Showing posts with label Indian Express. Show all posts
Showing posts with label Indian Express. Show all posts

Sunday, December 8, 2024


मी बातमीदार बनलो तेव्हा म्हणजे १९८१ साली आम्हा पत्रकारांना आणि इतर बिगरपत्रकार वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वर्षातून दहा पगारी सुट्ट्या (हॉलीडेज) होत्या. रजा वेगळ्या.

तत्कालीन अस्तित्वात असलेल्या आणि बहुसंख्य प्रतितिष्ठ वृत्तपत्रांत अंमलबजावणी होत असलेल्या वृत्तपत्र कर्मचारी कायद्यानुसार या पगारी सुट्ट्या होत्या.
गोव्यात आमच्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी आणि `नवप्रभा' या जुळ्या मराठी दैनिकात वर्षातून काही दिवस - नूतन वर्ष एक जानेवारी, २६ जानेवारी, पंधरा ऑगस्ट, गणेश चतुर्थी, दिवाळी - छपाई बंद ठेवून सर्वांना सुट्टी मिळायची,
यात तीनचार वर्षांनी एक मेच्या कामगार दिनाची भर पडली.
याचे कारण त्याकाळात डाव्या विचारसरणीचा जोर होता आणि आम्ही गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस (गुज) चे पदाधिकारी असलेले श्रमिक पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचारी स्वतःला कामगार समजायचो. उरलेल्या पाच पगारी सुट्ट्या आम्ही वर्षातून कधीही घेऊ शकायचो.
त्याशिवाय पत्रकार कायद्यानुसार वर्षाला तीस हक्काची रजा, बारा आजारपणाची रजा आणि दहाबारा कॅज्युएल रजा असायच्या.
गोवा सोडून मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हापर्यंत अशीच स्थिती होती,
पुण्यात त्यावेळी म्हणजे १९८९ साली मात्र दैनिकांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या असायच्या.
त्यावेळची प्रत्येक स्थानिक दैनिक आपापल्या वर्धापनदिनानिमित्त छपाई बंद ठेवायचे. उदाहरणार्थ, `सकाळ' चा वर्धापनदिनाला एक जानेवारीला सुट्टी असायची, दोन जानेवारीला पेपर नसायचा.
ही परिस्थिती एकदोन वर्षात व्यवहारी दृष्टिकोनामुळे बदलली.
मुंबईतल्या `लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसने पुण्यात आवृत्त्या सुरु केल्या होत्या. या दोन्ही वृत्तपत्रांनी आपल्या प्रती `सकाळ' वर्गणीदारांच्या घरांत दोन जानेवारीला फुकटात देणे सुरु केले.
त्यावेळचा पुण्यात दोन क्रमांकाचा असणारा `प्रभात' दुप्पट किंवा त्याहून अधिक प्रती दोन जानेवारीला छापू लागू लागला.
पुण्यात `सकाळ', `प्रभात' आणि `केसरी' याशिवाय इतरही दैनिके आहेत, याचा वाचकांना यावेळी पहिल्यांदाच पत्ता लागला.
परिणामतः `सकाळ' व्यवस्थापनाने एक जानेवारीला वृत्तपत्राची छपाई बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला. प्रतापराव पवार यांनी नानासाहेब परुळेकरांचा `सकाळ' पाचसहा वर्षांपूर्वी खरेदी केला होता.
छपाई आणि काम सुरु राहिले तरी `सकाळ' कर्मचाऱ्यांना मात्र त्यादिवसाऐवजी इतर दिवशी सुट्टी घेता यायची, आजही ही सोय आहे.
मी `इंडियन एक्सप्रेस'ला असतानाच पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांनी होळीनिमित्त सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.
बहुतेक वृत्तपत्र व्यवस्थापकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. या वितरकांच्या मदतीशिवाय आपण आपल्या दैनिकाच्या प्रती लोकांना वाटू असाही इशारा त्यांनी दिला.
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपला सुट्टीचा निर्णय वृत्तपत्र व्यवस्थापनकांना कळवल्यानंतर तीनचार दिवस तणावाची आणि संघर्षाची परिस्थिती निंर्माण झाली होती, हे आजही आठवते
मात्र वितरकांनी आपली एकी कायम ठेवली आणि आम्हा वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना असलेल्या आणखी एका सुट्टीची भर पडली.
पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांना आपल्या ताकदीची जाणीव झाली,
याआधी वृत्तपत्र कर्मचारी संघटितरित्या वृत्तपत्राची सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकत असत. आता त्यांची जागा वृत्तपत्र वितरकांनी घेतली होती,
हळूहळू एक मे चा कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन, अशा सुट्ट्या वाढत गेल्या.
अलीकडेच दिवाळीनिमित्त पुण्यात दैनिकांची छपाई त्यामुळे दोन दिवस बंद असते.
पुण्यात काल आणि आज वृत्तपत्रे नाहीत.
मात्र किती वाचकांना या दोन दिवशी सकाळी चुकल्याचुकल्यासारखे किंवा दैनिकांची गैरहजेरी जाणवतअसेल ?
Camil Parkhe



Tuesday, January 9, 2024


                                                                नरेंद्र चपळगावकर

औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला १९८८ साली मी नव्यानेच रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीतल्या 'नवहिंद टाइम्स' ला आठ वर्षे असताना तेथे मी क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. साहजिकच औरंगाबादला लोकमत टाईम्स येथेसुद्धा या बिट्सपैकी कोर्ट ही जबाबदारी माझ्याकडे आली.

