Showing posts with label German. Show all posts
Showing posts with label German. Show all posts

Thursday, November 27, 2025

रेस कोर्सनजिक असलेल्या सेंट पॅट्रिक्ट्स कॅथेड्रल्समध्ये जाऊन पुण्याचे नवनिर्वाचित बिशप फादर सायमन अल्मेडा यांची आज सकाळी सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या असलेल्या आणि दिडशे वर्षांचा इतिहास असलेल्या पुणे कॅथोलिक धर्मप्रांताचे किंवा डायोसिसचे ते आठवे बिशप असतील.
पुणे डायोसिसची स्थापना १८८६ साली झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत धर्मप्रांताचे पहिले दोन बिशप जर्मन होते.
कॅथोलिक धर्मप्रांताचे बिशप या पदाचे महत्त्व आणि अधिकार चर्चबाहेरच्या इतरांना सहसा माहित नसतात.
बिशप हे त्यांच्या डायोसिसमधील असलेल्या सर्व धर्मप्रांतीय शैक्षणिक संस्था - शाळा-कॉलेजेस, दवाखाने, सामाजिक आणि धर्मादाय संस्था यांचे व्यवस्थापकीय प्रमुख असतात.
आताच्या पुणे डायोसिसमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली महसूल जिल्हे आणि कोल्हापूर शहर यांचा समावेश होतो.
एके काळी म्हणजे बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांच्या कारकिर्दीच्या काळात १९८७ पर्यंत पुणे धर्मप्रांतात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारपासून कोकणातील रत्नागिरीपर्यंतचा भाग समाविष्ट होता.
गेल्या काही दशकांत नाशिक आणि नंतर सिंधुदुर्ग नवे धर्मप्रांत निर्माण झाल्याने पुणे धर्मप्रांताचे क्षेत्र कमी झाले आहे.
बिशप जॉन रॉड्रिग्स यांची मुंबई सर्वधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून निवड झाल्याने हे पद गेले एक वर्षभर रिक्त होते.
त्याआधी थॉमस डाबरे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण होईपर्यंत पुण्याचे बिशप होते.
प्रत्येक कॅथोलिक व्यक्तीचा त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी बिशपांशी संपर्क आलेला असतोच.
याचे कारण कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार (सांक्रामेंत ) देण्याचा अधिकार केवळ बिशपांना असतो.
काही वर्षांपूर्वी फादर सायमन अल्मेडा आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चचे पाच वर्षे धर्मगुरु होते.
कॅथोलिक चर्चच्या अखत्यारीतल्या चर्चमधील धर्मगुरूंची आणि शाळांच्या प्राचार्यांची ठरविक काळानंतर बदली होत असते.
कॅथोलिक चर्चचे जगभर पसरलेले जाळे, या चर्चच्या विविध संस्थांचे विविध समाजघटकांत चालू असलेले कार्य आणि या चर्चचे व्यवस्थापन हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि अतिशय कुतूहलाचा विषय आहे.
चर्चसारखे नेटवर्क असलेली जगात इतर कुठलीही संस्था वा संघटना नसावी.
फादर सायमन अल्मेडा यांच्या बिशपपदाची घोषणा पोप लिओ चौदावे यांच्याकडून व्हॅटिकन सिटीमधून, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाकडून दिल्लीतून आणि पुण्यातील सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमधून एकाच दिवशी आणि एकाच क्षणी व्हावी, त्या घोषणेवेळी चर्चबेलचा घंटानादही व्हावा, या घटनेतून चर्चच्या जागतिक नेटवर्कची थोडीबहुत कल्पना यावी.
मी स्वतः गोव्यात जेसुईट फादर होण्यासाठी काही वर्षे उमेदवारी केली असल्याने कॅथोलिक चर्चच्या कामकाजाची आणि नियमांची मला थोडीफार माहिती आहे.
नूतन वर्षांरंभात फादर सायन अल्मेडा यांचा बिशप म्हणून दीक्षाविधी होईल.
