Showing posts with label Independence Day. Show all posts
Showing posts with label Independence Day. Show all posts

Sunday, December 8, 2024


मी बातमीदार बनलो तेव्हा म्हणजे १९८१ साली आम्हा पत्रकारांना आणि इतर बिगरपत्रकार वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वर्षातून दहा पगारी सुट्ट्या (हॉलीडेज) होत्या. रजा वेगळ्या.

तत्कालीन अस्तित्वात असलेल्या आणि बहुसंख्य प्रतितिष्ठ वृत्तपत्रांत अंमलबजावणी होत असलेल्या वृत्तपत्र कर्मचारी कायद्यानुसार या पगारी सुट्ट्या होत्या.
गोव्यात आमच्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी आणि `नवप्रभा' या जुळ्या मराठी दैनिकात वर्षातून काही दिवस - नूतन वर्ष एक जानेवारी, २६ जानेवारी, पंधरा ऑगस्ट, गणेश चतुर्थी, दिवाळी - छपाई बंद ठेवून सर्वांना सुट्टी मिळायची,
यात तीनचार वर्षांनी एक मेच्या कामगार दिनाची भर पडली.
याचे कारण त्याकाळात डाव्या विचारसरणीचा जोर होता आणि आम्ही गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस (गुज) चे पदाधिकारी असलेले श्रमिक पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचारी स्वतःला कामगार समजायचो. उरलेल्या पाच पगारी सुट्ट्या आम्ही वर्षातून कधीही घेऊ शकायचो.
त्याशिवाय पत्रकार कायद्यानुसार वर्षाला तीस हक्काची रजा, बारा आजारपणाची रजा आणि दहाबारा कॅज्युएल रजा असायच्या.
गोवा सोडून मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हापर्यंत अशीच स्थिती होती,
पुण्यात त्यावेळी म्हणजे १९८९ साली मात्र दैनिकांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या असायच्या.
त्यावेळची प्रत्येक स्थानिक दैनिक आपापल्या वर्धापनदिनानिमित्त छपाई बंद ठेवायचे. उदाहरणार्थ, `सकाळ' चा वर्धापनदिनाला एक जानेवारीला सुट्टी असायची, दोन जानेवारीला पेपर नसायचा.
ही परिस्थिती एकदोन वर्षात व्यवहारी दृष्टिकोनामुळे बदलली.
मुंबईतल्या `लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसने पुण्यात आवृत्त्या सुरु केल्या होत्या. या दोन्ही वृत्तपत्रांनी आपल्या प्रती `सकाळ' वर्गणीदारांच्या घरांत दोन जानेवारीला फुकटात देणे सुरु केले.
त्यावेळचा पुण्यात दोन क्रमांकाचा असणारा `प्रभात' दुप्पट किंवा त्याहून अधिक प्रती दोन जानेवारीला छापू लागू लागला.
पुण्यात `सकाळ', `प्रभात' आणि `केसरी' याशिवाय इतरही दैनिके आहेत, याचा वाचकांना यावेळी पहिल्यांदाच पत्ता लागला.
परिणामतः `सकाळ' व्यवस्थापनाने एक जानेवारीला वृत्तपत्राची छपाई बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला. प्रतापराव पवार यांनी नानासाहेब परुळेकरांचा `सकाळ' पाचसहा वर्षांपूर्वी खरेदी केला होता.
छपाई आणि काम सुरु राहिले तरी `सकाळ' कर्मचाऱ्यांना मात्र त्यादिवसाऐवजी इतर दिवशी सुट्टी घेता यायची, आजही ही सोय आहे.
मी `इंडियन एक्सप्रेस'ला असतानाच पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांनी होळीनिमित्त सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.
बहुतेक वृत्तपत्र व्यवस्थापकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. या वितरकांच्या मदतीशिवाय आपण आपल्या दैनिकाच्या प्रती लोकांना वाटू असाही इशारा त्यांनी दिला.
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपला सुट्टीचा निर्णय वृत्तपत्र व्यवस्थापनकांना कळवल्यानंतर तीनचार दिवस तणावाची आणि संघर्षाची परिस्थिती निंर्माण झाली होती, हे आजही आठवते
मात्र वितरकांनी आपली एकी कायम ठेवली आणि आम्हा वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना असलेल्या आणखी एका सुट्टीची भर पडली.
पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांना आपल्या ताकदीची जाणीव झाली,
याआधी वृत्तपत्र कर्मचारी संघटितरित्या वृत्तपत्राची सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकत असत. आता त्यांची जागा वृत्तपत्र वितरकांनी घेतली होती,
हळूहळू एक मे चा कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन, अशा सुट्ट्या वाढत गेल्या.
अलीकडेच दिवाळीनिमित्त पुण्यात दैनिकांची छपाई त्यामुळे दोन दिवस बंद असते.
पुण्यात काल आणि आज वृत्तपत्रे नाहीत.
मात्र किती वाचकांना या दोन दिवशी सकाळी चुकल्याचुकल्यासारखे किंवा दैनिकांची गैरहजेरी जाणवतअसेल ?
Camil Parkhe



Saturday, August 14, 2021

 

पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि पातोळ्या खाण्याचा दिवस असं समीकरण आजही माझ्या डोक्यात घट्ट रुतून बसलेलं आहे
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
‘अक्षरनामा’

  • पातोळ्याचं एक छायाचित्र
  • Fri , 13 August 2021
  • पडघमसांस्कृतिकपातोळ्यागोवामिस्साविधीस्वातंत्र्य दिन

पंधरा ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन.

