुस्तकांत  मुस्लीम मुलींसाठी असलेल्या या शाळांबाबत उल्लेख आढळतो. त्यामुळे बेग आणि मरे मिचेल यांच्या या ऐतिहासिक कार्याची नोंद राहिली आहे.

Camil Parkhe