Showing posts with label Church. Show all posts
Showing posts with label Church. Show all posts

Friday, December 6, 2024

 कुठल्याही प्रार्थनास्थळाच्या आवारात संबंधित देवदैवतांच्या तसबिरी आणि धर्मग्रंथांतील वचने असतात. काल या देवळाच्या प्रशस्त आवारात शिरलो अन डाव्या बाजूला या कोनशिलावजा फलकाकडे लक्ष गेले आणि मी चमकलो.

तो फलक पाहून मी चमकलो, याचेही मला नंतर आश्चर्य वाटले.
याचे कारण म्हणजे या मंदिराच्या स्थापनेपासुन म्हणजे गेली तीस वर्षे मी तिथे वेळोवेळी जात आलेलो आहे. दादाबाई असताना घरच्यांना भेटण्यासाठी येथे माझे कायम येणेजाणे असायचे.
रविवारच्या मिस्सेसाठी या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी शहरातील हे दुसरे चर्च बांधण्यात आले आहे.
अलिकडच्या काळात जेथेजेथे मी गेलो तिथेतिथे हा फलक पाहून त्याभोवती फोटो काढण्याचा मला मोह झाला आहे. उदाहरणार्थ, पुण्यातील नव्या पेठेतील एस एम. जोशी स्मारकातील भारतातील राज्यघटनेच्या प्रास्तविकेचा हा फलक.
दर पंधरा ऑगस्टला चर्चमध्ये गायला जाणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतील ती प्रसिद्ध ओळसुद्धा या फलकावर कोरली आहे,
प्रागतिक विचारसरणीच्या संस्थांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्तविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करावा, लोकांमध्ये याबाबत जाणिव निर्माण करावी यात काही विशेष नाही.
त्यांच्या मूलभूत उद्दिष्ट्यांचा तो एक भाग असतो.
असेच कार्य करण्यासाठी लोयोला दिव्यवाणी चर्चच्या आवारात अगदी प्रवेशद्वारातच येशू ख्रिस्ताची प्रतिमा किंवा बायबलच्या वचनांऐवजी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत मांडलेल्या लोकशाही देशाच्या आदर्श तत्त्वांचा पुरस्कार करावा याचे मला सद्याच्या वातावरणात विशेष कौतुक वाटले.
गेल्या तीस वर्षांच्या काळात या अतिपरिचित फलकाच्या अस्तित्वाची मला कधी जाणिवही का झाली नाही याचेही मला लगेच उत्तरही मिळाले.
Where the mind is without fear
and the head held high;
Into that heaven of freedom,
my Father, let my country awake.
^^
Camil Parkhe, November 11, 2024

Saturday, May 13, 2023

जगातल्या कामगारांनो एक व्हा...तुमच्या पायातल्या शृंखलाशिवाय तुम्हाला गमवण्यासारखे इतर काहीच नाही..'

Workers of the world Unite.. You have nothing to lose but your shackles...

असे आता जगप्रसिद्ध बनलेले आवाहन साद देणारा कार्ल मार्क्स .

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा मला ओळख झाली ती श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना. आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला होता.

त्यावेळी या जिल्ह्यात बारातेरा साखर कारखाने त्यापैकी तीन खासगी, हरेगावचा बेलापूर शुगर फँक्टरी भारतातला ब्रिटिशकाळात सुरु झालेला पहिला साखर कारखाना. या परीसरात असे औद्योगिकीकरण झाल्याने, कामगार वर्ग निर्माण झाल्याने त्यामुळे कार्ल मार्क्स म्हटल्याप्रमाणे क्रांतीसाठी अगदी पोषक वातावरण.

त्यामुळे माझ्या घराच्या आसपास, रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कचेरीपाशी लाल बावटा अंगाखांद्यावर मिरवत शोषित कामगार मिरवणुकीने जाताना दिसत. `लाल बावटा झिंदाबाद' अशा काहीतरी घोषणा असायच्या, बहुधा गाडे नावाचे एक कामगार नेता या कामगारांचे नेतृत्व करायचे चा. एक दिवस तो लाल बावटा माझ्याही अंगाखांद्यावर आणि त्या घोषणा माझ्याही ओठांवर असतील असे त्यावेळी वाटले नव्हते.

गोव्यात मी कॉलेजात असताना सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकांत कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाने नव्या तरुण पिढीला कमालीची भुरळ घातली होती. मिरामार इथल्या आमच्या धेंपे कॉलेजातले, मडगाव म्हापसा बॉस्को द गामा इथल्या कॉलेजांमधले माझे कित्येक मित्रमैत्रिणी कट्टर मार्क्सवादी बनले होते..

त्याआधी जेसुईट प्रिनॉव्हिस म्हणून मी बीए ला तत्त्वज्ञान विषय घेतला होता. तिथे कार्ल मार्क्स, मानवेन्द्र नाथ रॉय, नक्षलबारी चळवळ, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरेंची जवळून ओळख झाली. माझ्या पिढीतले त्यावेळी बहुतेकजण त्यावेळी मार्क्सवादाच्या मांडवाखाली किंवा त्या प्रभावाखाली होते.

शियाकडून सप्रेम भेट आलेली अनेक गुळगुळीत पानांची, हार्ड बाउंड, अगदी स्वस्तातली मराठी पुस्तके त्याकाळात घरोघरी असायची. मॅक्सिम गॉर्की याचे आई (The Mother ) अशी कितीतरी पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझ्याकडेसुद्धा होती.

भारतातील कितीतरी नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कम्युनिस्ट नेते होते, कितीतरी नावे आहेत. भगत सिंग तर कम्युनिस्ट आयकॉन , चे गव्हेरा यांच्या प्रमाणे. महाराष्ट्रातील कितीतरी राजकीय नेते, साहित्यिक आणि कवी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हेसुद्धा सांगायालाच हवे.

गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी चिटणीस झालो. गोव्यातली आणि संपूर्ण भारतातली त्याकाळची पत्रकारांची आणि वृत्तपत्र कामगारांची चळवळ डावे आणि समाजवादी नेते चालवत होते. सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस वाय कोल्हटकर आणि साथी के. विक्रम राव (जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी आणि बडोदा डायनामाईट केसमधले एक आरोपी) आमचे नेते.

