Showing posts with label Maharashtra. Show all posts
Showing posts with label Maharashtra. Show all posts

Thursday, May 1, 2025


 मध्ययुगात वसाहतवादाची सुरुवात झाली तेव्हा पोर्तुगीज सर्वप्रथम भारताच्या किनाऱ्यावर आले.

त्यानंतर आलेल्या डच, इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी पण भारतात ठिकठिकाणी प्रदेश जिंकले. मात्र या देशांनी इथली आपली चंबुगबाळे एकापाठोपाठ उचलली.
सर्वात आधी आलेल्या पोर्तुगीजांनी सर्वात शेवटी म्हणजे साडेचारशे वर्षांनंतर १९६१ साली येथून आपला गाशा गुंडाळला.
भारतीय उपखंडाच्या अगदी चिमुकल्या का होईना आणि एकमेकांपासून काही शेकडे कोस दूर असलेल्या या चार प्रदेशांवर तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी आपली सत्ता गाजवली.
पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को दा गामा आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर. कालिकत येथे १४९८ ला पोहोचला.
त्यानंतर युरोपमधील अनेक राष्ट्रांतील साहसी दर्यावर्दी आणि व्यापारी कंपन्यांची गलबते भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यांवर लागली.
त्यापैकी प्रत्येक राष्ट्राने भारताच्या भूमीवर आपली सत्ता स्थापण्याचे प्रयत्न केले.
पोर्तुगीजांनंतर आलेल्या डच आणि फ्रेंच लोकांनी येथील काही प्रदेशांवर सत्ता गाजवली, ब्रिटिशांनी तर संपूर्ण उपखंडावर दिडशे वर्षे राज्य केले.
विशेष म्हणजे पोर्तुगालच्या राजकन्या कॅथरीन हिच्याशी लग्न करणाऱ्या इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला वरपित्याने आपल्या ताब्यात असलेल्या सात बेटांचे मुंबई या लग्नात चक्क आंदण - हुंडा - म्हणून १६६१ साली दिले होते.
त्यावेळी मुंबई बेटाबरोबरच शेजारच्या वसईत पोर्तुगीजांची सत्ता होती.
ब्रिटिशांनी दिडशे वर्षे येथे राज्य केल्याचे परिणाम तर आपल्याला माहित आहे.
पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले, त्याचे परिणामसुद्धा बऱ्यापैकी संबंधितांना आणि अभ्यासकांना माहित आहे.
मी स्वतः माझा उमेदीचा काळ - शिक्षण आणि पत्रकारितेतील सुरुवातीची नोकरी - गोव्यात घालवल्यामुळे मलाही पोर्तुगीज राजवटीचा गोव्यावर असलेला भलाबुरा प्रभाव माहित आहे.
माझ्या बारावीच्या परीक्षेचे प्रमाणपत्र गोवा, दमण आणि दीव शिक्षण मंडळाचे आहे !
गोव्याबरोबरच पोर्तुगीजांनी गोव्यापासून कितीतरी दूर असलेल्या गुजरातच्या दोन भिन्न टोकांवर किनाऱ्यापाशी असलेल्या दमण, दीव आणि दादरा, नगर हवेली येथेसुद्धा तब्बल साडेचारशे वर्षे राज्य केले.
स्वतंत्र गोवा राज्याची १९८६ साली स्थापना झाल्यावर दीव आणि दमण केंद्रशासित प्रदेश बनला.
अलिकडेच त्यामध्ये दादरा आणि नगर हवेलीचा या केंद्रशासित प्रदेशात समावेश करण्यात आला.
गोवा, दमण आणि दीव भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर १९ डिसेंबर १९६१ ला भारतीय संघराज्यात सामिल झाला.
त्याआधीच - चारपाच वर्ष आधी - पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दादरा आणि नगर हवेली कुठलाही गाजावाजा न होता भारतात सामिल झाले होते.
पत्रकारिता करताना पुण्यात मी रुजू झाल्यानंतर गोव्यातले माझे वास्तव्य संपले. संपर्क, नातेसंबंध आणि ऋणानुबंध अर्थात आजही कायम आहेत.
अलीकडच्या काळात पोर्तुगीजांची जुनी वसाहत असलेल्या दमण, दादरा आणि नगर हवेली येथे माझे काही काळ वास्तव्य असते.
समुद्रकिनारीच असलेले दीव येथून खूप दूर आहे, तिकडे जाण्याचे मला काही कारण आणि प्रायोजनसुद्धा नाही.
एकेकाळी गोव्याप्रमाणेच पोर्तुगीजांच्या Estado de India चा एक भाग असलेला हा चिमुकला दमण, दादरा आणि नगर हवेली प्रदेश मला खूप अचंबित करतो.
गोव्यात पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात.
एक पोर्तुगीज भाषा सोडून.
गोव्यातील माझ्या शालेय आणि कॉलेज जीवनात माझे शिक्षक, सहाध्यायी मुलेमुली आणि बुजुर्ग लोक पोर्तुगीज बोलत.
मी काम करत असलेल्या ` The Navhind Times ' या इंग्रजी दैनिकाचे मालक वसंतराव आणि वैंकुठराव डेम्पो (धेम्पे) यांचे पोर्तुगीज भाषेवर चांगले प्रभुत्व होते.
आता गोव्यात पोर्तुगीज बोलणारे कुणीही आढळणार नाही. गोवामुक्तीनंतर तेथे पोर्तुगीज भाषेचे पूर्ण उच्चाटन करण्यात आले.
शालेय अभ्यासक्रमातील दोन आणि तीन भाषिक धोरणात पोर्तुगीज भाषेचा बळी गेला. असे व्हायला नको होते असे मला आता वाटते.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची मुख्य भाषा गुजराती आहे.
पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाल्यावर गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६७ च्या जानेवारीत सार्वमत घेण्यात आले.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत झालेले भारतातले हे पहिले आणि अखेरचे सार्वमत.
या सार्वमतमध्ये मतदारांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता.
गोव्यातल्या लोकांसाठी : तुम्हाला गोवा स्वतंत्र हवा की गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण हवे आहे.
त्याचप्रमाणे दमण आणि दीव इथल्या लोकांसाठी पर्यायी प्रश्न होता. हे दोन तालुके स्वतंत्र हवे की गुजरातमध्ये त्यांचे विलीनीकरण हवे.
या सार्वंमताचा निकाल अगदी निसटता होता.
अगदी थोड्याशा मतांच्या टक्केवारीच्या फरकाने गोवा, दमण आणि दीवचे त्या वेळी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये विलीनीकरण टळले.
नाहीतर गोवा आज महाराष्ट्रात असता आणि दमण आणि दीव गुजरातमध्ये.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली इथे गुजराती मुख्य भाषा असली तरी दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मराठीभाषिक लोकांचे प्रमाण इथे मोठे आहे.
याचे कारण महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्याला लागूनच दमण, दादरा आणि नगर हवेली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.
गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत (२०२१ला ) दमण आणि दादरा नगर हवेली इथे चक्क (अविभक्त )शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर निवडून आल्या होत्या. अर्थात २०२४ साली त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. .
दमण येथील भव्य किल्ला, गोव्याप्रमाणेच जुने बंगले आणि चर्च यांच्या रुपात पोर्तुगीज वारसा येथे आजही शाबूत आहे.
विशेष म्हणजे दमण, दादरा आणि नगर हवेली येथे कॅथोलीक कुटुंबात आजही पोर्तुगीज बोलली जाते !
गोव्याप्रमाणेच दमण, दादरा आणि नगर हवेली येथील कॅथोलिक युवकांनी मोठ्या प्रमाणात पोर्तुगालला आणि युरोपला स्थलांतर केले आहे.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली प्रदेश अनेक बाजूंनी कायमस्वरुपी `ड्राय डे' गुजरातच्या विळख्यात असला तरी गोव्यासारखी इथेसुद्धा मद्य खूप स्वस्त असते.
साहजिकच विकेंड आणि सुट्ट्यांच्या दिवशी गुजरातहून अनेक लोक गाड्यांनी समुद्रकिनारा असलेल्या दमणला येतात आणि इथे अक्षरशः ट्रॅफिक जॅम असतो..
पोर्तुगालची साडेचार शतके वसाहत राहिलेल्या मात्र सर्वार्थाने दुर्लक्षित राहिलेल्या या प्रदेशाविषयी लिहिण्यासारखे खूप आहे.
Camil Parkhe February 8. 2025

