Showing posts with label Ahmednagar. Show all posts
Showing posts with label Ahmednagar. Show all posts

Wednesday, October 1, 2025


देवाचे गोठणे. कोकणात राजापूरजवळ देवाचे गोठणे हे गाव आहे. मराठी साहित्यविश्वाची थोडीफार ओळख असलेल्या कुणाही व्यक्तीला हे नाव परिचित असेल.

सत्तरच्या दशकात मी पहिल्यांदा राजापूर येथे पोहोचलो तेव्हा बॅरिस्टर नाथ पै यांचा हा लोकसभा मतदारसंघ आणि इथली अवचितपणे अवतरणारी `राजापूरची गंगा’ म्हणून हे शहर ऐकून होतो.
नाथ पै यांचा या मतदारसंघात पुढे वारसा चालवणारे मधू दंडवते यांचे नाव तोपर्यंत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या नजरेत भरले नव्हते.
तर देवाचे गोठणे लक्षात राहते ते एका वेगळया प्रकारचे नाव असलेल्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या पुस्तकामुळे.
माधव कोंडविलकर यांनी लिहिलेले हे आत्मकथन सत्तरीच्या दशकातील दया पवारांचे `बलुतं', सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचे `अगा जे कल्पिले नाही' आणि, लक्ष्मण माने यांचे 'उपरा' अशा पहिल्या दलित लेखकांच्या आत्मकथनांत आपले स्थान राखून आहे.
अशा प्रकारे लक्षात राहिलेल्या या गावाचे नाव काही महिन्यांपूर्वी ऐतिहासिक संदर्भात वाचले तेव्हा हे नाव अधिक ठळकपणे मनात कोरले गेले.
नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या `सावलीचा शोध' या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात देवाचे गोठणे येथील बाबाजी रघुनाथ या ख्रिस्ती झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या कोकणस्थ ब्राह्मण माणसाविषयी केलेली संक्षिप्त नोंद वाचली अन ख्रिस्ती समाजात आढळणाऱ्या असंख्य जातीजमाती या विषयावरील लिखाणाबाबत माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात बीज पेरले गेले होते.
रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांनी १८८१ साली लिहिलेल्या `अमेरिकन मराठी मिशन यासंबंधी मंडळ्यांची संक्षिप्त बखर' या पुस्तकात बाबाजी रघुनाथ मराठे या आद्य एतद्देशीय ख्रिस्ती मिशनरीबाबत माहिती लिहिली आहे.
अहिल्यानगरमधून ख्रिस्ती झालेल्या पहिल्या काही ब्राह्मण व्यक्तींमध्ये रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांचा समावेश होता.
त्यांची आणखी एक ओळख म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत कृष्णाची भूमिका करण्याबाबत प्रसिद्ध असलेले अभिनेते शाहू मोडक यांचे ते पणजोबा.
या पुस्तकात मोडक यांनी लिहिले आहे,
'' या (अहमदनगर) मिशनातील पहिले एतद्देशीय ख्रिस्ती साह्यकारकही उच्च जातींतले मनुष्य होते. बाबाजी रघुनाथ मराठे नामक कोकणस्थ ब्राह्मण जो मुंबईस मिशनरी लोकांस भाषा शिकवणारा पंडित असता, ख्रिस्ती शास्त्र शिकून व सत्याची खात्री पावून ख्रिस्ती झालेला होता, तोच या मिशनातला पहिला एतद्देशीय ख्रिस्ती उपदेशक होता.’’
मात्र अवघे बेचाळीस वर्षे आर्युमान लाभलेल्या या कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती माणसाचे भारतीय सामाजिक इतिहासात आणखी एक आगळेवेगळे स्थान आहे.
त्याकाळात ब्राह्मण आणि इतर वरच्या वर्णातील पुरुषांनी एखाद्या विधवेशी रितसर लग्न करणे ही अशक्यप्राय घटना होती. बाप्तिस्मा स्विकारुन ख्रिस्ती झालेल्या बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाने नेमके हेच केले.
त्या जमान्यात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते.
या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही पहिलीच घटना. बाबाजी रघुनाथ मराठे यांनी अमेरिकन मिशनच्या मुंबईतल्या आवारात आवडाबाई नावाच्या एक ब्राह्मण विधवेशी विधिवत लग्न करून हा इतिहास घडवला.
रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत लिहिले आहे: `` १८३१ साली या (ख्रिस्ती) मंडळीत बाबाजी रघुनाथ हा एकच एतद्देशीय ख्रिस्ती होता.
१८३१ यावर्षी आवडाबाई ब्राह्मणीण, जी बाबाजी रघुनाथाची बायको ती, कोंडू महार, काशिबा महार आणि भिक्या महार ही चौघेजणे (ख्रिस्ती) मंडळीत मिळाली.''
