Thursday, December 25, 2025
Saturday, May 22, 2021
हुतात्म्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड पाहता ‘हुतात्मा’ होण्याची पाळी कुणावरही येऊ नये, असेच वाटते!
‘अक्षरनामा पडघम - माध्यमनामाकामिल पारखे

- प्रातिनिधिक चित्र
- Wed , 31 March 2021
- पडघममाध्यमनामाअण्णा हजारेAnna Hazareशेतकरी आंदोलनFarmers' Protestहुतात्माMartyr
पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ला बातमीदार म्हणून १९८९च्या नोव्हेंबरात रुजू झालो. त्यानंतर काही दिवसांनी एक घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते किसन बाबुराव उर्फ अण्णा हजारे वाढत्या वीजदराबद्दल आणि अनियमित वीजपुरवठ्या विरोधात प्राणांतिक उपोषणाला बसले होते. आठव्या-नवव्या दिवशी राळेगण सिद्धीजवळ आंदोलन चिघळून झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात काही शेतकरी ठार झाले होते.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांनी मला ताबडतोब घटनास्थळी जाण्यास सांगितले. ‘लोकसत्ता’चे बातमीदार सुनील कडुस्कर आणि छायाचित्रकार मिलिंद वाडेकर यांच्याबरोबर शिरुरच्या दिशेने निघालो.
पुणे-अहमदनगर हमरस्त्यावर पारनेर फाट्यावर वाडेगव्हाण गावापाशी पोहोचलो. तिथला सन्नाटा थरकाप उडवत होता. रस्त्यालगत असलेल्या त्या गावातल्या चाळीवजा बैठ्या घरांना बाहेरून कड्याकुलुपे लावून लोक गायब झाले होते. शेताकडे गेलो तसे तिथे बायामुलांच्या आणि इतरांच्या रडण्याने काळीज फाटत गेले. रस्त्यावर काही फुटांच्या अंतरावर कपड्याने झाकलेले मृतदेह दिसत होते. आसपास उभे असलेले शस्त्रधारी पोलीससुद्धा सुन्न दिसत होते. चार-पाच शेतकऱ्यांनी या गोळीबारात जीव गमावला होता. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात ही प्राणहानी झाली, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. पोलिसांच्या गुंडांबरोबर झालेल्या चकमकीच्या म्हणजे एनकाऊंटरच्या घटनेत असे स्पष्टीकरण देण्यात येते.
गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचा क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर म्हणून याआधी मी सात-आठ वर्षे काम केले होते, पण मृत्यूचे असे तांडव इतक्या जवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ. गोव्यात त्या काळी प्राणघातक अपघात किंवा एखाद्या खुनाची घटना क्वचितच घडायची. दरोड्याची तर एकही घटना मी कव्हर केली नव्हती. त्या वेळी ती झाकलेली प्रेते पाहून मी हबकून गेलो होतो. काही तासांनी पुण्याला परत आलो, तेव्हा अहमदनगरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या वतीने वीजप्रश्नाचा विचार करण्याचे आश्वासन दिल्यामुळे अण्णा हजारे यांनी लिंबूरस घेऊन आपले बेमुदत उपोषण मागे घेतल्याची बातमी वृत्तसंस्थांनी दिली आहे, असे समजले.
हजारे यांचे हे पहिले बेमुदत उपोषण. यात तीन-चार शेतकऱ्यांनी जीव गमावला, त्यामुळे साहजिकच या आंदोलनाची राज्यभर आणि काही प्रमाणात देशपातळीवर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली. त्या काळी अहमदनगर शहरातील किंवा जिल्ह्यातील विविध दैनिकांचे स्थानिक बातमीदार हजारे यांना फारशी प्रसिद्धी देत नसत. त्यांची बातमी द्यावी, असा मुख्यालयातून निरोप आला किंवा अगदी टाळता येत नसेल तरच नाईलाज म्हणून बातमी दिली जात असे. यामागे स्थानिक ताकदवान राजकीय नेतृत्वाचा हजारे यांच्याविषयीचा राग होता, असे मला नंतर समजले.