Saturday, May 4, 2024

ख्रिस्ती मतदार
 अठरापगड जाती आणि जमातींचे समावेश असलेल्या ख्रिस्ती मतदारांचा महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत कुणाला कौल असणार आहे?

ख्रिस्ती समाजाचे राज्यात अधिकृत आणि अनधिकृत अशाप्रकारे तीन टक्क्यांच्या आसपास प्रमाण आहे.
भारतात सगळीकडे अगदी मुंबईपुण्यातसुद्धा धर्म, जात आणि पोटजात पाहून राजकीय पक्ष आपला उमेदवार देतात.
कारण मतदारसुद्धा त्याच पद्धतीने मतदान करतात.
महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विशेषतः विधानसभेत ख्रिस्ती समाजाचे एकगठ्ठा मतदान निर्णायक ठरु शकते याची तळागळावर काम असणाऱ्या राजकीय नेत्यांना माहिती असते.
याचा कधी तरी फटका बसला तर मग याची जाणीव होते.
एखादा उमेदवार थोड्याफार मतांच्या फरकाने पराभूत होतो अशावेळी मग एकगठ्ठा असलेल्या अशा मतदानामुळे ही किमया घडली हे कळते. असे मुंबईत एका प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अलीकडच्या काळात झाले होते.
त्यामुळें गाफील राहणे, कुठल्याही समजघटकाला दुर्लक्षित करणे धोकादायक ठरते.
इतर धर्मिय समाजाप्रमाणे निदान महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज एकसंघ, एक संस्कृतीचा किंवा एक भाषिक नाही. हे विशेषतः मुंबईपुण्यात जाणवते.
महाराष्ट्रात सर्वाधिक ख्रिस्ती मतदान आहे ते राज्याच्या राजधानीत.
मुंबईतल्या दोन लोकसभा मतदारसंघांत कुठलाही राजकीय पक्ष या समाजाला गृहीत धरू शकत नाही अशी तिथे परिस्थिती आहे. काटे की टक्कर असेल तर मग विचारूच नका.
मुंबईतला ख्रिस्ती मतदार हा पूर्णतः कॉस्मोपोलीटन आहे. मूळचे गोंयकार असलेले अनेक कॅथोलीक्स बांद्रा, चेंबूर, गोरेगाव वगैरे परीसरात मोठ्या संख्येने आहेत.
त्याशिवाय मूळचा दाक्षिणात्य असलेला ख्रिस्ती मतदार आहे,
त्याशिवाय संपूर्ण राज्यातून मुंबईत स्थायिक झालेल्या मराठी भाषक ख्रिस्ती समाज सुद्धा लक्षणीय आहे. भाषा, संस्कृती वगैरे कारणांमुळे या मराठी ख्रिस्ती लोकांचे वेगळेपण पटकन लक्षात येत नसते.
मुंबईत पाय रोवलेल्या या लोकांची नाळ आपल्या गावांकडे कायम असतेच. गावाकडच्या मतदानावरसुद्धा त्यांचा प्रभाव असतोच.
एकेकाळी म्हणजे सत्तरच्या दशकात मुंबईतून समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो विधानसभेवर निवडून येत असत.
त्याआधी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या काँग्रेसच्या स. का. पाटील यांना नंतर ' बंदसम्राट ' असे नाव कमावलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी चक्क लोकसभा निवडणुकीत हरवले होते !
डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे केवळ महापौर नव्हते तर नंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री सुद्धा बनले.
शेजारच्या वसईतून एखादे गोन्सालवीस किंवा इतर कुणी आमदार म्हणून निवडून येत असत.
मुंबईच्या सेलीन डिसिल्वा या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८३-८४) आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८५) राज्यमंत्री होत्या.
या समाजाच्या प्रतिनिधीला त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही.
.
कोकणात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या परिसरात फर्नांडिस, डिसोझा, डान्टेस, अशी नावे असणारी मूळची गोंयकार असलेली मंडळी लक्षणीय संख्येने आहेत.
गेल्या दोनतीन शतकात पोर्तुगीजांच्या गोव्यातून इथे हे कॅथोलिक लोक स्थायिक झालेत. त्यांना दुर्लक्षित करून कुठल्याही पक्षाला, उमेदवाराला विजयी होता येत नसते.
इथे एखादा कॅथोलीक उमेदवार सोशल इंजियरींगच्या आधारावर विधानसभेवर निवडून येऊ शकतो.
मुंबई आणि वसईनंतर ख्रिस्ती मतदानाचा सर्वाधिक टक्का आहे तो पुण्यात.
पूर्वी बारामती मतदारसंघात असलेले पिंपरी चिंचवड शहर आता मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॉस्मोपोलिटन ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व लगेच जाणवते. तिथले कॉलेज आणि इतर शिक्षणसंस्था या ख्रिस्ती समाजाची ओळख आहे.
अहमदनगर, नाशिक जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा येथे ख्रिस्ती समाज आपली खास ओळख राखून आहे. हा समाज तिथल्या मातीतला आहे, त्यामुळे आपल्या पाठीशी कोण राजकारणी उभा राहतो हे हा समाज पुरता ओळखून आहे.
संकटाच्या वेळी आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्ते या समाजाच्या पाठीशी असतात हे अनेकदा दिसून आले आहे. याचे कारण हा समाज आंबेडकरवाद्यांना परका मुळीच नाही. रक्ताचे आणि नात्यातले संबंध आहेत त्यांचे.
हे लोक ख्रिस्ती असल्याने भाजप आणि पूर्ण परिवार त्यांच्याकडे नेहेमीच संशयाने पाहत असतो हे साहजिकच.
तर मग या ख्रिस्ती मतदारांचा नैसर्गिक ओढा कुठल्या राजकीय पक्षांकडे असतो?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष ख्रिस्ती समाजाला गृहीत धरून असतात..
"तुम्ही जाऊन, जाऊन जाणार कुठे ? "असा मग्रुरीचा भाव.
पण खरेच तसे आहे काय?
एक सांगतो.
विसेक वर्षांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेत मागच्या वेळी एक ख्रिस्ती नगरसेविका निवडून आली होती. अश्विनी डॅनिएल लांडगे हे त्यांचे नाव.
त्यांना हैदराबादच्या ओवेसी यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. `एमआयएम'च्या त्या एकमेव नगरसेविका होत्या.
अशाप्रकारे आज कुठला राजकीय पक्ष ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करू शकेल?
यावेळी या राजकीय फाटाफुटीच्या काळात ख्रिस्ती मतदार कुणाच्या तागडीत आपला कौल टाकणार आहेत?
काही अंदाज?
यापुढील काही पोस्ट्समध्ये याविषयी सविस्तर लिहिणार आहे....
****
फोटो ओळी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांची भेट घेऊन त्यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे. अंतोन कदम
यावेळी हजर होते.
Camil Parkhe

