Showing posts with label Lenin. Show all posts
Showing posts with label Lenin. Show all posts

Saturday, February 24, 2024

 सोव्हिएत रशिया


Chernobel, ``आता आपण हिमालय पर्वतरांगांच्या वरुन अमुकअमुक हजार मिटर्स उंचावरुन जात आहोत '' अशी आमच्या एरोफ्लोट विमानाच्या स्पिकरवर ती रशियन, इंग्लिश, हिंदी आणि इतर काही भाषांतून केली जाणारी घोषणा ऐकली आणि नजर आपसूक विमानाच्या खिडकीतून खालच्या दिशेने वळाली.

आमच्या विमानाने मॉस्कोच्या दिशेने जाण्यासाठी रात्री दोनला दिल्ली विमानतळावरुन उड्डाण केले होते आणि काही वेळाने ही घोषणा झाली होती. विमानातून हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत नव्हत्या, मात्र आपण या उंच पर्वतांच्या जवळ आहोत ही भावना सुखावत होती. काही तासांनंतर विमान जमिनीच्या दिशेने उतरु लागले तेव्हा बाहेर अगदी अंधुक दिसत होते.
विमान जमिनीवर उतरले तेव्हाच ती घोषणा झाली: ''आपणास कळविण्यास खेद होत आहे की आज मॉस्को शहरातील तापमान नेहेमीपेक्षा खूपच खाली गेले आहे. विमानाबाहेर यावेळेस उणे १२ डिग्री सेल्शियस तापमान असून बर्फवृष्टी होत आहे. प्रवाशांनी विमानतळाबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी.''
''बाप रे, उणे १२ तापमान, म्हणजे किती थंडी असेल?'' आम्ही पत्रकार आपापसांत चर्चा करु लागलो.
मार्च महिन्यात मॉस्को शहरात खरे तर इतके कमी तापमान सहसा नसते, त्यामुळे आज असाधारणरित्या तापमान खाली उतरुन बर्फवृष्टी होत आहे, असे कळाले. आम्ही मात्र इतके कमी तापमान आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अगदी उत्सुक झालो होतो.
ही घटना आहे मार्च १९८६ची. युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रशिया (यूएसएसआर ) ची राजधानी असलेल्या मॉस्कोत आम्ही भारतीय पत्रकार आलो होतो. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपातील अनेक राष्ट्रांत त्यावेळी म्हणजे शीतयुद्धाच्या काळात भारतातील पत्रकारांसाठी विविध दौरे, अभ्यासक्रम आयोजित केले जात असत. रशियाच्या पूर्ण प्रभावाखाली असलेल्या म्हणजे वॉर्सा पॅक्टअंतर्गत (नाटो पॅक्टच्या अगदी उलट) साम्यवादी राष्ट्रांनी किती प्रगती साधली आहे हे दाखवण्याचा या दौऱ्यांचा अंतःस्थ हेतू असायचा हे उघड गुपित होते.
मॉस्को शहरात असताना त्या दिवसांत सोव्हिएत रशियातल्या साम्यवादी वातावरणाची पहिल्यांदा ओळख झाली. पुढील काही महिने असेच वातावरण वेगवेगळ्या स्वरुपांत दिसणार होते. त्या कडाक्याच्या थंडीत दिडेक किलोमीटर लांब असलेल्या रांगेत उभे राहिल्यानंतर भुयारी स्मारकात गेल्यावर तिथे काचेच्या पेटीत थ्री-पिस सूटमध्ये असलेल्या कॉम्रेड ब्लादिमीर लेनिनचे दर्शन घडले. स्मारकाबाहेर त्या जगप्रसिद्ध रेड स्केअर मध्ये आणि क्रेमलिनमध्ये कार्ल मार्क्स, फ्रेड्रिक्स एंजल्स, लेनिन, जोसेफ स्टॅलिन यांचे भव्य पुतळे पाहिले.
मॉस्कोत बसने फिरत असताना एका चौकात नुकतेच हौतात्म्य प्राप्त झालेल्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळाही पाहिला. इंदिरा गांधीं यांच्याशिवाय हिंदी चित्रपट अभिनेते राज कपूर यांचे नाव आणि त्यांच्या चित्रपटातील गाणी रशियात बहुपरिचित होते याचा सुखद अनुभवही आला.
मॉस्कोत क्रेमलीनमध्ये फिरत असताना त्यावेळच्या सोव्हिएत रशियाचे प्रमुख म्हणजे रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निवासस्थान आम्हा पत्रकारांना लांबूनही दाखवण्यात आले नाही हे त्याचवेळी लक्षात आले.
आम्हाला सोव्हिएत रशियाची, तेथल्या स्मारकांची आणि मॉस्को शहराची माहिती देताना आमचे अनुवादक आणि गाईड पोपटपंची करत आहेत, नेहेमीची तोंडपाठ केलेली माहिती ते सांगत आहेत हेसुद्धा जाणवत होते.
ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी वर्णिलेल्या आर्यन कर्टन किंवा पोलादी पडदा काय असू शकेल याची ही अर्थांत केवळ झलक होती
गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत रशियाचे प्रमुख म्हणून नुकतीच सूत्रे घेतली होती, मात्र त्यांचे ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका या राजकीय आणि राजकीय सुधारणांबाबत तोपर्यंत जागतिक पातळीवर चर्चा सुरु झाली नव्हती. अजूनही रशियाकडे आणि या `बिग ब्रदर'चे कठपुतळी राष्ट्रे असलेल्या पूर्व युरोपातल्या रुमानिया, पूर्व जर्मनी, युगोस्लाव्हाकिया, पोलंड, बल्गेरिया वगैरे राष्ट्रांकडे संशयित नजरेने पाहिले जात असे.
