Showing posts with label Kesari. Show all posts
Showing posts with label Kesari. Show all posts

Sunday, December 8, 2024


मी बातमीदार बनलो तेव्हा म्हणजे १९८१ साली आम्हा पत्रकारांना आणि इतर बिगरपत्रकार वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वर्षातून दहा पगारी सुट्ट्या (हॉलीडेज) होत्या. रजा वेगळ्या.

तत्कालीन अस्तित्वात असलेल्या आणि बहुसंख्य प्रतितिष्ठ वृत्तपत्रांत अंमलबजावणी होत असलेल्या वृत्तपत्र कर्मचारी कायद्यानुसार या पगारी सुट्ट्या होत्या.
गोव्यात आमच्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी आणि `नवप्रभा' या जुळ्या मराठी दैनिकात वर्षातून काही दिवस - नूतन वर्ष एक जानेवारी, २६ जानेवारी, पंधरा ऑगस्ट, गणेश चतुर्थी, दिवाळी - छपाई बंद ठेवून सर्वांना सुट्टी मिळायची,
यात तीनचार वर्षांनी एक मेच्या कामगार दिनाची भर पडली.
याचे कारण त्याकाळात डाव्या विचारसरणीचा जोर होता आणि आम्ही गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस (गुज) चे पदाधिकारी असलेले श्रमिक पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचारी स्वतःला कामगार समजायचो. उरलेल्या पाच पगारी सुट्ट्या आम्ही वर्षातून कधीही घेऊ शकायचो.
त्याशिवाय पत्रकार कायद्यानुसार वर्षाला तीस हक्काची रजा, बारा आजारपणाची रजा आणि दहाबारा कॅज्युएल रजा असायच्या.
गोवा सोडून मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हापर्यंत अशीच स्थिती होती,
पुण्यात त्यावेळी म्हणजे १९८९ साली मात्र दैनिकांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या असायच्या.
त्यावेळची प्रत्येक स्थानिक दैनिक आपापल्या वर्धापनदिनानिमित्त छपाई बंद ठेवायचे. उदाहरणार्थ, `सकाळ' चा वर्धापनदिनाला एक जानेवारीला सुट्टी असायची, दोन जानेवारीला पेपर नसायचा.
ही परिस्थिती एकदोन वर्षात व्यवहारी दृष्टिकोनामुळे बदलली.
मुंबईतल्या `लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसने पुण्यात आवृत्त्या सुरु केल्या होत्या. या दोन्ही वृत्तपत्रांनी आपल्या प्रती `सकाळ' वर्गणीदारांच्या घरांत दोन जानेवारीला फुकटात देणे सुरु केले.
त्यावेळचा पुण्यात दोन क्रमांकाचा असणारा `प्रभात' दुप्पट किंवा त्याहून अधिक प्रती दोन जानेवारीला छापू लागू लागला.
पुण्यात `सकाळ', `प्रभात' आणि `केसरी' याशिवाय इतरही दैनिके आहेत, याचा वाचकांना यावेळी पहिल्यांदाच पत्ता लागला.
परिणामतः `सकाळ' व्यवस्थापनाने एक जानेवारीला वृत्तपत्राची छपाई बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला. प्रतापराव पवार यांनी नानासाहेब परुळेकरांचा `सकाळ' पाचसहा वर्षांपूर्वी खरेदी केला होता.
छपाई आणि काम सुरु राहिले तरी `सकाळ' कर्मचाऱ्यांना मात्र त्यादिवसाऐवजी इतर दिवशी सुट्टी घेता यायची, आजही ही सोय आहे.
मी `इंडियन एक्सप्रेस'ला असतानाच पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांनी होळीनिमित्त सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.
बहुतेक वृत्तपत्र व्यवस्थापकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. या वितरकांच्या मदतीशिवाय आपण आपल्या दैनिकाच्या प्रती लोकांना वाटू असाही इशारा त्यांनी दिला.
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपला सुट्टीचा निर्णय वृत्तपत्र व्यवस्थापनकांना कळवल्यानंतर तीनचार दिवस तणावाची आणि संघर्षाची परिस्थिती निंर्माण झाली होती, हे आजही आठवते
मात्र वितरकांनी आपली एकी कायम ठेवली आणि आम्हा वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना असलेल्या आणखी एका सुट्टीची भर पडली.
पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांना आपल्या ताकदीची जाणीव झाली,
याआधी वृत्तपत्र कर्मचारी संघटितरित्या वृत्तपत्राची सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकत असत. आता त्यांची जागा वृत्तपत्र वितरकांनी घेतली होती,
हळूहळू एक मे चा कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन, अशा सुट्ट्या वाढत गेल्या.
अलीकडेच दिवाळीनिमित्त पुण्यात दैनिकांची छपाई त्यामुळे दोन दिवस बंद असते.
पुण्यात काल आणि आज वृत्तपत्रे नाहीत.
मात्र किती वाचकांना या दोन दिवशी सकाळी चुकल्याचुकल्यासारखे किंवा दैनिकांची गैरहजेरी जाणवतअसेल ?
Camil Parkhe