Friday, March 22, 2024

Goan delicacies 
 

 सत्तरच्या दशकात पणजीत मिरामारच्या आमच्या हॉस्टेलात मी आमच्या मेस्ताकडून मी खूप काही गोष्टी शिकलो .

फ्रान्सिस हा गोव्यापासून काही हजार मैल दूर असलेल्या आणि गुजरातच्या एका मुखाशी असलेल्या दमण इथला. मात्र पोर्तुगीज राजवटीत दमण हा पोर्तुगीज इंडियाचा भाग असल्याने तो तसा निज गोंयकार. जसे चित्रकार मारिओ मिरांडा निज गोंयकार, मात्र त्यांचा जन्म दमण इथला.
तर दमणचा उच्चार दमॉव असा आहे हे मी फ्रान्सिस मेस्ताकडून शिकलो तसे ओब्रिगाद, पिकेन, कॉमेस्ता? असे कितीतरी पोर्तुगीज शब्द आणि इतर वाक्यरचनासुध्दा शिकलो.
तर किचनमध्ये सकाळी आणि दुपारी आमच्यासाठी राबत असताना या मेस्ताने तयार केलेले कितीतरी गोवन आणि पोर्तुगीज मूळ असलेले कितीतरी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ मी पहिल्यांदा चाखले.
सरकारी गेस्ट हाऊसमध्ये खानसाम्या असतो त्याप्रमाणे गोव्यात ख्रिस्ती धर्मियांच्या संस्थासदनांत मेस्ता असतो.
फ्रान्सिस मेस्ताने त्याकाळात तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थांची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत असते,
स्वयंपाकघरात मी कायम असतो तरी या मेस्ताने तयार केलेले कितीतरी पदार्थ मला आजही करता येत नाही व आजतागायत केलेले नाही. उदाहरणार्थ, बिफ स्ट्रिक, बिफ शाकुती, चॉप्स, चिली फ्राय, नॉन-व्हेज समोसा आणि कटलेट्स.
बीए सेकंड इयरला असताना मी हाऊस मिनिस्टर असल्याने किचनची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती, त्यामुळे कॉलेजचा वेळ वगळता किचनमध्ये माझा भरपूर वावर असायचा.
सकाळीच मेस्ता बिफच्या मोठ्या तुकड्यांच्या हातभार लांबीच्या स्लाईसेस करून व्हिनेगरमध्ये भिजवायला ठेवायचा, नंतर टेबलावर बडवून रवा वगैरे लावून मस्तपैकी मंद आचेवर शिजवायचा.
दररोज सकाळी किमान अर्धा तास तो भल्यामोठ्या आकाराच्या खलबत्याच्या शेजारी स्टूलवर बसूनबसून त्यात ओले खोबरे वगैरे वाटत बसायचा, शाकुतीसाठी तर अधिक वेळ. त्यावेळी तो आम्हा पंचवीसतीस जणांसाठी स्वयंपाक बनवत असायचा
बिफ चॉप्स आणि कटलेट्स तर माझ्या खूप आवडीचे. आमच्या मेन्यूत कायम दर दुपारीं आणि रात्री बिफ आणि आठवड्यात दोनदा मासळी असायची. मात्र कुठलाही पदार्थ आठवड्यात रिपिट होणार नाही इतक्या वैविध्यतेचे पदार्थ हा मेस्ता बनवायचा.
पूर्ण शिजवलेल्या दाळीत अंडी फोडून टाकणे आणि मग थोडा वेळ दाळीला उकळी देणे हा आणखी एक खास गोंयचो खाद्यपदार्थ.
त्याशिवाय उकळलेले बटाटे आणि अंडीपासून सेमी-लिक्विड असलेली करी उंडो किंवा पावाबरोबर मस्त लागायची.
आमचे रात्रीचे जेवण दुपारीच बनवून चारच्या सुमारास तिशी ओलांडलेला हा मेस्ता अगदी नटूनथटून पणजीला जायचा. खांद्यापर्यंत रुळतील इतके मोठे त्याचे केस होते.
दररोज चकाचक दाढी करून तोंडाला भरपूर पावडर आणि ओठाला लिपस्टिक लावून खांद्यावर छोटोशी बॅग टाकून तो बाहेर पडायचा ते थेट रात्री नवाच्या आसपास फेणी घेऊन पूर्णतः झिंगलेल्या अवस्थेत आणि आम्हापैकी कुणाचा तरी कोंकणीत उद्धार करत तो परतायचा.
या दरम्यानच्या काळात तो पणजी किंवा सान्त इनेझला काय करायचा याबाबत आम्ही कधीच चौकशी केली नाही.
गेले काही दिवस फ्रान्सिस मेस्ताच्या आणि तो करत असलेल्या अनेक खाद्यपदार्थांच्या आठवणी परवा अचानक वर आल्या.
निमित्त होते म्हापसा मार्केटला काही खरेदीसाठी भेट.
तर तिथे एका बेकरीमध्ये काचेच्या कपाटात चिकन आणि बिफपासून बनवलेले समोसे, कटलेट्स, चॉप्स ओळीने मांडून ठेवले होते आणि माझ्या तोंडाला पाणीच सुटले.
खालच्या रांगेत पारंपरिक पध्द्तीने वेटोळे घालून ठेवलेले लाल भडक रंगाचे पोर्क सॉसेझेस होते.
त्यादिवशी पणजीत आझाद मैदानाशेजारी असलेल्या एका `टेक अवे' काउंटरला शंभर रुपयाला मिळणारी चिकन बिर्याणी घेण्यासाठी भलीमोठी रांग होती. मी अर्धा तासापासून व्हॅन येण्याची वाट पाहत असल्याने माझा नंबर तसा लगेच लागला.
त्या दिवशी पणजी बस स्टँडला गेलो होतो तेव्हाही असाच अनुभव.
गोवा दौरा आटोपून मुंबईपुण्याला आणि इतरत्र बसने जाणाऱ्या प्रवाशांची तिथं वर्दळ होती. रात्री प्रवासांत खाण्यासाठी त्या किराणा दुकानात अनेक खाद्यपदार्थ होते,
व्हेज पॅटिस, एग्ज पॅटीस, चिकन पॅटिस, चिकन समोसा, बटर पॅटीस. तिथे बिफ किंवा पोर्कचे खाद्यपदार्थ नव्हते तरी भरपूर खाद्यपदार्थांची भरपूर वैविध्यता होती.
मी राहतो त्या शहरात अशी वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृती अभावानेच दिसते, त्यामुळे विशेष अप्रूप वाटले.
गोव्यात सर्रास उपलब्ध असलेली अनेक पेये गोव्याबाहेर नेण्यास निर्बध आहेत. त्याचप्रमाणे गोव्यात सगळीकडे बेकरीत आणि हॉटेलांत मिळणारे काही खाद्यपदार्थ महाराष्ट्रात आणण्यास परवानगी नाही. आणल्यास कारवाई होऊ शकते.
त्यामुळे केवळ ओठांवर रेंगाळणारी चव राखून जड जिभेसह गोव्यातून बाहेर पडलो.
Camil Parkhe, March 22, 2024

Tuesday, June 21, 2022

 दहावी,  बारावीचा निकाल पैसे कमवण्यासाठी एक धंदाच 

श्रीरामपूरला एका मराठी दैनिकात मी कामाला होतो तेव्हाची ही गोष्ट. चार दशकांच्या माझ्या इंग्रजी पत्रकारितेच्या कारकीर्दीत मी जेमतेम तीनचार महिने एका मराठी दैनिकात काम केले. या मराठी दैनिकात जे काम केले ते काम त्याआधी आणि नंतरही कधी केले नाही.
 
साल होते १९८८. गोवा सोडून मी महाराष्ट्रात परतलो होतो. संध्याकाळी सातच्या दरम्यान मुंबईतल्या महाराष्ट्र विधीमंडळ कामकाजाचे समालोचन रेडीओवर लागायचे ते आमच्या दैनिकातले उपसंपादक टेबलवर ट्रांझिस्टर ठेवून ऐकायचे आणि त्यानुसार दुसऱ्या दिवसाच्या आवृत्तीच्या पान एक आणि आतल्या पानाच्या बातम्या लिहिल्या जायच्या. रेडिओवरचे धावते समालोचन ऐकून श्रीरामपूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्त्वाची असेल ती बातमी एकटाकी लिहिली जायची आणि लगेच कंपोंझिंगला पाठवली जायची. 
 
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) किंवा युनायटेड न्युज ऑफ इंडिया (युएनआय) या वृत्तसंस्था प्रादेशिक किंवा जिल्हा दैनिकांसाठी तेव्हा आणि आजही बातम्या देत नसतात. 
 
रात्री बारा वाजता नाईट ड्युटी संपल्यावर स्थानिक मुख्य मटका पेढीला फोन करून विजेत्या मटक्याचे आकडे विचारून ते पान एकला चौकटीत `सोना- चांदी', `मुंबई - कल्याण' किंवा `ओपन - क्लोज' अशा सांकेतिक नावांनी लावून मग घरी जायचो. 
 
पेपरचे वाचक या मटक्याच्या आकड्यासाठीच पेपर घ्यायचे. पुण्यातसुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले ' केसरी ' सारखे पेपर या मटक्याच्या अंकासाठीच खपायचे. 
 
त्याशिवाय दररोज `आजचे भविष्य' हे सदर सुद्धा सकाळी ड्युटीवर असलेले उपसंपादक लिहायचा. उदाहरणार्थ, पाहुणे येतील, पोट बिघडेल, अकस्मात धनलाभ, खिसा सांभाळा, गोड बातमी मिळेल, मनशांती बिघडेल, प्रवास घडेल वगैरे. 
 