बॉंबे हायकोर्टाचे एक खंडपीठ पणजी येथे होते, मांडवीच्या तिरावरच्या या हायकोर्टात मी दररोज दुपारी साडेचारला जायचो, तिथल्या रजिस्ट्रारला भेटून मुख्य बातम्या समजावून घ्यायचो आणि नंतर त्या बातम्या मिळवायला लागायचो. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश असताना त्यावेळीं तिथे काफेफोसा ॲक्ट् म्हणजे तस्करीच्या आणि हेबियस कॉर्पसच्या (बेकायदेशीर अडकवून ठेवणे) खूप केसेस असायच्या.
इथे औरंगाबादलासुद्धा हायकोर्टाचे खंडपीठ होते. पणजीला एकावेळी फक्त दोन न्यायमूर्ती असायचे . त्यापैकी एक पणजीला मुंबईचे हायकोर्ट जज्ज 'व्हिजिटिंग जज्ज' म्हणून यायचे ते अक्षरशः ' व्हेकेशन जज्ज' म्हणूनच. एका जिल्ह्यासारख्या लहान असणाऱ्या गोव्याच्या परिसरात हायकोर्टाची किती प्रकरणे आणि सुनावण्या असणार ? दुपारी अडीच तीनच्या सुमारास पुढील लिस्टेड, नोंदणी झालेले सुनावणी नाही म्हणून कोर्टाचे त्या दिवसाचे कामकाज तहकूब व्हायचे..!
औरंगाबाद खंडपीठाच्या हद्दीत मात्र मराठवाड्याचे नऊ जिल्हे आणि शेजारचा अहमदनगर जिल्हा आहे, त्यामुळे तिथे न्यायमूर्ती अधिक असायचे आणि भरपूर प्रकरणेही असायची. भरपूर कोर्टप्रकरणे म्हणजे भरपूर बातम्या... पण बातमीदाराच्या छोटयाशा झोळीत किती आणि कोणत्या बातम्या घेणार ?
मात्र माझ्यासमोरचा हा प्रश्न अपेक्षेपेक्षा लवकर आणि खूपच समाधानकारकरित्या सुटला.
त्यावेळी त्या खंडपीठात नरेंद्र चपळगावकर हे एक सिनियर वकील होते. त्यांची ओळख झाली आणि मग चांदणी चौकाशेजारच्या हायकोर्टात आल्यावर मी तडक चपळगावकर यांना भेटायचो आणि ते मग मला त्या दिवसाची हायकोर्टातली सर्वात मोठी बातमी काय ते सांगायचे, का महत्त्वाची हे सांगायचे आणि कुठल्या वकिलाकडे ती बातमी मिळणार हेही सांगायचे.
यात अहमदनगरच्या सहकारी साखर कारखान्याची कोर्टकेस असायची, कधी कायद्याच्या दृष्टीने अगदी वेगळा निकाल असायचा, कधी ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी असायची.
कधीकधी चपळगावकर म्हणायचे, ``कामिल, आज बातमीसारखे काहीच नाही हायकोर्टात..'' अन मी लगेच माझ्या ऑफिसची वाट धरायचो. आठवड्यातून एकदोनदा असे व्हायचे.
मला आठवते एकदा कोर्टात आल्याआल्या चपळगावकरांनी मला सांगितले
"आज छान बातमी आहे.. बॉम्बे हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती सुजाता मनोहर आजपासून येथे खंडपीठात काही काळासाठी व्हिजिटिंग जज्ज म्हणून आल्या आहेत.."
अशा खूप बातम्या मला या काळात चपळगावकरांनी दिल्या..
इतर वकील मात्र आपल्याकडचे कोर्ट प्रकरण खूप महत्वाचे आहे असा दावा करायचे. प्रत्यक्षात तसे काही नसायचे हे लक्षात आल्यानंतर मग मी अशा वकिलांना टाळायला लागलो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुद्द चपळगावकर यांच्याकडे महत्त्वाची कोर्ट बातमी असल्यावर जे घडायचे तो अनुभव मी कधीच विसरणार नाही.
``हा, तर घ्या लिहून,'' अशी सुरुवात चपळगावकर वकील करायचे.
मी इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून इंग्रजीत ते सांगायचे.
''A Division Bench of the Bombay High Court, comprising Mr Justice... and Mr. Justice... here on Monday set aside an order issued by ....""
कोर्टाच्या बातमीचा इंट्रो कसा असावा, त्यातील बातमीच्या संदर्भाचा क्रम कसा असावा आणि पूर्ण बातमी कशी असावी याचे चपळगावकर यांचे ते डिक्टेशन म्हणजे एक वस्तुपाठ होता.
माझे वय त्यावेळी अठ्ठावीस होते. कायद्याचा पदवीधर नसलो तरी गोव्यात हायकोर्ट कव्हर केलेले असल्याने कोर्टाच्या बातम्या किती काळजीपूर्वक कराव्या लागतात हे मला पूर्ण माहिती होते. कोर्टाच्या माझ्या कुठल्याही बातमीत माझ्या संमतीशिवाय काहीही फेरफार करायचे नाहीत अशी वृत्तसंपादकांची डेस्कवरच्या लोकांना सक्त ताकिदच असायची. ( 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये माझ्या कोर्टाच्या बातमीत एकदा असे एडिटिंग झाले होते तर आठ दिवसांत शिर्डीहून एका वकिलाची नोटीस येऊन धडकली होती.) चपळगावकर वकिलांनी याबाबतीत माझ्या माहितीत आणि कोर्ट बातमीदार म्हणून माझ्या कौशल्यात खूप काही भर घातली.
औरंगाबादला केवळ एक वर्ष राहून इंडियन एक्सप्रेसला रुजू होण्यासाठी मी पुण्याला आलो. पुण्याला हायकोर्टाचे खंडपीठ नाही, त्यामुळे नंतर लिगल रिपोर्टींग सुटले ते कायमचेच.
पण लिगल रिपोर्टींगची आठवण झाली कि आजही नरेंद्र चपळगावकर हमखास आठवतात.
पुण्यात इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्समध्ये पोलिटिकल रिपोर्टींग आणि लेख यात माझे स्पेशलायझेशन होते. पुण्यात नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला समाजवादी नेते आणि माजी खासदार ना. ग. किंवा नानासाहेब गोरे यांची कुठल्याही महत्त्वाच्या राष्ट्रीय घटनेवर प्रतिक्रिया आम्ही बातमीदार घेत असू.
त्यावेळी लॅण्डलाइनवर तिकडे आल्यावर नानासाहेब म्हणायचे, हा, घ्या लिहून.. ''
आणि नंतर नानासाहेब अक्षरशः बातमी डिक्टेट करायचे, हे डिक्टेशन गरजेनुसार इंग्रजीत किंवा मराठीत असायचे. त्यात एका शब्दाचाही फेरफार करण्याची गरज नसायची. नानासाहेबांचे विचार असे अगदी स्पष्ट असायचे.
आणि नानासाहेबांची अशी प्रतिक्रिया लिहून घेताना मला औरंगाबादचे वकील नरेंद्र चपळगावकर आठवायचे...
नंतर एकदोन वर्षांतच नरेंद्र चपळगावकर यांची हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली याचा मला आनंद झाला,, त्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली याचाही आनंद होताच.
आज सकाळी महाराष्ट्र फौंडेशनने नरेंद्र चपळगावकर यांची पुरस्कारासाठी निवड केली याचा तर खूपच आनंद झाला..
विशेष म्हणजे या वर्षीच्या महाराष्ट्र फौंडेशनने निवडलेल्या पुरस्कारार्थीमध्ये आणखी दोन जणांना मी व्यक्तिशः ओळखतो.
त्यापैकी `अक्षरनामा'चे संपादक राम जगताप हे माझे लेख अधूनमधून प्रकाशित करत असतात, वसईच्या लेखिका आणि कार्यकर्त्या सेसिलीया कार्व्हालो आहेत.
या तिघांसह इतर सर्वच पुरस्कारार्थींचे अभिनंदन.... !!
Camil Parkhe January 10, 2022

Sunday, March 27, 2022

 पत्रकारांसाठी असलेल्या सेवासुविधां

                                        Indian Express Pune Resident Editor Prakash Kardaley

ही खूप, खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, १९९०च्या आसपासपासची म्हणजे तीस वर्षांआधीची. माझ्या पत्रकारितेतील कारकिर्दितील गोवा-पर्व आटोपून मी पुण्याला नव्यानेच सुरु झालेल्या `इंडियन एक्सप्रेस'ला रुजू झालो होतो. निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांनीच मला औरंगाबादच्या `लोकमत टाइम्स'मधून बोलावून या राष्ट्रीय पातळीवरच्या इंग्रजी दैनिकात आणले होते.

