Showing posts with label Vasai. Show all posts
Showing posts with label Vasai. Show all posts

Thursday, December 25, 2025

 


नाताळाच्या पूर्वसंध्येला खूप काही गोष्टी करायच्या असतात. माळावरचा ख्रिसमस स्टार आणि इतर डेकोरेशन उतरून खाली आणून सजावटीची सुरुवात करणे वगैरे.
यावेळी आणखी एक काम होते. केकसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या दापोडीतल्या बेकरीतून केक आणणे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सीमावर्ती भागात दापोडी इथे असलेल्या `अलंकार' बेकरीच्या केकला खूप मागणी असते, नाताळाआधीच खूप जणांच्या, संस्थांच्या आगाऊ घाऊक ऑर्डर्स या बेकरीला मिळतात.
सणानिमित्त अनेकांना नाताळ केक आणि फराळ द्यायचा असल्याने या बेकरीतून दहाबारा केक मी घेऊन आलो.
आमच्या परिसरात बहुतेक बेकरी मालक मुसलमान आहेत आणि दरवर्षी त्यांनी नाताळ आणि ईस्टर सणानिमित्त बनवलेल्या केकला प्रचंड मागणी असते.
केक घेतल्यानंतर बेकरी मालकाला मेरी ख्रिसमस म्हणून सणाच्या आगाऊ शुभेछा देण्यास मी विसरलो नाही..
संध्याकाळी दयानंद ठोंबरे यांनी `अलौकिक परिवार'चा ख्रिसमस अंक दिला. `अलौकिक परिवार'चा हा पंधरावा नाताळ विशेषांक.
आता इतर ख्रिसमस अंकांची प्रतीक्षा आहे.
Camil Parkhe


Thursday, November 27, 2025

रेस कोर्सनजिक असलेल्या सेंट पॅट्रिक्ट्स कॅथेड्रल्समध्ये जाऊन पुण्याचे नवनिर्वाचित बिशप फादर सायमन अल्मेडा यांची आज सकाळी सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या असलेल्या आणि दिडशे वर्षांचा इतिहास असलेल्या पुणे कॅथोलिक धर्मप्रांताचे किंवा डायोसिसचे ते आठवे बिशप असतील.
पुणे डायोसिसची स्थापना १८८६ साली झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत धर्मप्रांताचे पहिले दोन बिशप जर्मन होते.
कॅथोलिक धर्मप्रांताचे बिशप या पदाचे महत्त्व आणि अधिकार चर्चबाहेरच्या इतरांना सहसा माहित नसतात.
बिशप हे त्यांच्या डायोसिसमधील असलेल्या सर्व धर्मप्रांतीय शैक्षणिक संस्था - शाळा-कॉलेजेस, दवाखाने, सामाजिक आणि धर्मादाय संस्था यांचे व्यवस्थापकीय प्रमुख असतात.
आताच्या पुणे डायोसिसमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली महसूल जिल्हे आणि कोल्हापूर शहर यांचा समावेश होतो.
एके काळी म्हणजे बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांच्या कारकिर्दीच्या काळात १९८७ पर्यंत पुणे धर्मप्रांतात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारपासून कोकणातील रत्नागिरीपर्यंतचा भाग समाविष्ट होता.
गेल्या काही दशकांत नाशिक आणि नंतर सिंधुदुर्ग नवे धर्मप्रांत निर्माण झाल्याने पुणे धर्मप्रांताचे क्षेत्र कमी झाले आहे.
बिशप जॉन रॉड्रिग्स यांची मुंबई सर्वधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून निवड झाल्याने हे पद गेले एक वर्षभर रिक्त होते.
त्याआधी थॉमस डाबरे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण होईपर्यंत पुण्याचे बिशप होते.
प्रत्येक कॅथोलिक व्यक्तीचा त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी बिशपांशी संपर्क आलेला असतोच.
याचे कारण कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार (सांक्रामेंत ) देण्याचा अधिकार केवळ बिशपांना असतो.
काही वर्षांपूर्वी फादर सायमन अल्मेडा आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चचे पाच वर्षे धर्मगुरु होते.
कॅथोलिक चर्चच्या अखत्यारीतल्या चर्चमधील धर्मगुरूंची आणि शाळांच्या प्राचार्यांची ठरविक काळानंतर बदली होत असते.
कॅथोलिक चर्चचे जगभर पसरलेले जाळे, या चर्चच्या विविध संस्थांचे विविध समाजघटकांत चालू असलेले कार्य आणि या चर्चचे व्यवस्थापन हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि अतिशय कुतूहलाचा विषय आहे.
चर्चसारखे नेटवर्क असलेली जगात इतर कुठलीही संस्था वा संघटना नसावी.
फादर सायमन अल्मेडा यांच्या बिशपपदाची घोषणा पोप लिओ चौदावे यांच्याकडून व्हॅटिकन सिटीमधून, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाकडून दिल्लीतून आणि पुण्यातील सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमधून एकाच दिवशी आणि एकाच क्षणी व्हावी, त्या घोषणेवेळी चर्चबेलचा घंटानादही व्हावा, या घटनेतून चर्चच्या जागतिक नेटवर्कची थोडीबहुत कल्पना यावी.
मी स्वतः गोव्यात जेसुईट फादर होण्यासाठी काही वर्षे उमेदवारी केली असल्याने कॅथोलिक चर्चच्या कामकाजाची आणि नियमांची मला थोडीफार माहिती आहे.
नूतन वर्षांरंभात फादर सायन अल्मेडा यांचा बिशप म्हणून दीक्षाविधी होईल.
नवनिर्वाचित बिशपांना शुभेच्छा !