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनी १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती. त्यावेळी ब्रिटिश संसदेने कायदा संमत करुन भारतात विधवाविवाह कायदेशीर ठरवला होता.
कॅथोलिक धर्मगुरु आणि नन्स यांनी आजन्म अविवाहित राहण्याचे व्रत स्विकारलेले असते. बाबाजी रघुनाथ मराठे हे ज्या प्रोटेस्टंट ख्रिस्ती मिशनरींबरोबर काम करत होते त्यांच्यामध्ये विवाह आणि पुनर्विवाह निषिद्ध नव्हता.
पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी धोंडो केशव कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या पुण्यातील शारदा सदनातील गोदूबाई (नंतर आनंदीबाई) या बालविधवेशी १८९३ला पुनर्विवाह केला होता.
बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
विशेष म्हणजे ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीच्या काळात असा जगावेगळा जीवनपट असलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांचे चरित्र त्यांच्या अकाली निधनानंतर लगेचच १८३५ साली लिहिले गेले होते.
अमेरिकन मिशनरी हॉलीस रीड यांनी लिहिलेले हे चरित्र अलीकडेच पुण्यातील एक संशोधक अशोक एस. हिवाळे यांच्या वाचनात आले आणि `बाबाजीची बखर' या शिर्षकाखाली ७६ पानांचे पुस्तक त्यांनी ते स्वतःच्या सुमित्र प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहे.
मात्र या चरित्रात मी वर उल्लेख केलेल्या बाबाजी रघुनाथ यांनी केलेल्या विधवाविवाहाचा उल्लेख नाही. हा उल्लेख आढळतो तो अमेरिकन मराठी मिशनच्या १८३१-१९१३ या अर्धशतकाच्या कार्याच्या इतिहासात.
विल्यम हेजन यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या `अ सेंच्युरी इन इंडिया - अ हिस्टॉरीकल स्केच ऑफ द मराठी मिशन ऑफ द अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्स (अमेरिकन मराठी मिशन) फ्रॉम १८१३ टू १९१३' या ग्रंथात हा उल्लेख मला आढळला तेव्हा मी अचंबित झालो होतो.
या पुस्तकात लिहिले आहे:
``बाबाजींचा २० नोव्हेंबर १८३१ रोजी बाप्तिस्मा झाला आणि लवकरच त्यांनी ज्या महिलेसोबत ते काही काळ राहात (म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये) होते. अशा एका ब्राह्मण विधवेशी विवाह केला. हिंदू असलेल्या व्यक्तींसाठी प्रथमच हा ख्रिस्ती विवाहसोहळा अशा रीतीने पार पडला आणि हा विलक्षण सोहळा पाहण्यासाठी चॅपेल (छोटे प्रार्थनामंदिर)मध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांसाठी तो एक नवा अनुभव होता.
त्याचवेळी, बाबाजींच्या बाप्तिस्म्याबरोबरच गोपीबाई नावाच्या एका महार स्त्रीलाही प्रभुभोजनात (होली कम्युनियन) सामिल करुन घेण्यात आले आणि अशा प्रकारे हिंदू समाजातील दोन विरुद्ध टोकांचे घटक पहिल्यांदाच या नव्या ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले.
मिशनरींनी एकत्रित आणलेल्या या ख्रिस्ती मंडळीचे स्वरूप विविध घटकांचे मिश्रण वाटावे असेच होते. प्रभुभोजनात सामिल झालेल्या त्या एकोणीस व्यक्तींविषयी त्यांनी म्हटले की, त्या “ जगाच्या चारही दिशांमधून आलेल्या शेम, हाम आणि जाफेथ यांचे ते वंशज आहेत.''
(नौकेच्या मदतीने जगबुडीतून वाचलेल्या नोहाची शेम, हाम आणि जाफेथ ही तीन मुले होती. त्यांच्यापासून पुढे पृथ्वीवर मानववंश विस्तार झाला, असे बायबलमध्ये उत्पत्तीच्या - जेनेसिस - पुस्तकात लिहिले आहे.)
रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत जातीभेदाच्या प्रथेला छेद देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे :
``नोव्हेंबरात बाबाजी रघुनाथ मराठे कोकणस्थ ब्राह्मणातला प्रथमच ख्रिस्ती होऊन या मंडळीला मिळाला. आणि त्याच वेळेला कोणी गोपी महारीणही ख्रिस्ती होऊन या मंडळीला मिळाली. तेव्हा ब्राह्मण व महारीण ही उभयता प्रथमच ख्रिस्ती होऊन भाऊ बहिण अशी होऊन एका पंगतीत बसली असा चमत्कार दृष्टीस पडला.’’
बाबाजींच्या या धर्मपरिवर्तनानंतर लगेचच म्हणजे एक महिन्यातच मुंबईतल्या अमेरिकन मिशनची एक तुकडी अहिल्यानगरला आली. त्या तुकडीमध्ये बाबाजी रघुनाथ मराठे यांचा समावेश होता. या घटनेचे ``अमेरिकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात पुढीलप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे:
