Showing posts with label P L Deshpande. Show all posts
Showing posts with label P L Deshpande. Show all posts

Wednesday, July 30, 2025


श्रीरामपूरला शाळेत पाचवी-सहावीला असताना आमच्या पारखे टेलरिंग दुकानासमोर असलेल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात मी जाऊ लागलो. तिथे वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचण्याची सवय लागली. नंतर हे वाचनालय स्वतःच्या प्रशस्त जागेत स्थलांतरित झाले तेव्हा जरासे दूर अंतरावर असलेल्या या नव्या इमारतीत मी जाऊ लागलो. चारपाच वर्षांनी शिक्षणासाठी मीच श्रीरामपूर सोडले, गोव्यात कॉलेज शिक्षणासाठी आणि व्यवसायानिमित्त राहिलो, औरंगाबाद आणि पुण्यात इतकेच नव्हे तर युरोपात राहिलो पण माझे वाचन कायम राहिले. पुस्तकांची साथ मी सोडली नाही आणि ही पुस्तके कायम माझी साथीदार बनून राहिली आहेत.
माझ्या वाचनाच्या आवडीचा श्रीगणेशा झाला तो श्रीरामपुरच्या नगरपालिका लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बालविभागात. तिथे जगातल्या विविध नामवंतांची विविध भाषांतली मराठीत आणलेली पुस्तके होती. इथे मी संस्कृतमधल्या शाकुंतल, मेघदूत, मृच्छकटिक अशा साहित्यरचना वाचल्या तशीच इसापनीती, ग्रीक भाषेतली इलियड ही पुस्तके वाचली आणि भा. रा. भागवत यांची `फास्टर फेणे' हा नायक असलेली पुस्तके, रवींद्रनाथ टागोरांची साने गुरुजींनी मराठीत आणलेली कितीतरी पुस्तके आणि कादंबऱ्या वाचल्या.
विल्यम शेक्सपियरची अनेक नाटके मी या शालेय जीवनात वाचून काढली. या सर्वच पुस्तकांची कथानके आणि पात्रे आज आठवत नसली तरी त्या काळात या पुस्तकांनी मला भुरळ घातली होती हे नक्की. मराठीतलं ‘ऑल टाइम बेस्ट सेलर’ ठरलेलं साने गुरुजींचं 'श्यामची आई' पण वाचलं. नंतर आचार्य अत्रे यांचं तीन-चार खंडांत असलेलं 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मचरित्र वाचलं. खूप वर्षांनंतर विस्टन चर्चिल यांनीही असंच खंडात्मक लिहिलेलं आत्मचरित्र सहज चाळलं.
माध्यमिक शाळेत आल्यावर मग वडिलांकडे हट्ट लावून या लोकमान्य टिळक वाचनालयाची वर्गणी भरली आणि मोठमोठ्या लेखकांची पुस्तके वाचायचा सपाटाच लावला. यापैकी काही लेखक आणि त्यांच्या नावाजलेल्या, आजही मनावर भूरळ असलेल्या साहित्यकृती आजही आठवतात.. मराठीतले पहिले ज्ञानपीठ वि. स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीला १९७४ साली मिळाले आणि लगेच ही कादंबरी वाचून काढली आणि मग खांडेकरांच्या 'दोन मेघ' सारख्या इतर पुस्तकांचा वाचून फडशा पाडला.
कुणा लेखकाचे एखादे पुस्तक आवडले कि मग लगेच त्याची इतरही पुस्तके वाचायला घ्यायची असा प्रकार असायचा. या पद्धतीने मी पु. ल. देशपांडे यांची 'बटाट्याची चाळ', असा मी असामी' वगैरे पुस्तके वाचली. शंकर पाटील, द, मा. मिरासदार, त्यावेळच्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत, रविंद्र गुर्जर यांनी मराठीत आणलेली 'पॉपिलॉन' `गॉडफादर’ सारखी पुस्तके वाचली. त्या सत्तरच्या दशकात गुरुनाथ नाईक यांच्या गुप्तहेरांच्या, रहस्यकथा असलेल्या पुस्तकांच्या मालिका इतर वाचकांप्रमाणे मलाही भुरळ घातली होती.
`ललित' या मासिकात `ठणठणपाळ' या सदरात हातात हातोडा घेऊन भारदस्त मिशी असलेल्या व्यक्तीच्या चित्रासह लिखाण प्रसिद्ध व्हायचे. नंतर ते सदर जयवंत दळवी लिहित असत असा यथाकाश गौप्यस्फोट झाला आणि मग जयवंत दळवी यांची खूप पुस्तके वाचली.
