Showing posts with label West Bengal. Show all posts
Showing posts with label West Bengal. Show all posts

Friday, June 11, 2021

मिरामार बीचवर फुटबॉल -- फुटबाँलवेडा गोवा

(Siridao beach photo by Willy Goes)

समोरचे ते लांबवर पसरलेले पाणी पाहून मी अगदी थक्क झालो होतो. काही ठिकाणी तर दुसरा किनाराही नजरेस पडत नव्हता. इतके पाणी मी केवळ हिंदी चित्रपटांत एखादे गाणे चालू असताना गंगामैया किंवा यमुना नदीचा प्रवाह दाखवतात तेव्हाच पाहिले होते.

माझी उत्फुर्त प्रतिक्रिया होती ; अरे बापरे, किती मोठी नदी आहे ही !

नदी? ही नदी नाही, समुद्र आहे, अरबी समुद्र ! आमच्या दौऱ्याचे प्रमुख असलेले फादर किस्स पटकन म्हणाले.

त्या उत्तराने आता माझ्या तोंडाचा आ अधिकच वासला होता. आपण काय पाहत आहोत यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
ही घटना आहे १९७८ ची. गोवा पुणे बेळगाव येशूसंघीय प्रांताने दहावी आणि अकरावीची परीक्षा दिलेल्या पंधरासोळा मुलांची आपल्या प्रांतातील मिशनकेंद्रांची व्होकेशनल टूर किंवा दैवी पाचारण दौरा आयोजित केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून मी एकटा या दौऱ्यात सामील झालो होतो. दौऱ्याच्या शेवटी पणजीला आल्यावर मिरामार बीचवर हा प्रसंग घडला होता.
एका बाजूला म्हणजे आमच्यासमोरच पणजी आणि कंपालकडून येणारे मांडवी नदीचे विशाल पात्र त्या अथांग सागरात विलीन होत होते आणि दुसऱ्या टोकाला निळ्याभोर आकाशापर्यंत भिडणारे ते पाणी म्हणजेच अरबी समुद्र होता !
माझी तर मती एकदम गुंग झाली होती. शालेय पुस्तकांत समुद्राविषयी कितीही शिकलो होतो तरी समुद्र प्रत्यक्ष पाहण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता.
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर उभे राहण्याची, तेथून तो समुद्र पाहाण्याची ही माझी पहिलीच वेळ. या मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशीच आणि नंतर सान्त इनेजशेजारच्या ताळगावात मी माझ्या आयुष्याची यापुढील तब्बल चौदा वर्षे घालवणार आहे याची तेव्हा मला साधी कल्पनाही नव्हती !
त्यानंतर एक महिन्यानंतर येशूसंघीयांतर्फे नव्यानेच उघडलेल्या लोयोला प्री-नोव्हिशिएट किंवा पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. अशाप्रकारे बीए होईपर्यंत म्हणजे चार वर्षे माझे समुद्रकिनारी वास्तव्य होते.
जून महिन्यात मी मिरामार बीचपाशी राहायला आलो. त्या पहिल्या पावसाळ्यात समोरच्या समुद्राने धारण केलेल्या रुद्र रुपाने खूप भीती वाटायची. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची खूप असायची आणि भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी तर अगदी रस्त्यापाशी आलेले असायचे. रात्री खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा घोघो आवाज झोप उडवायचा.
नंतर काही दिवसातच या समुद्राची भिती गेली, समुद्राचे पाणी कोठे किती खोल, कुठे कमी खोल हे कळायला लागले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोण्याचीं सवय आणि आवड निर्माण झाली.
धेम्पे कॉलेजातच माझे हायर सेकंडरी, पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले. बॉंबे युनिव्हर्सिटीची गोव्यातील आमची शेवटची बॅच. त्यानंतर गोवा युनिव्हर्सिटी स्थापन झाली.
धेम्पे कॉलेजासमोरच आमचे हॉस्टेल होते. पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षभर दर दिवशी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही मुले मिरामार बीचवर फुटबॉल खेळायचो.