``अहमदनगरातील व सभोवतालच्या प्रदेशांतील मिशनच्या इतिहासाला २० डिसेंबर १८३१ मध्ये प्रारंभ झाला. या सुमारास सहा व्यक्ती - यापैकी पाच मिशनरी व एक धर्मांतरित ब्राह्मण भक्त - अकरा दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर येथे येऊन पोहोचले. मुंबईपासून अहमदनगरचे अंतर अवघे २०० मैलांचे असूनही प्रवासाला इतका दीर्घकाल लागत होता. दुसऱ्याच दिवशी ते वचनबद्ध होऊन त्यांनी स्वतःचेच ख्रिस्ती चर्च निर्माण केले. अनेक प्रेरक घटनांपैकी अमेरिकन मिशन बोर्डाच्या बखरीत या पहिल्याच चर्च सभेचा वृत्तांत आढळतो तो असा:
डिसेंबर २१, १८३१
आम्ही, सहाजण ज्यांची नावे खाली दिली आहेत ते या ठिकाणी मुंबईच्या अमेरिकन मिशनची शाखा म्हणून आल्यावर आणि या व्यवहारावर दैवी कृपा व्हावी म्हणून विनम्र विनंती केल्यावर, आम्ही विधियुक्त एकत्रित येत आहोत आणि त्रैक्य, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा - याला ख्रिस्ती चर्च म्हणून समर्पण करीत आहोत.
आमचा स्वीकार व्हावा आणि परस्परांना (आम्ही) आशिर्वादित करुन या ठिकाणच्या लोकांना आशिर्वादित करावे.
अँलन ग्रेव्ह्ज, हॉलिस रॉड
मेरी ग्रेव्हज कॅरोलिन रॉड
विल्यम हार्वे बाबाजी रघुनाथ मराठे ‘’
रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत नगर येथील मिशन स्थापनेचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे:
``याच (१८३१) वर्षांच्या डिसेंबर महिन्यात रेव्ह. (अँलन) ग्रेव्हज साहेब, रेव्ह (हॉलीस) रीड साहेब, रेव्ह. (विल्यम) हार्वे साहेब, हे तिघे मिशनरी सहकुटुंब, बाबाजी रघुनाथ मराठे या एतद्देशीय ख्रिस्ती भावास संगती घेऊन येथे आले आणि या सातांनी १८३१ ता. २१ रोजी म्हणजे शालीवाहन शके १७५३ मार्गशीर्ष वंध्य ३ बुधवार या दिवशी महंमदनगर येथे यथाविधी ईश्वरी भक्ती करण्यासाठी व जे उमेदवार मंडळीस मिळण्यास तयार होतील त्यास मुंबई मंडळींची शाखा अशी एक मंडळी स्थापिली.
नंतर आठ एतद्देशीय मनुष्ये बाप्तिस्मा घेऊन त्यासी मिळाल्यावर त्यांची स. १८३३ मार्च ता. सहा रोजी अहमदनगर मिशनातली शुद्ध एतद्देशीय ख्रिस्ती मंडळी स्थापली गेली. तिजवर रेव्ह. रीड साहेब हे तूर्त पाळक म्हणून निवडले गेले आणि रा. बाबाजी रघुनाथ हे वडील असे आणि रा. दाजीबा निळकंठ (प्रभू) हे सेवक म्हणजे कारभारी असे नेमले गेले.’’
रामकृष्ण विनायक मोडक यांनी पुढे असेही लिहिले आहे:
``या (नगर) मिशनातील पहिले एतद्देशीय ख्रिस्त साह्यकारकही उच्च जातीतले सुशिक्षित मनुष्य होते, बाबाजी रघुनाथ मराठे नामक कोकणस्थ ब्राह्मण जो मुंबईस मिशनरी लोकांस भाषा शिकवणारा पंडित असता, ख्रिस्ती शास्त्र शिकून व त्याच्या सत्याची खात्री पावून ख्रिस्ती झालेला होता, तोच या मिशनातला पहिला एतद्देशीय उपदेशक होता. त्याचप्रमाणे दाजी निळकंठ प्रभूही मिशनशाळेचा पंतोजी मुंबईस असता ख्रिस्ती झाला तो या मिशनचा दुसरा प्रथमचा एत्तद्देशीय ख्रिस्ती उपदेशक होता.‘’
त्याकाळचे अहमदनगर आणि आजचे अहिल्यानगर महाराष्ट्रातील `मराठी ख्रिस्ती समाजाचे येरुशलेम’ असे समजले जाते. अहिल्यानगर शहरातील पहिल्या संस्थापक ख्रिस्ती मंडळींमध्ये पाच युरोपियन मिशनरींबरोबरच बाबाजी रघुनाथ मराठे या कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती व्यक्तीचाही समावेश होता हे विशेष.
बाबाजी रघुनाथ मराठे यांचे मराठी ख्रिस्ती समाजाला आणि पर्यायाने या मातीतल्या संस्कृतीला दिलेले आणखी एक मोठे योगदान आहे.
ते म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच ख्रिस्ती उपासनेच्या प्रसंगी उपयोगी पडेल अशा हेतूने मराठी गीते रचली.
मराठी भाषेच्या इतिहासात फादर थॉमस स्टीफन्स यांच्यानंतर मात्र इथल्याच मातीतील, एतद्देशीय ख्रिस्ती व्यक्तीने केलेली ही पहिलीच पद्यरचना, त्यामुळे या गायनांना आणि भजनकीर्तनाला खूप महत्त्व आहे.
नारायण वामन टिळक किंवा कृष्णाजी सांगळे यांच्याआधी अनेक दशकांपूर्वी बाबाजींनी ही भजने आणि कीर्तने लिहिली होती.
