Showing posts with label Jesuits. Show all posts
Showing posts with label Jesuits. Show all posts

Thursday, November 27, 2025

रेस कोर्सनजिक असलेल्या सेंट पॅट्रिक्ट्स कॅथेड्रल्समध्ये जाऊन पुण्याचे नवनिर्वाचित बिशप फादर सायमन अल्मेडा यांची आज सकाळी सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या असलेल्या आणि दिडशे वर्षांचा इतिहास असलेल्या पुणे कॅथोलिक धर्मप्रांताचे किंवा डायोसिसचे ते आठवे बिशप असतील.
पुणे डायोसिसची स्थापना १८८६ साली झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत धर्मप्रांताचे पहिले दोन बिशप जर्मन होते.
कॅथोलिक धर्मप्रांताचे बिशप या पदाचे महत्त्व आणि अधिकार चर्चबाहेरच्या इतरांना सहसा माहित नसतात.
बिशप हे त्यांच्या डायोसिसमधील असलेल्या सर्व धर्मप्रांतीय शैक्षणिक संस्था - शाळा-कॉलेजेस, दवाखाने, सामाजिक आणि धर्मादाय संस्था यांचे व्यवस्थापकीय प्रमुख असतात.
आताच्या पुणे डायोसिसमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली महसूल जिल्हे आणि कोल्हापूर शहर यांचा समावेश होतो.
एके काळी म्हणजे बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांच्या कारकिर्दीच्या काळात १९८७ पर्यंत पुणे धर्मप्रांतात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारपासून कोकणातील रत्नागिरीपर्यंतचा भाग समाविष्ट होता.
गेल्या काही दशकांत नाशिक आणि नंतर सिंधुदुर्ग नवे धर्मप्रांत निर्माण झाल्याने पुणे धर्मप्रांताचे क्षेत्र कमी झाले आहे.
बिशप जॉन रॉड्रिग्स यांची मुंबई सर्वधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून निवड झाल्याने हे पद गेले एक वर्षभर रिक्त होते.
त्याआधी थॉमस डाबरे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण होईपर्यंत पुण्याचे बिशप होते.
प्रत्येक कॅथोलिक व्यक्तीचा त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी बिशपांशी संपर्क आलेला असतोच.
याचे कारण कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार (सांक्रामेंत ) देण्याचा अधिकार केवळ बिशपांना असतो.
काही वर्षांपूर्वी फादर सायमन अल्मेडा आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चचे पाच वर्षे धर्मगुरु होते.
कॅथोलिक चर्चच्या अखत्यारीतल्या चर्चमधील धर्मगुरूंची आणि शाळांच्या प्राचार्यांची ठरविक काळानंतर बदली होत असते.
कॅथोलिक चर्चचे जगभर पसरलेले जाळे, या चर्चच्या विविध संस्थांचे विविध समाजघटकांत चालू असलेले कार्य आणि या चर्चचे व्यवस्थापन हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि अतिशय कुतूहलाचा विषय आहे.
चर्चसारखे नेटवर्क असलेली जगात इतर कुठलीही संस्था वा संघटना नसावी.
फादर सायमन अल्मेडा यांच्या बिशपपदाची घोषणा पोप लिओ चौदावे यांच्याकडून व्हॅटिकन सिटीमधून, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाकडून दिल्लीतून आणि पुण्यातील सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमधून एकाच दिवशी आणि एकाच क्षणी व्हावी, त्या घोषणेवेळी चर्चबेलचा घंटानादही व्हावा, या घटनेतून चर्चच्या जागतिक नेटवर्कची थोडीबहुत कल्पना यावी.
मी स्वतः गोव्यात जेसुईट फादर होण्यासाठी काही वर्षे उमेदवारी केली असल्याने कॅथोलिक चर्चच्या कामकाजाची आणि नियमांची मला थोडीफार माहिती आहे.
नूतन वर्षांरंभात फादर सायन अल्मेडा यांचा बिशप म्हणून दीक्षाविधी होईल.
नवनिर्वाचित बिशपांना शुभेच्छा !

Camil Parkhe


Tuesday, June 10, 2025

 


पुण्यातील शनिवार पेठेतील `स्नेहसदन' या जेसुईट फादरांच्या संस्थेच्या वतीने दिवंगत पोप फ्रान्सिस यांना अलीकडेच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शतक ओलांडलेल्या `निरोप्या' या मराठी मासिकाचे संपादक फादर भाऊसाहेब संसारे आणि माधवराव खरात यांनी आयोजित केलेल्या या श्रद्धांजली सभेला
पुणे, पिंपरी चिंचवड तसेच शेजारच्या नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक लोक आणि प्रगत पदवीधर संघटनेचे (पीपीएस) पदाधिकारी हजर होते.
यामध्ये पीपीएसचे सुधाकर सपकाळ, अंतोन कदम, जे डी आढाव, अर्चना आणि सुनील बोर्डे, रत्नाकर दोंडे आणि ऍडव्होकेट पी. एम संसारे , प्रेषित सोशल फौंडेशनचे सचिन औचारे, नाशिकचे वॉल्टर कांबळे. जयप्रकाश पारखे, `ज्ञानोदया'चे कार्यकारी संपादक कांतिश तेलोरे, सुनिता पारखे वगैरे होते.
पुणे येशूसंघीय (जेसुईट) प्रांताचे प्रांताधिकारी फादर आग्नेलो मस्करन्हेस, पुणे धर्मप्रांतीय व्यवस्थापक फादर रॉक अल्फान्सो, मेडिकल मिशन सिस्टर्स, बिबवेवाडी प्रमुख सिस्टर उषा गायकवाड (पोप फ्रान्सिस आणि स्त्रियांचा ख्रिस्तसभेमधील सन्मान व सहभाग) आणि मी स्वतः (कामिल पारखे ) यांचा वक्त्यांमध्ये समावेश होता.
या कार्यक्रमात सहभागी होण्यात मला खरोखर आनंद झाला.
जेसुईट फादर होण्यासाठी मी श्रीरामपूर सोडले १९७६ साली तेव्हा माझे गॉडफादर फादर प्रभुधर यांच्यासह येथे मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हापासून मी या संस्थेशी आजतागायत जोडले गेलेलो आहे.
हजारो ग्रंथ असलेल्या इथल्या ग्रंथालयात बसून मी महाराष्ट्र चरित्रकोशसह सातआठ पुस्तके लिहिली.
स्नेहसदन या संस्थेशी पुणेकरांचे फार जुने नाते आहे.
अनेक हौशी, प्रायोगिक मराठी नाटकांच्या तालमी येथे झालेल्या आहेत आणि पहिला अंक ( प्रवेश मूल्य ऐच्छिक ! ) येथेच झालेला आहे.
`स्नेहसदन'चे संस्थापक मॅथ्यू लेदर्ले यांच्या काळापासून नानासाहेब गोरे , पु. ल. देशपांडे, मोहन धारिया, मेधा पाटकर यांच्यासह अनेकांचा येथे नेहेमीच वावर होता.
फादर भाऊसाहेब संसारे यांनी सांगितले कि या वास्तूत पुन्हा एकदा कार्यक्रम आयोजित केले जातील.
या कार्यक्रमात हजर असलेल्या लोंकांचे हे छायाचित्र.
उजवीकडे कोपऱ्यात संस्थापक मॅथ्यू लेदर्ले यांचा फोटो आहे.

