Showing posts with label Narayan Sheshadri. Show all posts
Showing posts with label Narayan Sheshadri. Show all posts

Saturday, January 6, 2024

जॉन आणि मार्गारेट विल्सन :  सावित्रीबाई,जोतिबांचे शिक्षणक्षेत्रातील पुर्वसुरी


एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरु झाला, त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींचे भारतात आगमन झाले. या मिशनरींनी देशाच्या विविध भागांत समाजातील सर्व घटकांसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात नव्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुंबईत, कोकणात आणि पुण्यात अमेरिकन मराठी मिशनच्या आणि स्कॉटिश मिशनच्या मिशनरींनी पहिल्यांदाच मुलांमुलींसाठी शाळा सुरु केले आणि देशात नवे युग सुरु झाले. तोपर्यंत अशाप्रकारे शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली गेलेली नव्हती. स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन आणि त्यांच्या पत्नी मार्गारेट विल्सन यांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे योगदान केले आहे.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अमेरीकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाई त्यांचे नाव हमखास येते. त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन, डॉ. जॉन विल्सन, जेम्स मिचेल, मिसेस मार्गारेट शॉ मिचेल, जॉन मरे मिचेल आणि मिसेस मारिया मॅकेन्झी मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात.
स्कॉटिश मिशनरी सोसायटीने १८२२ साली भारताकडे लक्ष वळवले. त्यावेळी संपूर्ण पश्चिम भारत फक्तसहा मिशनरी होते असे त्या सालच्या सोसायटीच्या अहवालात म्हटले आहे. या सोसायटीचा पहिला मिशनरी डोनाल्ड मिचेल यांचे भारतात १९२३ च्या जानेवारीत आगमन झाले. त्यापूर्वी डोनाल्ड मिचेल हे ईस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते. त्यानंतर मिचेल यांचे वर्षभरातच- दहा महिन्यांतच - निधन झाले. मात्र त्यांच्या निधनापूर्वी इतर चार जण भारतात त्यांना सामील झाले होते. क्रॉफर्ड, कूपर, जेम्स मिचेल आणि जॉन स्टिव्हन्सन ही त्यांची नावे. ब्रिटिशांनी पेशवाई सत्ता संपवल्यानंतरही भारतात आलेल्या ख्रिस्ती मिशनरींना पुणे शहरात आणि मध्य महाराष्ट्रात येण्यास काही काळ पूर्ण मज्जाव होता.
`ब्राह्मणांच्या पुणे शहरात स्थायिक होण्याचे स्कॉटिश मिशनचा इरादा होता. स्कॉटिश मिशनरी भारतात पोहोचले तोपर्यंत मुंबईतील ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा मिशनरींबद्दलचा आकस मावळला होता. मात्र तरीसुद्धा स्कॉटिश मिशनला पुण्यात मिशनकेंद्र उघडण्यास परवानगी देण्यास या सरकारचा ठाम विरोध होता. या शहरात ख्रिस्ती मिशनकेंद्र उघडले तर पुण्यातल्या ब्राह्मणांच्या प्रचंड प्रक्षोपाला तोंड द्यावे लागेल असे कंपनी सरकारला वाटत होते,’’ असे जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी `सावलीचा शोध’ या पुस्तकात स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गारेट यांच्या शिक्षणकार्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ‘’स्कॉटिश मिशनने कोकणात मिशनकार्य सुरु केले होते. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली.
जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर क्रॉफर्ड हे स्कॉटिश मिशनरीही तेथे त्याच्या कामात सहभागी झाले. बाणकोट आणि हर्णै येथे स्कॉटिश मिशनचे कार्य चालू होते. सन १८२९ च्या दरम्यान या भागातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या.
