Friday, June 24, 2022

 



पंढरीच्या वारी

```राम कृष्ण हरी.. '' 
 
``राम कृष्ण हरी'' 
 
सन २००४ ला मी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरचा `टाइम्स ऑफ इंडिया' सोडून शनिवारवाडयालागून असलेल्या `सकाळ' वृत्तसमूहाच्या इमारतीत 'महाराष्ट्र हेराल्ड' ला रुजू झालो तेव्हापासून जूनच्या या काळात फोनवर ``राम कृष्ण हरी.. '' या शब्दांनी अभिवादन केले जायचे . 
 
याचे कारण याकाळात देहू आणि आळंदी येथे पालखी सोहोळ्याची लगबग सुरु व्हायची, तेव्हापासून मी `सकाळ’ वृत्तसमूहाच्या तिथल्या स्थानिक वार्ताहरांशी संपर्कात असायचो आणि त्यांच्यांशी बोलूनच मग आमच्या इंग्रजी दैनिकात दररोज पंढरपूरच्या आषाढी वारीसंदर्भात एक बातमी द्यायचो. 
 
या दोन्ही तिर्थक्षेत्रांतील वार्ताहरांना फोन लावला कि तिकडून ``राम कृष्ण हरी'' असे अभिवादन यायचे अणि माझ्याकडून पण मग तस्साच प्रतिसाद जायचा. 
 
पुण्यातल्या आमच्या `महाराष्ट्र हेराल्ड' (नंतरचे `सकाळ टाइम्स' ) इंग्रजी दैनिकाच्या वाचकांसाठी या पालखी सोहोळ्याची सर्वांत पहिली आणि महत्त्वाची बातमी असायची ती म्हणजे दोन्ही पालख्यांचे - संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालख्यांचे - आळंदी आणि देहू येथून कधी प्रस्थान होणार, पुण्यात या पालख्या कोणत्या तारखेला आणि कधी येणार आणि पुण्यातून प्रस्थान कुठल्या वारी होणार. 
 
याबाबत पुण्यात डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर , डेक्कन कॉर्नर, वगैरे परिसरांत राहणाऱ्या किंवा तेथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांना पुण्यात पालख्या कधी येणार याविषयी आगाऊ माहिती असणे आवश्यक असते. याचे कारण प्रचंड गर्दीमुळे त्यादिवशी या परीसरात अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असतात. त्यादृष्टीने पालखी सोहोळ्याची ही सलामीची बातमी फार महत्त्वाची असते. 
 
ही पहिली बातमी पुण्यातल्या इंग्रजी दैनिकांत सर्वप्रथम मी द्यावी याबाबत मी नेहेमी दक्ष असे. पंढरीच्या वारीनिमित्त या दोन्ही ठिकाणी महिनाभर आधी तयारी सुरु असते, पालखीच्या रथासाठी बैलांची निवड होते, पालखी रथ तयार केला जातो, पालखीतल्या अश्वांची निवड असते, याबाबतच्या बातम्या वेळोवेळी मी देत असे.'
 
दोन वर्षांपूर्वी कोविड महामारीने आमच्या इंग्रजी दैनिक ``सकाळ टाइम्स’चासुद्धा बळी घेतला तेव्हापर्यंत इमानेइतबारे मी या बातम्या द्यायचो, दोन्ही पालखीचे आपापल्या ठिकाणांहून प्रस्थान होईपर्यंत दररोज या बातम्या मी द्यायचो. 
 
ज्ञानदेव आणि तुकोबांच्या पालख्या पुणे शहरात आल्या कि या बातम्यांच्या पालखीची धुरा मग `महाराष्ट्र हेराल्ड- सकाळ टाइम्स’च्या बातमीदारांचा चमू आणि फोटोग्राफर्स यांच्याकडे जायची आणि मग पुढच्या वारीपर्यंत माझा वारकरी संप्रदायाशी असलेला संबंध खंडीत व्हायचा.
 
पंढरीच्या वारीशी आणि पालखी सोहोळ्याशी संबंधित असलेले हे काही प्रसंग मी कसे विसरेल? सन १९९९ ला पुणे कॅम्पातला `इंडियन एक्सप्रेस’ सोडून मी `टाइम्स ऑफ इंडिया’ला रुजू झालो. `टाइम्स’चे ऑफिस त्यावेळी नुकतेच शिवाजीनगरचा तात्पुरत्या आवारातून फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या स्वमालकीच्या अत्याधुनिक वातानुकूलित इमारतीत स्थलांतर झाले होते. 