लहानपणी घरी `चांदोबा’ मासिक यायचे, त्यातले `विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही; या वाक्याने सुरु होणारे सदर आणि महाभारतातल्या विविध कथा रंगीत चित्रांसह देणारे सदर माझे अत्यंत आवडीचे. महाभारताच्या या कथामालिकेमुळे या महाकाव्याच्या कायमच्या प्रेमात पडलो. त्यामुळे महाभारतातील पात्रे आणि उपाख्याने मला अगदी दुष्यंत, भरतापासून तो थेट राजा परिक्षित आणि जन्मेजय आणि उषा -अनिरुद्ध या प्रेमी युगुलापर्यंत परिचित आहेत किंवा अधुंकसे आठवतात. `बायबल’मधली पात्रे आणि छोटीमोठी कथानके आठवतात अगदी तसेच.
पुढच्या काळात दुर्गा भागवत यांचे `व्यासपर्व’ आणि कॉम्रेड शरद पाटील यांचे महाभारतावरील विश्लेषण तर खूपच भावले. आजही महाभारतावर काहीही लिहिलेले दिसले की अधाशासारखे मी वाचतो. महाभारतावर नऊ तास चालणारे नाटक दिग्दर्शित करणारे पिटर ब्रुक यांचे या जुलै महिन्यात निधन झाले तेव्हा त्यांच्यावर इंग्रजी आणि मराठी दैनिकांतले आलेले लेखसुद्धा अशाच उत्सुकतेने वाचले.
गो. नि. दांडेकर यांच्या 'मृन्मयी', 'कुणा एकाची भ्रमणगाथा' या कादंबऱ्या वाचल्या. गोनिदांची आगळीवेगळी लेखनशैली खूप भावली आणि रणजित देसाई यांच्या `स्वामी’ आणि `श्रीमान योगी’ या कादंबऱ्याने मला पार इतिहासकाळात फिरवून आणले होते.
`स्वामी'मधला एक प्रसंग मी आजपर्यंत विसरलो नाही. पेशवे माधवरावांनी कोठडीत ठेवलेल्या राघोबा दादांना भेटायला साडेतिन शहाण्यातील एक असलेले सखाराम बापू बोकिल आल्यावर बुद्धीबळाचा खेळ होतो. तेव्हा या खेळादरम्यान 'तुमचा राजा दोन घरे मागे घ्या' असा सल्ला दिला जातो. या सल्ल्याची माधवरावांना कल्पना दिली जाते. पेशव्यांच्या मदतीसाठी नागपूरहून निघालेले भोसल्यांचे सैन्य परत जाते आणि मग पेशवे माधवराव भोसल्यांच्या वकिलांना तंबी देतात असा तो प्रसंग. त्याशिवाय पानिपतच्या रणभूमीवर गायब झालेल्या सदाशिवराव पेशव्यांचा तोतयाबद्दलचे `स्वामी’ कादंबरीतील प्रकरणही अंधुकसे आठवते.
यानंतर आठदहा वर्षांनी गोव्यात म्हापसा येथे कोकणी साहित्य संमेलनाचे रणजित देसाई स्वागताध्यक्ष होते तेव्हा त्यांचे भाषण ऐकताना या पेशवाकालीन बुध्दीबळाच्या डावाची आठवण झालीच.
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या अशा अनेक पुस्तकांतील काही प्रसंगानी आजही मनात घर केलेले असते.
गोव्यात पणजीला शिक्षणासाठी गेलो आणि तिथे संभाषणाची भाषाच बदलली. इंग्रजी संभाषण आणि लिहिणे शिकायचे असेल तर मराठी, कोकणी आणि हिंदीत बोलायचे नाही असा आमच्या निवासस्थानी नियम होता. तो नियम पाळला, मात्र त्याने माझे वाचन थांबले नाही.
फरक एव्हढाच कि आता मी केवळ इंग्रजी पुस्तके वाचू लागलो आणि ज्ञानाचे केवढे मोठे दालन माझ्यासमोर खुले झाले आहे याचा मलाच अचंबा वाटला.
