Showing posts with label Lokmanya Tilak Vachanalaya. Show all posts
Showing posts with label Lokmanya Tilak Vachanalaya. Show all posts

Wednesday, July 30, 2025


श्रीरामपूरला शाळेत पाचवी-सहावीला असताना आमच्या पारखे टेलरिंग दुकानासमोर असलेल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात मी जाऊ लागलो. तिथे वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचण्याची सवय लागली. नंतर हे वाचनालय स्वतःच्या प्रशस्त जागेत स्थलांतरित झाले तेव्हा जरासे दूर अंतरावर असलेल्या या नव्या इमारतीत मी जाऊ लागलो. चारपाच वर्षांनी शिक्षणासाठी मीच श्रीरामपूर सोडले, गोव्यात कॉलेज शिक्षणासाठी आणि व्यवसायानिमित्त राहिलो, औरंगाबाद आणि पुण्यात इतकेच नव्हे तर युरोपात राहिलो पण माझे वाचन कायम राहिले. पुस्तकांची साथ मी सोडली नाही आणि ही पुस्तके कायम माझी साथीदार बनून राहिली आहेत.
माझ्या वाचनाच्या आवडीचा श्रीगणेशा झाला तो श्रीरामपुरच्या नगरपालिका लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बालविभागात. तिथे जगातल्या विविध नामवंतांची विविध भाषांतली मराठीत आणलेली पुस्तके होती. इथे मी संस्कृतमधल्या शाकुंतल, मेघदूत, मृच्छकटिक अशा साहित्यरचना वाचल्या तशीच इसापनीती, ग्रीक भाषेतली इलियड ही पुस्तके वाचली आणि भा. रा. भागवत यांची `फास्टर फेणे' हा नायक असलेली पुस्तके, रवींद्रनाथ टागोरांची साने गुरुजींनी मराठीत आणलेली कितीतरी पुस्तके आणि कादंबऱ्या वाचल्या.
विल्यम शेक्सपियरची अनेक नाटके मी या शालेय जीवनात वाचून काढली. या सर्वच पुस्तकांची कथानके आणि पात्रे आज आठवत नसली तरी त्या काळात या पुस्तकांनी मला भुरळ घातली होती हे नक्की. मराठीतलं ‘ऑल टाइम बेस्ट सेलर’ ठरलेलं साने गुरुजींचं 'श्यामची आई' पण वाचलं. नंतर आचार्य अत्रे यांचं तीन-चार खंडांत असलेलं 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मचरित्र वाचलं. खूप वर्षांनंतर विस्टन चर्चिल यांनीही असंच खंडात्मक लिहिलेलं आत्मचरित्र सहज चाळलं.
माध्यमिक शाळेत आल्यावर मग वडिलांकडे हट्ट लावून या लोकमान्य टिळक वाचनालयाची वर्गणी भरली आणि मोठमोठ्या लेखकांची पुस्तके वाचायचा सपाटाच लावला. यापैकी काही लेखक आणि त्यांच्या नावाजलेल्या, आजही मनावर भूरळ असलेल्या साहित्यकृती आजही आठवतात.. मराठीतले पहिले ज्ञानपीठ वि. स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीला १९७४ साली मिळाले आणि लगेच ही कादंबरी वाचून काढली आणि मग खांडेकरांच्या 'दोन मेघ' सारख्या इतर पुस्तकांचा वाचून फडशा पाडला.
कुणा लेखकाचे एखादे पुस्तक आवडले कि मग लगेच त्याची इतरही पुस्तके वाचायला घ्यायची असा प्रकार असायचा. या पद्धतीने मी पु. ल. देशपांडे यांची 'बटाट्याची चाळ', असा मी असामी' वगैरे पुस्तके वाचली. शंकर पाटील, द, मा. मिरासदार, त्यावेळच्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत, रविंद्र गुर्जर यांनी मराठीत आणलेली 'पॉपिलॉन' `गॉडफादर’ सारखी पुस्तके वाचली. त्या सत्तरच्या दशकात गुरुनाथ नाईक यांच्या गुप्तहेरांच्या, रहस्यकथा असलेल्या पुस्तकांच्या मालिका इतर वाचकांप्रमाणे मलाही भुरळ घातली होती.
`ललित' या मासिकात `ठणठणपाळ' या सदरात हातात हातोडा घेऊन भारदस्त मिशी असलेल्या व्यक्तीच्या चित्रासह लिखाण प्रसिद्ध व्हायचे. नंतर ते सदर जयवंत दळवी लिहित असत असा यथाकाश गौप्यस्फोट झाला आणि मग जयवंत दळवी यांची खूप पुस्तके वाचली.
लहानपणी घरी `चांदोबा’ मासिक यायचे, त्यातले `विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही; या वाक्याने सुरु होणारे सदर आणि महाभारतातल्या विविध कथा रंगीत चित्रांसह देणारे सदर माझे अत्यंत आवडीचे. महाभारताच्या या कथामालिकेमुळे या महाकाव्याच्या कायमच्या प्रेमात पडलो. त्यामुळे महाभारतातील पात्रे आणि उपाख्याने मला अगदी दुष्यंत, भरतापासून तो थेट राजा परिक्षित आणि जन्मेजय आणि उषा -अनिरुद्ध या प्रेमी युगुलापर्यंत परिचित आहेत किंवा अधुंकसे आठवतात. `बायबल’मधली पात्रे आणि छोटीमोठी कथानके आठवतात अगदी तसेच.