हजारे आणि माझे पुढच्या काळात व्यक्तिगत संबंध निर्माण झाले. हजारे स्वतः आपली टंकलिखित प्रसिद्धीपत्रके आणि इतर माहिती पोस्टाने पाठवत असत. त्या खाली ‘किसन बाबुराव उर्फ अण्णा हजारे’ अशी सही असे. मी नियमितपणे या बातम्यांना प्रसिद्धी देत असे.
ही ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यातील काही पत्रे आजही माझ्याकडे आहेत. मात्र ज्या आंदोलनाने हजारे यांना पहिल्यांदाच राज्य पातळीवर आणि देशपातळीवर ओळख निर्माण करून दिली, त्या आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या बायका-मुलांचे काय झाले, त्यांना नुकसानभरपाई मिळाली का, वगैरे प्रश्न मला आजही सतावतात. त्यांना हुतात्मे म्हणून कुणी सन्मान दिला नाही, कारण त्या आंदोलनाला कुठल्याही राजकीय पक्षाचे वा नेत्याचे पाठबळ नव्हते.
हजारे यांनीही नंतर या मृत शेतकऱ्यांचा विषय लावून धरल्याचे आठवत नाही. हजारे यांनी राळेगण सिद्धीत ग्रामविकासाचे काम केले. नंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या टर्मच्या अखेरीस जनलोकपालच्या नेमणुकीसाठी अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासह ‘जनआंदोलना’चे नेतृत्व करून अण्णा हजारे ‘नव्या स्वातंत्र्यचळवळीचे महात्मा गांधी’ बनले. त्यांच्या सामाजिक चळवळीतील या वाढत्या आलेखाविषयी लिहिणाऱ्यांना त्या चार गरीब शेतकरी आंदोलक हुतात्म्यांविषयी माहितीही नसते.
पुण्याहून अहमदनगरला जाताना वा पुण्याला येताना शिरुरजवळ असलेल्या पारनेर फाट्यापाशी वाडेगव्हाण गावाला आल्यावर आताही मला ते झाकलेले मृतदेह आणि बायामुलांचा तो आक्रोश आठवतो.
बातमीदारांना घटनेचे वार्तांकन करताना प्रत्यक्ष घटनास्थळी असावे लागते, आंदोलन करणाऱ्या लोकांत मिसळावे लागते, अशा वेळी अचानक हिंसाचार झाला तर पत्रकार म्हणून आम्हाला वा त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर कुणालाही कसले संरक्षण असते?
गोव्यात पणजी येथे १९८०च्या दशकात रांपणकारांचे म्हणजे समुद्रात जाळे टाकून मासे पकडणाऱ्या मच्छिमारांचे आंदोलन चालू होते. ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून मी त्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानापाशी असताना कुठूनतरी दगडफेक झाली आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्यसा लाठीमार केला. तेवढ्याने गर्दी न पांगल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मी इतरांप्रमाणेच दिशा दिसेल तिकडे धावू लागलो. पत्रकारितेत नवखा असलो तरी अशा घटनेत स्वतःच्या रुमालाने अश्रुधुरापासून स्वतःचे कसे संरक्षण करावे, हे मी शिकलो होतो. शिवाय अश्रुधुरानंतर गोळीबारही होऊ शकतो, हे मला पक्के ठाऊक होते. निष्कारण हुतात्मा होण्याची गरज नव्हती, हे खरेच होते.
या घटनेनंतर पणजीतल्या मध्ययुगीन राजवाडा असलेल्या सचिवालयातील प्रेसरूममधील काही पत्रकारांनी आंदोलनाच्या आणि इतर संवेदनाशील घटनांचे वार्तांकन करणाऱ्या बातमीदारांनी ‘प्रेस’ असे लिहिलेले आर्म बँड्स वापरावेत अशी सूचना केली होती. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टच्या प्रमोद खांडेपारकर आणि बालाजी गावणेकर वगैरेंनी ती सूचना ‘हास्यास्पद’ म्हणून धुडकावून लावली. अशा ओळखचिन्हामुळे पत्रकार आपसूकच हल्ल्याचे लक्ष्य ठरू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते.
औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’मध्ये बातमीदारी करताना घडलेला एक प्रसंग. शहरातल्या गुलमंडी परिसरात काही खोदकाम चालू असताना जमिनीत अचानक मोठे भगदाड पडले आणि खाली वेगवान पाण्याचा प्रवाह दिसू लागला. मध्ययुगीन म्हणजे मुस्लीम आणि नंतरच्या मुघल अमदानीच्या काळात पाणीपुरवठ्याच्या भूमिगत यंत्रणेचे असे अवशेष औरंगाबाद आणि अहमदनगर शहरांत अधूनमधून दिसतात.
माझा सहकारी असलेला एक तरुण अतिउत्साही बातमीदार लगेचच स्वतःच्या कमरेला दोरखंड बांधून त्या भुयारात शिरून त्या पाण्याच्या प्रवाहाचे स्तोत्र शोधण्याच्या कामाला लागला. त्याला रोखण्याचा मी खूप प्रयत्न केला. त्या अंधाऱ्या भुयारात उतरण्यात खूप जोखीम आहे. दुसरे म्हणजे हे बातमीदाराचे काम नाही. यात काही बरेवाईट झाले तर महिना बाराशे पगार देणारे आमचे दैनिक आतल्या पानावर किंवा फार तर पान एकवर ‘बातमीदाराचे कर्तव्य पार करताना हौतात्म्य’ अशी छायाचित्रासह बातमी छापेल. पण त्याने माझे ऐकले नाही. सुदैवाने त्या पाण्याचा वाहता प्रवाह काही मिनिटांत थांबला. तो सहकारी बातमीदार सुखरूपपणे त्या भगदाडाबाहेर आला आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. तिथे नंतर पोहोचलेल्या महापालिकेच्या लोकांना त्यात फार काही विशेष महत्त्वाचे आढळले नाही.
पुण्यात ‘सकाळ टाइम्स’साठी पिंपरी चिंचवड शहराचा बातमीदार असताना २०११ साली घडलेली एक घटना आठवते. मावळ तालुक्यातल्या पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बंद पाइपलाइन टाकण्याची योजना मंजूर झाली होती. त्या वेळी विरोधात असलेल्या राजकीय पक्षाने या योजनेस विरोध करून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले होते. अचानक या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि पोलिसांच्या गोळीबारात तीन लोक ठार झाले. आज त्या घटनेस दहा वर्षे झाली, पण निवडणुकीच्या काळात हमखास त्या मृत लोकांना ‘हुतात्मे’ संबोधून प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाविरुद्ध आजही तोफ डागली जाते. ‘या हुतात्म्यांनी सांडलेले रक्त वाया जाऊ देणार नाही’ अशा घोषणांनी आपल्या पारड्यात मते टाकण्यास सांगितले जाते.
या हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याच्या, त्यांच्या मुलाबाळांना सरकारी, महापालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याच्या आश्वासनांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही, अशा बातम्या अधूनमधून येतात. त्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांची आज काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करवत नाही. ‘ज्याचे जळते, त्याला कळते’ असे म्हणतात.
अशा प्रकारे प्राण गमावलेल्या हुतात्म्यांच्या नावावर होणारे राजकारण, सत्ताकारण आणि त्याच वेळी हुतात्म्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड पाहता ‘हुतात्मा’ होण्याची पाळी कुणावरही येऊ नये, असे वाटते.
Wednesday, April 21, 2021
महाराष्ट्रातील ख्रिस्ती मतदारांचा कौल कुणाला ?
महाराष्ट्रातील ख्रिस्ती मतदारांचा कौल कुणाला?
- प्रातिनिधिक छायाचित्र
- Mon , 22 April 2019
महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ख्रिस्ती समाजाचे प्रमाण अवघे दोन टक्के आहे! लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यातील ख्रिस्ती समाजाची सर्वाधिक संख्या आहे ती कॉस्मोपॉलिटन मुंबई आणि या महानगराच्या उपनगरांत. याचे कारण म्हणजे पोर्तुगीज संस्कृतीचा वारसा असलेला मूळचा गोवन आणि त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील वसईचा कॅथॉलिक समाज इथे मोठ्या संख्येने स्थायिक आहे. तसेच दक्षिणेतील कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथीय केरळी, तामिळ, तेलुगू, बंगाली, कारवारी, मँगलोरीयन ख्रिस्ती समाज आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व इतर प्रदेशातील लोक मुंबई आणि नजीकच्या परिसरात असल्याने तेथील अनेक विधानसभा-लोकसभा मतदारसंघांत ख्रिस्ती समाजाची मते निर्णायक नसली तरी महत्त्वाची ठरू शकतात.