नवनिर्वाचित बिशपांना शुभेच्छा !

Camil Parkhe


Tuesday, October 11, 2022


पापक्षालन - प्रायश्चित घेण्यासाठी कन्फेशनल बॉक्ससमोर आम्हा मुलांची रांग लागलेली असायची.

साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता. तर या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.

दर शनिवारी संध्याकाळीं किंवा रविवारच्या सकाळच्या मिस्साविधिपूर्वी आम्हा मुलांची संत तेरेजा देवळात रांग लागायची. उंचच उंच शिखर असलेल्या त्या भव्य देवळाच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा तीन फादर - फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर ज्यो पिंटो - प्रायश्चित ऐकण्यासाठी आपल्या खुर्चीवर बसलेले असायचे. त्यांच्या खुर्चीच्या एका बाजूला जाळीधारी लाकडी फळी असायची, त्या फळीच्या खाली असलेल्या लाकडी पट्टीवर गुडघे टेकून मुलं त्या आठवड्यात आपण केलेल्या लहानमोठ्या पापांची यादी फादरांना सांगत असत.
प्राथमिक शाळातील मुलांनीं केलेली ती पापं शांतपणे ऐकत ते फादर मुलांना पापक्षालन म्हणून एकदोन `आमच्या बापा' अन एक `नमो मारिया' या प्रार्थना म्हणायला सांगत, नंतर आपला उजवा हात उंचावून पवित्र क्रुसाची खूण करत ते मुलांच्या पापांची क्षमा करत.
त्यानंतर रांगेतला दुसरा मुलगा आपली पापं कबूल करायला, त्या पापांची क्षमा मागण्यासाठी त्या फळीवर गुडघे टेकायचा.
अशाप्रकारे पापक्षालन झाल्यावर पापमुक्त झालेली ही मुले नंतर होणाऱ्या मिस्साविधीत पवित्र कम्युनियन किंवा ख्रिस्तशरीर सेवन करण्यासाठी पात्र असायची.
आम्हा सर्व मुलांचे जन्मल्यानंतर काही महिन्यांतच बाप्तिस्मे झाले होते, त्यानंतरचे दोन महत्त्वाचे सांक्रामेन्त प्रथम कम्युनियन आणि प्रायश्चित या शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना झाले.
जन्मानंतर कुठलीही व्यक्ती देवाने मोशेला दिलेल्या दहा आज्ञांचे (टेन कमांडमेंट्स) उल्लंघन करतेच आणि पाप करते. या पापांचे क्षालन होण्यासाठी प्रायश्चित किंवा कन्फेशन हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत.
या `टेन कमांडमेंट्स'मध्ये मुर्तीपुजा करु नकोस, आईवडलांचा सन्मान कर, रविवार (शब्बाथ) पवित्र पाळ, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस, व्यभिचार करु नकोस, खून करु नकोस, वगैरेंचा समावेश होतो.
आता दहाबारा वर्षांची मुलंमुली असं कोणतं पाप करणार आहेत ? मात्र त्याकाळात प्रायश्चित घेण्यासाठी कन्फेशनल बॉक्ससमोर आम्हा मुलांची रांग लागलेली असायची.
हल्ली रविवारी किंवा सणावाराला चर्चला आवर्जून जाणाऱ्या भाविकांपैकी अनेकांना त्यांनी प्रायश्चित कधी घेतले होते हे आठवणारसुद्धा नाही. मीसुद्धा याला अपवाद नाही
कॅथोलिक धर्मात सप्त स्नानसंस्कार म्हणजे सात सांक्रामेंत असतात. जन्मानंतर काही दिवसांत होणारा बाप्तिस्मा (नामकरण विधी) , बालपणी कम्युनियन, प्रायश्चित किंवा कन्फेशन, पौंगडावस्थेत कन्फर्मेशन किंवा दृढीकरण, तरुणपणी लग्नविधी किंवा दिक्षाविधी, आणि पार्थिव देहावर अंतिम संस्कार हे ते सप्त स्नानसंस्कार.