माझ्याबरोबर राहणारी आणि शिकणारी इंग्लिश माध्यमाची बेनेडिक्त फरीया, लेस्टर फर्नांडिस आणि जेम्स पैस अशी मुले 'द रुटस' सारख्या जाडजूड कादंबऱ्या तिनचार दिवसांत (आणि रात्रींत ) वाचून संपवत. मलाही तशीच सवय लागली. `फ्रिडम ऍट मिडनाईट' ही लॉरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांची गाजलेली साहित्यकृती हे मी इंग्रजीत वाचलेले पहिले पुस्तक.
एक मात्र खरे कि महाराष्ट्राबाहेर राहिल्याने, मराठी भाषेशी संपर्क खंडित झाल्याने या दिडदशकाच्या काळात मराठीत आलेले उत्तमोत्तम साहित्य माझ्या वाचनात आले नाही, त्यामुळे अनेक नामवंत लेखकांच्या साहित्यकृती माझ्या वाचनात आल्या नाहीत ही खंत आहेच. मात्र या काळात इंग्रजी साहित्याचा परिचय झाला ही एक जमेची बाजू.
दरम्यान काळाच्या ओघात वाचनाची आवड बदलत गेली आहे. लहानपणी सुरुवातीच्या काळात हातात पडेल ते पुस्तक वाचण्याचा छंद होता, प्रामुख्याने कादंबऱ्या, ललित साहित्य, ऐतिहासिक, रहस्यमय साहित्य, चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचली जायची. नंतर ललित साहित्याऐवजी वैचारीक, गंभीर आणि समीक्षणात्मक साहित्य अधिक वाचले जाऊ लागले. बा. सी मर्ढेकर, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्या कविताही वाचल्या, आणि दलित आत्मकथनांची बाबुराव बागुल, लक्ष्मण माने, दया पवार यांची अनेक पुस्तके वाचली.
पुस्तक वाचनाच्या वेडापायी एक धडा मी काही फार कटू अनुभवातून शिकलो. आपल्याला फार आवडलेले पुस्तक आपल्या एखाद्या मित्राला वाचायला दिल्यावर काय होते याची मला आजही आठवण होते आणि मी अस्वस्थ होतो.
गोव्यात नोकरी करत असताना पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी युरोपात बल्गेरियात काही महिने गेलो होतो , या दरम्यान रशियाला भेट दिले. या काळात अनेक इंग्रजी पुस्तके आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या स्मरणिका मी गोळ्या केल्या. परत आल्यावर या पुस्तकांचा आणि स्मरणिकांचा अनेक लेख लिहिण्यासाठी वापर केला. यापैकी एक पुस्त्रक चक्क बल्गेरियातले खास विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरावर आधारित होते. पुण्यात आल्यावर एका मित्राला यापैकी आवडती पुस्तके मी वाचण्यासाठी दिली आणि आजतागायत ती पुस्तके मला परत मिळालेली नाहीत.
असेच पुणे शहराचे ऐतिहासिक संदर्भ असलेला पुणे महापालिकेने तयार केलेला डॉ मं. पा. मंगुडकर संपादित दुर्मिळ वर्धापन विशेषांक एका मित्राला वाचण्यासाठी दिला तोसुद्धा माझ्या संग्रहातून कायमचा नाहीसा झाला. या अनुभवातून कुणाला कधीही आपले आवडते पुस्तक देऊ नये असा कानाला खडा लावला आहे.
एक मात्र खरं कि अनेक पुस्तकं मी वाचत असलो तरी कितीतरी नामवंत नामवंत मराठी साहित्यिकांची एकही साहित्यकृती मी वाचलेली नाही आणि आता या नावाजलेली पुस्तकं वाचण्याची इच्छाही राहिलेली नाही, हा, मात्र या साहित्यिकांवर वेळोवेळी लिहिले जाणारे लेख आणि पुस्तके मी आवर्जून वाचतो, हे नक्की कशामुळे हे मात्र समजत नाही.
उदाहरणार्थ, जी. ए. कुलकर्णी यांचे मूळ साहित्य मी वाचलेले नाही, मात्र त्यांच्या गूढ कथांवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर लिहिले गेलेले भरपूर साहित्य मी वाचले आहे. उदाहरणार्थ, जी ए कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांचा पत्रव्यवहार आणि जीएंची पुण्यात राहणारी बहीण नंदा पैठणकर यांनी आपल्या भावाविषयी लिहिलेल्या गोष्टी.
गौरी देशपांडेंची पुस्तकेसुद्धा कशी कुणास ठाऊक माझ्या कधीच वाचनात आली नाहीत, मात्र त्यांच्या लिखाणावर आणि व्यक्तिमत्वावर असलेले लिखाण मला आजही आकर्षित करतात.
