Tuesday, January 9, 2024


                                                                नरेंद्र चपळगावकर

औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला १९८८ साली मी नव्यानेच रुजू झालो होतो तेव्हाची ही गोष्ट. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीतल्या 'नवहिंद टाइम्स' ला आठ वर्षे असताना तेथे मी क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. साहजिकच औरंगाबादला लोकमत टाईम्स येथेसुद्धा या बिट्सपैकी कोर्ट ही जबाबदारी माझ्याकडे आली.

बॉंबे हायकोर्टाचे एक खंडपीठ पणजी येथे होते, मांडवीच्या तिरावरच्या या हायकोर्टात मी दररोज दुपारी साडेचारला जायचो, तिथल्या रजिस्ट्रारला भेटून मुख्य बातम्या समजावून घ्यायचो आणि नंतर त्या बातम्या मिळवायला लागायचो. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश असताना त्यावेळीं तिथे काफेफोसा ॲक्ट् म्हणजे तस्करीच्या आणि हेबियस कॉर्पसच्या (बेकायदेशीर अडकवून ठेवणे) खूप केसेस असायच्या.
इथे औरंगाबादलासुद्धा हायकोर्टाचे खंडपीठ होते. पणजीला एकावेळी फक्त दोन न्यायमूर्ती असायचे . त्यापैकी एक पणजीला मुंबईचे हायकोर्ट जज्ज 'व्हिजिटिंग जज्ज' म्हणून यायचे ते अक्षरशः ' व्हेकेशन जज्ज' म्हणूनच. एका जिल्ह्यासारख्या लहान असणाऱ्या गोव्याच्या परिसरात हायकोर्टाची किती प्रकरणे आणि सुनावण्या असणार ? दुपारी अडीच तीनच्या सुमारास पुढील लिस्टेड, नोंदणी झालेले सुनावणी नाही म्हणून कोर्टाचे त्या दिवसाचे कामकाज तहकूब व्हायचे..!
औरंगाबाद खंडपीठाच्या हद्दीत मात्र मराठवाड्याचे नऊ जिल्हे आणि शेजारचा अहमदनगर जिल्हा आहे, त्यामुळे तिथे न्यायमूर्ती अधिक असायचे आणि भरपूर प्रकरणेही असायची. भरपूर कोर्टप्रकरणे म्हणजे भरपूर बातम्या... पण बातमीदाराच्या छोटयाशा झोळीत किती आणि कोणत्या बातम्या घेणार ?
मात्र माझ्यासमोरचा हा प्रश्न अपेक्षेपेक्षा लवकर आणि खूपच समाधानकारकरित्या सुटला.
त्यावेळी त्या खंडपीठात नरेंद्र चपळगावकर हे एक सिनियर वकील होते. त्यांची ओळख झाली आणि मग चांदणी चौकाशेजारच्या हायकोर्टात आल्यावर मी तडक चपळगावकर यांना भेटायचो आणि ते मग मला त्या दिवसाची हायकोर्टातली सर्वात मोठी बातमी काय ते सांगायचे, का महत्त्वाची हे सांगायचे आणि कुठल्या वकिलाकडे ती बातमी मिळणार हेही सांगायचे.
यात अहमदनगरच्या सहकारी साखर कारखान्याची कोर्टकेस असायची, कधी कायद्याच्या दृष्टीने अगदी वेगळा निकाल असायचा, कधी ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी असायची.
कधीकधी चपळगावकर म्हणायचे, ``कामिल, आज बातमीसारखे काहीच नाही हायकोर्टात..'' अन मी लगेच माझ्या ऑफिसची वाट धरायचो. आठवड्यातून एकदोनदा असे व्हायचे.
मला आठवते एकदा कोर्टात आल्याआल्या चपळगावकरांनी मला सांगितले
"आज छान बातमी आहे.. बॉम्बे हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती सुजाता मनोहर आजपासून येथे खंडपीठात काही काळासाठी व्हिजिटिंग जज्ज म्हणून आल्या आहेत.."
अशा खूप बातम्या मला या काळात चपळगावकरांनी दिल्या..
इतर वकील मात्र आपल्याकडचे कोर्ट प्रकरण खूप महत्वाचे आहे असा दावा करायचे. प्रत्यक्षात तसे काही नसायचे हे लक्षात आल्यानंतर मग मी अशा वकिलांना टाळायला लागलो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुद्द चपळगावकर यांच्याकडे महत्त्वाची कोर्ट बातमी असल्यावर जे घडायचे तो अनुभव मी कधीच विसरणार नाही.
``हा, तर घ्या लिहून,'' अशी सुरुवात चपळगावकर वकील करायचे.
मी इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून इंग्रजीत ते सांगायचे.
''A Division Bench of the Bombay High Court, comprising Mr Justice... and Mr. Justice... here on Monday set aside an order issued by ....""
कोर्टाच्या बातमीचा इंट्रो कसा असावा, त्यातील बातमीच्या संदर्भाचा क्रम कसा असावा आणि पूर्ण बातमी कशी असावी याचे चपळगावकर यांचे ते डिक्टेशन म्हणजे एक वस्तुपाठ होता.
माझे वय त्यावेळी अठ्ठावीस होते. कायद्याचा पदवीधर नसलो तरी गोव्यात हायकोर्ट कव्हर केलेले असल्याने कोर्टाच्या बातम्या किती काळजीपूर्वक कराव्या लागतात हे मला पूर्ण माहिती होते. कोर्टाच्या माझ्या कुठल्याही बातमीत माझ्या संमतीशिवाय काहीही फेरफार करायचे नाहीत अशी वृत्तसंपादकांची डेस्कवरच्या लोकांना सक्त ताकिदच असायची. ( 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये माझ्या कोर्टाच्या बातमीत एकदा असे एडिटिंग झाले होते तर आठ दिवसांत शिर्डीहून एका वकिलाची नोटीस येऊन धडकली होती.) चपळगावकर वकिलांनी याबाबतीत माझ्या माहितीत आणि कोर्ट बातमीदार म्हणून माझ्या कौशल्यात खूप काही भर घातली.
औरंगाबादला केवळ एक वर्ष राहून इंडियन एक्सप्रेसला रुजू होण्यासाठी मी पुण्याला आलो. पुण्याला हायकोर्टाचे खंडपीठ नाही, त्यामुळे नंतर लिगल रिपोर्टींग सुटले ते कायमचेच.
पण लिगल रिपोर्टींगची आठवण झाली कि आजही नरेंद्र चपळगावकर हमखास आठवतात.
पुण्यात इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्समध्ये पोलिटिकल रिपोर्टींग आणि लेख यात माझे स्पेशलायझेशन होते. पुण्यात नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला समाजवादी नेते आणि माजी खासदार ना. ग. किंवा नानासाहेब गोरे यांची कुठल्याही महत्त्वाच्या राष्ट्रीय घटनेवर प्रतिक्रिया आम्ही बातमीदार घेत असू.
त्यावेळी लॅण्डलाइनवर तिकडे आल्यावर नानासाहेब म्हणायचे, हा, घ्या लिहून.. ''
आणि नंतर नानासाहेब अक्षरशः बातमी डिक्टेट करायचे, हे डिक्टेशन गरजेनुसार इंग्रजीत किंवा मराठीत असायचे. त्यात एका शब्दाचाही फेरफार करण्याची गरज नसायची. नानासाहेबांचे विचार असे अगदी स्पष्ट असायचे.
आणि नानासाहेबांची अशी प्रतिक्रिया लिहून घेताना मला औरंगाबादचे वकील नरेंद्र चपळगावकर आठवायचे...
नंतर एकदोन वर्षांतच नरेंद्र चपळगावकर यांची हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली याचा मला आनंद झाला,, त्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली याचाही आनंद होताच.
आज सकाळी महाराष्ट्र फौंडेशनने नरेंद्र चपळगावकर यांची पुरस्कारासाठी निवड केली याचा तर खूपच आनंद झाला..
विशेष म्हणजे या वर्षीच्या महाराष्ट्र फौंडेशनने निवडलेल्या पुरस्कारार्थीमध्ये आणखी दोन जणांना मी व्यक्तिशः ओळखतो.
त्यापैकी `अक्षरनामा'चे संपादक राम जगताप हे माझे लेख अधूनमधून प्रकाशित करत असतात, वसईच्या लेखिका आणि कार्यकर्त्या सेसिलीया कार्व्हालो आहेत.
या तिघांसह इतर सर्वच पुरस्कारार्थींचे अभिनंदन.... !!
Camil Parkhe January 10, 2022