या छोट्याछोट्या साम्यवादी देशांचे पश्चिम युरोपातल्या नाटो
राष्ट्रांशी आदानप्रदान नसायचे, प्रत्येक बाबतीत ही राष्ट्रे सोव्हिएत रशियावर अवलंबून असायची हे आम्हा पत्रकारांना आमच्या तेथील वास्तव्यात नेहेमी जाणवायचे. उदाहरणार्थ, बल्गेरियातील साम्यवादी क्रांतीचा नेता आणि या देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉर्जि दिमित्रोव यांचे शरीर लेनिनप्रमाणेच सोफिया या राजधानीच्या शहरात जपवून ठेवले होते !
आमचा पत्रकारितेचा अभ्यासक्रम बल्गेरियात होता. याकाळात या देशातील बल्गेरियन भाषा शिकता आली, या भाषेसाठी वापरली जाणारी सिरिलिक ही लिपी रशियन आणि इतर देशांतील भाषांसाठीसुद्धा वापरली जाते.
सेंट सिरील आणि त्याचा भाऊ सेंट मेथोडियस या ख्रिस्ती धर्मगुरुंनी या लिपीतील काही वर्णाक्षरे सर्वप्रथम विकसित केली म्हणून या लिपीला सिरिलिक असे नाव पडले. हातात वर्णाक्षरांची पाट्या असलेल्या सेंट सिरील आणि सेंट मेथोडियस याची चित्रे युरोपात अनेक ठिकाणी दिसतात. हिच सिरिलिक लिपी रशियन भाषेसाठी वापरली जात असल्याने या लिपीला रशियन लिपी असेही म्हटले जाते. रशियाचा असाही प्रभाव इतर पूर्व युरोपियन देशांत दिसायचा.
मॉस्कोत अनेक जुन्या चर्चेसला आम्ही भेट दिल्या. `धर्म ही अफूची गोळी आहे' असे मानणाऱ्या सोव्हिएत रशियातल्या कम्युनिस्ट राजवटीने धर्मावर सरळसरळ बंदीच घातली होती. अत्यंत देखणे वास्तुशिल्प असलेल्या अनेक चर्चमध्ये आम्ही गेलो, तिथे केवळ सत्तरी पार केलेले मोजकेच पुरुष आणि महिला दिसायचे, काळे झगे आणि डोक्यावर काळेच उंच मुकुटवजा पगडी घातलेले आर्थोडॉक्स पंथीय धर्मगुरु दिसायचे.
त्याकाळच्या कम्युनिस्ट राजवटीत केजीबी आद्याक्षरे असलेली एक पाताळयंत्री गुप्तहेर संघटना होती, अमेरिकेतल्या सीआयए सारखी आणि तशाच स्वरुपाचे कामे करणारी. सीआयए आणि केजीबी या प्रतिस्पर्धी गुप्तहेर संघटनांवर आधारीत दीर्घकाळ चाललेल्या शितयुद्धाच्या काळात अनेक कादंबऱ्या आणि चित्रपटांची निर्मिती झाली.
सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन काही वर्षांनंतर आताचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे सत्तेवर आले. विशेष म्हणजे हे पुतीन महाशय त्याकाळच्या भयानक दरारा असलेल्या त्या केजीबी संस्थेचे प्रमुख होते !
कम्युनिस्ट राजवट संपल्यावर पुतीन यांनी आता स्वतःच्या हातात सर्व सत्ता ठेवली आहे आणि ते स्वतः ख्रिस्तीधर्मीय बनले आहेत आणि रशियात सहा जानेवारीला साजरा होणाऱ्या ख्रिसमसच्या प्रार्थनाविधीला ते नियमितपणे हजेरी लावत असतात ! राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याप्रमाणेच रशियातील अनेक लोक पुन्हा धर्माकडे वळले आहेत.
सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर विविध राष्ट्रे नव्याने अस्तित्वात आली त्यापैकी काही राष्ट्रांत बहुसंख्य लोक मुस्लीम आहेत. धर्माला बळजबरीने गाडून टाकण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच लोकांमध्ये
धार्मिक भावना पुन्हा उफाळून येतात हे यावरुन दिसून आले आहे.
मी बल्गेरियात असताना चेर्नोबल अणुभट्टीतील दुर्घटना घडली. जगाच्या इतिहासातील ही पहिली मोठ्या स्वरुपाची अणुशक्ती अपघात आणि दुर्घटना. सोव्हिएत रशियातील मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या राजवटीने चेर्नोबल अणुभट्टीतील ही दुर्घटना आणि तिचे स्वरुप जगापासून अनेक दिवस लपवून ठेवले होते, मात्र अमेरिकेने हे बिंग फोडले आणि साऱ्या जगाला धक्का बसला.
अशा स्वरुपाच्या अनेक बातम्या त्याकाळी आणि आजही चीन आणि आताच्या रशियन राजवटी जगापासून लपवून ठेवत असतात.
गोर्बाचेव्ह यांच्या राजवटीत सोव्हिएत रशियाचे विघटन आले, युरोप आणि आशियात अस्तित्व असलेल्या महाकाय आकाराच्या अखंड सोव्हिएत रशियातून अनेक राष्ट्रे जन्माला आली. हुकूमशाही कम्युनिस्ट राजवटीत यापैकी अनेक प्रदेश सोव्हिएत रशियात जबरदस्तीने विलीन करण्यात आले होते. त्या प्रदेशांतील लोकांची संस्कृती आणि अस्मिता दडपून टाकण्यात आली होती.
(At my residence in Bankya, Sofia in Bulgaria - 1986)
Camil Parkhe