कपाटात कधी काळी विकत घेतलेली पण न वाचलेली कितीतरी पुस्तके आहेत, तरीही आणखी पुस्तके घेण्याचा घेण्याचा मोह टाळता येतच नाही. मागच्या आठवड्यात म्हणूनच मग 'महर्षी ते गौरी' हे पुस्तकसुद्धा `साधना' पुस्तकाच्या दुकानात विकत घेतले. या पुस्तकाचे मुख्य आकर्षण अर्थात `समाजस्वास्थ' र. धो. कर्वे यांच्यावरचा विस्तृत लेख होता. `रधों' सारख्या व्यक्तींची चरित्रे मला कायम आकर्षित करत असतात.
नवीन पुस्तके विकत न घेण्याचा माझा निर्धार मला कधीच पाळता येत नाही. सुगावा बुक स्टॉलमध्ये अनेकदा चाळलेले आणि विकत घ्यायचे नाही म्हणून पुन्हापुन्हा रॅकमध्ये ठेवलेले लोकवाड्मय गृहाचे अर्जुन डांगळे यांचे नवे पुस्तक 'दलित पँथर – अधोरेखित सत्य ' मागच्या आठवड्यात असेच मग माझ्या बॅगेत आले. लोकवाड्मय गृहाचे दुसरे पुस्तक, `ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे' असेच अगदी अनिच्छेनेच माझ्या बागेत आले.
या दोन्ही पुस्तकांबद्दल मी येथे लिहिणार आहेच
या वाचनाच्या वेडाचे अखेर फलीत काय? आयुष्यातल्या अनेक वर्षांच्या दिवसांचे आणि रात्रींचे तास असे वाचन करण्यात गेले. त्याचे नक्की फलित काय असे गणित मांडायला गेले तर कितीतरी सकारात्मक बाबी नजरेसमोर येतात. सर्वात प्रथम आणि महत्त्वाची बाब म्हणजे वाचनाने अनेक व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर नेत्यांनी ग्रंथांमुळे आणि वाचनामुळे त्यांच्या जीवनांत कसा आमूलाग्र बदल घडवला हे लिहिले आहे.
माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर केवळ भौतिक प्रगतीचाच विचार केला तर वाचनामुळे मला पुढे उच्च शिक्षण घेता आले आणि माझे काही भाऊ घरच्या शिंपी कामाकडे वळाले तसे माझ्या बाबतीत न घडता राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरच्या इंग्रजी दैनिकांत पत्रकार म्हणून माझी कारकीर्द झाली.
पुस्तक वाचनाचा छंद आणि आवड असणाऱ्या इतर अनेक लोकांचा अनुभव असाच असणार आहे. त्याशिवाय, वाचनसंस्कृतीच्या भौतिक लाभांपेक्षाही ग्रंथ वाचनामुळे समृद्ध होणारे जीवन अधिक मोलाचे महत्त्व असते.
आजच्या मोबाईलच्या युगात पुस्तकांचे वाचन झपाट्याने कमी होत चालले आहे. नव्या जमान्यात कदाचित छापील पुस्तकांऐवजी ई-पुस्तके अधिक वाचली जातील. नव्या पिढीला ही नव्या धर्तीची पुस्तके अधिक भावतील. मात्र पुस्तके छापील वा डिझिटल स्वरुपांत असोत, मुळात पुस्तके अथवा ग्रंथ वाचण्याचा आनंद आणि त्यापासून मिळणारे भौतिक आणि इतर लाभ नेहेमीच कालातीत असणार आहे,
Camil Parkhe, July 31, 2022

Saturday, December 4, 2021

प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि न अनुभवलेल्या मराठी साहित्य संमेलनांच्या काही आठवणी…
‘अक्षरनामा’  पडघम - साहित्यिक

पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत

  • Wed , 01 December 2021

आतापर्यंत खरे तर मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीहून प्रसिध्द होणाऱ्या 'द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून आणि नंतर पुण्यात इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांचा बातमीदार या नात्याने मी काही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोप कार्यक्रमाची भाषणे कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो. मराठी साहित्य संमेलनातली ही उपस्थिती असायची ते केवळ उद्घाटक आणि इतर मुख्य पाहुणे मराठी साहित्याशिवाय इतर काही महत्त्वाचे मुद्दे मांडतील त्याची बातमी करण्यासाठी.