जॉन आणि मार्गारेट विल्सन यांचे १८२८ ला स्कॉटलंडहून मुंबईत आगमन झाले. त्यावेळी त्यांचा नुकताच विवाह झाला होता. कोकणातील आपला मराठीचा अभ्यास संपवून जॉन आणि मार्गारेट विल्सन १८२९च्या नोव्हेंबरात मुंबईत परतले.
दक्षिण कोकणात लोकसंख्या खूप विरळ असल्याने आणि तिथे जाण्यासाठी प्रवासाची सुलभ साधने नसल्याने स्कॉटिश मिशनरींनी १८२७ साली मुंबईत आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटिश मिशनरींनी आपले कार्य फक्त मुंबई आणि पुण्यात चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोकणातील मिशनकार्य बंद करण्यात आले.
``शाळेत शिकायला एकही मुलगी येणार नाही’ असे मुंबईत आलेल्या स्कॉटिश मिशनरींना सांगण्यात आले होते. मात्र या मिशनरींनी या सांगण्याकडे साफ डे दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणून १३ मार्च १८२४ रोजी मुलांबरोबरच अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागल्या आणि त्यामुळे मुलींसाठी एक वेगळा वर्ग सुरु करण्याची गरज निर्माण झाली.
सन १८२७ पर्यंत स्कॉटिश मिशनने ८० शाळा सुरु केलेल्या होत्या आणि त्यांत हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत होते. ब्राह्मणांपासून इतर सर्व जातींचे मुलेमुली या शाळांत शिकत होते. केवळ चार स्कॉटिश मिशनरी दूर अंतरावर पसरलेल्या ८० शाळा चालवत होते आणि या सर्व शाळांवर लक्ष ठेवणे कसे शक्य होते.
त्याशिवाय ख्रिस्ती धर्मप्रसार हा या मिशनरींचे मुख्य ध्येय होते आणि त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. स्कॉटिश मिशनरी सोसायटीने मुंबईत आपले कार्य सुरु केले होते तोपर्यंत मुंबईत एकही ख्रिस्ती धर्मांतर नव्हते. लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माविषयी अत्यंत प्रतिकूल भावना होत्या. ``स्थानिक लोक बाप्तिस्मा कधी घेणार, धर्मांतर होते का ? असा प्रश्न या मिशनरींना वारंवार त्यांच्या मायदेशातील लोक विचारात होते.
जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हे पुराण सांगणारे ब्राह्मण ख्रिस्ती झाले होते. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिक यांनीं लढवला होता.
``महाराष्ट्रात अमेरिकन मिशन, स्कॉटिश मिशन, लंडन मिशनरी सोसायटी, चर्च मिशनरी सोसायटी इत्यादी अनेक संस्था ख्रिस्ती धर्मप्रचाराचे कार्य करीत होत्या. या सर्व संस्थांचे कार्यकतें एकोप्याने व परस्पर सहकार्याने काम करीत होते. त्यासाठी बॉम्बे मिशनरी युनियन, मुंबई बायबल सोसायटी, बॉम्बे ट्रॅक्ट अॅन्ड बुक सोसायटी, मुंबई टेंपरन्स सोसायटी इत्यादी व्यापक संस्था स्थापन झाल्या होत्या. स्कॉटिश मिशनचे धर्मोपदेशक इ. स. १८२२ मध्ये मुंबई इलाख्यात प्रथम आले. त्यानंतर एकामागून एक जे उपदेशक आले, त्यांत जेम्स मिचेल, जॉन स्टिव्हन्सन, रॉबर्ट नेस्बिट, जॉन विल्सन, मरे मिचेल हे प्रमुख होते. सर्व धर्मोपदेशकांच्या कार्यपद्धतीत एकसूत्रीपणा होता. ज्या प्रदेशात प्रचार करायचा, त्यातील लोकांची भाषा आत्मसात करणे अत्यावश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणून येथे आल्यावर अल्पावकाशातच ते मराठी शिकले. इतर कार्यकर्त्यांना ती शिकणे सोपे जावे म्हणून त्यांनी मराठीचे कोश व व्याकरणे रचली. स्टिव्हन्सन, विल्सन, मिचेल यांना अनेक देशी भाषा अवगत होत्या. हिंदूचे धर्मग्रंथ पाहता यावेत म्हणून त्यांनी संस्कृतचाही अभ्यास केला,’’ असे ज्येष्ठ विचारवंत गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे. .
विल्सन यांची पत्नी मार्गारेट या कोकणात हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागल्या होत्या. हेच काम मुंबईत सुरु करण्याचे त्यांनी ठरविले. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या.