Camil Parkhe


Friday, January 17, 2025

गोव्यातील ख्रिश्चनांची संख्या गेल्या काही वर्षां\त झपाट्याने कमी असून याबाबत गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिलाई यांनी केरळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चिंता व्यक्त केली आहे.

याच वाक्याच्या उत्तरार्धांत महनीय राज्यपालांनी जे म्हटले तो खरा तर या देशात अनेकांच्या दृष्टीने खरा चिंतेचा विषय असू शकतो.
मात्र त्यांच्या वाक्याचा उत्तरार्ध हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही, त्यामुळे तिकडे न वळता गोव्यातील ख्रिश्चनांची संख्या गेली काही वर्षे सातत्याने कमी का होत आहे हे पाहता येईल.
गोव्यातील ख्रिश्चन लोक या राज्यात कॅथोलिक म्हणूनच ओळखले जातात. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी या छोट्या प्रदेशात सत्ता मिळवली तेव्हापासून पुढील काही काळ येथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडून आले.
पोर्तुगीज आणि स्पॅनिश हे दोन्ही देश कॅथोलिकांचे बालेकिल्ले. या दोन देशातले साहसी दर्यावर्दी नवे जग शोधायला आपल्या नौका समुद्रात सोडल्या तेव्हा वसाहती मिळवण्याबाबत आणि तेथे ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याबाबत या दोन राष्ट्रांत स्पर्धा होऊ नये म्हणून पोप महोदयांनी संपूर्ण जगाची या दोन राष्ट्रांमध्ये चक्क वाटणीच करून टाकली होती.
पाद्रुआदू आणि प्रोपोगांडा या नावाने जगाची स्पेन आणि पोर्तुगाल राष्ट्रांत विभागणी झाली होती.
पोर्तुगालच्या दर्यावर्दी वॉस्को दा गामा गोव्यात १४९८ साली पोहोचला आणि तेव्हापासून तिथे ख्रिस्ती धर्माचा म्हणजेच रोमन कॅथोलिक पंथाचा प्रसार झाला.
इंग्लंडच्या राजाने मूळ कॅथोलिक पंथापासून फारकत घेत स्वतःचे अँग्लिकन चर्च स्थापन केले होते. आजही इंग्लंडचा राजा अथवा राणी अँग्लिकन चर्चची प्रमुख असते नि या चर्चच्या सर्वोच्च धर्मगुरुची - आर्चबिशप ऑफ कँटरबरीची राजा किंवा राणीच करत असते.
इंग्लंडने स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या, मात्र ख्रिस्ती धर्मप्रसार हे ईस्ट इंडिया कंपनीचे उद्दिष्ट्य कधीच नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांच्या अंमलाखालील भारतात गोवा, वसई, दमण, सिल्व्हासा येथे मोठ्या प्रमाणावर लोक कॅथोलिक झाले तसे ब्रिटिश इंडियात झाले नाही.
प्रोटेस्टंटपंथीय असलेल्या ब्रिटिशांनी ना प्रोटेस्टंट मिशनरींना ना कॅथोलिक मिशनरींना धर्मांतरासाठी प्रोत्साहन दिले. धर्मप्रसाराऐवजी त्यांनी व्यापारालाच प्राधान्य दिले.
दक्षिण गोव्यात कॅथोलिकांची संख्या लक्षणीय आहे, दोन अपवाद वगळता इथल्या मतदारांनी आतापर्यंत नेहेमीच कॅथोलिक उमेदवाराची लोकसभा खासदार म्हणून निवड केलेली आहे. मागच्या निवडणुकीत फ्रान्सिको सार्दिन्हा खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी २०२४ च्या निवडणुकीत कॅप्टन विरिएतो फर्नांडिस दक्षिण गोव्यातून लोकसभेला निवडून आले आहेत.
याच्या अगदी उलट स्थिती उत्तर गोव्याची आहे, तिथे हिंदू बहुसंख्य आहेत आणि गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या (१९६१ - १९८६) आणि गोवा राज्यात इतिहासात इथून नेहेमीच हिंदू उमेदवार लोकसभेवर निवडला गेला आहे.
गोव्याची सध्याची डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याबाबत स्थिती अशी आहे.
अगदी मध्ययुगीन काळापासून गोव्यातले लोक गोवा सोडून हिरव्या कुराणाच्या शोधार्थ इतरत्र जात होते. यात मात्र तेव्हापासून एक मूलभूत फरक होता आणि आजच्या काळातही हा फरक प्रकर्षाने दिसून येतो.
गोव्यातील एक ज्येष्ठ वकील क्लिओपात अल्मेडा कुटिनो यांनी पणजीतल्या `द नवहिंद टाइम्स ' या इंग्रजी दैनिकात गोवा राज्यपालांच्या विधानाच्या अनुषंगाने या विषयावर एक विस्तृत लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला आहे.
गोव्यातील उच्च जातींतील म्हणजे सारस्वत रोमन कॅथोलिक सोळाव्या शतकापासूनच पोर्तुगाल आणि तेथून पोर्तुगालच्या इतर वसाहती देशांत किंवा युरोपातील इतर देशांत जात असत.
आधुनिक संमोहनशास्त्राचा जनक असलेल्या अँबे (फादर) फरिया यांनी रोम आणि फ्रान्समध्ये मोठे नाव कमावले, त्यांचा संमोहन करण्याच्या क्रियेतील पूर्णाकृती पुतळा पणजी येथे आदिलशाही पॅलेसजवळच आहे.