Camil Parkhe May 17, 2025



Saturday, December 7, 2024

 अतिशय धार्मिक म्हणता येईल अशा कुटुंबात मी वाढलो. माझ्या वडलांची दिनचर्या सुरु व्हायची ती सकाळी उठल्याउठल्या पलंगातल्या बिछान्यातच हातात रोझरी जपमाळ घेऊन कपाळावर, छातीवर आणि दोन्ही खांद्यांवर हाताने क्रुसाची खूण करत ' पवित्र क्रुसाच्या खुणेने...'' या प्रार्थनेपासून.

त्यानंतर `आमच्या बापा’, `नमो मारिया’ `प्रेषितांचा विश्वासांगिकार’ वगैरे प्रार्थना अर्धा तास चालायच्या. त्यांचे तोंड बाहेरच्या खोलीत असलेल्या आमच्या कुडाच्या भिंतीवर टांगलेल्या छोट्याशा आल्ताराकडे असायचे.
दरम्यानच्या काळात स्वयंपाकघरात केलेला कोरा चहा कपबशीत त्यांच्यासमोर ठेवलेला असायचा. दादांचे हे असे दररोजचे दर्शन मला खूप लहानपणापासून आठवते.. याचं कारण घरात इतरांपेक्षा खूप लवकर म्हणजे तांबडं फुटण्याआधीच बिछान्यातून बाहेर पडण्याची मला लागलेली सवय.
सकाळी साडेआठ दरम्यान दादांची आंघोळ, नाश्ता उरकायचा, तोपर्यंत घरात महिन्यावार लावलेला फुलांचा हार आलेला असायचा. कालचा जुना हार काढून दादा आल्तारासमोर उभे राहून दोनतीन प्रार्थना - आमच्या बापा, मारिया - मनातल्या मनात म्हणायचे आणि आमच्या `पारखे टेलर्स’ दुकानात जायला निघायचे.
माझी शाळा सकाळी अकराला असल्यानं अनेकदा मी त्यांच्याबरोबर जायचो. दुकानातल्या लाकडी फळ्यांचे दार उघडून केरसुणीनं ते दुकान झाडून घ्यायचे आणि मग दुकानाच्या भिंतीवर मध्यभागी असलेल्या आल्तारासमोर उभे राहून ते पुन्हा दोनतीन प्रार्थना म्हणायचे.
संद्याकाळी दुकानात पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवल्यावर आणि नंतरच्या काळात दिवे लावल्यावर लगेचच ते आल्ताराकडे पाहायचे आणि उजवा हात कपाळावर लावायचे.
श्रीरामपूर नगरपालिकेचा रात्रीचा साडेआठ वाजता भोंगा झाल्यानंतर दुकान बंद करण्याआधी पुन्हा एकदा आल्तारासमोर प्रार्थना व्हायची.
घरी आल्यावर नऊच्या आत आल्तारावर जाडजूड स्टीलच्या स्टॅण्डमध्ये दोन मेणबत्त्या लावल्या जायच्या आणि घरातील सगळे जण रात्रीच्या सामूहिक प्रार्थनेत सहभागी व्हायचे. जवळजवळ अर्धा तास चालणाऱ्या रात्रीच्या या प्रार्थनेत कुणीही गैरहजर राहू नये असा एक दंडक होता.
शनिवारी रात्री मारियेची प्रार्थना म्हणजे रोझरी व्हायची, आठवड्यातून दोनतीनदा मारियेची, सर्व संतांची आणि संत जोसेफची लितानी प्रार्थना व्हायची. अशाप्रकारे दादांचा नि आमच्या घरातला हा दिनक्रम कार्यक्रम कधीही चुकल्याचं मला आठवत नाही.
नाश्ता आणि कुठलेही जेवण घेण्याआधी हातानं क्रुसाची खूण केल्यानंतरच घास तोंडात टाकायचा ही त्यांची आणखी एक सवय. ही सवय आमच्या आईला - बाईला - सुद्धा होती. अहमदनगर जिल्ह्यात आईला 'बाई' असं संबोधन करण्याची रीत प्रचलित आहे.
घरातल्या या धार्मिक वातावरणाचा प्रभाव घरातल्या आम्हा मुलामुलींवर पडणे साहजिकच होते. घरातली सगळीच मुलं साधुसंत झाली नाही तरी बऱ्यापैकी धार्मिक आणि चांगल्यावाईट कल्पनांचा आदर आणि दुःस्वास करणारी निघाली.
घरातल्या कुणाही व्यक्तीकडून कसलाही अपशब्द, लिंगाधारित अपशब्द किंवा एखादी शिवी कधीही कानावर पडली नाही.
सत्तरच्या दशकापर्यंत जगभरातील कॅथोलिक देवळांत रविवारचा आणि दररोजचाही मिस्साविधी लॅटिन भाषेतून व्हायचा. आपल्याकडे अलीकडच्या काळापर्यंत अनेक धार्मिक विधी सामान्य लोकांना न कळणाऱ्या संस्कृत भाषेत व्हायचे अगदी तसेच. श्रीरामपूरला आणि हरेगावसारख्या खेड्यांपाड्यांत १९७२ पर्यंत कॅथोलिक देवळांत मिस्साविधी आणि प्रार्थना लॅटिन भाषेत व्हायच्या,
पुस्तकात समोरासमोरच्या पानांवर रोमन आणि देवनागरी लिपींत लिहिलेल्या या लॅटिन प्रार्थना आम्ही म्हणायचो. मराठी भाषा येणारे आम्ही लोक देवनागरी लिपीतल्या त्या लॅटिन प्रार्थना सहजपणे गात आणि म्हणत असू.
आमच्या लहानपणी आम्ही - आणि जगभरातले सर्वच भाविक लोक - लॅटिन भाषेत प्रार्थना करत असू. .
तासभर चालणाऱ्या या संगीतमय लॅटिन मिस्सा खरंच भव्यदिव्य स्वरुपाच्या असायच्या. पूर्ण उपासनाविधीत याजक आणि जमलेले भाविक जवळजवळ विशिष्ट लयबद्ध पद्धतीने गात असत. लॅटिन भाषेच्या संगीतमय उपासनाविधीला रुळलेल्या माझ्यासारख्या मुलांना आणि अनेक ज्येष्ठांना हा निर्णय लगेचच रुचला नव्हता हे कबूल करायलाच हवं.
आज जगभर सगळीकडे स्थानिक भाषांत मिस्साविधी आणि इतर सर्व प्रार्थना होतात.
ख्रिस्ती लोक बहुसंख्य बसलेल्या श्रीरामपूरच्या नामवंत जर्मन हॉस्पिटल म्हणजे सेंट लुक हॉस्पिटलच्या परिसरापासून दोन किलोमीटर लांब पण शहराच्या मुख्य वस्तीत आमचं घर होतं.
मेनरोडपाशी सोनार लेनमध्ये आमचं `पारखे टेलर्स’ हे शहरात नावाजलेलं दुकान होतं. तेथून जवळच असलेल्या सोमैय्या हायस्कुलपाशी आम्ही राहायचो.
आमच्या चाळीत बहुधर्मिय आणि विविध जातींची घरं होती. आमच्या घराच्या भिंतीला लागून मुसलमान शेजार होता, त्यांच्या अगदी समोरसुद्धा एक मुसलमान घर होतं, आमच्या घराच्या दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंब होतं, त्यांच्याशेजारी आणखी एक मुसलमान कुटुंब होतं. समोरची चारपाच घरं माळी जातीच्या आणि एकमेकांचे नातेवाईक असलेल्या कुटुंबांची होती.
या साऱ्या घरांतील लोक पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी सामाईक नळावर अवलंबून असत. त्यावेळी तिथं गोल कुंकू लावलेल्या, कुंकवाची आडवी चीर लावलेल्या आणि अजिबात कुंकू नि कुठलेही सौभाग्यलेणं नसलेल्या बायांची गर्दी होई.
मात्र वेगवेगळे कुंकू असण्याचा किंवा अजिबात कुंकू नसण्याचा त्यांच्या आपापसांतील संभाषणांत काहीही फरक नसायचा.