१८२९च्या सप्टेंबरात विल्सन दाम्पत्य मुंबईत आले आणि अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये त्यांनी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट शिकवत असत, या शाळेत पहिल्या तीन महिन्यातच ५३ मुली शाळेत दाखल झाल्या होत्या. मार्गारेट विल्सन यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या.
मार्गारेट विल्सन यांनी २९ मार्च १८३२ रोजी मुंबईत अँब्रोळी मिशन हाऊसमध्ये अँब्रोळी इंग्लिश स्कुल; या नावाने एक इंग्रजी शाळा सुरु केली. या मुलींना शिक्षणाबरोबरच कपडेलत्ते आणि जेवणासाठी थोडीशी रक्कम दिली जाई. मुंबईत राहणाऱ्या अनेक महिलांनी या शाळेला आर्थिक मदत पुरवून आपला पाठिंबा व्यक्त केला,
ही शाळा सुरु झाल्यानंतर तीन वर्षातच यापैकी सात मुली मार्गारेट यांच्या देखरेखीखाली मिशन हाऊसमध्येच राहू लागल्या. भारतातल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्यावहिल्या मुलींच्या बोर्डिंगची ही सुरुवात होती.
या शाळेसाठी मार्गारेट दररोज पाच तास देत असत. त्याशिवाय त्या कुलाबा येथे युरोपियन पेन्शरांना भेट द्यायच्या, जॉन विल्सन त्यांच्या साहित्यविषयक कामांत मदत करीत आणि त्याशिवाय काही एतद्देशीय नोकरांना धार्मिक शिक्षण द्यायच्या.
मार्गारेट यांनी पुढील सहा महिन्यांत सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुस्लीम मुलीही होत्या. या सहांपैकी एक शाळा आजही सेंट कोलंबा हायस्कुल फॉर गर्ल्स या नावाने प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने मराठी माध्यम होते.
``स्कॉटिश मिशनरी सोसायटीने डॉ. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यांतून आणि कोकण, गोव्यातही मुलींच्या शाळा, मुलीसाठी वसतिगृहे चालू केली. १८३२ मध्ये मुंबई शहरात स्कॉटिश मिशनने चालविलेल्या पाच शाळा एकमेकींशी संलग्न करण्याचे काम मिसेस विल्सन यांनी केले. तेव्हा त्या शाळांत एकंदर १२६९ विद्यार्थी होते. त्यांपैकी १७६ मुली होत्या. १८३९ सालच्या वार्षिक अहवालातील माहितीनुसार स्कॉटिश मिशनने चालविलेल्या मुंबईतील सर्व शाळांतील मिळून एकंदर ५४७ मुली मराठी माध्यमातून शिकत होत्या. १८२६-१८२७ साली मिशन यांच्या सर्व शाळांत मिळून ३०० होत्या. त्यांची संख्या १८४९-१८५० साली २००० झाली. या मुलीना शाळांत येण्यासाठी पैसे द्यावे लागत. ‘’ असे प्रतिभा रानडे यांनी आपल्या ` स्त्रीप्रश्नांची चर्चा: एकोणिसावे शतक’ या पुस्तकात लिहिले आहे.
विल्सन यांनी २९ मार्च १८३२ रोजी अंब्रोळी इंग्लिश स्कुल सुरु केली. या शाळेची परिक्षा सार्वजनिक रीतीने होई, या शाळेला नंतर कॉलेज डिव्हिजन जोडण्यात आले. या शाळेत इंग्रजी वाचन, व्याकरण, गणित, भूमिती, भूगोल इतिहास बायबल हे विषय शिकवले जात असत.’’
नाजूक प्रकृतीच्या मार्गारेट विल्सन यांच्या आरोग्यावर विपरीत परिमाण झाला आणि काही दिवस आजारी पडल्यानंतर त्यांचे १९ एप्रिल १८३५ला मुंबईतच निधन झाले. मृत्युशय्येवर असताना मार्गारेट यांनी `शक्य असल्यास मुलींच्या शाळेचे कार्य त्यांच्यानंतरही चालू ठेवावे'' अशी कळकळीची विनंती जॉन विल्सन यांना केली. पत्नीच्या या विनंतीने हेलावून गेलेल्या विल्सन यांनी मार्गारेटच्या दोन्ही बहिणींना या कामासाठी भारतात येण्याची विनंती केली.
मार्गारेट यांच्या या दोन्ही बहिणी रूढार्थाने मिशनरी नव्हत्या तरीही त्यांनी विल्सन यांच्या विनंतीला होकार दिला आणि त्या दोघी स्वखर्चाने स्कॉटलंडहून भारतात १८३७ साली आल्या.