`लोकमत' वृत्तसमूहाला त्याकाळात न्यायमूर्ती पालेकर वेतन आयोग माहितच नव्हता. कर्दळे यांनी मात्र या पालेकर वेतन आयोगानुसार बातमीदाराच्या वर्गात सर्वात शेवटची म्हणजे सर्वाधिक रक्कम असलेली वेतनश्रेणीचा पगार मला दिला होता, म्हणजे त्याकाळात पुण्यातल्या एक्सप्रेस कार्यालयात बातमीदारांमध्ये माझा पगार सर्वाधिक होता. एक्सप्रेसमध्ये त्यावेळी सिनियर रिपोर्टर किंवा चिफ रिपोर्टर या पदांवर कुणीच नव्हते. आम्ही सर्व बातमीदार - मुले आणि मुली - तिशीच्या आतले होतो.
`लोकमत टाइम्स'मध्ये महिना बाराशे पगार मिळवणारा मी आता इंडियन एक्सप्रेसमध्ये सर्वात खालच्या पदावर असूनही माझा महिना अडीच हजार रुपये पगार होता ! आणि याविषयी तक्रार असण्याची गरजच नव्हती.
माझ्या माहितीनुसार पालेकर वेतन आयोगाची अंमलबजावणी करणाऱ्या पुण्यातल्या अगदी `केसरी' आणि `सकाळ' या दैनिकांतही बातमीदारांना इतका पगार नव्हता, याचे कारण त्यावेळी एक कोटी रुपये वार्षिक उलाढाल (!) असणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या सर्वात वरच्या वेतनश्रेणीत असायच्या.
तर पुण्यात स्थिरस्थावर झाल्यावर म्हणजे स्वतःचे बिऱ्हाड केल्यानंतर मी पिंपरी चिंचवडहून पुण्याला कॅम्पात दररोज प्रवास करु लागलो. पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (पीएमटी ) निगडी-हडपसरच्या बसने अर्ध्या तासाच्या या प्रवासाला एकमार्गी साडेतीन रुपये लागायचे. दररोज सात रुपये प्रवासखर्च.
काही दिवसांनंतर कोणी तरी मला भरवून दिले कि पीएमटी मार्फत पत्रकारांना मोफत प्रवासासाठी पासेस दिले जातात.
बहुतांश वेळेला पत्रकारांसाठी असलेल्या अशा सेवासुविधांचा फायदा भुरटे पत्रकारच म्हणजे पूर्णवेळ पत्रकार नसलेले लोक उपटत असतात. एकवेळ पूर्णवेळ श्रमिक पत्रकार असलेल्या पत्रकारांना कधीच न मिळणाऱ्या या सेवासुविधा या भुरट्या पत्रकारांना मिळतात, याचे कारण बहुतांश वेळेस वृत्तपत्र कार्यालयात नोकरीला असलेल्या पत्रकारांना सरकारचे accreditation- अधिस्वीकृती - नोंदणी मिळत नाही, गावोगावची ही भुरटी पत्रकार मंडळी मात्र accredited - अधिस्वीकृत - असतात,
दहा टक्क्यात घर मिळवायला, एसटीतून फुकट प्रवास करायला, अतिशय आलिशान असलेल्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये आरामात राहायला ही accredited मंडळी पात्र असतात. तर मुद्दा असा होता कि मुळात पूर्णवेळ श्रमिक पत्रकार नसलेली मंडळी पत्रकारांसाठी असलेल्या पीएमटी च्या मोफत प्रवासाच्या पासचा लाभ घेत असतील तर आपण खरेखुरे पत्रकार - बातमीदार- असताना हा पास का मिळवू नये ?
अशी मनाची तयारी करुन मग मी निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांना या सिटी बसच्या मोफत प्रवासासाठी इंडियन एक्सप्रेसच्या कोट्यातल्या पाससाठी शिफारसपत्राची मागणी केली. प्रत्येक दैनिकासाठी अशी दोन मोफत पासेस त्यावेळी असायची.


कर्दळे यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि संपादक आणि पत्रकार या नात्याने आपण स्वतः अशा मोफत पास आणि सवलती घेण्याविरुद्ध आहोत असे स्पष्टपणे मला सांगितले.
इंडियन एक्सप्रेस हा वृत्तपत्र समूह पत्रकारांना आणि इतर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार चांगला पगार, वर्षाला जवळपास दिडदोन महिन्यांच्या पगारी रजा, प्रवास भत्ता, घरभत्ता देते. त्यामुळे पत्रकारांनी सरकारकडून वा कुणाकडूनही फुकटच्या सेवासुविधा घेऊन त्यांचे मिंधे होऊ नये, आणि अशाप्रकारे बातम्या देताना अशाप्रकारे कुठलेही मिंधेपण किंवा भिती नसावी, (No favour or fear ) असे आपले मत आहे असे कर्दळे यांनी मला सांगितले.
''But Camil, if you are nonetheless still keen on having this PMT pass, I will issue an official letter to the PMT administration..."" कर्दळे म्हणाले.
मात्र तरीही मला गरज असल्यास किंवा त्यांच्या मताशी मी सहमत नसल्यास संपादक म्हणून माझ्या नावाने शिफारस पत्र देण्यास ते तयार होते.
मी मात्र पीएमटीचा फुकट पस मिळवण्याबाबत ठाम होतो.
कर्दळे यांचे शिफारस पत्र घेऊन मी पीएमटी जनरल मॅनेजरला स्वारगेट ऑफिसात भेटलोही. मात्र त्या एका भेटीनंतर मी याबाबत पाठपुरावा केला नाही आणि अशाप्रकारे स्वतःचे हातपाय चिखलात बरबटून घेण्यापासून वाचलो.
पत्रकारांसाठी असलेल्या विविध जंकेटस चा लाभ घेण्याविरुद्ध मी कधीही नव्हतो, अशा खूप junkets चा मी लाभार्थी आहे. अशाच जंकेटचा फायदा घेऊन तिनेक वर्षांपूर्वी थायलंड सरकारने आयोजित केलेल्या दहा दिवसांच्या थायलंड भेटीत सकाळ वृत्तसमूहाच्या `सकाळ टाइम्स' चे आणि भारताचेही मी प्रतिनिधित्व केले. जगातल्या सत्तरेक पत्रकारांमध्ये भारतातल्या पाच मोजक्या पत्रकारांमध्ये माझा समावेश होता. पण तो जंकेटसचा विषय वेगळा, त्याविषयी पण एकदा सविस्तर लिहिन. .
महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या आमदारांना मुंबईत फुकट नाही पण सत्तर लाख रुपयांत घर देण्याविषयीची चर्चा येथे वाचली आणि हे एक जुने प्रकरण आठवले.

