Showing posts with label Holi. Show all posts
Showing posts with label Holi. Show all posts

Sunday, December 8, 2024


मी बातमीदार बनलो तेव्हा म्हणजे १९८१ साली आम्हा पत्रकारांना आणि इतर बिगरपत्रकार वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वर्षातून दहा पगारी सुट्ट्या (हॉलीडेज) होत्या. रजा वेगळ्या.

तत्कालीन अस्तित्वात असलेल्या आणि बहुसंख्य प्रतितिष्ठ वृत्तपत्रांत अंमलबजावणी होत असलेल्या वृत्तपत्र कर्मचारी कायद्यानुसार या पगारी सुट्ट्या होत्या.
गोव्यात आमच्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी आणि `नवप्रभा' या जुळ्या मराठी दैनिकात वर्षातून काही दिवस - नूतन वर्ष एक जानेवारी, २६ जानेवारी, पंधरा ऑगस्ट, गणेश चतुर्थी, दिवाळी - छपाई बंद ठेवून सर्वांना सुट्टी मिळायची,
यात तीनचार वर्षांनी एक मेच्या कामगार दिनाची भर पडली.
याचे कारण त्याकाळात डाव्या विचारसरणीचा जोर होता आणि आम्ही गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस (गुज) चे पदाधिकारी असलेले श्रमिक पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचारी स्वतःला कामगार समजायचो. उरलेल्या पाच पगारी सुट्ट्या आम्ही वर्षातून कधीही घेऊ शकायचो.
त्याशिवाय पत्रकार कायद्यानुसार वर्षाला तीस हक्काची रजा, बारा आजारपणाची रजा आणि दहाबारा कॅज्युएल रजा असायच्या.
गोवा सोडून मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हापर्यंत अशीच स्थिती होती,
पुण्यात त्यावेळी म्हणजे १९८९ साली मात्र दैनिकांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या असायच्या.
त्यावेळची प्रत्येक स्थानिक दैनिक आपापल्या वर्धापनदिनानिमित्त छपाई बंद ठेवायचे. उदाहरणार्थ, `सकाळ' चा वर्धापनदिनाला एक जानेवारीला सुट्टी असायची, दोन जानेवारीला पेपर नसायचा.
ही परिस्थिती एकदोन वर्षात व्यवहारी दृष्टिकोनामुळे बदलली.
मुंबईतल्या `लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसने पुण्यात आवृत्त्या सुरु केल्या होत्या. या दोन्ही वृत्तपत्रांनी आपल्या प्रती `सकाळ' वर्गणीदारांच्या घरांत दोन जानेवारीला फुकटात देणे सुरु केले.
त्यावेळचा पुण्यात दोन क्रमांकाचा असणारा `प्रभात' दुप्पट किंवा त्याहून अधिक प्रती दोन जानेवारीला छापू लागू लागला.
पुण्यात `सकाळ', `प्रभात' आणि `केसरी' याशिवाय इतरही दैनिके आहेत, याचा वाचकांना यावेळी पहिल्यांदाच पत्ता लागला.
परिणामतः `सकाळ' व्यवस्थापनाने एक जानेवारीला वृत्तपत्राची छपाई बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला. प्रतापराव पवार यांनी नानासाहेब परुळेकरांचा `सकाळ' पाचसहा वर्षांपूर्वी खरेदी केला होता.
छपाई आणि काम सुरु राहिले तरी `सकाळ' कर्मचाऱ्यांना मात्र त्यादिवसाऐवजी इतर दिवशी सुट्टी घेता यायची, आजही ही सोय आहे.
मी `इंडियन एक्सप्रेस'ला असतानाच पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांनी होळीनिमित्त सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.
बहुतेक वृत्तपत्र व्यवस्थापकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. या वितरकांच्या मदतीशिवाय आपण आपल्या दैनिकाच्या प्रती लोकांना वाटू असाही इशारा त्यांनी दिला.
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपला सुट्टीचा निर्णय वृत्तपत्र व्यवस्थापनकांना कळवल्यानंतर तीनचार दिवस तणावाची आणि संघर्षाची परिस्थिती निंर्माण झाली होती, हे आजही आठवते
मात्र वितरकांनी आपली एकी कायम ठेवली आणि आम्हा वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना असलेल्या आणखी एका सुट्टीची भर पडली.
पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांना आपल्या ताकदीची जाणीव झाली,
याआधी वृत्तपत्र कर्मचारी संघटितरित्या वृत्तपत्राची सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकत असत. आता त्यांची जागा वृत्तपत्र वितरकांनी घेतली होती,
हळूहळू एक मे चा कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन, अशा सुट्ट्या वाढत गेल्या.
अलीकडेच दिवाळीनिमित्त पुण्यात दैनिकांची छपाई त्यामुळे दोन दिवस बंद असते.
पुण्यात काल आणि आज वृत्तपत्रे नाहीत.
मात्र किती वाचकांना या दोन दिवशी सकाळी चुकल्याचुकल्यासारखे किंवा दैनिकांची गैरहजेरी जाणवतअसेल ?
Camil Parkhe



Tuesday, March 22, 2022

होळी म्हटलं की मला शेडगे काकू, पुरण पोळी आठवतात..

