Showing posts with label Lal Krishna Advani. Show all posts
Showing posts with label Lal Krishna Advani. Show all posts

Tuesday, November 22, 2022

  मोरबी दुर्घटना विकासाचं `गुजरात मॉडेल'

सन 2004 ची ही गोष्ट आहे. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने आपली आपली मुदत पूर्ण करण्यास काही महिन्यांचाच कालावधी उरला होता. देशात भाजप नेतृत्वाच्या केंद्र सरकारसमोर आव्हान उभे करील अशी आता कुठलीही गंभीर समस्या राहिलेली नाही नव्हती असं चित्र होतं. भाजप नेतृत्वाचे एनडीए सरकार आपली मुदत पूर्ण करत असताना देशात `फिल गुड ' वातावरण आहे हे लाल कृष्ण अडवाणी यांचे त्यावेळचे एक प्रसिद्ध वाक्य.

तेव्हा खरंच तशीच परिस्थिती होती हे मान्य करायलाच हवं. सरकारविरुद्ध कसलाच असंतोष नव्हता, निदान कुठल्याही विरोधी पक्षानं किंवा संघटनेनं याबाबत रान उठवलं नव्हतं.
`शायनिंग इंडिया' असं त्याकाळच्या भारताचं दुसरं एक वर्णन केलं जात होतं.
देशात पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला याहून अधिक दुसरी सुवर्णसंधी कुठली होती?
निदान त्या वेळचे या पक्षाचे चाणक्य असलेल्या प्रमोद महाजन आणि लाल कृष्ण अडवाणी यांनीं तरी असा विचार केला होता.
झालं. भारतीय जनता पक्षानं तेराव्या संसदेची मुदत पूर्णतः संपण्याआधी निवडणूक घेण्याचं ठरवलं.
याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या गंभीर आजाराचं निदान झालं आणि ते निवडणुकीच्या प्रचारकामात भाग घेऊ शकणार नाही हे उघड झालं. त्यामुळं भाजपच्या गोटात तर 'आता आपल्याला मोकळं मैदान मिळणार आहे' याची खात्रीच झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, आर आर पाटील वगैरे नेत्यांनी मात्र प्रचाराची खिंड लढवली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार रिंगणात उतरले, एकदोन भाषणं केली आणि निवडणुकीचा प्रचार संपला.
मात्र यादरम्यान देशात एक घटना घडली होती.
उत्तर प्रदेशात लखनौ शहरात भाजपच्या राज्यपातळीवरच्या नेत्याच्या वाढदिवसांच्या कार्यक्रमात एक दुःखद घटना घडली होती. वाढदिवसानिमित्त तिथं महिलांना फुकट साड्या दिल्या जात होत्या. त्यावेळी महिला मोठ्या संख्येने आल्याने साड्या मिळवण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली होती.
आयोजकांना गर्दी आवरणे मुश्किल झालं आणि चेंगराचेंगरीत बावीस महिलांचा मृत्यु झाला होता !
दुसऱ्या दिवशी देशभरातल्या वृत्तपत्रांत साडी मिळवण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरीत बावीस गरीब महिलांचा मृत्यु ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली.
या घटनेवर पडदा ओढण्याचा, सावरासावर करण्याचा प्रयत्न केंद्रातील सत्ताधारी भाजपने केला.
मात्र हेच का ते `फिल गुड वातावरण' ? हाच तो `शायनिंग इंडिया' असा प्रश्न चेंगराचेंगरीत त्या गरीब बायांचा झालेल्या मृत्यूनं निर्माण केला होता.