तर एक दिवस आमच्या दैनिकाच्या मॅनेजरने एक फतवा काढला की सर्व कर्मचारी उद्या सकाळीच ऑफिसात येतील आणि कुणीही दांडी मारू नये.
 
दुसऱ्या दिवशी ऑफिससमोर ही तुडुंब गर्दी, बाहेरच्या लोकांना आत प्रवेश नव्हता. 
 
एका खिडकीपाशी एकदोन सिनियर कर्मचारी मुलांकडून आणि इतर लोकांकडून चिठ्ठीचपाटीवर नंबर घेऊन, समोरच्या यादीत पाहून पास की नापास सांगत होते आणि त्याबदल्यात प्रत्येकी एक रुपया घेत होते. 
 
खिडकीपाशी जमा होणाऱ्या गल्ल्याकडे मॅनेजरसाहेब जातीने लक्ष घालून होते, हेराफेरीला मुळी वावच नव्हता.
एसएससी बोर्डाने प्रत्येक दैनिकांना छापण्यासाठी दहावीचा निकाल दिला होता, दुसऱ्या दिवशी तो छापण्याआधी दैनिकाच्या मॅनेजमेंटचे लोक तो निकाल सांगून पैसे कमावत होते. 
 
त्याकाळात दहावी बारावीचा निकाल राज्यातील सर्व दैनिके छापत असत म्हणजे पास झालेल्यांचे नंबर आणि त्यांचा क्लास. ज्यांचा नंबर नाही ते नापास असत. त्याकाळात बहुसंख्य विद्यार्थ्यांना नापास करण्याकडेच बोर्डाचा अधिक कल असायचा. बहुसंख्य मुलं गणितात आणि इंग्रजीत गचकायचे. माझ्या वेळेस दहावीचा निकाल २७ टक्के होता. गणितात मी थोडक्यात म्हणजे एक मार्काने वाचलो. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
 
तर नंतर लक्षात आले की महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रादेशिक आणि जिल्हा पातळीवर दैनिकांचा दहावी आणि बारावी परीक्षा निकालावेळी पैसे कमवण्यासाठी हा एक धंदाच होता. वाममार्गाने कमावलेला हा पैसा दैनिकाच्या कुठल्या खात्यात दाखवला जाई ते मला माहित नाही. 
 
गोव्यात जवळजवळ एक दशकभर मी नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाचा कॅम्पस (शैक्षणिक) रिपोर्टर होतो. मात्र गोव्यात आमच्या किंवा नवप्रभा या मराठी जुळ्या दैनिकाने किंवा प्रतिस्पर्धी गोमंतक, हेरॉल्ड वगैरे वृत्तपत्रांनी दहावी अन बारावी निकालाबाबत असा काळाबाजार धंदा केला नव्हता. 
 
वृत्तपत्र व्यवसायातील एक अत्यंत शरमिंदा करणारी ही आणखी एक गोष्ट. 
 
आज दहावीचा निकाल. त्यानिमित्त ही घटना आठवली. 

Wednesday, April 27, 2022

 सिल्व्हर ओक'