या आमच्या माळी-मराठी आणि मुसलमान शेजाऱ्यांच्या आपापसांत नेहेमी भाजी-कालवणांची - अडीअडचणीच्या काळात गव्हाच्या-ज्वारी-बाजरीच्या पिठाचीही आठव्याच्या किंवा एखाद्या पातेल्याच्या मापात मोजून घेऊन देवाणघेवाण व्हायची.
जराशा अंतरावर असलेल्या दगडी इमारतीत आणि बैठ्या दगडी घरांत एकदोन ब्राह्मण घरं होती. त्या ब्राह्मण घरातला नातू माझ्याच वर्गातला आणि माझा जवळचा मित्र, तो आमच्या घरात यायचा, मीही त्याच्या घरात थेट आतपर्यंत जायचो,
मात्र त्याची सत्तरीतली आजी कायम सोवळ्यात असायची, आणि कुणाला तिच्याजवळ येऊ किंवा शिवू देत नसायची. माझ्या आईची तिची जाम गट्टी होती.
'' या,या मार्थाबाई, बसा घडीभर'' असं म्हणत ती माझ्या आईला आपल्या घरात घ्यायची,
भरपूर वेळ खूप गप्पाटप्पा व्हायच्या, मात्र सुरक्षित अंतर ठेवूनच. आम्हाला मात्र त्याचं कधीही वाईट वाटलं नाही. इतर कुणाही व्यक्तीला - अगदी मराठा आणि माळी जातीच्या लोकांनाही - त्या गणपुले आजी शिवत नसायच्या.
सगळा शेजारपाजार एकमेकांच्या घरांतील सुखदुःखाला म्हणजे लग्नकार्यांना, मयतीला हजर असायचा, त्यामुळे एकमेकांच्या रितीरिवाजांची आणि संस्कृतीची साधारण ओळख असायची.
शेजारच्या मुसलमान घरांतील लहान मुलांच्या सुंता कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं मला आजही आठवतं. नंतर थोडं मोठं झाल्यावर कळालं कि सुंता परंपरा यहुदी धर्मात होती आणि यहुदी असलेल्या येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या बाराही शिष्यांची साहजिकच सुंता झाली होती.
नव्या ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांमध्ये मात्र सुंता प्रथा न आणण्याचा निर्णय या विषयावर चर्चा होऊन अगदी सुरुवातीच्या काळातच घेतला गेला होता.
कालांतरानं लक्षात आलं कि धर्म आणि भाषा, संस्कृती, पेहराव आणि अगदी खाद्यपध्द्ती यांचा एकमेकांशी काही एक संबंध नसतो.
साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.
या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.
साठ आणि सत्तरच्या दशकांच्या पिढीपर्यंत देशातील धार्मिक ख्रिस्ती कुटुंबांत घरातलं एक तरी मुल फादर किंवा सिस्टर व्हावं अशी आईवडलांची अपेक्षा असायाची.
युरोपातून आणि अमेरिकेतून अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आणि नन्स मिशनरी होऊन भारतात, आफ्रिका खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आले त्याचं हे प्रमुख कारण होतं. ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या केरळ, गोवा आणि वसईसारख्या भागांतूनसुद्धा अनेक धर्मगुरु आणि नन्स देशाच्या कानाकोपऱ्यांत काम करत आहेत ते याच कारणामुळं.
कोणे एके काळी अशाच धार्मिक कॅथोलिक कुटुंबात जन्मलेले जॉर्ज फर्नांडिस मंगलोर येथील सेमिनरीत फादर होण्यासाठी दाखल झाले होते, मात्र नंतर त्यांचा विचार बदलला आणि मग ते समाजवादी विचारसरणीचे कामगार नेते बनले.
आमचे धार्मिक ख्रिस्ती कुटुंबसुद्धा यास अपवाद नव्हते. याचा परिणाम म्हणून मी स्वतः आजन्म ख्रिस्ती संन्याशी होण्याचा निर्णय घेतला. दहावीनंतर मी जेसुईट फादर होण्यासाठी घरकुटुंब सोडले.
दहावीनंतर श्रीरामपुरातले घर मी सोडेपर्यंत दोन गोष्टी माझ्या शरीराभोवती कायम असायच्या. त्यापैकी एक म्हणजे गळयाभोवती काळ्या दोरीने बांधलेला क्रूस. ख्रिस्ती असल्याची ही खूण अनेकदा इतरांना दिसेल अशा पद्धतीने शर्टाच्या कॉलरपाशी असायची.
दुसरी एक गोष्ट मात्र इतरांना कधीही दिसत नसायची. चारपाच दिवसांच्या दिवाळसणाचा फक्त शेवटचा दिवस आमच्या घरी साजरा व्हायचा, तो म्हणजे भाऊबीज. ``इडा पिडा टळो'' असं काहीसं म्हणत बाई दादांना आणि आम्हा सर्व मुलांना ओवाळायची, नंतर बहिणी आम्हा भावांना ओवाळायच्या आणि मग ओवाळणीच्या ताटात आम्हा सर्व पुरुषांना करदोटे मिळायचे.
आधल्या वर्षाचे करदोटे काढून मग ते नवे करदोटे कमरेभोवती गुंडाळायचे. करदोटेविना पुरुष म्हणजे षंढ असा त्याकाळी समज असायचा.
गोव्यात आल्यानंतर गळ्याभोवतीचाचा हा क्रूस आणि अंतवस्त्रापाशी असलेला करदोटा नक्की कधी आणि कसे गळून पडले हेसुद्धा आता आठवत नाही.
गोव्यात अर्थातच कॅथोलिक समाजात करदोटे बाळगण्याची प्रथा नाही आणि गळ्याभॊवती कुणी क्रॉससुद्धा बाळगत नाही.
हा, गोव्यात कॅथॉलिक व्यक्ती असल्याची ओळख करून देणारी एक दुसरी गोष्ट होती, ती म्हणजे उजव्या अंगठ्याच्या टोकापाशी गोंदलेली छोटीशी क्रुसाची चिन्ह. हिंदू पुरुषाचे दोन्ही कान टोचलेले असतात, तसे गोव्यात कॅथोलिक स्त्री-पुरुषाचे अंगठे क्रूसाचे चिह्नाने गोंदलेले असतात .
मात्र गोव्यात पदवीधर होण्याआधीच धर्मगुरू होण्याचे, आजन्म अविवाहित राहून धर्मसेवा आणि समाजसेवा करण्याचं ध्येय मी सोडलं आणि पत्रकारितेच्या व्यवसायात आलो.
जेसुईट संन्याशी होण्याचं बाळगलेलं स्वप्न सोडणं तितकं सहज नव्हतं. याकाळात प्रचंड मानसिक तणावातून गेलो, मात्र वर्षभराच्या काळात सावरलो आणि एका नव्या व्रताचा - पत्रकारितेच्या आणि कामगार चळवळीच्या - स्वीकार केला.
आज मागे वळून पाहताना एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे झालेले हे स्थित्यंतर अगदी सहजगत्या पार पडले असं वाटते.
आजन्म अविवाहीत धर्मगुरु राहण्याचे उद्दिष्ट सोडून मी गृहस्थाश्रम स्वीकारायला होता तरी तसा एकदा घेतलेला वसा पूर्णतः टाकून दिलेला नव्हता. नव्या अवतारातसुद्धा मूळचा पिंड कायम राहिला होता असे आज मागे वळून पाहताना जाणवते.