विशेष म्हणजे या उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा इंग्रजी दैनिकांच्या वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त बातमी मूल्य असलेल्या इतर विषयांवर त्यांनी बोलल्यामुळे इंग्रजी दैनिकांच्या अमराठी वाचकांसाठी सुद्धा त्यांचे मत महत्त्वाचें ठरायचे.
एका कोकणी साहित्य संमेलनावे उद्घाटन म्हणुन मराठी लेखक `स्वामी’कार रणजित देसाई यांचे भाषण माझ्यासाठी असेच विस्मरणीय ठरले. त्यावेळी पणजीहून आम्हा बातमीदारांना संमेलनस्थळी घेऊन जाणाऱ्या कारमध्ये एक नामांकित, आदरणीय साहित्यिक व्हीआयपी व्यक्ती होती. मी पुढें ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो आणि मागच्या सीटवर मडगावहून प्रसिध्द होणाऱ्या दैनिक `राष्ट्रमत’चे बालाजी गावणेकर, 'नवप्रभा'चे गुरुदास पेडणेकर यांच्याबरोबर बाकिबाब म्हणजे प्रसिद्ध कवी बा. भ. (बाळकृष्ण भगवंत ) बोरकर बसले होते.
मानेपर्यंत रुळणारे केस आणि खांद्यावर घेतलेली शाल असे या कविवर्यांचे रूप आजही माझ्या नजरेसमोर कायम आहे. मुखदुर्बळतेमुळे म्हणा किंवा भिडेखातिर मी बोरकर यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. मात्र त्यांच्याबरोबरच्या गाडीतील प्रवासाची ती स्मरणीय घटना माझ्या मनात खोलवर उमटली आहे हे निश्चित.
त्यानंतर दक्षिण गोव्यात भरलेल्या दुसऱ्या एका कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यावेळच्या केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी केले, तो प्रसंग आजही आठवतो. त्यावेळी कर्नाटकात मंगळूर येथे राहणाऱ्या अल्वा यांचे कानडी ढंगाचे, उच्चाराचे कोकणी समजून घेताना आम्हा बातमीदारांची कशी त्रेधातिरपीट झाली होती ते आजही स्पष्ट आठवते. (कोकणी भाषा ही देवनागरी लिपीबरोबरच रोमन आणि कन्नड लिपींतही लिहिली जाते. सरकारी पारितोषके मात्र फक्त देवनागरी लिपीतल्या साहित्याला दिली जातात.)
मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला बातमीदार म्हणून नाही तर एक ख्रिस्ती वाचक म्हणून मी हजर होतो. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि आमदार नारायण राणे ऐनवेळी प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या विद्याभवन हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो यांनी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या साहित्य दिंडी नंतर संध्याकाळी राणेंच्या घरी जाऊन त्यांना संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची गळ घातली होती आणि ते लगेच राजी झाले होते.
``राजकारण्यांना साहित्य संमेलनात कशाला असा सन्मान द्यायचा?'' असा माझा नापसंतीचा सूर होता पण राणेंच्या उपस्थितीमुळे, त्यांच्याबरोबर आलेल्या फौजफाट्यामुळे, संमेलनाचा पुर्ण माहोल जो बदलला तो पाहून मग मी गप्पगार झालो.
शिवसेनेचे लढाऊ नेते अशी प्रतिमा असलेले नारायण राणे ख्रिस्ती समाजाच्या या मेळाव्यात काय मत मांडतील याबद्दलसुद्धा मी साशंक होतो. राणे यांच्या कोकणातील मतदारसंघात कॅथोलिक समाजाची संख्या लक्षणीय आहे. राणे यांच्या तिथल्या भाषणाने मात्र माझी निराशा केली नाही हे कबूल केले पाहिजे.
यावेळी संमेलनाध्यक्ष कवि निरंजन उजगरे होते. मराठी साहित्य संमेलने वाद झाल्याशिवाय गाजत नाहीत आणि आठवणीत राहत नाहीत. आपल्या भाषणात साहित्य संमेलनाध्यक्ष उजगरे यांनी ''दलित ख्रिस्ती' या शब्दप्रयोगाविषयी नापसंती व्यक्त केली आणि मग अशा वादाची ठिणगी पडलीच.
