Showing posts with label Henry Doering. Show all posts
Showing posts with label Henry Doering. Show all posts

Thursday, December 21, 2023

 मोगलाई आणि अमरावती 

                                       

आम्ही मोगलाईतले म्हणजे मराठवाड्यातले. माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर येथे गेले तरी नाळ मात्र कायम गंगेपलिकडे असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या आजोळशी राहिली. या मोगलाईतली भामाठाण, पैठण, नागमठाण, वरखेड, बोरसर, लासूर, महालगाव वैजापूर, गंगापूर अशी अनेक नावे बाई-दादांच्या अन आजोळच्या लोंकांच्या बोलण्यातून कायम कानावर पडायची. गंमत म्हणजे वरीलपैकी बहुतेक ठिकाणी मी कधीही गेलेलो नाही वा त्यांचे भौगोलिक स्थान मला आजही माहित नाही.
अधूनमधून सणावाराला माळीघोगरगाव येथून पायपीट करत आमचे आजोबा म्हणजे गोविंदराव शिनगारे टिळकनगर श्रीरामपूरला स्थायिक झालेल्या मार्थाबाई आणि अनुसयाबाई या आपल्या दोन्ही लेकुरवाळ्या लेकींसाठी पुरणपोळ्यांचे आणि इतर खाद्यपदार्थांचे टोपले घेऊन दुपारी बारापर्यंत आमच्या घरी पोहोचायचे. बहुधा भल्या सकाळी गरमागरम पुरणपोळ्याचे टोपले फेट्यावर ठेवून घेऊन ते या पायी प्रवासाला निघत असत. या सगळ्या ऐकिव गोष्टी.
याचे कारण म्हणजे मी जन्मायच्या खूप वर्षे आधीच आजोबा अचानक गेले. एका सकाळी शेतमळ्यात घराबाहेर झोपलेल्या आजोबांचे शरीर काळेनिळे पडलेले दिसले होते, बहुधा विषारी सर्पदंशाने. आजीचे - आईची आई - जिच्याबाबत कधी एक शब्द ऐकलेला आठवत नाही, तिचे तर आजतागायत नावसुद्धा माहित नाही.
दहापंधरा वर्षांपूर्वी बाई असताना काहीही निमित्त नसताना मुद्दामच तिच्याबरोबर तिच्या माहेरी गेलो होतो. तेव्हा शांत्वनमामांच्या थोरल्या मुलाला माझ्या मामेभाऊ शाहूला सहज `आपले शेत कुठपर्यंत आहे ? ' असे विचारले तेव्हा त्याने दोन दिशेला हात उभारुन लांबवरपर्यंतची शेतीची जागा दाखवली होती. ``बहुधा साठ-पासष्ट एकरांपर्यंत असावी,'' असे तो म्हणाला होता.
विशेष म्हणजे ही हाडुळकीची शेती नव्हती. तेव्हा त्यावेळी नाशिकजवळच्या नांदूर-मधमेश्वर धरणाचे पाणी नुकतेच घोगरगावाला पोहोचले होते. तशी शेतात विहीर होती, गरजेनुसार मोटेने पिकांना पाणी दिले जात होते.
विहिरीतून चार बैलांच्या मदतीने मोटेने विहिरीतून पाणी काढून या शेतातल्या भाजीपाल्यांना, वांगे, काकडी वगैरेंना पाणी दिले जाताना मी पाहिले आहे. आता धरणाच्या पाण्याने शेती पूर्णतः बागायती झाल्याने सालातून तीनदा पीक घेणे आज शक्य झाले आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना शाहूभाऊने आमच्या नजरेसमोर जमीनीतून उपटलेला डहाळ, गव्हाच्या कोवळ्या लोंब्या असे कायकाय दिले होते.
बाईची ही तिच्या माहेरची शेवटची गाठभेट ठरली. त्यानंतर घोगरगावातल्या त्या शेतमळ्यात आजपर्यंत मी पाय ठेवलेला नाही.
आता नक्की संदर्भ आठवत नाही मात्र आमच्या आईवडलांच्या संभाषणात अनेकदा येणारा एक शब्द म्हणजे `मोगलाई' हा होता. मोगलाई हा शब्द ऐकून तेव्हा शालेय वयातला मी अचंबित व्हायचो. (तिथल्या `राजवाडा' या शब्दाचा नेमका अर्थ मला तसा फार लवकर समजला होता).