तेथील स्वच्छ आणि सफेद मऊ वाळूत हा खेळ खेळताना पायात बूट घालायची गरज भासली नाही. एका बाजूला माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांची समाधी आणि दुसऱ्या बाजूला पाईन वृक्षांचे दाट जंगल यामध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच होती.
त्या मऊ वाळूत पळणे, फुटबॉल खेळवणे किंवा डॉज करणे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मार्क करणे आणि गोलकिपरने चेंडू अडविणे वगैरे सर्वकाही त्या खेळातील नियमांप्रमाणे होई. खेळतांना खाली पडले तरी वाळूमुळे अंग खरचटण्याचे, रक्त येण्याचे प्रमाण वा मोठी जखमा होण्याचे प्रमाण खूप कमी असायचे.
१९७०च्या दशकांत गोव्यात पर्यटकांची संख्या आजच्या इतकी नव्हती. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर कुठल्याही अडथळ्याविना किंवा इतरांना त्रास ना होता दररोज एक तासाचा खेळ होई. फुटबॉल समुद्रात गेला तर तो आणणारा येताना पाण्यात एका डुबकीही घेऊन होई. फुटबॉलची मॅच चालू असताना पाऊस सुरू झाला तर खेळण्याची मजा काही औरच असायची.
युरो फ़ुटबाँल स्पर्धेमुळे पुढील काही दिवसांत फुटबॉल फीवर सर्वत्र चढत जाणार आहे अर्थात गोव्यासारख्या छोट्याशा राज्यातील फुटबॉलप्रेम यापुरते मर्यादित नाही. ते गोमंतकीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे.
गोव्यातील शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात कधीही फुटबॉल खेळली नाही अशी व्यक्ती सहसा सापडणार नाही. अनेक घरांत गिटार वाजविणारी तरुण मुले आणि मुली आणि ज्येष्ठ नागरिकही असतात, त्याचप्रमाणे या छोटयाशा राज्यात घराघरांत फुटबाँलही असतो. गोवा ही चारशे वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीजांची वसाहत होती, त्याचा हा एक परिणाम.
पावसाळा संपला आणि मोकळ्या मैदानांवरचे पाणी जमिनीत जिरले, भाताची शेते मोकळी झाली की मग तेथे सकाळी आणि संध्याकाळी शाळकरी मुले आपल्या कोचसह फुटबॉल खेळू लागतात.
फुटबॉलचा हा सराव कधी आंतरशालेय स्पर्धांसाठी असतो, कधी कुठल्या स्पोर्टस क्लबने आयोजित केलेल्या टुर्नामेंटसाठी असतो. मात्र हे दृश्य तुम्हाला पणजी, म्हापशासारख्या शहरात दिसेल तसेच अंजुना समुद्रकिनाऱ्यापाशी दिसेल किंवा सांता एस्तेव्ह सारख्या बेटावरही दिसते (आता या गावाला काही बाजूंनी पुलाने जोडले गेले असल्याने बेट असण्याचे नावीन्य राहिले नाही).
भाताची कापणी होऊन एखादे शेत मोकळे झाले कि मग मुले फुटबॉल खेळण्यासाठी त्याचा ताबा घेतात. शाळेच्या मैदानांवर तर त्यांचा वर्षभर हक्क असतोच.
कधीकधी ही मुले फुटबॉल शूज, लांब मोजे घालून आलेली असतात तर कधी बूटमोज्याविनाही सराव करताना आढळतात. फुटबॉल डॉज करण्यासाठी, वेडीवाकडी वळणे घेत फुटबॉलशी खेळता यावे यासाठी सरावाची साधने घेऊन आली असतात. त्यांना कोचिंग करणारा तरुण किंवा मध्यमवयीन व्यक्ती त्यांच्या शाळेतले क्रीडाशिक्षक असतात किंवा स्थानिक स्पोर्टस क्लबचे सदस्य असतात.