देशभर आणि गोव्यात आम्ही पत्रकार आणि वृतपत्र कामगार चळवळीतले सगळे जण एकमेकांना कॉम्रेड म्हणून संबोधित असू, ( पुण्यात आल्यावर ही सवय सुटली ! ) लाल झेंडा आणि क्रांतीच्या त्या घोषणा, `हम होगे कामयाब' (We Shall overcome..) हे गाणे असायचेत.

मार्क्सवादाच्या याच प्रभावाखाली माझी सोव्हिएत रशिया आणि बल्गेरियाची वारी घडली, बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. कम्युनिस्ट देशाच्या या पंढरीची वारी करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील कितीतरी नेत्यांची, साहित्यिकांची नावे देता येईल.

मी त्यापैकी अखेरचा. याचे कारण मी मॉस्कोत होतो तेव्हा मिखाईल गोब्राचेव्ह नुकतेच सत्तेवर आले होते, नंतर ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइकाचे सुरु झाले नि सोव्हिएत रशियाची अन कम्युनिस्ट जगताची पडझड झाली, ती आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली.

मॉस्कोत क्रेमलीनला असताना तिथे खूप मोठी चर्चेस पाहिली, मार्क्स आणि लेनिन यांची पुतळेही पाहिलेय. चर्चमध्ये सामसूम असायची, पण साठ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीत सुदैवाने या वास्तू शाबूत राहिल्या, या देवळांना केवळ `संग्रहालय' असा दर्जा होता. नंतर कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे क्रेन लावून काढण्यात आली.

तीन दशकांपूर्वी संपूर्ण जग कार्ल मार्क्सला मानणाऱ्या आणि भांडवलशाही देशांमध्ये विभागले होते. येशू ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स असे म्हटले जायचे. कार्ल मार्क्स संपणारा आहे का ? त्याच्या विचारांचा नवा अन्वयार्थ शोधण्याचे काम चालूच राहिल.

जन्मदिनानिमित्त कार्ल मार्क्सला अभिवादन...


माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता
जानकी अक्का म्हणाली. ``वळीखलंस ह्याला -
ह्यो आमचा मार्क्सबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला
संन्याशाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती ''
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला
पुढे, एका सभेत मी बोलत होतो,
तर, या मंदीचे कारण काय ?
दारिद्र्याचे गोत्र काय ?
पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,
आणि घडाघडा बोलतच गेला
परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता,
मी म्हणालो -
`आता इतिहासाचे आपणच नायक आहोत
या पुढच्या सर्व चरित्रांचेही '
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला
`अरे, कविता-बिविता लिहितोस कि काय
छान, छान
मलासुद्धा गटे आवडायचा. '
---
नारायण सुर्वे
*जाहिरनामा" (पॉप्युलर प्रकाशन)



Wednesday, October 5, 2022

  पहिला कम्युनियन विधी


काही तारखा मनाच्या पटलावर कायमच्या कोरलेल्या असतात. आजची तीन ऑकटोबर तारीख तशीच. तीन ऑकटोबर हा कॅथोलिक चर्चच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये संत तेरेजा हिचा सण, फेस्त किंवा फिस्ट. श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव येथे संत तेरेजा चर्च आहे, तिथल्या संत तेरेजा शाळेत आणि बोर्डिंगमध्ये मी होतो. जर्मन जेसुईट फादरांनी या ग्रामीण भागात स्थापन केलेल्या या शाळेत त्या दिवशी खास कार्यक्रम असायचा. साठीच्या दशकाच्या अखेरीस त्या वर्षी आमच्या शाळेच्या बोर्डिंगमध्ये त्यादिवशी तीन ऑकटोबरला माझे आईवडील श्रीरामपूरहून भल्या पहाटे आले आणि देवळातल्या त्या कार्यक्रमासाठी माझी तयारी करु लागले. 
 
त्या वेळी मी तिसरीत असेल. बाईने मला धुऊनपुसून स्वच्छ केले, दादांनीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानात शिवलेले नवेकोरे कपडे माझ्या अंगावर चढवले. पांढरी पॅन्ट, पांढराच शर्ट, पांढरे मोजे आणि लेस असलेले पांढरे कापडी बूट. माझ्या डोक्याला तेल लावून कुरळे केस विंचरुन, भांग पडून केसाचा पुढे कोंबडा काढला, चेहेऱ्यावर पावडरचा हलकासा हात फिरवला, सावळ्या गालावर एक बारीकसा काजळाचा ठिपका लावला. नजर लागू नये म्हणून.. देवळात इतर मुलांसह जाण्यास मी आता तयार झालो होतो. 
 
उत्सवमुर्ती बनण्याची माझ्या आयुष्यातली ही पहिली घटना, त्याकाळात कुणाचाही वाढदिवस साजरा करण्याची प्रथा नव्हती. आमच्या शाळेला आणि देवळाला जिचे नाव दिले होते त्या संत तेरेजाच्या सणानिमित इथल्या बोर्डिंगमधल्या लहान मुलां-मुलींच्या पहिल्या कम्युनियनचा सामुदायिक विधी या दिवशी व्हायचा. 
 
ही संत तेरेजा म्हणजे मदर तेरेसा ऑफ कोलकता नव्हे. सेंट तेरेजा ऑफ द चाइल्ड जिझस ही एकोणिसाव्या शतकातली कार्मेलाईट संस्थेची फ्रेंच नन. या संत तेरेजाच्या या सणानिमित्त ``स्वर्गबागेतील लहान फुला, संत तेरेजा प्रणाम तुला, प्रणाम तुला'' हे गायन पेटी तबल्याच्या सुरांत हमखास गायले जायचे ! 
 
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या सैन्यात वैद्यकीय पथकात काम केलेले फादर ह्युबर्ट सिक्स्थ आणि फादर रिचर्ड वासरर हे संत तेरेजा देवळात त्यावेळी धर्मगुरु आणि शाळेचे प्रमुख होते. 
 
कॅथोलिक धर्मात सप्त स्नानसंस्कार म्हणजे सात सांक्रांमेंत असतात. जन्मानंतर काही दिवसांत होणारा बाप्तिस्मा (नामकरण विधी) , बालपणी कम्युनियन, प्रायश्चित किंवा कन्फेशन, पौंगडावस्थेत कन्फर्मेशन किंवा दृढीकरण, तरुणपणी लग्नविधी किंवा दिक्षाविधी, आणि पार्थिव देहावर अंतिम संस्कार हे ते सप्त स्नानसंस्कार. 
 