पुढच्या काळात दुर्गा भागवत यांचे `व्यासपर्व’ आणि कॉम्रेड शरद पाटील यांचे महाभारतावरील विश्लेषण तर खूपच भावले. आजही महाभारतावर काहीही लिहिलेले दिसले की अधाशासारखे मी वाचतो. महाभारतावर नऊ तास चालणारे नाटक दिग्दर्शित करणारे पिटर ब्रुक यांचे या जुलै महिन्यात निधन झाले तेव्हा त्यांच्यावर इंग्रजी आणि मराठी दैनिकांतले आलेले लेखसुद्धा अशाच उत्सुकतेने वाचले.
गो. नि. दांडेकर यांच्या 'मृन्मयी', 'कुणा एकाची भ्रमणगाथा' या कादंबऱ्या वाचल्या. गोनिदांची आगळीवेगळी लेखनशैली खूप भावली आणि रणजित देसाई यांच्या `स्वामी’ आणि `श्रीमान योगी’ या कादंबऱ्याने मला पार इतिहासकाळात फिरवून आणले होते.
`स्वामी'मधला एक प्रसंग मी आजपर्यंत विसरलो नाही. पेशवे माधवरावांनी कोठडीत ठेवलेल्या राघोबा दादांना भेटायला साडेतिन शहाण्यातील एक असलेले सखाराम बापू बोकिल आल्यावर बुद्धीबळाचा खेळ होतो. तेव्हा या खेळादरम्यान 'तुमचा राजा दोन घरे मागे घ्या' असा सल्ला दिला जातो. या सल्ल्याची माधवरावांना कल्पना दिली जाते. पेशव्यांच्या मदतीसाठी नागपूरहून निघालेले भोसल्यांचे सैन्य परत जाते आणि मग पेशवे माधवराव भोसल्यांच्या वकिलांना तंबी देतात असा तो प्रसंग. त्याशिवाय पानिपतच्या रणभूमीवर गायब झालेल्या सदाशिवराव पेशव्यांचा तोतयाबद्दलचे `स्वामी’ कादंबरीतील प्रकरणही अंधुकसे आठवते.
यानंतर आठदहा वर्षांनी गोव्यात म्हापसा येथे कोकणी साहित्य संमेलनाचे रणजित देसाई स्वागताध्यक्ष होते तेव्हा त्यांचे भाषण ऐकताना या पेशवाकालीन बुध्दीबळाच्या डावाची आठवण झालीच.
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या अशा अनेक पुस्तकांतील काही प्रसंगानी आजही मनात घर केलेले असते.
गोव्यात पणजीला शिक्षणासाठी गेलो आणि तिथे संभाषणाची भाषाच बदलली. इंग्रजी संभाषण आणि लिहिणे शिकायचे असेल तर मराठी, कोकणी आणि हिंदीत बोलायचे नाही असा आमच्या निवासस्थानी नियम होता. तो नियम पाळला, मात्र त्याने माझे वाचन थांबले नाही.
फरक एव्हढाच कि आता मी केवळ इंग्रजी पुस्तके वाचू लागलो आणि ज्ञानाचे केवढे मोठे दालन माझ्यासमोर खुले झाले आहे याचा मलाच अचंबा वाटला.
माझ्याबरोबर राहणारी आणि शिकणारी इंग्लिश माध्यमाची बेनेडिक्त फरीया, लेस्टर फर्नांडिस आणि जेम्स पैस अशी मुले 'द रुटस' सारख्या जाडजूड कादंबऱ्या तिनचार दिवसांत (आणि रात्रींत ) वाचून संपवत. मलाही तशीच सवय लागली. `फ्रिडम ऍट मिडनाईट' ही लॉरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांची गाजलेली साहित्यकृती हे मी इंग्रजीत वाचलेले पहिले पुस्तक.
एक मात्र खरे कि महाराष्ट्राबाहेर राहिल्याने, मराठी भाषेशी संपर्क खंडित झाल्याने या दिडदशकाच्या काळात मराठीत आलेले उत्तमोत्तम साहित्य माझ्या वाचनात आले नाही, त्यामुळे अनेक नामवंत लेखकांच्या साहित्यकृती माझ्या वाचनात आल्या नाहीत ही खंत आहेच. मात्र या काळात इंग्रजी साहित्याचा परिचय झाला ही एक जमेची बाजू.
दरम्यान काळाच्या ओघात वाचनाची आवड बदलत गेली आहे. लहानपणी सुरुवातीच्या काळात हातात पडेल ते पुस्तक वाचण्याचा छंद होता, प्रामुख्याने कादंबऱ्या, ललित साहित्य, ऐतिहासिक, रहस्यमय साहित्य, चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचली जायची. नंतर ललित साहित्याऐवजी वैचारीक, गंभीर आणि समीक्षणात्मक साहित्य अधिक वाचले जाऊ लागले. बा. सी मर्ढेकर, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्या कविताही वाचल्या, आणि दलित आत्मकथनांची बाबुराव बागुल, लक्ष्मण माने, दया पवार यांची अनेक पुस्तके वाचली.
पुस्तक वाचनाच्या वेडापायी एक धडा मी काही फार कटू अनुभवातून शिकलो. आपल्याला फार आवडलेले पुस्तक आपल्या एखाद्या मित्राला वाचायला दिल्यावर काय होते याची मला आजही आठवण होते आणि मी अस्वस्थ होतो.
गोव्यात नोकरी करत असताना पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी युरोपात बल्गेरियात काही महिने गेलो होतो , या दरम्यान रशियाला भेट दिले. या काळात अनेक इंग्रजी पुस्तके आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या स्मरणिका मी गोळ्या केल्या. परत आल्यावर या पुस्तकांचा आणि स्मरणिकांचा अनेक लेख लिहिण्यासाठी वापर केला. यापैकी एक पुस्त्रक चक्क बल्गेरियातले खास विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरावर आधारित होते. पुण्यात आल्यावर एका मित्राला यापैकी आवडती पुस्तके मी वाचण्यासाठी दिली आणि आजतागायत ती पुस्तके मला परत मिळालेली नाहीत.
