Showing posts with label Lokmat. Show all posts
Showing posts with label Lokmat. Show all posts

Sunday, March 27, 2022

 पत्रकारांसाठी असलेल्या सेवासुविधां

                                        Indian Express Pune Resident Editor Prakash Kardaley

ही खूप, खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, १९९०च्या आसपासपासची म्हणजे तीस वर्षांआधीची. माझ्या पत्रकारितेतील कारकिर्दितील गोवा-पर्व आटोपून मी पुण्याला नव्यानेच सुरु झालेल्या `इंडियन एक्सप्रेस'ला रुजू झालो होतो. निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांनीच मला औरंगाबादच्या `लोकमत टाइम्स'मधून बोलावून या राष्ट्रीय पातळीवरच्या इंग्रजी दैनिकात आणले होते.

`लोकमत' वृत्तसमूहाला त्याकाळात न्यायमूर्ती पालेकर वेतन आयोग माहितच नव्हता. कर्दळे यांनी मात्र या पालेकर वेतन आयोगानुसार बातमीदाराच्या वर्गात सर्वात शेवटची म्हणजे सर्वाधिक रक्कम असलेली वेतनश्रेणीचा पगार मला दिला होता, म्हणजे त्याकाळात पुण्यातल्या एक्सप्रेस कार्यालयात बातमीदारांमध्ये माझा पगार सर्वाधिक होता. एक्सप्रेसमध्ये त्यावेळी सिनियर रिपोर्टर किंवा चिफ रिपोर्टर या पदांवर कुणीच नव्हते. आम्ही सर्व बातमीदार - मुले आणि मुली - तिशीच्या आतले होतो.
`लोकमत टाइम्स'मध्ये महिना बाराशे पगार मिळवणारा मी आता इंडियन एक्सप्रेसमध्ये सर्वात खालच्या पदावर असूनही माझा महिना अडीच हजार रुपये पगार होता ! आणि याविषयी तक्रार असण्याची गरजच नव्हती.
माझ्या माहितीनुसार पालेकर वेतन आयोगाची अंमलबजावणी करणाऱ्या पुण्यातल्या अगदी `केसरी' आणि `सकाळ' या दैनिकांतही बातमीदारांना इतका पगार नव्हता, याचे कारण त्यावेळी एक कोटी रुपये वार्षिक उलाढाल (!) असणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या सर्वात वरच्या वेतनश्रेणीत असायच्या.
तर पुण्यात स्थिरस्थावर झाल्यावर म्हणजे स्वतःचे बिऱ्हाड केल्यानंतर मी पिंपरी चिंचवडहून पुण्याला कॅम्पात दररोज प्रवास करु लागलो. पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (पीएमटी ) निगडी-हडपसरच्या बसने अर्ध्या तासाच्या या प्रवासाला एकमार्गी साडेतीन रुपये लागायचे. दररोज सात रुपये प्रवासखर्च.
काही दिवसांनंतर कोणी तरी मला भरवून दिले कि पीएमटी मार्फत पत्रकारांना मोफत प्रवासासाठी पासेस दिले जातात.
बहुतांश वेळेला पत्रकारांसाठी असलेल्या अशा सेवासुविधांचा फायदा भुरटे पत्रकारच म्हणजे पूर्णवेळ पत्रकार नसलेले लोक उपटत असतात. एकवेळ पूर्णवेळ श्रमिक पत्रकार असलेल्या पत्रकारांना कधीच न मिळणाऱ्या या सेवासुविधा या भुरट्या पत्रकारांना मिळतात, याचे कारण बहुतांश वेळेस वृत्तपत्र कार्यालयात नोकरीला असलेल्या पत्रकारांना सरकारचे accreditation- अधिस्वीकृती - नोंदणी मिळत नाही, गावोगावची ही भुरटी पत्रकार मंडळी मात्र accredited - अधिस्वीकृत - असतात,
दहा टक्क्यात घर मिळवायला, एसटीतून फुकट प्रवास करायला, अतिशय आलिशान असलेल्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये आरामात राहायला ही accredited मंडळी पात्र असतात. तर मुद्दा असा होता कि मुळात पूर्णवेळ श्रमिक पत्रकार नसलेली मंडळी पत्रकारांसाठी असलेल्या पीएमटी च्या मोफत प्रवासाच्या पासचा लाभ घेत असतील तर आपण खरेखुरे पत्रकार - बातमीदार- असताना हा पास का मिळवू नये ?