मार्गारेट यांच्या दोन भगिनी मुंबईत मिशनकार्यासाठी आल्या या घटनेचा स्कॉटलंडमध्ये मोठा प्रभाव पडला.स्कॉटलंडच्या महिलांनीं भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन कॅप्टन सेंट क्लेर जेम्सन यांनी केले. त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून स्कॉटिश लेडीज असोसिएशन फॉर फिमेल एज्युकेशन इन इंडिया या संस्थेची मार्च १८३७ मध्ये स्थापना झाली. मिशनरींच्या पत्नींनी स्त्रीशिक्षणासाठी सुरु केलेल्या कामासाठी आर्थिक मदत पुरवणे आणि भारतात पूर्णवेळ कार्य करण्यासाठी स्कॉटलंडहून अविवाहित महिला स्कॉटलँडवरून पाठवणे ही या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये होती.
मिस रीड या पहिल्या मिशनरी महिलेचे १८३८ ला भारत आगमन झाले, मात्र वर्षभरात त्यांचे निधन झाले. मेडल जेलट या दुसऱ्या महिलेने त्यांची जागा घेतली. मात्र कॉलराने त्यांचा लगेचच बळी घेतला. मार्गारेट विल्सन यांची बहीण मिस अँना बेना यांचेसुद्धा १८४१ साली निधन झाले. दुसरी बहीण हे बेना यांचे रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याशी विवाह झाला, त्यांचेही लग्नानंतर काही वर्षातच निधन झाले.
ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी भारतात आलेल्या या मिशनरींचे कार्य मात्र पूर्णतः व्यर्थ गेले नव्हते. बोर्डिंग स्कुलमधल्या सहा मुलींनी १८३८ साली बाप्तिस्मा घेतला आणि त्यानंतर १८४० मध्ये आणखी सहा मुली ख्रिस्ती झाल्या होत्या.
शिक्षणाचे कोणते उद्दिष्ट्य आपल्यासमोर आहे हे स्पष्ट करणारा लेख विल्सन यांनी `ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेकर'' मध्ये लिहिला. ``मानवसेवा हे ख्रिश्चनांचे प्रमुख कर्तव्य आहे. या सेवेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ज्ञानदान. सर्वांत चांगले ज्ञान म्हणजे धर्मसत्याचे ज्ञान. त्यानंतरचा क्रम कला आणि विज्ञान यांचा येतो. या ज्ञानालाच उपयुक्त ज्ञान असे आज संबोधले जाते. या ज्ञानाचा प्रसार शक्य होईल तेवढा करणे जे आपले (ख्रिश्चनांचे ) कर्तव्य आहे’’ असे त्यांनी म्हटल्याचे नरेंद्र चपळगावकर यांनी नमूद केले आहे.
धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी यांच्या धर्मांतरांनंतर पारशी लोकांनी आपल्या मुलांना विल्सन यांच्या शाळेतून काढून घेतले आणि ही शाळा काही काळ जवळपास ओस पडली.
जॉन विल्सन यांनी आपली शाळा मुंबईत फोर्ट येथे हलवली आणि जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूट या नावाने ही शाळा प्रसिद्ध झाली. जॉन विल्सन यांनी आपली शाळा मुंबईत फोर्ट येथे हलवली आणि जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूट या नावाने ही शाळा प्रसिद्ध झाली. जॉन विल्सन यांनी मुंबईत फोर्ट येथे उघडलेल्या शाळेत म्हणजे जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूट मध्ये अनेक वर्षे मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट हे इतर स्कॉटिश मिशनरीसुद्धा शिकवत असत.
जॉन विल्सन, रॉबर्ट नेस्बिट आणि जॉन मरे मिचेल यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूट या संस्थेच्या आणि शाखांच्या कामांत सतरा वर्षे एकत्रितरित्या मिशनकार्य केले. मुंबईत १८२६ साली कार्य सुरु करणारे नेस्बिट यांचे १८५५ साली निधन झाले आणि या तिघांची ही भागीदारी संपुष्टात आली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती.