Sunday, June 30, 2024

पोप फ्रान्सिस भारतभेटीला

इटलीच्या दौऱ्यावर असताना शुक्रवारी G-7 बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे.

परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलॉनी यांच्यासमवेत मोदीजी आणि पोप फ्रान्सिस यांचे हे छायाचित्र आहे.
मोदीजी यांनी याबाबत समाज माध्यम Xवर खालील टिपण्णी केली आहे.
“Met Pope Francis on the sidelines of the @G7 Summit. I admire his commitment to serve people and make our planet better. Also invited him to visit India. @Pontifex,”
G7 या राष्ट्रांच्या गटात भारताचा समावेश होत नसला तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला या बैठकीचे आमंत्रण दिले जाते. इटलीत ही बैठक होत असल्याने व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख या नात्याने पोप फ्रान्सिस यांनाही या बैठकीचे आमंत्रण होते.
याआधी मोदीजी पोपमहोदयांना व्हॅटिकन सिटीमध्ये २०२१ साली भेटले होते. तेव्हाही पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेऊन त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण दिले होते.
दरम्यानच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील काही राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत.
इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे पोप फ्रान्सिस यांचा दौरा अचानक होत नाही, याचे कारण त्यांची भेट ही नेहमीच धार्मिक उद्दिष्ट्याची ( Pastoral ) असते, त्यासाठी स्थानिक चर्चतर्फे खूप आधीपासून नियोजन केले जाते.
याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारतात १९८६ साली दहा दिवसांचा दौरा केला होता, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली ते पुन्हा तीन दिवसांच्या भेटीसाठी भारतात आले होते.
पोप यांच्या भारतभेटीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहेमीच विरोध केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार अशा देशांना भेटी दिल्या होत्या. या देशांपेक्षा भारतात ख्रिश्चनांचे प्रमाण फार अधिक आहे.
मोदीजी यांचे भारतभेटीचे आमंत्रण केवळ औपचारीकता नसून अगदी मनापासून असेल तर भारतातील चर्चचे पदाधिकारी आनंदून या दौऱ्याच्या तयारीला लागतील.
भारतातील कॅथोलिक चर्च गेली अनेक वर्षे भारताने पोप यांच्या दौऱ्यास मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
पोप हे राष्ट्रप्रमुखसुद्धा असल्याने कुठल्याही दौऱ्यासाठी त्या देशाचे त्यांना औपचारिक आमंत्रण असणे आवश्यक असते.
भारत सरकारने पुन्हा औपचारिक आमंत्रण दिल्यास काही महिन्यांत पोप फ्रान्सिस यांचा भारतदौरा होऊ शकतो.
या वर्षाअखेरीस नोव्हेंबरात गोव्यात संत फ्रान्सिस झेव्हियरच्या पार्थिवाचे अवशेष दोन महिन्यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
दर दहा वर्षानंतर होणाऱ्या या प्रदर्शनातून गोव्याला चांगला महसूल मिळत असतो.
संत फ्रान्सिस झेव्हियर हे सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट) किंवा येशूसंघ या धर्मगुरूंच्या संस्थेचे एक संस्थापक.
विशेष म्हणजे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर निवड झालेले पहिलेच जेसुईट धर्मगुरु आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भारत दौऱ्यात गोव्याचाही समावेश असेल अशी आशा व्यक्त केली आहे.
Camil Parkhe