हॉलीस रीड यांनी बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या चरित्रात बाबाजींची अनेक भजने आणि कीर्तनेसुद्धा दिली आहेत. बाबाजींच्या अभंगाच्या अखेरच्या कडव्यात `बाबाजी म्हणे' किंवा `ख्रिस्तदास म्हणे’ अशी ओळ असते.
मात्र बाबाजींबद्दल आणि त्यांच्या काव्य, भजन आणि कीर्तन अशा साहित्यकृतींबाबत काहीच माहिती नसल्याने आणि त्यांच्या आद्य पद्यरचना कुठल्याच उपासना संगीत पुस्तकांत नसल्याने त्यांचे कर्तृत्व आणि महती यावर गेली दोन शतके पडदा पडला गेला होता.
नवलाची आणखी एक बाब म्हणजे बाबाजी रघुनाथ मराठे यांचे अमेरिकन मिशनरी हॉलीस रीड यांनी १८३५ साली लिहिलेले आणि नंतर काळाच्या ओघात गायब झालेले चरित्र अशोक हिवाळे यांना कसे मिळाले ही आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत हिवाळे यांनी याबाबत लिहिले आहे. ते म्हणतात:
``मला बाबाजींचे रेव्ह. हॉलीस रीड यांनी लिहिलेले मराठी चरित्र गुगलवर एका वेबसाईटवर मिळाले. त्याच्या जेपीईजे फाईल्स मी डाऊनलोड करून त्यातील टेक्स्ट युनिकोड टेक्स्टमध्ये रुपांतरीत करुन स्वतःलाच ईमेल केले. तेथून कॉम्प्युटरवर त्याचे श्रीलिपी टाइपात रूपांतर करून हे पुस्तक पेजमेकरमध्ये सेट केले आहे व मुद्रित करण्यासाठी त्याची पीडीएफ फाईल बनवली. ‘’
मला आजही घरच्या टिव्हीवर ओटीटीवर चित्रपट लावणे जमत नाही. लॅपटॉपवर दररोज मी अनेक तास काम करतो, मात्र हे फक्त जुने टाईपरायटर बडवण्यापुरते मर्यादित असते. लॅपटॉपला माऊस लावल्याशिवाय मला टाईप करताच येत नाही, टचपॅडचा वापरच नाही. मोबाईलच्या वापराबाबतसुद्धा डिट्टो.
तर अशा या टेक्नॉसॅव्ही अशोक हिवाळे यांच्या व्यक्तिमत्वाबाबत तुम्ही काय ठोकताळे बांधणे असतील ?
अवघे एकोणऎंशी वर्षे आयुर्मान असलेल्या हिवाळे यांची नजर आता अधू झाली असून त्यांना केवळ एका डोळ्यानेच थोडेफार स्पष्ट दिसते, आतापर्यंत पाच वेळेला हृदयाच्या धक्क्यांना ते सामोरे गेलेले आहेत. हालचाल केवळ त्यांच्या घरापुरतीच मर्यादित आहे. असे असले तरी मोबाईल डोळ्याजवळ घेऊन त्यांचे वाचन-लिखाण, पुस्तक प्रकाशन आणि संशोधन अव्याहत चालू आहे.
हिवाळे यांनी पुण्यात जीवनवचन प्रकाशन या प्रकाशन संस्थेत अनेक पदांवर काम करताना पाचशेहून अधिक पुस्तकांचे संपादन, मुद्रिशोधन केलेले आहे, अनेक पुस्तके लिहिली आहेत,अनुवादित केली आहेत.
मुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या गोव्यातल्या धेम्पे कॉलेजात बीएला माझा ऐच्छिक मराठी हा विषय होता. मराठी लिहिण्याशी माझा तो अखेरचा संबंध. त्यानंतरची माझी संपूर्ण बातमीदारी आणि पत्रकारिता इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीतली.
काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमातला माझा एक मराठी लेख अशोक हिवाळे यांच्या वाचण्यात आला. त्यांच्यातील संपादक आणि मुद्रितशोधक जागा होऊन सहज एक चाळा म्हणून त्यातील शुद्धलेखनातील थोड्याफार चुका कंसात लिहून तो लेख त्यांनी माझ्याकडे पाठवला होता !
काळाच्या उदरात लुप्त झालेल्या आणि आता अचानक अवतरलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या काव्याविषयी अशोक हिवाळे यांनी लिहिले आहे:
``बाबाजींचे हे चरित्र मला फारच आवडले. कारण (हॉलीस रीड या ) लेखकाने ते त्या काळातील मराठीत अगदी सोप्या भाषेत लिहिले आहे. बाबाजींनी ख्रिस्ती मंडळीला केलेला बोध आजही अनुकरणीय, तसेच त्यांनी मंडळीला लिहिलेली पत्रे बोधप्रद आहेत. देवाच्या वचनांनी पुरेपूर भरलेली आहेत. त्या काळात उपासना संगीत नव्हते. बाबाजी हे कवीही होते. त्यांच्याच कविता मंडळीमध्ये गाइल्या जात असत. . त्या काळात बाबाजीने जे निःस्वार्थी परिश्रम ख्रिस्ती मंडळीसाठी केले ते वाखाणण्यासारखे आहेत.
कॉलऱ्याच्या साथीत (1833) त्यांचा दुदैवी अंत झाला व ख्रिस्ती मंडळी एका खऱ्या ख्रिस्ती सेवकाला मुकली. त्यांना अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभले. मला वाटते ते आणखी जगले असते, तर खूप मोठ्या प्रमाणावर व सखोल आध्यात्मिक कार्य अहमदनगर जिल्ह्यात झाले असते. ''
Camil Parkhe