Tuesday, July 30, 2024

 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी मीनाक्षी गुरव या निवडून आल्या आहेत.

अशा निवडीची मी गेली अनेक वर्षे वाट पाहत होतो, तो योग आज तब्बल तीन दशकांनी आला.
सन १९९१-९२ ला या पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी मी अर्ज भरला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
कारण माझ्यामुळे निवडणूक अटळ होती.
त्याकाळात पत्रकार संघातले काही दुढ्ढाचार्य पत्रकार संघाचे पदाधिकारीपद आणि सदस्यपद इतरांना बहाल करत असत.
गोवा सोडून औरंगाबादमार्गे मी पुण्याला आलो होतो. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा - गुजचा - मी सरचिटणीस होतो, पत्रकारांच्या अनेक केसेस मी लढवल्या होत्या, ठाण्यात बच्छावत वेतन आयोगासमोर मी पत्रकारांची बाजू मांडली होती.
हाती लाल बावटे घेऊन, घोषणा देत पणजीत, दिल्लीत, कटक आणि श्रीनगर येथील वृत्तपत्र कामगारांच्या मोर्च्यांत मी सहभागी झालो होतो आणि नेतृत्वही केले होते
गुज सरचिटणीस म्हणून Indian Federation of Working Journalists- IFWJ- ने मला प्रशिक्षणासाठी बल्गेरिया आणि रशियाला पाठवले होते.
लोकमत टाइम्सला असताना औरंगाबाद श्रमिक पत्रकार संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत मी सरचिटणीसपदी निवडून आलो होतो.
तर पुण्यातल्या आमच्या इंडियन एक्सप्रेस ऑफिसात असाच एक सहकारी ऑफिसात आला आणि आपल्या दैनिकातर्फे त्याची सदस्यपदावर निवड झाली हे त्याने सांगितले, तेव्हा मी त्याच्याकडे असे चमकून पाहिले होते.
मग दुसऱ्या वर्षी माझ्यामुळे निवडणूक अटळ ठरली.
तर त्यावर्षी समोरचा उमेदवार खूप मताधिक्याने निवडून आला, ५२ विरुद्ध १३.
सलग दुसऱ्या वर्षी माझ्यामुळे पुन्हा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पुन्हा निवडणुका झाल्या,
जवळजवळ सर्वच पदांसाठी.

विशेष म्हणजे मी आणि पराग रबडेने सर्व पदांसाठी निवडणुकीसाठी अख्खे पॅनेलच उभे केले होते.
महाराष्ट्र हेराल्डच्या गौरी आगट्ये- आठल्ये सरचिटणीसपदावर बिनविरोध निवडून आल्या.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या त्या पहिल्यावाहिल्या महिला सरचिटणीस.
त्याआधी महिलांनी केवळ चिटणीसपद भूषवले होते.
त्यावेळी केसरीचे मधुकर प्रभुदेसाई सकाळ पुरस्कृत महाराष्ट्र हेराल्डच्या मूर्तींचा पराभव करून निवडून आले.
त्यानंतर पत्रकार संघाच्या नियमित निवडणुका होऊ लागल्या त्या आजतागायत. हे माझे एक छोटेसे पण महत्त्वाचे योगदान.
मात्र गेले पस्तीस वर्षे एकाही महिलेची सरचिटणीसपदावर निवड झालेली नव्हती ही अभिमानाची गोष्ट नव्हती. .
नव्या सोळा सदस्यीय कार्यकारिणीत इतर केवळ एकच महिला आहे.
अध्यक्षपदानेसुद्धा महिला पत्रकारांना आतापर्यंत हुलकावणी दिली आहे.
नूतन अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
Camil Parkhe, July 29, 2024