Friday, January 26, 2024

Karl Marx : ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा ओळख
Karl Marx Birth Anniversary
Karl Marx Birth Anniversaryesakal

Karl Marx Birth Anniversary : `जगातल्या कामगारांनो एक व्हा...तुमच्या पायातल्या शृंखलाशिवाय तुम्हाला गमवण्यासारखे इतर काहीच नाही..'

Workers of the world Unite.. You have nothing to lose but your shackles...

असे आता जगप्रसिद्ध बनलेले आवाहन साद देणारा कार्ल मार्क्स .

कार्ल मार्क्स किंवा डावी विचारसरणी किंवा क्रांतीचे प्रतीक असलेल्या झेंड्याची पहिल्यांदा मला ओळख झाली ती श्रीरामपूरला मी प्राथमिक शाळेत असताना. आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. 

त्यावेळी या जिल्ह्यात बारातेरा साखर कारखाने त्यापैकी तीन खासगी, हरेगावचा बेलापूर शुगर फँक्टरी भारतातला ब्रिटिशकाळात सुरु झालेला पहिला साखर कारखाना. या परीसरात असे औद्योगिकीकरण झाल्याने, कामगार वर्ग निर्माण झाल्याने त्यामुळे कार्ल मार्क्स म्हटल्याप्रमाणे क्रांतीसाठी अगदी पोषक वातावरण.

त्यामुळे माझ्या घराच्या आसपास, रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कचेरीपाशी लाल बावटा अंगाखांद्यावर मिरवत शोषित कामगार मिरवणुकीने जाताना दिसत. `लाल बावटा झिंदाबाद' अशा काहीतरी घोषणा असायच्या, बहुधा गाडे नावाचे एक कामगार नेता या कामगारांचे नेतृत्व करायचे चा. एक दिवस तो लाल बावटा माझ्याही अंगाखांद्यावर आणि त्या घोषणा माझ्याही ओठांवर असतील असे त्यावेळी वाटले नव्हते.

गोव्यात मी कॉलेजात असताना सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकांत कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाने नव्या तरुण पिढीला कमालीची भुरळ घातली होती. मिरामार इथल्या आमच्या धेंपे कॉलेजातले, मडगाव म्हापसा बॉस्को द गामा इथल्या कॉलेजांमधले माझे कित्येक मित्रमैत्रिणी कट्टर मार्क्सवादी बनले होते..

त्याआधी जेसुईट प्रिनॉव्हिस म्हणून मी बीए ला तत्त्वज्ञान विषय घेतला होता. तिथे कार्ल मार्क्स, मानवेन्द्र नाथ रॉय, नक्षलबारी चळवळ, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरेंची जवळून ओळख झाली. माझ्या पिढीतले त्यावेळी बहुतेकजण त्यावेळी मार्क्सवादाच्या मांडवाखाली किंवा त्या प्रभावाखाली होते.

रशियाकडून सप्रेम भेट आलेली अनेक गुळगुळीत पानांची, हार्ड बाउंड, अगदी स्वस्तातली मराठी पुस्तके त्याकाळात घरोघरी असायची. मॅक्सिम गॉर्की याचे आई (The Mother ) अशी कितीतरी पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझ्याकडेसुद्धा होती.

भारतातील कितीतरी नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कम्युनिस्ट नेते होते, कितीतरी नावे आहेत. भगत सिंग तर कम्युनिस्ट आयकॉन , चे गव्हेरा यांच्या प्रमाणे. महाराष्ट्रातील कितीतरी राजकीय नेते, साहित्यिक आणि कवी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते हेसुद्धा सांगायालाच हवे.

गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी चिटणीस झालो. गोव्यातली आणि संपूर्ण भारतातली त्याकाळची पत्रकारांची आणि वृत्तपत्र कामगारांची चळवळ डावे आणि समाजवादी नेते चालवत होते. सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस वाय कोल्हटकर आणि साथी के. विक्रम राव (जॉर्ज फर्नांडिस यांचे जवळचे सहकारी आणि बडोदा डायनामाईट केसमधले एक आरोपी) आमचे नेते. 

देशभर आणि गोव्यात आम्ही पत्रकार आणि वृतपत्र कामगार चळवळीतले सगळे जण एकमेकांना कॉम्रेड म्हणून संबोधित असू, ( पुण्यात आल्यावर ही सवय सुटली ! ) लाल झेंडा आणि क्रांतीच्या त्या घोषणा, `हम होगे कामयाब' (We Shall overcome..) हे गाणे असायचेत. 

मार्क्सवादाच्या याच प्रभावाखाली माझी सोव्हिएत रशिया आणि बल्गेरियाची वारी घडली, बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. कम्युनिस्ट देशाच्या या पंढरीची वारी करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील कितीतरी नेत्यांची, साहित्यिकांची नावे देता येईल.

मी त्यापैकी अखेरचा. याचे कारण मी मॉस्कोत होतो तेव्हा मिखाईल गोब्राचेव्ह नुकतेच सत्तेवर आले होते, नंतर ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइकाचे सुरु झाले नि सोव्हिएत रशियाची अन कम्युनिस्ट जगताची पडझड झाली, ती आपल्या देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली. 

मॉस्कोत क्रेमलीनला असताना तिथे खूप मोठी चर्चेस पाहिली, मार्क्स आणि लेनिन यांची पुतळेही पाहिलेय. चर्चमध्ये सामसूम असायची, पण साठ वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीत सुदैवाने या वास्तू शाबूत राहिल्या, या देवळांना केवळ `संग्रहालय' असा दर्जा होता. नंतर कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे क्रेन लावून काढण्यात आली.