 
फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणजे पालखी मार्गावरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा. दोन्ही पालख्या पुण्यातल्या आपल्या रात्रीच्या मुक्कामी जागी जाण्याआधी या टप्प्यावर सर्वाधिक भाविक दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. तर १९९९ साली पहिल्यांदाच दोन्ही पालख्यांचे आणि अर्थातच दोन्ही संतांच्या पादुकांचे अगदी जवळून दर्शन घडले. याचे कारण म्हणजे `टाइम्स’ किंवा बेनेट अँड कोलेमन समुहाच्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरच्या गच्चीतून या पालखी मिरवणुकीचे आणि पादुकांचे जवळून दर्शन घडते. 
 
पालखी आणि पादुका दर्शनांचा तो क्षण आजही माझ्या नजरेसमोर आहे. 
 
नंतर पुढच्या काही वर्षांत `टाइम्स ऑफ इंडिया’च्या ऑफिसमधून खाली उतरुन वारीच्या मिरवणुकीत सामील झालो, त्यावेळी कपाळावर लावला गेलेला बुक्का चिंचवडला रात्री घरी जाईपर्यंत मी कायम ठेवायचो. जॅकलीनचा त्याबद्दल आक्षेप असण्याचा प्रश्नच नव्हता. आदितीला - आमच्या मुलीला - वारीचा हा अनुभव देणे आम्हा दोघांनाही नक्कीच आवडले असते. आदितीला आम्ही गणपती मूर्ती विसर्जनालाआणि विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी नेत होतोच. पण पंढरीच्या वारीच्या सोहोळ्याचा अनुभव काही वेगळाच. 
 
मॉन्सूनच्या बातम्यांत विशिष्ट शब्दयोजना असते,  अनेकदा मानवी भावनांचा वापर केला जातो असे म्हटले होते, जसे कि मान्सून रुसला, रेंगाळला, दांडी मारली, प्रसन्न झाला, परतला, वगैरे. पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहोळ्याच्या बातम्यांची आपली स्वतःची अशी वेगळीच परिभाषा असते, वेळोवेळी पालखी मिरवणुकीचे वृत्तांकन केले कि मग ही परिभाषा अंगवळणी पडते. 
 
इथे ज्ञानोबांची पालखी पहिल्या दिवशी `टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान' करते, मात्र ती आळंदीलाच असते, त्या पहिल्या दिवशी या पालखीचा 'मुक्काम' हा `आजोळी' असतो. पालखींचा `विसावा' असतो, पाद्यपूजन असते, मार्गावरच्या नदीत पादुकांचा स्नानसोहोळा असतो, पहिले, दुसरे `रिंगण असते, तुकाराम महाराज आणि ज्ञानदेव महाराजांच्या दोन्ही पालख्यांची एका ठिकाणी भेटसुद्धा होते आणि नंतर या आपापल्या वेगळ्या मार्गाने प्रस्थान करतात. 
 
पंढरीची वारी समजावून घ्यायची असेल तर वारकऱ्यांबरोबर काही पावले चालणे आवश्यक आहे. बातमीदाराने किंवा फोटोग्राफरने स्वतःच्या वाहनाचा वापर करत वारीच्या बातम्या आणि फोटो देणे वेगळे आणि त्यासाठी स्वतः पायी चालत, घाम गाळत आणि पाऊस झेलत वारी करणे वेगळे. 
 
इथे वारीमध्ये सामिल होणारा प्रत्येक 'माऊली' `माऊली' असतो, प्रत्येकाला `माऊली' हेच संबोधन वापरले जाते. मागे एकदा इस्कॉनच्या मंदिराला आणि तिथल्या आवारात चालू असलेल्या विविध उपक्रमांना भेट दिली तेव्हा तिथे सगळेजण एकमेकांना 'प्रभू', 'प्रभू' असेच संबोधत होते हे आता आठवले. 
 
दैनिकांचे अनेक बातमीदार आळंदी किंवा देहू तीर्थक्षेत्रांपासून पुण्यापर्यंत पालख्यांबरोबर येतात, पालख्यांनी पुण्यात दोन मुक्काम केल्यावर काही बातमीदार पुण्याहून दिवे घाटापर्यंत पालख्यांची सोबत करतात आणि पुण्यातल्या आपल्या मुख्यालयात परततात. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते तशी. 