स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या लहानपणाच्या काही आठवणी आहेत. या दिवशी श्रीरामपूरला आम्ही सकाळीच सातलाच देवळात जायचो आणि तिथं मिस्साविधीत सहभागी व्हायचो. ही खास मिस्सा असते, पवित्र मारियामातेच्या स्वर्गारोहणाच्या सणानिमित्त किंवा ‘द फिस्ट ऑफ द अझम्पशन ऑफ आवर लेडी मिस्सा’ झाल्या झाल्या सगळे लोक तिथल्या जर्मन हॉस्पिटल किंवा संत ल्युकस दवाखान्याच्या प्रवेशद्वारापाशी जमा व्हायचे. तिथं झेंडावंदन व्हायचं, राष्ट्रगीत गायलं जायचं आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा व्हायच्या. 

त्यानंतर शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा व्हायचा आणि घरातली इतर मंडळी चर्चला जाऊन तिथंच स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनात सामील व्हायची.

जन गण मन हे राष्ट्रगीत उपासनासंगीत या ख्रिस्ती उपासना गीत पुस्तकातील गीत आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी ध्वज वंदनाच्या वेळेस चर्च आवारात, हे राष्ट्रगीत गायले जाते.

गोव्यात उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयात असताना स्वातंत्र्य दिनाच्या आणि मारियामातेच्या स्वर्गारोहणाच्या सणाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. गोव्यात मारियामातेच्या सणानिमित्त मिस्सा इंग्रजीतून व्हायची आणि शेवटचं गायन ठरलेलं असायचं.

चर्चमध्ये वर्षभर साजऱ्या होणाऱ्या काही सणांच्या मिस्साचं शेवटचं गीत विशिष्ट असतं. उदाहरणार्थ ख्रिसमसच्या मिडनाईट  मिस्साचा शेवट ‘वी विश यू अ मेरी ख्रिस्मस’ या गाण्यानं होतो, तर सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या ३ डिसेंबरच्या सणाची मिस्सा ‘सान फ्रान्सिस शाव्हिएरा’ या कोकणी गीतानं होते. कारण गोवन ख्रिस्ती लोकांचा सेंट फ्रान्सिस झेव्हियर हा सर्वांत महत्त्वाचा संत. भारतातील बहुतेक चर्चेसमध्ये पंधरा ऑगस्टच्या इंग्रजी मिस्साचा शेवट होतो- रवीन्द्रनाथ टागोरांची पुढील प्रसिद्ध कविता गाऊन-

“Where the mind is without fear and the head is held high;

Where knowledge is free;

Where the world has not been broken up into fragments by domestic walls;

Where words come out from the depth of truth;

Into that heaven of freedom, my Father, let my country awake

चर्चमध्ये गिटार किंवा कि-बोर्डच्या संगीताच्या सुरांवर धीरगंभीर स्वरांत गायली जाणारी ही कविता आपल्याला देवाच्या भक्तीकडून देशभक्तीच्या वाटेवर घेऊन जाते.

एकदा येशू ख्रिस्ताला अडचणीत टाकण्यासाठी एकाने येशूला कैसरचे चिन्ह असलेले नाणे दाखवले आणि कर भरण्याविषयी त्याचे मत विचारले. तेव्हा ''जे कैसरचे आहेे ते कैसरला द्या आणि देवाचे आहे ते देवाला द्या '' असे उत्तर दिले.
विशेष म्हणजे याच येशू ख्रिस्ताला पुढे राजद्रोहाच्या आरोपाखाली रोमन पद्धतीने क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले होते. राजद्रोहाचे हे जुलमी कलम तसे फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

पिंपरी-चिंचवडच्या आताच्या आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चमध्येही पंधरा ऑगस्टला ‘अझम्पशन ऑफ आवर लेडी’ या सणानिमित्त होणाऱ्या मिस्सेची सांगता याच देशभक्तीपर कवितेनं होते. देशाच्या इतर कॅथोलिक चर्चेसमध्येसुद्धा असंच होतं.

