Tuesday, January 28, 2025

 


जोतिबा अणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वमान्य आहे.
मात्र ते दोघे नेमक्या कुठल्या शाळेत शिकले हे आजही निश्चित नाही. याबाबत संशोधकांमध्ये उत्सुकता असेलच.
सावित्रीबाईंनी नगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या मिस सिंथिया फरार यांच्याकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले ती शिक्षणसंस्था म्हणजे या शहरातील माळीवाड्यात आजही चालू असलेली क्लारा ब्रूस स्कुल.
येथेच जोतिबांनी फरार मॅडमची भेट घेतली होती, त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन पुण्यात येऊन त्यांनी तेथे लगेच मुलींसाठी शाळा सुरु केली होती. खुद्द जोतीबांनीच असे लिहिले आहे.
अर्थात क्लारा ब्रूस हे नाव त्यानंतर खूप वर्षांनी या शाळेला देण्यात आले. क्लारा ब्रूस या शाळेच्या अनेक वर्षे प्राचार्य होत्या.
पुण्यात फुले दाम्पत्य जिथे शिकले त्या शाळांबाबत मात्र अशी सुस्पष्टता नाही. जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले, नंतर याच शाळांत ते काही काळ शिक्षक होते.
सावित्रीबाईंनी पुण्यात स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट मिचेल यांच्याकडे अध्यापनाचे शिक्षण घेतले होते.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतिबांनी आपण सुरु केलेल्या शाळा नंतर कमिटीकडे देण्यात आल्या आणि त्या शाळा मिसेस मिचेल चालवत होत्या असे म्हटले आहे.
कुठे आहेत आता त्या शाळा आणि शिक्षणसंस्था ?
अपार उत्सुकतेने काही वर्षांपूर्वी याबाबत सुरु झालेल्या माझ्या शोधाला आता एक निश्चित दिशा मिळते आहे असे वाटत आहे.
फुले दाम्पत्याच्या चरित्राशी आणि कार्याशी निगडित असलेल्या या शिक्षणसंस्थांच्या शोधाला अचानक गती मिळाली ती या पंधरवड्यातच.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळांबाबत कुतूहल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक विश्वस्त दीपक गिरमे यांनी माझा मोबाईल नंबर मिळवून याबाबत माझ्याकडे चौकशी केली तेव्हा.
त्यानंतर समाज कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या असुंता पारधे यांनी मला पुण्यातील स्कॉटिश संस्थांबाबत काही माहिती पुरवली आणि या तपासाला गती मिळत गेली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत स्कॉटिश मिशनरी मार्गारेट आणि जॉन विल्सन हे दाम्पत्य, जॉन मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट त्याचप्रमाणे पुण्यात मार्गारेट आणि जेम्स मिचेल हे दाम्पत्य शिक्षणकार्य करत होते.
मात्र या स्कॉटिश मिशनचे पुण्यात आता मुळी अस्तित्वच नाही असा माझा कालपरवापर्यंत ठाम समज होता.
स्कॉटिश मिशनरींशी संबंध असलेल्या चार नावाजलेल्या शिक्षणसंस्था पुण्यात आजही आहेत हे समजले तेव्हा माझ्या या अज्ञानाबद्दल मला खूप शरमल्यासारखे झाले.
आणि त्याबरोबरच एक सुखद धक्काही बसला होता.
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचा ज्या शिक्षणसंस्थाशी अतूट आणि दीर्घकाळ संबंध होते त्या याच संस्था असतील हे निःसंशय आहे.
घाशीराम कोतवाल उत्तर पेशवाई काळातील एक वादग्रस्त पात्र. विजय तेंडुलकरांच्या नाटकाने हे नाव अनेकांना परिचित झाले आणि अगदी सातासमुद्रापार पोहोचले.
पुणे कॅम्पात असलेला घाशीराम कोतवालचा ऐतिहासिक वाडा अनेक वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाला. मात्र या वाड्याची माहिती आणि एक छायाचित्र त्या जागी उभे करण्यात आले.
आता अस्तित्वात नसलेल्या या घाशीराम कोतवालच्या वाड्याच्या बाजूला आजही एक जुनी वास्तू आणि शिक्षणसंस्था तग धरुन आहे.
ही शिक्षणसंस्था म्हणजे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा. बालवाडी व इयत्ता पहिली ते चौथी.
स्थापना सहा जानेवारी १८२७.
याचा अर्थ भारतात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या काही शाळांपैकी ही एक शाळा आहे.
लवकरच सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा २०० वर्षे पूर्ण करणार आहे.
भारतात सर्वप्रथम प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या त्या बंगाल इलाख्यात.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला.
त्यानंतर मिस मेरी अँन कुक यांनी 1822 मध्ये कोलकात्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या.
अमेरीकन मराठी मिशनच्या मिशनरींनी भारतात - मुंबईत - १८१२ साली प्रवेश केल्यानंतर लगेच तेथे शाळा स्थापन केल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे १८२३ साली शाळा सुरु केल्या होत्या.
मार्गारेट आणि जॉन विल्सन हे नवविवाहित जोडपे स्कॉटलंडहून भारतात १८२८ साली आले, कोकणात मराठी शिकल्यानंतर मुंबईत येऊन १८३२ साली त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरु केल्या.
मुंबईत आजही असलेली सेंट कोलंबा गर्ल्स स्कुल आणि विल्सन कॉलेज त्यांनीच स्थापन केले.
पुण्यातील या प्राथमिक शाळेची मालकी आता जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीकडे असली तरी ही शाळा जॉन विल्सन किंवा स्कॉटिश मिशनरींनी सुरु केलेली नसणार.
याचे कारण स्कॉटिश मिशनरी तोपर्यंत १८२७ साली दख्खनेत - पुण्यात - पोहोचलेसुद्धा नव्हते.
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मार्गारेट आणि जॉन विल्सन आणि इतर स्कॉटिश मिशनरींवर एक प्रकरण लिहिले आहे.