गोव्यात माझ्या बहिणीकडे गेलो की या शाळेच्या मैदानात किंवा एखादया मोकळ्या झालेल्या पॅडी फिल्डवर मुलांचा फुटबॉलचा सराव पाहणे, कधी एखादा अटीतटीचा सामना पाहणे यात चांगला वेळ जातो. एकूण फुटबॉल हा खेळ अनेक गोमंतकीयांची पॅशन आहे.
पणजी येथील कम्पाला ग्राउंडवर तुम्ही गेलात तर तेथे अनेक जण क्रिकेट आणि फुटबॉल खेळतांना तुम्हाला हमखास सापडतील. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी दूरदृष्टी राखून पणजीतील मांडवी नदीच्या तीरावरील मिरामारपर्यंतचा लांबवरचा पट्टा विविध कला, क्रीडा आणि संस्कृती क्षेत्रांसाठी राखून ठेवला.
त्यामुळे या क्षेत्रांत रस असणाऱ्या गोमंतकीय आणि इतरांचीही खूप सोय झाली. गोव्याची कला अकादमी येथेच आहे.
विशेष म्हणजे कला, क्रीडा आणि संस्कृती या विषयाला वाहिलेल्या अनेक संस्था आणि स्पोर्टस क्लब्स गोव्यात गावोगावी सापडतात. फुटबॉल हा या स्पोर्टस क्लबचा प्रमुख आणि सर्वाधिक लोकप्रिय खेळ असतो. यापैकी अनेक स्पोर्टस क्लब्सना खूप वर्षांचा वारसा आहे. त्यापैकी काही पोर्तुगीज जमान्यातील आहेत.
काही क्लब्सना स्वतःच्या मालकीचे स्पोर्टस ग्राउंड्स आहेत, इमारती आणि कार्यालये आहेत, ग्राउंडवर फुटबॉल, हॉकी किंवा क्रिकेट खेळले जाते आणि इमारतीत विविध इन-डोअर गेम्स खेळले जातात.
गोव्यात घरी सकाळी वृत्तपत्र आले की पहिल्यांदा अगदी शेवटचे म्हणजे क्रीडा पान वाचणारे माझे अनेक मित्र आहेत. गोमंतकीयांसारखे इतके क्रीडाप्रेम भारताच्या काही मोजक्याच राज्यांत आढळेल.
गोव्याच्या या लोकप्रिय खेळास प्रमुख स्थानिक उद्योग कंपन्यांनी, दानशूर व्यक्तींनी आणि धनवानांनी गेली अनेक वर्षे आर्थिक पाठबळ पुरविले आहे. डेम्पो स्पोर्टस क्लब, साळगावकर स्पोर्ट्स क्लब, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा चर्चिल ब्रदर्स वगैरे नामांकित स्पोर्टस क्लब्स गोव्यात आहेत.
या क्लब्ससाठी गोव्यातील फुटबॉलपटू खेळात असतात. त्यामुळे या फुटबॉलपटूंना बिदागी मिळतेच, त्याशिवाय या खेळास आर्थिक पाठबळ मिळून नवी पिढीही या खेळाकडे आकर्षित होते.
गोव्यातील वृत्तपत्रांत फुटबॉलची माहिती असणारा स्पोर्टस रिपोर्टर असणे आवश्यक असते, कारण क्रीडापानांवरील प्रमुख बातम्या या फुटबॉलच्या असतात.
तसे पाहू गेल्यास फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक देशात सर्वाधिक खेळला जाणारा आणि प्रत्यक्ष मैदानावर वा टीव्हीवर पाहिला जाणारा खेळ आहे. त्या तुलनेने क्रिकेट, हॉकी किंवा टेनिस हे खेळ काही ठराविक देशांतच लोकप्रिय आहे. या क्रीडाप्रकारांत प्रावीण्य मिळालेले पेले आणि डायगो मॅराडोना यासारखे अनेक खेळाडू त्यांच्या हयातीतच दंतकथा बनले आहेत.