कॅथोलिक देवळात रविवारीही (आणि दररोजही ) होणाऱ्या मिस्सा विधीत भाविकांना ख्रिस्तशरीर किंवा कम्युनियन दिले जाते. 
 
दहाव्या वर्षांच्या आसपास असणाऱ्या मुलांमुलींना पहिल्यांदा या सांक्रामेंतसाठी भरपूर पुर्वतयारी करून म्हणजे नेहेमी म्हटल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना शिकवून सामुहिकरीत्या पहिल्यांदा कम्युनियन दिला जातो त्या विधीत मी आज सामील होणार होतो. 
 
या विधीसाठी मुलींना अगदी नववधुसारख्या पांढरे गाऊन, हातमोजे आणि तोंडावर व्हेल वगैरे वेशात सजवलं जातं .
या विधीसाठी मला दादा-बाईनं असं नटूनथटून तयार केलं हे आजही आठवतं तसा पहिला कम्युनियनचा तो विधी मात्र आठवत नाही.  
 
इव्हेंट्सच्या आजच्या जमान्यात घरातल्या मुलां-मुलींचा फर्स्ट कम्युनियन हा ख्रिस्ती कुटुंबांसाठी मोठा समारंभ असतो. 
 
कुठल्याही ख्रिस्ती - कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट - व्यक्तीसाठी त्यांचा पहिला कम्युनियन विधी असा अविस्मरणीय असतो, याचं कारण म्हणजे श्रद्धाळू असेपर्यंत आणि देवळांत उपासनेसाठी ते जातील तोपर्यंत या उपासना विधिदरम्यान ते या ख्रिस्तभोजनात किंवा युखिरिस्ट विधीत ते सहभागी होत असतात. 
 
 
Camil Parkhe, October 3, 2022

Tuesday, May 4, 2021

ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या पुस्तकाची प्रस्तावना

 