"हा कुठल्या फुलांचा सुगंध आहे...कुठले झाड ह्या फुलांचे?"
त्या दिवशी महापालिकेच्या बागेत एका जागी घुटमुटमुळत असलेल्या कोणा एकाने विचारले.
सकाळी फिरायला आलेलो मी त्यावेळी माझ्या दोन-तीन मित्रांबरोबर त्या व्यक्तीच्या समोरच होतो.
"हे इकडे सोन चाफ्याचं झाड आहे.. फुलं ती अगदी वरच्या फांद्यांवर आहेत.." मी लगेच तत्परतेने माहिती पुरवली.
माझे उत्तर ऐकून माझ्याबरोबर असलेले माझे मित्रही त्या सोनचाफ्याच्या त्या झाडाकडे, त्या पिवळयाधमक फुलांकडे जराशा विस्मयाने पाहू लागले.
''अरे खरंच कि. इतके दिवस माझ्याही लक्षात आले नाही हे फुलांचे झाड आणि फुलांचा हा सुगंध !'' माझ्याबरोबरचे एक ज्येष्ठ नागरीक म्हणाले.
''या मोठ्या बागेत इतके जुने सोनचाफ्याचे हे एकमेव झाड आहे. सुगंधित फुले खूप उंचावर असल्याने या झाडाचे अस्तित्व सुदैवाने सहसा कुणाच्या लक्षातही यात नाही आणि त्यामुळे ही फुले आणि इथला हा सुगंध सुरक्षित राहतो,'' मी म्हटलं.
ते तीनचार जण अजूनही सोनचाफ्याच्या त्या उंच झाडाकडे टक लावून पाहत होते. त्यामुळे सोनचाफ्याच्या झाडाविषयी अतिरिक्त माहिती देण्याचा मोह मला आवरला नाही.
`महापालिकेच्या बाग खात्याने काही वर्षांपूर्वी सोनचाफ्याची काही नवी झाडे या बागेत लावली आहेत. चला, दाखवतो मी तुम्हाला ही झाडे, दोनतीन वर्षांत या झाडांनाही फुलं यायला सुरुवात होईल.''
त्यानंतर बागेच्या इतर जागी काही वर्षांपूर्वी लावलेली आणि आता चांगले बाळसे धरलेली सोनचाफ्याची ती इतर झाडेही मी त्यांना दाखवली. सोनचाफ्याची झाडे कशी ओळखायची हेसुद्धा मी त्यांना सांगितले.
एव्हाना झाडे आणि फुलांविषयीची माझी माहिती ऐकून माझे दोन मित्र चकित झाले होते.
``अहो पण तुम्हाला या झाडांची आणि फुलांची खूप माहिती दिसते. मी या बागेत गेली कित्येक वर्षे येतोय पण झाडांची अशी नावे माहितच नाही.'' .
वयाने माझ्यापेक्षा मोठे असले आणि सरकारी नोकरीच्या निमित्त ते राज्याच्या विविध शहरांत आणि छोट्यामोठ्या गावांत राहिले होते तरी झाडे आणि फुलांची त्यांची माहिती खूप मर्यादित होती.
कडुनिंबाची, पिंपळाची, गुलमोहोराची आणि नारळाची अशी काही झाडे आणि गुलाब, मोगरा, फार झालं तर जाईजुई सजी थोडीफार फुले सोडली तर आपल्यापैकी बहुतेकांना इतर झाडांची, झुडुपांची आणि फुलांची माहितीच नसते.
मंडईत किंवा बाजारात गेल्यावरसुद्धा नेहेमी भाजी घेणाऱ्या पुरुषांना आणि अनेक बायांना मेथी, पालक, करडई, शेपू आणि इतर काही पाल्याभाज्यांची आणि कोबी, फ्लॉवर, टमाटे वगैरे फळभाज्यांची नावे माहित असतात. आंबटचुका, चवळी, चाकवत, डांगर, विविध प्रकारचे बिन्स किंवा वाल ही नावे अनेकांनी कधी ऐकलेली नसतात, त्यांची चव कशी माहित असणार? तसाच हा प्रकार.
तर त्या दिवशी बागेतल्या त्या ज्येष्ठ नागरिकाने माझ्या फुलांबाबतच्या आणि झाडांविषयीच्या माहितीविषयी कौतुक केले.
''तुम्हाला माहित आहे का येथे आपण रोज फिरतो या बागेत फणसाचे एक झाड आहे? कवठांच्या ओझ्याने वाकलेले एक झाड आहे? दररोज रात्री आपला मोहक सुगंध पसरविणारे रातराणीचे झाड आहे ? आणि साक्षात स्मुद्रमंथनातून बरे आलेले आणि नंतर सत्यभामाच्या हट्टामुळे स्वर्गातून पृथ्वीतलावर आलेले दररोज सकाळी सुगंधी फुलांचा सडा टाकणारे पारिजातक किंवा प्राजक्ताचे झाड आहे?''
``इथलं हे फणसाचं झाड मी सहसा कुणाला दाखवतही नाही, नाहीतर उन्हाळ्यात सगळे जण फांद्यांवर लोंबणाऱ्या फणसांकडे पाहत राहतील. मागच्या वर्षी
या झाडाला लागलेले छोटेसे दोन फणस काढण्याचा प्रयत्न एक बाई आणि तिची मुलगी करत होती. लांबूनच मला ते दिसले आणि मी मोठ्याने ओरडलो, ;; अरे अजून लहान आहेत ते फणस.. वॉचमनला सांगू का?'' दोघीजणी लगेच पळाल्या, नंतर लक्षात आले नवीनच आलेल्या वॉचमनची ती बायको आणि मुलगी होती. ''
माझे न थांबणारे ते भाषण ऐकून माझ्याबरोबरचे ते मित्र थक्क झाले त्यानंतर चारपाच मिनिटांतच ही सर्व झाडे, विशेषतः कवठाने वाकलेले ते झाड पाहून सगळे थक्क झाले. दररोज तिथे येऊन त्या कडक कवठांच्या फळांकडे त्यांचे कधी लक्षही नव्हते गेले.