मात्र भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारतात काही अगदी मोजक्याच राज्यांत फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे आणि त्या राज्यांमध्ये गोव्याचा समावेश होतो. इतर राज्यांमध्ये केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांचा समावेश होतो.
संतोष ट्रॉफी हा या खेळातील देशातील सर्वात मानाचा चषक. तो चषक केवळ या मोजक्या राज्यांत वर्षानुवर्षे फिरत राहिला आहे. त्यांत नव्या राज्यांची भर पडलेली दिसत नाही.
ब्रह्मानंद संकवाळकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या संघाने संतोष ट्रॉफी पहिल्यांदा १९८३ साली जिंकली. ट्रॉफी जिंकून गोव्यात आल्यानंतर ब्रह्मानंद आणि त्यांच्या संघातील खेळाडूंची पणजीत ट्रकमधून मिरवणूक काढली होती. मला आठवते लोक मोठया संख्येने या फुटबॉलपटूंचे स्वागत करण्यास आले होते. ब्रह्मानंद संकवाळकर यांना नंतर देशातील क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतात गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांत फुटबॉलची इतकी क्रेझ असूनही आपला देश आंतराष्ट्रीय स्तरावर या खेळात खूप मागे आहे. जगाच्या नकाशावर टिंबाएव्हढे अस्तित्व असणारे छोटेछोटे देश सध्या चालू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कप स्पर्धेत हिरीरीने भाग घेत आहेत.
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण करणारे काही देश तर या स्पर्धेच्या चषकाचे दावेदार असणाऱ्या देशांनाच आव्हान देताना दिसत आहेत.
यापैकी अनेक देशांची नावे प्रेक्षक पहिल्यांदाच ऐकत असतील. गेली अनेक वर्षे भारत मात्र या महत्त्वाच्या स्पर्धेत पात्रताफेरीतच बाद होतो,
युरो फुटबॉल कप आज रात्री 12.30 पासून सुरू
आता पुढील काही दिवस मी फ़ुटबाँल मॅचेस पाहणार आहे.

Wednesday, June 26, 2019

कामगार चळवळीतील डाव्यांची पोकळी कोण भरून काढणार?

कामगार चळवळीतील डाव्यांची पोकळी कोण भरून काढणार?
पडघम - राज्यकारण 
कामिल पारखे
  • कामगार चळवळीचं एक चित्र, मुंबईच्या हुतात्मा चौकातील स्मारक आणि सीपीएमचे ध्वज
  • Wed , 26 June 2019
  • पडघमराज्यकारणकामगार चळवळकम्युनिस्ट पक्षडावे पक्षवेतनहक्करजाश्रेणी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना त्यांच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात एकही जागा जिंकता आली नाही. केरळमध्ये डावी आघाडी सत्तारूढ असूनही तिथे काँग्रेसने लोकसभेच्या अधिक जागा जिंकण्यात बाजी मारली. त्रिपुरातही डावे पक्ष सत्तेतून पायउतार झाले आहेत. देशभर पुरोगामी चळवळीतल्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कन्हैय्या कुमारचा बिहारमध्ये भाकपच्या बालेकिल्ल्यात पराभव झाला! डावे पक्ष आणि डाव्या संघटना देशातून लवकरच नामशेष होतील अशी सध्या चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर डाव्या पक्षांनी देशभर आणि जगातही कामगार वर्गाच्या हितासाठी, कल्याणासाठी उभारलेल्या यशस्वी लढ्याच्या योगदानाची साहजिकच आठवण येते. भले राजकीय सत्तेसाठी लोक काँग्रेस वा इतर पक्षांची निवड करत असत, तरी कामगारांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी डावे आणि समाजवादी नेतेमंडळीच धावून येणार हे अगदी ठरलेले असायचे. डाव्या पक्षांचे आणि पर्यायाने त्यांनी चालवलेल्या विविध कामगार संघटनांचे अस्तित्व हळूहळू नाहीसे होत आहे, ही कामगारांच्या दृष्टीने निश्चितच काळजी करण्यासारखी बाब आहे.