Tuesday, March 22, 2022

होळी म्हटलं की मला शेडगे काकू, पुरण पोळी आठवतात..

होळी म्हटलं की मला खूप वर्षे आमच्या शेजारी असणाऱ्या शेडगे काकू आठवतात.. आमची लेक अदिती त्यांना काकू म्हणायची म्हणून आम्ही सगळे जण त्यांना शेडगे काकू म्हणायला लागलो..
आम्ही दोघे नोकरीला असल्याने अदिती चार महिन्यांची झाल्यापासून पाळणाघरात राहिली. जॅकलीन सकाळी साडेसातला शाळेत जायची, मग साडे दहापर्यंत मी अदितीला आंघोळ घालून तिचे कपडे करुन तोंडाला पावडर आणि काजळ लावून श्रद्धा गार्डन कॉलनीत असलेल्या पाळणाघरात न्यायचो. तिला तिथे झोपवून नंतर इंडियन एक्स्प्रेसला कामावर जायचो. दुपारी साडेतीनपर्यंत जॅकलीन अदितीला घरी न्यायची.
अदिती थोडी मोठी झाल्यावर आणि तिला कळायला लागल्यावर मात्र गडबड व्हायला लागली. याचे कारण म्हणजे...
शनिवारी रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी अदितीचा वावर पूर्ण दिवस शेडगे काकूंकडे असायचा. शेडगे. काकूंनी. शेंगदाणे जिरे आणि इतर कायकाय घालून केलेले पोहे, साबुदाणा खिचडी अदितीला खूप आवडायची..
त्यामुळे सोमवारी आणि इतर दिवशी पाळणाघरात गेलो कि माझे कपडे आणि बॅग आपल्या चिमुकल्या हातांत घट्ट पकडून अदिती म्हणायची.

'' No, No. Don't leave me here.. I will stay with Shedge Kaku... I won't trouble Shedge Kaku.. Don't leave me here...''

आज हे लिहिताना काळीज तिळतिळ तुटते तर त्यावेळी काय होत असेल कल्पना करा.. काळजावर भलामोठा दगड घट्ट ठेवून डोळ्यातले पाणी लपवत मी बस स्टॉपकडे निघायचो..
तर होळीच्या दिवशी शेडगे काकूंकडून आम्हा तिघांना पुरण पोळी, चमचमीत आमटी आणि भजे यायचे.. होळीच्या दिवशी आमच्या घरी जेवणासाठी गॅस पेटवला जात नसे..
शेडगे कुटुंबात दरवर्षी गणपती बसवला जायचा तेव्हा त्या अकरा दिवसांत अदितीला बोलावल्यानंतरच तिथे आरती सुरु व्हायची आणि अदितीच्या हातात घंटी असायची.. ''घालीन लोटांगण'' सुरु झालं की अदिती त्यासर्वांबरोबर गोलगोल फिरायची. दिवा असलेलं आरतीचं ताट समोर आल्यावर नमस्कारही करायची, नंतर खोबरे, पेढे असा प्रसाद खायची. गणपती विसर्जनाला शेडगे कुटुंबाबरोबर अदितीसह आम्ही दोघेही चिंचवडगावातल्या पवना नदीच्या घाटावर असायचो.
अदिती पाचवी-सहावीत असेल तेव्हा आम्ही समोरच्याच इमारतीत मोठ्या घरात राहायला आलो. काही वर्षांपुर्वी शेडगे कुटुंबसुद्धा भोसरीपाशी स्वतःच्या बंगल्यात राहायला गेले आणि आमचा त्यांचा दररोजचा संपर्क तुटला..
शेडगे काकूंच्या दोन्ही मुलांच्या आणि मुलीच्या लग्नासाठी आम्ही त्यांच्या गावाला सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावला आवर्जून गेलो होतो. गावातली ती लग्ने अदितीने खूप एन्जॉय केली.
अदितीला मात्र शेडगे काकुंचे पोहे, साबुदाणे खिचडी आणि होळीच्या सणाच्या पुरण पोळी, आमटी आणि भजे नेहेमी आठवत असतात.
काल रात्री श्रद्धा गार्डन कॉलनीतल्या होळी पेटल्या तसे जॅकलीनला मी शेडगे काकूंची आणि पुरणपोळींची आठवण करुन दिली..
अदितीशी काल फोनवर होळीच्या सुट्टीबाबत बोलणे झालं होतं ..
होळीनिमित्त तिलाही शेडगे काकू आणि त्यांच्या पुरणपोळी, आमटीची ती चव आठवली असेलच... ..

Friday, February 11, 2022

अण्णा हजारे आणि मी


फोटोत अण्णा आणि मी ... साल १९९१ च्या आसपास ,, फोटोक्रेडीट अभय वैद्य

 कोणे एकेकाळी अण्णांशी माझी खूप घसरट होती. अण्णा पुण्यात येत असल्याचे किंवा आल्याचे इतर पत्रकारांपेक्षा मला आधीच कळायचे आणि मग मी त्यांना नारायण पेठेतल्या हिंदी राष्ट्रभाषा भवनात भेटायला जायचो.