स्कॉटिश मिशनरींशी निगडीत असलेल्या पुण्यातील इतर शिक्षणसंस्था म्हणजे रास्ता पेठेतील एथेल गॉर्डन अध्यापन कॉलेज, लाल देवळामागे पेट्रोल पंपाशेजारी असलेली सेंट अँड्रयूज मराठी स्कुल आणि पुणे कॅम्पात शिवाजी मार्केटपाशी असलेले सेंट जॉन स्कुल.
तूर्तास इतकेच...
Camil Parkhe, January 27, 2025
All reactions:
Datta Chavan, Pramod Mujumdar and 225 others

Friday, January 17, 2025

गोव्यातील ख्रिश्चनांची संख्या गेल्या काही वर्षां\त झपाट्याने कमी असून याबाबत गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिलाई यांनी केरळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चिंता व्यक्त केली आहे.

याच वाक्याच्या उत्तरार्धांत महनीय राज्यपालांनी जे म्हटले तो खरा तर या देशात अनेकांच्या दृष्टीने खरा चिंतेचा विषय असू शकतो.
मात्र त्यांच्या वाक्याचा उत्तरार्ध हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही, त्यामुळे तिकडे न वळता गोव्यातील ख्रिश्चनांची संख्या गेली काही वर्षे सातत्याने कमी का होत आहे हे पाहता येईल.
गोव्यातील ख्रिश्चन लोक या राज्यात कॅथोलिक म्हणूनच ओळखले जातात. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी या छोट्या प्रदेशात सत्ता मिळवली तेव्हापासून पुढील काही काळ येथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडून आले.
पोर्तुगीज आणि स्पॅनिश हे दोन्ही देश कॅथोलिकांचे बालेकिल्ले. या दोन देशातले साहसी दर्यावर्दी नवे जग शोधायला आपल्या नौका समुद्रात सोडल्या तेव्हा वसाहती मिळवण्याबाबत आणि तेथे ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याबाबत या दोन राष्ट्रांत स्पर्धा होऊ नये म्हणून पोप महोदयांनी संपूर्ण जगाची या दोन राष्ट्रांमध्ये चक्क वाटणीच करून टाकली होती.
पाद्रुआदू आणि प्रोपोगांडा या नावाने जगाची स्पेन आणि पोर्तुगाल राष्ट्रांत विभागणी झाली होती.
पोर्तुगालच्या दर्यावर्दी वॉस्को दा गामा गोव्यात १४९८ साली पोहोचला आणि तेव्हापासून तिथे ख्रिस्ती धर्माचा म्हणजेच रोमन कॅथोलिक पंथाचा प्रसार झाला.
इंग्लंडच्या राजाने मूळ कॅथोलिक पंथापासून फारकत घेत स्वतःचे अँग्लिकन चर्च स्थापन केले होते. आजही इंग्लंडचा राजा अथवा राणी अँग्लिकन चर्चची प्रमुख असते नि या चर्चच्या सर्वोच्च धर्मगुरुची - आर्चबिशप ऑफ कँटरबरीची राजा किंवा राणीच करत असते.
इंग्लंडने स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या, मात्र ख्रिस्ती धर्मप्रसार हे ईस्ट इंडिया कंपनीचे उद्दिष्ट्य कधीच नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांच्या अंमलाखालील भारतात गोवा, वसई, दमण, सिल्व्हासा येथे मोठ्या प्रमाणावर लोक कॅथोलिक झाले तसे ब्रिटिश इंडियात झाले नाही.
प्रोटेस्टंटपंथीय असलेल्या ब्रिटिशांनी ना प्रोटेस्टंट मिशनरींना ना कॅथोलिक मिशनरींना धर्मांतरासाठी प्रोत्साहन दिले. धर्मप्रसाराऐवजी त्यांनी व्यापारालाच प्राधान्य दिले.
दक्षिण गोव्यात कॅथोलिकांची संख्या लक्षणीय आहे, दोन अपवाद वगळता इथल्या मतदारांनी आतापर्यंत नेहेमीच कॅथोलिक उमेदवाराची लोकसभा खासदार म्हणून निवड केलेली आहे. मागच्या निवडणुकीत फ्रान्सिको सार्दिन्हा खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी २०२४ च्या निवडणुकीत कॅप्टन विरिएतो फर्नांडिस दक्षिण गोव्यातून लोकसभेला निवडून आले आहेत.
याच्या अगदी उलट स्थिती उत्तर गोव्याची आहे, तिथे हिंदू बहुसंख्य आहेत आणि गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या (१९६१ - १९८६) आणि गोवा राज्यात इतिहासात इथून नेहेमीच हिंदू उमेदवार लोकसभेवर निवडला गेला आहे.
गोव्याची सध्याची डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याबाबत स्थिती अशी आहे.
अगदी मध्ययुगीन काळापासून गोव्यातले लोक गोवा सोडून हिरव्या कुराणाच्या शोधार्थ इतरत्र जात होते. यात मात्र तेव्हापासून एक मूलभूत फरक होता आणि आजच्या काळातही हा फरक प्रकर्षाने दिसून येतो.
गोव्यातील एक ज्येष्ठ वकील क्लिओपात अल्मेडा कुटिनो यांनी पणजीतल्या `द नवहिंद टाइम्स ' या इंग्रजी दैनिकात गोवा राज्यपालांच्या विधानाच्या अनुषंगाने या विषयावर एक विस्तृत लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला आहे.
गोव्यातील उच्च जातींतील म्हणजे सारस्वत रोमन कॅथोलिक सोळाव्या शतकापासूनच पोर्तुगाल आणि तेथून पोर्तुगालच्या इतर वसाहती देशांत किंवा युरोपातील इतर देशांत जात असत.
आधुनिक संमोहनशास्त्राचा जनक असलेल्या अँबे (फादर) फरिया यांनी रोम आणि फ्रान्समध्ये मोठे नाव कमावले, त्यांचा संमोहन करण्याच्या क्रियेतील पूर्णाकृती पुतळा पणजी येथे आदिलशाही पॅलेसजवळच आहे.