जगभरच डाव्यांची, समाजवाद्यांची आणि इतर पुरोगामी संघटनांची सगळ्याच क्षेत्रांत पिछेहाट होत असताना विचारसरणीच्या अनेक संस्था-संघटनांना ‘अच्छे दिन’ आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि क्षेत्र पसरत चालले आहे. अशा परिस्थितीत डाव्यांना समर्थ पर्याय म्हणून कामगारांच्या हितासाठी लढणारी कुठलीही संघटना आज दिसत नाही. उजव्या विचारसरणीत कामगार हिताला बिलकूल महत्त्व नाही, केवळ मालकांचेच हित आणि नफेखोरीलाच प्राधान्य द्यायला हवे, असाच संदेश सध्याची परिस्थिती देते आहे. 
गेल्या शतकात अनेक दशके एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन जगभरातील कामगार मंडळी आणि कामगार संघटना अतिशय उत्साहाने साजरा करत असत. या आंतरराष्ट्रीय दिनाचा सोहळा सर्वांत अधिक थाटामाटाने साजरा होई तो जगातील पहिली साम्यवादी क्रांती झालेल्या रशियातील मॉस्को शहरातील लाल चौकात आणि चीनमधील बीजिंग शहरात ! राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांच्या आणि हजारो नागरिकांच्या हजेरीत पार पडणारा हा सोहळा अगदी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याइतका महत्त्वाचा गणला जायचा. जगातील अनेक देशांत कम्युनिस्ट राजवटीचा पोलादी पडदा शतकाअखेरीस गायब झाला. त्याआधीच म्हणजे १९८६ साली हा आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा सोहळा बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पाहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट्स या कामगार संघटनेचा सरचिटणीस या नात्याने रशिया दौऱ्याची आणि बल्गेरियात पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली होती. कामगार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारा तो मेळावा आणि तेथील सैन्याच्या कवायतीमुळे मी अगदी भारावून गेलो होतो.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाला साम्यवादी जगात म्हणजे रशिया, चीन आणि पूर्व युरोपातील देशांत, डाव्यांच्या आणि समाजवाद्यांच्या चळवळीतच अधिक महत्त्व दिले जायचे. “जगातील कामगारांनो, एक व्हा! तुम्हाला तुमच्या शृंखलांशिवाय म्हणजे गुलामगिरीशिवाय इतर काहीही गमवायचे नाही!!” असा स्पष्ट नाराच कार्ल मार्क्सने दिला होता. त्यामुळे भांडवलशाहीचे प्रस्थ असलेल्या पश्चिम युरोपात आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रांत आंतरराष्ट्रीय कामगार दिनाला राष्ट्रीय सणासारखे महत्त्व दिले जाणे शक्यच नव्हते. मात्र या देशांतही डाव्या संघटनांच्या आणि इतरानाही चालवलेल्या कामगार चळवळीत एक मे च्या कामगार दिनाला महत्त्वाचे स्थान होतेच.
भारतातही तशीच परिस्थिती होती. देशात आणि महाराष्ट्रात त्या काळी काँग्रेसची सत्ता असली तरी कामगार चळवळीवर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (भाकप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप), समाजवादी पक्षांची आणि काँग्रेसचीही मजबूत पकड होती. भाकपची आयटक, माकपची सिटू, काँग्रेसची इंटक,  पूर्वाश्रमीच्या जनसंघाची आणि आताच्या भाजपची भारतीय मजदूर संघ आणि समाजवाद्यांची हिंद मजदूर सभा अशा कामगार संघटना सक्रिय होत्या. महाराष्ट्रात आणि देशभरातही एकेकाळी कामगार संघटनांवर लाल बावट्याचे म्हणजे कम्युनिस्टांच्या लाल झेंड्याचेच अधिराज्य असायचे. जॉर्ज फर्नांडिस, एस. एम. जोशी वगैरे समाजवादी नेतेही कामगार संघटनांच्या लढ्यात आघाडीवर होते. संरक्षण खात्यातील नागरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे नेतृत्व एस. एम. जोशी आणि इतर समाजवादी नेत्यांकडे अनेक वर्षे होते. 