या पारशी धर्मांतरीत मुलांना जॉन विल्सन यांनी कोंडून ठेवले आहे आणि त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात यावे अशी विनंती करणारा `हेबीअस कॉपर्स’ ; अर्ज पारशी समाजाच्या वतीने मुंबईतील सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला. या अर्जात जॉन विल्सन यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
कंपनी सरकारच्या अमदानीत भारतात पहिल्यांदा सर्व नागरिकांना समान मानणाऱ्या ब्रिटिश कायद्याचे राज्य सुरू झाले होते. `हेबीअस कॉपर्स’ पेटिशन म्हणजे कोंडून ठेवलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर आणले जावे अशी विनंती करणे. या कायद्यानुसार भारतात न्यायालयात आलेले हे बहुधा पहिलेच प्रकरण असावे.
मुंबईत स्कॉटिश मिशनरींच्या प्रभावाने परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात श्रीपत शास्त्रीला उभे करण्यात आले तेव्हा न्यायाधीश एरस्किन पेरी यांनी बारा वर्षाच्या अज्ञान मुलाचे धर्मांतराबाबतचे मत मुळी विचारात घेण्यासारखेच नाही, असे जाहीर केले. हा निवाडा देऊन त्या लहान मुलाला ताबडतोब त्याच्या वडलांकडे सोपवण्याचा आदेश न्यायाधिशांनीं दिला. तेव्हा ``;पण मूर्तिपूजा करण्यास मला का भाग पाडले जात आहे ?’’ त्या मुलाच्या प्रश्नाकडे अर्थात सरळसरळ दुर्लक्ष करण्यात आले आणि नारायण आणि श्रीपत या दोन भावांची अशाप्रकारे ताटातूट झाली.
यापैकी नंतर रेव्हरंड झालेल्या नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले, पुण्यात त्यांनी काम केले आणि नंतर मराठवाड्यात बेथेल हे ख्रिस्ती लोकांचे एक नगरच वसवले. नरेंद्र चपलगावकर यांनी या बेथेल गावावर एक पूर्ण प्रकरणच लिहिले आहे.
नारायणशास्त्री आणि श्रीपतशास्त्री शेषाद्री यांच्या संदर्भांतल्या हेबीअसं कॉपर्स खटल्यात निवड देणाऱ्या न्यायाधीश एरस्किन पेरी यांचे नाव लक्षात ठेवण्यासारखे आहे. काही काळानंतर पुण्यात त्यांची वेगळ्या पदावर नेमणूक झाली होती आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रांत त्यांचे नाव विविध संदर्भांत झळकत असते.
जोतिबा फुले यांचे इंग्रजी शिक्षण स्कॉटिश मिशन शाळेत झाले. दरम्यानच्या काळात जेम्स मिचेल, मरे मिचेल, कँडी, इज्देल, डॉ. जॉन विल्सन (मुंबईतील विल्सन हायस्कूल व विल्सन कॉलेजचे संस्थापक) यांच्याशी त्यांचा बराच संबंध आल्यामुळे ख्रिस्ताने शिकविलेल्या मानवतावादाचा आणि ख्रिस्ती मिशनरींच्या समर्पित जीवनाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला.
मार्गारेट आणि जॉन विल्सन यांच्या सेवेतून अंब्रोली चर्च, विल्सन कॉलेज, विल्सन हाय स्कूल, सेंट कोलंबा गर्ल्स स्कूल वगैरे शैक्षणिकसंस्था २०० वर्षापूर्वी सुरु झाल्या. पुढील काळात म्हणजे १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. देशातील या पहिल्यावहिल्या विद्यापीठाचे उपकुलगुरूपद हे पद जॉन विल्सन यांना १८६९ साली देऊन शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दाखल घेतली गेली.
भारतात पहिल्यांदाच प्राथमिक शाळा ते उच्च शिक्षण अशी सेवा उपलब्ध करून देऊन शिक्षणक्षेत्रात मोठी मजल मारणाऱ्या रेव्हरंड डॉ. जॉन विल्सन यांना आधुनिक भारतीय शिक्षणक्षेत्रातील पितामह म्हणता येईल.
^^^
Camil Parkhe, December 27, 2023

