Showing posts with label Sahitya sammelan. Show all posts
Showing posts with label Sahitya sammelan. Show all posts

Tuesday, September 3, 2024

 

आज त्याच पुस्तक प्रदर्शनाला तिसऱ्यांदा भेट दिली. पहिल्या दोन भेटी घाईघाईत होत्या. आज अगदी आरामात अनेक कक्षांतील पुस्तके दोनदातिनदा नजरेखाली घातली, बऱ्याच पुस्तकांतला मजकूर चाळला.
पुस्तक प्रदर्शनात नेहेमीचेच यशस्वी प्रकाशक कलाकार होते आणि नेहेमीचेच लेखक आणि त्यांची ती पुस्तके होती.
अशाप्रकारच्या लोकप्रिय पुस्तक प्रदर्शनांत वेगवेगळी चव असणाऱ्या बहुतांश वाचकांना आवडतील अशीच पुस्तके असतात. हे प्रदर्शन त्यास अपवाद नव्हते.
मी वेगवेगळ्या प्रकारची अनेक मराठी पुस्तके - चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य, विनोदी साहित्य , ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या - खूप आवडीने वाचल्या ते श्रीरामपुरात दहावीपर्यंत शिकत असताना.
तिथल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात हे सगळे वाचन झाले. त्यानंतर मी गोव्याला गेलो, तेथे मी इंग्रजी शिकलो आणि इंग्रजी साहित्याकडे आणि पत्रकारितेकडे वळलो ते आजतागायत.
आज या पुस्तक प्रदर्शनात दिडेक तास वावरताना मला ती माझ्या ओळखीचे अनेक साहित्यिक आणि पुस्तके भेटली.
वि. स. खांडेकर, साने गुरुजी, ग. दि. आणि व्यंकटेश माडगूळकर, शिवाजी सावंत, इरावती कर्वे, पुल देशपांडे, दुर्गा भागवत, व.पु. काळे, गो. नि दांडेकर, आचार्य अत्रे आणि धनंजय कीर .
ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकांत अनेक मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या कलाकृती मी वाचलेल्या नाहीत. पण त्या पुस्तकांची आणि साहित्यिकांची मला तोंडओळख आहे.
आजच्या प्रदर्शनात ही पुस्तके नजरेसमोर आली आणि त्यांत मी डोकावून पाहिलेसुद्धा. मात्र आज ही पुस्तके माझ्याकडून वाचली जातील कि नाही अशी शंका येऊन ती पुस्तके पुन्हा रॅकवर ठेवली.
काही नवी पुस्तके नजरेत भरली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे 'देवळांचा धर्म' हेच पुस्तक गेली अनेक वर्षे ठिकठिकाणी दिसायचे, आता त्यांचे ''माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र , 'दगलबाज शिवाजी' असे चकित करणारे शीर्षक असलेले पुस्तक आणि इतरही पुस्तके नव्याने बाजारात आली आहेत.
मला हवे असलेले प्रबोधनकारांनी लिहिलेले पंडिता रमाबाई यांचे चरित्र मात्र मला मिळाले नाही.
अशी अनेक चांगल्या दर्जाची असलेली मराठी पुस्तके विविध कारणांमुळे दुर्मिळ होत चालली आहेत. मागच्याच आठवड्यातील एक गोष्ट सांगतो.
नाशिक येथे १८३०च्या आणि १८४०च्या दशकांत मुलींच्या शाळा चालवणाऱ्या मिसेस कॅरोलिन फरार यांचे 'चमत्कारिक गोष्टी' हे अनुवादित पुस्तक फार लोकप्रिय झाले,
`The Ayah and Lady. An Indian Story' या Mary Martha Sherwood यांच्या पुस्तकाचा अनुवाद.
या मराठी पुस्तकाच्या अनेक आवृत्त्याही छापल्या गेल्या होत्या. मिशनरी शाळांत हे पाठ्यपुस्तक म्हणून शिकवले जायचे.
'चमत्कारिक गोष्टी' या पुस्तकाबाबत मी अनेक जाणकार व्यक्तींकडे चौकशी केली, तर या पुस्तकाचे नावदेखील त्यांनी ऐकले नव्हते !.
नरहर कुरुंदकर यांची अनेक पुस्तकेसुद्धा आता नव्याने प्रकाशित झाली आहेत. साने गुरुजी यांनी अनुवादित केलेली विल ड्युरांत यांचे 'पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास' हा ग्रंथसुद्धा एक नवी भर आहे.
लोकप्रिय स्वरूपाच्या पुस्तक प्रदर्शनांत ठराविक प्रकाशन संस्थाचाच सहभाग असतो. त्यामागे आर्थिक गणित असतेच.
विविध प्रकारच्या मराठी साहित्य संमेलनांत भरणाऱ्या आणि पुस्तक प्रदर्शनांत पुस्तकप्रेमी लोकांना मोठे घबाड मिळत असते.
यावेळी अ भा. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्लीत होणार आहे. तिथे याबाबाबत काय परिस्थिती असेल हे आताच सांगता येणार नाही.
Camil Parkhe, August

Tuesday, November 8, 2022

बीड येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन


६ नोव्हेंबर २०२२ पासून बीड येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनातून तिसेक वर्षांपूर्वी मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने वेगळी वाट धरुन वेगळी चूल मांडली. तेव्हापासून मुख्य (!) प्रवाहातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या बहुसंख्य अध्यक्षांनी या वेगळ्या प्रवाहावर टीका केली आहे, भरपूर तोंडसुख घेतले आहे.