तीन दशकांपूर्वी संपूर्ण जग कार्ल मार्क्सला मानणाऱ्या आणि भांडवलशाही देशांमध्ये विभागले होते. येशू ख्रिस्तानंतर जगात सगळीकडे पोहोचलेले नाव म्हणजे कार्ल मार्क्स असे म्हटले जायचे. कार्ल मार्क्स संपणारा आहे का ? त्याच्या विचारांचा नवा अन्वयार्थ शोधण्याचे काम चालूच राहिल.

जन्मदिनानिमित्त कार्ल मार्क्सला अभिवादन...

Esakal 

https://www.esakal.com/blog/karl-marx-birth-anniversary-after-christ-name-that-has-reached-all-over-world-aak11

Camil Parkhe 



Wednesday, December 13, 2023


पुण्यात स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत महात्मा जोतिबा फुले शिकले, सावित्रीबाई यांनी स्कॉटिश मिशनरी मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अद्यापनाचे शिक्षण घेतले असा उल्लेख फुले दाम्पत्याचे अनेक चरित्रकार करतात.

हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या लेखी निवेदनात जोतिबा फुले म्हणतात की त्यांनी आपल्या शाळा मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या अन् या शाळा आजही (१८८२ साली ) चालू आहेत.
याच निवेदनात जोतिबा म्हणतात की ``ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे''.
या स्कॉटिश मिशन शाळेतील जोतिबा फुले यांचे शिक्षक कोण होते, फुले यांनी स्कॉटिश मिशन शाळेत काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली ती शाळा चालवणारे मिशनरी कोण याचा उल्लेख कुठल्याही फुले चरित्रांत चरित्रकार करत नाही.
जोतिबांनी सुरु केलेल्या शाळा पुढे चालवण्याची जबाबदारी घेणाऱ्या या मिसेस मिचेल कोण?
मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरु करणाऱ्या जोतिबांचा पुण्यात १८५०च्या दशकाच्या. सुरुवातीला जंगी सत्कार करण्यात आला, शालजोडीही भेट म्हणून देण्यात आली.
या कौतुक समारंभाला हजर असलेल्या शहरातील देशी विदेशी प्रतिष्ठित व्यक्तींची नावे त्याकाळच्या वृत्तपत्रांत झळकतात. फुले चरित्रांत ही नावे येतात, त्यामध्ये रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल ही नावे आहेत.
जोतिबांबरोबर या कामात त्यांना साथ देणाऱ्या सावित्रीबाई यांचाही या कार्यक्रमात सत्कार व्हायला हवा होता, तो झाला की.नाही हे आता कळणार नाही. हंटर आयोगातल्या निवेदनात हे शिक्षणकार्य आपल्या पत्नीच्या मदतीने केले असा सावित्रीबाईंना त्यांचे श्रेय देताना, त्यांचे ऋण मान्य करताना जोतिबा स्पष्ट उल्लेख करतात. जोतिबा या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात लिहितात:
``सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ ( १८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले. ’’
कोण आहेत हे जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल? काय म्हणून हे मिशनरी दांपत्य जोतिबांच्या सत्काराला उपस्थित होते?
हेच ते रेव्हरंड जेम्स मिचेल जोतिबांचे शिक्षक, ज्यांच्या स्कॉटिश शाळेत जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात इंग्रजी शिकले. ( जोतिबांचे हंटर कमिशनला दिलेले इंग्रजी निवेदन मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यांचे या भाषेवरील प्रभुत्व त्यातून दिसते.)
आणि जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मिचेल म्हणजे सावित्रीबाईंच्या शिक्षिका मिसेस (मार्गारेट शॉ ) मिचेल.
यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षकिणिचा (अद्यापनाचा ) अभ्यासक्रम पूर्ण केला ! याच मिसेस मिचेल यांनी जोतिबा दांपत्याने सुरू केलेल्या शाळा पुढे चालवल्या.
आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा असा भर मांडवात सत्कार होताना या मिशनरी मिचेल दाम्पत्याच्या भावना काय असतील याची आपण केवळ कल्पना करू शकतो.
स्कॉटलंडहून रेव्हरंड जेम्स मिचेल भारतात १८२९ साली आले. रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन आणि जेम्स मिचेल या दोघांनी पुण्यात स्कॉटिश मिशनचे कार्य पुण्यात १८३० साली सुरु केले, येथे शाळा सुरू केल्या.
याच शाळांत जोतिबा फुले, त्यांचे मित्र (आणि नंतर त्यांच्या समाजकार्यातले सहकारी) सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे यांचे शिक्षण झाले असे धनंजय कीर आणि इतर फुले चरित्रकार लिहितात.
जेम्स मिचेल यांच्या जोडीला पुण्यात नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल आले. तिथल्या संस्कृत कॉलेज (नंतर पूना कॉलेज आणि आताचे डेक्कन कॉलेजचे) प्रिन्सिपल किंवा व्हिझिटर बनले आणि जोतिबा फुले यांचे घनिष्ट स्नेही बनले.
जॉन मरे मिचेल यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्याकाळच्या सामाजिक स्थितीचा तो एक उत्तम दस्तऐवज आहे, मात्र फुले दाम्पत्याच्या बहुतेक चरीत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
जोतिबांच्या चरित्रातील उल्लेख होणाऱ्या `चटईचा विटाळ' आणि `वर्गातल्या अस्पृश्य विद्यार्थ्याना ढेकळाने मारणारे पंतोजी' वगैरे घटना या जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलेल्या आहेत.
अलीकडेच मी जोतिबा फुले यांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि सावित्रीबाई यांच्या अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर येथील शिक्षिका मिस सिंथिया फरारबाई यांचे चरित्र लिहिले.
आता जोतिबांचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल यांचेही चरित्र लिहिले आहे. हे चरित्र जेसुईट धर्मगुरूंच्या संस्थेतर्फे `स्नेहसदन', पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या `निरोप्या' मासिकाच्या या महिन्याच्या (डिसेंबर २०२३) नाताळ विशेषांकात प्रसिद्ध झाले आहे.
विशेष म्हणजे `निरोप्या' हे मराठी पत्रकारितेतील एक सर्वांत दीर्घायुषी (स्थापना १९०३) नियतकालिक आहे.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रावर आधारित त्यांचे सविस्तर चरित्र मी लिहिले आहे, तेसुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल.