उजगरे यांची विधाने अशी होती:
"मध्यंतरी दलित ख्रिस्ती' चळवळ आणि त्यापाठोपाठ ' दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन' भरवण्यात आली. हा एकंदर प्रकारच अत्यंत चिंताजनक आहे. सर्व जातिजमातींमधून धर्मांतरीत झालेला ख्रिस्ती समाज ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने बांधला गेला आहे अशी आमची श्रद्धा असेल तर `दलित ख्रिस्ती' ही संकल्पना मान्य करता येणार नाही. पुन्हा एकदा अवमानित जगण्याकडे जाण्याची आमची मानसिक तयारी आहे का? अनुसूचित जातींना मिळणाऱ्या सवलतीसाठी आम्ही ' दलित ख्रिस्ती' ही पाटी गळ्यात अडकवणार का?"
झाले, या विधानामुळे उजगरे यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला. अलिकडेच, म्हणजे २०१८ ला दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे ज्यांनी अध्यक्षपद भूषविले ते निरोप्या ' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड या संमेलनात होते, कार्यकर्ते पौलस वाघमारे आणि माजी संमेनाध्यक्षा विजया पुणेकरसुध्दा होत्या.
काही दिवसांनी उजगरे यांनी आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती.
तर या मालवणच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्थानिक मिलाग्रिस वर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरु फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा होते. त्या तीन दिवसांच्या संमेलनात जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने जमलेले रसिक आणि खवय्ये पाहुणेलोक या मालवणी पाहुणचाराबद्दल जाम खूष होते.
लातूर जिल्ह्यात उदगीर येथे भरलेल्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले ते त्यावेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे.
हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे असा आरोप करुन ते संमेलन उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती. त्यामुळे जमलेल्या आम्हा पाहुण्यांना धड भोजनाची सुध्दा व्यवस्था झाली नव्हती. शेवटच्या दिवशी तर आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या एका पाळकाने म्हणजे पास्टरने सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज जेवण भरपेट देऊन सुभाष चांदोरीकर आणि इतर आयोजकांची अब्रू वाचवली होती.
श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे - जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती.
ही सर्व साहित्य संमेलने लक्षात राहिली आहेत ती अशा वेगवेगळया साहित्यविरहीत संदर्भांनी. या सर्व संमेलनांना मी उपस्थित असल्याने या साहित्य जत्रा आठवणीत राहिल्या.
मात्र काही मराठी साहित्य संमेलनांना थेट हजर नसतानाही ही संमेलने झाल्यापासून साडेचार दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही आजही माझ्या मनात अगदी ताजी आहेत. ही संमेलने झाली त्यावेळीं म्हणजे सत्तरच्या दशकात मी शालेय विद्यार्थी होतो. तरीसुद्धा त्या संमेलनाआधी, संमेलनादरम्यान आणि संमेलन पश्चात झालेले कवित्व, वाद आणि घडामोडी मला आजही अगदी स्पष्ट आठवतात.
संमेलनात हजर नसतानासुद्धा माझ्या आठवणीत असलेली ही दोन मराठी साहित्य संमेलने म्हणजे इचलकरंजीत पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आणि त्यापाठोपाठ लगेच कराड येथे दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली ऐन आणीबाणीच्या काळात झालेले मराठी साहित्य संमेलन.
इचलकरंजीचे १९७४ सालचे संमेलन खास आठवते याचे कारण संमेलनाध्यक्ष पु.ल. देशपांडे. त्यात या संमेलनाची पन्नाशी पुर्ण झाली म्हणून साहित्य विश्वात खूप उत्साह होता. याकाळात मी शाळेत शिकत असलो तरी मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती आणि तो वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हणजे त्याकाळात नव्यानेच साक्षर झालेली पहिली किंवा दुसरी पिढी नियतकालिके आणि मासिके भरपूर, अगदी पुरवून पुरवून वाचत असे. या दैनिकांना आणि इतर नियकालिकांसाठी ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने म्हणजे मोठी पर्वणीच होती. मला वाटते पुलंच्या अध्यक्षतेखाली भरलेले हे साहित्य संमेलन हे मराठी ग्रंथकारांचे पहिलेच मोठे गाजलेले संमेलन, मोठी साहित्य यात्रा असावी.