Tuesday, February 20, 2024

`ग्रंथकार संमेलन जोतीरावांचे ते ऐतिहासिक पत्र

आज अचानक हे पुस्तक समोर आले. दोनेक महिन्यापूर्वी कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनात विकत घेतले होते तेव्हापासून अगदी चाळलेसुध्दा नव्हते. आज काही पाने उलगडल्यानंतर हे वाक्य वाचले आणि थबकलो.

पुन्हा एकदा वाचून काढले आणि आजच हा संदर्भ वाचायला मिळावा याचे नवल वाटले.
पुस्तक रा. ना. (रामचंद्र नारायण) चव्हाण यांचे आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले. `विचार दर्शन' शिर्षकाचे.
त्यात `महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर' या शिर्षकाच्या प्रकरणात रानडे यांनी भरवलेल्या `ग्रंथकार संमेलनास' येण्यास जोतिबा फुले यांनी नकार दिला, त्याबाबत विवेचन आहे.

लेखक रा. ना. चव्हाण विचारतात : ``या ग्रंथकार सभेस पाठवलेल्या या पत्राचे पुढे काय झाले ? ''
मराठी वाङमयाचा इतिहास प्रसिद्ध झाला त्यात हे पत्र आले नाही.
दत्तो वामन पोतदार प्रभूतींना फुले यांचे हे पत्र दखलपात्र वाटले नाही. ''
चव्हाण पुढे लिहितात: ``दत्तो वामन पोतदार वाईत राहत होते, त्यांच्याशी मी बातचीत केली. त्यावेळी त्यांच्यात जोतिरावांबद्दल आदराचा अंशही आढळला नाही. ''
मग जोतीरावांचे ते ऐतिहासिक पत्र आजही कसे उपलब्ध आहे?
रानडे यांना लिहिलेल्या पत्राची प्रत जोतिबांनी अहमदनगर येथून ख्रिस्ती मिशनरी प्रसिद्ध करत असलेल्या `ज्ञानोदय' या नियतकालिकाकडे पाठवली.
संपादकांनी ती लगेचच म्हणजे ``११ जून १८८५ च्या अंकात प्रसिद्ध केली म्हणून आज अभ्यासकांना म. फुल्यांचे वरील पत्र उपलब्ध आहे. नाही तरी त्या पत्रात फक्त ब्रह्मद्वेष आणि ब्रह्मविरोधच मागील साहित्यिकांनी पाहिला,'' चव्हाण लिहितात.
महात्मा फुले यांच्याविषयी आणि त्यांनी दिलेले लेख `ज्ञानोदया'ने वेळोवेळी म्हणजे अगदी १८५२ पासून प्रसिद्ध केले आहे.
जोतिबांच्या शाळेतली विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिचा निबंध हे एक उदाहरण.
तत्कालीन मराठी वृत्तपत्रांचा याबाबत तेव्हाही आनंदीआनंदच होता.
जोतिबांविषयी विस्तृत मृत्युलेख याच नियतकालिकाने `ज्ञानोदया'ने छापला. केसरीने ही बातमी सरळसरळ दुर्लक्षित केली.
``समाजसुधारणेच्या इतिहासाचे महत्त्वाचे धागेदोरे व संदर्भ ज्ञानोदयामुळे आज उपलब्ध होतात'' असे रा. ना. चव्हाण यांनी म्हटले आहे.
तूर्त इतकेच
Camil Parkhe

Tuesday, June 21, 2022

 दहावी,  बारावीचा निकाल पैसे कमवण्यासाठी एक धंदाच 

श्रीरामपूरला एका मराठी दैनिकात मी कामाला होतो तेव्हाची ही गोष्ट. चार दशकांच्या माझ्या इंग्रजी पत्रकारितेच्या कारकीर्दीत मी जेमतेम तीनचार महिने एका मराठी दैनिकात काम केले. या मराठी दैनिकात जे काम केले ते काम त्याआधी आणि नंतरही कधी केले नाही.
 