Camil Parkhe

Friday, April 7, 2023

 गोव्यातला पोर्तुगाल :


महाराष्ट्र किंवा कर्नाटक सीमा ओलांड़ून गोव्यात प्रवेश केला कि एका वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन घडू लागते. कोकणातली हिरवी जर्द झाडी आणि विविध दिशेने उंच झेपावलेली नारळाची झाडे इथेही असतात. पण गोव्याचे वेगळेपण जाणवते ते इथल्या टुमदार, बैठ्या कौलारू घरांमध्ये, उंच टेकडीवर मोक्याच्या जागी असलेल्या चर्च आणि छोट्यामोठ्या चॅपेल्समध्ये, वेगळ्या धर्तीच्या मंदिरामध्ये. म्हापसा आणि पणजी शहरांकडे आपण येतो तेव्हा गोव्याचे हे वैशिष्ठय अधिक ठळकपणे जाणवते. लांबवर पसरलेले समुद्रकिनारे, तिथल्या अरबी समुद्रात आजही स्वच्छ असलेले पाणी आणि तिथली स्वच्छ वाळू कुणालाही मोहित करतात.

मात्र गोवा याहून कितीतरी अधिक वैशिष्ठयपूर्ण आहे, भारतीय संघराज्यातल्या इतर राज्यांपेक्षा गोवा अनेक बाबतीत आपले वेगळेपण आजही राखून आहे. हे सांस्कृतिक, धार्मिक, आणि ऐतिहासिक वेगळेपणाचे एक मुख्य कारण म्हणजे गोवा हा चिमुकला प्रदेश तब्बल साडेचारशे वर्षे पौर्तुगिज वसाहत होती. पन्नास वर्षांपूर्वी - १८डिसेंबर १९६१ रोजी - हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामील झाला तरी पोर्तुगीजांच्या दीर्घ राजवटीच्या अनेक पाऊलखुणा गोवा आजही बाळगून आहे. आणि यापैकी अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैशिष्ठ्ये अभिमानास्पद आहेत. `वैविध्यतेतून एकता' असे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या या वैशिष्ठ्यात गोव्याचेही योगदान आहे
पोर्तुगालच्या अल्फान्सो डी अल्बुकर्कने गोव्यावर १५१० साली राजकीय सत्ता मिळवली, ओल्ड गोवा येथे आपल्या या वसाहतीची राजधानी बनवली आणि त्यानंतरच्या पोर्तुगीज गव्हंर्नर जनरल यांनी गोव्याच्या इतरत्र भागांवर सत्ता मिळवली. पोर्तुगिज राजकन्या कॅथरीन हिचा ब्रिटिश राजपुत्र चार्ल्स दुसरा याच्याशी १६६१ साली लग्न झाले तेव्हा पोर्तुगालने आपल्या ताब्यात असलेली मुंबईची सात बेटे ब्रिटिशांना चक्क आंदण म्हणून देऊन टाकली होती !
वसई येथील पोर्तुगीज अंमल चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या सैन्याने संपवला होता. ब्रिटिश सत्तेने संपूर्ण भारतभर राजकीय सत्ता मिळवली, मात्र गोव्यातील पोर्तुगीज सत्तेशी ब्रिटिशांनी कधी स्पर्धा केली नाही.
गोव्यापासून दूर अंतरावर, गुजरातपाशी असलेल्या दादरा नगर हवेली तसेच दमण आणि दीव हे चिमुकले प्रदेशसुद्धा पोर्तुगीज इंडिया म्हणजेच पोर्तुंगीज इस्तादिओ चा भाग होते. साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेने या प्रदेशांत दुरगामी परिणाम केले. पोर्तुगिजांचा हा प्रभाव त्यांच्या या वसाहतीत सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, भाषा, वास्तुकला, खाद्मसंस्कृती, संगीत, नृत्य, आणि इतर क्षेत्रांत आजही ठळकपणे दिसून येतो.
गोव्याची राजधानी पणजी या शहरात प्रवेश केला. तिथल्या आदिलशहा पॅलेस परीसर, अल्तिन्हो (पोर्तुगीज भाषेत टेकडी), किंवा फॉन्तइनेझ अथवा मांडवीच्या तिरावरच्या कंपाल परिसरात तुम्ही फिरला कि पोर्तुगीज राजवटीचा वास्तुशास्त्रीय वारसा तुम्हाला ठळकपणे लक्षात येईल. इथल्या इमारतींचा, बंगल्यांचा. छोट्यामोठ्या घरांचा रंग यामध्ये एक कमालीचे सातत्य आहे हे तुम्ही लक्षपूर्वक पहिले तर लगेच तुमच्या लक्षात येईल.
या वास्तूंचा रंग केवळ दोन रंगात असतो, पिवळा आणि सफेद, लाल आणि सफेद, निळा आणि सफेद. फॉन्तइनेझ परिसरातले रचनाबद्ध रस्ते आंणि तिथली घरे गोव्यातल्या पोर्तुगीज शैलीच्या वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. मागे एका संस्थेने तर आपले पूर्ण वार्षिक कॅलेंडर फॉन्तइनेझ परिसरावर काढले होते !
इथे गेल्या आठवड्यात फेसबुक फ्रेंड विवेक मिनिझेस यांनी त्यांच्या पॉंडिचेरी भेटीत तिथले फोटो शेअर केले तेव्हा बराच काळ फ्रेंचांची वसाहत असलेल्या या शहरातली घरे आणि वास्तुशास्त्र गोव्यासारखेच आहे असं मला जाणवलं .
गोव्यातल्या जुन्या सरकारी, खासगी इमारती, इथले तीनशेचारशे वर्षे जुनी असलेली चर्चेस वगैरे वास्तु इथल्या पोर्तुगीज राजवटीच्या खुणा दृश्यपणे आपल्या अंगाखांद्यांवर बाळगून आहेत त्याचप्रमाणे या प्रदेशातल्या इतर कितीतरी अदृश्य बाबी पोर्तुगीज राजवटीचा आणि संस्कृतीचा वारसा मिरवत आहेत.
यात परदेशी राजवटीचा व संस्कृतीचा अभिमान नसला तरी त्याबाबत लज्जा राखण्याचेही काही कारण नाही.