हे अबे फरिया आणि गोव्यातील इतर कॅथोलिक लोकांनी लिस्बन आणि पोर्तुगालमध्ये कार्य केले ते सर्व सारस्वत या वरच्या आणि उच्चभ्रु जातीतले.
फरिया हे मूळचे शेणवी किंवा शिनॉय, म्हणजे सारस्वत .
पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा यांचे घराणे मूळचे गोव्यातील मडगाव येथले. त्याच्या आजोबांनी गोव्यातून स्थलांतर केले होते.
गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे - पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.
१९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे.
वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो
गोव्यातील कॅथोलिक अगदी सोळाव्या शतकापासून गोव्यातून स्थलांतरित होत असले तरी हे प्रमाण नगण्य होते. गेल्या दिडशे वर्षांत स्थलांतरितांची संख्या वाढून येथील लोकसंख्येत कॅथोलिकांचे प्रमाण कमी होत गेले आहे. याचा परिणाम साहजिकच या राज्यातील निवडणूक निकालांवर पडत गेला आहे.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय जनमताच्या रेट्याला प्रतिसाद देत अखेरीस १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कराकरवी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश हा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त करुन भारतीय संघराज्यात सामील केला.
त्यानंतर या केंद्रशासित प्रदेशाचे भवितव्य ठरवण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६७ च्या जानेवारीत या प्रदेशात सार्वमत घेतले. भारतीय संघराज्याच्या इतिहासातील हे पहिलेच आणि आतापर्यंतचे एकमेव सार्वमत.
या सार्वमताद्वारे गोवा, दमण आणि दीव या जनतेने या प्रदेशाचे स्वतंत्र अस्तित्व असावे आणि गोवा महाराष्ट्रात आणि दमण आणि दीव गुजरातेत विलीन करू नये असा निर्णय दिला.
विशेष म्हणजे या चिमुकल्या प्रदेशाचे शेजारच्या राज्यांत विलीनीकरण टळले ते सार्वमताच्या अगदी काही थोडक्या मतांच्या टक्क्याने आणि या सार्वमतात कॅथोलिक लोकांनीं विलीनीकरणाच्या विरोधी जवळजवळ एकगठ्ठा मतदान करून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखले.
गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे याबाबत ४५ टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केले होते यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही.
गोव्याचे महाराष्ट्रात विलिनी व्हावे यासाठी गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि केंद्रीय मंत्रि यशवंतराव चव्हाण यांनीं जोरदार प्रचार केला होता.
गोव्यातील कॅथोलिक पोर्तुगाल किंवा पोर्तुगालच्या इतर वसाहतींत स्थलांतर होणे तसे साहजिकच होते अगदी त्याच प्रमाणे गोव्यातील अनेक हिंदू लोकांनी महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात आणि इतरत्र स्थलांतर केले होते.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची यादी पाहिली कि त्यामध्ये अनेक गोमंतकीय आहेत हे लक्षात येते.
गोवा, दमण आणि दीव पोर्तुगालच्या साडे चारशे वर्षांच्या सत्तेतून १९६१ साली मुक्त केल्यानंतर या प्रदेशातल्या पोर्तुगीज पासपोर्ट असणाऱ्या लोकांना भारतात राहण्याचा किंवा पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेण्याची सोय होती.
अनेकांनी मग साहजिकच पोर्तुगालची आणि त्यामार्गे इतर पाश्चिमात्य देशांची वाट धरली.
गोव्यातील कॅथोलिक लोकसंख्या गोवामुक्तीनंतरच्या काळात ३६ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आली आहे असे आकडेवारीवरून दिसते. नजिकच्या काळात हे प्रमाण असेच घसरत जाण्याची शक्यता दिसत आहे.
रोमन कॅथोलीक पंथात संतती नियमनाची कृत्रिम साधने आणि गर्भपात यावर कागदोपत्री बंदी आहे. पण चर्च या नियमांकडे कानाडोळा करत असते आणि कॅथोलिक लोक सरळसरळ दुर्लक्ष करत असतात हे वास्तव आहे. ख्रिस्ती लोकांची गोव्यात आणि इतरत्र सुद्धा लोकसंख्या कमी होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती. बातमीचा मथळा होता :
Of 70,000 surrendered passports in India in a decade, 40% were in Goa
गोव्यातील कॅथोलिक लोकांनी पोर्तुगालकडे आणि नंतर युरोपियन देशांत इतक्या मोठया संख्येनें स्थलांतर का केले याची अनेक कारणे आहेत.
एक म्हणजे रोजगार. पोर्तुगीज इंडियात उद्योगाची आणि रोजगाराची वानवाच होती. पोर्तुगीजमुळे इतर युरोपियन भाषा शिकणे अधिक सहजसाध्य, पाश्चात्य पेहेराव, खाद्य संस्कृती, ख्रिस्ती धर्म वगैरे अनेक बाबींमुळे लिस्बनकडे जाणाऱ्या जहाजाची वाट धरणे अधिक आकर्षक ठरले.
गोव्यातील हिंदूंच्या तुलनेत कॅथोलिक्स अधिक वेस्टर्नाइज्ड होते, अनेक कॅथोलिक कुटुंबांत पोर्तुगीजमध्ये संभाषण होई, त्यामुलें इंग्रजी शिकणे त्यांना तुलनेत सोपे जाई, त्यांची खाद्य, पेहेराव आणि धार्मिक संस्कृती पाश्चात्य धर्तीची होती.
पोर्तुगालच्या गोव्यातल्या जुन्या मुलखातील कॅथॉलिकांचे प्रमाण १७६४ साली तब्बल ८६ टक्के होते. या ओल्ड काँक्वेस्टमध्ये गोव्यातील बार्देझ, सालसेट किंवा साष्टी, इलिहास (पणजीजवळचा भाग) आणि मार्मुगावचा समावेश होता.
पोर्तुगीजांनी नंतर उत्तर गोव्यावर कब्जा मिळवला आणि तेव्हाच्या नव्या आणि जुन्या मुलखांतील पोर्तुगीज गोव्यातील कॅथॉलिकांचे प्रमाण १८५१ साली ६३.८ टक्के इतके कमी झाले.