हरेगावच्या संत तेरेजा शाळेच्या बोर्डिंगमध्ये मी तिसऱ्या इयत्तेत असताना पहिल्यांदा माझी मिशनरींच्या जीवनाशी ओळख झाली. त्या काळात म्हणजे 1960 च्या दशकात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक फादरबाडींमध्ये पन्नाशी पार केलेले युरोपियन धर्मगुरू काम करत होते. कडक शिस्तीचे फादर ह्युबर्ट सिक्स्त हे आमच्या शाळेचे मुख्य होते, तर काटकुळ्या प्रकृतीचे आणि साठी ओलांडलेले फादर रीचर्ड वासरर हे त्यांचे सहायक होते. शरीरप्रकृतीने आणि स्वभावप्रकृतीनेही या दोन फादरमध्ये बराचसा फरक होता.
म्हातारे फादर वासरर यांच्या अंगाखांद्याला लहान मुले सदैव झोंबत असत. त्यावेळी संत तेरेजा शाळा कौलारू खोल्यांमध्ये भरत असे. या खोल्यांच्या मागे शाळेच्या मालकीच्या असलेल्या शेतीजवळ त्यावेळी नव्यानेच एक मोठा पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. या हौदात सकाळची शाळा सुरू होण्याआधी भल्या पहाटे फादर वासरर आम्हा बोर्डिंगच्या मुलांना घेऊन पोहत असत. नदीची वा विहिरीची ओळख नसलेल्या आम्हा अनेक मुलांना त्यांना येथेच पोहण्याचे धडे दिले. म्हाताऱ्या फादरच्या पाठीवर पडून पाण्यात हात-पाय हलवून त्यावेळी अनेक मुले पोहायला शिकली.
एकदा पोहण्याचा कार्यक्रम चालू असताना हौदाची एक भिंत वाहून गेली. सुदैवाने फादर यांच्यासह इतर कुणाही मुलाला दुखापत झाली नाही.
मध्यम उंचीचे आणि अल्सेसियन कुत्रा पाळणारे फादर सिक्स्त हे स्वत: या आजारी मुलांना तपासत असत. स्वत:जवळ असलेल्या बटव्यातून औषध आणि गोळ्या देत असत. गरज भासल्यास मुलांना इंजेक्शनदेखील देत असत. हे इंजेक्शनदेखील त्या फादरबद्दल मुलांच्या मनात भीती निर्माण करण्याचे एक कारण असावे असे आता मला वाटते.
जर्मन नागरिक असलेल्या हुबर्ट सिक्त यांना सक्तीच्या लष्करभरतीमुळे दुसऱ्या महायुद्धात भाग घ्यावा लागला होता, तेव्हा त्यांनी जखमींना मदत करणाऱ्या मेडिकल कोअरमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे त्यांना औषधोपचारांची माहिती होती. (हे मला अर्थात अलिकडेच जर्मनीत तीन दशकांपासून स्थायिक असलेल्या अजित लोखंडे यांनी लिहिलेल्या 'मिशन, मिशनरी आणि मी' या पुस्तकातील लेखावरून कळाले. गोव्यात कळंगुटजवळच्या बागा बिचवर पोहोताना फादर सिक्त यांचे १९८७ साली निधन झाले.)
बोर्डिंगमध्ये मार्शल आणि पेत्रस हे माझे थोरले दोन भाऊही होते. हरेगाव (बेलापूर) शुगर फॅक्टरीच्या आसपास असलेल्या उंदीरगाव आणि एकवाडी, दोनवाडी, तीनवाडी अशा वाड्यांतील मुले या शाळेत शिकत असत. बोर्डिंगच्या मुलांना राहण्याची आणि जेवणाची मासिक पाच रुपये फी होती. मात्र ही फीसुद्धा वेळेवर कधी भरली जात नसे. मात्र फी न भरल्यामुळे एखाद्या मुलाला तंबी मिळाली वा बोर्डिंगमधून काढूनटाकले असा प्रकार मात्र कधीही झाला नाही.
आज अहमदनगर जिल्ह्यात अनेक शहरात आणि गावात ख्रिस्ती धर्मगुरूंतर्फे वा सिस्टर्सतर्फे अनेक शाळा चालविल्या जातात. त्याकाळात मात्र जिल्ह्यातील मागासवर्गीय ख्रिस्ती समाजासाठी हरेगावची संत तेरेजा शाळा आणि संगमनेरची ‘ज्ञानमाता’ ही दोनच प्रमुख शिक्षण केंद्रे होती. श्रीरामपूर आणि शेजारील तालुक्यातील मुले हरेगावला बोर्डिंगमध्ये राहून सातवीपर्यंत शिकत आणि पास झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी संगमनेरच्या ज्ञानमाता बोर्डिंगचा रस्ता धरत. त्याकाळातील सर्वच मिशन केंद्रे येशूसंघीय (जेसुईट) फादरांची होती.
आठवी-नववीनंतर, मॅट्रीकमध्ये सुटल्यानंतर वा सुटले नाही तरी यापैकी अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येशूसंघातर्फेच पुण्यात फादर आयवो मायर यांनी चालविलेल्या सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये भरती होत. (बाय द वे, फादर मायर यांनीच माझा श्रीरामपुरला बाप्तिस्मा करुन मला 'कामिल' हे नाव दिले होते!) सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये तेथील बोर्डिंगमध्ये राहून टर्नर, फिटर, वायरमन वगैरेंचे शिक्षण घेत. पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेण्याची पूर्वाश्रमीचे दलित असलेल्या या ख्रिस्ती समाजाची आर्थिक वा सामाजिक कुवत त्यावेळी नव्हती.
त्याकाळात अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील स्थानिक फादरबाडींतील बोर्डिंगमध्ये आणि नंतर ज्ञानमातेत शिकून पुण्यात सेंट जोसेफ टेक्निकलकडे प्रवास केलेल्यांची संख्या प्रचंड आहे. किमान दोन पिढ्यांनी ही पायवाट वापरली आहे. पुण्यात व्यावसायिक शिक्षण घेऊन नंतर पुण्यातीलच बजाज, टेल्को, फिलिप्स, ग्रीव्हज वगैरे कंपन्यांत यापैकी अनेकांनी प्रवेश मिळविला.
या दोन जिल्ह्यांतून पुण्यात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती गावी मागे राहिलेल्या त्यांच्या इतर समाजकुटुंबीयांपेक्षा कितीतरी चांगली आहे. उपेक्षित ख्रिस्ती समाजाला मिशनरींनी दिलेल्या पाठबळामुळे अर्थात हे शक्य झाले. दलित असूनही धर्मांतरामुळे हा समाज राखीव जागांच्या सवलतीस मुकला.
ख्रिस्ती दलितांचा - किंबहुना पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या कुठल्याही दलितांचा - सर्व प्रकारच्या घटनात्मक आरक्षणावर पूर्णतः अधिकार नव्हे हक्क आहे, भले घटनेने आणि कायद्याने तो त्यांना आजपर्यंत नाकारला आहे ही बाब दुसरी. मिशनरींनी मात्र आपल्या मर्यादित कुवतीनुसार या समाजाला स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले आणि दलित असूनही या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या या समजात न्यूनगंडाची भावना आढळत नाही ती यामुळेच.
‘मनुष्य केवळ भाकरीवरच जगत नाही’, हे ख्रिस्ताचे वचन सांगतानाच गरीब ख्रिस्ती कुटुंबांना रोजची रोटी कशी मिळविता येईल याकडेही मिशनरींनी लक्ष दिले. भारतातील ख्रिस्तीसमाजापैकी बहुतांश लोक पूर्वाश्रमीच्या अनुसूचित जाती-जमातींमधून (एस सी आणि एस टी) आले आहेत. या दलित समाजाच्या प्रगतीत मिशनरींनी केलेले योगदान स्पष्ट करण्यासाठी येथे मुद्दामच अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्याचा एक उदाहरण म्हणून उल्लेख केला आहे.
देशातील विविध राज्यांतील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ख्रिस्ती समाजाला मिशनरींनी असाच मदतीचा हात दिला आहे. नवख्रिस्ती समाज बाल्यावस्थेत असताना मिशनरींनी केलेल्या मदतीबद्दल समाजाच्या या पिढ्या कृतज्ञ राहिलेल्या आहेत.
