Showing posts with label George Fernandes. Show all posts
Showing posts with label George Fernandes. Show all posts

Monday, June 23, 2025

 

                                        टी. बी कुन्हा


                                               पीटर अल्वारीस
खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मतदारांनी जन्माने ख्रिस्ती असलेली एक व्यक्ती लोकसभेवर निवडून दिली होती.

महाराष्ट्र राज्य त्यावेळी त्यावेळी नुकतेच अस्तित्वास आले होते. महाराष्ट्रातून ख्रिस्ती व्यक्ती देशाच्या संसदेवर निवडून येणे ही फार मोठी ऐतिहासिक घटना होती, त्या निवडणुकीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक खूप ताकदवान राजकीय नेता दिला.
निवडून आलेल्या त्या व्यक्तीने देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर फार मोठा दूरगामी प्रभाव केला.
लोकसभेत पाठवलेल्या त्या नेत्याचे नाव होते जॉर्ज फर्नांडिस.
अर्थात जॉर्ज फर्नांडिस यांची १९६७ साली निवड करताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी फर्नाडिस किंवा काँग्रेसचे स. का. पाटील यांचा धर्म किंवा जात विचारात घेतलीच नव्हती.
अरुण साधू यांच्या ‘आज दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबरींवर आधारीत असलेल्या जब्बार पटेल दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर यांची पटकथा असलेल्या `सिहासन' चित्रपटातील डिकॉस्टा या कामगार नेत्याचे पात्र हे जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बेतलेले आहे असे म्हणतात.
सतीश दुभाषी यांनी हे पात्र साकारले होते.
त्यावेळची १९६७ ची लोकसभा निवडणुकीत आजही ऐतिहासिक ठरते याचे कारण त्यावेळी पहिल्यादाच बलाढ्य गणल्या गेलेल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाला अनेक ठिकाणी विशेषतः दक्षिण भारतात अपयश चाखावे लागले.
त्यावेळी देशात अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रातसुद्धा विरोधी पक्षांचे नेते लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र त्यापैकी बहुतेकांचा पुढील निवडणुकीत पराभव झाला.
जॉर्ज फर्नांडिस यांचासुद्धा.
जॉर्ज फर्नांडिस त्यानंतर अनेकदा बिहारमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीप्रमाणेच धर्माची बाब त्यांच्या या निवडणुकांत कधीही आडवी आली नाही.
मूळचे मॅंगलोरचे असलेले जॉर्ज तरुणपणी फादर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत दाखल झाले होते ! ( दहावीच्या परीक्षेनंतर मी पण जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी श्रीरामपूर सोडून गोव्यात आलो होतो. )
जन्माने ख्रिस्ती असलेली आणखी दोन व्यक्ती ख्रिस्ती बहुसंख्य नसलेल्या मतदारसंघातून अनेकदा निवडून आलेल्या आहेत. जॉर्ज फर्नाडिस यांच्याप्रमाणेच ही व्यक्ती सर्वांना परिचित आहे. त्या आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी.
त्याशिवाय तिसरी व्यक्ती म्हणजे एन. के. पी. साळवे.
'महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्त्वाची ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे एन. के. पी.
(नरेंद्र कुमार प्रसादराव) साळवे. ते १९६७ ते १९७७ या काळात लोकसभेचे सभासद होते.
त्याशिवाय राज्यसभेवर ते चार वेळेस निवडून गेले होते आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्रीसुद्धा होते.
अर्थात जॉर्ज फर्नांडिस किंवा सोनिया गांधी यांना ख्रिस्ती व्यक्ती म्हणून संबोधने त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, त्यांना ते आवडले नसते याची मला पूर्ण कल्पना आहे.
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे किंवा समाजवादी नेते ना. ग. गोरे यांना ब्राह्मण म्हणून संबोधने असाच काहीसा हा प्रकार आहे.