राष्ट्रभाषा मंडळाचे पदाधिकारी असलेले मोहन धारिया ( हेही अण्णा म्हणून ओळखले जायचे ) त्यावेळी हजारे यांचे जवळचे म्हणून पुण्यात येथे ते त्यावेळी राहायचे.
लक्ष्मी रोडवरच्या सुगावा प्रकाशनाकडे जाताना नारायण पेठेतल्या मोदी गणपतीपाशी असलेल्या या राष्ट्रभाषा भवनाकडे आजही माझी नजर हमखास जाते याचे हे कारण.
पुण्यातल्या मराठी दैनिकांतल्या बातमीदारांना त्याकाळात अण्णांना भेटण्यास मुळी इंटरेस्टही नसायचा.
पुण्यात डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोर मंथली कॉट बेसिसवर इंडियन एक्सप्रेसच्या अव्हर्तीन्हो मिरांडा, विश्वास कोठारी आणि विश्वनाथ हिरेमठ वगैरे सड्याफटिंग बातमीदारांसह मी राहायचो. प्रिया लॉजच्या त्या पत्त्यावर अण्णा मला पोस्टाने निळ्या आंतरदेशीय पत्राने बातम्या पाठवायाचे . ती पत्रे आजही माझ्याकडे आहेत.
गोव्यातले नवहिंद टाइम्स सोडल्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स मार्गे पुण्यातल्या इंडियन एक्स्प्रेसला मी १९८९ ला रुजू झालो होतो.
एके दिवशी कळाले कि पुणे अहमदनगर हमरस्त्यावर पारनेर फाट्याजवळ वाडेगव्हाण येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोलीस गोळीबारात पाचजण ठार झाले होते. अहमदनगरला अण्णा हजारे यांचे त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राणांतिक उपोषण चालू होते. अण्णांचे हे पहिलेच आमरण उपोषण.
एक्सप्रेस समूहाच्या ऑफिस वाहनाने लोकसत्ताचे बातमीदार सुनिल कडुस्कर आणि फोटोग्राफरसह मी लगेच वाडेगव्हाण येथे गेलो. पुण्यात ऑफिसात परतेपर्यंत अण्णांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेतले होते असे कळाले.
अण्णा हजारे या व्यक्तिमत्वाशी माझा यावेळी असा पहिल्यांदाच संबंध आला.
त्यानंतर सवडीने एकदा राळेगण सिद्धीला (त्यावेळी शिंदी ) जाऊन आलो. लवकरच राळेणसिद्धी हा माझ्या वहिवाटीचा रस्ता बनला.
पत्रकाराने कुठल्याही व्यक्तिमत्वाशी, घटनेशी, चळवळीशी स्वतःस गुंतून घेऊ नये त्यामुळे त्यांच्या निःपक्षीपणात तडजोड होऊ शकतो, हा पत्रकारितेतील एक सर्वमान्य, बेसिक नियम आहे. माझ्या स्वतःच्या गोव्यातल्या कॉलेज जीवनातल्या पार्श्वभूमीमुळे मात्र मला या नियमाचे पालन करता येणे शक्य झाले नाही.
गोव्यात मिरामारच्या धेम्पे कॉलेजात मी आर्ट सर्कलचा संपादक होतो, स्टुडंट्स युनियनच्या निवडणुका मी लढवल्या होत्या. नवहिंद टाइम्सचा रिपोर्टर असताना मी गोवा युनियन ऑफ जर्नालीस्टचा (GUJ) सरचिटणीस होतो. वृत्तपत्र उद्योगातील लेबर युनियन लीडर म्हणून गोव्यात, औरंगाबादला आणि पुण्यातही दशकभर सक्रिय काम केलेले, त्यावेळीं जॉर्ज फर्नांडिस आमचे दैवत असायचे. गोव्याला फिलॉसॉफी असोसिएशनचा सरचिटणीस म्हणून अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या श्याम मानव यांचे व्याख्यान मी पणजीला आयोजित केले होते.
असे चळवळ्ये व्यक्तीमत्व असल्याने मी स्वतःला असे अलिप्त ठेवणे शक्य नव्हते.
आणि शेवटी व्हायचे तेच झाले.
राळेगणच्या माझ्या भेटी वाढत गेल्या, एकदा तर मी तेथे दोनतीन दिवस मुक्काम केला. त्यावेळी अण्णांचे चरित्र आणि कार्य यावर असलेले एक पुस्तक त्यांच्या कार्यालयात दिसले. त्यांच्पा सचिवाने पुस्तकाची किंमत मला सांगितली. काही क्षणातच अण्णांनी ते पुस्तक माझ्या शबनम बॅगेत हळूच टाकून दिले होते.
अण्णांची ती कृती मी पाहिली आणि ते पक्के मिडिया सॅव्ही आहेत हे त्याच वेळी माझ्या लक्षात आले.
नंतर त्यांच्या पुढील प्रवासात अगदी काही वर्षांपूर्वीच्या अरविंद केजरीवाल, किरण बेदी प्रभुतींसह झालेल्या दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनात अण्णांची ती कृती मला वेळोवेळी आठवायची.
त्या काळातला टाइम्स ऑफ इंडियाच्या अभय वैद्यने अण्णांबरोबरचा माझा टिपलेला हा कृष्णधवल फोटो. . नरेन करुणाकरन या एक्सप्रेसच्या बातमीदाराने राळेगण येथेच माझा अण्णांबरोबर काढलेला दुसरा रंगीत फोटो आता सापडत नाही. आणि नरेन याचा अण्णांबरोबर यावेळी मी काढलेला रंगीत फोटो मात्र माझ्याकडे आहे !
त्याकाळात अण्णा हजारे यांना राष्ट्रीय पातळीवर आणण्यास इंडियन एक्सप्रेसचे बातमीदार म्हणून नरेन करुणाकरन आणि मी , टाइम्स ऑफ इंडियाचे अभय वैद्य आणि इंडिपेंडेंटचे आनंद आगाशे यांचा हातभार लागला. हे आम्ही सर्व पत्रकार इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकांतले. साहजिकच आमच्या बातम्यांमुळे पहिल्यांदाच अण्णा राज्य आणि राष्ट्र पातळीवर पोहोचले...
अहमदनगर जिल्ह्यातील मॉफुसील बातमीदार अण्णा हजारेंकडे ढुंकूनही पाहत नसत, पुण्या-मुंबईच्या मुख्यालयातून विचारणा झाल्यास वा बाहेरचे पत्रकार अण्णांच्या बातम्या देऊ लागल्यास मगच या बातम्या त्यांच्याकडून यायच्या.
हल्ली अनेकदा गोव्यात सुट्टीला आणि या दिवसांत निवडणुकीसाठी पुण्यातले मित्र आणि पत्रकार मंडळी जातात तेव्हा मला हमखास काही टिप्स मागतात. नव्वदच्या दशकात राळेगणला जाणारे पत्रकार मला अशीच वाट पुसत असत.
१९९३ साली संजय सोनवणी यांनी `उत्तुंग' हे माझे व्यक्तिचित्रसंग्रह प्रसिध्द केले त्यात अण्णा हजारे यांचेही चरित्र होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचेही या पुस्तकात चरित्र होते. बाबा आढाव, शंतनुराव किर्लोस्कर , मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई वगैरेंची चरित्रे होती.
मी त्यावेळी तिशी पार केलेली नव्हती, पत्रकार असलो तरी पटकन भारावले जाण्याचा तो युवा काळ होता. भ्रमनिरास त्यानंतर खूप कालावधीनंतर होत गेला..
गोव्यात १९८३ साली कॉमनवेल्थ कॉन्फरनसच्या निमित्ताने ३९ राष्ट्रप्रमुख अगदी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ऑस्ट्रियाचे पंतप्रधान बॉब हॉक, झिम्बाब्वे पंतप्रधान रॉबर्ट मुगाबेसह आले होते. गोव्यात वाहतूक उपाधिक्षक असलेल्या किरण बेदी यांच्याशी त्यावेळी क्राईम रिपोर्टर असलेल्या माझा नियमितपणे संबंध यायचा. किरण बेदींबरोबर वाहतूक पोलिसांच्या नव्याकोऱ्या जिप्सी जीपमध्ये वॉकीटॉकी यंत्रासह रेकी करण्यासाठी किरण बेदी निघायच्या त्यावेळी दाबोळी विमानतळ ते आग्वाद फोर्ट या प्रवासात मी त्यांच्या बरोबर असायचो. बेदी यांच्याविषयी मला तेव्हा खरंच काहीच माहिती नव्हती, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी भारावून जाण्याचा सवालच नव्हता.
`बदलती पत्रकारिता' हे माझे पुस्तक सुगावा प्रकाशनाने २०१८ साली प्रसिध्द केले त्यात मी अण्णा हजारेंवर एक प्रकरण लिहिले आहे. याच पुस्तकात किरण बेदी यांच्यावर सुध्दा वेगळे प्रकरण आहे.
गेली अनेक वर्षे किरण बेदी यांच्याशी माझा काहीही संपर्क नाही.. पुण्यात असूनही अण्णा हजारे यांच्याशी माझा गेली कित्येक वर्षे काहीही संपर्क नाही. बेदी आणि अण्णांच्या विस्मृतीत मी केव्हाच गेलेलो असणार ..
राष्ट्रीय पातळीवरच्या बातम्यांत किरण बेदी आणि अण्णा हजारे अजूनमधून झळकतात तेव्हा त्या बातम्या विस्तृतपणे वाचण्यात मला अजिबात इंटरेस्ट नसतो.
------