अशी मनाची तयारी करुन मग मी निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांना या सिटी बसच्या मोफत प्रवासासाठी इंडियन एक्सप्रेसच्या कोट्यातल्या पाससाठी शिफारसपत्राची मागणी केली. प्रत्येक दैनिकासाठी अशी दोन मोफत पासेस त्यावेळी असायची.


कर्दळे यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि संपादक आणि पत्रकार या नात्याने आपण स्वतः अशा मोफत पास आणि सवलती घेण्याविरुद्ध आहोत असे स्पष्टपणे मला सांगितले.
इंडियन एक्सप्रेस हा वृत्तपत्र समूह पत्रकारांना आणि इतर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार चांगला पगार, वर्षाला जवळपास दिडदोन महिन्यांच्या पगारी रजा, प्रवास भत्ता, घरभत्ता देते. त्यामुळे पत्रकारांनी सरकारकडून वा कुणाकडूनही फुकटच्या सेवासुविधा घेऊन त्यांचे मिंधे होऊ नये, आणि अशाप्रकारे बातम्या देताना अशाप्रकारे कुठलेही मिंधेपण किंवा भिती नसावी, (No favour or fear ) असे आपले मत आहे असे कर्दळे यांनी मला सांगितले.
''But Camil, if you are nonetheless still keen on having this PMT pass, I will issue an official letter to the PMT administration..."" कर्दळे म्हणाले.
मात्र तरीही मला गरज असल्यास किंवा त्यांच्या मताशी मी सहमत नसल्यास संपादक म्हणून माझ्या नावाने शिफारस पत्र देण्यास ते तयार होते.
मी मात्र पीएमटीचा फुकट पस मिळवण्याबाबत ठाम होतो.
कर्दळे यांचे शिफारस पत्र घेऊन मी पीएमटी जनरल मॅनेजरला स्वारगेट ऑफिसात भेटलोही. मात्र त्या एका भेटीनंतर मी याबाबत पाठपुरावा केला नाही आणि अशाप्रकारे स्वतःचे हातपाय चिखलात बरबटून घेण्यापासून वाचलो.
पत्रकारांसाठी असलेल्या विविध जंकेटस चा लाभ घेण्याविरुद्ध मी कधीही नव्हतो, अशा खूप junkets चा मी लाभार्थी आहे. अशाच जंकेटचा फायदा घेऊन तिनेक वर्षांपूर्वी थायलंड सरकारने आयोजित केलेल्या दहा दिवसांच्या थायलंड भेटीत सकाळ वृत्तसमूहाच्या `सकाळ टाइम्स' चे आणि भारताचेही मी प्रतिनिधित्व केले. जगातल्या सत्तरेक पत्रकारांमध्ये भारतातल्या पाच मोजक्या पत्रकारांमध्ये माझा समावेश होता. पण तो जंकेटसचा विषय वेगळा, त्याविषयी पण एकदा सविस्तर लिहिन. .
महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या आमदारांना मुंबईत फुकट नाही पण सत्तर लाख रुपयांत घर देण्याविषयीची चर्चा येथे वाचली आणि हे एक जुने प्रकरण आठवले.