रोमन कॅथोलिक कुटुंबांत जन्मलेल्या जॉर्ज फर्नांडिस आणि सोनिया गांधी यांचा परंपरेनुसार बाप्तिस्मा झाला होता. त्याचप्रमाणे नानासाहेब गोरे किंवा कॉम्रेड डांगे हे ब्राह्मण कुटुंबांत जन्मले होते आणि त्यांनी आपले ब्राह्मण्यत्व कधीही मिरवले नव्हते.
जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच इतरही अनेक ख्रिस्ती व्यक्ती मुंबईच्या समाजकारणात आणि राजकारणात त्याकाळात सक्रीय होत्या.
जॉर्ज फर्नांडिस मुंबईच्या क्षितिजावर अवतरण्यापूर्वी खूप वर्षे आधीच त्यांचा मुंबईच्या समाजकारणात आणि चळवळीत वावर होता.
वसईचे `काका' जोसेफ बॅप्टिस्टा असेच एक नाव. बाळ गंगाधर टिळक यांचे एक जवळचे सहकारी.
चिरोल बदनामी खटल्यात विलायत वारीत जोसेफ बॅप्टिस्टा यांनी टिळकांना साथ दिली होती. त्याशिवाय `होम रुल' चळवळीचे ते एक प्रमुख नेते होते.
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हे टिळकांचे ऐतिहासिक वाक्य मूळचे काका जोसेफ बॅप्टिस्टा यांचे आहे असेही काही जण म्हणतात.
वसईत आता त्यांच्या नावाने एक ज्युनियर कॉलेज आहे.
जॉर्ज फर्नाडिस यांच्यापूर्वी खूप वर्षे आधी एका ख्रिस्ती कामगार नेत्याची मुंबईतून आमदार म्हणून निवड झाली होती.
समाजवादी पक्षाचेच असलेले पीटर अल्वारीस हे त्यांचे नाव.
पीटर अल्वारीस हे मूळचे गोव्याचे. गोव्यात पोर्तुगीजांविरुद्ध उठाव करण्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. गोवा सोडून मुंबईत त्यांनी गोवा मुक्तीसाठी कार्य सुरु केले.
पीटर अल्वारीस हे मुंबई विधानसभेचे ते १९४९ ते १९५२ या काळात आमदारसुद्धा होते. त्यांच्या रूपाने एक कामगार नेता पहिल्यांदा आमदार झाला होता.
गोवा १९६१ साली मुक्त झाल्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून पीटर अल्वारीस पणजी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.
गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने अल्वारीस यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला होता.
गोव्यातल्या पोर्तुगीज वसाहत राजवटीविरुद्ध संघर्ष उभारणारे टी. बी कुन्हा (त्रिस्ताव डी ब्रागांझा कुन्हा) यांनी मुंबईतून आपले राजकीय कार्य सुरु ठेवले होते.
येथे अधिक ठळकपणे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच या सर्व व्यक्ती केवळ जन्मानेच रोमन कॅथोलिक होत्या.
यापैकी बहुतेक जण एकतर डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीच्या होत्या. काही पूर्ण नास्तिक होते.
नास्तिक असल्यामुळे टी. बी. कुन्हा यांना मुंबईतील कॅथोलिक कबरस्थानात चिरविश्रांतीसाठी जागा मिळाली नव्हती. त्याऐवजी त्यांचे पार्थिव प्रोटेस्टंट कबरस्थानात पुरण्यात आले होते.
एके काळी नाकारलेल्या गेलेल्या टी. बी. कुन्हा यांच्या याच पार्थिवाच्या अवशेषाला आता पणजीतल्या आझाद मैदानातील स्मारकात अत्यंत सन्मानाची जागा मिळाली आहे.
प्रजा समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो हे सत्तरच्या दशकात माटुंगा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून जात असत. मुंबईच्या माटुंगा, चेंबूर, बांद्रा, अंधेरी, आणि इतर परिसरांत मूळचे गोमंतकीय तामिळ आणि मल्याळी असलेल्या ख्रिस्ती लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे.
खूप वर्षांपूर्वी जनता दलाचे डॉमिनिक गोन्सालवीस वसईतून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते.
डॉ. लिऑन डिसोझा यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होते. आमदार म्हणून निवडले गेल्यानंतर काही काळ ते महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीसुद्धा होते.
नव्वदच्या दशकात महाराष्ट्र मंत्रिमंडळात सेलीन डिसिल्व्हा या मंत्री होत्या.
सेलीन डिसोझा यांच्या कन्या जेनेट डिसोझा यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या उपाध्यक्षा म्हणून कार्य केले आहे.
आता हा भूतकाळ झाला आहे. मात्र हा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.