Saturday, December 18, 2021

 हे तसं अगदी खाजगी संभाषण.. ..


हे तसं अगदी खाजगी संभाषण.. कालच झालेलं पण ते इथे शेअर करण्याचा मोह आवरता येईना ...म्हणून हा उपद्व्याप..
------
काल संध्याकाळी औषधाच्या दुकानात सेल्सवुमनशी बोलताना फोन वाजला म्हणून लगेच दुकानाबाहेर आलो..
"तुम्ही कामिल पारखे काय? " एका महिलेचा तिकडून प्रश्न आला..
"हो..""
मी अमुक अमुक... तुम्ही माझे नाव कधी ऐकले काय..?
नाव तसे पुर्णतः अपरिचित होते पण भिडेखातीर आणि समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून म्हटले "हो, हे नाव ऐकले आहे.. "
पत्रकार असल्याने अनोळखी नंबरचे विविध पीआरओंचे असे फोन सतत येत असतात..
"तुमचं वय काय?"
तो प्रश्न ऐकून मी गप्पगारच झालो.
काय उद्देश असू शकतो हा प्रश्र्न विचारण्यामागे ? आवाजावरुन पलीकडच्या व्यक्तिच्या वयाचा अंदाज तर येत नव्हता..पण विचार करायला फार वेळ नव्हता..
तरी लगेचच मी त्या प्रश्नाला खरे काय ते उत्तर दिले. खरं पाहिलं तर मी यावर काही तरी खरमरीत उत्तर द्यायला पाहिजे होतं असं आता वाटतं..
"हा, तर माझे वय तुमच्यापेक्षा जास्त आहे... . तुमची "बदलती पत्रकारिता" हे पुस्तक मी वाचले आहे..त्यात 'पत्रकारितेतील स्त्रिया' या प्रकरणात महाराष्ट्रातील इंग्रजी आणि मराठी पत्रकारितेतल्या काही मोजक्या पत्रकार महिलांचा तुम्ही उल्लेख केला आहे. त्या प्रकरणात तुम्ही माझा उल्लेख सरळसरळ टाळला आहे. असं का?"
मला काहीं बोलू न देता त्या पुढे बोलत राहिल्या
"मी तुमच्याआधी खूप वर्षापूर्वी पत्रकारितेत आले. अनेक मराठी दैनिकांत मोठया पदांवर मी काम केले आहे .पत्रकारिता या विषयावर मी विद्यापिठात शिकवले आहे.. माझी कितीतरी - विसेक- पुस्तकेही आहेत. तुम्ही माझं नाव ऐकलं असेलच...आणि मराठी महिला पत्रकारांवर लिहिताना तुम्ही माझ्या नावाचा साधा उल्लेखही करत नाही..?"
"ओ मॅडम. मी खरंच तुमचं नाव कधीच ऐकलं नव्हतं.. नाही तर नक्की तुमचा उल्लेख केला असता... तुमच्याशिवाय आणि काहीं ज्येष्ठ महिला पत्रकारांचाही उल्लेख राहिला आहे.. आता पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत मी तुमचा उल्लेख करेल.. मुद्दाम तुमचं नाव टाळलं नाही.."
"असं कसं म्हणता तुम्ही.. महिला पत्रकारितेवर तुम्ही लेखात, पुस्तकात लिहिता, तेव्हा पत्रकार आणि लेखक म्हणून या विषयाचा पूर्ण अभ्यास करणं माहिती करून घेणे हे तुमचं काम होतं..
"ओ मॅडम .माझ्या पत्रकारितेतील अनुभवावर हे पुस्तक आहे. माझ्या नजरेतली. मी अनुभवलेली पत्रकारिता या पुस्तकात आहे.. ते आत्मचरीत्र नाही. पण माझी व्यक्तिगत निरीक्षणे त्यात मी मांडली आहे..तो इतिहास तर मुळीच नाही आणि परिपूर्ण माहिती नाही. इतिहास लिहिण्याचा उद्देश नसल्याने मी ती माहिती गोळा केली नाही आणि त्यामुळे तुमचा आणि अनेकांचा उल्लेख त्यात नाही.."
"अहो असं कसं म्हणता तुम्ही...? पत्रकारितेवर लिहिलेल्या तुमच्या या पुस्तकाबद्दल मी वाचले, खूप ऐकले म्हणून मुद्दाम ते पुस्तक विकत घेतले आणि वाचले .. माझा त्यात साधा उल्लेखही नाही हे ऐकून मला धक्काच बसला.. म्हणून लगेच हा फोन करते आहे.."
"ओ मॅडम.. तुमचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे, पण मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. मला मराठी पत्रकारितेविषयी खरंच फार माहिती नाही. माझी सर्व नोकरी इंग्रजी दैनिकांतली .. मराठी पत्रकारितेशी माझा तसा लांबून संबंध आला. . शिवाय मी खूप वर्षे महाराष्ट्राबाहेर गोव्यात होतो.. नंतर महाराष्ट्रात ज्या मोजक्या शहरांत मी राहिलो फिरलो, त्या अनुभवावर हे पुस्तक आहे.. तुमच्या शहरातील पत्रकारितेविषयी मला फारशी माहितीही नाही...मी पत्रकारितेचा इतिहास लिहिलेला नाही..तसा दावा पण करत नाही... दुसरं म्हणजे हे पुस्तक विश्वकोश, encyclopedia नाही की ज्यात परिपूर्ण, अगदी अक्युरेट माहिती असायला हवी..''
पण मॅडम माझे म्हणणे ऐकून घ्यायलाच तयार नव्हत्या.
."अहो तुमचे हे पुस्तक सर्वदूर जाणार.. त्यात अशी अर्धवट अपुरी माहिती देणे योग्य आहे का...?
'ओ मॅडम. हे मराठी पुस्तक आहे ते असे 'सर्वदूर' कसे जाणार ..? ( बहिणाबाई म्हणतात तसं मानवी मन किती चंचल असतंं बघा.. इतक्या तापलेल्या, गंभीर संभाषणातसुध्दा 'ओ मॅडम' असं म्हणताना मला का कुणास ठाऊक ती ''दिदी, ओ दिदी" ही आता खूप प्रसिद्ध झालेली ती पूर्व समुद्र किनाऱ्यावरची ललकारीच सदा आठवायची...)
``अहो मॅडम, मराठी पुस्तकांची एक आवृत्ती किती प्रतींची असते आणि मराठी पुस्तके किती खपतात हे तुम्हाला माहिती आहे ना..? आणि मी म्हणजे काय डॉमिनिक लापियर, सलमान रश्दी, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे किंवा गिरीश कुबेर आहे का की ज्यांच्या मांडणीची, पुस्तकाची सगळीकडे, `सर्वदूर'' चर्चा होणार आहे.. ? मी मुद्दामहून तुमचं नाव गाळलेलं नाही हे परत परत सांगतोय..."
"...आणि तुम्ही तुमच्या पुस्तकात तुमचा पत्ताही दिलेला नाही... तुमचा पत्ता मला द्या.. माझी सर्व पुस्तके आजच तुम्हाला पाठवून देते.. मग तुम्हाला कळेल मी कोण आहे ते !!"
"ओ मॅडम, पुस्तके वाचणे मी आता पूर्ण बंद केले आहे मागच्याच महिन्यात घरात असलेली कितीतरी - तीनचार पोते - वाचलेली अन् न वाचलेली आणि यापुढेही कधी वाचणारही नाही अशी इंग्रजी - मराठी पुस्तके मी रद्दीत दिली... नको, तुमची ती पुस्तके तुमच्याकडेच ठेवा...!"
त्या क्षणाला आमच्या दोघांपैकी नक्की कुणी फोन आधी कट केला ते आता आठवत नाही......
----
आणि माझ्या `बदलती पत्रकारिता' (सुगावा प्रकाशन, पुणे २०१९) या पुस्तकातील `पत्रकारितेतील महिला' या प्रकरणातील (१९९४च्या आसपास Indian Express मध्ये छापलेले) हे छायाचित्र
Camil Parkhe December 17, 2021
May be an image of 3 people, people standing and text that says "without any benefits accorded to retiring officers. Written with Pune from inside a hot air bal- loon floating a few hundread wigs, know your bosses, was his approach. "Ãh you are from In- NEWSMAKERS: Anuradha Shah, Prasannakumar Keskar, Madhav Gokhale, Nanda Dabhoie-Kasabe, Camil Parkhe, Rachana Bisht Rawat, Vishwanath Hiremath and Manish Umbrajkar, part of Newsline sreporting team sharing a light moment in front of the lens. Photo by Milind Wadekar."

