Showing posts with label Abhay Vaidya. Show all posts
Showing posts with label Abhay Vaidya. Show all posts

Friday, February 11, 2022

अण्णा हजारे आणि मी


फोटोत अण्णा आणि मी ... साल १९९१ च्या आसपास ,, फोटोक्रेडीट अभय वैद्य

 कोणे एकेकाळी अण्णांशी माझी खूप घसरट होती. अण्णा पुण्यात येत असल्याचे किंवा आल्याचे इतर पत्रकारांपेक्षा मला आधीच कळायचे आणि मग मी त्यांना नारायण पेठेतल्या हिंदी राष्ट्रभाषा भवनात भेटायला जायचो.

राष्ट्रभाषा मंडळाचे पदाधिकारी असलेले मोहन धारिया ( हेही अण्णा म्हणून ओळखले जायचे ) त्यावेळी हजारे यांचे जवळचे म्हणून पुण्यात येथे ते त्यावेळी राहायचे.
लक्ष्मी रोडवरच्या सुगावा प्रकाशनाकडे जाताना नारायण पेठेतल्या मोदी गणपतीपाशी असलेल्या या राष्ट्रभाषा भवनाकडे आजही माझी नजर हमखास जाते याचे हे कारण.
पुण्यातल्या मराठी दैनिकांतल्या बातमीदारांना त्याकाळात अण्णांना भेटण्यास मुळी इंटरेस्टही नसायचा.
पुण्यात डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोर मंथली कॉट बेसिसवर इंडियन एक्सप्रेसच्या अव्हर्तीन्हो मिरांडा, विश्वास कोठारी आणि विश्वनाथ हिरेमठ वगैरे सड्याफटिंग बातमीदारांसह मी राहायचो. प्रिया लॉजच्या त्या पत्त्यावर अण्णा मला पोस्टाने निळ्या आंतरदेशीय पत्राने बातम्या पाठवायाचे . ती पत्रे आजही माझ्याकडे आहेत.
गोव्यातले नवहिंद टाइम्स सोडल्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स मार्गे पुण्यातल्या इंडियन एक्स्प्रेसला मी १९८९ ला रुजू झालो होतो.
एके दिवशी कळाले कि पुणे अहमदनगर हमरस्त्यावर पारनेर फाट्याजवळ वाडेगव्हाण येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोलीस गोळीबारात पाचजण ठार झाले होते. अहमदनगरला अण्णा हजारे यांचे त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राणांतिक उपोषण चालू होते. अण्णांचे हे पहिलेच आमरण उपोषण.
एक्सप्रेस समूहाच्या ऑफिस वाहनाने लोकसत्ताचे बातमीदार सुनिल कडुस्कर आणि फोटोग्राफरसह मी लगेच वाडेगव्हाण येथे गेलो. पुण्यात ऑफिसात परतेपर्यंत अण्णांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेतले होते असे कळाले.
अण्णा हजारे या व्यक्तिमत्वाशी माझा यावेळी असा पहिल्यांदाच संबंध आला.
त्यानंतर सवडीने एकदा राळेगण सिद्धीला (त्यावेळी शिंदी ) जाऊन आलो. लवकरच राळेणसिद्धी हा माझ्या वहिवाटीचा रस्ता बनला.
पत्रकाराने कुठल्याही व्यक्तिमत्वाशी, घटनेशी, चळवळीशी स्वतःस गुंतून घेऊ नये त्यामुळे त्यांच्या निःपक्षीपणात तडजोड होऊ शकतो, हा पत्रकारितेतील एक सर्वमान्य, बेसिक नियम आहे. माझ्या स्वतःच्या गोव्यातल्या कॉलेज जीवनातल्या पार्श्वभूमीमुळे मात्र मला या नियमाचे पालन करता येणे शक्य झाले नाही.
गोव्यात मिरामारच्या धेम्पे कॉलेजात मी आर्ट सर्कलचा संपादक होतो, स्टुडंट्स युनियनच्या निवडणुका मी लढवल्या होत्या. नवहिंद टाइम्सचा रिपोर्टर असताना मी गोवा युनियन ऑफ जर्नालीस्टचा (GUJ) सरचिटणीस होतो. वृत्तपत्र उद्योगातील लेबर युनियन लीडर म्हणून गोव्यात, औरंगाबादला आणि पुण्यातही दशकभर सक्रिय काम केलेले, त्यावेळीं जॉर्ज फर्नांडिस आमचे दैवत असायचे. गोव्याला फिलॉसॉफी असोसिएशनचा सरचिटणीस म्हणून अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या श्याम मानव यांचे व्याख्यान मी पणजीला आयोजित केले होते.
असे चळवळ्ये व्यक्तीमत्व असल्याने मी स्वतःला असे अलिप्त ठेवणे शक्य नव्हते.
आणि शेवटी व्हायचे तेच झाले.
राळेगणच्या माझ्या भेटी वाढत गेल्या, एकदा तर मी तेथे दोनतीन दिवस मुक्काम केला. त्यावेळी अण्णांचे चरित्र आणि कार्य यावर असलेले एक पुस्तक त्यांच्या कार्यालयात दिसले. त्यांच्पा सचिवाने पुस्तकाची किंमत मला सांगितली. काही क्षणातच अण्णांनी ते पुस्तक माझ्या शबनम बॅगेत हळूच टाकून दिले होते.
अण्णांची ती कृती मी पाहिली आणि ते पक्के मिडिया सॅव्ही आहेत हे त्याच वेळी माझ्या लक्षात आले.
नंतर त्यांच्या पुढील प्रवासात अगदी काही वर्षांपूर्वीच्या अरविंद केजरीवाल, किरण बेदी प्रभुतींसह झालेल्या दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनात अण्णांची ती कृती मला वेळोवेळी आठवायची.
त्या काळातला टाइम्स ऑफ इंडियाच्या अभय वैद्यने अण्णांबरोबरचा माझा टिपलेला हा कृष्णधवल फोटो. . नरेन करुणाकरन या एक्सप्रेसच्या बातमीदाराने राळेगण येथेच माझा अण्णांबरोबर काढलेला दुसरा रंगीत फोटो आता सापडत नाही. आणि नरेन याचा अण्णांबरोबर यावेळी मी काढलेला रंगीत फोटो मात्र माझ्याकडे आहे !