Sunday, July 29, 2018

Chages in newspaper technology पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रवास



रविवार, २९ जुलै, २०१८



पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रवास  goo.gl/yDdWFM 
मंगळवार, २४ जुलै, २०१८कामिल पारखे
कोणताही व्यवसाय अनेकविध बदलांतून प्रवास करतो. वृत्तपत्र व्यवसायाने खूप मोठे तांत्रिक बदल थोड्या काळात बघितले. या बदलांचा पट, ते अनुभवलेल्या एका बातमीदाराच्या नजरेतून.
आधुनिक छपाई तंत्रज्ञानाचा शोध लागला पंधराव्या शतकात. तेव्हापासून कागदावर शब्दे उमटू लागली.  मात्र जोहानस गटेनबर्गने  हा शोध लावल्यानंतर त्यानंतर विसाव्या शतकापर्यंत या तंत्रज्ञानात फारशी प्रगती झाली नव्हती. पुस्तके  आणि वृत्तपत्रे जुन्याच पद्धतीने म्हणजे खिळ्यांची अक्षरे जुळवून छापली जात. ही पुरातन पद्धत भारतात अगदी १९८०च्या दशकापर्यंत चालू होती. मी पत्रकारितेची सुरुवात केली ती १९८१ साली.  तेव्हा मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेतील  वृत्तपत्रांच्या छापखान्यांत  खिळ्यांची अक्षरे जुळवून छपाई होत असे. अशा छपाईच्या आणि बातमी संकलनाच्या अगदी जुन्या  पद्धतीपासून  तो थेट आताच्या अत्याधुनिक पद्धतीच्या पत्रकारितेमध्ये झालेल्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. लँडलाईन, टेलिव्हिजन आणि मोबाईल फोन नसलेल्या काळात,  रेडीओची मर्यादित स्वरूपाची वार्तासुविधा असताना पत्रकारीतेची सुरुवात  करुन आजच्या अत्याधुनिक प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अगदी मोजक्या पत्रकारांमध्ये  मीही  आहे. यादरम्यानच्या काळात वृत्तपत्रांच्या तंत्रज्ञान वापरात आणि  बातमी संकलनांत, कामकाज पद्धतीत आणि एकंदर पत्रकारीतेत किती स्थित्यंतरे घडून आली आहेत याची नव्या पिढीला कल्पनाही करता येणार नाही. 
पणजीतून प्रकाशित होणाऱ्या द नवहिंद  टाइम्स या इंग्रजी दैनिकात मी नोकरीस लागलो होतो.  डेम्पो उद्योगसमूहाच्या द नवहिंद  टाइम्सचे आणि नवप्रभा या मराठी दैनिकाचे काम एकाच इमारतीत चालत असे. नवप्रभा या मराठी वृत्तपत्राची छपाई या खिळ्यांची अक्षरे जुळवून व्हायची. जुळारी हा आपल्या समोर रचलेल्या विविध छोटयाछोट्या खोक्यांमधून अगदी वेगाने आपल्याला हवे ते शब्द, जोडशब्द, कानामात्र, वेलांटी, उकार  आणि ओलांट्यासह निवडत असे आणि काही शब्दांची एका ओळ रचून नंतर दुसरी ओळ सुरू करत असे.  बोल्ड, इटॅलिक्स आणि छोट्यामोठया, विविध आकाराच्या टाइपांच्या  अक्षरांसाठी वेगळी खोकी असत. 