 
`महाराष्ट्र हेराल्ड’मध्ये कौस्तुभ कुलकर्णी, शर्वरी जोशी, मयुरेश कोन्नूर या तीन तरुण पत्रकारांनी पुण्यापासून पंढरपूरपर्यंत संपूर्ण वारीचे वार्तांकन केल्याचे आठवते. सन २००४ साली इंग्रजी पत्रकारितेतील `पहिला वारकरी बातमीदार' म्हणून कौस्तुभ कुलकर्णी याला पाठवायची कल्पना `महाराष्ट्र हेराल्ड'चे तेव्हाचे संपादक प्रदुमन महेश्वरी यांची. एका बातमीदाराने संपूर्ण वारी करण्याची परंपरा मराठी दैनिकांत आधीपासून असली तरी इंग्रजी पत्रकारितेतील २१ दिवसांची संपूर्ण वारी करणारे हे पहिलेच पत्रकार, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आणि इतरांमध्ये तेव्हा केव्हढे अप्रूप असायचे. 
 
बातमीदार कौस्तुभ कुलकर्णीने पूर्ण वारी केली आहे असे कळताच एका मध्यमवयीन गृहस्थाने कौस्तुभच्या पायी लोटांगणच घातले होते ! वारी करुन परतलेल्या वारकऱ्यांच्या पायी पडण्याची आपल्याकडे परंपराच आहे, असे लोटांगण घातल्याने हा नमस्कार थेट पांडुरंगाला पोहोचतो अशी श्रद्धा आहे. 
 
काही वर्षांपूर्वी मी बायको आणि मुलीसह इटलीमधील व्हॅटिकन सिटी, रोम, फ्रान्समधील मेरियन डिव्होशन सेंटर लुर्ड्स वगैरे तीर्थस्थानांची म्हणजे होली लँडची यात्रा करुन परतलो तेव्हा पलेसुद्धा कुणी `असे' स्वागत करेल काय असा एक गंमतीदार विचार माझ्या मनात आला होता. 
 
पालखी सोहोळा किंवा पंढरपूरच्या वारींचा अभ्यास करायचा किंवा लिहायचे म्हणजे काही तज्ज्ञांना वाट पुसणे भाग पडते. पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा ऐवज, त्यावर कितीतरी लिहिले गेले आहे. अनेक नामवंत लोकांनी याबाबत पायाभूत स्वरुपाचे लिहिले आहे. 
 
दि. बा. मोकाशी यांनी साठच्या दशकात लिहिलेले 'पालखी' हे पुस्तक माझ्या फार आवडीचे. सन १९६१ ला पानशेत धरण फुटले त्याच काळात झालेल्या वारीमध्ये मोकाशी संशोधनासाठी सामिल झाले होते. त्याच तटस्थ दृष्टिकोनातून हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीला चित्रकार रवि मुकुल यांची सुंदर रेखाटने आहेत.
त्याशिवाय ज्येष्ठ मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे एकदा पंढरपूरच्या वारीत सश्रद्ध मनाने सहभागी झाल्या ती वारी त्यांनी आपल्या 'वाटचाल' या प्रदीर्घ लेखात रेखाटली आहे. या वार्षिक वारीत `हौशे, नवशे आणि गवसे' असतात, या सर्वांचे वर्णन मोकाशी आणि इरावतीबाई करतात. 
 
आपल्या या लेखात महाराष्ष्ट्रातील विविध प्रांतांतील -मोगलाई, खानदेश, वऱ्हाड, नाशिक, सोलापूर - विविध जातींचे लोक पंढरीच्या वारीला येतात असे इरावती कर्वे यांनीं म्हटले आहे, ''ज्या देशातील लोक पंढरीला येतात तो महाराष्ट्र ' अशी महाराष्ट्राची एक नवी व्याख्या मला कळून आली' असे इरावतीबाई म्हणतात. 
 
पुण्यातल्या डेक्कन कॉलेजात शिकवणाऱ्या इरावतीबाईंचा समाजशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. महाराष्ट्राची त्यांनी केलेली आणखी एक व्याख्या आहे: ''जेथपर्यंत महार पोहोचले तिथपर्यंत महाराष्ट्र !'' 
 
दुर्गा भागवत यांनीसुद्धा `पंढरीचा विठोबा' या शिर्षकाचा एका वेगळ्या आशयाचा लेख त्यांच्या `पैस' या पुस्तकात लिहिला आहे. 
 
त्याशिवाय परदेशी संशोधक गाय दलरी, सोन्थायमर वगैरे नावे पंढरी वारीच्या अभ्यासात घेतली जातातच. त्याशिवाय दिलीप पुरुषोत्तम चित्रे अशी अनेक नावे आहेतच .
 
प्राच्यविद्या पंडित जर्मन जेसुईट आणि पुण्यातल्या `स्नेहसदन’ आश्रमाचे संस्थापक फादर मॅथ्यू लेदर्ले यांनीही वारकऱ्यांचा भक्तीभाव जाणून घेण्याच्या हेतूने एकदा पूर्ण वारी केली होती. `` तुकारामांच्या अभंगांनी मला भुरळ घातली आहे. स्वर्गात पोहोचलो म्हणजे मी संत तुकारामांची नक्कीच गाठ घेईन आणि त्यांचे अभंग स्वतःच्याच वाणीमध्ये गाण्याची त्यांना विनंती करेन'' हे फादर लेदर्ले यांचे वाक्य प्रसिद्ध आहेच. 