असेच पुणे शहराचे ऐतिहासिक संदर्भ असलेला पुणे महापालिकेने तयार केलेला डॉ मं. पा. मंगुडकर संपादित दुर्मिळ वर्धापन विशेषांक एका मित्राला वाचण्यासाठी दिला तोसुद्धा माझ्या संग्रहातून कायमचा नाहीसा झाला. या अनुभवातून कुणाला कधीही आपले आवडते पुस्तक देऊ नये असा कानाला खडा लावला आहे.
एक मात्र खरं कि अनेक पुस्तकं मी वाचत असलो तरी कितीतरी नामवंत नामवंत मराठी साहित्यिकांची एकही साहित्यकृती मी वाचलेली नाही आणि आता या नावाजलेली पुस्तकं वाचण्याची इच्छाही राहिलेली नाही, हा, मात्र या साहित्यिकांवर वेळोवेळी लिहिले जाणारे लेख आणि पुस्तके मी आवर्जून वाचतो, हे नक्की कशामुळे हे मात्र समजत नाही.
उदाहरणार्थ, जी. ए. कुलकर्णी यांचे मूळ साहित्य मी वाचलेले नाही, मात्र त्यांच्या गूढ कथांवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर लिहिले गेलेले भरपूर साहित्य मी वाचले आहे. उदाहरणार्थ, जी ए कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांचा पत्रव्यवहार आणि जीएंची पुण्यात राहणारी बहीण नंदा पैठणकर यांनी आपल्या भावाविषयी लिहिलेल्या गोष्टी.
गौरी देशपांडेंची पुस्तकेसुद्धा कशी कुणास ठाऊक माझ्या कधीच वाचनात आली नाहीत, मात्र त्यांच्या लिखाणावर आणि व्यक्तिमत्वावर असलेले लिखाण मला आजही आकर्षित करतात.
कपाटात कधी काळी विकत घेतलेली पण न वाचलेली कितीतरी पुस्तके आहेत, तरीही आणखी पुस्तके घेण्याचा घेण्याचा मोह टाळता येतच नाही. मागच्या आठवड्यात म्हणूनच मग 'महर्षी ते गौरी' हे पुस्तकसुद्धा `साधना' पुस्तकाच्या दुकानात विकत घेतले. या पुस्तकाचे मुख्य आकर्षण अर्थात `समाजस्वास्थ' र. धो. कर्वे यांच्यावरचा विस्तृत लेख होता. `रधों' सारख्या व्यक्तींची चरित्रे मला कायम आकर्षित करत असतात.
नवीन पुस्तके विकत न घेण्याचा माझा निर्धार मला कधीच पाळता येत नाही. सुगावा बुक स्टॉलमध्ये अनेकदा चाळलेले आणि विकत घ्यायचे नाही म्हणून पुन्हापुन्हा रॅकमध्ये ठेवलेले लोकवाड्मय गृहाचे अर्जुन डांगळे यांचे नवे पुस्तक 'दलित पँथर – अधोरेखित सत्य ' मागच्या आठवड्यात असेच मग माझ्या बॅगेत आले. लोकवाड्मय गृहाचे दुसरे पुस्तक, `ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे' असेच अगदी अनिच्छेनेच माझ्या बागेत आले.
या दोन्ही पुस्तकांबद्दल मी येथे लिहिणार आहेच
या वाचनाच्या वेडाचे अखेर फलीत काय? आयुष्यातल्या अनेक वर्षांच्या दिवसांचे आणि रात्रींचे तास असे वाचन करण्यात गेले. त्याचे नक्की फलित काय असे गणित मांडायला गेले तर कितीतरी सकारात्मक बाबी नजरेसमोर येतात. सर्वात प्रथम आणि महत्त्वाची बाब म्हणजे वाचनाने अनेक व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर नेत्यांनी ग्रंथांमुळे आणि वाचनामुळे त्यांच्या जीवनांत कसा आमूलाग्र बदल घडवला हे लिहिले आहे.
माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर केवळ भौतिक प्रगतीचाच विचार केला तर वाचनामुळे मला पुढे उच्च शिक्षण घेता आले आणि माझे काही भाऊ घरच्या शिंपी कामाकडे वळाले तसे माझ्या बाबतीत न घडता राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरच्या इंग्रजी दैनिकांत पत्रकार म्हणून माझी कारकीर्द झाली.
पुस्तक वाचनाचा छंद आणि आवड असणाऱ्या इतर अनेक लोकांचा अनुभव असाच असणार आहे. त्याशिवाय, वाचनसंस्कृतीच्या भौतिक लाभांपेक्षाही ग्रंथ वाचनामुळे समृद्ध होणारे जीवन अधिक मोलाचे महत्त्व असते.
आजच्या मोबाईलच्या युगात पुस्तकांचे वाचन झपाट्याने कमी होत चालले आहे. नव्या जमान्यात कदाचित छापील पुस्तकांऐवजी ई-पुस्तके अधिक वाचली जातील. नव्या पिढीला ही नव्या धर्तीची पुस्तके अधिक भावतील. मात्र पुस्तके छापील वा डिझिटल स्वरुपांत असोत, मुळात पुस्तके अथवा ग्रंथ वाचण्याचा आनंद आणि त्यापासून मिळणारे भौतिक आणि इतर लाभ नेहेमीच कालातीत असणार आहे,
Camil Parkhe, July 31, 2022