त्या २००४च्या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षानं सत्ताधारी भाजपपेक्षा लोकसभेच्या अधिक जागा मिळवल्या आणि सर्वांनाच - काँग्रेस पक्षालासुद्धा - धक्का बसला. डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान बनले. पुढच्या २००९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षांने तर २००४ पेक्षा अधिक जागा जिंकल्या.
देशातील `फिल गुड' वातावरण आणि `शायनिंग इंडिया'चा फुगा लखनौत चेंगराचेंगरीत बाविस महिलांचा झालेल्या मृत्यूच्या दुर्घटनेनं फोडला होता.
अलीकडेच गुजरातमध्ये मोरबी येथे जुन्या पुलाची डागडुजी करुन उद्घाटन झाल्याझाल्या तो पूल कोसळून १३५ लोकांचा मृत्यु झाला आहे.
या घटनेनं संपूर्ण भारतात आणि गुजरातमध्येसुद्धा उभं केलेलं विकासाचं `गुजरात मॉडेल' पार कोसळलं आहे.
सत्ताधारी भाजपच्या दुदैवानं गुजरातच्या निवडणुकीच्या अगदी तोंडावर ही दुर्घटना घडली आहे. डॅमेज कंट्रोलसाठी पक्षाच्या रथी, अतिरथी, महारथींना पुढे सरसावणे भाग पडले आहे.
मात्र प्रसारमाध्यमांनी या प्रकरणावर खूपच सारवासारवी केल्याचं, पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसतं. विशेष म्हणजे आज राष्ट्रीय पत्रकार दिन आहे असं वाचलं.
`नवा पूल कोसळून १२० लोक ठार' असा एका इंग्रजी दैनिकानं त्यादिवशी बातमीचा मथळा केला होता तर आघाडीच्या एका मराठी दैनिकानं परिच्छेदाच्या पाचव्यासहाव्या वाक्यात 'हा पूल पाच दिवसापुर्वी खुला करण्यात आला होता असं म्हटलं होतं !
`भारत जोडो' यात्रेप्रमाणेच प्रसारमाध्यमांनी या मोरबी घटनेकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं असलं तरी गुजरात उच्च न्यायालयानं या घटनेची `सु मोटु' (Su Mottu) दखल घेतली आहे.
खूप खूप काळानंतर देशातील न्यायालयानं एखाद्या मोठ्या धटनेची अशी `सु मोटु' म्हणजे स्वतःहून दखल घेतली आहे हा एक मोठा सुखद धक्का आहे हे निश्चित.
मुंबईच्या गोव्यातल्या पणजी आणि नंतर औरंगाबाद इथल्या खंडपीठात मी क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर म्हणून काम केले आहे, त्याकाळात न्यायालय अशा अनेक छोट्यामोठ्या घटनांची `सु मोटु', स्वतःहून दाखल घेत असत.
एखाद्या निनावी पत्राच्या आधारे, वृत्तपत्रांत आलेल्या छोट्यामोठ्या बातमीच्या आधारे न्यायाधीश सु मोटु, (Su Mottu) स्वतःहून दाखल घेत आपल्या न्यायालयात सुनावणी सुरु करत असत.
Su Mottu case म्हणजे एक मोठी बातमी, आम्ही बातमीदार मंडळी अशा प्रकरणांची लगेच दाखल घ्यायचो.
अशा घटनांचे वकीलपत्र घेण्यासाठी अमिकस क्युरी (Amicus Curiae – friend of the court) म्हणून एखाद्या वकिलाची नेमणूक करत असत. देशाचे मुख्य न्यायाधीश पी एन भगवती यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुरु करण्याच्या खूप आधी सु मोटु हा प्रकार जनताभुमिख मनाला जायचा.
मोरबी दुर्घटनेचा गुजरात निवडणुकीच्या निकालावर किंवा इतर आगामी निवडणुकांवर परिणाम होईल कि नाही हे आता सांगणं अर्थातच अवघड आहे.