त्यामानाने द नवहिंद  टाइम्स या इंग्रजी दैनिकाच्या छपाईतंत्रात मात्र फारच मोठी मजल मारण्यात आली होती.  इंग्रजी लिखाण कंपोझिगसाठी तेथे भल्या मोठया आकाराचे आणि अवजड सात-आठ लायनोटाईप सेटिंग मशीन होते.  त्या मशीनमध्ये झिंक  वितळून त्यापासून अक्षरे असणारी एका छोटीशी चकती तयार केली जात असे.  लायनोटाईप ऑपरेटरसमोर किबोर्ड असायचा त्यावर ठराविक संख्येंचे शब्द टाईप करुन कळ दाबली की  त्या भल्यामोठया मशीनचे विविध भाग हलत आणि काही सेकंदात उकळत्या बॉयलरमधून झिंकचा ठराविक निवडलेल्या शब्दांची एक ओळ संच तयार व्हायची. झिंकचा ती ओळ थंड झाल्यावर त्या अनॆक ओळी एकत्र रचून त्याची प्रुफे  प्रूफरिडिंगला पाठवली जात. देवनागरी लिखाणात एखादया शब्दाची स्पेलिंगची चुक झाल्यास फक्त तेवढा शब्द दुरुस्त केला जाई, मात्र लायनोटाईप  मशीनवर इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाल्यास त्या झिंक धातूची पूर्ण ओळ बदलावी लागे. लायनोटाईप  मशिन्स अवजड असल्याने ती तळमजल्यावर असत तर  मराठी अक्षरजुळणीचे काम लाकडी तुळयांचे फ्लोअरिंग असलेल्या पहिल्या मजल्यावर चालायचे. 
कृष्णधवल फोटो छापण्यासाठी त्याकाळात फोटोवरून ब्लॉक केले जात असत आणि जुळवलेल्या बातम्यांबरोबर चौकटीत तो ब्लॉक ठेवला जाई.  हा ब्लॉकमेकर लाल दिवा असलेल्या अंधाऱ्या खोलीत काम करता असे.  नेहेमी वापरल्या जाणाऱ्या फोटोसाठी हे ब्लॉक्स लाकडावर माऊंट केले जात आणि पुनर्वापरासाठी जपवून ठेवले जात. पीआयबीने दिल्लीहून पाठवलेले पंतप्रधानांचे, इतरांचे  फोटो घटनेनंतर चार-पाच दिवसांनंतर छापले जात. 
१९८०च्या दशकात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया (यूएनआय ) ही दोन वृत्तसंस्था वृत्तपत्रांचे एका मोठे आधारस्तंभ असत. मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा सरचिटणीस असताना माझे वृत्तसंपादक मला म्हणत असत की आम्ही सर्व बातमीदार संपावर गेलो तरी  पीटीआय आणि युएनआयच्या  मदतीने ते बारा पानांचा पेपर सहज प्रसिद्ध करू शकतील ते यामुळेच. पीटीआयचे टेलिप्रिंटरचे मशीन लाकडी  बॉक्सचे तर युएनआयचे टेलिप्रिंटर स्टीलच्या बॉक्समध्ये असायचे. एखादी खूप मोठी महत्त्वाची  बातमी असेल ( त्यावेळी  ' ब्रेकिंग न्युज' हा शब्द फारसा रूढ झाला नव्हता) तर टेलिप्रिंटरवर लागोपाठ बेल वाजू लागेल. कामावर असलेला एखादा उपसंपादक मग काय बातमी आहे  हे पाहण्यासाठी टेलिप्रिंटरकडे येई आणि त्या बातमीची दाखल घेऊन सिनियरांना तशी कल्पना दिली जाई.   
एके दिवशी सकाळी  मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात असताना सकाळी दहाच्या दरम्यान टेलिप्रिंटरची घंटा सारखी वाजू लागली तेव्हा मी तिकडे सहज गेलो आणि मला धक्काच बसला.  केवळ एकच वाक्य पुन्हापुन्हा टाईप करत टेलिप्रिंटरवर घंटा वाजत होती. तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४ आणि ते धक्कादायक वाक्य होते : प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी शॉट अॅट'. त्यानंतर ऑफिसातील सर्व माणसे त्या टेलिप्रिंटरपाशी ताबडतोब जमा झाली हे सांगायलाच नको. साडेबाराच्या  दरम्यान ते वाक्य बदलले आणि  'प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी शॉट अॅट, फीयर्ड डेड' या वाक्यानंतर टेलिप्रिंटरवर सतत घंटा वाजत राहिली. सकाळी झालेल्या गोळीबारात इंदिरा गांधींचें निधन झाले ही बातमी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या संध्याकाळी उशिरा जाहीर केली होती.   