Tuesday, September 3, 2024

 

आज त्याच पुस्तक प्रदर्शनाला तिसऱ्यांदा भेट दिली. पहिल्या दोन भेटी घाईघाईत होत्या. आज अगदी आरामात अनेक कक्षांतील पुस्तके दोनदातिनदा नजरेखाली घातली, बऱ्याच पुस्तकांतला मजकूर चाळला.
पुस्तक प्रदर्शनात नेहेमीचेच यशस्वी प्रकाशक कलाकार होते आणि नेहेमीचेच लेखक आणि त्यांची ती पुस्तके होती.
अशाप्रकारच्या लोकप्रिय पुस्तक प्रदर्शनांत वेगवेगळी चव असणाऱ्या बहुतांश वाचकांना आवडतील अशीच पुस्तके असतात. हे प्रदर्शन त्यास अपवाद नव्हते.
मी वेगवेगळ्या प्रकारची अनेक मराठी पुस्तके - चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य, विनोदी साहित्य , ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या - खूप आवडीने वाचल्या ते श्रीरामपुरात दहावीपर्यंत शिकत असताना.
तिथल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात हे सगळे वाचन झाले. त्यानंतर मी गोव्याला गेलो, तेथे मी इंग्रजी शिकलो आणि इंग्रजी साहित्याकडे आणि पत्रकारितेकडे वळलो ते आजतागायत.
आज या पुस्तक प्रदर्शनात दिडेक तास वावरताना मला ती माझ्या ओळखीचे अनेक साहित्यिक आणि पुस्तके भेटली.
वि. स. खांडेकर, साने गुरुजी, ग. दि. आणि व्यंकटेश माडगूळकर, शिवाजी सावंत, इरावती कर्वे, पुल देशपांडे, दुर्गा भागवत, व.पु. काळे, गो. नि दांडेकर, आचार्य अत्रे आणि धनंजय कीर .
ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकांत अनेक मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या कलाकृती मी वाचलेल्या नाहीत. पण त्या पुस्तकांची आणि साहित्यिकांची मला तोंडओळख आहे.
आजच्या प्रदर्शनात ही पुस्तके नजरेसमोर आली आणि त्यांत मी डोकावून पाहिलेसुद्धा. मात्र आज ही पुस्तके माझ्याकडून वाचली जातील कि नाही अशी शंका येऊन ती पुस्तके पुन्हा रॅकवर ठेवली.
काही नवी पुस्तके नजरेत भरली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे 'देवळांचा धर्म' हेच पुस्तक गेली अनेक वर्षे ठिकठिकाणी दिसायचे, आता त्यांचे ''माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र , 'दगलबाज शिवाजी' असे चकित करणारे शीर्षक असलेले पुस्तक आणि इतरही पुस्तके नव्याने बाजारात आली आहेत.
मला हवे असलेले प्रबोधनकारांनी लिहिलेले पंडिता रमाबाई यांचे चरित्र मात्र मला मिळाले नाही.
अशी अनेक चांगल्या दर्जाची असलेली मराठी पुस्तके विविध कारणांमुळे दुर्मिळ होत चालली आहेत. मागच्याच आठवड्यातील एक गोष्ट सांगतो.
नाशिक येथे १८३०च्या आणि १८४०च्या दशकांत मुलींच्या शाळा चालवणाऱ्या मिसेस कॅरोलिन फरार यांचे 'चमत्कारिक गोष्टी' हे अनुवादित पुस्तक फार लोकप्रिय झाले,
`The Ayah and Lady. An Indian Story' या Mary Martha Sherwood यांच्या पुस्तकाचा अनुवाद.
या मराठी पुस्तकाच्या अनेक आवृत्त्याही छापल्या गेल्या होत्या. मिशनरी शाळांत हे पाठ्यपुस्तक म्हणून शिकवले जायचे.
'चमत्कारिक गोष्टी' या पुस्तकाबाबत मी अनेक जाणकार व्यक्तींकडे चौकशी केली, तर या पुस्तकाचे नावदेखील त्यांनी ऐकले नव्हते !.
नरहर कुरुंदकर यांची अनेक पुस्तकेसुद्धा आता नव्याने प्रकाशित झाली आहेत. साने गुरुजी यांनी अनुवादित केलेली विल ड्युरांत यांचे 'पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास' हा ग्रंथसुद्धा एक नवी भर आहे.
लोकप्रिय स्वरूपाच्या पुस्तक प्रदर्शनांत ठराविक प्रकाशन संस्थाचाच सहभाग असतो. त्यामागे आर्थिक गणित असतेच.
विविध प्रकारच्या मराठी साहित्य संमेलनांत भरणाऱ्या आणि पुस्तक प्रदर्शनांत पुस्तकप्रेमी लोकांना मोठे घबाड मिळत असते.
यावेळी अ भा. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्लीत होणार आहे. तिथे याबाबाबत काय परिस्थिती असेल हे आताच सांगता येणार नाही.
Camil Parkhe, August

Friday, June 4, 2021


श्रीरामपुरातल्या ‘लोकमान्य टिळक वाचनालया’ने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली!
‘अक्षरनामा’   ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 04 June 2021
  • ग्रंथनामावाचणारा लिहितोपुस्तकेBooksगो. नि. दांडेकरG. N. Dandekarवि. स. खांडेकरV. S. Khandekarसाने गुरुजीSane Gurujiश्यामची आईShyamchi Aaiसाने गुरुजी कथामालाSane Guruji KathamalaचांदोबाChandobaहंसHansनवलNavalकिर्लोस्करKirloskarललितLalitअनिल बर्वेAnil Barveद. मा. मिरासदारD. M. Mirasdarपु. ल. देशपांडेP. L. DeshpandeकेशवसुतKeshavsutआचार्य अत्रेAachary Atre

श्रीरामपुरात मेन रोडवरील सोनार आळीतील आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानासमोर नगरपालिकेचे लोकमान्य टिळक वाचनालय होते. अगदी जुनाट दिसत असलेल्या या वाचनालयात पाचव्या इयत्तेत असल्यापासून मी नियमितपणे जायला सुरुवात केली. संध्याकाळी साडेपाचला शाळा सुटली की, मी आमच्या दुकानाकडे येई आणि वाचनालयाच्या सहा वाजता खुला होणाऱ्या बालविभागाच्या कक्षात जाऊन बसे. १९७०-७१सालची ही घटना. त्या काळात महाराष्ट्रातील सर्वांत उत्तम पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालयांमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या या लोकमान्य टिळक वाचनालयाचा समावेश होई. 

या वाचनालयाच्या बालविभागाने मला संपूर्ण जगाच्या, भारताच्या आणि मराठीच्या समृद्ध साहित्याची तोंडओळख करून दिली. ‘इसापनीती’, ‘गुलबकावली’, ‘ग्रीक साहित्यातील महाकाव्ये’, कालिदासाची ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’ वगैरे नाटके, वासवदत्ता वगैरे संस्कृतमधील अनेक अभिजात साहित्य, विल्यम शेक्सपियरची ‘हॅम्लेट’ आणि इतर नाटके, रविंद्रनाथ टागोर यांची मराठीत भाषांतरीत झालेली अनेक पुस्तके, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’, ‘सिंदबादच्या कथा’, बिरबल आणि अकबरच्या सुरस कथा, साने गुरुजींची ‘श्यामची आई’, ‘धडपडणारी मुले’, अमर चित्र कथा मालिकेतली रंगीबेरंगी चित्रांची पुस्तके’ आणि आता न आठवणारी कितीतरी पुस्तके मी पाचवी, सहावी आणि सातव्या इयत्तांत  असताना अगदी अधाशीपणे वाचली.