 
फोटोग्राफर संदेश भंडारे यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पंढरपूरची वारी कव्हर केली आहे आणि `वारी- एक आनंदयात्रा' या पुस्तक रुपात ही वारी उपलब्ध आहे. (हा इथला फोटो संदेश भंडारे यांचाच. ) 
 
वारी अनुभवायची असली तर वारकऱ्यांसोबत अशी काही पाऊले चालायलाच हवी.

Tuesday, June 21, 2022

 दहावी,  बारावीचा निकाल पैसे कमवण्यासाठी एक धंदाच 

श्रीरामपूरला एका मराठी दैनिकात मी कामाला होतो तेव्हाची ही गोष्ट. चार दशकांच्या माझ्या इंग्रजी पत्रकारितेच्या कारकीर्दीत मी जेमतेम तीनचार महिने एका मराठी दैनिकात काम केले. या मराठी दैनिकात जे काम केले ते काम त्याआधी आणि नंतरही कधी केले नाही.
 
साल होते १९८८. गोवा सोडून मी महाराष्ट्रात परतलो होतो. संध्याकाळी सातच्या दरम्यान मुंबईतल्या महाराष्ट्र विधीमंडळ कामकाजाचे समालोचन रेडीओवर लागायचे ते आमच्या दैनिकातले उपसंपादक टेबलवर ट्रांझिस्टर ठेवून ऐकायचे आणि त्यानुसार दुसऱ्या दिवसाच्या आवृत्तीच्या पान एक आणि आतल्या पानाच्या बातम्या लिहिल्या जायच्या. रेडिओवरचे धावते समालोचन ऐकून श्रीरामपूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्त्वाची असेल ती बातमी एकटाकी लिहिली जायची आणि लगेच कंपोंझिंगला पाठवली जायची. 
 
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) किंवा युनायटेड न्युज ऑफ इंडिया (युएनआय) या वृत्तसंस्था प्रादेशिक किंवा जिल्हा दैनिकांसाठी तेव्हा आणि आजही बातम्या देत नसतात. 
 
रात्री बारा वाजता नाईट ड्युटी संपल्यावर स्थानिक मुख्य मटका पेढीला फोन करून विजेत्या मटक्याचे आकडे विचारून ते पान एकला चौकटीत `सोना- चांदी', `मुंबई - कल्याण' किंवा `ओपन - क्लोज' अशा सांकेतिक नावांनी लावून मग घरी जायचो. 
 
पेपरचे वाचक या मटक्याच्या आकड्यासाठीच पेपर घ्यायचे. पुण्यातसुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले ' केसरी ' सारखे पेपर या मटक्याच्या अंकासाठीच खपायचे. 
 
त्याशिवाय दररोज `आजचे भविष्य' हे सदर सुद्धा सकाळी ड्युटीवर असलेले उपसंपादक लिहायचा. उदाहरणार्थ, पाहुणे येतील, पोट बिघडेल, अकस्मात धनलाभ, खिसा सांभाळा, गोड बातमी मिळेल, मनशांती बिघडेल, प्रवास घडेल वगैरे. 
 
तर एक दिवस आमच्या दैनिकाच्या मॅनेजरने एक फतवा काढला की सर्व कर्मचारी उद्या सकाळीच ऑफिसात येतील आणि कुणीही दांडी मारू नये.
 
दुसऱ्या दिवशी ऑफिससमोर ही तुडुंब गर्दी, बाहेरच्या लोकांना आत प्रवेश नव्हता. 
 
एका खिडकीपाशी एकदोन सिनियर कर्मचारी मुलांकडून आणि इतर लोकांकडून चिठ्ठीचपाटीवर नंबर घेऊन, समोरच्या यादीत पाहून पास की नापास सांगत होते आणि त्याबदल्यात प्रत्येकी एक रुपया घेत होते. 
 
खिडकीपाशी जमा होणाऱ्या गल्ल्याकडे मॅनेजरसाहेब जातीने लक्ष घालून होते, हेराफेरीला मुळी वावच नव्हता.
एसएससी बोर्डाने प्रत्येक दैनिकांना छापण्यासाठी दहावीचा निकाल दिला होता, दुसऱ्या दिवशी तो छापण्याआधी दैनिकाच्या मॅनेजमेंटचे लोक तो निकाल सांगून पैसे कमावत होते. 