Camil Parkhe

Saturday, December 7, 2024

 अतिशय धार्मिक म्हणता येईल अशा कुटुंबात मी वाढलो. माझ्या वडलांची दिनचर्या सुरु व्हायची ती सकाळी उठल्याउठल्या पलंगातल्या बिछान्यातच हातात रोझरी जपमाळ घेऊन कपाळावर, छातीवर आणि दोन्ही खांद्यांवर हाताने क्रुसाची खूण करत ' पवित्र क्रुसाच्या खुणेने...'' या प्रार्थनेपासून.

त्यानंतर `आमच्या बापा’, `नमो मारिया’ `प्रेषितांचा विश्वासांगिकार’ वगैरे प्रार्थना अर्धा तास चालायच्या. त्यांचे तोंड बाहेरच्या खोलीत असलेल्या आमच्या कुडाच्या भिंतीवर टांगलेल्या छोट्याशा आल्ताराकडे असायचे.
दरम्यानच्या काळात स्वयंपाकघरात केलेला कोरा चहा कपबशीत त्यांच्यासमोर ठेवलेला असायचा. दादांचे हे असे दररोजचे दर्शन मला खूप लहानपणापासून आठवते.. याचं कारण घरात इतरांपेक्षा खूप लवकर म्हणजे तांबडं फुटण्याआधीच बिछान्यातून बाहेर पडण्याची मला लागलेली सवय.
सकाळी साडेआठ दरम्यान दादांची आंघोळ, नाश्ता उरकायचा, तोपर्यंत घरात महिन्यावार लावलेला फुलांचा हार आलेला असायचा. कालचा जुना हार काढून दादा आल्तारासमोर उभे राहून दोनतीन प्रार्थना - आमच्या बापा, मारिया - मनातल्या मनात म्हणायचे आणि आमच्या `पारखे टेलर्स’ दुकानात जायला निघायचे.
माझी शाळा सकाळी अकराला असल्यानं अनेकदा मी त्यांच्याबरोबर जायचो. दुकानातल्या लाकडी फळ्यांचे दार उघडून केरसुणीनं ते दुकान झाडून घ्यायचे आणि मग दुकानाच्या भिंतीवर मध्यभागी असलेल्या आल्तारासमोर उभे राहून ते पुन्हा दोनतीन प्रार्थना म्हणायचे.
संद्याकाळी दुकानात पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवल्यावर आणि नंतरच्या काळात दिवे लावल्यावर लगेचच ते आल्ताराकडे पाहायचे आणि उजवा हात कपाळावर लावायचे.
श्रीरामपूर नगरपालिकेचा रात्रीचा साडेआठ वाजता भोंगा झाल्यानंतर दुकान बंद करण्याआधी पुन्हा एकदा आल्तारासमोर प्रार्थना व्हायची.
घरी आल्यावर नऊच्या आत आल्तारावर जाडजूड स्टीलच्या स्टॅण्डमध्ये दोन मेणबत्त्या लावल्या जायच्या आणि घरातील सगळे जण रात्रीच्या सामूहिक प्रार्थनेत सहभागी व्हायचे. जवळजवळ अर्धा तास चालणाऱ्या रात्रीच्या या प्रार्थनेत कुणीही गैरहजर राहू नये असा एक दंडक होता.
शनिवारी रात्री मारियेची प्रार्थना म्हणजे रोझरी व्हायची, आठवड्यातून दोनतीनदा मारियेची, सर्व संतांची आणि संत जोसेफची लितानी प्रार्थना व्हायची. अशाप्रकारे दादांचा नि आमच्या घरातला हा दिनक्रम कार्यक्रम कधीही चुकल्याचं मला आठवत नाही.
नाश्ता आणि कुठलेही जेवण घेण्याआधी हातानं क्रुसाची खूण केल्यानंतरच घास तोंडात टाकायचा ही त्यांची आणखी एक सवय. ही सवय आमच्या आईला - बाईला - सुद्धा होती. अहमदनगर जिल्ह्यात आईला 'बाई' असं संबोधन करण्याची रीत प्रचलित आहे.
घरातल्या या धार्मिक वातावरणाचा प्रभाव घरातल्या आम्हा मुलामुलींवर पडणे साहजिकच होते. घरातली सगळीच मुलं साधुसंत झाली नाही तरी बऱ्यापैकी धार्मिक आणि चांगल्यावाईट कल्पनांचा आदर आणि दुःस्वास करणारी निघाली.
घरातल्या कुणाही व्यक्तीकडून कसलाही अपशब्द, लिंगाधारित अपशब्द किंवा एखादी शिवी कधीही कानावर पडली नाही.
सत्तरच्या दशकापर्यंत जगभरातील कॅथोलिक देवळांत रविवारचा आणि दररोजचाही मिस्साविधी लॅटिन भाषेतून व्हायचा. आपल्याकडे अलीकडच्या काळापर्यंत अनेक धार्मिक विधी सामान्य लोकांना न कळणाऱ्या संस्कृत भाषेत व्हायचे अगदी तसेच. श्रीरामपूरला आणि हरेगावसारख्या खेड्यांपाड्यांत १९७२ पर्यंत कॅथोलिक देवळांत मिस्साविधी आणि प्रार्थना लॅटिन भाषेत व्हायच्या,
पुस्तकात समोरासमोरच्या पानांवर रोमन आणि देवनागरी लिपींत लिहिलेल्या या लॅटिन प्रार्थना आम्ही म्हणायचो. मराठी भाषा येणारे आम्ही लोक देवनागरी लिपीतल्या त्या लॅटिन प्रार्थना सहजपणे गात आणि म्हणत असू.