Saturday, January 6, 2024

अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर स्थापना दिन

 ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’

दोनशे वर्षांपूर्वी ( नेमके म्हणजे २० डिसेंबर १८३१ साली ) अमेरिकन मिशनरींनी अहमदनगर येथे आपले केंद्र उघडले आणि धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून तेथे शाळा सुरु केल्या.
रेव्ह. हॉलीस रीड यांच्या पत्नीने तिथे मुलींची शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना स्थानिक लोकांनी वरील प्रश्न विचारला होता.
अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राचा आज २० डिसेंबर स्थापना दिन. त्यानिमित्त ज्येष्ठ लेखक अशोक हिवाळे यांनी जुन्या दस्तऐवजातून संकलन केलेली ही माहिती मी इथे देतो आहे.
``१८३१ मध्ये अहमदनगर मिशन ठाणे सुरू करणार्या पहिल्या मिशनरींपैकी रेव्ह. हॉलिस रीड हे एक मिशनरी होते. अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राच्या १८८१ साली साजरा झालेल्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रेव्ह. हॉलीस रीड यांनी अमेरीकेतून आपल्या आठवणी लिहून पाठवल्या होत्या. त्या स्मरणिकेतील हा भाग :
``२० डिसेंबर १८३१ रोजी आमच्या प्रारंभीच्या छोट्या टोळीने अहमदनगरमध्ये आमचे तंबू ठोकले; आमच्या टोळीत मिस्टर आणि मिसेस ग्रेव्हज, मिस्टर हर्वे, आणि मी आणि माझी पत्नी यांचा समावेश होता. मिस्टर ॲलन आणि मी अशा दोघांनी आधी दख्खन पठाराचा पुनर्विचार केला होता आणि हे ठिकाण पसंतीचे स्थान म्हणून निवडले होते.
आणि जेव्हा मी तुमच्या तरुण मुलींच्या बोर्डिंग स्कूलकडे पाहतो, तेव्हा त्या बोर्डिंगस्कूलची सर्व सोयींनीयुक्त इमारत, पुस्तके आणि फर्निचर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय आदर्श पातळीचे (आयएसओ) विद्यार्थी, तेव्हा मला मिसेस रीड यांनी मुलींसाठी पहिली छोटी शाळा सुरू करण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न आठवले.
पुन्हा, मोहरीच्या छोट्या दाण्याचे कसे झाड झाले आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये कसे वावरत आहेत याची मला आठवण झाली.
मुलींची शाळा सुरू करण्याच्या मिसेस रीडच्या प्रयत्नांकडे मूळ रहिवाशांनी एक परिपूर्ण मूर्खपणा म्हणून पाहिले आणि काहींनी त्यांची खिल्ली उडवली.
त्यांनी तिला विचारले की, ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’’
तर्क आणि मन वळवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, तिने शेवटला उपाय म्हणून पैशांचा युक्तिवाद वापरला.
जी मुलगी दररोज शाळेला येईल तिला एक पैसा मिळेल. या युक्तिवादाचा उपयोग करून एक लहान शाळा स्थापन करण्यात आली. पैसे (कदाचित दहा पैसे) आठवड्याच्या शेवटी प्रत्येकीला दिले गेले.
लवकरच मुलींना शाळेला येण्यात स्वारस्य वाटू लागले - काही वाचायला शिकल्या. सुरुवातीला त्यांच्या पालकांना आश्चर्य वाटले, परंतु लवकरच या नवीन आणि अनपेक्षित विकासाचा अभिमानही वाटू लागला. आणि मग पैसा मिळो अगर न मिळो मुली शाळेत नियमितपणे येऊ लागल्या.''
परंतु प्रवाह नेहमीच सुरळीत वाहतो असे नाही. स्त्रीशिक्षण हे ब्राह्मण आणि उच्च जातींनी अतिशय संशयास्पद मानले होते आणि खालच्या जातींनीही ते अत्यंत अनिच्छेने व्यवहार्य किंवा आवश्यक म्हणून स्वीकारले होते. हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता. त्याची उपयुक्तता कोणीही पाहू शकत नव्हते आणि त्याच्या यशामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अपयश आले नाही. त्यामुळे मुलींच्या शाळांकडे पुरोहित फारच संकुचितपणे पाहत. आणि अशा योजनांना मोडून काढण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारची कटकारस्थाने आखली जात.
याचे एक उदाहरण पाहा : एके दिवशी सकाळी मिसेस रीड शाळेला नेहमीप्रमाणे भेट देत असताना, तिला एक वर्ग रिकामा आढळला. एकही विद्यार्थिनी दिसत नव्हती.
बाई आश्चर्यचकित होऊन तेथेच रेंगाळत असताना शिक्षक येऊन हजर झाले. आणि शाळेचा वर्ग रिकामा का आहे याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, अशी अफवा पसरली आहे की मुलींना थोडेफार प्रशिक्षण देऊन व त्यांच्यात बदल करून त्यांना दूर पाठवून गुलाम म्हणून विकण्यासाठी त्यांच्या घरातून काढून एकत्र आणण्याचा बाईंचा हेतू होता. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना शाळेतून घेऊन गेले. ''
१८७८ सालच्या मराठी मिशनचा अहवाल दयाळूपणे माझ्याकडे पाठवला आणि गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या छोट्याशा सुरुवातीची सध्या सुरू असलेल्या विस्तृत आणि उदात्त कामाशी तुलना केली, तेव्हा मी आश्चर्याने आणि निर्विवाद कृतज्ञतेने उद्गारलो, ‘‘पाहा, देवाने केवढे कार्य केले आहे!’’
हा अहवाल पाहून माझे हृदय भरून आले आणि मी म्हटले, अरे! त्या येणार्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होते. म्हणजे आपण सर्वांनी मिळून त्या प्रिय मिशनमध्ये असलेल्या देवाच्या सामर्थ्यशाली हाताने केलेले कार्य इतरांना सांगितले असते. मी तिकडे आलोच तर परत अमेरिकेला माघारी येणार नाही. परंतु माझा प्रिय बंधू हर्वे याच्या कबरेच्या बाजूला मला पुरण्यात यावे, अशी मी अपेक्षा करीन.''
अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राच्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर येथे आज एक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
Camil Parkhe December 20, 2023