`मात्र यात काहीच नवलाची गोष्ट नाही, आपण दररोज संध्याकाळी, रात्री घराबाहेर पडत असतो, किती वेळेस आपले सुर्याच्या मावळत्या लालभडक गोळ्याकडे लक्ष देऊन पाहतो? , किती वेळेस आपण उगवती चंद्रकोर, अष्टमीचा किंवा पौर्णिमेचा चंद्र न्याहाळत असतो? त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणिव नसते. तसेच हे पण आहे..''
मी त्यांच्याशी झाडाफुलांविषयी बोलत होतो ते खरे पण माझे मन कधीच या झाडाफुलांच्या कितीतरी आठवणींमध्ये रमले होते. इथली ही लांबसडक काड्यासारखी फुले असणारी उंचच उंच बुचाची झाडे मला हरेगावच्या संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगची आठवण करुन देत होती. लालभडक, जांभळ्या आणि सफेद रंगांची बोगेनव्हेलची फुले मला नेहेमीच श्रीरामपूरच्या जर्मन हॉस्पिटलपाशी असलेल्या देवळातल्या मतमाऊलीच्या डोंगरापाशी घेऊन जातात. क्रोटॉनची कितीतरी रंगांची रोपटे मला गोव्यातल्या मिरामारच्या माझ्या पहिल्या चिमुकल्या बागेची आठवणी जागी करतात.
वड म्हटलं कि मला श्रीरामपूरपाशी गोंधवणीपासून तीनचार किलोमीटर असलेला आमच्या शाळेच्या सहलीचे ठिकाण असलेला तो बन आठवतो. तिथला तो महाकाय, पारंब्या सगळीकडे पसरत कितीतरी अंतरावर पसरलेला वटवृक्ष मला आजही उठतो, त्या वडाच्या अगदी मध्यभागी एका पिराची हिरव्या कापडाने झाकलेली कंबर होती.
औंदुंबर म्हटलं कि बालकविंची ती हुरहुर निर्माण करणारी कविता हमखास आठवते.
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी
लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
नव्वदच्या दशकात रशियात आणि बल्गेरियात वास्तव्यात असताना आणि अलिकडेच पुन्हा एकदा युरोपात सहलीवर असताना आणि दोन वर्षांपूर्वी थायलंडला असताना तिथली झाडे, त्या झाडांची पाने आणि फुले मी असेच अगदी नवलाने पाहत बसायचो.
चिंचवडमधल्या माझ्या इमारतीच्या आसपास आणि गच्चीवर शक्य होतील अशी ही बहुतेक झाडे आणि रोपटे मी लावली आहेत, याचे हे एक मुख्य कारण आहे. विशेष म्हणजे याची जाणीव मला अगदी अलिकडच्या काळात झाली. माझा भूतकाळ माझ्याबरोबर घेऊन उद्या येणाऱ्या नव्या पानांची, कळ्यांची आणि फुलांची वाट मी पाहत असतो.
बोलतबोलत बागेभोवतीच्या गोल रस्त्यांवरुन आमचा एक फेरा पूर्ण झाला होता आणि मला ते दुसरे एक उंच झाड दिसले.. ''आणि हे बघा हे आहे ...''
आणि मी एकदम गप्पगार झालो. मी पुरता ब्लँक झालो होतो,
माझ्या जिभेच्या अगदी टोकांवर असलेले त्या झाडाचे नावच मला आठवेना..
''अहो हल्ली हे झाड सगळीकडे दिसते, आमच्या इमारतीच्या शेजारीही दोन आहेत ही झाडं.. काय नाव ते..''
नंतर मला अचानक एक आठवले.. ``अहो हे झाड म्हणजे शरद पवारांच्या मुंबईतल्या बंगल्याचे नाव..मागे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सत्ता स्थापन करण्यासाठी होणारी चर्चा मातोश्री आणि शरद पवारांच्या या घरात व्हायची.. शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिष्टाई करण्यासाठी त्या दिवसांत या दोन निवासस्थानांत सारखे फेऱ्या मारत असायचे.. आठवले का शरद पवारांच्या घराचे ते नाव ? हे झाड त्याच नावाचे आहे..''
''म्हणजे तुम्हाला `सिल्व्हर ओक' म्हणायचे आहे का?;
राजकारणात खूप इंटरेस्ट असलेल्या त्यापैकी एकाने पट्कन म्हटले.
त्यांना एकदम आलिंगन द्यावे असे मला त्यावेळी वाटले.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यावर मातोश्री, सिल्वर ओक आणि खासदार संजय राऊत अनेक दिवस एकदम प्रकाशझोतात आले होते.
`मातोश्री' हे निवासस्थान तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून महाराष्ट्रात परिचयाचे होते, २०१९साली सत्तास्थापनाच्या वाटाघाटीच्या काळात आणि संजय राऊत यांच्या शिष्टाईमुळे शरद पवार यांचे मुंबईतील `सिल्व्हर ओक' हे निवासस्थानसुद्धा महाराष्ट्रभर आणि देशाच्या राजधानीतही सर्वपरिचित झाले.
अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात याच खासदार संजय राऊत यांच्यामुळे पेशवाईच्या काळातील विस्मृतीत गेलेले ते `साडेतीन शहाणे' म्हणजे नक्की कोण होते याचीही अनेकांना माहिती झाली.