पुर्वसंमेलनाध्यक्ष निरंजन उजगरे, आणि सुभाष पाटील या आपल्या पूर्वसुरींच्या पावलांवर पाऊल टाकत आताचे संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे यांनीही `ख्रिस्ती दलित' या संकल्पनेवर भरपूर आगपाखड केली आहे.
दलित समाजाची पार्श्वभूमी नसलेल्या पूर्वसंमेलनाध्यक्ष डॉमिनिक ऑब्रिओ आणि सेसिलिया कार्व्हालो यांनी मात्र या वेगळ्या प्रवाहाबद्दल सहानुभूतीची भूमिका घेतली होती. गंमत म्हणजे दलित ख्रिस्ती संमेलनांवर टीका करणाऱ्या आधीच्या संमेलनाध्यक्षांनी पूर्वाश्रमीचे दलितत्व निदान मान्य केले होते, वाघमारे यांनीं मात्र आपला समाज मुळी दलितच नाही, अशीच भूमिका घेतली आहे.
या दलित ख्रिस्ती चळवळीविषयी संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे आपल्या भाषणात म्हणतात : (हे भाषण `अक्षरनामा'ने काल प्रसिद्ध केले आहे. )
``अलीकडच्या काही दशकांत ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ अस्तित्वात आली. खेड्यातील अस्पृश्य, दलित गणले गेलेल्या लोकांना त्यांचा दर्जा परत मिळवून देण्याच्या उद्देशाने ही चळवळ मूळ धरु लागली. महाराष्ट्रात रेव्ह. डॉ. अरविंद निर्मळ यांनी या चळवळीचा पाया घातला. आपला विचार रुजावा, फोफवावा, दबलेले लोक जागृत व्हावेत म्हणून त्यांनी विविध प्रयत्न केले. चळवळीसाठी पैसा उभा केला. कार्यकर्त्यांची फळी उभी केली. सुरुवातीची काही वर्षे निर्मळांच्या नेतृत्वामुळे ही चळवळ जीव धरुन होती. पुढे डॉ. निर्मळ ख्रिस्तवासी झाले, चळवळ खंडीत झाली.
मुळात दलित नसलेले आमचे लोक आहेत, कानामागून आलेल्या सवर्णांनी दलितत्व, अस्पृश्यता आमच्यावर लादलेली आहे. आमच्या असहायतेचा फायदा उठवत आम्हाला त्यांनी दास्यात ठेवले आहे. आणि त्यांचीच री ओढत, स्वतःला पुन्हा पुन्हा दलित म्हणवून घेत ही चळवळ पुढे रेटायचा प्रयत्न चालू आहे. ख्रिस्ती मिशनरींच्या आधाराने शिक्षण, आत्मसन्मान लाभलेले आणि आत्मभान लाभलेल्या लोकांनी या चळवळीला मान्यता दिली नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत ही चळवळ खुजी, खुरटी राहिली. याविषयीचे आत्मपरीक्षण या चळवळीतील कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.
अस्पृश्य नसताना दुसरे म्हणतात, वागवतात म्हणून किती दिवस स्वतःला ‘दलित’ म्हणवून घेणार आहोत आपण? आम्हाला केव्हा आत्मभान येणार? मिशनरींनी केलेले संस्कार, आम्ही विसरुन गेलो की काय? मिशनरींच्या प्रेरणेने स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीचा आम्हाला विसर पडला की काय? राजांचा राजा, प्रभुंचा प्रभू असलेल्या ख्रिस्ताच्या प्रजेने स्वतःला अस्पृश्य, दलित म्हणून स्वत:ला हिनवून घ्यायचे, ही शरमेची बाब आहे.
या चळवळीतील कार्यकर्ते वारंवार वास्तवतेचा टाहो फोडतात, खेड्यातील वास्तवता दाहक आहे, अजूनही सवर्ण आम्हाला आमचा दर्जा देत नाहीत. या वास्तवतेला खरे पाहिल्यास आम्हीच जबाबदार आहोत. सवर्णांप्रमाणेच आम्हीच आम्हाला वारंवार दलित म्हणवून घेतल्याने ‘दलितत्व’ जाण्याऐवजी टिकून राहत आहे, ही खरी वास्तवता आहे.
कोणतीही गोष्ट वारंवार घोकल्याने ती सत्य वाटू लागते, या नियमानुसार आम्ही दलित नसतांना, अस्पृश्य नसतानादेखील दुसरे म्हणतात\ गणतात, म्हणून आम्ही स्वतःला दलित म्हणवून घ्यायचे, यात पुरुषार्थ नाही. ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ दलितत्व घालवण्यासाठी आहे की, टिकवण्यासाठी, असा विरोधाभास जाणवतो. हे या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांने आत्मपरीक्षण केल्यास निश्चितच पटेल.''
---
`ख्रिस्ती दलित' ही मुळी संकल्पनाच पौलस वाघमारे यांनी नाकारल्याने हा प्रपंच..
....
``अहमदनगर येथे २३ आणि २४ मे १९९२ रोजी पहिले ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलन पार पडले. सन २००४ पर्यंत अशी एकूण सहा ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. सन १९९२ मध्ये भरलेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष रेव्ह. अरविंद निर्मळ यांनी विशेष पुढाकार घेऊन चार संमेलने आयोजित केली होती. सन १९९० मध्ये महाराष्ट्रात सुरु झालेल्या ख्रिस्ती दलित मुक्ती चळवळ, पुण्यातील समता विचार मंच आणि आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील दलित मुक्ती विद्यापीठाच्या सहकार्याने चेन्नईमधील गुरुकुल महाविद्यालयाने ही संमेलने प्रायोजित केली होती.