हे अबे फरिया आणि गोव्यातील इतर कॅथोलिक लोकांनी लिस्बन आणि पोर्तुगालमध्ये कार्य केले ते सर्व सारस्वत या वरच्या आणि उच्चभ्रु जातीतले.
फरिया हे मूळचे शेणवी किंवा शिनॉय, म्हणजे सारस्वत .
पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा यांचे घराणे मूळचे गोव्यातील मडगाव येथले. त्याच्या आजोबांनी गोव्यातून स्थलांतर केले होते.
गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे - पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.
१९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे.
वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो
गोव्यातील कॅथोलिक अगदी सोळाव्या शतकापासून गोव्यातून स्थलांतरित होत असले तरी हे प्रमाण नगण्य होते. गेल्या दिडशे वर्षांत स्थलांतरितांची संख्या वाढून येथील लोकसंख्येत कॅथोलिकांचे प्रमाण कमी होत गेले आहे. याचा परिणाम साहजिकच या राज्यातील निवडणूक निकालांवर पडत गेला आहे.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय जनमताच्या रेट्याला प्रतिसाद देत अखेरीस १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कराकरवी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश हा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त करुन भारतीय संघराज्यात सामील केला.
त्यानंतर या केंद्रशासित प्रदेशाचे भवितव्य ठरवण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६७ च्या जानेवारीत या प्रदेशात सार्वमत घेतले. भारतीय संघराज्याच्या इतिहासातील हे पहिलेच आणि आतापर्यंतचे एकमेव सार्वमत.
या सार्वमताद्वारे गोवा, दमण आणि दीव या जनतेने या प्रदेशाचे स्वतंत्र अस्तित्व असावे आणि गोवा महाराष्ट्रात आणि दमण आणि दीव गुजरातेत विलीन करू नये असा निर्णय दिला.
विशेष म्हणजे या चिमुकल्या प्रदेशाचे शेजारच्या राज्यांत विलीनीकरण टळले ते सार्वमताच्या अगदी काही थोडक्या मतांच्या टक्क्याने आणि या सार्वमतात कॅथोलिक लोकांनीं विलीनीकरणाच्या विरोधी जवळजवळ एकगठ्ठा मतदान करून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखले.
गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे याबाबत ४५ टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केले होते यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही.
गोव्याचे महाराष्ट्रात विलिनी व्हावे यासाठी गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि केंद्रीय मंत्रि यशवंतराव चव्हाण यांनीं जोरदार प्रचार केला होता.
गोव्यातील कॅथोलिक पोर्तुगाल किंवा पोर्तुगालच्या इतर वसाहतींत स्थलांतर होणे तसे साहजिकच होते अगदी त्याच प्रमाणे गोव्यातील अनेक हिंदू लोकांनी महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात आणि इतरत्र स्थलांतर केले होते.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची यादी पाहिली कि त्यामध्ये अनेक गोमंतकीय आहेत हे लक्षात येते.
गोवा, दमण आणि दीव पोर्तुगालच्या साडे चारशे वर्षांच्या सत्तेतून १९६१ साली मुक्त केल्यानंतर या प्रदेशातल्या पोर्तुगीज पासपोर्ट असणाऱ्या लोकांना भारतात राहण्याचा किंवा पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेण्याची सोय होती.
अनेकांनी मग साहजिकच पोर्तुगालची आणि त्यामार्गे इतर पाश्चिमात्य देशांची वाट धरली.
गोव्यातील कॅथोलिक लोकसंख्या गोवामुक्तीनंतरच्या काळात ३६ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आली आहे असे आकडेवारीवरून दिसते. नजिकच्या काळात हे प्रमाण असेच घसरत जाण्याची शक्यता दिसत आहे.
रोमन कॅथोलीक पंथात संतती नियमनाची कृत्रिम साधने आणि गर्भपात यावर कागदोपत्री बंदी आहे. पण चर्च या नियमांकडे कानाडोळा करत असते आणि कॅथोलिक लोक सरळसरळ दुर्लक्ष करत असतात हे वास्तव आहे. ख्रिस्ती लोकांची गोव्यात आणि इतरत्र सुद्धा लोकसंख्या कमी होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती. बातमीचा मथळा होता :
Of 70,000 surrendered passports in India in a decade, 40% were in Goa