Saturday, May 13, 2023

जगातल्या कामगारांनो एक व्हा...तुमच्या पायातल्या शृंखलाशिवाय तुम्हाला गमवण्यासारखे इतर काहीच नाही..'

Workers of the world Unite.. You have nothing to lose but your shackles...

असे आता जगप्रसिद्ध बनलेले आवाहन साद देणारा कार्ल मार्क्स .

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा मला ओळख झाली ती श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना. आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला होता.

त्यावेळी या जिल्ह्यात बारातेरा साखर कारखाने त्यापैकी तीन खासगी, हरेगावचा बेलापूर शुगर फँक्टरी भारतातला ब्रिटिशकाळात सुरु झालेला पहिला साखर कारखाना. या परीसरात असे औद्योगिकीकरण झाल्याने, कामगार वर्ग निर्माण झाल्याने त्यामुळे कार्ल मार्क्स म्हटल्याप्रमाणे क्रांतीसाठी अगदी पोषक वातावरण.

त्यामुळे माझ्या घराच्या आसपास, रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कचेरीपाशी लाल बावटा अंगाखांद्यावर मिरवत शोषित कामगार मिरवणुकीने जाताना दिसत. `लाल बावटा झिंदाबाद' अशा काहीतरी घोषणा असायच्या, बहुधा गाडे नावाचे एक कामगार नेता या कामगारांचे नेतृत्व करायचे चा. एक दिवस तो लाल बावटा माझ्याही अंगाखांद्यावर आणि त्या घोषणा माझ्याही ओठांवर असतील असे त्यावेळी वाटले नव्हते.

गोव्यात मी कॉलेजात असताना सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकांत कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाने नव्या तरुण पिढीला कमालीची भुरळ घातली होती. मिरामार इथल्या आमच्या धेंपे कॉलेजातले, मडगाव म्हापसा बॉस्को द गामा इथल्या कॉलेजांमधले माझे कित्येक मित्रमैत्रिणी कट्टर मार्क्सवादी बनले होते..