हरेगावची संत तेरेजा, संगमनेरची ज्ञानमाता, पुण्यातील सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूट, लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट या शाळा, मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज, बंगलोरचे सेंट जॉन मेडिकल कॉलेज, मदर तेरेसांची जगभर पसरलेली अनाथगृहे या सर्व ख्रिस्ती धर्मीयांनी चालविलेल्या संस्था आहेत. मात्र यापैकी सर्वच संस्थांतील बहुतांश लाभार्थी हे अख्रिस्ती समाजातील असतात हे विशेष. याचे कारण म्हणजे या सर्व संस्था सर्व धर्माच्या आणि जातीच्या व्यक्तींसाठी खुल्या आहेत. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह देशातील विविध क्षेत्रांतील नामवंतांनी ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांत शिक्षण घेतले आहे. ख्रिस्ती मिशनरींनी देशाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेले हे एक मोठे योगदान आहे.
ख्रिस्ती मिशनरी आपल्या संस्थांचा वापर छुप्या पद्धतीने, आर्थिक प्रलोभन दाखवून वा सक्तीने धर्मांतर करण्यासाठी करतात असा अनेकदा आरोप केला जातो. ख्रिस्ती शाळा-कॉलेजात शिकलेल्या, मिशनरींच्या इस्पितळात उपचार घेतलेल्या वा इतर मिशनरी संस्थांच्या सेवेचा लाभ घेतलेल्या अख्रिस्ती व्यक्तीच या आरोपात कितपत तथ्य आहे हे सांगू शकतील.
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वर्षे मिशनरींनी दुर्लक्षित ग्रामीण भागात शैक्षणिक, वैद्यकीय सेवा मुक्तपणे पुरविली. लाभार्थींच्या जाती-धर्माचा त्यांनी कधी विचार केला नाही. मिशनरी वृत्तीची सेवा हा वाक्प्रचार त्यांच्या या नि:स्वार्थी सेवेमुळेच रूढ झाला आहे. धार्मिक कार्य करतानाच धर्मप्रचाराच्या अनुषंगाने ख्रिस्ती मिशनरींनी गेल्या पाच शतकांच्या काळात भारताच्या विविध राज्यात साहित्य, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्र वगैरे क्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. यापैकी केवळ काही मिशनरींच्या कार्याचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.
त्यापैकी विल्यम केरी, पंडिता रमाबाई, रेव्ह. ना. वा. टिळक, बाबा पदमनजी, मदर तेरेसा आदींचे कार्य सर्वपरिचित आहे. ‘निरोप्या’कार आर्चबिशप हेन्री डोरिंगसारख्या मिशनरींचे कार्य मात्र आज विस्मृतीच्या छायेत गेले आहे. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करूनही कालौघात विस्मृतीत गेलेले असे अनेक मिशनरी आहेत.
भारतातील ख्रिस्ती धर्माचा इतिहास या धर्माच्या इतिहासाइतकाच म्हणजे दोन हजार वर्षांचा आहे. येशू ख्रिस्ताचा शिष्य असलेल्या संत थॉमसने भारतभूमीवर केरळ राज्यात ख्रिस्ताचे वचन सांगितले तेव्हापासून या देशात ख्रिस्ती धर्माची परंपरा आहे. ख्रिस्ती धर्म पाश्चियमात्य आहे असा बहुप्रचलित गैरसमज आहे. मध्ययुगीन काळात हिंदुस्थानात युरोपातून आलेल्या मिशनरींनी देशाच्या इतर राज्यात या धर्माचा प्रसार केला, त्यावर हा गैरसमज आधारित आहे.
ख्रिस्ताचा जन्म आशियातील इस्राएलमध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. त्याचे संपूर्ण जीवितकार्य इस्राएलच्या एका छोट्याशा परिसरात मर्यादित होते. त्यामुळे हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध आणि शीख धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्माचेही उगमस्थान आशिया खंडातीलच. ख्रिस्ताच्या अनुयायांनी ख्रिस्ती धर्म प्रथम रोममध्ये आणि नंतर इतर राष्ट्रात पसरविला.
भारतातील विविध राज्यांतील धर्मांतरित ख्रिस्ती लोकांनी धर्मांतरानंतरही आपलीमूळची भारतीय वा हिंदू संस्कृती बदललेली नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ख्रिस्ती स्त्रिया आजही नऊवारी वा सहावारी साड्या नेसतात. कुंकू लावतात आणि बांगड्या घालतात. पुरुषमंडळीही इतर बहुसंख्य पुरुषांप्रमाणेच पोशाख वापरतात. ख्रिस्ती धर्मीय व्यक्ती म्हणजे फाडफाड इंग्लीश बोलणारी, फ्रॉकमध्ये वा सुटाबुटात वावरणारी आणि मद्यपान करणारी व्यक्ती हा समज हिंदी चित्रपटात केलेल्या चित्रणामुळे रूढ झालेला आहे.
देशातील बहुतांश ख्रिस्ती समाजाने मात्र अजूनही आपल्या मूळ संस्कृतीची नाळ कायम राखली आहे. याचे कारण म्हणजे ख्रिस्ती धर्म आणि स्थानिक संस्कृती परस्परविरोधी असू शकत नाही, अशी मिशनरींनी घेतलेली ठाम भूमिका होय. रॉबर्ट डी नोबिली आदींसारख्या मिशनरींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्मसंस्थेत वादळ निर्माण झाले होते. मात्र धर्मसंस्थेने हे सत्य नंतर मान्य केले.
ख्रिस्ती धर्माच्या या सांस्कृतीकरणाच्या (इनकल्चरेशन) तत्त्वामुळेच देशातील ख्रिस्ती समाज आपली मातृभाषा आणि इतर संस्कृतीच्या इतर अंगांशी इमान राखून आहे आणि गेल्या दोन-तीन शतकांपासून ही परंपरा चालू आहे. त्यामुळेच अनेक पिढ्यांपासून ख्रिस्ती असलेली केरळ, तामिळनाडूमधील तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आणि मूळची गोमंतकीय असलेली अनेक बार्देस्कर ख्रिस्ती कुटुंबे पूर्णत: शाकाहारी आहेत असे आढळते. ही कुटुंबे मूळच्या ज्या उच्च जातींतून ख्रिस्ती धर्मात आली त्या जातींमध्ये मांसाहार वर्ज्य असे. धर्मांतरानंतर कित्येक दशके त्यांनी आपल्या संस्कृतीत बदल केलेला नाही हे विशेष.
`‘ख्रिस्त महाराष्ट्रात जन्मला असता तर त्यानेही खास मराठमोळ्या पद्धतीने पागोटे वापरले असते. मराठी माणसाप्रमाणे तो जगला असता’, असे ‘निरोप्या’चे तेव्हाचे संपादक फादर प्रभुधर यांनी आपल्या एका संपादकीयात लिहिले होते ते याच अर्थाने.
ख्रिस्ती समाजाची अशी आचारप्रवृत्ती निर्माण करण्यात मिशनरींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मूळचे युरोपियन असले तरी या मिशनरींनी नवधर्मांतरित समाजात स्थानिक संस्कृतीविषयी दुस्वास पेरला नाही. याउलट स्थानिक भाषावाङ्मय वा इतर संस्कृती क्षेत्रात भर घालून या स्थानिक संस्कृतीची जोपासनाच केली. या प्रकल्पासाठी संशोधन करताना तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या अनेक मिशनरींच्या कार्याची ओळख झाली. या सर्वांच्याच कार्याची ओळख ('ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या छोट्याशा पुस्तकातून करून देणे शक्य नव्हते.'
('ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' (२००३) कामिल पारखे या पुस्तकाची प्रस्तावना_)