भारतीय उपखंडातील पोर्तुगिजांच्या वसाहतीचा एक महत्त्वपूर्ण प्रभाव म्हणजे या प्रदेशात म्हणजे वसई, गोवा, दमण आणि दादरा, नगर हवेली येथील ख्रिस्ती लोकसंख्येचे मोठे प्रमाण. गोव्यात विशेषतः दक्षिण गोव्यात विविध जातींतले स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती झाले.
पोर्तुगीज हे कॅथोलिक पंथीय त्यामुळे साहजिकच गोव्यातली ख्रिस्ती समाज कॅथोलिक आहे. पोर्तुगिजांचा विविध क्षेत्रांतील प्रभाव प्रामुख्याने या कॅथोलिक समाजात आढळतो.
गोवा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेजवळचा एक अगदी छोटासा, महाराष्ट्रातील एका जिल्ह्यांच्या आकाराएवढा. गोवा, दमण आणि दीव हा एक केंद्रशासित प्रदेश होता. १९८७ साली दीव आणि दमण यांना वेगळं करून गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला.
गोवा हे समुद्रकाठचं स्थळ, त्यात पाश्चिमात्य वळणाची जीवनशैली, खाद्य \आणि पेय संस्कृती, गोव्यामध्ये शेजारच्या राज्यांच्या तुलनेत पेट्रोलप्रमाणेच मद्यही खूप स्वस्त आहे, हे आता संपूर्ण देशभर माहीत आहे.
मात्र पोर्तुगीज राजवटीचा वारसा असलेला ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’ (समान नागरी कायदा) गोव्यात जवळजवळ शंभर वर्षांपासून अस्तित्वात आहे, हे आज अनेकांना ठाऊकही नसेल. लग्न, मालमत्तासंबंधी वारसाहक्क आणि स्त्री-पुरुषांना समान हक्क, ही या कायद्याची काही वैशिष्ट्ये!
मी गोव्यात शिक्षणासाठी १९७०च्या दशकात पोहोचलो, तेव्हा माझ्या मित्रांचे आईवडील, इतर ज्येष्ठ मंडळी आपसांत पोर्तुगीज भाषेत बोलता. त्यांच्यामुळे मीही या भाषेत थोडेफार बोलायला शिकलो. गोव्यातून पोर्तुगीज भाषा आता हद्दपार झाली आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि इतिहासाचे अनेक अवशेष मात्र गोव्यात आजही आढळतात
भारतातील पहिले नि शेवटचे सार्वमत : भारतात सामिल झाल्यावर गोवा, दमण आणि दीव या छोट्या प्रदेशाचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला. गोव्यात हिंदू समाजातील सर्व लोक आपसांत कोकणीत बोलत असले तरी सर्वांना मराठी कळते, लिहिता-वाचता येते. अनेकांना गोवा हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन व्हावा, असे वाटणे साहजिकच होते. मात्र मराठी न समजणाऱ्या, देवनागरी लिपीचे फारसे ज्ञान नसणाऱ्या, कोकणी आणि पोर्तुगीज बोलणाऱ्या गोव्यातील ख्रिस्ती लोकांसाठी गोवा महाराष्ट्रात विलीन करणे धक्कादायक होते.
त्यानंतर १६ जानेवारी १९६७ रोजी गोव्यात सार्वमत घेण्यात आले अखेर ५४ टक्के लोकांनी या प्रदेशाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या बाजूने कौल दिला, तर ४३ टक्के लोकांनी गोव्याच्या विलिनीकरणाच्या बाजूने. हे सार्वमत भारतातील पहिले नि शेवटचे ठरले.
.
जेसुईट धर्मगुरुंनी पणजीत येथे चालविलेल्या प्री-नोव्हिशिएटमध्ये धर्मगुरु होण्यासाठी दाखल झालेले आम्ही वीस तरुण उमेदवार पाच वर्षे उच्च माध्यमिक शिक्षण घेत होतो. मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या आमच्या प्री-नोव्हिशिएटमध्ये मूळ दमणचा रहिवासी असलेला फ्रान्सिस हा मेस्ता किंवा आचारी होता. तो फक्त पोर्तुगीज, कोंकणी आणि थोडीफार हिंदी बोलायचा. संध्याकाळी कामातून मोकळा झाल्यावर फेणी घेतल्यावर तो आपल्या कर्कश आवाजात पोर्तुगीज गाणी गायचा.
आमच्या जेवणासाठी तो रोज बनवत असलेल्या बिफच्या विविध पाककलाकृती, केक आणि त्याची जीवनशैली दमण येथील त्याकाळातही कायम असलेल्या पोर्तुगीज प्रभावाचे प्रतिक होते.
मेस्ता फ्रान्सिसमुळेच पोर्तुगीज भाषेत दमण ह्या शब्दाचा उच्चार ‘दमॉव’ असा करतात, पोर्तुगालची राजधानी लिस्बन चा पोर्तुगीजमध्ये उच्चार 'लिसबॉव' असा करतात हे मला कळाले होते. या मेस्ताकडून मी 'ओब्रिगाद' (थॅक्स) असे अनेक पोर्तुगीज शब्द शिकलो.
चर्चमधील मिस्साविधी आणि इतर सर्व प्रार्थनांसाठी गोव्यातील कॅथोलिक समाज पोर्तुगीज प्रभावामुळे आजही फक्त रोमन लिपीत लिहिलेल्या कोकणी भाषेचाच वापर करतो.
गोवा भारतात सामिल होण्याआधी गोव्यात ख्रिस्ती समाजाचे प्रमाण जवळजवळ 3० टक्के होते. पण नंतरच्या काळात त्यांच्या भारतात आणि परदेशात होणाऱ्या स्थलांतराने आणि भारतीय लोक गोव्यात मोठ्या प्रमाणात स्थायिक होत गेल्याने ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या वेगाने खाली येऊन आता २५ टक्क्यांवर आली आहे.
अलीकडेच मी दमणला भेट दिली दमण मधील ख्रिश्चन समाजाची संख्या झपाट्याने कमी होत आहे कारण त्यांच्यापैकी बरेच लोक पाश्चात्य देशात स्थायिक झालेले आहेत, अजूनही पोर्तुगीज पासपोर्ट असल्याने आजही युरोप आणि इतर देश त्यांना खुणावत आहेत.
पुढे चालू ...