 मॉर्निंग वॉक निखळ निसर्गावरच ही पोस्ट

आज सकाळी श्रीधरनगर बागेत मॉर्निंग वॉकच्या कार्यक्रम पत्रिकेवरील सर्वच कार्यक्रम पूर्ण करता आले. असा योग नेहेमीच येत नाही. बागेत जातानाच कारमध्ये नेहेमी असलेली बॅडमिंटनची दोन रॅकेट्स आणि शटल कॉक घेऊन गेलो.
मी असा जामाजम्यानिशी जात असताना पाहून '' ''अहो तुमचे कुणी जोडीदार बागेत नाही'' असं एकजण मला म्हणालासुद्धा. पण म्हटले ``पाहू या, येईल कुणीतरी खेळायला. ''
अगदी तसंच झालं.
त्या सकाळच्या थंडीत थोडा वेळ उन्हात उभा राहून सुर्याकडे टक राहून पाहत राहिलो, नंतर थंडी जाईपर्यंत उभ्यानेच काही व्यायामप्रकार केले आणि बागेत थोडा पळून आलो. तोपर्यंत माझ्याबरोबर नेहेमी बॅडमिंटन खेळणाऱ्यांपैकी एक जोडीदार आला होता.
मस्तपैकी पंधरावीस मिनिटे खेळून झाले, अंग छानपैकी मोकळे झाले.
बॅडमिंटनची `मॅच’ अशी मी कधीच खेळत नाही, शिवाजीनगरच्या सकाळ टाइम्स वृत्तपत्रातले काम संपल्यावर आणि बॉसलोक ऑफिसातून घरी गेल्यावर संध्याकाळी उशिरा किंवा रात्री ऑफिसच्या मोकळ्या जागेत बॅडमिंटन करण्याचा माझा खूप वर्षे शिरस्ता होता. त्यावेळी असिम त्रिभुवन, ओंकार परांजपे, अनामिका अशा काही तरुण सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव काही वेळेस मॅचेस खेळाव्या लागायच्या. नाहीतर स्पर्धेसाठी म्हणून नाही तर निव्वळ निखळ आनंदासाठी खेळायचे हेच माझे नेहेमी धोरण असते.
गोव्यात मिरामारच्या धेम्पे कॉलेजात शिकताना आणि नंतर नवहिंद टाइम्समध्ये नोकरी करताना केवळ फ़ुटबाँल खेळायचो, युरोपात बल्गेरियात काही महिने पत्रकारितेच्या अभ्यासासाठी असताना तिथेही फ़ुटबाँलच खेळायचो. गेल्या काही वर्षांत माझी मुलगी आदिती आणि तिच्या कॉलनीतल्या मित्रमैत्रिणींमुळे बॅडमिंटन खेळायची आवड निर्माण झाली आणि आता केवळ हाच खेळाचा प्रकार मला आवडतो आणि झेपतो पण.
खेळून झाले आणि काही मिनिटातच शिट्टी झाली. कोरोनाकाळात हल्ली महापालिकेच्या बागा सकाळी दहाऐवजी नऊलाच बंद होतात. गेटबाहेर आलो तर दत्तमंदिरातून बाहेर येणारे दुसरे एक मित्र दिसले.
केंद्रिय उद्योग खात्यातून पंधरा वर्षांपूर्वी निवृत्त झालेले हे विजय देशपांडे सर मॉर्निग वॉकमध्ये मला साथ देत असतात. त्यांच्याबरोबर चालताना त्यांचे सरकारी कार्यालयातील घटनांचे आणि कामकाजाचे अनुभव ऐकत शरीराचा व्यायाम होतोच पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे खूप उच्च दर्जाची बौद्धिक मशागत होत असते.
दिल्लीत एकदा काही कागदपत्रे घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटण्याची देशपांडेंना संधी मिळाली होती, बारामतीला महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या देशातील व्हिव्हिआयपींच्या उपस्थितीत पण साध्याच स्वरुपात झालेल्या लग्नासही निमंत्रित सरकारी अधिकारी म्हणून ते उपस्थित होते.
ऐन आणिबाणिच्या काळात देशपांडे नवी दिल्लीत होते, त्याकाळातल्या त्यांनी सांगितलेली ही एक आठवण. आणिबाणी लागू केल्यानंतर देशात एकदम कठोर शिस्तपर्व म्हणजे विनोबा भावे यांच्या शब्दांत `अनुशासन पर्व’ सुरु झाले.
दिल्लीतील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वक्तशीरपणे म्हणजे सकाळी नऊ वाजता कार्यालयात हजर व्हावे असा एक आदेश काढण्यात आला होता. या आदेशाकडे बहुतेक सर्वच अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी याबाबत माहिती कळली. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊनंतर नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकची प्रमुख दरवाजे बंद करण्यात यावे, असा एक आदेश त्वरित काढण्यात आला. (त्याकाळात पंतप्रधान कार्यालय म्हणजे Prime Minister's Office किंवा PMO अस्तित्वात नव्हते).