                                                            हरेगावचे हे भव्य संत तेरेजा चर्च

Thursday, January 3, 2019

धर्माधर्मांतील विटाळ आणि स्त्री-पुरुष समानता Sabarimal temple entry

धर्माधर्मांतील विटाळ आणि स्त्री-पुरुष समानता
पडघम - सांस्कृतिक           goo.gl/jaU4qP
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 03 January 2019
  • पडघमसांस्कृतिकशबरीमालाSabarimalaचर्चChurchमशिदMashidअग्यारीAgiaryगुरुद्वाराGurudwara
श्रीरामपुरात आम्ही राहायचो तो परिसर मिश्र जातीधर्मांच्या संस्कृतीचा होता. चार बैठी घरे एका लाईनीत आणि समोरच्या लाईनमध्ये दीड-दोन गुंठ्यांच्या जागांवर बांधलेली सहा-सात स्वतंत्र घरे होती. आमच्या लाईनमधील घरांच्या कुडाच्या भिंती सामायिक होत्या. आमच्या ख्रिस्ती कुटुंबाशेजारी एका बाजूला मुसलमान कुटुंब होते, तर दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंब होते. आणि त्यांच्या शेजारी दुसरे एक मुसलमान कुटुंब होते. समोरच्या लाईनीत प्रशस्त जागेवर एक मुसलमान संयुक्त कुटुंब होते. आणि त्यांना लागून माळी कुटुंबांची सलग स्वतंत्र तीन घरे होती. बाकीचे घरे आणि इमारती लांब अंतरावर असल्याने ही सात-आठ घरांतील माणसे एकमेकांशी विशिष्ट नात्यांनी घट्ट बांधली गेली होती. प्रत्येक घराच्या चालीरीती, श्रद्धा, सणवार, आहार वेगळ्या होत्या.
आमच्या ख्रिस्ती आणि शेजारच्या मुसलमान घरांत अमुक वारी चुलीवर काय शिजते, याची इतरांना कल्पना असायची. तरीसुद्धा या घरांतील निदान बायांचे तरी दुसऱ्या घरातील थेट स्वयंपाकघरांपर्यंत जाणे-येणे असायचे. ते विशिष्ट वार वगळून इतर दिवशी भाजी-कालवणाची देवाणघेवाण व्हायची. या सर्व घरांतील पुरुषांचे कपडे सारखेच असले तरी महिलांची वेशभूषा मात्र पूर्णतः वेगळी होती. मुसलमान महिला कुंकू लावत नसायच्या, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नसायचे, मात्र इतर बायांप्रमाणे पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे असायचे. माळी कुटुंबातल्या बाया कपाळावर आडवे कुंकू लावायच्या, तर माझी आई आणि शेजारची मराठा बाई गोल कुंकू लावायची. वेगवेगळ्या जातीधर्माच्या असल्या तरी या सर्व बाया डोक्यावर पूर्ण पदर घ्यायच्या. दिवाळीला हिंदू कुटुंबांतून सर्व शेजाऱ्यांना फराळाचे ताट जायचे, ईदला मुसलमान घरांतून शिरकुर्माच्या वाट्या आणि कटोऱ्या जायच्या आणि नाताळाला आमच्या घरातून सर्वांना फराळाचे ताट जायचे. त्यात दिवाळीसारखेच म्हणजे करंज्या, अनारशे शेव वगैरे पदार्थ असायचे.
दर महिन्यातून काही दिवस शेजारच्या माळी-मराठा घरांतील बाया ‘बाहेर बसायच्या’, म्हणजे तसे त्या एकमेकींना सांगायच्या तेव्हा ते कानावर पडायचे. त्या दिवसात त्या बाया घरांत स्वयंपाक करत नसत. सर्व घरकामांतून त्यांना सुट्टी मिळत असे. कारण त्या ‘विटाळशी’ आहेत असे सांगितले जाई. आमच्या घरात आणि शेजारच्या मुस्लीम कुटुंबांत मात्र असा प्रकार नसायचा. आमच्या घरात दोन वहिनी, थोरली बहीण होती. मात्र विशिष्ट दिवसांत जुन्या सुती रंगीबेरंगी पातळांपासून बनवलेल्या मोठ्या रुमालाच्या आकाराची फडकी दोरीवर उन्हात वाळायला टाकली जायची. अमुक मुलीला ‘पदर आला’ असे संभाषण यायचे. त्या काळात शाळांत लैगिक शिक्षण हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे मी दहावीच्या परीक्षेनंतर घर सोडले, तेव्हापर्यंत हा काय प्रकार आहे, हे कळालेच नव्हते. नंतरची अनेक वर्षे म्हणजे लग्न होईपर्यंत सडाफटिंग असताना मुलांच्या हॉस्टेलात, लॉजमध्ये कॉट बेसिसवर किंवा इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर भाड्याचे घर शेअर करताना महिलांचे काही विशेष प्रश्न असतात याची कल्पनाच नव्हती.
औरंगाबादमध्ये ‘लोकमत टाइम्स’मध्ये रुजू झालो, तेव्हा माझा एक बातमीदार सहकारी आलम मुस्तफा याच्याबरोबर दर शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान शहरातील मशिदीत नमाज पढण्यासाठी जात असे. क्राईम रिपोर्टर असलेला आलम तसा खूपच बेडर आणि तितकाच आक्रमक असल्यामुळे माझ्यासारखी परधर्मी व्यक्ती मशिदीत आल्यामुळे कुणी काही गडबड केली, तर तो परिस्थिती योग्य प्रकारे हाताळेल याची मला पूर्ण खात्री होती. मात्र तसा प्रसंग कधीही आला नाही. मशिदीत गेल्यावर तिथल्या वाहत्या नळावर आलम हातपाय धुई, तसे मीही करत असे. नंतर डोक्यावर रुमाल पांघरून आलमकडे पाहत नमाजाच्या सर्व कृती मी करत असे. हे करताना आपण काही धर्मद्रोह करतो आहे किंवा कुणाच्या भावना दुखावतील असे करतो आहोत, असे आलमला किंवा मला चुकूनही कधी वाटले नाही.
त्यावेळी आलमबरोबर नमाज पढताना मला एक गोष्ट खटकायची. ती म्हणजे त्या मशिदीत शंभर-दीडशे भाविकांमध्ये एकही महिला नसायची! चर्चमध्ये वेगवेगळ्या वयोगटाच्या महिला अगदी अपरिचित पुरुषांबरोबर बाकांवर दाटीदाटीने बसत असतात. त्यामुळे मशिदीतील महिलांची ही अनुपस्थिती मला प्रकर्षाने जाणवायची.
आपल्यापैकी बहुतेकांना दुसऱ्यांच्या, अगदी आपल्या मित्रांच्या धर्मस्थळांबद्दल, तेथील रीतीरिवाजाविषयी काहीच माहिती नसते. या धर्मस्थळांत इतरधर्मियांना किंवा महिलांना प्रवेश असतो की नाही, प्रवेश असल्यास काय रीतीरिवाज पाळायचे याची माहिती नसते. महिलांना धर्मस्थळांत प्रवेश आहे का, असल्यास, पुरुष आणि महिला शेजारीशेजारी बसू शकतात की, नाही याची माहिती नसते. बहुतेक धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये चपला, बूट बाहेर काढावे लागतात, मात्र जिथे बसण्यासाठी बाके असतात, त्या चर्चमध्ये हा नियम नसतो. मशिदीत आणि गुरुद्वारात शिरताना बोडक्या डोक्याने न जाता डोक्यावर रुमाल व टोपी असावी लागते. याउलट पाश्चिमात्य शिष्टाचारानुसार चर्चमध्ये शिरताना टोपी, हॅट वगैरे काढावी लागते. 
मला आठवते, माझ्या लहानपणी ग्रामीण महाराष्ट्रात ख्रिस्ती भाविक मोठे पागोटे वा गांधी टोपी घालून चर्चमध्ये शिरायचे. त्यावेळी इतर लोक करत असलेल्या टोपी, पागोटे काढून ठेवण्याच्या खाणाखुणामुळे त्यांचा मोठा गोधळ उडत असे.