गोव्यातील कॅथोलिक लोकांनी पोर्तुगालकडे आणि नंतर युरोपियन देशांत इतक्या मोठया संख्येनें स्थलांतर का केले याची अनेक कारणे आहेत.
एक म्हणजे रोजगार. पोर्तुगीज इंडियात उद्योगाची आणि रोजगाराची वानवाच होती. पोर्तुगीजमुळे इतर युरोपियन भाषा शिकणे अधिक सहजसाध्य, पाश्चात्य पेहेराव, खाद्य संस्कृती, ख्रिस्ती धर्म वगैरे अनेक बाबींमुळे लिस्बनकडे जाणाऱ्या जहाजाची वाट धरणे अधिक आकर्षक ठरले.
गोव्यातील हिंदूंच्या तुलनेत कॅथोलिक्स अधिक वेस्टर्नाइज्ड होते, अनेक कॅथोलिक कुटुंबांत पोर्तुगीजमध्ये संभाषण होई, त्यामुलें इंग्रजी शिकणे त्यांना तुलनेत सोपे जाई, त्यांची खाद्य, पेहेराव आणि धार्मिक संस्कृती पाश्चात्य धर्तीची होती.
पोर्तुगालच्या गोव्यातल्या जुन्या मुलखातील कॅथॉलिकांचे प्रमाण १७६४ साली तब्बल ८६ टक्के होते. या ओल्ड काँक्वेस्टमध्ये गोव्यातील बार्देझ, सालसेट किंवा साष्टी, इलिहास (पणजीजवळचा भाग) आणि मार्मुगावचा समावेश होता.
पोर्तुगीजांनी नंतर उत्तर गोव्यावर कब्जा मिळवला आणि तेव्हाच्या नव्या आणि जुन्या मुलखांतील पोर्तुगीज गोव्यातील कॅथॉलिकांचे प्रमाण १८५१ साली ६३.८ टक्के इतके कमी झाले.
याचे कारण उत्तर गोव्यात दक्षिण गोव्याच्या तुलनेत फारच नगण्य स्वरूपाचे ख्रिस्ती धर्मांतर झाले होते. दुसरे कारण म्हणजे दक्षिण गोव्यात दाट लोकसंख्या होती तर उत्तर गोव्यात लोकसंख्या तुलनेने विरळ होती.
गोव्यातील कॅथॉलिकांनी केवळ पोर्तुगालला स्थलांतर केले असे नाही, अनेक कॅथोलिक कुटुंबांनी मुंबईत आणि त्याकाळी भारतातच असलेल्या कराची येथे कायमचे स्थायिक होणे पत्करले.
स्थलांतर करताना यापैकी अनेकांनी आपल्या वडिलोपार्जित मालमत्ता कायमच्या विकून टाकल्या होत्या.
देशातले आणि मुंबईचे पहिले भारतीय बिशप म्हणून आणि त्यानंतर पहिले भारतीय कार्डिनल होण्याचा सन्मान मिळणारे व्हॅलेरियन ग्रेशियस यांचा जन्म कराची येथला. कार्डिनल ग्रेशियस यांचे कुटुंब मूळचे गोव्यातील मडगावजवळ असलेल्या नावेली गावाचे होते.
पोर्तुगालमध्ये घटनात्मक राजेशाही १८२० साली प्रस्थापित झाल्यानंतर गोव्यात उदारमतवाही प्रवाह सुरु झाला आणि ब्रिटिश इंडियाच्या सीमावर्ती भागांतील अनेक मराठी बोलणारे लोक उत्तर गोव्यात स्थायिक झाले.
ख्रिस्ती धर्मांतर आणि इतर कारणांमुळे गोव्यातून पलायन केलेल्या लोकांपैकी अनेक जण पुन्हा गोव्यात स्थायिक झाले. दरम्यान गोव्यातून कॅथॉलिक लोकांचे पोर्तुगालला आणि इतर ठिकाणी स्थलांतर चालूच राहिले.
गोव्यातील पोर्तुगीजांची सत्ता १९६१ साली संपली तेव्हा कॅथॉलिकांचे १८५१ साली असलेले ६३.८ टक्के प्रमाण थेट ३८. ०७ इतके म्हणजे ११० वर्षांच्या काळात २५. टक्क्यांनी खाली घसरले होते.
मी गोव्यात शिक्षणासाठी १९७०च्या दशकात पोहोचलो, तेव्हा माझ्या मित्रांचे आईवडील, इतर ज्येष्ठ मंडळी आपापसांत पोर्तुगीज भाषेत बोलत. त्यांच्यामुळे मीही या भाषेत थोडेफार बोलायला शिकलो. गोव्यातून पोर्तुगीज भाषा आता हद्दपार झाली आहे.
गोव्यात कॉलेजला शिकताना माझ्या बरोबर जेसुईट प्री- नॉव्हिशिएटमध्ये (पूर्व-सेमिनिरीत) राहणाऱ्या बेनी (बेनेडिक्ट) फरीयाने सज्ञान होण्याआधी पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेतला.
बेनीचा आणि लेस्टर फर्नांडिसचा पासपोर्ट पोर्तुगीज होते. मात्र वयाची एकवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट न बदलता ते आणि त्यांची भावंडे भारतात राहू शकत होते. सज्ञान झाल्यानंतर मात्र त्यांना भारतीय पासपोर्ट घेणे भाग होते. त्याआधीच बेनी फरीयाची आणि लेस्टर फर्नांडिसची सर्व भावंडं पोर्तुगालला गेली.
लेस्टर फर्नांडिसने मात्र पोर्तुगालऐवजी गोव्यातच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने आपला पोर्तुगालचा पासपोर्ट परत करून भारतीय पासपोर्ट आणि नागरीकत्व स्वीकारला होता.
गोव्यातुन परदेशांत झालेल्या स्थलांतराविषयी २००८ साली फातिमा दा सिल्वा यांनी केलेल्या एका संशोधनातून स्थलांतरीत लोकांमध्ये ७४ टक्के कॅथोलिक होते ते दिसून आले होते.
ही सगळी आकडेवारी क्लिओपात अल्मेडा कुटिनो यांनी आपल्या लेखात दिली आहे.
इंग्लंडच्या तुलनेत पोर्तुगालने भारताच्या आणि आपल्या इतर वसाहतींतील लोकांना पोर्तुगालमध्ये आणि त्यानंतर इतर युरोपियन देशांत स्थायिक होण्यास मोठया प्रमाणात हातभार लावला आहे.