त्याकाळात अण्णा हजारे यांना राष्ट्रीय पातळीवर आणण्यास इंडियन एक्सप्रेसचे बातमीदार म्हणून नरेन करुणाकरन आणि मी , टाइम्स ऑफ इंडियाचे अभय वैद्य आणि इंडिपेंडेंटचे आनंद आगाशे यांचा हातभार लागला. हे आम्ही सर्व पत्रकार इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकांतले. साहजिकच आमच्या बातम्यांमुळे पहिल्यांदाच अण्णा राज्य आणि राष्ट्र पातळीवर पोहोचले...
अहमदनगर जिल्ह्यातील मॉफुसील बातमीदार अण्णा हजारेंकडे ढुंकूनही पाहत नसत, पुण्या-मुंबईच्या मुख्यालयातून विचारणा झाल्यास वा बाहेरचे पत्रकार अण्णांच्या बातम्या देऊ लागल्यास मगच या बातम्या त्यांच्याकडून यायच्या.
हल्ली अनेकदा गोव्यात सुट्टीला आणि या दिवसांत निवडणुकीसाठी पुण्यातले मित्र आणि पत्रकार मंडळी जातात तेव्हा मला हमखास काही टिप्स मागतात. नव्वदच्या दशकात राळेगणला जाणारे पत्रकार मला अशीच वाट पुसत असत.
१९९३ साली संजय सोनवणी यांनी `उत्तुंग' हे माझे व्यक्तिचित्रसंग्रह प्रसिध्द केले त्यात अण्णा हजारे यांचेही चरित्र होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचेही या पुस्तकात चरित्र होते. बाबा आढाव, शंतनुराव किर्लोस्कर , मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई वगैरेंची चरित्रे होती.
मी त्यावेळी तिशी पार केलेली नव्हती, पत्रकार असलो तरी पटकन भारावले जाण्याचा तो युवा काळ होता. भ्रमनिरास त्यानंतर खूप कालावधीनंतर होत गेला..
गोव्यात १९८३ साली कॉमनवेल्थ कॉन्फरनसच्या निमित्ताने ३९ राष्ट्रप्रमुख अगदी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ऑस्ट्रियाचे पंतप्रधान बॉब हॉक, झिम्बाब्वे पंतप्रधान रॉबर्ट मुगाबेसह आले होते. गोव्यात वाहतूक उपाधिक्षक असलेल्या किरण बेदी यांच्याशी त्यावेळी क्राईम रिपोर्टर असलेल्या माझा नियमितपणे संबंध यायचा. किरण बेदींबरोबर वाहतूक पोलिसांच्या नव्याकोऱ्या जिप्सी जीपमध्ये वॉकीटॉकी यंत्रासह रेकी करण्यासाठी किरण बेदी निघायच्या त्यावेळी दाबोळी विमानतळ ते आग्वाद फोर्ट या प्रवासात मी त्यांच्या बरोबर असायचो. बेदी यांच्याविषयी मला तेव्हा खरंच काहीच माहिती नव्हती, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी भारावून जाण्याचा सवालच नव्हता.
`बदलती पत्रकारिता' हे माझे पुस्तक सुगावा प्रकाशनाने २०१८ साली प्रसिध्द केले त्यात मी अण्णा हजारेंवर एक प्रकरण लिहिले आहे. याच पुस्तकात किरण बेदी यांच्यावर सुध्दा वेगळे प्रकरण आहे.
गेली अनेक वर्षे किरण बेदी यांच्याशी माझा काहीही संपर्क नाही.. पुण्यात असूनही अण्णा हजारे यांच्याशी माझा गेली कित्येक वर्षे काहीही संपर्क नाही. बेदी आणि अण्णांच्या विस्मृतीत मी केव्हाच गेलेलो असणार ..
राष्ट्रीय पातळीवरच्या बातम्यांत किरण बेदी आणि अण्णा हजारे अजूनमधून झळकतात तेव्हा त्या बातम्या विस्तृतपणे वाचण्यात मला अजिबात इंटरेस्ट नसतो.
------

Wednesday, January 20, 2021

`टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. पत्रकारितेतील माझा मित्र अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.
टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा. अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत जवळजवळ मी एक तप घालवलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ? आणि त्या बातमीचा इंट्रो ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002, 10.37 PM IST
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या केंदळ -वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे. मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
वजनाने नेहेमीपेक्षा अधिक जाडजुड असलेला डिसेंबरच्या नाताळ विशेषांकानंतर आता प्रसिद्ध झालेला निरोप्या' जानेवारी २०२१ चा अंक पाहायला हवा. रंगीत जाहिरातीची तब्बल बारा पाने असलेला एकुण ४४ पानांचा अंक पाहिला तर या मासिकाला वाचकांपासून मिळणाऱ्या प्रतिसादासंबंधी ठोकताळे बांधणे शक्य आहे.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापकशांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनाने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे निधन १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
त्यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी बोलतो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
( निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. त्यावेळी पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा व्यवसाय असेल याची कल्पनाही केली नव्हती. )