जॉन आणि मार्गारेट विल्सन :  सावित्रीबाई,जोतिबांचे शिक्षणक्षेत्रातील पुर्वसुरी


एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरु झाला, त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींचे भारतात आगमन झाले. या मिशनरींनी देशाच्या विविध भागांत समाजातील सर्व घटकांसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात नव्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुंबईत, कोकणात आणि पुण्यात अमेरिकन मराठी मिशनच्या आणि स्कॉटिश मिशनच्या मिशनरींनी पहिल्यांदाच मुलांमुलींसाठी शाळा सुरु केले आणि देशात नवे युग सुरु झाले. तोपर्यंत अशाप्रकारे शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली गेलेली नव्हती. स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन आणि त्यांच्या पत्नी मार्गारेट विल्सन यांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे योगदान केले आहे.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अमेरीकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाई त्यांचे नाव हमखास येते. त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन, डॉ. जॉन विल्सन, जेम्स मिचेल, मिसेस मार्गारेट शॉ मिचेल, जॉन मरे मिचेल आणि मिसेस मारिया मॅकेन्झी मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात.
स्कॉटिश मिशनरी सोसायटीने १८२२ साली भारताकडे लक्ष वळवले. त्यावेळी संपूर्ण पश्चिम भारत फक्तसहा मिशनरी होते असे त्या सालच्या सोसायटीच्या अहवालात म्हटले आहे. या सोसायटीचा पहिला मिशनरी डोनाल्ड मिचेल यांचे भारतात १९२३ च्या जानेवारीत आगमन झाले. त्यापूर्वी डोनाल्ड मिचेल हे ईस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते. त्यानंतर मिचेल यांचे वर्षभरातच- दहा महिन्यांतच - निधन झाले. मात्र त्यांच्या निधनापूर्वी इतर चार जण भारतात त्यांना सामील झाले होते. क्रॉफर्ड, कूपर, जेम्स मिचेल आणि जॉन स्टिव्हन्सन ही त्यांची नावे. ब्रिटिशांनी पेशवाई सत्ता संपवल्यानंतरही भारतात आलेल्या ख्रिस्ती मिशनरींना पुणे शहरात आणि मध्य महाराष्ट्रात येण्यास काही काळ पूर्ण मज्जाव होता.
`ब्राह्मणांच्या पुणे शहरात स्थायिक होण्याचे स्कॉटिश मिशनचा इरादा होता. स्कॉटिश मिशनरी भारतात पोहोचले तोपर्यंत मुंबईतील ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा मिशनरींबद्दलचा आकस मावळला होता. मात्र तरीसुद्धा स्कॉटिश मिशनला पुण्यात मिशनकेंद्र उघडण्यास परवानगी देण्यास या सरकारचा ठाम विरोध होता. या शहरात ख्रिस्ती मिशनकेंद्र उघडले तर पुण्यातल्या ब्राह्मणांच्या प्रचंड प्रक्षोपाला तोंड द्यावे लागेल असे कंपनी सरकारला वाटत होते,’’ असे जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी `सावलीचा शोध’ या पुस्तकात स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गारेट यांच्या शिक्षणकार्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ‘’स्कॉटिश मिशनने कोकणात मिशनकार्य सुरु केले होते. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली.
जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर क्रॉफर्ड हे स्कॉटिश मिशनरीही तेथे त्याच्या कामात सहभागी झाले. बाणकोट आणि हर्णै येथे स्कॉटिश मिशनचे कार्य चालू होते. सन १८२९ च्या दरम्यान या भागातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या.
जॉन आणि मार्गारेट विल्सन यांचे १८२८ ला स्कॉटलंडहून मुंबईत आगमन झाले. त्यावेळी त्यांचा नुकताच विवाह झाला होता. कोकणातील आपला मराठीचा अभ्यास संपवून जॉन आणि मार्गारेट विल्सन १८२९च्या नोव्हेंबरात मुंबईत परतले.
दक्षिण कोकणात लोकसंख्या खूप विरळ असल्याने आणि तिथे जाण्यासाठी प्रवासाची सुलभ साधने नसल्याने स्कॉटिश मिशनरींनी १८२७ साली मुंबईत आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटिश मिशनरींनी आपले कार्य फक्त मुंबई आणि पुण्यात चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोकणातील मिशनकार्य बंद करण्यात आले.
``शाळेत शिकायला एकही मुलगी येणार नाही’ असे मुंबईत आलेल्या स्कॉटिश मिशनरींना सांगण्यात आले होते. मात्र या मिशनरींनी या सांगण्याकडे साफ डे दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणून १३ मार्च १८२४ रोजी मुलांबरोबरच अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागल्या आणि त्यामुळे मुलींसाठी एक वेगळा वर्ग सुरु करण्याची गरज निर्माण झाली.
सन १८२७ पर्यंत स्कॉटिश मिशनने ८० शाळा सुरु केलेल्या होत्या आणि त्यांत हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत होते. ब्राह्मणांपासून इतर सर्व जातींचे मुलेमुली या शाळांत शिकत होते. केवळ चार स्कॉटिश मिशनरी दूर अंतरावर पसरलेल्या ८० शाळा चालवत होते आणि या सर्व शाळांवर लक्ष ठेवणे कसे शक्य होते.
त्याशिवाय ख्रिस्ती धर्मप्रसार हा या मिशनरींचे मुख्य ध्येय होते आणि त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. स्कॉटिश मिशनरी सोसायटीने मुंबईत आपले कार्य सुरु केले होते तोपर्यंत मुंबईत एकही ख्रिस्ती धर्मांतर नव्हते. लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माविषयी अत्यंत प्रतिकूल भावना होत्या. ``स्थानिक लोक बाप्तिस्मा कधी घेणार, धर्मांतर होते का ? असा प्रश्न या मिशनरींना वारंवार त्यांच्या मायदेशातील लोक विचारात होते.
जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हे पुराण सांगणारे ब्राह्मण ख्रिस्ती झाले होते. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिक यांनीं लढवला होता.
``महाराष्ट्रात अमेरिकन मिशन, स्कॉटिश मिशन, लंडन मिशनरी सोसायटी, चर्च मिशनरी सोसायटी इत्यादी अनेक संस्था ख्रिस्ती धर्मप्रचाराचे कार्य करीत होत्या. या सर्व संस्थांचे कार्यकतें एकोप्याने व परस्पर सहकार्याने काम करीत होते. त्यासाठी बॉम्बे मिशनरी युनियन, मुंबई बायबल सोसायटी, बॉम्बे ट्रॅक्ट अॅन्ड बुक सोसायटी, मुंबई टेंपरन्स सोसायटी इत्यादी व्यापक संस्था स्थापन झाल्या होत्या. स्कॉटिश मिशनचे धर्मोपदेशक इ. स. १८२२ मध्ये मुंबई इलाख्यात प्रथम आले. त्यानंतर एकामागून एक जे उपदेशक आले, त्यांत जेम्स मिचेल, जॉन स्टिव्हन्सन, रॉबर्ट नेस्बिट, जॉन विल्सन, मरे मिचेल हे प्रमुख होते. सर्व धर्मोपदेशकांच्या कार्यपद्धतीत एकसूत्रीपणा होता. ज्या प्रदेशात प्रचार करायचा, त्यातील लोकांची भाषा आत्मसात करणे अत्यावश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणून येथे आल्यावर अल्पावकाशातच ते मराठी शिकले. इतर कार्यकर्त्यांना ती शिकणे सोपे जावे म्हणून त्यांनी मराठीचे कोश व व्याकरणे रचली. स्टिव्हन्सन, विल्सन, मिचेल यांना अनेक देशी भाषा अवगत होत्या. हिंदूचे धर्मग्रंथ पाहता यावेत म्हणून त्यांनी संस्कृतचाही अभ्यास केला,’’ असे ज्येष्ठ विचारवंत गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे. .
विल्सन यांची पत्नी मार्गारेट या कोकणात हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागल्या होत्या. हेच काम मुंबईत सुरु करण्याचे त्यांनी ठरविले. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या.