यापैकी बाप्तिस्मा, लग्नविधी, दीक्षाविधी आणि अंतिम संस्कार हे सांक्रामेंत आयुष्यातून एकदाच होतात तर कम्युनियन आणि प्रायश्चित हे दोन सांक्रामेंत भाविक वारंवार घेऊ शकतात. लग्नाचा विधी अर्थात काहींच्या बाबतीत एकापेक्षा अनेकदा होऊ शकतो !
कॅथोलिक देवळात रविवारीही (आणि दररोजही) होणाऱ्या मिस्साविधीत भाविकांना ख्रिस्तशरीर किंवा कम्युनियन दिले जाते. प्रायश्चित या सांक्रामेंतचा लाभ भाविक त्यांना हवे तेव्हा घेऊ शकतात.
मात्र कन्फर्मेशन (दृढीकरण), लग्न, दीक्षाविधी यासारख्या महत्त्वाचे सांक्रामेंत स्विकारण्याआधी त्या व्यक्तींनी प्रायश्चित घेऊन म्हणजे एकप्रकारे अध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध, पवित्र होऊन पुढले पाऊल उचलावे अशी अपेक्षा असते.
ख्रिस्ती धर्मानुसार जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती मूळ पापाचा कलंक घेऊन येत असते. आदाम आणि ईव्ह या पृथ्वीतलावरील पहिल्या पुरुष आणि स्त्रीने देवाची आज्ञा मोडली. इदेन बागेतलं देवाने मना केलेलं एक फळ (सफरचंद? ) इव्हने सैतानाच्या सांगण्यानुसार खाल्ले, आदामालाही खाल्लेलं अर्धे फळ खाण्यास दिलं, हेच ते मूळ पाप किंवा ओरिजिनल सिन. येशू ख्रिस्ताने क्रुसावर मरण पत्करुन मानवजातीची मूळ पापापासून सुटका केली.
बाप्तिस्मा घेणारी प्रत्येक व्यक्ती जन्मतः येणाऱ्या या मूळ पापापासून मुक्त होते. येशूची आई मदर मेरी मात्र या मूळ पापाच्या कलंकाशिवाय जन्माला आली, असा कॅथोलिक धर्माचा एक धर्मसिद्धांत ( डॉक्टरीन) आहे.
``ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता, त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची पापे तुम्ही तशीच राहू द्याल, ती तशीच राहतील,'' असं येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना म्हटलं होतं, त्या आधारावर पापक्षालन या स्नानसंस्काराची स्थापना झाली आहे.
कुठल्याही कॅथोलिक चर्चच्या सणानिमित्त, यात्रेनिमित्त जमलेले अनेक भाविक पापक्षालन सांक्रामेंत घेत असतात.
धर्मगुरु, बिशप, आर्चबिशप आणि कार्डिनल्स, पोपसुद्धा मानवच असल्याने पापं करणारच, त्यामुळे तेसुद्धा वेळोवेळी प्रायश्चित घेत असतात.
पोप हे भुतलावरचे येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी, सेंट पिटरचे उत्तराधिकारी, त्यांना `होली फादर' असेच संबोधले जाते. तर सर्वोच्च धर्माचार्य असलेले सद्याचे पोप फ्रान्सिस हे सुद्धा आपल्या पापक्षालनासाठी एखाद्या धर्मगुरुकडे आपल्या पापांची कबुली देऊन पापक्षालन करत असतात, हे वाचून अनेकांना धक्का बसायची शक्यता आहे.
यावरुन एक आठवलं. पोपपदावर आल्यानंतर लगेचच पोप जॉन पॉल दुसरे यांच्यावर व्हॅटिकन सिटीत सेंट पिटर्स चौकात दर्शनासाठी भाविकांमध्ये वाहनातून फिरत असताना जीवघेणा गोळीबार झाला. पोटात तीनचार गोळया जाऊनसुद्धा आश्चर्यकारकरित्या ते बचावले आणि पुढे सत्तावीस वर्षे पोप राहण्याचा आणि जगाचा राजकीय आणि भौगोलिक इतिहास बदलण्याचा विक्रम त्यांचा नावावर जमा झाला.