सन १९९३ मध्ये जालना येथे `आपण'कार सत्यवान नामदेव सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन भरले. लोणावळ्यात तिसरे संमेलन भरण्याआधीच या संमेलनाचे अध्यक्ष कवी विश्वासकुमार उर्फ संपत विश्वास गायकवाड यांचे निधन झाले. त्यामुळे हे संमेलन अध्यक्षाविना पार पडले. चौथे ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे देवदत्त हुसळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनानंतर २३ सप्टेंबर १९९५ रोजी रेव्ह. निर्मळ यांचे निधन झाले.
पाचवे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन पुण्यात बिशप प्रदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली २००१ साली पार पडले. सहावे संमेलन नाशिक येथे ८ आणि ९ मे २००४ रोजी पार पडले. रेव्ह. सुभाष चांदोरीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. नागपुरला झालेल्या सातव्या संमेलनाचे गिल्बर्ट लोंढे अध्यक्ष होते तर लातुर जिल्हात उदगीरच्या आठव्या संमेलनाचे वसंत म्हस्के अध्यक्ष होते. श्रीरामपुरच्या २०१४ सालच्या नवव्या आणि २०१८च्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अनुक्रमे अनुपमा डोंगरे जोशी आणि फादर ज्यो गायकवाड यांनीं भुषवले.
चेन्नईमधील गुरुकुल ईश्वरविज्ञान महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या दलित ईश्वरविज्ञान विभागाचे अरविंद निर्मळ प्रमुख होते. सन १९८० मध्ये मंडळ आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर एक वर्षानंतर दक्षिण भारतात वेल्लोर येथे ख्रिश्चन दलित लिबरेशन मुव्हमेंट सुरु झाली. ख्रिस्ती दलितांची ही चळवळ महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय निर्मळ याना दिले जाते. निर्मळ यांच्या निधनानंतर ही चळवळ काही काळ क्षीण झाली होती. प्रा. देवदत्त हुसळे, सुभाष चांदोरीकर आणि डॉ. गिल्बर्ट लोंढे यांनी या चळवळीला पुन्हा संजीवनी प्राप्त करून दिली.
विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजात चालू असलेल्या आरक्षणासाठीच्या चळवळीची वा या विषयाची साधी दाखलसुद्धा या काळात झालेल्या बहुतांश मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांनी घेतलेली नाही. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांची परंपरा नाशिक येथे १९२७ साली झालेल्या संमेलनापासून सुरु होते. अर्थात सर्वच प्रकारच्या मराठी साहित्यातून वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतूनही बहुजन समाजाच्या प्रश्नांचे प्रतिबिंब पडतेच असे नाही. तसाच प्रकार येथेही घडला होता. सन १९२७ पासून २०२२ पर्यंत एकूण सहवीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने पार पडली आहेत.
या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
आरक्षणाच्या या महत्वाच्या मुद्द्यावर ख्रिस्ती समाजाच्या या प्रमुख व्यासपीठावर दलित ख्रिश्चनांच्या खास समस्यांवर चर्चा झाली नाही. याचे दुसरे कारण म्हणजे या समाजातील आर्थिकदृष्ट्या प्रगत झालेल्या समाजघटकाचा बराच काळ दलित ख्रिश्चनांना आरक्षण देण्यास ठाम विरोध होता. या परिस्थितीत आज फार मोठा बदल झाला आहे. असेही म्हणता येणार नाही. मुख्य म्हणजे या प्रगत घटकास आरक्षणाच्या कुबड्यांची आता गरज नाही. या लोकांची संख्या अगदी मूठभर असली तरी शिक्षित असल्याने ह्या प्रश्नाबाबत केवळ तेच पुढाकार घेऊ शकतात. त्यांचाच या सवलतीस तत्वतः विरोध असल्याने वा या बाबत ते निरुत्साही असल्याने बहुसंख्य ख्रिस्ती समाजाचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे शीतपेटीतच राहिला आहे.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आरक्षणाच्या हक्काचे पहिल्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद निर्मळ यांनी जोरदार समर्थन केले. बहुसंख्य मराठी ख्रिस्ती समाज दलित असून आरक्षण वगैरे सवलतींवर त्यांचा हक्क आहे असे त्यांनी म्हटले. ख्रिस्ती समाजावर झालेल्या अन्यायासंदर्भात ते म्हणतात :
खेड्यापाड्यातील लाखो ख्रिस्ती दलित असून साक्षरावस्थेत पोहोचलेले नाहीत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजून त्यांना भेटलेच नाहीत. पूर्वी सरकारी सवलती, आरक्षण केवळ हिंदू धर्मातील दलितांनाच मिळत असत. नंतर शीख धर्मात गेलेल्या दलितांना या सवलती खुल्या झाल्या. परवा त्या नवबौद्धांनाही देण्यात आल्या. परंतु धर्मांतरित मुस्लिम आणि ख्रिस्ती दलितांना या सवलती अजूनही मिळत नाही. आई जेवू घालीना अन बाप भीक मागू देईना,'' अशी ख्रिस्ती दलितांची अवस्था आहे असे निर्मळ यांनी आपल्या या भाषणात पुढे म्हटले आहे.
दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाची विद्रोही, आक्रमक भूमिका