या आदेशाची ताबडतोब कार्यवाही करण्यात मात्र एक अडचण होती. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे प्रमुख दरवाजे गेली कित्येक वर्षे कधीही पूर्णतः बंद केले जात नसल्याने ते गंजले होते आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ते बंद करणे अशक्य होते. त्यावर आदेश आला की कुठल्याही परिस्थितीत ही प्रमुख दरवाजे सकाळी नऊनंतर बंद झालीच पाहिजे. यानंतर रात्रभर काम करून अखेरीस हे दरवाजे बंद आणि खुले होतील यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे सर्व प्रमुख दरवाजे सकाळी नऊनंतर बंद झाले आणि त्यानंतर येणाऱ्या विविध खात्यांच्या मुख्य सचिवांच्या, सचिवांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या गाडया गेटबाहेरच रोखण्यात आल्या. देशाच्या इतिहासात प्रथमच त्या दिवशी अनेक मुख्य सचिव आणि सचिवांच्या नावावर 'उशिरा आल्याचा' शेरा नोंदविला गेला. त्यानंतर मात्र सर्व अधिकारी आणि इतर कर्मचारीवर्ग वेळेवर कार्यालयात येऊ लागला.
तर सांगायचे म्हणजे देशपांडे सर म्हणजे अशा अनेक समृद्ध आणि संपन्न अनुभवांची मोठी खाण आहे. आपल्या नोकरीच्या कारकिर्दीत देशांतील विविध राज्यांत तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा ठिकाणी काम करताना आलेल्या नोकरशाहीचे, नोकरशहांचे आणि राजकारणी व्यक्तींचे किस्से ते सांगत असतात कोल्हापुरात असताना त्यांचे पत्रकार मित्र प्रभाकर कुलकर्णी आणि राजारामबापू पाटील यांच्या अनेक आठवणी आणि किस्से ते अधूनमधून सांगत असतात.
अशा अनुभवसंपन्न व्यक्तीशी दररोज बोलण्याची संधी मिळणे हे आम्हा पत्रकारांसाठी किती अमुल्य संधी असते हे सांगायलाच नको. देशपांडे सरांच्या या बोलण्यातून मला आतापर्यंत वृत्तपत्रांतील बातमी आणि लेखांसाठी कितीतरी विषय मिळाले आहेत, यापुढच्या कितीतरी लिखाणासाठी त्यांनी बेगमी पुरवली आहे.
घरी आलो तेव्हा इमारतीखाली लिफ्टच्या शेजारी असलेल्या महापालिकेच्या नळाला अजून पाणी येते आहे हे पाहून धक्काच बसला.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने धरणांत अपुरा पाणीसाठा आहे या कारणाखाली दिवसाआड एकवेळ फक्त संद्याकाळी पाणीपुरवठा सुरु केला त्यात नंतर अतिवृष्टी होऊन, भरलेल्या धरणांतून पाणी सोडण्याची वेळ येऊनही बदल केलेला नाही. मात्र आजकाल अनेकदा सकाळीही नळाने पाणीपुरवठा होतो हे अनेक लोकांच्या लक्षातही आलेले नाही.
मग काय, ताबडतोब घरात गेलो आणि दोन बादल्या आणि पाण्याचा मग घेऊन पुन्हा त्या नळाशी आलो. खूप दिवस इमारतीपाशी आणि रस्त्याला लागून असलेल्या रोपांना आणि झाडांना मी पाणी घातले नव्हते. इतर शेजारपाजारचे वृक्षमित्र रहिवाशी नियमितपणे या झाडांनां पाणी घालत असले तरी ते पाणी अपुरे आहे हे पारिजातकाच्या, कण्हेरी आणि इतर झाडांच्या वाळलेल्या पानांवरुन लक्षात येत होते. शिवाय हिवाळा संपत आल्याने, आंबा आणि इतर फळझाडांचा फळांचा मोसम जवळ येत असल्याने त्यांना वाढीव पाण्याची गरज होती
झाडांना पाणी घालणे सुरु केले आणि खूप वर्षांपूर्वी आमच्या कॉलनीतल्या वाहत्या कॅनालपाशी असलेल्या मोकळ्या जागेत मीच लावलेल्या या कडुनिंबाच्या, आंब्याच्या, सोनचाफ्याच्या झाडांकडे आणि तगर, सोनचाफा कण्हेर वगैरे फुलझाडांकडे मी गेली दोन वर्षे दुर्लक्ष केले याबद्दल वाईट वाटले.
यापैकी काही झाडांना पाणी साचण्यासाठी मग आळे केले, काही झाडांच्या मुळापाशी शेजारीच कुणी तरी आणून टाकलेली लाल पावटा माती पसरुन टाकली, पेरु आणि सिताफळाच्या झाडांच्या फांद्याची थोडी छाटणी केली. अजूनही महापालिकेच्या नळाला पाणी येत होते त्यामुळे किती वेळ या बागकामात मन रमले ते कळालेसुद्धा नाही.
सहज घड्याळाकडे पाहिले तर साडेअकरा वाजून गेले होते. नाश्त्याची वेळ कधीच टळून गेली होती.
पण मग मनाशीच म्हटले, चला, काही हरकत नाही, आता नाश्ता नकोच. दमणची पाहुणे मंडळी घरी असल्याने आज मिष्टानांचा बेत आहे. आज भरपूर खेळून, व्यायाम करुन झाला, बागकामाने जाम भूक लागलीय.
अगदी तीस-पस्तीस नाही तरी नेहेमीपेक्षा आज काही जास्तीच पुरणपोळ्या अगदी आरामात खाता येतील.