यांपैकी बऱ्याचशा पुस्तकांचे कथानक काय होते, हे आता मला आठवतही नाही. त्याशिवाय ‘चांदोबा’, ‘कुमार’, ‘आनंद’, ‘किशोर’ अशी किती तरी बालमासिके तिथे असायची. बालविभागाच्या दारापाशी चपला काढून फरशीवर पसरलेल्या लाल चादरीवर बैठक घालून आम्ही मुले वाचत बसायचो. या बालविभागात उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘साने गुरुजी कथामाला’ चालायची. या कथामालेमुळे गो. नि. दांडेकर वगैरे नामवंत साहित्यिकांच्या तोंडून त्यांच्या साहित्याची ओळख झाली. 

बालविभागाची वेळ फक्त सहा ते साडेसात अशी असायची आणि ती संपल्यावर नाराजीनेच मी बाहेर पडायचो. आणि सर्वांत वाईट बाब म्हणजे हा बालविभाग वर्षांतून काही महिनेच म्हणजे फक्त दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतच चालू असायचा! पण या इष्टापतीमुळेच मला वाचनालयाच्या दुसऱ्या म्हणजे मोठ्या माणसांसाठी असलेल्या वाचनकक्षाची ओळख झाली.   

वाचनालयाच्या या मुख्य कक्षात लाकडी प्लॅटफॉर्मवर जाड दोरीने बांधलेली श्रीरामपूर शहरात येणारी सर्व मराठी वृत्तपत्रे उभ्याने वाचण्याची सोय होती. त्याशिवाय काही इंग्रजी, हिंदी आणि एकदोन गुजराती दैनिकेसुद्धा होती. सर्वांत महत्त्वाचे आणि आनंदाचे म्हणजे या कक्षात मराठी भाषेत प्रसिद्ध होणारी विविध साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी लांबलचक लाकडी टेबले आणि खुर्च्यांची सोय होती. ‘धर्मयुग’ हे हिंदी साप्ताहिक, ‘इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ हे खुशवंत सिंग संपादित आणि मारिओ मिरांडा यांची ‘सेंट्रल स्प्रेड’वर रंगीत व्यंगचित्रे असलेले इंग्रजी साप्ताहिक ही नियतकालिकेदेखील मी चाळीत असे. माझ्यासाठी एक मोठे आनंदमय भांडार उघडले गेले आहे, अशीच त्या वेळी माझी भावना होती. या वाचनालयाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. बुधवार हा आठवड्यातला माझा सर्वाधिक नावडता आणि कंटाळवाणा दिवस असायचा, याचे कारण म्हणजे वाचनालय या दिवशी बंद असायचे.

वाचनालयाचे ग्रंथपाल हरीभाऊ कुलकर्णी होते. गोरेपान, मध्यम उंचीचे आणि नाजूक चष्मा वापरणारे हरीभाऊ आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानात दादांकडून आपला सफेद शर्ट आणि सफेद पायजमा शिवून घ्यायचे आणि आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे या शिलाईची पूर्ण रक्कम लगेचच रोख द्यायचे. दादांबरोबर वा दुकानातील इतर कुणाबरोबरही गप्पा मारताना मी त्यांना कधी पाहिले नाही. एक खूप शिकलेली, सुसंस्कृत आणि आदर करण्यासारखी व्यक्ती म्हणून हरिभाऊ कुलकर्णी ही माझ्या आयुष्यात आलेली पहिली व्यक्ती.

दादांचे शिक्षण केवळ दुसरीपर्यंत झालेले असले तरी वाचनाचे त्यांना प्रचंड वेड होते. दिवसभर चहा आणि त्यानंतर केवळ कात आणि चुना लावलेले पान खायची सवय वगळता त्यांना इतर कुठलेही व्यसन नव्हते. आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानात कुणी गिऱ्हाईक नसले, आजूबाजूचे कुणी गप्पागोष्टीसाठी जमलेले नसले की, मग दादा ‘सकाळ’ किंवा ‘नवा मराठा’ ही वृत्तपत्रे वाचायचे. शिवून झालेली कपडे ठेवायच्या कपाटातच एका कोपऱ्याला अवांतर वाचनासाठी काही साप्ताहिके, मासिके, पुस्तके असायची. यामध्ये ‘चांदोबा’ हे रंगीबेरंगी चित्रांचे मासिक, जेसुईट संस्थेतर्फे श्रीरामपुरातूनच संपादक फादर प्रभुधर प्रकाशित करत असलेले ‘निरोप्या’ हे मासिक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी-संपादित जेसुइटांमार्फतच नाशिकहून प्रकाशित होणारे ‘आपण’ हे साप्ताहिक, ‘स्वराज्य’ हे सकाळ ग्रुपतर्फे प्रकाशित केलेले लोकप्रिय साप्ताहिक यांचा हमखास समावेश असायचा.

त्याशिवाय आमच्या दुकानात आणि घरीही अनेक मराठी पुस्तकांचा संच असायचा आणि त्यात कायम भर पडत राहायची. श्रीरामपूरजवळच असलेल्या हरेगाव येथे दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी-रविवारी मारिया मातेच्या जन्मानिमित्त मतमाऊलीची यात्रा भरते. त्यात असलेल्या बुकस्टॉलमध्ये दादा दरवर्षी नवनवी पुस्तके विकत घ्यायचे. आमच्या कुडाच्या घरातील तिन्हीही खोल्यांत - अगदी स्वयंपाकघरातही - पितळी भांड्यांच्या फळीवर, रेडिओशेजारी, इकडेतिकडेही साप्ताहिके, पुस्तके असायची. 

या पुस्तकांपैकी सगळीच पुस्तके मी अधाशासारखी वाचली. मला वाचायला येण्याआधीपासून दादा ही पुस्तके विकत घेत असत, स्वतः वाचत बसत असत. त्यांचे पाहून मीही ती पुस्तके हातात घेऊ लागलो आणि नंतर अधाशाप्रमाणे ती वाचू लागलो. नंतरनंतर तर हरेगावच्या मतमाऊली यात्रेत घेतलेली पुस्तके माझ्यासाठीच घेतलेली असायची. 