भारतात गोवा, दमन आणि दीव १९६१ साली सामील झाला, आजही १९६१ सालापूर्वी या पोर्तुगीज वसाहतीत जन्मलेल्या आणि त्यांच्या पुढील तीन पिढ्यांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि पर्यायाने पोर्तुगालचे नागरिकत्व सहज मिळू शकते.
विशेष म्हणजे गोव्याच्या मुक्तीनंतरही गोव्यातील अनेक लोकांकडे पोर्तुगालचेही पासपोर्ट म्हणजेच नागरिकत्वही होते. हा प्रकार अनेक वर्षे चालू राहिला होता.
मागील काही शतकांत गोव्यातील अनेक स्थलांतरित लोक जहाजांवर विविध नोकऱ्या करत असत, सणावाराला किंवा इतर कामांसाठी ते आपल्या मायभूमीकडे परतत असत.
पोर्तुगालचे पंतप्रधान असताना अंतोनिओ कोस्टा हे सुद्धा दोनदा गोव्याच्या भेटीवर आले होते.
गोव्यात मी जातो तेव्हा आल्डोना, वागातोर वगैरे अनेक ठिकाणी मोठमोठे कौलारीं बंगले आणि घरे झाकून ठेवलेली दिसतात.
परदेशांत स्थायिक झालेल्या आपल्या मालकांच्या किंवा त्यांच्या वंशजांच्या परतण्याची ही छोटीमोठी घरे वाट पाहत असतात. अनेकदा हे बंगले, घरे लँड माफियांच्या कारस्थानाला बळी पडतात.
तर अशा गोंयकारांच्या अनेक प्रॉपर्टीज गोव्यात असल्या तरी ते कायमचे परतण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत.
अगदी अशीच परिस्थिती `इस्तादो दा पोर्तुगालचा' म्हणजे पोर्तुगीज इंडियाचा भाग असलेल्या गुजरातजवळील दमण येथे, दादरा नगर हवेली आणि सिल्व्हासा येथे आहे हे मी नेहेमी पाहत असतो.
गोव्याप्रमाणेच एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आणि तेथून जवळच असलेल्या गुजरातच्या सीमेनजिकच्या दमण आणि सिल्व्हासा येथेसुद्धा स्थानिक कॅथोलिक लोकांचे मोठ्या प्रमाणात पाश्चात्य राष्ट्रांत स्थलांतर होत आहे.
गोव्याप्रमाणेच वसईतसुद्धा अनेक ठिकाणी घरटी निदान एकतरी व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक युरोपात, अमेरिकेत, कॅनडात किंवा ऑस्ट्रेलियात असतो असे मी स्वतः अनुभवले आहे.
गोवा मुक्तीनंतरच्या काळात भारताच्या विविध राज्यांतून हिंदू, मुस्लीम आणि इतर धर्मियांनी या छोट्याशा राज्यात स्थलांतर केले आहे आणि यामुळे कॅथोलिक लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सतत कमी होते गेली आहे.
गोंयकारांचे प्रमाण कमी होण्याचे एक महत्वाचे कारण प्रचंड संख्येने बाहेरील राज्यातून इथे आलेले लोक. हल्ली रोजगारासाठी आणि मजुरीकरता बिहार, झारखंड, कर्नाटक आणि इतर राज्यांतून मोठ्या संख्येने लोक गोव्यात आलेले आहेत.
सिटी बसमध्ये प्रवास करताना हे सहज जाणवते.
गोव्यातील मूळ गोवन - गोमंतकीय असलेल्या - लोकांची संख्याही त्यामुळे घटत चालली आहे. निज गोंयकार आणि भायले अशा संज्ञा त्यासाठी वापरल्या जातात.
असेच चालू राहिले तर काही काळात गोव्यात कॅथोलीक लोकांचे प्रमाण दखल न घेण्याइतके नगण्य होऊ शकते.
यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी विनोद म्हणून सांगितलेला एक किस्सा सद्याच्या परिस्थितीवर झोत टाकतो.
उत्तर भारतातील अनेक लोक, विशेषतः दिल्लीतील अनेक व्यक्ती हल्ली गोव्यात कायमचे स्थायिक होत आहेत असे त्यांनी पणजी येथे झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले आहे.
``हल्ली गोव्यात पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक संख्येने लोक राहत आहेत. दिल्लीतलय एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर `दिल्लीतल्या कुठल्या भागात राहता?'' असे विचारले तर ती व्यक्ती म्हणते: '' मी अजूनमधून दिल्लीत येत असतो, कायमस्वरुपी मी गोव्यात राहतो!' ''
'' उत्तर भारतातील प्रत्येकाला गोव्यात राहायचे आहे. निवृत्त होणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला गोव्यात स्थायिक व्हायचे असते.," असे त्यांनी म्हटले आहे.
गोवा भारताचा भाग असल्याने यात वावगे काहीच नाही, मात्र इतक्या मोठ्या संख्येने गोव्यात स्थायिक होणाऱ्या लोकांना सामावून घेणे गोव्याला शक्य आहे काय असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
फोटो ओळी : अंतोनियो कोस्टा पोर्तुगालचे पंतप्रधान असताना आपल्या मायभूमीच्या भेटीवर गोव्यात २०१७ साली आले तेव्हाचा फोटो
Camil Parkhe,