Monday, May 13, 2024

अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघ


आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळचा कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला.. इथले नंतर राज्यात आणि केंद्रात प्रस्थापित झालेले अनेक नेते मूळचे कम्युनिस्ट विचारधारेचे.

मला आठवते ती इथली पहिली लोकसभेची निवडणूक १९७१ सालची. त्यावेळचे तेव्हाच्या कोपरगाव मतदारसंघातले सर्वांत तगडे उमेदवार होते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि त्यांच्या विरोधात होते होतकरु तरुण उमेदवार एकनाथ विठ्ठलराव विखे पाटील.
निवडणूक प्रचारादरम्यान या दोघांना त्यावेळी श्रीरामपूर येथे आमच्या `पारखे टेलर्स' दुकानासमोर मी पाहिले. कॉम्रेड कडू पाटील यांची प्रचारात आघाडी होती.
इंदिराबाईंच्या `गरिबी हटाव'च्या त्या लाटेत निवडणूक अर्थात बाळासाहेब विखे जिंकले आणि त्यानंतर जिल्ह्यातला कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ओसरत गेला, राज्यात सुद्धा.
आताचा शिर्डी मतदारसंघ राखीव झाला, त्यामुळे विखे घराण्याने शेजारच्या अहमदनगर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. तरी शिर्डी मतदारसंघात विखे चालवतील त्या उमेदवाराला भरपूर मते मिळतील अशीच स्थिती आहे.
रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा २००९ साली शिर्डी राखीव मतदासंघात पराभव झाला होता, आता ते भाजपच्या मदतीने राज्यसभेत आहेत, केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत.

