Thursday, May 1, 2025


 मध्ययुगात वसाहतवादाची सुरुवात झाली तेव्हा पोर्तुगीज सर्वप्रथम भारताच्या किनाऱ्यावर आले.

त्यानंतर आलेल्या डच, इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी पण भारतात ठिकठिकाणी प्रदेश जिंकले. मात्र या देशांनी इथली आपली चंबुगबाळे एकापाठोपाठ उचलली.
सर्वात आधी आलेल्या पोर्तुगीजांनी सर्वात शेवटी म्हणजे साडेचारशे वर्षांनंतर १९६१ साली येथून आपला गाशा गुंडाळला.
भारतीय उपखंडाच्या अगदी चिमुकल्या का होईना आणि एकमेकांपासून काही शेकडे कोस दूर असलेल्या या चार प्रदेशांवर तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी आपली सत्ता गाजवली.
पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को दा गामा आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर. कालिकत येथे १४९८ ला पोहोचला.
त्यानंतर युरोपमधील अनेक राष्ट्रांतील साहसी दर्यावर्दी आणि व्यापारी कंपन्यांची गलबते भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यांवर लागली.
त्यापैकी प्रत्येक राष्ट्राने भारताच्या भूमीवर आपली सत्ता स्थापण्याचे प्रयत्न केले.
पोर्तुगीजांनंतर आलेल्या डच आणि फ्रेंच लोकांनी येथील काही प्रदेशांवर सत्ता गाजवली, ब्रिटिशांनी तर संपूर्ण उपखंडावर दिडशे वर्षे राज्य केले.
विशेष म्हणजे पोर्तुगालच्या राजकन्या कॅथरीन हिच्याशी लग्न करणाऱ्या इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला वरपित्याने आपल्या ताब्यात असलेल्या सात बेटांचे मुंबई या लग्नात चक्क आंदण - हुंडा - म्हणून १६६१ साली दिले होते.
त्यावेळी मुंबई बेटाबरोबरच शेजारच्या वसईत पोर्तुगीजांची सत्ता होती.
ब्रिटिशांनी दिडशे वर्षे येथे राज्य केल्याचे परिणाम तर आपल्याला माहित आहे.
पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले, त्याचे परिणामसुद्धा बऱ्यापैकी संबंधितांना आणि अभ्यासकांना माहित आहे.
मी स्वतः माझा उमेदीचा काळ - शिक्षण आणि पत्रकारितेतील सुरुवातीची नोकरी - गोव्यात घालवल्यामुळे मलाही पोर्तुगीज राजवटीचा गोव्यावर असलेला भलाबुरा प्रभाव माहित आहे.
माझ्या बारावीच्या परीक्षेचे प्रमाणपत्र गोवा, दमण आणि दीव शिक्षण मंडळाचे आहे !
गोव्याबरोबरच पोर्तुगीजांनी गोव्यापासून कितीतरी दूर असलेल्या गुजरातच्या दोन भिन्न टोकांवर किनाऱ्यापाशी असलेल्या दमण, दीव आणि दादरा, नगर हवेली येथेसुद्धा तब्बल साडेचारशे वर्षे राज्य केले.
स्वतंत्र गोवा राज्याची १९८६ साली स्थापना झाल्यावर दीव आणि दमण केंद्रशासित प्रदेश बनला.
अलिकडेच त्यामध्ये दादरा आणि नगर हवेलीचा या केंद्रशासित प्रदेशात समावेश करण्यात आला.
गोवा, दमण आणि दीव भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर १९ डिसेंबर १९६१ ला भारतीय संघराज्यात सामिल झाला.
त्याआधीच - चारपाच वर्ष आधी - पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दादरा आणि नगर हवेली कुठलाही गाजावाजा न होता भारतात सामिल झाले होते.
पत्रकारिता करताना पुण्यात मी रुजू झाल्यानंतर गोव्यातले माझे वास्तव्य संपले. संपर्क, नातेसंबंध आणि ऋणानुबंध अर्थात आजही कायम आहेत.
अलीकडच्या काळात पोर्तुगीजांची जुनी वसाहत असलेल्या दमण, दादरा आणि नगर हवेली येथे माझे काही काळ वास्तव्य असते.
समुद्रकिनारीच असलेले दीव येथून खूप दूर आहे, तिकडे जाण्याचे मला काही कारण आणि प्रायोजनसुद्धा नाही.
एकेकाळी गोव्याप्रमाणेच पोर्तुगीजांच्या Estado de India चा एक भाग असलेला हा चिमुकला दमण, दादरा आणि नगर हवेली प्रदेश मला खूप अचंबित करतो.