पोप यांच्यावर हल्ला करणाऱ्या अली अगका नावाच्या तुर्किश तरुणाला पुढे जन्मठेपेची सजा झाली. पोप जॉन पॉल या स्वतःच्या मारेकऱ्याला तुरुंगात जाऊन भेटले आणि त्याला त्याच्या पापाची किंवा गुन्ह्याची आपण क्षमा केली आहे असे त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर सांगितले.
अर्थात अली अगकाच्या पापाचे क्षालन झाले तरी या लौकिक जगातल्या न्यायानुसार अली अगका याला तुरुंगवासाची शिक्षा मात्र माफ झाली नव्हती. (पोप जॉन पॉल यांच्याप्रमाणेच प्रियंका गांधीसुद्धा त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना तुरुंगात भेटल्या आणि त्यांच्याविषयी आपल्या मनात कटुता नाही असं नंतर त्यांनी सांगितलं.)
मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या मृत्यूच्या सजेआधी त्यांचं प्रायश्चित ऐकून घेतले जाते.
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचेही प्रायश्चित ऐकून घेतल्यानंतर, पापांची कबुली ऐकल्यावर ती कबुली धर्मगुरुंना इतर कुणालाही अगदी न्यायालयांतसुद्धा उघड करण्याची परवानगी नसते. मग ही पापाची कबुली एखाद्या चोरीबद्दल, खुनाबद्दल, बलात्कारासारख्या किंवा खुनासारख्या मोठ्या गुन्ह्यांबद्दल असो. ही पापकबुली धर्मगुरुंना स्वतःपाशीच ठेवावी लागते.
अशा प्रकारचे कन्फेशन करणे किंवा पापांची कबुली देणे याचे फायदे खूप असतात आणि त्यामुळे धार्मिक बाब एकवेळ बाजूला ठेवली तरी मानसशास्त्रात त्यास फार महत्त्वाचे मानले गेले आहे.
मूळ पाप हे जन्मतः येते, तर काही पापे अथवा गुन्हे सामूहिक असतात. उदाहरणार्थ, अडॉल्फ हिटलरच्या कारकिर्दीत जर्मनीत लाखो निरपराध ज्यु लोकांना मृत्युदंडाची सजा देण्यात आली, अगणित लोकांचा छावण्यांत छळ करण्यात आला आणि त्याकडे इतर समाजघटकांनी, देशांनी आणि कॅथोलिक चर्चसारख्या सामर्थ्यवान संस्थांनी सरळसरळ काणाडोळा केला.
जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्लंडच्या राजघराण्याने किंवा प्रतिनिधींनी भारताची माफी मागावी, पापक्षालन करावे अशीसुद्धा मागणी केली जाते.
तसेच युरोपात आणि अमेरिकेत ख्रिस्ती धर्मगुरुंनी लहान मुलांवर केलेल्या लैगिक अत्याचाराबाबत म्हणता येईल, त्याबद्दल संबंधीत लोकांची आणि कुटुंबियांची पोप बेनेडिक्त सोळावे आणि पोप फ्रान्सिस यांनी माफी मागून एकप्रकारे पापक्षालनाची विनंती केली आहे.
तर अशा या पापक्षालनाविषयी अजून बरंच काही लिहिता येईल.

^^^^
Camil Parkhe, October 10, 2022

Tuesday, May 4, 2021

ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या पुस्तकाची प्रस्तावना

 



हरेगावच्या संत तेरेजा शाळेच्या बोर्डिंगमध्ये मी तिसऱ्या इयत्तेत असताना पहिल्यांदा माझी मिशनरींच्या जीवनाशी ओळख झाली. त्या काळात म्हणजे 1960 च्या दशकात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक फादरबाडींमध्ये पन्नाशी पार केलेले युरोपियन धर्मगुरू काम करत होते. कडक शिस्तीचे फादर ह्युबर्ट सिक्स्त हे आमच्या शाळेचे मुख्य होते, तर काटकुळ्या प्रकृतीचे आणि साठी ओलांडलेले फादर रीचर्ड वासरर हे त्यांचे सहायक होते. शरीरप्रकृतीने आणि स्वभावप्रकृतीनेही या दोन फादरमध्ये बराचसा फरक होता.