`आम्ही मोगलाईतले', `मोगलाईतला अमुकअमुक परिसर' असे शब्दप्रयोग व्हायचे. ''ही काय मोगलाई हाई काय?'', ''मोगलाई लागून गेली काय?'' असे वाक्प्रचार कानावर पडायचे.
दिल्लीतले मुघल साम्राज्य आणि औरंगाबाद जिल्ह्यातली मोगलाई ही नक्की काय भानगड आहे, असा मला प्रश्न पडायचा. नंतरनंतर कळायला लागले कि ही मोगलाई म्हणजे हैदराबाद निजामाच्या अमलाखालील मराठवाडा वगैरे प्रदेश म्हणजे मोगलाईतील भाग. अहमदनगर जिल्ह्यातल्या सीमेवरची गोदावरी म्हणजे गंगा ओलांडली कि हा मोगलाईचा भाग सुरु व्हायचा.
घोगरगावच्या फादर गुरियन जाकियरबाबांचे मी चरित्र लिहायला घेतले तेव्हा अगदी पहिल्यांदा 'मोगलाई' हा शब्द त्याच्या समर्पक अर्थासह तोही इंग्रजी पुस्तकांत मी पहिल्यांदा वाचला आणि या शब्दाविषयीच्या माझ्या कुतूहलाला अखेरीस पुर्णविराम मिळाला.
मी वाचलेल्या कुठल्याही मराठी पुस्तकांत `मोगलाई' या शब्द या अर्थाने वापरलेला माझ्या वाचनात आलेला नाही. मी वाचलेले बहुतेक लेखक पुण्यामुंबईतले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले असावेत यामुळेही हे असेल कदाचित.
दुसरा नेहेमी कानावर पडणारा शब्द म्हणजे अमरावती आणि अमरावतीचे बिशप. त्याकाळात औरंगाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीपलीकडचा परिसर अमरावती डायोसिसमध्ये म्हणजे धर्मप्रांतात होता. औरंगाबाद धर्मप्रांताची निर्मिती खूप अलिकडची, १९७७ सालची, पण तोपर्यंत मी माझे घर आणि श्रीरामपूर सोडून गोव्यात फादर होण्यासाठी गेलो होतो
ऐंशीच्या दशकाआधी खूप, खूप वर्षांपुर्वी अखंड नागपूर धर्मप्रांत होता. नागपूरचे फ्रान्सलियन बिशप यांच्या अखत्यारीतला. फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु विशाखापट्टणम येथून मिशनकार्य करण्यासाठी नागपूर आणि वऱ्हाडात पोहोचले होते आणि तेथून ते मोगलाईचे अखेरचे टोक असलेले औरंगाबाद जिल्ह्यात माळीघॊगरगाव येथे १८९२ साली काम करण्यासाठी पोहोचले होते. ही त्यांची मिशनकामाची सीमाहद्द कारण तेथून पुढे अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईत जर्मन असलेल्या जेसुईट धर्मगुरुंची हद्द.
युरोपातल्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दर्यावर्दी देशांत आपापसांत झगडे नको म्हणून मध्ययुगात पोपमहाशयांनी संपूर्ण जगाची चक्क दोन भागांत वाटणी केली होती ! एक-दुसऱ्यांच्या हद्दीत आक्रमण टाळण्यासाठी.
मोगलाईतल्या गंगेपलीकडे अहमदनगर, पुण्या-मुंबईत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे जर्मन, स्विस, ऑस्ट्रेलियन धर्मगुरू कार्यरत होते त्याप्रमाणे विदर्भात, अमरावती आणि मराठवाड्यात फ्रान्समधल्या फ्रान्सलियन संस्थेचे धर्मगुरू कार्यरत होते. या संस्थेच्या कागदपत्रांतून आणि रोजनिशीतून विसाव्या शतकातील येथील ख्रिस्ती मिशन कामाबाबत, शैक्षणिक संस्थाबाबत माहिती मिळते.
फ्रेंच फ्रान्सलियन धर्मगुरु फ्रान्सिस मॉगे ( Francis Moget) यांनी Vagabonds for God : A story of the Catholic Church in India (1846-1907) प्रकाशनवर्ष १९९० आणि Shepherds for Christ : A story of the Catholic Church in Central India 1907-1960) प्रकाशनवर्ष १९९४ हे दोन ग्रंथ विविध संदर्भ आणि रोजनिशींच्या आधारे लिहिलेले आहेत.