 
त्याकाळात दहावी बारावीचा निकाल राज्यातील सर्व दैनिके छापत असत म्हणजे पास झालेल्यांचे नंबर आणि त्यांचा क्लास. ज्यांचा नंबर नाही ते नापास असत. त्याकाळात बहुसंख्य विद्यार्थ्यांना नापास करण्याकडेच बोर्डाचा अधिक कल असायचा. बहुसंख्य मुलं गणितात आणि इंग्रजीत गचकायचे. माझ्या वेळेस दहावीचा निकाल २७ टक्के होता. गणितात मी थोडक्यात म्हणजे एक मार्काने वाचलो. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
 
तर नंतर लक्षात आले की महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रादेशिक आणि जिल्हा पातळीवर दैनिकांचा दहावी आणि बारावी परीक्षा निकालावेळी पैसे कमवण्यासाठी हा एक धंदाच होता. वाममार्गाने कमावलेला हा पैसा दैनिकाच्या कुठल्या खात्यात दाखवला जाई ते मला माहित नाही. 
 
गोव्यात जवळजवळ एक दशकभर मी नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाचा कॅम्पस (शैक्षणिक) रिपोर्टर होतो. मात्र गोव्यात आमच्या किंवा नवप्रभा या मराठी जुळ्या दैनिकाने किंवा प्रतिस्पर्धी गोमंतक, हेरॉल्ड वगैरे वृत्तपत्रांनी दहावी अन बारावी निकालाबाबत असा काळाबाजार धंदा केला नव्हता. 
 
वृत्तपत्र व्यवसायातील एक अत्यंत शरमिंदा करणारी ही आणखी एक गोष्ट. 
 
आज दहावीचा निकाल. त्यानिमित्त ही घटना आठवली. 

 `ज्ञानोदय'  मराठी भाषेतले सर्वाधिक दीर्घायुषी नियतकालिक May be an image of text

 
२० जून १८४२ रोजी - १८० वर्षांपूर्वी -  अहमदनगर येथे अमेरिकन धर्मगुरु रेव्ह. हेन्री बॅलेन्टाईन यांनी `ज्ञानोदय' हे मराठी नियतकालिक सुरु केले. 
 
त्याआधी दहा वर्षे आधी - १८३२ साली - बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतले पहिले वृत्तपत्र `दर्पण' सुरु केले होते. पण `दर्पण' अल्पायुषी ठरले. 
 
महात्मा जोतिबा फुले `ज्ञानोदय' नियतकालिकाचे एक वर्गणीदार होते. 
 
सावित्रीबाई फुलेंची विद्यार्थिनी मुक्ता साळवेचा " मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध', १८८५च्या ज्ञानोदय मासिकाच्या दोन अंकांमध्ये प्रसिद्ध झाला होता. 
 
`ज्ञानोदय' आजही पुण्यातून प्रसिद्ध होतो, त्यामुळे मराठी भाषेतले सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेले हे नियतकालिक आहे. अशोक आंग्रे हे विद्यमान संपादक आहेत. 
 
पुण्यातूनच प्रसिद्ध होणारे दैनिक `केसरी' आणि जेसुईट फादरांच्या (सोसायटी ऑफ जिझस किंवा येशूसंघ ) संस्थेतर्फे प्रकाशित होणारे 'निरोप्या' हे मासिक ही मराठीतील सर्वाधिक दीर्घायुषी नियतकालिके.
`ज्ञानोदय'चे संस्थापक संपादक अमेरिकन तर 'निरोप्या'चे संस्थापक-संपादक जर्मन, (पुणे डायोसिसचे) आर्चबिशप हेन्री डोरिंग !
 
ज्येष्ठ साहित्यिक डॉ अनुपमा उजगरे यांनी ज्ञानोदय च्या पहिल्या अंकातील संपादकीय आज येथे पोस्ट केले ते मी शेअर करत आहे. 
 
----
'ज्ञानोदय' पहिला अंक(अहमदनगर)
२० जून १८४२
संपा.रेव्ह.हेन्री बॅलेन्टाईन
जरीमरी
यंदा ठिकठिकाणीं जरीमरीचा वाखा फार झाला आहे... नगरामध्यें जरीमरीचा उपद्रव फार झाला नाहीं.बाजारगप्पाप्रमाणें मोजलें असतां एका महिन्यांत चारपांचशें माणसें मरावीं, परंतु अशा गप्पांवर कांहीं विश्वास ठेवावयाचा नाहीं. जर पांच माणसें मेलीं तर पंधरा ह्मणावें अशी चाल आहे...या वाक्यामुळें लोक घाबरलें आणि देवाचा क्षोभ आह्मांवर झाला असें बोलतात. फार करून सर्व लोक समजतात कीं, पटकीं पापामुळें आहे, कोणी ह्मणतात कीं इंग्लिश लोक या देशांत आल्यामुळें हा उपद्रव झाला आणि दोष सरकारवर घालितात.