म्हातारे फादर वासरर यांच्या अंगाखांद्याला लहान मुले सदैव झोंबत असत. त्यावेळी संत तेरेजा शाळा कौलारू खोल्यांमध्ये भरत असे. या खोल्यांच्या मागे शाळेच्या मालकीच्या असलेल्या शेतीजवळ त्यावेळी नव्यानेच एक मोठा पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. या हौदात सकाळची शाळा सुरू होण्याआधी भल्या पहाटे फादर वासरर आम्हा बोर्डिंगच्या मुलांना घेऊन पोहत असत. नदीची वा विहिरीची ओळख नसलेल्या आम्हा अनेक मुलांना त्यांना येथेच पोहण्याचे धडे दिले. म्हाताऱ्या फादरच्या पाठीवर पडून पाण्यात हात-पाय हलवून त्यावेळी अनेक मुले पोहायला शिकली.
एकदा पोहण्याचा कार्यक्रम चालू असताना हौदाची एक भिंत वाहून गेली. सुदैवाने फादर यांच्यासह इतर कुणाही मुलाला दुखापत झाली नाही.
मध्यम उंचीचे आणि अल्सेसियन कुत्रा पाळणारे फादर सिक्स्त हे स्वत: या आजारी मुलांना तपासत असत. स्वत:जवळ असलेल्या बटव्यातून औषध आणि गोळ्या देत असत. गरज भासल्यास मुलांना इंजेक्शनदेखील देत असत. हे इंजेक्शनदेखील त्या फादरबद्दल मुलांच्या मनात भीती निर्माण करण्याचे एक कारण असावे असे आता मला वाटते.
जर्मन नागरिक असलेल्या हुबर्ट सिक्त यांना सक्तीच्या लष्करभरतीमुळे दुसऱ्या महायुद्धात भाग घ्यावा लागला होता, तेव्हा त्यांनी जखमींना मदत करणाऱ्या मेडिकल कोअरमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे त्यांना औषधोपचारांची माहिती होती. (हे मला अर्थात अलिकडेच जर्मनीत तीन दशकांपासून स्थायिक असलेल्या अजित लोखंडे यांनी लिहिलेल्या 'मिशन, मिशनरी आणि मी' या पुस्तकातील लेखावरून कळाले. गोव्यात कळंगुटजवळच्या बागा बिचवर पोहोताना फादर सिक्त यांचे १९८७ साली निधन झाले.)
बोर्डिंगमध्ये मार्शल आणि पेत्रस हे माझे थोरले दोन भाऊही होते. हरेगाव (बेलापूर) शुगर फॅक्टरीच्या आसपास असलेल्या उंदीरगाव आणि एकवाडी, दोनवाडी, तीनवाडी अशा वाड्यांतील मुले या शाळेत शिकत असत. बोर्डिंगच्या मुलांना राहण्याची आणि जेवणाची मासिक पाच रुपये फी होती. मात्र ही फीसुद्धा वेळेवर कधी भरली जात नसे. मात्र फी न भरल्यामुळे एखाद्या मुलाला तंबी मिळाली वा बोर्डिंगमधून काढूनटाकले असा प्रकार मात्र कधीही झाला नाही.