Tuesday, November 30, 2021

आमच्यात अशी काही प्रथा नसते... "'?


चिंचवडगावातले ते प्रसूतीगृह सोडण्याची वेळ आली होती आणि हळूहळू मी सामान आवरु लागलो. आमची मुलगी सहा दिवसांची झाली होती आणि डॉक्टरांनी बिल भरण्याची सूचना केली होती.
जॅक्लीन आणि माझी आई आमच्या बाळाकडे लक्ष देत होत्या त्याचवेळी त्या मॅटर्निटी होमच्या दोन आया आणि एक पुरुष स्टाफ त्यांच्याकडे आला आणि घरी जाण्याआधी त्यांचे बक्षीस देण्याची आठवण करून गेला.
मी याबाबत तयारच होतो. आमच्या अपत्याच्या आगमनानंतर आनंदाचे वातावरण असल्याने त्या प्रसूतीगृहातील सर्व कामगारांना आमच्या या आनंदात सहभागी आम्ही करणार होतोच.
त्यासाठी त्या कामगारांना देण्यासाठी एक रक्कम मी माझ्या आईकडे सोपवली आणि तिला म्हटले, "बाई, तुझ्या हातानेच त्या सगळ्यांना घरी जाण्याआधी हे बक्षीस दे.."'
मात्र एव्हढ्यावरच त्या दोन आयांचे आणि इतर कामगारांचे समाधान होणार नव्हते.
"आमच्या बक्षिसीबरोबर बाळाच्या पाळण्यात नारळ ठेवून मगच घरी जा. ज्या पाळण्यात गेले काही दिवस बाळ आरामात पाहुडले होते तो बाळाचा पाळणा असा रिकामा, ओकाबोका सोडायचा नसतो...." त्या आयांपैकी जरा वयस्कर असलेल्या एकीने मला म्हटले.
"बक्षीसाबद्दल मला काही म्हणायचे नाही, ते तुम्हाला सगळ्यांना मिळेलच. पण नारळ वगैरे आम्ही काही देणार नाही... आमच्यात अशी काही प्रथा नसते... "'?
हे मी त्यांना सांगत होतो तोच बाईने माझे बोलणे हाताच्या इशाऱ्यानेच थांबवले.
"कामिल, तसं काई सांगू नकोस त्यांना.. जा लगेच चापेकर चौकात आणि आन एक नारळ.."
माझ्याकडे आता दुसरा काही पर्यायच नव्हता..
मुलीला बाळंत्यात घट्ट गुंडाळून घेऊन बाई, जॅक्लीन आणि मी त्या प्रसूतीगृहातून बाहेर पडलो तेव्हा बाळाचा तो पाळणा मोकळा नव्हता. तिथे ते श्रीफळ होते. मांगल्याचे आणि शुभ घटनेवे प्रतिक !
आम्हा तिघांना निरोप देण्यासाठी त्या आया त्या रूममध्ये जमल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची ती ख़ुशी मी पाहिली तेव्हा पाळण्यात श्रीफळ ठेवण्याचा बाईचा सल्ला मी ऐकला ते योग्यच केले याची लगेच जाणीव झाली. बक्षीसीच्या रकमेविषयी त्यांचे काहीच म्हणणे नव्हते.
श्रद्धा गार्डन कॉलनीत आमच्या इमारतीपाशी रिक्षा थांबली तसे मी घाईघाईने दुसऱ्या मजल्यावर आमव्या फ्लॅटपाशी जाऊन थांबलो. माझ्या पाठोपाठ आलेल्या बाईने मात्र हातात बाळ घेऊन असलेल्या जॅक्लीनला दाराबाहेरच थांबवले. लगबगीने किचनमध्ये शिरुन एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात चपातीचा चतकोर तुकडा घेऊन ती आली, बाळ आणि बाळाच्या भोवती त्या चतकोर चपातीने ओवाळून म्हणजे दृष्ट काढून झाल्यावर, बॅड ओमेनचा नायनाट करुन झाल्यावरच बाळ आणि बाळंतिणीचा -कुटुंबातील नव्या सदस्याचा - गृहप्रवेश झाला!
यावेळेस मात्र मी कुठलाही विरोध केलेला नव्हता, चुपचाप तो विधी पाहत मग घरात शिरलो.
प्रसूतिगृहातून बाहेर पडण्याआधीच बाईच्या सांगण्यानुसार मी मिठाईचे बॉक्स आणून ठेवले होते, त्यापैकी एक बॉक्स पहिल्यांदा येशू आणि मारियाबाईचे पुतळे असलेल्या आणि मेणबत्त्या लावलेल्या अल्तारापाशी ठेवला गेला आणि मगच या मिठाईचे शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये वाटप झाले.
पुणे कँम्पमध्ये असलेल्या इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या ऑफिसात पत्रकार आणि इतर सहकाऱ्यांना मी पेढे वाटले तेव्हा अनेकांना आश्चर्यच वाटले.
"मुलगी झाली अन कामिल, तू चक्क पेढे देतोस? जिलेबी का नाही? पेढे तर मुलगा झाल्यावर देतात!" असे आश्चर्योदगार अनेकांनी काढले.
पण याबाबतीत लिंगाधारीत भेदभाव करणारी प्रचलित रूढ प्रथा पाळण्यास मी ठाम नकार दिला होता..