पहिल्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद निर्मळ यांचे भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण तितकेच विद्रोही विचार अगदी ठामपणे मांडणारे आहेत. खरी सामाजिक बांधिलकी उराशी बाळगणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणावे, पहिल्या मराठी ख्रिस्ती दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करावे. पंधरा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात आम्ही वाट चुकलो आहोत, आता नवी वाट तुडवायला हवी. मराठी ख्रिस्ती साहित्याला नवी दिशा द्यायला हवी. आमच्या मूक-बधिर समाजाला लिहिते, वाचते, बोलते व ऐकते करायला हवे, असे त्यांनी म्हटले होते.
आपण कोणत्या अर्थाने वाट चुकलो हे सांगताना अरविंद निर्मळ पुण्यातील ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या उदघाटक शांता शेळके यांच्या भाषणाचा संदर्भ देतात.
पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे उदघाटन करताना मराठी ख्रिस्ती साहित्य परंपरेचे विश्लेषण करताना शांताबाई शेळके म्हणाल्या होत्या ``फादर स्टीफन्सची पुराण ही संकल्पनाच हिंदू होती. साहित्यातील ही समन्वयाची भूमिका बाबा पदमनजी, रेव्ह. ना. वा टिळक, लक्ष्मीबाई आणि दे. ना. टिळक यांनीही पुढे चालू ठेवली. त्यामुळे मराठी माणसांमध्ये आणि मराठी साहित्यामध्ये त्यांना प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळाले आहे.''
या संदर्भात निर्मळ म्हणतात कि वर उलखलेली सर्व मंडळी म्हणजे सवर्ण धर्मांतरित ख्रिस्ती. त्यांना ख्रिस्ती धर्मात वैदिक धर्माची पूर्ती झाल्याचेही वाटले असेल. म्हणून त्यांनी ही समनव्याची भूमिका चालू ठेवली. आम्ही दलितांनी मात्र ख्रिस्ती धर्म पत्करला तो चातुर्वर्णाधिष्ठित हिंदू धर्माला पर्याय म्हणून. त्याचेशी समन्वय साधायला म्हणून नव्हे समन्वयाकडून संघर्षाकडे अशी वाटचाल आम्ही करायला हवी. याचा अर्थ असा नाही कि आम्हाला समेट नको आहे. समन्वय तडजोडीवर आधारित असतो परंतु समेटाला न्याय अभिप्रेत असतो.
संघर्षातून न्याय मिळवून मग आम्ही समेटाकडे वळू. समन्वय साधणाऱ्या सवर्ण ख्रिस्ती साहित्यिकांना मराठी साहित्यामध्ये प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळालेले आहे. परंतु संघर्षाची वाट तुडविणारे सूर्यवंशी मात्र मराठी साहित्यात उपेक्षितच राहतात, हेदेखील येथे लक्षात घेतले पहिजे'' असे निर्मळ यांनी ठासून सांगितले आहे.
``ख्रिस्ती धर्माचा अंगीकार करून त्या धर्माच्या नावाने जगणाऱ्या माणसांच्या जीवनाचं दर्शन घडवणारं, ते जीवन प्रतिबिबित करणारं साहित्य ते ख्रिस्ती साहित्य'' अशी नवी व्याख्या निर्मळ यांनी केली आहे.
ही व्याख्या स्वीकारली तर महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्म जगणारी बहुसंख्य माणसं दलित अस्मितेची, दलित मानसिकतेची, दलित जाणिवा उराशी बाळगणारी अशी त्रस्त, ग्रस्त माणसं आहेत, हेही आमच्या लक्षात येईल. त्यांच्या व्यथावेदना, त्यांची सुखदुःख, त्यांची तडफड, त्यांचा विद्रोह आणि त्यांचा नकार मग आमच्या साहित्यातून साकार होईल आणि आमच्या साहित्याला जिवंतपणा येईल. आमचे साहित्य मग विद्रोहाची आग ओकू लागेल. ते विषमतेविरुद्ध बंद पुकारील. मग ही विषमता आणि अन्याय स्वसमाजातील असली तरीही आमची लेखणी गय करणार नाही'' असे निर्मळ म्हणतात.
या नव्या वाटेवरील आणखी एक पाऊल म्हणजे आमच्या इतर दलित बांधवांशी आणि दलित साहित्याशी संबंध जोडणे, असे निर्मळ म्हणतात. इतर दलितांशी नाते जुळवून आम्ही एक भारतव्यापी दलित साहित्यिक चळवळ निर्माण केली पाहिजे. निदान महाराष्ट्रापासून आम्ही ही सुरुवात करायला हवी. आमच्या धर्मप्रेरणा वेगवेगळ्या असतील, आहेत. त्या कुणी कुणावर लढायला नकोत. परंतु दलितत्व हे आमचं सामान नातं आहे आणि विषमता हा आमचा समान वैरी आहे.
``आमच्या जालन्यात ख्रिस्तजयंतीच्या वेळी मोठी धामधूम असते. ख्रिस्तजयंतीच्या पूर्वसंध्येला कॅरोल राउंड निघतात. ख्रिस्तजन्माची स्तुतिगीते गेली जातात.
अशीच एक ख्रिस्तजयंती मी माझ्या सासूबाईंच्या येथे होतो. बाहेर मुलांचं एक टोळकं मध्यरात्री आलं, ते गाऊ लागले.
``उघडा हो दार आता / कुठवरी झोप घेता /
अंगात एक बंडी / वाजते फार थंडी /
नंतर' गद्यात ``आंटी उघडा ना आता दार अन द्या आम्हाला थोडीशी चिल्लर'. ' या गीताचा विषय ख्रिस्तजन्म नाहीच मुळी. पण माझ्या समाजाचं वास्तव त्यात उघड पडलं आहे.
