Showing posts with label Portugal. Show all posts
Showing posts with label Portugal. Show all posts

Saturday, August 30, 2025

 

                                                                  Francisco Luis Gomes

गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर डोना पॉलच्या दिशेने जाणाऱ्या दयानंद बांदोडकर मार्गावर मांडवीच्या किनाऱ्यापाशी कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो.
पणजीत असे पुतळे फार कमी आहेत, पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा असलेल्या बहुतेक जुन्या पुतळ्यांची गोवामुक्तीनंतर उचलबांगडी करुन त्यांची रवानगी वस्तूसंग्रहालयांत करण्यात आली आहे.
पणजी येथील मध्ययुगीन आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा त्यातून वाचला, तसाच कला अकादमीशेजारच्या कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा. या दोन्ही पुतळ्यांबाबत यामागील कारण एकच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या दोन्ही व्यक्ती ` नीज गोंयकार' आहेत.
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील कमरेवर एक हात ठेवून असलेल्या या व्यक्तीच्या पुतळ्याकडे सहसा लक्ष जात नाही किंवा अगदी क्वचित लक्ष जाते.
सुरुवातीला शिक्षणानिमित्त आणि नंतर `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात बातमीदारी करताना अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ आणि नंतर शेजारच्या ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी नेहेमीच कुतूहल वाटायचे.
हा पुतळा आहे डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स (Francisco Luis Gomes) यांचा. पोर्तुगीज उच्चारांनुसार फ्रांसिश्कु लुईश गोमिश. गोव्यातील अनेक लोकांनासुद्धा या डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्यता कमीच आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून तीनदा निवडून गेले होते.
त्याशिवाय फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे एक अगदी महत्त्वाचे आगळेवेगळेपण आहे.
एकोणिसाव्या शतकात जेव्हा निम्म्याहून अधिक जग वसाहतवादाने वेढले होते तेव्हा पारतंत्र्यात असलेल्या भारताला पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे फ्रान्सिस्को लुईस गोम्स हे पहिलेच राष्ट्रवादी नेते होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचा हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९३१ साली साली पोर्तुगाल राजवटीतच डॉ. गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता.
गोम्स यांच्या जन्मशताब्दीच्या दिनी म्हणजे ३१ मे १९२९ रोजी या पुतळ्याची कोनशिला बसवण्यात आली होती. या पुतळ्याचे ब्राँझ कास्टिंग इटालीमधील फ्लॉरेन्स शहरात झाले होते.
गोव्यातील तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर जनरल जोआओ कार्लोस क्राव्हेइरो लोपेश आणि आणि ईस्ट इंडिजचे पॅट्रियार्क हे पद असलेले गोव्यातील चर्चप्रमुख डॉम तिओटोनिओ डी कॅस्ट्रो यांनी २३ डिसेंबर १९३१ रोजी या पूर्णाकृती पुतळ्याचे या कंपाल गार्डनमध्ये अनावरण केले.
डॉ. गोम्स यांनी २२ डिसेंबर १८६० रोजी लिस्बनमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवून संसदेच्या आपल्या खासदारकीची सुरुवात केली होती.
पोर्तुगीज राजवटीतच त्यांचा पूर्णाकृती पुतळा पणजी येथे उभारला गेला तेव्हा पोर्तुगाल आणि भारत या दोन्ही देशांसाठी आपली प्रतिभा आणि सर्व गुण समर्पित करणारा देशभक्त म्हणून तेथील शिलालेखात त्यांचा गौरव करण्यात आला होता.
या पुतळ्याच्या चौथऱ्यावर पोर्तुगीज भाषेत खालील शिलालेख आहे . त्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे:
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्या गौरवशाली स्मृतीस
स्वातंत्र्याचे निर्भयी पुरस्कर्ते
प्रखर वक्ते
थोर साहित्यिक
विद्वान अर्थशास्त्रज्ञ
देशभक्त
ज्यांनी आपल्या तेजस्वी बुद्धीच्या
सर्व शक्ती
भारत आणि पोर्तुगालच्या कल्याणासाठी अर्पण केल्या
जन्मशताब्दीप्रित्यर्थ
१८२९–१९२९
" हा पुतळा पोर्तुगीज भारताच्या ७ व्या प्रांतीय अधिवेशनाच्या अभ्यास समितीने सुचवला.
अध्यक्ष डॉ. अँटोनिओ मारिया दा कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली,
प्रख्यात खासदार आणि नामांकित लेखकाचा गौरव करण्यासाठी,
ज्यांनी द ब्राह्मिन्स, द मार्क्विस ऑफ पोम्बाल, राजकीय अर्थशास्त्र आणि भूमी स्वातंत्र्य यांसारखी साहित्यकृती निर्माण केली."
गोव्यात आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली या भारताच्या इतर प्रदेशांत पोर्तुगालची तब्बल साडेचारशे वर्षे सत्ता होती. यापैकी बहुतांश काळात १८२२ नंतर गोवा, दमण, दीव, दादरा नगर हवेली यांचा समावेश असलेल्या पोर्तुगीज इंडियातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
पोर्तुगीज नागरिकांप्रमाणे पोर्तुगालच्या सर्व वसाहतीमध्ये स्थलांतर करण्याचे अधिकार आणि हक्क गोवा, दमण आणि दीव दादरा, नगर हवेली यासारख्या इतर सर्व पोर्तुगीज वसाहतीतील लोकांनाही होते.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गोवामुक्तीआधी म्हणजे १९ डिसेंबर १९६१ आधी पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना पोर्तुगीज नागरिकत्वावरचा हक्क आजही शाबूत आहे.
इतकेच नव्हे तर त्यांच्या पुढच्या दोन पिढ्यांनासुद्धा हा हक्क आहे.
पोर्तुगालमध्ये 1822 सालच्या राज्यघटनेनुसार गोव्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी लिस्बनमध्ये सत्तेवर आलेल्या लिबरल पार्टीने सर्व नागरिकांना मतदानाचे अधिकार दिले होते. विशेष म्हणजे पोर्तुगाल साम्राज्याच्या जगभरातील सर्व वसाहतीतील - पोर्तुगीज इंडियासह- सर्व नागरिकांचा त्यात समावेश होता.
लोकशाही तत्त्वानुसार ही फार मोठी राजकीय घटना होती. अर्थात निवडणुकीत मतदानाचे हे अधिकार काही विशिष्ट लोकाना होते. पोर्तुगीज बऱ्यापैकी लिहू आणि वाचू शकणारे आणि काही किमान सरकारी कर भरणारे पोर्तुगाल साम्राज्यातील वसाहतींतील सर्व नागरिक या मतदानासाठी पात्र होते.
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून तीनदा निवडून गेले होते. .