Saturday, August 26, 2023

 


मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.
केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगिजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समुळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.
दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.
मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.
देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व - वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या - जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.
आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा - १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.
या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.
मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.
इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदु व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशु ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ''नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.
ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.
बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.
मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.
मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स' चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार.
रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.
सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.
जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.
पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.
पंजाबमध्ये आणि संपुर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.
अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.
हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील. ``सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .
त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले.
त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.
यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन' ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे कासार जातीचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.
अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.
ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.
ख्रिस्ती समाजात अशाप्रकारे विविध जाती जमाती अगदी खुल्या स्वरूपात अस्तित्वात असल्या तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात मात्र जातीभेद नाही असे ठोसपणे म्हणता येते.
हे नंतर अगदी सविस्तरपणे पुढल्या पोस्टमध्ये…

Thursday, September 8, 2022

 बाबा पदमनजी 

 

मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार म्हणून बाबा पदमनजी सुपरिचित आहेत. तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी 1857 साली ‘यमुनापर्यटन‘ ही कादंबरी लिहून त्यांनी मराठी भाषेत कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा पाया घातला. 

जवळजवळ सव्वाशे पुस्तके लिहून बाबांनी मराठी साहित्यातील कोश, निबंध, आत्मचरित्र वगैरे वाङ्मयप्रकारांची दालने समृद्घ केली. 
 
बाबा पदमनजी त्या काळातील एक प्रमुख समाजसुधारकही होते. आपल्या साहित्यातून त्यांनी प्रचलित विविध घनिष्ट सामाजिक रीतिरिवाजांवर टीका केली. पेशवाईचा अस्त होऊन ब्रिटिश आमदानीच्या काळात महाराष्ट्रातील समाज जीवनास नवी दिशा देणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये बाबा पदमनजींचा समावेश होतो.
 
बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे 1831 च्या मे महिन्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. मात्र त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. बाबा पदमनजी हे कासार जातीचे होते. त्यांचे वडील पदमनजी माणिकजी यांनी दक्षिण कोकणात सब असिस्टंट सर्व्हेअर व बिल्डर म्हणून काम केले होते, नंतर त्यांची बेळगावात बदली झाली. 
 
बेळगावातच लंडन मिशनच्या शाळेत बाबा पदमनजींनी शिक्षण घेतले. 1847 साली वर्षभर त्यांचे एडन येथे वास्तव्य होते. तेथून परल्यानंतर 1849 साली त्यांनी मुंबईतील काळबादेवी गायवाडी येथील फ्री चर्च विद्यालयात प्रवेश घेतला. या विद्यालयात नारायण शेषाद्री हे मूळचे चित्पावन ब्राह्मण समाजातील, पण नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेले शिक्षक शिकवित असत. 
 
या काळातच बाबा पदमनजी यांची हिंदू समाजातील चालीरीतींविषयी, जातिभेदांविषयीची मते बदलत गेली. त्याकाळात अत्यंत गुप्त रीतीने स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचे ते सभासद बनले. . मात्र त्याकाळात समाजसुधारणांबाबत कर्मठ मंडळींचा कडवा विरोध लक्षात घेऊन परमहंस मंडळीच्या स्थापनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असे. 
 
मात्र या मंडळीच्या एका सभासदाने या सभेच्या सदस्यांची यादीच प्रसिद्ध केली. 
 