परंतु फार करून लोक आपल्या पदरीं पाप घेऊन देवाला किंवा देवीला प्रसन्न करायाला उपाय करितात. हिंदु धर्मांतले जे लोक ते असें समजतात कीं, हें मरी देवीचे खेळ आहेत ह्मणून लोक गांवाबाहेर एखादें बागेंमध्यें जेवण करून इची पूजा करितात. घोडनदीस फौजदाराने सर्व लोकांस आज्ञा दिली कीं, गांवाबाहेर जाऊन देवीची पूजा करावी.
नगरामध्यें कांहीं दिवसामागें ब्राह्मण आणि विशेषेंकरून कारकून मंडळी यांनी बहुत पैका खर्च करून होम केले आणि एक तरुण मांगीण आणून तिला चांगले लुगडें व चोळीं नेसवून गळ्यांत माळा घालून आणि नैवेद्य देऊन तिचें चांगलें पूजन केलें आणि तिला गाड्यावर बसवून वाजंत्री आणि समागमें बहुत लोक गांवाबाहेर मिरवीत गेलें. परंतु या सर्व उपायांनीं कांहीं होत नाहीं तरी लोक असें करीत जातात.
हा रोग कसा उत्पन्न होतो? ज्यांनीं याचा शोध केला ते असें समजतात कीं, लोक अगोदर आपली प्रकृती बिघडवून मग हा रोग लागतो आणि आपली प्रकृती कशी बिघडवितात तर खादाडपणानें बहुत फळें आंबे वगैरे खाण्यानें व लग्नाकरितां सारी रात्र जागे राहण्याने आणि रांडबाजी करण्यानें आणि भयानें इत्यादिक. सारांश, जेणेंकरून मन अस्वच्छ होतें तेणेंकरून हा रोग लागण्यास शरीर तयार होतें...
खादाडपणा हें पाप आहे. जरी जेवण फुकट मिळतें तरी माणसें पशुधर्माप्रमाणें चालली असतां देव शिक्षा देईल... सर्व लोकांनीं ईश्वराचें भजन करून सर्व पाप सोडावें... ब्राह्मण लोकांनीं मांगणीचें पूजन करूं नये, परंतु आपल्या पापाविषयीं पश्चात्तापी होऊन ईश्वराजवळ प्रार्थना करावी.
संदर्भ :'ज्ञानोदय'ची पहिली १००वर्षे, १८४२-१९४१.
संपा. : भा.पां.हिवाळे.
--अनुपमा निरंजन उजगरे
संपादक 'ज्ञानोदय',२००३-२००४





Sunday, May 8, 2022

 

 गोवा मुक्ती  - नानासाहेब गोरे

पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. . उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात  स्पष्ट केली होती. ‘’आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही’’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते.

‘’परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शाश्वत  बंधुप्रेमाने एकत्र येतील,  शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात उगवण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.

पारतंत्र्याच्या बेडीतुन गोव्याची मुक्तता करण्यासाठी या पोर्तुगीज वसाहतीवर निःशस्त्र स्वारी करणाऱ्या या सत्याग्रहींस चुकूनही कल्पना आली नसेल कि पत्रातील वरील उतारा एक भविष्यवाणी ठरून त्यानंतर केवळ सहा वर्षातच गोव्यातील ४५० वर्षाची पोर्तुगीजांची सत्ता कोलमडून पडेल.  पण अखेर असेच घडले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या आदेशानुसार भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला आणि जवळजवळ कुठल्याही प्रतिकाराविना गोवा १९ डिसेम्बर १९६१ साली मुक्त झाला.

कारवार येथे १९५४ साली भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. नानासाहेब गोरे अध्यक्ष होते. पारतंत्र्यात असलेल्या पंतकालीन मराठी साहित्यिकांची तोपर्यँत गोमंतकाबाहेरच करत असत. यापुढील गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातच व्हावेअशी इच्छा नानासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली अन यातूनच गोवा मुक्तीसाठी भारतीयांनी गोवेकरांच्या खांद्यास खांदा लावून लढा उभारण्याची कल्पना जन्मास आली.