माध्यमिक शाळेत असताना रविंद्रसिंग धुप्पड नावाचा माझा एका जिवलग मित्र होता. त्या कारा वर्षांत आम्हा दोघांचेही एकमेकांच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. त्यांच्याकडे दुधदुभते भरपूर असायचे. त्यामुळे दर आठवड्याला त्याची आई आमच्याकडे ताकाचे मोठे पातेले पाठवत असे. मात्र धुप्पडबरोबर गुरुद्वारात जाण्याचा कधी योग आला नाही. 
युएनआय वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी जाल खंबाटा यांची दिल्लीहून गोव्यात बदली झाली, तेव्हा आमची चांगली गट्टी जमली होती. तेव्हा गोव्याचे नायब राज्यपाल के. टी. सातारावाला हे पारशी असले तरी पणजीत आगियारी नव्हती. त्यामुळे पारशी मंदिराची फारशी माहिती मिळाली नाही. नंतर कळाले की, केवळ पारशी असलेल्या व्यक्तींनाच आगियारीत प्रवेश असतो.
बुद्धविहारात जाण्याचा, नातेवाईक आणि सहकारी पत्रकार मित्रांचे बुद्ध धर्मपद्धतीने होणाऱ्या लग्नसमारंभात हजर राहण्याचा योग अनेकदा लाभला आहे. पुण्यातील अनेक पत्रकारमित्रांनी माझ्या लग्नाच्या वेळी पहिल्यांदाच चर्चमध्ये प्रवेश केला होता आणि तेथील प्रार्थना कशा होतात हे पाहिले होते.
महाराष्ट्रीयन, मल्याळी आणि तामिळ महिला चर्चमध्ये डोक्यावर पदर किंवा दुपट्टा, ओढणी घेतात, मात्र ख्रिस्ती चर्चमध्ये भिन्नभिन्न संस्कृतीचे भाविक असल्याने हे बंधनकारक नसते. नाताळ सणाच्या वेळी आणि नूतन वर्षारंभाच्या मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनेला अनेक बिगरख्रिस्ती लोक मोठ्या संख्येने चर्चमध्ये कुतूहल वा औत्सुक्य म्हणून हजर असतात. त्याबद्दल कुणाचा काही आक्षेप नसतो. यावेळी धर्मगुरू फक्त जाहीर करतात की, कम्युनियन हे सांक्रामेंत (स्नानसंस्कार) किंवा ख्रिस्तप्रसाद हा केवळ ख्रिस्ती भाविकांसाठीच आहे, इतरांनी कृपया पुढे येऊ नये. तरीही कुणी पुढे आल्यास धर्मगुरू त्यांच्या कपाळावर आशीर्वादाची खूण करून पुढच्या भाविकास ख्रिस्तप्रसाद देतात.
औरंगाबादमध्ये असताना एका ज्येष्ठ धर्माचार्यांच्या एका धार्मिक समारंभास आणि पत्रकार परीषदेला मी हजर होतो. कार्यक्रम संपल्यानंतर धर्माचार्यांच्या शिष्यांनी तेथे जमलेल्या महिलांनी त्यांच्याजवळ येऊ नये, त्यांना स्पर्श करू नये धर्माचार्यांभोवती कडे केले होते. अशा कडेकोट बंदोबस्तात स्वामीजी आपल्या गाडीपाशी आले आणि मार्गस्थ झाले. महिला म्हणजे मोक्ष मार्गातील धोंड ही यामागची एक भावना. 
यासंदर्भात एका बोधकथा आठवते. एक स्वामीजी आपल्या शिष्यपरिवाराबरोबर नदीकाठी आले, तेव्हा एका सुंदर तरुण स्त्रीने त्यांना नदीच्या दुसऱ्या काठावर नेण्याची विनंती केली. स्वामींनी तिला खांद्यावर घेऊन नदीपार केली आणि आपल्या मार्गाने चालू लागले. तेव्हा एका शिष्याने त्यांना म्हटले की, एक संन्यासी असताना तुम्ही त्या तरुणीला खांद्यावर कसे घेतले? स्वामीजी हसले आणि म्हणाले, “त्या तरुणीला मी खांद्यावरून कधीच जमिनीवर ठेवले आणि विसरलोसुद्धा. तुझ्या मनातून मात्र ती अजूनही गेलेली दिसत नाही.”
विश्वामित्राच्या कठोर तपस्येचा भंग मेनका या अप्सराने केला ही गोष्ट आपण विसरू शकत नाही. दुसऱ्या एका धर्माचार्याच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेली त्यांची व्रते आणि नियम मला अजूनही आठवतात- “कुठल्याही वयाच्या महिलांना आम्ही कधीही स्पर्श करत नाही. अगदी नुकतेच जन्मलेले बाळ मुलगी असेल तरीही आम्ही त्या अर्भकाला हात लावत नाही. ब्रह्मचर्याचे इतके कठोर व्रत आम्ही पाळतो.”
पंतप्रधान इंदिरा गांधींनाही कुठल्याशा प्रार्थनास्थळांत शिरण्यास परवानगी नाकारण्यात आली होती असे आठवते. मात्र त्यांनी या प्रकरणाचा फारसा बाऊ केला नव्हता. ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक पंथांतही धार्मिक व्रत स्वीकारलेल्या महिलांना म्हणजे नन्सना पौराहित्याचे म्हणजे चर्चमध्ये मिस्साविधी करण्याचे, बाप्तिस्मा करण्याचे, लग्न लावण्याचे कुठलेही अधिकार नसतात. पाश्चिमात्य देशांत ख्रिस्ती धर्मगुरूंची संख्या वेगाने रोडावत असली तरी नन्सना पौराहित्याचे अधिकार नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता कमीच आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मांत असलेल्या विटाळासंबंधीच्या शिवाशिवीविषयी आपल्या ‘बहिष्कृत भारत’मध्ये लिहिले आहे. मासिक ऋतूच्या काळात स्त्रियांना यहुदी आणि पारशी धर्मांत अस्पृश्य किंवा विटाळशी मानले जात असे त्यांनी म्हटले आहे. मात्र ही अस्पृश्यता तात्पुरती, तात्कालिक असते, हिंदू धर्मातील अस्पृश्यतेच्या प्रथेप्रमाणे जन्माधारित आणि कायम स्वरूपाची नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले आहे. ‘बायबल’मध्येही बारा वर्षे रक्तस्त्रावाचा विकार असलेल्या आणि त्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या स्त्रीने येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या काठाला गुपचूप स्पर्श केला आणि ती तत्क्षणी बरी झाली असा उल्लेख आहे.
सध्या केरळच्या शबरीमाला मंदिरात मासिक पाळी येण्याच्या वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यावरून रणकंदन माजले आहे. गेल्या शतकांत पुण्यातील पर्वती मंदिरात आणि नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे आंदोलन, सत्याग्रह झाले होते. अमेरिकेत १९५०च्या दशकांपर्यंत आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांना बसमध्ये गोऱ्या लोकांबरोबर प्रवास करता यावा, मतदानाचे आणि इतर समान नागरी हक्क मिळावेत यासाठी रेव्ह. डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांच्या नेतृत्वाखाली लढा द्यावा लागला होता. त्यात किंग यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. पंढरपुरातील विठोबाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साने गुरुजींना उपोषण करावे लागले होते, याची यानिमित्ताने आठवण झाली. जगातील सर्वच समाजांत लिंगनिरपेक्ष वा इतर कुठलेही भेद नसलेली समानता गाठण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे निश्चित.
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com