Monday, May 13, 2024

अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघ


आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळचा कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला.. इथले नंतर राज्यात आणि केंद्रात प्रस्थापित झालेले अनेक नेते मूळचे कम्युनिस्ट विचारधारेचे.

मला आठवते ती इथली पहिली लोकसभेची निवडणूक १९७१ सालची. त्यावेळचे तेव्हाच्या कोपरगाव मतदारसंघातले सर्वांत तगडे उमेदवार होते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि त्यांच्या विरोधात होते होतकरु तरुण उमेदवार एकनाथ विठ्ठलराव विखे पाटील.
निवडणूक प्रचारादरम्यान या दोघांना त्यावेळी श्रीरामपूर येथे आमच्या `पारखे टेलर्स' दुकानासमोर मी पाहिले. कॉम्रेड कडू पाटील यांची प्रचारात आघाडी होती.
इंदिराबाईंच्या `गरिबी हटाव'च्या त्या लाटेत निवडणूक अर्थात बाळासाहेब विखे जिंकले आणि त्यानंतर जिल्ह्यातला कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ओसरत गेला, राज्यात सुद्धा.
आताचा शिर्डी मतदारसंघ राखीव झाला, त्यामुळे विखे घराण्याने शेजारच्या अहमदनगर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. तरी शिर्डी मतदारसंघात विखे चालवतील त्या उमेदवाराला भरपूर मते मिळतील अशीच स्थिती आहे.
रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा २००९ साली शिर्डी राखीव मतदासंघात पराभव झाला होता, आता ते भाजपच्या मदतीने राज्यसभेत आहेत, केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत.

तर या राखीव मतदारसंघात आपण आपल्या पसंतीचा उमेदवार जिंकून आणू शकतो अशी भावना येथील ख्रिस्ती मतदारांची आहे, याचे कारण या मतदारसंघाचा इतिहास आणि रचना.
मुंबई, पुणे आणि पालघर (वसई) खालोखाल इथे ख्रिस्ती मतदान अत्यंत लक्षणीय आहे आणि तिरंगी किंवा चौरंगी लढतीत ही मते निर्णायक ठरु शकतात.
उद्या सोमवार १३ मे रोजी या मतदारसंघात मतदान आहे आणि त्या निमित्ताने ख्रिस्ती लोकांच्या समाजमाध्यम ग्रुप्स वरच्या चर्चा या अनुषंगाने आहेत. या अनेक ग्रुप्सवर मी असल्याने या चर्चेतील आशय समजला.
अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाला स्वतःचा एक आगळावेगळा इतिहास आहे, ओळख आहे.
पुण्या-मुंबईतल्या कॉस्मोपॉलीटन ख्रिस्ती लोकांच्या तुलनेत हे लोक इथल्या मातीतले आहेत, इथल्या समाजजीवनाशी त्यांची नाळ जुळलेली आहे.
श्रीरामपूर परिसरात हरेगाव येथील खाजगी बेलापूर शुगर फॅक्टरी, टिळकनगर येथील खाजगी महाराष्ट्र शुगर फॅक्टरी येथे अंगमेहेनती कामगार वर्ग इथला वंचित समाजाचा होता.
त्या कामगारवर्गामध्ये स्थानिक आणि शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यातील ख्रिस्ती समाजाचे मोठे प्रमाण होते.