साल होते १९८८. गोवा सोडून मी महाराष्ट्रात परतलो होतो. संध्याकाळी सातच्या दरम्यान मुंबईतल्या महाराष्ट्र विधीमंडळ कामकाजाचे समालोचन रेडीओवर लागायचे ते आमच्या दैनिकातले उपसंपादक टेबलवर ट्रांझिस्टर ठेवून ऐकायचे आणि त्यानुसार दुसऱ्या दिवसाच्या आवृत्तीच्या पान एक आणि आतल्या पानाच्या बातम्या लिहिल्या जायच्या. रेडिओवरचे धावते समालोचन ऐकून श्रीरामपूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्त्वाची असेल ती बातमी एकटाकी लिहिली जायची आणि लगेच कंपोंझिंगला पाठवली जायची. 
 
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) किंवा युनायटेड न्युज ऑफ इंडिया (युएनआय) या वृत्तसंस्था प्रादेशिक किंवा जिल्हा दैनिकांसाठी तेव्हा आणि आजही बातम्या देत नसतात. 
 
रात्री बारा वाजता नाईट ड्युटी संपल्यावर स्थानिक मुख्य मटका पेढीला फोन करून विजेत्या मटक्याचे आकडे विचारून ते पान एकला चौकटीत `सोना- चांदी', `मुंबई - कल्याण' किंवा `ओपन - क्लोज' अशा सांकेतिक नावांनी लावून मग घरी जायचो. 
 
पेपरचे वाचक या मटक्याच्या आकड्यासाठीच पेपर घ्यायचे. पुण्यातसुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले ' केसरी ' सारखे पेपर या मटक्याच्या अंकासाठीच खपायचे. 
 
त्याशिवाय दररोज `आजचे भविष्य' हे सदर सुद्धा सकाळी ड्युटीवर असलेले उपसंपादक लिहायचा. उदाहरणार्थ, पाहुणे येतील, पोट बिघडेल, अकस्मात धनलाभ, खिसा सांभाळा, गोड बातमी मिळेल, मनशांती बिघडेल, प्रवास घडेल वगैरे. 
 
तर एक दिवस आमच्या दैनिकाच्या मॅनेजरने एक फतवा काढला की सर्व कर्मचारी उद्या सकाळीच ऑफिसात येतील आणि कुणीही दांडी मारू नये.
 
दुसऱ्या दिवशी ऑफिससमोर ही तुडुंब गर्दी, बाहेरच्या लोकांना आत प्रवेश नव्हता. 
 
एका खिडकीपाशी एकदोन सिनियर कर्मचारी मुलांकडून आणि इतर लोकांकडून चिठ्ठीचपाटीवर नंबर घेऊन, समोरच्या यादीत पाहून पास की नापास सांगत होते आणि त्याबदल्यात प्रत्येकी एक रुपया घेत होते. 
 
खिडकीपाशी जमा होणाऱ्या गल्ल्याकडे मॅनेजरसाहेब जातीने लक्ष घालून होते, हेराफेरीला मुळी वावच नव्हता.
एसएससी बोर्डाने प्रत्येक दैनिकांना छापण्यासाठी दहावीचा निकाल दिला होता, दुसऱ्या दिवशी तो छापण्याआधी दैनिकाच्या मॅनेजमेंटचे लोक तो निकाल सांगून पैसे कमावत होते. 
 