तर या राखीव मतदारसंघात आपण आपल्या पसंतीचा उमेदवार जिंकून आणू शकतो अशी भावना येथील ख्रिस्ती मतदारांची आहे, याचे कारण या मतदारसंघाचा इतिहास आणि रचना.
मुंबई, पुणे आणि पालघर (वसई) खालोखाल इथे ख्रिस्ती मतदान अत्यंत लक्षणीय आहे आणि तिरंगी किंवा चौरंगी लढतीत ही मते निर्णायक ठरु शकतात.
उद्या सोमवार १३ मे रोजी या मतदारसंघात मतदान आहे आणि त्या निमित्ताने ख्रिस्ती लोकांच्या समाजमाध्यम ग्रुप्स वरच्या चर्चा या अनुषंगाने आहेत. या अनेक ग्रुप्सवर मी असल्याने या चर्चेतील आशय समजला.
अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाला स्वतःचा एक आगळावेगळा इतिहास आहे, ओळख आहे.
पुण्या-मुंबईतल्या कॉस्मोपॉलीटन ख्रिस्ती लोकांच्या तुलनेत हे लोक इथल्या मातीतले आहेत, इथल्या समाजजीवनाशी त्यांची नाळ जुळलेली आहे.
श्रीरामपूर परिसरात हरेगाव येथील खाजगी बेलापूर शुगर फॅक्टरी, टिळकनगर येथील खाजगी महाराष्ट्र शुगर फॅक्टरी येथे अंगमेहेनती कामगार वर्ग इथला वंचित समाजाचा होता.
त्या कामगारवर्गामध्ये स्थानिक आणि शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यातील ख्रिस्ती समाजाचे मोठे प्रमाण होते.


माझे आजोळ असलेल्या वैजापूर तालुक्यातील माळीघोगरगाव येथील माझे मामेभाऊ सत्तरच्या दशकात श्रीरामपूर शेजारच्या टिळकनगरच्या महाराष्ट्र शुगर फॅक्टरीत कामाला होते.
या तीनचार खाजगी साखर कारखान्यातील कामगार संघटनांचे नेते वंचित समाजातील चांगदेव त्रिभुवन आणि रणशूर वगैरे मंडळी होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर काम केलेल्या दादासाहेब (दामोदर) रुपवते यांच्यापासून आंबेडकरी चळवळीशी आणि कार्यकर्त्यांशी येथील वंचित ख्रिस्ती लोकांचे घट्ट संबंध राहिलेले आहेत.
रुपवते नंतर काँग्रेसमध्ये गेले, मंत्रीही झाले.
सत्तरच्या दशकात अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाचे कार्यक्रम नामदार दादासाहेब रुपवते यांच्या उपस्थितीवाचून होत नसत.
आज दादासाहेब रुपवते यांच्या नात असलेल्या उत्कर्षा रुपवते या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डीत उमेदवार आहेत.
इथले प्रमुख उमेदवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आहेत तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून लढत आहेत.
अर्थात शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघांतली खरी अटीतटीची लढत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे राधाकृष्ण विखे या दोन पारंपरीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आहे.
मात्र यावेळी राधाकृष्ण विखे स्वतः अहमदनगर मतदारसंघात त्यांचा मुलगा सुजय विखे यांच्या निवडणूक प्रचारात गुंतलेले आहेत. तिथे महाआघाडीच्या निलेश लंके यांनी महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे.
शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघांतला ख्रिस्ती समाज आंबेडकरी चळवळीशी आणि कार्यकर्त्यांशी नाते सांगतो याचे कारण हे नाते तसे एकदम नैसर्गिक आहे.
इथल्या ख्रिस्ती समाजाचा इतर मागास वर्गात म्हणजे ओबीसीमध्ये समावेश होतो.
हा ख्रिस्ती समाज इथल्या वंचित समाजाचाच एक घटक आहे, धर्मामुळे त्यांच्यावर अन्याय होऊन त्यांना अनुसूचित जातीचे आरक्षण लागू होत नाही, इतकाच काय तो फरक.
त्यामुळे इथल्या राखीव जागेवर नैसर्गिक हक्क असुनसुद्धा आपण लढू शकत नाही तरी इथे लढणाऱ्या एखाद्या आपल्या उमेदवाराला आपण पाठबळ देऊन निदान निवडून आणू शकतो अशी भावना साहजिकच शिर्डी आणि काही प्रमाणात शेजारच्या अहमदनगर मतदारसंघांतील वंचित ख्रिस्ती समाजाची आहे
.
ही वस्तुस्थिती असल्याने या दोन्ही मतदारसंघांतील ख्रिस्ती मतदान आपल्या बाजूने वळवण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेस, महायुती आणि वंचित बहुजन आघाडींकडून होत आहेत.
यात ज्या आघाडीला यश मिळेल त्या आघाडीकडे या अटीतटीच्या निवडणुकीत यशाचे पारडे झुकेल अशी स्थिती आहे.
उद्याच ( १३ मे रोजी) मतदान होणाऱ्या पुणे मतदारसंघात आणि मावळ मतदारसंघात (पिंपरी चिंचवडचा समावेश असलेल्या) सुद्धा ख्रिस्ती मतदानाची संख्या अत्यंत लक्षणीय आहे.
या दोन्ही शहरांतील मतदार यादीतील या ख्रिस्ती मतदारांच्या विशिष्ट नाव आणि आडनावांमुळे त्यांची धार्मिक पार्श्वभूमी राजकीय पक्षांच्या नेत्यांना कळत देखील नाही अशी गंमत आहे. (उदाहरणार्थ, माझे व माझ्या मुलीचे नाव).
त्यामुळे या मतदारांकडे एक व्होटबँक म्हणून पाहिले जात नाही आणि इथेच गफलत होते.
महाराष्ट्रात ख्रिस्ती मतदारांची सर्वाधिक संख्या मुंबईत दोन मतदारसंघांत आहे.
तिथे पुढल्या टप्प्यात, २० मे रोजी, मतदान आहे. त्याबाबत नंतर...
Camil Parkhe