आमच्या लहानपणी आम्ही - आणि जगभरातले सर्वच भाविक लोक - लॅटिन भाषेत प्रार्थना करत असू. .
तासभर चालणाऱ्या या संगीतमय लॅटिन मिस्सा खरंच भव्यदिव्य स्वरुपाच्या असायच्या. पूर्ण उपासनाविधीत याजक आणि जमलेले भाविक जवळजवळ विशिष्ट लयबद्ध पद्धतीने गात असत. लॅटिन भाषेच्या संगीतमय उपासनाविधीला रुळलेल्या माझ्यासारख्या मुलांना आणि अनेक ज्येष्ठांना हा निर्णय लगेचच रुचला नव्हता हे कबूल करायलाच हवं.
आज जगभर सगळीकडे स्थानिक भाषांत मिस्साविधी आणि इतर सर्व प्रार्थना होतात.
ख्रिस्ती लोक बहुसंख्य बसलेल्या श्रीरामपूरच्या नामवंत जर्मन हॉस्पिटल म्हणजे सेंट लुक हॉस्पिटलच्या परिसरापासून दोन किलोमीटर लांब पण शहराच्या मुख्य वस्तीत आमचं घर होतं.
मेनरोडपाशी सोनार लेनमध्ये आमचं `पारखे टेलर्स’ हे शहरात नावाजलेलं दुकान होतं. तेथून जवळच असलेल्या सोमैय्या हायस्कुलपाशी आम्ही राहायचो.
आमच्या चाळीत बहुधर्मिय आणि विविध जातींची घरं होती. आमच्या घराच्या भिंतीला लागून मुसलमान शेजार होता, त्यांच्या अगदी समोरसुद्धा एक मुसलमान घर होतं, आमच्या घराच्या दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंब होतं, त्यांच्याशेजारी आणखी एक मुसलमान कुटुंब होतं. समोरची चारपाच घरं माळी जातीच्या आणि एकमेकांचे नातेवाईक असलेल्या कुटुंबांची होती.
या साऱ्या घरांतील लोक पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी सामाईक नळावर अवलंबून असत. त्यावेळी तिथं गोल कुंकू लावलेल्या, कुंकवाची आडवी चीर लावलेल्या आणि अजिबात कुंकू नि कुठलेही सौभाग्यलेणं नसलेल्या बायांची गर्दी होई.
मात्र वेगवेगळे कुंकू असण्याचा किंवा अजिबात कुंकू नसण्याचा त्यांच्या आपापसांतील संभाषणांत काहीही फरक नसायचा.
या आमच्या माळी-मराठी आणि मुसलमान शेजाऱ्यांच्या आपापसांत नेहेमी भाजी-कालवणांची - अडीअडचणीच्या काळात गव्हाच्या-ज्वारी-बाजरीच्या पिठाचीही आठव्याच्या किंवा एखाद्या पातेल्याच्या मापात मोजून घेऊन देवाणघेवाण व्हायची.
जराशा अंतरावर असलेल्या दगडी इमारतीत आणि बैठ्या दगडी घरांत एकदोन ब्राह्मण घरं होती. त्या ब्राह्मण घरातला नातू माझ्याच वर्गातला आणि माझा जवळचा मित्र, तो आमच्या घरात यायचा, मीही त्याच्या घरात थेट आतपर्यंत जायचो,
मात्र त्याची सत्तरीतली आजी कायम सोवळ्यात असायची, आणि कुणाला तिच्याजवळ येऊ किंवा शिवू देत नसायची. माझ्या आईची तिची जाम गट्टी होती.
'' या,या मार्थाबाई, बसा घडीभर'' असं म्हणत ती माझ्या आईला आपल्या घरात घ्यायची,
भरपूर वेळ खूप गप्पाटप्पा व्हायच्या, मात्र सुरक्षित अंतर ठेवूनच. आम्हाला मात्र त्याचं कधीही वाईट वाटलं नाही. इतर कुणाही व्यक्तीला - अगदी मराठा आणि माळी जातीच्या लोकांनाही - त्या गणपुले आजी शिवत नसायच्या.
सगळा शेजारपाजार एकमेकांच्या घरांतील सुखदुःखाला म्हणजे लग्नकार्यांना, मयतीला हजर असायचा, त्यामुळे एकमेकांच्या रितीरिवाजांची आणि संस्कृतीची साधारण ओळख असायची.
शेजारच्या मुसलमान घरांतील लहान मुलांच्या सुंता कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं मला आजही आठवतं. नंतर थोडं मोठं झाल्यावर कळालं कि सुंता परंपरा यहुदी धर्मात होती आणि यहुदी असलेल्या येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या बाराही शिष्यांची साहजिकच सुंता झाली होती.
नव्या ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांमध्ये मात्र सुंता प्रथा न आणण्याचा निर्णय या विषयावर चर्चा होऊन अगदी सुरुवातीच्या काळातच घेतला गेला होता.