``अंगात एक बंडी वाजते फार थंडी'' हा आहे माझा समाज, उघडा नागडा, थंडीत कुडकुडणारा अंगात उष्णता नाही म्हणून चहा प्यायला रुपयांऐवजी चिल्लर मागणारा. अंगात थंडी घालून ख्रिस्तजयंतीला थंडीने कुडकुडणाऱ्या या समाजाच्या व्यथावेदना माझ्या साहित्यात उतरल्या पाहिजेत याला म्हणतात सामाजिक बांधिलकी .दलित लेखक कवी हे आमचे खरे स्वजन: ''असं निर्मळ म्हणतात
`आपण'कार सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांनी १९७२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ख्रिस्ती समाज इतर दलित, अल्पसंख्य समाजाहून वेगळा नाही,या इतर समाजघटकांबरोबर राहून त्यांच्यासह झगडून ख्रिस्ती लोकांनी आपल्या हितसंबंधांचे रक्षण केले पाहिजे असा विचार मांडला होता.
जालना येथे १४ मे १९९३ रोजी पार पडलेल्या दुसऱ्या ख्रिस्ती दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सूर्यवंशी यांनी दलित लेखक कवी हेच आमचे खरे स्वजन आहेत असे स्पष्ट केले.
आपल्या भाषणात सूर्यवंशी म्हणतात ``हे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन आहे पण हा सवतासुभा नाही. ख्रिस्ती लेखक म्हणून इतर दलित लेखकांवेगळे आम्ही स्वतःला मनात नाही. दलित हा धर्म नाही कि जात नाही . दलित ही चिरडल्या, भरडल्या गेलेल्या व जात असलेल्या जित्या जागत्या माणसाची अगतिक बनवून सोडणारी अवस्था आहे. ती गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीतून बाहेर पडा हा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि दलित मुक्ती लढा सुरु झाला. तो आमचा लढा आहे आणि त्या लढ्यात उतरलेला प्रत्येक लेखक, कवी, पत्रकार, वक्ता आमचा भाऊ आहे, असे सूर्यवंशींनी यावेळी जाहीर केले.
दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात ख्रिस्ती दलित लेखककवींच्या लिखाणाचा मागोवा घ्यायला हवा. इतर समाजी दलित लेखकांची आणि आपली चूल वेगळी नाही हे संमेलन हा विचार पुढे ठेवण्यास बोलावण्यास आले आहे. स्वतःभोवती भिंतीही उभारू नयेत आणि ब्राह्मणी शैलीचे साहित्य लिहीत बसण्याचा व्यर्थ आटापिटाही करू नये. `विशाल प्रवाह' ही खोटी हूल आहे. या देशात प्रस्थापित म्हटले जातात त्यापेक्षा दलितांची संख्या अधिक आहे. विशाल प्रवाह आमचा आहे, त्यांचा नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न यशस्वी करण्यास सर्व दलित लेखकांनी धर्मभेद या तथाकथित जातीभेद विसरून एकत्र आले पाहिजे असे आवाहन यावेळी सूर्यवंशींनी केले.''
दलित ख्रिस्ती समाजाने आपल्या सभा आणि शिबिरांत इतर समाजी दलित नेते आणि साहित्यिकांना बोलावून त्यांचे विचार जाणून घेतले आहेत. यामध्ये बाबुराव बागुल, वामन निंबाळकर, विलास वाघ, उषा वाघ, नागपूरच्या कुमुद पावडे, औरंगाबादचे शांताराम पंदेरे, गोपाळ गुरु, डॉ लता मुरुणकर यांचा समावेश होता असे सांगून सूर्यवंशी म्हणतात कि ख्रिस्ती लेखकांबरोबरच बौद्ध, हिंदू, मुसलमान, शीख वगैरे समाजातील लेखकांनांही आम्ही वेळोवेळी बोलावतो याचे कारण म्हणजे ते आणि आम्ही वेगळे नाही, ही भावना आहे.
सूर्यवंशी यांनी 'जय हिंद ! जय भीम ! जय ख्रिस्त !' असे अभिवादन करुन आपले भाषण संपविले . .
सन १९७५च्या मुंबई येथील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष फादर डॉमिनीक ऑब्रिओ (नंतरचे औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप ) यांनी या व्यासपीठावरून सर्वप्रथम ख्रिस्ती दलितांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला.
''महाराष्ट्राच्या खेडोपाडी विखुरलेले आमचे असंख्य ख्रिस्ती बांधव केवळ ख्रिस्ती असल्यामुळे हलाखीचे व अपमानित जीवन जगात आहेत. कारण धर्मांतरामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती मुळात बदललेली नाही, याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे व इतरांना मिळणाऱ्या अल्पस्वल्प सवलती त्यांना मिळवून देण्यासाठी ख्रिस्ती लेखकांनीं पुढे सरसावले पाहिजे. ''
नाशिक येथे २००० साली भरलेल्या अठराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष सेसिलीया कार्व्हालो यांनी `दलित ख्रिस्ती' या संकल्पनेविषयी सहाभूतीची भूमिका घेतली होती.
सेसिलीया कार्व्हालो म्हणतात : एक उपेक्षित घटक म्हणजे दलित ख्रिस्ती. समाज आणि साहित्य या दोन्हींनी या घटकाची फारशी दाखल घेतलेली नाही. वास्तविक ख्रिस्ती धर्म कोणताही जातिभेदभाव मानत नाही ही फारच चांगली गोष्ट आहे. मात्र भारतीय मातीत आणि रक्तात जातिव्यवस्था भिनलेली असल्याने आणि ख्रिस्ती समाज या मातीतला असल्याने व्यवहारात मात्र जातिभेद मानला जातो. तळागाळातील लोकांनी ज्या कळाझळा सोसलेल्या आहेत ते त्या ख्रिस्ती दलितांच्या 'गावा' आणि 'वंशा' गेल्याशिवाय कळणार नाही .''