गोव्यात पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात.
एक पोर्तुगीज भाषा सोडून.
गोव्यातील माझ्या शालेय आणि कॉलेज जीवनात माझे शिक्षक, सहाध्यायी मुलेमुली आणि बुजुर्ग लोक पोर्तुगीज बोलत.
मी काम करत असलेल्या ` The Navhind Times ' या इंग्रजी दैनिकाचे मालक वसंतराव आणि वैंकुठराव डेम्पो (धेम्पे) यांचे पोर्तुगीज भाषेवर चांगले प्रभुत्व होते.
आता गोव्यात पोर्तुगीज बोलणारे कुणीही आढळणार नाही. गोवामुक्तीनंतर तेथे पोर्तुगीज भाषेचे पूर्ण उच्चाटन करण्यात आले.
शालेय अभ्यासक्रमातील दोन आणि तीन भाषिक धोरणात पोर्तुगीज भाषेचा बळी गेला. असे व्हायला नको होते असे मला आता वाटते.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची मुख्य भाषा गुजराती आहे.
पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाल्यावर गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६७ च्या जानेवारीत सार्वमत घेण्यात आले.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत झालेले भारतातले हे पहिले आणि अखेरचे सार्वमत.
या सार्वमतमध्ये मतदारांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता.
गोव्यातल्या लोकांसाठी : तुम्हाला गोवा स्वतंत्र हवा की गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण हवे आहे.
त्याचप्रमाणे दमण आणि दीव इथल्या लोकांसाठी पर्यायी प्रश्न होता. हे दोन तालुके स्वतंत्र हवे की गुजरातमध्ये त्यांचे विलीनीकरण हवे.
या सार्वंमताचा निकाल अगदी निसटता होता.
अगदी थोड्याशा मतांच्या टक्केवारीच्या फरकाने गोवा, दमण आणि दीवचे त्या वेळी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये विलीनीकरण टळले.
नाहीतर गोवा आज महाराष्ट्रात असता आणि दमण आणि दीव गुजरातमध्ये.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली इथे गुजराती मुख्य भाषा असली तरी दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मराठीभाषिक लोकांचे प्रमाण इथे मोठे आहे.
याचे कारण महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्याला लागूनच दमण, दादरा आणि नगर हवेली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.
गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत (२०२१ला ) दमण आणि दादरा नगर हवेली इथे चक्क (अविभक्त )शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर निवडून आल्या होत्या. अर्थात २०२४ साली त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. .
दमण येथील भव्य किल्ला, गोव्याप्रमाणेच जुने बंगले आणि चर्च यांच्या रुपात पोर्तुगीज वारसा येथे आजही शाबूत आहे.
विशेष म्हणजे दमण, दादरा आणि नगर हवेली येथे कॅथोलीक कुटुंबात आजही पोर्तुगीज बोलली जाते !
गोव्याप्रमाणेच दमण, दादरा आणि नगर हवेली येथील कॅथोलिक युवकांनी मोठ्या प्रमाणात पोर्तुगालला आणि युरोपला स्थलांतर केले आहे.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली प्रदेश अनेक बाजूंनी कायमस्वरुपी `ड्राय डे' गुजरातच्या विळख्यात असला तरी गोव्यासारखी इथेसुद्धा मद्य खूप स्वस्त असते.
साहजिकच विकेंड आणि सुट्ट्यांच्या दिवशी गुजरातहून अनेक लोक गाड्यांनी समुद्रकिनारा असलेल्या दमणला येतात आणि इथे अक्षरशः ट्रॅफिक जॅम असतो..
पोर्तुगालची साडेचार शतके वसाहत राहिलेल्या मात्र सर्वार्थाने दुर्लक्षित राहिलेल्या या प्रदेशाविषयी लिहिण्यासारखे खूप आहे.
Camil Parkhe February 8. 2025

Tuesday, January 28, 2025

 


जोतिबा अणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वमान्य आहे.
मात्र ते दोघे नेमक्या कुठल्या शाळेत शिकले हे आजही निश्चित नाही. याबाबत संशोधकांमध्ये उत्सुकता असेलच.
सावित्रीबाईंनी नगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या मिस सिंथिया फरार यांच्याकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले ती शिक्षणसंस्था म्हणजे या शहरातील माळीवाड्यात आजही चालू असलेली क्लारा ब्रूस स्कुल.
येथेच जोतिबांनी फरार मॅडमची भेट घेतली होती, त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन पुण्यात येऊन त्यांनी तेथे लगेच मुलींसाठी शाळा सुरु केली होती. खुद्द जोतीबांनीच असे लिहिले आहे.