कम्युनिस्टांच्या या क्षेत्रातील आघाडीच्या भूमिकेमुळे कामगार संघटना म्हणजेच कम्युनिस्टांच्या क्रांतीचे निशाण असणारा लाल झेंडा असे एक समीकरण झाले होते. एके काळी मुंबईत कॉम्रेड डांगे यांची आयटक संघटना कामगार चळवळीत आघाडीवर होती. भारतीय मजदूर संघ ही दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेली संघ परिवारातील कामगार संघटना नंतर डाव्यांना एक पर्याय म्हणून उभी राहिली होती. 
शिवसेनेनेसुद्धा मुंबईतील कामगार चळवळीत शिरून या क्षेत्रातील डाव्यांची मक्तेदारी संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अलिकडच्या काळात शिवसेनेने मुंबईत आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतसुद्धा कामगार चळवळीतून अंग काढून घेतल्यासारखे दिसत आहे. कामगार चळवळीत डॉ दत्ता सामंत यांनीही एकेकाळी मुंबईत आणि महाराष्ट्राच्या काही भागांत कामगार चळवळीची एक मोठी ताकद निर्माण केली होती.
या सर्वच कामगार संघटना कामगारांच्या हितासाठी भांडत असत. वार्षिक पगारवाढ, वेतनवाढीचे करार, पगारी सुट्ट्या, कायम नोकरी, विविध भत्ते, कामगारांचे निलंबन किंवा बडतर्फी, कामाचे तास आणि कामाच्या जागी दिल्या जाणाऱ्या सुविधा यासाठी या कामगार संघटना विशेष जागरूक असत. अगदी १९९० दशकापर्यंत बहुतेक सर्वच मोठ्या सार्वजनिक आणि खासगी कंपन्यात कामगार संघटना अधिकृतरीत्या काम करत असत, व्यवस्थापनातर्फेही त्यांना अधिकृत मान्यता दिली जात असे, ठराविक काळानंतर वेतनवाढीचे करार या कामगार संघटनेशी केले जात असत. घसघशीत पगारवाढ असलेल्या या त्रैवार्षिक वेतनकराराच्या व्यवस्थापनाकडून वा कामगार संघटनांकडून आलेल्या बातम्या आम्ही पत्रकार आवर्जून छापायचो. काही गंभीर समस्या असली तर या कामगार संघटना संपाची नोटीस देत कंपन्या टाळेबंदीची नोटीस काढत असत. विशेष म्हणजे हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहून होत असे. कामगार आयुक्तांचे प्रतिनिधीही कामगारांच्या आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींशी औद्योगिक तंटे मिटविण्यासाठी बैठक घेत असत.
भारतातील विविध प्रमुख शहरांतील आम्हा पत्रकारांच्या आणि वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या संघटनांवरही डाव्या पक्षांच्या नियंत्रण असायचे. सिटू या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र कर्मचाऱ्यांनी झगडून पालेकर, बच्छावत वगैरे वेतन आयोगाची स्थापना करायला लावली आणि नंतर या आयोगांच्या शिफारशींच्या अमंलबजावणीसाठीही लढे दिले. अशाच प्रकारे इतर क्षेत्रातील कामगारांना डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांनी संघटीत केले आणि त्यांच्या हिताचे संरक्षण केले. काही दशकांपूर्वी कुठल्याही औद्योगिक पट्ट्यात काही कंपन्यांच्या प्रवेशदारापाशीं लाल बावटे घेऊन निदर्शने करत असलेले कामगार हमखास दिसायचे. या कामगार युनियन्सच्या अवास्तव मागण्यांमुळे, संपांमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असेही घडले.