त्याआधी जेसुईट प्रिनॉव्हिस म्हणून मी बीए ला तत्त्वज्ञान विषय घेतला होता. तिथे कार्ल मार्क्स, मानवेन्द्र नाथ रॉय, नक्षलबारी चळवळ, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरेंची जवळून ओळख झाली. माझ्या पिढीतले त्यावेळी बहुतेकजण त्यावेळी मार्क्सवादाच्या मांडवाखाली किंवा त्या प्रभावाखाली होते.

शियाकडून सप्रेम भेट आलेली अनेक गुळगुळीत पानांची, हार्ड बाउंड, अगदी स्वस्तातली मराठी पुस्तके त्याकाळात घरोघरी असायची. मॅक्सिम गॉर्की याचे आई (The Mother ) अशी कितीतरी पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझ्याकडेसुद्धा होती.

भारतातील कितीतरी नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कम्युनिस्ट नेते होते, कितीतरी नावे आहेत. भगत सिंग तर कम्युनिस्ट आयकॉन , चे गव्हेरा यांच्या प्रमाणे. महाराष्ट्रातील कितीतरी राजकीय नेते, साहित्यिक आणि कवी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हेसुद्धा सांगायालाच हवे.

गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी चिटणीस झालो. गोव्यातली आणि संपूर्ण भारतातली त्याकाळची पत्रकारांची आणि वृत्तपत्र कामगारांची चळवळ डावे आणि समाजवादी नेते चालवत होते. सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस वाय कोल्हटकर आणि साथी के. विक्रम राव (जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी आणि बडोदा डायनामाईट केसमधले एक आरोपी) आमचे नेते.

देशभर आणि गोव्यात आम्ही पत्रकार आणि वृतपत्र कामगार चळवळीतले सगळे जण एकमेकांना कॉम्रेड म्हणून संबोधित असू, ( पुण्यात आल्यावर ही सवय सुटली ! ) लाल झेंडा आणि क्रांतीच्या त्या घोषणा, `हम होगे कामयाब' (We Shall overcome..) हे गाणे असायचेत.

मार्क्सवादाच्या याच प्रभावाखाली माझी सोव्हिएत रशिया आणि बल्गेरियाची वारी घडली, बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. कम्युनिस्ट देशाच्या या पंढरीची वारी करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील कितीतरी नेत्यांची, साहित्यिकांची नावे देता येईल.

मी त्यापैकी अखेरचा. याचे कारण मी मॉस्कोत होतो तेव्हा मिखाईल गोब्राचेव्ह नुकतेच सत्तेवर आले होते, नंतर ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइकाचे सुरु झाले नि सोव्हिएत रशियाची अन कम्युनिस्ट जगताची पडझड झाली, ती आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली.

मॉस्कोत क्रेमलीनला असताना तिथे खूप मोठी चर्चेस पाहिली, मार्क्स आणि लेनिन यांची पुतळेही पाहिलेय. चर्चमध्ये सामसूम असायची, पण साठ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीत सुदैवाने या वास्तू शाबूत राहिल्या, या देवळांना केवळ `संग्रहालय' असा दर्जा होता. नंतर कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे क्रेन लावून काढण्यात आली.

तीन दशकांपूर्वी संपूर्ण जग कार्ल मार्क्सला मानणाऱ्या आणि भांडवलशाही देशांमध्ये विभागले होते. येशू ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स असे म्हटले जायचे. कार्ल मार्क्स संपणारा आहे का ? त्याच्या विचारांचा नवा अन्वयार्थ शोधण्याचे काम चालूच राहिल.

जन्मदिनानिमित्त कार्ल मार्क्सला अभिवादन...


माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता
जानकी अक्का म्हणाली. ``वळीखलंस ह्याला -
ह्यो आमचा मार्क्सबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला
संन्याशाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती ''
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
पुढे, एका सभेत मी बोलत होतो,
तर, या मंदीचे कारण काय ?
दारिद्र्याचे गोत्र काय ?
पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,
आणि घडाघडा बोलतच गेला
परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता,
मी म्हणालो -
`आता इतिहासाचे आपणच नायक आहोत
या पुढच्या सर्व चरित्रांचेही '
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला
`अरे, कविता-बिविता लिहितोस कि काय
छान, छान
मलासुद्धा गटे आवडायचा. '
---
नारायण सुर्वे
*जाहिरनामा" (पॉप्युलर प्रकाशन)



Wednesday, August 4, 2021

 