आज अहमदनगर जिल्ह्यात अनेक शहरात आणि गावात ख्रिस्ती धर्मगुरूंतर्फे वा सिस्टर्सतर्फे अनेक शाळा चालविल्या जातात. त्याकाळात मात्र जिल्ह्यातील मागासवर्गीय ख्रिस्ती समाजासाठी हरेगावची संत तेरेजा शाळा आणि संगमनेरची ‘ज्ञानमाता’ ही दोनच प्रमुख शिक्षण केंद्रे होती. श्रीरामपूर आणि शेजारील तालुक्यातील मुले हरेगावला बोर्डिंगमध्ये राहून सातवीपर्यंत शिकत आणि पास झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी संगमनेरच्या ज्ञानमाता बोर्डिंगचा रस्ता धरत. त्याकाळातील सर्वच मिशन केंद्रे येशूसंघीय (जेसुईट) फादरांची होती.
आठवी-नववीनंतर, मॅट्रीकमध्ये सुटल्यानंतर वा सुटले नाही तरी यापैकी अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येशूसंघातर्फेच पुण्यात फादर आयवो मायर यांनी चालविलेल्या सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये भरती होत. (बाय द वे, फादर मायर यांनीच माझा श्रीरामपुरला बाप्तिस्मा करुन मला 'कामिल' हे नाव दिले होते!) सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये तेथील बोर्डिंगमध्ये राहून टर्नर, फिटर, वायरमन वगैरेंचे शिक्षण घेत. पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेण्याची पूर्वाश्रमीचे दलित असलेल्या या ख्रिस्ती समाजाची आर्थिक वा सामाजिक कुवत त्यावेळी नव्हती.
त्याकाळात अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील स्थानिक फादरबाडींतील बोर्डिंगमध्ये आणि नंतर ज्ञानमातेत शिकून पुण्यात सेंट जोसेफ टेक्निकलकडे प्रवास केलेल्यांची संख्या प्रचंड आहे. किमान दोन पिढ्यांनी ही पायवाट वापरली आहे. पुण्यात व्यावसायिक शिक्षण घेऊन नंतर पुण्यातीलच बजाज, टेल्को, फिलिप्स, ग्रीव्हज वगैरे कंपन्यांत यापैकी अनेकांनी प्रवेश मिळविला.
या दोन जिल्ह्यांतून पुण्यात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती गावी मागे राहिलेल्या त्यांच्या इतर समाजकुटुंबीयांपेक्षा कितीतरी चांगली आहे. उपेक्षित ख्रिस्ती समाजाला मिशनरींनी दिलेल्या पाठबळामुळे अर्थात हे शक्य झाले. दलित असूनही धर्मांतरामुळे हा समाज राखीव जागांच्या सवलतीस मुकला.
ख्रिस्ती दलितांचा - किंबहुना पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या कुठल्याही दलितांचा - सर्व प्रकारच्या घटनात्मक आरक्षणावर पूर्णतः अधिकार नव्हे हक्क आहे, भले घटनेने आणि कायद्याने तो त्यांना आजपर्यंत नाकारला आहे ही बाब दुसरी. मिशनरींनी मात्र आपल्या मर्यादित कुवतीनुसार या समाजाला स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले आणि दलित असूनही या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या या समजात न्यूनगंडाची भावना आढळत नाही ती यामुळेच.
‘मनुष्य केवळ भाकरीवरच जगत नाही’, हे ख्रिस्ताचे वचन सांगतानाच गरीब ख्रिस्ती कुटुंबांना रोजची रोटी कशी मिळविता येईल याकडेही मिशनरींनी लक्ष दिले. भारतातील ख्रिस्तीसमाजापैकी बहुतांश लोक पूर्वाश्रमीच्या अनुसूचित जाती-जमातींमधून (एस सी आणि एस टी) आले आहेत. या दलित समाजाच्या प्रगतीत मिशनरींनी केलेले योगदान स्पष्ट करण्यासाठी येथे मुद्दामच अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्याचा एक उदाहरण म्हणून उल्लेख केला आहे.
देशातील विविध राज्यांतील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ख्रिस्ती समाजाला मिशनरींनी असाच मदतीचा हात दिला आहे. नवख्रिस्ती समाज बाल्यावस्थेत असताना मिशनरींनी केलेल्या मदतीबद्दल समाजाच्या या पिढ्या कृतज्ञ राहिलेल्या आहेत.