कालांतरानं लक्षात आलं कि धर्म आणि भाषा, संस्कृती, पेहराव आणि अगदी खाद्यपध्द्ती यांचा एकमेकांशी काही एक संबंध नसतो.
साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.
या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.
साठ आणि सत्तरच्या दशकांच्या पिढीपर्यंत देशातील धार्मिक ख्रिस्ती कुटुंबांत घरातलं एक तरी मुल फादर किंवा सिस्टर व्हावं अशी आईवडलांची अपेक्षा असायाची.
युरोपातून आणि अमेरिकेतून अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आणि नन्स मिशनरी होऊन भारतात, आफ्रिका खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आले त्याचं हे प्रमुख कारण होतं. ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या केरळ, गोवा आणि वसईसारख्या भागांतूनसुद्धा अनेक धर्मगुरु आणि नन्स देशाच्या कानाकोपऱ्यांत काम करत आहेत ते याच कारणामुळं.
कोणे एके काळी अशाच धार्मिक कॅथोलिक कुटुंबात जन्मलेले जॉर्ज फर्नांडिस मंगलोर येथील सेमिनरीत फादर होण्यासाठी दाखल झाले होते, मात्र नंतर त्यांचा विचार बदलला आणि मग ते समाजवादी विचारसरणीचे कामगार नेते बनले.
आमचे धार्मिक ख्रिस्ती कुटुंबसुद्धा यास अपवाद नव्हते. याचा परिणाम म्हणून मी स्वतः आजन्म ख्रिस्ती संन्याशी होण्याचा निर्णय घेतला. दहावीनंतर मी जेसुईट फादर होण्यासाठी घरकुटुंब सोडले.
दहावीनंतर श्रीरामपुरातले घर मी सोडेपर्यंत दोन गोष्टी माझ्या शरीराभोवती कायम असायच्या. त्यापैकी एक म्हणजे गळयाभोवती काळ्या दोरीने बांधलेला क्रूस. ख्रिस्ती असल्याची ही खूण अनेकदा इतरांना दिसेल अशा पद्धतीने शर्टाच्या कॉलरपाशी असायची.
दुसरी एक गोष्ट मात्र इतरांना कधीही दिसत नसायची. चारपाच दिवसांच्या दिवाळसणाचा फक्त शेवटचा दिवस आमच्या घरी साजरा व्हायचा, तो म्हणजे भाऊबीज. ``इडा पिडा टळो'' असं काहीसं म्हणत बाई दादांना आणि आम्हा सर्व मुलांना ओवाळायची, नंतर बहिणी आम्हा भावांना ओवाळायच्या आणि मग ओवाळणीच्या ताटात आम्हा सर्व पुरुषांना करदोटे मिळायचे.
आधल्या वर्षाचे करदोटे काढून मग ते नवे करदोटे कमरेभोवती गुंडाळायचे. करदोटेविना पुरुष म्हणजे षंढ असा त्याकाळी समज असायचा.
गोव्यात आल्यानंतर गळ्याभोवतीचाचा हा क्रूस आणि अंतवस्त्रापाशी असलेला करदोटा नक्की कधी आणि कसे गळून पडले हेसुद्धा आता आठवत नाही.
गोव्यात अर्थातच कॅथोलिक समाजात करदोटे बाळगण्याची प्रथा नाही आणि गळ्याभॊवती कुणी क्रॉससुद्धा बाळगत नाही.
हा, गोव्यात कॅथॉलिक व्यक्ती असल्याची ओळख करून देणारी एक दुसरी गोष्ट होती, ती म्हणजे उजव्या अंगठ्याच्या टोकापाशी गोंदलेली छोटीशी क्रुसाची चिन्ह. हिंदू पुरुषाचे दोन्ही कान टोचलेले असतात, तसे गोव्यात कॅथोलिक स्त्री-पुरुषाचे अंगठे क्रूसाचे चिह्नाने गोंदलेले असतात .
मात्र गोव्यात पदवीधर होण्याआधीच धर्मगुरू होण्याचे, आजन्म अविवाहित राहून धर्मसेवा आणि समाजसेवा करण्याचं ध्येय मी सोडलं आणि पत्रकारितेच्या व्यवसायात आलो.
जेसुईट संन्याशी होण्याचं बाळगलेलं स्वप्न सोडणं तितकं सहज नव्हतं. याकाळात प्रचंड मानसिक तणावातून गेलो, मात्र वर्षभराच्या काळात सावरलो आणि एका नव्या व्रताचा - पत्रकारितेच्या आणि कामगार चळवळीच्या - स्वीकार केला.
आज मागे वळून पाहताना एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे झालेले हे स्थित्यंतर अगदी सहजगत्या पार पडले असं वाटते.
आजन्म अविवाहीत धर्मगुरु राहण्याचे उद्दिष्ट सोडून मी गृहस्थाश्रम स्वीकारायला होता तरी तसा एकदा घेतलेला वसा पूर्णतः टाकून दिलेला नव्हता. नव्या अवतारातसुद्धा मूळचा पिंड कायम राहिला होता असे आज मागे वळून पाहताना जाणवते.