परमहंस मंडळीच्या सभासदांच्या या यादीने त्याकाळात समाजात मोठी खळबळ निर्माण केली होती. या सभेच्या सदस्यांचा ख्रिस्ती धर्माकडे कल आहे, हे सर्व सभासद लवकरच ख्रिस्ती होणार अशीही वदंता सगळीकडे पसरली.
बाबा पदमनजींच्या वडिलांनी त्यामुळे बाबांना ताबडतोब घरी म्हणजे साताऱ्याजवळील उडतरे गावी बोलावून घेतले. बाबा पदमनजींनी 3 सप्टेंबर 1854 रोजी म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी बेळगाव येथे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 
 
आपण धर्मांतर का केले याची कारणे बाबांनी ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात दिली होती. या धर्मांतराचे वृत्त तत्कालीन अनेक मराठी नियतकालिकांतही प्रसिद्ध झाले.
 
सोळा वर्षे बाबांचे पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात ते बराच काळ फ्री चर्चच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत.
बाबा पदमनजींचे महात्मा जोतिबा फुले यांच्याशी चांगले संबंध होते. बाबा पदमनजी हे अनेकदा बी.पी. किंवा बा.प. या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी लेख लिहित असत. महात्मा फुल्यांच्या ‘ब्राम्हणाचे कसब’ या पुस्तकाला बाबांनी प्रस्तावना लिहिली होती व प्रस्तावनेखाली बी.पी. अशी सही केली होती. 
 
त्याशिवाय महात्मा फुले यांच्या ‘शिवाजीचा पोवाडा’ या पुस्तकाची प्रूफेही बाबांनी तपासली होती.
 
बाबा पदमनजी त्याकाळात ख्रिस्ती समाजात खूप लोकप्रिय होते असे दिसून येते. त्यांच्या धर्मातरास 40 आणि 50 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हा प्रसंग साजरा करण्यासाठी खास समारंभ झाले होते व या समारंभाचे वृत्तान्तही प्रसिद्ध झाले होते.
 
त्यांनी स्वतःही काही नियतकालिकांचे अनेक वर्षे प्रकाशन केले. ‘उदयप्रभा’, ‘सत्यदीपिका (धाकटी), ‘सत्यदीपिका (थोरली)’, सत्यवादी, कुटुंबमित्र आणि ऐक्यदर्शक पत्रिका ही बाबांनी चालविलेली नियतकालिके. 
 
समाजाचे उपेक्षित घटक असणाऱ्या बालविधवा आणि महिलांच्या उन्नतीसाठी महात्मा फुल्यांनी कार्य सुरू केले तेव्हा त्यांना प्रचंड सामाजिक प्रक्षोभास तोंड द्यावे लागले. अशावेळी बाबांनी आपल्या या स्नेह्यास पाठबळ पुरविले.
‘सत्यदीपिका’ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारखे ख्रिस्ती मिशनरी आणि ` ज्ञानोदय’ सारख्या मिशनरींच्या मुखपत्राने जोतिरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली, असे ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांनी आपल्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड पहिला) या ग्रंथात नमूद केले आहे.
 
मराठी साहित्यातील कादंबरी, शब्दकोश, निबंधसंग्रह, चरित्रे, आत्मचरित्र, मृत्युलेख वगैरे विविध वाङ्मयप्रकारांत मोलाची भर टाकणाऱ्या बाबा पदमनजींना आपल्या या साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होण्याचे भाग्य लाभले. अर्थात यासाठी त्यांची जाहिरातपद्धती आणि ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रभावी पद्धती उपयुक्त ठरल्या. 
 
आपल्या या साहित्यकृती अधिकाधिक वाचकांपर्यंत जाण्यासाठी बाबा प्रकाशनपूर्व सवलीची किंमत, भरपूर जाहिरात वगैरे मार्केटिंग तंत्रांचा कुशलतेने वापर करत. त्यामुळे त्यांच्या हयातीत ‘यमुनापर्यटन‘च्या तीन आवृत्या हातोहात खपल्या. 
 
आपल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीत ही कादंबरी कुणी खरेदी केली याची बाबांनी सरळसरळ यादीच प्रकाशित केली. या यादीमध्ये दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, लोकहितवादी, महात्मा जोतिबा फुले, शेख दाऊद गुलाम महंमद, शिक्षणतज्ज्ञ रेव्ह. जॉन विल्सन, रेव्ह. नारायण शेषाद्री, मराठी शब्दकोशकार जेम्स टी. मोल्सवर्थ आदी त्याकाळच्या नामांकित व्यक्तींचा समावेश होता.
 