१८२९च्या सप्टेंबरात विल्सन दाम्पत्य मुंबईत आले आणि अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये त्यांनी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट शिकवत असत, या शाळेत पहिल्या तीन महिन्यातच ५३ मुली शाळेत दाखल झाल्या होत्या. मार्गारेट विल्सन यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या.
मार्गारेट विल्सन यांनी २९ मार्च १८३२ रोजी मुंबईत अँब्रोळी मिशन हाऊसमध्ये अँब्रोळी इंग्लिश स्कुल; या नावाने एक इंग्रजी शाळा सुरु केली. या मुलींना शिक्षणाबरोबरच कपडेलत्ते आणि जेवणासाठी थोडीशी रक्कम दिली जाई. मुंबईत राहणाऱ्या अनेक महिलांनी या शाळेला आर्थिक मदत पुरवून आपला पाठिंबा व्यक्त केला,
ही शाळा सुरु झाल्यानंतर तीन वर्षातच यापैकी सात मुली मार्गारेट यांच्या देखरेखीखाली मिशन हाऊसमध्येच राहू लागल्या. भारतातल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्यावहिल्या मुलींच्या बोर्डिंगची ही सुरुवात होती.
या शाळेसाठी मार्गारेट दररोज पाच तास देत असत. त्याशिवाय त्या कुलाबा येथे युरोपियन पेन्शरांना भेट द्यायच्या, जॉन विल्सन त्यांच्या साहित्यविषयक कामांत मदत करीत आणि त्याशिवाय काही एतद्देशीय नोकरांना धार्मिक शिक्षण द्यायच्या.
मार्गारेट यांनी पुढील सहा महिन्यांत सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुस्लीम मुलीही होत्या. या सहांपैकी एक शाळा आजही सेंट कोलंबा हायस्कुल फॉर गर्ल्स या नावाने प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने मराठी माध्यम होते.
``स्कॉटिश मिशनरी सोसायटीने डॉ. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यांतून आणि कोकण, गोव्यातही मुलींच्या शाळा, मुलीसाठी वसतिगृहे चालू केली. १८३२ मध्ये मुंबई शहरात स्कॉटिश मिशनने चालविलेल्या पाच शाळा एकमेकींशी संलग्न करण्याचे काम मिसेस विल्सन यांनी केले. तेव्हा त्या शाळांत एकंदर १२६९ विद्यार्थी होते. त्यांपैकी १७६ मुली होत्या. १८३९ सालच्या वार्षिक अहवालातील माहितीनुसार स्कॉटिश मिशनने चालविलेल्या मुंबईतील सर्व शाळांतील मिळून एकंदर ५४७ मुली मराठी माध्यमातून शिकत होत्या. १८२६-१८२७ साली मिशन यांच्या सर्व शाळांत मिळून ३०० होत्या. त्यांची संख्या १८४९-१८५० साली २००० झाली. या मुलीना शाळांत येण्यासाठी पैसे द्यावे लागत. ‘’ असे प्रतिभा रानडे यांनी आपल्या ` स्त्रीप्रश्नांची चर्चा: एकोणिसावे शतक’ या पुस्तकात लिहिले आहे.
विल्सन यांनी २९ मार्च १८३२ रोजी अंब्रोळी इंग्लिश स्कुल सुरु केली. या शाळेची परिक्षा सार्वजनिक रीतीने होई, या शाळेला नंतर कॉलेज डिव्हिजन जोडण्यात आले. या शाळेत इंग्रजी वाचन, व्याकरण, गणित, भूमिती, भूगोल इतिहास बायबल हे विषय शिकवले जात असत.’’
नाजूक प्रकृतीच्या मार्गारेट विल्सन यांच्या आरोग्यावर विपरीत परिमाण झाला आणि काही दिवस आजारी पडल्यानंतर त्यांचे १९ एप्रिल १८३५ला मुंबईतच निधन झाले. मृत्युशय्येवर असताना मार्गारेट यांनी `शक्य असल्यास मुलींच्या शाळेचे कार्य त्यांच्यानंतरही चालू ठेवावे'' अशी कळकळीची विनंती जॉन विल्सन यांना केली. पत्नीच्या या विनंतीने हेलावून गेलेल्या विल्सन यांनी मार्गारेटच्या दोन्ही बहिणींना या कामासाठी भारतात येण्याची विनंती केली.
मार्गारेट यांच्या या दोन्ही बहिणी रूढार्थाने मिशनरी नव्हत्या तरीही त्यांनी विल्सन यांच्या विनंतीला होकार दिला आणि त्या दोघी स्वखर्चाने स्कॉटलंडहून भारतात १८३७ साली आल्या.
मार्गारेट यांच्या दोन भगिनी मुंबईत मिशनकार्यासाठी आल्या या घटनेचा स्कॉटलंडमध्ये मोठा प्रभाव पडला.स्कॉटलंडच्या महिलांनीं भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन कॅप्टन सेंट क्लेर जेम्सन यांनी केले. त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून स्कॉटिश लेडीज असोसिएशन फॉर फिमेल एज्युकेशन इन इंडिया या संस्थेची मार्च १८३७ मध्ये स्थापना झाली. मिशनरींच्या पत्नींनी स्त्रीशिक्षणासाठी सुरु केलेल्या कामासाठी आर्थिक मदत पुरवणे आणि भारतात पूर्णवेळ कार्य करण्यासाठी स्कॉटलंडहून अविवाहित महिला स्कॉटलँडवरून पाठवणे ही या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये होती.
मिस रीड या पहिल्या मिशनरी महिलेचे १८३८ ला भारत आगमन झाले, मात्र वर्षभरात त्यांचे निधन झाले. मेडल जेलट या दुसऱ्या महिलेने त्यांची जागा घेतली. मात्र कॉलराने त्यांचा लगेचच बळी घेतला. मार्गारेट विल्सन यांची बहीण मिस अँना बेना यांचेसुद्धा १८४१ साली निधन झाले. दुसरी बहीण हे बेना यांचे रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याशी विवाह झाला, त्यांचेही लग्नानंतर काही वर्षातच निधन झाले.
ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी भारतात आलेल्या या मिशनरींचे कार्य मात्र पूर्णतः व्यर्थ गेले नव्हते. बोर्डिंग स्कुलमधल्या सहा मुलींनी १८३८ साली बाप्तिस्मा घेतला आणि त्यानंतर १८४० मध्ये आणखी सहा मुली ख्रिस्ती झाल्या होत्या.