इचलकरंजीचे हे संमेलन होण्यापूर्वी कितीतरी दिवस आधी नियकालिकांची पानेच्या पाने आणि रकाने साहित्य संमेलना विषयीच्या मजकुराने भरली होती. संमेलनाध्यक्षकांचे संपूर्ण भाषण पान एकवरुन आतल्या पानावर आणि उद्घाटकांच्या भाषणाचा वृत्तान्त हा पान एक्वरची पहिली बातमी म्हणजे लीड न्युज होती. त्याशिवाय दैनिकांची इतर सर्व पाने संमेलना विषयीच्या बातम्यांनी भरलेली होती.
कराड येथील साहित्य संमेलन भरण्याआधीच त्याभोवती वादाचे ढग जमायला सुरुवात झाली होती. संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत आणि यजमान किंवा स्वागताध्यक्ष होते कराडचे सुपुत्र आणि देशाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य संमेलन होणार होते त्यावेळचा काळ आणि परिस्थिती.
हा काळ होता पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशभर लादलेल्या आणीबाणीचा. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व नेते त्यावेळी तुरुंगात होते. प्रसारमाध्यमांत सेन्सॉरशिप लागू होती.
आणीबाणी होती तरी कराड इथल्या साहित्य संमेलनातल्या सर्व बातम्या दैनिकांच्या आम्हा वाचकांपर्यंत पोहोचत होत्या. मावळते संमलनाध्यक्ष पु. ल. देशपांडे यांनी नव्या संमेलनाद्यक्षा दुर्गा भागवत यांच्याकडे सूत्रे सोपवतना केलेले भाषण, क्षणचित्रे वगैरे सर्व वृत्तांत यांनी वृत्तपत्रांची रकाने भरली होती.
"खूप वापर होत गेला तर मेलेल्या कातडीपासून बनवलेले वहाणसुध्दा कुरकुरायला लागते.," अशा आशयाचे या संमेलनात पुलंनी म्हटलेले आणि दैनिकांत वाचलेले एक वाक्य अजूनही मी विसरलेलो नाही.
कराड इथले हे मराठी साहित्य संमेलन हे या ग्रंथकारांच्या मेळाव्याच्या इतिहासातील अनेक कारणांनी आणि अर्थांनी आतापर्यंत सर्वांत गाजलेले आणि ऐतिहासिक संमेलन म्हणता येईल.
हे संमेलन पार पडल्यानंतरसुद्धा तिथले कवित्व लगेच संपले नाही. संमेलनानंतर लवकरच संमेलनाध्यक्षा दुर्गाबाईना अटक झाली आणि आणीबाणी शिथिल झाल्यावरच त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
त्यानंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कराड येथील मावळते आणि नवीन असे दोन्ही संमेलनाध्यक्ष - पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत - सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या विरोधात हिरीरीने उतरले आणि काँग्रेसचे निवडणुकीत पानिपत झाल्यावर दोघेही पडद्याआड झाले.
कराडचे हे गाजलेले आणि आताही बहुचर्चित असलेले हे साहित्य संमेलन मी संमेलनस्थळी न जाताही अशाप्रकारे वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनुभवले.
योगायोगाने केवळ एक वर्षांतच जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी मी कराड येथेच आलो. तिथे टिळक हायस्कूलात अकरावीचे शिक्षण घेताना तिथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाची आठवण येणे साहजिकच होते. तेव्हा म्हणजे १९७६ ला आणीबाणी पर्व चालूच होते.
आजही पुण्याहून गोव्याला जाताना आणि तेथून परतताना कृष्णाकाठचे कराड लागतेच. त्या थांब्यावर असताना कराडमधला माझा तो एक वर्षाचा काळ आणि त्याआधीचे पुलंनी आणि दुर्गाबाईनी गाजवलेले ते ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन हमखास आठवते.
कराडचे ते साहित्य संमेलन मराठी सारस्वतांनीच नाही तर सर्व भारतीयांनी सदा स्मरणात ठेवावे असेच आहे.
आणीबाणीच्या काळात कराडचे साहित्य संमेलन होत होते त्यावेळी सुध्दा सर्वकाही अलबेल आहे असे मानणारे आणि सांगणारे लोक बहुसंख्य होते.
सद्याच्या विविध क्षेत्रांतील अनेक अर्थांनी भरकटलेल्या परिस्थितीत तर कराड येथील ते साहित्य संमेलन एखाद्या दिपगृहासारखे दिशा दाखवणारे झाले आहे. पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या कणखर, परिणामांची पर्वा न करता राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावणाऱ्या, स्पष्टवक्त्या साहित्यिकांची कमतरता तर खूपच जाणवते आहे.