हेरगिरीपासून सर्वसामान्य व्यक्ती, अगदी तुम्ही-आम्हीही सुटू शकत नाही, हे भयावह सत्य आहे!
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 04 August 2021
  • पडघममाध्यमनामापेगाससPegasusहेरगिरीspywareपेगाससPegasus spyware

मी दिल्लीहून एअरोफ्लोट (Aeroflot) एअरलाईन्सच्या विमानाने रशियाच्या दिशेने निघालो, तेव्हा जगात शीतयुद्ध जारी होते. ते लवकरच संपणार होते, मात्र कसे आणि कशामुळे हे कुणालाच माहीत नव्हते. ते वर्ष होते १९८६. शीतयुद्धातील दोन पक्ष होते- अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. या दोन महाशक्तींच्या सीआयए आणि केजीबी या हेरयंत्रणांविषयी त्या काळात अनेक पुस्तके लिहिली गेली, चित्रपट निघाले होते. मॉस्को विमानतळावर उतरल्यावर माझी ज्या तऱ्हेने उलटतपासणी सुरू झाली, तेव्हा या दोन्ही पाताळयंत्री गुप्तहेर यंत्रणांविषयी वाचलेले सर्व काही एकदम आठवले.

आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. पासपोर्ट तयार करण्यासाठी लिहिलेल्या अर्जामध्ये माझ्या डोळ्यांच्या ‘बुबुळांचा रंग काळा’ असे लिहिले होते. समोरच्या काचेच्या केबिनमध्ये बसून माझ्या चेहऱ्याचे, केसांचे, कानांचे सूक्ष्म निरीक्षण करणारा आणि पडताळणीसाठी पुन्हा माझ्या पासपोर्टच्या फोटोकडे वळणाऱ्या त्या निळ्या डोळ्यांच्या अधिकाऱ्याकडे पाहून मला केजीबीची आठवण होत होती !

विमान जमिनीवर उतरण्याआधी ‘मॉस्कोचे तापमान उणे बारा आहे’ असे आम्हा प्रवाशांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षातही तितक्याच थंड नजरेने माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण चालू होते. त्या केबिनमध्ये समोरच्या व्यक्तीला पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेले तीन-चार छोटेसे आरसे होते. त्यांत आळीपाळीने पाहून माझ्या चेहरपट्टीचे, केसाचे विविध कोनांतून तो अधिकारी निरीक्षण करत होता. त्या पाच-दहा मिनिटे चाललेल्या तपासणीदरम्यान त्या अधिकाऱ्याने मला साधा एकही प्रश्न विचारला नव्हता! पासपोर्ट माझ्याकडे परत देण्यात आला, तेव्हा हुश्श्य करत मी पुढे निघालो.

अशा अनुभवामुळे मॉस्कोतल्या त्या वास्तव्यात ‘केजीबी’चे लोक सगळीकडेच पेरून ठेवले आहेत की, काय अशी मला शंका यायची. एअरोफ्लोट विमानातल्या त्या हवाईसुंदरी प्रवाशांना ‘वेलकम’ म्हणताना साधे स्मितसुद्धा करत नव्हत्या. मॉस्कोत हॉटेलवर उतरलो होतो, तेव्हा लिफ्ट आणि दरवाजापाशी एका स्टुलावर काळ्या कपड्यांतली एक वयस्कर बाई बसून असायची. तिच्याविषयीही मला हाच संशय होता, मात्र नंतर मला ती ओळखीचं स्मित द्यायला लागली, तेव्हा हा संशय मी बाजूला ठेवला.

मी त्या वेळी भारतीय पत्रकारांच्या तुकडीसह बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम करण्याआधी रशियात पोहोचलो होतो. मॉस्कोत प्रसिद्ध रेड स्केअरला भेट दिली, लेनिन म्युझियमला भेट दिली, तिथे कॉम्रेड ब्लादिमीर लेनिनचे शरीर थ्रीपीस सूटमध्ये सजवून ठेवलेले होते. क्रेमलिनच्या त्या भव्य इमारती पाहताना आमच्यातल्या एका पत्रकाराने रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि सोव्हिएत रशियाचे सर्वोच्च नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे अधिकृत निवासस्थान कुठे आहे असे विचारले, तेव्हा आमच्या अनुवादिकेने उत्तर देण्याचे टाळले. कुणी तरी आपल्यावर नजर ठेवून आहे, अशी भावना अशा वेळी प्रबळ व्हायची.  