टागोरांची ही आशयघन कविता गेल्या काही वर्षांत तर अधिकच महत्त्वपूर्ण बनली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील केवळ चर्चेसमध्ये नव्हे, तर विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांत ती गायली जायला हवी. त्याद्वारे भीतीमय  वातावरणाचा आणि विविध प्रकारच्या असमानतेचा कायमचा नाश व्हावा आणि सर्वांना आपलं डोकं उंचावून जगण्याची संधी मिळावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची भावना निर्माण व्हायला हवी.

काही पक्क्वानं विशिष्ट सणांनिमित्त बनवली जातात. त्या सणाचा तो खास मेन्यू असतो. गणेशोत्सव म्हटलं की, उकडीचे मोदक हवेतच. दिवाळीत फराळ, नाताळाच्या सणाला केक आणि रमझान ईदला शिरकुर्मा हवाच. अशा पक्क्वानांच्या जोड्या आपल्या मनात तयार झालेल्या असतात.  

माझी मुलगी आदिती लहान होती, तेव्हा दर होळीच्या सणाला संध्याकाळी आमच्या शेजारच्या शेडगेकाकूंकडून तिच्यासाठी पुरणपोळीचं ताट यायचं. त्यामुळे आजही होळी म्हटलं की, आदितीशी घट्ट नातं जुळलेल्या शेडगे काकूंच्या पुरणपोळीची हमखास आठवण येते.

अशाच एका पक्क्वानामुळे स्वातंत्र्य दिन माझ्या दृष्टीनं स्मरणीय झालेला आहे. हा खाद्यपदार्थ म्हणजे पातोळ्या. म्हणजे नारळाचं खोबरं आणि गूळ घालून हळदीच्या पानांत उकडलेलं पक्क्वान्न. हा पदार्थ उकडीच्या मोदकांसारखाच, मात्र घड्या घालून हळदीच्या पानांत उकडून तयार केला जातो. पंधरा ऑगस्टला मारिया मातेच्या सणानिमित्त गोव्यात कॅथोलिक समाजात पातोळ्या हे मिष्टान्न बनवलं जातं.


१९७०च्या दशकात गोव्यात मिरामारच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पहिल्यांदा पातोळ्या खाल्ल्या. त्या दिवशी सकाळीच गोव्यातील मुलांच्या आई-वडिलांकडून गरमागरम पातोळ्यांचे डबे आमच्या वसतिगृहात यायचे.

मागच्या वर्षी पहिल्यांदाच एकेकाळी गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग असलेल्या दमण शहरात मी गेलो होतो . दमण शेजारचे सिल्व्हासा हेसुद्धा एकेकाळी पोर्तुगिज वसाहतीचे भाग होते. दमण आणि सिल्व्हासा या दोन्ही शहरांत गोव्याप्रमाणेच कॅथोलिक समाजात पातोळ्या बनवल्या जातात.


पालघर जिल्ह्यातल्या वसईतील कॅथोलिक समाजातही पातोळ्या हे एक आवडते पक्क्वान्न आहे.

विशेष महत्त्वाचं म्हणजे गोव्यात हिंदू समाजातसुद्धा पातोळ्या करतात, तोही एका विशिष्ट सणाच्या दिवशी. हा सण म्हणजे ऑगस्टच्या आसपास श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या नागपंचमीला.

या शुक्रवारी झालेल्या नागपंचमीनिमित्त गोव्यात घराघरांत पातोळ्या बनवल्या गेल्या आणि उद्या पंधरा ऑगस्टला मारियामातेच्या स्वर्गारोहणानिमित्त ख्रिस्ती कुटुंबांत पातोळ्यांचा आस्वाद घेतला जाणार आहे.

या पातोळ्या हा गोव्यातील हिंदू आणि किरीस्तांव समाजातील खाद्यसंस्कृतीचा एक आगळावेगळा ठेवा आहे. 

पातोळ्या आणि उकडीचे मोदक करण्यासाठी वापरले जाणारे घटक सारखेच असतात. तांदळाचं पीठ, नारळाचं खोबरं आणि गूळ. त्यामुळे या दोन पदार्थांची चवही साधारणत: सारखीच असते. फरक असतो फक्त आकारात. पातोळ्या करताना तांदळाचं पीठ, खोबरं आणि गूळ यांचं सारण हळदीच्या पानांवर घालून मग भांड्यांत उकडलं जातं. त्यामुळे हळदीच्या पानाचा वास त्याला वेगळी चव आणतो.

मोदक आणि पातोळ्या यांच्यात फरक असतो तो फक्त त्यांच्या आकारात, आतील सारण आणि चव एकच ! काय लाजवाब संगम आहे !

त्यामुळे पंधरा ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्यदिन आणि मारियेच्या सणानिमित्त पातोळ्या हे पक्क्वान्न खाण्याचा दिवस असे समीकरण तेव्हापासून आजपर्यंत माझ्या डोक्यात घट्ट बसले आहे.

त्याशिवाय नागपंचमी म्हणजे गोव्यात घरांघरांत पातोळ्या असेही दुसरे समीकरण असतेच.