Camil Parkhe

Tuesday, October 25, 2022

 लाल कृष्ण अडवाणी यांची रथयात्रा आठवते ?

काही घटना, काही प्रसंग काळजात एकदम धडकी निर्माण करतात.

एकेकाळी साध्वी ऋतंबरा आणि साध्वी उमा भारती ही दोन नावं त्यांच्या भाषणांसाठी खूप गाजत असत. काळ ऐंशीच्या दशकाचा शेवट. भारतीय जनता पक्षानं त्यावेळी अयोध्यातल्या बाबरी मशिदचा प्रश्न आणि तिथं राम मंदिर उभारण्याचा विषय लावून धरला होता. साध्वी ऋतंबरांची हिंदीतली भाषणं देशात ठिकठिकाणी आवश्यक ती वातावरण निर्मिती करण्यासाठी आयोजित केली जात होती. काही ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या कॅसेट्स जमलेल्या लोकांसमोर ऐकवल्या जात असत.
साध्वी ऋतंबरा यांचं असंच एक भाषण मी ऎकलं. कुठं ते आता नक्की आठवत नाही, पण या साध्वी खुर्चीवर बसून भाषण देत होत्या हे नक्की आठवतं.

त्या उत्कृष्ठ वक्त्या होत्या याबाबत वादच नव्हता. साध्वी जे काही बोलायच्या ते समोरच्या लोकांच्या , त्यांच्या चाहत्या लोकांच्या मनाला भिडायचे. मात्र त्यांच्या भाषणातला बराचसा अंश हा अल्पसंख्य लोकांविरुद्ध असायचा आणि ही भाषण त्यांच्या मनात धडकी, भीती आणि असुरक्षितता निर्माण करील असंच होती.
भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे सरचिटणिस असलेले प्रमोद महाजन यांनी अडवाणी यांच्या या `रथयात्रे'चे सारथ्य केले होते. (वरच्या फोटोत काळ्या गॉगलवाले). त्या काळात म्हणजे सद्याचं हे नव राजकीय युग सुरु होण्याआधी काँग्रेस आणि हो, भारतीय जनता पक्षातसुद्धा, सरचिटणिस हे एक अत्यंत महत्त्वाचे, प्रतिष्ठेचं पद असायचे. या दोन्ही पक्षांत दहाबारा सरचिटणीस असायचे, त्यामध्ये संघटन सरचिटणीस अशी काही पदे अति महत्त्वाची असायची.

राष्ट्रीय पक्षांच्या विविध सरचिटणिसांच्या मुलाखती प्रसिद्ध व्हायच्या, पक्षाचे हे सरचिटणीस आणि प्रभारी आपापल्या पक्षांच्या भूमिका मांडत असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षात पहिल्यांदा प्रतिनियुक्ती झाली तेव्हा त्यांनाही असंच एक पद देण्यात आलं होतं.

आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील एखाद्या सरचिटणीसाचं साधं नाव आठवतं का पहा...!! असो.

कॅथोलिक धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप हे व्हॅटिकन सिटीतल्या सेंट पिटर्स स्केअरमध्ये जमलेल्या भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी एका खास डिझाईन केलेल्या उघड्या वाहनातून फिरत असतात. अशाच एका प्रसंगी पोप जॉन पॉल यांच्यावर १९८१ साली गोळ्या झाडल्या गेल्या, तेव्हापासून `पोपमोबाईल' नावाने ओळखले जाणारे वाहन बुलेटप्रुफ पोप यांच्यासाठी वापरण्यात जातं.

या जीवघेण्या हल्ल्यातून वाचलेले पोप जॉन पॉल १९८६ साली भारत भेटीवर आले तेव्हा गोव्यात मिरामार समुद्रकिनारी कंपाल ग्राउंडवर `पोपमोबाईल'मधून फिरताना त्यांना मी अगदी जवळून पाहिलं तेव्हा मी इंग्रजी दैनिक `द नवहिंद टाइम्स'चा क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. बारा दिवसांच्या पोप यांच्या या भारत दौऱ्यात कार्यक्रमानुसार दोन `पोपमोबाईल' देशात तैनात ठेवण्यात आल्या होत्या.

त्यानंतर शाह रुख खान वगैरे बॉलीवूड नट आपल्यासाठी विविध सुविधा असणाऱ्या अशी खास डिझाईन केलेली वाहने आऊटडोअर शूटिंग दरम्यान वापरू लागले.

तर अशाच धर्तीवर लाल कृष्ण अडवाणी यांच्या या रथयात्रेसाठी खास `रथा'ची निर्मिती करण्यात आली होती. अशा प्रकारचं खास डिझाईन केलेलं हे तसं भारतीय लोकांसमोर मोठ्या प्रमाणात येणारं भारतातल हे पहिलं वाहन. त्यामुळे या रथात काय सुविधा आहेत याविषयी अनेक राष्ट्रीय आणि राज्य प्रादेशिक थरावरच्या दैनिकांत रसभरीत वर्णनं छापून येत होती. `टिआरपी' हा शब्द त्यावेळी रुढ झालेला नव्हता पण दृश्यं आणि छापील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या `रथयात्रे'ला खूप प्रसिद्धी देत होती.

अनेक दैनिकांनी ही रथ यात्रा कव्हर करण्यासाठी आपले वार्ताहर नेमले होते.

पुण्यात ही रथ यात्रा आली तेव्हा अडवाणी यांची शनिवारवाडयासमोर जाहीर सभा झाली, त्यावेळी मी तिथं हजर होतो. अडवाणी यांचं भाषणसुद्धा असंच काहींच्या अंगांवर रोमांच निर्माण करणारं आणि काहींच्या काळजांत धडकी निर्माण करणारं होतं.
ही रथ यात्रा गायपट्ट्यात पोहोचली तेव्हा तेथील काही समाजघटकांच्या मनात प्रचंड भीती, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती तर त्याचवेळी देशभर दुसऱ्या बाजूनं प्रचंड उन्माद तयार होत होता.