दिल्लीत राष्ट्रपती भवन अगदी रस्त्यावरून सगळ्यांना दिसते. आत प्रवेश नसला तरी ही वास्तू मुद्दाम लांबून पाहिली, दाखवली जाते. काही वर्षांपूर्वी पॅरिसला असताना ‘आर्क ऑफ ट्रायम्प’ पाहून मी परतत होतो, तेव्हा जवळच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आहे, असे सांगितले गेले. त्यात शासकीय गुपिताचा भंग होण्याचा प्रश्नच नव्हता. कम्युनिस्टांच्या राजवटीत मात्र राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून लोकांपासून लपवण्यासारख्या कितीतरी गोष्टी होत्या.

पुढे बल्गेरियातल्या तीन महिन्यांच्या वास्तव्यात हाच अनुभव आला. पत्रकारितेच्या आमच्या लेक्चरच्या भाषांतराशिवाय बाकीच्या काही घडामोडींविषयी ती अनुवादक मंडळी एक चकार शब्द अधिक बोलत नसायची. आपल्यावर कुणीतरी, एखादा ‘बिग ब्रदर’ पाळत ठेवत आहे, याचे त्या लोकांना नेहमी भान असायचे. पोपटपंची म्हणजे काय असते, हे आम्ही प्रत्यक्ष त्या वेळी तेथे अनुभवले.

अमेरिकेला प्रतिकूल असलेल्या जगातील अनेक राजकीय राजवटींविरुद्ध ‘सीआयए’ने केलेल्या कारवायांविषयी अनेकदा लिहिले गेले आहे. जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांच्या हत्या, काही देशांतील राजकीय अशांत वातावरण, यादवी युद्धे यामागे ‘सीआयए’ होती, असे म्हटले गेले आहे.

पंतप्रधान इंदिरा गांधी या आपल्या भाषणांत अमुक अमुक गोष्टीमागे ‘परकीय हात’ आहे, असे नेहमी म्हणायच्या. त्याबद्दल खूपदा विनोद केले जायचे. हा ‘फॉरेन हँड’ अर्थातच केजीबी नसणार आणि सीआयए असणार याबद्दल सर्वांनाच खात्री होती. शीतयुद्धाच्या काळात भारत अलिप्त राष्ट्रांचा नेता असला तरी रशियाच्या बाजूने झुकलेला होता, हे उघड गुपित होते. १९७१ला पाकिस्तानविरोधी युद्धात आणि बांगलादेश निर्मितीच्या वेळी रशियाच्या मदतीने इंदिराजींनी अमेरिकेची कशी नांग टेचली होती, हे सर्व जगाने पाहिले होते. रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणजेच तेथील सत्ताधारी नेते निकिता कृशेव्ह, लिओनिड ब्रेझनेव्ह भारताच्या भेटीवर यायचे, तेव्हा मला आठवते की, त्या दिवसांतल्या वृत्तपत्रांतील त्यांचे इंदिरा गांधी यांच्याबरोबरचे फोटो आणि बातम्या भारत रशियाच्या किती जवळ आहे, हे दर्शवायच्या.

रशिया आणि बल्गेरियाला जाण्यापूर्वी व्हिसा आणि इतर कामानिमित्त दिल्लीतल्या चाणक्यपुरी या परिसराला अनेकदा भेटी दिल्या. या परिसरात विविध देशांतील वकिलाती, राजदूतांची कार्यालये आहेत, म्हणजे त्या वेळी होत्या. या वकिलातींचे वैशिष्टय म्हणजे तिथे काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींकडे संशयाने पाहिले जाऊ शकते, अगदी तिथे झाडलोट करणाऱ्या व्यक्तीकडेही. या वकिलातींत राजदूत हे अधिकृतरित्या आपापल्या देशांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. त्याशिवाय या कार्यालयांत सचिव, उपसचिव, क्लार्क वगैरे अनेक पदांवर त्या देशांतील माणसे काम करत असतात. या सर्वांकडे साहजिकच गुप्तहेर म्हणूनच अनेकदा पाहिले जाते. दूतावासातील लोकांच्या अधिकृत आणि अनधिकृत कामासंबंधी दोन्ही देशांना त्याची पुरेपूर कल्पना असते. मात्र दोन्हीही देश त्याकडे कानाडोळा करत असतात आणि त्याच वेळी आपली गुपिते बाहेर जाणार नाहीत, याविषयी पुरेपूर काळजी घेत असतात.  