आमच्या घरातील इतर जण म्हणजे माझे मोठे भाऊ किंवा बहिणी यांना कधीही ही पुस्तके वाचताना मी पाहिले नाही. बाई - माझी आई - तर निरक्षरच होती. भिंतीवरच्या येशू ख्रिस्ताचा पुतळा असलेल्या अल्तारापाशीच सुबक कोरीव लाकडी पेटीमध्ये ठेवलेल्या गोल आकाराचे घड्याळ वाचण्यापलीकडे तिची मजल गेली नव्हती. 

मला आणि माझ्या भावंडांना दुसरी-तिसरीत असताना ते घड्याळ वाचण्यास बाईनेच शिकवले. शाळेची तयारी करण्यासाठी हे घड्याळ वाचणे गरजेचे होते. ते जुने घड्याळ बंद पडल्यावर नव्या पद्धतीचे घड्याळ आले आणि बाईची तेव्हढीही साक्षरता संपली. जेव्हा माझ्या लक्षात हे आले, तेव्हा मला खूप वाईट वाटले होते.

त्यानंतर खूप वर्षांनी, वयाची पंच्याऐशी ओलांडल्यानंतर दादांना चष्मा लावल्यानंतरही वाचता येईना, म्हणून मी त्यांना डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तेव्हा ‘यापुढे त्यांना वाचणे शक्य होणार नाही’ असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मला असेच खूप वाईट वाटले होते.                

तर त्या वेळी घरच्या संग्रहातील वाचलेल्यांपैकी आजही आठवणाऱ्या या पुस्तकांमध्ये ‘यात्रेकरूचा प्रवास’ (जॉन बनयान यांच्या सोळाव्या शतकातील गाजलेल्या ‘द पिलग्रिम्स प्रोग्रेस’ या कादंबरीचा मराठी अनुवाद), सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांच्या ‘चांदवडचा मधू’ वगैरे कादंबऱ्या, सेंट हेलेना, डॉन बॉस्को, डॉमिनिक साव्हियो वगैरे संतांची रंगीत कव्हर असलेली चरित्रे, ‘हैती’ ही जाडजूड आकाराची भाषांतरीत कादंबरी वगैरेंचा समावेश होता. पुण्यातील ‘जीवनप्रकाश’ या जेसुईट प्रकाशन संस्थेतर्फे त्या काळात मराठीत अनेक पुस्तके प्रकाशित व्हायची. ही मूळ मराठीतील आणि भाषांतरीत पुस्तके कुणाच्या संग्रहात असली तर पुढच्या पिढीसाठी ती जपून ठेवायला हवी.

एकदाची शाळा सुटली की, मी घरात दफत्तर ठेवून जवळच असलेल्या आमच्या दुकानाकडे सुसाट पळत यायचो. मी कायम आमच्या या दुकानात पडीक असायचो. दादांकडे हट्ट करून नव्या शिवलेल्या कपड्यांना काजे करायचे, बटणे लावायचे मी शिकलो. इतर मोठ्या भावांप्रमाणे मात्र शिलाई मशीनवर बसून कपडे शिवण्याचे तंत्र मी शिकलो नाही. मित्रांबरोबर कधी धप्पारप्पी, क्रिकेट, विट्टी-दांडू, पतंग, लंगोरी किंवा गोट्या खेळणे अशा खेळांत मी कधी रमलोच नाही. या सांघिक खेळांत मी फक्त शाळेच्या पीटीच्या क्लासमध्ये किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे त्या काळात माझ्या घराशेजारी भरत असलेल्या शाखेमध्ये सहभागी व्हायचो. दादांमुळे मलाही दुकानात रस्त्याशेजारी असलेल्या त्या बाकावर बसून मग ‘चांदोबा’, ‘स्वराज्य’, ‘निरोप्या’,  ‘आपण’, ‘श्री’ अशी  नियतकालिके, मासिके वाचायची सवय लागली ती लागलीच. 

मी सहावी-सातवीला असेन तेव्हा श्रीरामपूरच्या मेन रोडवर किशोर टॉकीजशेजारी एका हातगाडीवर सार्वजनिक वाचनालय चालायचे. या हातगाडीवर छोट्याछोट्या पुस्तकांचा ढीग लावलेला असायचा आणि वर्गणीदार दरदिवशी किंवा आठवड्यातून दोन-तीन वेळेस पुस्तके बदलून घ्यायला यायचे. माझा दोन नंबरचा भाऊ लुईस - नाना - हा या वाचनालयाचा वर्गणीदार होता. त्याच्या संगतीने मलाही या वेगळ्याच प्रकारच्या, साहसी, रहस्यमय, उत्कंठा वाढवणारी पुस्तके वाचण्याची सवय लागली.

या वाचनालयाची सर्वाधिक लोकप्रिय पुस्तके म्हणजे गुरुनाथ नाईक यांच्या पाच-सहा मालिकांत दर आठवड्याला प्रसिद्ध होणारी पॉकेट बुक्स. यामध्ये ‘तिरंदाज’, ‘कॅप्टन भोसले’, ‘भारतीय गुप्तहेराच्या  पाकिस्तानातील करामती’, ‘काळा पहाड’ असे नायक असलेली पॉकेट बुक्स शुक्रवारी हाती पडायच्या आणि त्यावर वर्गणीदारांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. (काही वर्षांनंतर गोव्यात एका संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत एका सहकारी पत्रकाराने तेथे हजर असलेल्या गुरुनाथ नाईक यांची ओळख करून दिली, तेव्हा त्यांना पाहून मी थक्क झालो होतो!)  बाबुराव अर्नाळकर यांच्या  भयकथांच्या पुस्तकांनाही या वाचनालयात भरपूर मागणी असायची, पण अर्नाळकरांच्या पुस्तकांच्या वाटेला मी कधी गेलो नाही.

मी आठवीत गेल्यावर लोकमान्य टिळक वाचनालय श्रीरामपूर नगरपालिकेच्या आझाद मैदान येथील प्रशस्त जागेत गेले. तोपर्यंत वाचनाचे मला व्यसन लागल्याने मी एकटा मेन रोडने चालत जाऊन तिथे वाचत बसू लागलो. सुट्टीच्या काळात मी तेथे सकाळी नऊपासून अकरापर्यंत तर संध्याकाळीही रात्री आठपर्यंत वाचनात घालवत असे. ‘वाट चुकलेला फकिर मशिदीत’ या नियमाने या काळात मी कोठे असेल असा प्रश्न माझ्या आईवडलांना कधी पडत नसे. श्रीरामपूर नगरपालिकेचा भोंगा रात्री साडेआठला वाजल्यानंतर शहरातील सर्व दुकाने बंद व्हायची, या भोंग्याआधीच मी आमच्या दुकानात वा घरी पोहोचलेलो असायचो.  