माझे आजोळ असलेल्या वैजापूर तालुक्यातील माळीघोगरगाव येथील माझे मामेभाऊ सत्तरच्या दशकात श्रीरामपूर शेजारच्या टिळकनगरच्या महाराष्ट्र शुगर फॅक्टरीत कामाला होते.
या तीनचार खाजगी साखर कारखान्यातील कामगार संघटनांचे नेते वंचित समाजातील चांगदेव त्रिभुवन आणि रणशूर वगैरे मंडळी होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर काम केलेल्या दादासाहेब (दामोदर) रुपवते यांच्यापासून आंबेडकरी चळवळीशी आणि कार्यकर्त्यांशी येथील वंचित ख्रिस्ती लोकांचे घट्ट संबंध राहिलेले आहेत.
रुपवते नंतर काँग्रेसमध्ये गेले, मंत्रीही झाले.
सत्तरच्या दशकात अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाचे कार्यक्रम नामदार दादासाहेब रुपवते यांच्या उपस्थितीवाचून होत नसत.
आज दादासाहेब रुपवते यांच्या नात असलेल्या उत्कर्षा रुपवते या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डीत उमेदवार आहेत.
इथले प्रमुख उमेदवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आहेत तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून लढत आहेत.
अर्थात शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघांतली खरी अटीतटीची लढत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे राधाकृष्ण विखे या दोन पारंपरीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आहे.
मात्र यावेळी राधाकृष्ण विखे स्वतः अहमदनगर मतदारसंघात त्यांचा मुलगा सुजय विखे यांच्या निवडणूक प्रचारात गुंतलेले आहेत. तिथे महाआघाडीच्या निलेश लंके यांनी महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे.
शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघांतला ख्रिस्ती समाज आंबेडकरी चळवळीशी आणि कार्यकर्त्यांशी नाते सांगतो याचे कारण हे नाते तसे एकदम नैसर्गिक आहे.
इथल्या ख्रिस्ती समाजाचा इतर मागास वर्गात म्हणजे ओबीसीमध्ये समावेश होतो.
हा ख्रिस्ती समाज इथल्या वंचित समाजाचाच एक घटक आहे, धर्मामुळे त्यांच्यावर अन्याय होऊन त्यांना अनुसूचित जातीचे आरक्षण लागू होत नाही, इतकाच काय तो फरक.
त्यामुळे इथल्या राखीव जागेवर नैसर्गिक हक्क असुनसुद्धा आपण लढू शकत नाही तरी इथे लढणाऱ्या एखाद्या आपल्या उमेदवाराला आपण पाठबळ देऊन निदान निवडून आणू शकतो अशी भावना साहजिकच शिर्डी आणि काही प्रमाणात शेजारच्या अहमदनगर मतदारसंघांतील वंचित ख्रिस्ती समाजाची आहे
.
ही वस्तुस्थिती असल्याने या दोन्ही मतदारसंघांतील ख्रिस्ती मतदान आपल्या बाजूने वळवण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेस, महायुती आणि वंचित बहुजन आघाडींकडून होत आहेत.
यात ज्या आघाडीला यश मिळेल त्या आघाडीकडे या अटीतटीच्या निवडणुकीत यशाचे पारडे झुकेल अशी स्थिती आहे.
उद्याच ( १३ मे रोजी) मतदान होणाऱ्या पुणे मतदारसंघात आणि मावळ मतदारसंघात (पिंपरी चिंचवडचा समावेश असलेल्या) सुद्धा ख्रिस्ती मतदानाची संख्या अत्यंत लक्षणीय आहे.
या दोन्ही शहरांतील मतदार यादीतील या ख्रिस्ती मतदारांच्या विशिष्ट नाव आणि आडनावांमुळे त्यांची धार्मिक पार्श्वभूमी राजकीय पक्षांच्या नेत्यांना कळत देखील नाही अशी गंमत आहे. (उदाहरणार्थ, माझे व माझ्या मुलीचे नाव).
त्यामुळे या मतदारांकडे एक व्होटबँक म्हणून पाहिले जात नाही आणि इथेच गफलत होते.
महाराष्ट्रात ख्रिस्ती मतदारांची सर्वाधिक संख्या मुंबईत दोन मतदारसंघांत आहे.
तिथे पुढल्या टप्प्यात, २० मे रोजी, मतदान आहे. त्याबाबत नंतर...
Camil Parkhe

Saturday, May 4, 2024

ख्रिस्ती मतदार
 अठरापगड जाती आणि जमातींचे समावेश असलेल्या ख्रिस्ती मतदारांचा महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत कुणाला कौल असणार आहे?