नारळ किंवा श्रीफळाने मात्र माझा पिच्छा त्यानंतरही सोडला नाही.
चिंचवडगावातील सोनार लेनमध्ये आता तीन महिन्यांच्या झालेल्या आदितीचे कान टोचण्यासाठी आम्ही तिला घेऊन गेलो. तिचा कान हातात धरण्याआधी सोनाराने श्रीफळ आणले की नाही याचीच पहिल्यांदा चौकशी केली होती. चापेकर चौकात जाऊन लगेच मी श्रीफळ घेऊन आलो होतो.
जॅक्लीनची मैत्रीण असलेल्या भट्टाचार्य या शेजारणीने तिच्या घरात पडून असलेला लोखंडाचा एक भलामोठा पाळणा आदितीसाठी घेऊन जाण्यास आम्हाला सांगितले. काही महिन्यांच्या कालावधीनंतर एक दिवस या पाळण्यात उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदितीला आम्ही पाहिले आणि आता या पाळण्याची गरज संपली हे लक्षात आले.
तो पाळणा परत नेल्यावर जॅक्लीनच्या त्या मैत्रिणीने तिच्या मदतीबद्दल काहीही रक्कम घेण्यास स्पष्ट नकार दिला. साडी-चोळी घ्यायला सुद्धा भट्टाचार्य मॅडमचा ठाम नकार होता.
"या पाळण्यात श्रीफळ ठेवून तो मला परत करा," अशी तिची माफक मागणी होती. त्यावर एक शब्दही न वाढवता आम्ही तिच्या मागणीचा आदर केला.
"आमच्यात अशा प्रथा नसतात,' हे वाक्य मी यावेळी जिभेवर आणले नाही.
आदिती दहा महिन्यांची झाली आणि आता तिचा हेअरकट फार लांबवता येणार नाही हे निश्चित झाले. मी नेहेमी ज्यांच्याकडे केस कापायला जायचो त्या कासिमभाईंकडे मी आदितीला घेऊन गेलो.
आपल्या या नव्या गिऱ्हाईकाकडे पाहून कासिमभाई खूष झाले. खुर्चीवर एक अतिरिक्त आडवी लाकडी पट्टी ठेवून त्यावर आदितीला आरामात बसवले.
"जावळ काढण्याचे पाचशे एक रुपये होतील आणि त्याआधी एक नारळ आणून ठेवावा लागेल " असे त्यांनी फर्मानच काढले अन मी उडालोच.
" ओ कासिमभाई, वो जावळ वगैरे कुछ भी नाही, साधी आपली कटिंग करायची आहे" या माझ्या सांगण्याचा कासिमभाईंवर काहीही परिणाम झाला नाही. नाभिक व्यवसायात त्यांनी अनेक वर्षे काढली होती, माझ्या मुलीकडे पाहताच ही जावळाची कटिंग आहे हे त्यांना कळाले होते.
बाळाचे जावळ काढण्यासाठी बाळाच्या मामाला सन्मानपूर्वक बोलावे लागते, त्याला टोपी-टॉवेल चढवून, कपडेलत्ते केल्यावर त्याने जावळाची पहिली बट कापल्यावर मग पुन्हा न्हाव्ह्याचाही मान राखावा लागतो, हे अर्थातच मला माहिती होते. पण गावाकडच्या या प्रथा-परंपरा गावातल्या लोकांबरोबर शहरांतही आल्या होत्या हे मला माहित नव्हते.
मला राग, चीड आणि आश्चर्य वाटले होते ते मात्र दुसऱ्याच गोष्टीचे..
"कासिमभाई, हे काय भलतंच? मी कोण हे तुम्हाला माहित नाही काय? आमच्यात या- जावळाच्या - प्रथा नसतात... आणि तुम्ही... तुम्हीपण - मला ही प्रथा पाळायला सांगताय काय?'
कासिमभाई हसले. त्यांना माहित होते, मला काय म्हणायचे होते ते.
पण जावळासाठी असे जास्त पैसे मोजायचे म्हटले म्हणजे या पातळीवर घसरणारा मी त्यांचा नक्कीच पहिला गिऱ्हाईक नसणार. अर्थात हे माझ्या उशिरा लक्षात आले. ते लक्षात आल्यावर मी स्वतःच शरमलो होतो.
ते माझी नेहेमी हेअर कटिंग करत असल्याने कासिमभाई मला चांगले ओळखत होते. त्यांच्या त्या स्मितहास्याने घात केला आणि शेजारच्या किराणा दुकानातून मी मुकाट्याने श्रीफळ घेऊन आलो.
मात्र पूर्ण हार मानण्यास मी तयार नव्हतो. जावळ काढण्याबदल पाचशेएक रुपयांऐवजी मी आता फक्त दोनशे एक्कावन रुपये देणार होतो.
कासिमभाई सुद्धा दोन पावले मागे येण्यास एक शब्दही न बोलता अगदी हसतहसत तयार झाले. आदितीच्या जावळाच्या केसाची एक बट त्यांनी हळुवारपणाने आपल्या हातात घेतली.
मागच्या वर्षी याच काळात, ऐन दिवाळीच्या दरम्यान, तनिष्काची ती वादग्रस्त जाहिरात टाटा ग्रुपने मागे घेतली होती, त्यावेळी ही पोस्ट मी फेसबुकवर टाकली होती.
यावर्षी टिकली आणि उर्दू शब्द 'इर्शाद'चे निमित्त झाले..