याचे कारण उत्तर गोव्यात दक्षिण गोव्याच्या तुलनेत फारच नगण्य स्वरूपाचे ख्रिस्ती धर्मांतर झाले होते. दुसरे कारण म्हणजे दक्षिण गोव्यात दाट लोकसंख्या होती तर उत्तर गोव्यात लोकसंख्या तुलनेने विरळ होती.
गोव्यातील कॅथॉलिकांनी केवळ पोर्तुगालला स्थलांतर केले असे नाही, अनेक कॅथोलिक कुटुंबांनी मुंबईत आणि त्याकाळी भारतातच असलेल्या कराची येथे कायमचे स्थायिक होणे पत्करले.
स्थलांतर करताना यापैकी अनेकांनी आपल्या वडिलोपार्जित मालमत्ता कायमच्या विकून टाकल्या होत्या.
देशातले आणि मुंबईचे पहिले भारतीय बिशप म्हणून आणि त्यानंतर पहिले भारतीय कार्डिनल होण्याचा सन्मान मिळणारे व्हॅलेरियन ग्रेशियस यांचा जन्म कराची येथला. कार्डिनल ग्रेशियस यांचे कुटुंब मूळचे गोव्यातील मडगावजवळ असलेल्या नावेली गावाचे होते.
पोर्तुगालमध्ये घटनात्मक राजेशाही १८२० साली प्रस्थापित झाल्यानंतर गोव्यात उदारमतवाही प्रवाह सुरु झाला आणि ब्रिटिश इंडियाच्या सीमावर्ती भागांतील अनेक मराठी बोलणारे लोक उत्तर गोव्यात स्थायिक झाले.
ख्रिस्ती धर्मांतर आणि इतर कारणांमुळे गोव्यातून पलायन केलेल्या लोकांपैकी अनेक जण पुन्हा गोव्यात स्थायिक झाले. दरम्यान गोव्यातून कॅथॉलिक लोकांचे पोर्तुगालला आणि इतर ठिकाणी स्थलांतर चालूच राहिले.
गोव्यातील पोर्तुगीजांची सत्ता १९६१ साली संपली तेव्हा कॅथॉलिकांचे १८५१ साली असलेले ६३.८ टक्के प्रमाण थेट ३८. ०७ इतके म्हणजे ११० वर्षांच्या काळात २५. टक्क्यांनी खाली घसरले होते.
मी गोव्यात शिक्षणासाठी १९७०च्या दशकात पोहोचलो, तेव्हा माझ्या मित्रांचे आईवडील, इतर ज्येष्ठ मंडळी आपापसांत पोर्तुगीज भाषेत बोलत. त्यांच्यामुळे मीही या भाषेत थोडेफार बोलायला शिकलो. गोव्यातून पोर्तुगीज भाषा आता हद्दपार झाली आहे.
गोव्यात कॉलेजला शिकताना माझ्या बरोबर जेसुईट प्री- नॉव्हिशिएटमध्ये (पूर्व-सेमिनिरीत) राहणाऱ्या बेनी (बेनेडिक्ट) फरीयाने सज्ञान होण्याआधी पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेतला.
बेनीचा आणि लेस्टर फर्नांडिसचा पासपोर्ट पोर्तुगीज होते. मात्र वयाची एकवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट न बदलता ते आणि त्यांची भावंडे भारतात राहू शकत होते. सज्ञान झाल्यानंतर मात्र त्यांना भारतीय पासपोर्ट घेणे भाग होते. त्याआधीच बेनी फरीयाची आणि लेस्टर फर्नांडिसची सर्व भावंडं पोर्तुगालला गेली.
लेस्टर फर्नांडिसने मात्र पोर्तुगालऐवजी गोव्यातच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने आपला पोर्तुगालचा पासपोर्ट परत करून भारतीय पासपोर्ट आणि नागरीकत्व स्वीकारला होता.
गोव्यातुन परदेशांत झालेल्या स्थलांतराविषयी २००८ साली फातिमा दा सिल्वा यांनी केलेल्या एका संशोधनातून स्थलांतरीत लोकांमध्ये ७४ टक्के कॅथोलिक होते ते दिसून आले होते.
ही सगळी आकडेवारी क्लिओपात अल्मेडा कुटिनो यांनी आपल्या लेखात दिली आहे.
इंग्लंडच्या तुलनेत पोर्तुगालने भारताच्या आणि आपल्या इतर वसाहतींतील लोकांना पोर्तुगालमध्ये आणि त्यानंतर इतर युरोपियन देशांत स्थायिक होण्यास मोठया प्रमाणात हातभार लावला आहे.
भारतात गोवा, दमन आणि दीव १९६१ साली सामील झाला, आजही १९६१ सालापूर्वी या पोर्तुगीज वसाहतीत जन्मलेल्या आणि त्यांच्या पुढील तीन पिढ्यांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि पर्यायाने पोर्तुगालचे नागरिकत्व सहज मिळू शकते.
विशेष म्हणजे गोव्याच्या मुक्तीनंतरही गोव्यातील अनेक लोकांकडे पोर्तुगालचेही पासपोर्ट म्हणजेच नागरिकत्वही होते. हा प्रकार अनेक वर्षे चालू राहिला होता.
मागील काही शतकांत गोव्यातील अनेक स्थलांतरित लोक जहाजांवर विविध नोकऱ्या करत असत, सणावाराला किंवा इतर कामांसाठी ते आपल्या मायभूमीकडे परतत असत.
पोर्तुगालचे पंतप्रधान असताना अंतोनिओ कोस्टा हे सुद्धा दोनदा गोव्याच्या भेटीवर आले होते.
गोव्यात मी जातो तेव्हा आल्डोना, वागातोर वगैरे अनेक ठिकाणी मोठमोठे कौलारीं बंगले आणि घरे झाकून ठेवलेली दिसतात.
परदेशांत स्थायिक झालेल्या आपल्या मालकांच्या किंवा त्यांच्या वंशजांच्या परतण्याची ही छोटीमोठी घरे वाट पाहत असतात. अनेकदा हे बंगले, घरे लँड माफियांच्या कारस्थानाला बळी पडतात.