Sunday, June 30, 2024

केंद्रीय मंत्री

 आज खूप दीर्घ काळानंतर भारतात केंद्रीय मंत्री अशी काही चीज असते हे लक्षात आले.

गेल्या दशकभरात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही दोनच नावे सगळीकडे झळकत होती, अधूनमधून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत हे लक्षात यायचे.
रस्ते वाहतूक आणि टोल आकारणी संदर्भात नितीन गडकरी यांचे नाव निदान महाराष्ट्रात तरी लक्षात असते.
दोनअडीच वर्षांच्या त्या भीषण ऐन कोरोना काळात या देशाचे आरोग्यमंत्री आहेत का?, असल्यास कोण आहेत? अशी विचारणा अनेकदा झाल्याचे आपणा सर्वांना आठवत असेलच..
पुणे शहरात मेट्रोच्या विविध टप्प्यांचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान मोदीजी यांनी पुण्यात वारंवार येऊन किंवा त्यांना वेळ नसल्यास दिल्लीतूनच ऑनलाईन केले. काही टप्प्यांचे काम अजून सुरू आहे, त्यामुळे ते पुन्हा अजूनही येतीलच.
त्यामुळे देशात रेल्वेमंत्री किंवा रेल्वे राज्य मंत्री कोण आहेत याची पुण्यातल्या आणि देशातल्या लोकांना कल्पना असेल असे वाटत नाही.
श्रीरामपूरला शाळेत पाचवी-सहावीला असताना मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली, त्यामुळे काही राजकीय नेत्यांची नावे अणि त्यांनी देशात आणि महाराष्ट्रात सांभाळलेली मंत्रीपदे आजही तोंडपाठ आहेत.
उदाहरणार्थ, बांगलादेश निर्मितीप्रसंगी १९७१ साली परराष्ट्रमंत्री असलेले सरदार स्वर्णसिंग, आरोग्यमंत्री करण सिंग, अर्थमंत्री मधू दंडवते, परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी, नभोवाणी मंत्री लाल कृष्ण अडवानी, पहिले मनुष्यबळ संसाधन मंत्री पी. व्ही. नरसिंह राव, रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र, टी ए पै, जॉर्ज फर्नांडिस, नेहेमी काळा गॉगल वापरणारे गानी खान चौधरी, ममता बॅनर्जी आणि लालू प्रसाद यादव, संरक्षण मंत्री मुलायम यादव आणि शरद पवार, अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख, वगैरे वगैरे.
या केंद्रीय मंत्र्याची नावे आणि खाते लक्षात राहण्याचे कारण म्हणजे हे मंत्री खरेच त्यांच्या खात्याचा कारभार सांभाळायचे, त्यांच्या खात्याच्या कामासाठी देशभर हिंडायचे, त्यांचे फोटो आणि बातम्या देशभर वृत्तपत्रांत जाहिरातीत आणि इतरत्र झळकायचे.
त्यांच्या खात्याबाबत हे मंत्री पत्रकार परिषदा घेत असत, धोरणे ठरवत असत, निर्णयसुद्धा स्वतः घेत असत.
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या सहा महिन्यात पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते.
त्या काळात त्यांनी पुणे, शिवाजीनगर आणि चिंचवड रेल्वे स्थानकांचा केलेला कायापालट आजही नजरेसमोर दिसतो.
भारतीय लोकशाही व्यवस्थेत गेले दशकभर हे सर्व बंद झाले होते.
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला हे वाचून हे मंत्री नक्की होते तरी कोण याबाबत मला उत्सुकता वाटली आणि त्या तीन मंत्र्यांची नावे मला कळाली.
उत्सुकता असल्यास तुम्हीही ही तीन नावे शोधू शकता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा रामदास आठवले यांनी आपल्या खात्याशी निगडित असलेल्या कुठल्या कार्यक्रमाचे कधी उद्घाटन केल्याचे किंवा पत्रकार परिषद घेतल्याचे आठवते का?
जिथे राष्ट्राचे आणि संसदेचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपती यांचें पदसिध्द असलेले अधिकार आणि परदेशात देशाचे प्रतिनिधित्व वगैरे कामेसुद्धा त्यांना करु देली जात नाही, तिथे केंद्रीय किंवा राज्यमंत्री असलेल्या लोकांची काय अवस्था असेल?
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे कालपरवा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री असलेल्या जनता दल (सेक्युलर ) पक्षाच्या एच. डी. कुमारस्वामी यांचे त्यांच्या खात्याशी निगडित असलेले एक विधान वाचले.
आपण यासंदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊ ,असे त्यांचे ते विधान होते.
आज त्यांनी त्याबाबत सारवासारव केल्याची बातमी आहे.
बैलाला आणि रेड्याला औताला, जोत्याला जुंपण्याआधी ठराविक सोपस्कार करावे लागतात, ते बहुधा या नव्या राजवटीत अजून झालेले नसावे.
केंद्रात नव्या आघाडी सरकारच्या राजवटीत ते शक्य नसल्यास लोकशाही व्यवस्थेसाठी ती इष्टापत्ती म्हणावी लागेल.
Camil Parkhe.

Saturday, May 4, 2024

ख्रिस्ती मतदार
 अठरापगड जाती आणि जमातींचे समावेश असलेल्या ख्रिस्ती मतदारांचा महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत कुणाला कौल असणार आहे?