( ' दलित ख्रिश्चनांचा आरक्षणासाठी लढा '' लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन २००६) मधील एक प्रकरण )

Camil Parkhe

Saturday, December 4, 2021

प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि न अनुभवलेल्या मराठी साहित्य संमेलनांच्या काही आठवणी…
‘अक्षरनामा’  पडघम - साहित्यिक

पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत

  • Wed , 01 December 2021

आतापर्यंत खरे तर मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीहून प्रसिध्द होणाऱ्या 'द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून आणि नंतर पुण्यात इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांचा बातमीदार या नात्याने मी काही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोप कार्यक्रमाची भाषणे कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो. मराठी साहित्य संमेलनातली ही उपस्थिती असायची ते केवळ उद्घाटक आणि इतर मुख्य पाहुणे मराठी साहित्याशिवाय इतर काही महत्त्वाचे मुद्दे मांडतील त्याची बातमी करण्यासाठी.

विशेष म्हणजे या उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा इंग्रजी दैनिकांच्या वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त बातमी मूल्य असलेल्या इतर विषयांवर त्यांनी बोलल्यामुळे इंग्रजी दैनिकांच्या अमराठी वाचकांसाठी सुद्धा त्यांचे मत महत्त्वाचें ठरायचे.
एका कोकणी साहित्य संमेलनावे उद्घाटन म्हणुन मराठी लेखक `स्वामी’कार रणजित देसाई यांचे भाषण माझ्यासाठी असेच विस्मरणीय ठरले. त्यावेळी पणजीहून आम्हा बातमीदारांना संमेलनस्थळी घेऊन जाणाऱ्या कारमध्ये एक नामांकित, आदरणीय साहित्यिक व्हीआयपी व्यक्ती होती. मी पुढें ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो आणि मागच्या सीटवर मडगावहून प्रसिध्द होणाऱ्या दैनिक `राष्ट्रमत’चे बालाजी गावणेकर, 'नवप्रभा'चे गुरुदास पेडणेकर यांच्याबरोबर बाकिबाब म्हणजे प्रसिद्ध कवी बा. भ. (बाळकृष्ण भगवंत ) बोरकर बसले होते.
मानेपर्यंत रुळणारे केस आणि खांद्यावर घेतलेली शाल असे या कविवर्यांचे रूप आजही माझ्या नजरेसमोर कायम आहे. मुखदुर्बळतेमुळे म्हणा किंवा भिडेखातिर मी बोरकर यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. मात्र त्यांच्याबरोबरच्या गाडीतील प्रवासाची ती स्मरणीय घटना माझ्या मनात खोलवर उमटली आहे हे निश्चित.
त्यानंतर दक्षिण गोव्यात भरलेल्या दुसऱ्या एका कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यावेळच्या केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी केले, तो प्रसंग आजही आठवतो. त्यावेळी कर्नाटकात मंगळूर येथे राहणाऱ्या अल्वा यांचे कानडी ढंगाचे, उच्चाराचे कोकणी समजून घेताना आम्हा बातमीदारांची कशी त्रेधातिरपीट झाली होती ते आजही स्पष्ट आठवते. (कोकणी भाषा ही देवनागरी लिपीबरोबरच रोमन आणि कन्नड लिपींतही लिहिली जाते. सरकारी पारितोषके मात्र फक्त देवनागरी लिपीतल्या साहित्याला दिली जातात.)
मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला बातमीदार म्हणून नाही तर एक ख्रिस्ती वाचक म्हणून मी हजर होतो. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि आमदार नारायण राणे ऐनवेळी प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या विद्याभवन हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो यांनी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या साहित्य दिंडी नंतर संध्याकाळी राणेंच्या घरी जाऊन त्यांना संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची गळ घातली होती आणि ते लगेच राजी झाले होते.
``राजकारण्यांना साहित्य संमेलनात कशाला असा सन्मान द्यायचा?'' असा माझा नापसंतीचा सूर होता पण राणेंच्या उपस्थितीमुळे, त्यांच्याबरोबर आलेल्या फौजफाट्यामुळे, संमेलनाचा पुर्ण माहोल जो बदलला तो पाहून मग मी गप्पगार झालो.
शिवसेनेचे लढाऊ नेते अशी प्रतिमा असलेले नारायण राणे ख्रिस्ती समाजाच्या या मेळाव्यात काय मत मांडतील याबद्दलसुद्धा मी साशंक होतो. राणे यांच्या कोकणातील मतदारसंघात कॅथोलिक समाजाची संख्या लक्षणीय आहे. राणे यांच्या तिथल्या भाषणाने मात्र माझी निराशा केली नाही हे कबूल केले पाहिजे.
यावेळी संमेलनाध्यक्ष कवि निरंजन उजगरे होते. मराठी साहित्य संमेलने वाद झाल्याशिवाय गाजत नाहीत आणि आठवणीत राहत नाहीत. आपल्या भाषणात साहित्य संमेलनाध्यक्ष उजगरे यांनी ''दलित ख्रिस्ती' या शब्दप्रयोगाविषयी नापसंती व्यक्त केली आणि मग अशा वादाची ठिणगी पडलीच.
उजगरे यांची विधाने अशी होती:
"मध्यंतरी दलित ख्रिस्ती' चळवळ आणि त्यापाठोपाठ ' दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन' भरवण्यात आली. हा एकंदर प्रकारच अत्यंत चिंताजनक आहे. सर्व जातिजमातींमधून धर्मांतरीत झालेला ख्रिस्ती समाज ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने बांधला गेला आहे अशी आमची श्रद्धा असेल तर `दलित ख्रिस्ती' ही संकल्पना मान्य करता येणार नाही. पुन्हा एकदा अवमानित जगण्याकडे जाण्याची आमची मानसिक तयारी आहे का? अनुसूचित जातींना मिळणाऱ्या सवलतीसाठी आम्ही ' दलित ख्रिस्ती' ही पाटी गळ्यात अडकवणार का?"
झाले, या विधानामुळे उजगरे यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला. अलिकडेच, म्हणजे २०१८ ला दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे ज्यांनी अध्यक्षपद भूषविले ते निरोप्या ' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड या संमेलनात होते, कार्यकर्ते पौलस वाघमारे आणि माजी संमेनाध्यक्षा विजया पुणेकरसुध्दा होत्या.
काही दिवसांनी उजगरे यांनी आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती.
तर या मालवणच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्थानिक मिलाग्रिस वर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरु फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा होते. त्या तीन दिवसांच्या संमेलनात जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने जमलेले रसिक आणि खवय्ये पाहुणेलोक या मालवणी पाहुणचाराबद्दल जाम खूष होते.
लातूर जिल्ह्यात उदगीर येथे भरलेल्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले ते त्यावेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे.
हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे असा आरोप करुन ते संमेलन उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती. त्यामुळे जमलेल्या आम्हा पाहुण्यांना धड भोजनाची सुध्दा व्यवस्था झाली नव्हती. शेवटच्या दिवशी तर आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या एका पाळकाने म्हणजे पास्टरने सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज जेवण भरपेट देऊन सुभाष चांदोरीकर आणि इतर आयोजकांची अब्रू वाचवली होती.
श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे - जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती.
ही सर्व साहित्य संमेलने लक्षात राहिली आहेत ती अशा वेगवेगळया साहित्यविरहीत संदर्भांनी. या सर्व संमेलनांना मी उपस्थित असल्याने या साहित्य जत्रा आठवणीत राहिल्या.
मात्र काही मराठी साहित्य संमेलनांना थेट हजर नसतानाही ही संमेलने झाल्यापासून साडेचार दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही आजही माझ्या मनात अगदी ताजी आहेत. ही संमेलने झाली त्यावेळीं म्हणजे सत्तरच्या दशकात मी शालेय विद्यार्थी होतो. तरीसुद्धा त्या संमेलनाआधी, संमेलनादरम्यान आणि संमेलन पश्चात झालेले कवित्व, वाद आणि घडामोडी मला आजही अगदी स्पष्ट आठवतात.
संमेलनात हजर नसतानासुद्धा माझ्या आठवणीत असलेली ही दोन मराठी साहित्य संमेलने म्हणजे इचलकरंजीत पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आणि त्यापाठोपाठ लगेच कराड येथे दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली ऐन आणीबाणीच्या काळात झालेले मराठी साहित्य संमेलन.
इचलकरंजीचे १९७४ सालचे संमेलन खास आठवते याचे कारण संमेलनाध्यक्ष पु.ल. देशपांडे. त्यात या संमेलनाची पन्नाशी पुर्ण झाली म्हणून साहित्य विश्वात खूप उत्साह होता. याकाळात मी शाळेत शिकत असलो तरी मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती आणि तो वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हणजे त्याकाळात नव्यानेच साक्षर झालेली पहिली किंवा दुसरी पिढी नियतकालिके आणि मासिके भरपूर, अगदी पुरवून पुरवून वाचत असे. या दैनिकांना आणि इतर नियकालिकांसाठी ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने म्हणजे मोठी पर्वणीच होती. मला वाटते पुलंच्या अध्यक्षतेखाली भरलेले हे साहित्य संमेलन हे मराठी ग्रंथकारांचे पहिलेच मोठे गाजलेले संमेलन, मोठी साहित्य यात्रा असावी.
इचलकरंजीचे हे संमेलन होण्यापूर्वी कितीतरी दिवस आधी नियकालिकांची पानेच्या पाने आणि रकाने साहित्य संमेलना विषयीच्या मजकुराने भरली होती. संमेलनाध्यक्षकांचे संपूर्ण भाषण पान एकवरुन आतल्या पानावर आणि उद्घाटकांच्या भाषणाचा वृत्तान्त हा पान एक्वरची पहिली बातमी म्हणजे लीड न्युज होती. त्याशिवाय दैनिकांची इतर सर्व पाने संमेलना विषयीच्या बातम्यांनी भरलेली होती.
कराड येथील साहित्य संमेलन भरण्याआधीच त्याभोवती वादाचे ढग जमायला सुरुवात झाली होती. संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत आणि यजमान किंवा स्वागताध्यक्ष होते कराडचे सुपुत्र आणि देशाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य संमेलन होणार होते त्यावेळचा काळ आणि परिस्थिती.
हा काळ होता पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशभर लादलेल्या आणीबाणीचा. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व नेते त्यावेळी तुरुंगात होते. प्रसारमाध्यमांत सेन्सॉरशिप लागू होती.
आणीबाणी होती तरी कराड इथल्या साहित्य संमेलनातल्या सर्व बातम्या दैनिकांच्या आम्हा वाचकांपर्यंत पोहोचत होत्या. मावळते संमलनाध्यक्ष पु. ल. देशपांडे यांनी नव्या संमेलनाद्यक्षा दुर्गा भागवत यांच्याकडे सूत्रे सोपवतना केलेले भाषण, क्षणचित्रे वगैरे सर्व वृत्तांत यांनी वृत्तपत्रांची रकाने भरली होती.
"खूप वापर होत गेला तर मेलेल्या कातडीपासून बनवलेले वहाणसुध्दा कुरकुरायला लागते.," अशा आशयाचे या संमेलनात पुलंनी म्हटलेले आणि दैनिकांत वाचलेले एक वाक्य अजूनही मी विसरलेलो नाही.
कराड इथले हे मराठी साहित्य संमेलन हे या ग्रंथकारांच्या मेळाव्याच्या इतिहासातील अनेक कारणांनी आणि अर्थांनी आतापर्यंत सर्वांत गाजलेले आणि ऐतिहासिक संमेलन म्हणता येईल.
हे संमेलन पार पडल्यानंतरसुद्धा तिथले कवित्व लगेच संपले नाही. संमेलनानंतर लवकरच संमेलनाध्यक्षा दुर्गाबाईना अटक झाली आणि आणीबाणी शिथिल झाल्यावरच त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
त्यानंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कराड येथील मावळते आणि नवीन असे दोन्ही संमेलनाध्यक्ष - पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत - सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या विरोधात हिरीरीने उतरले आणि काँग्रेसचे निवडणुकीत पानिपत झाल्यावर दोघेही पडद्याआड झाले.
कराडचे हे गाजलेले आणि आताही बहुचर्चित असलेले हे साहित्य संमेलन मी संमेलनस्थळी न जाताही अशाप्रकारे वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनुभवले.
योगायोगाने केवळ एक वर्षांतच जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी मी कराड येथेच आलो. तिथे टिळक हायस्कूलात अकरावीचे शिक्षण घेताना तिथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाची आठवण येणे साहजिकच होते. तेव्हा म्हणजे १९७६ ला आणीबाणी पर्व चालूच होते.
आजही पुण्याहून गोव्याला जाताना आणि तेथून परतताना कृष्णाकाठचे कराड लागतेच. त्या थांब्यावर असताना कराडमधला माझा तो एक वर्षाचा काळ आणि त्याआधीचे पुलंनी आणि दुर्गाबाईनी गाजवलेले ते ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन हमखास आठवते.
कराडचे ते साहित्य संमेलन मराठी सारस्वतांनीच नाही तर सर्व भारतीयांनी सदा स्मरणात ठेवावे असेच आहे.
आणीबाणीच्या काळात कराडचे साहित्य संमेलन होत होते त्यावेळी सुध्दा सर्वकाही अलबेल आहे असे मानणारे आणि सांगणारे लोक बहुसंख्य होते.
सद्याच्या विविध क्षेत्रांतील अनेक अर्थांनी भरकटलेल्या परिस्थितीत तर कराड येथील ते साहित्य संमेलन एखाद्या दिपगृहासारखे दिशा दाखवणारे झाले आहे. पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या कणखर, परिणामांची पर्वा न करता राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावणाऱ्या, स्पष्टवक्त्या साहित्यिकांची कमतरता तर खूपच जाणवते आहे.