पुण्याला परतल्यानंतर नानासाहेबांनी आपले समाजवादी दिवंगत एस. एम. जोशी यांची घेतली आणि गोवा मुक्तीसाठी गोव्यात प्रवेश करून तेथे सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. ‘’एसेम  यांनी सत्याग्रहाच्या कल्पनेचे स्वागतच केले. पण त्याचवेळी पोर्तुगीजांच्या वसाहतीत स्वातंत्र्यासाठी अगदी शांततामय सत्याग्रह करणेही किती धोकादायक आहे याची मला स्पष्ट कल्पना दिली,’’  जुन्या आठवणींना उजाळा देत नानासाहेब म्हणत होते.

ब्रिटिश आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांमध्ये हाच फरक होता. गोव्यातील आपल्या सत्येला आव्हान देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मग ती सशस्त्र असो निशस्त्र पोर्तुगीज राज्यकर्ते दीर्घ कारावासाची शिक्षा देत असत. अनेक स्वतंत्रसैनिकांनी या लढ्यात तर प्राणही गमावले होते.

गोवा मुक्तीसाठी त्या काळात पुण्यात स्थापन झालेल्या गोवा विमोचन सहायक समितीचे नानासाहेब गोरे एक कार्यवाह होते. या समितीतर्फे गोव्यात पाठविण्यात येणाऱ्या भारतीय सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीचे नेते म्हणून नानासाहेबांची निवड करण्यात आली. समितीतर्फे १५ ऑगस्ट १९५५ साली गोव्यात सामुदायिक सत्याग्रह आयोजित करण्याचा निर्णयही येवेळी घेण्यात आला होता. गोवा मुक्तीसाठी गोव्यात आणि गोव्याबाहेर कार्यरत असलेल्या गोवा नॅशनल काँग्रेसने त्यावेळेस श्री. नानासाहेब गोरे याना त्यांच्या सत्याग्रहप्रित्यर्थ निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा आयोजित केली होती. आचार्य अत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. पीटर अल्वारीस, त्रिस्तव बॅ ब्रागांझा कुन्हा वगैरे जेष्ठ गोवा स्वात्यंत्रसेनानींची  याप्रसंगी भाषणे झाली होती.

नानासाहेबांच्या सत्याग्रहाच्या तुकडीने पुण्याहून गोव्याच्या दिशेने १२ मे १९५५ रोजी प्रस्थान केले. वयोवृद्ध स्वतंत्रसेनानी सेनापती बापट हेही या तुकडीत सहभागी झाले होते. सत्याग्रहींची संख्या सुरुवातीस ३२ होती तर वाटेत आणखी  व्यक्ती या तुकडीत सामावून सत्याग्रहींची संख्या ६८  पर्यंत पोहोचली. यापैकी चार सत्याग्रही गोमंतकीय होते. ५३ महाराष्ट्रीयन होते. उत्तर प्रदेशचे आणि राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यातील प्रत्येकी एक व्यक्ती होती.

या सत्याग्रह मोहिमेचे वर्णन करताना नानासाहेब म्हणतात,  ‘’ गोव्यापर्यंतच्या आमच्या प्रवासात आम्हा सत्याग्रहींचे जयसिंगपूर कोल्हापूर, बेळगाव आणि इतर ठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. गोवा मुक्तीविषयी भारतीयांच्या भावना इतक्या तीव्र असतील अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. भारत छोडो ये १९४२च्या चळवळीत निर्माण झालेल्या वातावरणासारखीच परिस्थिती यावेळीही आम्हाला दिसून आली.’’

आपल्या सत्याग्रहातील भूमिका स्पष्ट करताना नानासाहेबांनी गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला लिहिले होते,  ‘’ ज्या परिस्थितीत गोवा, दमण आणि  दिवला भारतात विलीन होणे शक्य होईल ती परिस्थिती निर्माण व्हायला आम्ही कारणीभूत  होऊ इच्छितो, ज्याप्रमाणे शंभराहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले म्हणून आमचा देश ब्रिटिश होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे या टीचभर तुकड्यावर तुम्ही कितीतरी वर्षे राज्य केले म्हणून तो प्रदेश पोर्तुगीज होऊ शकत नाही. आम्हाला माहित आहे कि गोवा-दमण-दिवच्या जनतेला तुमचे स्वामित्व नको आहे.  तुमच्या स्वामित्वाविरुद्ध ती बंद करून उठली आहेत आणि त्या लोकांचे आम्ही (गोवेकराव्यतिरिक्त इतर भारतीय) भाईबंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मिळविण्याच्या बाबतीत मदत करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. गोव्याच्या लोकांनी तुमच्या प्रशासकीय दहशतीविरुद्ध दीर्घकाळ लढा दिलेला आहे आणि आपले रक्त सांडले आहे. जर या विषम, कठोर संघर्षात आम्ही स्तब्धपणे बघ्याची भूमिका घेतली आणि तुम्ही करीत असलेली पाशवी हिंसा अविरतपणे चालू दिली तर भावी पिढ्या आम्हाला अपराधी ठरवतील.”