मात्र फ्रान्सिस्को लुईस गोम्स हेसुद्धा गोव्यातून पोर्तुगाल संसदेवर निवडून जाणारे पोर्तुगीज इंडियातले - गोव्यातले - पहिले नागरिक नव्हते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याआधी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीच बर्नार्डो पेरेस दा सिल्व्हा यांची आणि कॉन्स्टॅनशिओ रॉक दा कोस्टा या दोन गोवन नागरिकांची सर्वप्रथम यांची पोर्तुगालच्या संसदेवर चार जानेवारी १८२२ रोजी निवड झाली होती.
यापैकी बर्नार्डो पेरेस दा सिल्व्हा (१७७५- १८४४) हे पोर्तुगाल संसदेवर गोव्यातून तब्बल तीनदा निवडून गेले होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी मात्र इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, साहित्य अशा विविध क्षेत्रांत भरीव योगदान केले आणि जागतिक कीर्तीला पात्र ठरले. गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरु ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे इंग्रजी भाषेत लिहिलेले विस्तृत चरित्र नॅशनल बुक ट्रस्टने २०१० साली प्रकाशित केले आहे.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचा जन्म दक्षिण गोव्यातील नावेली येथे ३१ मे १८२९ रोजी झाला. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी तरुण वयातच पोर्तुगीज भाषेबरोबरच फ्रेंच, लॅटिन, मराठी, कोकणी भाषांत प्राविण्य मिळवले.
पणजीतल्या गोवा मेडिकल कॉलेजात त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पणजी येथे १८०१ साली स्थापन झालेले हे स्कूल ऑफ मेडिसिन अँड सर्जरी हे केवळ भारताततली नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली आधुनिक वैद्यकीय शिक्षण संस्था होती.
या वैद्यकीय शिक्षणानंतर गोम्स यांनी सहा महिने ब्रिटिश भारतातील मुंबईत वास्तव्य केले.
मुंबईतल्या या अल्प काळात त्यांचा या शहरातल्या मूळच्या गोमंतकीय, अँग्लो इंडियन तसेच पारशी कुटुंबांशी संबंध आला. पोर्तुगीज इंडियाच्या म्हणजे गोव्याबाहेरील इतर भारतीय भागांत प्रचलीत असलेल्या समाजव्यवस्थेची त्यांना पहिल्यांदाच अशाप्रकारे ओळख झाली.
याच काळात त्यांनी मुंबई सोडून उत्तर भारतातील काही प्रदेशांना भेटी दिल्या असाव्यात. याचे कारण म्हणजे पोर्तुगालला गेल्यानंतर त्यांच्या लिखाणात उत्तर भारतातील समाज व्यवस्थेचे चित्रण आढळते. विशेषत त्यांनी पुढे लिहिलेल्या `द ब्राह्मण' या पोर्तुगीज कादंबरीत उत्तर भारतातील समव्यवस्थेचे चित्रण आहे.
ब्रिटिश भारतात असताना याच काळात गोम्स यांनी इंग्रजी, मराठी आणि इतर भारतीय भाषांत प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
गोव्यात परतल्यानंतर गोम्स यांनी गोवा सरकारच्या आरोग्य सेवा खात्यातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेतला. त्यानंतर त्यांची सहाय्यक सर्जन पदावर निवड झाली आणि पणजी येथील सैन्यदलात त्यांची नेमणूक झाली. नंतर त्यांची पोंडा येथे सहायक सर्जन या पदावर बढती मिळाली.
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची १८६०च्या ऑगस्ट महिन्यात दक्षिण गोव्यातून सालसेट- काणकोण मतदारसंघातून पोर्तुगाल संसदेवर निवड झाली. त्यावेळी त्यांचे वय अवघे बत्तीस वर्षे होते.
पोर्तुगीज संसदेत त्यांनी उदारमतवादी विरोधी पक्षात प्रवेश केला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लवकरच ते आपल्या पक्षाचे एक प्रमुख नेते बनले. पोर्तुगालच्या विविध नियतकालिकांत त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. पट्टीचे वक्ते म्हणूनसुद्धा ते गाजले. पोर्तुगीज पार्लमेंटमधील त्यांची भाषणे माहितीपूर्ण असत.
अफोन्सेका नावाच्या एका खासदाराने पोर्तुगीज संसदेतील वसाहतींचे प्रतिनिधित्व रद्द करावे असे एक विधेयक 1861 च्या जानेवारीत आणले होते. इंग्लंडने आपल्या संसदेतील कॅनडाचे प्रतिनिधित्व रद्द केले होते, त्या धर्तीवर हा ठराव दाखल करण्यात आला होता.
आपल्या भाषणातून गोम्स यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. पोर्तुगीज वसाहतीतील लोकांच्या राजकीय हक्कांचा धडाडीने समर्थन करत त्यांनी या विधेयकास विरोध केला.
वसाहतींमधील शेकडो लोकांना त्यांचा केवळ जन्म परदेशातील वसाहतींमध्ये झाला या एकाच कारणास्तव त्यांच्या राजकीय हक्कांपासून वंचित ठेवले जाऊ नये असे त्यांनी ठामपणे मांडले. `परदेशातील वसाहतींमधील लोक सुसंकृत नाहीत, त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क देण्यात येऊ नये' या अफोन्सेका यांच्या मुद्द्यात तथ्य नाही असेही गोम्स यांनी ठणकावून मांडले.
त्यांच्या या भूमिकेमुळे हे विधेयक बारगळले.
फ्रान्समधील साहित्यिक अल्फान्सो डी लामार्तिन (१७९० – १८६९) यांच्यापासून गोम्स यांनी प्रेरणा घेतली होती.
लामार्तिन यांना पाच जानेवारी १८६१ रोजी फ्रेंच भाषेत लिहिलेल्या एका पत्रात गोम्स यांनी म्हटले होते:
``भारत देशात माझा जन्म झाला. जो देश एके काळी काव्य, तत्त्वज्ञान, इतिहास यांचा पाळणा होता व जो आज दुदैवाने त्याचे थडगे होऊन राहिला आहे. ज्या देशाने महाभारत निर्माण केले व बुद्धिबळाचा शोध लावला, तो देश माझा आहे. या दोन महान कृतींत दिक्कालातीत असे काहीतरी आहे. पण हे राष्ट्र ज्याने आपल्या संहितांना कवितेत लिहिले, ज्याने आपल्या राजकारणाला खेळामधून प्रकट केले ते राष्ट्र आता मुळी अस्तित्वातच नाही! हा देश आपल्या मातृभूमीतच कैद झाला आहे, स्वतःच्या समृद्धीनेच पार थकलेला आहे आणि स्वतःच्या वैभवाच्या तेजोमयतेतच झाकोळून गेलेला आहे.
आपल्या पंखांच्या मदतीने हिमालयाच्या उंच शिखरांवर भरारी मारणाऱ्या या पक्ष्याने आता आपल्याच पिंजऱ्याच्या गजांशी झुंजत आपली पिसे गमावली आहेत. कोणे एकेकाळी या पक्ष्याच्या गीताचे स्वर संपूर्ण आकाश व्यापत असत, आता स्वातंत्र्य गमावल्यामुळे आक्रोश करणारी ही कोकिळा आपला मंजुळ स्वरच विसरुन गेली आहे. मी भारतासाठी स्वातंत्र्याची मागणी करत आहे.”
कल्पना करा कि फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी पारतंत्र्याच्या जोखंडात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी १८६१ साली केली.
गोम्स यांनी या पत्रात गुलामगिरीत जखडलेल्या आपल्या देशाची व्यथा मांडत व्यक्त केलेली ही भूमिका तेव्हा गुलामगिरीत असलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामाच म्हणता येईल.
त्या काळात भारत हा प्रदेश एक एकसंघ राष्ट्र आहे अशी संकल्पना या भूमीवर राहणाऱ्या लोकांमध्येसुद्धा सोडा, येथील राज्यकर्त्यांमध्येसुद्धा रुजली नव्हती. या उपखंडातील छोटेमोठे राज्यकर्ते शतकोनुशतके आपापसांत लढत होती.