मुंबईखालोखाल ख्रिस्ती समाजाचे सर्वाधिक प्रमाण वसई तालुक्यात आहे. वसईत पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांच्या ताब्यातील आणि चिमाजीअप्पांनी चढाई केलेला वसईचा किल्ला अजूनही एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. वसईच्या या पोर्तुगीजांनीच मुंबई बेट इंग्रजांना लग्नात आंदण म्हणून दिले आणि हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेचा शिरकाव झाला, हा इतिहास आहे. वसई तालुक्यात सर्वच खेड्यापाड्यांत कॅथॉलिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथे फिरताना चौकाचौकांतील क्रूस आणि मदर मेरीचे पुतळे पाहून नवागताला गोव्यात आल्याचा आभास होतो.
यामुळेच व्हॅटिकनने या तालुक्यासाठी १९९८ साली खास नवा धर्मप्रांत स्थापून तेथे थॉमस डाबरे या भूमिपुत्राची बिशप म्हणून नेमणूक केली होती. भौगोलिकदृष्ट्या भारतातील हा एक अगदी छोटा धर्मप्रांत! येथील ख्रिस्ती लोकांची स्वत:ची वेगळी बोलीभाषा आहे, आगळीवेगळी संस्कृती आहे. दोन दशकांपूर्वी अल्पसंख्याकांचा प्रतिनिधी महाराष्ट्र मंत्रिमंडळात हमखास असे. त्या काळी वसईतून किंवा मुंबईतून निवड झालेल्या ख्रिस्ती आमदाराची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निवड होत असे.
मुंबई आणि वसाईखालोखाल पुणे जिल्ह्यात आणि त्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यात ख्रिस्ती समाजाची संख्या लक्षणीय आहे. पुणे जिल्ह्यातील ख्रिस्ती समाज मुंबईप्रमाणेच स्थलांतरित कुटुंबांचा आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून कामधंद्यानिमित्त मोठ्या संख्येने पुणे आणि पिंपरी चिचंवड या उद्योगनगरीत स्थलांतरित झाले आहेत. याशिवाय या ख्रिस्ती समाजात गोवन, मूळचा गोवन असलेला सीमाभागेतील बार्देसकर समाज, मल्याळी, तामिळ वगैरे लोकांची संख्या लक्षणीय आहे. अहमदनगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतल्या काही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीत या समाजाचे मतदान निर्णायक ठरू शकते अशी परिस्थिती आहे.
अहमदनगर शहर आणि जिल्हा हे महाराष्ट्रीयन ख्रिस्ती जनतेचे ‘जेरुसलेम’ मानले जाते, इतके या परिसराचे या समाजाशी ऋणानुबंध आहेत. याचे कारण दोनशे वर्षांपूर्वी येथे प्रथमच मोठ्या प्रमाणात धर्मांतर होऊ लागले आणि धर्मांतराची ही लाट अनेक दशके चालू राहिली. त्याचे लोण नंतर शेजारच्या गोदावरीच्या तीरावरील औरंगाबाद जिल्ह्यात पसरले. त्यामुळेच या दोन जिल्ह्यांत गावोगावी चर्च आढळतात. या चर्चतर्फे मराठी-इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि दवाखाने चालवले जातात.
मराठवाड्याच्या लातूर वगैरे जिल्ह्यातही ख्रिस्ती समाज आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मतमाऊलीच्या म्हणजे मारियामातेच्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने येतो, तेव्हा मराठी ख्रिस्ती समाजाचे राज्यातील अस्तित्व, जनसंख्येचे प्रमाण आणि संभावित व्होट बँक यांचा थोडाबहुत अंदाज येतो. मतमाऊलीच्या यात्रेच्या वेळी मारियामातेच्या दर्शनाला फुले-हार आणि मेणबत्त्या घेऊन येणारे विविध पक्षांचे स्थानिक राजकीय पुढारी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या आगमनाची वर्दी जमलेल्या गर्दीला करून देता असतात ते यामुळेच.
पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील ख्रिस्ती जनता पूर्वाश्रमीची दलित असली तरी रिपब्लिकन पक्षांशी वा दलित चळवळीशी क्वचितच एकरूप झाली. दलित वर्गांतून ख्रिस्ती झालेली जनता अनेकदा ‘जय भीम’ आणि ‘जय ख्रिस्त’ या संबोधनाच्या पेचात अडकलेली असते. दादासाहेब रूपवतेंच्या काळात पहिल्यांदाच राज्यातील सत्ताधारी पक्षाला अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील एक व्होट बँक म्हणून ख्रिस्ती समाजाची ओळख पटली होती. नंतर मात्र हा समाज विशिष्ट पक्षाच्या दावणीला जुंपला गेला किंवा गृहित धरला गेला. राज्यातील प्रत्येक जातीजमातीला राजकीय नेतृत्व लाभले, तसे या समाजाचे झाले नाही. त्यामुळे कदाचित असे झाले असेल.
महाराष्ट्राच्या सीमेच्या असलेल्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील बेळगाव या जिल्ह्यांत बार्देस्कर समाज या नावाने ओळखला जाणारा एक वेगळाच ख्रिस्ती समाजघटक आहे. घरांत कोकणी भाषा बोलणाऱ्या आणि डिसोझा, फर्नांडिस, गोन्सालवीस अशी पोर्तुगीज धाटणीची आडनावे धारण करणारा हा समाज मूळचा गोव्यातील बार्देस या तालुक्यातील. अठराव्या शतकामध्ये पोर्तुगीज राजवटीत बार्देस तालुक्यातील अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी ब्रिटिश इंडियातील सीमाभागांत स्थलांतर केले आणि तेथेच आपले मूळ धरले. तेथे शेतजमिनी घेतल्या, मासेविक्रीचा व्यवसाय केला. मात्र गेली दोन-तीन शतके या बार्देस्कर मंडळींनी गोव्यातील आपल्या मूळ गावाशी, तेथील जमीनजुमल्याशी आणि कोकणी भाषेशीही फारकत घेतलेली नाही हे विशेष.
त्यांच्या गोवा या मूळ वतनभूमीत मात्र त्यांची संभावना ‘घाटी’, ‘घाटावरचे’ अशीच केली जाते! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण तालुक्यांत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, इचलकरंजी तालुक्यांत बार्देस्कर समाजाची संख्या लक्षणीय आहे. या तालुक्यातील जुनी चॅपेल्स आणि चर्च शंभर-दोनशे वर्षांची जुनी आहेत. सीमाभागातील ही बार्देस्कर मंडळी खरे तर समाजशास्त्रज्ञांसाठी आणि कोकणी-मराठी भाषाअभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय ठरू शकतात. या बार्देस्कर मंडळींपैकी अनेकजण आज पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईत स्थायिक झाले आहेत.
महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज असा विविध शहरांत आणि जिल्ह्यांत विभागला आहे. एकच धर्म असलेला हा समाज कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स वगैरे पंथांत विभागला आहे. या समाजातील विविध प्रदेशांतील विविध समाजघटकांची संस्कृती, जीवनशैली, आर्थिक राहणीमान, भाषा आणि बोलीभाषाही विभिन्न आहेत. त्याचप्रमाणे मूळ हिंदू धर्मातील अठरापगड जातीजमाती पोटजाती ख्रिस्ती मानल्या जाणाऱ्या लोकांतही असतात. उदाहरणार्थ, सारस्वत, नायर, नंबुद्रीपाद, रेड्डी, महार, मातंग, भंडारी, क्षत्रिय, चर्मकार वगैरे वगैरे. आपल्या महाराष्ट्रात कांबळे, केळकर, टिळक, सोनकांबळे, वाघ, बनसोडे वगैरे ख्रिस्ती आडनावांवरून जाणकारांना त्यांच्या मूळ जातीचा लगेच संदर्भ लागतो, त्याचप्रमाणे गोन्सालवीस, मॅथ्यू, अब्राहाम, थॉमस, फर्नांडिस, नायडू, वर्गिस संगमा, मुंडा या नावावरून त्या ख्रिस्ती व्यक्तीची मूळ प्रादेशिक पार्श्वभूमी चटकन लक्षात येते.