Saturday, May 4, 2024

ख्रिस्ती मतदार
 अठरापगड जाती आणि जमातींचे समावेश असलेल्या ख्रिस्ती मतदारांचा महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत कुणाला कौल असणार आहे?

ख्रिस्ती समाजाचे राज्यात अधिकृत आणि अनधिकृत अशाप्रकारे तीन टक्क्यांच्या आसपास प्रमाण आहे.
भारतात सगळीकडे अगदी मुंबईपुण्यातसुद्धा धर्म, जात आणि पोटजात पाहून राजकीय पक्ष आपला उमेदवार देतात.
कारण मतदारसुद्धा त्याच पद्धतीने मतदान करतात.
महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विशेषतः विधानसभेत ख्रिस्ती समाजाचे एकगठ्ठा मतदान निर्णायक ठरु शकते याची तळागळावर काम असणाऱ्या राजकीय नेत्यांना माहिती असते.
याचा कधी तरी फटका बसला तर मग याची जाणीव होते.
एखादा उमेदवार थोड्याफार मतांच्या फरकाने पराभूत होतो अशावेळी मग एकगठ्ठा असलेल्या अशा मतदानामुळे ही किमया घडली हे कळते. असे मुंबईत एका प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अलीकडच्या काळात झाले होते.
त्यामुळें गाफील राहणे, कुठल्याही समजघटकाला दुर्लक्षित करणे धोकादायक ठरते.
इतर धर्मिय समाजाप्रमाणे निदान महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज एकसंघ, एक संस्कृतीचा किंवा एक भाषिक नाही. हे विशेषतः मुंबईपुण्यात जाणवते.
महाराष्ट्रात सर्वाधिक ख्रिस्ती मतदान आहे ते राज्याच्या राजधानीत.
मुंबईतल्या दोन लोकसभा मतदारसंघांत कुठलाही राजकीय पक्ष या समाजाला गृहीत धरू शकत नाही अशी तिथे परिस्थिती आहे. काटे की टक्कर असेल तर मग विचारूच नका.
मुंबईतला ख्रिस्ती मतदार हा पूर्णतः कॉस्मोपोलीटन आहे. मूळचे गोंयकार असलेले अनेक कॅथोलीक्स बांद्रा, चेंबूर, गोरेगाव वगैरे परीसरात मोठ्या संख्येने आहेत.
त्याशिवाय मूळचा दाक्षिणात्य असलेला ख्रिस्ती मतदार आहे,
त्याशिवाय संपूर्ण राज्यातून मुंबईत स्थायिक झालेल्या मराठी भाषक ख्रिस्ती समाज सुद्धा लक्षणीय आहे. भाषा, संस्कृती वगैरे कारणांमुळे या मराठी ख्रिस्ती लोकांचे वेगळेपण पटकन लक्षात येत नसते.
मुंबईत पाय रोवलेल्या या लोकांची नाळ आपल्या गावांकडे कायम असतेच. गावाकडच्या मतदानावरसुद्धा त्यांचा प्रभाव असतोच.
एकेकाळी म्हणजे सत्तरच्या दशकात मुंबईतून समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो विधानसभेवर निवडून येत असत.
त्याआधी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या काँग्रेसच्या स. का. पाटील यांना नंतर ' बंदसम्राट ' असे नाव कमावलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी चक्क लोकसभा निवडणुकीत हरवले होते !
डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे केवळ महापौर नव्हते तर नंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री सुद्धा बनले.
शेजारच्या वसईतून एखादे गोन्सालवीस किंवा इतर कुणी आमदार म्हणून निवडून येत असत.
मुंबईच्या सेलीन डिसिल्वा या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८३-८४) आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८५) राज्यमंत्री होत्या.
या समाजाच्या प्रतिनिधीला त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही.
.
कोकणात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या परिसरात फर्नांडिस, डिसोझा, डान्टेस, अशी नावे असणारी मूळची गोंयकार असलेली मंडळी लक्षणीय संख्येने आहेत.
गेल्या दोनतीन शतकात पोर्तुगीजांच्या गोव्यातून इथे हे कॅथोलिक लोक स्थायिक झालेत. त्यांना दुर्लक्षित करून कुठल्याही पक्षाला, उमेदवाराला विजयी होता येत नसते.
इथे एखादा कॅथोलीक उमेदवार सोशल इंजियरींगच्या आधारावर विधानसभेवर निवडून येऊ शकतो.
मुंबई आणि वसईनंतर ख्रिस्ती मतदानाचा सर्वाधिक टक्का आहे तो पुण्यात.
पूर्वी बारामती मतदारसंघात असलेले पिंपरी चिंचवड शहर आता मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॉस्मोपोलिटन ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व लगेच जाणवते. तिथले कॉलेज आणि इतर शिक्षणसंस्था या ख्रिस्ती समाजाची ओळख आहे.
अहमदनगर, नाशिक जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा येथे ख्रिस्ती समाज आपली खास ओळख राखून आहे. हा समाज तिथल्या मातीतला आहे, त्यामुळे आपल्या पाठीशी कोण राजकारणी उभा राहतो हे हा समाज पुरता ओळखून आहे.
संकटाच्या वेळी आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्ते या समाजाच्या पाठीशी असतात हे अनेकदा दिसून आले आहे. याचे कारण हा समाज आंबेडकरवाद्यांना परका मुळीच नाही. रक्ताचे आणि नात्यातले संबंध आहेत त्यांचे.
हे लोक ख्रिस्ती असल्याने भाजप आणि पूर्ण परिवार त्यांच्याकडे नेहेमीच संशयाने पाहत असतो हे साहजिकच.
तर मग या ख्रिस्ती मतदारांचा नैसर्गिक ओढा कुठल्या राजकीय पक्षांकडे असतो?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष ख्रिस्ती समाजाला गृहीत धरून असतात..
"तुम्ही जाऊन, जाऊन जाणार कुठे ? "असा मग्रुरीचा भाव.
पण खरेच तसे आहे काय?
एक सांगतो.
विसेक वर्षांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेत मागच्या वेळी एक ख्रिस्ती नगरसेविका निवडून आली होती. अश्विनी डॅनिएल लांडगे हे त्यांचे नाव.
त्यांना हैदराबादच्या ओवेसी यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. `एमआयएम'च्या त्या एकमेव नगरसेविका होत्या.
अशाप्रकारे आज कुठला राजकीय पक्ष ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करू शकेल?
यावेळी या राजकीय फाटाफुटीच्या काळात ख्रिस्ती मतदार कुणाच्या तागडीत आपला कौल टाकणार आहेत?
काही अंदाज?
यापुढील काही पोस्ट्समध्ये याविषयी सविस्तर लिहिणार आहे....
****
फोटो ओळी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांची भेट घेऊन त्यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे. अंतोन कदम
यावेळी हजर होते.
Camil Parkhe