शिक्षणाचे कोणते उद्दिष्ट्य आपल्यासमोर आहे हे स्पष्ट करणारा लेख विल्सन यांनी `ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेकर'' मध्ये लिहिला. ``मानवसेवा हे ख्रिश्चनांचे प्रमुख कर्तव्य आहे. या सेवेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ज्ञानदान. सर्वांत चांगले ज्ञान म्हणजे धर्मसत्याचे ज्ञान. त्यानंतरचा क्रम कला आणि विज्ञान यांचा येतो. या ज्ञानालाच उपयुक्त ज्ञान असे आज संबोधले जाते. या ज्ञानाचा प्रसार शक्य होईल तेवढा करणे जे आपले (ख्रिश्चनांचे ) कर्तव्य आहे’’ असे त्यांनी म्हटल्याचे नरेंद्र चपळगावकर यांनी नमूद केले आहे.
धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी यांच्या धर्मांतरांनंतर पारशी लोकांनी आपल्या मुलांना विल्सन यांच्या शाळेतून काढून घेतले आणि ही शाळा काही काळ जवळपास ओस पडली.
जॉन विल्सन यांनी आपली शाळा मुंबईत फोर्ट येथे हलवली आणि जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूट या नावाने ही शाळा प्रसिद्ध झाली. जॉन विल्सन यांनी आपली शाळा मुंबईत फोर्ट येथे हलवली आणि जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूट या नावाने ही शाळा प्रसिद्ध झाली. जॉन विल्सन यांनी मुंबईत फोर्ट येथे उघडलेल्या शाळेत म्हणजे जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूट मध्ये अनेक वर्षे मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट हे इतर स्कॉटिश मिशनरीसुद्धा शिकवत असत.
जॉन विल्सन, रॉबर्ट नेस्बिट आणि जॉन मरे मिचेल यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूट या संस्थेच्या आणि शाखांच्या कामांत सतरा वर्षे एकत्रितरित्या मिशनकार्य केले. मुंबईत १८२६ साली कार्य सुरु करणारे नेस्बिट यांचे १८५५ साली निधन झाले आणि या तिघांची ही भागीदारी संपुष्टात आली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती.
या पारशी धर्मांतरीत मुलांना जॉन विल्सन यांनी कोंडून ठेवले आहे आणि त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात यावे अशी विनंती करणारा `हेबीअस कॉपर्स’ ; अर्ज पारशी समाजाच्या वतीने मुंबईतील सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला. या अर्जात जॉन विल्सन यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
कंपनी सरकारच्या अमदानीत भारतात पहिल्यांदा सर्व नागरिकांना समान मानणाऱ्या ब्रिटिश कायद्याचे राज्य सुरू झाले होते. `हेबीअस कॉपर्स’ पेटिशन म्हणजे कोंडून ठेवलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर आणले जावे अशी विनंती करणे. या कायद्यानुसार भारतात न्यायालयात आलेले हे बहुधा पहिलेच प्रकरण असावे.
मुंबईत स्कॉटिश मिशनरींच्या प्रभावाने परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात श्रीपत शास्त्रीला उभे करण्यात आले तेव्हा न्यायाधीश एरस्किन पेरी यांनी बारा वर्षाच्या अज्ञान मुलाचे धर्मांतराबाबतचे मत मुळी विचारात घेण्यासारखेच नाही, असे जाहीर केले. हा निवाडा देऊन त्या लहान मुलाला ताबडतोब त्याच्या वडलांकडे सोपवण्याचा आदेश न्यायाधिशांनीं दिला. तेव्हा ``;पण मूर्तिपूजा करण्यास मला का भाग पाडले जात आहे ?’’ त्या मुलाच्या प्रश्नाकडे अर्थात सरळसरळ दुर्लक्ष करण्यात आले आणि नारायण आणि श्रीपत या दोन भावांची अशाप्रकारे ताटातूट झाली.
यापैकी नंतर रेव्हरंड झालेल्या नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले, पुण्यात त्यांनी काम केले आणि नंतर मराठवाड्यात बेथेल हे ख्रिस्ती लोकांचे एक नगरच वसवले. नरेंद्र चपलगावकर यांनी या बेथेल गावावर एक पूर्ण प्रकरणच लिहिले आहे.
नारायणशास्त्री आणि श्रीपतशास्त्री शेषाद्री यांच्या संदर्भांतल्या हेबीअसं कॉपर्स खटल्यात निवड देणाऱ्या न्यायाधीश एरस्किन पेरी यांचे नाव लक्षात ठेवण्यासारखे आहे. काही काळानंतर पुण्यात त्यांची वेगळ्या पदावर नेमणूक झाली होती आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रांत त्यांचे नाव विविध संदर्भांत झळकत असते.
जोतिबा फुले यांचे इंग्रजी शिक्षण स्कॉटिश मिशन शाळेत झाले. दरम्यानच्या काळात जेम्स मिचेल, मरे मिचेल, कँडी, इज्देल, डॉ. जॉन विल्सन (मुंबईतील विल्सन हायस्कूल व विल्सन कॉलेजचे संस्थापक) यांच्याशी त्यांचा बराच संबंध आल्यामुळे ख्रिस्ताने शिकविलेल्या मानवतावादाचा आणि ख्रिस्ती मिशनरींच्या समर्पित जीवनाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला.
मार्गारेट आणि जॉन विल्सन यांच्या सेवेतून अंब्रोली चर्च, विल्सन कॉलेज, विल्सन हाय स्कूल, सेंट कोलंबा गर्ल्स स्कूल वगैरे शैक्षणिकसंस्था २०० वर्षापूर्वी सुरु झाल्या. पुढील काळात म्हणजे १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. देशातील या पहिल्यावहिल्या विद्यापीठाचे उपकुलगुरूपद हे पद जॉन विल्सन यांना १८६९ साली देऊन शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दाखल घेतली गेली.
भारतात पहिल्यांदाच प्राथमिक शाळा ते उच्च शिक्षण अशी सेवा उपलब्ध करून देऊन शिक्षणक्षेत्रात मोठी मजल मारणाऱ्या रेव्हरंड डॉ. जॉन विल्सन यांना आधुनिक भारतीय शिक्षणक्षेत्रातील पितामह म्हणता येईल.
^^^
Camil Parkhe, December 27, 2023