वसईतील ख्रिस्ती समाजाचे लातूरच्या वा अहमदनगरच्या ख्रिस्ती समाजाशी किंवा मालवणच्या बार्देस्कर समाजाशी कुठलेच साम्य नाही. तसेच गोवन ख्रिस्ती लोकांचे तामिळ व मल्याळी ख्रिस्ती लोकांशी रोटीबेटीचे व इतर कसलेही संबंध नसतात. अगदी एकाच शहरात राहणारे हे लोक एकाच चर्चमध्ये दर रविवारी प्रार्थनेसाठी एकत्र येत असले तरीसुद्धा! एवढी वैविधता आणि विरोधाभास देशातील इतर कुठल्याही धार्मिक समुदायात आढळणार नाही. हा विरोधाभास असूनसुद्धा इतरांच्या म्हणजे बहुसंख्य समाजाच्या दृष्टिकोनातून हा ख्रिस्ती समाज हा एकगठ्ठा, एकजिनसी एक धार्मिक समूहच असतो. याचे कारण बहुतेकांना ख्रिस्ती धर्माच्या वैश्विक स्वरूपाची आणि त्याचप्रमाणे पंथीय भेदांची माहिती नसते. त्यामुळे अनेकदा काही विचित्र प्रसंग आणि गंमतीजमतीही होतात.
तर असा हा महाराष्ट्रातील अठरापगड जातीजमातींचा, विभिन्न भौगोलिक संस्कृतींचा, वेगवेगळ्या बोलीभाषा आणि भाषा बोलणाऱ्या आणि विविध पंथांच्या ख्रिस्ती समाजाला देश वा महाराष्ट्र पातळीवरच्या निवडणुकीच्या संदर्भात व्होट बँक म्हणून एक समुदाय म्हणून संबोधता येईल काय? देशात लोकसंख्येच्या दोनअडीच टक्के प्रमाण असल्याने या समाजाला राजकीय पक्षांना दुर्लक्षित करता येणे शक्य नाही, हे अनेकदा दिसून आले आहे. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असताना त्यांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघातून २००४ साली अल्पमतांच्या फरकाने निवडणूक हरले, तेव्हा त्या मतदारसंघात काही भागात लक्षणीय संख्या असलेल्या ख्रिस्ती मतदारांची नाराजी त्यांना भोवली, असा जाहीर ठपका त्यावेळी ठेवण्यात आला होता
ख्रिस्ती समाजात प्रचंड वैविधता असली तरी त्यांना एकत्र गुंफणारे काही समान धागे आहेत. देशातील बहुसंख्य ख्रिस्ती समाज हा पूर्वाश्रमीच्या मागासवर्गीय आणि ईशान्य राज्यांत आदिवासी समाजांतून आला आहे. त्यांचे सण आणि उपासनापद्धती आणि अगदी आहारसुद्धा (मांसाहार आणि बीफसेवन) सर्वसाधारणपणे समान आहे. देशांत विविध ठिकाणी संघ परिवाराच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्यांचे हा समाज लक्ष्य बनलेला आहे. या सगळ्या बाबींचा परिपाक म्हणून एक व्होट बँक म्हणून एका विशिष्ट पक्षाला व विचारधारेला मते देण्याची या समाजाची अगदी जुन्या काळापासूनची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत मात्र गोव्यात आणि अगदी अलीकडेच ईशान्य प्रांतांतील ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या राज्यांतील मतदारांनीही भाजपसारख्या खुलेपणाने हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्या पक्षाला मते दिली आहेत! अर्थात तिथल्या निवडणुकांत भाजपने विकासावर भर देऊन हिंदुत्व, घरवापसी, बीफ बॅन वगैरे मुद्दे गुंडाळून ठेवले होते.