तर अशा गोंयकारांच्या अनेक प्रॉपर्टीज गोव्यात असल्या तरी ते कायमचे परतण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत.
अगदी अशीच परिस्थिती `इस्तादो दा पोर्तुगालचा' म्हणजे पोर्तुगीज इंडियाचा भाग असलेल्या गुजरातजवळील दमण येथे, दादरा नगर हवेली आणि सिल्व्हासा येथे आहे हे मी नेहेमी पाहत असतो.
गोव्याप्रमाणेच एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आणि तेथून जवळच असलेल्या गुजरातच्या सीमेनजिकच्या दमण आणि सिल्व्हासा येथेसुद्धा स्थानिक कॅथोलिक लोकांचे मोठ्या प्रमाणात पाश्चात्य राष्ट्रांत स्थलांतर होत आहे.
गोव्याप्रमाणेच वसईतसुद्धा अनेक ठिकाणी घरटी निदान एकतरी व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक युरोपात, अमेरिकेत, कॅनडात किंवा ऑस्ट्रेलियात असतो असे मी स्वतः अनुभवले आहे.
गोवा मुक्तीनंतरच्या काळात भारताच्या विविध राज्यांतून हिंदू, मुस्लीम आणि इतर धर्मियांनी या छोट्याशा राज्यात स्थलांतर केले आहे आणि यामुळे कॅथोलिक लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सतत कमी होते गेली आहे.
गोंयकारांचे प्रमाण कमी होण्याचे एक महत्वाचे कारण प्रचंड संख्येने बाहेरील राज्यातून इथे आलेले लोक. हल्ली रोजगारासाठी आणि मजुरीकरता बिहार, झारखंड, कर्नाटक आणि इतर राज्यांतून मोठ्या संख्येने लोक गोव्यात आलेले आहेत.
सिटी बसमध्ये प्रवास करताना हे सहज जाणवते.
गोव्यातील मूळ गोवन - गोमंतकीय असलेल्या - लोकांची संख्याही त्यामुळे घटत चालली आहे. निज गोंयकार आणि भायले अशा संज्ञा त्यासाठी वापरल्या जातात.
असेच चालू राहिले तर काही काळात गोव्यात कॅथोलीक लोकांचे प्रमाण दखल न घेण्याइतके नगण्य होऊ शकते.
यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी विनोद म्हणून सांगितलेला एक किस्सा सद्याच्या परिस्थितीवर झोत टाकतो.
उत्तर भारतातील अनेक लोक, विशेषतः दिल्लीतील अनेक व्यक्ती हल्ली गोव्यात कायमचे स्थायिक होत आहेत असे त्यांनी पणजी येथे झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले आहे.
``हल्ली गोव्यात पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक संख्येने लोक राहत आहेत. दिल्लीतलय एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर `दिल्लीतल्या कुठल्या भागात राहता?'' असे विचारले तर ती व्यक्ती म्हणते: '' मी अजूनमधून दिल्लीत येत असतो, कायमस्वरुपी मी गोव्यात राहतो!' ''
'' उत्तर भारतातील प्रत्येकाला गोव्यात राहायचे आहे. निवृत्त होणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला गोव्यात स्थायिक व्हायचे असते.," असे त्यांनी म्हटले आहे.
गोवा भारताचा भाग असल्याने यात वावगे काहीच नाही, मात्र इतक्या मोठ्या संख्येने गोव्यात स्थायिक होणाऱ्या लोकांना सामावून घेणे गोव्याला शक्य आहे काय असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
फोटो ओळी : अंतोनियो कोस्टा पोर्तुगालचे पंतप्रधान असताना आपल्या मायभूमीच्या भेटीवर गोव्यात २०१७ साली आले तेव्हाचा फोटो
Camil Parkhe,

Sunday, December 8, 2024


मी बातमीदार बनलो तेव्हा म्हणजे १९८१ साली आम्हा पत्रकारांना आणि इतर बिगरपत्रकार वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वर्षातून दहा पगारी सुट्ट्या (हॉलीडेज) होत्या. रजा वेगळ्या.

तत्कालीन अस्तित्वात असलेल्या आणि बहुसंख्य प्रतितिष्ठ वृत्तपत्रांत अंमलबजावणी होत असलेल्या वृत्तपत्र कर्मचारी कायद्यानुसार या पगारी सुट्ट्या होत्या.
गोव्यात आमच्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी आणि `नवप्रभा' या जुळ्या मराठी दैनिकात वर्षातून काही दिवस - नूतन वर्ष एक जानेवारी, २६ जानेवारी, पंधरा ऑगस्ट, गणेश चतुर्थी, दिवाळी - छपाई बंद ठेवून सर्वांना सुट्टी मिळायची,
यात तीनचार वर्षांनी एक मेच्या कामगार दिनाची भर पडली.
याचे कारण त्याकाळात डाव्या विचारसरणीचा जोर होता आणि आम्ही गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस (गुज) चे पदाधिकारी असलेले श्रमिक पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचारी स्वतःला कामगार समजायचो. उरलेल्या पाच पगारी सुट्ट्या आम्ही वर्षातून कधीही घेऊ शकायचो.
त्याशिवाय पत्रकार कायद्यानुसार वर्षाला तीस हक्काची रजा, बारा आजारपणाची रजा आणि दहाबारा कॅज्युएल रजा असायच्या.
गोवा सोडून मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हापर्यंत अशीच स्थिती होती,
पुण्यात त्यावेळी म्हणजे १९८९ साली मात्र दैनिकांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या असायच्या.
त्यावेळची प्रत्येक स्थानिक दैनिक आपापल्या वर्धापनदिनानिमित्त छपाई बंद ठेवायचे. उदाहरणार्थ, `सकाळ' चा वर्धापनदिनाला एक जानेवारीला सुट्टी असायची, दोन जानेवारीला पेपर नसायचा.
ही परिस्थिती एकदोन वर्षात व्यवहारी दृष्टिकोनामुळे बदलली.