 स्कॉटिश शाळांत सावित्रीबाई, जोतिबा विद्यार्थी आणि नंतर जोतिबा शिक्षकसुद्धा

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अमेरीकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाई, त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन, मार्गारेट आणि डॉ. जॉन विल्सन, जेम्स मिचेल, मिसेस मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात.
सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुले यांच्या जडणघडणीत पुण्यातले स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, रेव्हरंड जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मॅकेंझी मिचेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८२९ साली पुण्याचा दौरा केला आणि प्रवचने दिली. तेथे त्यांचे चांगले स्वागत झाल्याने स्टीव्हन्सन यांनी १८३० साली पुण्यातच पुण्यात स्कॉटिश मिशनचे शैक्षणिक आणि धार्मिक काम सुरु केले. संस्कृत आणि मराठीवर जॉन स्टिव्हन्सन यांचे कमालीचे प्रभुत्व होते, प्राच्यविद्यापंडित म्हणूनही त्यांची एक वेगळीच ओळख आहे.
पुण्याला स्थायिक झाल्यानंतर जॉन स्टिव्हन्सन यांनी या शहरात एक इंग्रजी शाळा सुरु केली होती. पुण्यातल्या सर्व जातींच्या आणि समाजघटकांनी या शाळेचे कौतुक केले. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला मुंबईप्रमाणेच पुण्यातही इंग्रजी शाळा सुरु करायच्या होता. त्यामुळे स्टिव्हन्सन यांनीं आपली शाळा 1833 साली कंपनी सरकारकडे सुपूर्द केली.
विशेष म्हणजे रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन यांनी सुरु केलेल्या आणि नंतर ईस्ट इंडिया सरकारकडे सुपूर्द केलेल्या या शाळेतच जोतिबा फुले आणि त्यांचे सहकारी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर वगैरेंनी आपले शिक्षण घेतले होते.
``आपल्या विद्यार्थिदशेतच जोतीने सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्याशी अभंग अशी मैत्री जोडली. जोतीच्या ह्या गोवंडे मित्राचा जन्म १८२४ मध्ये पुण्यात झाला. तो ब्राह्मण कुटुंबातील होता. त्याने दृढनिश्चय आणि अखंड उद्योगशीलता या गुणवत्तेवर आपल्या पुढील आयुष्यात मोठीच प्रगती केली. तो स्कॉटिश मिशन शाळेत असताना जोतीचा स्नेही झाला. आणि पुढे बुधवारवाड्यातील सरकारी शाळेत ते दोघे शिकत असताना त्यांचा स्नेह दृढ होत गेला. ही शाळा स्टिव्हन्सन नावाच्या गृहस्थाने सप्टेंबर १८३२ मध्ये काढली होती. ती पुढे त्याने सरकारच्या स्वाधीन केली’’ असे जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे.
``शाळेत येणान्या उच्चवर्णीय मुलांशी लवकरच त्यांच्या ओळखी झाल्या. त्यांपैकी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राह्मण विद्यार्थी त्यांचे जिवलग मित्र बनले आणि त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टिकून राहिली. वाळवेकर हे तर अखेरपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे होते. 'सदसद्विवेकी सुबोधाचा दाता। गृहिणीचा पिता जोती मित्र अशा शब्दात त्यांनी या आपल्या मित्राचे गुणवर्णन केले आहे.’’ असे गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे.
``जोती आपले शिक्षण पूर्ण करीपर्यंत मिशन शाळेत जात होता. त्या काळी इंग्रजी शिक्षणासाठी महाराष्ट्रात महाविद्यालय नव्हते. इंग्रजी शिक्षण देणारी तशी मोठी एखादी संस्थाही नव्हती. याच दिवसांत सदाशिव गोवंड्यांनी मोरो विठ्ठल वाळवेकर या ब्राह्मण मित्राशी आणि वाळवेकरांचा ब्राह्मणमित्र सखाराम यशवंत परांजपे यांच्याशी मैत्री जोडली. मोरो वाळवेकर हा गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याचेही शिक्षण एका मिशनशाळेत झाले होते. वाळवेकर आणि परांजपे हे जोतीचे परम स्नेही झाले. पुढे ते दोघे जोतीच्या कार्यातील मोठे सहकारी म्हणून गाजले''. असेही कीर यांनी लिहिले आहे.
जोतिबांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळा चालवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचा उल्लेख करता येईल. स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत जोतिबांनी १८४१ ते १८४७ या काळात आपले माध्यमिक इंग्रजी शिक्षण पूर्ण केले.
सावित्रीबाईनी पुण्यात मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे घेतले असा उल्लेख हरी नरके आणि इतर संशोधक करतात त्या मिसेस मिचेल म्हणजे रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल.
जोतिबांनी सावित्रीबाईंच्या मदतीने आपल्या शाळा वेतन न घेता चालू ठेवल्या. त्याकाळात अर्थार्जनासाठी जोतिबा फुले स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळांत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्य करत होते. मेजर थॉमस कँडी काही काळासाठी मायदेशी गेल्यावर रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे पुण्यातल्या १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे - नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे - प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.
``आम्ही पाहिलेले फुले'' या हरी नरके संपादित आणि महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सत्यशोधक कार्यकर्ते शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील यांनी १८९१ साली लिहिलेले जोतिबांचे अल्पचरित्र समाविष्ट केले आहे. त्यात सावित्रीवाई फुले यांनीं मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असे म्हटले आहे:
``जोतीरावांचे शिक्षण बुडाल्याने सगुणाबाईचा जीव तिळतिळ तूटत होता. तिने लिजिटसाहेबामार्फत गफार बेग मुनशीचे वजन गोविंदरावांवर पाडून त्यांचे मन वळविले. त्यामुळे जोतीराव १-१-१८४३ पासून बुधवारवाड्यातील शाळेत पुन्हा जाऊ लागला. त्याच वेळेपासून सगुणाबाईच्या आग्रहामुळे ते सगुणाबाईस व सावित्रीबाईस शिकवू लागले. सगुणाबाई पूर्वी जोतीरावांकडून थोडेफार शिकली होती पण ती विसरून गेली होती. दोघीहि एकमेकांच्या सहवासात चढाओढीने शिकत होत्या. जोतीराव अभ्यासू व हुशार मुलगा होता. त्याने प्रत्येक वार्षिक परीक्षेत निरनिराळी पुस्तके बक्षिसे मिळविली होती. पत्नीला व माईला मराठीचे सर्व शिक्षण दिल्यावर त्यांना मिसेस मिचेल यांच्या अत्याग्रहावरून शिक्षणिकीचा कोर्स देण्यासाठी त्यांनी ठरविले. हा कोर्स नार्मल स्कूलमध्ये मिचेलबाईच चालवीत होत्या. या बाईंनी सावित्रीदेवीची व सगुणाबाईची परीक्षा घेऊन त्यांना तिसऱ्या वर्षाचा प्रवेश दिला. त्यांचे तिसरे वर्ष (१८४५-१८४६) साली पास झाले. (१८४६-१८४७) साली ४ वर्षाची परीक्षा देऊन त्या स्कूलमधून बाहेर पडल्या. या दोघीही पुढे उत्तम ट्रेड मिस्ट्रेस म्हणून नावाजल्या. १८४७ साली महात्मा जोतीराव इंग्रजी शिक्षणाची शेवटची परीक्षा उत्तम तन्हेने पास झाले