गेल्या वर्षी दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो यांनी आपल्या धर्मप्रातांतील ख्रिस्ती जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेराव यांनीही आपल्या पास्टरल पत्रात देशाची राज्यघटना धोक्यात आहे, असे विधान केले होते. या दोन्ही घटनांनंतर त्यावेळी मोठा गहजब माजला होता. देशातील राजकीय परीस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्याचे काही कारण नाही, असाच त्यावेळी सगळ्यांचा सूर होता. मात्र काही महिन्यानंतर चित्र पालटले आणि आता राजकीय नेत्यांबरोबरच इतरही अनेक जण असाच सूर आळवत आहे हे विशेष! देशातील ख्रिस्ती जनता अल्पसंख्य असली तरी पूर्णतः दुर्लक्षित करण्यासारखी नाही हे यावेळी सिद्ध झाले.
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे एप्रिल २३ ला पुणे, अहमदनगर, शिर्डी, औरंगाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. येथे ख्रिस्ती मतदारांची संख्या अगदी लक्षणीय आहे. चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात एप्रिल २९ रोजी मुंबई आणि पालघर येथे मतदान होणार आहे. तेथे तर राज्यांतील सर्वाधिक ख्रिस्ती मतदार आहेत. महाराष्ट्रातील हे ख्रिस्ती मतदार एका विशिष्ट पक्षाला एकगठ्ठा मतदान करतात का, त्यांची समाज म्हणून इतर जातीजमातींप्रमाणे एक व्होट बँक असते काय, असे प्रश्न विचारात घेण्यासारखे आहेत.
ख्रिस्ती समाजाचा राजकीय चेहरा म्हणून एकाही व्यक्तीला राज्यपातळीवर मान्यता मिळालेली नाही. पालघर जिल्ह्यात वसईत एखाद-दुसऱ्या आमदारकीवर या समाजाला समाधान मानावे लागते आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एखाद्या विशिष्ट समाजाने एखाद्या मतदारसंघात व राज्यपातळीवर कुठल्या उमेदवाराला वा पक्षाला मत दिले हे उघड होतेच. पुढील दोन टप्प्यांत होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील ख्रिस्ती मतदारांची सुप्त स्वरूपातील व्होट बँक कुणाला झुकते माप देते, हे २३ मेच्या निकालानंतर कळेलच.
https://www.aksharnama.com/client/article_detail/3223?fbclid=IwAR3pwv3zNYTM0sE5o1kUPV8YNz2fezdy2KVVqvMBsA_XwkqFVMXnHz2CXPA
Sunday, July 29, 2018
Mali community leaders stake claim to mayor’s post in PCMC
Monday, July 30, 2018, 11:20 AM | e-paper
Mali community leaders stake claim to mayor’s post in PCMC

Tuesday, November 17, 2015
Charismatic, youth conventions inaugurated in Pimpri Chinchwad
Cardinal Cleemis, head of the apex body of the Catholic church in the country, was speaking at the inauguration of the four-day long 16th national Catholic charismatic convention and ‘Kairos Youth Convention 2015’ at St Ursula School grounds in Nigdi on Wednesday morning.
Cardinal Cleemis said, “India is a sacred land having saints, martyrs and living saints of various communities and a land, which offers the world a plurality of divine.”
The CBCI chief urged the gathering not to be exclusive but to be inclusive to serve all who are created in the image of God.
The two national conventions are being attended by a large number of Catholics including priests and nuns from different parts of the country.
The charismatic convention is being held at St Ursula School while the youth convention is being held at St Andrew’s School in Chinchwad. This is the first time that the two-national level conventions are being held in the same city simultaneously.
In his address, Pune district Guardian Minister Girish Bapat who welcomed delegates from different states in the country said that true religion is the one, which preaches spreading love to everyone in the whole world. “All religious shrines, be it temple, church or Gurudwara, are dwellings of God. People should experience God who lives among the poor,” he said.
Archbishop Salvatore Pennachhio, the apostolic nuncio in India, Pune Bishop Thomas Dabre and Silven Miranda, chairman of the local service team, also spoke at the event. The inaugural ceremony was attended by MP Shrirang Barne, MLA Laxman Jagtap, Bishop emeritus Valerian D’Souza.
Shirish Sebastian was the coordinator for the two conventions.
Saturday, September 22, 2012
Pune is my home in India: Peter Vizenetz
www.facebook.com/SakaalTimes