अर्थात क्लारा ब्रूस हे नाव त्यानंतर खूप वर्षांनी या शाळेला देण्यात आले. क्लारा ब्रूस या शाळेच्या अनेक वर्षे प्राचार्य होत्या.
पुण्यात फुले दाम्पत्य जिथे शिकले त्या शाळांबाबत मात्र अशी सुस्पष्टता नाही. जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले, नंतर याच शाळांत ते काही काळ शिक्षक होते.
सावित्रीबाईंनी पुण्यात स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट मिचेल यांच्याकडे अध्यापनाचे शिक्षण घेतले होते.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतिबांनी आपण सुरु केलेल्या शाळा नंतर कमिटीकडे देण्यात आल्या आणि त्या शाळा मिसेस मिचेल चालवत होत्या असे म्हटले आहे.
कुठे आहेत आता त्या शाळा आणि शिक्षणसंस्था ?
अपार उत्सुकतेने काही वर्षांपूर्वी याबाबत सुरु झालेल्या माझ्या शोधाला आता एक निश्चित दिशा मिळते आहे असे वाटत आहे.
फुले दाम्पत्याच्या चरित्राशी आणि कार्याशी निगडित असलेल्या या शिक्षणसंस्थांच्या शोधाला अचानक गती मिळाली ती या पंधरवड्यातच.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळांबाबत कुतूहल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक विश्वस्त दीपक गिरमे यांनी माझा मोबाईल नंबर मिळवून याबाबत माझ्याकडे चौकशी केली तेव्हा.
त्यानंतर समाज कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या असुंता पारधे यांनी मला पुण्यातील स्कॉटिश संस्थांबाबत काही माहिती पुरवली आणि या तपासाला गती मिळत गेली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत स्कॉटिश मिशनरी मार्गारेट आणि जॉन विल्सन हे दाम्पत्य, जॉन मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट त्याचप्रमाणे पुण्यात मार्गारेट आणि जेम्स मिचेल हे दाम्पत्य शिक्षणकार्य करत होते.
मात्र या स्कॉटिश मिशनचे पुण्यात आता मुळी अस्तित्वच नाही असा माझा कालपरवापर्यंत ठाम समज होता.
स्कॉटिश मिशनरींशी संबंध असलेल्या चार नावाजलेल्या शिक्षणसंस्था पुण्यात आजही आहेत हे समजले तेव्हा माझ्या या अज्ञानाबद्दल मला खूप शरमल्यासारखे झाले.
आणि त्याबरोबरच एक सुखद धक्काही बसला होता.
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचा ज्या शिक्षणसंस्थाशी अतूट आणि दीर्घकाळ संबंध होते त्या याच संस्था असतील हे निःसंशय आहे.
घाशीराम कोतवाल उत्तर पेशवाई काळातील एक वादग्रस्त पात्र. विजय तेंडुलकरांच्या नाटकाने हे नाव अनेकांना परिचित झाले आणि अगदी सातासमुद्रापार पोहोचले.
पुणे कॅम्पात असलेला घाशीराम कोतवालचा ऐतिहासिक वाडा अनेक वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाला. मात्र या वाड्याची माहिती आणि एक छायाचित्र त्या जागी उभे करण्यात आले.
आता अस्तित्वात नसलेल्या या घाशीराम कोतवालच्या वाड्याच्या बाजूला आजही एक जुनी वास्तू आणि शिक्षणसंस्था तग धरुन आहे.
ही शिक्षणसंस्था म्हणजे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा. बालवाडी व इयत्ता पहिली ते चौथी.
स्थापना सहा जानेवारी १८२७.
याचा अर्थ भारतात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या काही शाळांपैकी ही एक शाळा आहे.
लवकरच सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा २०० वर्षे पूर्ण करणार आहे.
भारतात सर्वप्रथम प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या त्या बंगाल इलाख्यात.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला.
त्यानंतर मिस मेरी अँन कुक यांनी 1822 मध्ये कोलकात्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या.
अमेरीकन मराठी मिशनच्या मिशनरींनी भारतात - मुंबईत - १८१२ साली प्रवेश केल्यानंतर लगेच तेथे शाळा स्थापन केल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे १८२३ साली शाळा सुरु केल्या होत्या.
मार्गारेट आणि जॉन विल्सन हे नवविवाहित जोडपे स्कॉटलंडहून भारतात १८२८ साली आले, कोकणात मराठी शिकल्यानंतर मुंबईत येऊन १८३२ साली त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरु केल्या.