त्या काळात खूप लोकप्रिय असलेली साप्ताहिके, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक, ‘डेबेनॉर’, ‘फेमिना’, ‘करंट’ आणि ‘ब्लिट्झ’ साप्ताहिके, ‘ठणठणपाळ’ हे लोकप्रिय साहित्यिक टवाळक्या करणारे सदर असणारे ‘ललित’ मासिक, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘नवल’, ‘मोहिनी’, ‘हंस’, ‘जत्रा’, तसेच य. गो. जोशी यांचे धार्मिक विषयाला वाहिलेले ‘प्रसाद’ मासिक वगैरे मासिके आणि विविध विषयांना वाहिलेले दिवाळी अंक हे सर्व या वाचनालयात अगदी फुकटात वाचायला मिळणे म्हणजे एक मोठी मेजवानीच होती.

यापैकी प्रत्येक साप्ताहिकाचा, मासिकाचा, दिवाळी अंकाचा स्वतःचा असा वेगळा बाज असे. कुठले तरी एक साप्ताहिक त्यातल्या पान दोनवर प्रसिद्ध होणाऱ्या बिकिनीतील ललनेसाठी लोकप्रिय होते. ‘हंस’, ‘नवल’ आणि ‘मोहिनी’ ही तिन्ही मासिके एकाच प्रकाशनसंस्थेची, अनंत अंतरकर यांनी सुरू केलेली. मात्र यापैकी ‘नवल’ हे गूढ आणि रहस्यकथांना वाहिलेले होते. ‘मोहिनी’ आणि ‘हंस’ यांचे वेगवेगळे विषय कोणते होते, ते आता आठवत नाही, मात्र हे तिन्ही मासिके मी वाचत असे हे मात्र नक्की. अशीच गोष्ट किर्लोस्कर कंपनीतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’ या मासिकांची होती. ही तिन्ही मासिके त्या काळात खूप लोकप्रिय होती. त्या तीन मासिकांची  आद्याक्षरे असलेले ‘किस्त्रीम’ नावाचे मासिक आता प्रसिद्ध होते.

विशेष म्हणजे लोकमान्य टिळक वाचनालयात ही सर्व  साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिके ती अगदी ताजीतवानी असतानाच वाचकांच्या टेबलांवर असायची, साधारणतः महिन्याच्या सातआठ तारखेपर्यंत सर्व नियतकालिके वाचकांच्या पुढ्यांत असायची. तीच गोष्ट दिवाळी अंकांची. याबद्दल ग्रंथपाल हरीभाऊ कुलकर्णी यांना श्रेय देऊन त्यांचे याबाबतीत ऋण मान्य केलेच पाहिजे. ग्रंथपाल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर लवकरच दुदैवाने हरीभाऊ यांचे हृदयविकाराने निधन झाले, हे दादांकडून ऐकले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. ज्येष्ठ असलेल्या या व्यक्तीशी मी एक शब्दही कधी बोललो नव्हतो, मात्र ग्रंथपाल म्हणून त्यांनी माझ्यासारख्या अनेकांची वैचारीक, बौद्धिक जडणघडण केली आहे हे नक्कीच. 

‘पॅपिलॉन’, अनिल बर्वे यांचे ‘थँक यू मिस्टर ग्लॅड’ वगैरे पुस्तके, ‘मनोहर’ या नियतकालिकांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेतून मी पहिल्यादा वाचली. रवींद्र गुर्जर यांनी इंग्रजीतील अनेक लोकप्रिय पुस्तके मराठीत आणली त्यापैकी अनेक पुस्तके मी या काळात वाचली.  

टिळक वाचनालयात दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत साने गुरुजी कथामालेअंतर्गत साहित्यिकांची व्याख्याने आयोजित केली जायची. हे वाचनालय आपल्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाल्यावर तेथे गो. नि. दांडेकर यांचे व्याख्यान झाले होते. तेव्हा शिवरायांचे किल्ले चढणारे दांडेकर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी त्या चक्राकार पायऱ्या अगदी वेगाने कसे चढले होते, ते आताही आठवते.    

अजूनही माझ्या आवाक्यात न आलेले एक भले मोठे भांडार त्या लोकमान्य टिळक वाचनालयात होते. ते भांडार म्हणजे वाचनालयात असलेली हजारो पुस्तके. मात्र ही पुस्तके केवळ वाचनालयाच्या वर्गणीदारांना घरी घेऊन वाचायला मिळायची. अनामत रक्कम भरून मासिक वा वार्षिक वर्गणीदार  झालेल्या लोकांना ही पुस्तके काही ठराविक दिवसांसाठी मिळायची. पुस्तक परतण्यास उशीर झाल्यास दरदिवशी काही पैसे दंड बसायचा. दादांना मी पुष्कळ तगादा करुनही त्यांनी वाचनालयाची वर्गणी भरली नव्हती. अखेरीस मी आठवी की, नववीला गेल्यावर एकदाचे दादांनी ही अनामत  रक्कम  आणि वर्गणी भरली आणि मी एकदम खुश्श झालो.  

आता या कक्षात बसून लाकडी खोक्यांमधील लेखकाच्या किंवा पुस्तकाच्या आद्याक्षरानुसार जाड कागदांवर लिहिलेली यादी पाहून पुस्तके निवडणे म्हणजे आनंदच होता. त्यानंतर मराठीतील अनेक नामवंत लेखकांची एकामागून एक पुस्तके वाचण्याचा मी सपाटा लावला. यामध्ये गो. नि. दांडेकर होते. त्यांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘मृन्मयी’, ‘माचीवरला बुधा’ यांसारख्या पुस्तकांनी मला भारावून टाकले होते. इतर लेखकांमध्ये वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील होते. त्या काळात म्हणजे १९७०च्या दशकात त्या टिळक वाचनालयाच्या सर्व सुविधांचा सर्वाधिक पुरेपूर लाभ घेणारा माझ्या वयातील मी एकमेव वाचक होतो. खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषक मिळाल्यावर ‘ययाती’ कादंबरी वाचून काढली. ‘खांडेकरांच्या रूपाने मराठीला पहिले ज्ञानपीठ’ असा मी दिलेला दहाबारा ओळींचा लेख माझ्या नावानिशी त्या वेळी ‘निरोप्या’ मासिकात प्रसिद्ध झाला होता.  