ख्रिस्ती समाजाचे राज्यात अधिकृत आणि अनधिकृत अशाप्रकारे तीन टक्क्यांच्या आसपास प्रमाण आहे.
भारतात सगळीकडे अगदी मुंबईपुण्यातसुद्धा धर्म, जात आणि पोटजात पाहून राजकीय पक्ष आपला उमेदवार देतात.
कारण मतदारसुद्धा त्याच पद्धतीने मतदान करतात.
महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विशेषतः विधानसभेत ख्रिस्ती समाजाचे एकगठ्ठा मतदान निर्णायक ठरु शकते याची तळागळावर काम असणाऱ्या राजकीय नेत्यांना माहिती असते.
याचा कधी तरी फटका बसला तर मग याची जाणीव होते.
एखादा उमेदवार थोड्याफार मतांच्या फरकाने पराभूत होतो अशावेळी मग एकगठ्ठा असलेल्या अशा मतदानामुळे ही किमया घडली हे कळते. असे मुंबईत एका प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अलीकडच्या काळात झाले होते.
त्यामुळें गाफील राहणे, कुठल्याही समजघटकाला दुर्लक्षित करणे धोकादायक ठरते.
इतर धर्मिय समाजाप्रमाणे निदान महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज एकसंघ, एक संस्कृतीचा किंवा एक भाषिक नाही. हे विशेषतः मुंबईपुण्यात जाणवते.
महाराष्ट्रात सर्वाधिक ख्रिस्ती मतदान आहे ते राज्याच्या राजधानीत.
मुंबईतल्या दोन लोकसभा मतदारसंघांत कुठलाही राजकीय पक्ष या समाजाला गृहीत धरू शकत नाही अशी तिथे परिस्थिती आहे. काटे की टक्कर असेल तर मग विचारूच नका.
मुंबईतला ख्रिस्ती मतदार हा पूर्णतः कॉस्मोपोलीटन आहे. मूळचे गोंयकार असलेले अनेक कॅथोलीक्स बांद्रा, चेंबूर, गोरेगाव वगैरे परीसरात मोठ्या संख्येने आहेत.
त्याशिवाय मूळचा दाक्षिणात्य असलेला ख्रिस्ती मतदार आहे,
त्याशिवाय संपूर्ण राज्यातून मुंबईत स्थायिक झालेल्या मराठी भाषक ख्रिस्ती समाज सुद्धा लक्षणीय आहे. भाषा, संस्कृती वगैरे कारणांमुळे या मराठी ख्रिस्ती लोकांचे वेगळेपण पटकन लक्षात येत नसते.
मुंबईत पाय रोवलेल्या या लोकांची नाळ आपल्या गावांकडे कायम असतेच. गावाकडच्या मतदानावरसुद्धा त्यांचा प्रभाव असतोच.
एकेकाळी म्हणजे सत्तरच्या दशकात मुंबईतून समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो विधानसभेवर निवडून येत असत.
त्याआधी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या काँग्रेसच्या स. का. पाटील यांना नंतर ' बंदसम्राट ' असे नाव कमावलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी चक्क लोकसभा निवडणुकीत हरवले होते !
डॉ लिऑन डिसोझा हे मुंबईचे केवळ महापौर नव्हते तर नंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री सुद्धा बनले.
शेजारच्या वसईतून एखादे गोन्सालवीस किंवा इतर कुणी आमदार म्हणून निवडून येत असत.
मुंबईच्या सेलीन डिसिल्वा या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८३-८४) आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या मंत्रिमंडळात (१९८५) राज्यमंत्री होत्या.
या समाजाच्या प्रतिनिधीला त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही.
.
कोकणात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या परिसरात फर्नांडिस, डिसोझा, डान्टेस, अशी नावे असणारी मूळची गोंयकार असलेली मंडळी लक्षणीय संख्येने आहेत.
गेल्या दोनतीन शतकात पोर्तुगीजांच्या गोव्यातून इथे हे कॅथोलिक लोक स्थायिक झालेत. त्यांना दुर्लक्षित करून कुठल्याही पक्षाला, उमेदवाराला विजयी होता येत नसते.
इथे एखादा कॅथोलीक उमेदवार सोशल इंजियरींगच्या आधारावर विधानसभेवर निवडून येऊ शकतो.
मुंबई आणि वसईनंतर ख्रिस्ती मतदानाचा सर्वाधिक टक्का आहे तो पुण्यात.
पूर्वी बारामती मतदारसंघात असलेले पिंपरी चिंचवड शहर आता मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी चिंचवड शहरात कॉस्मोपोलिटन ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व लगेच जाणवते. तिथले कॉलेज आणि इतर शिक्षणसंस्था या ख्रिस्ती समाजाची ओळख आहे.
अहमदनगर, नाशिक जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा येथे ख्रिस्ती समाज आपली खास ओळख राखून आहे. हा समाज तिथल्या मातीतला आहे, त्यामुळे आपल्या पाठीशी कोण राजकारणी उभा राहतो हे हा समाज पुरता ओळखून आहे.
संकटाच्या वेळी आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्ते या समाजाच्या पाठीशी असतात हे अनेकदा दिसून आले आहे. याचे कारण हा समाज आंबेडकरवाद्यांना परका मुळीच नाही. रक्ताचे आणि नात्यातले संबंध आहेत त्यांचे.
हे लोक ख्रिस्ती असल्याने भाजप आणि पूर्ण परिवार त्यांच्याकडे नेहेमीच संशयाने पाहत असतो हे साहजिकच.
तर मग या ख्रिस्ती मतदारांचा नैसर्गिक ओढा कुठल्या राजकीय पक्षांकडे असतो?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष ख्रिस्ती समाजाला गृहीत धरून असतात..
"तुम्ही जाऊन, जाऊन जाणार कुठे ? "असा मग्रुरीचा भाव.
पण खरेच तसे आहे काय?
एक सांगतो.
विसेक वर्षांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेत मागच्या वेळी एक ख्रिस्ती नगरसेविका निवडून आली होती. अश्विनी डॅनिएल लांडगे हे त्यांचे नाव.
त्यांना हैदराबादच्या ओवेसी यांच्या पक्षाने उमेदवारी दिली होती. `एमआयएम'च्या त्या एकमेव नगरसेविका होत्या.
अशाप्रकारे आज कुठला राजकीय पक्ष ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करू शकेल?
यावेळी या राजकीय फाटाफुटीच्या काळात ख्रिस्ती मतदार कुणाच्या तागडीत आपला कौल टाकणार आहेत?
काही अंदाज?
यापुढील काही पोस्ट्समध्ये याविषयी सविस्तर लिहिणार आहे....
****
फोटो ओळी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांची भेट घेऊन त्यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे. अंतोन कदम
यावेळी हजर होते.
Camil Parkhe



 भारताच्या इतिहासात दादाभाई नौरोजी हे पहिले लोकप्रतिनिधी.