त्याकाळात दहावी बारावीचा निकाल राज्यातील सर्व दैनिके छापत असत म्हणजे पास झालेल्यांचे नंबर आणि त्यांचा क्लास. ज्यांचा नंबर नाही ते नापास असत. त्याकाळात बहुसंख्य विद्यार्थ्यांना नापास करण्याकडेच बोर्डाचा अधिक कल असायचा. बहुसंख्य मुलं गणितात आणि इंग्रजीत गचकायचे. माझ्या वेळेस दहावीचा निकाल २७ टक्के होता. गणितात मी थोडक्यात म्हणजे एक मार्काने वाचलो. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
 
तर नंतर लक्षात आले की महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रादेशिक आणि जिल्हा पातळीवर दैनिकांचा दहावी आणि बारावी परीक्षा निकालावेळी पैसे कमवण्यासाठी हा एक धंदाच होता. वाममार्गाने कमावलेला हा पैसा दैनिकाच्या कुठल्या खात्यात दाखवला जाई ते मला माहित नाही. 
 
गोव्यात जवळजवळ एक दशकभर मी नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाचा कॅम्पस (शैक्षणिक) रिपोर्टर होतो. मात्र गोव्यात आमच्या किंवा नवप्रभा या मराठी जुळ्या दैनिकाने किंवा प्रतिस्पर्धी गोमंतक, हेरॉल्ड वगैरे वृत्तपत्रांनी दहावी अन बारावी निकालाबाबत असा काळाबाजार धंदा केला नव्हता. 
 
वृत्तपत्र व्यवसायातील एक अत्यंत शरमिंदा करणारी ही आणखी एक गोष्ट. 
 
आज दहावीचा निकाल. त्यानिमित्त ही घटना आठवली. 

Sunday, May 8, 2022

 

 गोवा मुक्ती  - नानासाहेब गोरे

पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. . उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात  स्पष्ट केली होती. ‘’आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही’’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते.

‘’परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शाश्वत  बंधुप्रेमाने एकत्र येतील,  शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात उगवण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.

पारतंत्र्याच्या बेडीतुन गोव्याची मुक्तता करण्यासाठी या पोर्तुगीज वसाहतीवर निःशस्त्र स्वारी करणाऱ्या या सत्याग्रहींस चुकूनही कल्पना आली नसेल कि पत्रातील वरील उतारा एक भविष्यवाणी ठरून त्यानंतर केवळ सहा वर्षातच गोव्यातील ४५० वर्षाची पोर्तुगीजांची सत्ता कोलमडून पडेल.  पण अखेर असेच घडले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या आदेशानुसार भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला आणि जवळजवळ कुठल्याही प्रतिकाराविना गोवा १९ डिसेम्बर १९६१ साली मुक्त झाला.

कारवार येथे १९५४ साली भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. नानासाहेब गोरे अध्यक्ष होते. पारतंत्र्यात असलेल्या पंतकालीन मराठी साहित्यिकांची तोपर्यँत गोमंतकाबाहेरच करत असत. यापुढील गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातच व्हावेअशी इच्छा नानासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली अन यातूनच गोवा मुक्तीसाठी भारतीयांनी गोवेकरांच्या खांद्यास खांदा लावून लढा उभारण्याची कल्पना जन्मास आली.

पुण्याला परतल्यानंतर नानासाहेबांनी आपले समाजवादी दिवंगत एस. एम. जोशी यांची घेतली आणि गोवा मुक्तीसाठी गोव्यात प्रवेश करून तेथे सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. ‘’एसेम  यांनी सत्याग्रहाच्या कल्पनेचे स्वागतच केले. पण त्याचवेळी पोर्तुगीजांच्या वसाहतीत स्वातंत्र्यासाठी अगदी शांततामय सत्याग्रह करणेही किती धोकादायक आहे याची मला स्पष्ट कल्पना दिली,’’  जुन्या आठवणींना उजाळा देत नानासाहेब म्हणत होते.

ब्रिटिश आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांमध्ये हाच फरक होता. गोव्यातील आपल्या सत्येला आव्हान देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मग ती सशस्त्र असो निशस्त्र पोर्तुगीज राज्यकर्ते दीर्घ कारावासाची शिक्षा देत असत. अनेक स्वतंत्रसैनिकांनी या लढ्यात तर प्राणही गमावले होते.