मुंबईत आजही असलेली सेंट कोलंबा गर्ल्स स्कुल आणि विल्सन कॉलेज त्यांनीच स्थापन केले.
पुण्यातील या प्राथमिक शाळेची मालकी आता जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीकडे असली तरी ही शाळा जॉन विल्सन किंवा स्कॉटिश मिशनरींनी सुरु केलेली नसणार.
याचे कारण स्कॉटिश मिशनरी तोपर्यंत १८२७ साली दख्खनेत - पुण्यात - पोहोचलेसुद्धा नव्हते.
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मार्गारेट आणि जॉन विल्सन आणि इतर स्कॉटिश मिशनरींवर एक प्रकरण लिहिले आहे.
स्कॉटिश मिशनरींशी निगडीत असलेल्या पुण्यातील इतर शिक्षणसंस्था म्हणजे रास्ता पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन कॉलेज, लाल देवळामागे पेट्रोल पंपाशेजारी असलेली सेंट अँड्रयूज मराठी स्कुल आणि पुणे कॅम्पात शिवाजी मार्केटपाशी असलेले सेंट जॉन स्कुल.
तूर्तास इतकेच...
Camil Parkhe, January 27, 2025
All reactions:
Datta Chavan, Pramod Mujumdar and 225 others

Friday, January 17, 2025

गोव्यातील ख्रिश्चनांची संख्या गेल्या काही वर्षां\त झपाट्याने कमी असून याबाबत गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिलाई यांनी केरळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चिंता व्यक्त केली आहे.

याच वाक्याच्या उत्तरार्धांत महनीय राज्यपालांनी जे म्हटले तो खरा तर या देशात अनेकांच्या दृष्टीने खरा चिंतेचा विषय असू शकतो.
मात्र त्यांच्या वाक्याचा उत्तरार्ध हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही, त्यामुळे तिकडे न वळता गोव्यातील ख्रिश्चनांची संख्या गेली काही वर्षे सातत्याने कमी का होत आहे हे पाहता येईल.
गोव्यातील ख्रिश्चन लोक या राज्यात कॅथोलिक म्हणूनच ओळखले जातात. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी या छोट्या प्रदेशात सत्ता मिळवली तेव्हापासून पुढील काही काळ येथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडून आले.
पोर्तुगीज आणि स्पॅनिश हे दोन्ही देश कॅथोलिकांचे बालेकिल्ले. या दोन देशातले साहसी दर्यावर्दी नवे जग शोधायला आपल्या नौका समुद्रात सोडल्या तेव्हा वसाहती मिळवण्याबाबत आणि तेथे ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याबाबत या दोन राष्ट्रांत स्पर्धा होऊ नये म्हणून पोप महोदयांनी संपूर्ण जगाची या दोन राष्ट्रांमध्ये चक्क वाटणीच करून टाकली होती.
पाद्रुआदू आणि प्रोपोगांडा या नावाने जगाची स्पेन आणि पोर्तुगाल राष्ट्रांत विभागणी झाली होती.
पोर्तुगालच्या दर्यावर्दी वॉस्को दा गामा गोव्यात १४९८ साली पोहोचला आणि तेव्हापासून तिथे ख्रिस्ती धर्माचा म्हणजेच रोमन कॅथोलिक पंथाचा प्रसार झाला.
इंग्लंडच्या राजाने मूळ कॅथोलिक पंथापासून फारकत घेत स्वतःचे अँग्लिकन चर्च स्थापन केले होते. आजही इंग्लंडचा राजा अथवा राणी अँग्लिकन चर्चची प्रमुख असते नि या चर्चच्या सर्वोच्च धर्मगुरुची - आर्चबिशप ऑफ कँटरबरीची राजा किंवा राणीच करत असते.
इंग्लंडने स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या, मात्र ख्रिस्ती धर्मप्रसार हे ईस्ट इंडिया कंपनीचे उद्दिष्ट्य कधीच नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांच्या अंमलाखालील भारतात गोवा, वसई, दमण, सिल्व्हासा येथे मोठ्या प्रमाणावर लोक कॅथोलिक झाले तसे ब्रिटिश इंडियात झाले नाही.
प्रोटेस्टंटपंथीय असलेल्या ब्रिटिशांनी ना प्रोटेस्टंट मिशनरींना ना कॅथोलिक मिशनरींना धर्मांतरासाठी प्रोत्साहन दिले. धर्मप्रसाराऐवजी त्यांनी व्यापारालाच प्राधान्य दिले.