म्हाफुसिल किंवा प्रादेशिक बातमीदारांसाठी त्याकाळात टेलिग्राम हे एक महत्त्वाचे साधन होते. गोव्यात मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना कोल्हापुरच्या  'पुढारी' या वृत्तपत्राचा पणजी येथील स्ट्रींगर बातमीदारसुद्धा  होतो. बातम्या पाठविण्यासाठी 'पुढारी'ने  मला टेलिग्राम कार्ड दिले होते. यासाठी मात्र मराठी बातम्या रोमन लिपीमध्ये लिहाव्या लागत. पोस्टात टेलिग्राम ऑपरेटर मग त्या संबंधित वृत्तपत्राला पाठवत असे.
महाराष्ट्र सरकारच्या एसटी गाड्या या म्हाफुसिल बातमीदारांचे महत्त्वाचे आश्रयस्थान असायचे. आपल्या बातम्या, वार्तापत्रे, जाहिरातीचा मजकूर आणि कृष्णधवल फोटो  एका पाकिटात घालून हे बातमीदार त्यांच्या संबंधित वृत्तपत्रांच्या शहरी जाणाऱ्या एसटी बसच्या ड्रायव्हरकडे सोपवत असत, तो ड्रायव्हर मग वृत्तपत्रांच्या गेटपाशी लांबूनच फेकता असे आणि वॉचमन ती पाकिटे उचलून संपादकीय टेबलांकडे पाठवत असे. औरंगाबादला जालना रोडच्या महामार्गावर असलेल्या लोकमतच्या कार्यालयासमोर हा प्रकार सारखा चालूच असे. वृत्तपत्र कार्यालय प्रवासाच्या वाटेवर नसल्यास त्या वृत्तपत्राच्या पोस्टबॉक्समध्ये ती पाकिटे टाकली जात. वृत्तपत्र कार्यालयातील शिपाई  दिवसातून दोनदा- तिनदा हे पोस्टबॉक्स उघडून त्यातील पाकिटे  नेत असे. 
याच काळात कंपोझिंगच्या कामासाठी वृत्तपत्रांत संगणक दाखल  झाले आणि अक्षरजुळारीचे पद आणि  लायनोटाईप मशिनची गरज गायब झाली. मात्र मराठी बातमीदार त्यानंतरही अनेक वर्षे आपल्या बातम्या हाताने लिहित असत तर  इंग्रजी वृत्तपत्रांमधील आम्ही बातमीदार टाइपरायटरवर टाईप करत असू. इंग्रजी वृत्तपत्रांतील संपादकिय विभागातील सर्वच जण म्हणजे अगदी बातमीदार- उपसंपादकापासून तो थेट मुख्य संपादकांपर्यंत सर्व जण आपापले लिखाण स्वतः टाईप करत असत. मराठी पत्रकारितेत मात्र बातमीदारांनी आणि मुख्य संपादकांनी  स्वतः संगणकावर लिखाण करण्यास खूप उशिरा सुरुवात केली.  त्याकाळात मराठी दैनिकांचे मुख्य संपादकही  स्वतः हाताने लिहायचे वा स्टेनोला डिक्टेट करायचे. 
बल्गेरियात १९८६ मध्ये  पत्रकारितेचा अभ्यासक्रम केल्यानंतर परत येताना मी दोन अत्यंत मूल्यवान वस्तू घेऊन आलो होतो. या वस्तू म्हणजे अडीच किलो वजनाचा एक पोर्टेबल टाईपरायटर आणि एक कॅमेरा. रॅमिंग्टन कंपनीचा तो टाईपरायटर मी  बल्गेरियन चलनी नोटा १०० लेव्ह देऊन म्हणजे एक हजार रुपयांना मी विकत घेतला होता आणि तो कॅमेरा दहा लेव्हला म्हणजेच  शंभर रुपयांस विकत घेतला होता. त्याकाळात पत्रकारितेत उपयुक्त ठरणाऱ्या या दोन वस्तू असणारा गोव्यातील मी एकमेव बातमीदार होतो! याच काळात कृष्णधवल फोटोग्राफी मागे पडून रंगीत फोटोग्राफी सुरु झाली.   