गोम्स यांनी हे ऐतिहासिक विधान केले त्याच्या चार वर्षे आधीच भारतातील विविध संस्थानिक मांडलिक आणि राजेमहाराजे यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या विरोधात दिल्लीतील शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जाफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ साली उठाव केला होता. आपापल्या मुलखांत आपली सत्ता कायम राहावी यासाठी त्यांनी केलेली ही अखेरची धडपड होती.
त्यामुळेच फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी समुद्रापार युरोपात केलेली ही मागणी विलक्षण आणि ऐतिहासिक ठरते.
भारताला स्वातंत्र्य मिळावे, या देशाची गुलामी संपायला हवी अशी मागणी गोम्स त्याकाळात केली होती आणि तीसुद्धा युरोपात आणि पोर्तुगालच्या भुमीवर ही महत्त्वाची बाब आहे.
भारताला परकीय सत्तेतून मुक्ती मिळावी अशी मागणी तोपर्यंत देशात कुणीही केली नव्हती.
भारताच्या स्वातंत्र्याची अशी मागणी करणारे गोम्स हे पहिलेच भारतीय नेते.
त्यांच्यानंतर तब्बल तीन दशकांनंतर १८९२ साली ब्रिटिश भारतातून दादाभाई नौरोजी यांची इंग्लंडच्या संसदेवर निवड झाली. इंग्लंडच्या संसदेवर खासदार म्हणून निवड झालेले दादाभाई हे पहिलेच आणि एकमेव भारतीय.
भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी करण्याची मानसिकता भारतीय नेत्यांमध्ये निर्माण होण्यासाठी पुढे बराच काळ लागला. त्यामुळेच फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे भारतीय राष्ट्रवादी असणे अधिक ठळक होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी आपल्या याच पत्रात एक महत्त्वाची टिपण्णी केली होती. विशेष म्हणजे गोम्स यांचा हा उतारा देताना त्यातील पुढील वाक्य अनेकदा गाळले जाते, असे गोम्स यांचे चरित्रकार ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी म्हटले आहे.
मात्र या वाक्यातील मतितार्थ खूप महत्त्वाचा आहे. त्या पत्रातील हे वाक्य पुढीलप्रमाणे आहे :
“ही शीर्षके माझ्या देशावर प्रेम करणाऱ्या आणि मानवजातीवर प्रेम करणाऱ्या तुमच्यासाठी पुरेशी शिफारस ठरतील. माझ्याबद्दल सांगायचे झाले, तर मी माझ्या देशबांधवांपेक्षा अधिक आनंदी आहे. मी स्वतंत्र आहे. `Civis Sum'
या वाक्यानंतर त्यांनी `civis sum' (एक नागरिक आहे) हा अभिजात लॅटिन भाषेतला वाक्प्रचार वापरला होता.
` मी सर्वार्थाने सर्व नागरी हक्क आणि अधिकार असलेला एक नागरिक आहे.’ असे या वाक्प्रचारातून स्पष्ट होते.
`मी माझ्या देशबांधवांपेक्षा अधिक आनंदी आहे. मी स्वतंत्र आहे. मी `नागरिक’ आहे,’’ या वाक्यात गोम्स यांनी ब्रिटिश भारतात आणि पोर्तुगीज भारतात लोकांना दिल्या जाणाऱ्या राजकीय आणि नागरी हक्कांची तुलना केली आहे आणि आपल्या भारतीय देशबांधवांपेक्षा आपण अधिक आनंदी आहोत असे म्हटले आहे.
हे स्पष्ट करताना ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी पोर्तुगाल आणि इंग्लंडने जगभरातील आपल्या वसाहतींतील लोंकाना दिलेल्या राजकीय आणि नागरी हक्कांची तुलना केली आहे.
``कारण पोर्तुगालने गोव्यातील आणि आपल्या इतर वसाहतींतील लोकांना आपल्या राष्ट्राचे नागरिक मानले होते आणि त्या सर्वांना समान अधिकार दिले होते. परंतु फ्रान्सिको लुईस गोम्स यांचे जे भारतीय देशबांधव इंग्रजांच्या राजवटीखाली होते ते त्यांच्यासारखे पोर्तुगीजांच्या राजवटीतील ‘नागरिक’ नव्हते, तर त्यांना नेहेमीच केवळ दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती, ” असे ओलिव्हियानो गोम्स यांनी लिहिले आहे.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे हे पत्र त्याकाळात खूप गाजले होते. फ्रान्समध्ये हे पत्र वाचल्यानंतर लामार्तिन आनंदाने बेहोश झाला होता असे म्हणतात. खूप सुंदर, खूप सुंदर.पत्र. हे पत्र लिहिणारा नक्कीच खूप प्रतिभासंपन्न आहे. मला या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला आवडेल. ‘’
लामार्तिन यांची इच्छा लवकरच पूर्ण झाली.
युरोपमध्ये डॉ गोम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे जोरदार स्वागत झाले. पॅरिस येथील दौऱ्यात ते लामार्तिन यांना १८६६ साली भेटले तर याच वर्षी इंग्लंडमध्ये लंडन येथे जॉन स्टुअर्ट मिल यांनी त्यांचे स्वागत केले.
गोम्स यांनी १८६६ साली Os Brâmanes किंवा द ब्राह्मण ही कादंबरी पोर्तुगीज भाषेत लिहिली. भारतातील जातिव्यवस्थेवर या कादंबरीत लिहिण्यात आले आहे.
लक्ष्मणराव सरदेसाई यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीं अध्यक्ष असताना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा अनुवाद १९७३ साली पहिल्यांदा प्रकाशित केला होता.
विशेष म्हणजे आपल्या या कादंबरीसाठी गोम्स यांनी गोव्याऐवजी उत्तर भारतातील फैजाबाद जिल्ह्यातील एक खेडे निवडले आहे.
गोम्स यांच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पोर्तुगीज संस्कृतीत वाढलेला ता तरुण मनाने भारतीयच राहिला, आपल्या भारतीयत्वाचा विसर त्यांना कधीही पडला नाही असे लक्ष्मणराव सरदेसाई यांनी म्हटले आहे.
पोर्तुगीज संसदेतील गोव्याचे प्रतिनिधी या नात्याने फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी गोव्याच्या हिताची अनेक कामे करवून घेतली, गोव्यासाठी अनेक सवलती मिळवल्या, करांचे ओझे कमी केले, त्याशिवाय गोव्यातील सरकारी नोकरांचा दर्जा पोर्तुगालमधील सरकारी नोकरांच्या बरोबरीचा करून घेतला.
गोव्यातील ख्रिस्ती लोकांना अंत्यसंकारासाठी आणि कबरस्थानात मृतदेह पुरण्यासाठी सरकारला मोठ्या रकमेचा कर भरावा लागत असे, त्यामुळे गरीब लोकांना खूप त्रास होत असे. संसदेतील आपल्या भाषणांत गोम्स यांनी या जाचक करांवर सडकून टीका होती.