दक्षिण गोव्यात कॅथोलिकांची संख्या लक्षणीय आहे, दोन अपवाद वगळता इथल्या मतदारांनी आतापर्यंत नेहेमीच कॅथोलिक उमेदवाराची लोकसभा खासदार म्हणून निवड केलेली आहे. मागच्या निवडणुकीत फ्रान्सिको सार्दिन्हा खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी २०२४ च्या निवडणुकीत कॅप्टन विरिएतो फर्नांडिस दक्षिण गोव्यातून लोकसभेला निवडून आले आहेत.
याच्या अगदी उलट स्थिती उत्तर गोव्याची आहे, तिथे हिंदू बहुसंख्य आहेत आणि गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या (१९६१ - १९८६) आणि गोवा राज्यात इतिहासात इथून नेहेमीच हिंदू उमेदवार लोकसभेवर निवडला गेला आहे.
गोव्याची सध्याची डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याबाबत स्थिती अशी आहे.
अगदी मध्ययुगीन काळापासून गोव्यातले लोक गोवा सोडून हिरव्या कुराणाच्या शोधार्थ इतरत्र जात होते. यात मात्र तेव्हापासून एक मूलभूत फरक होता आणि आजच्या काळातही हा फरक प्रकर्षाने दिसून येतो.
गोव्यातील एक ज्येष्ठ वकील क्लिओपात अल्मेडा कुटिनो यांनी पणजीतल्या `द नवहिंद टाइम्स ' या इंग्रजी दैनिकात गोवा राज्यपालांच्या विधानाच्या अनुषंगाने या विषयावर एक विस्तृत लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला आहे.
गोव्यातील उच्च जातींतील म्हणजे सारस्वत रोमन कॅथोलिक सोळाव्या शतकापासूनच पोर्तुगाल आणि तेथून पोर्तुगालच्या इतर वसाहती देशांत किंवा युरोपातील इतर देशांत जात असत.
आधुनिक संमोहनशास्त्राचा जनक असलेल्या अँबे (फादर) फरिया यांनी रोम आणि फ्रान्समध्ये मोठे नाव कमावले, त्यांचा संमोहन करण्याच्या क्रियेतील पूर्णाकृती पुतळा पणजी येथे आदिलशाही पॅलेसजवळच आहे.
हे अबे फरिया आणि गोव्यातील इतर कॅथोलिक लोकांनी लिस्बन आणि पोर्तुगालमध्ये कार्य केले ते सर्व सारस्वत या वरच्या आणि उच्चभ्रु जातीतले.
फरिया हे मूळचे शेणवी किंवा शिनॉय, म्हणजे सारस्वत .
पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा यांचे घराणे मूळचे गोव्यातील मडगाव येथले. त्याच्या आजोबांनी गोव्यातून स्थलांतर केले होते.
गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे - पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.
१९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे.
वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो
गोव्यातील कॅथोलिक अगदी सोळाव्या शतकापासून गोव्यातून स्थलांतरित होत असले तरी हे प्रमाण नगण्य होते. गेल्या दिडशे वर्षांत स्थलांतरितांची संख्या वाढून येथील लोकसंख्येत कॅथोलिकांचे प्रमाण कमी होत गेले आहे. याचा परिणाम साहजिकच या राज्यातील निवडणूक निकालांवर पडत गेला आहे.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय जनमताच्या रेट्याला प्रतिसाद देत अखेरीस १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कराकरवी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश हा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त करुन भारतीय संघराज्यात सामील केला.
त्यानंतर या केंद्रशासित प्रदेशाचे भवितव्य ठरवण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६७ च्या जानेवारीत या प्रदेशात सार्वमत घेतले. भारतीय संघराज्याच्या इतिहासातील हे पहिलेच आणि आतापर्यंतचे एकमेव सार्वमत.
या सार्वमताद्वारे गोवा, दमण आणि दीव या जनतेने या प्रदेशाचे स्वतंत्र अस्तित्व असावे आणि गोवा महाराष्ट्रात आणि दमण आणि दीव गुजरातेत विलीन करू नये असा निर्णय दिला.
विशेष म्हणजे या चिमुकल्या प्रदेशाचे शेजारच्या राज्यांत विलीनीकरण टळले ते सार्वमताच्या अगदी काही थोडक्या मतांच्या टक्क्याने आणि या सार्वमतात कॅथोलिक लोकांनीं विलीनीकरणाच्या विरोधी जवळजवळ एकगठ्ठा मतदान करून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखले.
गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे याबाबत ४५ टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केले होते यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही.
गोव्याचे महाराष्ट्रात विलिनी व्हावे यासाठी गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि केंद्रीय मंत्रि यशवंतराव चव्हाण यांनीं जोरदार प्रचार केला होता.