कुठल्याही राजदूताला ‘डिप्लोमॅटिक इम्युनिटी’ असते. शत्रूकडून कितीही वाईट संदेश घेऊन आला तरी शत्रूच्या दूताला शिक्षा करण्याचे अगदी पुरातन काळापासून शिष्टसंमत नाही. पांडवांचा दूत म्हणून शिष्टाई करण्यासाठी कृष्ण हस्तिनापूरला कौरवांच्या दरबारात आला, तेव्हा त्याला जेरबंद करण्याचा बालिशपणा दुर्याधनाने केला होता. राजदूतावासातील कुठलीही व्यक्ती हेरगिरी करताना आढळली तर अटक वा शिक्षा न करता तिची देशातून हकालपट्टी केली जाते. दोन देशांत कुरबुरी वाढत गेल्या की, पहिली संक्रांत दूतावासातील लोकांवर कोसळते आणि रागाचा वचपा काढण्यासाठी मग दोन्ही राष्ट्रे दूतावासातील काही लोकांची हकालपट्टी करतात. अर्थात ही नेहमीची लुटुपुटीची लढाई असते, तणाव निवळल्यावर राजनैतिक आणि राजदूत संबंध पुन्हा प्रस्थापित होतात.   

त्या काळात दरदिवशी पाठवले जाणारे टपाल हेच हेरगिरीचे मुख्य साधन असायचे. प्रत्येक दूतावासातून, वकिलातींतून दरदिवशी त्यांच्या देशाला विविध कागदपत्रे आणि काही वस्तू पाठवल्या जायच्या. विमानांतून व इतर मार्गे जाणाऱ्या या सिलबंद पाकिटांना आणि वस्तूंना ‘डिप्लोमॅटिक इम्युनिटी’ असते. त्याची विमानतळांवर वा इतर चेकपोस्टवर उघडून तपासणी होत नसते. बल्गेरियातील त्या दीर्घ वास्तव्यात मला त्याचा अनुभव आला.

भारतात काही पत्रे पाठवायची असल्यास आम्ही ती पाकिटे सिलबंद करून, त्यावर तिकिटे लावून आम्ही आमच्या यजमानांकडे सोपवायचो. मग ती बल्गेरियातून भारताकडे जाणाऱ्या पार्सलमध्ये टाकली जात आणि दिल्लीला बल्गेरियन वकिलातीतील लोक ती पत्रे जवळच्या पोस्ट ऑफिसांत टाकत असत. यामुळे सोफियातील आमची पत्रे दिल्लीत एक-दोन दिवसांत पोहोचत आणि तिथून गोव्यात व इतरत्र ठिकाणी तीन-चार दिवसांत. वकिलातीकडून आलेली पार्सलांची तपासणी होत नाही, हे त्या वेळी मला समजले. 

आणि ही अगदी अलीकडची गोष्ट, तीन वर्षांपूर्वीची. ‘सकाळ टाइम्स'मध्ये सहाय्य्क संपादक-कम - न्यूज ब्युरो चीफ म्हणून काम करताना ‘थायलंडला प्रेस टूरवर जायला आपल्याला आवडले का?’ अशी एक ई-मेल मला आली अन मी उडालोच. ‘आवडेल का?’ काय प्रश्न होता! तर लवकरच थायलंडच्या मुंबई येथील वकिलातीने आयोजित केलेल्या या दौऱ्यासाठी माझी निवड झाली. थायलंड सरकारचा पाहुणा या नात्याने थायलंड वकिलातीतर्फे मला व्हिसा मिळाला. त्याशिवाय थायलंड वकिलातीच्या लेटरहेड आणि सहीशिक्यासह एक पत्रही देण्यात आले.

या पत्रामुळे बँकॉक विमानतळावर उतरताच तेथे कुठलीही तपासणी न होता, कुठल्याही रांगेत उभे न राहता एक स्वतंत्र प्रवेशदारातून मला तत्काळ बाहेर सोडण्यात आले होते आणि तेथे थायलंड सरकारचे प्रतिनिधी माझे स्वागत करण्यासाठी उभे होते. ‘डिप्लोमॅटिक इम्युनिटी’ आणि त्याबरोबर येणारे विशेष हक्क म्हणजे काय, हे मी तेव्हा प्रत्यक्ष अनुभवले.     

सीआयए आणि केजीबी यांच्या हेरगिरीविषयी आता फारशी चर्चा होत नाही. त्यांच्या गुप्त कारवाया अर्थातच चालूच असतील..

पुलित्झर पारितोषिक प्राप्त पत्रकार सेमुर हर्ष यांनी १९८३ साली प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे भारताच्या मंत्रीमंडळात मंत्री असताना ‘सीआयए एजंट’ होते, असा आरोप करून मोठा गदारोळ उडवून दिला होता. मोरारजी देसाई यांनी हर्ष यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र काही तांत्रिक बाबींमुळे तो फेटाळला गेला होता.