सनातनी मंडळींच्या प्रखर विरोधामुळे ही शाळा जोतीबांना बंद करावी लागली.
``जोतीरावांच्या वडिलांनी तर त्यांना केव्हाच घरातून घालवून दिले होते. ना पित्याचा आश्रय, ना स्वतःचा धंदा. त्यामुळे त्यांची संसारात फारच आर्थिक कुचंबणा झाली. अशा परिस्थितीत त्यांना पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करणे भाग पडले. ही शाळा ख्रिस्ती- मिशनऱ्यांनी १८५४ जुलै महिन्यात मिशनच्या आवारात सुरू केली होती. मुलींचे वसतिगृहही तेथेच होते. त्या संस्थेमध्ये टाकलेली मुले, अनाथ मुले आणि ख्रिस्तीधर्म स्वीकारलेल्या गरीब लोकांची मुले आणि ज्यांच्यावर मिशनचा पूर्ण ताबा होता अशी मुले त्या संस्थेत शिकत होती. जेवणाखाण्याची तेथेच व्यवस्था असे’’ असे कीर यांनी आपल्या ,`महात्मा जोतीराव फुले' या पुस्तकात लिहिले आहे.
धनंजय कीर यांनी लिहिले आहे कि ``पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेची माहिती देताना एका इतिवृत्तात चालकांनी असे म्हटले आहे की, सध्या आमच्याकडे वसतिगृहामध्ये राहणारी १३ मुले आहेत. दिवसा त्यांचे शिक्षण होत असताना दुसरी ४० मुले त्यांच्याबरोबर शिकतात. पुण्यातील एक अत्यंत उत्साही आणि निपुण शिक्षक आमच्या शाळेत दररोज चार तास शिक्षणाच्या कार्यात साह्य करावयास लाभला आहे याविषयी आम्हांला समाधान वाटते. ते म्हणजे परोपकारबुद्धीचे आणि कनिष्ठ जातींच्या मुलींच्या शिक्षणासाठी अविरत झगडणारे आणि ज्यांच्या कार्याची शिक्षामंडळीने आणि स्वतः सरकारने मनापासून प्रशंसा केली, ते जोतीराव फुले होत. त्यांनी आमच्या मोठ्यात मोठ्या शिक्षणविषयक आशा फलद्रूप केल्या. ''
महात्मा फुलें स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत शिक्षक होते याचा उल्लेख ज्ञानोदय या मासिकात जोतिबांच्या निधनानंतर १८ डिसेंबर १८९० रोजी लिहिलेल्या अग्रलेखातसुद्धा पुढीलप्रमाणे आढळतो.:
``पुण्यातील मिशनरींनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलीच्या शिक्षणाच्या कामावर पगार देऊन नेमले. येथे कामावर असता त्यांनी मिशनरी लोकांच्या सुचनेवरुन ख्रिस्तीधर्माकडे विशेष लक्ष पुरविले-''
डॉ. विल्यम हंटर शिक्षण आयोगापुढे पुणे येथे १९ ऑकटोबर १८८२ रोजी सादर केलेल्या निवेदनात महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्याला ख्रिस्ती मिशनरींनीं मुलींसाठी सुरु केलेल्या शाळांमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली, आपण आपल्या शाळा नंतर मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या, तसेच ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत आपण स्वतः शिक्षक होतो असे नमूद केले आहे.
जोतिबांनी या निवेदनाच्या पहिल्या परिच्छेदांत म्हटले आहे :
`` माझा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील खेडी यापुरताच प्रामुख्याने आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ (१८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले…… या संथांमध्ये मी सुमारे नऊदहा वर्षे कार्य करीत होतो; पण काही विशिष्ट परिस्थितीमुळे ते कार्य मी सोडले. सध्या समितीने मुलींच्या शाळांची व्यवस्था शिक्षणखात्याकडे सुपूर्द केली असून मिसेस मिचेलच्या देखरेखीखाली त्या शाळा अद्यापही चालू आहेत.’’
महारमांगादी कनिष्ठ वर्गीयांची शाळासुद्धा आजपर्यंत चालू असली तरी तिची स्थिती फारशी समाधानकारक नाही. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे. आता उल्लेखिलेल्या शाळांमध्ये मी जे कार्य केले, तोच शैक्षणिक क्षेत्रातला माझा महत्त्वाचा अनुभव म्हणता येईल.''
जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे.
``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’ जोतिबांचे हे अल्पचरित्र’ 'आम्ही पाहिलेले फुले' या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.
स्कॉटिश मिशनरी आणि विशेषतः जॉन मरे मिचेल आणि जोतिबा फुले यांच्या नातेसंदर्भात ज्येष्ठ संशोधक रा ना. चव्हाण यांनी पुढील शब्दांत लिहिले आहे:
``इंग्लंड आणि स्कॉटलंडमधून प्रोटेस्टंट मिशनऱ्यांच्या तुकड्या भारतात आल्या. मुंबईस डॉ. विल्सन, कलकत्यास डॉ. डफ. पुण्यास डॉ. मिचेल येऊन थडकले. हे सारे स्कॉच होते. हे लोक मराठी शिकले. कमीअधिक संस्कृत शिकले आणि धर्मप्रचार करू लागले. तरुणांच्या ओळखी करायच्या, त्यांना घरी बोलवायचे, शक्य झाल्यास त्यांच्या घरी जायचे, स्वतःच्या घरात लहानलहान चर्चा मंडळे काढायची, पाहुण्यांना ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून द्यायचा, अशी या मिशनऱ्यांची पद्धत होती. अजून आहे. या पद्धतीस अनुसरून मिचेलसाहेबांनी तरूण फुल्यांची ओळख करून घेतली, दोघांचा खूपच परिचय वाढला. चर्चा झाल्या. मिचेलच्या चरित्रात फुल्यांचे उल्लेख येतात. गाठीभेटीत काय घडले हे समजण्यास मार्ग नाही. परंतु अंदाज करण्यास पुष्कळच आधार आहेत.’’
ख्रिस्ती मिशनरी आणि महात्मा फुले दाम्पत्य यांचे अशाप्रकारचे अतूट नाते आणि ऋणानुबंध होते. जोतिबा फुले अनेकदा हे ऋणानुबंध व्यक्त करतात.
या मिशनरींनीं सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची व्यक्तिमत्वे घडवण्यात आपल्या परीने योगदान केले. मात्र गेल्या दोनशे वर्षांच्या कालखंडानंतर आजही या व्यक्तींविषयी, महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासांत या मिशनरींच्या वैयक्तिक चरित्रांवर, कार्यांवर आणि योगदानांवर आजही पुरेसा प्रकाश पाडला गेलेला नाही.
(मूळ प्रसिद्धी, `ख्रिस्तायन' ऑनलाईन नाताळ अंक २०२३)
Camil Parkhe December 29, 2023