गोव्यातील कॅथोलिक पोर्तुगाल किंवा पोर्तुगालच्या इतर वसाहतींत स्थलांतर होणे तसे साहजिकच होते अगदी त्याच प्रमाणे गोव्यातील अनेक हिंदू लोकांनी महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात आणि इतरत्र स्थलांतर केले होते.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची यादी पाहिली कि त्यामध्ये अनेक गोमंतकीय आहेत हे लक्षात येते.
गोवा, दमण आणि दीव पोर्तुगालच्या साडे चारशे वर्षांच्या सत्तेतून १९६१ साली मुक्त केल्यानंतर या प्रदेशातल्या पोर्तुगीज पासपोर्ट असणाऱ्या लोकांना भारतात राहण्याचा किंवा पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेण्याची सोय होती.
अनेकांनी मग साहजिकच पोर्तुगालची आणि त्यामार्गे इतर पाश्चिमात्य देशांची वाट धरली.
गोव्यातील कॅथोलिक लोकसंख्या गोवामुक्तीनंतरच्या काळात ३६ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आली आहे असे आकडेवारीवरून दिसते. नजिकच्या काळात हे प्रमाण असेच घसरत जाण्याची शक्यता दिसत आहे.
रोमन कॅथोलीक पंथात संतती नियमनाची कृत्रिम साधने आणि गर्भपात यावर कागदोपत्री बंदी आहे. पण चर्च या नियमांकडे कानाडोळा करत असते आणि कॅथोलिक लोक सरळसरळ दुर्लक्ष करत असतात हे वास्तव आहे. ख्रिस्ती लोकांची गोव्यात आणि इतरत्र सुद्धा लोकसंख्या कमी होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती. बातमीचा मथळा होता :
Of 70,000 surrendered passports in India in a decade, 40% were in Goa
गोव्यातील कॅथोलिक लोकांनी पोर्तुगालकडे आणि नंतर युरोपियन देशांत इतक्या मोठया संख्येनें स्थलांतर का केले याची अनेक कारणे आहेत.
एक म्हणजे रोजगार. पोर्तुगीज इंडियात उद्योगाची आणि रोजगाराची वानवाच होती. पोर्तुगीजमुळे इतर युरोपियन भाषा शिकणे अधिक सहजसाध्य, पाश्चात्य पेहेराव, खाद्य संस्कृती, ख्रिस्ती धर्म वगैरे अनेक बाबींमुळे लिस्बनकडे जाणाऱ्या जहाजाची वाट धरणे अधिक आकर्षक ठरले.
गोव्यातील हिंदूंच्या तुलनेत कॅथोलिक्स अधिक वेस्टर्नाइज्ड होते, अनेक कॅथोलिक कुटुंबांत पोर्तुगीजमध्ये संभाषण होई, त्यामुलें इंग्रजी शिकणे त्यांना तुलनेत सोपे जाई, त्यांची खाद्य, पेहेराव आणि धार्मिक संस्कृती पाश्चात्य धर्तीची होती.
पोर्तुगालच्या गोव्यातल्या जुन्या मुलखातील कॅथॉलिकांचे प्रमाण १७६४ साली तब्बल ८६ टक्के होते. या ओल्ड काँक्वेस्टमध्ये गोव्यातील बार्देझ, सालसेट किंवा साष्टी, इलिहास (पणजीजवळचा भाग) आणि मार्मुगावचा समावेश होता.
पोर्तुगीजांनी नंतर उत्तर गोव्यावर कब्जा मिळवला आणि तेव्हाच्या नव्या आणि जुन्या मुलखांतील पोर्तुगीज गोव्यातील कॅथॉलिकांचे प्रमाण १८५१ साली ६३.८ टक्के इतके कमी झाले.
याचे कारण उत्तर गोव्यात दक्षिण गोव्याच्या तुलनेत फारच नगण्य स्वरूपाचे ख्रिस्ती धर्मांतर झाले होते. दुसरे कारण म्हणजे दक्षिण गोव्यात दाट लोकसंख्या होती तर उत्तर गोव्यात लोकसंख्या तुलनेने विरळ होती.
गोव्यातील कॅथॉलिकांनी केवळ पोर्तुगालला स्थलांतर केले असे नाही, अनेक कॅथोलिक कुटुंबांनी मुंबईत आणि त्याकाळी भारतातच असलेल्या कराची येथे कायमचे स्थायिक होणे पत्करले.