मुंबईतल्या `लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसने पुण्यात आवृत्त्या सुरु केल्या होत्या. या दोन्ही वृत्तपत्रांनी आपल्या प्रती `सकाळ' वर्गणीदारांच्या घरांत दोन जानेवारीला फुकटात देणे सुरु केले.
त्यावेळचा पुण्यात दोन क्रमांकाचा असणारा `प्रभात' दुप्पट किंवा त्याहून अधिक प्रती दोन जानेवारीला छापू लागू लागला.
पुण्यात `सकाळ', `प्रभात' आणि `केसरी' याशिवाय इतरही दैनिके आहेत, याचा वाचकांना यावेळी पहिल्यांदाच पत्ता लागला.
परिणामतः `सकाळ' व्यवस्थापनाने एक जानेवारीला वृत्तपत्राची छपाई बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला. प्रतापराव पवार यांनी नानासाहेब परुळेकरांचा `सकाळ' पाचसहा वर्षांपूर्वी खरेदी केला होता.
छपाई आणि काम सुरु राहिले तरी `सकाळ' कर्मचाऱ्यांना मात्र त्यादिवसाऐवजी इतर दिवशी सुट्टी घेता यायची, आजही ही सोय आहे.
मी `इंडियन एक्सप्रेस'ला असतानाच पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांनी होळीनिमित्त सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.
बहुतेक वृत्तपत्र व्यवस्थापकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. या वितरकांच्या मदतीशिवाय आपण आपल्या दैनिकाच्या प्रती लोकांना वाटू असाही इशारा त्यांनी दिला.
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपला सुट्टीचा निर्णय वृत्तपत्र व्यवस्थापनकांना कळवल्यानंतर तीनचार दिवस तणावाची आणि संघर्षाची परिस्थिती निंर्माण झाली होती, हे आजही आठवते
मात्र वितरकांनी आपली एकी कायम ठेवली आणि आम्हा वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना असलेल्या आणखी एका सुट्टीची भर पडली.
पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांना आपल्या ताकदीची जाणीव झाली,
याआधी वृत्तपत्र कर्मचारी संघटितरित्या वृत्तपत्राची सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकत असत. आता त्यांची जागा वृत्तपत्र वितरकांनी घेतली होती,
हळूहळू एक मे चा कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन, अशा सुट्ट्या वाढत गेल्या.
अलीकडेच दिवाळीनिमित्त पुण्यात दैनिकांची छपाई त्यामुळे दोन दिवस बंद असते.
पुण्यात काल आणि आज वृत्तपत्रे नाहीत.
मात्र किती वाचकांना या दोन दिवशी सकाळी चुकल्याचुकल्यासारखे किंवा दैनिकांची गैरहजेरी जाणवतअसेल ?
Camil Parkhe



Saturday, December 7, 2024

 अतिशय धार्मिक म्हणता येईल अशा कुटुंबात मी वाढलो. माझ्या वडलांची दिनचर्या सुरु व्हायची ती सकाळी उठल्याउठल्या पलंगातल्या बिछान्यातच हातात रोझरी जपमाळ घेऊन कपाळावर, छातीवर आणि दोन्ही खांद्यांवर हाताने क्रुसाची खूण करत ' पवित्र क्रुसाच्या खुणेने...'' या प्रार्थनेपासून.

त्यानंतर `आमच्या बापा’, `नमो मारिया’ `प्रेषितांचा विश्वासांगिकार’ वगैरे प्रार्थना अर्धा तास चालायच्या. त्यांचे तोंड बाहेरच्या खोलीत असलेल्या आमच्या कुडाच्या भिंतीवर टांगलेल्या छोट्याशा आल्ताराकडे असायचे.
दरम्यानच्या काळात स्वयंपाकघरात केलेला कोरा चहा कपबशीत त्यांच्यासमोर ठेवलेला असायचा. दादांचे हे असे दररोजचे दर्शन मला खूप लहानपणापासून आठवते.. याचं कारण घरात इतरांपेक्षा खूप लवकर म्हणजे तांबडं फुटण्याआधीच बिछान्यातून बाहेर पडण्याची मला लागलेली सवय.
सकाळी साडेआठ दरम्यान दादांची आंघोळ, नाश्ता उरकायचा, तोपर्यंत घरात महिन्यावार लावलेला फुलांचा हार आलेला असायचा. कालचा जुना हार काढून दादा आल्तारासमोर उभे राहून दोनतीन प्रार्थना - आमच्या बापा, मारिया - मनातल्या मनात म्हणायचे आणि आमच्या `पारखे टेलर्स’ दुकानात जायला निघायचे.
माझी शाळा सकाळी अकराला असल्यानं अनेकदा मी त्यांच्याबरोबर जायचो. दुकानातल्या लाकडी फळ्यांचे दार उघडून केरसुणीनं ते दुकान झाडून घ्यायचे आणि मग दुकानाच्या भिंतीवर मध्यभागी असलेल्या आल्तारासमोर उभे राहून ते पुन्हा दोनतीन प्रार्थना म्हणायचे.
संद्याकाळी दुकानात पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवल्यावर आणि नंतरच्या काळात दिवे लावल्यावर लगेचच ते आल्ताराकडे पाहायचे आणि उजवा हात कपाळावर लावायचे.
श्रीरामपूर नगरपालिकेचा रात्रीचा साडेआठ वाजता भोंगा झाल्यानंतर दुकान बंद करण्याआधी पुन्हा एकदा आल्तारासमोर प्रार्थना व्हायची.
घरी आल्यावर नऊच्या आत आल्तारावर जाडजूड स्टीलच्या स्टॅण्डमध्ये दोन मेणबत्त्या लावल्या जायच्या आणि घरातील सगळे जण रात्रीच्या सामूहिक प्रार्थनेत सहभागी व्हायचे. जवळजवळ अर्धा तास चालणाऱ्या रात्रीच्या या प्रार्थनेत कुणीही गैरहजर राहू नये असा एक दंडक होता.