दहावीनंतर शिक्षणासाठी कराडला गेलो तेथे ज्यांच्याबरोबर मी राहात होतो, त्या ‘निरोप्या’ मासिकाचे संपादक असलेल्या फादर प्रभुधर यांच्या मराठी ग्रंथसंग्रहाची दोन-तीन स्टीलची, पारदर्शक काचांची कपाटेच होती. त्यामध्ये ‘ज्ञानेश्वरी’ होती, केशवसुतांच्या कविता  होत्या, स्वामी रामदासांचे ‘दासबोध’  आणि संत तुकारामांची ‘गाथा’ होती. मराठीतील पहिले छापिल पुस्तक असलेले फादर थॉमस स्टिफन्स यांचे ‘ख्रिस्तपुराण’, ‘कऱ्हेचे  पाणी’ या आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राचे तीन-चार खंड होते. त्या वर्षभराच्या काळात अशी ही अनेक पुस्तके एकतर वाचून किंवा नजरेखालून काढली.

पुढील शिक्षणासाठी मी गोव्याला गेलो आणि तिथे इंग्रजी बोलता आणि वाचता यावे म्हणून आम्हा मुलांवर मराठी वा कोकणी बोलण्यावर बंदीच आली आणि त्यामुळे मी इंग्रजी बोलू लागलो, लिहू आणि वाचू लागलो.

पदवी शिक्षण संपल्यानंतर गोव्यातच मी पत्रकार बनलो, तेही इंग्रजी दैनिकात. तेथून आजवर पूर्णतः इंग्रजी वृत्तपत्रांतच कारकीर्द घालवली आहे.गोव्यातील माझ्या वास्तव्याचा काळ हा माझ्या आयुष्याचा ऐन उमेदीचा काळ. या काळात मी विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकांशिवाय इतर कुठली मराठी पुस्तके वाचलीही नाहीत. त्या कॉलेज आणि हॉस्टेल जीवनात मित्रांच्या संगतीने हेराल्ड रॉबिन्स, जेफ्री आर्चर, मारिओ पुझो (गॉडफादरफेम) वगैरेंची भरपूर लोकप्रिय इंग्रजी पुस्तके वाचली, इंग्रजी चित्रपट पाहिले.

मी केवळ इंग्रजी पत्रकारितेतच काम केले असले तरी तेव्हापासून आजपर्यंत मराठीतही माझे लिखाण असतेच. काही जण म्हणतात, दोन्ही भाषांत मी बऱ्यापैकी लिहू शकतो. लहानपणी भरपूर वाचन केल्यामुळे असे दोन्ही भाषांतही लिहिणे शक्य झाले असावे. 

आता मागे वळून पाहताना वाटते कि सत्तर, ऐशी आणि नव्वदच्या दशकांचा तो काळ मराठी साप्ताहिके, मासिके आणि इतर नियतकालिकांचा सुवर्णकाळच होता. वाचनसंस्कृतीचाच तो सुवर्णकाळ म्हटले तरी चालेल. दूरदर्शन किंवा मोबाईल येण्याच्या आधीच्या त्या काळात बहुतेक घरात किमान एक तरी दैनिक यायचे. शेजाऱ्यांकडून दैनिके वाचण्यासाठी घेऊन जाण्याची पद्धत होती. शहरांत चौकाचौकांत वर्तमानपत्रांचा, इतर नियतकालिकांचे स्टॉल्स असायचे आणि रस्त्यांवर सायकलने हिंडत मोठ्याने ओरडून, बस स्टॅण्डवर प्रत्येक बसमध्ये शिरून ‘ताज्या’ बातम्या असणारी दैनिके विकली जायची. चहाची तलफ भागवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘अमृततुल्य’ सारख्या हॉटेलांत, तसेच कटिंग सलूनमध्येही दैनिके, साप्ताहिके ठेवण्याची प्रथा होती.   

अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजे दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील कुठल्या तरी  वाचनालयाचे सदस्य असणे प्रतिष्ठेचे समजले जायचे. मी पुण्यात डेक्कनला १९८९ला राहायला आलो, तेव्हा माझ्या लॉजच्या शेजारी असलेल्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचे सदस्य होण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असायची, हे अजूनही आठवते. नेहमी सिटी बसने प्रवास करणाऱ्या मी स्वतः  अनेक वर्षे बसची वाट पाहत असताना काही वाचावे म्हणून बॅगमध्ये नेहमी पुस्तक वा मासिक आवर्जून ठेवत असायचो. मोबाईलमुळे माझी ही सवय आता गेली आहे.

या दोन-तीन दशकांच्या काळात ‘स्वराज्य’, ‘श्री’, ‘मार्मिक’, ‘विवेक’, ‘आपण’, ‘मनोहर’, ‘ब्लिट्झ’, ‘करंट’ अशी भिन्न विचारसरणींची, प्रवृत्तींची दैनिकांच्या, नियतकालिकांच्या कट्ट्यांवर एकमेकांशेजारी गुण्यागोविंदाने राहिली. वाचकांनी ती सार्वजनिक वाचनालयांत किंवा आपापल्या घरी वाचली. तरी या वाचकांना डावा, उजवा, पुरोगामी, भक्त, अर्बन नक्सली किंवा कुठलेही ‘वादी’ अशी लेबले त्या काळात लावली जात नसायची. अशीच स्थिती देशभरही होती का ते माहीत नाही. या सगळ्या विचारांची त्या काळात सरमिसळ होत राहायची. हे विचार ‘स्टेटस को’ किंवा ‘जैसे थे’वादी, डबके न बनता सतत प्रवाही राहिले हे नक्की!