या सामाजिक पुढाऱ्याचे वयाच्या 75 व्या वर्षी म्हणजे 29 ऑगस्ट 1906 रोजी मुंबईत निधन झाले. मुंबईतील शिवडी येथे त्यांचा पार्थिव देह पुरण्यात आला.
 
एखाद्या वाङ्मयप्रकारातील पहिली वहिली कृतीच मोठी प्रक्षोभक, वादग्रस्त आणि तत्कालीन समाजातील एखाद्या महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नाचा वेध घेणारी क्वचितच असते, ‘यमुनापर्यटन‘ ही पहिली वहिली कृती त्यादृष्टीने अपवादात्मकच म्हणाली लागेल, असे बाबा पदमनजींचे चरित्रकार डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर यांनी म्हटले आहे. 
 
एकोणिसाव्या शतकात विधवांची स्थिती आणि त्यांचा पुनर्विवाह हा अत्यंत ज्वलंत सामाजिक विषय होता. विधवांच्या प्रश्नावर लिहिलेल्या या कादंबरीस बाबांचे एक स्नेही आणि समाजसुधारक दादोबा पांडुरंग यांनी छापील 27 पानांची संस्कृतमध्ये प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेचा 18 पानांचा मराठीतील सारांशही बाबांनी आपल्या या कादंबरीबरोबर प्रसिद्घ केला. 
 
विधवांच्या पुनर्विवाहाची गरज दादोबा पांडुरंगांनी आपल्या या प्रस्तावनेत मांडली. त्यामुळे ‘यमुनापर्यटन‘ या कादंबरीद्बारे समाजात विधवाविवाहाबाबत जागृती करण्याचा कादंबरीकाराचा हेतू होता हे स्पष्ट होते. बाबांनी आपल्या या कादंबरीचे उपशीर्षक ‘हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण‘ असे ठेवले त्यावरूनही हेच स्पष्ट होते.
 
बाबा पदमनजींनी ‘शब्दरत्नावली‘ या नावाचा समानार्थी शब्दांचा कोश अथवा थिसॉरस 1860 साली प्रसिद्घ केला. मराठी भाषेतील हा पहिलाच समशब्दकोश. इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ कोशकार पीटर मार्क रॉजेट थिसॉरस या प्रसिद्घ समानार्थी शब्दांच्या कोशाच्या धर्तीवर ‘शब्दरत्नावली‘ची निर्मिती करण्यात आली आहे. 
 
विशेष म्हणजे रॉजेट थिसॉरसची पहिली आवृत्ती 1852 साली प्रसिद्घ झाली. त्यानंतर केवळ आठ वर्षातच रेव्ह. पदमनजींनी आपला ‘शब्दरत्नावली‘ कोश प्रसिद्घ केला. 
 
मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी मराठी भाषेतील एक प्रमुख कोशकर्ते म्हणूनही ओळखले जातात. संस्कृतमध्ये ‘निघंटु‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शब्दकोश या वाङ्मयप्रकाराचा मराठीत सर्वप्रथम पाया रेव्ह. विल्यम केरी या बॅप्टिस्ट मिशनरीने 1810 साली रचला. 
 
बाबा पदमनजी यांनी 1860 साली इंग्लीश आणि मराठी कोशाचा संक्षेप (A Comprehensive Dictionary-English and Marathi) या नावाचा त्यांचा पहिला शब्दकोश प्रसिद्घ केला. बावीस हजारांहून अधिक शब्द असलेल्या या कोशाची दुसरी आवृत्ती 1870 साली तर तिसरी आवृत्ती 1889 साली प्रसिद्घ झाली.
 
पुण्याच्या भवानी पेठेत बोहरा दफन भूमी जवळ त्यांच्या नावाने चौक आहे.
 
 
  ^^
 
 
( संदर्भ : ‘बाबा पदमनजी' : काल व कर्तृत्व’-डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई 400 032 (1979).
 
^^^
( `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' , लेखक कामिल (पारखे (वितरक सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती २०१७) मधील एक प्रकरण )