ख्रिस्ती समाजाचे राज्यात अधिकृत आणि अनधिकृत अशाप्रकारे तीन टक्क्यांच्या आसपास प्रमाण आहे.
भारतात सगळीकडे अगदी मुंबईपुण्यातसुद्धा धर्म, जात आणि पोटजात पाहून राजकीय पक्ष आपला उमेदवार देतात.
कारण मतदारसुद्धा त्याच पद्धतीने मतदान करतात.
महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विशेषतः विधानसभेत ख्रिस्ती समाजाचे एकगठ्ठा मतदान निर्णायक ठरु शकते याची तळागळावर काम असणाऱ्या राजकीय नेत्यांना माहिती असते.
याचा कधी तरी फटका बसला तर मग याची जाणीव होते.
एखादा उमेदवार थोड्याफार मतांच्या फरकाने पराभूत होतो अशावेळी मग एकगठ्ठा असलेल्या अशा मतदानामुळे ही किमया घडली हे कळते. असे मुंबईत एका प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अलीकडच्या काळात झाले होते.
त्यामुळें गाफील राहणे, कुठल्याही समजघटकाला दुर्लक्षित करणे धोकादायक ठरते.
इतर धर्मिय समाजाप्रमाणे निदान महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज एकसंघ, एक संस्कृतीचा किंवा एक भाषिक नाही. हे विशेषतः मुंबईपुण्यात जाणवते.
महाराष्ट्रात सर्वाधिक ख्रिस्ती मतदान आहे ते राज्याच्या राजधानीत.
मुंबईतल्या दोन लोकसभा मतदारसंघांत कुठलाही राजकीय पक्ष या समाजाला गृहीत धरू शकत नाही अशी तिथे परिस्थिती आहे. काटे की टक्कर असेल तर मग विचारूच नका.
मुंबईतला ख्रिस्ती मतदार हा पूर्णतः कॉस्मोपोलीटन आहे. मूळचे गोंयकार असलेले अनेक कॅथोलीक्स बांद्रा, चेंबूर, गोरेगाव वगैरे परीसरात मोठ्या संख्येने आहेत.
त्याशिवाय मूळचा दाक्षिणात्य असलेला ख्रिस्ती मतदार आहे,
त्याशिवाय संपूर्ण राज्यातून मुंबईत स्थायिक झालेल्या मराठी भाषक ख्रिस्ती समाज सुद्धा लक्षणीय आहे. भाषा, संस्कृती वगैरे कारणांमुळे या मराठी ख्रिस्ती लोकांचे वेगळेपण पटकन लक्षात येत नसते.
मुंबईत पाय रोवलेल्या या लोकांची नाळ आपल्या गावांकडे कायम असतेच. गावाकडच्या मतदानावरसुद्धा त्यांचा प्रभाव असतोच.
एकेकाळी म्हणजे सत्तरच्या दशकात मुंबईतून समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो विधानसभेवर निवडून येत असत.
त्याआधी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या काँग्रेसच्या स. का. पाटील यांना नंतर ' बंदसम्राट ' असे नाव कमावलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी चक्क लोकसभा निवडणुकीत हरवले होते !
डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे केवळ महापौर नव्हते तर नंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री सुद्धा बनले.
शेजारच्या वसईतून एखादे गोन्सालवीस किंवा इतर कुणी आमदार म्हणून निवडून येत असत.
मुंबईच्या सेलीन डिसिल्वा या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८३-८४) आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८५) राज्यमंत्री होत्या.
या समाजाच्या प्रतिनिधीला त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही.
.
कोकणात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या परिसरात फर्नांडिस, डिसोझा, डान्टेस, अशी नावे असणारी मूळची गोंयकार असलेली मंडळी लक्षणीय संख्येने आहेत.
गेल्या दोनतीन शतकात पोर्तुगीजांच्या गोव्यातून इथे हे कॅथोलिक लोक स्थायिक झालेत. त्यांना दुर्लक्षित करून कुठल्याही पक्षाला, उमेदवाराला विजयी होता येत नसते.
इथे एखादा कॅथोलीक उमेदवार सोशल इंजियरींगच्या आधारावर विधानसभेवर निवडून येऊ शकतो.
मुंबई आणि वसईनंतर ख्रिस्ती मतदानाचा सर्वाधिक टक्का आहे तो पुण्यात.
पूर्वी बारामती मतदारसंघात असलेले पिंपरी चिंचवड शहर आता मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॉस्मोपोलिटन ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व लगेच जाणवते. तिथले कॉलेज आणि इतर शिक्षणसंस्था या ख्रिस्ती समाजाची ओळख आहे.
अहमदनगर, नाशिक जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा येथे ख्रिस्ती समाज आपली खास ओळख राखून आहे. हा समाज तिथल्या मातीतला आहे, त्यामुळे आपल्या पाठीशी कोण राजकारणी उभा राहतो हे हा समाज पुरता ओळखून आहे.
संकटाच्या वेळी आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्ते या समाजाच्या पाठीशी असतात हे अनेकदा दिसून आले आहे. याचे कारण हा समाज आंबेडकरवाद्यांना परका मुळीच नाही. रक्ताचे आणि नात्यातले संबंध आहेत त्यांचे.
हे लोक ख्रिस्ती असल्याने भाजप आणि पूर्ण परिवार त्यांच्याकडे नेहेमीच संशयाने पाहत असतो हे साहजिकच.
तर मग या ख्रिस्ती मतदारांचा नैसर्गिक ओढा कुठल्या राजकीय पक्षांकडे असतो?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष ख्रिस्ती समाजाला गृहीत धरून असतात..
"तुम्ही जाऊन, जाऊन जाणार कुठे ? "असा मग्रुरीचा भाव.
पण खरेच तसे आहे काय?
एक सांगतो.
विसेक वर्षांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेत मागच्या वेळी एक ख्रिस्ती नगरसेविका निवडून आली होती. अश्विनी डॅनिएल लांडगे हे त्यांचे नाव.
त्यांना हैदराबादच्या ओवेसी यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. `एमआयएम'च्या त्या एकमेव नगरसेविका होत्या.
अशाप्रकारे आज कुठला राजकीय पक्ष ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करू शकेल?
यावेळी या राजकीय फाटाफुटीच्या काळात ख्रिस्ती मतदार कुणाच्या तागडीत आपला कौल टाकणार आहेत?
काही अंदाज?
यापुढील काही पोस्ट्समध्ये याविषयी सविस्तर लिहिणार आहे....
****
फोटो ओळी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांची भेट घेऊन त्यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे. अंतोन कदम
यावेळी हजर होते.
Camil Parkhe