हरेगावची संत तेरेजा, संगमनेरची ज्ञानमाता, पुण्यातील सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूट, लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट या शाळा, मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज, बंगलोरचे सेंट जॉन मेडिकल कॉलेज, मदर तेरेसांची जगभर पसरलेली अनाथगृहे या सर्व ख्रिस्ती धर्मीयांनी चालविलेल्या संस्था आहेत. मात्र यापैकी सर्वच संस्थांतील बहुतांश लाभार्थी हे अख्रिस्ती समाजातील असतात हे विशेष. याचे कारण म्हणजे या सर्व संस्था सर्व धर्माच्या आणि जातीच्या व्यक्तींसाठी खुल्या आहेत. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासह देशातील विविध क्षेत्रांतील नामवंतांनी ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांत शिक्षण घेतले आहे. ख्रिस्ती मिशनरींनी देशाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेले हे एक मोठे योगदान आहे.
ख्रिस्ती मिशनरी आपल्या संस्थांचा वापर छुप्या पद्धतीने, आर्थिक प्रलोभन दाखवून वा सक्तीने धर्मांतर करण्यासाठी करतात असा अनेकदा आरोप केला जातो. ख्रिस्ती शाळा-कॉलेजात शिकलेल्या, मिशनरींच्या इस्पितळात उपचार घेतलेल्या वा इतर मिशनरी संस्थांच्या सेवेचा लाभ घेतलेल्या अख्रिस्ती व्यक्तीच या आरोपात कितपत तथ्य आहे हे सांगू शकतील.
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वर्षे मिशनरींनी दुर्लक्षित ग्रामीण भागात शैक्षणिक, वैद्यकीय सेवा मुक्तपणे पुरविली. लाभार्थींच्या जाती-धर्माचा त्यांनी कधी विचार केला नाही. मिशनरी वृत्तीची सेवा हा वाक्प्रचार त्यांच्या या नि:स्वार्थी सेवेमुळेच रूढ झाला आहे. धार्मिक कार्य करतानाच धर्मप्रचाराच्या अनुषंगाने ख्रिस्ती मिशनरींनी गेल्या पाच शतकांच्या काळात भारताच्या विविध राज्यात साहित्य, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्र वगैरे क्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. यापैकी केवळ काही मिशनरींच्या कार्याचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.
त्यापैकी विल्यम केरी, पंडिता रमाबाई, रेव्ह. ना. वा. टिळक, बाबा पदमनजी, मदर तेरेसा आदींचे कार्य सर्वपरिचित आहे. ‘निरोप्या’कार आर्चबिशप हेन्री डोरिंगसारख्या मिशनरींचे कार्य मात्र आज विस्मृतीच्या छायेत गेले आहे. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करूनही कालौघात विस्मृतीत गेलेले असे अनेक मिशनरी आहेत.
भारतातील ख्रिस्ती धर्माचा इतिहास या धर्माच्या इतिहासाइतकाच म्हणजे दोन हजार वर्षांचा आहे. येशू ख्रिस्ताचा शिष्य असलेल्या संत थॉमसने भारतभूमीवर केरळ राज्यात ख्रिस्ताचे वचन सांगितले तेव्हापासून या देशात ख्रिस्ती धर्माची परंपरा आहे. ख्रिस्ती धर्म पाश्चियमात्य आहे असा बहुप्रचलित गैरसमज आहे. मध्ययुगीन काळात हिंदुस्थानात युरोपातून आलेल्या मिशनरींनी देशाच्या इतर राज्यात या धर्माचा प्रसार केला, त्यावर हा गैरसमज आधारित आहे.
ख्रिस्ताचा जन्म आशियातील इस्राएलमध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. त्याचे संपूर्ण जीवितकार्य इस्राएलच्या एका छोट्याशा परिसरात मर्यादित होते. त्यामुळे हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध आणि शीख धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्माचेही उगमस्थान आशिया खंडातीलच. ख्रिस्ताच्या अनुयायांनी ख्रिस्ती धर्म प्रथम रोममध्ये आणि नंतर इतर राष्ट्रात पसरविला.