देशातील विविध उद्योगकंपन्यांतील कामगारांना संघटीत करण्यात, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात आणि त्यासाठी संघर्ष करून हे हक्क मिळवून देण्यात इतरांपेक्षा डाव्यांनी फार मोठे योगदान केले आहे. मात्र हे करत असताना डावे पक्ष मुंबईत आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतही केरळ आणि पश्चिम बंगालप्रमाणे राजकीय सत्ता मात्र मिळवू शकले नाही.
काही वर्षांपूर्वी आपल्या देशात आणि जगाच्या इतर भागांतही उदार अर्थव्यवस्था अस्तित्वात आली, खासगी कंपन्यांवरील सरकारी नियंत्रणे कमी होत गेली आणि कामगार संघटनांचे अस्तित्व लोपू लागले. गेल्या काही वर्षांत अनेक खाजगी क्षेत्रात व्यवस्थापनांनी कामगार संघटनांचे अस्तित्वच नाकारले आहे. कामगारांचा संघटित होण्याचा कायदेशीर हक्कच आज कुणी मान्य करत नाही. त्यामुळे कामगार युनियन्स स्थापन होण्याची प्रक्रियाच बंद झाली आहे. वार्षिक पगारवाढ, दर तीन वर्षानंतर होणारे वेतन करार, बाळंतपणाची हक्काची पगारी सुट्टी वगैरे कायदेशीर बाबी आता दुर्मीळ होत चालल्या आहेत. दर दिवसाचे कामाचे फक्त आठ तास आणि अधिक तास काम केल्यास ओव्हर टाइम हे नियम आता कुठल्याच खासगी कंपनीत पाळले जात नाहीत. सकाळी कामावर वेळेवर जाणारा कर्मचारी आणि अधिकारी रात्री कधी घरी परतेल याची कुणालाच खात्री नसते. शिवाय कर्मचाऱ्याने घरूनही काम करावे, मोबाईलवर संपर्कांसाठी कायम उपलब्ध असावे अशी अपेक्षा असते. 
आमच्या पिंपरी-चिंचवड शहरात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नावाने महापालिकेने एक संकुल उभारले आहे, भारतातील या आद्य कामगार नेत्याने ब्रिटिश काळात कामगारांचे दरदिवसाचे कामाचे तास मर्यादित असावे आणि त्यांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी म्हणून यशस्वी लढा उभारला होता. आजच्या कामगारांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे सतत वाढत जाणारे कामाचे तास, त्यांचे कायदेशीर हक्क आणि सोयी-सुविधांत सतत होणारी कपात पाहता कामगारांच्या कल्याणसुविधा आणि हक्कांबाबत सुधारणा होण्याऐवजी पिछेहाट होते कि काय असाच संशय येतो. हल्ली महिलांना सहा महिन्यांची बाळंतपणाची रजा मिळते. त्यामुळे काही कंपन्यांत गर्भवती महिलांना ही हक्काची आणि पूर्णपगारी रजा देण्याऐवजी त्यांना राजीनामा देण्यास भाग पडले जाते. या कारणामुळे अविवाहित व नवविवाहित महिलांना नोकरी देणे किंवा नोकरीत नियमित करणे टाळले जाते, असेही दिसून येते.
आज सर्वच क्षेत्रांतील कर्मचाऱ्याना प्रॉव्हिंडट फंडाशी निगडीत असलेले निवृत्तीवेतन दिले जाते. २०-२५ वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांस निवृत्तीनंतर महिना दोन-तीन हजार रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते! मात्र एकदा खासदार म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीला आयुष्यभर लाखो रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते. याचे कारण सर्वपक्षीय खासदार, आमदार आणि इतर लोकनियुक्त प्रतिनिधी आपले स्वतःचे वेतन आणि भत्ते वाढवून घेण्यासाठी पक्षभेद विसरून संघटीत होतात. नजिकच्या काळात आपल्या हितासाठी कामगार संघटीत होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे वेतनवाढीसाठी, वेतनवाढ करारासाठी आणि निवृत्तीवेतनाच्या या त्रुटी आणि तफावतीविरुद्ध भांडणार कोण?