मिसेस मिचेल आणि रेव्हरंड जेम्स मिचेल.

मुलींसाठी आणि शुद्रांसाठी पहिली शाळा काढणारे एतद्देशीय दाम्पत्य सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या दोघांचेही शिक्षक होते अनुक्रमे मिसेस मार्गारेट शॉ मिचेल आणि त्यांचे पती रेव्हरंड जेम्स मिचेल.

महात्मा फुले स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत शिकले आणि मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण करून सावित्रीबाई प्रशिक्षित शिक्षिका बनल्या हे सर्वश्रुत आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस - १८२२ साली- स्कॉटिश मिशनने कोकणात आपले कार्य सुरु केले, नंतर मुंबईत आणि पुण्यात आपली केंद्रे स्थापन केली. या स्कॉटिश मिशनरींमध्ये सर्वांत ज्येष्ठ होते जेम्स मिचेल.
रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन यांच्यासह त्यांनी पुण्यात १८३० साली स्कॉटिश मिशन उभारले, स्टिव्हसन्स यांनी लगेचच मिशनरीपद सोडून ईस्ट इंडिया कंपनीचे चॅप्लेनपद स्वीकारले. जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल मात्र पुण्यात शैक्षणिक आणि मिशनकार्य करत राहिले.
आपले विद्यार्थी असलेल्या फुले दाम्पत्याने पुण्यात शाळा सुरु करून भारतात मोठी सामाजिक क्रांती केल्याबद्दल जोतिबांचा शालजोडी देऊन झालेल्या जंगी सत्कारात निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचे सुख आणि भाग्य जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांना लाभले.
पुण्यात साडेतीन दशके कार्यरत राहून या देशातच महाबळेश्वर येथे रेव्हरंड जेम्स मिचेल यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी आपला देह ठेवला.
जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांच्याविषयी खूप काही एकोणिसाव्या शतकातच लिहिले गेले आहे. स्कॉटिश मिशनच्या दस्तऐवजांत आणि अनेक पुस्तकांत ही माहिती आढळते.
जेम्स मिचेल आणि नॉमल स्कुल चालवणाऱ्या मिचेलबाईंचा उल्लेख जोतिबांचे आणि सावित्रीबाईंचे बहुतेक सर्वच चरीत्रकार करतात. मात्र यापैकी कुठल्याही चरित्रांत महात्मा फुले यांचे शिक्षक म्हणून जेम्स मिचेल यांचा कधीही उल्लेख होत नाही.
त्याचबरोबर नॉर्मल स्कुलच्या मिचेलबाई म्हणजेच जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल हे स्पष्ट केले जात नाही.
फुले दाम्पत्याविषयी लिहिलेल्या पुस्तकांच्या अखेरच्या पानांत संदर्भांची यादी चाळली कि यामागचे कारण उलगडते.
बहुतेक चरीत्रे ही आधी लिहून गेलेल्या ग्रंथांवर आणि चरित्रांवर आधारित असतात, त्यात भर अशी क्वचितच टाकलेली दिसते. `समग्र फुले' चे संपादक हरी नरके यांनी आपल्या संपादकियात याबाबत खंत व्यक्त केली आहे.
मागच्या महिन्यात तर्कशास्त्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महात्मा फुले यांचे लिहिलेले आणि नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले एक संक्षिप्त चरित्र मोठ्या उत्सुकतेने हाती घेतले आणि घोर निराशा झाली.
अर्थात याबाबत तर्कतीर्थांनी स्वतःच खुलासा केला आहे. थोड्या कालावधीत त्यांच्याकडून या चरित्राची मागणी केली आणि त्यामुळे धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या चरित्रावर पूर्णतः आधारीत त्यांनी हे चरित्र लिहिले आहे.
दुसरे म्हणजे फुले दाम्पत्याच्या बहुतेक चरित्रांत आणि पुस्तकांत संदर्भसूचीमध्ये दिलेले बहुतांश संदर्भ मराठी पुस्तके असतात.
त्यामुळे इंग्रजी साहित्यात फुले दाम्पत्याविषयी आणि त्याकाळासंबंधी असलेल्या प्रचंड आणि बहुमूल्य माहितीकडे या चरित्रकारांचे दुर्लक्ष होते.
त्यामुळेच सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रांतील अनेक बाबींकडे आजही प्रकाशझोत टाकला गेला नाही, असे म्हणता येईल.
म्हणूनच फुले दाम्पत्याला शिकवणाऱ्या जेम्स मिचेल आणि मिचेलबाई या स्कॉटिश मिशनरी दाम्पत्याचे पहिलेच छोटेखानी चरित्र लिहिताना मला खूपच आनंद वाटला.
Camil Parkhe, December 31, 2023

 गोपाळराव जोशी.. सिर्फ नाम ही काफी है..

अव्वल ब्रिटिश अमदानीचा इतिहास गोपाळराव जोशींच्या उल्लेखावाचून पूर्ण होऊ शकत नाही इतके त्यांचे महत्त्व किंवा उपद्रवमूल्य आहे.

परदेशात जाऊन डॉकटर होण्याचे शिक्षण घेणाऱ्या डॉ आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून त्यांची एक ओळख आहे.
एक अत्यंत हुशार, विक्षिप्त, ध्येयासक्त व्यक्ती म्हणून त्यांचे वर्णन केले जाते.
आपली पत्नी शिकावी, डॉकटर व्हावी म्हणून त्यांनी काय काय केले नाही ?
लोकमान्य टिळकांचे चरित्रकार न चिं केळकर, रमाबाई रानडे वगैरेंच्या पुस्तकांतून या गोपाळराव जोशींच्या कारवायांविषयी माहिती मिळते.
पुण्यातली ही एक अत्यंत वादग्रस्त वल्ली.
डोकयावरुन पाणी घेऊन बाप्तिस्मा स्विकारुन ख्रिस्ती होणार आणि मग धोतर आणि जानव्यासह रविवारी चर्चमध्ये हजेरी लावून धर्मांतराचा फोलपणा दाखवून देणारी ही व्यक्ती कशी असणार याबाबत फक्त कल्पना करणे शक्य आहे.
तर या गोपाळराव जोशींनी आपल्या बायलाईनसह ``पुणे वैभव'' या त्यांच्याइतक्याच वादग्रस्त नियतकालिकात एक वृत्तांत लिहिला आणि भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात एक प्रकरण लिहिले गेले.
त्या बायलाईनसह प्रसिद्ध झालेल्या बातमीने पुण्यातल्या भल्याभल्या लोकांना जेरीस आणले, यापैकी सर्वात मोठे नाव होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातले हे पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन.
निमित्त काय तर वेताळ पेठेतील म्हणजे आजच्या गुरुवार पेठेतील पंचहौद चर्चच्या एका कार्यक्रमात १४ ऑकटोबर १८९० रोजी काही लोकांनी चहापान केले, ख्रिस्ती लोकांच्या घरात बिस्किटे खाल्ली आणि धर्मद्रोही कृत्य केले.
गोपाळरावानी हे सर्वकाही घडवून आणले होते. Planned and executed.
“भरलेल्या जठरांत एकादा विषारी कण गेला म्हणजे जसे सगळे अन्न ढवळून निघते, तशी स्थिती पुणे-वैभवाच्या या अंकाने सगळ्या पुण्याची केली.'' इति न चिं केळकर
गोपाळरावांच्या त्या बातमीने अनेकांना कामाला लावले, खुद्द शंकराचार्याना या प्रकरणी चौकशीसाठी ग्रामण्य (आयोग) नेमावा लागला, आपल्यामागची ही पीडा संपावी म्हणून टिळकांना दोनदा प्रायश्चित घ्यावे लागले.
समाजातील सर्व लोकांचा म्हणजे जहाल, कर्मठ, सनातनी मंडळींची दांभिकता, ढोंगीपणा, आचारविचारातली विसंगती चव्हाट्यावर आणणे हा एकमेव उद्देश या स्टिंग ऑपरेशनमागे होता, तो बहुतांशी सफल झाला हे नंतर दिसून आले.
आजच्या पत्रकार दिनानिमित्त गोपाळराव जोशी यांना विसरता कामा नये.
त्यांच्यासारखे काम करण्याचे धाडस हल्ली कुठलाही पत्रकार करेल असे वाटत नाही.
Camil Parkhe, January 6, 2024