शनिवारी रात्री मारियेची प्रार्थना म्हणजे रोझरी व्हायची, आठवड्यातून दोनतीनदा मारियेची, सर्व संतांची आणि संत जोसेफची लितानी प्रार्थना व्हायची. अशाप्रकारे दादांचा नि आमच्या घरातला हा दिनक्रम कार्यक्रम कधीही चुकल्याचं मला आठवत नाही.
नाश्ता आणि कुठलेही जेवण घेण्याआधी हातानं क्रुसाची खूण केल्यानंतरच घास तोंडात टाकायचा ही त्यांची आणखी एक सवय. ही सवय आमच्या आईला - बाईला - सुद्धा होती. अहमदनगर जिल्ह्यात आईला 'बाई' असं संबोधन करण्याची रीत प्रचलित आहे.
घरातल्या या धार्मिक वातावरणाचा प्रभाव घरातल्या आम्हा मुलामुलींवर पडणे साहजिकच होते. घरातली सगळीच मुलं साधुसंत झाली नाही तरी बऱ्यापैकी धार्मिक आणि चांगल्यावाईट कल्पनांचा आदर आणि दुःस्वास करणारी निघाली.
घरातल्या कुणाही व्यक्तीकडून कसलाही अपशब्द, लिंगाधारित अपशब्द किंवा एखादी शिवी कधीही कानावर पडली नाही.
सत्तरच्या दशकापर्यंत जगभरातील कॅथोलिक देवळांत रविवारचा आणि दररोजचाही मिस्साविधी लॅटिन भाषेतून व्हायचा. आपल्याकडे अलीकडच्या काळापर्यंत अनेक धार्मिक विधी सामान्य लोकांना न कळणाऱ्या संस्कृत भाषेत व्हायचे अगदी तसेच. श्रीरामपूरला आणि हरेगावसारख्या खेड्यांपाड्यांत १९७२ पर्यंत कॅथोलिक देवळांत मिस्साविधी आणि प्रार्थना लॅटिन भाषेत व्हायच्या,
पुस्तकात समोरासमोरच्या पानांवर रोमन आणि देवनागरी लिपींत लिहिलेल्या या लॅटिन प्रार्थना आम्ही म्हणायचो. मराठी भाषा येणारे आम्ही लोक देवनागरी लिपीतल्या त्या लॅटिन प्रार्थना सहजपणे गात आणि म्हणत असू.
आमच्या लहानपणी आम्ही - आणि जगभरातले सर्वच भाविक लोक - लॅटिन भाषेत प्रार्थना करत असू. .
तासभर चालणाऱ्या या संगीतमय लॅटिन मिस्सा खरंच भव्यदिव्य स्वरुपाच्या असायच्या. पूर्ण उपासनाविधीत याजक आणि जमलेले भाविक जवळजवळ विशिष्ट लयबद्ध पद्धतीने गात असत. लॅटिन भाषेच्या संगीतमय उपासनाविधीला रुळलेल्या माझ्यासारख्या मुलांना आणि अनेक ज्येष्ठांना हा निर्णय लगेचच रुचला नव्हता हे कबूल करायलाच हवं.
आज जगभर सगळीकडे स्थानिक भाषांत मिस्साविधी आणि इतर सर्व प्रार्थना होतात.
ख्रिस्ती लोक बहुसंख्य बसलेल्या श्रीरामपूरच्या नामवंत जर्मन हॉस्पिटल म्हणजे सेंट लुक हॉस्पिटलच्या परिसरापासून दोन किलोमीटर लांब पण शहराच्या मुख्य वस्तीत आमचं घर होतं.
मेनरोडपाशी सोनार लेनमध्ये आमचं `पारखे टेलर्स’ हे शहरात नावाजलेलं दुकान होतं. तेथून जवळच असलेल्या सोमैय्या हायस्कुलपाशी आम्ही राहायचो.
आमच्या चाळीत बहुधर्मिय आणि विविध जातींची घरं होती. आमच्या घराच्या भिंतीला लागून मुसलमान शेजार होता, त्यांच्या अगदी समोरसुद्धा एक मुसलमान घर होतं, आमच्या घराच्या दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंब होतं, त्यांच्याशेजारी आणखी एक मुसलमान कुटुंब होतं. समोरची चारपाच घरं माळी जातीच्या आणि एकमेकांचे नातेवाईक असलेल्या कुटुंबांची होती.
या साऱ्या घरांतील लोक पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी सामाईक नळावर अवलंबून असत. त्यावेळी तिथं गोल कुंकू लावलेल्या, कुंकवाची आडवी चीर लावलेल्या आणि अजिबात कुंकू नि कुठलेही सौभाग्यलेणं नसलेल्या बायांची गर्दी होई.
मात्र वेगवेगळे कुंकू असण्याचा किंवा अजिबात कुंकू नसण्याचा त्यांच्या आपापसांतील संभाषणांत काहीही फरक नसायचा.
या आमच्या माळी-मराठी आणि मुसलमान शेजाऱ्यांच्या आपापसांत नेहेमी भाजी-कालवणांची - अडीअडचणीच्या काळात गव्हाच्या-ज्वारी-बाजरीच्या पिठाचीही आठव्याच्या किंवा एखाद्या पातेल्याच्या मापात मोजून घेऊन देवाणघेवाण व्हायची.
जराशा अंतरावर असलेल्या दगडी इमारतीत आणि बैठ्या दगडी घरांत एकदोन ब्राह्मण घरं होती. त्या ब्राह्मण घरातला नातू माझ्याच वर्गातला आणि माझा जवळचा मित्र, तो आमच्या घरात यायचा, मीही त्याच्या घरात थेट आतपर्यंत जायचो,
मात्र त्याची सत्तरीतली आजी कायम सोवळ्यात असायची, आणि कुणाला तिच्याजवळ येऊ किंवा शिवू देत नसायची. माझ्या आईची तिची जाम गट्टी होती.
'' या,या मार्थाबाई, बसा घडीभर'' असं म्हणत ती माझ्या आईला आपल्या घरात घ्यायची,
भरपूर वेळ खूप गप्पाटप्पा व्हायच्या, मात्र सुरक्षित अंतर ठेवूनच. आम्हाला मात्र त्याचं कधीही वाईट वाटलं नाही. इतर कुणाही व्यक्तीला - अगदी मराठा आणि माळी जातीच्या लोकांनाही - त्या गणपुले आजी शिवत नसायच्या.