आपल्या भाषणात उपहासात्मक शैलीत गोम्स यांनी म्हटले होते:
``सरकारी कर गोळा करणाऱ्या लोकांचा हात इतका लांब की तो मृत माणसाच्या थडग्यापलीकडेही शिरतो आणि मृतांकडून त्याचा ‘मांसाचा हिस्सा’ खेचून घेतो. गोव्यात मेलेल्या लोकांनासुद्धा कर द्यावा लागतो ! अंत्यसंकारासाठी कर असलेली ही १५० रईसांची रक्कम त्या मृत व्यक्तींच्या शाश्वत निद्रेत आणि एकांतात व्यत्यय आणते. ‘’
पोर्तुगालच्या संसदेत बोलताना फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी मतदानाचा हक्क केवळ पोर्तुगीज वाचु आणि लिहू शकणाऱ्या आणि सरकारला कर देणाऱ्या लोकांपुरता ठेवणाऱ्या कायदेशीर तरतुदींवर टीका केली
``मी स्वतः जरी जवळजवळ एक लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करत असलो तरी त्यापैकी प्रत्यक्षात फक्त दोन हजार लोक मला मतदान करु शकले आहेत. याचे कारण कि या नागरिकांपैकी खूप कमी लोक पोर्तुगीज वाचू आणि लिहू शकतात किंवा सरकारला कर देत असतात. पोर्तुगीज भाषा येणे आणि सरकारला कर देणे या दोन गोष्टी मतदानासाठी अटी असल्याने हे नागरिक मतदानासाठी पात्र नसतात.''
पोर्तुगालच्या सर्व वसाहतींतील लोकांसाठी असलेला या अटी अर्थातच अन्यायकारक होत्या. उदाहरणार्थ, गोव्यात राहणाऱ्या लोकांना हिंदू लोकांपैकी अनेकांना कोकणी आणि मराठी भाषा लिहिता आणि वाचता येत असे, मात्र त्यांना पोर्तुगीज भाषेचे ज्ञान नसे. पोर्तुगीज भाषा प्रामुख्याने गोव्यातल्या ख्रिस्ती लोकांना येत असे, स्थानिक समाजातील उच्च वर्णातील म्हणजे शेणवी, सारस्वत वगैरे जातींची पार्श्वभूमी असलेल्या ख्रिस्ती लोकांनी पोर्तुगाल भाषेला स्वीकारले होते. त्यामुळेच पोर्तुगालची राजधानी लिस्बनकडे यापैकी अनेकांचा ओढा असे.
ऍबे फरीया यासारखी काही उदाहरणे यासंदर्भात देता येईल. त्यामुळेच या वसाहतीकाळात पोर्तुगीज इंडियातून पोर्तुगाल संसदेसाठी मतदान करणारे बहुसंख्य नागरिक कॅथोलिक असत आणि खासदार म्हणून निवडून येणारेसुद्धा कॅथोलिकच असत.
अर्थात पोर्तुगालच्या जुन्या आणि नव्या मुलखांत या देशाची सत्ता बळकट झाल्यानंतर ख्रिस्ती लोकांबरोबरच हिंदू लोकांनीही पोर्तुगीज भाषेला जवळ केले होते, शिक्षण, व्यवसाय वगैरे मूलभूत गोष्टींसाठी राज्यकर्त्यांची भाषा शिकणे गरजचे होते.
अर्थात तरीही पोर्तुगाल इंडिया १९६१ साली भारतीय संघराज्यात सामील होईपर्यंत एकाही हिंदू गोवन नागरिकांची पोर्तुगालच्या संसदेवर निवड झाली नव्हती.
पोर्तुगालच्या एकतंत्री राजवटीचा अनेक वर्षे पंतप्रधान असलेल्या मार्केज द पोम्बाल याचे चरित्र गोम्स यांनी लिहिले, मार्केज द पोम्बालच्या या ले मार्कीस द पोंबाल : एस्कीस द सा वि पब्लिक ( Le Marquis de Pombal : Esquisse de sa vie publique ) चरित्रात गोम्स यांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील समग्र राजकीय इतिहास उभा केला त्यामुळे युरोपात त्यांना इतिहासकार म्हणून मान्यता मिळाली.
पोम्बालने गोव्याच्या बाबतीत केलेली अनेक स्मरणीय कामे गोम्स यांनी “मार्कीस दे पोंबाल : त्याच्या सार्वजनिक जीवनाची रूपरेषा’’ या चरित्रात विस्ताराने सांगितली आहेत. पोर्तुगालच्या नागरीकांना मिळणारे हक्क आणि सवलती गोव्यातील लोकांनाही देण्याचा प्रयत्न पोम्बाल याने केला होता, त्याची कारकीर्द गोव्यासाठी हितकारक ठरली असे गोम्स यांनी या चरित्रात मांडले आहे.
गोम्स यांनी लिहिलेल्या एका अर्थशास्त्रातील ग्रंथाने त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळाली. एस्से सुर ला थेओरी द ल'एकोनोमी पॉलिटिक ( Essai sur la théorie de L 'Economie Politiquen) हा तो ग्रंथ. गोम्स यांनी हे दोन्ही ग्रंथ फ्रेंच भाषेत लिहिले होते.
डॉ. गोम्स यांच्या गौरवार्थ मुंबईतील रॉयल आशियाटीक सोसायटीने त्यांची सदस्य म्हणुन निवड केली होती.
युरोपातील रोमँटिसिझम काळात ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्यावेळी त्यांच्यावर व्हिक्टर ह्युगो आणि लामार्तिन यांचा प्रभाव होता. या कादंबरीच्या तात्त्विक बाजूचे श्रेय व्हिक्टर ह्युगो यांच्याकडे तर भावनात्मक बाजूचे श्रेय लामार्तिन यांच्याकडे जाते असे लक्ष्मणराव सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दुदैवाने गोव्याच्या या महान सुपुत्राला फार कमी आयुष्य लाभले.
त्याकाळात बरा न होणाऱ्या क्षयासारख्या रोगाची लागण झाल्यामुळे आपले उर्वरित आयुष्य गोव्यात घालवण्याच्या इराद्याने त्यांनी पोर्तुगाल सोडले, मात्र बोटीवर प्रवासात असतानाच त्यांचे ३० सप्टेंबर १८६९ रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे चाळीस वर्षे होते.
गोम्स यांच्या पार्थिव देहाला मग जलसमाधी देण्यात आली. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची आपल्या जन्मभूमीत परतण्याची इच्छा अपुरीच राहिली.
आपल्या मायदेशात शेवटचा श्वास घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या गोम्स यांना घेऊन येणारी ती बोट गुजरातमधील पोरबंदर या बंदरात 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोहोचली.
तेव्हा या बोटीतल्या प्रवाश्यांमध्ये फ्रान्सिस्को लुईस गोम्स नव्हते.
योगायोग म्हणजे गोम्स यांच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नासाठी यशस्वीरीत्या लढणाऱ्या एका नेत्याचा याच दिवशी पोरबंदर येथे जन्म झाला होता.
मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे नाव.
आपल्या भारत देशाची गुलामी संपून पूर्ण स्वातंत्र्य लाभावे अशी खुली मागणी पहिल्यांदाच करणाऱ्या फ्रान्सिस्को लुईस गोम्स या राष्ट्रवादी नेत्याची ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी महात्मा गांधी यांनी अपार कष्ट घेतले.
Camil Parkhe, August 23, 2025