स्थलांतर करताना यापैकी अनेकांनी आपल्या वडिलोपार्जित मालमत्ता कायमच्या विकून टाकल्या होत्या.
देशातले आणि मुंबईचे पहिले भारतीय बिशप म्हणून आणि त्यानंतर पहिले भारतीय कार्डिनल होण्याचा सन्मान मिळणारे व्हॅलेरियन ग्रेशियस यांचा जन्म कराची येथला. कार्डिनल ग्रेशियस यांचे कुटुंब मूळचे गोव्यातील मडगावजवळ असलेल्या नावेली गावाचे होते.
पोर्तुगालमध्ये घटनात्मक राजेशाही १८२० साली प्रस्थापित झाल्यानंतर गोव्यात उदारमतवाही प्रवाह सुरु झाला आणि ब्रिटिश इंडियाच्या सीमावर्ती भागांतील अनेक मराठी बोलणारे लोक उत्तर गोव्यात स्थायिक झाले.
ख्रिस्ती धर्मांतर आणि इतर कारणांमुळे गोव्यातून पलायन केलेल्या लोकांपैकी अनेक जण पुन्हा गोव्यात स्थायिक झाले. दरम्यान गोव्यातून कॅथॉलिक लोकांचे पोर्तुगालला आणि इतर ठिकाणी स्थलांतर चालूच राहिले.
गोव्यातील पोर्तुगीजांची सत्ता १९६१ साली संपली तेव्हा कॅथॉलिकांचे १८५१ साली असलेले ६३.८ टक्के प्रमाण थेट ३८. ०७ इतके म्हणजे ११० वर्षांच्या काळात २५. टक्क्यांनी खाली घसरले होते.
मी गोव्यात शिक्षणासाठी १९७०च्या दशकात पोहोचलो, तेव्हा माझ्या मित्रांचे आईवडील, इतर ज्येष्ठ मंडळी आपापसांत पोर्तुगीज भाषेत बोलत. त्यांच्यामुळे मीही या भाषेत थोडेफार बोलायला शिकलो. गोव्यातून पोर्तुगीज भाषा आता हद्दपार झाली आहे.
गोव्यात कॉलेजला शिकताना माझ्या बरोबर जेसुईट प्री- नॉव्हिशिएटमध्ये (पूर्व-सेमिनिरीत) राहणाऱ्या बेनी (बेनेडिक्ट) फरीयाने सज्ञान होण्याआधी पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेतला.
बेनीचा आणि लेस्टर फर्नांडिसचा पासपोर्ट पोर्तुगीज होते. मात्र वयाची एकवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट न बदलता ते आणि त्यांची भावंडे भारतात राहू शकत होते. सज्ञान झाल्यानंतर मात्र त्यांना भारतीय पासपोर्ट घेणे भाग होते. त्याआधीच बेनी फरीयाची आणि लेस्टर फर्नांडिसची सर्व भावंडं पोर्तुगालला गेली.
लेस्टर फर्नांडिसने मात्र पोर्तुगालऐवजी गोव्यातच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने आपला पोर्तुगालचा पासपोर्ट परत करून भारतीय पासपोर्ट आणि नागरीकत्व स्वीकारला होता.
गोव्यातुन परदेशांत झालेल्या स्थलांतराविषयी २००८ साली फातिमा दा सिल्वा यांनी केलेल्या एका संशोधनातून स्थलांतरीत लोकांमध्ये ७४ टक्के कॅथोलिक होते ते दिसून आले होते.
ही सगळी आकडेवारी क्लिओपात अल्मेडा कुटिनो यांनी आपल्या लेखात दिली आहे.
इंग्लंडच्या तुलनेत पोर्तुगालने भारताच्या आणि आपल्या इतर वसाहतींतील लोकांना पोर्तुगालमध्ये आणि त्यानंतर इतर युरोपियन देशांत स्थायिक होण्यास मोठया प्रमाणात हातभार लावला आहे.
भारतात गोवा, दमन आणि दीव १९६१ साली सामील झाला, आजही १९६१ सालापूर्वी या पोर्तुगीज वसाहतीत जन्मलेल्या आणि त्यांच्या पुढील तीन पिढ्यांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि पर्यायाने पोर्तुगालचे नागरिकत्व सहज मिळू शकते.
विशेष म्हणजे गोव्याच्या मुक्तीनंतरही गोव्यातील अनेक लोकांकडे पोर्तुगालचेही पासपोर्ट म्हणजेच नागरिकत्वही होते. हा प्रकार अनेक वर्षे चालू राहिला होता.