सामाजिक आणि आर्थिक जीवन अभ्यासण्यासाठी अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज किती महत्त्वाचा आहे हे सांगायलाच नको. याच दोन पुस्तकांच्या आधारावर मी स्वतः ``घोगरगावचे जाकियरबाबा : मराठवाडा कॅथोलिक धर्मप्रांताचा इतिहास' हे पुस्तक मराठी आणि इंग्रजीत लिहिले आहे.
पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुध्दातसुद्धा तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतातल्या सर्व शत्रुराष्ट्रातील नागरिकांना म्हणजे जर्मन जेसुईट धर्मगुरूंना तुरुंगात वा छावणीत टाकले होते. अशा कठीण आणि युद्धस्थसमयी मोगलाई, अमरावती आणि नागपूर येथील फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु फादर गुरियन जाकियर आणि मेरी बेर्जे पुण्यातल्या आणि इतर जर्मन जेसुइट धर्मगुरूंच्या मदतीला धावले आणि येथील चर्चचे काम पाहिले.
यापैकी फादर बेर्जे यांनी १९१७ साली जन्मलेल्या माझ्या वडलांचा माळीघोगरगाव येथे बाप्तिस्मा केला होता. बाप्तिस्मा सर्टिफिकेटवर फादर बर्जे यांचे आणि गॉडफादरचेही नाव आहे. आपल्याकडे लग्नात नवरीला उचलून मांडवात आणण्यासाठी नवरीच्या मामाची - खऱ्या किंवा मानलेल्या - मामाची गरज असते तसेच बाप्तिस्मा करताना गॉडफादर ( आणि कधीकधी गॉडमदरसुद्धा) पाहिजेच.
पहिल्या महायुद्धात जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरिक असलेले पुण्याचे बिशप हेन्री डोरींग रोममध्येच अडकल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नागपूरचे बिशप फ्रान्सिस कॉपेल बैलगाडीने प्रवास करत मजल दरमजल करत पुण्याला, खडकी, संगमनेर आणि राहाता येथे तीन वेळेस म्हणजे १९१६, १९१७ आणि १९१९ला आले होते !
अन याची परतफेड म्हणून महायुद्ध संपल्यानंतर १९२६ला जपानमधील हिरोशिमातून भारतात परतलेल्या पुण्याचे आर्चबिशप हेन्री डोरींग हे ८ जानेवारी १९३३ रोजी मोगलाईतल्या माळीघोगरगावला मुलांमुलींना कन्फर्मेशन सांक्रामेंत देण्यासाठी पोहोचले होते. कारण नागपूरचे बिशप कॉपेल त्यावेळी आजारी होते.
कॅथोलिक लोकांच्या जीवनात धर्मप्रांत आणि बिशप यांचे एक अतूट नाते असते कारण आयुष्यात किमान एकदा तरी भाविक लोक काही क्षण बिशपांच्या अगदी जवळ येत असतात. याचे कारण म्हणजे सप्त स्नानसंस्कारांपैकी एक असलेल्या दृढीकरण किंवा confirmation हे सांक्रामेंत केवळ बिशपमहोदयच देऊ शकतात. बाप्तिस्मा, लग्नविधी, अंत्यसंस्कार वगैरे सांक्रामेंतासाठी कुठलाही दिक्षित धर्मगुरु पौराहित्य करू शकतो.
इतर धर्माच्या तुलनेत ख्रिस्ती धर्मात सश्रद्ध लोकांच्या जीवनात धर्मगुरूंचे अधिक महत्त्वाचे स्थान असते. विशेष महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ती धर्मात कुणाही व्यक्तीला- हो कुणालाही - धर्मगुरु होता येते, हे पद किंवा अधिकार विशिष्ट समाजघटकाचे नसतात. आता माझेच उदाहरण आहे. कधीकाळी मीसुध्दा गोव्यात फादर होण्यासाठी गेलो नव्हतो का?
तर एकेकाळी अमरावती धर्मप्रांत खूप महत्त्वाचा होता कारण या हद्दीत ख्रिस्ती लोकसंख्या भरपूर होती, या भागात अनेक ख्रिस्ती मंदिरे होती. माझ्या आजोळी माळीघोगरगाव येथे 1927 साली गॉथिक वास्तू शैलीत बांधलेले भव्य आणि सुंदर चर्च आहे. चर्चचे नाव आहे ख्रिस्त राजा मंदिर.... Church of Christ the King... आजही अशाप्रकारचे भव्य आणि सुंदर बांधकाम नवलाईची बाब ठरते. या बांधकामासाठी नेवाशाहून खास काळे पाषाण मागवण्यात आले होते.