Monday, June 23, 2025

 

                                        टी. बी कुन्हा


                                               पीटर अल्वारीस
खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मतदारांनी जन्माने ख्रिस्ती असलेली एक व्यक्ती लोकसभेवर निवडून दिली होती.

महाराष्ट्र राज्य त्यावेळी त्यावेळी नुकतेच अस्तित्वास आले होते. महाराष्ट्रातून ख्रिस्ती व्यक्ती देशाच्या संसदेवर निवडून येणे ही फार मोठी ऐतिहासिक घटना होती, त्या निवडणुकीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक खूप ताकदवान राजकीय नेता दिला.
निवडून आलेल्या त्या व्यक्तीने देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर फार मोठा दूरगामी प्रभाव केला.
लोकसभेत पाठवलेल्या त्या नेत्याचे नाव होते जॉर्ज फर्नांडिस.
अर्थात जॉर्ज फर्नांडिस यांची १९६७ साली निवड करताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी फर्नाडिस किंवा काँग्रेसचे स. का. पाटील यांचा धर्म किंवा जात विचारात घेतलीच नव्हती.
अरुण साधू यांच्या ‘आज दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबरींवर आधारीत असलेल्या जब्बार पटेल दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर यांची पटकथा असलेल्या `सिहासन' चित्रपटातील डिकॉस्टा या कामगार नेत्याचे पात्र हे जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बेतलेले आहे असे म्हणतात.
सतीश दुभाषी यांनी हे पात्र साकारले होते.
त्यावेळची १९६७ ची लोकसभा निवडणुकीत आजही ऐतिहासिक ठरते याचे कारण त्यावेळी पहिल्यादाच बलाढ्य गणल्या गेलेल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाला अनेक ठिकाणी विशेषतः दक्षिण भारतात अपयश चाखावे लागले.
त्यावेळी देशात अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रातसुद्धा विरोधी पक्षांचे नेते लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र त्यापैकी बहुतेकांचा पुढील निवडणुकीत पराभव झाला.
जॉर्ज फर्नांडिस यांचासुद्धा.
जॉर्ज फर्नांडिस त्यानंतर अनेकदा बिहारमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीप्रमाणेच धर्माची बाब त्यांच्या या निवडणुकांत कधीही आडवी आली नाही.
मूळचे मॅंगलोरचे असलेले जॉर्ज तरुणपणी फादर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत दाखल झाले होते ! ( दहावीच्या परीक्षेनंतर मी पण जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी श्रीरामपूर सोडून गोव्यात आलो होतो. )
जन्माने ख्रिस्ती असलेली आणखी दोन व्यक्ती ख्रिस्ती बहुसंख्य नसलेल्या मतदारसंघातून अनेकदा निवडून आलेल्या आहेत. जॉर्ज फर्नाडिस यांच्याप्रमाणेच ही व्यक्ती सर्वांना परिचित आहे. त्या आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी.
त्याशिवाय तिसरी व्यक्ती म्हणजे एन. के. पी. साळवे.
'महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्त्वाची ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे एन. के. पी.
(नरेंद्र कुमार प्रसादराव) साळवे. ते १९६७ ते १९७७ या काळात लोकसभेचे सभासद होते.
त्याशिवाय राज्यसभेवर ते चार वेळेस निवडून गेले होते आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्रीसुद्धा होते.
अर्थात जॉर्ज फर्नांडिस किंवा सोनिया गांधी यांना ख्रिस्ती व्यक्ती म्हणून संबोधने त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, त्यांना ते आवडले नसते याची मला पूर्ण कल्पना आहे.
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे किंवा समाजवादी नेते ना. ग. गोरे यांना ब्राह्मण म्हणून संबोधने असाच काहीसा हा प्रकार आहे.
रोमन कॅथोलिक कुटुंबांत जन्मलेल्या जॉर्ज फर्नांडिस आणि सोनिया गांधी यांचा परंपरेनुसार बाप्तिस्मा झाला होता. त्याचप्रमाणे नानासाहेब गोरे किंवा कॉम्रेड डांगे हे ब्राह्मण कुटुंबांत जन्मले होते आणि त्यांनी आपले ब्राह्मण्यत्व कधीही मिरवले नव्हते.
जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच इतरही अनेक ख्रिस्ती व्यक्ती मुंबईच्या समाजकारणात आणि राजकारणात त्याकाळात सक्रीय होत्या.
जॉर्ज फर्नांडिस मुंबईच्या क्षितिजावर अवतरण्यापूर्वी खूप वर्षे आधीच त्यांचा मुंबईच्या समाजकारणात आणि चळवळीत वावर होता.
वसईचे `काका' जोसेफ बॅप्टिस्टा असेच एक नाव. बाळ गंगाधर टिळक यांचे एक जवळचे सहकारी.
चिरोल बदनामी खटल्यात विलायत वारीत जोसेफ बॅप्टिस्टा यांनी टिळकांना साथ दिली होती. त्याशिवाय `होम रुल' चळवळीचे ते एक प्रमुख नेते होते.
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हे टिळकांचे ऐतिहासिक वाक्य मूळचे काका जोसेफ बॅप्टिस्टा यांचे आहे असेही काही जण म्हणतात.
वसईत आता त्यांच्या नावाने एक ज्युनियर कॉलेज आहे.
जॉर्ज फर्नाडिस यांच्यापूर्वी खूप वर्षे आधी एका ख्रिस्ती कामगार नेत्याची मुंबईतून आमदार म्हणून निवड झाली होती.
समाजवादी पक्षाचेच असलेले पीटर अल्वारीस हे त्यांचे नाव.
पीटर अल्वारीस हे मूळचे गोव्याचे. गोव्यात पोर्तुगीजांविरुद्ध उठाव करण्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. गोवा सोडून मुंबईत त्यांनी गोवा मुक्तीसाठी कार्य सुरु केले.
पीटर अल्वारीस हे मुंबई विधानसभेचे ते १९४९ ते १९५२ या काळात आमदारसुद्धा होते. त्यांच्या रूपाने एक कामगार नेता पहिल्यांदा आमदार झाला होता.
गोवा १९६१ साली मुक्त झाल्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून पीटर अल्वारीस पणजी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.
गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने अल्वारीस यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला होता.
गोव्यातल्या पोर्तुगीज वसाहत राजवटीविरुद्ध संघर्ष उभारणारे टी. बी कुन्हा (त्रिस्ताव डी ब्रागांझा कुन्हा) यांनी मुंबईतून आपले राजकीय कार्य सुरु ठेवले होते.
येथे अधिक ठळकपणे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच या सर्व व्यक्ती केवळ जन्मानेच रोमन कॅथोलिक होत्या.
यापैकी बहुतेक जण एकतर डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीच्या होत्या. काही पूर्ण नास्तिक होते.
नास्तिक असल्यामुळे टी. बी. कुन्हा यांना मुंबईतील कॅथोलिक कबरस्थानात चिरविश्रांतीसाठी जागा मिळाली नव्हती. त्याऐवजी त्यांचे पार्थिव प्रोटेस्टंट कबरस्थानात पुरण्यात आले होते.
एके काळी नाकारलेल्या गेलेल्या टी. बी. कुन्हा यांच्या याच पार्थिवाच्या अवशेषाला आता पणजीतल्या आझाद मैदानातील स्मारकात अत्यंत सन्मानाची जागा मिळाली आहे.
प्रजा समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो हे सत्तरच्या दशकात माटुंगा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून जात असत. मुंबईच्या माटुंगा, चेंबूर, बांद्रा, अंधेरी, आणि इतर परिसरांत मूळचे गोमंतकीय तामिळ आणि मल्याळी असलेल्या ख्रिस्ती लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे.
खूप वर्षांपूर्वी जनता दलाचे डॉमिनिक गोन्सालवीस वसईतून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते.
डॉ. लिऑन डिसोझा यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होते. आमदार म्हणून निवडले गेल्यानंतर काही काळ ते महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीसुद्धा होते.
नव्वदच्या दशकात महाराष्ट्र मंत्रिमंडळात सेलीन डिसिल्व्हा या मंत्री होत्या.
सेलीन डिसोझा यांच्या कन्या जेनेट डिसोझा यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या उपाध्यक्षा म्हणून कार्य केले आहे.
आता हा भूतकाळ झाला आहे. मात्र हा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.

Camil Parkhe

Thursday, May 1, 2025

 From bars to brothels...