मागील काही शतकांत गोव्यातील अनेक स्थलांतरित लोक जहाजांवर विविध नोकऱ्या करत असत, सणावाराला किंवा इतर कामांसाठी ते आपल्या मायभूमीकडे परतत असत.
पोर्तुगालचे पंतप्रधान असताना अंतोनिओ कोस्टा हे सुद्धा दोनदा गोव्याच्या भेटीवर आले होते.
गोव्यात मी जातो तेव्हा आल्डोना, वागातोर वगैरे अनेक ठिकाणी मोठमोठे कौलारीं बंगले आणि घरे झाकून ठेवलेली दिसतात.
परदेशांत स्थायिक झालेल्या आपल्या मालकांच्या किंवा त्यांच्या वंशजांच्या परतण्याची ही छोटीमोठी घरे वाट पाहत असतात. अनेकदा हे बंगले, घरे लँड माफियांच्या कारस्थानाला बळी पडतात.
तर अशा गोंयकारांच्या अनेक प्रॉपर्टीज गोव्यात असल्या तरी ते कायमचे परतण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत.
अगदी अशीच परिस्थिती `इस्तादो दा पोर्तुगालचा' म्हणजे पोर्तुगीज इंडियाचा भाग असलेल्या गुजरातजवळील दमण येथे, दादरा नगर हवेली आणि सिल्व्हासा येथे आहे हे मी नेहेमी पाहत असतो.
गोव्याप्रमाणेच एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आणि तेथून जवळच असलेल्या गुजरातच्या सीमेनजिकच्या दमण आणि सिल्व्हासा येथेसुद्धा स्थानिक कॅथोलिक लोकांचे मोठ्या प्रमाणात पाश्चात्य राष्ट्रांत स्थलांतर होत आहे.
गोव्याप्रमाणेच वसईतसुद्धा अनेक ठिकाणी घरटी निदान एकतरी व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक युरोपात, अमेरिकेत, कॅनडात किंवा ऑस्ट्रेलियात असतो असे मी स्वतः अनुभवले आहे.
गोवा मुक्तीनंतरच्या काळात भारताच्या विविध राज्यांतून हिंदू, मुस्लीम आणि इतर धर्मियांनी या छोट्याशा राज्यात स्थलांतर केले आहे आणि यामुळे कॅथोलिक लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सतत कमी होते गेली आहे.
गोंयकारांचे प्रमाण कमी होण्याचे एक महत्वाचे कारण प्रचंड संख्येने बाहेरील राज्यातून इथे आलेले लोक. हल्ली रोजगारासाठी आणि मजुरीकरता बिहार, झारखंड, कर्नाटक आणि इतर राज्यांतून मोठ्या संख्येने लोक गोव्यात आलेले आहेत.
सिटी बसमध्ये प्रवास करताना हे सहज जाणवते.
गोव्यातील मूळ गोवन - गोमंतकीय असलेल्या - लोकांची संख्याही त्यामुळे घटत चालली आहे. निज गोंयकार आणि भायले अशा संज्ञा त्यासाठी वापरल्या जातात.
असेच चालू राहिले तर काही काळात गोव्यात कॅथोलीक लोकांचे प्रमाण दखल न घेण्याइतके नगण्य होऊ शकते.
यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी विनोद म्हणून सांगितलेला एक किस्सा सद्याच्या परिस्थितीवर झोत टाकतो.
उत्तर भारतातील अनेक लोक, विशेषतः दिल्लीतील अनेक व्यक्ती हल्ली गोव्यात कायमचे स्थायिक होत आहेत असे त्यांनी पणजी येथे झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले आहे.
``हल्ली गोव्यात पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक संख्येने लोक राहत आहेत. दिल्लीतलय एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर `दिल्लीतल्या कुठल्या भागात राहता?'' असे विचारले तर ती व्यक्ती म्हणते: '' मी अजूनमधून दिल्लीत येत असतो, कायमस्वरुपी मी गोव्यात राहतो!' ''
'' उत्तर भारतातील प्रत्येकाला गोव्यात राहायचे आहे. निवृत्त होणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला गोव्यात स्थायिक व्हायचे असते.," असे त्यांनी म्हटले आहे.
गोवा भारताचा भाग असल्याने यात वावगे काहीच नाही, मात्र इतक्या मोठ्या संख्येने गोव्यात स्थायिक होणाऱ्या लोकांना सामावून घेणे गोव्याला शक्य आहे काय असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
फोटो ओळी : अंतोनियो कोस्टा पोर्तुगालचे पंतप्रधान असताना आपल्या मायभूमीच्या भेटीवर गोव्यात २०१७ साली आले तेव्हाचा फोटो
Camil Parkhe,