आपला आत्मसन्मान जपण्यासाठी भारतीय राजकारण्यांनी परदेशांतील न्यायालयांत लेखक-पत्रकारांविरुद्ध असे दावे करण्याच्या घटना तशा अतिशय दुर्मीळ आहेत. त्याआधी सत्तर वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनीही लंडनच्या न्यायालयात अशाच प्रकारे एका पत्रकाराविरुद्ध दावा दाखल केला होता. 

व्हॅलेंटाईन चिरोल या पत्रकाराने आपल्या एका पुस्तकात लोकमान्य टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ (Father of Indian Unrest) असे म्हटले होते. या बिरुदाविरुद्ध टिळकांनी दीर्घकालीन न्यायालयीन दावा चालवला. त्यासाठी वसईचे बॅरिस्टर जोसेफ ‘काका’ बॅप्टिस्टा, विदर्भातले  दादासाहेब खापर्डे यांच्यासह त्यांनी विलायतवारीही केली. या नेत्यांबरोबरचे टिळकांचे लंडनमधल्या कुठल्याशा राजवाड्यासमोरचे सुटाबुटातले एक छायाचित्र पाहण्यासारखे आहे.

मात्र टिळक हा दावा हरले. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ हे बिरुद भविष्यात आपल्यामागे अभिमानाने लावले जाईल, याची टिळकांनी त्या वेळी कल्पनाही केली नसेल.   

लंडनला जाण्यासाठी शास्त्रांत निषिद्ध ठरवलेले समुद्रगमन केल्यामुळे टिळकांनी भारतात आल्यावर प्रायश्चितसुद्धा घेतले. शास्त्रनियम तोडल्याबद्दल त्यांनी घेतलेले हे दुसरे प्रायश्चित. पहिले प्रायश्चित पुण्यातल्या पंचहौद चर्चमध्ये चहा प्यायल्याबद्दल घेतले होते.

मोरारजी देसाईसुद्धा ‘सीआयए एजंट’ संदर्भांतील न्यायालयीन दावा १९८९मध्ये हरले आणि त्याच वेळी भारतातील दुसऱ्या एका राजकीय नेत्याचे नाव यासंदर्भात गोवले गेले. हे राजकीय नेते होते भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.

मुंबईतून नव्यानेच प्रकाशित होणाऱ्या आणि विनोद मेहता संपादक असलेल्या ‘द इंडिपेंडेंट’ या इंग्रजी दैनिकाने ‘यशवंतराव चव्हाण हे सीआयएचे हस्तक होते काय?’, अशी प्रश्नार्थक शीर्षक असलेली बातमी पान एकवर आठ कलमांत छापून मोठा बॉम्ब टाकला होता. यशवंतराव चव्हाण यांचे या बातमीआधीच निधन झाले होते.

अशी स्फोटक पण तथ्यहीन बातमी देण्याची पुरेपूर किंमत विनोद मेहता यांना मोजावी लागली. त्यांना संपादकपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ‘इंडिपेंडेंट’ हे दैनिकही लगेच बंद पडले. 

मानवी इतिहासात हेरगिरी ही तशी अगदी प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तंत्रज्ञानाच्या बळावर आता पाळत ठेवण्याच्या पद्धतीत मोठी क्रांती घडवून आणली आहे. तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीने कुणावर पाळत राखण्याच्या, पाठलाग करण्याचा, संभाषण प्रत्यक्ष चोरून ऐकण्याच्या, महत्त्वाच्या दस्तऐवजांची नक्कल करण्याच्या जुन्या पारंपरिक हेरगिरीच्या पद्धती पूर्णतः कालबाह्य झाल्या आहेत.

विशेष म्हणजे पूर्वी केवळ महत्त्वाच्या राजकीय नेत्यांवर, सरकारी उच्चपदस्थांवर पाळत ठेवली जायची. आज स्थिती बदलली आहे. अलीकडेच उघडकीस आलेल्या नव्या पेगॅसास प्रकरणात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींशी दुरान्वयाने संबंधित असलेली व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय यांच्यावरसुद्धा पाळत ठेवली जात होती, असे दिसून आले आहे. त्यामुळे हेरगिरीपासून सर्वसामान्य व्यक्ती, अगदी तुम्ही-आम्हीही सुटू शकत नाही, हे भयावह सत्य आता समोर आले आहे.