भारतातील विविध राज्यांतील धर्मांतरित ख्रिस्ती लोकांनी धर्मांतरानंतरही आपलीमूळची भारतीय वा हिंदू संस्कृती बदललेली नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ख्रिस्ती स्त्रिया आजही नऊवारी वा सहावारी साड्या नेसतात. कुंकू लावतात आणि बांगड्या घालतात. पुरुषमंडळीही इतर बहुसंख्य पुरुषांप्रमाणेच पोशाख वापरतात. ख्रिस्ती धर्मीय व्यक्ती म्हणजे फाडफाड इंग्लीश बोलणारी, फ्रॉकमध्ये वा सुटाबुटात वावरणारी आणि मद्यपान करणारी व्यक्ती हा समज हिंदी चित्रपटात केलेल्या चित्रणामुळे रूढ झालेला आहे.
देशातील बहुतांश ख्रिस्ती समाजाने मात्र अजूनही आपल्या मूळ संस्कृतीची नाळ कायम राखली आहे. याचे कारण म्हणजे ख्रिस्ती धर्म आणि स्थानिक संस्कृती परस्परविरोधी असू शकत नाही, अशी मिशनरींनी घेतलेली ठाम भूमिका होय. रॉबर्ट डी नोबिली आदींसारख्या मिशनरींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्मसंस्थेत वादळ निर्माण झाले होते. मात्र धर्मसंस्थेने हे सत्य नंतर मान्य केले.
ख्रिस्ती धर्माच्या या सांस्कृतीकरणाच्या (इनकल्चरेशन) तत्त्वामुळेच देशातील ख्रिस्ती समाज आपली मातृभाषा आणि इतर संस्कृतीच्या इतर अंगांशी इमान राखून आहे आणि गेल्या दोन-तीन शतकांपासून ही परंपरा चालू आहे. त्यामुळेच अनेक पिढ्यांपासून ख्रिस्ती असलेली केरळ, तामिळनाडूमधील तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आणि मूळची गोमंतकीय असलेली अनेक बार्देस्कर ख्रिस्ती कुटुंबे पूर्णत: शाकाहारी आहेत असे आढळते. ही कुटुंबे मूळच्या ज्या उच्च जातींतून ख्रिस्ती धर्मात आली त्या जातींमध्ये मांसाहार वर्ज्य असे. धर्मांतरानंतर कित्येक दशके त्यांनी आपल्या संस्कृतीत बदल केलेला नाही हे विशेष.
`‘ख्रिस्त महाराष्ट्रात जन्मला असता तर त्यानेही खास मराठमोळ्या पद्धतीने पागोटे वापरले असते. मराठी माणसाप्रमाणे तो जगला असता’, असे ‘निरोप्या’चे तेव्हाचे संपादक फादर प्रभुधर यांनी आपल्या एका संपादकीयात लिहिले होते ते याच अर्थाने.
ख्रिस्ती समाजाची अशी आचारप्रवृत्ती निर्माण करण्यात मिशनरींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मूळचे युरोपियन असले तरी या मिशनरींनी नवधर्मांतरित समाजात स्थानिक संस्कृतीविषयी दुस्वास पेरला नाही. याउलट स्थानिक भाषावाङ्मय वा इतर संस्कृती क्षेत्रात भर घालून या स्थानिक संस्कृतीची जोपासनाच केली. या प्रकल्पासाठी संशोधन करताना तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या अनेक मिशनरींच्या कार्याची ओळख झाली. या सर्वांच्याच कार्याची ओळख ('ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या छोट्याशा पुस्तकातून करून देणे शक्य नव्हते.'
('ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' (२००३) कामिल पारखे या पुस्तकाची प्रस्तावना_)



                                                            हरेगावचे हे भव्य संत तेरेजा चर्च