आता पुढे काय होणार, रथ यात्रा आपल्या इच्छित स्थळी पोहोचणार काय आणि तिथं काय होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात होता.

त्यावेळी उत्तर प्रदेशात नुकतेच दिवंगत झालेले मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री होते तर त्यांचे समाजवादी साथी लालू प्रसाद यादव बिहारमध्ये मुख्यमंत्री होते.
ही रथ यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश करण्याआधी बिहारच्या सीमेवर असतानाच लालुजींनी या रथाची चाके थांबवली.
मुलायम सिंग यादव यांनीं याबद्दल लालू प्रसाद यादव यांना शेवटपर्यंत माफ केलेलं नसावं.
या रथ यात्रेची पुढे झालेली फलश्रुतीसुद्धा सर्वांना माहिती आहेच.
या रथ यात्रेत काय पेरलं गेलं होतं हे सांगायची आता गरज नाही.
त्याकाळी पेरलेलं आता देशात ठिकठिकाणी उगवलेलं आणि त्या रोपां-झाडांना बरीच फळंसुद्धा लगडलेली दिसतात.
त्यानंतर अनेक वर्षांनंतर आता राहुल गांधी यांची देशपातळीवरची `भारत जोडो' यात्रा चालू आहे.

राहुल गांधी यांच्या `भारत जोडो' कार्यक्रमाने सत्ताधारी पक्षाच्या तंबूत धडकी भरवली आहे, तसेच देशभर विविध राजकीय पक्षांच्या लोकांना, समर्थकांना राहुलने आकर्षित केले आहे. त्यामुळे `भारत जोडो' यात्रेकडं सरळसरळ दुर्लक्ष करायचं असा फतवा देशभरातील इंग्रजी, मराठी आणि इतर भाषांतील दैनिकांच्या आणि वाहिन्यांच्या मालकांनीं काढलेला दिसतो !
अडवाणी यांची `रथ यात्रा' आणि राहुल गांधी यांची `भारत जोडो' यात्रा या दोन्हींमध्ये अनेक दृष्टींनीं आणि अनेक बाबतींत जमीन अस्मानाचा फरक आहे हे स्पष्ट जाणवतं.
कदाचित `भारत जोडो' या यात्रेची देशासाठी फळंही वेगळी, मधुर असणार आहेत.

Wednesday, April 27, 2022

दौरे आणि चळवळ समाजजागृतीसाठी आवश्यक

मी लहानपणी श्रीरामपूरला शाळॆत शिकत असताना समाजवादी कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांनी महाराष्ट्रभर एक दौरा काढल्याचे आजही आठवते. दौऱ्याचे आयोजन एका विशेष कारणासाठी केले होते. राज्यातील किती गावांत विविध समाजघटकांसाठी - स्पष्टच लिहायचे झाल्यास विविध जातीजमातींसाठी - पिण्याच्या पाण्यासाठी किती आणि कशाप्रकारच्या सामायिक विहिरी आणि इतर सुविधा आहेत हे पाहण्यासाठी डॉ आढाव यांनी हा संशोधनदौरा हाती घेतला होता. यानंतर कुठल्याशा दैनिकात कि इतर नियतकालिकांत याविषयी डॉ बाबा आढाव यांनी 'एक गाव, एक पाणवठा' या शिर्षकाची एक लेखमालिका लिहिली. नंतर ही लेखमालिका पुस्तकरुपातही प्रसिद्ध झाली. ही घटना आहे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीची.

डॉ बाबा आढाव यांच्या या 'एक गाव, एक पाणवठा' संशोधनदौऱ्यात महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा सामायिक आहे कि नाही याबाबतचे वास्तव लोकांच्या समोर आले.
त्यानंतर शांतीलाल मुथ्था यांनी सामुदायिक विवाहासाठी असेच दौरे आणि चळवळ सुरु केली होती. काही समाजांत लग्नासाठी आणि हुंड्यासाठी मुलीच्या कुटुंबाच्या ऐपतीबाहेर खर्च करण्यासाठी प्रचंड दबाब येतो, त्यावर सामुदायिक विवाह हा एक प्रभावी उपाय आहे असे मुथ्था यांचे म्हणणे होते.