दारुच्या गुत्त्यांपासून ते थेट कुंटणखान्यांपर्यंत
चमकलात कि नाही.? हे वाचल्यानंतर मी सुद्धा असाच चमकलो होतो अन् उत्सुकतेने लगेच पुढे वाचायला घेतले होते.
फ्रेडरिक नोरोन्हा यांनी संपादित केलेल्या गोव्यातील पत्रकारांची आत्मकथने असलेल्या "...अँड रीड ऑल अगेन?" या पुस्तकातील हे पहिले प्रकरण आहे.
बहुधा लेखाच्या धक्कादायक शिर्षकामुळे या लेखाची या संग्रहात पहिल्या क्रमांकाचा लेख म्हणून निवड झाली होती.
पोर्तुगीज इंडिया किंवा गोव्याचे शेवटचे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युएल सिल्वा यांच्याविषयी हा लेख आहे.
लॉर्ड लुईस माऊंटबॅटन हे ब्रिटिश इंडियाचे शेवटचे गव्हर्नर जनरल. सत्तांतर घडल्यानंतर भारतीय राज्यघटना अंमलात येईपर्यंत सी. राजगोपालाचारी यांची गव्हर्नर जनरल म्हणून निवड करण्यात आली होती.
कुठलाही हिंसाचार न होता ही प्रक्रिया झाली, अर्थात भारताची फाळणी झाल्यानंतर सीमाभागात ज्या हिंदू मुस्लीम दंगली उसळल्या त्या वेगळ्या संदर्भात होत्या.
गोव्याबाबत मात्र असे काही घडले नव्हते. गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश साडेचार शतके पोर्तुगीज वसाहतीचा भाग होता. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले मात्र त्यानंतरसुद्धा गोवा पोर्तुगीज साम्राज्याचा एक भाग राहिला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा पोर्तुगीज राजवटीविरुद्ध चिमकुल्या गोव्यात मोठे उठाव असे झालेच नाही. ज्या काही चळवळी झाल्या तेव्हा पोर्तुगीज राजवटीने अशा नेत्यांना सरळसरळ तुरुंगात टाकले आणि लांब अशा लिस्बनच्या तुरुंगात त्यांना ठेवले.
आणि अचानक एके दिवशी भारतीय लष्कराने विविध बाजूंनी गोव्याला घेरले आणि एकदिड दिवसांत कुठलाही रक्तपात आणि हिंसाचार न होता गोवा भारतीय संघराज्याचा १९ डिसेंबर १९६१ रोजी एक अविभाज्य भाग बनला.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आंतरराष्ट्रीय परिणामांची पर्वा न करता गोव्यात लष्कराची धडक कारवाई केली होती.
गोव्यापासून लांब अंतरावर असलेल्या दमणमध्ये मात्र संपर्काच्या अभावी प्रतिकार आणि रक्तपात झाला होता.
त्याआधी काही वर्षांपूर्वी असेच गुजरातजवळ असलेल्या पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या एका तालुक्याचा आकार असलेला छोटासा दादरा नगर हवेली प्रदेश गाजावाजा न होता भारतात सामिल झाला होता.
कुठलाही प्रतिकार आणि रक्तपात न होता साडेचार शतकांची पोर्तुगीजांनी गोव्यातली सत्ता संपली होती.
हे असे कसे घडले?
याचे कारण म्हणजे त्यावेळचे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल असलेल्या मॅन्युएल अंतोनियो व्हासालो ई सिल्वा यांनी लिस्बनचा प्रतिकाराचा आदेश धुडकावत आपल्या सैन्याला शस्त्र खाली ठेवत शरणागती स्वीकारण्यास सांगितले होते.
परिणामतः लिस्बनला गेल्यानंतर त्यांच्यावर कोर्ट मार्शल कारवाई करण्यात आली होती.
तर पोर्तुगीज इंडियाचे हे शेवटचे गव्हर्नर जनरल मॅन्युएल सिल्वा गोवामुक्तीनंतर अठरा वर्षानंतर भारतात आणि गोव्यात आले तेव्हा अत्यंत उत्साहाने त्यांचे स्वागत झाले.
माझे पत्रकार सहकारी असलेले धर्मानंद कामत तेव्हा १९७९ साली गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टसचे (गुज) सरचिटणीस होते.
या गुजतर्फे सिल्वा साहेबांचा ' मिट द प्रेस ' कार्यक्रम झाला, त्याला दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत चांगली प्रसिध्दी मिळाली.
झाले, दुसऱ्या दिवशी दक्षिण गोव्याचे माजी खासदार मुकुंद शिक्रे यांनी पत्रकार संघाने पोर्तुगीज माजी गव्हर्नर जनरलच्या केलेल्या सन्मानाबद्दल कडक शब्दांत नापसंती व्यक्त केली.
पोर्तुगालच्या ज्या माजी सत्ताधाऱ्यांने भारतीय लष्करासमोर सपशेल शरणागती पत्करली होती, त्याच्यासमोर गोव्यातील पत्रकारांनी आता लोटांगण घातले आहे, अशी शिक्रे यांनी टीका केली होती.
त्याला उत्तर म्हणून धर्मानंद कामत यांनी ठणकावून सांगितले.
"आम्ही पत्रकार लोक बॉर्डरलेस आहोत, आम्हाला सीमा आणि हद्द नसतात, आमचा दारुच्या गुत्त्यापासून थेट कुंटणखान्यापर्यंत संचार असतो. "
असे अनेक विविध विषयांवरील लेख या पुस्तकात आहेत. माझे दोन लेख त्यात आहेत.
परवा मडगावात झालेल्या कार्यक्रमात माझ्यासह इतर पत्रकार लेखकांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले.


 मध्ययुगात वसाहतवादाची सुरुवात झाली तेव्हा पोर्तुगीज सर्वप्रथम भारताच्या किनाऱ्यावर आले.