Monday, May 14, 2012

Produce quality literature, Christian writers told


Produce quality literature, Christian writers told
Sakaal Times
Sunday, May 13, 2012 AT 09:00 PM (IST)
AHMEDNAGAR: Speakers at the 23rd  Marathi Khristi  Sahitya Sammelan concluded here on Saturday  urged Marathi Christian littérateurs not to dwell in the past glory of pioneer writers and lexicographers of the pre-British and British era, but produce quality literature befitting their  tradition.

The speakers said that Christian missionaries like 17th century Marathi epic 'Kristpuran' writer Fr Thomas Stephens, and the first Marathi novelist Baba Padamanjee had played  great role in enriching Marathi language and that tradition was further continued by Pandita Ramabai, and  Rev Narayan Vaman Tilak. This glorious tradition was not carried forwardduring the past few decades, the speakers lamented.

The three-day seminar was inaugurated by Sakal Media Group's Chief Editor Uttam Kamble on Thursday. Editor of  170-year-old Marathi monthly 'Dnyanodaya' Ashok Angre presided over the literary meet. 

The programmes at the literary meet held at Mahavir Sanskritik Bhavan included a Granth Dindi, talks, and a music concert based on songs by Krishna R Sangle written 100 years ago.

The speakers included former Sahitya Sammelan presidents Fr Michael G, Devdatta Husale, Anupama Ujgare and Subhash Patil, 'Suvarta' monthly editor Fr Francis Correa, Anupama Dongre-Joshi,  Camil Parkhe and Dayanand  Thombre.