या भागातील ख्रिस्ती लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची अनेक सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे आहेत.
तर सांगायचा मुद्दा असा कि आम्ही जसे मोगलाईतले तसेच एकेकाळच्या अमरावती धर्मप्रांतातले सुद्धा .
मागच्या आठवड्यात अमरावती येथील बिशपांचे कॅथेड्रल किंवा आसनपीठ (कॅथेड्रॉ म्हणजे आसन, seat ) असलेल्या चर्चमध्ये दुपारी पाचच्या दरम्यान चर्चबेलचा घंटानाद झाला.
त्याचवेळेस व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकामध्येसुद्धा घंटानाद झाला होता.
अमरावती डायोसिसच्या नव्या बिशपांची पोप फ्रान्सिस यांनी नेमणूक केली हे जाहीर करण्यासाठी हा घंटानाद होता.
अमरावतीच्या नव्या बिशपांच्या नेमणुकीची बातमी इथेच फेसबुकवर लगेचच पाचदहा मिनिटांत मला कळाली आणि अमरावतीशी असलेल्या माझ्या खूप जुन्या नातेसंबंधांना उजाळा मिळाला.
अमरावती धर्मप्रांताचे हे नवे बिशप आहेत पुणे धर्मप्रांताचे आताचे व्हिकर जनरल (धर्मसत्तेत पदश्रेणीत बिशपानंतर दुसऱ्या क्रमांकाचे) फादर मॅल्कम सिक्वेरा.
पुढच्या महिन्यात प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारीला, अमरावतीचे नवे बिशप म्हणून त्यांचा दीक्षाविधी होईल.

Camil Parkhe

Wednesday, January 20, 2021

`टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. पत्रकारितेतील माझा मित्र अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.
टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा. अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत जवळजवळ मी एक तप घालवलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ? आणि त्या बातमीचा इंट्रो ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002, 10.37 PM IST
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या केंदळ -वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे. मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
वजनाने नेहेमीपेक्षा अधिक जाडजुड असलेला डिसेंबरच्या नाताळ विशेषांकानंतर आता प्रसिद्ध झालेला निरोप्या' जानेवारी २०२१ चा अंक पाहायला हवा. रंगीत जाहिरातीची तब्बल बारा पाने असलेला एकुण ४४ पानांचा अंक पाहिला तर या मासिकाला वाचकांपासून मिळणाऱ्या प्रतिसादासंबंधी ठोकताळे बांधणे शक्य आहे.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापकशांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनाने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे निधन १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
त्यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी बोलतो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
( निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. त्यावेळी पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा व्यवसाय असेल याची कल्पनाही केली नव्हती. )