याच हेतूने त्यांनी १९८९साली महाराष्ट्राच्या काही भागांत म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या प्रदेशांतील विविध शहरांत आणि गावांत सामुदायिक विवाहास उत्तेजन देण्यासाठी पदयात्रा काढली. यादरम्यान गोव्यातील माझे वास्तव्य आटोपून मी महाराष्ट्रात परतलो होतो, तेव्हा या पदयात्रेचे ठिकठिकाणी अगदी उत्साहाने स्वागत होत असल्याचे वृत्तपत्रांच्या बातम्यांतून दिसून येत होते. या दौऱ्यामुळेच शांतिलाल मुथ्था यांना मग `सामुदायिक विवाहाचे प्रणेते' ही एक उपाधी चिकटली.
मुथ्था यांच्या प्रेरणेने नंतर अनेक जाती आणि जमातींमधील आणि धर्मांतील नेत्यांनी मग आपापल्या समाजांसाठी सामुदायिक विवाहसोहोळे आयोजित सुरु केले
काँग्रेसचे मुंबईतील खासदार आणि चित्रपट अभिनेते सुनिल दत्त यांनी मुंबई ते पंजाबमधील अमृतसर येथपर्यंत १९८७ साली काढलेली शांती पदयात्रा अशीच त्यामागच्या उद्दात्त हेतूने गाजली. अमृतसर येथील सुवर्णमंदिरातले अतिरेकी बाहेर काढण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टार लष्करी कारवाईनंतर सुद्धा पंजाबमधले स्थिती पूर्वपदावर आलेली नव्हती.
पंजाबमधली ही स्थिती बदलून तेथे शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि दुःखी शीख समाजाच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी ही अडिचहजारहून अधिक किलोमिटर्सची पदयात्रा सुनिल दत्त यांनी सुरु केली होती. एकूण ७८ दिवस चाललेल्या या पदयात्रेत सुनिल दत्त यांच्या सोबत त्यांची मुलगी प्रिया दत्त याही होत्या.

समाजसेवक बाबा आमटे यांनी ऐंशीच्या दशकात ''भारत जोडो'' या नावाने देशभरचा दौरा सुरु केला होता. पणजी येथे `नवहिंद टाइम्स'चा बातमीदार म्हणून बाबा आमटे यांचा हा गोवा दौरा मी कव्हर केला होता, त्यावेळेस वृद्धत्त्वाकडे झुकलेले बाबा आमटे मणक्याच्या दुखण्याने त्रस्त होते तरीसुद्धा त्यांनी हा दौरा हाती घेतला होता हे विशेष होते.
जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी १९८३ साली केलेली कन्याकुमारी ते दिल्ली पदयात्रा अशीच खूप गाजली. `भारत यात्रा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पदयात्रेने चंद्रशेखर यांना देशभर एक नवी, स्वतंत्र ओळख मिळवून दिली.
भारतीय जनता पक्षाच्या लाल कृष्ण अडवाणी यांच्या देशभरच्या रथ यात्रेने तर देशाचा इतिहास घडवला हे कोण नाकारू शकेल?
काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना इतर पक्षांच्या मदतीने पदच्युत करुन शरद पवार मुख्यमंत्री बनले पण हे पद अल्पकाळाचे ठरले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आल्यानंतर आणि काँग्रेसचे सरकार आल्यावर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (समाजवादी) पक्षाचे नेते म्हणून शरद पवार स्वस्थ बसले नव्हते. त्याकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता, अगदी कब्बडीच्या स्पर्धा आयोजनातसुद्धा ते मागे राहिले नव्हते असे म्हणतात. शरद पवार यांच्या अशा या कष्टांचे फळ आणि परीणाम आपण सर्व जण आज पाहत आहोतच.
आजकाल मात्र असे दीर्घ परीश्रम आणि कष्टांचे दौरे राजकीय नेत्यांना सोसवत नाहीत असे दिसते. त्यामुळेच केवळ एखादया केंद्रस्थानी वा प्रकाशझोतात आलेल्या क्षेत्राला भोज्याप्रमाणे (भोंगा नव्हे ! ) भेट देऊन त्याद्वारे दीर्घकालीन दौऱ्याचे पुण्य आणि श्रेय उपटण्याचे मार्ग पत्करावे लागत आहेत.
अर्थात एव्हढ्या शॉर्टकटने जर त्यांचा अपेक्षित कार्यभाग उरकत असेल तर इतरांचीही त्याबद्दल हरकत नसावी.