गोवा सोडल्यानंतर श्रीरामपूरला काही महिने सार्वमत या मराठी दैनिकात उपसंपादक होतो. तेथे मुंबई  किंवा नागपूरला चाललेल्या विधिमंडळाच्या सत्रांच्या काळात बॅटरी असलेल्या रेडिओवरील विधिमंडळाचे समालोचन आम्ही उशिरा संध्याकाळी  ऐकायचो. त्यानुसार  दुसऱ्या दिवसाच्या प्रमुख बातम्या आम्ही तयार करायचो. 
१९८०च्या दशकात  वृत्तपत्र कार्यालयांत केवळ सीनियर लोकांसाठी स्वतःचे टेबल आणि टाईपरायटर असायचे. माझ्यासारखे ज्युनियर रिपोर्टर आणि इतरांसाठी एकच जुना झालेला टाईपरायटर आणि एक लांबरुंद टेबल असायचा. औरंगाबादला मी लोकमत टाइम्सला जॉईन झालो तेव्हा मला पहिल्यांदा स्वतःचा टेबल आणि टाईपरायटर मिळाला. एक वर्षानंतर म्हणजे १९८९ ला पुण्यात इंडियन एक्सप्रेसला जॉईन झालो तेव्हा पुन्हा एकदा एका लांब मोठया  टेबलावर बसून सामायिक टाईपरायटर वापरायची पाळी आली. नंतर तेथे संगणकावर काम सुरू झाले तरी सुरुवातीला हे संगणकसुद्धा एक कॉमन प्रॉपर्टी असायची. सन  १९९९ ला पुण्यातच फर्गसन कॉलेज रोडवरच्या 'टाइम्स ऑफ इंडिया'त कामाला लागलो, तेव्हा पुण्यातले ते पहिलेच वातानुकूलित वृत्तपत्र कार्यालय होते. तेथे मला पहिल्यांदाच स्वतंत्र क्युबिकल, पीसी आणि गोलगोल फिरणारी खुर्ची मिळाली!  
१९९०च्या सुमारास भारतात इंटरनेटचा वापर सुरू झाला. याकाळात 'आयुका'चे  संचालक डॉ. जयंत नारळीकर यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्याकडून 'इलेक्ट्रॉनिक मेल'मुळे  जगातील शास्त्रज्ञांशी संवाद साधणे सोपे झाले आहे असे ते म्हणाले. त्यावेळी  'इलेक्ट्रॉनिक मेल' ही संकल्पनाच मला कळाली नव्हती. ई-मेल नंतर व्यवहाराचा एका अविभाज्य भाग होईल अशी त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती. त्याकाळात इंटरनेट कसे फायदेशीर आहे आणि त्याचा वापर कसा करावा यासंदर्भात पुणे श्रमिक पत्रकार संघाने आपल्या सदस्यांसाठी कार्यशाळाही  आयोजित केली होती. 
आज आम्ही सर्व पत्रकारमंडळी  इंग्रजी किंवा मराठी भाषेत बातमी किंवा लेख लिहिल्यानंतर आणि स्वतःच काढलेले फोटो त्याबरोबर जोडून संपादकांना इमेल करतो, त्याची अनेकदा एका मिनिटांत पोचही येते. या बातम्या ऑनलाईन आवृत्तीवर ताबडतोब प्रसिद्धही होतात.  लँडलाईन फोनचीही सुविधा नसलेल्या काळात पत्रकारिता सुरू केलेल्या माझ्यासारख्या पत्रकारास हे आजही स्वप्नवत वाटते आणि यापुढे आणखी काय असेल याबद्दल औत्सुक्यही  आहे.