गोवा मुक्तीसाठी त्या काळात पुण्यात स्थापन झालेल्या गोवा विमोचन सहायक समितीचे नानासाहेब गोरे एक कार्यवाह होते. या समितीतर्फे गोव्यात पाठविण्यात येणाऱ्या भारतीय सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीचे नेते म्हणून नानासाहेबांची निवड करण्यात आली. समितीतर्फे १५ ऑगस्ट १९५५ साली गोव्यात सामुदायिक सत्याग्रह आयोजित करण्याचा निर्णयही येवेळी घेण्यात आला होता. गोवा मुक्तीसाठी गोव्यात आणि गोव्याबाहेर कार्यरत असलेल्या गोवा नॅशनल काँग्रेसने त्यावेळेस श्री. नानासाहेब गोरे याना त्यांच्या सत्याग्रहप्रित्यर्थ निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा आयोजित केली होती. आचार्य अत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. पीटर अल्वारीस, त्रिस्तव बॅ ब्रागांझा कुन्हा वगैरे जेष्ठ गोवा स्वात्यंत्रसेनानींची  याप्रसंगी भाषणे झाली होती.

नानासाहेबांच्या सत्याग्रहाच्या तुकडीने पुण्याहून गोव्याच्या दिशेने १२ मे १९५५ रोजी प्रस्थान केले. वयोवृद्ध स्वतंत्रसेनानी सेनापती बापट हेही या तुकडीत सहभागी झाले होते. सत्याग्रहींची संख्या सुरुवातीस ३२ होती तर वाटेत आणखी  व्यक्ती या तुकडीत सामावून सत्याग्रहींची संख्या ६८  पर्यंत पोहोचली. यापैकी चार सत्याग्रही गोमंतकीय होते. ५३ महाराष्ट्रीयन होते. उत्तर प्रदेशचे आणि राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यातील प्रत्येकी एक व्यक्ती होती.

या सत्याग्रह मोहिमेचे वर्णन करताना नानासाहेब म्हणतात,  ‘’ गोव्यापर्यंतच्या आमच्या प्रवासात आम्हा सत्याग्रहींचे जयसिंगपूर कोल्हापूर, बेळगाव आणि इतर ठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. गोवा मुक्तीविषयी भारतीयांच्या भावना इतक्या तीव्र असतील अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. भारत छोडो ये १९४२च्या चळवळीत निर्माण झालेल्या वातावरणासारखीच परिस्थिती यावेळीही आम्हाला दिसून आली.’’

आपल्या सत्याग्रहातील भूमिका स्पष्ट करताना नानासाहेबांनी गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला लिहिले होते,  ‘’ ज्या परिस्थितीत गोवा, दमण आणि  दिवला भारतात विलीन होणे शक्य होईल ती परिस्थिती निर्माण व्हायला आम्ही कारणीभूत  होऊ इच्छितो, ज्याप्रमाणे शंभराहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले म्हणून आमचा देश ब्रिटिश होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे या टीचभर तुकड्यावर तुम्ही कितीतरी वर्षे राज्य केले म्हणून तो प्रदेश पोर्तुगीज होऊ शकत नाही. आम्हाला माहित आहे कि गोवा-दमण-दिवच्या जनतेला तुमचे स्वामित्व नको आहे.  तुमच्या स्वामित्वाविरुद्ध ती बंद करून उठली आहेत आणि त्या लोकांचे आम्ही (गोवेकराव्यतिरिक्त इतर भारतीय) भाईबंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मिळविण्याच्या बाबतीत मदत करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. गोव्याच्या लोकांनी तुमच्या प्रशासकीय दहशतीविरुद्ध दीर्घकाळ लढा दिलेला आहे आणि आपले रक्त सांडले आहे. जर या विषम, कठोर संघर्षात आम्ही स्तब्धपणे बघ्याची भूमिका घेतली आणि तुम्ही करीत असलेली पाशवी हिंसा अविरतपणे चालू दिली तर भावी पिढ्या आम्हाला अपराधी ठरवतील.”

या पत्राची एक प्रत पंतप्रधान पंडित नेहरू याना पाठविण्यात आली होती.