होळी म्हटलं की मला खूप वर्षे आमच्या शेजारी असणाऱ्या शेडगे काकू आठवतात.. आमची लेक अदिती त्यांना काकू म्हणायची म्हणून आम्ही सगळे जण त्यांना शेडगे काकू म्हणायला लागलो..
आम्ही दोघे नोकरीला असल्याने अदिती चार महिन्यांची झाल्यापासून पाळणाघरात राहिली. जॅकलीन सकाळी साडेसातला शाळेत जायची, मग साडे दहापर्यंत मी अदितीला आंघोळ घालून तिचे कपडे करुन तोंडाला पावडर आणि काजळ लावून श्रद्धा गार्डन कॉलनीत असलेल्या पाळणाघरात न्यायचो. तिला तिथे झोपवून नंतर इंडियन एक्स्प्रेसला कामावर जायचो. दुपारी साडेतीनपर्यंत जॅकलीन अदितीला घरी न्यायची.
अदिती थोडी मोठी झाल्यावर आणि तिला कळायला लागल्यावर मात्र गडबड व्हायला लागली. याचे कारण म्हणजे...
शनिवारी रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी अदितीचा वावर पूर्ण दिवस शेडगे काकूंकडे असायचा. शेडगे. काकूंनी. शेंगदाणे जिरे आणि इतर कायकाय घालून केलेले पोहे, साबुदाणा खिचडी अदितीला खूप आवडायची..
त्यामुळे सोमवारी आणि इतर दिवशी पाळणाघरात गेलो कि माझे कपडे आणि बॅग आपल्या चिमुकल्या हातांत घट्ट पकडून अदिती म्हणायची.

'' No, No. Don't leave me here.. I will stay with Shedge Kaku... I won't trouble Shedge Kaku.. Don't leave me here...''

आज हे लिहिताना काळीज तिळतिळ तुटते तर त्यावेळी काय होत असेल कल्पना करा.. काळजावर भलामोठा दगड घट्ट ठेवून डोळ्यातले पाणी लपवत मी बस स्टॉपकडे निघायचो..
तर होळीच्या दिवशी शेडगे काकूंकडून आम्हा तिघांना पुरण पोळी, चमचमीत आमटी आणि भजे यायचे.. होळीच्या दिवशी आमच्या घरी जेवणासाठी गॅस पेटवला जात नसे..
शेडगे कुटुंबात दरवर्षी गणपती बसवला जायचा तेव्हा त्या अकरा दिवसांत अदितीला बोलावल्यानंतरच तिथे आरती सुरु व्हायची आणि अदितीच्या हातात घंटी असायची.. ''घालीन लोटांगण'' सुरु झालं की अदिती त्यासर्वांबरोबर गोलगोल फिरायची. दिवा असलेलं आरतीचं ताट समोर आल्यावर नमस्कारही करायची, नंतर खोबरे, पेढे असा प्रसाद खायची. गणपती विसर्जनाला शेडगे कुटुंबाबरोबर अदितीसह आम्ही दोघेही चिंचवडगावातल्या पवना नदीच्या घाटावर असायचो.
अदिती पाचवी-सहावीत असेल तेव्हा आम्ही समोरच्याच इमारतीत मोठ्या घरात राहायला आलो. काही वर्षांपुर्वी शेडगे कुटुंबसुद्धा भोसरीपाशी स्वतःच्या बंगल्यात राहायला गेले आणि आमचा त्यांचा दररोजचा संपर्क तुटला..
शेडगे काकूंच्या दोन्ही मुलांच्या आणि मुलीच्या लग्नासाठी आम्ही त्यांच्या गावाला सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावला आवर्जून गेलो होतो. गावातली ती लग्ने अदितीने खूप एन्जॉय केली.
अदितीला मात्र शेडगे काकुंचे पोहे, साबुदाणे खिचडी आणि होळीच्या सणाच्या पुरण पोळी, आमटी आणि भजे नेहेमी आठवत असतात.
काल रात्री श्रद्धा गार्डन कॉलनीतल्या होळी पेटल्या तसे जॅकलीनला मी शेडगे काकूंची आणि पुरणपोळींची आठवण करुन दिली..
अदितीशी काल फोनवर होळीच्या सुट्टीबाबत बोलणे झालं होतं ..
होळीनिमित्त तिलाही शेडगे काकू आणि त्यांच्या पुरणपोळी, आमटीची ती चव आठवली असेलच... ..