सगळा शेजारपाजार एकमेकांच्या घरांतील सुखदुःखाला म्हणजे लग्नकार्यांना, मयतीला हजर असायचा, त्यामुळे एकमेकांच्या रितीरिवाजांची आणि संस्कृतीची साधारण ओळख असायची.
शेजारच्या मुसलमान घरांतील लहान मुलांच्या सुंता कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं मला आजही आठवतं. नंतर थोडं मोठं झाल्यावर कळालं कि सुंता परंपरा यहुदी धर्मात होती आणि यहुदी असलेल्या येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या बाराही शिष्यांची साहजिकच सुंता झाली होती.
नव्या ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांमध्ये मात्र सुंता प्रथा न आणण्याचा निर्णय या विषयावर चर्चा होऊन अगदी सुरुवातीच्या काळातच घेतला गेला होता.
कालांतरानं लक्षात आलं कि धर्म आणि भाषा, संस्कृती, पेहराव आणि अगदी खाद्यपध्द्ती यांचा एकमेकांशी काही एक संबंध नसतो.
साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.
या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.
साठ आणि सत्तरच्या दशकांच्या पिढीपर्यंत देशातील धार्मिक ख्रिस्ती कुटुंबांत घरातलं एक तरी मुल फादर किंवा सिस्टर व्हावं अशी आईवडलांची अपेक्षा असायाची.
युरोपातून आणि अमेरिकेतून अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आणि नन्स मिशनरी होऊन भारतात, आफ्रिका खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आले त्याचं हे प्रमुख कारण होतं. ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या केरळ, गोवा आणि वसईसारख्या भागांतूनसुद्धा अनेक धर्मगुरु आणि नन्स देशाच्या कानाकोपऱ्यांत काम करत आहेत ते याच कारणामुळं.
कोणे एके काळी अशाच धार्मिक कॅथोलिक कुटुंबात जन्मलेले जॉर्ज फर्नांडिस मंगलोर येथील सेमिनरीत फादर होण्यासाठी दाखल झाले होते, मात्र नंतर त्यांचा विचार बदलला आणि मग ते समाजवादी विचारसरणीचे कामगार नेते बनले.
आमचे धार्मिक ख्रिस्ती कुटुंबसुद्धा यास अपवाद नव्हते. याचा परिणाम म्हणून मी स्वतः आजन्म ख्रिस्ती संन्याशी होण्याचा निर्णय घेतला. दहावीनंतर मी जेसुईट फादर होण्यासाठी घरकुटुंब सोडले.
दहावीनंतर श्रीरामपुरातले घर मी सोडेपर्यंत दोन गोष्टी माझ्या शरीराभोवती कायम असायच्या. त्यापैकी एक म्हणजे गळयाभोवती काळ्या दोरीने बांधलेला क्रूस. ख्रिस्ती असल्याची ही खूण अनेकदा इतरांना दिसेल अशा पद्धतीने शर्टाच्या कॉलरपाशी असायची.
दुसरी एक गोष्ट मात्र इतरांना कधीही दिसत नसायची. चारपाच दिवसांच्या दिवाळसणाचा फक्त शेवटचा दिवस आमच्या घरी साजरा व्हायचा, तो म्हणजे भाऊबीज. ``इडा पिडा टळो'' असं काहीसं म्हणत बाई दादांना आणि आम्हा सर्व मुलांना ओवाळायची, नंतर बहिणी आम्हा भावांना ओवाळायच्या आणि मग ओवाळणीच्या ताटात आम्हा सर्व पुरुषांना करदोटे मिळायचे.
आधल्या वर्षाचे करदोटे काढून मग ते नवे करदोटे कमरेभोवती गुंडाळायचे. करदोटेविना पुरुष म्हणजे षंढ असा त्याकाळी समज असायचा.
गोव्यात आल्यानंतर गळ्याभोवतीचाचा हा क्रूस आणि अंतवस्त्रापाशी असलेला करदोटा नक्की कधी आणि कसे गळून पडले हेसुद्धा आता आठवत नाही.
गोव्यात अर्थातच कॅथोलिक समाजात करदोटे बाळगण्याची प्रथा नाही आणि गळ्याभॊवती कुणी क्रॉससुद्धा बाळगत नाही.
हा, गोव्यात कॅथॉलिक व्यक्ती असल्याची ओळख करून देणारी एक दुसरी गोष्ट होती, ती म्हणजे उजव्या अंगठ्याच्या टोकापाशी गोंदलेली छोटीशी क्रुसाची चिन्ह. हिंदू पुरुषाचे दोन्ही कान टोचलेले असतात, तसे गोव्यात कॅथोलिक स्त्री-पुरुषाचे अंगठे क्रूसाचे चिह्नाने गोंदलेले असतात .
मात्र गोव्यात पदवीधर होण्याआधीच धर्मगुरू होण्याचे, आजन्म अविवाहित राहून धर्मसेवा आणि समाजसेवा करण्याचं ध्येय मी सोडलं आणि पत्रकारितेच्या व्यवसायात आलो.
जेसुईट संन्याशी होण्याचं बाळगलेलं स्वप्न सोडणं तितकं सहज नव्हतं. याकाळात प्रचंड मानसिक तणावातून गेलो, मात्र वर्षभराच्या काळात सावरलो आणि एका नव्या व्रताचा - पत्रकारितेच्या आणि कामगार चळवळीच्या - स्वीकार केला.
आज मागे वळून पाहताना एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे झालेले हे स्थित्यंतर अगदी सहजगत्या पार पडले असं वाटते.
आजन्म अविवाहीत धर्मगुरु राहण्याचे उद्दिष्ट सोडून मी गृहस्थाश्रम स्वीकारायला होता तरी तसा एकदा घेतलेला वसा पूर्णतः टाकून दिलेला नव्हता. नव्या अवतारातसुद्धा मूळचा पिंड कायम राहिला होता असे आज मागे वळून पाहताना जाणवते.