Friday, January 26, 2024

 


American Marathi Mission : या तिघांमुळे महाराष्ट्रात बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. 

मुंबई : दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १८१३ रोजी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या मिशनवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात पाय ठेवला आणि भारतात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली.

गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या. आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते.

महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.

ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.

याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.

याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.

एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते.

त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.

मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत.

त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट होते. आणि या उद्दिष्टाला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.

त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.

ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली.

अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या.

याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.

अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.

उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.

आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.

अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.

ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण.

भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.

`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.

प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते.

इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.

मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले.

महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.

``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :

''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनी जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते.

एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''

पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे.

यांपैकी अनेक देशांत कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत.

त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.

मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:

``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत.

प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली.

स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’

याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.

''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती.

इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली.

मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली.

या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली.

आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले.

सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’

मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.



American Marathi Mission : या तिघांमुळे महाराष्ट्रात बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. 

मुंबई : दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी १८१३ रोजी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या मिशनवर निघालेल्या तीन व्यक्तींनी मुंबई बंदरात पाय ठेवला आणि भारतात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली.

गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या. आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते.

महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.

ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.

याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.

याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.

एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते.

त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.

मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत.

त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट होते. आणि या उद्दिष्टाला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.

त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.

ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली.

अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या.

याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.

अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.

उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.

आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.

अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.

ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण.

भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.

`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.

प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते.

इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.

मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले.

त्यानंतरच स्वतः फुले दाम्पत्याने पुण्यात शाळा उघडल्या. फरार मॅडम यांच्या शाळेत सावित्रीबाई यांच्याबरोबर फातिमा शेख यांनीही प्रशिक्षण घेतले.

महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.

``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :

''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनी जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते.

एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''

पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे.

यांपैकी अनेक देशांत कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत.

त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.

मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:

``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत.

प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली.

स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’

याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.

''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती.

इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली.

मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली.

या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली.

आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले.

सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’

मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.