एकोणिसाव्या शतकात भारतात ब्रिटिशांची सत्ता आल्यावर देशात पहिल्यांदाच कायद्याचे आणि समानतेचे राज्य आले. ब्रिटिश सरकारने दादाभाई नौरोजी यांची ब्रिटिश संसदेवर भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली.
या ब्रिटिश संसदेचे भारताचे पहिले आणि शेवटचे प्रतिनिधी नौरोजी होते, कारण त्यानंतर भारतात स्थानिक म्हणजे प्रांतिक सरकारे स्थापन होत गेली.
(अर्थात पोर्तुगिज इंडियातील अनेक गोमंतकीय दादाभाई नौरोजी यांच्या खूप आधीच पोर्तुगीज संसदेचे सभासद होते. आताचे पोर्तुगालचे पंतप्रधान अंटोनियो कोस्टा मूळचे गोंयकार आहेत.)
भारतीयांचे ब्रिटिश संसदेवर प्रतिनिधी असलेले दादाभाई नौरोजी हे होते पारशी.
मुंबईच्या समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण यावर त्यावेळी पारशी समाजाचा मोठा प्रभाव होता.
फिरोजशाह मेहता वगैरे काही नावे सांगता येतील.
हे फार पूर्वीच्या काळातले.
मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या स. का. पाटील यांचा कामगार नेते, समाजवादी पक्षाच्या जॉर्ज फर्नाडिस यांनी १९६७च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला.
जॉर्ज फर्नांडिस हे जन्माने ( माझ्यासारखेच !) रोमन कॅथोलिक, मुळचे मंगलोरीयन होते तरी ते मुंबईतून मोठ्या मताने निवडून आले.
आणीबाणीच्या याकाळात तुरुंगातून आणि नंतर अनेकदा ते बिहार येथील मुझ्झफरनगर येथून लोकसभेवर निवडून गेले.
हिच गोष्ट समाजवादी नेते मधू लिमये यांची.
गांधी-नेहरु कुटुंबातील लोकांना जात, धर्म, भाषा किंवा राज्य या चौकटीत बंदिस्त करता येत नाही असे म्हणतात.
विशेषतः आजच्या पिढीतील राहुल आणि वरुण गांधी यांना. कुणाची जात आणि कुणाचा धर्म ते लावणार?
रायबरेलीतील आणि उत्तर भारतातील पराभवानंतर इंदिरा गांधी `अम्मा' कर्नाटकातील चिकमंगळूर येथील निवडून आल्या होत्या.
नंतर सोनिया गांधी सुद्धा.

वरील प्रकरणांत नेत्यांच्या जात, धर्म, लिंग, भाषा किंवा राज्य या गोष्टी बेदखल ठरल्या असे दिसते.
मात्र सर्वसाधारण चित्र कसे असते ?
आपण मतदान कुणाला, कशाच्या आधारावर करतो?
जात, पोटजात, लिंग, धर्म, भाषा कि विचारसरणीच्या आधारावर?
लोकशाही प्रक्रियेत पक्षाचे उमेदवार ठरवताना किंवा मतदार मत देताना जात, धर्म, लिंग आणि भाषा खरेच बेदखल असतात काय?
महाराष्ट्रातील अनेक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांतील प्रतिनिधी अशाप्रकारे विशिष्ट जातीजमातीचे असतात.
या ठिकाणी दुसऱ्या धर्माच्या किंवा जातीच्या उमेदवाराला पक्षाचे तिकीट दिले जात नाही, आणि मतदारसुद्धा त्यांना निवडून देत नसतात.
राज्यातील अनेक मतदारसंघात समाजातील वरच्या जातींच्या, मध्यम स्तरावरच्या जातींच्या, आदिवासींची, अनुसूचित जाती आणि जमातींचीच्या संख्या अधिक असते.
धुळे, बारामती, चंद्रपूर, नागपूर, बीड, पुणे, हातकणंगले, ही त्यापैकी काही वानगीदाखल नावे.
तेथे पूर्वापारपासून त्याच जातींतील आणि जमातीतील उमेदवारांना राजकीय पक्षांचे तिकीट मिळते आणि मतदार त्यांनाच निवडत असतात.
या मतदारसंघांत परधर्मीय उमेदवार कधीही निवडणूक लढणार नाहीत.
त्यासाठी अल्पसंख्य समाज मोठया संख्येने असलेल्या आणि अशाप्रकारे सुरक्षित असलेल्या मतदारसंघांत त्यांना निवडणूक लढावी लागते. .

याच कारणामुळे मूळचे कोकणातले असलेल्या माजी मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांनी औरंगाबाद येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती.
मात्र त्यामुळे आयतेच ध्रुवीकरण झाल्याने त्यांचा पराभव झालाच.
हल्ली उघडउघड धर्माच्या नावाखाली मते मागितली जात असली तरी त्याअंतर्गत जातीजमातीचे कप्पे असतातच.
त्यामुळे अमुकअमुक नेता हा अमुकअमुक जातीचा, अमुकअमुक जमातीचा नेता असे उघडपणे म्हटले जाते,
त्या नेत्यांनासुद्धा या बाबीचा अभिमानच वाटत असतो.
त्यामुळेच इतर पक्षातील नेतेसुद्धा या नेत्यांनीं आपल्या पक्षात येऊन अमुकअमुक मतदारसंघांत निवडणूक लढावी असे उघडउघड आवाहनही केले जाते.
असेच चित्र देशपातळीवर - उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, आणि पूर्वेपासून पश्चिम राज्यांत दिसते.
जातनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष निवडणुका होण्यासाठी आपल्याला प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Camil Parkhe,