त्यानंतर आलेल्या डच, इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी पण भारतात ठिकठिकाणी प्रदेश जिंकले. मात्र या देशांनी इथली आपली चंबुगबाळे एकापाठोपाठ उचलली.
सर्वात आधी आलेल्या पोर्तुगीजांनी सर्वात शेवटी म्हणजे साडेचारशे वर्षांनंतर १९६१ साली येथून आपला गाशा गुंडाळला.
भारतीय उपखंडाच्या अगदी चिमुकल्या का होईना आणि एकमेकांपासून काही शेकडे कोस दूर असलेल्या या चार प्रदेशांवर तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी आपली सत्ता गाजवली.
पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को दा गामा आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर. कालिकत येथे १४९८ ला पोहोचला.
त्यानंतर युरोपमधील अनेक राष्ट्रांतील साहसी दर्यावर्दी आणि व्यापारी कंपन्यांची गलबते भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यांवर लागली.
त्यापैकी प्रत्येक राष्ट्राने भारताच्या भूमीवर आपली सत्ता स्थापण्याचे प्रयत्न केले.
पोर्तुगीजांनंतर आलेल्या डच आणि फ्रेंच लोकांनी येथील काही प्रदेशांवर सत्ता गाजवली, ब्रिटिशांनी तर संपूर्ण उपखंडावर दिडशे वर्षे राज्य केले.
विशेष म्हणजे पोर्तुगालच्या राजकन्या कॅथरीन हिच्याशी लग्न करणाऱ्या इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला वरपित्याने आपल्या ताब्यात असलेल्या सात बेटांचे मुंबई या लग्नात चक्क आंदण - हुंडा - म्हणून १६६१ साली दिले होते.
त्यावेळी मुंबई बेटाबरोबरच शेजारच्या वसईत पोर्तुगीजांची सत्ता होती.
ब्रिटिशांनी दिडशे वर्षे येथे राज्य केल्याचे परिणाम तर आपल्याला माहित आहे.
पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले, त्याचे परिणामसुद्धा बऱ्यापैकी संबंधितांना आणि अभ्यासकांना माहित आहे.
मी स्वतः माझा उमेदीचा काळ - शिक्षण आणि पत्रकारितेतील सुरुवातीची नोकरी - गोव्यात घालवल्यामुळे मलाही पोर्तुगीज राजवटीचा गोव्यावर असलेला भलाबुरा प्रभाव माहित आहे.
माझ्या बारावीच्या परीक्षेचे प्रमाणपत्र गोवा, दमण आणि दीव शिक्षण मंडळाचे आहे !
गोव्याबरोबरच पोर्तुगीजांनी गोव्यापासून कितीतरी दूर असलेल्या गुजरातच्या दोन भिन्न टोकांवर किनाऱ्यापाशी असलेल्या दमण, दीव आणि दादरा, नगर हवेली येथेसुद्धा तब्बल साडेचारशे वर्षे राज्य केले.
स्वतंत्र गोवा राज्याची १९८६ साली स्थापना झाल्यावर दीव आणि दमण केंद्रशासित प्रदेश बनला.
अलिकडेच त्यामध्ये दादरा आणि नगर हवेलीचा या केंद्रशासित प्रदेशात समावेश करण्यात आला.
गोवा, दमण आणि दीव भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर १९ डिसेंबर १९६१ ला भारतीय संघराज्यात सामिल झाला.
त्याआधीच - चारपाच वर्ष आधी - पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दादरा आणि नगर हवेली कुठलाही गाजावाजा न होता भारतात सामिल झाले होते.
पत्रकारिता करताना पुण्यात मी रुजू झाल्यानंतर गोव्यातले माझे वास्तव्य संपले. संपर्क, नातेसंबंध आणि ऋणानुबंध अर्थात आजही कायम आहेत.
अलीकडच्या काळात पोर्तुगीजांची जुनी वसाहत असलेल्या दमण, दादरा आणि नगर हवेली येथे माझे काही काळ वास्तव्य असते.
समुद्रकिनारीच असलेले दीव येथून खूप दूर आहे, तिकडे जाण्याचे मला काही कारण आणि प्रायोजनसुद्धा नाही.
एकेकाळी गोव्याप्रमाणेच पोर्तुगीजांच्या Estado de India चा एक भाग असलेला हा चिमुकला दमण, दादरा आणि नगर हवेली प्रदेश मला खूप अचंबित करतो.
गोव्यात पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात.
एक पोर्तुगीज भाषा सोडून.
गोव्यातील माझ्या शालेय आणि कॉलेज जीवनात माझे शिक्षक, सहाध्यायी मुलेमुली आणि बुजुर्ग लोक पोर्तुगीज बोलत.
मी काम करत असलेल्या ` The Navhind Times ' या इंग्रजी दैनिकाचे मालक वसंतराव आणि वैंकुठराव डेम्पो (धेम्पे) यांचे पोर्तुगीज भाषेवर चांगले प्रभुत्व होते.
आता गोव्यात पोर्तुगीज बोलणारे कुणीही आढळणार नाही. गोवामुक्तीनंतर तेथे पोर्तुगीज भाषेचे पूर्ण उच्चाटन करण्यात आले.
शालेय अभ्यासक्रमातील दोन आणि तीन भाषिक धोरणात पोर्तुगीज भाषेचा बळी गेला. असे व्हायला नको होते असे मला आता वाटते.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची मुख्य भाषा गुजराती आहे.
पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाल्यावर गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६७ च्या जानेवारीत सार्वमत घेण्यात आले.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत झालेले भारतातले हे पहिले आणि अखेरचे सार्वमत.
या सार्वमतमध्ये मतदारांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता.
गोव्यातल्या लोकांसाठी : तुम्हाला गोवा स्वतंत्र हवा की गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण हवे आहे.
त्याचप्रमाणे दमण आणि दीव इथल्या लोकांसाठी पर्यायी प्रश्न होता. हे दोन तालुके स्वतंत्र हवे की गुजरातमध्ये त्यांचे विलीनीकरण हवे.
या सार्वंमताचा निकाल अगदी निसटता होता.
अगदी थोड्याशा मतांच्या टक्केवारीच्या फरकाने गोवा, दमण आणि दीवचे त्या वेळी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये विलीनीकरण टळले.
नाहीतर गोवा आज महाराष्ट्रात असता आणि दमण आणि दीव गुजरातमध्ये.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली इथे गुजराती मुख्य भाषा असली तरी दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मराठीभाषिक लोकांचे प्रमाण इथे मोठे आहे.
याचे कारण महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्याला लागूनच दमण, दादरा आणि नगर हवेली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.
गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत (२०२१ला ) दमण आणि दादरा नगर हवेली इथे चक्क (अविभक्त )शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर निवडून आल्या होत्या. अर्थात २०२४ साली त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. .
दमण येथील भव्य किल्ला, गोव्याप्रमाणेच जुने बंगले आणि चर्च यांच्या रुपात पोर्तुगीज वारसा येथे आजही शाबूत आहे.
विशेष म्हणजे दमण, दादरा आणि नगर हवेली येथे कॅथोलीक कुटुंबात आजही पोर्तुगीज बोलली जाते !
गोव्याप्रमाणेच दमण, दादरा आणि नगर हवेली येथील कॅथोलिक युवकांनी मोठ्या प्रमाणात पोर्तुगालला आणि युरोपला स्थलांतर केले आहे.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली प्रदेश अनेक बाजूंनी कायमस्वरुपी `ड्राय डे' गुजरातच्या विळख्यात असला तरी गोव्यासारखी इथेसुद्धा मद्य खूप स्वस्त असते.
साहजिकच विकेंड आणि सुट्ट्यांच्या दिवशी गुजरातहून अनेक लोक गाड्यांनी समुद्रकिनारा असलेल्या दमणला येतात आणि इथे अक्षरशः ट्रॅफिक जॅम असतो..
पोर्तुगालची साडेचार शतके वसाहत राहिलेल्या मात्र सर्वार्थाने दुर्लक्षित राहिलेल्या या प्रदेशाविषयी लिहिण्यासारखे खूप आहे.
Camil Parkhe February 8. 2025