Sunday, May 27, 2018

Church consistent in secular, pro-Constitution poll stance

Church consistent in secular, pro-Constitution poll stance

Camil Parkhe
Saturday, 26 May 2018    goo.gl/GgS2fm  
The Catholic Bishops Conference of India (CBCI), the apex body of the Catholic Church in the country, issues nationwide appeal to the faithful before the general polls to vote for those who will uphold the fundamental rights of the citizens, ensure social, communal harmony and well-being of all citizens, protect democratic rights and secular principles as enshrined in the Constitution. The Election Commission of India has never found contents of these appeals as objectionable or partisan to any particular political parties. 
A few days back, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis called on Vasai Archbishop Felix Machado at the Bishop’s House, ahead of the Lok Sabha by-poll in Palghar constituency. This parliamentary seat has a sizeable population of Christians. The Christians can decide the poll outcome in this Lok Sabha seat and two assembly constituencies. CM Fadnavis had therefore called on the Archbishop to woo the votes of the Christians.
CM Fadnavis cannot be blamed for calling on the Archbishop to seek the minority votes for the BJP. It is an open secret that the Church does play an important role in shaping the views of its faithful in any poll. When there are attacks on the Christians or when their rights on food consumption, freedom of worshiping and preaching are threatened, the Church has always been very vocal in voicing its concerns. The period of elections therefore serves as an occasion for the Church to caution the faithful to vote wisely to ensure protection of these rights. The recent appeal of Delhi’s Archbishop Anil Couto therefore should be seen as in consistence with the Church’s practice to periodically ask Christians -  and also others - to vote for those who will uphold all the democratic rights enshrined in the nation’s Constitution and protect the secular fabric of the nation. A look at Archbishop Couto’s pastoral letter will reveal that he has not said anything objectionable.
The Catholic Bishops Conference of India (CBCI), the apex body of the Catholic Church in the country, issues nationwide appeal to the faithful before the general polls to vote for those who will uphold the fundamental rights of the citizens, ensure social, communal harmony and well-being of all citizens, protect democratic rights and secular principles as enshrined in the Constitution. The Election Commission of India has never found contents of these appeals as objectionable or partisan to any particular political parties.  
In the recent years, the country has seen an alarming rise in the atrocities against the dalits, Muslims and Christians in connection with the issues of consumption of beef, cow slaughter, cow vigilantism, conversion and Ghar Wapsi. The members of the Christian community, a majority of whom are erstwhile dalits and tribals, are directly affected by these sensitive issues and the Church has on a regular basis voiced its concerns to safeguard the rights of its flock. The period before any elections therefore is used by the Church all over the country to appeal to the devotees and others to vote only for those who will preserve the nation’s social harmony and secular fabric.
Unfortunately, some political parties and organisations perceive these appeals as directed against them. The words such as secular, nationalist and nationalism, patriotism, freedom of expression and dissent have obtained altogether different connotations in the recent years. Those espousing the cause of secularism, freedom of expression, freedom of religion and democratic principles are therefore perceived to be the critics of the powers that be. Delhi’s Archbishop Anil Couto’s well-intentioned appeal is a victim of this perverse perception.  
Full text of Archbishop Couto’s letter
“We are witnessing a turbulent political atmosphere, which poses a threat to the democratic principles enshrined in our Constitution and the secular fabric of our nation.
It is our hallowed practice to pray for our country and its political leaders all the time but all the more so when we approach the General Elections.
As we look forward towards 2019 when we will have [a] new Government, let us begin a Prayer Campaign for our country from May 13, 2018 which marks the Anniversary of the Apparition of the Blessed Mother at Fatima, consecrating ourselves and our nation to the Immaculate Heart.
I request that we observe a Day of Fast every Friday of the week by foregoing at least one meal and offering our penance and all our sacrifices for our spiritual renewal and that of our nation.
Moreover, I earnestly request that we organise an hour of Eucharistic Adoration every Friday at a convenient time in all our parishes, religious houses and institutions, specifically praying for our nation.”