या पत्राची एक प्रत पंतप्रधान पंडित नेहरू याना पाठविण्यात आली होती.

या सत्याग्रहींच्या तुकडीचे स्वागत गोव्यात डिचोलीजवळ सशस्त्र पोर्तुगीज पोलिसांनी केले. नानासाहेब, सेनापती बापट यांच्यासह सर्व सत्याग्रहींना  यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. नानासाहेब वगळता इतर सर्व सत्याग्रहींना नंतर गोव्याच्या सरहद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले. नानासाहेबांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

त्यांच्यानंतर गोव्यात सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या श्री. शिरूभाऊ लिमये, श्री. जगन्नाथराव जोशी, श्री. मधू लिमये, खासदार श्री. त्रिदिबकुमार चौधरी या सर्वांवर लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. यापैकी बहुतेक नेत्यांना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु अम्नेस्टी इंटरनॅशनलमुळे अडीच वर्षानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.

केवळ  स्वातंत्र्याचे  नारे लागवल्याबद्दल निशस्त्र सत्याग्रहींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा मिळाल्याच्या वृत्ताने त्यावेळेस भारतात मोठी खळबळ निर्माण झाली होती.

या शिक्षेची बातमी कळताच माझ्या आईवडिलांना धक्काच  बसला. माझी आणि त्यांची पुन्हा कधीही भेट होणार नाही असेच त्यांना वाटले,’’  असे नानासाहेब म्हणतात. नानासाहेबांना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्माविण्यात आली तेव्हा त्यांच्या वडिलांचे वय ८२ वर्षाचे होते.

नानासाहेब तुरुंगात असताना त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचण्यास आवडतात अशी विचारणा पंतप्रधान नेहरूंनी नानासाहेबांच्या पत्नीकडे केली होती. त्यानंतर पंडितजींनी पुस्तकांचा एक गठ्ठा नानासाहेबांना पाठविण्याची व्यवस्थाही केली. ”पण ही  पुस्तके माझ्या तुरुंगाच्या कोठडीत कधीच पोहोचली नाहीत,”  नानासाहेबांनी मला हसत हसत सांगितले.

नानासाहेबांची तुरुंगातून मुक्तता झाली तेवढा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर घेतला होता. या काळात झालेल्या निवडणुकीत नानासाहेब पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नानासाहेबांनी गोवा मुक्तीचा विषय उपस्थित केला होता.

या काळात भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करावा यासाठी राष्ट्रवादी मंडळ सरकारवर सतत दबाव आणत होती. त्यावेळी पंतप्रधान नेहरू श्री. पीटर अस्वारीस,  बॅरिस्टर नाथ पै आणि श्री. गोरे यांच्याशी प्रश्नावर चर्चा केली.   ‘’ गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकीय नागरिक पोर्तुगीज सरकारविरुद्ध तीव्र करू शकतील काय?’’  असा प्रश्न पंडितजींनी या बैठकीत आम्हाला विचारला. पण अहिंसा, सत्याग्रहासारख्या आंदोलनांनी पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचे कधीच मागे गेला आहे आता एकाच पर्याय राहिलेला  आहे म्हणजे लष्करी कारवाई ‘’ असे मी पंडितजींना दिले असे श्रीगोरे  म्हणतात .

लष्करी कारवाईच्या आमच्या सल्ल्यानेच पंडितजींनी नंतर कारवाई केली असा दावा मी करत नाही. पण यानंतर वेळोवेळी घेतल्या भूमिकेवरून कारवाईचा त्यांनी ठाम निर्णय होता हे स्पष्ट झाले पोर्तुगीज शासनालाही ह्याची स्पष्टता आली होती,”  श्री. गोरे पुढे म्हणतात.

स्वातंत्र्यसैनिकांचा सशस्त्र निशस्त्र उठाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टाई वगैरे सर्व प्रयत्नानंतरही पोर्तुगीजांनी सोडण्यास नकार दिला.  अन शेवटी नेहरुंच्या आदेशावरुन भारतीय सेनेने  गोवा, दमण आणि दिवमध्ये प्रवेश केला अन गोवा स्वतंत्र झाला. गोव्याच्या मुक्तीसाठी हुतात्म्यांनी सांडलेले रक्त आणि  स्वातंत्र्यसैनिकांचे  श्रम वाया गेले नाही अन ४५० प्रदीर्घ काळानंतर गोवा पुन्हा भारत भूमीशी संलग्न झाला