या सत्याग्रहींच्या तुकडीचे स्वागत गोव्यात डिचोलीजवळ सशस्त्र पोर्तुगीज पोलिसांनी केले. नानासाहेब, सेनापती बापट यांच्यासह सर्व सत्याग्रहींना  यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. नानासाहेब वगळता इतर सर्व सत्याग्रहींना नंतर गोव्याच्या सरहद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले. नानासाहेबांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

त्यांच्यानंतर गोव्यात सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या श्री. शिरूभाऊ लिमये, श्री. जगन्नाथराव जोशी, श्री. मधू लिमये, खासदार श्री. त्रिदिबकुमार चौधरी या सर्वांवर लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. यापैकी बहुतेक नेत्यांना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु अम्नेस्टी इंटरनॅशनलमुळे अडीच वर्षानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.

केवळ  स्वातंत्र्याचे  नारे लागवल्याबद्दल निशस्त्र सत्याग्रहींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा मिळाल्याच्या वृत्ताने त्यावेळेस भारतात मोठी खळबळ निर्माण झाली होती.

या शिक्षेची बातमी कळताच माझ्या आईवडिलांना धक्काच  बसला. माझी आणि त्यांची पुन्हा कधीही भेट होणार नाही असेच त्यांना वाटले,’’  असे नानासाहेब म्हणतात. नानासाहेबांना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्माविण्यात आली तेव्हा त्यांच्या वडिलांचे वय ८२ वर्षाचे होते.

नानासाहेब तुरुंगात असताना त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचण्यास आवडतात अशी विचारणा पंतप्रधान नेहरूंनी नानासाहेबांच्या पत्नीकडे केली होती. त्यानंतर पंडितजींनी पुस्तकांचा एक गठ्ठा नानासाहेबांना पाठविण्याची व्यवस्थाही केली. ”पण ही  पुस्तके माझ्या तुरुंगाच्या कोठडीत कधीच पोहोचली नाहीत,”  नानासाहेबांनी मला हसत हसत सांगितले.

नानासाहेबांची तुरुंगातून मुक्तता झाली तेवढा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर घेतला होता. या काळात झालेल्या निवडणुकीत नानासाहेब पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नानासाहेबांनी गोवा मुक्तीचा विषय उपस्थित केला होता.

या काळात भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करावा यासाठी राष्ट्रवादी मंडळ सरकारवर सतत दबाव आणत होती. त्यावेळी पंतप्रधान नेहरू श्री. पीटर अस्वारीस,  बॅरिस्टर नाथ पै आणि श्री. गोरे यांच्याशी प्रश्नावर चर्चा केली.   ‘’ गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकीय नागरिक पोर्तुगीज सरकारविरुद्ध तीव्र करू शकतील काय?’’  असा प्रश्न पंडितजींनी या बैठकीत आम्हाला विचारला. पण अहिंसा, सत्याग्रहासारख्या आंदोलनांनी पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचे कधीच मागे गेला आहे आता एकाच पर्याय राहिलेला  आहे म्हणजे लष्करी कारवाई ‘’ असे मी पंडितजींना दिले असे श्रीगोरे  म्हणतात .

लष्करी कारवाईच्या आमच्या सल्ल्यानेच पंडितजींनी नंतर कारवाई केली असा दावा मी करत नाही. पण यानंतर वेळोवेळी घेतल्या भूमिकेवरून कारवाईचा त्यांनी ठाम निर्णय होता हे स्पष्ट झाले पोर्तुगीज शासनालाही ह्याची स्पष्टता आली होती,”  श्री. गोरे पुढे म्हणतात.

स्वातंत्र्यसैनिकांचा सशस्त्र निशस्त्र उठाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टाई वगैरे सर्व प्रयत्नानंतरही पोर्तुगीजांनी सोडण्यास नकार दिला.  अन शेवटी नेहरुंच्या आदेशावरुन भारतीय सेनेने  गोवा, दमण आणि दिवमध्ये प्रवेश केला अन गोवा स्वतंत्र झाला. गोव्याच्या मुक्तीसाठी हुतात्म्यांनी सांडलेले रक्त आणि  स्वातंत्र्यसैनिकांचे  श्रम वाया गेले नाही अन ४५० प्रदीर्घ काळानंतर गोवा पुन्हा भारत भूमीशी संलग्न झाला